मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

प्रकाश घाटपांडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित. अशा अंनिसच्या हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख अंनिस वार्तापत्राच्या त्यावेळच्या संपादक मंडळाने नाकारला. असे समजले की त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होत होते म्हणून नाकारला गेला. नंतर मी तो लेख मनोगत या जालीय दिवाळी अंकात प्रसिद्ध केला. तसेच तो माझ्या ब्लॉगवर ही आहे. शिवाय तो अन्य संकेतस्थळांवर पण टाकला आहे. मिपावर मात्र टाकायचा राहिला असे लक्षात आल्याने तो आत्ता टाकतो आहे. अनेकांनी तो लेख आवडल्याचे आवर्जून कळवले होते. अंनिस वार्तापत्रात नंतर व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होणारे असंख्य लेख येउन गेले. असो. कदाचित त्यामुळेच त्यानंतर रिसबूडांविषयी असलेला आदर अनेक ठिकाणी व्यक्त करण्याची संधी मी सोडली नाही. 2005 मधे मला वार्तापत्र लेखक पुरस्कार मिळाला. तो घ्यायला आयुष्यात एकदाच सांगलीला गेलो होतो. तेव्हा एक त्यांची आठवण झाली कारण त्या पुरस्काराचे खर्‍या अर्थाने असलेले मानकरी हे माधव रिसबुड हेच आहेत. त्यांची आठवण येत नाही असा दिवस जात नाही. माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'. किंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले," मीच माधव रिसबूड." त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला. डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?" हे पुस्तक लिहायला घेतले. "राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी "शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे," असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो," अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे." फलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का? ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्यांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील "कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल"च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी "कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक" हा "सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला. रुडॉल्फ एच. स्मिट "प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी"चे सचिव आहेत. "ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील "कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे? हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे 'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले. नाडी भविष्य आणि रिसबूड त्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती? गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता! प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता! हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे? फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत. शास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात! सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे? आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून? आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत? जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे? श्रद्धेचा दुसरा भाग श्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो? इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात! श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही! टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही! श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला. पाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका अनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाणात येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी डीन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे! आता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक. शेवटचा लेख फलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं?' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो. ( पुर्वप्रकाशित मनोगत दिवाळी २००७)

वाचने 122728 वाचनखूण प्रतिक्रिया 352

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 12:55
चांगला वाटला लेख. म्हणजे रिसबुड ज्योतिष हे शास्त्र नाही अशा विचारांचे वरवर वाटले तरी आतून कुणी वर्तवलेल्या फलादेशांना घाबरून असावेत. आपण ही शास्त्र, अंधश्रद्धा विज्ञानविरोधी वगैरे चर्चा बाजूला ठेवू. काही गोष्टी सामान्य माणसच्या ( राजाही काही वेळा सामान्य माणूसच ठरतो ) आयुष्यातले प्रसंग अडचणी धोके चढउतार सांगण्यात विज्ञान कामाचे नसते आणि ते ज्योतिषाचा सल्ला घेतात. त्याच्या नशिबाने काही वेळा दिशादर्शक उत्तर देणारे भेटतातही. त्याप्रसंगी एकच आक्रोश असतो की मला कुठूनही उत्तर हवंय.

In reply to by कंजूस

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/10/2020 - 13:17
म्हणजे रिसबुड ज्योतिष हे शास्त्र नाही अशा विचारांचे वरवर वाटले तरी आतून कुणी वर्तवलेल्या फलादेशांना घाबरून असावेत.
काही टोटल लागली नाही. बाकी प्रतिक्रिया ठिक आहे.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक गुरुवार, 09/17/2020 - 20:18
धागा तुमच्या हातून सटकून कुठल्या कुठे गेला. मोबाईलवर स्क्रीनच्या बाहेर लेखन गेले आहे... ट्रेन प्रवासात रिझर्वेशनवाल्यांची बळकावून हमरीतुमरीवर येणाऱ्या अगांतूक प्रवाशांच्या आवेशात लेखन करताना पहायला मजा येते आहे. गारुड्याचे खेळ पहायला आलेल्यांना जंभूरा आवडतो... पण त्याला पडद्यात लपवले जाते. तसे आपले वरिष्ठ मित्र वर्य रिसबुडांना बिनबुडाचे करून टाकले आहे कि काय असे वाटले!

In reply to by कंजूस

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/10/2020 - 13:32
आपण शेवटचा पॅरा नीट वाचलात का? लिखाण आता बास झाले अशा अर्थाने ते शेवटचा लेख असे आहे. संगणकात फाईलला मोठी नावे घेत नसत.

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 13:29
सत्ता, संपत्ती आणि संसार यातल्या खाचाखोचा, बेरीज-वजाबाकी ज्योतिषी लोकांना समजतात ( पण ते आगावू सांगण्याचं टाळतात. ) हे कोणतेच विज्ञान वर्तवू शकत नाही म्हणूनच ज्योतिष {आसन नाही} पण आपली पायरी पकडून आहे.

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 17:17
मुळात सर्व जोतिष (आणि त्याची प्रत्येक शाखा ) वेळ या एकमेव आधारावर अवलंबून आहे. वास्तविकात वेळ असं काहीही अस्तित्वात नाही. तो भास आहे आणि मानवानं प्रक्रिया मापनासाठी निर्मिलेली ती एक सोयीची कल्पना आहे. वेळ या उपयोगी पण भासमान कल्पनेचा समग्र उहापोह मी काल या लेखात केला आहे. वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 18:26
जर उद्या शामला फाशी होणार आहे. आणि मी वक्तव्य केलं की उद्या शाम मरून जाईल. तर ह्याला तुम्ही काय म्हणाल, भविष्य सांगणे न म्हणता ? "उद्या" अस्तित्वात नसेल तर तुम्ही ही गोष्ट कशी सांगाल ?

In reply to by शा वि कु

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:07
नीट नाही मांडले. पुन्हा: जर तुम्हाला कळाले की रिलायन्स चे समभाग काही महिन्यांनी चढ्या दरात (cmp पेक्षा) बायबॅक केले जाणार आहेत. (टीप मिळाली.) तर तुमचा रिस्पॉन्स काय असेल ? १) काळ हा भ्रम आहे. महिना ही गोष्ट अस्तित्वातच नसल्याने मला काहीही करण्याची गरज नाही. २) अरेवा. घेऊन टाकतो. (शेअर मार्केट पसंत नसल्यास mutatis mutandis वेगळे उदाहरण घ्यावे.) मुद्दा काय तर फलज्योतिष हे अगदी अश्याच अगदी व्यवहारिक फायद्यासाठी वापरले जाते. काळ हा भ्रम आहे म्हणून यात काय फरक पडणार ?

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:25
तारीख, महिना, वर्ष या सर्व मानवी कल्पना आहेत. त्यांच्या उपयोगितेबद्दल वाद नाही. ३० नोव्हेंबर (किंवा ऑक्टोबर) ही रिटर्न्स फायलींगची लास्ट डेट आहे. ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम केलं जातंय. पण वस्तुस्थिती इतकीच आहे की आता ते काम चालू आहे > १० सप्टेंबर किंवा ३० ऑक्टोबर या केवळ (उपयोगी) कल्पना आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:36
अमान्य नाहीच.
मुद्दा काय तर फलज्योतिष हे अगदी अश्याच अगदी व्यवहारिक फायद्यासाठी वापरले जाते. काळ हा भ्रम आहे म्हणून यात काय फरक पडणार ?
काळ हा भ्रम आहे असं आपण बिल ड्यू झाल्यावर सांगू शकतो का ? जरी भ्रम असला तरी ? मानवी कल्पना तिथे आपल्याला समीकरणात घ्यावे लागतेच ना ? बस. इतकेच.

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:43
सूर्य कायम प्रकाशमान आहे त्यामुळे दिवस आणि रात्र हा भास आहे > त्यामुळे काल-आज-उद्या असं काहीही अस्तित्वात नाही. बिल देणं आहे ही वस्तुस्थिती आहे. चेक लिहिणं ही क्रिया आहे > ते लेट झालं म्हणणं हा पारस्पारिक व्यावहार आहे > पण त्यामुळे कालनिर्मिती होत नाही. .

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 19:55
@ शा वि कु : तुमच्या लक्षात येत नाही !
त्यांना ते मध्यंतरीच्या काळात घडणार्‍या बर्‍याच गोष्टींबद्दल सांगा ना, म्हणजे त्यांच्या पटकन लक्षात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:56
मी काही तरी वेगळंच म्हणतोय. शेवटचा प्रयत्न: काळ आणि साठी दोन्ही भ्रम आहेत (पेक्षा, मानवी संकल्पना आहेत.) मान्य. पण या संकल्पना डोक्यात ठेऊन माणसाला बचत करावी लागते की नाही ? म्हणहेच या स्वतः तयार केलेल्या संकल्पना माणूस वापरतो ना ! केवळ मानवी संकल्पना आहे म्हणून ती कल्पना भ्रम आणि रद्दबातल होत नाही. काळ ही वस्तू अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी आपण आपल्या सुविधेसाठी एक विशिष्ठ मोजमापाची पद्धत तयार केली आहे. आणि हे मोजमाप नक्कीच समाजाच्या वावरामध्ये अस्तित्वात आहे. प्रत्येक ठिकाणी तिला भ्रम म्हणणे स्वतःच आपण बनवलेले नियम तोडण्या योग्य आहे. बस. शाविक् आउट.

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 20:49
१.
केवळ मानवी संकल्पना आहे म्हणून ती कल्पना भ्रम आणि रद्दबातल होत नाही. काळ ही वस्तू अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी आपण आपल्या सुविधेसाठी एक विशिष्ठ मोजमापाची पद्धत तयार केली आहे. आणि हे मोजमाप नक्कीच समाजाच्या वावरामध्ये अस्तित्वात आहे.
अर्थात ! पण मोजमापामुळे सोय झाली तरी काल कदापिही निर्माण होणार नाही.
२. प्रत्येक ठिकाणी तिला भ्रम म्हणणे स्वतःच आपण बनवलेले नियम तोडण्या योग्य आहे.
ते नियम तोडणं नाही. कालाचा धसका संपवणं आहे !

