स्वामी
जगताना खरोखर महत्वाच्या गोष्टी कोणत्या? केवळ सवयीच्या, समाजाने लादलेल्या कोणत्या आणि आतून रुजून येणाऱ्या मूलभूत कोणत्या? कितीतरी गोष्टी, ज्यांना आपण जीवापाड जपतो, महत्वाच्या मानतो त्या किती फोल असतात ते नजर आत वळवून मूलभूत गोष्टींमध्ये 'ध्यान' लावल्याखेरीज उमजत नाही. हे ध्यान स्वयंप्रेरणेने करणारे बुद्ध होतात. आपल्यासारख्या सामान्य लोकांना जगण्याने तशा स्थितीत जबरदस्तीने ढकलावं लागतं. आणि अर्थातच परिस्थिती आहे म्हणून ध्यान होईलच आणि त्यातून ज्ञान होईलच अशी खात्री देता येत नाहीच. आपल्या रोजच्या जगण्यात अशी, मोजा उलटा व्हावा तशी जगणं उलट होईल अशी उलथापालथ होईल अशी शक्यता कमीच. कृती काय ते आपली क्षमता ठरवेल पण मुख्यतः ते ठरेल ते आपल्या मेंदूत काय घडतं यावरच. शेवटी ज्ञानेंद्रियात आपण अनुभव घेत नसतो तर सारे अनुभव घडतात ते मेंदूतच. जगण्याच्या मूलभूत अंगाकडे अशातर्हेनें पहायला प्रवृत्त करणे, ते अनुभव कल्पनेने जगायला लावणे हे कलावंत आणि मुख्य म्हणजे अशा प्रश्नाचा शोध घेण्यात झपाटलेला कलावंत प्रतिभावंतच करू शकतो. जीए हे अशा प्रतिभावंतांच्या यादीतील अगदी वरचं नाव. त्यांच्या ज्या कथेबद्दल सांगू इच्छितो तिचं नाव 'स्वामी'.
विषयाला भिडण्यासाठी माणसाच्या जगण्याला चिकटलेली बाह्य व्यवधानं हटवण्याची गरज आहे. आणि ती हटवणं ओढून ताणून असून चालणार नाही. वाचकाने स्वतःला त्या परिस्थितीत कल्पणे गरजेचे आहे आणि ते जर स्वाभाविक वाटले नाही तर सगळेच मुसळ केरात. इथे जीएची घटना रचायची सहजता आणि चित्रदर्शी भाषा उपयोगी पडते. वाचक नकळत त्यात गुंततो आणि स्वतःला कथानायक समजायला लागतो. व्यवहारी जगातून कथेसाठी गरजेच्या असलेल्या जगात वाचक अलगद उतरत जातो. नायका सोबत हलके हलके एकेक वरवरची गोष्ट खरवडून काढली जाते. तोवर कल्पनेच्या जगाची सत्यता वाचकाच्या मनात झिरपत असली तरी पक्की झालेली नसते. ही उतरवून ठेवलेली झूल ही गम्मत आहे. आजच्या रात्रीचाच प्रश्न, एक थोडा विचित्र पण रुचिपालट अशी भावना असताना अचानक एका क्षणी नायकाला अचानक जाणीव होते की ही व्यवधानं उतरवलेली अवस्था आता कायमस्वरूपी आहे! तोवर वाचकाचा नायकात परकायाप्रवेश पूर्ण झालेला असतो. आणि नायकाला बसणारा धक्का वाचक अनुभवतो.
जखम मोठी असेल तर सुरवातीला बधीरपणा येतो आणि वेदना जाणवत नाहीत. नंतर हळूहळू ठणकणारी नस नी नस स्वातंत्रपणे जाणवते. तसं या नव्या परिस्थितीचा आघात वाचकाला बधिर करतो. नायकाचा महतांशी झालेल्या संवादातून त्या वेदनेने अक्रंदणारी प्रत्येक नस जीए आपल्या जाणिवेत आणून देतात आणि तिथून मूलभूत जगणं म्हणजे काय या दिशेने प्रवास सुरु होतो.
या प्रवासात दुसऱ्याचे अनुभव एका मर्यादेपर्यंतच उपयोगी असतात. परिस्थिती आणि त्याला येणारी आपली प्रतिक्रिया यात परिस्थिती पॅसिव्ह आणि आपण ऍक्टिव्ह असतो. एकच परिस्थिती प्रत्येकावर वेगळा परिणाम करत असते. त्या दिशेने सूचक बोट दाखवण्यासाठी आजच्या नायकासाठी भूतकाळात गडप झालेल्या नायकांची भेट घडवून आणणे भाग आहे. झालेल्या आघाताने आत्मा थरथरतो आहे. धक्याचा, यातनेचा तळ गाठला आहे असं वाटत असताना अचानक पायाखालची जमीन फाटते आणि दरीत कोसळत असताना जुने नायक भेटतात. आणि विचारांचा भोवरा केंद्रीकरणाचा सर्वोच्च बिंदू गाठतो आणि मूलभूत जगणे म्हणजे काय हा मुद्दा जीवन्त होऊन नजरेला नजर भिडवतो. गळ्याभोवती त्या प्रश्नाची पकड स्वच्छ जाणवते! पापण्या चिमटे लावून उघड्या ठेवल्या जातात. मान फिरवून चेहरा दुसरीकडे न्यायची सोय शिल्लक नसते आणि तेंव्हा जीवनातले सर्वात मूल्यवान असे काही गवसते. जे जगण्याचा भाग नाही पण त्याला माणूस आपल्या जगण्यातून घडवत असतो. चुकलो.. घडवू शकतो. ते जीवन्त राहण्याहूनही मूल्यवान असलेले असे काही, शब्दातीत मूल्य, जीए गद्य काव्यातून आपल्यासमोर उलगडतात. आणि एका सुन्न उन्नत भावावस्थेत वाचक असताना कथा संपते.
कथा कागदावर संपते पण वाचकाचा ताबा त्याचं झपाटलेपण आता संपणारी गोष्ट उरायची शक्यता संपलेली असते. वाचकाची मनोभूमिका एका पातळीवर निश्चितपणे आणि कायमस्वरूपी बदलून जाते. चुकलो.. बदलू शकते.. तस घडू शकतं. जीए ते घडण्यासाठी सर्वोत्तम परिस्थिती घडवून आपल्याला त्यात आणून सोडतात. परिणाम प्रत्येकावर कसा होईल ते प्रत्येकाच्या हाती!
-अनुप
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
छान लिहिलं आहे , कथा याआधी 4
कथा थोडक्यात..
छान . महंत अशा एखाद्या ज्याचा
GA च्यां बहुतेक कथा ह्या English
कोणत्या कथा ईंग्रजी कथेवर
आठवत नाही.
निश्चित सांगता येत नसेल तर
हेच म्हणतो..
यात्रिक, कैरी, आणि स्वामी या
+लाख
र्हस्व
र्हस्व
र्हस्व
?
स्वामि ....
उदास ....