Skip to main content

इच्छापूर्ती

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 27/12/2023 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, इच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू समयी त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही. स्वामीजी धर्मदेव कडे पहात हसत-हसत म्हणाले, त्यांच्या सर्व इच्छा तू सहज पूर्ण करू शकतो. स्वामीजींनी धर्मदेवला एक कान मंत्र दिला. पुढील २० वर्षांत धर्मदेव यांनी वडिलांच्या स्मृतीत अनेक शाळा, कॉलेजेस अनाथाश्रम, वृध्दाश्रम बांधले. एक मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल ही बांधले. कोट्यवधी रुपये दरवर्षी ते यासाठी खर्च करतात. एकदा एका पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला, तुम्ही कोणताही व्यापार, धंधा, उद्योग करत नाही, मग हे सर्व तुम्हाला कसे काय जमते. धर्मदेव म्हणाले ही सर्व भगवंताची कृपा आहे. स्वामी महाराजांनी मला कान मंत्र दिला आणि हे सर्व साध्य झाले. पत्रकाराने विचारले स्वामीजींनी तुम्हाला कोणता कानमंत्र दिला होता. "स्वामीजींनी मला भगवंताचे भव्य मंदिर उभारण्याचा आदेश दिला आणि म्हणाले भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील". आपली सर्व जमापूंजी आणि व्यापार विकून मी इच्छापूर्ती करणाऱ्या भगवंताचे भव्य मंदिर बांधले. मी भगवंताची सेवा करतो आणि भगवंताने माझ्या स्वर्गीय वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5541
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

यथार्थ. कालातीत. मंदीरापेक्षा सुंदर धंदा कुठलाच नाही आजकाल. . बादवे त्या कानमंत्र देणार्‍या स्वामीजींना कुठल्याश्या पीठाचे अधिपती वगैरे केले नाही का व्यापार्‍याने नंतर? की स्वतःच बनले धर्माधिपती?

In reply to by सुरिया

मंदिर धंधा नाही.प्राचीन काळापासून समाजसेवेचे माध्यम आहे. दासबोध वाचा मंदिर बांधण्याची महत्व कळेल. करोना काळात आणि आज ही कोट्यवधी लोकांची भूक मंदिर भागवतात. स्वामी त्रिकालदर्शी निःस्पृह योगी आहेत. ते फक्त भक्तांचे मार्गदर्शन करतात.

In reply to by सुरिया

मध्यंतरी एक प्रसिद्ध मंदिरवाले भक्तांच्या सेवेसाठी फ्रेंचायजी उघडायचे म्हणत होते. स्थानिकांनी कडाडून विरोध केला. सिनेमागृहात जसे वेगवेगळी दराची तिकीटे तसेच मंदिरात सुद्धा. एक खुपच वाईट अनुभव. मुलीच्या लग्नाची पत्रिका ग्रामदैवतास देण्यास गेलो. पुजारी गर्भगृहास कुलूप लावत होते. आम्ही म्हणालो गुरूजी दोनच मिनीटे द्या पत्रिका पाया जवळ ठेवतो. गुरूजी म्हणाले वेळ झाली संध्याकाळी या. इतका उर्मट होता की अजीबात ऐकले नाही. दुरून हाडपसर वरून आलोयं. म्हणाला ,पायरीवर ठेवा, आम्हांला पण थोडावेळ हाडं पसरायची आहेत पहाटे पासूनचा आहे. पत्रिका पायरीवर ठेवली. देवा रे तुला रे बाबा डोळे म्हणून परत फिरलो.

आपल्याला कशा आव्हान देतात याचं उदाहरण म्हणजे हा लेख. भगवंत, मंदिर, वडिलांची इच्छापूर्ती, समर्थ असे शब्द असलेला, कुणाचाही उपमर्द नसलेला परंतु चांगुलपणाच्या कल्पनेलाच सुरुंग लावणारा लेख आणि तोसुध्दा माजी राजपत्रित अधिकाऱ्याकडून. हा लेख मिपा संपादक मंडळाची कसोटी पाहतोय हे नक्की.

In reply to by सर टोबी

>> चांगल्या वाईटाच्या कल्पना आपल्याला कशा आव्हान देतात याचं उदाहरण म्हणजे हा लेख. >> मंदीरापेक्षा सुंदर धंदा कुठलाच नाही आजकाल. या वाक्यांशी १००% सहमत. पुरावा? मागे एका धडपडणार्या उद्योजकाल माहिती तंत्रज्ञानाबाबत काही मदत हवी होती. भारतातल्या एका फार मोठ्या आयटी कंपनीला त्याने संपर्क केला. व्यवसाय कल्पना अत्यंत अभिनव होती, लोकोपयोगी होती, पण काम त्यांच्या मानाने खूप छोटे असल्याने कंपनीने त्याला अजिबात प्रतिसाद दिला नाही. या कंपनीचा तिरूपती हा एक क्लायंट आहे. online दर्शन बारी, प्रसाद, निवास व्यवस्था यासाठी हीच कंपनी तिरुपतीबरोबर मोठ्ठा धंदा करते. सबब, मंदीर हा एक (फसवणूकीचा असला तरी) एक मोठ्ठा धंदा आहेच मुळी. फसवणुकीचा, कारण देव मंदीरात असतो असे कुठेही सिध्द झालेले नाही.

लेखाला सुचवायचंय की मंदिरासारखा दुसरा धंदाच नाही. लाखो लोक येऊन दान देऊन जातात नी पुजारी बक्कळ कमावतात. लोक दान देतात गरीबांसाठी पण त्यावर पुजारी डल्ला मारतात. पेरियार ह्यांनी ते इरोड मधल्या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असताना हे ओळखले नी मंदिरात पगारी पुजारी ठेवणे सुरू केले. मंदिरांचे सरकारीकरण करायला लावले. आज भारतात प्रमूख मंदिरे सरकराच्या कह्येत आहेत. - पेरियारवादी बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

जगातील अतिशय प्राचीन काळापासून सुरु असलेल्या, अगणित मानवांचे कल्याण करत आलेल्या, समाज संघटनांच्या दृष्टीने त्रिकालात अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या अश्या "हिंदू मंदिर" या संस्थेचा अवमान करण्याच्या हेतूने लिहिलेला हा लेख तात्काळ अप्रकाशित करण्यात यावा ही संपादक मंडळास विनंती.

In reply to by वामन देशमुख

आजिबात नाही. मंदीर माध्यमाचा झालेला व्यवसाय व त्यावर पोसले जाणारे निरूपयोगी लोक ह्यावर ह्याशिवाय दुसरा चांगला लेख नाही. हा लेख असू द्यावा. जे जे चांगलं त्याला विरोध करावाच असं काही नसतं वामन साहेब. मुळात अगणीत मानवांचं कल्याण कसं झालं काही विदा?? काही समाजातील मुठभर लोक दक्षीणा खाऊन पोसले गेले ते अगणीत होतात का?? काही लोकांना तर मंदीर प्रवेशही नव्हता. त्यांचं काय कल्याण केलं?? अनेकांना सामाजीक अवहेलना, दलीतांना त्रास , आमची जात वर इतर खाली, चातुर्वर्ण व्यवस्थ्तेत पिचलेले लोक ह्यांचं काय कल्याण केलं कळेल का?? पेरियार, शाहु, फुले, आंबेडकर नसते तर ह्या जातीवाद्यांनी मंदिराच्या साक्षीने किती बळी घेतले असते अजून??? मंदिरात देव नसतो तर पुजार्याचे पोट असते- संत गाडगेबाबा. - लेख आवडलेला बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

ह्या संकल्पनेत, बरीचशी प्रार्थना स्थळे येतात... देवाचे नाव घेतले की आपण समाजातील इतर घटकांना फाट्यावर मारण्यास मोकळे... मग तो अजमेर शरीफ दर्गा असो किंवा इतर काही... मी डोंबिवलीत ज्या इमारतीत राहतो तिथेच तळमजल्यावर एक बाबा मंदिर आहे... दररोज फक्त ध्वनी प्रदुषण करण्या व्यतिरिक्त इतर कुठलेही भरीव कामगिरी करत नाही... पण, जर तुम्हाला तुमच्या जागेवर अतिक्रमण नको असेल तर, कुठलेही बाबा मंदिर बांधा. जागा अतिशय सुरक्षित राहील.

