Skip to main content

एकटा जीव सदाशिव

लेखक निओ यांनी बुधवार, 12/07/2023 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी शहरात 'एकट्याने' वास्त्यव्य करणं पण कधी कधी सुखाचं असतं. अट एकच खिसा भरलेला हवा. खर्च केलाच पाहिजे असं बंधन नाही पण चिंता नसावी. मग मन मारायची गरज उरत नाही. मन मानेल तसं निश्चिन्तपणे भटकवता येतं. मनाचा व्यायाम हा वेगळा न झेपणारा गहन विषय, आतातरी नको. तर अनोळखी शहरात 'एकट्याने' आल्यावर life कसं शांत होतं. सुपरफ़ास्ट चालणारी गाडी एकदम पॅसेंजर होते. सुट्टीचा दिवस तर रेंगाळत रेंगाळत निघून जातो. धावपळीत अडकलेल्या जीवाला उसंत मिळते. वेळ कसा Invest करावा याचा Sense असलेल्या एखाद्याला तर पर्वणीच वाटावी. काय छंद जोपासायचे ते जोपासा. कोणाचाच अडथळा नाही. कुठे जायची गडबड नाही, कोणासाठी काही करायची गरज नाही. जीवाला काही काळजीच नाही. निवांत आपल्या सोयीनं उठायचं, आपल्या गतीनं कामं करायची. माणसं नवीन, जागा नवीन, आपणही नवीनच. अचानक पाटी एकदम कोरी झाल्यासारखे वाटते. लिहा काही लिहायचे आहे ते. कोणीच ओळखीचं नाही म्हणून चुकवायचा प्रश्न नाही कि कोणी आपल्याला चुकवत नाही. सगळ्यांशी सारखेच अंतर आणि एकच नाते human being, माणूस हीच ओळख. किती भारी. आपल्या राहत्या भागात आपलं status संभाळण्याचं नकळत एक दडपण असतं. इथं तसलं काही नसतं, काहीही घाला, काहीही करा. कोणी तुमच्याकडं पाहत पण नाही. सगळ्याच वाटा सारख्या, काहीच वर्ज्य नाही, कुठेही फिरा. कसले पूर्वग्रह नाही, कसले चांगले-वाईट चे शिक्के नाही. काही नाहीच आवडले तर आपल्याला काय करायचे आहे, आपलं थोडीच गाव आहे, अशी सोईस्कर पळवाट आहे. आवडती माणसे दिसत नसल्याचा त्रास होतो पण नावडती माणसं दिसत नसल्याचं सुख पण असतेच. आणि एकटेपणाचा फार विचार करायचा नसतो. साथ देणारे बरोबर असतातच पण शेवटी प्रत्येकजण आतून एकटाच असतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6769
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

आपण गर्दीतही एकटेच असतो.

लेखातली भावना जाणवली. मी अनेक लहानमोठ्या शहरांत दीर्घकाळ वास्तव्य केले आहे. सुरुवातीला 'अनोळखी' असलेली ही शहरे कधी जिवाभावाची होऊन गेली हे कळले नाही. तसेच दूर निसर्गाच्या कुशीत असलेल्या गावसदृश ठिकाणीही प्रदीर्घ काळ कुटुंबाशिवाय राहिलो आहे. तेथील सहकारी हेच एकमेकांचे कुटुंब होते. एकटेपणा हा अवाढव्य महानगरातही राशीला येऊ शकतो. जीव लावणारे मित्रमैत्रिणी दुर्गम गावातही लाभू शकतात.

In reply to by चलत मुसाफिर

खरं आहे, तिथले लोक, त्यांचं राहणीमान, तिथले खाद्यपदार्थ, स्थानिक वाहतूक व्यवस्था, प्रसिद्ध ठिकाणे आदी आठवणी मनावर कायमच्या कोरल्या जातात. घरी परत आले कि तिकडचे काही किस्से सांगून माफक भाव खाता येतो. त्या ठिकाणचं नाव निघालं कि जुनी ओळख असल्यासारखे वाटते. आपल्या सारखे एकल वनवासी जीव आपले मित्र बनून जातात.

प्रत्येक समाजात, प्रातांत, शहरात चांगल्या बरोबरच वाईट गोष्टी, माणसे व जागाही असतात. नविन जागि सर्व माहीती करत असताना त्या वाईट गोष्टींबद्दल ही माहिति करत रहावी असे सुचवेन.

अनोळखी शहरात पाठीला सॅक लावुन फिरणे हा एक मस्त अनुभव असतो बहुतेक वेळा.

