Skip to main content

माझं कुणाला ओझं नको

माझं कुणाला ओझं नको

Published on 16/07/2018 - 19:21 प्रकाशित
मला वृद्धापकाळी कुणावर ओझ बनायचं नाहीये ..
.. हल्ली ह्या एका विधानाने प्रचंड स्तोम माजवल आहे. आणि ह्या विधानाचा एका अजून दृष्टीकोनातून विचार. प्रचंड अहंकार आहे ह्या विधानात. ह्यात अनेक सुप्त विधानं अंतर्भूत आहेत --मी स्वयंभू आहे, --मी पैसे मिळवले, --मी कुणाला उत्तरदायी नाही, --मी अजूनही लोकांसाठी काही करू शकतो पण कुणाला एक छदाम मदत मागणार नाही. --मी इतरांची सेवा करतो तो माझा मोठेपणा पण इतरांनी माझी सेवा करायची वेळ आली तर ते माझं जणू मरणच ...नकोच ते अधिकार पदावरून (अधिकारपद किंवा कर्तेपण हे मी कौटुंबिक / सामाजिक/व्यवसायिक वगैरे सर्वत्र म्हणतोय) गेलो तरी मी आहे तो पर्यंत मी म्हणीन ती पूर्व, करीन तो कायदा, म्हणीन ते नियम आणि ह्यात कुणी विरोध केला कि मी आता ओझं झालोय हि भावना आणि ती नको म्हणून माझं कुणाला ओझं नको हा हट्ट
मला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीन
असा विचार का नको ? ह्याच एक कारण, आयुष्यात आपल्या उमेदीत आपण कर्तेपणा सांभाळताना, मिरवताना, गाजवताना (प्रत्येक क्रियापद तेवढेच महत्वाचे) जे काही विपरीत केलय त्याची परतफेड मला मी कर्ता नसताना भोगावी लागू नये हा एक सुप्त भाव आहे ....आणि तो मुख्य आहे माझे अधिकार पद गेल्यावर मला त्याच ठिकाणी तसाच मान मिळावा हि अपेक्षा म्हणून ठीक आहे परंतु ते तितके सोपे नाही. त्यासाठी आपल्या अधिकाराचा (इतरांना त्रासदायक असा ) आपण गैरवापर केलेला नाही ह्याची खात्री हवी. योग्य प्रकारे आपण जर माणसे (घरी दारी सगळी कडे) जोडून ठेवली असतील तर आपल ओझं तर कुणाला वाटणार नाहीच पण उलट एक हवेहवेसे घटक म्हणून आपण शेवटपर्यंत राहू शकतो. आपण आपल्या आयुष्यात लोकांकडे गेल्यावर आपल्याला कशी वागणूक मिळते, आपण त्यांना कशी वागणूक देतो. ह्यात आपल्यावर पैशा मुळे मान देणारे कोण आणि आतड्याची जवळीक कुणाशी हे कळायला फार वेळ लागू नये.

बघा विचार करून


याद्या 23191
प्रतिक्रिया 71

मला वृद्धापकाळी कुणावर ओझ बनायचं नाहीये .. खरं आहे , 'दुसर्‍यांवर' 'ओझे' बनण्याची मजा तरुणपणीच येत ;) #सेक्रेड्_गेम्स्_ईफेक्ट

In reply to by प्रसाद गोडबोले

' निर्मळ मनाच्या ' मार्कस यांच्या या प्रतिसादात कसल्याही प्रकारचा द्विअर्थ मला तरी दिसला नाही , जर कोणाला दिसत असेल तर त्या व्यक्तीने मनशुद्धीकर्ण करून घ्यावे

हे व्यक्ती सापेक्ष असावे का ? कारण तसही आजकाल कुणालाही दूस-यासाठी इच्छा असूनही जास्त वेळ देता येईल असे नाही. यात स्वाभिमान सुद्धा असू शकतोच की.

हे मानणे यावर अवलंबून असते,कित्येक बालपण आई-वडिलांनी ओझं समजून वाढविलेल्या कन्या पाहील्या आहेत. फुकाफुकी ओझं न बनता रेशीम स्नेहबंध राखलेला संसारी नाखु पांढरपेशा

मला वृद्धापकाळी कुणावर ओझ बनायचं नाहीये. यात चुकीचं काय आहे ???!!! हे एक वास्तव म्हणून स्विकारणेच बुद्धीचे लक्षण आहे. काही अपवाद वगळता, वृद्धापकाळी कुणावर ओझं बनणार्‍या माणसाचे आपल्या जीवनाचे व्यवस्थापन फसले आहे, असेच मानावे लागेल. १. "आपल्या मुलांनी आपले भविष्य सर्वोत्तम बनवावे" अशी इच्छा करतानाच, त्याच दमात, "माझ्या मुलांनी माझ्या म्हातारपणाची काठी बनावे" किंवा "त्यांनी सतत आमच्या भल्याबुर्‍या आर्थिक व मानसिक गरजा पुरवित राहणे हे त्यांचे कर्तव्य आहे" असा हट्ट धरणार्‍यांना, त्यांच्या या दोन विचारतली विसंगती दिसत नसेल, तर ही त्यांच्या समजुतीतली कमतरता आहे, यात संशय आहे काय ?! भर जोमाने प्रगतीपथावर धावण्याच्या वेळेस, मुलांवर आपली जबाबदारी टाकण्याने, आपणच त्यांच्या पायात बेड्या अडकवत असतो, हे कटू असले तरी सत्य आहे. "आमच्या मुलांनी सर्वोत्तम भविष्य बनवावे" ही इच्छा मनापासून असल्यास, ती खरी होण्यासाठी, त्यांना त्यांच्या आवडीच्या गाव-शहर-देशामध्ये, त्यांच्या आवडीच्या नोकरी-व्यवसायाच्या आकाशात, निरंकुश भरार्‍या मारायला केवळ पूर्ण परवानगी असायला हवी असेच नाही तर तसे करण्यासाठी पालकांचा सक्रिय पाठिंबा असायला हवा. पूर्णविराम. २. आपल्या वृद्धापकाळासाठी आर्थिक व मानसिक तरतूद करणे ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत जबाबदारी आहे. ते न जमणार्‍यांनी, आपल्या अर्थ-मानसिक व्यवस्थापनातल्या कमतरतेबद्दल इतरांना दोष देणे अयोग्य आहे. मुलांना त्यांचे जीवन त्यांना हवे आहे तसे जगण्याचा हक्क आहे, त्यावर आक्षेप घेण्याचा पालकांना हक्क नाही... कारण, मुलांना जन्म देण्याआधी पालक त्यांच्याकडून "तुम्ही माझ्या म्हातारपणाची काठी बनणे आवश्यक आहे" अशी मागणी मान्य करून घेत नाहीत. किंबहुना, जन्म देण्यासाठी मुलांनी पालकांवर जबरदस्तीने केलेली नसते किंवा मुलांचे मतही विचारात घेणे शक्य नसे... म्हणजेच, मुलांना जन्म देणे ही पालकांनी स्वमताने व स्वानंदासाठी केलेली कृती असते. त्यामुळे, (अ) मुलांच्या उत्कर्षाला पूर्ण ताकदीने हातभार लावणे व (आ) त्यात अडथळा न बनणे, ही पालकांची मूलभूत कर्तव्ये आहेत. "म्हातारपणासाठी काठी मिळावी" या कारणासाठी मुलांना जन्म देणे, हा भविष्यातल्या फायद्यासाठी केलेला एक व्यापारी गुंतवणूकीचा व्यवहार होईल. कितीही कटु किंवा गैरसोईचे वाटले, तरी हे सत्य आहे. ३. याचा असा अजिबात अर्थ नाही, की मुले व पालकांत कोणताच बंध असू नये. तसे म्हणणे मानवी भावनिक वस्तूस्थितीला धरून होणार नाही. त्याऐवजी, वरची परखड सत्य वस्तूस्थिती जाणून घेतल्यावर, मुले व पालकांनी सामोपचाराने, एकमेकाला शक्य तेवढी सुकर, सुखद व सोईस्कर अशी मध्यममार्गी व्यवस्था मान्य करणे, दोन्ही बाजूंसाठी योग्य आणि आनंदाचे होईल. अन्यथा, पालक व मुले, केवळ स्वतःचा विचार करत, एकमेकाच्या दु:खाचे कारण होतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

+१ अत्यंत सहमत.
मला वृद्धापकाळी कुणावर ओझ बनायचं नाहीये
हे जे मूळ वाक्य आहे त्यातला ओझं हा शब्द म्हणजे "मुलांवर आपली सक्तीची जबाबदारी", "इच्छा नसताना निभावायला लागलेलं कर्तव्य", "पर्यायच नसणे" अशा अर्थाने आहे. मुलांवर अनैच्छिक , अनिवार्य जबाबदारी पडणं ही घटना टाळता यावी असा उद्देश त्या वाक्यात दिसतो. त्यातही मुख्यतः आर्थिक आधाराच्या संदर्भात ते वाक्य म्हटलेलं असतं. मुलांकडून मिळालाच तर मानसिक आधार हवाच असतो पण आर्थिक ओझं त्यांच्या पाठीवर पडून त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांचं कंबरडं मोडू नये अशा अर्थाने तो शब्द असतो असं वाटतं. उपचारांच्या खर्चाची तरतूद मी करून ठेवली तर बरं. पूर्ण बिछान्याला खिळल्यास नर्स, अटेंडन्ट वगैरे पगार देऊन ठेवणं परवडत नाही म्हणून मुलगी, मुलगा, सून यांना सेवा करावी लागतेय, त्यातून कटुता येतेय असं होऊ नये या इच्छेत आणि तदनुषंगिक प्लॅनिंगमधे काही अहंकार वाटत नाही. (किमान मॅजोरिटी केसेसमध्ये).

