Skip to main content

छोटीसी बात..

लेखक गवि यांनी सोमवार, 07/11/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
..न जाने क्यूं.. होता है ये जिंदगी के साथ.. अचानक ये मन.. किसीके जाने के बाद.. करे फिर उसीकी याद.. छोटी छोटीसी बात.. तिचं आवडतं गाणं... आणि "काय जुनी गाणी ऐकतेस..?", असं म्हणत म्हणत का होईना पण तिच्या नादाने ऐकून नादावलेला मी. लताचे सूर समोरच्या समुद्रासारखे.. पुन्हापुन्हा लाटा बनून आपटणारे.. किसीके जाने के बाद.. करे फिर उसीकी याद.. पण मग एकदम तो सगळा काळ उलटून अंगावर येतोय असं वाटलं.. समोर आत्ता खळखळणारी छोटीशी लाट एकदम चाळीस फुटाची बनून अंगावर यावी तसा.. गाणं एफएमवर लागलेलं असतं तर बंद करुन ती लाट थोपवता आली असती.. पण मनातच गुणगुण वाजणार्‍या गाण्याचं काय? बंद कसं करु? गुणगुणीतून एकदम भण्ण भण्ण असं व्हायला लागलं तर? जिवाच्या आकांताने उठल्यासारखा वाळूतून उठलो.. माणसांच्या वस्तीत पोचलो असतो की सुटलो असतो.. वाळूत पळताही येत नाही.. मग पायात पेटके येतील एवढ्या जोराने पाय रेटत वाळू पार केली आणि डांबरी रस्त्यावर आलो.. डांबरी रस्ता सेफ.. नो मेमरीज..नो लाटाबिटा.. शहाळेवाला.. लक्ष दुसरीकडे घालवायचंय ना? मग हे करुन बघू.. "ए दोस्त.. मलईवाला दे रे एक.. बडा दे ना भाई.. कैसा छोटा निकालता है रे देखके.." .... ती माझी का झाली नाही? काही अघटित घडलं होतं? की सगळं छान चाललेलं असताना कोणी येऊन सांडलं सगळं? तसं काही नव्हतंच.. मी तिला कधी विचारलंच नाही.. मी गांडू होतो? तसंही वाटत नाही.. कदाचित माझंच नशीब इतकं वाईट होतं की मला तिच्याशिवाय राहणं इतकं नकोसं होईल अशी जाणीव होईहोईपर्यंत तिचं लग्न आणि पोरंही होऊन गेली... मी फार हळूहळू प्रेमात पडलो काय तिच्या? स्लो पॉयझन?? आणि मधल्या काळात मला त्याची तीव्र जाणीव कधीच झाली नाही? मी माझ्या मनात तिला घोळवत राहून मनातच अफेअर करत राहिलो? आणि प्रत्यक्षातल्या तिला दूरच ठेवली? ती तर मजेत आहे तिच्या घरी.. तिचा नवरा आणि पोरं..दोन दोन.. मग ठीकच आहे ना.. ठीक आहे तर मग आत्ता इतल्या वर्षांनंतर ही धगधग कसली.. आता का अनावर उलटीसारखं वर येतंय सगळं? काळाने कमी होण्याऐवजी चटका वाढत कसा जातोय? ती हवीच.. काही झालं तरी हवी हा कसला भलता रेटा मनाचा.. काही कळत नाही.. कसलाच तर्क चालत नाही.. आणि आता काय करु या विचाराने डोक्यातला मेंदू.. शहाळ्यात सर्रकन सुरी आणि मलई बळ्ळकन बाहेर.. शी... मेंदू..बाहेर येईल आता विचार करुन... नको. शहाळं नको.. "नही चाहिये भाई... बराबर नही है तुम्हारा नारियल.. सडा है साला.. " "अर्रे..मैं खराब है बोला तो खराब है.. कस्टमर मैं है के तू?? .. तुम्हारा पैसा ले लो ना तुम.." आता पटपट लॉजवर जायला पाहिजे.. एक गोळी जिभेवर चघळली की लॉजपर्यंत पोचेपर्यंत ती लाट विरुन जाईल.. खिशात गोळी नाही.. संपल्याहेत गोळ्या आणि नवीन स्ट्रिप घ्यायला विसरलो कसा च्यायला?? एकावेळी एकच स्ट्रिप.. तीही प्रिस्क्रिप्शनशिवाय इथे मिळणार नाही.. प्रिस्क्रिप्शन लॉजवर.. व्हॉट द फक.. ते खिशात ठेवण्याइतका पण मी भानावर नसतो.. नेहमीच्या सन मेडिकोपर्यंत जायला पाहिजे.. तो प्रिस्क्रिप्शनशिवाय एक स्ट्रिप देईल..अ‍ॅटलीस्ट एक गोळी सुट्टी.. पण त्यासाठी पण लॉजच्या अर्ध्या वाटेपर्यंत जायला पाहिजे.. विनागोळी.. मग ती लाट?? ... लाट जाणार आहे.. डॉक्टरांनी स्वतःला समजावायला सांगितलंय.. स्वयंसूचना.. ती फक्त भीतीची लाट आहे..ती जाईल.. तिला महत्त्व द्यायचं नाहीये.. आणि आता तर डांबरी रस्ता आहे.. वाळूपण नाही..पटकन पोचता येईल..एकदा गोळ्या मिळाल्या की झालं. लॉजचा एक जिना.. की मग बस्स.. खोली लपेटून झोपून टाकू.. झोप झाली की होईल रिसेट.. ..लॉजपर्यंत पाय पुढे पुढे टाकत राहायला पाहिजे.. पावलं मोजता येतील हवीतर... ........................ (मे बी कंटिन्यूड..)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13120
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

