Skip to main content

माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 19/08/2022 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ इथे. नमस्कार रूळगाडी मित्रांनो ! आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार ! या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... ! ok
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 72346
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

प्रवाही धाग्याची कल्पना आवडली. प्रस्तावातील बिस्कीट रेल्वे चित्र आवडले. --- प्रवासाच्या माझ्या आवडत्या साधनांत रेल्वेचा वरचा क्रमांक आहे. विशेषतः रात्रभर प्रवासासाठी. उदा. - अनुभव: हैद्राबाद-बेंगळुरू प्रवासासाठी विमानाने प्रत्यक्ष उड्डाण काळ हा सव्वा तासाचा असला तरीही दार-ते-दार (door to door) प्रवास काळ हा प्रत्यक्षात किमान सहा तासांचा असतो. या सहा तासांच्या काळाचा काही काम करण्यासाठी फारसा विशेष उपयोग होत नाही. झोपता तर अजिबात येत नाही. रेल्वेने दार-ते-दार प्रवास काळ हा १२ तासांचा असतो. त्यापैकी किमान आठ तास सुखाने झोपता येते, दोनेक तास काही कामे करता येतात. निष्कर्ष: विमानापेक्षा रेल्वे प्रवास अधिक चांगला आहे. अर्थात, हैदराबाद-दिल्ली किंवा हैदराबाद-कोलकाता या प्रवासासाठी हा निष्कर्ष लागू नाही.

In reply to by वामन देशमुख

धन्यवाद व नव्या अध्यायात स्वागत !
हैद्राबाद-बेंगळुरू प्रवासासाठी
>>>> +११ मी पण रेल्वे पसंत करेन.

In reply to by वामन देशमुख

वामन देशमुख,
हैदराबाद-दिल्ली किंवा हैदराबाद-कोलकाता या प्रवासासाठी हा निष्कर्ष लागू नाही.
या मार्गांवर बुट्रे सुरू झाल्या तर निकष बदलेल काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बुट्रे आली तरी माझी पहिली पसंती सध्याच्या साध्या किंवा राजधानी दर्जाच्या गाड्यांनाच असेल.

In reply to by वामन देशमुख

रेल्वेच्या नवीन प्रस्तावानुसार, हे अंतर ताशी दोनशे किमीच्या गतीने अडीच तासांत कापता येईल. संबंधित बातमीचा दुवा

In reply to by वामन देशमुख

विमानापेक्षा रेल्वे प्रवास अधिक चांगला आहे. भारत सोडला आणि रेल्वे प्रवासाच्या या गंमतील मुकलो येथे पूर्व किनाऱ्या वरील ४ शहरातील एकमेकातील अंतर प्रत्येकी ८००-१००० कि आहे आणि मध्ये फारशी लोकसंख्या नाही त्यामुळे विमान प्रवास हा "सर्वसामान्यनसाठी" आणि रेल्वे = मज्जा म्हणून तशाही येथील रेल्वे युरोप/ जपान च्य्या मानाने "मागासलेल्या" आहेत म्हणा काही गमती चाय गोष्टी जगातील सर्वात जास्त लांबीचा सरळ रेषेतील रेल्वे येथे आहे ४७७ कि मी सरळ रेषेत = कालगुर्ली ते पोर्ट अगस्टा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया थोडे विषयांतर रोड ट्रेन = https://www.youtube.com/watch?v=0iFkKRh5kcM

जुन्या प्रेयसीला तुम्ही लैच रेमटवली होती :=) ते घडामोडीवाले चालू लोकं बघा दीडशे किलोमीटर झाले कि कशे लगेच नवीन आयटम बरोबर फिरायला लागतात :P तुम्ही आयटम नाही बदलली; तिचा मेकओव्हर केला हे भारी काम केले :D नवीन धाग्याला शुभेच्छा.

कृ ह घ्या

(रूळगाडी मित्र) रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

अहो, बाकींच्यांच्या आयटम्स हाईता, सायबांची पिरयेसी हाय. दोनीत फरक हाय. जरा सम्जुन घ्याव. 😜

वडील मध्य रेल्वेत अधिकारी असल्याने त्यांना मिळणाऱ्या पास वर लहानपणा पासून वयाच्या २१ वर्षांपर्यंत भरपूर प्रवास घडला. त्यानंतर मात्र आठवणीत राहण्यासारख्या रेल्वे प्रवासाची वेळ खूप कमी वेळा आली. लहानपणीच्या रेल्वे प्रवासाच्या आठवणी म्हणजे पूर्वी लाकडी स्लीपर्स वर रुळ टाकलेले असायचे, त्यावर गाडी वर खाली आणि डावी-उजवीकडे हलत डुलत चालायची त्यामुळे शरीराची आणि पर्यायाने मेंदूची इतकी लयबद्ध हालचाल व्हायची की लांबचा प्रवास संपला तरी नंतर कितीतर तास आपण अजून गाडीतच आहोत असे वाटत राहायचे 😀 नंतर सिमेंट काँक्रिटच्या स्लीपर्स बसवल्यावर हा नकोसा वाटणारा त्रास बंद झाला. पूर्वीचा फर्स्ट क्लासचा कुपे, ac डब्यात प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये लावलेले ते जाळीदार नक्षीचे पांढरे शुभ्र तर आत-बाहेर जाण्याच्या दोन्ही बाजूच्या दरवाजांना आतून लावलेले सॅटिनचे गडद निळ्या रंगाचे पडदे, दोन खिडक्यांच्या मध्ये बसवलेले आणि गोलाकार फिरणारे ऍश ट्रे, कधी इंजिनमधून लोको पायलटच्या शेजारी बसून तर कधी गार्डच्या डब्यातून केलेला प्रवास, डिझेल इंजिनचा हॉर्न वाजवण्या साठी असलेला जाड स्प्रिंग वाला घट्ट नॉब सगळी शक्ती एकवटून दाबला कि लालबुंद होणारा हातचा तळवा अशा काही गोष्टी आजही जशाच्या तशा आठवतात. गेले ते दिवस, राहिल्या त्या रम्य आठवणी 🙂

