Skip to main content

मनाचे खेळ!

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 26/03/2010 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
एक न असलेल्या अंधऱ्या खोलीतल्या दोन न असलेल्या खुर्च्या. मध्यभागी न टांगलेला दोनशे वॉटचा दिवा न हिंदोळणारा. तिथे उपस्थित न असलेल्यांच्या सावल्या तशाच मंद गतीने न हिंदोळवणारा. त्या खोलीच्या भिंती सहा इंच जाड दगडी (न असलेल्या - आता हे पुन्हा पुन्हा सांगत नाही). एका खुर्चीवरच्या व्यक्तीला खुर्चीला जखडून ठेवलेलं. तिला आपण अ म्हणू. अज्ञात, अनॉनिमस, अविचारी म्हणून... दुसऱ्या, समोरच्या खुर्चीवर तात्या. तात्या तो दिवा फिरवून त्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर भणभणता झोत टाकतात. "शेवटचं विचारतो. बोल, कोण आहेस तू?" दुर्दैवाने त्यांना चेहेऱ्याच्या जागी एका गहन काळिम्यापलीकडे काहीच दिसत नाही. कारण ती व्यक्ती नसून ती एक आयडी असते. धूसर. शरीरहीन. त्या खोलीमध्ये खरंतर सर्वच आयड्या आहेत. मुसु, चतुरंग, आणि इतर काही जाहीर न केलेले संपादक - सगळे आयडीरूपात. का कोण जाणे पण पूर्णपात्रेही आहेत. त्यांच्यापैकी कोणीही त्या खुर्चीत असू शकेल. खुद्द तात्याच दोन्ही खुर्च्यांत बसलेले असू शकतील. टीआरपी साठी काहीही... "शुद्धलेखन? आणि मिपावर?" तात्या पुन्हा गरजतात. "मी काहीच अशुद्ध लिहिलं नाही..." समोरच्या खुर्चीवरून केविलवाणा आवाज येतो. त्या आवाजावरही गहन काळिमा. आयड्यांचं हे असंच असतं. आवाज, रूप, लेखनपद्धतीवरून काही म्हणता काही सांगता येत नाही. सगळी ऐयारी.... "हरामखोरा, लोकांच्या शुद्धलेखनाबद्दल बोलतोय मी..." अ च्या मुस्कटात मारून तात्या बोलतात. आयड्यांना लागत नाही, तरी पलीकडून गहन काळिम्यातलं कळवळणं येतं. "पण, पण, मी फक्त लेखन सुधारलं. शेवटी संपादक आहे मी." "संपादक? संपादकपदाला तू काळिमा फासतो आहेस" तात्यांचा राग अनावर होत चाललेला. कोणत्याही क्षणी ते गायला लागतील अशी परिस्थिती. "नाहीतर काय, संपादक असून संपादन करतोस?" इतर सावल्यांमधून एक आवाज. "तेच ना. आता तू काम केलंस तर वाईट पायंडा नाही का पडणार?" "लोकांना वाटेल की आम्ही पण काही काम करावं. मग असंबद्ध प्रतिसाद, निरर्थक बडबड हेसुद्धा काढून टाकायला लावतील." "नाहीतर काय. हलकट मेला!" "अरे मेला काय म्हणतोस, कदाचित मेली अधिक योग्य असेल" दुसरा एक आवाज घाईघाईने त्याला सांगतो... "चूप. आता तू माझ्या शुद्ध बोलण्याच्या चुका काढतोस? कदाचित तूच त्या खुर्चीत असशील..." "तसं नाही. अनुपस्थित संपादकांपैकी किमान दोन तरी ताई आहेत ना. म्हणून म्हटलं." "सगळेच त्यातल्या सगळ्यांना ताई म्हणणार नाहीत बरं का" एक खवचट आवाज. "ए गब्बस रे झंप्या" "ए शेंबड्या..." ही बडबड फार मुद्दा सोडून चाललेली आहे हे तात्यांच्या ध्यानात येतं. "अरे ही काय पददलित पुरुषांच्या हक्कविषयक चर्चा आहे का, वाटेल तशी वाहावायला? हा कोण आहे हे शोधून काढायचंय आपल्याला..." सगळे गप्प बसले तरी एकमेकांना गुपचुप चिमटे काढणं चालूच राहतं. पण सुदैवाने आयड्यांना चिमटे टोचत नाहीत. तात्या पुन्हा समोर वळतात. म्हणजे वळून मागे खेकसायचे थांबून परत सरळ होतात. "शुद्धलेखन सुधारल्याबद्दल माझ्याकडे तक्रारी आल्या ठाऊक नाही का तुला?" "पण त्यात मी वाईट काय केलं? तो माझा आग्रह आहे." "वाईट काय केलं? किती लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या कल्पना आहे का तुला? एकींनी जाहीर तक्रार केली. आणि म्हटलं की त्या चुका दाखवलेल्या पाहून त्यांना कोणीतरी डोळे वटारल्यासारखं वाटलं व ताबडतोब त्यांनी मॅसोचिस्ट बडवेगिरी सुरू केली." "ती शुद्धलेखनाची चूक तर नव्हती ना?" मागून एक खवचट आवाज व आयड्यांच्यात पिकलेली खसखस... "गपा रे फोकलिच्यांनो." एरवी खवचटपणाला मनापासून दाद देणारे तात्या आता मूडमध्ये नसतात. त्यांचा मूड असा की त्या क्षणी साक्षात दीदींच्या तोंडचा यमन लावला असता तरी त्यांनी ते स्पीकर्स तोडून फोडून टाकले असते. बाझवला संपादक मिपावर शुद्धलेखन काढतो म्हणजे काय! मुळात स्वत:च्या अधिकाराने काही करतोच म्हणजे काय! उद्या कोणाचे प्रतिसाद असंबद्ध म्हणून उडवतील. परवा नाडीचे धागेच्या धागे जातील परस्पर... हे थॉट पोलिसिंगला आमंत्रणच आहे. मी एवढं मुक्त, लोकशाहीवादी संस्थळ काढलं आणि... "कदाचित तुमच्यापैकीच कोणीतरी त्या खुर्चीत असेल..." तात्या. "मी नाय ब्वॉ." चतुरंग आत्मशोध घेऊन शांतपणे सांगतात. यावेळी हा शोध पटकन होतो कारण नुकताच त्यांनी आत्मा शोधासाठी क्रॉल करून घेतलेला असतो... "मग मुसु तू?" "मी चुका काढलेल्या नाहीत. मी दोष माथ्यावर घेणार नाही. पाह्यजे तर मी हे सगळं पुन्हा अशुद्ध बोलून दाखवतो." मुसु नुसती धमकी देऊन न थांबता ते बोलून दाखवतो. "पण नुसतं असं सांगून काय सिद्ध होतं?" एक आवाज "सिद्ध करणं सोपं आहे, कारण मी आधीच म्हटलं आहे की मला संपादकपदाची हाव आहे. त्यापायी माझं लेखन बिघडलं असं म्हणणाऱ्या लोकांनासुद्धा फाट्यावर मारायला तयार आहे.." "तां मात्र बरीक खरांच हां...." हे किती आवाज आहेत मलाही माहीत नाही. पण मधूनमधून येतात खरे. "तात्या, तुम्ही आम्हाला बोलताय, पण कदाचित तुम्हीच तर नाही ना सुधारणा करणारे?" पूर्णपात्रे "का काही शिव्या वगैरे राहून गेल्या का?" पुन्हा खसखस... तात्या शांतपणे नकार देतात. "नाही, काही शब्दसाधर्म्य दिसलं...म्हणून..." आता मात्र तात्या जाम वैतागलेले. ते पाहून पूर्णपात्रे पवित्रा बदलतात. "मला सापडला." "काय?" एकदम दोनतीन घाबरेघुबरे आवाज. "तात्या तुम्हाला गेल्या पंधरा मिनिटांत व्यनि आला असेल...मी एक बदल मुद्दामच करायला सांगितला, व तो होईपर्यंत टपलो होतो." "नायबा, काही व्यनिबिनी नाही आला." "अरेच्च्या" आता पूर्णपात्रे पूर्णपणे गोंधळलेले. काय करावं कळत नाही. तितक्यात त्यांची सुटका होते. दारावरनं किल्ली फिरवल्याचा आवाज येतो. बिका प्रवेशतात. जणू काही आपण इतका वेळ झोपलेलो होतो असा आव आणत.. "मी काही मिस् केलं का? सापडला का तो हरामखोर संपादक?" सगळे बिकांकडे संशयाने बघत असताना....धागा तुटतो... कारण यापैकी काही झालंच नाही. शुद्धलेखनाच्या चुका अर्थातच कोणीतरी दुरुस्त केल्या असाव्यात. किंवा हरामखोर लेखकांनीच त्या दुरुस्तीचा कांगावा करून संपादकांना बदनाम करण्यासाठी तशा ओळी त्यात टाकल्या असतील... हो, तसंच असेल. पण महत्त्वाची गोष्ट काय, तर थॉट पोलिसिंग वगैरे नाहिच्चे मुळी मिपावर. उगाच लोकं काहीतरी बोलतात. दाखवा कुठे आहे हे सगळं घडलं असं सांगणारा धागा? तो उडालेला नाही, कारण मुळात तो नव्हताच. आणि उडालेला असेल तर तो कदाचित त्यात फारच अशुद्ध काहीतरी लेखन झालं म्हणून उडाला असेल. तसं असेल तर तो शुद्ध होऊन परत येईलच ना. थॉट पोलिसिंग वगैरे केवळ मनाचे खेळ!

वाचने 5600
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

खुलासा - तो धागा माझा होता .... मी उडवला. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

In reply to by शुचि

मी म्हटलं नव्हतं का काहीतरी इनोसंट एक्स्प्लानेशन असेल म्हणून? लेख पडल्याबरोब्बर सहा मिनिटात ते आलं यावरून दुसरं काय दिसतं? त्यात हे उत्तर मूळ धागालेखिकेकडूनच आलं म्हणजे संशयातीतच. आयड्यांचं विश्व म्हणजे काय मेट्रीक्सचं विश्व आहे का की एजंटना कोणाच्याही आयडीत शिरून त्यांच्या नावे काहीही लिहिता यावं? बरं झालं सगळं स्वच्छ झालं ते. आता कसं मळभ दूर झाल्यासारखं वाटतंय. राजेश

>> सगळी ऐयारी.... >> कोणत्याही क्षणी ते गायला लागतील अशी परिस्थिती. >> खुद्द तात्याच दोन्ही खुर्च्यात बसलेले असू शकतील. टीआरपी साठी काहीही... सही....काय फोडलय :) :) :)

जबरा.... *तरी मला संशय होताच शेवटिन प्रवेशकर्त्यावर.... ह. घेणे. * नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

In reply to by नितिन थत्ते

अफाट, कडक, कहर, वगैरे वगैरे... (शु सुधारक संपादकांना सूचना करता येण्याची सुविधा सर्व सदस्यांना दिली* आहे. दिल्या* आहे असे नाही. कालच धनंजयच्या पावाची पाककृती वाचनखूण म्हणून साठवली तर वाचनखुण साठवल्यागेलेली आहे. असे दिसले.) ** ;) ;)

मुसु, चतुरंग, आणि इतर काही जाहीर न केलेले संपादक -
हा हा हा! 'जाहीर न केलेले संपादक..' हे मस्तच रे.. :) लेखही झकास.. तात्या.

सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा. घासकडवींना आपला साष्टांग नमस्कार... कवटी

In reply to by मुक्तसुनीत

लय भारी! मास्तरनेच (धर्म)शाळेचे बिंग फोडावे? ;) -एक सौम्य आणि नेहमीच दाबला जाणारा अंधारातला आवाज. ;)

या मनाच्या खेळातून काय दिसतं माहितीये का? ग्रासस्टँझाज् ना संपादकपदाची हाव आहे. ;) इतकेच नाही तर तात्यांनी त्यांना संपादक करून ते जाहिर करू नये असेही वाटत आहे. ;) (हलके हलके घेणे) रेवती

सदर संपादक आणि वरील लेखक यांच्या कॉमन फ्याक्टर आहे. * भरपूर मोकळा वेळ. * तो आज माझ्याकडेही आहे. :) बाकी, लेख मस्तच. ;) असो. वरील लेखात अंधऱ्या आणि इतर शब्दांत र्‍या योग्य उमटलेला नाही. हौशी संपादकांना चराऊ कुरण आहे.

In reply to by प्रियाली

सदर संपादक आणि वरील लेखक यांच्या कॉमन फ्याक्टर आहे. * भरपूर मोकळा वेळ. *
प्रियालीतै, सदर संपादक आणि लेखक यांचे वेळापत्रक आपणास ठाऊक असावे असे दिसते. हे लोक रिकामटेकडे असल्याचा काही पुरावा आपल्यापाशी आहे का?

कोणत्याही क्षणी ते गायला लागतील अशी परिस्थिती सगळे गप्प बसले तरी एकमेकांना गुपचुप चिमटे काढणं चालूच राहतं. पण सुदैवाने आयड्यांना चिमटे टोचत नाहीत. त्यांचा मूड असा की त्या क्षणी साक्षात दीदींच्या तोंडचा यमन लावला असता तरी त्यांनी ते स्पीकर्स तोडून फोडून टाकले असते. :)) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

हे सारे मनाचेच खेळ आहेत का? संपादकीय विभागाच्या बैठका अशाच होत असतात...

लेख भारीच झालाय....! बाय द वे, हा शुद्धलेखनाचा आग्रह धरणारा संपादक कोण आहे, मला जरा व्य.नि. ने कळवा राव. :S -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर लोकच जास्त शुद्धलेखनाचा आग्रह धरतात असे पाहण्यात आले आहे ... (ह. घे.) ;)

वाचताना खोखो हसलो. अस्सल प्रतिभावंताला आपल्या प्रतिभेचे धुमारे (की घुमारे) फुलवायला फारसा वेळ लागत नाही, काही काही वेळा फक्त एक नवा आयडी घेतला की झाले; असे काहीसे मनात येऊन गेले. शेवटी हेही मनाचे खेळ असतील असे समजून गप्प बसलो. सन्जोप राव वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

हे मनाचे खेळ डोंबार्‍याच्या खेळावानी होन्यासाठि काही संप्रेरके / उद्दिपिके लागतात. ऋषिमुनींना सोम नावाची वनस्पती तेव्हा सापडली होती. तिचे महत्व मी पामराने लोकांना काय बरे सांगावे. त्यातुनच आपल्या प्राचीन वाङमयाला घुमारे काय ते फुटल्याचे ऐकिवात आहे. भास व वास्तव यातील सीमारेषा पुसट करण्यात या संप्रेरकांचा मोठा वाटा असतो. परमेश्वराशी तादात्म्य पावण्यासाठी अंतरे कमी करावी लागतात. त्यासाठी पण ही वापरतात असे बम भोलेनाथ पंथीय सांगतात. आपलाच टाकेश भासघडवी

खतरनाकच! आयला हे वाचायचे राहूनच गेले होते. अफाट लेखणि आहे बुवा तुमची.:) आपल्या प्रतिभेला साष्टांग दंडवत. नील.

=)) =)) =)) बाकी 'मुळामुठेच्या पाण्यातच काही दडलेले आहे का?' असा शोध घेण्याचा काही लोकांनी पूर्वी प्रयत्न केला होता म्हणे. त्या धर्तीवर सॅक्रामेंटो-सॅन ऑक्विनचा तपास करावा लागेल का? ;). असो, बाकी एकंदरीत 'डार्कनेस ऍट नून'ची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी