Skip to main content

मातृत्वाचा शृंगाररस

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 19/10/2024 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
मातृत्वाचा शृंगाररस चंदन चांदणं गोंदण ल्याली नवथर कांती तनू सुकुमार अर्ध मोकळ्या केसावरती माळून गजरा चंद्राकार कुठे निघाली चंचल रमणी थबकत लचकत हरिणी समान सरकत शेला सावरलेला धरत रोखुनी नयन कमान ठुमकत मुरडत गवळण राधा जणू विहरत यमुनाकाठ गोप बघुनी झाकू पाहते पदराखाली भरला माठ हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार हृदय-चक्षूंना वेधून घेते तन्मीलनाची नमनमिनार अर्ध्या उघड्या पाठीवरती भुरुभुरू केसांचे नर्तन नाभी भवती करुनी रिंगण पिंगा खेळतो द्वाड पवन गुलाब जाई मोहित होई रूप गोजिरे पद्मसमान लपून आडून चोरून बघती फुलामागुनी पिकले पान कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम कुणी म्हणाले कामुक मैना खुदुखुदू हसुनी रमताराम कुण्या मुलखाची राजपरी ही कुजबुज करती वल्लीशिवार जशी घडविली, तशी मढवली ही रंगीली नटवी नार तव वदली ती प्रसन्नवदना हो मी आहे नटवी नार खळखळ वाहत असतो माझ्या नसानसातुनी रस शृंगार विरक्तीला लुब्ध कराया करीत पीयुषाची पखरण सजणेधजणे, लटक, मटकणे प्रीत लालित्याची उधळण जरी दिसतो तुम्हां दुरुनी माझ्याठायी हा एकच रस परी मी आहे सर्व रसांचा जणू घुसळला अमृतरस कधी असते मी झाशी, अहिल्या मीच कालिकेचा अवतार मी राधिका, मीच मीरेच्या अद्वैत भक्तीचा एकतार मीच कैकेयी, मी कौशल्या मी वनवासी जनकाची लेक मीच देवकी, मीच यशोदा माझे स्वरूप, रूप अनेक मीच भीमाई, मी जीजाऊ मी क्रांतीची ज्योतमशाल पंकामध्येही पंकजाची पालनकर्ती मी मृणाल आदी माया आदी शक्ती सचेतनाची मी सृजक जैवजिवांची उत्पत्ती अन प्रणयरसाची मी पूजक स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी सजीव सृष्टी माझं बाळ ब्रह्मांडाला व्यापून उरली माझ्या मातृत्वाची नाळ - गंगाधर मुटे 'अभय' ============== अठरा/दहा/चोवीस
लेखनविषय:

वाचने 21299
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

या सर्व स्त्रिया अप्रतिम लावण्यवती असतील ( असे धरुयात, आपण कुठं बघितलंय ) त्या स्त्रिया असल्यामुळे त्यांच्यापढे साहजिकच पुरुषाला लोभावणारे शारीरिक शरीरसौष्ठव असेल ( पहिली काही कडवी) तरीही त्या स्त्रिया त्यांच्या भक्ती/ वीर / मातृत्व या रसांमुले जास्त परिचित आहेत असे धरायला हरकत नसावी .. मग असे असताना काव्यात "हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार हृदय-चक्षूंना वेधून घेते" किंवा "कुणी म्हणाले कामुक मैना" यासाठी हीच उदाहरणे का सापडली हा साधा प्रश्न आहे १) शृंगारिक काय अगदी कामुक ( पण दर्जेदार ) कविता जरूर करा हो ,, मग ती मस्तानी वर असो किंवा कुना काल्पनिक अप्सरेवर असो २) भक्ती/ वीर / मातृत्व यावर कविता जरूर करा हो ,,, "कलेसाठी कला" किंवा "कवी मनाला काय वाटेल ते तो लिहू शकतो घायचे तर घ्या नाहीतर फूटा " असा पवित्रा असेल तर काही बोलण्यात अर्थ नाही पण रसिक का टीका करतोय ह्याकडे जर कोणी निर्माता लक्षच देणार नसेल तर अशी कलाकृती एक तर कचऱ्यात जाईल किंवा विसरली जाईल , किंवा तद्दन भम्पकपणा म्हणून ( मूलतः चांगली असूनही) त्यावर राग काढलं जाईल

