मित्रांनो
डाएट या विषयावर सखोल चर्चा करण्याची इच्छा आहे. डाएट हा एक अत्यंत व्यापक विषय आहे वाढलेले वजन घटवण्यासाठी ची विशिष्ट आहारप्रणाली म्हणजे डाएट असा जो दृष्टीकोण आहे तो माझ्या मते फारच तोकडा असा आहे. सुदैवाने मला जरी वजन ही समस्या कधी आली नाही तरी अनेकांच्या आयुष्यात वाढलेले वजन हा मोठा गंभीर प्रश्न आहे याची जाणीव आहे. त्याचप्रमाणे वजन कमी करणे हा मुद्दा केंद्रात असल्यास ( व तो एक स्वतंत्र मुद्दाही अर्थातच फार महत्वाचाही असल्याने ) लोक डाएट साठी प्रेरीत होतात म्हणून आपणही तोच मुद्द्दा केंद्रीत ठेवुया मात्र त्या अनुषंगाने एकुण डाएट वर चर्चा होइल अशी अपेक्षा आहे. तर मला असे वाटते की एका एका भागात आपण एक पॉप्युलर डाएट घेऊन त्याची चिकित्सा केली तर नवे नवे पैलु समोर येतील. मी एक कच्चा खर्डा यासाठी Intermittent Fasting हा विषय घेऊन बनवला मात्र तो फारच विस्कळीत दिर्घ झाल्याने मलाच "पचला" नाही म्हणुन त्याएवजी मी विचार केला की फक्त विषय समोर ठेवतो व जसजसे प्रतिसाद येतील तशी एकेका मुद्द्यावर चर्चा करु या म्हणजे सर्वांनाच नवे पैलु उलगडतील व मजाही येइल.
तर बेसीक ओपनींग देण्याचा प्रयत्न करतो. सध्या Intermittent Fasting महाराष्ट्रात डॉ. दिक्षीत डाएट या नावाने लोकप्रिय आहे. Fasting चे मुळ तसे फार जुने वा प्राचीन असे आहे. डॉक्टर दिक्षीत यांच्या अगोदर डॉ. श्रीकांत जिचकार यांनी महाराष्ट्रात सर्व प्रथम याची ओळख व प्रचार केलेला होता. त्यांच्या अकाली निधनाने मध्ये काही काळाची गॅप पडली नंतर डॉ, दिक्षीत यांनी त्यांचा विचार पुढे अधिक प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचवला. तर यामध्ये डॉ. दिक्षीत Intermittent Fasting च्या अनेक पॅटर्न पैकी केवळ एक ( याचे इतर व्हर्जन्स आपल्याकडे अजिबात चर्चेत नसतात असा अनुभव आहे किंबुहना हे एक व्हर्जन म्हणजेच सर्व काही असाही समज आहे ) १६/८ व्हर्जन वापरताअधिक यामध्येही डॉ. दिक्षीत १६/८ असा स्पेसीफिक आग्रह धरत नाहीत किंवा ही टाइम फ्रेम इनसीस्ट करत नाहीत. ते दोन जेवणाच्या सर्वसाधारण जेव्हा अधिक भुक लागते त्या ठरवुन घेण्यास सांगतात त्यामध्ये म्हणजे दिवसातुन दोन वेळेसच फक्त जेवण करावे त्यानंतर इतर वेळेत पुर्ण उपाशी रहावे असे सांगितले जाते. इतर मधल्या वेळात भुक लागल्यास डॉ. दिक्षीत काही ठराविक खाण्यासाठी परवानगी देतात. त्यात प्रामुख्याने साखरविरहीत ब्लॅक टी / ब्लॅक कॉफी , ताक , नारळपाणी एक टोमॅटो आणी अर्थातच पाणी दिवसभर. यामागचा तर्क असा आहे की या गोष्टींनी शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढत नाही म्हणुन या गोष्टी घेण्याची परवानगी आहे. संपुर्ण डाएट चा पाया शरीरातील इन्सुलीनची पातळी नियंत्रणात ठेवणे हा आहे. त्याचबरोबर ग्लुकॉगॉन या हार्मोन ला सक्रीय करण्यास वाव देऊन त्याद्वारे अनावश्यक मेदाचे फॅट चे ज्वलन करणे. व इतर बरेच असे आहे. शरीरात इन्सुलीन ची वाढलेली अनावश्यक पातळी व त्यामुळे निर्माण झालेला इन्सुलिन रेसीस्टन्स हा लट्ठपणासहीत अनेक रोगांचे मुळ आहे. यात एक निरिक्षण असे आहे की डॉ.दिक्षीत हे मुळ Intermittent Fasting चे " अतीसुलभीकरण" करतात त्यामानाने डॉ. श्रीकांत जिचकार हे अतीशय व्यवस्थित शास्त्रशुद्ध व्यापक मांडणी करत होते असे त्यांचे व डॉ. दिक्षीतांचे युट्युब वरील सर्व व्हिडीओ बघितल्यानंतरचे माझे मत आहे. जिचकारांचा प्लॅन व्यापक असा होता. दुसरी एक बाब डॉ. दिक्षीतांच्या अगोदरच सुलभ डाएट चे लोक त्याहुन अधिक सुलभीकरण करत त्यांच्या एकुण हेतुला व एकुण Intermittent Fasting च्या थेअरीची पार वाट लावुन काही भलतेच अंमलात आणतात. आश्चर्य म्हणजे कोणी Intermittent Fasting हा शब्च च वापरत नाहीत. स्वतः डॉ. दिक्षीत यांच्या तोंडुन हा शब्द ऐक्ल्याचे स्मरत नाही. म्हणजे जर डॉ. दिक्षीत यांची प्रणाली ( जी मुळात त्यांची नाही हे ते स्वतः ही मान्य करतात ) समजुन घ्यावयाची असेल तर मुळात हा विषय Intemittent Fasting या नावाने प्रचलित आहे हे समजुन घ्यायला हवे. बरेच मंडळींना माहीत असेलही पण इतर बरेच दिक्षीत डाएट म्हणून ओळखतात म्हणून हे सांगावेसे वाटते . म्हणजे या दिशेने जालावर शोधल्यास सखोल जाता येइल यासाठी हे म्हणतोय.
तर मित्रांनो तुमचे काय म्हणणे आहे तुमचा काय अनुभव आहे ?
प्रतिक्रिया
26 Mar 2020 - 9:50 pm | पद्मावति
मी १६/८ नियम गेले सहा महिने अंगिकारला आहे. रात्री समजा आठला जेवण संपलं कि त्यानंतर सोळा तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी १२ ला लंच. अधेमधे मग काही नाही. सकाळचा चहा आणि कॉफी पण बिन दुधाची आणि अर्थात बिन साखरेची.
मला सकाळी नाश्ता नाही पण सकाळी एक कप भर दुधाची कॉफी प्यायची सवय होती. तेव्हडे कॅफिन गेल्याशिवाय तरतरी याची नाही, डोकं दुखायचं आणि कपभर दुधावर लंचपर्यंत आरामात वेळ निघायचा. पण तेव्हढेही नाही म्हंटल्यावर मात्र मी साशंक झाले. ठरविले तर मी कुठलंही डायट करू शकते पण सकाळचे कॅफिन नाही आणि दूध नाही म्हंटल्यावर मला वाटले कि भूक धरवेल कि नाही.