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"म्हातारपणासाठी काठी मिळावी" या कारणासाठी मुलांना जन्म देणे, हा भविष्यातल्या फायद्यासाठी केलेला एक व्यापारी गुंतवणूकीचा व्यवहार होईल. पण दुर्दैवाने आपल्या सरकारला तेच अपेक्षित आहे ! हे पहा >>>>> a : पालकांना १०००० प्रतिमाह पर्यंत पैसे द्यावेत असे सुचव्ण्यात आलेले आहे , सध्याच्या बॅन्केच्या व्याजदरांकडे ( ६% ते ८% ) पहाता दरमहा १०००० व्याज येण्यासाठी १५ ते २० लाख ची एफ.डी. असणे आवश्यक आहे ! म्हणजे आई वडील दोन्ही असल्यास ३० ते ४० लाख ची एफ.डी. सासु सासरे असल्यास ६० ते ८० लाख ची एफ.डी. ! आणि उद्या भविष्यात आपल्या पोरावर असे हिशोब करायची वेळ येवु नये म्हणुन आपणच आपल्यासाठी इन्फ्लेशन आणि घटते व्याजदर लक्षात घेता किमान ६० ते ८० लाखाची एफ.डी करणे आवश्यक ! नेट नेट टोटल दीड कोटी सेव्हिंग असले पाहिजे ! ते ही एफ. डी. अर्थात रिस्क फ्री ! एवढे पैसे साठवायला एका माणासाला किमान २५ वर्षे लागतील ! ( कारण कोणत्याही मध्यमवर्गीय माणासाला इतर सतराशे साठ हप्ते असतातच , घर घेताना एकदा मोर्टगेज काढले की माणुस त्यातच अर्धा होतो. मोर्टगेज हे नाव एकदम चपखल आणि स्वयंसिध्द आहेच म्हणा ! ) मग बायकोने नोकरी करणेही आवश्यक ! मग पोराला पाळणाघरात टाकणे आवश्यक ! कारर्ण आपल्याच कोर्टाने " नातवंडांची काळजी घेणे ही आजी आजोबांची जबाबदारी नाही " असेही सांगितले आहे ! एकुणच अवघड आहे हे सारं ! अर्थस्य पुरुषो दासः हेच खरं ! सर्वसामान्य मध्यम वर्गीय माणुस म्हातारपणाचा विचार करतच जिवंतपणी मरुन जाईल , आणि मग अशा झाँबी सोसायटी मध्ये कसे इनोव्हेशन होणार ? कसे नवे बिझनेस उदयास येणार ? आणि हो , हा एक छोटा प्रश्न नसुन मोठ्ठा फेनॉमेनॉन आहे , चायना , जपान अशा बहुतांश देशात हीच परिस्थीरी आहे कि कमवणाअरे हात कमी आणि खाणारी तोंडे जास्त ! ह्याला फार पुर्वीच उपाय सुचवला होता आपल्या पुर्वजांनी. सनातन धर्मात सांगितले होते तसे चार आश्रम व्यवस्थित प्रश्थापित करणे ! एकदा का पोराबाळांची लग्ने झाली की हळु हळु मन संसारातुन काढुन घेणे , अलिप्त राहुन केवळ साक्षीस्वरुप राहुन नातवंडांच्या बाललीला अनुभवणे हा खरा वानप्रस्थाश्रम ! ही खरी संन्यासाची तयारी ! आपला आजचा समाज गृहस्थास्रमाच्या पुढे सरकतच नाही ! वानप्रस्थाश्रम आलाच नाही तर संन्यासाश्रम कसा येणार ? प्रपंचात गुंतलेली वासना सुटतच नाही मग काय करणार ??? क्षणभरही प्राणियास ।माया घेऊं नेदी उमस । मिथ्या लोभासाठीं आयुष्य ।व्यर्थ गेलें ॥९॥ उपाय होतां दिसेना ।प्रपंचीं गुंतली वासना । तेणें गुणें समाधाना ।अंतर पडे ॥१०॥ असो .

In reply to by प्रसाद गोडबोले

आपण रिव्हर्स मॉर्टगेज ऐकलं आहे काय? https://www.ndtv.com/business/how-senior-citizens-can-benefit-from-reverse-mortgage-373027 जर आपण घर घेताना मॉर्टगेज घेतलं असेल तर आपल्या वृद्धापकाळी आपल्याला आपल्या घरावर हेच रिव्हर्स मॉर्टगेज घेऊन सन्मानाने जगता येईल. आणि जर मुलांना ते घर परत हवे असेल तर आवश्यक तो पैसे भरून त्यांना ते घर स्वतःच्या नावावर करून घेता येईल. कारण एकदा तुम्ही कोर्टाची पायरी चढला तर मुलांशी असलेले सौहार्दाचे संबंध संपणारच असतील तर निदान भीक/ दूध का कर्ज किंवा पालन पोषण केल्याचा परतावा म्हणून मुलांकडून मागण्यापेक्षा हक्काने मिळणारे पैसे सुखाने वापरता येतील. https://homeloans.sbi/products/view/reverse-mortgage-loan

In reply to by सुबोध खरे

रिव्हर्स मॉर्टगेज हा चांगला पर्याय आहे.
जर आपण घर घेताना मॉर्टगेज घेतलं असेल तर आपल्या वृद्धापकाळी आपल्याला आपल्या घरावर हेच रिव्हर्स मॉर्टगेज घेऊन सन्मानाने जगता येईल
पण घर घेताना कर्ज घेतलं असेल तरच रिव्हर्स मॉर्टगेज करता येते का ?मला वाटते अशी अट असू नये.

In reply to by मराठी कथालेखक

एकदा कर्ज फेडले कि ते घर आपल्या मालकीचे होते. मग आपण तेच घर रिव्हर्स मॉर्टगेज म्हणून त्याच बँक/ वित्तीय संस्थेकडे परत तारण म्हणून ठेवू शकता. मूळ कर्ज त्याच संस्थेने दिलेले असल्याने( त्याची कायदेशीर तपासणी त्यानी अगोदरच केलेली असल्याने) त्यावर रिव्हर्स मॉर्टगेज मिळणे सोपे असते. अर्थात आपण दुसऱ्या कोणत्याही संस्थेकडे जाऊ शकताच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सत्य आहे सहमत आहे पण अनेकांना ते पचवायला अवघड आहे.आणि अपचन झाले तर काय करायच? आन दिनूच्या बिलाचे काय?

In reply to by प्रकाश घाटपांडे

आन दिनूच्या बिलाचे काय? >>> त्या दिनूच्या बाईच्या बिल मधे "काही नाही" कुठून आलंय? त्या बाईचा अन्न, वस्त्र, निवारा, इतर खर्च काय आकाशातला बाप उचलतोय का? उच्च/मध्यम वर्गातल्या तद्दन फालतू घरबश्या बायकांचे उद्दातिकरन करण्याचा मूर्ख प्रयत्न. आन त्याच्यावर टिपं गळणारे तितकेच मूर्ख दिनुचे अवतार...

In reply to by एमी

"काही नाही" म्हणजे त्या बाईतर्फे दिनूला व्यक्तिगत सर्व्हिस चार्जेस काही नाहीत. पण "काही नाही" = 0 इतके चार्जेस दाखवण्याच्या निमित्ताने ती सर्व्हिसेसची यादी (ब्रेकअपसहित) देणं आणि ती वाचून दिनूच्या मनात गिल्ट ठासून भरवणं ही "इन्व्हेस्टमेंट" जरूर आहे. ते चार्जेस तिकडे थेट वळते केले गेलेत. म्हणजे पगार हातात न पडता थेट पेन्शन फंडात जाण्याप्रमाणे काहीसं.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पूर्णपणे सहमत! वृद्धापकाळासाठी आर्थिक तरतूद करणे समजू शकते, (सर्वांच्या बाबतीत जमू शकतेच असे नाही) मानसिक तरतूद कशी करावी?