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:14
तुमच्या सर्व धारणांच्या निराकारणार्थ प्रतिसादात दिलेला लेख वाचा. शब्दयोजना आणि प्लानींग या दृष्टीनं काल ही उपयोगी संकल्पना आहे पण तो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं निर्माण होणारा भास आहे. शाम फाशी जाईल त्याची वेळ निश्चित केली गेली आहे > त्यामुळे तसं विधान ही करता येईल > शाम नेमक्या वेळी फाशी पण जाईल > तरीही `इतके वाजले' ही फक्त मानवी कल्पना असेल.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:20
मानवी कल्पना आहे हे मान्य तरी कित्येक मानवी कल्पनांना भ्रम न म्हणता त्यांना समीकरणात घ्यावे लागते. ज्योतिष सुद्धा तसेच.

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:31
समजा ती १० सप्टेंबर १९९०, संध्याकाळी ७.३० अशी आहे. तुमची कुंडली आणि सर्व भवितव्य त्या पॉइंट ऑफ टाईमवर आधारित आहे. पण अस्तित्वात अशी वेळ आणि तारीख कधीच उगवत नाही > ती केवळ मानवी कल्पना आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 19:38
पण अस्तित्वात अशी वेळ आणि तारीख कधीच उगवत नाही > ती केवळ मानवी कल्पना आहे. पण तुम्हीच मागे एकदा लिहील्याप्रमाणे मध्यंतरीचा काळ असतो आणि त्यात बर्‍याच गोष्टी घडतात ना?

In reply to by शा वि कु

कोहंसोहं१० गुरुवार, 09/10/2020 - 20:27
मानवी कल्पना आहे हे मान्य तरी कित्येक मानवी कल्पनांना भ्रम न म्हणता त्यांना समीकरणात घ्यावे लागते. ज्योतिष सुद्धा तसेच. >>>>शा वि कु बरोबर बोललात. म्हणूनच ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असे म्हणणाऱ्या कठोर अद्वैतवादी शंकराचार्यांनीसुद्धा प्रतिभासिक सत्य, व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य या संकल्पना मांडल्या. पारमार्थिक सत्य हे जरी पूर्ण सत्य (Ultimate Truth) असले तरी जोपर्यंत या जगात वावर आहे तोपर्यंत तारतम्यासाठी व्यावहारिक सत्य मान्य करावेच लागते. व्यवहारातील आपल्याला असोईस्कर आणि न पटणाऱ्या गोष्टींना संकल्पना भ्रम म्हणत बसणे मूर्खपणा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 18:59
वेळ या उपयोगी पण भासमान कल्पनेचा समग्र उहापोह मी काल या लेखात केला आहे. वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !
मग ते मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या त्याचं काय?

बाजीगर गुरुवार, 09/10/2020 - 18:38
सुंदर व तार्कीक विश्लेषक गुरुशिष्य जोडी आणि सातत्याने या विषयावर लिखाण करण्यासाठी कष्ट करण्याची क्षमता हा दूर्मिळ गुण या जोडी कडे होता. आता प्रतिक्रिया पाहू, कंजूससाहेब आणि क्षीरसागरसाहेब यांचा जोतीषावर विश्वास आहेच त्यामुळे रिसबूड-घाटपांडे सरांची तर्कशुद्धता व्यर्थ गेली. (यामागे भिती आहे, कशाला विषाची परिक्षा पहा हा विचार आहे, एकंदरीत लहानपणापासून पिंड कसा जोपासला गेला ते आहे) मी मात्र खुल्ला म्हणतो जोतिष भंकस (थोतांड) आहे.पोट भरायचा धंदा आहे.रिसबूड सर-घाटपांडे सर.

In reply to by बाजीगर

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 18:44
कंजूससाहेब आणि क्षीरसागरसाहेब यांचा जोतीषावर विश्वास आहेच ?
हे कुठून काढलं ? भविष्य (किंवा कोणताही) काळच नाही त्यामुळे जोतिष व्यर्थ आहे असा माझ्या प्रतिसादाचा अर्थ आहे

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 20:09
बाजीगर, मला असं म्हणायचं आहे की ज्यांना या आडाख्यांचा, सल्ल्यांचा उपयोग आहे असं वाटतं ते करून घेत आलेले आहेत आणि करत आहेत. कोणती क्षेत्रं ते दिलेलं आहे. बाकी विरोधी आणि बाजूने मतं मांडणं हे इतर लोकांसाठी आहे. जो तो आपल्या श्रद्धे प्रमाणे शास्त्राला टाळतो अथवा जवळ करतो.

कोहंसोहं१० गुरुवार, 09/10/2020 - 20:15
new in scopeचिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत >>>>>>>> हे पटले. पण आपल्याकडे याच्या बरोबर उलटे आहे. जुने समज नाकारले की पुरोगामी बुद्धिवादी म्हणून घ्यायला मोकळे. ज्याचा काहीच अनुभव नाही, अभ्यास नाही त्याला खोटे म्हणून उडवून लावणारे बरेच आहेत. तसेच गरजेपोटी आंधळा विश्वास ठेवणारे आणि त्याचा फायदा घेऊन लुटालूट करणारे (हे मात्र सगळ्याच क्षेत्रात आहेत) देखील बरेच. पण चिकित्सेपोटी अभ्यास करून मत बनवणारे अत्यंत कमी. याबाबत मला पाशात्य लोक आपल्यापेक्षा जास्त पुढारलेले वाटतात. त्यांच्यात आपल्यापेक्षा चिकित्सक आणि प्रयोगवृत्ती बरीच जास्त आहे. पण ज्यांना ते करायची इच्छा नाही ते उगाच सगळे नाकारून स्वतः पुरोगामी बुद्धिवादीचा डंका पिटत बसत नाहीत.

सतिश गावडे गुरुवार, 09/10/2020 - 20:41
मला फलज्योतिष हा भूतकाळातील होऊन गेलेल्या घटनांवर आधारीत काही निष्कर्ष काढून त्यावरुन भविष्यात घडणार्‍या आडाखे बांधणे असा प्रकार वाटतो. फलज्योतिष्याच्या ज्या काही संहिता आहे त्यांच्या लेखकांनी असा गोष्टींचा अभ्यास करुन मग त्यांचे ठोकताळे फलज्योतिष संहिता स्वरुपात लिहीले असावेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आकाशातील ग्रहांची स्थिती कशी होती याची कोष्टक किंवा "स्थानांच्या" स्वरुपात मांडणी करायची. नंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या ठळक सुखद आणि दु:खद घटनांची नोंद करायची. अशा अनेक कुंडल्यांचा अभ्यास करुन त्यांच्यातील ग्रहाच्या स्थानांची आणि व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांची सांगड घालायची. पुढे भविष्यात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचे आधीच्या अभ्यास केलेल्या कुंडलीशी साम्य आढळयास त्या पूर्वीच्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी साम्य असणार्‍या घटना या व्यक्तीच्या आयुष्यातही होऊ शकतात. जर विवाह प्रचलीत वयापेक्षा उशिरा झालेल्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये "रवी सप्तम स्थानात होता" ही गोष्ट सामायिक असेल तर एखाद्या कुंडलीत सप्तम स्थानात रवी असेल तर त्या व्यक्तीचा विवाह उशिरा होईल असा आडाखा फलज्योतिषवाले बांधू शकतात. अर्थात हे ज्यांनी फलज्योतिषाच्या संहिता लिहील्या त्यांनी केले असावे. आताचे फलज्योतिषी फक्त जातकाची कुंडली जुन्या डेटाबेसशी (संहिता किंवा पुस्तके) जूळवून त्यानुसार भाकीत वर्तवत असावेत. हे असं मला वाटतं. :)

In reply to by सतिश गावडे

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 20:53
मला फलज्योतिष हा भूतकाळातील होऊन गेलेल्या घटनांवर आधारीत काही निष्कर्ष काढून त्यावरुन भविष्यात घडणार्‍या आडाखे बांधणे असा प्रकार वाटतो.
त्यामुळे ते फक्त अट्ट्या लावणं आहे. त्याला काहीही आधार नाही.

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 20:50
@सगा , जर विवाह प्रचलीत वयापेक्षा उशिरा झालेल्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये "रवी सप्तम स्थानात होता" ही गोष्ट सामायिक असेल रैट. शिवाय अशीच इतर गृहितकं वापरली जातात. दुर्दैवाने लग्न, सुख यांची गृहितकं खरी ठरतात म्हणून ती सांगून निराश केले जात नाही. भले या ज्योतिष्याला काही कळत नाही म्हटले लोकांनी तरी.

In reply to by कंजूस

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 20:58
दुर्दैवाने लग्न, सुख यांची गृहितकं खरी ठरतात म्हणून ती सांगून निराश केले जात नाही. भले या ज्योतिष्याला काही कळत नाही म्हटले लोकांनी तरी.
जातकाला भविष्यातलं गाजर दाखवू शकला नाही तर जोतिषी स्वतःच भिकेला लागेल > राजकारण आणि जोतिष यांचा एकच फंडा आहे > अच्छे दिन आनेवाले है !

In reply to by कंजूस

अनन्त्_यात्री गुरुवार, 09/10/2020 - 22:04
ज्यांचं भलं चाललंय अशातले अनेक लोक्स अधिक भलं चालावं म्हणून हातबघ्यांकडे किंवा पत्रिकाबघ्यांकडे चकरा मारताना दिसतात की.