एकदा फास्टिंगची सुरुवात झाली आणि काही आठवड्यात या रुटीनची सवय झाली. आता सोळा तासांचे काहीही वाटत नाही. फायदा असा झाला कि पूर्वी वजनाच्या काट्यांचे नेहमी दडपण यायचे. सणासुदीच्या दिवसांत वजन वाढायचे पण या रुटीनची सवय झाल्यापासून सुरुवातीला वजन कमी झाले आणि नंतर आता काही दिवस खाण्यापिण्याचे लाड केले तरी वजन अजिबात वाढत नाही. अर्थात बाकी चालण्याचा व्यायाम, माफक जिम हे जोडीला आवश्यक आहे. व्यायाम न करता केवळ या फास्टिंगने वजन कमी होण्याचा ( वजन होईलही कमी काही दिवस) आणि मुख्य म्हणजे ते मेंटेन्ड राहण्याचा रेट कंसिस्टन्ट असेल कि नाही माहित नाही. पण १६/८ सुरु केल्यापासून वजनाचे टेन्शन गेलंय हे नक्की( टच वूड)
26 Mar 2020 - 11:03 pm | मारवा
व्यायाम न करता केवळ या फास्टिंगने वजन कमी होण्याचा ( वजन होईलही कमी काही दिवस) आणि मुख्य म्हणजे ते मेंटेन्ड राहण्याचा रेट कंसिस्टन्ट असेल कि नाही माहित नाही. पण १६/८ सुरु केल्यापासून वजनाचे टेन्शन गेलंय हे नक्की( टच वूड)
27 Mar 2020 - 10:38 am | आनन्दा
जगातल्या सर्व डाएट च्या पद्धतीमध्ये मनावर काहीतरी ताबा ठेवावा लागतो.. आणि बहुतांश वेळेस हा ताबा ठेवणे आपल्याला सामान्य माणुस म्हणून खुप कठीण जाते.
तो ताबा सुटला की लठ्ठपणा दुप्पट जोमाने उसळून येतो.
परंतु मला अशी एक पद्धत मिळाली की जी एक सवय म्हणून शरीरात आणि मनात झिरपत जाते. त्यामुळे त्यात मनावर ताबा ठेवणे हे प्रयोजनच राहत नाही.
मिपावरच चामुंडराय यांचा एक लेख आहे https://www.misalpav.com/node/43881
माझे बिघडलेले पोट सुधरवण्यासाठी मी हा उपाय अंमलात आणला, पण साइड एफेक्त म्हणून मझे वजन १० किलो कमी झाले. आणि एक आरोग्यदायी सवय कायमचि जडली ते वेगळे.
आता मी माझी सामान्य जीवनशैली जगत असुन सुद्धा माझे वजन वाढत नाही, कारण ही सवय सब कोन्शस मनात गेली आहे.
27 Mar 2020 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉ.जिचकारांचे वाट्सॅपवर ढकलपत्र ऐकलेले पण डॉ.दिक्षित सोपे वाटले होते. काही दिवस दोन वेळा जेवलो. पण भूक लागते.
सातत्य नसणे ही मुख्य अडचण असते. आणि सारखं खात राहावे वाटणे हा हावरटपणा ही एक अडचण असते.
वजन तर मलाही कमी करायचं आहे, मनात येईल तेव्हा वॉक. आणि वजन वाढणे चांगलं नाही असे वाटले की आहार कमी करणे.
-दिलीप बिरुटे
27 May 2020 - 2:29 pm | तुषार काळभोर
मी ३ जानेवारी २०२० ला ९२ किलो होतो. २ एप्रिलला ८४ किलो होतो. आज ८१ किलो आहे. २०२० संपेपर्यंत ७५ पर्यंत जाण्याचा संकल्प आहे. (उंची १८३ सेमी)
काय केलं -
पाणी मी आधीपण भरपूर प्यायचो. (तीन लिटर दिवसाला) आता अजून जास्त पितो (चार लिटर).
बाहेरचं खाणं - शून्य केलं. आज १४७ दिवस झाले, मी हॉटेल मधला एकही पदार्थ खालेल्ला नाही.
बेकरी - शून्य. १४७ दिवस - नो बिस्कीट, नो ब्रेड-पाव, नो खारी-बटर-टोस्ट
तळलेले पदार्थ - शून्य. अक्षय्य तृतियेला पहिल्यांदा भजी (खरं तर एक भजं) खाल्ली. त्यानंतर बर्याचदा पापड (घरी बनवलेले), कुर्ड्या, खारावडे झाले.
चहा - शून्य. १४७ दिवस. काही वेळा बिनादुधा-साखरेचा चहा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यापेक्षा न घेतलेला बरा.
कृत्रिम गोड पदार्थ - साखर असलेले - शून्य. घरी केलेला केक - मी अर्धा चमचा खाल्ला होता फक्त. चहा, सरबत नाही.
वरचं खाणं - शेंगदाणे - फुटाणे - शेव - चुरमुरे - कापण्या - शून्य.
मांसाहार - शून्य (आधी आठवड्यातनं एकदा चिकन/मटण आणि एकदा अंडं खाणं व्हायचं. आणि वशाट असलं की एक चपाती + एक वाटी भात एक्स्ट्रा खाल्ला जातो)
भाजीतलं तेलाचं प्रमाण - नाममात्र. आता भाजीवर तर्री नसते.
पालेभाज्या - आधी शून्य खायचो. आता आठवड्यात किमान पाचवेळा खातो.
जेवण पोट भरायच्या आधी थांबवणं. मी जेव्हा जेवण थांबवतो त्यावेळी अजून एक चपाती/एक वाटी भात खाता येईल, एवढी भूक असते. ती तशीच राहू देतो.
लॉकडाऊनच्या आधी रोज अर्धा लिटर ताक प्यायचो, रोज काकडी- टॉमॅटो खायचो (चार वाजताच्या भुकेला पर्याय. नगण्या कॅलरीज). ते आता बंद झालंय.
हे सगळं 'बळंच' नाही करायचं. या खाण्यात मनापासून समाधान मानायचं. बळंच केलं तर, स्वतःवर ताबा वगैरे ठेवावा लागतो. या गोष्टी आवडून घेतल्या की त्या आपोआप होतात.
यातील काही गोष्टी सर्वांना बंद किंवा कमी नक्की करता येतील - उदा चहा, साखर, हॉटेल, बेकरीवरचं खाणं बंद करणं.
16 Jun 2020 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा एकदा प्रयत्न करतो. दोन वेळेस जेवतो. पाहतो प्रयोग करुन.
-दिलीप बिरुटे
27 Mar 2020 - 5:41 pm | डॉ श्रीहास
Intermittent Fasting
माझा जिव्हाळ्याचा विषय !!
ह्यावर मी तासन् तास बोलू शकतो ....
अन्नग्रहण >> ईन्शुलिन वाढ >>यकृतातील साखर जमा आणि चरबी उत्पादन वाढ
उपास >> ईन्शुलिन घट >>यकृतातील साखर आणि चरबीत घट
IF चे प्रकार
१.१६:८ म्हणजे १६ तास उपाशी राहणे आणि ८ तासात २ किंवा ३ वेळा आहार
२.२०:४
३.OMAD(One meal a day)/एकभुक्त
४.४८ तास सलग उपास
५.७२ तास !!