In reply to by Nitin Palkar

मानसिक तरतूद असो की आर्थिक तरतूद, ती सगळ्यांनाच जमेल असे नाही. पण, दोन्हीसाठी भविष्यातली तरतूद करत जाणे आपल्या हातात असते. "आपल्याला मुलाचा उत्कर्ष व्हायला हवा आहे आणि त्यासंबंधी त्याची स्वतःचीही घर-व्यवसायाची स्वप्ने असणारच... व ती सर्व एकत्र राहून शक्य नसू शकतात" ही वस्तूस्थिती जाणून त्या दिशेने मानसिक तयारी करायला हरकत नसावी. ती करताना, "आपल्या हट्टा-/म्हणण्या-पेक्षा मुलाचा उत्कर्ष जास्त महत्वाचा आहे" हे सारासारविवेकी उत्तर मनाला पटले तर तशी तयारी करायला भक्कम मदत होते. अन्यथा, किमान, "तशी तरतूद न करता, दैवाला आणि मुलांना दोष देण्याने, दोघांचेही जीवन दु:खी करण्यापलिकडे काहीच साध्य होत नाही", हे सत्य लक्षात ठेवून वस्तूस्थितीला सामोरे जावे.

वरील प्रतिक्रिया आणि माबो वरचा धागा वाचला लोक मी ओझं होण्यापेक्षा आत्महत्या करीन वगैरे लेव्हल ला विचार करतात तेव्हा ह्या विचारसरणीचा मुळातून उहापोह व्हायला हवा असे वाटले आणि म्हणून हा धागा. मुले म्हणजे म्हतार्प्नीची काठी वगैरे विचार कधीच कालबाह्य झालेय असे समजून चालू. केवळ आईवडील किंवा दोघांपैकी एक जे आहेत ते जवळ राहायला तयार नाहीत म्हणून त्यांच्या काळजी पोटी आपली कर्मभूमी आणि जन्मभूमी असे खेटे घालणारी अनेक मुल आजू बाजूला दिसतील (ह्यात एका गावात राहणारे ते वेगवेगळ्या देशात/खंडात राहणारे इतका मोठा स्पेक्ट्रम आहे). ह्यात खर्च होणारा मुलांचा वेळ,श्रम, पैसा हा अपव्यय टळू शकेल. आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम असून जेव्हा माणूस अंथरूण पकडतो, तेव्हाही तो परावलंबी होतोच कि; मुद्दा हा कि अशा वेळी त्याचा अहंकार का ढवळला जावा ? तो हि इतका कि असे घडले तर मी मरण पत्करीन इतका टोकाचा विचार माणूस ऐन तारुण्यात करू लागलाय??????? माणसाला आपल्याविषयीचे कोणतेही अधिकार पुढच्या पिढी कडे द्यायचे नाहीत हा हट्ट मला या ठिकाणी अधोरेखित करायचा आहे. कळपामध्ये राहताना कळपातील इतरांना मदत करणे आणि त्यांची घेणे हा एक अत्यंत नैसर्गिक व्यवहार असताना "मी मदत तर करीन, पण घेणार मात्र नाही" हा अहंकार नाही का ? असो चर्चा जशी पुढे सरकेल तशी काही उदाहरणे टाकीन

In reply to by अत्रन्गि पाउस

शक्यतो मी स्वतःचे मी स्वतः मॅनेज करेन जेव्हा मदत लागेल वा अवलंबित्व निर्माण होईल तेव्हाच मला तुमची मदत घ्यावीशी वाटेल. तो पर्यंत माझ्या जगण्याचा तुम्हाला त्रास कशाला ? असाही विचार असतो. यावर बीईंग मॉर्टल हे डॉ अतुल गवांदे यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे व वाचनीय आहे. मराठी अनुवादही आता उपलब्ध आहे.

अपा यांच्या धाग्याचा मुख्य विषय मुलांनी सांभाळ करणे पालकांनी गृहीतच धरु नये याबद्दल नाही. म्हाताऱ्या माणसांनी नेहमीच नकारात्मक राहू नये याबद्दल आहे. जीथे मुलामुलींना करीयर किंवा तत्सम कारणांमुळे लांब राहायला सागलेय त्यांचा प्रश्न नाही. परंतु जे पालक त्यांच्या परिवारासोबत राहत आहेत आणि नेहमी त्यांच्यासोबत राहणे शक्य असतानादेखील असा नकारात्मक विचार घेऊन जगतात त्यांच्याबद्दल धाग्याचा रोख आहे. बरेचसे मुले सुना सासुसासऱ्यांची जबाबदारी घेण्यास तयारदेखील असतात. परंतु जेष्ठ नागरीक नव्या पिढीसोबत तडजोड करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे विसंवाद वाढत जातोय याचे कुठेतरी मूळ मी स्वयंभू आहे, --मी पैसे मिळवले, --मी कुणाला उत्तरदायी नाही, --मी अजूनही लोकांसाठी काही करू शकतो पण कुणाला एक छदाम मदत मागणार नाही. --मी इतरांची सेवा करतो तो माझा मोठेपणा पण इतरांनी माझी सेवा करायची वेळ आली तर ते माझं जणू मरणच ...नकोच ते यात आहे. अशी कितीतरी उदाहरणे मी डोळ्यानी पाहीली आहेत. त्यापेक्षा या लोकांनी नव्या पिढीच्या चिंता , त्यांची स्पर्धा, भावनीक ओढाताण समजून घेऊन मला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीन असा विचार का करीत नाहीत?

In reply to by श्वेता२४

आपल्याला माझ्या म्हणण्याचा रोख समजलाय ... "जेष्ठ नागरीक नव्या पिढीसोबत तडजोड करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे विसंवाद वाढत जातोय याचे कुठेतरी मूळ" हे तर आहेच आणि ते चिंताजनक आहे तथापि आधी म्हटल्या प्रमाणे : बरेचसे तरुण लोकस "आधीच" मी वृद्धापकाळी अमुक करीन , तमुक वागीन आणि नाहीतर आत्महत्या करीन ह्या दृष्टीकोनातून विचार करताहेत .... हे सुद्धा तितकच धोकादायक आहे

In reply to by अत्रन्गि पाउस

मला यात काहीच धोकादायक दिसत नाही. स्व तःबद्दल बोलायचं झाला तर मी मुलांना लग्न झाल्यापासून वेगळे राहण्याचा सल्ला देतो आहे आणि शक्य तितके दिवस त्यांना त्यांचे स्वातंत्र्य उपभोगू द्यायचे शेवटी शरीर गलितगात्र झाल्यावर तुम्हाला कुणाच्या तरी आधाराची गरज पडेल तेंव्हा तुम्ही निदान आर्थिक दृष्ट्या तरी मुलांवर अवलंबून असू नये असे वाटले तर चूक काय? आणि अर्धांगवायू सारखा कायम गलितगात्र करणारा रोग झाला असेल तर तसे जगण्यापेक्षा मृत्यूला धीराने सामोरे जाईन हा विचार काय चूक आहे? कारण आपल्या मुलांनाच आपल्याला कंटाळा आला आहे किंवा आपण त्यांच्यावर बोजा झालो आहोत हा विचार सुद्धा आई बापाना जड जातो. असे अनेक वृद्ध आईबाप आमच्या व्यवसायात पाहायला मिळतात. अंथरुणावर खितपत पडलेला बाप किंवा आई ज्याला प्रातर्विधीची शुद्ध राहिलेली नाही अशांकडे पाहून ते सुखाने गेलेले काय वाईट असा विचार आणि शरम मुलांच्या आणि आईबापांच्या मनात नेहेमी येत असतात. कोणताही अफाट खर्च करून केवळ काही दिवस आपल्या आईबापांना जगवण्याचा अट्टाहासामुळे अक्षरशः देशोधडीस लागलेली( घर गहाण किंवा विकायला लागल्यामुळे) अनेक कुटुंबे तुम्हाला टाटा कर्करोग रुग्णालयात पाहायला मिळतील. अमरत्वाचा पट्टा घेऊन कोणीही जन्मास आलेला नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात? तेंव्हा जोवर जगत आहात तोवर सन्मानाने आणि परावलंबी न होता जगावे हा विचार धोकादायक आहे असे मला तरी वाटत नाही

मुळात तरुणपणी काहीही यंव त्यंव संकल्प किंवा प्रतिज्ञा करणारे लोक प्रत्यक्ष वृद्धत्व आल्यावर खरंच तसं वागू राहू शकतात का याविषयीच मुळात शंका आहे. वयाने माणूस पूर्ण बदलू शकतो आणि आपल्याला तरुणपणात मागच्या पिढीचं काय काय बोचत होतं ते विसरून पुढच्या पिढीशी नकळत तस्साच वागत जातो असं वाटतं. कोणाला पटत असेल किंवा निरीक्षण असेल तर सांगा. अटेंशन सीकिंग ही मुळात खोलवर पक्की रुजलेली नैसर्गिक जीवनावश्यक प्रवृत्ती असावी. आपण महत्वाच्या पोझिशनमध्ये असलं पाहिजे ही इच्छा सर्व वयांत राहतेच..