उपयोजक Fri, 09/11/2020 - 00:09
१) ग्रहांचे भ्रमण,ग्रहांचे स्वरुप आणि नक्षत्रे यांचा मानवावर बर्‍यापैकी परिणाम होतो.परिणाम जाणवतात.पण हे सगळं होतं कसं किंवा त्या ग्रहांकडून किंवा नक्षत्रांकडून कसं अॉपरेट केलं जातं ते माहित नाही. २) किरकोळ समस्या वगळता ज्यांचं आयुष्य बरं/चांगलं/उत्तम चाललंय आणि त्यात जे समाधानी आहेत असे लोक फलज्योतिषाकडे जात नाहीत. याउलट जे हवं त्यासाठी अनेकदा प्रयत्न करुनही मनासारखे यश मिळत नसल्याने हताश झालेले किंवा बर्‍यातून चांगल्या आणि चांगल्याकडून अधिक सुखकर जीवनाची अपेक्षा असलेले काही लोक फलज्योतिषाचा आधार घेतात.अशावेळी ते अंनिस/विज्ञान फलज्योतिषाबद्दल काय म्हणतं त्याकडे लक्ष देत बसत नाहीत. ३) जगात जोपर्यंत अस्थिरता आहे तोपर्यंत फलज्योतिष जिवंत राहणारच.नोकरीच्या तुलनेत व्यवसायात अस्थिरता तीव्र असते, स्पर्धा तीव्र असते त्यामुळे नोकरदारांच्या तुलनेत व्यावसायिकांमधे फलज्योतिषाचा आधार घेण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं. ४) अस्थिरता,किचकट समस्या,आजार यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारांची मदत नक्की होऊ शकते.पण मानसोपचारतज्ज्ञांची फी परवडणारी नसेल किंवा समजा परवडणारी असेल पण त्या उपचारांनी गुण येण्यास समस्याग्रस्त व्यक्तीच्या अपेक्षांच्या तुलनेत जास्त वेळ लागणार असेल तर ती व्यक्ती फलज्योतिषाकडे जाते.मानसोपचारतज्ज्ञांची फी/उपचारांचा खर्च सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्यास ते फलज्योतिषाकडे जाणे कमी होईल. ५) भारताची लोकसंख्या अफाट आहे, लोकांच्या अपेक्षा काळाप्रमाणे बदलत असतात.त्यामुळे इथे सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात दररोज पळावेच लागते.संघर्ष अटळ आहे. शहरात/महानगरात ही धावपळ,दगदग जास्त असते.अनिंससारख्या संस्थांनी ही धावपळ,दगदग कमी कशी करावी याबद्दल प्रबोधन करावे, उपाय सुचवावेत.अशाप्रकारे मुळावरच घाव घालावा म्हणजे लोक फलज्योतिषाकडे जाण्याचे प्रमाण बरेच कमी होईल.

In reply to by उपयोजक

कंजूस Fri, 09/11/2020 - 07:06
रिसबुडांनी आणि (त्या विचारांचे लोक) ज्योतिष का नको, किती टक्केवारीनेच बरोबर येते, किती चुकते हे भाविक लोकांना सांगण्यात वेळ व्यर्थ घालवतात. उपयोजक ,मुद्दे क्र २.३ सहमत. क्र ४ सांगून उपयोग नाही. झालेली गोष्ट दुरुस्त करण्यासाठीचे उपाय करण्याबद्दल विरोध नाहीच. याच मुद्द्यावर अनिसवाले भांडत असतील तर योग्यच आहे. पण ज्योतिष असे सांगत नाही की तुम्ही उपचार करू नका, अमुक एक ग्रहांचे कुंडलीतले योग टळले दोन वर्षांनी की आपोआपच बरे होणार. एखाद्यास आजारपणाचा त्रास अमुक काळात आहे हे भविष्य असते आणि त्यास विज्ञानाकडे उत्तर नसते. विज्ञानाच्या नावाने ओरडणाऱ्यांनी उगाच नसलेल्या शत्रुवर आग पाखड करणे व्यर्थ आहे. राजकारणी - राजे आणि लोकशाहीतील राज्यकर्ते हे नेहमीच ज्योतिषाचा सल्ला घेतात. पक्षांतर, मंत्रीपद, नवीन खेळी यावर मत घेतातच. ते मत मागतात आणि पैसे देतात यात दुसऱ्या कुणाचे पोट दुखण्याचे कारण काय?

In reply to by उपयोजक

आपल म्हणण खर आहे. मिपा चालू झाल होत त्या सुरवातीच्या काळात या ज्योतिषाच काय करायचं? या संपादकीयात मी ते लिहिले आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

उपयोजक Sat, 09/12/2020 - 00:06
तिकडे विकास यांनी विचारलेलाच प्रश्न पुन्हा विचारतो. "फलज्योतिषाच्या बाजूने आहात की फलज्योतिषाच्या विरोधात?" ; )

In reply to by उपयोजक

उपयोजक, हो कि नाही? अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. तुम्ही ज्योतिष समर्थक कि विरोधक असा प्रश्न मला तसाच काहीसा वाटतो. इथे मी माझी भूमिका मांडली आहे. http://mr.upakram.org/node/777#comment-12763

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुम्ही अनेक वर्ष आहत आणि नाडीग्रंथावर प्रतिसाद देतांना तुम्ही म्हटलंय की `हताशा आली आहे. पुढची पिढी आता काय करते ते बघू'. तुम्हाला सपोर्ट करायला मी इथे उतरलो. काही अज्ञानी हा धागा मी हॅक केला म्हणतायंत ते त्यांच्या अज्ञानाला सुरुंग लागल्यामुळे आहे. आयुष्य खंबीरपणे जगण्यासाठी तुमच्यात कमालीची वैचारिक क्लॅरिटी आणि त्याबरोबर तितकाच ओपननेस हवा, मग हताश होण्याऐवजी जीवन बहरत जातं. १.
अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते
क्लॅरिटी आणि ओपननेस एकावेळी असेल तर असा प्रकार (जो अंतीमतः द्विधा अवस्था आणतो) होत नाही. पण सध्याच्या भंपक राजकीय धोरणामुळे if you are not with us, you are with them असा निर्बुद्ध युक्तीवाद देशात निर्माण झाला आहे. तरीही त्याचा अर्थ आपण लोंबकाळत रहावं असा नाही. आपण आपल्या मुद्द्यावर कायम ठाम हवं आणि तितकंच ओपन हवं. अंधश्रद्धेला नेमकं हेच जमत नाही त्यामुळे असे लोक निव्वळ बायकी युक्तीवाद करुन बाजी मारायचा प्रयत्न करतात. त्यांना भीक घालायची काहीएक गरज नाही. २.
मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. तुम्ही ज्योतिष समर्थक कि विरोधक असा प्रश्न मला तसाच काहीसा वाटतो
हा विचार वरकरणी उदारमतवादी दिसला तरी तो ठामपणाचा आभाव दर्शवतो आणि त्यामुळे हताशा येते. मी स्वतः विज्ञानवाद आणि वस्तुनिष्ठता मानतो आणि तसा जगतो, त्यामुळे तुमच्याशी दृष्टीकोन शेअर केला, बघा विचार करुन.

उपयोजक Fri, 09/11/2020 - 00:26
balaji उलगडून सांगा. हे दोघे पदरचे ३-४ तास खर्च करुन तिरुपतीच्या बालाजीला का गेले असावेत? बालाजीच्या मंदिराच्या कामासंबंधी काही कंत्राट हवे असेल तर यांचे मॅनेजर वगैरे हाताखालचे लोक जाऊ शकतात. मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत. मग का आले असावेत बालाजीला? : )

In reply to by संजय क्षीरसागर

उपयोजक Fri, 09/11/2020 - 23:21
हजारो कोटींचे उद्योग चालवण्याइतपत चातुर्य असणार्‍या , जगातल्या कोणत्याही नामवंत मानसोपचारतज्ज्ञाची अपाॅईंटमेंट मिळवू शकणार्‍या , देशातल्या टॉपच्या विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या या उद्योजकांना समजत नसावं का? तरीही ते तसं का करत असावेत? या अब्जाधीश उद्योजकांच्या मनातली अस्थिरता जर अंनिस किंवा कोणताही मानसोपचारतज्ज्ञ जर पूर्णपणे उपटून काढू शकत नसेल तर या दोघांच्या तुलनेत कैकपट कमी आर्थिक यश किंवा सुख मिळालेल्या लोकांनी फलज्योतिष किंवा निर्जीव मुर्तीदर्शनाचा आपलं भल होईल या आशेने आधार घेतला तर त्यांना दोष कसा देणार? सामान्य व्यक्तीला कोणत्या तोंडाने सांगणार की फलज्योतिषाचा आधार घेऊ नका म्हणून? फलज्योतिषाकडे असमाधानी लोकच जातात. जे मिळालंय त्यात समाधानी असणार्‍या व्यक्ती फलज्योतिष किंवा कर्मकांड यांचा आधार घेणार नाही. पण प्रश्न हा आहे की जगात अशा आतून समाधानी व्यक्ती संख्येने खूप कमी असाव्यात.बहुतांश व्यक्ती या असमाधान ,अस्थिरता यांना महत्व देणार्‍याच असतात. त्यांचे विचार बदलणे , त्यांना समाधानी रहायला शिकवणे हे अंनिस किंवा अन्य विज्ञानवादी संघटना करणार का?

In reply to by उपयोजक

स्वरुपाचा उलगडा न झाल्यामुळे होतं. त्यात कोण काय पोस्टला आहे, त्याचं शिक्षण किती, त्याचा सामाजिक वट काय यानं काहीएक फरक पडत नाही. स्वरुपाचा उलगडा न होण्याचं मुख्य कारण चुकीच्या धारणा हे आहे. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. तो टेंपररी रिलीफ आहे. पुन्हा परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Tue, 09/15/2020 - 19:55
परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील. अस्थिरता आणि अशांती हा मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे. यातून मुक्त फक्त दोनच लोक आहेत १) संत आणि २) मतिमंद

In reply to by सुबोध खरे

हे कुठून काढलं ? आनंद हा जीवनाचा स्थायी भाव आहे.