पण शक्यतो पोहोचण्याची वेळ सकाळी सात ते अकरा असावी हे पाहतो. हे पर्यटनासाठी विशेष लागू. परतण्यासाठी सकाळी सात ते बाराला निघणारी ट्रेन पाहतो कारण त्या वेळी चेकाउट असते. जे प्रवासी आपल्या नातेवाइकांकडे जातात त्यांना हा प्रश्न पडत नाही. भारतात विमानाने जाण्याची गरज नाही हे माझे मत. वेळ भरपूर पडलेला असतो त्याचा उपयोग झाला तर काय बिघडते? गंमतीजमती पाहात जाण्यात गैर काय?

In reply to by कंजूस

भारतात विमानाने जाण्याची गरज नाही हे माझे मत. वेळ भरपूर पडलेला असतो त्याचा उपयोग झाला तर काय बिघडते? गंमतीजमती पाहात जाण्यात गैर काय?
हे मत रिटायर्ड लोक, विद्यार्थी, एकटे दुकटे प्रवासी ह्यांना लागू असेल तर बरे, कारण इथ ३ दिवस C.L. टाकून घरी जाऊन यायचं म्हणलं तरी धावपळ होते, भारतात सगळ्यांना वेळ असतो म्हणून कृपया क्रूर चेष्टा करू नये. LoL सोबत बारकी पोरे, वरिष्ठ नागरिक वगैरे असले की सगळ्यांच्या अंघोळी , पोरांच्या बाबतीत शी शु चे दोन तीन राऊंड, बायकांची त्यानंतरची आवराआवरी इत्यादी करून निघणे हे जमेस धरून वेळ बघावी लागते रेल्वेची.

In reply to by जेम्स वांड

सरांचा आयडी काळजीपुर्वक बघा. सर नेहमी कमी खर्चात कामे कशी होतील ते बघण्यात माहिर आहेत. वेळ भरपूर असतो हे त्यांचे सर्वसाधारण निरिक्षण आहे. जेसीबी की खुदाई वाले मिम्स आठवा. तुमच्यासारख्या बिझी लोकांना ते लागू होत नाही.
सोबत बारकी पोरे, वरिष्ठ नागरिक वगैरे असले की सगळ्यांच्या अंघोळी , पोरांच्या बाबतीत शी शु चे दोन तीन राऊंड, बायकांची त्यानंतरची आवराआवरी इत्यादी करून निघणे हे जमेस धरून वेळ बघावी लागते रेल्वेची.
आंघोळ रोज करावी लागते काय ? उगाच पाणी, वेळ सगळ्यांची नासाडी. सरांकडे एखादी आंघोळीची गोळी आहे का विचारुन पहा. कंजूस सर : हा प्रतिसाद विनोदी अंगाने लिहिला आहे आपण तसाच समजून घ्याल ही अपेक्षा.

In reply to by धर्मराजमुटके

काका पदी पोचलेले सर कंजूस आहेत हे मी विसरलोच होतो.. काका, हा पण प्रतिसाद हलक्या अंगाने जाणारा आहे हो.

In reply to by धर्मराजमुटके

कशाला लागते? व्यवस्थित चेकाऊट अगोदर आंघोळ वगैरे झालेली असते. किंवा घरातून दुपारी निघाल्यास तोही प्रश्न येत नाही. थोडं आयोजन.