का करावं ????
जवळ जवळ प्रत्येक धर्मात उपास करण्याबद्दल सांगीतलं गेलं आहेच परंतू का सांगीतलं असावं ह्यावर बहूतांशी कोणीही विचार केलेला नसतो !!
उपाशी राहल्यानंतर तुमच्या पचनसंस्थेला आराम तर मिळतोच परंतू ग्लायकोजन (ह्या रुपात ग्लुकोज साठवलेलं असतं) १२ तासांनी संपल्यावर चरबीचा वापर सुरू होतो (ketosis) आणि ईथे खरी मजा सुरू होते
१.ketosis द्वारे किटोन्स तयार होतात जे मेंदूमध्ये BDNF (Brainderived neurotrophic factor) ज्यामुळे मेंदूच्या पेशींची वाढ आणि संतुलन/मेन्टेनन्स होतो, शिवाय स्मरणशक्ती वाढते हे विविध स्टडीमध्ये लक्षात आलेलं आहे.
२.वजन कमी होतं, त्याच बरोबर बिपी (उच्च रक्तदाब) आटोक्यात येण्यास सुरवात होते.
३.रक्तातली साखर , चरबी नियंत्रणात येते.
४.ग्लुकोजपेक्षा चरबी ३पट उष्मांक / कॅलरीज् जास्त देते.
त्यामुळे कमी खाऊन (जास्त कॅलरी) वजन घटवता येतं.
५.Oxidative stress & inflammation ( ह्यासाठी योग्य मराठी शब्द नाही सापडले )चं प्रमाण कमी होतं आणि ह्या दोन्ही गोष्टी जवळ जवळ सर्व आजारांसाठी कारणीभूत आहेत.
६.Autophagy बद्दल सांगीतलं गेलं आहेच पण दोन महत्वाचे फायदे कॅन्सर आणि अल्झायमर पासून संरक्षण !!
७.किटोजेनिक आहार किंवा IF मध्ये तुमच्या हृदय आणि मेंदूची काम करण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढते कारण हे दोन्ही अवयव कार्यशक्तीसाठी किटोन्स वर शिफ्ट झालेले असावेत.
गेल्या ६ महिन्यात स्वत: वजन १२ किलो कमी केलं आहे त्यासाठी आहारातील बदल ८०% आणि व्यायाम २०% हे सुत्र वापरलं आणि यशस्वी होत आहे (अजून १० ते १२ किलो कमी करणार आहे ).
मी IF चा OMAD हा प्रकार करतो , २४ तासात एकदाच जेवतो .
५-६ अंडी, २ भाकऱ्या,हिरवी पालेभाजी,चटणी, नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑईल, तुप असं सर्व एकाच जेवणात !!
महीन्याकाठी १.५ किलो तुप खाऊनही वजन कमी होतं आहे .... तुपाला विनाकारण बदनाम केलं गेलेलं आहे!!
त.टि.
IF ची सुरवात करतांना गहू आणि गोड (साखर,गुळ,मध) संपुर्ण सोडणं अत्यावश्यक आहे .... नंतर अधेमधे चवीत बदलासाठी घेऊ शकता.
गव्हाबद्दल अजून थोडं सांगू ईच्छितो
१.गव्हाचा Glycemic index (पोटात गेल्यावर रक्तातील साखर वाढवण्याची क्षमता ) साखरेपेक्षाही जास्त आहे !!!!
२.ज्वारी राखावी लागते गहू नाही .... पक्ष्यांना पण गहू नको असतो.
27 Mar 2020 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद माहितीपूर्ण. आवडला.
-दिलीप बिरुटे
27 Mar 2020 - 6:21 pm | प्रशांत
मोजक्या शब्दात प्रतिसाद दिला..
छान माहिती दिली
ते १६ / ८ चा प्रयत्न केला काहि दिवस पण काहि जमलं नाहि. साखर कमि केली मात्र.
27 Mar 2020 - 7:18 pm | मारवा
हेच सर्व सांगायच होत. सर मी सुद्धा ओएमएडी चा प्रयोग केला होता. यात सर्वात मोठी अडचण अशी आली होती की.
१- कव्हरेज समाधानकारक होत नसे म्हणजे कार्ब फॅट कव्हर होत असे पण मुख्यतः प्रोटीनची नेहमीच कमतरता होत असे. त्यात एक्स्ट्रीम वेट ट्रेनींग आठवड्यातुन तीन दिवस असल्याने प्रोटीन ची गरज अधिक वाढत असे. शेवटी जिम ट्रेनर च्या सल्ल्यावरुन मग ते थांबवल तो म्हणाला तुला प्रोटीन पुरेसे घेणं जमत नसेल तर वेट ट्रेनींग बंद करुन टाक. मग पुन्हा १६/८ वर आलो. आणि आठवड्यातुन एकदा २४ तासाचा एक बुस्टर फास्ट करतो.
२-व्हिटॅमिन्स मिनरल्स ही समाधानकारकरीत्या कव्हर होत नसे.
मग Thomas DeLauer च्या शिकवणीनुसार एक स्मॉल मिड मिल इटींग विंडो मध्ये घेऊन आणि झोन डाएट च्या वापराने परफेक्ट बॅलन्स साधु शकलो. नंतर एकदम झकास बॅलन्स झाला.
तुम्ही अगोदर बघितले नसल्यास याचे व्हिडीयोज जरुर बघा अत्यंत नविन विलक्षण माहीती तो इफा विषयी आणि एकुण न्युट्रीश्य्नन डाएट विषयी देत असतो.
https://www.youtube.com/playlist?list=PLFbLg_bIQgxBG0hlJ7t2VjbtYC53tSRso
तसेच डॉ. जॅसन फंग चे ओबेसीटी कोड हे या विषयाशी संबंधित सर्वात जबरदस्त पुस्तक मला आजपर्यंत वाटले एकवार जरुर वाचुन पहा तुम्हाला आवडेल नक्की.
https://www.amazon.com/Obesity-Code-Unlocking-Secrets-Weight/dp/B01MRKEO...
27 Mar 2020 - 9:03 pm | डॉ श्रीहास
THE ART AND SCIENCE OF LOW
CARBOHYDRATE
LIVING
Jeff S. Volek, PhD, RD
Stephen D. Phinney, MD, PhD
डॉ.फंग चे यूट्यूब वरचे जवळ जवळ सगळे व्हिडीओ बघण्यासारखे आहेत.
तुम्ही प्रोटीन्स ऐवजी फॅट्स वाढवा , वेट ट्रेनींग हळूहळू वाढवू शकालच ... प्रोटीन्स जर प्राणिज स्वरूपात घेतले तर सर्वोत्तम कारण शरीर प्राणिज रुपातले प्रोटीन्स जास्त चांगल्या प्रकारे शोषतं शिवाय डाळीमध्ये कार्ब्स जास्त जातात तेच टाळायचे आहेत... तुम्हाला ट्रायाथलाॅन ट्रेनींग करायचं असेल तर मात्र ६०:२०:२० (फॅट:प्रोटीन्स:कार्ब)असा आहार असू द्या.
मी १०० जोर , २०० बैठका ईतका व्यायाम नियमितपणे करू शकतोय, बदल म्हणून १०० बर्पीज् मारतो .... हे सगळं ६ महिन्यांपुर्वी शक्य नव्हतं !!