In reply to by सुबोध खरे

त्यामुळे तुम्हाला मुद्दा कळत नाही, त्यात पुन्हा प्रतिसाद देण्याची घाई आणि वरती स्वतःची चुकीची विधानं ठळक अक्षरात टाईप करुन माझ्या नांवावर खपवतायं ! आता तरी नीट वाचा : अस्थिरता आणि अशांती हे स्वरुपाचा उलगडा न झाल्यामुळे होतं. त्यात कोण काय पोस्टला आहे, त्याचं शिक्षण किती, त्याचा सामाजिक वट काय यानं काहीएक फरक पडत नाही. स्वरुपाचा उलगडा न होण्याचं मुख्य कारण चुकीच्या धारणा हे आहे. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. तो टेंपररी रिलीफ आहे. पुन्हा परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे गुरुवार, 09/17/2020 - 09:28
एक आश्चर्य आहे ( किंवा नाही ) तुमचा मुद्दा मिसळपाव वर कुणालाच समजत नाही कारण एक तर लोक नीट वाचत नाहीत किंवा त्याची समजच कमी असते. ( असं त्यांचं मत आहे.) ते कोण ते विचारायचं नाही. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. माणूस केवळ कृतज्ञतेच्या पोटी अमूर्त शक्तीचे मूर्त स्वरूप म्हणून मंदिरात जात नाही का? त्यासाठी कर्मकांड किंवा ज्योतिषच हवे का? ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. हि तुमची चुकीची धारणा आहे. (अरे बापरे मी पण सर्वज्ञा सारखे बोलायला लागलो कि काय?). कशावरून ते कर्मकांडासाठी तेथे गेले आहेत?

In reply to by सुबोध खरे

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 13:56
कशावरून ते कर्मकांडासाठी तेथे गेले आहेत ?
तुम्ही बालाजीला (किंवा इतर देवाला), त्याची तब्येत तपासायला जाता का ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे गुरुवार, 09/17/2020 - 14:15
हो पुरी येथे भगवान श्री जगन्नाथ आजारी पडतो आणि त्याबद्दल तपासणीही केली जाते https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/astrology/religious-places/the-god-at-this-temple-is-sick-cant-meet-devotees/amp_articleshow/68206724.cms बाकी *कृतज्ञता व्यक्त करणे* हा वाक्प्रचार आपण ऐकलेला दिसत नाही

In reply to by उपयोजक

चौकस२१२ Tue, 09/15/2020 - 17:22
या दोघांच्या तुलनेत कैकपट कमी आर्थिक यश किंवा सुख मिळालेल्या लोकांनी फलज्योतिष किंवा निर्जीव मुर्तीदर्शनाचा आपलं भल होईल या आशेने आधार घेतला तर त्यांना दोष कसा देणार? सर्वसामान्य रंजल्या गांजलेल्याचा दोष नाही त्यांना "जोतिषी उपाय" दाखवतो आणि बघ तुझं कसं भलं होईल अश्या गोष्टी सांगणारी लोकांना दिला जातोय... साधा प्रश्न आहे हो... समाजात जर घर बांधणारा स्थापत्य विशारद कीव रुग्णओपचार करणारा वैद्य त्याने दिलेला सल्ला फसला तर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची सोय आहे तशी का नाही हो या ज्योतीश्वयवसायाबद्दल?

In reply to by उपयोजक

मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत.>>>>> महत्वाचा मुद्दा आहे. उपयोजक, अंधश्रद्धा या केवळ अगतिकता संस्कार यातून निर्माण होत नाहीत. त्याची जैवशास्त्रीय कारणे देखील आहेत. अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान हे मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण जरुर वाचा.

In reply to by उपयोजक

मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत.>>>>> महत्वाचा मुद्दा आहे. उपयोजक, अंधश्रद्धा या केवळ अगतिकता संस्कार यातून निर्माण होत नाहीत. त्याची जैवशास्त्रीय कारणे देखील आहेत. अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान हे मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण जरुर वाचा.

In reply to by उपयोजक

डीप डाईव्हर Fri, 09/11/2020 - 14:21
जगातला प्रत्येक यशस्वी माणूस नास्तिकच असला पाहिजे असा काही नियम आहे का? बालाजीच्या मंदिराच्या कामासंबंधी काही कंत्राट हवे असेल तर तिथे यांचे मॅनेजर वगैरे हाताखालचे लोक पाठवायचे कि त्यांनी स्वतः जायचे हा निर्णय ते घेऊ शकत नाहीत का? तो त्यांचा अधिकार नाही का? तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीचे दर्शन घेऊन त्यांना मानसिक समाधान लाभत असेल तर ते मिळवण्याचा त्यांना अधिकार नाही का? कोणाला देव धर्म श्रद्धा हे थोतांड वाटते तसे त्यांना मानसोपचार मानसोपचारतज्ज्ञ अशा गोष्टी थोतांड वाटू शकत असतील का?

गामा पैलवान Fri, 09/11/2020 - 04:10
संजय क्षीरसागर,
पण मोजमापामुळे सोय झाली तरी काल कदापिही निर्माण होणार नाही.
काल निर्माण करण्याविषयी चर्चा चालू नाहीये. काल आहे की नाही यावर चाललीये. असो. ज्याअर्थी आपली शरीरं म्हातारी होताहेत त्याअर्थी काल अस्तित्वात आहे. असं माझं मत आहे. अर्थ काही प्रकारची जेलीफिशं म्हातारी होत नाहीत. त्यांचा अपवाद वगळता बाकी सगळे प्राणी म्हातारे होतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१.
काल निर्माण करण्याविषयी चर्चा चालू नाहीये. काल आहे की नाही यावर चाललीये.
प्रश्णाच्या संदर्भात प्रतिसाद वाचलात तर अर्थ कळेल. २. ज्याअर्थी आपली शरीरं म्हातारी होताहेत त्याअर्थी काल अस्तित्वात आहे. असं माझं मत आहे. शरीर वृद्ध होणं ही प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रक्रियेला कालाची गरज नाही. थोडक्यात, तुमच्या दिवस मोजण्यानं शरीर वृद्ध होत नाही. ते मोजणं ही मानवानं स्वतःसाठी केलेली सोय आहे. अस्तित्वातली हरेक प्रक्रिया कालरहित आहे; प्रक्रियेच्या मापनासठी काल ही मानव निर्मित सोय आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि Fri, 09/11/2020 - 10:55
काळ नावाची वेगळी गोष्ट फिजिकली अस्तित्वात नाही हे जरी सत्य असलं तरी ते रोजच्या जीवनातली उदाहरणं घेऊन पाहू गेल्यास कोणाला पटणं खूप कठीण आहे. आपल्याला स्मृती आहे म्हणून काहीतरी मनात शिल्लक असणे. मग ते जे शिल्लक आहे ते "मागे" पडलं अशी एक मांडणी करुन आपण मांडामांडी ऊर्फ अरेन्जमेंट करतो. मग त्याच विचाराने "पुढे" जे येणार त्याचा अंदाज करतो. किती स्मृती कप्प्यात लावून झाल्या यावर किती काळ गेला अशी मोजणी करतो. पुन्हा पुन्हा घडत असलेल्या घटनांवरुन त्याचे तुकडे करतो. बदल नोंदवले गेले (उदा केस पांढरे झाले, त्वचा सुरकुतली) की काळ नुसताच पुढे सरकत नसून त्या पुढे सरकण्यानेच आपल्यात आणि आसपास बदल होताहेत अशी समजूत पक्की होते. एका दिशेत अनिवार्यपणे जात राहणारा "Arrow of time" ही कल्पना मनात रुढ होते. आईनस्टाइन त्याला स्पेसशी जोडतो. तेही एक थियरी अधिक परिपूर्ण होण्यासाठी ठीकच. हे सर्व व्यवहारासाठी आवश्यक असल्याने ठीकच ठीक.. पण प्रत्यक्षात वेळ अस्तित्वात नाही हे कोणास पटवणे अवघड. किंबहुना ते आवश्यक तरी आहे का असा विचार मनात येतो. आपण आत्ता होतो आत्ता आहोत आणि आत्ताच नसू हे हास्यास्पद वाटलं तरी सध्या तरी मूलभूत "पुरावा बेस्ड" थियरीनुसार ते मान्य करण्याखेरीज इलाज नाही. :-)

In reply to by गवि

सहमत आहे. छान विश्लेषण मला संक्षीच्या मांडणीत काळ हा अनादि व अनंत आहे तसाच तो स्वयंभू आहे. त्याला स्टार्टिंग पॉईंट असा नाही. मग तो कसा मोजणार? राशीचक्राला जसे आरंभबिंदू मुळे सायन निरयन पद्धती तयार होतात तसे इथे नाहि.मग अमक्या राशीचा अमका अंश जन्माच्या वेळी उदित आहे हा फलज्योतिषाचा महत्वाचा कुंडलीचा मुद्दा इथे निरर्थक ठरतो ; असे ( माझ्यापुरते) आकलन होते. संक्षी अधिक स्पष्ट करतील.