लहान असताना एखादा अपवाद सोडला तर फक्त तीनच प्रवास घडायचे वर्धा - हिंगणघाट, वर्धा - चंद्रपूर, वर्धा - नागपूर. हे तीनही प्रवास ९९% वेळेला पॅसेंजर ट्रेननेच व्हायचे. आता सहज विचार केला तर लक्षात आले की १२वी पर्यंत असेच होते. या पॅसेंजरच्या प्रवासात प्रवासापेक्षा टिकिट काढणेच दिव्य होते. तीन पॅसेंजर एकाच वेळी सुटायच्या, दोन कॉऊंटर काय झुंबड व्हायची. बल्हारशा पॅसेंजर तर उभीच असायची तेंव्हा त्यात जाउन बसायचे. तिकिट काढणारा येतपर्यंत सतत धाकधुक असायची. मग पहाटे आधी जाऊन तिकिट काढायला लागलो. मी कधी प्रवास केल्याचे अजिबात आठवत नाही पण नागपूर काझीपेठ पॅसेंजर वेळेत येणे यापेक्षा मोठे आश्चर्य नव्हते. नागूपर रायपूर हा प्रवास देखील पॅसेंजरचाच. रायपूरपर्यंत कसे पोहचलो ते एक दिव्य होते. ट्रेनमधे प्रचंड गर्दी असल्याने गार्डच्या डब्यातून प्रवास केला होता ते डब्बे फक्त गोंदियापर्यंत होते. तिथून पुढे दुसऱ्या गाडीने गेलो. रायपूरवरुन बिलासपूरला छत्तीसगड एक्सप्रेसने जायचे होते. रायपूर स्टेशनवर घोषणा झाली ट्रेन या नाही दुसऱ्या फलाटावर आली आहे तेंव्हा धावत तिकडे गेलो. ट्रेनमधे सामान ठेवले, बसलो तर कुणी सांगितले ही वाल्टेयर (रायपूर-विजयनगरम-विशाखापट्टणम मार्ग) एक्सप्रेस आहे. खाली उतरलो. छत्तीसगड आली. फलाटावर आणि ट्रेनमधे प्रचंड गर्दी होती. गाडी येताच वडिलांनी सामान आणि मला आत टाकले. तेंव्हा खिडक्यांना गज नसायचे म्हणतात. आजीने वडिलांना पण डब्ब्यात जायला सांगितले. ते कसेबसे आले. ते डब्बे कटले आणि यार्डात चालले होते. मोठ्या मुष्किलिने आम्ही सामानासकट चालत्या गाडीतून खाली उतरलो. आजी स्टेशनवरच होती. तिने कुणाला तरी सांगून एक जागा पकडून ठेवली होती. हे तिचे स्किल जबरदस्त होते. पुढचा प्रवास झाला. तेंव्हा मी पाचसहा वर्षाचा असेन. या नागपूर-रायपूर-बिलासपूर-वर्धा प्रवासातील मला फक्त काही दृष्ये चित्रासारखी अंधुकशी आठवतात. गार्डचा डब्बा, खिडकितून मला आत टाकले, सामानासकट चालत्या गाडीतून उतरणे बाकीची गोष्ट आजीकडून ऐकली. त्यानंतर मी आजतागायत बिलासपूरला गेलो नाही. रायपूरला देखील १५ वर्षानंतर गेलो पण एक्सप्रेसने. आजी माहेरी एकटीच जायची. दुसरा लगेच आठवला तो अलिकडचा प्रवास. कुटुंबासमवेत हैदराबादवरुन दक्षिण एक्सप्रेसने वर्ध्याला चाललो होतो. ट्रेन वेळेत सुटली. छान झोप लागली. सकाळी पाचसाडेपाचला उठलो. ट्रेन थांबली होती. मी विचारले "बल्लारशा आ रहा है क्या?" दुसऱ्याने उत्तर दिले "सामने गुडस पलटा है ट्रेन वापस जायेगी." नंतर समजले तिथनं बल्हारशा अर्धा तासाच्या अंतरावर होते. ट्रेन तिथून थेट सिकंदराबाद पर्यंत परत आली. रात्री दहाला सुटलेली ट्रेन सकाळी साडेदहापर्यंत परत आली होती. जाणे महत्वाचे असल्याने आम्ही उतरलो नाही. मग ट्रेन सिकंदराबाद-मुदखेड-वणी-माजरी-नागपूर या मार्गाने गेली. यात मुदखेड पर्यंत तरी ठिक होते, चहा नाष्टा, जेवण सुद्धा मिळाले. मुदखेड ते माजरी हा मार्ग तेंव्हा तितकासा डेव्हलप न झाल्याने तिथल्या स्टेशनवर साधा चहा सुद्धा मिळत नव्हता. रामगुंडम किंवा बेलमपल्लीला उतरुन बसने गेलो असतो तर एव्हाना वर्ध्याला पोहचलो असतो असे वाटत होते. पँट्रिवाल्याने आधीच ऑर्डर घेऊन अदिलाबादला बिर्याणीची (पैसे बिर्याणीचे पण त्याला फुलाव म्हणायला पण लाज वाटेल.) सोय केली. मजल दरमजल करीत पहाटे साडेपाच वाजता आम्ही वर्ध्याला पोहचलो. ज्या प्रवासाला १० तास लागतात. तो प्रवास करायला ३२ तास लागले.

In reply to by टर्मीनेटर

काझीपेठ बल्हारशा हा मार्ग जर का बंद झाला तर दक्षिणेकडे जाणारे सर्व मार्ग खुंटतात. चेन्नई आणि खाली दक्षिणेतून येणाऱ्या सर्व गाड्या या मार्गावरुन वळविल्या होत्या. आता बारा वर्षे झाली पण तेंव्हा हा सिकंदराबाद मुदखेड मार्गावर देखील इतक्या गाड्या हँडल करु शकत नव्हते. मुदखेड - माजरी तर मला वाटते आजही नाही. किती सुधारणा झाल्या ते माहित नाही.

दिवसाच्या प्रवासाची मजा वेगळी असली तरी रात्रीचा रेल्वे प्रवास बऱ्याच वेळा सोयीचा पडतो असा वैयक्तिक अनुभव. वातानुकूलित असेल तर अधिक सोईचे. आमच्या कौटूंबिक सहलीच्या ग्रुपसाठी आम्ही ३ AC ला प्राधान्य देतो. खर्च सगळ्यांना झेपेल इतका. फायदे : १. बेड रोल मिळत असल्याने (करोना काळ सोडून) सहलीत अंथरून, पांघरूनाचे ओझे/अतिरिक्त डाग वागवायची जरूर नाही. २. संडासच्या दुर्गंधीचा त्रास नाही. ३. फेरीवाल्यांचा त्रास कमी ४. इतर घुसखोर लोकांचा त्रास नाही. ५. गेल्या ८-१० वर्षात डब्यात चोरी वगैरे झाल्याचे नजरेस नाही. ६. सर्वात महत्वाचे रात्रीचा प्रवास असेल तर मस्त झोप होऊन सकाळी आपण भटकंतीसाठी ताजेतवाने असतो. रात्रीच्या प्रवासाचे इतर फायदे * रात्रीच्या प्रवासामुळे हॉटेलमधील साधारण एका मुक्कामाचा तरी खर्च वाचतो. * सहलीच्या दिवसांमध्ये १-२ दिवसाची कपात करता येते (वेळ व खर्च दोन्हीची बचत) राजस्थान सहलीच्या वेळी आम्ही सकाळी सकाळी आग्रा येथे पोहचलो होतो. ताजमहाल, फत्तेपूर सिक्री वगैरे भटकंती केली व रात्रीच्या रेल्वेने प्रवास करून सकाळी बिकानेरला पोहचलो. स्थानिक भटकंतीला संपूर्ण दिवस मिळाला. दोन मुक्कामांचा खर्च व वेळ वाचला. सहलीच्या शेवटच्या दिवशीही सकाळी चेक आऊट करून दिवसभर भटकंती केली व रात्रीची गाडी पकडली. येथेही एक मुक्कामाचा खर्च /वेळ वाचला. (अर्थात पहिल्या दिवशी रेल्वेतून उतरल्यापासून शेवटच्या दिवशी रेल्वे स्टेशनवर पोहचेपर्यंत भटकंतीसाठी वाहन असल्याने हे शक्य होते ) साधारण अशीच आखणी इतर सहलींमध्येही असते. आता थोडी जाहिरात. यावेळच्या ऑक्टोबरमधील हिमाचल सहलीतही पठाणकोटला सकाळी सातला रेल्वेतून उतरल्यावर अडीच तासात धर्मशाळा पोहचणे आणि नंतर भटकंती . पहिल्याच दिवशी येथील मुक्कामातील अर्धा अधिक भाग पाहून होणार. परत येतांना देखील सकाळी अमृतसरच्या हॉटेलमधून चेक आऊट करून दिवसभर भटकंती व रात्री रेल्वे प्रवास सुरु.