27 Mar 2020 - 9:40 pm | मारवा
मी Living the Low-Carb Life या Jonny Bowden च्या पुस्तकात सर्वात अगोदर यातुम्ही सांगितलेल्या लेखकाविषयी वाचलेले तेव्हापासुन उत्सुकता चाळवलेली होती. आता नक्कीच हे पुस्तक मी मिळवुन वाचणारच.
तुम्ही म्हणता त्यात फॅट ६० म्हणजे थोड धाडस होत नाही. म्हणजे कळतय पण वळत नाही. मी प्रोटीन्स धार्जिण असल्याने असेल कदाचित. पण अवघड वाटते मला थोडे.
मी इन्टेन्स वेट ट्रेनींग ३ च दिवस करतो व इतर ३ दिवस रनींग ( पुर्वी लाँग डिस्टन्स वर भर होता आता एच आय आय टी आणि अॅन्टी ग्रॅव्हीटी वर भर आहे ) यात एक आठवडा ३ दिवस रनींग व दुसरा आठवडा ३ दिवस "शॉक वर्कआउट " जो ट्रेनर देइल तो. मात्र वेट ट्रेनींग कन्सीस्टंट असते त्यात बदल नाही.
27 Mar 2020 - 10:22 pm | डॉ श्रीहास
१.जास्त प्रथिनं खाल्लं तर त्याचं रुपांतर ग्लुकोजमध्ये होतं, ह्याला ग्लुकोनियोजेनेसीस म्हणतात ... ह्यामुळे
जास्त प्रथिनं >>ग्लुकोज>>चरबी>> वजनवाढ
२.पण चरबी (तुप,नारळाचं तेल,बटर,olive oil) जर आहारात मुख्य कार्यशक्तीचा स्त्रोत म्हणून असला तर खूप कमी वेळा अन्नाची गरज भासते (गाडी पेट्रोल ऐवजी राॅकेट फ्यूएलवर चालवली तर ॲव्हरेज फार जास्त मिळतं) & उपाशी असतांनाही शरीर चरबीचा वापर करत राहतं व वजन आटोक्यात येईल किंवा कमी होईल.
३.काही हजार वर्षांपुर्वी माणूस कसा जगत होता ....दिवसाकाठी २०-२५ किमी भ्रमंती , मिळालं तर खायचं नाहीतर उपाशी राहायचं ...ह्याचा एकच अर्थ आहे ... गेली कित्येक शतकं आपण intermittent fasting करत आलो आहोत, समृद्ध शरीर आणि भरपूर जगण्यासाठी उपाशी राहणं अतिशय जरूरी आहे कारण आपली जनुकीय रचनाच तशी आहे.
सुवर्ण मध्य तुम्हालाच शोधायचा आहे ... किती उपाशी राहायचं / किती खायचं ... हाताची बोटं सारखी नसतात तसं प्रत्येकाची आहारशैली वेगळी असते , मी OMAD वर अगदी छान राहू शकतो तर तुम्ही 2MAD वर !!
28 Mar 2020 - 10:14 pm | चामुंडराय
मी IF चा OMAD हा प्रकार करतो , २४ तासात एकदाच जेवतो .
मी सध्या २MAD वर आहे. पुढे १MAD करायची इच्छा आहे परंतु अजूनही धीर होत नाही :)
हे २MAD सुरु करताना मनाने किती खुसपट काढली, किती विरोध केला, किती भीती दाखवली त्या बद्दल लिहीन कधीतरी.
9 Jun 2020 - 3:00 pm | डॉ श्रीहास
गेल्या आठवड्यात सलग ७२ तास (३ दिवस) कडक उपास केला , फक्त पाणी पिऊन राहीलो. Intermittent fasting मधला पुढचा टप्पा गाठला . हे करता येतं कळल्यामुळे स्वत:बद्दलचा अभिमान किंचीतसा वाढलाय;))
10 Jun 2020 - 5:11 am | चामुंडराय
व्वा कौतुकास्पद आहे.
तुम्ही स्वतः डॉक्टर असल्याने काय काय पॅरामीटर्स मॉनिटर केले?
तुमचे भुकेच्या संदर्भात अनुभव काय होते? कशा साठी केले?
काय फायदे जाणवले?
विस्तृत लिहा ह्या प्रयोगाबद्दल. .
10 Jun 2020 - 2:34 pm | डॉ श्रीहास
कौतुक करणाऱ्या खूप कमी लोकांपैकी तुम्ही एक ...
पॅरामिटर्स बद्दल बोलायचं झालं तर फक्त लघवीतील किटोन्स माॅनिटर केले , तशी ती तपासणी एकदाच केली ; त्यात किटोन्स जरी बरेच वाढलेले दिसले तरी नाॅर्मल रेंज मध्ये म्हणजे उपाशी राहील्यामुळे जेवढे वाढायला हवेत तेवढे !! मला बिपी,डायबेटीस नसल्यामुळे बाकी पॅरामिटर्स ची काळजी नव्हती . केवळ १ किलो वजन कमी झाल्यामुळे थोडं वाईट वाटलं :)) परंतु ६० तासांनी कंबर जवळ जवळ एक इंच कमी झालेली होती जे माझ्यासाठी पुरेसं encouraging होतं.
२४ तासांपर्यंत काहीच जाणवलं नाही कारण रोजची सवय आहेच ... खरी गंमत ४८ तासांनी सुरू झाली , भुकेची जाणीव म्हणा किंवा फोकस करायला थोडासा ताण पडायला लागला. शुक्रवार आणि शनीवार रोजचे ४ तास ओपिडीत बिझी जायचे त्यामुळे भुकेची जाणीव त्यावेळात नव्हती परंतू घरी आल्यावर काहीही खायचं नाही हे चॅलेंजींग वाटलेलं.४८ ते ६० तास हा काळ अवघड होता पण पाणी पिऊन भुकेची जाणीव शांत व्हायची. ६० तासांनंतर भुकेची जाणीव होणं पुर्णपणे थांबलं होतं अगदी ७२ व्या तासालाही शांत होतो. ह्या दरम्यान रोजचं ४-५ लिटर पाणी पिणं आणि अधेमधे चमचाभर मिठ हे आठवणीनी चालू होतं आणि ह्या ३ दिवसात व्यायाम मात्र पूर्णपणे बंद केला होता.
काही ठराविक फायद्यासाठी जसे वजन कमी करणे किंवा कंबर घटवण्यासाठी हे करण्यापेक्षा मला स्वत:वर आणि खासकरून जिभेवर ताबा मिळवण्यासाठी हे करायचं होतं.पुढचा टप्पा मोठा उपास असेल आणि तो जमेल याची खातरजमा झालेली आहे.
10 Jun 2020 - 2:59 pm | mrcoolguynice
रात्री झोप कशी आली ?.. किंवा उपाशी पोटी झोप , एखाद्याने कशी आरोग्यदायी रित्या म्यानेज करावी ?
10 Jun 2020 - 3:25 pm | डॉ श्रीहास
प्रयत्न केले तर सहज जमेल.... मी झोपेच्या ४-५ तास आधी जेवतो
16 Jun 2020 - 8:05 pm | सुबोध खरे
@ डॉ श्रीहास
आपल्याला कडक सलाम
मला उपास झेपत नाही.
जर उपाशी असलो मला राग पटकन येतो आणि फार चिडचिड होते.
अन्यथा मी बराच शांत असतो. (अगदी बायकोची सोनोग्राफी चालू असताना नवर्याच्या मोबाईलवर टांग टुंगचे सारखे नोटिफिकेशन येत असले तरीही.)
अगदी लष्करात असताना सुद्धा उपाशी असताना मी आमच्या कमांडींग अधिकारी( मेजर जनरल) किंवा आर्मी कमांडरच्या बायको बरोबरसुद्धा भांडण केले होते.
(त्यामुळे आमच्या विभागप्रमुखांना हृदयविकाराचा झटका येणे बाकी होते हा भाग अलाहिदा)
याला नक्की उपाय काय? हे कुणाला विचारले तर त्यानाही सांगता येत नाही.
यामुळे उपास कसा करावा या विचारात मी आहे.
17 Jun 2020 - 12:20 pm | डॉ श्रीहास
१०, १२ आणि १६ तास अनुक्रमे उपाशी राहाण्याची प्रॅक्टीस करा... नेटानी प्रयत्न करा नक्की जमेल.
10 Jun 2020 - 5:31 pm | झेन
बापरे
10 Jun 2020 - 7:42 pm | डॉ श्रीहास
वजन, ढेरी सोडा ....
Zen स्थिती मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे . पटलं ?
27 Mar 2020 - 6:49 pm | धर्मराजमुटके
मी देखील जानेवारी पासून जेवणाचे विविध प्रयोग करत आहे.
कारणे आणि फायदे यावर ८-१० महिन्यांनंतर सविस्तर लिहिन.
सध्या इतकेच सांगू इच्छितो की तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि मनाची तयारी करायची असेल तर २१ दिवसाच्या लॉकडाऊन मधे फक्त इतकेच करा.
१. साखर, गुळ, मध किंवा खर्या आणि कृत्रिम साखरेपासून बनविलेले कोणतेही पदार्थ खायचे / प्यायचे नाहीत.
२. मैद्यापासून बनलेले कोणतेही पदार्थ खायचे नाहीत.
३. लॉकडाऊन च्या पिरियड मधे बटाटा खायचा नाही.
आज वजन करा आणि अजून २१ दिवसांनी वजन करा आणि या धाग्यावर लिहा.
आजचा गृहपाठ : वरील पदार्थ वगळल्यावर तुम्हाला बाजारात पॅकींगचे कोणते पदार्थ खाण्यासाठी मिळतात त्याची यादी येथे लिहा.
27 Mar 2020 - 8:17 pm | सुबोध खरे
@डॉ श्रीहास
काही बदल
१) ४.ग्लुकोजपेक्षा चरबी ३पट उष्मांक / कॅलरीज् जास्त देते.
तीन पट नाही तर सव्वा दोन पट ( १ ग्रॅम चरबी = ९ कॅलरी तर १ ग्रॅम ग्लुकोज = ४ कॅलरी)
२) गव्हाच्या चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स ५२ आहे तर साखरेचा ६५ आहे.
27 Mar 2020 - 8:42 pm | मारवा
विचारात घेणे अधिक उपयुक्त ठरते का ?
म्हणजे टरबुज चा ग्लायसेमिक इंडेक्स जरी ७२असला व ( हा ७० पेक्शा जास्त म्हणून ग्लाय्सेमिक इंडेक्स च्या व्याख्येनुसार हाय ग्लाय्सेमिक जरी असला तरी ) चार कप
सर्व्हींग चा ग्लायसेमिक लोड ८.६ येणार.
व हा १० पेक्षा कमी असल्याने जरी ग्लायसेमिक इंडेक्स वाइज हाय असला तरी ग्लायसेमिक लोड नुसार लो मानला जातो.
तर या निकषावर टरबुज या मात्रेत खाण्यास योग्यच नाही का ?
शिवाय त्या फळाचे इतर फायदे बोनस सोडुनच देऊ
28 Mar 2020 - 12:34 pm | सुबोध खरे
बरोबर आहे
ग्लायसेमिक इंडेक्स कमी म्हणून तुम्ही दाबून खाल्लं तरी त्याचा परिणाम एकच होणार.
एक लक्षात ठेवा शेवटी १ ग्रॅम चरबी म्हणजे ९ कॅलरीज आणि १ ग्राम प्रोटीन/ कर्बोदके = ४ कॅलरी.
जन्व्हा तुमच्या शरीराच्या गरजे पेक्षा जास्त कॅलरी खाल्ल्या तर त्याचा दुष्परिणाम होणारच.
जोवर आपला कॅलरीचा ऋण समतोल ठेवाल तेंव्हाच बाकी सर्व गोष्टीचा फायदा होईल.
रुग्णालयातील रुग्णाला १०० ग्लायसेमिक इंडेक्स ची ग्लुकोजच सलाईन मधून देतात पण जोवर ती त्याच्या रोजच्या गरजेपेक्षा कमी असते तोवर त्याचा दुष्परिणाम होत नाही.
IT IS NOT ONLY QUALITY BUT QUANTITY ALSO MATTERS
28 Mar 2020 - 4:00 pm | आनन्दा
कदाचित आश्चर्य वाटेल, पण तुम्ही किती जेवता याला खूप महत्व असते. माझ्या हे आता वर्षभरात पुर्ण लक्श्यात आले आहे.
त्यामुळे मी आता उपास वगैरे करायच्या वाटेला जात नाही.
हवे ते खातो. पोटभर जेवतो, पण प्रत्येक घास चावुन चावुन. वजन अर्थातच आटोक्यात आहे.
माझा आहार काहीही न करता आपोआप १/३ झाला.
वेळेला ५ पोळ्या खाणारा मी दीड फार तर दोन पोळ्यांवर जेवुन उठायला लागलो.
त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अजुन काही करायचि गरजच पडली नाही.
28 Mar 2020 - 6:38 pm | सुबोध खरे
कदाचित आश्चर्य वाटेल, पण तुम्ही किती जेवता याला खूप महत्व असते.
यात काहीच आश्चर्य नाही. हेच समजून घेतल्यामुळे गेल्या ३० वर्षात माझे वजन केवळ ४ किलोने वाढले.
कोणत्याही समारंभात माझी प्लेट पाहणारे लोक हेच विचारतात कि तुम्ही सगळंच खाताय( चिकन, पनीर, समोसा, शेवट आईस्क्रीम/ गुलाबजामून इ) तरी तुमचं वजन कसं वाढत नाही? त्यांना उत्तर हेच असतं कि जेंव्हा मी या गोष्टी खातो तेंव्हा भात किंवा पोळी आणि तत्सम पदार्थ अजिबात खात नाही
28 Mar 2020 - 10:29 pm | चामुंडराय
हे खरं तर १ ग्रॅम चरबी = ९ किलो कॅलरी तर १ ग्रॅम ग्लुकोज = ४ किलो कॅलरी असं पाहिजे ना?
29 Mar 2020 - 1:58 am | सुबोध खरे
बरोबर
पण बोली भाषेत किलो कॅलरीला नुसतं कॅलरी संबोधलं जातं(दुर्दैवाने)
2 Apr 2020 - 9:37 pm | माझीही शॅम्पेन
डॉक दोघांमध्ये काय फरक आहे ?
