✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पेशवाईची अखेर आणि दुसरा बाजीराव

म
मनो यांनी
Tue, 02/06/2018 - 06:36  ·  लेख
लेख
दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचे राज्य घालवले अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. तो अखेरचा पेशवा असल्याने या समजुतीला बळ मिळते. त्या काळाबद्दल खोलवर वाचन करताना (एकत्रित यादी शेवटी दिली आहे) मला असा आढळलं की ही समजूत खोटी आहे. मागच्या भागात वल्ली आणि गामा पैलवान यांनी थोडक्यात प्रतिसाद लिहिले आहेतच, पण मला असे वाटले की याबद्दल सविस्तर लिहायला हवे. म्हणून हा सारांश इथे मांडतो आहे. राज्य बुडवण्यासाठी दुसरा बाजीराव हा कारणीभूत नसला तरी याचा अर्थ असा नाही की तो शूर होता किंवा त्याच्या हातून चुका झाल्या नाहीत. त्याने आपल्या कुवतीनुसार धडपड केली आणि अखेरपर्यंत त्याला आपण काय गमावले याची जाणीव होती. राज्य गमावण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरु झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज अथवा थोरला बाजीराव याचे काही गुण जरी त्याच्या अंगी असते तर त्याला कदाचित ती प्रक्रिया थांबवता आली असती आणि राज्य टिकवता आले असते. त्याचा दोष इतकाच दिसतो की त्याच्या अंगी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन लोकोत्तर यश मिळवण्याचे गुण नव्हते आणि अशी संधी त्याला आली असताना ते शिवधनुष्य पेलण्यास तो असमर्थ ठरला. या मराठेशाहीच्या अंताची सुरवात १८१७ मध्ये नाही तर कधी झाली होती, दिल्ली ताब्यात घेऊन आख्या भारताचा कारभार चालवणाऱ्या मराठा सत्तेचा ऱ्हास कधी झाला, हे प्रश्न मग उभे राहतात. फक्त मराठ्यांच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील हा निर्णायक क्षण (decisive moment) म्हणजे १८०३ असे मला वाटते. या वर्षानंतर मराठ्यांचे विधिलिखित अटळ बनले. ते टाळणे शक्य होते पण फार अवघड होते. असाच एक दुसऱ्या महायुद्धातील असा निर्णायक क्षण म्हणजे स्टालिनग्राडचा लढा आणि नंतरची कर्स्कची लढाई (ऑगस्ट १९४३). इथे जर्मन लष्कराने आक्रमक पुढाकार गमावला (lost operational initiative) आणि पूर्व आघाडीवर त्यांना सतत बचावात्मक भूमिका घेणे भाग पडले. पूर्व आघाडीवर विजयाची शक्यता कर्स्क इथे पूर्ण नाहीशी झाली. त्यानंतर २ वर्षे हिटलरच्या मृत्यूपर्यंत लढाई चालू होती. पण जर्मनीचा पराभव दिवसेंदिवस अटळ होत गेला. मराठयांच्या बाबतीत एक गोष्ट दिसते की दौलतीस (मग ती पेशवेपद, होळकर, शिंदे अशी कोणतीही असो) पुढचा वारस कोण होणार या प्रश्नावर सतत अंतर्गत कलह चालू राहिला - . त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी सर्वांचे लष्करी पराभव केले आणि हा देश ताब्यात घेतला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंग्रजांनी १८०३ साली दिल्ली मराठ्यांच्या ताब्यातून घेतली. इंग्रजांनी मोगलांचा पराभव करून नव्हे तर मराठ्यांचा पराभव करून दिल्ली घेतली. नागपूरकर भोसल्यांना १८०३ साली ओरिसा, कटक हा भाग इंग्रजांना द्यावा लागला. त्यामुळे भारताची सत्ता इंग्रजांनी मराठ्यांकडून मिळवली हे स्पष्ट दिसते. आपण जर सवाई माधवरावाच्या जन्माच्या वेळची (ई. स. १७७४) परिस्थिती पाहिली तर आपल्याला नंतरच्या दुसऱ्या बाजीरावाच्या वेळेसारखीच स्थिती दिसते. थोरल्या माधवरावाच्या वेळेपासूनच (१७६१-१७७२) दोन प्रतिस्पर्धी पक्ष पेशवेदरबारात उभे राहिले होते. त्या वेळी नारायणरावाच्या खुनात सहभाग असणाऱ्या रघुनाथरावास पेशवाईचा धनी म्हणून मानणे बऱ्याच जणांना मान्य नव्हते. म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयास गेले. त्या वेळी जनमत नाना फडणीसांच्या मागे उभे राहिले. महादजी शिंदे यांनी आपले सैन्यबळ नानांच्या मागे उभे केले. मुंबईकर इंग्रजांचा पराभव महादजी शिंदे यांनी वडगाव इथे केला. सालबाईच्या तहानुसार इंग्रजांनी माघार घेतली. रघुनाथरावास नाना सांगेल ते मान्य करून कोपरगावास गोदावरीकाठी (म्हणजे गंगेकाठी) राहावे लागले. इंग्रजांचा पराभव जरी झाला असला तरी त्यांचा संपूर्ण नाश झालेला नव्हता, मुंबई किंवा कलकत्ता मराठयांच्या ताब्यात आलेले नव्हते. उलट इंग्रज दिवसागणिक अजूनच बलवान होत होते. त्यांनी १७९० च्या दशकात निझामाचा दरबार आणि राजकारण ताब्यात घेतले (जे मराठ्यांना ५० वर्षे जमले नव्हते). त्यांनी टिपू सुलतानाचा पराभव करून त्यालाही ठार मारले. ह्या दोन्ही घटना अवघ्या १० वर्षातील आहेत. रघुनाथरावाचा जेष्ठ पण दत्तक मुलगा अमृतराव. औरस पण लहान पुत्र दुसरा बाजीराव. त्याचा लहान भाऊ चिमाजीअप्पा. बाजीरावाची आई आनंदीबाई यांचे पत्रात 'कारभारी (म्हणजे नाना) मर्द माणूस. बाजीरावाच्या जन्मावेळी धार किल्यात होतो तें किल्ल्यावर तोफा चालवल्या' असा उघड वैराचा आरोप आहे. बाजीरावाच्या अभ्यासाविषयी 'बाजीराव यांचा स्वभाव हूड. फार खेळतात. एकदा मेलेला उंदीर सापडला त्यास काड्या जमा करून अग्नी लावला. पूर्वी गुरुजी होते त्या वेळेस असे नव्हते' अशी तक्रार केलेली दिसते. एकंदरीत नानास 'मूल शहाणे होऊ नये' असे वाटते हा आनंदीबाईंचा ग्रह होता. त्यामुळे तीन बंधूंच्या मनात नाना फडणिसाबद्दल द्वेष नाही तरी किमान अविश्वास नक्कीच भरलेला होता. नाना आणि सवाई माधवराव विकिपीडियावरून साभार nana नाना फडणीसांनी सवाई माधवरावाच्या सुरक्षेच्या नावास्तव त्याला नेहमी कडेकोट बंदोबस्तात ठेवले. पेशवाईचे सर्व राजकारण नानांनी चालवले. नानांनी या काळात बराच पैसाही जमवला. उदाहरणार्थ कल्याणच्या सुभेदाराच्या दत्तक पुत्रास मान्यता देण्यासाठी पेशव्यास १ लक्ष (खासगी की सरकारी ते कळत नाही) आणि नानास २,००० रुपये मिळालेले अधिकृत कागदात दिसतात. यामुळे नानाच्या प्रतिस्पर्धकांच्या मनात पेशवा आणि त्याला कडक नियंत्रणात ठेऊन मिळणाऱ्या भरपूर कमाईची संधी असा एक पायंडा