In reply to by मुक्त विहारि

आज देशात ५ लाख कोटी धंधा परिवहन आणि हॉटेल्स मंदिरांचा भरोस्यावर करतात.४ लाख कोटींची स्थानिक व्यापार. देशांत हजारों शाळा कॉलेजेस मेडिकल कॉलेज मंदिरांच्या पैश्यांवर चालतात. लाखो गरीब मुलींचा विवाह मंदिरांच्या मदतीने होतात. या शिवाय अन्न छत्र कोटीहून जास्त लोकांची भूक भागवितात.

In reply to by विवेकपटाईत

बाकी इतर जोडधंदे... ह्यातील काही ठळक उदाहरणे... 1. गणपती पुळे... साल 1975-1981, कुठलीही गर्दी नाही... चिकन तर सोडाच पण बियर देखील विनासायास मिळत न्हवती... आज नुसती गर्दी आणि चिकन व दारुची दुकाने. 2. शेगाव... साल 1975 ते 1985, एक नंबरचे बाबा दुकान... हे बाबा नागडेच भटकायचे.. कुठलाही कामधंदा नाही. कुणालाही कधी खांदा दिला नाही किंवा कुठलेही सामाजिक काम केले नाही. ही वस्तुस्थिती आहे कारण माझ्या पणजीचे, त्या गावी सतत येणे जाणे असायचे. माझी पणजी सुईण होती. त्यामूळे पणजीला आसपासच्या परिसरातील सर्व माणसांची पारख होती. 3. साईबाबा... हे दुसऱ्या नंबरचे बाबा दुकान... अमर अकबर अँथनी, ह्या सिनेमा नंतर, ह्याची आथिर्क उलाढाल प्रचंड वाढली.. 4. अक्कलकोटचे स्वामी समर्थ.... गेल्या 30-40 वर्षांत ह्यांचे आर्थिक साम्राज्य वाढत आहे... पण, अद्याप देखील ह्यांनी, सोलापूर येथील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही... कूठे गाढवाला पाणी पाजणारे "संत एकनाथ" आणि कुठे हे समर्थ? ५. सध्या असेच एक बाबा म्हणजे, गोंदवलेकर महाराज... ह्यांच्या भक्तांचा त्रास रोजच सहन करत आहे... हिंदू धर्मात, व्यक्ती पूजेला स्थान नाही. त्यामुळे, मी कधीच व्यक्ती पूजा करत नाही... गाडगेबाबा हे आदर्श व्यक्तिमत्व असले तरी, त्यांचा फोटो मी ठेवत नाही किंवा त्यांना कधी हार देखील घातला नाही. गुणांची पूजा करणे, हा हिंदू धर्माचा पाया आहे आणि माझ्या दृष्टीने तरी, तेच योग्य आहे... व्यक्तीपूजा आणि अती देवधर्म, हे माणसाच्या वैयक्तिक उंनातीला घातकच ठरतात. असो, वादे वादे जायते संवाद: हे तुमच्या बाबतीत घडत असल्याने, हा प्रतिसाद प्रपंच. बाकी, प्रत्येक प्रतिसादाला मी उत्तर देत बसत नाही...

In reply to by विवेकपटाईत

अशा निबंधासाठीच्या मुद्यांची यादी वाटतीय तुमचा प्रतिसाद म्हणजे. निव्वळ ढोबळ आकडे - तेही तुमच्या कल्पनेतलेच. लाखो, कोट्यावधी वगैरे. देशातले सर्वात जास्त रोजगार शेती आणि बांधकाम व्यवसाय यातून निर्माण होतात. हे आणि असे उद्योग वेगवान आणि फायदेशीर व्हावेत म्हणून त्या जोडीला इतर उद्योग आणि संशोधन असे एक प्रगतीचे पुढे पुढे जाणारे चक्र निर्माण होते. त्यामुळे अशा उद्योगांना ग्रोथ इंजिन अशी संज्ञा मिळते. हे उद्योग समाजातल्या सर्व थरातल्या व्यक्तींना काही तरी घडविण्यासाठी उद्युक्त करतात आणि असा समाज एक सुदृढ व्यवस्था म्हणून टिकतो आणि भरभराट करतो. त्याउलट तीर्थक्षेत्राच्या उलाढालीवर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही गावाची सामाजिक परिस्थिती बघा. घरातली चांगली मुलं बाहेर गावी अथवा परदेशी निघून जातात. आणि उरलेले प्रसाद, नैवेद्य, यजमान, आणि दक्षिणा अशा गोष्टींवर आपले आयुष्य काढतात. तीर्थक्षेत्राची भरभराट आणि त्यामुळे होणारे किरकोळ पुण्यकर्म हे कधीही समाजाला भूषणावह असू शकत नाही. तुम्ही कुणाला तरी कायमस्वरूपी पंगू आणि उपकृत ठेवता ज्यामुळे समाज फक्त आक्रसतो.

तुर्की लोकांनी जेव्हा सुरूवातीला भारतात आक्रमण केले तेव्हा मंदिर फोडले नाही त्यांना दिसले की इथे अपार संपत्ती दान होतं आहे काही काळ मंदिरे उद्ध्वस्त केली नाही संपत्ती लुटली,नंतर खरा हेतूपायी मंदिर उद्ध्वस्त केली.पण मंदिर हा पुरातनापासून श्रद्धेचा विषय आहे....काल एक बरं वाक्य ऐकलं 'मंदिरं हे ... अस्मितेचे प्रतिक न करता राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक व्हावे' तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या भावना परत आठवल्या... https://www.misalpav.com/node/48012 अवडंबर नको हे अजूनही वाटतं.

हिंदू देवळांवर अमाप चरून लठ्ठ झालेला पुरोहित कोणाच्या पाहण्यात आला आहे काय? देवळे ही पुजाऱ्यांची पोटे भरायची सोय आहे असं कोणतरी म्हणतंय वरती. म्हणून म्हंटलं की सहज चौकशी करावी. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

मी पाहीलाय. नोटबंदीत १० लाखाच्या जून्या नोटा घेऊन आठ लाखाच्या नव्या नोटा द्यायचा. मंदिरं सरकारने ताब्यात घेतलीत म्हणून नाहीतर सगळा पैसा हे पुजारी पचवायचे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्हाला एवढेही माहित नाही पुजारी कर्मचारी असतात. असत्य प्रतिसाद देण्यात अर्थ नसतो.

In reply to by विवेकपटाईत

ते कर्मचारी दानपेट्यांना फूलांनी बंदं करतात, दिसला पैसा कुणाच्या हातात की ओरबाडतात, ५०० दे जवळून दर्शन करवतो सांगतात. कर्मकांडं करायला लावून त्याची दक्षीणा घेतात. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एक पुजारी सापडला म्हणून सगळी देवळं बंद करायची का? एक पैसे खाण्यासाठी चाचण्या करवून घेणारा एक डॉक्टर सापडला म्हणून सगळं वैद्यक बदनाम होतं का? मुळात लोकं देवळात येतात म्हणजे लोकांना कुठेतरी काहीतरी समस्या आहे, आणि जिची पाहिजे तिकडे तड लागंत नाहीये. तर मूळ कारणाची चिकित्सा व्हावी. 'प्रत्येक देवळात फक्त पोटे भरण्याचा उद्योग चालतो' अशी सरसकट विधानं असू नयेत. मी इथे थांबतो. -ना.न.

झुकानेवाला चाहिये अशीच काहीशी परिस्थीती आहे. जिन्हें सुकून चाहीये था देवालयमे चले गये हमे सुकून चाहीये था हम मदिरालय मे चले गये कुठे जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तरीसुद्धा मंदिरांमुळे फक्त पुजारीच श्रीमंत झाले म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी(फुले,हळद इ. उगवणारे) ,माळी,हलवाई, हाॅटेल वाले रिक्षाचालक अशा अनेक सामाजिक घटकांचा उदरनिर्वाह चालतो.