2 May 2020 - 7:15 am | चामुंडराय
किलोग्राम किंवा किलोमीटर प्रमाणे १ किलो कॅलरी म्हणजे १००० कॅलरी
27 Mar 2020 - 9:44 pm | प्रमोद देर्देकर
लेकानो तूमचे वजन वाढतेच कसे.
अम्हि बघा दिवसातनं कीतीही वेळ काहीही खा काय भीशाद है काटा 62 च्या पुढे जाइल.
गेली 7 वर्ष एकाच जागी स्थिर. वर नाही की खाली नाही.
जाणारच नाही.
27 Mar 2020 - 10:06 pm | संजय क्षीरसागर
भोजन हा जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे.
जे लिहिलंय तो माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यावर कोणताही विचार न करता, स्वतः प्रयोग करून न बघता काही मिनिटात प्रतिसाद देणं अयोग्य होईल. प्रयोग करून बघणार असाल तर कोणताही प्रश्न स्वागतार्ह आहे.
-----------------------------------------------------
आहार, विहार, निद्रा, उत्सर्ग आणि प्रणय हे निसर्गानं सर्वांना बहाल केलेले आनंद आहेत.
हे आनंद नैसर्गिक आहेत याचा अर्थ ते मिळवायला कोणत्याही प्रशिक्षणाची किंवा कौशल्य संपादनाची गरज नाही, ते आपल्याला जन्मतःच प्राप्त आहेत आणि सदैव उपलब्ध आहेत.
हे सर्व आनंद एकमेकांशी निगडित आहेत. विहारानं शरीर दमलं नाही तर आहाराचा आनंद मिळणार नाही, मनसोक्त विहार आणि तृप्त करणारा आहार यात निद्रेचं सौख्य लपलंय आणि उत्सर्गाच्या आनंदाची 'आहार, विहार आणि निद्रा' ही परिमाणं आहेत. सरते शेवटी प्रणयासाठी लागणारी ऊर्जा या चारही प्रक्रियांवर अवलंबून आहे.
त्यामुळे भोजनाचा विचार हा (प्रणय वगळता) इतर तीन आनंदांशी संबंधीत आहे.
भोजनाचा आनंद दुर्लभ होण्याचं मुख्य कारण भूक लागल्यावर न जेवता वेळ झाल्यावर जेवण्याची लावून घेतलेली सवय हे आहे. मुळात वेळ ही कल्पना आहे आणि भूक ही संवेदना आहे त्यामुळे भोजनासाठी भूक लागणं महत्त्वाचं आहे.
सर्व मानवी जीवनाची मुख्य दिशा अर्थ प्राप्ती असल्यामुळे भोजनाचा आधार भूके ऐवजी वेळ झालाय. भूक लागो न लागो सर्वांनी एकाच लंच टाइमला जेवणं यामुळे भोजन हा फक्त केवळ उपचार राहिला आहे त्यात आनंद वगैरे उरला असेल तर तो फक्त सणासुदीला!
भुकेची संवेदना प्रखर होण्या साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट विहार आहे. काय वाटेल ते झालं तरी सकाळी सहाच्या आत उठून तीन प्रकारच्या शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत.
एक, पोटावर दाब येईल अशी योगासन, यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वज्रासनात बसून कपाळ समोर जमिनीला टेकवणं आणि ते करत असताना हाताच्या मुठी क्रमाक्रमानं, नाभी जवळ, पोटाच्या मध्य भागी आणि मांडी वर ठेवल्या तर पोटाला उत्तम मसाज होऊन पचन क्रियेत कमालीची सुधारणा होते.
कपाळ जमिनीवर टेकवताना श्वास सोडणं आणि वर येताना श्वास घेणं या क्रिया इतक्या सहजतेनं होतात की त्यामुळे श्वसनाचा जोम वाढून श्वास पोटा पर्यंत पोहोचायला लागतो.
उत्तम श्वसन आणि पोटाची लवचीकता हे भूक, उत्सर्ग आणि सर्वांगीण शरीर स्वास्थ्य एकाच वेळी साधतात.
दोन्ही पायांची लवचीकता आणि स्नायूंचा जोम यावर शारीरिक चापल्य आणि उत्साह अवलंबून आहे त्या साठी दोन्ही हात आणि पायांच्या तळव्यांवर दहा बाय दहाच्या रूमला किमान दहा फेऱ्या मारणं (वॉकिंग ऑन फोर) हा उत्तम व्यायाम आहे.
सकाळी चहा घेण्या पूर्वी अंतरा अंतरानं किमान तीन ग्लास (सहाशे मिली) पाणी पिणं शरीराचं डिटॉक्सीकेशन करतं.
एकदा शरीरात पुरेशी लवचीकता आली की टेकडी चढणं किंवा टेबल टेनिस सारखा खेळ खेळणं ही संपूर्ण दिवसाची अत्यंत विधायक सुरुवात आहे.
-------------------------------------------
उत्तम उत्सर्गा साठी सर्वात महत्त्वाची पण संपूर्ण दुर्लक्षित गोष्ट म्हणजे उत्छ्वासाचा जोम आहे. या विषयावर काढे आणि चूर्ण यांचं वर्णन करणारं अत्यंत निर्बुद्ध आणि दिशाभूल करणारं लेखन प्रकाशित झालंय आणि त्यावर तितक्याच सुमार दर्जाचे प्रतिसाद दिले गेलेत पण उत्सर्गाचं खरं रहस्य उत्छ्वासात आहे.
उत्तम उत्छ्वास तीन गोष्टी साधतो : एक, पोटाच्या स्नायूंची लवचीकता, दोन, जोमदार श्वासाची निर्मिती आणि तीन, अपरिग्रह! अपरिग्रह म्हणजे (उत्सर्गाच्या संदर्भात) शरीरावर असलेली आपली पकड सोडण्याची चित्तदशा.
अपरिग्रह ही मनोदशा आपला मूड सकाळ पासूनच लाइट ठेवते आणि लाइट मूड उत्सर्गाच्या आनंदाची प्रचिती देतो.
जोमदार उत्छ्वासामुळे साधलेला अपरिग्रह मनाचा जेलसी हा दोष दूर करतो, मनाला विधायक आणि उमदं बनवतो.
----------------------------------------
उत्तम भुकेचं एकमेव लक्षण म्हणजे काय खावं ते आतनं उमगणं आहे. भूकच तुम्हाला शरीराला काय हवंय ते सांगते. ही संवेदना रस स्वरूप असते म्हणजे : आंबट, गोड, तिखट या तीन प्रमुख आणि तुरट, खारट आणि कडू या दुय्यम रसांपैकी नक्की कोणता रस किती प्रमाणात सेवन करावा हे तुम्हाला कळतं.
सुरुवाती सुरुवातीला जरी आवेगानं जे समोर येईल ते खावं असं वाटलं तरी सकाळी लवकर उठण्याचा दिनक्रम जसजसा नियमित होत जाईल तशी रस संवेदना प्रगल्भ होत जाईल आणि नेमका आहार घेण्या कडे कल होत जाईल.
जेवण हे नेहमी रस परिपोष करणारं हवं. जेवण रस परिपोषक आहे की नाही हे समजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जेवताना साधलेली तन्मयता (तुम्ही जेवताना बोलूच शकत नाही), ते सुरू राहावं अशी चित्तदशा आणि नंतर येणारी तृप्ती आणि कृतज्ञता!
भुकेनं जेवताना येणारा एक अफलातून अनुभव म्हणजे जेवण किती ही रसपूर्ण असलं तरी केव्हा थांबावं याची होणारी जाणीव. ही जाणीव एका थ्रेशोल्ड पॉंईंट सारखी असते, तुम्ही तिच्या कडे सहज दुर्लक्ष करू शकता पण एकदा त्या पॉंईंटला थांबायची मजा कळली की तुम्हाला कोणतंही डायेट करावं लागत नाही. ती जाणीव हाच सर्वोत्तम डायेट पॉंईंट आहे.
------------------------------------------------
संपूर्ण शरीर हे अन्नाचं रूपांतरण आहे त्यामुळे उत्तम भोजन, उत्तम शरीर स्वास्थ्य, उत्तम निद्रा, उत्तम उत्सर्ग आणि उत्तम ऊर्जा अशी साखळी आहे.
आयुर्वेदाचं सूत्रंच असं आहे की योग्य आहार कोणताही शारीरिक दोष दूर करतो त्यामुळे केव्हा खाऊ नये (उपवास) आणि नक्की कोणता आणि किती आहार घ्यावा हे एकदा साधलं की कोणत्याही औषधाची जरूर नाही, अन्न हेच सर्वोत्तम औषध आहे.
--------------------------------------------------
माझा असा व्यक्तीगत अनुभव आहे की पहाटे प्रसन्न चित्तदशेनं उठल्यावर, शरीराची लवचीकता आणि उत्साह साधलेला असताना मनसोक्त विहार केल्यावर लागलेली भूक तुम्हाला काय खावं हे 'दाखवते', तुम्हाला तो पदार्थ, ती रेसिपी 'दिसते'. मला सुरुवातीला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं पण मग नंतर लक्षात आलं की ही निसर्गाची अंतर्निहित योजनाच आहे. माणूस सोडला तर सर्व सजीव सृष्टी आपलं अन्न याच पद्धतीनं शोधते कारण निसर्गाशी एकरूप असल्यानं त्यांना एकाच वेळी अन्न आणि ते कुठे आहे ती दिशा यांचा बोध होतो.
प्रगल्भ भुकेचा अत्यंत सहज आणि आपसूकपणे येणारा दुसरा पैलू म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या अन्नाची कमीत कमी प्रयासात होणारी उपलब्धता! याचं ही कारण तितकाच नैसर्गिक आहे, निसर्गच भूक निर्माण करत असल्यानं तिच्या तृप्तीची योजना निसर्ग स्वयेच करत असतो.
भोजनाचा इतर सजीव सृष्टीला जाणीवेची प्रगल्भता नसल्यामुळे न गवसू शकणारा पण मानवाला आनंदित करणारा तिसरा पैलू म्हणजे कृतज्ञता आहे. आपण भूक, तिच्या मुळे होणारं अन्नाचं दर्शन ( द व्हिज्युअल साईट ऑफ फूड), रस परिपोष करणारं भोजन आणि त्यातून निर्माण होणारी तृप्ती यानी इतके भारून जातो की अन्नाला ब्रह्म का म्हटलंय हे कळतं! भोजन केवळ नित्यक्रम न राहता उत्सव होतं, रोजच्या जगण्याला आनंदाचं एक नवं परिमाण उपलब्ध होतं.
29 Mar 2020 - 11:36 am | झेन
वाचायला चांगल वाटतय पण जिद्द पाहिजे. वजनाचा प्रक्रूतीचा काही प्राॅब्लेम नाही पण परवा छोटा म्हणाला तूला कोरोनाच काही टेन्शन नाही पण काळजी घे ढेरीना व्हायरसचा त्रास आहे.
सो अॅक्शन टाईम
29 Apr 2020 - 8:06 pm | विकास...
लोकवन गव्हाच्या चपातीवर तूप साखर टाकून म्हशीच्या दुधात बुचकळून खाताना प्रतिसाद .....
मी कमीतकमी पाच वेळा जेवण करतोय, ३ चहा म्हशीच्या दुधाचा, घाण्याचे शेंगदाणा तेल वापरतोय, तरी वजन ५८-६२ (वय ३७, उंची १७४ सेमी), बाकी बाहेरचे खाल्लेले मोजत नाही . (फक्त शाकाहारी)
रच्याकने ... सर्वांनी काळजी घ्या
27 May 2020 - 7:39 am | डॉ श्रीहास
तुम्ही नशिबवान आहात एवढंच म्हणू शकतो
3 May 2020 - 3:30 pm | Prajakta२१
चांगली चर्चा सर्वांना धन्यवाद
काही प्रश्न:
१. फोडणीत तुपाचा वापर केल्याने काही फरक पडू शकतो का?
२. intermittent फास्टिंग करताना उपास सोडताना जेवताना जास्त खाणे होते किंवा जे समोर दिसेल ते खाल्ले जाते डाएट चा विचार न करता
हे कसे कंट्रोल करता येईल?
27 May 2020 - 7:38 am | डॉ श्रीहास
१.तुपाच्या फोडणीने चव तर वाढेलच पण अन्नाची क्वालिटी कैक पटीनी वाढेल..... तुपाची देणगी जगाला देणारा आपला देश तुपाबद्दलच भ्रमित आहे !! जेवढं तुप खाऊ शकाल तेवढं चांगलंच .
२.अशी वखवख टाळायची असेल तर आहारात चरबीचं प्रमाण वाढवलं पाहीजे, जेवढे जास्त कार्ब तेवढी वारंवार खाण्याची ईच्छा ....
27 May 2020 - 6:40 pm | Prajakta२१
धन्यवाद
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
7 May 2020 - 12:54 am | तात्या९१
Intermittent Fasting / Dixit Diet / OMAD चे फायदे मी स्वत: अनुभवले आहेत (एकूण १४ किलो वजन घटले ७ महिन्यामधे). ते करत असताना मला झालेले हे तीन महत्वाचे साक्षात्कार -
१. "Calorie in is not the same as calorie out" अर्थात, "मिळवलेला उष्मांक आणि खर्च केलेला उष्मांक हे सारखेच नाहीत".
या विचारामागे डॉक्टर जेसन फुंग यानी सांगितल्याप्रमाणे २-भाग मॉडेल हे आहे (2-compartment model). त्याचा सारांश असा कि इन्सुलिन रक्तात आहे कि नाही यावर किती उष्मांक खरच खर्च होतात ते ठरते. नुसते १०० उष्मांक असलेले अन्न खाऊन १०० उष्मांक खर्च करणारे व्यायाम केले म्हणजे झाले हा निव्वळ संभ्रम आहे! हे तेव्हा उमगले जेव्हा दररोज ३ माईल्स धावूनसुद्धा वजन कमी होण्याचे नाव घेत नव्हते. त्यानंतर दिक्षित सरांचे व्याख्यान ऐकून फक्त २ वेळा जेवणे सुरू केले आणि मगच वजनात फरक दिसू लागला.
२. "I treated food as entertainment, not as nourishment" अर्थात, "आपण जेवणाकडे मनोरजन म्हणून बघतो, पोषण म्हणून नाही".