कानडाऊ योगेशू यांनी केलेल्या रसग्रहणाशी सहमत आहे. कविता दोन दृष्टीकोनातून बघावी लागेल. एक वयस्क नर जो नायिकेचा कुणीही नाही, तीच्या कडे रंगीली नटवी नार, फक्त भोग्या या नजरेने बघत आहे. त्याच्या नजरेला उत्तर देताना नारी स्वीकार करते ,होय मी नटवी नार आहे,कुण्या ऋषींची तपस्या भंग करण्याची शक्ती माझ्या मधे आहे.परंतू माझी इतरही अनेक रूपे आहेत. मी फक्त मोहिनी नसून मी विवीध रूपा आहे. तव वदली ती प्रसन्नवदना हो मी आहे नटवी नार खळखळ वाहत असतो माझ्या नसानसातुनी रस शृंगार विरक्तीला लुब्ध कराया करीत पीयुषाची पखरण सजणेधजणे, लटक, मटकणे प्रीत लालित्याची उधळण जरी दिसतो तुम्हां दुरुनी माझ्याठायी हा एकच रस परी मी आहे सर्व रसांचा जणू घुसळला अमृतरस या कडव्यानंतर, स्त्रीची विवीध रूपे उद्धृत केली आहेत. कवितेचा शेवट स्त्री ही जननी,जगत्जनीनी आहे हे सांगीतले आहे ही कवीता तुकड्यात नसून एकसंध वाटते. कदाचित कवितेचे शिर्षक व कवितेतील भाव या मधे तफावत असल्याने कवी रसिकांपर्यंत पोहचत नसावा. सर्व रस आपापल्या जागी आहेत कुठेही सरमिसळ वाटत नाही. शृंगार, वासनेची परिणीती मातृत्व-पितृत्व मधे होते. ती सार्वजनिक करू नये एक समाज संकेत आहे. पण तो कवीला लागू पडतो का,कवी आणी कवितेला मर्यादित करतो का? कवीने याचे पालन करावे किवां नाही,रसिकांनी ते स्विकारावे किंवा नाही हा सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे. मातृत्व एक पवित्र भावना. आई बद्दल कुणीच वाईट, अश्लील, शृंगारिक शब्द वापरत नाही.परंतू, महाकवी ग्रेस यांनी आपल्या एका कवितेत आईचे वर्णन करताना काय शब्द वापरलेत ते वाचून मती गुंग होते. अर्थात त्यांनी कुठल्या दृष्टीकोनातून ही कवीता लिहीली हा भाग थोडावेळ बाजूला ठेवूया. ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!! आई माझी कृष्णकळीतील विष विसरला कंस देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस... आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस (संग्रह " सांजभयाच्या साजणी") सरतेशेवटी,कवी आणी रसिक यांचे स्वातंत्र्य अबाधित असून कलाकार जेव्हां आपली कलाकृती रसिकांपर्यंत पोहचण्यास सक्षम ठरतो त्या कलाकृतींना रसिक डोक्यावर घेतो.