पडला. प्रसंगी निजाम किंवा इंग्रज यांची मदत नाना फडणीसांनी घेतली (उदाहरणार्थ टिपूविरुद्ध). पेशव्यांशी निष्ठा किंवा राष्ट्राशी निष्ठा हा प्रकार त्या काळात कमी झाला. या ना त्या मार्गाने आपले कमाईचे स्थान अबाधित राखणे हा प्रकार सुरु झाला. गरगरीत वाटोळा रुपया हाच खरा देव अशी त्या काळची परिस्थिती बनली. सवाई माधवरावाच्या राज्याच्या अखेरच्या काळात महादजी शिंदे सैन्यासह पुण्यास आले. आधी कबूल केलेली सैन्यखर्चाची बाकी वसूल करणे आणि कारभारात महादजी शिंदे याना सहभागी करून घेणे अश्या शिंद्यांच्या रास्त मागण्या होत्या. नानास भीती पडली की शिंदे आपल्याला कैद करतात अथवा सैन्याचा बळावर आपल्या मागण्या मान्य करवून घेतात की काय, पण शिंद्यानी सामोपचाराने आपल्या मागण्या मान्य करवून घेण्याचे प्रयत्न केले. पेशव्यांसही स्वतंत्रपणे वागण्यास महादजीने प्रोत्साहन दिले. नानांनी महादजीबरोबरचे वाटाघाटीचे गुऱ्हाळ चालतच ठेवले. त्याचा लवकर निर्णय लागू दिला नाही. त्यामुळे शिंद्यांची मोठी फौज निष्कारण गुंतून पडली. त्यातच महादजी शिंदे यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या फौजेचा पगार देण्यास पैशाची कमी पडू लागली. त्यातूनच निजामाकडून खंडणीची बाकी वसूल करण्यासाठी खर्ड्याची स्वारी करण्यात आली. बाजीरावासही नानाने तुमची व्यवस्था स्वारीनंतर करून देऊ असे फक्त आश्वासन दिले. या परिस्थितीत अनेक गुंते पडून असताना नानांचे दुर्दैव म्हणून सवाई माधवरावाचे निधन झाले. या वेळी बाजीरावाबद्दल कुणालाच फार माहिती नसल्यामुळे पेशवे घराण्याचा अस्सल वारस म्हणून सरदार आणि जनतेची सहानुभूती बाजीरावाच्या बाजूने होती. नानांनी बाजीरावास पुण्यास आणून त्याच्याबरोबर जुळते घेऊन राज्यकारभार करणे हा योग्य मार्ग सोडून आपले स्थान अबाधित राखण्यासाठी आपल्या नियंत्रणात राहणारा दत्तक पेशवाईच्या गादीवर बसवण्याची धडपड चालू केली. त्यांना लोकांचा पाठिंबा मिळेना. बाजीरावास कळून चुकले की नाना आपल्यास पेशवा बनू देणार नाहीत. त्याने मग शिंद्यांशी गुप्त करार केला की मला पुण्यास पेशवा बनवा म्हणजे मी तुम्हास दीड कोट रुपये देतो. इकडे नानास कळून चुकले की बाजीरावास आणल्याशिवाय पेशवाईचा गुंता सुटणार नाही. म्हणून शेवटी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी बाजीरावास पुण्यास आणले. बाजीरावाकडे शिंद्यास देण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसे नव्हते. विल्यम टोन हा यावेळी १७९६ मध्ये बाजीरावापाशी होता. त्याने लिहून ठेवले आहे- 'मध्यंतरीच्या भानगडी चार-पाच महिने चालू असतानाच नानाने सरकारी खजिन्यातील सर्व मत्ता युक्तीने लांबवली होती. निदान २० कोट तरी रोख रक्कम खजिन्यात असावी असा त्या वेळी जाणत्या मंडळींचा तर्क होता'. बाजीरावाने शिंद्यास म्हणावे की मला परशुरामभाऊ यांनी आणले, तुम्ही नव्हे असा प्रकार सुरु झाला. म्हणून शिंदे म्हणू लागले की आम्हास परवानगी द्या, आम्ही नानाकडून पैसे वसूल करतो. महादजी शिंदे यांच्या बायकांनी त्यांचे वारस दौलतराव शिंदे यांच्यावर मारेकरी घातले. या सर्व घोळात कित्येक महिने निघून गेले. इकडे अहिल्याबाईनंतर होळकरांचे वारस तुकोजी होळकर हे आजारी होते. त्यांच्या मृत्यूनंतर थोरला मुलगा काशीराव हा सैनिकी मोहीम करण्यास शारीरिकदृष्ट्या असमर्थ होता, पण त्याचे तीन भाऊ मल्हारराव, विठोजी आणि यशवंतराव हे शूर होते. तुकोजी होळकरांनी मृत्यूसमयी काशीरावास वारस नेमले. काशीरावास दौलतराव शिंदे यांनी जवळ केले, त्यामुळे त्याच्या बाकी तीन भावाना भीती पडली की दौलतराव शिंदे होळकरांची दौलत काशीरावास गुंडाळून त्याच्याकरवी घशात घालतील. अशातच काशीरावाच्या संमतीने शिंद्यानी मल्हारराव होळकरावर हल्ला करून त्यास ठार मारले. त्यामुळे त्याचे दोन भाऊ शिंद्यांविरुद्ध बंड करून उठले. या आपसातल्या भांडणात नाना अथवा बाजीराव यांनी मध्यस्ती करून वेळीच हा संहार थांबवला नाही. शिंद्यांच्या फौजेच्या ताब्यात बाजीराव असल्याने शिंदे म्हणतील तसा कारभार चालू झाला. विठोजी होळकरास हत्तीच्या पायी देऊन मारण्यात आले. जनरल वेलस्ली pic2 होळकरांचा आपण सहज पराभव करू हा शिंद्यांचा अंदाज खोटा ठरवत यशवंतराव होळकराने शिंद्यांचा पराभव केला आणि पुणे लुटले. या वेळी बाजीरावास शिंद्यांचा आश्रय राहिला नाही आणि होळकरावर विश्वास ठेवता आला नाही. त्यामुळे त्याने मुंबईकर इंग्रजांची मदत मागवली. त्यानुसार आर्थर वेल्सली याने दक्षिणेत आणि जनरल लेक याने उत्तरेत अशी एकाच वेळी मोहीम सुरु केली. १८०३ साली भारताच्या इतिहासातले एक निर्णायक वर्ष सुरु झाले. मराठा तोफखाना (असईच्या लढाईत) - विकिपीडियावरून साभार pic3 बाजीराव जरी इंग्रजांच्या ताब्यात असला तरी त्याचे शिंद्यांशी जवळचे संबंध होते. बाजीरावाने शिंदे आणि नागपूरकर भोसले याना एकत्र येऊन इंग्रजांचा पराभव करण्यास भरपूर प्रोत्साहन दिले. होळकराने सुरुवातीस या युद्धात सामील होण्यास नकार दिला, पण नंतर स्वतंत्र लढाई दिली. या पद्धतीने सर्व मराठा सैन्य एका बाजूस तर इंग्रज, निझाम आणि थोडे मराठा सरदार दुसऱ्या बाजूस असा निर्णायक लढा सुरु झाला. मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य या वेळी इंग्रजांपेक्षा वरचढ होते ते कसे ते खालील यादीत दिसते. दक्षिणेत इंग्रज फौज (जनरल वेल्सली) एकूण सुमारे ५०,००० - ८,००० स्टुअर्ट - ८,००० स्वतः वेल्सली - ९,००० स्टीव्हन्सन - ८,००० कॅपिटॉन मरे (सुरत) - १५,००० सखो रुद्र, निजामाकडून उत्तरेत इंग्रज फौज (जनरल लेक) एकूण सुमारे २०,००० - ११,००० कानपुर येथे - ३,५०० अलाहाबाद - ५,५०० कटक, ओरिसा शिंद्यांची फौज उत्तरेत - १७,००० पायदळ २०,००० स्वार (जनरल पेरॉन) शिंद्यांची फौज दक्षिणेत - ५,००० पायदळ - ८,००० गोपाळराव - बाबा फडक्यांची हुजुरात नागपूरकर भोसल्यांची फौज - १०,००० ते २०,००० पायदळ - ३०,००० ते ४०,००० स्वार यशवंतराव होळकर - ७०,००० स्वार (हा आकडा तपासून पाहण्यास मला वेळ झाला नाही) असईची लढाई -विकिपीडियावरून साभार pic10 मराठ्यांच्या हालचाली सावध, धीमेपणाने होत होत्या. दौलतरावाने प्रथम भोसले येऊन मिळण्याची वाट पाहिली. नंतर होळकरांबरोबर वाटाघाटी बराच काळ चालल्या. याउलट जनरल वेलस्ली हा त्यावेळी नवीन सेनापती होता. त्याला स्वतःची प्रगती करून घेण्याची ही संधी मिळाली होती. त्यामुळे त्याने मोठ्या तडफेने आक्रमक हालचाली केल्या. पुढं वेलस्लीने नेपोलियनचा वॉटरलू येथे पराभव करून फार कीर्ती मिळवली. नंतर वेल्सलीस आयुष्यातील सर्वात अवघड लढाईचे नाव विचारले असता त्याने असईच्या लढाईचे नाव घेतले. ही लढाई कशी घडली ते थोडक्यात पाहूया (विस्तृत मजकूर विकिपीडियावर आहे - खाली पहा) जनरल वेलस्ली स्वतः लिहितो की बचावात्मक हालचाली करून ही लढाई दीर्घकाळ लांबवण्यापेक्षा मी ठरवले की सुरुवातीपासूनच आक्रमक हालचाली करायच्या. शिंदे आणि भोसले निजामाच्या राज्यात घुसून लुटालूट करण्याच्या बेतात होते. वेलस्लीने स्टीव्हन्सनला जाफराबाद इथे ठेवले आणि स्वतः नगरच्या किल्ल्यावर त्याने हल्ला केला. तोफांच्या माऱ्याने त्याने लगेच किल्ला घेतला आणि तिथे आपला पुरवठा करणारा बेस स्थापन केला. आपली पिछाडी सुरक्षित केल्यावर वेलस्ली उत्तरेस औरंगाबादच्या दिशेने गेला. दौलतरावाने या हालचाली पाहून आपला बेत बदलला आणि त्याच्या फौजा भोकरदन इथे आहेत अशी वेलस्लीला खबर मिळाली. त्याने स्टीव्हन्सनला भोकरदन इथे येण्याचे हुकूम दिले आणि इंग्रज फौज दोन बाजूनी मराठ्यांच्या शोधात भोकरदनच्या दिशेने गेल्या. असईची लढाई - विकिपीडियावरून साभार pic3 २३ सप्टेंबर १८०३ या दिवशी वेलस्लीला मराठी फौज भोकरदनऐवजी ६ मैल दूर असई इथे आढळली. दौलतराव आणि स्वार आधीच पुढच्या मुक्कामावर गेले होते. १०० तोफा आणि पायदळ मात्र केळणा नदी आणि जुई नदी यांच्यामध्ये नदीचा उतारावर तोफा डागून बसले होते. हे पायदळ निसटून जाईल या भीतीने वेलस्लीने स्टिव्हन्सनची वाट न पाहताच आपली कमी फौज असली तरी ८,००० लोकांनिशी अचानक हल्ला करण्याचा निश्चय केला. त्याचे वाटाडे सांगत होते की नदीस अजून दुसरा उतार नाही, पण वेलस्लीने दोन खेडी केळणा नदीच्या दोन काठांवर पाहिली आणि ठरवले की त्याच्यामध्ये नदीस उत्तर असलाच पाहिजे. इंग्रज इंजिनिअरने पाहणी करून तो उतार शोधून काढला आणि वेलस्ली मराठ्यांच्या डाव्या बाजूने नदीपार झाला. मराठयानी वेल्स्लीवर तोफांचा मारा केला आणि त्याचे कित्येक सैनिक तिथे ठार झाले. आपले राखीव घोडेस्वार आणि संगिनी (बायोनेट) यांचा हल्ला करून वेलस्लीने तोफा बंद पाडल्या, आणि उरलेल्या पायदळास पळवून लावले. वेलस्लीची इतकी हानी झाली होती की त्याने मराठ्यांचा पाठलाग केला नाही. तोफांचे आवाज ऐकून स्टीव्हन्सन संध्याकाळी वेल्सलीस जाऊन मिळाला. यानंतर काही महिन्यात वेलस्लीने शिंद्यांचा आणि भोसल्यांचा पाठलाग करून बऱ्हाणपूर येथे पराभव केला. जनरल लेक pic2 जनरल लेक याने उत्तरेत मोठे राजकारण तडीस नेले. दौलतरावाचा फ्रेंच सेनानी पेरॉन हा दौलतरावावर नाराज होता. त्यास हाताशी धरून मायदेशी सुखरूप पोचवण्याचे आश्वासन इंग्रजांनी दिले. वार्षिक ४० लक्ष रुपये तनखा देऊन पोसलेला एक उत्कृष्ट सेनानी मराठ्यांनी अश्या प्रकारे गमावला. लेक याने घोड्यांनी ओढून नेण्याजोगा हलता मोबाईल तोफखाना आपल्या सैन्यात जोडला. प्रत्येक तुकडीला अश्या काही तोफा वाटून दिल्या. अशी जय्यद तयारी केल्यावर त्याने अलिगढ इथल्या शिंद्यांच्या तळावर हल्ला केला. अलिगडचा किल्लाही त्याने घेतला. पुढे आग्रा आणि दिल्लीवरही त्याने विजय मिळवला. उत्तरेतल्या पराभवाची बातमी ऐकून दक्षिणेत दौलतरावास इंग्रजांबरोबर तह करून माघार घेणे भाग पडले. इंग्रजांनी अश्या रीतीने एका वर्षात मराठ्यांचा निर्णायक लष्करी पराभव केला आणि हे निश्चित केले की मराठ्यांमध्ये पुन्हा आपल्या पराभव करण्याजोगी लष्करी शक्ती उरता कामा नये. १८०३ या एक वर्षात दिल्ली आणि आग्र्याचा किल्ला, अलिगडचा तळ, महादजी शिंदे यांनी आग्र्यात सुरु केलेले बंदुकीचे आणि तोफांच्या दारूचे कारखाने, दिल्लीच्या बादशाहीवरचे नियंत्रण असे बरेच काही शिंद्यानी गमावले. भोसल्याना ओरिसा हा प्रांत सोडून द्यावा लागला. इंग्रज फौजा दापोडी आणि शिरूर येथे राहू लागल्या. त्यांना पुण्यावर हल्ला सहज शक्य झाला. पुढे बाजीरावाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला भक्कमपणे पाय रोवून बसलेल्या इंग्रजांना मात देता आली नाही. त्यामुळे १८०३ चा पराभव हा मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासात असा घातक ठरला. संदर्भ 1) सरदेसाई गो. स. रियासत उत्तर विभाग https://docs.google.com/file/d/0B_hbiN5lXt31bFp6Q0VmVVVZNlU/edit 2) पेशवाईच्या सावलीत - नारायण गोविंद चापेकर https://docs.google.com/file/d/0B0vwUrnl4_0dQlBfZTNaSFZzVGc/edit?usp=sharing 3) Fall of Mughal empire by Jadunath Sarkar https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251 4) Battle of Assaye – Wikipedia https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Assaye 5) मंत्रावेगळा, वाळल्या फुलात, चांदराती रंगल्या - ना स इनामदार 6) Baji Rao Ii And The East India Company 1796 1818 By Pratul Chandra Gupta https://archive.org/details/in.ernet.dli.2015.279666 7) The Last Peshwa And The English Commissioners 1818-1851 Pratul Chandra Gupta https://archive.org/details/in.ernet.dli.2015.81221 8) Nana Sahab Peshwa And The Fight For Freedom https://archive.org/details/in.ernet.dli.2015.147235
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
34115 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