In reply to by गोरगावलेकर

वय परत्वे आता झोप तितकी गाढ लागत नाही त्यामुळे मागच्या वेळेस १० वर्षांपूर्वी देवगिरी एक्स्प्रेस च्या ए सी कोच ने प्रवास केला तर काही लोक भयाण घोरत होते. त्यामुळे रात्री दोन ते तीन मी जागा होतो आणि असे झोपेची आराधना करत राहणे हि एक शिक्षा आहे. जर घोरणारे लोक नसतील तर रात्री मला ८ तास झोप लागते. आता पुढे जर कधी रात्रीचा प्रवास करायला लागला तर शांतपणे झोपेची गोळी घेऊन झोपण्याचा विचार केला आहे. उगाच अपरात्री जागे राहण्याची शिक्षा परवडणार नाही. द्वितीय वर्गात निदान बाहेरचा आवाज आणि चाकांचा खडखडाट यामुळे घोरण्याचा इतका भयानक आवाज येत नाही. पण वातानुकूलित कोच मध्ये धूर नाही धूळ नाही आवाज पण नाही यामुळे तीन कप्पे पलीकडच्या घोरण्याचा आवाज पण तुमच्यापर्यंत पोचतो. यामुळे गेली १० वर्षे आम्ही रात्रीचा प्रवास टाळलेला आहे. अर्थात स्वतःचा दवाखाना चालू केल्यामुळे गेली १२ वर्षे कुठेही प्रवास करायचा एक दिवस दवाखाना बंद ठेवण्यापेक्षा विमानाने प्रवास करणे परवडते त्यामुळे गंतव्य स्थानाच्या सर्वात जवळच्या विमानतळ पर्यंत विमानाने जातो आणि पुढे रेल्वे किंवा बस सारखे जे सोयीचे असेल ते वापरतो. पण गेल्या १० वर्षात अहमदाबाद शताब्दी, वैगई एक्स्प्रेस, मडगाव जनशताब्दीच्या व्हिस्ताडोम सारखे अनेक प्रवास केलेले आहेत.

या वेळी करोना काळाच्या नंतर रेल्वेने प्रवास केला होता, का कोणास ठावूक पण रेल्वेचे हे नवे डबे अधिक हलतात असे मला जाणवले. बहुतेक वजनाने ते हलके आहेत म्हणुन अधिक हलत असावेत का ? हा अनुभव मला एसी स्लिपर कोच मध्ये दोन्ही वेळा आला. या आधीच्या धाग्यात सुपर वासुकीचा व्हिडियो द्यायला आलो होतो,पण तुम्ही त्या बद्धल आधीच दिलेला प्रतिसाद पाहिला. :) जे लोक हा धागा वाचत आहे त्यांच्यासाठी तो व्हिडियो इथे देऊन ठेवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2

In reply to by मदनबाण

पण वातानुकूलित कोच मध्ये धूर नाही धूळ नाही आवाज पण नाही यामुळे तीन कप्पे पलीकडच्या घोरण्याचा आवाज पण तुमच्यापर्यंत पोचतो. होय याचा लईच त्रास होतो ! लोक मोबाईलवर गाणी ऐकत बसतात त्याचा देखील वैताग येतो. नवे डबे हलतात असे वरती मी लिहले आहे, त्यामुळे झोपताना शरीर अधिक हलते हे जाणवल्याने तसे लिहले आहे. यापुढे जेव्हा केव्हा प्रवास करीन तेव्हा यावर परत निरिक्षण करेन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2

In reply to by मदनबाण

एक सुरेख उपयोग होतो, घरी बारा बारा पर्यंत न झोपता दंगा मस्ती करणारं आमचं लव्हेबल क्युटी पण पाजी पोरगं रेल्वेत मात्र बर्थ वर टाकल्याच्या पाचव्या मिनिटांत शांत झोपी जातं ! आता घरच्या किंग साईज बेडला हायड्रॉलिक लावून हलवावे का काय असा विचार करतो आहे आम्ही उभयतां

In reply to by जेम्स वांड

आता घरच्या किंग साईज बेडला हायड्रॉलिक लावून हलवावे का काय असा विचार करतो आहे आम्ही उभयतां हा.हा.हा... अगदी असाच विचार माझ्या देखील मनात आलेला होता की असा काही जुगाड करुन बेड बनवता येईल का ? परंतु हे हलणे मला रेल्वेच्या जुन्या डब्यात अधिक आवडायचे, नव्या डब्याच्या गाड्या अधिक वेगवान असाव्यात आणि या वेगाचा आणि झोपताना मिळणार्‍या लयीचा मेळ निदान माझ्या शरीरास तरी यावेळी मेळ खाताना दिसला नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2

In reply to by मदनबाण

जुन्या डब्याचे हालणे - chugging movement, लाकडी किंवा लोखंडी प्लेट्स आलटून पालटून दबण्यामुळे आलेला "डुलत डुलत जाणाऱ्या" झुकझुकगाडीची फिलिंग नव्या डब्याचे हालणे - हे एका प्रकारे खेचल्याने पडणाऱ्या ओढी सारखे वाटते, प्रसंगी centrifugal किंवा Centripetal फोर्सचा आविष्कार, त्यामुळे मला वाटते ते जुने हलणे सुखद अन् नवीन त्रासिक वाटत असावे, वाढीव गतीची किंमत म्हणायला हवी ही, युट्यूबवर मी overnight Japanese train videos बघितले होते, त्यात पण स्लीपर कोच मध्ये बसलेले निवेदक हा ताण फेस करतायत असे मला तरी जाणवले होते, किंवा अगदी ट्रान्स सायबेरियन मध्ये पण

In reply to by जेम्स वांड

ह्म्म्म... याच बरोबर मला आयसीएफ आणि एलएचबी कोच मधला फरक अधिक वाटत आहे, कारण लाकडी स्लिपर्स बदलुन आता बराच कालावधी लोटला आहे. माझ्या शरीराला आयसीएफ मधले हलणे अधिक प्रिय होते की काय असे वाटतं. आधी म्हंटल्या प्रमाणे यापुढे प्रवास करताना माझ्या अनुभवात काय फरक पडतोय का ते मी अनुभवुन पाहिन. युट्यूबवर मी overnight Japanese train videos बघितले होते, त्यात पण स्लीपर कोच मध्ये बसलेले निवेदक हा ताण फेस करतायत असे मला तरी जाणवले होते, किंवा अगदी ट्रान्स सायबेरियन मध्ये पण ओक्के. मी आता पाहिलेला एक व्हिडियो इथे देऊन ठेवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2

In reply to by हेमंतकुमार

'सुखी झोपेचा साथी' लेखाची आठवण झाली. काही प्रवासी वेटिंग लिस्ट तिकिटावरचे ( साध्या नान एसी डब्यात) दाराजवळ पेपर टाकून डाराडुर झोपलेले असताना दिसतात.

कमी वेगाने जाणाऱ्या गाड्या सुरू करणार अशी बातमी आहे. पूर्वी परदेशात असे वाक्य होते की लोक पैसे मिळवण्यासाठी चक्क कामंही करतात. म्हणजे यांना कामात वेळ न घालवता पैसे भरपूर मिळतात आणि वेळ घालवण्यासाठी प्रवासाची साधने हवी असतात. बोटी वगैरे.

याचा एक लेख डिस्कवरी and leisure मासिकात आला होता. -मालाड/बोरिवली भागातून दुपारी ट्याक्सीने डोमेस्टिक एरपोर्ट, -विमानाने संध्याकाळी बाजपे एरपोर्ट, -मग एरबिएनबीमाध्यमातून खोली रात्रीसाठी मंगलोर जंक्शन एरियात, - एरपोर्ट ते खोली ओटो -सकाळी पाचवाजता पुन्हा ओटोने मंगलोर जंक्शन -मंगलोर- मडगाव प्यासेंजरने गोकर्ण स्टे. दहा वाजता, -ओटोने दोनशे रुपये देऊन गोकर्ण (१२ किमी.) हॉटेल. ((फक्त रेल्वेने गेला गेल्यास रात्री साडेदहाची रेल्वे, झोपून सकाळी कुमटा साडे दहा. -कुमटा ते गोकर्ण बस तीस रु बाराला गोकर्ण हॉटेलात.))

In reply to by कंजूस

पण प्रत्येक माणूस तुमच्यासारखा पावली पावली बचाव मोहीम उघडत असेल कायम हे वाटत नाही, आजकाल पोरे नोकरीला लागल्या बरोबर "गोल बेस्ड investments" वगैरे करतात त्यात लग्न वगैरे long-term ते पुढील वर्षी लेटेस्ट आयफोन घ्यायचा, अमुक ठिकाणी फिरायला जायचं अशी शॉर्ट गोल्स पण असतात, वय असल्याने रिस्क appetite पण उत्तम असते, खरे साहेबांचे वरचे उदाहरण पाहता वेळही नसतो व्यवसायातून किंवा कामाच्या रगाड्यातून, त्यामुळे प्रत्येकाला रात्रभर रेल्वेत डुलत डुलत जाऊन ३०₹ मध्ये रिक्षा करून आपण लई भारी पैसा वाचवला हा फिलिंग घ्यावा वाटेल असे अजिबात वाटत नाही. तुम्हाला पैसे वाचवण्याचा एकस्पिरियांस आवडत असेलही पण लोकांना पर्यटन experience आवडतो हे इथे ठळक करू इच्छितो, दोन पैसे जास्त गेले तरी लोक किमान सुट्टी घालावताना पैश्याकडे बघत नाहीत. पैसा वाचवणे उत्तम गोष्ट मानली तरी, गोल बेस्ड investment करुन आपल्याला हवी त्या टाईम फ्रेममधे तो पैसा वाढवून नंतर दौलतजादा करणे ही पण एक विलक्षण समाधान देणारी कला असते वित्तीय नियोजनातील, तुम्हाला पटले पाहिजे असा आग्रह नाही, पण एकंदरीतच तुमचे इथं ३० वाचवा , तिथं ५० वाचवा, कश्याला हवं अमुक कश्याला हवं तमुक टाईप प्रतिसादांचा घाऊक कंटाळा आल्यामुळे जरा स्पष्टच मांडतोय.

