Skip to main content

वर्षाव अमृताचा..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 12/03/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी श्वासात खोल जाई मिसळून रातराणी बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी उठती अनेक हलके हलके तरंग कोठे गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी (हळुवार मंद होई हा दीप तेवणारा वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी.. - प्राजु
लेखनविषय:

वाचने 5752
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

वा! क्या बात है !!! आज काय सुंदर सुंदर कवितांचाच दिवस आहे काय?
हकलेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी..
विशेष आवडले !! मस्तच ऽऽऽ अजुन येवु द्या :) --अवलिया

सुंदर!!! बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रीका दिवाणी सुंदर!!! बिपिन कार्यकर्ते

तुझ्या प्रतिभेचा शृंगार असाच फुलत राहो, हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना.... घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी या ओळी खासच ....

खूप गोड कविता आहे प्राजु! एकदम नाजूक आणि तरल भाव! खूप खूप आवडली. तूच कविता, नाजूक कविता शरण तुला प्राजक्ता मी ग शरण तुला प्राजक्ता! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

अल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी सुंदर आहेत ओळी!!! खूपच छान कविता! जियो...!! अवांतर : तुम्ही प्रतिभा उसनी देता का?

अप्रतिम काव्य्..ओळ अन् ओळ अर्थपुर्ण... सुरेख आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

जियो जानेमन :) संपूर्ण कविताच इतकी अलवार आहे ना.... सौंदर्यस्थळं तर अगदी जागोजागी आहेत. खूप खूप छान !! नव्या लेखनासाठी मनापासून शुभेच्छा :)

आवडली अगदी! मात्र एकंदर काफियासंच पाहता सुरांनी हा काफिया (मला तरी) खटकला. न-ण, ड-ढ, क-ख, ज-झ अशा जोड्यांचे काफिये योजावयाची युक्ती म्हणजे दोन मतले लिहावेत. म्हणजे काही अडचणराहत नाही. अर्थात, अशा कोणत्या बंधनांमध्ये कवी/कवयित्रीने स्वतःला किती अडकवून घ्यायचे हा ज्याचात्याचा/जिचातिचा प्रश्न. असो. (आस्वदक)बेसनलाडू

अचानक विचाराचा एक थेंब येउन त्याचे तरंग मनाचा पूर्ण ताबा घेतात. सुरेख!

बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी सॉलिट्ट्ट... :) चांदण्यांचा वर्षाव असाच सुरु राहावा पुनवेचा चंद्र हा नभी सदा रहावा... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

हळुवार कविता ... शब्द, लय .. सारेच सुरेख ! उठती अनेक हलके हलके तरंग कोठे गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी .....मस्तच .

"कंपीत गात्र होई", ऐवजी "कंपून गात्र जाई" कसे वाटते ? इतक्या हळूवार कवितेला पास्ट पार्टिसिपल्स टाळावेत. - मिसळभोक्ता

भावतरल कविता..! खर तर शब्दातीत अनुभुती, शब्दात व्यक्त करण कठिण असत, आपण यशस्वी झालात ...!!!

छान गझल..नेहमीप्रमाणेच उत्तम! आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी.. हे खास!! :) राघव

सुंदर कविता प्राजु ताई... खुप खुप आवडली! आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी ह्या ओळी तर लाजवाब! काय सुंदर कल्पना आहे, नव्हे हेच वास्तव असावे!! -अनामिक