Skip to main content

गुलाबी कागद निळी शाई

लेखक @tul यांनी मंगळवार, 23/06/2020 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी पत्रं "लिहिली" जात... आता "आठवली" जातात. गेल्या १०० शंभर वर्षांचा विचार केला तर जलद संदेशासाठी आणि दीर्घ संवादासाठी दळणवळणाची वेगवेगळी साधने होती . ह्या १०० वर्षांचे तीन भागात विभाजन केले तर पहिल्या भागातील काळात जलद संदेशासाठी तारयंत्राचा वापर म्हणजे तार संदेश होते आणि दीर्घ संवादासाठी हस्तलिखित पत्राची सोय पोस्ट सेवेत होती. मधल्या काळात जलद संदेशासाठी फोन आले आणि दीर्घ संवादासाठी पत्र हेच माध्यम राहिले. वर्तमान काळात जलद संदेशासाठी आधी काही काळ pager मग मेसेजिंग आणि आता whatsapp आणि दीर्घ संवादासाठी हस्तलिखित पत्र नामशेष होऊन e पत्र व्यवहार सुरु झाला. तसं नाही म्हणायला रक्षाबंधनाला दूरच्या भावाला राखी पाठवताना चार ओळी खरडल्या जातायत आजही पण हस्तलिखितातला तो कदाचित शेवटचा पुरावा असेल. विसाव्या शतकात अशा हस्तलिखित पत्रांचं एक अप्रूप होतं, ओलावा, आपलेपणा होता ते सर्व ह्या शुष्क ई-मेल मध्ये नाही. ती हस्तलिखित पत्रांची मौज पुन्हा वर्तमानाच्या पटलावर ओढावी अशा विचारातून ही एक पत्रमाला गुंफण्याचा प्रयत्न. तुम्हाला हा प्रयत्न भावेल अशी आशा आहे. ( फेसबुकवर पूर्वप्रकाशीत)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5307
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

पत्र लेखनाची माझी संवय अजूनही मी जपून ठेवली आहे. माझी पत्रे मित्रांकडे पोहोचल्यावर मित्र विचारतात कि " तुझे पत्र ? अजूनही ? " माझं त्यावर एकच उत्तर असते, " जोपर्यंत भारत सरकार पत्र  ही संकल्पना पोस्टातून बाद करीत नाही तोपर्यंत मी पत्रे लिहून पाठवीत राहणार. " अर्थात आत्मस्तुतीचा दोष पदरी घेऊन लिहितो कि माझे अक्षर सुंदर आहे. कॅलिग्राफीचा शाईचा पेन वापरतो आणि शाईचं लिखाण असते. पोस्टात जाऊन एकदम तीस चाळीस रुपयांची पत्रे विकत घेतो त्यावेळी पोस्टमन सुद्धा माझ्याकडे आश्चर्याने पाहत असतो. माझ्या काही मित्रांनी माझी पूर्वीची पत्रे जपून ठेवलेली आहेत. पत्राने मजकूर कळविल्यास पुढील फायदे होतात. १) माझ्या मनात काय आहे ते सर्वांना कधीही वाचता येते. २) पत्रे घरातील कोणीही ,कधीही वाचू शकतात. ३) पत्रातील मजकूर चांगला असल्यास त्याचा संग्रह केला जातो. ४) गत काळाच्या आठवणी नीट जपून ठेवण्यासाठी पत्रे  हि चांगली सोय आहे. याउलट फोनवर बोलणे केल्यास १) ऐकणारा सर्वच बोलणे सुसंगतीने सांगेल याची खात्री नाही. २) एकदाच बोलले जाते, त्यामुळे सर्वच गोष्टी नेहमीसाठी लक्षात ठेवणे कठीण असते. ३) कोणत्याच प्रकारचा संग्रह करता येत नाही. म्हणून मी अजूनही मित्रांना / नातेवाईकांना पत्र लिहून पाठवीत असतो.

In reply to by जयन्त बा शिम्पि

छंद म्हणून निवडक जणांना कधितरी पाठवणं ठिक. पण नेहमी अशी पत्र पाठवल्यावर स्वतःचा फॅमिली गृपमध्ये रोज गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवणारे काका होउ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पोस्ट कार्डामुळे आणि आंतर्देशीय पत्रामुळी पोस्टाला अनुक्रमे सात आणि पाच रुपयांचं नुकसान होतं. त्यामुळे सरकारने ही 'सोय' छंदासाठी केली नसून दुर्गम ठिकाणी माहिती/बातमी पोहचवण्यासाठी केली आहे असे वाटते. चुभुदेघे. त्यामुळे अगदी गरज असेल तरच अशा सेवा वापराव्या अश्या मताचा मी आहे.

ही दोघांमधल्या पत्रांची सिरीज आहे. @tul आणि मी आम्ही दोघांनी "तो आणि ती" या भूमिकेतून ही पत्रे लिहिली आणि अभिवाचन केले. प्रत्येक पत्राखाली अभिवाचनाची युट्युब लिंक द्यायचा विचार आहे. कसा वाटतोय प्रयत्न/ प्रयोग ते मिपाकर खुल्या मनाने सांगतीलच असा विश्वास आहे.

मुक्तक छान लिहिलंय. माझ्या आई ने मला पहिल्यांदी ईमेल केली होती त्यात सुरवात "चि वीणा" आणि शेवट "कळावे तुझी आई " वाचून मजा वाटली होती ते आठवलं :)