इंद्रधनू....
लेखनविषय:
काव्यरस
इंद्रधनू...
निरोप घेताना म्हणालो मी,
माझी आठवण ठेव..
नशिबापुढे हतबल आपण,
जोड्या ठरवतो देव....
क्षणात सारं बदललं तरी,
विसरू कशी तुला..?
तिचे साश्रुपूर्ण नयन,
विचारत होते मला....
निशब्द शांततेत घुमला,
उदास तिचा उसासा..
पण हात हाती घेऊन दिला,
तिनंच मला दिलासा....
केली जरी प्रीती,
पण सोडली नाही नीती..
अपराधासम खंत कशाला,
सोड मनातील भीती....
शब्द असे पडता कानी,
धरिले तिचे पाय..
परमहंस नाही गं मी,
पण तू आहेस शारदा माय....
शेवटच्या त्या भेटीमध्ये,
मनं झाली साफ..
विशाल हृदयाच्या तिनं,
केलं मला माफ....
आयुष्यात आता पुढे जाईन,
बाळगणार नाही तमा..
खूप समाधान देऊन गेली,
तिची अनमोल क्षमा....
भांबावलो, काहीसा उध्वस्त मी,
ती झाली जाणती..
अंधारलेल्या माझ्या भावविश्वातली,
जणू स्थिर पणती...
आता कधी एकाकी असता,
ती करते आठवणींची ढाल..
संधिकाली कातरवेळी ओढते,
कधी हळुवार क्षणांची शाल....
कितीही गर्दी असली तरी,
बाजारात कधी ती दिसतेच..
डोळ्यांच्या कडा पाणावल्या तरी,
ओळखीचं गोड हसतेच...
प्रेमसरिता अविरत मात्र,
त्यांच्या उरी वहाते..
दोन तीरांवर विरही जीवांना,
ते आभासी इंद्रधनू सांधते....!!
जयगंधा..
६-६-२०२१.
वाचने
2103
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
छान...!
छान
छान...