In reply to by गवि

सहमत आहे. वय वाढत जाते तसे तुमच्या शरीरात जैवरासायनिक बदल होत असतात. त्याचा परिणाम तुमच्या आचार विचारात फरक पडत जाण्यात होतो. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती या विचाराकडे तो येतो. तेच तरुणपणात मोडेन पण वाकणार नाही अशा भूमिकेत असतो. अर्थात हे सर्वसाधारण निरिक्षण आहे. शानसे जगलो शानसे मरेंगे अस म्हणुन आत्महत्या करण्याची उदाहरणे माझ्या पहाण्यात नाही. पण पुरेसे जगलो म्हणून आता समाधानाने मरु हा विचार मात्र मूळ धरु लागला आहे.

आपल्याला तरुणपणात मागच्या पिढीचं काय काय बोचत होतं ते विसरून पुढच्या पिढीशी नकळत तस्साच वागत जातो असं वाटतं. अटेंशन सीकिंग ही मुळात खोलवर पक्की रुजलेली नैसर्गिक जीवनावश्यक प्रवृत्ती असावी. आपण महत्वाच्या पोझिशनमध्ये असलं पाहिजे ही इच्छा सर्व वयांत राहतेच.. जे पुरुष किंवा स्त्रिया घरात कर्तृत्ववान म्हणून मान्यता पावलेले आहेत त्यांच्या बाबतीत ही प्रवृत्ती जास्त असते कारण जगासमोर कायम आपण खंबीर व स्वयंपूर्ण अशी प्रतिमा निर्णाण केलेली असते व ती जपण्याचाच त्यांचा अट्टहास असतो. माझ्या आईच्या मैत्रिणीची आई निवृत्त सरकारी कर्मचारी. पेंन्शनमुळे आर्थिकदृष्ट्या कुणावर अवलंबून नव्हती. अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या शहरात 2 मुले व 2 मुली राहात होत्या तरी कुणाकडेही राहायला तयार नव्हती. कारण हेच की माझा कुणाला त्रास नको. सर्व मुलांचा जीव तुटायचा तिच्यासाठी हीच्या आजारपणात मुले व मुली आळीपाळीने हीच्याकडे सेवेला जाऊन राहायची पण ही पठ्ठी काही घर सोडायला तयार नव्हती. शेवटी अती झाल्यावर मुले-मुली चिडल्या तेव्हा कुठे ही बाई एका मुलाकडे राहायला तयार झाली. त्याचा बंगला 5 खोल्यांचा . हीची स्पेशल रुम . तर हीला टिव्हीचा, नातवंडांच्या मित्र मैत्रिणींचा त्रास व्हायचा. मग परत हीची कुरकुर की मला वृद्धाश्रमातच राहायचाय. मग सर्वांनी मिळून एका उत्तम वृद्धाश्रमात हीची रवानगी केली. 4 च महिन्यात हिने कुणाला तरी मेलेलं बघून घरच्यांना घेऊन जाण्यासाठी फोन केला. परत आणल्यावर 6 महिन्यांनी तापाचं निमित्त होऊन ती बाई गेली.

गवींच म्हणणं तंतोतंत पटलं.. मी अशी ज्येष्ठ मंडळी बघितली आहेत ज्यांच अगदी लहान मुलांसारखं "Attention seeking behaviour" होऊन जातं.. येनकेन प्रकारे वाद घालून, विरोध करून आपल्याकडे लक्ष वेधू पाहतात.. बरं ह्यातली बरीचशी मंडळी बर्‍या आर्थिक स्थितीतील असून स्वत: आयुष्यभर सगळ्या प्रकारची मौजमजा, फिरणं करुन आता तरुण पिढीला त्यागाचे / तडजोडीचे धडे शिकवू पाहतात.. तरुणपणी अत्यंत irresponsibly वागुन; आता वयामुळे फक्त senior citizens झाल्यामुळे ह्याना respect द्यावा का असा प्रश्न पडतो..

मुलगी असेल तर तिला स्वतःचे करियर , सासर व माहेर च बघता बघता तिची ससेहोलपट होते , पण बाप आणि मुलाच्या नात्यात नाळ जुळलेली नसेल तर वृद्धाश्रमा ची भरभराट होणार . अवांतर :- पुणे जिल्ह्यातील भोर गावा मध्ये माझ्या मित्राची सख्खी मावशी बंगल्यात एकटी राहायची . मुलगा अमेरिकेत , पती पूर्वीच गेलेले , बाजूला तिचे दोन दिर राहायला होते . आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या माझ्या मित्राच्या घरी फक्त तिचे ये जा होती . म्हातारी ने नवऱ्याच्या वाट्याला आलेली जमीन विकली , बंगला विकला सगळे पैसे बँकेत ठेवले , मृत्यूपत्र तयार केले आणि कोथरूड चा वृद्धाश्रम गाठला . दोन वर्षा नंतर म्हातारी ला ब्रेन हॅमरेज झाले असता तिचे पुतणे व माझ्या मित्राने वर्गणी काढून हॉस्पिटल चे बिल भरले , पण तरी म्हातारी गेली . काही दिवसांनी तिच्या पुतणे लोकांनी माहिती काढली असता म्हातारी ने त्यांच्या व माझ्या मित्राच्या नावावर प्रत्येकी 5000 हजार रु व उर्वरित सगळे त्या वृद्धाश्रमा ला दान केले होते . शेवटी कोर्टात जाऊन यांनी लिहून दिले ते पैसे आम्हाला नको त्या वृद्धाश्रमालाच द्या .

" जे पुरुष किंवा स्त्रिया घरात कर्तृत्ववान म्हणून मान्यता पावलेले आहेत त्यांच्या बाबतीत ही प्रवृत्ती जास्त असते कारण जगासमोर कायम आपण खंबीर व स्वयंपूर्ण अशी प्रतिमा निर्माण केलेली असते व ती जपण्याचाच त्यांचा अट्टहास असतो. "श्वेताचे हे म्हणणे मला पटते. मात्र हा अट्टाहास जोपर्यंत आपले हात पाय व्यवस्थित काम करीत आहेत तोपर्यंतच टिकतो. शिवाय त्याच्यासोबत आपल्या गाठी भरपूर पैसा तर असलाच पाहिजे,त्यातुनच " आम्ही म्हातारपणी कुणावर अवलंबून रहाणार नाही. अशी प्रव्रुत्ती तयार होत असावी. दुसरा एक द्रुष्टीकोण असा की, मुलांचे वा सुनांचे कितीही प्रेम असले तरीही व आपण आपल्या मुलांवर कितीही सुसंस्कार केले असले तरीही," मुलगा व नारळ कसा निघेल हे सांगता येत नाही " या उक्तिप्रमाणे आपण आपले सावध राहिलेले बरे असे कदाचित वाटत असल्याने मनात हा विचार येत असावा.

In reply to by जयन्त बा शिम्पि

" मुलगा व नारळ कसा निघेल हे सांगता येत नाही " या उक्तिप्रमाणे आपण आपले सावध राहिलेले बरे
हॅहॅहॅ

ह्याला फार पुर्वीच उपाय सुचवला होता आपल्या पुर्वजांनी. सनातन धर्मात सांगितले होते तसे चार आश्रम व्यवस्थित प्रश्थापित करणे ! एकदा का पोराबाळांची लग्ने झाली की हळु हळु मन संसारातुन काढुन घेणे , अलिप्त राहुन केवळ साक्षीस्वरुप राहुन नातवंडांच्या बाललीला अनुभवणे हा खरा वानप्रस्थाश्रम ! ही खरी संन्यासाची तयारी ! आपला आजचा समाज गृहस्थास्रमाच्या पुढे सरकतच नाही ! वानप्रस्थाश्रम आलाच नाही तर संन्यासाश्रम कसा येणार ? प्रपंचात गुंतलेली वासना सुटतच नाही मग काय करणार ??? अगदी अगदी. हल्लीच्या पालकांना स्वताचा अहंकार, स्वाभिमान व घरात अपेक्षित असलेले मानाचे स्थानही सोडायचे नाहीय आणि मुला-सुनांच्या संसाराची व नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारीही नकोय. वर हे लोक वृद्ध म्हणून समाजाची सहानुभूती यांनाच. थोडक्यात काय तरुणपणी स्वताच्या मुलांना करीयरच्या नावाखाली वेळ द्यायचा नाही व म्हातरपणी जेव्हा त्यांच्या करीयरचा काळ असतो तेव्हा मदत करायची नाही पण आपले हक्क मात्र व्यवस्थित उपभोगायचे. माझा कुणाला त्रास नको म्हणून वृद्धाश्रमात न राहता वेगळे एकटे राहणारे लोक ढोंगी असतात. कारण त्यांना माहित असतं की वेळ आली की मुलंमुली येतीलच. आजवर माझा त्रास कुणाला नको म्हणून आत्महत्या करणारे किंवा स्वताचा त्रास नको म्हणून वृद्धाश्रमात आनंदाने राहणारे लोक मी पाहिले नाहीत. वृद्धाश्रमात राहणारे लोक पण मुले नातवंडे जवळ नसण्याचे दुख बाळगून असतात. त्यामुळे माझा त्रास कुणाला नको असे म्हणणारे लोक निव्वळ ढोंगी असतात व त्यांच्यात प्रचंड अहंकार असतो असे माझे स्पषअट मत आहे. वद्धांसाठी समुपदेशनाची व्यवस्था असणारी केंद्रे उघडण्याची भविष्यात खूप गरज भासेल असे वाटते. कारण वद्धांनी असा नकारात्मक दृष्टीकोन बाळगणे त्यांनाही व त्यांच्या परिवारालाही घातक आहे.

