Skip to main content

काही लिहावयाचे आहे.......

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 10/11/2022 09:24 या दिवशी प्रकाशित केले.

काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही 

ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही 

अंतरात माझ्या, भावनांना फुटती धुमारे 

कोणास वेळ आहे, त्यांचे प्रदर्शन मी मांडणार नाही

 कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात 

परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही 

मनी आठवणींचे, सप्तरंग जरी विखुरले तरीही 

शब्दचित्र त्यांचे,मी रेखाटणार नाही

 साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव 

ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही. 

मी उपेक्षितांचा धनी होणार नाही.... 

जीथे प्रतीसाद भावनांना मिळणार नाही

लेखनविषय:

वाचने 5062
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

"काही बोलावयाचे आहे" , ही कवीता वाचल्यानंतर मनात आलेले विचार. कुसुमाग्रजांची कवीता आजच्या परिस्थितीत लागू पडते. माणूस किती अंतर्मुख झालाय. कवीने दिलेला शेवटच्या कडव्यातल्या संदेशतुन बोध लक्षात घेऊन त्यानुसार वागणे अपेक्षित आहे.

" कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही " क्या बात है !!

वाह.. मस्त जमली आहे. कुसुमाग्रज तर ग्रेटच, पण हेसुद्धा छान आहे.

छान भाव मांडले आहेत. साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही. बरोबर,पण.....आताशा माझ्याही पोस्ट ऐवजी , इनबॉक्समधल्या सेव्ह कविता वाढू लागल्या आहेत :)

लिहीत रहा कर्नलसाहेब आम्ही वाचत आहोत. पैजारबुवा,

काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही... हे ठाऊक असूनही जाणिवांचा कल्लोळ, भावनांना फुटणारे धुमारे, आठवणींचे सप्तरंग ... हे स्वस्थ बसू देत नाहीत आणि काहीतरी लिहायला, रेखायला, बोलायला उद्युक्त करतातच. मस्त लिहीले आहे. लिहीत रहावे.

भावना व्यक्त करणारी सुंदर रचना. साद प्रतिसाद, छिन्नी हातोडीचे घाव ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही. आणि... हे खासच कर्नल साहेब!