कुठलाच धर्मग्रंथ चालणार नाही.

पगला गजोधर
Wed, 02/07/2018 - 18:14 नवीन
कुठलाच धर्मग्रंथ चालणार नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मग समान नागरी कायदा हा

श्रीगुरुजी
Wed, 02/07/2018 - 18:24 नवीन
मग समान नागरी कायदा हा धर्मातीत आहे का हिंदू धर्मग्रंथावर आधारीत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

....द्विराष्ट्रवाद (फक्त

माहितगार
Tue, 02/06/2018 - 22:16 नवीन
....द्विराष्ट्रवाद (फक्त हिंदूंसाठी वेगळा देश फक्त मुस्लिमांसाठी वेगळा) हा विचार फ्लॉप आहे ..
द्विराष्ट्रवाद या शब्दाचा अर्थच मूळी एका राष्ट्राचे आपापसात द्वंद्व असलेले अधिक भाग असा होतो , नाहीतर द्विराष्ट्रवाद या शब्दास प्रयोजनच शिल्लक राहीले नसते. कोणतेही आपापसातले द्वंद्व परकीयांना साहाय्यकारी होते. काश्मिर बद्दल उगाच काव काव करायची आणि काहीच मानवी आधिकार न देणार्‍या चीन पुढे नत मस्तक व्हायचे , आमेरीकेपुढे नत मस्तक व्हायचे आणि आपल्याच राष्ट्राचा मोठा भाऊ असलेल्या भारतालाही महासत्तांशी तडजोड करावयास लावायचे यातून पाकीस्तान ने काय साधले. भविष्यातील काळाची रेष ज्यांनी वेळीच संपूर्ण यादवी केली नाही ते, ते ज्यांनी अर्धवट तडजोडी केल्या त्या सगळ्याच बाजूंपुढे प्रश्न चिन्ह उपस्थित करेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

...

manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 19:04 नवीन
द्विराष्ट्राच्या नावाने फक्त काँग्रेसलाच का जबाबदार धरतात ? १९४० ला मुस्लिम लीगने मांडलेल्या द्विराष्ट्राला आधी काँग्रेसनेच नकार दिला होता. नंतर हिंदू महासभा ( साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर ) आणि काँग्रेस या दोघानीही त्याला मान्यता दिली होती , हे का नाही सांगितले जात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