In reply to by श्वेता२४

श्वेता२४ माझा कुणाला त्रास नको म्हणून वृद्धाश्रमात न राहता वेगळे एकटे राहणारे लोक ढोंगी असतात. हे एकांगी मत आहे. माझे आईवडील आमच्या( माझ्या आणि माझ्या भावाच्या) लग्नापासून वेगळे राहत आले आहेत. त्यामुळे दोन्ही सुनानां मिळणारे स्वातंत्र्य हे अनमोल आहे. याची कितीही पैशात किंमत करता येणार नाही. आजही त्यांचे आपले मित्र मंडळींचे गट आणि आमचे मित्र मंडळींचे गट वेगळे आहेत. त्यामुळे दोघांचे स्वातंत्र्य अबाधित आहे. यात ढोंगी पणा काय झाला. उद्या त्यांना शारीरिक हतबलतेमुळे स्वतंत्र राहणे शक्य झाले नाही तर आम्ही दोन्ही मुले आणि सुना त्याची काळजी घेण्यास समर्थ आहोत. तो वर त्यांनी मुलांवर अवलंबून राहायचे नाही असे म्हटले तर काय चूक आहे? उगाच मुलांच्या संसारात लुडबुड करायची, आम्ही मुलांना असे वाढवले तसे वाढवले ,म्हणून रोज सुनांकडे किरकिर करायची यापेक्षा स्वतंत्र राहिले तर दोघांना सुख लाभते. आमची लग्ने झाल्यावर आमच्या आईने( आता मुलगे तुमच्या पदरात टाकले आहेत "पादा पण नांदा" असे सुनाना सांगून, मुलांना( आणि विशेषतः सुनांना) निरपेक्ष मनाने पूर्ण स्वातंत्र्य दिले. आमच्या लग्नाला २६ आणि भावाच्या लग्नाला २८ वर्षे झाली. इतकी वर्षे स्वतंत्र राहण्याच्या सुखाची किंमत पैशात होऊच शकत नाही. वेळ आली की मुलंमुली येतीलच.यात काय चूक आहे? उगाच डोक्याला डोकं लावून भांडण करण्यापेक्षा वेगळे राहून शक्य आहे तोवर सुखात राहा आणि जेंव्हा शरीर साथ देत नाही तेंव्हा मुलांकडे जा यात मला तरी काहीच चूक दिसत नाही. माझ्या दोन्ही मुलांना लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मी वेगळे राहण्यासच सांगितले आहे. जेंव्हा तुमची गरज असेल तेंव्हाच आम्ही येऊ अन्यथा तुम्ही तुमचे स्वातंत्र्य उपभोगा. त्यामुळे माझा त्रास कुणाला नको असे म्हणणारे लोक निव्वळ ढोंगी असतात व त्यांच्यात प्रचंड अहंकार असतो हे मत अतिरेकी आहे असेच मी म्हणेन.

In reply to by सुबोध खरे

वेळ आली की मुलंमुली येतीलच.यात काय चूक आहे?
वेळ आली की मुलमुली येतीलच यात ग्यारंटी काय? कशाचीच ग्यारंटी नाही. अशीही आणी तशीही

In reply to by सुबोध खरे

काही लोक याचा प्रतिवाद असाही करतात की तोपर्यंत मुलांना अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य उपभोगायची सवय झालेली असते. मग जेव्हा वृद्ध आईवडिलांना तुमच्या सोबत एकत्र रहाण्याची गरज लागते त्यावेळी मुलासुनांची त्यांना सहन करण्याची क्षमता राहिली नसते. फार फार तर ते तुमच्या वृद्धाश्रमाची सोय करतील पण तुमच्या सोबत सहजीवन सहन करणार नाहीत. यासाठी प्रत्येकाची वृद्धाश्रमात जाण्याची मानसिक तयारी आतापासून असली पाहिजे. यासाठी वृद्धकल्याणशास्त्र विकसित झाले पाहिजे

In reply to by प्रकाश घाटपांडे

वृद्धाश्रमातच जायला पाहिजे असे नाही. घर स्वतंत्र असेल आणि आर्थिक परिस्थिती असेल तर पूर्ण वेळेचे सेवक ठेवून तेच काम करता येते. माझ्या मित्राचे आईवडील आता ( हात पाय चालत असले तरी) थकले आहेत. त्यांची मुले आणि सुना दिवसात दोन वेळेस त्यांच्या घरी जाऊन सर्व गोष्टी हवं नको ते पाहतात. त्यांना जेवणाचा घरगुती डबा लावून दिलेला आहे. एक विधवा मावशी बाकी सर्व पाहायला आहेत. मग मुलांच्या घरातच राहिले पाहिजे असा आग्रह का? किंवा वृद्धाश्रमात पाठवले तर अशी काळजी घेतली जाईल याची खात्री आहे का? आणि वृद्धाश्रमात जायला लागले तरी त्यात चूक किंवा वाईट काय आहे? शिक्षणासाठी जर मुले वसतिगृहात राहू शकतात किंवा लष्करात मी जर काही वर्षे मेसमध्ये राहिलो तसे वृद्धाश्रमात राहणे काय चूक आहे? त्यात "लोक काय म्हणतील" याची पत्रास बाळगल्यामुळे हे असे सर्व प्रश्न उभे राहतात.

In reply to by सुबोध खरे

मुद्दा चुकीचा नाही. तो लोकांना मानवतो का? हा आहे. आणि मानवत नसेल / परवडत नसेल तर त्याला पर्याय काय? हा आहे. म्हणून मी बीईंग मॉर्टल या अतुल गवांदेंच्या पुस्तकाचा वर उल्लेख केला आहे.

