Skip to main content

बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 29/03/2025 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! या खेपेला युयुत्सुनेट चुकलं की बरोबर ठरलं हे ठरवणं मला अवघड जातंय. कारण मला ज्या पातळीपासून बाजार उलट फिरेल असं वाटत होते, ती पातळी झुगारून २३८६९ ला जाऊन उलट फिरलं (हा उलट फिरण्याचा भाग खरा ठरला कारण युयुत्सुनेटला तेव्हढेच म्ह० पुढची दिशा ओळखायला शिकवले आहे). पण रेंजच्या बाबतीत हुलकावणी दिली. आठवडा अखेरीस बंद होताना आठवड्याच्या ओपन जवळच बाजार बंद झाला आहे. माझ्यामते ही त्रुटी "क्षम्य" आहे कारण पातळीचा अंदाज माझा होता, युयुत्सुनेटचा नव्हता. पण इतरांनी ही त्रुटी माफ करावी असा माझा आग्रह नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आधार आणि विरोध पातळ्यांजवळ कोणत्याही मॉडेलचा गोंधळ उडू शकतो. माणसे पण महत्त्वाच्या टप्प्याजवळ आली की पुढची योग्य दिशा घेताना गडबडू शकतात. आकृती -१ निफ्टीच्या साप्ताहिक आलेखामध्ये निळ्या वर्तूळातील मेणबत्तीची लांब वात बाजार माघारी फिरल्यावर शिक्का मोर्तब करते.  आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता ५%/९५%  आकृती -३ सोने वर/खाली जायची शक्यता ३०%/७०%  आकृती -४ युयुत्सुनेट म्हणते बाजार खाली येईल. v मागिल भाकीताचा दुवा - https://www.misalpav.com/node/52807 वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1744
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मंडळी, मार्केटमध्ये जेव्हा रॅली येते तेव्हा ती टिकाऊ असते का या बाबत मतमतांतरे व्यक्त होतात. अशा वेळेला विश्वास नक्की कुणावर ठेवायचा? टिकाऊ रॅलीची काही संख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये असतात. आत्ताच २१ मार्चला संपलेल्या आठवड्यात मार्केटने अपेक्षेप्रमाणे उसळी मारली. पण ही टिकाऊ आहे की नाही यावर काही तज्‍ज्ञांनी शंका व्यक्त केल्या. मी यातले तथ्य तपासण्यासाठी एक संख्याशास्त्रीय़ चाचणी (माझ्या आकलनानुसार) वापरून तपासायचे ठरवले. त्या अगोदर ही चाचणी भूतकाळातील टिकाऊ उसळ्या व्यवस्थित ओळखते का हे डीपसिकच्या मदतीने तपासले. माझे प्राथमिक समाधान झाल्याने २१ मार्चला संपलेल्या आठवड्यातील रॅलीला ही कसोटी लावून बघितली. तेव्हा ही रॅली टिकाऊ नाही असे उत्तर मिळाले. याचा एक अर्थ असा की अजूनही मोठ्या गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक भविष्यावर तितकासा विश्वास नाही... आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...

In reply to by युयुत्सु

आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...
आजच्या शुभ दिवशी , आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या भाकिता ला जास्त किंमत आहे , मुहूर्तावर खरेदी करण्याच्या प्रथे पेक्षा ... गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ! सर्वाना ...

या नि पुढच्या आठवड्यात कामाचे चार दिवस आहेत, त्यापुढच्या आठवड्यात तर तीनच दिवस आहेत. तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का? ---
नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
धन्स्! सर्व व्यापारी, गुंतवणूकदार यांना हे वर्ष भरपूर नफ्याचे व परताव्याचे जावो ही शुभेच्छा!

In reply to by वामन देशमुख

पण ते जाऊ दे... समजा यामूळे जरी भाकीत चुकले तरी मॉडेल स्वत:ला अ‍ॅडजस्ट करते आणि पुढच्या भाकीतासाठी तयार होते. तेव्हा या कालावधीतील भाकीते जास्त काळजीपूर्वक घेणे किंवा भाकीतेच न करणे ... हा हा हा!

तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का?> प्रश्न चांगला आहे. याचा माझ्या मॉडेल मध्ये विचार केलेला नाही. त्याची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही कारण त्याचा विचार न करता भाकीते ब-यापैकी बरोबर ठरत आहेत. कामकाजाचे दिवस वाढले तर भाकीत चुकायची शक्यता आहे - कारण अधिक वेळ मिळाल्याने अधिक शक्यता निर्माण होतात. त्यामुळे भाकीत चुकू शकते. तसंच मला या पेक्षा प्रभावी घटक म्हणजे जागतिक बाजारांचा समावेश करायला आवडेल (ते आपल्या बाजारांवर प्रभाव पाडतात) पण सध्या माझ्याकडे पुरेशी कंप्युट पॉवर नाही आणि विश्वासार्ह आणि अखंडित डेटा नाही. तेव्हा सध्या जोपर्यंत I5+8GB आणि I7+16GB या दोन मशिन्स वर भागतंय तेव्हढ पुरेसे आहे. स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...

In reply to by युयुत्सु

आज शेवटचा दिवस आहे. बाजार तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दक्षिणेकडे जात आहे.
स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...
मतभिन्नतेच्या आदरासहित: स्वतःच्याच, चांगल्या विषयावर काढलेल्या लेखमालेवर तुम्ही स्वतःच (वादाला तोंड फुटू शकते असे) अवांतर करू नये असे वाटते. आधीच चांगली-चांगली मिपाखरे इथल्या कर्कश्य कबुतरांच्या त्रासाला कंटाळून इथून उडून गेली आहेत, जी राहिली आहेत तीही जायला नकोत.