स्वतःची फसवणूक

चौकस२१२
Mon, 03/30/2020 - 04:52 नवीन
हे जरी खरे असले आणि आज सुद्धा दोन मुसलमान सुद्धा एकमेकांशी भांडताना दिसत असले तरी द्विराष्ट्रवाद हा मुसलमानांच्या दृवष्टने "जिथे इस्लामी जनता तिथे इस्लामी कायदा " या तत्त्वप्रणाली नुसार होत आणि आहे ... दोन हिंदू एकमेकात भांडले म्हणू हे सिद्ध होत नाही कि "वैश्विक इस्लाम " हि कल्पना मुसलमानांच्या डोक्यातून गेली आहे किंवा जाईल .. एक साधी गोष्ट आहे " ज्या धर्माच्या अनुयायांना "धर्म आधी आणि देश वैगरे नंतर" हे पक्कं पटलेले आहे ते, आणि ज्या धर्माचं लोकांना "आधी देश आणि मग धर्म हे "चालेल " अश्या दोन धर्माचे अनुयायी एक ठिकाणी असले कि हे द्वंद्वा होणारच.. हे नाकारून स्वतःची फसवणूक करून घेण्यात आपण हिंदू अग्रगणी ...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

जबरदस्त माहितीपूर्ण लेख

आनंदयात्री
Tue, 02/06/2018 - 21:05 नवीन
या जबरदस्त माहितीपूर्ण लेखाबद्दल अनेक धन्यवाद. या लेखातून झालेले आकलन असे कि, त्या काळी दुसऱ्या बाजीरावासमोर मराठेशाहीच्या चार आधारभूत स्तंभांना एकत्र ठेवण्याचे आव्हान होते, मुळातच नेतृत्वगुण नसल्याने किंवा जडणघडणीच्या वयात तो कमावण्याचा वाव न मिळाल्याने ते आव्हान त्यांना पेलता आले नाही आणि हि वाताहत झाली.
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम माहिती

नीलकांत
Tue, 02/06/2018 - 21:18 नवीन
तुम्ही इतिहासाच्या अतिशय कमी चर्चील्या जाणार्‍या कालखंडावर उत्तम माहिती देत आहात. तुमचे लेखन खुपच स्पष्ट व सुलभ आहे. ही लेखमाला अशीच चालू द्या. भारतभर पसरलेली मराठेशाही कशी अस्ताला गेली हे सुध्दा आपल्याला अगदी स्पष्ट ठाऊक असलंच पाहिजे. उत्तम लेखमालेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+१ आणि मुख्य म्हणजे

माहितगार
Tue, 02/06/2018 - 21:28 नवीन
+१ आणि मुख्य म्हणजे अभ्यासपूर्ण , वेगळी पण रोचक आणि उल्लेखनीय मांडणी सोबतच शक्य तेवढ्या तटस्थतेने .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

माहितीपूर्ण लेख

निशाचर
Tue, 02/06/2018 - 21:34 नवीन
माहितीपूर्ण लेख
  • Log in or register to post comments

.....एक गोष्ट दिसते की दौलतीस

माहितगार
Tue, 02/06/2018 - 21:38 नवीन
.....एक गोष्ट दिसते की दौलतीस (मग ती ....., ......, .....अशी कोणतीही असो) पुढचा वंशपरंपरागत वारस कोण होणार ....
दक्षिण आशियाचे वंश परंपरा प्रेम अद्यापही जोरात आहे. जनता वंश परंपरेवर प्रेम करते म्हणल्यावर ओघानेच वंशीयांना आणि त्यांच्या भोवतालच्यांना आपापसात खेळता येते.
  • Log in or register to post comments

छ.शिवाजी आणि पेशवे यांनी

माहितगार
Tue, 02/06/2018 - 22:03 नवीन
छ.शिवाजी आणि पेशवे यांनी वापरलेल्या लूटीत एक महत्वाचा फरक रयत या घटकाकडे बघण्याच्या दृष्टीकोणात पडलेला फरक ही असावा. आधी रयतेच हित केंद्र स्थानी होते त्याची जागा सरंजाम शहा आणि त्यांनी उद्युक्त केलेल्या लुटारुं टोळ्यांनी घेतली. जेव्हा अधिक पैशाचे अमिष नसते तेव्हा केवळ प्रेम कामाशी येते आणि तो प्रेमाचा आधिकार मराठी राजवटीने कुठेतरी गमावला गेला होता का अशी शंका वाटते . नागपूरकर भोसल्यांनी बंगालात केलेल्या लूटींच्या बंगाली जनतेच्या सर्वच आठवणी कदाचित स्पृहणीय नसाव्यात हे पेशव्यांनीही केले पण मराठी इतिहासकार ही बाजू मांडताना सर्वसाधारण पणे कचरतात का अशी शंका वाटते. चुभूदेघे. संदर्भ बार्गी
  • Log in or register to post comments

सहमत आहे.. हे साधारण दुसऱ्या

आनन्दा
Tue, 02/06/2018 - 22:32 नवीन
सहमत आहे.. हे साधारण दुसऱ्या पानिपतच्या वेळेस सुरू झालं बहुतेक, दिल्लीचे तख्त देखील फोडायची गरज खरे तर नव्हती असे ऐकून आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अशा लेखांसाठीच इथे रोज चक्कर

वीणा३
Tue, 02/06/2018 - 22:07 नवीन
अशा लेखांसाठीच इथे रोज चक्कर मारते. काही ना काही सुंदर हाती लागतंच. अतिशय धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

संदर्भासहित लिहलेला उत्तम लेख

अमितदादा
Wed, 02/07/2018 - 01:16 नवीन
संदर्भासहित लिहलेला उत्तम लेख... असे आणखी लेख येऊद्यात.
  • Log in or register to post comments

छान लेख. पुभाप्र

चावटमेला
Wed, 02/07/2018 - 02:31 नवीन
छान लेख. पुभाप्र
  • Log in or register to post comments

अशा लेखांनी

तिमा
Wed, 02/07/2018 - 02:50 नवीन
अशा लेखांनी रोज मिपावर यावेसे वाटते. लिहित रहा. दुसर्‍या बाजीरावाबद्दल एवढी तपशीलवार माहिती नव्हती.
  • Log in or register to post comments

सखोल माहिती . उत्तर पेशवाईत

सिरुसेरि
Wed, 02/07/2018 - 09:23 नवीन
सखोल माहिती . उत्तर पेशवाईत फंदफितुरीचे प्रमाण वाढले होते . शनीवार वाड्यातल्या बातम्या , संगमावरच्या अल्पिष्टन साहेबाला रोज हेरांमार्फत कळत असत .
  • Log in or register to post comments