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्यामुळे आरंभ बिंदू, सायन, निरायन, उदित काल वगैरे सर्व भानगडी काल्पनिक आहेत. थोडक्यात, सूर्य उगवला, मावळला असं ज्याला वाटतं त्याला तसा दृष्टीभ्रम होत असतो. या भ्रमावरच कालविभाजन आधारित आहे. त्यामुळे सर्व ज्योतिष बोगस आहे. वास्तविकात सूर्य कायम प्रकाशमान आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

चौकस२१२ Wed, 09/16/2020 - 04:09
वास्तविकात सूर्य कायम प्रकाशमान आहे. अहो माहिती आहे कि सगळ्यानं हे, सूर्य मावळला "पृथ्वीच्या" या भागात हे सगळ्यानं माहित आहे कि असे म्हणतात , "सूर्य प्रकाशमान नाही" असे नाही म्हणत कोणी इथे! , हे सापेक्ष मावळणे आणि उगवणे हे चक्र खात्रीचे कायमचे असावे या समजुतीने त्यावर वेळचे घड्याळ बनवले... हि सेप्स / सूर्य वैगरे कालातीत आहे हे जरी असले तरी जीवित प्राण्याच्या दृष्टीने आज आणि उद्या हे आहेच कि... जन्म आणि मृत्यू आणि यातील प्रवास.. यालाच जर मानवाने काळ असे म्हणले तर तुमचा काय बिघडला समजत नाही.. उगा काय वाद घालताय काही समजत नाही ( का अस्कन्ख्यक धाग्यांमध्ये " मी म्हणतो तेच सर्व आणि शेवटचे" असे असेल तर काय चालुद्या )

In reply to by गवि

आपण आत्ता होतो आत्ता आहोत आणि आत्ताच नसू हे हास्यास्पद वाटलं तरी सध्या तरी मूलभूत "पुरावा बेस्ड" थियरीनुसार ते मान्य करण्याखेरीज इलाज नाही. :-)
१. आता का एकच क्षण कायम चालू आहे आणि त्यातच सर्व घडतंय. २. आता हा खरं तर क्षण नाही तो एक अनंत आणि सर्वव्यपी एंप्टीनेस आहे. शास्त्रज्ञ असल्यानं आइन्स्टाईनचा फोकस प्रक्रियेवर आहे, त्यामुळे त्याला कालाचा मोह सोडवत नाही. म्हणून, तो काल स्पेसशी रिलेट करतो (Time is fourth dimension of Space). थोडक्यात, आइन्स्टाईनं काल ही धारणा सोडली असती तर ज्याला तो स्पेस म्हणतो; तो अथांग एंप्टीनेस ही वस्तुस्थिती त्याला समजू शकली असती. ३. शरीराचा जन्म ही याच एंप्टीनेसमधे होतो, सध्या ते त्यातच वृद्धींगत झालं आहे आणि त्याचा मृत्यू पण त्यातच होईल. जनसामान्यांनी (किंवा शास्त्रज्ञांनी, कारण ती सर्वांची सोय आहे) काल आहे ही धारणा घट्ट धरुन ठेवल्यानं; जन्म अमक्या साली झाला, आज अमुक साल चालू आहे आणि मृत्यू तमक्या साली होईल असं भ्रामक विभाजन केलं आहे. घटना कालात घडत नाही, एंप्टीनेसमधे घडते. जोतिष व्यर्थ आहे कारण ते कालाधारित आहे, जो केवळ (व्यावहारिक उपयोग निर्विवादपणे असला तरी) भ्रम आहे. २.
हे सर्व व्यवहारासाठी आवश्यक असल्याने ठीकच ठीक.. पण प्रत्यक्षात वेळ अस्तित्वात नाही हे कोणास पटवणे अवघड. किंबहुना ते आवश्यक तरी आहे का असा विचार मनात येतो.
याचा वास्तविक उपयोग असा की एकदा काल ही धारणा निस्सरित झाल्यावर, आपण शरीर नसून तो एंप्टीनेस आहोत हा उलगडा होतो. आपण अविनाशी होतो कारण एंप्टीनेस ही निर्वस्तू आहे. हा उलगडा होणं हे अध्यात्माचं इप्सित आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Sat, 09/12/2020 - 10:22
आइन्स्टाईनं काल ही धारणा सोडली असती तर ज्याला तो स्पेस म्हणतो; तो अथांग एंप्टीनेस ही वस्तुस्थिती त्याला समजू शकली असती. है शाबास संत महंत झाले मनोविकारतज्ज्ञ याना काही कळत नव्हते ते आपण समजावून देणार होता. आता शास्त्रज्ञ ते पण आईन्स्टाईनला काळ याबाबत तुम्ही समजावून देणार?. पण काळ नाहीच म्हटले तर आईन्स्टाईन जिवंत पहिजे. पण दुर्दैवाने आईन्स्टाईन आज जिवंत नाही. म्हणजे एकतर तुम्ही काळाच्या मागे आहात किंवा आईन्स्टाईन काळाच्या पुढे होता. पण काळ आहे कि नाही ? सब गोलमाल है !!

In reply to by सुबोध खरे

गवि Sat, 09/12/2020 - 10:57
डॉक्टर, या बाबतीत तरी टु बी फेअर विथ संक्षी, केवळ आईनस्टाइनपेक्षा वेगळा किंवा विरोधी विचार असणे हा काही निगेटिव्ह पॉईंट नाही. विज्ञानात कोणाचा दबदबा मानून उपयोग नाही. शिवाय आईनस्टाइननेही काळ आपण मानतो तसा अस्तित्वात नाही हेच म्हटलं आहे. त्याने काळाला स्पेसशी एकरुप केलं. प्रत्येक थियरीला अधिक परिपूर्ण करण्यासाठी मांडणी बदलून बघावी लागतेच. तेव्हा काळ भौतिक अर्थाने एक स्वतंत्र एन्टीटि म्हणून अस्तित्वात नाही हे मत एक ग्राह्य मत आहे. पुढे त्याचा विस्तार संक्षी कसा करतात ते मला माहीत नाही. काळ हे आपलं सोयीसाठी आवश्यक इंटरप्रिटेशन आहे हे समजून घेतलं की झालं. बाकी आपण मोजतो तसा सरकणारा काळ असं काही आपल्या मनाबाहेर अस्तित्वात नाही याची कुठेतरी जाणीव हवी.

In reply to by गवि

आनन्दा Sat, 09/12/2020 - 11:23
कोणतीहि संकल्पना नाकारणं सोपं असतं. सिद्ध करणं कठीण. अति अवांतर - जग निर्गुण निराकार आहे, काळ नावाची संकल्पना अस्तित्वात नाही वगैरे सिद्धांत मांडायला विज्ञानाची गरज नाही.. हे सिद्धांत अनादिकालापासून चालत आले आहेत. संक्षी जे काही सांगत आहेत ते काही फार वेगळे नाही, तत्त्वज्ञानाच्या पातळीवर हे विश्व अनादी अनंत कालातीत आहेच. पण म्हणून आपल्याला दिसणारा काळ दृष्टीभ्रम का मानावा? मुळात पंचज्ञानेंद्रिय हाच जर भ्रम आहे, तर त्या ज्ञानेंद्रियांमार्फत दिसणाऱ्या विकाराच्या आहारी जायची गरज नाही माणसाला. पण तो जातो , कारण भावातीत जाण्याची, किंवा कालातीत होण्याचे ज्ञान फार कमी उपलब्ध आहे. आता, पुढचा प्रश्न असा आहे की, त्याचा खरेच अनुभव, विशेषतः भावातीत, कालातीत जाण्याचा अनुभव त्याबद्दल बोलणार्यांनी घेतला आहे का याबद्दल मी साशंक आहे. कारण कालातीत गेलेल्या माणसांची जी लक्षणे मला ज्ञात आहेत त्यातील कोणतेही लक्षण मला या माणसात दिसून येत नाही, त्यामुळे पोकळ शब्दबंबाळ अध्यात्माला काही फारसे लागत नाही..

In reply to by आनन्दा

सोत्रि Sun, 09/13/2020 - 05:56
मुळात पंचज्ञानेंद्रिय हाच जर भ्रम आहे, तर त्या ज्ञानेंद्रियांमार्फत दिसणाऱ्या विकाराच्या आहारी जायची गरज नाही माणसाला. पण तो जातो , कारण भावातीत जाण्याची, किंवा कालातीत होण्याचे ज्ञान फार कमी उपलब्ध आहे.
हेच ते खरे ज्ञान! ते उपलब्ध आहे पण सामान्य माणसाला समजावून सांगणारे आणि मुक्तीकडे नेणारं दुर्दैवाने कोणीही नाही. तो मार्ग प्रत्येकाने (साधकाने) आापापला शोधायचा आहे. सुदैवाने इंटरनेट तंत्रज्ञानामुळे हा शोध बराच सुकर झाला आहे. माझ्या ह्या शोधातून मला समजलेल्या एका साधनाप्रणालीची ओळख इथे आहे! - (साधक) सोकाजी

In reply to by गवि

१.
डॉक्टर, या बाबतीत तरी टु बी फेअर विथ संक्षी, केवळ आईनस्टाइनपेक्षा वेगळा किंवा विरोधी विचार असणे हा काही निगेटिव्ह पॉईंट नाही. विज्ञानात कोणाचा दबदबा मानून उपयोग नाही. शिवाय आईनस्टाइननेही काळ आपण मानतो तसा अस्तित्वात नाही हेच म्हटलं आहे.
असा समजुतदारपणा सर्व सदस्यांनी दाखवला तर संकेतस्थळावरच्या लेखनाचा दर्जा कुठल्या कुठे जाईल ! २.
त्याने काळाला स्पेसशी एकरुप केलं. प्रत्येक थियरीला अधिक परिपूर्ण करण्यासाठी मांडणी बदलून बघावी लागतेच. तेव्हा काळ भौतिक अर्थाने एक स्वतंत्र एन्टीटि म्हणून अस्तित्वात नाही हे मत एक ग्राह्य मत आहे
बरोब्बर ! ३.
काळ हे आपलं सोयीसाठी आवश्यक इंटरप्रिटेशन आहे हे समजून घेतलं की झालं. बाकी आपण मोजतो तसा सरकणारा काळ असं काही आपल्या मनाबाहेर अस्तित्वात नाही याची कुठेतरी जाणीव हवी.
इक्झॅक्टली ! हाच मूळ मुद्दा आहे. ४.
पुढे त्याचा विस्तार संक्षी कसा करतात ते मला माहीत नाही.
एकदा फंडा क्लिअर झाला की पुढे मजा आहे : अ) काल असं काहीही नाही त्यामुळे सर्व घटना (आदीपासून अंतापर्यंत) एकाच कालात घडतायंत आणि घडत राहतील, तो म्हणजे वर्तमान काळ ! ब) अर्थात, ज्या कालाला मागे-पुढे काही नाही त्याला वर्तमान काळ सुद्धा म्हणता येत नाही. तो एक सर्वव्यापी, अमर्याद एंप्टीनेस आहे. क) हा एंप्टीनेस विश्वातल्या सर्व क्रिया (आणि त्या अनुषंगानं क्रियेत सहभागी असलेली प्रत्येक वस्तू) अंतर्बाह्य व्यापून आहे. त्याच्या उपस्थितीशिवाय कोणतीही क्रिया असंभव आहे. तो खुद्द मात्र निर्वस्तू (नॉन-मॅटर) आहे, त्यामुळे कोणतीही क्रिया त्याच्यावर काहीही परिणाम करु शकत नाही. ड) फायनली, तो एंप्टीनेस म्हणजे खुद्द आपणच आहोत कारण...... एंप्टीनेसमधे कुठेही अंतर नाही ! हा शेवटचा मुद्दा करणार्‍याला सिद्ध म्हणतात ! नाऊ ट्राय.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि Sun, 09/13/2020 - 06:08
हा शेवटचा मुद्दा करणार्‍याला सिद्ध म्हणतात !
आपण शून्य (एम्टीनेस) आहोत हा मुद्दा करण्याची गरज नसून त्याची अनुभूती घेणं/येणं हे गरजेचं आहे. सिद्ध म्हणायचे नसून व्हायचे आहे. आणि हे होणं अत्यंत वैयक्तिक आहे, स्वानुभूती आहे, शब्दांच्या पलीकडली. स्वत:संबंधी असल्याने ते अध्यात्म (अधि + आत्म*) आहे! * ईथे आत्म म्हणजे स्वत: आत्मा नव्हे. ही फोड न कळल्याने अध्यात्म हे मन आणि शरीर परस्परसंबंधांचे शास्त्र आहे हे न समजून शब्दबंबाळ तत्वज्ञान होऊन बसले आहे, दुर्दैवाने! - (मुमुक्षू) सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि Sun, 09/13/2020 - 06:28
असा समजुतदारपणा सर्व सदस्यांनी दाखवला तर संकेतस्थळावरच्या लेखनाचा दर्जा कुठल्या कुठे जाईल !
सर्व समस्यांचे (पक्षी: दु:ख) कारण बाह्य नसून ते प्रत्येक व्यक्तीच्या आत असते. बाहेर काहीच नसतं सगळं आपल्या आत असतं. हेच अध्यात्म, हीच सिद्धता, हाच तो एम्टीनेस. हा उलगडा झालेला असल्यास कोट केललं विधान सत्याशी फारकत घेणारं आहे ह्याची जाणिव होईल! - (साधक) सोकाजी

In reply to by गवि

कोहंसोहं१० Sat, 09/12/2020 - 21:40
या बाबतीत तरी टु बी फेअर विथ संक्षी, केवळ आईनस्टाइनपेक्षा वेगळा किंवा विरोधी विचार असणे हा काही निगेटिव्ह पॉईंट नाही >>> गवि, वेगळा किंवा विरोधी विचार तारतम्य न बाळगता आणि स्वतःच्या सोयीने हवा तेंव्हा वापरणे हा निगेटिव्ह पॉईंट आहे. आनंदा म्हणतात तसे हा विचार अध्यात्म वाचलेल्या किंवा जाणणाऱ्यांसाठी नवा नाही. उपनिषदे, दर्शन तत्वज्ञान वाचल्यास त्यांच्या विचारात काहीच नावीन्य दिसणार नाही. जरी ते स्वतः कधीच नमूद करत नसले तरीही (कदाचित त्यांनी मांडलेले विचार हे त्यांचे नसून उसने आहेत हे लोकांना कळल्यावर त्यांचे महत्व कमी होईल या भीतीने असावे). पण या विचारांचा जेंव्हा ते स्वतःला न पटणाऱ्या गोष्टींसाठी शस्त्रासारखा वापर करतात तेही तारतम्य न बाळगता तेंव्हा ते चुकीचे ठरते. निर्गुण निराकार सत्य सोडल्यास बाकी सर्वच भ्रम हे खरे असले तरी व्यवहारात व्यावहारिक सत्याचा स्वीकार करावाच लागतो. इथे संक्षींना ज्योतिष पटत नाही त्यामुळे ज्योतिष भ्रम आहे हे सांगण्यासाठी ते निर्गुण निराकार अथांग शून्यच फक्त सत्य आहे हा मुद्दा रेटत आहेत. अध्यत्माच्या त्या ऊंचीवरून पाहिल्यास ज्योतिष काय सगळंच भ्रम आहे. अगदी भौतिक, जैविक, रासायनिक विज्ञान सुद्धा. पण विज्ञानाच्या कोणत्याही धाग्यावर संक्षी आपले हे तत्वज्ञान घेऊन कधी दिसले आहेत का? त्यांच्यात ते धाडस नाही. सत्याचा दाखल द्यायचाच असेल तर सोयीस्करपणे कशाला हवा? बरे, ज्या काळाला भ्रम त्यांनी म्हणत धागा हायजॅक केला आहे (धाग्याचा विषय ज्योतिष खरे कि खोटे हा नसताना) ते स्वतः मात्र व्यवहारात जगताना काळ वेळ पाळतील. सत्याचा दृष्टीने हे शरीर पण भ्रम तरीही योग्य वेळी भूक लागल्यावर जेवण करतील.आजारी पडल्यास योग्य वेळी डॉक्टरकडे जातील (अगदी अपॉइंटमेंट च्या वेळेला) गरज पडली तर वेळेआधी लाईट बिल भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतील, स्वतःचे आणि इतरांचे टॅक्स वेळेआधी फाईल करतील, क्लाएंट ने विशिष्ट वेळी बोलावल्यास किंवा मीटिंग ठेवल्यास तीही वेळ पाळतील, एखाद्या वेळेस घड्याळ आणि फोन घरी विसरल्यास बाहेर एखाद्या माणसाला टाइम विचारतील किंवा एखाद्याने विचारल्यास किती वाजले हेही सांगतील. सोयीसाठी 'मध्यंतरीच्या काळात अनेक घटना घडल्या' अशी कालवाचक वाक्येही स्वतःच्या धाग्यावर लिहितील आणि चाणाक्ष मिपाकरांनी त्यांच्यातला हा परस्परविरोधीपणा दाखवून दिला की सोयीस्करपणे दुर्लक्ष करतील. पण स्वतःला न पटणाऱ्या एखाद्या गोष्टींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संदर्भ आला जसे की काळ, ज्योतिष की लगेच त्यांना ब्रह्म सत्यम जगत मिथ्या आठवते. काहीही अभ्यास आणि अनुभव नसताना व्यावहारिक तारतम्य न बाळगता इतर गोष्टींना भ्रम म्हणून मोकळे व्हायचे आणि प्रतिवादाला सोयीस्करपणे निर्गुण निराकार अथांग शून्याचा संदर्भ द्यायचा ज्यात विषयाचे त्यान्चे अज्ञान सहजपणे लपवले जाते. हा दुटप्पीपणा दरवेळी कशाला हवा? मी वर एका प्रतिसादात म्हंटले होते की अद्वैतवादाचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या शंकराचार्यांनीसुद्धा व्यावहारिक सत्य आणि आध्यात्मिक सत्य या संकल्पना मांडल्या होत्या. कारण त्यावेळीही अध्यात्मातील विचारधारा व्यावहारिक तारतम्य न ठेवता स्वतःच्या सोयीसाठी वापरणारे अनेक भोंदू होते (जसे आजही आहेत...अगदी मिपावर पण). आमचा विरोध अध्यात्मातील तत्वज्ञान सोयीस्करपणे वापरणाऱ्या त्या भोंदूपणावर आणि दुटप्पी भूमिकेवर.

In reply to by कोहंसोहं१०

फक्त तीन गोष्टींची उत्तरं द्या : १. ज्योतिषाचा एकमेव आधार जातकाची जन्म वेळ आहे. मुळात काल ही मानवी कल्पना आहे, त्यामुळे जन्मवेळेला काहीही अर्थ नाही. थोडक्यात, तुमची जन्म वेळ ही मानवी कल्पनेवर आधारित, अस्तित्वात घडलेल्या एका नगण्य गणनेची फक्त कागदोपत्री केलेली नोंद आहे आणि इतक्या फालतू गोष्टीवर सगळ्या ज्योतिषाचा डोलारा उभा आहे. २. ज्योतिष हा कार्यकारणभावाचा वेध आहे अशी तुम्ही जी डींग मारता आहात ती तद्दन फालतू आहे. विज्ञान हा कार्यकारणाचा वेध आहे, ज्योतिष नाही. ज्योतिष ही जातक केंद्रित अंदाजपंचे केलेली फेकंफाक आहे. जातक हटवला तर ज्योतिषाशास्त्रावरचे जगातले सर्व ग्रंथ कचर्‍याच्या भावात सुद्धा जाणार नाहीत . ३. अस्तित्वातली कोणतीही घटना कालाधारित नाही हे माझंच विधान तुम्ही घूम फिराके आधीच्या प्रतिसादात, मलाच सांगितलं आहे. सर्व घटना कालनिरपेक्ष असल्यानं, जन्मवेळ हा काल्पनिक कालबिंदू घेऊन, त्या सापेक्ष केलेले घटनांचे कालाधारित अंदाज ही मूर्खपणाची परमावधी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 11:47
इथे धाग्याचा विषय भलताच आहे याचंही साधं भान न ठेवता स्वतःचे ज्ञान पाजळण्यासाठी "काल हा भ्रम आहे" ही आरोळी ठोकत आहात मात्र स्वतःच केलेल्या मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या. या काल हा भ्रम आहे या विधानाशी पुर्णतः विसंगत असलेल्या विधानाबद्दल बोलती बंद झाली आहे तुमची तिथे मात्र तुम्ही मुग गिळून बसला आहात. त्या स्वतःच केलेल्या विधानाला सामोरं जायची हिंमत तुमच्यात नाही आणि लोकांच्या बोलण्याला पचपच म्हणत आहात. इतरांचा मोठमोठाले प्रतिसाद देऊन प्रतिवाद करत आहात. आणि मी तुमच्या दोन विधानांमधील विसंगती फक्त एक दोन वाक्यात अनेक प्रतिसाद देऊन दाखवली. त्या एक दोन वाक्यांच्या प्रतिसादांना सामोरं जायचं धाडस तुमच्यात नाही. असेल हिंमत तर द्या उत्तर काल हा भ्रम असेल मधल्या काळात बर्‍याच कशा काय घडल्या या प्रश्नाचे.