In reply to by कर्नलतपस्वी

खालील दोन ओली वाचल्या आणि एक विचार मनात आला आईचा स्त्री म्हणून समजेने वापर केला असावा आणि तिचे ते दुर्दैव बघून काविला अशी रचना सुचली असावी ? जर गरिबीचा बापू कादंबरीतील बाप्या ने आपली आई वर कविता लिहली तर कदाचित अशी असेल का??? आई माझी झुळझुळतांना तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा

"कदाचित कवितेचे शिर्षक व कवितेतील भाव या मधे तफावत असल्याने कवी रसिकांपर्यंत पोहचत नसावा." काहींना नाही पोचलला पण त्याची थोडी का होईन जबादारी ती कविता निर्माण करणाऱ्यवर नाही का असत? आगम्य लिहणे हे प्रत्येकाचा हकक जरी असला तरी बहुतेकांना साधारण पने कळेल असे लिहिण्यात तर कवी / लेखकांची खरी कसोटी असते वैयक्तिक मुद्दा हे कारण पुढे केलं जाते, मग असे असेल तर कवी ने आपले हे प्रसिद्ध करूनच नये स्वतः सुखायच असेल तर छापता कशाला!

In reply to by चौकस२१२

बहुतेकांना साधारण पने कळेल असे लिहिण्यात तर कवी / लेखकांची खरी कसोटी असते मी आजपर्यंत 700 ते 800 कविता लिहिल्यात. त्यापैकी बहुतांश सरसकट सर्वांना समजेल अशा कविता आहेत. त्यापैकी शेकडो कविता मिसळ पाव वर उपलब्ध आहेत. आपण त्या साध्या शिध्या सुलभ कविता का नाही वाचत? हीच कविता साध्या सोप्या भाषेत असावी असा आग्रह कशाबद्दल?

In reply to by गंगाधर मुटे

हीच कविता साध्या सोप्या भाषेत असावी असा आग्रह कशाबद्दल? म्हणजे हि साधी सुधी नाही असा दावा आहे का? पण म्हणजे आमची टीका कळली नाही तुम्हाला ... पिंगा खेळतो द्वाड पवन ते अहिल्याबाई ! काय बोलायचे राहा तुमच्या ८००+ कवितांचा पाऊस पाडत. संपादित

In reply to by चौकस२१२

हो. ही कविता नक्कीच साधीसुधी नाही. अनेक क्लिष्ट शब्द या कवितेत आहेत. ज्या वाक्यांचा सहजासहजी उलगडा होणार नाही असे वाक्य या कवितेत आहेत.

In reply to by चौकस२१२

राहा तुमच्या ८००+ कवितांचा पाऊस पाडत >>> या देशात दीडशे कोटी जनता आहे. ती तुम्हालाही विचारत नाही आणि मलाही विचारत नाही. तुमच्याही इशाऱ्यावर नाचत नाही आणि माझ्याही इशाऱ्यावर नाचत नाही. ते त्यांच्या मर्जीने जगतात. त्यामुळे आपले वरील वाक्य अत्यंत अनावश्यक स्वरूपाचे ठरते.

आईचा स्त्री म्हणून समजेने वापर केला असावा आणि तिचे ते दुर्दैव बघून काविला अशी रचना सुचली असावी ? कवी ग्रेस यानी लिहीलेली कवीता फक्त उदाहरण .त्यांनी ती कुठल्या परिप्रेक्षातून लिहीली हा भाग वेगळा असे मी आगोदरच म्हणले आहे. मुटे यांची कवीता स्त्रीपुरूष मधला संवाद म्हणून बघीतली तर मातृत्व एक त्यातला छोटासाच भाग आहे. कवी आणी रसिक हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी त्यामुळे दोघांच्या मर्यादा वेगळ्या. आता हलवायाने जिल्बी पाडावी व खाणार्‍याने ती खावी. कुणाला किती गोड लागेल हा ज्याचा त्याचा प्रश्न. हलवाई बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणार. हलकेच घ्या. मी पण तुमच्याच कुळीतला वाचक,फक्त आपले मत मांडतो.

In reply to by कर्नलतपस्वी

हलवाई बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणार. बरोअबर पण त्याची चव घेणाऱ्याने " अरे हि जिलबीच आहे का किंवा या जिलबीत हे काय घातलाय " असे विचारायचे म्हणजे महापाप कि काय

In reply to by चौकस२१२

तुम्ही काढलेला निष्कर्ष हाच जगमान्य असून तोच सर्वांनी शिरसावंद्य मानला पाहिजे का? अर्थ काढण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसा आपापल्या परीने निष्कर्ष काढण्याचा, अर्थ लावण्याचा प्रत्येकाला अधिकार नाही का?