In reply to by सुबोध खरे

माफ करा पण तुमचीही मते केवळ स्वानुभवावरुन आल्याने एकांगीच आहेत. त्याचे सार्वजनिकीकरण करता येणार नाही. तसेच उच्च मध्यमवर्ग व श्रीमंतवर्गाला ही समस्या जाणवणार नाही कारण त्यांना आर्थिक प्रश्न फारसे नसतात व ते सामाजिक बंधनांचा तुलनेने विचार करत नाहीत. खरा प्रश्न मध्यमवर्गिय व आर्थिकद्ष्ट्या फारसा सक्षम नसलेला वर्गाचा आहे. आणि असा समाज मोठ्या प्रमाणावर आहे व तो समाज काय म्हणेल या विचाराने दबून वागतो. आपली संस्कृती अशी आहे की कुटुंबातले सर्व सदस्य एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो. स्वताच्या पालका्ची जबाबदारी टाळायची इच्छा बहुतांशी मुलामुलींची नसते. आई वडील मेले तरी बघायला न येणारे लाखात काही असतील. खरंतर मुलांना पाळणाघरात ठेवणे ही सोय असते व आमच्या पिढीने ही सोय स्विकारली. याचा अर्थ असा नाही की पालकांवर मुलांचे प्रेम कमी होते कींवा त्यांच्या कष्टाची जाणीव मुलांना नसते. पण आता त्याच न्यायाने मुलांना वेळ देता येत नसेल व ती त्यांच्या सोईप्रमाणे तुमच्याशी व्यावहार करत असतील, त्यांच्या आयुष्यातील प्रयोरीटी बदलत असतील तर या बदलांना सकारात्मकतेने सामोरे जाणे गरजेचे आहे. कारण पालक वद्धाश्रमात गेले किंवा एकटे राहिले तर समाज मुलांनाच बोल लावतो. त्यामुळे आताची पिढी या ताणात जगतेय कारण समाज वृद्धांच्या वर्तणूकीची बाजू विचारातच घेत नाही. होतं काय की, वृद्ध आनंदानं वेगळे राहत असते (जसे तुमचे पालक आहेत असे तुमचे म्हणणे आहे त्याप्रमाणे) तेव्हा प्रश्न नसतो. प्रश्न तेव्हा असतो जेव्हा ते नाईलाजाने वेगळे राहतात किंवा आपल्याला जुळवून घेता येईल की नाही या आकसापोटी वेगळे राहतात. असे वृद्ध ओळखिच्या लोकांमध्ये मुलासुनांविषयी जाहीर नाराजी व्यक्त करत असतात. ही लोकं आजारी पडले की नातेवाईक त्यांच्याकडे सहानुभूतीने व मुलासुनांकडे शत्रूयुक्त दृष्टीने बघतात. सर्वात घातक प्रकार घरातल्या मुलासुनांच्याबाबतीत किककिर करत राहून तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे वागला नाहीत किंवा मला फारच त्रास झाला तर मी वेगळं राहीन किंवा मला वृद्धाश्रमात पाठवा म्हणणाऱ्यांचा. रत्ंयेकवेळी नव्या पिढीचीच चूक नसते. अाजुबाजुला डोळे उघडून पाहिलेत तर या प्रकारच्या कॅटॅगरीतच वहुतेक वृद्ध दिसतात. मग आमचा मुलांना त्रास नको म्हणणे हा ढोंगीपणा आहे नाहीतर काय आहे. हे असं वागून ते मुलांना त्रासच देत असतात. बरं वेगळे राहिलेले व वृद्धाश्रमात राहणारे बहुतांशी लोक मुले नातवंडे जवळ नसल्याचे दुख बाळगून असतात मग काय उपयोग. वेगळे राहण्याची चैन प्रत्येकाला परवडणारी नसते. वेगळे राहील्यावर वृद्धांच्या आजारपणात स्वताची नोकरीचे व्याप, ताप, मुलांच्या शाळा, व आर्थिक ओढाताण सांभाळता सांभाळता जीव मेटाकुटीला येतो. व वृद्धाश्रमात पाठविण्याच्या विचारानेदेखील कित्येक मुलामुलींना ताण येऊन नैराश्य येते. माझ्या ओळखीतले कित्येक लोक या ताणामुळे मानसोपचार तज्ञांचे उपचार घेत आहेत. आता ह्या वयात त्यांनी कस बदलायचं ? आपणच Adjust व्हायचं हा एक असंच बंडल विचार ..... असं म्हणून चालणार नाही. जुन्या पिढीला देखील या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. म्हणूनच अशा वृद्धांनी सकारात्मक दृष्टीकोन स्विकारुन घरात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्याकरीता समुपदेशनाची व्यवस्था झाली पाहिजे. कोणत्याच आईवडीलांना स्वताच्या मुलांना त्रास व्हावा असं वाटत नाही. व वृद्धांच्या समस्येवर उपायही शोधून काढावेच लागतील. केवळ कायदे करुन प्रश्न सुटत नसतात. त्यामुळे मुले व पालक दोघांकरीता समुपदेशनाची व्यवस्था असणे (हो. मुलेदेखील वाईट वागतात, बेजबाबदारपणे वागतात. आई-वडील व सासूसासरेदेखील मुलगा व मुलगी या दोघांचीही जबाबदारी आहे हे मला शंभर टक्के मान्य आहे.) पण घरात अडजेस्ट न होणाऱ्या वद्धांना वृद्धाश्रमात पाठविण्याशिवाय मुलांसमोर दुसरा पर्याय नसेल तर अशा मुलांना दोषी धरु नये किंबहुना ते नैसर्गिक आहे व बदलत्या परिस्थितीशी अनुरुप आहे अशा प्रकारचे विचार समजात केवळ पसरवले नाही तर रुजवले पाहिजेत . जेणेकरुन वृद्धांना केवळ वृद्ध म्हणून मिळणारा सहानुभूतीचा पाठिंवा कमी होईल . व आपण असे वागलो तर समाजात आपली किंमत कमी होईल ही दहशत त्यांना बसेल व नव्या पिढीचा सामाजिक ताण कमी होण्यास मदत होईल.

In reply to by श्वेता२४

उच्च मध्यमवर्ग व श्रीमंतवर्गाला ही समस्या जाणवणार नाही कारण त्यांना आर्थिक प्रश्न फारसे नसतात व ते सामाजिक बंधनांचा तुलनेने विचार करत नाहीत. खरा प्रश्न मध्यमवर्गिय व आर्थिकद्ष्ट्या फारसा सक्षम नसलेला वर्गाचा आहे. आणि असा समाज मोठ्या प्रमाणावर आहे व तो समाज काय म्हणेल या विचाराने दबून वागतो.
प्रचंड सहमत

In reply to by श्वेता२४

तुमचीही मते केवळ स्वानुभवावरुन आल्याने एकांगीच आहेत. ब्वॉर्र आपण आता असा ग्रह करूनच घेतला आहे तर तेच खरं

In reply to by श्वेता२४

आजवर माझा त्रास कुणाला नको म्हणून आत्महत्या करणारे किंवा स्वताचा त्रास नको म्हणून वृद्धाश्रमात आनंदाने राहणारे लोक मी पाहिले नाहीत.
अच्छा! तुम्ही पाहिले नाहीत म्हणून असे लोक नसतात होय! अतिशय एकांगी, आक्रस्ताळा आणि वास्तवापासून फारकत घेणारा प्रतिसाद.

वृद्धांना सांभाळणे कटकटीचे होण्यामागे "२०-२५ वर्ष वेगळ्या घरात वाढलेल्या मुलीला नवर्याचे आईवडील सांभाळायला लावणे" या सामाजिक प्रथेचा हात कितपत आहे? केवळ मुलीच असलेले वृद्ध कमी कटकटणारे असतात का? स्वतःच्याच आईवडलांशी जुळवून घेणे अवघड जात असताना तर दुसऱ्याच्या घरातल्या वृद्धांशी जुळणे शक्यतरी आहे का?

In reply to by एमी

वृद्धांना सांभाळणे कटकटीचे होण्यामागे "२०-२५ वर्ष वेगळ्या घरात वाढलेल्या मुलीला नवर्याचे आईवडील सांभाळायला लावणे" या सामाजिक प्रथेचा हात कितपत आहे?
निश्चितच आहे. म्हणून तर तु तुझ्या आईवडिलांची काळजी घे मी माझ्या, ती कशी, किती प्रमाणात घ्यायची याचे डील लग्नाच्या आधी केलेले हवे. आई वडिल गेले चुलीत वाली मानसिकदृष्ट्या निखळ उपयुक्ततावादी दृष्टीकोनातूनसुद्धा अनैतिकच आहे.

वृद्धांना सांभाळणे कटकटीचे आहे किंवा कसे? मुलीचे आईवडील कमी कटकटी किंवा मुलाचे आईवडील जास्त कटकटी? तसेच दोन्हीकडच्या पालकांना सांभाळणे ही मुलांची जबाबदारी आहे किंवा नाही हा नाहीच आहे मुळी. वृद्धांनी म्हातारपणी बदलले्या सामाजिक परिस्थितीचे भान स्विकारुन मला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीन अशा पद्धतीने कुटुंबातच सकारात्मकपणे व समंजसपणे राहावं हा आहे. दुर्दैवानं तो बहुतांशी दिसत नाही.

In reply to by श्वेता२४

मला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीन
भारत माझा देश आहे। सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।

या धाग्यावर व्यक्त होणारे विचार पाहता भरपूर माल असलेल्या लोकांना इच्छामरण साठी कॅलिफोर्निया हे एक ऑपशन आहे , पण त्या साठी व्हिसा मिळणार का ? https://navbharattimes.indiatimes.com/world/america/california-to-become-sixth-us-state-to-allow-euthanasia/articleshow/48902312.cms

वृद्धांनी म्हातारपणी बदलले्या सामाजिक परिस्थितीचे भान स्विकारुन मला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीन अशा पद्धतीने कुटुंबातच सकारात्मकपणे व समंजसपणे राहावं हा आहे. >>> मला वाटतं मूळ विषय "आत्ता मध्यमवयातच असलेल्यांनी 'मला दुसर्यावर ओझं बनायचं नाहीय त्यापेक्षा मी मरण पत्करेन' असा विचार करणे कसे अयोग्य आहे" हा आहे.

तुमच्याकडे डस्ट्बीन आहे का? हा विवाहेच्छुक मुलीने विचारलेला प्रश्न अनेक किश्श्यांमधे आपण ऐकला असेल. बाकी माहित नाही पण प्रश्नाने लोकांना खडबडून जाग आली.

In reply to by प्रकाश घाटपांडे

ऐकला आहे पण खरंच तो प्रश्न विचारला जातो का शंका आहे. खरंतर मराठी आंजवर जी लग्नाळू मुलांची किरकिर चालू असते "आजकालच्या मुली सहा आकडी पगार, स्वतःचे घर, नो डस्टबिन असल्याशिवाय लग्नच करत नाहीत" हा प्रॉब्लेम जात स्पेसिफीक आहे अशी मला जबरदस्त शंका आहे.

In reply to by एमी

प्रॉब्लेम जात स्पेसिफीक हा प्रश्न जात स्पेसिफिक नसून हुच्च्भ्रू स्पेसिफिक आहे. कारण मुलीला लहानपणापासून सासू हि वाईट आणि तू कशी स्वतंत्रच राहा असेच शिकवून वाढवणारी पिढी आता "मुले असे बोलू लागली" म्हणून रडारड करताना दिसतात त्यात चूक स्वतःच्या पिढीची आहे हे मान्य करायचा मोठेपणा नाही हि पण वस्तुस्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

निर्विवाद बहुमत ! जुन्या पिढीतील लोकांनीं खूपच प्रॅक्टिकल वागणं त्यांना शिकवलं व स्वतः ही तसेच वागले , पण आता ते बूमरॅगं होतंय म्हणून नव्या लोकांना शिव्या देण्यात काय अर्थ ?