"फितुरी"

चौकस२१२
Mon, 03/30/2020 - 04:55 नवीन
यावरून भन्साळींच्या चित्रपटासाठी केलेले पण चित्रपटात नसलेले "फितुरी" या गाण्याच्या शब्दाचे बोल आठवले ....खरंच भन्साळीची कल्पकता आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

बाळाजी नातूने अलुपिष्टन

श्रीगुरुजी
Wed, 02/07/2018 - 14:58 नवीन
बाळाजी नातूने अलुपिष्टन साहेबाशी सूत जमवून पेशव्यांशी फितुरी केली होती यावर पण लिहा.
  • Log in or register to post comments

हिंदुस्थानातली कपड्यांची उपलब्धी

गामा पैलवान
Wed, 02/07/2018 - 19:12 नवीन
बबन ताम्बे,
पानिपतावर मराठी फौज उत्तरेच्या हाडे गोठविणार्‍या थंडीत गारठली, त्याचे कारण हेही असावे, नाही का?
उबदार कपड्यांचा पुरवठा कमी पडला असू शकेल. मात्र भारतात कपड्यांचं बऱ्यापैकी वैपुल्य असावं. अन्यथा घरातल्या बायका मध्ययुगीन युरोपप्रमाणे सूत कातण्याच्या कामाला जुंपल्या गेल्या http://www.sleuthsayers.org/2013/06/the-3500-shirt-history-lesson-in.html असत्या. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

वैपुल्य असेल ..

बबन ताम्बे
गुरुवार, 02/08/2018 - 07:28 नवीन
गा. पै. कपड्यांचे वैपुल्य असू शकेल. पण त्या वेळच्या सामान्य माणसांना अंगभर कपडे मिळणे दुरापास्त होते असे चित्रांवरून दिसते. इनफँक्ट जुने फोटो जरी बघितले तरी त्यात सामान्य जनता अशीच उघडी आणि पोट खपाटीला गेलेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मावळे आणि पठाण मोगल ई

पैसा
गुरुवार, 02/08/2018 - 15:39 नवीन
मावळे, पठाण मोगल इ सैनिक अंगरखे व मांडचोळणा घातलेले दिसतात. महाराष्ट्रातील घोडे बाळगणारे सैनिक अंगभर कपडे घालून दिसतात. वरचे चित्र उत्तर भारतीय आणि गरीब तसेच कमी सामाजिक दर्जा असलेल्या लोकांचे असावे. १९ व्या शतकाची सुरुवात होण्यापूर्वीच अनेक आक्रमकांनी लूट करून भारतातील सुबत्ता कमी व्हायची सुरुवात झालेली होती. बंगाल मधील विणकरांचे हाल बंगाल इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सुरू झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

तसेही असेल.

बबन ताम्बे
Fri, 02/09/2018 - 14:19 नवीन
जुन्या (ब्रिटीशकालीन) फोटोंमधे हडकुळी जनता दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पगला गजोधर,

गामा पैलवान
Wed, 02/07/2018 - 19:16 नवीन
पगला गजोधर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला . १.
कुण्या एकाच धर्माचा हा देश नव्हे, दुसऱ्या धर्माचे नागरिक या देशात भाडेकरू नव्हेत, त्यांचाही देशावर सर्वासारखा हक्क आहे, त्यामुळे उठसुठ त्यांना पाकिस्तानात जा, म्हणणारे, द्विराष्ट्रवादाचे छुपे समर्थक होय,
पाकिस्तानातल्या लोकांनी वेगळा पाकिस्तान मागितला नव्हता. तरीही पाकिस्तान कसा काय उत्पन्न झाला? कारण की कोणीतरी तिथल्या मुस्लिमांवर पाकिस्तानी हे लेबल लावलं. असंच धर्मांध लेबल तुम्ही हिंदू लोकांवर चिकटवीत आहात. म्हणूनंच ज्यांना पाकिस्तानात जावंसं वाटतं त्यांना पाकिस्तानात जाऊ देणं याला मी उदारमतवाद मानतो. २.
फक्त हिंदु या देशाचे प्रथम नागरिक, व इतर धार्मिक दुय्यम नागरिक, असे विचारधन असलेले सुद्धा द्विराष्ट्रवादाचे समर्थक होय,
द्विराष्टवादाची सुरुवात ज्या सईद अहमद खानांनी केली त्यांनी ती धोंड सांभाळावी. तोपर्यंत हिंदूंच्या संरक्षणासाठी हिंदू या देशाचे प्रथम नागरिक मानले पाहिजेत. कारण की हिंदू या देशाला आई मानतात. ३.
समान नागरी कायदा, म्हणजे मॅजोरीटी हिंदू धर्म संस्कृती संकल्पना कवटाळलेले व इतर धर्मीयांवर ते लादले जाणारे नियम कायदे नव्हेत...
समान नागरी कायदा म्हणजे काय ते न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तुमच्या उपरोक्त मताची दखल घ्यायची गरज नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

खुपच व्यासंगी लेख आणि प्रतिसाद.

कलंत्री
गुरुवार, 02/08/2018 - 06:51 नवीन
या विषयाला अनूसरुन एखादा कट्टा व्हायलाच हवा.
  • Log in or register to post comments

अभ्यासपूर्ण आणि उत्तम लेख!

रुपी
गुरुवार, 02/08/2018 - 06:56 नवीन
अभ्यासपूर्ण आणि उत्तम लेख! इतका सखोल अभ्यास करुन निवडक पण महत्त्वाची माहिती देण्याचे तुमचे प्रयत्न स्तुत्य आहेत.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर चालू आहे मालिका,

उपेक्षित
गुरुवार, 02/08/2018 - 12:26 नवीन
अतिशय सुंदर चालू आहे मालिका, नवीन नवीन माहिती कळत आहे आम्हाला.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

एमी
गुरुवार, 02/08/2018 - 17:34 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

पाटीलभाऊ
गुरुवार, 02/08/2018 - 17:50 नवीन
उत्तम लेख
  • Log in or register to post comments

खूप सुंदर!! खूप आवडला लेख!

हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/08/2018 - 17:53 नवीन
खूप सुंदर!! खूप आवडला लेख!
  • Log in or register to post comments

एक गोष्ट इथे मुद्दाम नमूद

मनो
Fri, 02/09/2018 - 01:47 नवीन
एक गोष्ट इथे मुद्दाम नमूद करायला हवी. महाराष्ट्र एका बाबतीत फार भाग्यवान आहे. आपल्याकडे इतिहासाचे संशोधन जवळपास दीड शतकापासून चालू आहे. एकापेक्षा एक विद्वान आणि तेजस्वी असे संशोधक मराठ्यांच्या इतिहासावर काम करून गेले आहेत. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, द. ब. पारसनीस, जदुनाथ सरकार, शेजवलकर, सुरेंद्रनाथ सेन, सेतुमाधवराव पगडी, द. वा. पोतदार, अप्पासाहेब पवार, श. ना जोशी, ग. ह. खरे अशी कित्येक नावे आपल्याला सापडतील. कित्येकांनी अत्यंत खडतर परिस्थितीत गावोगाव भटकून कागद जमा केले. स्वतःच्या पैशानी प्रकाशन, छपाई करून पुस्तकात छापले. जदुनाथ सरकार हे फारसीचे विद्वान पण त्यांना मराठी येत नव्हते. प्रौढ वयात ते इतिहास संशोधनासाठी मराठी शिकले. ग. ह. खरर्यांच्या स्वतःच्या शब्दातच सांगायचे तर - 'आनंदाश्रमात जाऊन अंघोळ करायची आणि एका मित्राकडे घेऊन ठेवलेले दीड पावशेर दूध व बाजारातून आणलेला दोन पैशांचा पाव याचा फराळ करावयाचा आणि पुन्हा अभ्यास अथवा द्रव्योत्पादक काम यास लागवयाचे. रात्री थंडा फराळ करून आनंदाश्रम किंवा मंडळात झोपायचे असे सहा महिने मी काढले.' (पूर्ण मजकूर इथे वाचता येईल) ही परंपरा आजही चालू आहे. श्री. गजानन मेहेंदळे हे आमच्या सर्वांचे गुरुजी. आजही ७० वर्षांच्या वयात शिवचरित्राविषयी काही वाचले नाही असा त्यांचा दिवस जात नाही. मला फारसी इंटरनेटवर शिकण्यास अनेक अडचणी आल्या, त्या सर्व वेळी योग्य मार्ग दाखवण्याचे काम आपल्या संशोधन आणि लेखनातून वेळ काढून त्यांनी आवर्जून केले. मोडीचे तज्ञ् आणि वर्ग घेऊन कित्येक लोकांना शिकवणारे मंदार लवाटे सर आणि कोणत्याही किल्ल्याबद्दल तपशीलवार माहिती असणारे श्री. सचिन जोशी हे भारत इतिहास संशोधक मंडळाचे आधारस्तंभ आहेत. पेशवे दफ्तराबद्दल काहीही ज्यांना विचारता येते ते बलकवडे सर आणि शिलालेख इतर काही याबद्दल ज्यांना हक्काने विचारता येते ते महेश तेंडूलकर. मिसळ्पाववरचे 'बॅटमॅन' यांनी डच साधनावर भरपूर अभ्यास केला आहे आणि नवीन नोंदी उजेडात आणल्या आहेत. श्री मानसिंग कुमठेकर यांनी आजही जुनी दप्तरे धुंडाळून कागद शोधून काढले आहेत. त्यांचा एक फोटो इथे देतो म्हणजे त्या कामाचा अंदाज येईल. (मूळ लेख जरूर वाचा इथे) Image removed. या संशोधकांच्या अविरत धडपडीमुळे आपल्याला आज मूळ पत्रे आणि पुस्तके सहज मिळतात. त्यामुळे इतिहास संशोधनाचे श्रेय हे या संशोधकांना जाते. त्यांनी केलेल्या कामामुळे आज आपण हा इतिहास इतक्या सहज मांडू शकतो हे नमूद करणे म्हणून आवश्यक वाटले.
  • Log in or register to post comments

...

manguu@mail.com
Fri, 02/09/2018 - 09:37 नवीन
छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

श्री. मानसिंग कुमठेकर ह्यांचा

प्रचेतस
Fri, 02/09/2018 - 09:46 नवीन
श्री. मानसिंग कुमठेकर ह्यांचा संग्रह त्यांच्या घरीच ब्याट्याबरोबर पाहिला आहे. अजोड काम आहे ते. श्री. कुमठेकरांची मुलाखत बॅटमनने मिसळपावसाठी घेतली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

तुमचे आणि तुम्ही

बिटाकाका
Fri, 02/09/2018 - 12:00 नवीन
तुमचे आणि तुम्ही उल्लेखिलेल्या सर्वांचे या अद्वितीय कामासाठी मन:पूर्वक आभार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

इतिहासाचं प्रयोजन

गामा पैलवान
Fri, 02/09/2018 - 13:35 नवीन
मनो, इतिहासातून काहीतरी शिकायचं असतं. लोकांना शहाणं करायची तुमची सर्वांची तळमळ अभिमानास्पद व कौतुकपात्र आहे. रामदासस्वामींनी म्हंटल्याप्रमाणे 'शहाणे करोनी सोडावे, सकळ जन' याची प्रचीती तुम्हां सर्वांच्या कार्यातनं येतेय. त्याबद्दल धन्यवाद आणि कृतज्ञता ! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

मनोंनी उल्लेख केलेल्या इतिहास

पुंबा
Fri, 02/16/2018 - 15:53 नवीन
मनोंनी उल्लेख केलेल्या इतिहास संशोधकांचा अतीव आदर वाटतो. आपल्या समुहाची वाटचाल कशी झाली आहे याचा अभिनिवेशहीन धांडोळा घेण्याची आवश्यकता नेहमीच असते. पुर्वजांना आलेल्या अडचणी त्यांनी कश्या सोडवल्या, नक्की कोनत्या अंतःप्रेरणेने उत्कर्ष झाला, कोणत्या चुकांमुळे पतन झाले अश्या विभिन्न प्रश्नांचा मागोवा घेताना वर उल्लेखलेल्या महान वाटाड्यांचा आधार जनसमुहाला मोलाचा ठरतो हे निश्चित. पण.. आपण इतिहासातून खरेच काही शिकतो का? निदान आपल्याकडे इतिहास या विषयाखाली केवळ व्यक्तिपुजा, राजेरजवाड्यांच्या जंत्र्या नाही तर जातीय धार्मिक झुंडींचे लांगूलचालन एवढेच होताना दिसत नाही का? हजारो वर्षांच्या आपल्या इतिहासात कित्येक उत्कृष्ट कल्पना आपल्या पुर्वजांना सुचल्या व त्यांनी त्या अंमलात आणल्या. त्या कल्पनांपासून किती तरी शिकता येण्यासारखे आहे. पण तसे न होता इतिहासाचा दुरूपयोग आता भांडणांत ब्राऊनी पॉईंट्स मिळवण्यासाठी आणि जाती नाही तर धर्मांच्या झुंडी हाकण्यासाठीच केला जातो आहे ना आजकाल? माझ्या मते, इतिहास हा विषय महत्वाचा आहे तो त्यातून मिळू शकणार्‍या मूल्यांसाठी, आजच्या समस्यांना झुंजताना इतिहासातील कल्पनांपासून प्रेरणा घेण्यासाठी. आजकाल इतिहासाच्या नावाखाली आपण जे दिवे लावतो आहोत त्यावरून तरी या विषयाचा वीटच अधिक येतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

सुरेख...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/12/2018 - 19:09 नवीन
संदर्भाने केलेले लेखन आवडतेच आपले माहितीपूर्ण लेखन आवडले. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मनो आपल्या या धाग्यानंतर पुढील लढायांचे काय झाले...

