पुन्हा पुन्हा तो वेडा वसंत हिला खुणावत राहिला, ही पुन्हा पुन्हा त्याच्या आर्जवांना टाळत राहिली. त्याच्यापासून दूर दूर जाण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहिली.
तिची ही असोशी, चलबिचल, अस्वस्थता तिचंच रंगरूप घेऊन आलेल्या देवकन्यांनी जाणली. तिला पुसलं, " का अशी अस्वस्थ तू? होतंय काय तुला?"
हिनं आपलं मन त्या इवल्याशा देवकन्यांपुढे उलगडलं. त्या आनंदल्या, वठलेल्या वृक्षाला पुन्हा पालवी फुटू पहात होती, कोमेजलेली वेल पुन्हा उमलू पहात होती. त्या हसल्या. त्यांनी तिला सांगितलं, "विसर जगाला, जग जरा स्वतःसाठी. लिहीत रहा मनात येईल ते सारं, स्वतःसाठीच. नको कोमेजून जाऊस आता." त्यांनी तिला दिला फुलण्याचा वसा! कसा आहे हा वसा? घ्यावा कसा? वसावा कसा?
मनातली निराशेची जाळ्या-जळमटं काढून टाकावी, उदासीनतेचे रंग खरडून काढून उल्हासाचे, चैतन्याचे रंग भरावे, दारी आशेच्या फुलांचं, स्वप्नांच्या पानांचं तोरण बांधावं, सुंदर शब्दांच्या रांगोळ्या काढाव्या, सूर-तालांचे सनई-चौघडे घुमवावे, कल्पनेचा पाट मांडावा, मनोभावे स्फूर्तिदेवतेची आराधना करावी. ती आली, की तिला डोळ्यांतल्या निर्मळ पाण्यानं स्नान घालावं, आत्म्याचं निरांजन करून भावनांच्या ज्योतींनी तिची आरती करावी. ती प्रसन्न होऊन आशिर्वाद देईल. हा वसा कधीही, कुठेही घ्यावा, पण उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये!
हिनं देवकन्यांकडून वसा घेतला. आपल्या कोशातून बाहेर निघाली. त्या वेड्या वसंताच्या चरणी स्वतःला अर्पण केलं! मनात येईल ते, मनाला वाटेल तसं लिहित राहिली, स्वतःच स्वतःशी वाचत राहिली, देवकन्यांना दाखवत राहिली. पुन्हा सुरवंटाचं फुलपाखरू झालं.
करता करता एक दिवस स्फूर्तिदेवता आली, तिनं विचारलं,"ही शब्द-सुरांची आरास कुणी मांडली?" ही समोर आली, आणि देवतेच्या चरणी लागली. स्फूर्तिदेवता हिला पाहून प्रसन्न झाली. हिच्यातला आमूलाग्र बदल देवतेला सुखावून गेला. देवतेनं काय केलं? हिचे शब्द आभाळाच्या को-या पाटीवर मांडले. खट्याळ वा-यानं ते ओंजळीत घेतले आणि दिले उधळून आसमंतात! सगळ्या सीमा ओलांडून सातासमुद्रापल्याड पोहोचले शब्द तिचे! कुणी त्यांच्यात प्रतिसादांचे, कौतुकाचे रंग भरले आणि त्यांच्या चित्तवेधक रांगोळ्या झाल्या. मैत्रीचा, स्नेहाचा गंध माळून त्यांची फुलं झाली, आत्मीयतेच्या, आपुलकीच्या सुरांत गुंफून त्यांची गीतं झाली, प्रासादिकतेच्या कोंदणात जडून त्यांचे मंत्र झाले! ती हरखून गेली. तिनं मनोभावे देवतेला वंदन केलं. तशी देवतेनं तिला आशिर्वाद दिला, 'फुलत रहा!'
स्फूर्तिदेवता हिला म्हणाली, '"अग वेडे, फुलणा-याला सुकावं लागतंच, हा तर निसर्गनियम आहे. पण सुकावं लागणार आहे, म्हणून फुलण्याआधीच कोमेजणं हा शाप आहे, स्वतःच स्वतःला दिलेला! दिवस सरणार आहे, रात्र येणारच आहे आणि ती पुन्हा नवा दिवस आणणारच आहे, पण नवा दिवस उगवला तरी कवाडं-गवाक्ष बंद ठेवून अंधाराला जवळ करून "अजून रात्रच आहे, दिवस उगवणारच नाहीय" असं समजणं हा करंटेपणा आहे. आता तरी मोकळी हो या शापातून! सुख-दु:ख, हसू-आसू, आशा-निराशा सगळंच व्यक्त करत रहा. वसंत-शरद-वर्षाच नाही , तर ग्रीष्म-हेमंत-शिशिरालाही दे शब्दांचे फुलोरे. भावनांना कोंडू नकोस, संवेदनांना गोठवू नकोस. दु:खालाही दे शब्दांचं कोंदण आणि घडव त्यांचे मनमोहक अलंकार. काट्यांनाही फुलवत रहा, उजळत रहा मनात कल्पनांच्या ज्योती, मिटव घुसमटत्या अंधाराला. वैशाखवणवे येतच रहाणार, जुनं सारं जळतच रहाणार. पण एखादा हिरवा कोंब वळवाच्या एका थेंबाच्या मदतीनं पुन्हा देवराई वसवू शकतो, हे विसरू नकोस. अग, मनाला कुंपण, भावनांना वय, स्वप्नांना बंधनं, कल्पनेला भय आणि बहराला काळ-वेळ नसते कधीच! हो स्वतःच स्वतःचे स्फूर्ति आणि मिळव विजय मनावर!" मनातली वास्तुदेवता धीरगंभीर आवाजात बोलली "तथास्तु!" यक्षपिता आणि गुरुदेवांनी आसमंतातून आशिर्वादाची फुलं उधळली. देवकन्या आनंदल्या.
तिनं मनाशी निश्चय केला, "कितीही वणवे आले, वादळं आली तरी मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. फुलत राहीन गुलमोहरासारखी, वैशाखातही. काट्यांतही डौलानं फुलणा-या गुलाबकळीसारखी, कुंपणाला सजवणा-या मधुमालतीसारखी, सुकूनही गंध उधळणा-या बकुळीसारखी."
ती फुलतेच आहे, सुकेपर्यंत फुलत रहायचं व्रत मनोभावे करते आहे. जशी तिला स्फूर्तिदेवता प्रसन्न झाली, तशी तुम्हा-आम्हा सर्वांना होवो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!
वाचने
3011
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
लय
वा आवडली
मस्त लिहीलंय!
क्रान्ति ताई मस्तच !! :)
कहाणी
कहाणी
In reply to कहाणी by स्वाती दिनेश
छान !!
सहमत
हेच म्हणणे.
कहाणी खूप
खूप खूप
फारच छान कहाणी...