In reply to by सुबोध खरे

निर्विवाद बहुमत ! जुन्या पिढीतील लोकांनीं खूपच प्रॅक्टिकल वागणं त्यांना शिकवलं व स्वतः ही तसेच वागले , पण आता ते बूमरॅगं होतंय म्हणून नव्या लोकांना शिव्या देण्यात काय अर्थ ?

आयला !!!!! ह्यांच्या तर आता या नवीन पिढी च्या !!!! तरी बर हाये आईबापाने कष्ट घेऊन त्यानं जन्म दिला , शिकव्हल आन हे फोद्रीचे म्हाताऱ्या माणसाना डस्टबीन म्हणत्यात ? तपासणी नळीतुन जलामले आस्ते तर आजून काय म्हणाले आस्ते देवास ठाऊक . देवा उचल रे त्यांना लवकर , आमच्या आदी .

जरा मुलांकडून अपेक्षा ठेवणार्‍या आईबापाला इथे मराठी आंजावर असं काही सुनावलं जातं की बिचारे घाबरून जातात. दिनूच्या बिलाच्या कथेचा उल्लेख अश्या वेळी उपरोधाने होत असला तरी त्यातला गाभा पटण्यासारखाच असतो. आर्थिकदृष्ट्या सुस्थीर, मानसिक स्थैर्य असणार्‍या कुटुंबात बालपण घालवणार्‍या मुलाला आईबापाने आपल्या स्वत:च्या आकांक्षा, करीअरमधील संधी, वेळ खर्च करून जे दिलेले असते तयचा परतावा म्हणून काहीही मिळण्याची अपेक्षा करू नये हा आग्रह अतीरेकी नाही वाटत? आता स्वतंत्र झालो, आता माझ्यावर कसलेच बंधन नको आणि आईवडिलांनी त्यांचं त्यांचं बघावं ह्या वृत्तीला प्रॅक्टिकलापणा हा एकच आयाम प्राप्त झालाय असे दिसते. अर्थात किती अपेक्षा हा मुद्दा वादाचा असू शकतो, पण अपेक्षाच नको आणि परोपजीव्याच्या स्थीतप्रज्ञतेने मिळतेय ते घ्या आणि गप्प पडा हा अ‍ॅप्रोच मला तरी वृद्धत्वामुळे येणार्‍या मानसिक हळवेपणाच्या पार्श्वभुमीवर अन्याय्य वाटतो.

आर्थिकदृष्ट्या सुस्थीर, मानसिक स्थैर्य असणार्‍या कुटुंबात बालपण घालवणार्‍या मुलाला आईबापाने आपल्या स्वत:च्या आकांक्षा, करीअरमधील संधी, वेळ खर्च करून जे दिलेले असते तयचा परतावा म्हणून काहीही मिळण्याची अपेक्षा करू नये हा आग्रह अतीरेकी नाही वाटत? मुलांकडे गुंतवणूक किंवा म्हातारपणाची काठी या भूमिकेतून बाहेर येऊन केवळ पालकांच्या भूमिकेत जगायला कधी शिकणार आपला समाज? हा तर निव्वळ देण्याघेण्याचा व्यवहार आहे ज्यात दुसऱअया बाजूचे कोणतेही मत विचारात घेतलेले नसते. एकतर स्वताची गरज म्हणून मुले जन्माला घालायची, स्वताचे स्टेटस व म्हातारपणाची तरतुद म्हणून त्यांना शिकवायचे व पायावर उभे करायचे. व नंतर म्हातारपणी सांभाळले नाही म्हणून रडत बसायचे. मुलांना जन्माला घातल्यानंतर त्यांना वाढवणे, शिकवणे व वेळ देणे पालकांचे कर्तव्यच आहे. मी नोकरी केली, खस्ता खाल्या, संधी वाया घालवल्या तडजोडी केल्या यासाठी स्वताच्या मर्जीने जन्माला घातलेल्या मुलांना कसे काय जबाबदार धरु शकता ?

हे निव्वळ आणि निव्वळ प्रेम व त्याची तीव्रता यावर अवलंबून आहे. मुले व पालक या दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा असतात. मुले बऱ्याचदा लहान असल्याने आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करु शकत नाहीत. व पालक याबाबतीत अनभिज्ञ राहतात. ज्या पालक व मुलांमधअये पुरेसा संवाद आहे , एकमेकांबद्दल खूप ऑटाचमेंट आहे, जे एकमेकांना भावनिक आधार देतात त्यांना वद्धापकाळी फारसा प्रश्न येऊ नये. कारण मुलांना त्यांच्या पालकांनी त्यांच्याविषयी काय केलेय याची पुरेशी जाणीव असते. त्याहीपेक्षा आपल्या पालकांना आपल्याला हे दिले ते दिले किंवा दिले नाही याचा विचार न करता मला माझे आईबाबा कायम जवळ हवेत असाच विचार करतात. पण जे पालक मी यांव केले त्यांव केले किंवा करतोय अशी मानसिकता घेऊन मुलांशी वागतात ते म्हातारपणी देखील हाच अहंकार बाळगून राहतील पुढचे काही बोलायलाय नको