In reply to by जेम्स वांड

असं करण्याचा कुणाला आग्रह केलेला नाही. फक्त रेल्वे प्रवासाची तुलना दाखवली. आणि पर्यटन स्थळे पूर्वीच्या लोकांनी एरपोर्ट जवळच न बांधण्याची चूकच केली. वरील उदाहरणात मंगलोर एरपोर्ट ते गोकर्ण २३० किमी अंतर त्याने प्यासेंजरनेच प्रवास केला. मग त्यापेक्षा मुंबईतूनच कारने गेला असता. आता रेल्वेच्या एसी डब्यांचे गुणदोषही दाखवले आहेतच ना? आणखी एक - फोटो काढायचे तर प्रत्येक वेळी दारात धोकादायक उभे राहावे लागते. खिडकीच्या काळ्या काचेतून शक्य नसते. स्वस्तात जाण्याचा कुणाला आग्रह करत नाही तरीही रेल्वे आरक्षणं मिळत नाहीत, नवनवीन लक्षरी गाड्या वाढवतच आहेत. मला का सोपे पडते एवढेच मांडले. ज्यांना पटेल आणि परवडेल ते करतात. नाहीतर आपल्या साधुसंतांनी पायी भारतभ्रमण केले म्हणून मी करणार नाही.

In reply to by कंजूस

कंजूस साहेब चला तुम्हाला एक आवाहान ..बघुयात काही उपाय तुमच्या कडे आहे का मुंबई आणि आसपास मध्ये ७-८ दिवस सलग फिरयायचे आहे , ३-४ प्रवासी बसतील अशी गाडी ( बहुतेक वातानुकूलित) पाहिजे असले तर उबर / ओला पेक्षा, आणि दिवसा पूर्वी ४० कि मी ८०० रु ( आता माहित नाही जास्त असणार) अश्या पेक्षा जास्त "किफायतशीर " उपयाय आहे का? सलग ७-८ दिवस , असे समजा दोनदा १.५ महिन्यात कंत्राट दिले तर फक्त १ दिवसाच्या कंत्राटा पेक्षा थोडे सरासरी कमी पडायला पाहिजेत ना ? ठाणे ते चर्चगेट वैगरे जायचे तर फर्स्ट एसी लोकल जास्त किफायती पडते / पडेल ( वेळेच्या दृष्टीने) हे माहित आहे (हे आव्हान हलके घ्या पण विचारणे निश्चितच गंभीर आहे वर्षाअखेरी अशी निकड भासणार आहे )

In reply to by कंजूस

कंजूस साहेब मला जर गोकर्णला जायचे असेल तर मी रात्रीच्या गाडीने सकाळी कुमटा येथे उतरून गोकर्णला रिक्षाने जाण्यापेक्षा रात्री माझा दवाखाना चालू ठेवला आणि रुग्ण पाहिले आणि सकाळी उठून गोव्याला विमानाने गेलो आणि तेथून टॅक्सी ने गोकर्णला गेलो तर ते मला जास्त स्वस्त पडते. असे असंख्य ठिकाणी प्रवास करताना मारवाडी हिशेब करून मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. गेले एक वर्ष विमानाचे भाडे फारच वाढले असल्यामुळे या हिशेबात कदाचित फरक पडला असेल. परंतु रेल्वेत लोकांच्या घोरण्यामुळे मला झोप मिळाली नाही तर हा प्रवास प्रकृतिच्या दृष्टीने महाग पडतो. आमचे दुकान बंद असले तर मीटर डाऊन होतो. नोकरीत असताना किंवा निवृत्त झालेल्या लोकांची गोष्ट वेगळी आहे.

In reply to by असा मी असामी

बाहेरचा नको असलेला आवाज ठराविक फ्रिक्वेंन्सीत असेल तरच तो गाळता येतो noise cancellation headphonesमध्ये.

बेंगलोर ते हैदराबाद, हैदराबाद ते पुणे, बेंगलोर ते पुणे थोडक्यात दक्षिण भारतातल्या दोन मेट्रो सिटी जोडणारी कोणतीही ट्रेन किमान १५-१६-१७-१८ अशा तासांवर प्रवास करते. हे ब्रुटल आहे. बहुतांश ट्रॅक (म्हणजे भूसंपादन करून) तर ब्रिटिशांनी आखलेले आहेत. पुणे ते बेंगलोर बस ने कमी वेळ लागतो आणि रेल्वेने जास्त हा तर ज्योक आहे. याची प्रचंड लाज सरकारांना वाटायला हवी. दक्षिण भारतात रेल्वेच्या जाळ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. का कुणास ठाऊक. रेल्वे हा संयुक्त सूचीतला विषय हवा. केवळ केंद्रसरकारच्या सूचीत नको. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला मी केवळ इतक्याच कारणासाठी फुल सपोर्ट करतो. किमान भारतातली पहिली दहा शहरे तरी हायस्पीड ट्रॅक्सने जोडली पाहिजेत. सुवर्ण चतुष्कोण करा किंवा पंचकोन किंवा डायमंड.. काहीही करा च्यायला. हे व्ह्यायला २०७० उजाडणार. किंवा २१००. अवघड आहे समदं.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

एखाद दक्षिणात्य व्यक्तीला विचारून बघा, ते लोक पुण्याला दक्षिण भारतात मोजतील का ? त्यातही तमिळ माणसाला विचारले तर अजूनच मज्जा. Lol

In reply to by Trump

एक किमीची उंची गाठायला किती अंतर जावे लागते. १) १/१०, २)१/२० ३)१/३० ४)१/४० ५)१/५० . . . खंडाळा - लोणावळा बोरघाट हा क्रमांक (४) आहे. तीन एंजिने गाडीमागे लावून गाडी वर चढवायला. लागते. सह्याद्रीचा पश्चिम उतार ( चढ) तीव्र आहे. पण सह्याद्रीचा पूर्व उतार ( चढ) तेवढा तीव्र नाही. पसरत पसरत पूर्व किनारा गाठतो. दक्षिणेकडे मंगळुरु - हसन उतार तीव्र नाही. वळणे घेत एक एंजिन गाडी ओढते. पुणे - सातारा गाडी अगदी उतारा बाजूला वळणे घेत सावकाश चढते (५५० मिटर्सवरून ७५०मिटर्स. )एकच डिझेल एंजिन कोयना एक्सप्रेस खेचू शकते. ( रस्ता मार्ग मात्र दोन चढ्या घाटाने सातारा/वाईला पोहोचतो आणि शंभर किमी कमी होतात/लागतात.) हिंदुपूर ते बंगलोर हा घाटही एकच डिझल एंजिन उद्यान एक्सप्रेसला खेचत वर नेऊ शकते. संबळपूर - कटक घाटमार्गही एक एंजिन खेचते. अंतर वाढले मान्य पण फारशी मोठी शहरेही वाटेवर नाहीत. मुंबई - दिल्ली पश्चिम रेल्वेने गेल्यास गाडी कोणताही घाट चढत/उतरत नाही. त्यामुळे वेगात सरळ जाते.