योगविवेक
Sun, 03/29/2020 - 20:56 नवीन
स्वतःच्या पैशानी प्रकाशन, छपाई करून पुस्तकात छापले. जदुनाथ सरकार हे फारसीचे विद्वान पण त्यांना मराठी येत नव्हते. प्रौढ वयात ते इतिहास संशोधनासाठी मराठी शिकले. ग. ह. खरर्यांच्या स्वतःच्या शब्दातच सांगायचे तर - 'आनंदाश्रमात जाऊन अंघोळ करायची आणि एका मित्राकडे घेऊन ठेवलेले दीड पावशेर दूध व बाजारातून आणलेला दोन पैशांचा पाव याचा फराळ करावयाचा आणि पुन्हा अभ्यास अथवा द्रव्योत्पादक काम यास लागवयाचे. रात्री थंडा फराळ करून आनंदाश्रम किंवा मंडळात झोपायचे असे सहा महिने मी काढले.'
किती कष्टाचे काम आहे इतिहासाच्या महासागरात उतरून नीरक्षीर विवेक करायचे.... आता ओक काका लिहायला घेतात म्हणतात....
  • Log in or register to post comments

सध्या पानिपतच्या लढाईसंबंधी

मनो
Mon, 03/30/2020 - 07:56 नवीन
सध्या पानिपतच्या लढाईसंबंधी इंग्रजी पुस्तक पूर्ण केले आहे. त्यात या विषयाशी संबंधित साधारण ८० जुनी चित्रे आहेत. त्या चित्रांच्या परवानग्या घेणे चालू आहे. त्यातली अनेक प्रथमच प्रसिद्ध होत आहेत. गोविंदपंत बुंदेले यांच्या वाड्यातील चित्रे, पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतात आजही शिल्लक उरलेला अब्दालीच्या सैन्यातील जम्बुरक, मराठ्यांची छावणी कुठे असावी ते दाखवणारे नकाशे आणि युद्धाची जागा दाखवलेले नकाशे, फ्रेंच भाषेतील साधने, साधारण २५ फारसी पोथ्या अशी किती नावे सांगू. जूनपर्यंत पुस्तक प्रकाशित होईल अशी अपेक्षा होती, पण व्हायरसच्या मनात येईल त्याप्रमाणे होईल असं दिसतंय :) पुस्तकाचे मुखपृष्ठ, मी बनवलेले - पाहूया प्रकाशक हेच वापरतो की नवीन. Image removed. या लेखानंतर बहुतेक मी शनिवारवाडा आणि सिंहगडच्याबद्दल लिहिलं आहे. शनिवारवाडा http://www.misalpav.com/node/43325 सिंहगड (भाग १) http://www.misalpav.com/node/43804 सिंहगड (भाग २) http://www.misalpav.com/node/43853 रायगडचे रजपूत किल्लेदार (१६८९ ते १७०७) http://www.misalpav.com/node/45073 ओककाका लिहितील तर आनंदच आहे, त्यांनी फक्त थोडी मांडणी वेगळी करायला हवी होती असं वाटतं. त्या काळातले संशोधक वेगळे होते, त्यांनी प्रत्यक्ष कष्ट इतके घेतलेले आहेत की आजकाल आपण फार सुखात काम करतो असं म्हणावे लागते. अगदी २० वर्षांपूर्वीपर्यंत जी साधने दुरापास्त होती, ती आज आपल्याला online मिळतात (ब्रिटिश लायब्ररी, MET न्यूयॉर्क, BnF पॅरिस अशी कितीतरी अस्सल पहिल्या दर्जाची सामग्री इंटरनेटवर आहे). तरीही आजपण जुन्या संशोधकांच्या तोडीचं काम क्वचितच पाहायला मिळतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगविवेक

पुस्तकाच्या प्रतिक्षेत

तुषार काळभोर
Tue, 03/31/2020 - 06:54 नवीन
मुखपृष्ठ अतिशय उत्कृष्ट आहे. ती ढाल प्रचंड सुंदर आहे. तलवार आणि म्यान मराठी उत्तर भारतीय पद्धतीची (मुघल/इंदूर/ग्वाल्हेर) आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

ढाल मध्यप्रदेश अथवा

मनो
Tue, 03/31/2020 - 08:30 नवीन
ढाल मध्यप्रदेश अथवा उत्तरेकडील आहे, अठराव्या शतकातील, म्हणजे १७०० -१७९९ मधील. सध्या शेख नासर सबाह अल-अहमद अल-सबाह कलेक्शन (कुवैत नॅशनल म्युसिअम) इथे आहे. अजून एक चित्र इथे टाकतो आहे. अहमदशाह अब्दालीचे हे अप्रकाशित चित्र, खाली त्याच्या नाण्यावर असलेला फारसी मजकूर दिलेला आहे. त्याची नाणी काही वर्षांपूर्वी पुण्यात सापडली, त्याबद्दल एक हकीगत पुस्तकात देतो आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

धन्यवाद...

शशिकांत ओक
Mon, 03/30/2020 - 21:59 नवीन
ओककाका लिहितील तर आनंदच आहे, त्यांनी फक्त थोडी मांडणी वेगळी करायला हवी होती असं वाटतं.
योग विवेक तू उचकून काढून या धाग्यावरील माहिती उपलब्ध करून दिली. मनो यांनी मांडणी वेगळेपण असू दे असे सुचवले आहे. ते लक्षात ठेवून मांडणी करायला हवी... कै शि म परांजपे यांच्या पुस्तकाला मध्यवर्ती ठेवून यांनी केलेले लढाईचे वर्णन सादर करताना मनोंची मदत लागणार आहे. आशा करू कि ते आपला वेळ देतील.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा