Skip to main content

श्रद्धांजली

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


श्रद्धांजली




गेल्या वर्षभरात, म्हणजे २०१८च्या साधारण अखेरीपासून ते आतापर्यंत मिपाने आणि मिपाकरांनी तीन मिपाकर बघता बघता कायमचे गमावले. आज २०१९ची दीपावली साजरी करतानाच्या उत्सवाला ह्या दुःखाचीही काळी किनार आहे. लिहिण्याचे, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अबाधित असले पाहिजे, संस्थळावरील वातावरण मुक्त असले पाहिजे हे धोरण बाळगून मिसळपावची स्थापना करणारे तात्या अभ्यंकर उर्फ चंद्रशेखर अभ्यंकर एक उमदे, अवलिया व्यक्तिमत्त्व होते. शास्त्रीय संगीत आणि त्यासंबंधित घराणी, गायक, व्यक्तिचित्रे ह्याबरोबरच इतरही खुसखुशीत लेखन करणारे, आवडलेल्या लिखाणाला दिलखुलास प्रतिसाद देणारे, तितक्याच हिरिरीने न पटलेल्या मुद्द्यांवर वाद घालणारे, माणूसवेडे तात्या मिपाच्या सुरुवातीच्या दिवसांत मिपाचा यूसपी होते असे म्हणायला हरकत नाही. त्यांंनी नुसतेच संस्थळ सुरू केले असे नाही, तर अनेक गुणी माणसेही घेऊन आले, त्यांना मिपाकर बनवले, मैत्री केली, मिपापरिवार घडवला, वाढवला. मजरूह सुलतानपुरी ह्यांचा प्रसिद्ध शेर आहे, त्यात किंचित बदल करून म्हणावेसे वाटते की,
वो अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया
दुर्दैवाने आपल्या कारवाँची साथ मात्र तात्यांनी अचानक आणि लवकर सोडली.. तात्या अभ्यंकर ह्यांचे मिपावरीलत्यांच्या ब्लॉगवरील लेखन. *** सुरुवात झाली बोका-ए-आझमच्या अकाली जाण्याने. मिपावरचा अभ्यासू, शैलीदार लेखन करणारा, सिद्धहस्त असा हा लेखक. आपल्या विनयशील आणि साध्या स्वभावाने अनेकांचा आवडता झालेला, प्रचंड लोकसंग्रह बाळगून असलेला बोका. मिपावरील बोक्याचे लेखन म्हणजे मिपाचे वैभव आहे. बोक्याच्या अकाली जाण्याने मिपा आणि मिपाकर वाचकांचे आणि बोक्याच्या मित्रपरिवाराचे कायमचे नुकसान झाले. एक उत्तम लेखक आपल्यातून निघून गेला आणि त्याची उणीव यापुढे कायम भासणार याची खंत आहेच, त्याहीपेक्षा एक मनस्वी, सहृदय व्यक्ती आता आपल्यात कधीच नसेल, ही खंत अधिक डाचणारी आहे. ही तूट भरून निघणारी नव्हे. बोका-ए-आझम ह्यांचे मिपावरील लेखन. *** हे दोन धक्के पुरेसे नव्हते, म्हणून वरुण मोहिते ह्यांच्या निधनाची बातमी लागोपाठ आली. मिपाच्या सुरुवातीच्या काळापासून मिपावर असलेल्या मोहिते ह्यांचे लहान वयात अकाली जाणे अतिशय दु:खद आणि धक्कादायक होते. भरपूर वाचन करणारा, अनेकविध अनुभव गाठीशी असणारा उमदा मित्र अनेक मिपाकरांनी गमावला. वरूण मोहिते ह्यांचे मिपावरील लेखन. *** तात्या, बोका-ए-आझम आणि वरुण मोहिते ह्या तिघांनाही मिपातर्फे विनम्र श्रद्धांजली. तुमच्या लेखनातून मिपावर तुमचं अस्तित्व आणि मिपाकरांच्या मनात तुमची आठवण अबाधित राहील.
20191021-18262520191021-182640
अनुक्रमणिका

वाचने 14895
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

तिघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. बोका व तात्या यांची भेट कधी झाली नाही. मात्र वरूण मोहिते पाटलांची भेट गेल्या ऑगस्टात झाली. त्यांनी माझ्यासाठी कट्टा प्रायोजित केला होता तेव्हा. हो प्रायोजित होता, कोणाकडनं एक छदामही घेतला नाही. परत भेट होणार नाही ही हळहळ लागून राहील. -गा.पै.

मी यापैकी कुणालाच कधी भेटलो नाही. बोका आणि वरुण मोहिते यांच्याशी प्रतिसादातून बोलणे झाले होते. श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली __/\__ देव करो आणि श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्या मिपावर पुन्हा न येवो. खूप क्लेशकारक आहे हे :(

अकाली जाणे अतिशय क्लेशदायक आहे, भावपूर्ण श्रद्धांजली. नाखु

तात्या व्यतरिक्त कोणाला व्यक्तिशः ओळखत नव्हतो पण सर्वांनाच श्रध्दांजली, अकाली जाणे फारच दु:खदायक असते. :( मी स्वतः अजानुकर्णामुळे इथे आलो आणि तात्यामुळे इथे राहिलो - माझ्या उर्दू शायरीवरील पहिल्या लेखावरची त्याची दिलदार दाद/प्रतिक्रिया अजूनही आठवते. परवा प्रिंटेड रेनबोच्या लिखाणात बेग़म अख़्तर यांच्या 'न जा बलम परदेस' उल्लेख झाला तेंव्हा तात्याची आठवण झाली. तो असता तर रागदारी उलगडून बेग़म अख़्तरची एखादी भन्नाट आठवण घेऊन आला असता. मला मराठीत लिहायची सवय नव्हती, ती घडली मिपामुळे - त्यामुळे मी नेहमीच मिपाचा आणि तात्याचा आभारी राहीन. जाता-जाता - संपुर्ण अंकाला छान, उत्सवी सजावट करणार्‍या टीमने इथे औचित्य राखून शीर्षकाला करडा रंग आणि बॅकग्राऊंड काळेच ठेवले आहे. ह्या सजावटीच्या टीमचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

प्रत्यक्षात कुणाचीच भेट झाली नव्हती. तात्या अन वरुण मात्र प्रतिसादातून भेटत गेले, समजत गेले. हे तिघेच नव्हे तर यकू आणि इंदूर येथे नोकरी संपवून नाशिकला रूजू होण्यास येणारे कुलकर्णी देखील गेले तेव्हा डोळ्यार अश्रू अनावर झाले होते. कोण कुठले आपण, एकमेकांना ओळखत नसतांना आपलेसे होतो अन मग अशा जाण्याने हुरहुर लावून जातो? आदरांजली. _/\_

तिघांना हि व्यवस्थित ओळखत होतो आणि भेटलेलो आहे. बोका आणि वरूण यांच्या आजाराची कल्पना होती आणि त्यांची अखेर होणार हेही माहिती होतं. तात्या बद्दल अकल्पित आणि अघटित झालं. तिन्ही व्यक्तिमत्त्वं एकमेकांपासून एकदम वेगळी असली तरी तिघेही "उमदे आणि दिलदार" होते. त्यांच्या बरोबर व्यतीत केलेला काळ आणि व्यक्ती म्हणून त्यांची आठवण झाली तर काळजात कळ उठते. ईश्वर त्यांच्या आत्म्यांना चिरशान्ति देवो__/\__

In reply to by सुबोध खरे

> वरूण यांच्या आजाराची कल्पना होती आणि त्यांची अखेर होणार हेही माहिती होतं. > वरुणला १५-२० दिवस आधी कावीळ झाली होती आणि त्यात तो अचानक गेला ना?

In reply to by एमी

नाही अतिमद्यपानामुळे त्याचे यकृत खराब झाले होते. आणि अशी परिस्थिती येईल याची स्पष्ट कल्पना मी त्याला एक वर्षांपूर्वीच दिलेली होती. ईश्वरेच्छा बलीयसी

In reply to by सुबोध खरे

रिहॅबबद्दल त्याने स्वतःच लिहल्याने थोडी कल्पना होती. पण इतकी गंभीर परिस्थिती होईल/झाली आहे असे वाटले नव्हते. त्यामुळे एवढा लहान मुलगा असा अचानक जाणे फार धक्कादायक होते...

In reply to by एमी

माझ्या मते पाटीलबुवांना जीवनेच्छा उरली नव्हती. त्यामुळे प्रकृतीची हेळसांड करून पिणं चालूच राहिलं (, की ठेवलं) ! :-( -गा.पै.

मी बर्याच महिन्यांनंतर मिपा पाहते आहे आणि या दु:खद निधनांच्या बातम्या वाचुन अत्यंत वाईट वाटलं. जरी मी या कोणालाही पाहिले नव्हते तरी मिपापरिवाराची ओढ खरच अशा घटनांमुळे किती जवळची आहे याची खरच जाणिव झाली.