In reply to by कंजूस

धन्यवाद श्री कंजुस. तुमची उदाहरणे ही पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. तुमच्याकडे दक्षिण भारताविषयी माहिती आहे का?

In reply to by Trump

पुणे ते बेंगलोर बस ने कमी वेळ लागतो आणि रेल्वेने जास्त हा तर ज्योक आहे. ते लिहिलं आहे. अगदी दक्षिणेकडे म्हणाल तर कोशुवेली( तिरुवअनंथपुरम/ त्रिवेंद्रम) कुर्ला गरीबरथ बरीच वेगात येते. त्या मार्गावर लक्षरी गाड्या हव्या आहेत काय?

In reply to by Trump

पुणे ते बेंगलोर बस ने कमी वेळ लागतो आणि रेल्वेने जास्त हा तर ज्योक आहे. ते लिहिलं आहे. अगदी दक्षिणेकडे म्हणाल तर कोशुवेली( तिरुवअनंथपुरम/ त्रिवेंद्रम) कुर्ला गरीबरथ बरीच वेगात येते. त्या मार्गावर लक्षरी गाड्या हव्या आहेत काय?

In reply to by Trump

मुंबईतील प्रवाशांना ( भाविकांना) तिरुपती'ला थेट गाडी हवी या हट्टपायी एक गाडी जात असे. (16351- मुंबई ते नागरकोईल व्हाया तिरुपती. ) खरं म्हणजे मुंबईकडून चैन्नई जाणाऱ्या गाड्या रेनिगुंटा या स्टेशनवरून जातात आणि रेनिगुंटा ते तिरुपती फक्त अकरा किमी दुसऱ्या मार्गावर आहे. पण भाविकांसाठी ती गाडी ते अकरा किमी अंतर कापायला अडीच तास घेत असे. कारण रेनिगुंटा आणि तिरुपतीला एंजिन रिवर्सल. आता ( २०१३ सेप्टेंबर)काढून टाकले आहे. गाडी रेनिगुंटावरून सरळ पुढे जाते. आणखी एक कारण म्हणजे एकेरी मार्ग होते आणि प्रत्येक स्टेशनला एक 'की' / दांडा घेतल्याशिवाय गाडी पुढे जात नसे. एक वेताचे मोठे कडे असे ते धावत्या गाडीतही अदलाबदल केली जात असे. ही जुनी सिग्नल सिस्टम होती. ( मालगुडी डेज पुस्तकात चित्रे सापडतील.) २००६ मध्ये इलेक्ट्रॉनिक ओटो सिग्नल आले. आणि वेग वाढला. अशा बऱ्याच गोष्टी गेल्या वीस वर्षांत सुधरवल्या आहेत आणि वेग वाढवत आहेत.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

दक्षिण भारतात रेल्वेच्या जाळ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. का कुणास ठाऊक सी के जाफर शरीफ सोडल्यास बहुसंख्य रेल्वे मंत्री हे उत्तर भारतातील होते त्यामुळे रेल्वे हे आपले वतन समजून त्यांनी आपल्या पोळीवर तूप ओढले आहे. भारतभरातून दिल्लीला जाणाऱ्या गाड्या सर्वात जलद आहेत यात राजधानी अंतर्भूत आहेत. मुंबई दिल्ली आणि कोलकाता दिल्ली हे प्रवास सर्वात जलद आहेत पण मुंबई चेन्नई मुंबई कोलकाता आणि कोलकाता चेन्नई हे मार्ग अजूनही कूर्मगतीने का आहेत याचा साधा सरळ अर्थ असाच आहे. रेल्वेचा नकाशा काढून पहा गंगेच्या खोऱ्यात सर्वात जास्त रेल्वेचे जाळे आहे. आणि झारखंड छत्तीसगड ओडिशा या कोळसा लोह खाणी असलेल्या प्रदेशात खरं तर वेगवान रेल्वेचे जाळे असायला हवे होते. कारण सर्वात जास्त मालवाहतूक तेथून होते. पण राजकीय फायद्यासाठी रेल्वे ७० वर्षे वापरली गेली आहे. WAG १२ या इंजिनांचा कारखाना माधेपुरा मध्ये का निघाला? कारण तो लालू प्रसाद यादव यांचा मतदार संघ आहे. मालदा शहर येथुन अनेक ठिकाणी गाड्या सुरु का झाल्या तर तो अब्दुल घनी खान चौधरी यांचा मतदार संघ होता. कोकण रेल्वे सारखा महत्त्वाचा प्रकल्प सुरु व्हायला इतकी दशके का लागली? श्री मधू दंडवते रेल्वे मंत्री झाल्यावर त्यांनी जोर लावला म्हणून ते झाले. अन्यथा उत्तर भारतीय खासदारांना त्यात काही रस नव्हता. रेल्वे हे स्वतःचे वतन म्हणून राजकीय पक्षांनी त्याची वाट लावली. श्री मोदी यांनी रेल्वे चा वेगळा अर्थसंकल्पच काढून टाकला त्यामुळे आता रेल्वे मंत्री हे पद तेवढे "प्रतिष्ठेचे" राहिलेले नाही