एका महत्त्वाच्या सामाजिक व्यवस्थेसंबंधी आतापर्यंत दोन्ही बाजूंनी चांगली आणि बहुतांश सामंजस्यपूर्ण चर्चा चालू आहे, हे खूप आनंदाचे आहे. पालक व मुले या दोघांच्या बाजूंचा समतोलपणे व सामंजस्याने विचार केला तर खालचे मुद्दे महत्त्वाचे ठरतात... १. गेल्या दोन-तीन पिढ्यांपर्यंत होते तसे सद्याच्या पिढीचे क्षितिज घर-गावापर्यंत मर्यादित राहिलेले नाही. त्यामुळे, एकत्र कुटुंब पद्धती शहरांत जवळ जवळ नाहीशी झाली आहे आणि गावांतही ती हळू हळू संपुष्टात येत चालली आहे. विशेषतः गेल्या ५० वर्षांत या जगात इतके क्रांतिकारी बदल झाले आहेत की त्यांची तुलना पृथ्वीच्या कोणत्याही ५० किंवा १०० वर्षांच्या कालखंडाशी होऊ शकत नाही. अगदी एकदोन पिढ्या मागे गेलो तरी गाव सोडून शहरात जाणे किंवा देशातल्या एका शहरातून दुसर्‍यात स्थित्यंतर करणे या गोष्टी धाडसाचे निर्णय होत्या. एखादा व्यवसाय (शेतकरी, सोनार, कुंभार, लोहार, चर्मकार, इ) पिढी दर पिढी चालत राहण्याची प्रथा नाहीशी होत आहे. हे केवळ कमी उत्पन्नांच्या व्यवसायांतच होत आहे असे नव्हे. उत्तम उत्पन्न असलेल्या व्यावसायिकांची मुलेही शिक्षित होऊन स्वतंत्र विचाराने व्यवसायाची क्षितिजे विस्तारित आहेत किंवा अधिक फायद्याचा पूर्णपणे वेगळा व्यवसाय किंवा नोकरी स्विकारत आहेत. यामुळे, पालक व मुलांची राहण्याची ठिकाणे वेगवेगळ्या गावांत-शहरांत-देशांत असणे अपवादात्मक राहिले नाही. या पार्श्वभूमीवर, सद्याच्या पिढीला गवसणी घालण्यासाठी अवघे जग खुले आहे, हे जुन्या पिढीने समजून घेतले पाहिजे. जुन्या पिढीकडून नव्या पिढीला अश्या अपेक्षा आहेत* : (अ) मोठी स्वप्ने पाहण्याचे स्वातंत्र्य, (आ) ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रोत्साहन, जमल्यास व जमेल तेवढी आर्थिक-भावनिक मदत... आणि (इ) किमानपक्षी, दोन पिढ्यांच्या वस्तुस्थितीत झालेले क्रांतिकारक बदल समजून-उमजून घेऊन भावनिक अडथळे उभे न करणे. २. ठराविक (साधारण १८ ते २५ वर्षे... व्यक्तिसापेक्षाने यात थोडे कमी जास्त असून शकते) वयानंतर... कोणी मानो न मानो... मोठे झालेले मूल हे पालकांपेक्षा वेगळी व्यक्ती असते. ते वेगळेपण प्रत्यक्षात किती प्रमाणात व्यक्त होईल हे पालक व मुलाच्या सामाजिक, भावनिक व आर्थिक वस्तुस्थितीवर अवलंबून असते. ३. असे वेगळे असण्यात काहीच चूक नाही, किंबहुना, तसे असणे हेच मानवी प्रगल्भतेचे मुख्य लक्षण आहे. कोणतीही दोन माणसे दीर्घ काळासाठी एकसारखा (आयडेंटिकल) विचार व कृती करणारी असू शकत नाही, हे मानवी सत्य आहे. कितीही घट्ट प्रेम असले तरी सर्वकाळ, सर्व मते एकसारखी असू शकत नाहीत... तसे दिसले तर संशयास्पद परिस्थिती आहे असे खुशाल समजावे ! दीर्घ काळासाठी एकसारखा (आयडेंटिकल) असलेला विचार व कृती केवळ भावनिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक असाहाय्यतेतून / जबरदस्तीतून जन्माला येऊ शकतात... व कधी कधी त्याला समाजाच्या किंवा मनाच्या लाजेकाजेखातर "आमचे घट्ट प्रेम" असे लाडिक संबोधन दिले जाते. पालकांनी जबरदस्तीने वा भावनिक गैरफायद्याच्या (इमोशनल ब्लॅकमेलिंग) आधारे पाल्याला एकत्र राहण्यास भाग पाडणे जितके वाईट, तितकेच किंवा किंचित जास्तच पाल्यांनी आपला गोड गैरसमज (किंबहुना, ब्रेन वॉशिंग) करून एकत्र राहणे वाईट आहे... कारण जरी पाल्याला ते सुखाचे वाटत असले तरी, पाल्याच्या पती/पत्नीला ते बहुदा दु:खकारक असते. ४. नवीन लग्न झालेल्या जोडप्याला त्यांचा एकांत (प्रायव्हसी) किती आवश्यक आणि किती प्रिय असते, हे त्या वयात असलेल्यांना किंवा त्या वयातून गेलेल्यांना सांगायला नकोच. तर मग, "आम्हाला तसा एकांत मिळाला नाही, त्याने आमचे काय बिघडले ?" असा विचार करून नवीन पिढीला शक्य असतानाही, तसे स्वातंत्र्य आणि एकांत नाकारणे, केवळ संकुचित मनोवृत्तीच नाही तर सरळ सरळ दुष्टपणा होईल. ५. "नवरा-बायको", "पालक-मूल" अश्या 'एकास-एक' व्यक्तीसंबंधांमध्ये वैचारिक चकमकी होऊ शकतात, होतात. तर, पिढ्यांचा आणि पालन-संवर्धनाचा फरक असलेल्या "पालकाचे कुटुंब-पाल्याचे कुटुंब" अश्या 'अनेकास-अनेक' व्यक्तीसंबंधांमध्ये संघर्षाचे किती छोटेमोठे प्रसंग उभे राहू शकतात, हे काय सांगायला हवेच काय ? 'दर वेळेस मुलाने आमचे मत घेतलेच पाहिजे' असे म्हणणे/मनात असणे आणि मत न घेतल्यामुळे होणारी भांडणे वाईट असतातच. पण, मत घेतले नाही याबद्दलचा आपला निषेध स्पष्टपणे न सांगता सतत धुमसत राहून धुसफूस करणे नातेसंबंधात जास्त कडवटपणा आणते. असे सतत ताणलेले संबंध दोन्ही बाजूंना मानसिकरीत्या अत्यंत दु:खकारक असतात आणि त्याचा बाह्यसंबंधांवर (कामाचे ठिकाण व समाजातला वावर) प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतोच होतो. जीवनातला सर्वात महत्त्वाचा काळ समोर असलेल्या पाल्यांच्या भविष्यावर यामुळे दुष्परिणाम होणारच. ६. असे संघर्ष घरातल्या क्षुल्लक कारणांपासून ते बाहेर संबंध असणार्‍या मित्र-मैत्रिणी व कामाच्या संबंधित माणसांशी असलेल्या व्यवहारापर्यंत असू शकतात. "आपण आपले बघावे व इतरांना त्यांच्या व्यवहारांबद्दल मोकळीक द्यावी" असे प्रगल्भ विचार असलेली, चार किंवा जास्त माणसे, एकाच छपराखाली, दीर्घकालासाठी एकत्र सुखाने नांदणे व्यवहारात पाहणे अती-अती-अपवादात्मक आहे, ही काय सिद्ध करायला लागेल अशी गोष्ट आहे काय ? जरा खोलवर निरीक्षण केले तर "वर वर सुखी दिसणार्‍या बहुतांश अपवादात्मक एकत्र कुटुंबात" त्या मुखवट्याच्या मागे भावनिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक असहाय्यता / जबरदस्ती दिसते... हा मुखवटा एखाद्या प्रसंगाने गळून पडतो आणि तडे दृश्य होतात. वरच्या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक कुटुंबाने आपापल्या मनाप्रमाणे, स्वातंत्र्याने, वेगवेगळे राहून एकमेकाला मधून मधून भेटणे आणि सौहार्दाचे संबंध ठेवणे केव्हाही सगळ्यांनाच जास्त सोयीचे व आनंदाचे ठरेल, नाही का ? ================================ टीप : वरच्या विश्लेषणात, खरोखरच सर्वकाळ समन्वय साधून असलेल्या अती-अती-अती-अपवादात्मक (असलीच तर) असलेली "आऊटलायर" ) एकत्र कुटुंबे जमेस धरलेली नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एका महत्त्वाच्या सामाजिक व्यवस्थेसंबंधी आतापर्यंत दोन्ही बाजूंनी चांगली आणि बहुतांश सामंजस्यपूर्ण चर्चा चालू आहे, हे खूप आनंदाचे आहे. पूर्ण सहमत !

मुलं जन्माला घालून त्यांच्या कडून अपमानास्पद वागणूक करून घेण्या पेक्षा दोन चार कुत्री मांजरी पाळलेली परवडली . ते मुके प्राणी मालकाला शेवट पर्यंत प्रेम देतात , एकाकीपणाची जाणीव होऊन देत नाही . 70 / 80 लाखा ची एफ डी करून मृत्यूपर्यंत च्या आर्थिक नियोजना साठी आणि मृत्युपत्रात ती रक्कम एखादया निराधार लोकांची सेवा करणाऱ्या आश्रमाला दान करण्या चा उल्लेख करणे हा सुद्धा उपाय चांगला आहे . डस्टबीन कन्सेप्ट ला जर आळा नाही बसला तर पारशी ( शून्य जन्मदर ) सारख दुर्मीळ होण्याची अवस्था सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या लोकांवर येणार हे निश्चित .

दोन चार कुत्री मांजरी पाळलेली परवडली साहेब या प्राण्यांची नैसर्गीक आयुर्मर्यादा फार कमी असते (१०-१५ वर्ष) त्यामुळे ते मध्येच आपल्याला सोडून जातात आणि ते गेल्याचे दुःख पण फार त्रासदायक असते हे असे प्राणी पाळणाऱ्या माणसांना विचारून पहा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात?

केवळ मुल-पालकच नव्हे तर सर्वच मानवी भावनिक संबंधात "दुसर्‍याने स्वतः आणि/किंवा त्याच्याबाबतीत असलेल्या आपल्या अपेक्षा पुर्‍या कराव्या" हा अट्टाहासच बहुतेक दु:खाचे कारण ठरतो... आपल्या अपेक्षा दुसर्‍यावर लादू लागल्यावर तर त्यावर कळस चढतो. "आपण स्वतःबद्दलच्या अपेक्षा पुर्‍या कराव्या व त्याच मापाने, इतर सर्व प्रौढांना (यात मुलेही आली) त्यांच्या अपेक्षा पुर्‍या करण्याची पूर्ण मोकळीक द्यावी... त्यात जमल्यास मदत करावी, पण उगाच अनामंत्रित (अनइन्व्हायटेड) लुडबूड करू नये... भावनिक अडथळे (इमोशनल ब्लॅकमेल) तर अजिबात उभे करू नये" हे तत्व पाळले तर बिघडलेले/बिघडणारे अनेक सुहृदसंबंध रुळावर येऊन सुखद होतील. असे करताना, नातेसंबंध ही काही तत्वांची लढाई नाही, समोरच्याचे भले (उदा : पालकांसाठी मुलांचे भले) हीच आपली प्राथमिकता आहे, इतके ध्यानात ठेवले तरी खूप फरक पडेल. जेथे "मी आणि माझे विचार", "दुसरा आणि त्याच्या विचारांवर" विजय मिळवायचा प्रयत्न करतात, तेथे संघर्ष किंवा दु:खाशिवाय दुसरे काय हाती लागणार आहे ?

कोणत्याही अपेक्षा न ठेवता जगता आले पाहिजे. निदान तसे जगण्याचा प्रयत्न तरी करत राहिले पाहिजे. बर्‍याच समस्या दूर होतात. असा माणूस सगळ्यांना हवाहवासा वाटतो. थोडक्यात असा माणूस कधीच एकटा पडत नाही. शब्दात मांडणे अवघड होतयं. थांबतो. असो. _/\_