कथा वाचून शहारा आला. फक्त ते 'मे बी कंटिन्यूड" बदला बुवा आणि 'टु बी कंटिन्यूड' करा, कारण कथानायकाच्या अर्ध्या राहिलेल्या प्रेमकथेसारखी ही कथा अर्धी राहिली तर आमचं पण डोकं खराब करील!

ठीक आहे तर मग आत्ता इतल्या वर्षांनंतर ही धगधग कसली इथे इतक्या असं टाकायचं होतं का? आणि पोरं..दोन दोन.. या शब्दांनी तर खुदकन हसू आलं. आणी हे मे बी का? पुढचं वाचायचं आहेच...निदान मला तरी.

मस्त लिहिलेय. पुढचा भाग वाचायलाच हवा.

प्रेमकथा अर्धवट सोडणे हा दंडनीय गुन्हा आहे गवी!! आणि तिही अशी प्रेमकथा?? Please continue...

लिखान आवडले.. आवडल्याचे कारण यावेळी तुमचे शब्द नाही तर अशीच एक जुनी आठवण आहे .. "आते जाते .. हसते गाते .. सोचा था मैने मन में कई बार " हे गाणे मनात वाजले की अशी प्रश्नमालिका सुरु होते .. मन हळुच उडुन कॉलेजच्या दिवसात जाते ... तिचे हे आवडते गाणे ... आणि नंतर माझ्या साठी फक्त माझ्या साठी कॉलेज मधेय सगळ्यां समोर तिने हे गायलेले गाणे .. तो काळ खरच खुप अलवार होता ... कधी कधी तो तलवार च आहे जनु असा भास होतो.. पण पुन्हा संध्याकाळ येते .. त्या आठवणी पुन्हा मनात रुंझी घालतात आणि हळुवार पणे मनाला साद घालतात ... The End.

In reply to by वपाडाव

सगळं मुसळ केरात...
आवडल्याचे कारण यावेळी तुमचे शब्द नाही तर अशीच एक जुनी आठवण आहे ..
हे लिहुन घोटाळा झाला! ;)

लिहा ओ लिहा तुम्ही, उगा घाबरवताय का आम्हाला अवांतर - मा सं. मं, त्या मे बी ला शॅल बी किंवा वुइल बी करता येईल का तुमच्या अधिकारात. ?