दोन वेळच्या जेवणादरम्यान (नकळत) चरणे आणि नंतर एकदाचे जेवणच कमी केल्यावर (OMAD) त्यावेळी असे लक्षात येऊ लागले की आपण (अतिरिक्त) खाणे ही क्रीया मनोरंजन म्हणून करत होतो, पोषण समजून नव्हे!
३. "Breakfast is not the most important meal of the day" अर्थात, "न्याहारि हे दिवसातले सगळ्यात महत्वाचे जेवण नाही".
किंबहुना, "न्याहारि" हा अधुनिक जगातील कोर्पोरेट शक्तिंनी एकत्र येउन तयार केलेला mass propaganda असावा. त्यातल्या त्यात, बैठे काम करणार्या लोकांसाठी न्याहारिची गरजच नसावि!
तुम्हालाहि असे काही साक्षात्कार झाले असतील तर नक्की सांगा!
27 May 2020 - 7:41 am | डॉ श्रीहास
अगदी बरोबर मांडलंत _/\_
7 May 2020 - 8:11 pm | Prajakta२१
Breakfast is not the most important meal of the day" अर्थात, "न्याहारि हे दिवसातले सगळ्यात महत्वाचे जेवण नाही".
किंबहुना, "न्याहारि" हा अधुनिक जगातील कोर्पोरेट शक्तिंनी एकत्र येउन तयार केलेला mass propaganda असावा. त्यातल्या त्यात, बैठे काम करणार्या लोकांसाठी न्याहारिची गरजच नसावि!>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
न्याहारी केली कि जास्त भूक लागते उलट न्याहारी नाही केली कि एवढी भूक लागत नाही असा अनुभव आहे आणि मनमोकळेपणे जेवता येते
27 May 2020 - 6:18 pm | वामन देशमुख
वजन वाढवायचं कसं ते कुणीतरी सांगा राव!
11 Jun 2020 - 11:42 am | जेडी
असे फास्टींग करुन वजन कमी केले की स्कीन लुज पडते मात्र थोडं थोडं खात वेट ट्रेनिॆग केलं की स्कीन लुज पडत नाही असे फिटर अॅप वाले किंवा जीम मधले ट्रेनर सांगतात. वरचे सर्व ज्यांनी फास्टींग करुन वजन कमी केलय ते प्रकाश टाकु शकतात का.
13 Jun 2020 - 6:53 pm | डॉ श्रीहास
असं काही होत नाही .... नुसतं Intermittent fasting करायचं नसतंच , नियमित व्यायाम हवाच.
13 Jun 2020 - 11:27 pm | जेडी
व्यायामात सर्व तर्हेचे व्यायाम करता का? जसे की वेट ट्रेनिंग, कार्डीओ, स्ट्रेचिॆग... डॉ.दिक्षित कार्डिओ करा असे सांगतात, फिटर अॅप वाले वेट ट्रेनिंग करा असे सांगतात कारण फास्टिंग - कार्डिओ केले तर तुमचे मसल्स जातात, शिवाय व्यायाम केला की अर्धा तासात तुम्ही प्रोटिनयुक्त आहार करा नाहीतर मसल्स लुज होतात... इतके कन्फ्युज व्हायला झालय..
14 Jun 2020 - 4:49 am | चामुंडराय
डॉ. जेसन फ़ंग चे व्हिडीओ बघा. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात.
ट्रेनर मंडळींना कितपत शास्त्रीय ज्ञान असते याची शंका आहेच.
14 Jun 2020 - 3:43 pm | डॉ श्रीहास
मी सर्व व्यायामप्रकार करतो वेट्स, कार्डीओ आणि स्ट्रेचींग .......
दिक्षित कार्डियो करा म्हणतात कारण लोकं किमान त्यामुळे हालचाल तरी करतील...ॲपवाले काहीही म्हणतात त्यांच्याकडून फक्त व्यायामाच्या instructions घेत चला म्हणजे कन्फ्यूजन होणार नाही...व्यायामानंतर अर्धा तासात प्रोटिन्स खाल्ले तरच मसल्स चांगले बनतील हे चूकच आहे कारण दिवसभरात जे प्रोटिन्स आहारातून जाणार त्याचं आधी अर्धा तास वाल्या प्रोटीन्स ची ॲक्शन सारखीच असते !! शिवाय उपाशी पोटी (फास्टींग दरम्यान) व्यायाम केला तरच फायदाच होतो म्हणून लगेच प्रोटीन्स खाण्याचा संबंधच नाहीये.
तुमचं तुम्ही सगळं करून मग ठरवा की फास्टींगसोबत तुम्ही कोणता व्यायाम तुम्हाला जमतो.
14 Jun 2020 - 7:24 am | अनरँडम
चर्चा वाचतो आहे आणि आळस झटकून प्रतिसाद टंकण्याइतपत प्रभावक्षेत्रात घूसलेलो आहे.
मी आठवड्याला साधारण ५०-६० मैल पळतो. कमीत कमी दोन बाटल्या साउथ अमेरिकन कॅबरने आणि दोन ते तीन आयपीए पितो. कितीही कुठेही कसेही खातो. पण लॉकडाउनपासून मांसाहाराचे प्रमाण बर्यापैकी कमी आहे. माझे वजन फारसे वाढलेले नाही पण तीन वर्षांपूर्वी माझ्या पोटाचा आकार अमेरिकन एगप्लँटसारखा मला वाटत असे. मी पळायला लागलो आणि ते पोट वगैरे गेले. तर मघाशी मी जेवण केले आता सोळा तास उपाशी बसतो. आणि दरम्यान इथे काही धावते प्रतिसाद टाकतो. उद्या सकाळी वजनही कर्तो. माघे डॉक्टरकडे पाहिले तेव्हा १४० पाउंड होतो पण आता कमी झाले असावे कारण गालही आतच जात आहेत.
14 Jun 2020 - 7:40 am | अनरँडम
आत्ता माझ्याकडे रात्र आहे. रोज सकाळी साधारण चहा (दुधसाखररेडलेबल्चा) एक मगभरून पितो, एखादं उकडलेलं अंडं किंवा दुधात साखरबूंद सिरियल खाऊन ८-१० मैल पळतो. उद्या फक्त चहाच पिहीन (न पिण्याचा निर्धार धरवणार नाही). नेहमी न खाता पळायला जाताना भिती वाटते पण उद्या काही न खाताच जाईन आणि येऊन साधारण ४ तास उपाशीच असेल. बघूया. कदाचित मध्ये १०० पुश अपही मारतो.
14 Jun 2020 - 6:30 pm | अनरँडम
आता कमीत कमी ८ मैल पळायला निघतो. दिड वाजता जेवण. मध्ये ऑफिसचे काम. मिसळपाव धावते प्रतिसाद.
14 Jun 2020 - 9:30 pm | अनरँडम
वय साधारण ४५. उंची १६४-६५ (माझा बायस लक्षात घ्या.) आता लोकांनी धागा हायजॅकच्या अव्यक्त भावना प्रदर्शित करण्याआधी माझे प्रतिसाद थांबवतो.
17 Jun 2020 - 9:41 am | mrcoolguynice
Angry when Hungry ?
on lighter note (and I hope, people reading this is not hungry while reading it)
17 Jun 2020 - 12:16 pm | डॉ श्रीहास
खास शब्द आहे...... HANGRY (ANGRY + HUNGRY)