In reply to by सुबोध खरे

कोकण रेल्वे सारखा महत्त्वाचा प्रकल्प सुरु व्हायला इतकी दशके का लागली? श्री मधू दंडवते रेल्वे मंत्री झाल्यावर त्यांनी जोर लावला म्हणून ते झाले. माझाही ऐकीव समज असाच झालेला. पण श्रीधरनवरचं 'मेट्रोमन श्रीधरन वाचल्यावर तो भ्रम दूर झाला. मुंबई दिल्ली आणि कोलकाता दिल्ली हे प्रवास सर्वात जलद आहेत पण मुंबई चेन्नई मुंबई कोलकाता आणि कोलकाता चेन्नई हे मार्ग अजूनही कूर्मगतीने का आहेत याचं उत्तर वरच्या एक प्रतिसादात दिलं आहे. शिवाय एंजिन रिवर्सलची ठिकाणंही कमी करत आहेत. विजयवाडा,संबळपूर,महोबा,तिरुपती-रेनिगुंटा. शेवटचं कमी केलंय.

In reply to by चौकस२१२

महोबा स्टेशन नकाशा https://www.openstreetmap.org/#map=12/25.2909/79.8526 अशी जंक्शन आहेत तिथे डावीकडून (झाशी) खाली (खजुराहो) वळण नाही. तिकडे वस्ती असल्याने आता रूळ टाकणे शक्य नसेल. मग रिवर्सल करावे लागते आणि पाच मिनिटांऐवजी पन्नास मिनिटे लागतात. दिल्ली- खजुराहो ही पर्यटनाच्या कामाची ट्रेन अशी येते. २) भुबनेश्वर -नागपूर - मुंबई मार्गावर संबळपूर आणि झारसगुडा अशा दोन दोन ठिकाणी पन्नास किमीटरांत दोनदा रिवर्सल होते चार वर्षांपूर्वी पण आता झारसगुडा येथे वळण रूळ टाकला आहे. तिथला रिवर्सल वेळ वाचला.

In reply to by कंजूस

माहोबा छतरपुर जवळचे का,बघितले आहे. दौंड येथे अशीच झेलम उलटी चालते.

In reply to by कर्नलतपस्वी

पूर्वी इथूनच खजुराहोला जावे लागायचे.

In reply to by कर्नलतपस्वी

पूर्वी सारखे आता दौंड ला गाडीचे इंजिन मागे लावून दिशा बदलायला लागत नाही. नवीन कॉर्ड लाईन बनवली आहे आणि त्यावर नवीन स्टेशन वसवले आहे.

In reply to by सुबोध खरे

म्हणजे एकच बारा डब्यांची गाडी दौंडपर्यंत जाते व एंजिन पुढचे सहा डबे घेऊन एका लाईनवर पुढे जाते तर मागच्या सहा डब्यांना दुसरे एंजिन लावून शिरडीला नेतात. यात वेळ जातो. पण इतर एक्सप्रेसना हा प्रश्न येत नाही. असाच काही प्रकार भारतात कुठेकुठे जंक्शनला करतात. काही वेळा त्या प्रभागातले (झोनमधले) एंजिन त्याच भागात परत पाठवतात. याच वेळी दुसरी तिकडची गाडी यावी लागते. उदा महोबाचा वर उल्लेख केला आहे. बिहार(दक्षिण)/झाशी/खजुराहो इकडच्या गाड्या जंक्शनला आल्यावर एंजिनं बदलतात. वेळ जातो. बिहारकडचे आपल्या गाड्यांना पुढे काढतात आणि इतर झोनच्या गाड्यांना साइडिंगला टाकतात. मग दुसऱ्या झोनच्या गाड्या वेळवर असल्या तरी मागे पडतात.

In reply to by कंजूस

त्या शिरडी गाडीला पंढरपूर/ बिजापूर जोडून दौंडला गाडी अर्धी करून एंजिन बदलायचा खटाटोप काढला आहे. म्हणजे तीन वेगळ्या गाड्या सुरु केल्या आहेत आणि पसेंजर वर्गातून काढून एक्स्प्रेस केल्या आहेत. नवे दौंड वेगळे दूर आहे. असा प्रश्न सोडवला.

मुंबई अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस चा प्रवास हा धक्कादायक वाटावा इतका सुखद आहे. सीट्स , सेवा , स्वच्छता , खान-पान सेवा सर्वच बाबतीत उत्तम आहे.

In reply to by हेमंतकुमार

मुंबई - अहमदाबाद तेजस ही पश्चिम रेल्वे ऑपरेट करत नसून IRCTC कंपनी ऑपरेट करत असल्यामुळे सेवेत असा फरक दिसत असावा काय असा प्रश्न पडला आहे.

In reply to by जेम्स वांड

ती खाजगी ट्रेन आहे असे ऐकिवात आहे. पण अहमदाबाद मुंबै शताब्दी पेक्षा तेजस खूपच भावली. आसने / खिडक्यांचे ऑटोमॅटीक ब्लाइंडर्स वगैरे सुविधा अप्रतीम आहेत. चेअर कार आहे त्यामुळे बसायला आसनांची खूप छान सोय आहे ( सामान्य उंचीच्या माणसाने च्या स्लिपर कोच मधील बाकड्यावर पाय खाली सोडून नीट टेकून बसुन दाखवावे. १०० रुपये बक्षीस देईन. )

In reply to by विजुभाऊ

प्रवासी संख्या आणि तिकिट भाडे यांचा गुणाकार सारखाच राहतो. अधिक एसीचा अधिभार. परदेशांतली चारपाच डब्यांची गाडी दोनशे-अडिचशे वेगाने जाणे याच तोडीची अठरा डब्यांची कोकण रेल्वे १२० च्या वेगाने जाणे आहे.