सुरुवात वाचून गाण्याचं रसग्रहण असावं असं वाटलं होतं. त्यामुळे आधी गाणं एकदा ऐकून घेतलं आणि नंतर लेख वाचला, अपेक्षेपेक्षा वेगळा निघाला.

_/\_ गवि, हॅट्स ऑफ. याचा पुढचा भाग टाकण्याचा करंटेपणा तुम्ही करणार नाही याची खात्री आहे कारण ही जी अवस्था आहे ती अशीच राहते. यातुन पुढे सुखांत करणे हा करंटेपणा होइल आणि सत्यापासुन प्रचंड फारकत देखील.

आजच्या या तुमच्या लेखामुळे प्रतिसाद द्यायला आपोआप बोटं कीबोर्डवर फिरली...अगदी नकळत..जवळपास एका वर्षानंतर !!! 'मे बी कंटीन्युड...' हाच या लेखाचा सर्वोत्तम शेवट असू द्या. जीवाची झालेली प्रचंड घालमेल अनुभवलीये या काळात आणि नेमका तशीच कालवाकालव करवणारा हा लेख....नकोच...पुढचा / चे भाग नकोच.

भेजाचा पार भुर्जीपाव झालेला दिसतोय! अगदी कळवळून लिहिलंय... पण गविशेठ, हे गोळी घेणं डेंजरस हो!!!! त्यापेक्षा डोक्याला "धनगरी तेल" चोळून बघा काही फरक पडतो का ते!!!! :)

अस्वस्थ करणारे लिखाण. प्रत्यक्ष वर्णन न करता केवळ मनातल्या तुटक-सलग विचारांच्या वाकयांतून चित्र निर्माण केले आहे. एका ठराविक बिंदूवर निसटून चाललेल्या आयुष्याची जाणीव झाल्यावर भूतकाळात गमावलेल्या गोष्टींची आणि केलेल्या चुकांची बोच मनात तीव्र होत जात असावी आणि ती नंतरच्या आयुष्यात अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी भळभळती राहात असावी. त्यामुळे ही गोष्ट "मे बी कंटिन्यूड" असली तरी तिला खरोखर अंत आहे?

भावना पोहोचल्या. लेख अजून चांगला करता आला असता. भाग दूसरा येणार असेल तर शब्दांच्या निवडीकडे लक्ष द्यावे अशी एक नम्र विनंती.

प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्‍यात असली जखम कुठेतरी असेलच. जे आपल्यापाशी नाही त्याचं दु:ख होणं मग आलच. ज्यांना अशा जखमाच नाहीत त्यांना सुद्धा "त्या" वयातच असल्या एक-दोन जखमा न करुन घेतल्याबद्दल पश्चाताप वाटत असेलच! :)

इथे एक लिहिते, रूढ अर्थाने कथेचा शेवट सुखान्त होणं शक्य नाही, कारण 'ती' लग्न करून सुखात आहे. ती परत येणं शक्य नाही, त्यासाठी हिंदी सिनेमासारखे योगायोग घडवून आणावे लागतील. पुढील भाग लिहा असं आम्ही बरेचजण म्हणतोय, त्याचं कारण म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीत असलेला नायक यातून सावरू शकतो का आणि कसा हीच उत्सुकता आहे. आजूबाजूला वेगवेगळ्या कारणानी निराशेच्या गर्तेत गेलेली अनेक माणसं पाहिली आहेत, ती जर यातून बाहेर येऊ शकली तर त्यांचं स्वतःचं आयुष्य निदान सुसह्य होतं नाहीतर ती स्वत:बरोबर जवळच्या जिवाभावाच्या माणसांचं आयुष्य नरक करून टाकतात.

In reply to by पैसा

ती लग्न करून सुखात आहे, ती परत येण शक्य नाही.पण हा आयुष्याचा 'द एंड ' नाही.कदाचित ती आपल्या नशिबात नव्हती.ठीक आहे. 'ये नाही तो कोई और सही' आयुष्य रुळावर आणण गरजेच आहे.