In reply to by संगणकनंद

काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही हे आतापर्यंत १०० वेळा सांगून तुम्हाला प्रकाश पडलेला दिसत नाही. आज तारीख काय ? याचं उत्तर १३ सप्टेंबर २०२० दिल्यावर, मला पराभूत केलं म्हणून एखादा फुल महात्याचूच वेडगळासारखा नाचू शकतो. पण अस्तित्वात दिवस, रात्र, तारीख, वार, तास, मिनीटं, सेकंद अशी काहीही गणना नाही. थोडक्यात अस्तित्वात १३ सप्टेंबर २०२० असं काहीही नाही. आलं का लक्षात ? आता नीट समजावून घ्या आणि मला प्रतिसाद देतांना किमान १० वेळा विचार करा म्हणजे अशी चारचौघात वारंवार शोभा होणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 14:18
आधी म्हणता: काल हा भ्रम आहे नंतर म्हणता: मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या त्यातली विसंगती दाखवल्यावर तुमची बोलती बंद. मग तुम्ही नवेच ज्ञान पाजळू लागलात: काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही तोंडावर आपटल्यावर पलटी मारणे किंवा शब्दांचे खेळ करणे तुमच्यासाठी नवीन नाही. इथेही तेच केलेत. आणि हो, महात्याचू तुम्ही असाल. माझा आयडी त्याचू आहे.

In reply to by संगणकनंद

१ सप्टेंबर २०२० ते १३ सप्टेंबर २०२० या गणनेला कालावधी म्हणतात. त्या दरम्यान म्हणजे त्या कालावधीत. पण अस्तित्वाच्या दृष्टीनं रात्र आणि दिवस असं काहीही नाही त्यामुळे कालावधीही नाही. `मध्यंतरीच्या काळात ' ही फक्त बोली भाषेतली स्पेसिफिक निर्देशाची सोय आहे. महात्याचू हा तुमचा आयडी नसून ती तुमच्या प्रतिसादांची गुणवत्ता आहे. तुमच्याकडे आकलनक्षमता कमी म्हणून प्रतिसादाचा अर्थ कळत नाही, मी शब्द फिरवण्याचा संबंधच नाही. आता पुन्हा प्रतिसाद देण्याचं साहस करु नका.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 15:12
आता पुन्हा प्रतिसाद देण्याचं साहस करु नका.
का बरे? तुम्ही दमलात का शाब्दिक पलट्या आणि कोलांट्याऊड्या मारुन? आता नाही देणार मग. "काल हा भ्रम आहे -> मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या -> काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही" ही तुमची महात्याचू गुणवत्तेची विचारसरणी उघडी पाडणं हा माझा उद्देश होता. तो सफल झाला. आता नाही देणार हं प्रतिसाद. नाही मारायला लागणार तुम्हाला महात्याचू गुणवत्तेच्या शाब्दिक पलट्या. एंजॉय युअर विकेंड.

In reply to by संगणकनंद

पुन्हा नांव सार्थ करु नका ! एकतर तुम्हाला प्रतिसादाचा अर्थ कळत नाही आणि त्या अज्ञानात तुम्हाला फार मोठं काही तरी केल्याचा आनंद होतोयं ! याला दुहेरी त्याचूपणा म्हणतात, चालू द्या !

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 16:38
विधान क्र १: काल हा भ्रम आहे विधान क्र २: मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या विधान क्र ३: काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही याला तिहेरी महात्याचूपणा म्हणतात, चालू द्या !

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 16:57
तुम्ही तीन परस्पर विसंगत विधाने करत आहातः विधान क्र १: काल हा भ्रम आहे विधान क्र २: मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या विधान क्र ३: काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही आधी तुम्ही ठरवा तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते. स्वतःचे ठरेना आणि दुसर्‍यांना म्हणे हे सिद्ध करा आणि ते सिद्ध करा. स्वत: काय वाटेल ते ठोकून देता आणि लोकांना म्हणता सिद्ध करा. असला फालतूपणा एखादा महात्याचूच करु शकतो.

In reply to by संगणकनंद

आधी नीट वाचायला शिका : १ काल हा भ्रम आहे, काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही हा माझा दावा आहे. २. मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या (तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही) असा सर्व विधानांचा एकूण अर्थ आहे आणि ती सर्व एकमेकांशी सुसंगत आहेत. ______________________________________ आता तुम्ही काल ही वास्तविकता आहे हे सिद्ध करुन दाखवा. जिथे तुम्हाला अर्थच कळत नाही तिथे तुम्ही सिद्ध काय करणार ?

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 23:19
बराच वेळ लावलात शब्दांची जुळवाजुळव करायला. हे तुमचं मुळ मत नाही. हे तुम्हाला तोंडावर आपटल्यावर सुचलेलं शहाणपण आहे. मुळ मत असतं तर चार महिन्यांपुर्वी जेव्हा पहील्यांदा निरुत्तर झालात तिथेच हे उत्तर दिलं असतं तुम्ही. आताचं हे शहाणपण इतरांचे प्रतिसाद वाचून आलेलं शहाणपण आहे. पण हरकत नाही :) आता हाच उपयोगितेचा तर्क या धाग्यावरील ज्योतिष हा विषय किंवा इतरत्र चर्चिले जाणारे देव किंवा श्रद्धा या विषयांना लावून पहा बरं. समानता दिसते का? तुम्हाला आता जशी काल संकल्पनेत उपयोगिता दिसते तशीच उपयोगिता ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांमध्ये आहे. त्यामुळे काल संकल्पना वापरल्याने तुम्ही जसे मूर्ख ठरत नाही तसेच ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांचा वापर केल्याने लोक मूर्ख ठरत नाहीत. बघा जमतंय का, लोकांना नावं न ठेवणं.
आता तुम्ही काल ही वास्तविकता आहे हे सिद्ध करुन दाखवा.
असा काही दावा मी केलाच नव्हता. त्यामुळे तो सिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही.
जिथे तुम्हाला अर्थच कळत नाही तिथे तुम्ही सिद्ध काय करणार ?
अर्थ कळत नसता तर तुम्हाला असं नरम पाडता आलं असतं का मला? :)

In reply to by संगणकनंद

१.
तुम्हाला आता जशी काल संकल्पनेत उपयोगिता दिसते तशीच उपयोगिता ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांमध्ये आहे. त्यामुळे काल संकल्पना वापरल्याने तुम्ही जसे मूर्ख ठरत नाही तसेच ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांचा वापर केल्याने लोक मूर्ख ठरत नाहीत
काल ही संकल्पना पैसा या संकल्पने प्रमाणे व्यावहारिक आहे. त्यांच्यामुळे जगण्यात सुलभता येते. तुम्ही या संकल्पना वापरल्यानं मूर्ख ठरता का ? २.
असा काही दावा मी केलाच नव्हता. त्यामुळे तो सिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही.
मग कशाला इतकी पचपच लावली होती ? न तुम्हाला स्वतःचा काही विचार न दुसर्‍याचं काही समजून घेण्याची क्षमता. ३.
अर्थ कळत नसता तर तुम्हाला असं नरम पाडता आलं असतं का मला? :)
कोणत्या भ्रमात आहात ? एकतर तुम्हाला काहीही ठोस माहिती नाही. कधी तरी उगवून पि़ंका टाकण्यापलिकडे काहीही जमत नाही. काल आहे हे सिद्ध करुन दाखवा म्हटलं तर शेपूट घातली आणि वर असले भ्रम करुन घेतायं !

In reply to by संगणकनंद

कोहंसोहं१० Mon, 09/14/2020 - 00:24
मुळ मत असतं तर चार महिन्यांपुर्वी जेव्हा पहील्यांदा निरुत्तर झालात तिथेच हे उत्तर दिलं असतं तुम्ही. >>>>> तिथे काय बोलणार. त्या धाग्यावर संक्षींच्या प्रतिसादानंतर मिपाकरांनी त्यांची एवढी टर उडवली आहे की शेवटी तो धागाच वाचनमात्र ठेवावा लागला. 'ओशोंच्या एक दशांश वेळेत मी कोणत्याही अध्यात्मिक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो' अश्या डिंग्या मारणाऱ्या आयडीचे तत्वज्ञान छापायला प्रकाशक आणि पैसे देऊन वाचायला दहा व्यक्ती सुद्धा तयार नाहीत हे वाचून मात्र हसून हसून पुरेवाट झाली. सगळ्याला भ्रम भ्रम म्हणताना स्वतःबद्दलचा भ्रमाचा भोपळा अनेकवेळा फुटूनही ते पुन्हा त्याच भ्रमात वास्तविकतेशी फारकत घेऊन जगत राहतात - यालाच म्हणतात माया. श्रीकृष्ण उगाच नाही म्हणतात गीतेत - दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया |

In reply to by संजय क्षीरसागर

कोहंसोहं१० Sun, 09/13/2020 - 20:31
हाहा. बाण अचूक लागलेला दिसतोय मर्मावर. तुमचा वेळेबाबतचा सोयीस्कर भोंदूपणा आणि दुटप्पीपणा तुम्हाला स्वतःला स्वीकार्य आहे तर. तुम्ही मला उत्तरे द्यायला सांगताय पण प्रश्नच नाहीत तिथे काय उत्तर देणार. तुमची विधानं कशी पोकळ आहेत ते मी आधीच्या प्रतिसादातून लिहिले आहेच. पुन्हा पुन्हा गोल गोल शब्द फिरवून तुम्ही तेच तेच लिहिताय ज्याला मी आधीच उत्तरे दिली आहेत. तरी पुन्हा एकदा शेवटचे लिहितो: १. तुमची जन्म वेळ ही मानवी कल्पनेवर आधारित, अस्तित्वात घडलेल्या एका नगण्य गणनेची फक्त कागदोपत्री केलेली नोंद आहे आणि इतक्या फालतू गोष्टीवर सगळ्या ज्योतिषाचा डोलारा उभा आहे >>>>> या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात केवळ ५-७ फूट उंचीच्या एका शरीरावर जे विश्वाच्या मानाने अत्यंत नगण्य आहे आणि ज्याच्या असण्याने आणि नसण्याने काहीच फरक पडत नाही इतक्या फालतू गोष्टींवर मेडिकल सायन्स चा डोलारा उभा आहे. मग ते पण झूट का? काय बोलताय? उगाच प्रतिवाद करायचा म्हणून काहीच्या काही का? आणि हो, जन्मवेळेला फालतू गोष्ट म्हणताय मग आत्तापर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा, तुमच्या मुलाचा, पत्नीचा किंवा परिवारातील कोणाचाही वाढदिवस साजरा केला नाही, त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा पार्टीला गेला नाहीत हे प्रामाणिकपणे सांगा. आणि त्याचे कारण कोणी विचारल्यास वरील उत्तर दिले आहे का हेही सांगा. नसल्यास तुमचा वेळ भ्रम, जन्मवेळ फालतू गोष्ट आहे असला डंका पिटणे इथे बंद करा. तुमच्या सोयीस्कर भोंदूपणाची शोभा झालीच आहे. अजून होईल. आणि मी याआधीच सांगितलंय की वेळ फक्त साधन आहे. वेळेचा उपयोग फक्त जन्मक्षणी ग्रहांची असणारी स्थिती काढण्यासाठी आहे. समजा एखाद्याने जन्म होताना पहिले आणि त्याच क्षणी ग्रहांची स्थितीची नोंद केली तर वेळेची गरजही लागणार नाही. ज्योतिषशात्र हे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होते जेंव्हा वेळ मोजण्याची अचूक परिमाणेही आपल्याकडे नव्हती. तेंव्हा जन्मक्षणी सूर्याचे आकाशातील स्थान, आणि त्यायोगे इतर ग्रहांची स्थाने यावरून कुंडली मांडली जात असे. २. ज्योतिष हा कार्यकारणभावाचा वेध आहे अशी तुम्ही जी डींग मारता आहात ती तद्दन फालतू आहे. विज्ञान हा कार्यकारणाचा वेध आहे, ज्योतिष नाही. >>> तिसऱ्यांदा सांगतोय. ते कार्यकारणभावावर कसे अवलंबून आहे ते मी वर उदाहरणादाखल दिलेले आहे. डोळ्यावर पट्टी बांधून आंधळेपणाने सोंग घेणाऱ्याला अजून तेच तेच सांगून मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. "जातक हटवला तर ज्योतिषाशास्त्रावरचे जगातले सर्व ग्रंथ कचर्‍याच्या भावात सुद्धा जाणार नाहीत ." >>>> यावरही मी प्रतिसाद दिला आहे. तुम्ही एकतर प्रतिसाद वाचत नाही किंवा समजूनपण तुमचा आडमुठेपणा सोडत नाही. वरच्यासाठी मी माझा आधीच्याच प्रतिसाद पुन्हा लिहितो- 'अतिशय बालिश विधान. हे म्हणजे पेशंट ला हटवा मग मेडिकल सायन्स किंवा डॉक्टरला ला काय अर्थ राहतो ते सांगा म्हणण्यासारखे आहे. असे काय करून काय होणार?' ३. "सर्व घटना कालनिरपेक्ष असल्यानं, जन्मवेळ हा काल्पनिक कालबिंदू घेऊन, त्या सापेक्ष केलेले घटनांचे कालाधारित अंदाज ही मूर्खपणाची परमावधी आहे. >>>> पुन्हा वेळेतच अडकलात. माझे आधीचे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचा. त्यात मी वेळेबद्दल सांगितले आहेच. वेळ न मानणाऱ्या तुमच्यासारख्यांच्यासाठी सुद्धा ज्योतिष कसे व्यवहार्य आहे वर वाचा समजून येईल (जर समजून घ्यायचे असल्यास).

In reply to by कोहंसोहं१०

Rajesh188 Sun, 09/13/2020 - 20:49
काल म्हणून निराळे तत्त्व वा द्रव्य मानण्याची जरूरी नाही, असा विचार सांख्य तत्त्वज्ञानात मानला आहे. मूळ प्रकृती हे सर्व जन्य पदार्थांचे तत्त्व आहे, त्याच्यात क्रमाने विकार किंवा परिणाम उत्पन्न होतात हे विकार किंवा परिणामच कालभेद होत, असे सांख्यांचे मत वाचस्पती मिश्रांनी सांख्यकारिकेच्या टीकेत (कारिका ३३ ) मांडले आहे. बौद्ध तत्त्वज्ञान सांगते, की क्षण वा क्षणपंरपरा हाच काल होय आणि क्षण म्हणजे प्रत्येक उत्पन्न होणारी भाववस्तू. प्रत्येक वस्तू ही क्षणिकच असते. जैनांनी काल हे एकमितियुक्त स्वंतत्र द्रव्य मानले आहे. कारण ते घटादिकांप्रमाणे प्रदेश व्यापत नाही. द्रव्यांमध्ये जे क्रमाने बदल होतात म्हणजे पर्याय उत्पन्न होतात, त्यांचे नियामक म्हणून काल हे द्रव्य जैनांनी मानले आहे. नव्यनैयायिक रघुनाथ शिरोमणीने क्षण म्हणून स्वतंत्रच द्रव्य व महाकाल ईश्वरच होय असे मानले आहे. महाकाल म्हणून निराळे द्रव्य मानू नये, असे त्याने पदार्थतत्त्वनिरूपण या ग्रंथात म्हटले आहे. Copy pest. ह्यांनीच सांगून ठेवल्या वर बाकी विचार संकल्पना,शास्त्रीय शोध जे काळा विषयी सांगतात ते सर्व थोतांड ठरते. एवढे सोप आहे ते.

In reply to by Rajesh188

कोहंसोहं१० Sun, 09/13/2020 - 21:29
राजेश, मी एका प्रतिसादात लिहिले आहे की अध्यात्माच्या त्या ऊंचीवरून पाहिल्यास ब्रह्म सोडून सर्वच भ्रम आहे, मिथ्या आहे किंवा अगदीच म्हणालात तर थोडांत आहे. त्यात शरीर आले, मन आले, पंचमहाभूत आले, विज्ञान पण आले. पण त्या सत्याचा सोयीस्कर उपयोग करून जेंव्हा कोणी व्यवहारातल्या त्यांच्या काही विश्वास नसणाऱ्या गोष्टीसाठी करतो तेंव्हा तो सोयिस्करपणाचा बुरखा फाडणे गरजेचे ठरते. आता प्रकृतीच भ्रम म्हणून मग म्हणून आपण जेवणे, पाणी पिणे किंवा इतर शारीरिक क्रिया सोडतो का? रोजचे व्यवहार सोडतो का? वेळ भ्रम म्हणून तुम्ही उद्या मनाला येईल त्या वेळेला ऑफिस ला येणे जाणे कराल का? ऑफिस चे नियम एका अमुक वेळेच्या आत ऑफिस मध्ये पाहिजे असा असल्यास वेळेवर अवलंबून म्हणून ऑफिस झूट म्हणाल का? तुमच्या नोकरीचा डोलारा वेळेवर अवलंबून असेल (उदा सकाळी पेपर टाकणे) तर वेळ भ्रम म्हणून ती नोकरी झूट म्हणू शकाल का? मग हा नियम फक्त ज्योतिषाला कशाला लावायचा? म्हणायचेच असेल तर विज्ञालाही भ्रमच म्हणा कारण तोही वेळेवर आधारित आहेच. संक्षी जी वेळ भ्रम म्हणून ज्योतिष भ्रम ही बडबड इथे करत आहेत तीच बडबड विज्ञानाच्या धाग्यावर करायची त्यांची हिम्मत नाही कारण त्यांना ठाऊक आहे तसे केल्यास त्यांना बरेच शाब्दिक फटके मिळून तेथून हाकलण्यात येईल. ती हिम्मत नसेल तर इतर गोष्टींप्रमाणे ज्योतिष सुद्धा व्यवहाराचा एक भाग आहे (खरे की खोटे हा वेगळा मुद्दा) हे मान्य करावे. उगाच अध्यात्माचे सत्य सोयीस्करपणे तिथे नकोत. नियम लावायचाच असेल तर तो सर्वांना एकसारखा लावायचा नाहीतर दुटप्पेपणाचा बुरखा फाडला जाईल.

In reply to by डॅनी ओशन

कोहंसोहं१० Sun, 09/13/2020 - 22:01
ते राहिलेच पुन्हा लिहायचे. संक्षी हा आयडी प्रकाशझोतात राहण्यासाठी असे उद्योग करत असतो. मागे असाच एक धागा आला होता मानसिक समस्यांचा. लेखकाचा हेतू 'मिपाकरांच्या मानसिक समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणे' इतका प्रांजळ होता. तेंव्हा हेच महाशय तिथे मन नसतेच असल्या आध्यात्मिक संकल्पना घेऊन धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी नाईलाजाने लेखकाने सरळ शब्दात तंबी दिली मग गपचूप बाजूला झाले. पण वाईट खोड इतक्या सहजासहजी कशी जाणार म्हणून शेवटी हा धागा केला हायजॅक. उसने ज्ञान अलंकारिक शब्दात विवादास्पद पद्धतीने मांडून टाळ्या मिळवण्याच्या सतत प्रयत्नात असतात ते (अध्यात्मात याला लोकेषणा म्हणले आहे जो मोठा दुर्गुण आणि आत्मानुभव प्राप्तीच्या प्रयत्नात मोठा अडसर मानला गेला आहे).