कविता आवडली. भावनांतर तर विशेष आवडले. खर तर वरकरणी परस्पर विरोधी वाटणार्या भावना हा भावनाकल्लोळ संचातील घटक असतात.कार्येषु मंत्री करुणेषु दासी शयनेषु रंभा भोजनेषु माता हा स्त्रीचा आविष्कार तरी काय दाखवतो? फ्रॉईडच्या इड इगो सुपर इगो च्या त्रयीत एखादी आवडती स्त्री सहज संचार करते तेव्हा मला तर चक्क तिचे पाय धरावेसे वाटतात. अर्थात ही माझी फँटसी आहे.

कार्येषु मंत्री करुणेषु दासी शयनेषु रंभा भोजनेषु माता या चारही गोष्टी एकत्र असू नयेत हे तारतम्य आहे. नाही तर शयनेषु माता आणि भोज्येषु रंभा झालं तर गोची होईल. वाघीण आपल्या पिल्लांची वात्सल्यपूर्ण माता असतेच पण शिकारीच्या वेळेस तिने वात्सल्य दाखवले तर स्वतःला आणि पिल्लाना उपाशी मरावे लागेल

काही आयड्याकडून नेहमीप्रमाणे कवितेशी संबंध नसलेले अनावश्यक व फालतू प्रतिसाद टाकून कवितेचा धागा भरकटवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. माझ्या सवयीप्रमाणे मी जशास तसे उत्तर देणार आणि मग धागा भरकटवण्यात माझाही हातभार लागणार. त्यावर पर्याय म्हणून आठ दिवस मी मिसळपाव वरून विश्रांती घेत आहे. कवितेची संबंध नसलेले असंबंद्ध प्रतिसाद माझे तरी पडायचे थांबतील. धन्यवाद! भेटूयात आठ दिवसानंतर!!

In reply to by गंगाधर मुटे

हा आरोप अमान्य आहे , तुम्ही आमच्या टीकेशी सहमत नसाल पण केवळ मुद्दे समजावून ना घेत तुम्ही उत्तर आणि वयक्तिक टीकेवर वसकन उतरलात दोन उत्तम कविता आहेत हे पाहिचलेच सांगतले, तेवढे लिहिण्याची प्रतिभा पण आम्चि नाही पण तुम्ही पुढे माणूस आणि पशु यांचे मातृत्व ... एकच असे फालतू प्रतिसाद तारे तोडू लागतात ... विश्रन्ती ह्या नाही तर रोज टंकआ हू केंअर्स

In reply to by गंगाधर मुटे

एकांतवासा साठी शुभेच्छा. झारखंड राज्यातील श्री गंगाराम तिवारीजी यांची कवीता,श्री हबीब तन्वीर यांनी जनमानसात आणली.पुढे श्री अमिर खान यांनी आपल्या सिनेमात वापरली. करोना काळात बर्‍याच लोकांना धैर्यशील बनवले. द्रोना जईसे गुरू चले गए करन जईने दानी संग, करन जईसे दानी बाली जईसे वीर चले गए, रावन जस अभिमानी चोला माटी के राम एकर का भरोसा? चोला माटी के रे कोनो रिहिस ना कोनो रहै, भईया ही सबके पारी एक दिन आई सबके पारी काल को नोला छोड़े नाहीं, राजा, रंक, भिखारी चोला माटी के राम एकर का भरोसा? चोला माटी के रे

कवितेचे नाव वाचूनच ऑन द रॉक्स सिवाज रिगल मधे कोजागिरी पोर्णिमेचे मसाला दूध मिसळल्यासारखे वाटले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हो ना किंवा उत्तम तांबड्या वारुणीत कोका कोला मिसळणे म्हणजे दोन्ही ची हि मजा घालवली , पण कवीश्वरांना कोण सांगणार !