घराणेशाही चांगली की वाईट?

आनन्दा काथ्याकूट
कदाचित अवांतर होइल, पण नेहरूंच्या धाग्यावरून माझ्या मनात आलेला प्रश्न आहे.. आपण सरसकट घराणेशाही म्हणजे वाईटच असे विधान करतो, पण खरंच घराणेशाही चांगली की वाईट? म्हणजे कसे बघा. सामान्यपणे आपण असे मानतो की माणसाचे बहुतांशी गुण - दोष हे त्यांना मिळणार्‍या अनुवांशिक वारश्यातून, आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीतून येतात. म्हणजे एखादा माणुसघाणा असेल की बोलघेवडा, राजकीय समज किती असेल, आर्थिक समज किती असेल या गोष्टींना अनुवांशिक आणि सामाजिक कारणे असतात. परंतु, जसे मारवाड्याच्या पोराला पैसे वाचवायला शिकवावे लागत नाही, किंवा बर्‍याच डॉक्टर ची मुले, किंवा वकिलांची मुले नकळतपणे त्या त्या व्यवसायांचे संस्कार सोबत घेउनच येतात, तसे जर एखादा राजकारणाचे संस्कार घेऊन येत असेल तर विरोध का असावा? बर हे केवळ भारतातच नाही, परदेशात देखील असे होतेच, थोरले बुश आणि धाकटे बुश हे त्याचे अगदी समोर ठेवण्यासारखे उदाहरण, हिलरी क्लिंटन देखील म्हणायला हरकत नाही. मग अश्या स्थितीत एखादा वारस राजकारण करण्यास समर्थ असेल, तर केवळ घराणेशाही म्हणून त्याला विरोध असावा का? (घराणेशाही का नको याची देखील काही कारणे आहेत, पण ती मी नंतर मांडेन. तूर्तात इतकेच. दोन्ही बाजूनी चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे)
वर्गीकरण

27 टिप्पण्या 12,481 दृश्ये

Comments

शा वि कु नवीन

पण ही एक अपेक्षा असते की राजकीय पक्षसुद्धा सामान्य जनतेचा पक्षकार असावा. मला कायम गंमत वाटते की जे सामान्य कार्यकर्ते असतात जे पक्षसाठी जीव तोडून काम करतात, त्यांना कधी आपल्यावर अन्याय झाला असं का वाटत नाही जेव्हा एखादया पुढाऱ्याच्या मुलाला पक्षातले महत्वाचे स्थान दिले जाते. उलट ते कार्यकर्तेच आपल्या दादा/भाऊ/प्रिन्स चा उदोउदो करताना दिसतात. तर माझे मत कि त्या वारसाने सुद्धा पक्षाच्या अपेक्षित hierarchy मधूनच जावे, अगदी तो भीष्मनीती शिकून जन्माला आला तरीही.

सुबोध खरे नवीन

बर्‍याच डॉक्टर ची मुले, किंवा वकिलांची मुले नकळतपणे त्या त्या व्यवसायांचे संस्कार सोबत घेउनच येतात, याला कोणताही आधार नाही मी आणि माझी बायको दोघेही स्वतःच्या आवडीने /मताने (चॉईसने) डॉक्टर आहोत परंतु माझ्या मुलीने कॉमर्स घेतलं आणि मुलाने सिव्हिल इंजिनियरिंग. दोघांनाहि जीवशास्त्र आवडत नाही. आमचे असे अनेक मित्र आहेत त्यांची मुले डॉक्टर झालेली नाहीत. बऱ्याच वेळेस घरचे रुग्णालय आहे म्हणून आई बाप आपली मते मुलांवर लादत असतात आणि मुले सुद्धा सोपा मार्ग (path of least resistance) म्हणून ते निवडतात. घरूनच शिकवणी असल्याने तो मार्ग त्यांना सोपा जातो एवढंच अन्यथा त्यांचा कल/ आवड त्यात असतेच असे नाही. ( मुलाला काय कळतंय म्हणून हा मार्ग बहुसंख्य मुलांवर लादला जातो) आणि हि घराणेशाही राजकारणातच आहे असे नाही तर न्यायालयांमध्ये पण त्याचा सुळसुळाट झालेला आहे. relationships of advocates with sitting and retired HC and apex court judges in at least 11 instances among 33 recommendations for the Allahabad HC. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/65220425.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst..

Rajesh188 नवीन

भारतात राजेशाही होती. त्या मुळे घराणेशाही परंपरेने खूप वर्षा पासून चालू आहे . पाहिले राजा च्या मुलाला सर्व विद्या शिकवल्या जायच्या राज्यकारभार कसा करावा ह्या पासून नीतिमत्ता, शस्त्र चालवण्याचे शिक्षण दिले जायचे. त्या मुळे परिपूर्ण शासक मिळत असे. नंतर लोकशाही आली. लोक शासक निवडू लागले. आणि राजकीय घराणी तयार झाली . काँग्रेस जास्त वर्ष सत्तेवर असल्या मुळे त्या पक्षात जास्त राजकीय घराणी आहेत. राजकारण मध्ये येवून निवडून येणे tas नवीन व्यक्तीला अवघड च असते . आयुष्यातील किती तरी वर्ष प्रयत्न केल्या नंतर राजकारणात स्थिर होता येते . घराणे शाही असावी की नसावी हे जनतेनी ठरवायचे आहे. सर्वच क्षेत्रात घराणेशाही आहे . बॉलिवूड सुद्धा त्या तून सुटले नाही. उद्योग विश्व सुद्धा त्या मधून सुटले नाही. जेव्हा घराणेशाही नकोशी वाटेल तेव्हा मतदानाचा अधिकार वापरून आपण ती नष्ट करू शकतो. आता तरी घराणेशाही नकोशी झालेली नाही

सुबोध खरे नवीन

घराणेशाही असण्याबद्दल प्रश्न नाही. एखाद्या सर्जनाचा मुलगा सर्जन बनतो त्यासाठी त्याला प्रथम एम बी बी एस पास व्हावे लागते ( साडे पाच वर्षे) त्यानंतर एम एस पास व्हावे लागते( किमान तीन वर्षे) यानंतर काही वर्षे वरिष्ठ शल्य चिकित्सकांच्या हाताखाली काम केल्यानंतर तो सर्जन म्हणून काम करू लागतो. नौसेनाध्यक्ष ऍडमिरल जयंत नाडकर्णी यांचा मुलगा राजेश नाडकर्णी हा सुद्धा सब लेफ्टनंट म्हणून नौदलात भरती झाला आणि चढत चढत २७ वर्षे वेगवेगळ्या पदांवर जहाजांवर काम करत रिअर ऍडमिरल पदापर्यंत गेला आहे. सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांचा मुलगा प्रथम एल एल बी झाला त्यानंतर त्याने फली नरिमन सारख्या प्रख्यात वकिलाबरोबर सहाय्यक म्हणून कामे केली नंतर हार्वर्ड येथे कायद्याची उच्च पदवी घेतली आणि तेथे कायदासंस्थेत कामही केले नंतर मुंबई उच्च न्यायालयात काही वर्षे वकिली केली त्यानंतर त्याना उच्च न्यायालयात अतिरिक्त महाधिवक्ता( ASG) आणि नंतर न्यायाधीश म्हणून नेमले गेले (१९९८) आणि त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढतीवर गेले आहेत (२०१६). सध्या बढती क्रमात ते सरन्यायाधीश होण्याची शक्यता बरीच आहे याउलट कालपर्यंत विमान चालवत असलेला एक पायलट एकदम राजकारणात येतो आणि लगेच खासदार आणि थेट पंतप्रधान बनतो आणि अर्थव्यवस्था अशा रसातळाला नेऊन ठेवतो कि भारताला आपले सोने गहाण ठेवावे लागते. त्या कर्तृत्वावर त्याला भारतरत्न हि पदवी पण देऊन डॉ आंबेडकरांसारख्या दिग्गज नेत्यांच्या रांगेत नेऊन बसवले जाते. ज्या श्री नरसिम्ह राव या विद्वान पंतप्रधानांनी डॉ मनमोहन सिंह यांच्या मदतीने देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढलं त्यांच्या अंत्ययात्रेला चार सुद्धा वरिष्ठ काँग्रेसचे नेते नव्हते आणि आजही नाही चिरा नाही पणती अशा स्थितीत त्याची समाधी कुठे असेल तर असेल यानंतर त्या भारतरत्न पंतप्रधानांची विधवा ( ज्यांचे शिक्षण किती आहे ते माहिती नाही) एकदम १०० वर्षे जुन्या पक्षाचा पक्ष प्रमुख म्हणून येते ( केवल भारतीय राज्यघटनेतील कलमांमुळे शक्य नाही म्हणून पंतप्रधान होत नाही अन्यथा झाल्याच असत्या) आणि यानंतर त्यांचा सुपुत्र ( ज्याच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि एकंदर प्रशिक्षणाबद्दल शंका यावी) थेट पक्षाचा उपाध्यक्ष बनतो आणि काही वर्षात अध्यक्ष होऊन पंतप्रधान पदावर दावा करतो. अशा १२५ वर्षे इतिहास असलेल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या पुढे अक्कल गहाण ठेवून लोटांगण घालावे लागते हीच लोकशाहीची विटंबना आहे. याला कुठे तरी काही तरी तारतम्य असावे कि नाही?

फेरफटका नवीन

In reply to by सुबोध खरे

सुबोधजी, तुमचे प्रतिसाद / लेख नेहमीच व्हॅल्यू अ‍ॅड असतात. आज सुद्धा तुम्ही काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. परंतू, काही ठिकाणी थोडी तपशीलातली मतभिन्नता आहे, ती मांडतो. सर्जन, नौसेनाध्यक्ष, सरन्यायाधीश ह्यांच्या मुलांची जी उदाहरणं तुम्ही दिलीत, ती स्तुत्य आहेत, परंतू त्या मुलांना वडिलांच्या कर्तृत्वामुळे, प्रभावामुळे काही संधी सहज मिळाल्या, काही प्रिव्हीलेजेस सहज मिळाले हे देखील तितकच सत्य आहे. न्या. धनंजय चंद्रचुडांना फली नरिमन बरोबर काम करण्याची संधी, हार्वर्ड मधली अ‍ॅडमिशन (ज्यात अ‍ॅकेडेमिक यशाइतकच, रेकमेंडेशन्स, वर्क हिस्टरी वगैरे गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत) वगैरे गोष्टी, 'यशवंत' ह्या मिडल नेम मुळे मिळाल्या / सोप्या झाल्या असाव्या असं म्हणायला वाव आहे. तीच बाब सर्जन च्या मुलाच्या बाबतीत सुद्धा असू शकते. अर्जून तेंडुलकर ला आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर सराव करण्याची जी संधी मिळते, ती इतरांना तितक्या सहजतेनं मिळत नाही. त्यामुळे प्रिव्हिलेजेस असतात हे नाकारता येत नाही. असे प्रिव्हीलेजेस असण्यात गैर काहीही नाही. प्रत्येकानं शुन्यापासून सुरूवात करावी असं म्हणणं भाबडेपणाचं आहे. प्रत्येक 'बाप' आपल्यामुलाचा रस्ता सुकर करण्याचा प्रयत्न करतच असतो आणी त्यात काहीही गैर नाही. ह्या प्रिव्हिलेजेस मुळे जरी सुरूवातीच्या पायर्या सोप्या झाल्या, तरी पुढचा प्रवास स्वतःच्या हिंमतीवर, कष्ट-कौशल्यावरच करावा लागतो हे निर्विवाद. ह्या प्रिव्हीलेज ची दुसरी बाजू - प्रेशर - ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. बाकी राजकीय क्षेत्रातल्या उदाहरणांवर माझा पास.

सुबोध खरे नवीन

In reply to by फेरफटका

@ फेरफटका त्यामुळे प्रिव्हिलेजेस असतात हे नाकारता येत नाही. असे प्रिव्हीलेजेस असण्यात गैर काहीही नाही. हि गोष्ट मान्य आहे. प्रत्येकानं शुन्यापासून सुरूवात करावी. मी असं अजिबात म्हटलेलं नाही. उलट शून्यातून सुरु करून माणसं ऊच्च पदाला पोहोचू शकली पाहिजेत अशी कोणत्याही ठिकाणी स्थिती असायला हवी. श्री राहुल गांधी यांचं असं काय कर्तृत्व होता ज्या मुळे त्यांना १२५ वर्षे जुन्या पक्षाच्या थेट उपाध्यक्ष पदी बसवलं? न्या. धनंजय चंद्रचुड यांचे वडील सरन्यायाधीश असले तरीही त्यांना एल एल बी पास व्हावेच लागले. त्यांना मानद एल एल बी पदवी वर वकील किंवा न्यायाधीश होता येत नाही. पुढचा प्रवास स्वतःच्या हिंमतीवर, कष्ट-कौशल्यावरच करावा लागतो हे निर्विवाद अशी काय मेहनत श्री राहुल गांधी यांनी केली ज्यामुळे त्यांना थेट उपाध्यक्ष पद आणि नंतर अध्यक्ष पद मिळावे? अशा घराणेशाही बद्दल संताप येतो. तैमूर अली खान बद्दल या भविष्यातील सुपरस्टार बद्दल आपलं काय म्हणणं आहे ?

फेरफटका नवीन

In reply to by सुबोध खरे

सुबोधजी, तुमच्या सगळ्या पोस्टला मी प्रतिवाद नाही केला. ज्या गोष्टींना केला, त्यावर तुम्ही वर प्रतिसाद दिलाय. त्याबद्दल धन्यवाद! "प्रत्येकानं शुन्यापासून सुरूवात करावी. मी असं अजिबात म्हटलेलं नाही. " - असा अर्थ माझ्या पोस्टमधून ध्वनित होत असल्यास क्षमस्व! त्याचा रोख तुमच्याकडे नव्हता. पण बरेच वेळा एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या मुलांना मिळणार्या प्रिव्हिलेजेस च्या चर्चेत अशी उदाहरणं येतात त्या जनरल वक्तव्याविषयी मला लिहायचं होतं. उदा. अर्जून तेंडुलकर ला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंचं मार्गरदर्शन लाभतं म्हटलं की लगेच 'अरे त्या प्रणव धनावडे ला का नाही' वगैरे प्रश्न येतात. आता अर्जून त्याच्या वडिलांबरोबर गच्चीत जरी क्रिकेट खेळला तरी त्याला 'आंतरराष्ट्रीय' दर्जाच्या खेळाडूबरोबर खेळण्याचाच अनुभव मिळणार ना? मग ही तुलना अस्थायी ठरते. असा माझा संपूर्णपणे वेगळा मुद्दा होता. "तैमूर अली खान बद्दल या भविष्यातील सुपरस्टार बद्दल आपलं काय म्हणणं आहे ?" - काय म्हणणार? बॉलीवूड मधे सगळा कनेक्शन चा च मामला आहे. एखादा शाहरूख खान त्याला अपवाद. तो कलाकार म्हणून आवडतो की नाही ह्यावर चर्चा / मतभेद असू शकतात / आहेत. परंतू कुठलीही फिल्मी पार्श्वभुमी नसताना त्यानं जे यश मिळवलय ते निर्विवाद आहे. बाकी कपूर, खान, गांगूली, मुकर्जी वगैरे घराण्यांशी संबंधित लोकं बॉलिवूड डॉमिनेट करतात. एका वेगळ्या अँगलने त्याच्याकडे पाहिलं तर त्यातही मला थोडसं लॉजिक दिसतं. ह्या घरातली मुलं त्या जीवनशैलीला इतक्या लहानपणापासून सरावतात की त्यांना त्या इंडस्ट्रीमधे येण्यात नवखेपणा जाणवत नाही. तिथल्या रिती-रिवाजांमधे सहज सामावता येतं. अर्थात हा झाला त्यांचा प्रवेश. पुढे यश मिळणं, न मिळनं, ते टिकवणं, न टिकवणं हे सर्वस्वी त्यांच्या परफॉर्मन्स वर अवलंबून असतं. अर्थात ह्या लोकांना संधी जास्त मिळतात हे सुद्धा खरंय. अजय देवगण, सैफअली खान वगैरे मंडळींना यशस्वी होईपर्यंत संधी मिळाल्या तश्या एखाद्या विवेक मुश्रन ला नाही मिळत. पण प्रवेश सहज झाला म्हणून राजीव कपूर, संजय कपूर, कुणाल गोस्वामी ह्यांना प्रेक्षकांनी स्विकारलं नाही हे सुद्धा सत्य आहे.

जॉनविक्क नवीन

In reply to by सुबोध खरे

कोणीही वकील, डॉकटर, इंजिनिअर, यशस्वी खेळाडू वा कलाकार घराणेशाहिच्या जीवावर बनत नाही, घराण्याची पुण्याई भलेही त्यांच्या कामी येते पण घराणेशाही ही संपूर्ण वेगळी बाब असताना निव्वळ टिकात्मक प्रतिसाद टँकून तुम्ही मेथी सोबत बटाटा कसा काय तोललात ?

prahappy नवीन

In reply to by सुबोध खरे

"आजही नाही चिरा नाही पणती अशा स्थितीत त्याची समाधी कुठे असेल तर असेल" मोदींनी दिला न्याय - कॉग्रेस नी आता जागा नाहीये हे कारण दिलेलं असताना मोदींनी न जुमानता योग्य ते समाधी स्थळ बांधलं

सुबोध खरे नवीन

In reply to by जॉनविक्क

संगीतातील घराणेशाही हि त्या घराण्यात जन्म घेतल्यामुळे मिळत नाही तर अपार मेहनत घेऊन त्या उच्च पातळीवर पोहोचल्यामुळे मिळते. अन्यथा भारतरत्न श्री भीमसेन जोशी यांचे पुत्र निदान पद्मभूषण नाही तर गेला बाजार पदमश्री मिळवते झाले असते. जाता जाता -- राजकारणा सारखीच घराणेशाही बॉलिवूड मध्ये असल्याने तेथील बहुसंख्य कलाकारांबद्दल मला मुळातूनच तिरस्कार आहे आणि मी शक्यतो सिनेमे पाहणेच टाळतो.

श्वेता२४ नवीन

In reply to by जॉनविक्क

संगीतातील घराणेशाही ही गुरु शिष्य परंपरेवर चालते. यात आंतरजातीयच नव्हे तर आंतरधर्मिय व्यक्ती असतात व त्यात कुणालाच गैर वाटत नाही. उलट ही अतीशय अभिमानास्पद व गौरवशाली परंपरा आहे. इथे गुरुला स्वत:च्या संसारापेक्षा आपल्या शिष्यांवर प्रेम असते. क्वचितच प्रसिद्ध गायक किंवा वादकाचा मुलगा/मुलगी पुढे आलेले दिसतील. मला आठवताता ते सरोदवादक पिता पुत्र अमजद अली खॉं साहेब व त्यांचे दोन पुत्र. पण यात घराणेशाहीपेक्षा त्यांच्या दोन मुलांच्या सरोदवादनाचे कौशल्य निर्विवाद आहे हे कुणीही मान्य करेल. कृपया राजकारणासारख्या घाणेरड्या विषयात असा शास्त्रिय संगीतातील घराण्यांचा कुणी उदाहरणादाखल देखील उल्लेख करु नये, ही नम्र विनंती. बाकी चालुद्या.

सुबोध खरे नवीन

In reply to by श्वेता२४

कृपया राजकारणासारख्या घाणेरड्या विषयात असा शास्त्रिय संगीतातील घराण्यांचा कुणी उदाहरणादाखल देखील उल्लेख करु नये, ही नम्र विनंती. बाडीस

Rajesh188 नवीन

तुम्ही दिलेली व्यवसाय मधील घराणे शाही ची उदाहरणे तार्किक दृष्ट्या योग्य वाटत असली तरी घराणेशाही चा फायदा कोणता ना कोणता फायदा घेवून न झेपणार यश प्राप्त केले असण्याची शक्यता बिलकुल नाकारता येत नाही .

सुबोध खरे नवीन

In reply to by Rajesh188

तीन तर्हेचे लोक जगात असामान्य झालेले दिसतात १) स्वकष्टावर अपार मेहनत घेऊन --यात डॉ अब्दुल कलाम, भारतरत्न डॉ आंबेडकर, भारतरत्न भीमसेन जोशी सारखे लोक येतात. या लोकांना जनतेचे मनापासून प्रेम आणि मान मिळतो. (उत्तम) २) बड्या घराण्यात जन्माला आल्यामुळे मार्ग सुकर होऊन यश मिळालेले -- उदा श्रीमती इंदिरा गांधी, श्री उद्धव ठाकरे इ (मध्यम) ३) लायकी नसताना मोठेपण हे त्यांच्यावर लादले गेले--उदा श्री राहुल गांधी, श्री सलमान खान (अधम) उत्तमो आत्मनो ख्यात: पितु: ख्यात: च माध्यम: अधम: पत्नी ख्यात: श्वशुराश्च अधमाधम:

हुप्प्या नवीन

वकीलाचा मुलगा/गी वकील आणि डॉक्टरचा मुलगा/गी डॉक्टर आणि नेत्याचे अपत्य नेता ह्यात एक मोठा फरक आहे. अन्य सर्व व्यावसायिकांना त्या क्षेत्रात शिक्षण वा प्रशिक्षण घ्यावे लागते. डॉक्टरीचा अभ्यासक्रम सर्वांना सारखाच. डॉक्टरच्या मुलाला जास्त सोपा वगैरे नसतो. फारतर घरून मार्गदर्शन मिळू शकते. घरचा बांधकाम व्यवसाय असेल तरी अगदी सिव्हिल इन्जिनियरिंग नाही झाला तरी त्या धंद्याच्या खाचाखोचा समजावून मगच त्या धंद्यात निर्णय घेता येतात नाहीतर गोत्यात येऊ शकतो. आता नेत्यांची पिलावळ काय करते? बहुतेक वेळा त्यांना आयतेच तिकिट मिळते. सुप्रिया सुळे, पूनम महाजन, पंकजा मुंडे, रोहित पवार, पार्थ पवार, आदित्य ठाकरे ह्यांनी पक्षाकरता निवडणूक लढवायला मिळावी म्हणून काय कष्ट केले? काही नाही. निव्वळ वारसा हक्क. सामान्य कार्यकर्ता प्रचंड घाम गाळतो, उरलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा काहीतरी मोठे, प्रभावी काम करतो तेव्हा पक्षश्रेष्ठी त्याला/तिला तिकिट द्यायचा विचार करतात. ही मुख्य पायरी घराणेशाहीवर चालणार्‍या पक्षात नसते. आणि ते वाईट आहे. कुठल्या नेत्याची बायको, मुलगा वा मुलगी निवडणूक लढवत असेल तर सदिच्छा म्हणून अनेकदा विरोधी पक्ष उमेदवारच देत नाहीत. हाही फरक आहे.

फेरफटका नवीन

In reply to by हुप्प्या

"घरचा बांधकाम व्यवसाय असेल तरी अगदी सिव्हिल इन्जिनियरिंग नाही झाला तरी त्या धंद्याच्या खाचाखोचा समजावून मगच त्या धंद्यात निर्णय घेता येतात नाहीतर गोत्यात येऊ शकतो." - हेच लॉजिक राजकीय प्रवासाबद्द्दल सुद्धा लावता येतं. घरून राजकारणाचे बाळकडू मिळणं, त्यातल्या खाचाखोचा समजणं, त्यासाठी लागणारा पैसा, मॅनपॉवर मिळणं, तिथल्या एटीकेट्स चं पूर्वज्ञान मिळणं हे प्रिव्हीलेजेस आहेतच.

हुप्प्या नवीन

In reply to by फेरफटका

निवडणु़कीचे तिकिट आयते मिळणे म्हणजे एखाद्या डॉक्टरला १२ ची परीक्षा, एम बी बी एस वगैरे काही न करता रेसिडेन्सी करु देण्यासारखे आहे. सामान्य कार्यकर्त्याला निवडणु़कीचे तिकिट मिळवायला प्रचंड यातायात करावी लागते. कित्येक कार्यकर्ते २०-३० वर्षे काम करत असतानाही त्यांच्या नशीबी तिकिट नसते. पण मोठ्या नेत्यांची पोरेटोरे मिसरूड फुटता फुटता तिकिट मिळवतात हे पक्षपातीपणाचे आहे. खर्या व्यवसायात असे होत नाही. खाजगी व्यवसायात कुणी असा प्रयोग केलाच तर त्याचे यश अपयश मालकाच्या पदरात पडते. राजकारणात पक्ष कुणाच्या मालकीचा नसतो. पक्ष हा पक्षातील सदस्यांच्या इच्छेनुसार काही अंशी तरी लोकशाही पद्धतीने चालावा अशी अपेक्षा असते. धंद्याबाबत तशी अपेक्षा नसते.

Rajesh188 नवीन

राजकारणात घराणे शाही असली तरी त्यात स्वतःची जागा बनवणे सोपे नाही . बाकी व्यवसाय आणि नोकरीत जी स्थिरता आहे ती स्थिरता राजकारणात नसते. नेहमी सावध राहून अनंत संकटाना तोंड देणे एवढे सोप नाही. तुलना केली तर नोकरी आणि व्यवसाय पेक्षा राजकारणात टिकून राहणे खूप अवघड आहे.

सुबोध खरे नवीन

In reply to by Rajesh188

ती स्थिरता राजकारणात नसते. हे संपूर्ण मान्य आहे. पण तरीही लोक राजकारणात का पडतात? १९९२ साली श्री शेषन या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेली माहिती डोळ्यात अंजन घालणारी ठरेल. एका तेलगू देसम च्या कुणीही नाव न ऐकलेल्या खासदाराला निवडणुकीचा खर्च किती केला हे विचारल्यावर त्याने उत्तर दिले कि २ कोटी रुपये. ज्या माणसाला परत तिकीट मिळेल कि नाही याची खात्री नाही असा माणूस २ कोटी रुपये खर्च का करतो? यावर त्या खासदाराने अप्रत्यक्ष रित्या सूचक विधान केले कि कमीत कमी ५ कोटी रुपये मी ५ वर्षात मिळवले नाहीत तर खासदार होण्यात काय अर्थ आहे? लक्षात घ्या हि स्थिती १९९२ ची आहे आणि आपण इथे खासदार आमदारांना पेन्शन किती आणि त्यांना संसदेत थाळी कशी स्वस्त मिळते याचे दळभद्री प्रतिसाद व्हॉट्स अँप वर पुढे ढकलत समाजजागृती केल्याचे समाधान मिळवत असतो. २ कोटी खर्च करून ५ कोटी रुपये मिळवणारा माणूस तीन दमड्या देणाऱ्या नोकरीच्या स्थिरतेची चिंता करीत नाही

प्रकाश घाटपांडे नवीन

सुबोध खरे आपल्या मताशी सहमत आहे. परवाच एबीपी माझावर श्रीहरी अणे यांनी घराणेशाहीवर आपले मत व्यक्त केले. त्यात त्यांनी जर लायक नसलेला घराण्यातील माणुस असेल तर लोक त्याला नाकारतात असे सांगितले होते. चर्चा राजकारणावर होती.

Rajesh188 नवीन

राजकारणात व्यक्ती जाते ती समाजसेवा करण्या साठी जात नाही. निवडून आल्यानंतर जे अधिकार प्राप्त त्या मधून पैसे कमविणे,संघटनेच्या बळावर गुन्हे दाबून ठेवणे. आणि ह्यातून वेळ मिळाला तर लोकांची काम करणे. लोक हिताची दिखावू काम करणे हे राजकारण च्या धंद्या मधील गुंतवणूक असते. Dr होण्यासाठी फक्त हुशार असणे गरजेचे नाही तर तुमची 1/२ करोड रुपये खर्च करण्याची ताकत असायला हवी. आता dr बनण्यासाठी एवढे पैसे खर्च केला तर तो वसूल होणे गरजेच असते . त्या मधून अनैतिक मार्ग अवलंबले जातात. सरकारी नोकरी मिळवणे म्हणजे मोठ दिव्यच आहे. मग प्रामाणिक कर्तव्य निष्ट्ट सरकारी नोकरीची अपेक्षा पूर्ण होत नाही. खासगी नोकरीत. सर्व्हिस एजन्सी नेमताना कमीशन सामान खरेदी करताना कमीशन,असे बऱ्याच प्रकारात गैर काम होतात. पावूस पडला रे पडला की रिक्षा टॅक्सी ह्यांचे भाव तिप्पट. माणूस बळ कमी असेल म्हणून बांधकाम चे कंत्राट दिले आणि आपण लक्ष देवू शकलो नाही की निकृष्ट काम करून अपहार झालाच म्हणून समजा. ऑफिस मध्ये शिपाई आणि घरा मध्ये नोकर तुम्ही नसेल तेव्हा बिनधास्त कमचोरी करणार आणि घरातील / ऑफिस मधील वस्तूंचा फायदा घेणार. वॉचमन कोण्ही बघत नाही हे बघितलं की बिनधास्त झोपा काढणार. थोडक्यात काय तर समाजाच्या एकदम खालच्या स्तरा पासून वर पर्यंत एक फसवण्याचा साखळी तयार झाली आहे. पण सरकार तरी प्रामाणिक कसे असेल . ते सुद्धा समाजाचा भाग आहेत.