एकटेपण जीवघेणे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

खरं आहे, कुटूंबापासून दूर जाताना भरल्या ताटावरून उठल्यासारखा अनुभव येतो. नाईलाज असतो. एकटे पणा अवघड असतो. त्यातल्यात्यात सकारात्मक बाजूंचा विचार करून लेख लिहिला. तेवढंच बळ मिळतं.

एकट्याने वास्तव्य करायचा बराच अनुभव घेऊन झालाय. कुठल्याही पाशात न अडकता मनाला वाटेल तसा दिवस घालवायचा. बऱ्याच वेळी तर अजिबात प्लॅन न करता...मी गमतीने याला शवासन म्हणतो. डोक्याला कुठल्याही प्रकारचा ताण न देता घालवलेला वेळ.

लिखाण आवडलं. आधी थोडसं घाईत सरसर वाचलं होतं तेव्हा solo travel बद्दल लिहिताय असं वाटलं होतं. आता पुन्हा एकदा वाचलं आणि प्रतिक्रिया ही वाचल्या मग हे लेखन म्हणजे कदाचित कामानिमित्त एखाद्या शहरात, गावात राहण्याबद्दल आहे हे लक्षात आलं. कामानिमित्त भारतातील शहरांमध्ये दोन दोन तीन महिने घरापासून दूर एकटं राहण्याचा अनुभव मला आहे. या लिखाणात व्यक्त केल्याप्रमाणे कधी विचार केला नव्हता.

In reply to by वामन देशमुख

माझा एक जिवलग मित्र मागच्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या गावी deputation वर गेला आहे त्याला या लिखाणाची लिंक पाठवीन.

In reply to by वामन देशमुख

धन्यवाद सर. कामानिमित्त ७/८ महिन्यापासून पर राज्यात एकटा राहत आहे. एकटेपणात सकारात्मक विचारांची फार गरज असते.

छान लिहीले आहे. हे वाचून भालचंद्र नेमाडे यांची बिढार - जरीला - झूल ही कादंबरी- मालिका आठवली. नव्वदच्या दशकात ती अनेकदा वाचली. त्यावेळी कामानिमित्त अनेकदा एकटाच विविध शहरात जाऊन रहात असे, त्या प्रवासात हमखास वाचायचो. वाचताना ही आपलीच कहाणी आहे, असे वाटायचे. (आताच्या तरूण पिढीला याबद्दल कितपत माहिती आहे हे ठाऊक नाही)

In reply to by चित्रगुप्त

+१ (कोसलाचा काही कंटाळवाणा भाग सोडला तर) कोसला + बिढार + जरीला + झूल हे कांदबरी चतुष्टय ह्रुदयात घर करून राहिले आहे. प्रत्येक कांदबरीच्या शेवटी उदास व्ह्यायला व्हायचं ... कित्येक दिवस हॅन्गओव्हर रहायचा ! क्वचितच वेगळ्या शहरात जाऊन एकटं फारस्ं अनुभवलं नाहीय .... पण हे चतुष्टय माझ्या हृदयाच्या खुप जवळचं आहे त्याचे कारण ही आपली कहाणी आहे, असं जाणवायं !

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद चित्रगुप्तजी बिढार - जरीला - झूल, या माहिती बद्दल आभार. माझ्या वाचनाच्या यादीत जमा करतो.

आणि हूल? खरंच विषय असा आहे म्हटल्यावर नेमाड्यांचंच नाव आठवलं. त्यांच्या बहुतेक कादंबऱ्या एक तर अशाच पार्श्वभूमीवरच्या आहेत आणि त्यातली तीव्र, मनस्वी संवेदना, पात्रांचे उत्कटतेने जगलेले दिवस आपण विसरूच शकत नाही. खासकरून जरीला.

In reply to by रामचंद्र

बहुतेक कादंबऱ्या एक तर अशाच पार्श्वभूमीवरच्या आहेत आणि त्यातली तीव्र, मनस्वी संवेदना, पात्रांचे उत्कटतेने जगलेले दिवस आपण विसरूच शकत नाही. खासकरून जरीला.
अगदी +१ बाकी शून्य ही कांदबरी देखिल काही प्रमाणात असाच अनुभव देते. विशेषतः त्यातले इंजिनियरींगचे होस्टेलवरचे दिवस आजही आठवण करून दे दे ता त

@कंजूस, @चलत मुसाफिर @शानबा५१२ @राजेंद्र मेहेंदळे @अथांग आकाश @कर्नलतपस्वी @किल्लेदार @वामन देशमुख @चित्रगुप्त @रामचंद्र सर्व मान्यवरांचे मनापासून आभार !