Skip to main content

कळतं रे पण..

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 07/02/2023 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
कळतं मला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय. कळतं आता तुझंमाझं उरलं नाही वेडं वय. येताजाता उचकी लागेल अशी आता कुठली सय? कळतं की भरतीनंतर ओहोटी ही येणारच, किती कुणी जवळ येवो दूर तर जाणारच.. तरीही, उठता उठताच आधी पहिला फोनकडे जातो हात, तुझ्या मेसेजशिवाय होते दिवसाची सुरुवात. स्टेटस, डीपी, पोस्ट, फोटो कुठंतरी तर भेटशील खरं? पण डिलिटलेल्या नंबरवर कसं कुणी दिसणार बरं? कधीतरी तर वाजेल रिंग समजावतं एक मन चोवीस तास उगाचंच हाताजवळ असतो फोन! ... सोडायचं म्हटलं तरी सवयी सुटता सुटत नाहीत; जीर्ण शीर्ण झाल्या तरी काही गाठी तुटत नाहीत..
लेखनविषय:

वाचने 3470
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अरे अरे .. अशी लॉन्ग-डिस्टन्स रिलेशनशिपवरील कवितेवर .. मन उदास झालं असेल कवयित्रीचे.... तर कवयित्रीने हा व्हिडीओ पहावा ... https://www.youtube.com/watch?v=Jcu2AcGx01Q a

छान लिहीलं आहे.

In reply to by सरिता बांदेकर

धन्यवाद!

"डिलिटलेल्या" शब्द विशेष आवडला

पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय.
म्हणुनच म्हणतो , बिनधास्त बोलुन टाकायचं , मनात ठेवायचं नाही . कोणी आवडलं की स्पष्ट सांगायचं जास्त आढेवेढे न घेता ! तुम्ही जर डीसेंटली विचारलेत तर , जास्तीत जास्त वाईट काय होइल , नकार येईल , त्यापेक्शा तर जास्त काही होणार नाही ना , मग ठीक आहे की ! तो नकार तुम्हाला किंव्वा तुमच्या पर्सनॅलिटीला नसुन सर व्यक्तिच्या स्वतःविषयीच्या परिस्थीतीला आहे , बस्स ! आणि तसेही , विचारले असते तर कदाचित काहीतरी वेगळे होऊ शकले असते ह्या कल्पनेत जळत रहाण्यापेक्षा , ठीक आहे , नाही तर नाही , मुव्ह ऑन . हे म्हणणे जास्त सोप्पे असते :) हे मोबाईल अन व्हॉत्सॅप्प मेसेजेस अन सोशळ मीडीयाच्या नादात लोकं स्पष्ट बोलायलाच विसरली आहेत . बोला रे बोला... मनातलं बोला , उगाच बाष्कळ गफ्फा मारत बसु नका , स्पष्ट मनातलं बोला . बोलुन रिकामे व्हा . #वॉर_ऑन_लोनलीनेस

वय झालं तरी सय सुटत नाही तुला विसरावे हेच मुळी पटत नाही. शालजोडीला चिंधी लावतोय, कशी वाटते सांगा. पुला खालून बरचं पाणी वाहून गेलं आहे. तरीही आठवणींचा ओलावा अजून टिकून आहे दगड गोट्यावरचे हिरवे शेवाळ सुकत आहे जुन्या जखमेतून रक्त लाल गळत आहे काळे मेघ अजुन विरलेले नाहीत गुलाबी स्वप्नांचे दिवस सरलेले नाहीत दिवसा मागून दिवस पळत आहेत उरलेल्या आसवांना बांध घालत आजुनही वाट बघत आहे. -कसरत

In reply to by कर्नलतपस्वी

शालजोडीला चिंधी लावतोय, कशी वाटते सांगा.
अहो चिंधी म्हणता म्हणता पार गोधडी करुन टाकलीत तुम्ही तीही रंगीबेरंगी =)))) हिरवे शेवाळ, रक्त लाल, गुलाबी स्वप्न , काळे मेघ =)))) g गोधडी जड असेल पण प्रतिसाद हलक्यात घ्या =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रतिसाद आवडला. काहीतरी उधडायचं काहीतरी बुनायचं विसाव्याचे दिवस आता असचं काहीतरी करायचं &#128512

In reply to by कर्नलतपस्वी

विसाव्याच्या दिवसात प्रतिभा एव्हढी उफाळुन आलेय तर उमेदीच्या दिवसात काय असेल?