लेखमाला अर्धवट सोडण्याचे पाप माझ्या माथी लागले आहेच. त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. या मालिकेतील पुढचे लेख ३-४ दिवसांचे अंतर ठेवून प्रकाशित करेन जेणेकरून इतर लेखांवर अन्याय होणार नाही.
भाग.1 https://www.misalpav.com/node/४२५८४
------------------
आमचा नूकताच डिप्लोमा करुन झालेला होता. एकीकडे मित्रांच्या ताटातूटीमुळे होणारा त्रास आणि दुसरीकडे खूणावणारी कॉलेज लाईफ असे ते सोनेरी दिवस. चटकन विश्वास ठेवणारे , जगरहाटी न पाहिलेले ते कोवळे वय होते आमचे !
त्यावेळेसच्या इतर असंख्य मूलांप्रमाणेच पूढे कोणते कॉलेज घ्यायचे यावर आमच्या ग्रूपमद्धे चर्चा घडत. कुठले कॉलेज चांगले , कुठल्या कॉलजचे 'काय काय' चांगले आहे यावर दिवसच्या दिवस वादविदात चालत. तेव्हा एकजण कोणीतरी बोधले सरांबद्दल सांगितले. ते कसकसले सॉफ्टवेअरचे क्लासेस घेत. काही दिवसातच त्यांचा क्लास चालू होणार होता. तसेही आम्ही रिकामेच बसलो होतो , तेव्हा सर्वानुमते तो क्लास लावायचा असे पक्के ठरले.
क्लासच्या पहिल्या दिवसाअगोदर सरांना भेटायचा योग आलाच नव्हता. पहिली भेट अजूनही आठवते. काळासावळा रंग , बेतातीच उंची. पण डोळे मात्र कमालीचे पाणीदार! अगदी समोरच्या माणसाच्या मनात सहज हात घालण्याची कला त्या डोळ्यांना अवगत होती. तेव्हाच बोधले सरांनी आम्हाला खिशात टाकले. त्याचबरोबर त्यांनी त्या दिवशी आम्हाला अभियांत्रिकी प्रवेशाबाबतची सगळी माहिती देऊन टाकली. सरांनी कॉलेजचे आधीचे कट अॉफ जमा करून ठेवले होते. त्यानुसार त्यांनी कोणाले कोणते कॉलेज मिळेल याचेही भाकित करून दिले.
सरांची आमची नस पकडली होती. असा 'पर्सनल टच' आम्ही कधी अनुभवला नव्हताच.एवढे सगळे कष्ट सरांनी काहीही कारण नसताना घेतले होते. अर्थात ही मदत का केली जात असेल असे प्रश्न आमच्या मनाला त्यावेळी पडणे अगदी अशक्यच होते. कर्णोपकर्णी बोधले सर सर्वांना माहिती होऊ लागले आणि क्लासला गर्दी होऊ लागली.
यथावकाश क्लासमद्धे शिकवणे चालू झाले. असेच ५-६ दिवस झाले असतील आणि एके दिवशी सरांची घोषणा केली की आज नेहमीच्या क्लासेस ऐवजी एक कार्यक्रम होणार होता. त्यासाठी त्यांनी गावातीलच एका पुजारीस बोलावले होते. 'तरूण मुले आणि अध्यात्म' यावर त्यांचे भाषण होणार होते.
कार्यक्रम चालू असताना सरांनी प्रथमेश ला बोलावून घेतले आणि पैशे देऊन कुठेतरी पाठवले. तो जाताच त्यांनी मला खूण करून बोलावून घेतले. मला म्हणाले , " प्रवीण आता ५ -१० मिनीटात हा कार्यक्रम संपेल. त्यांचे भाषण झाले की तुला आभार प्रदर्शनाचे भाषण द्यायचे आहे. मला कळाले आहे की तू चांगला भाषण देतोस. त्यामूळे तुलाच ही जबाबदारी देतोय. " माझ्या प्रतिसादाची वाट ही न पाहता सर दुस-या एका मित्रासोबत बोलू लागले.
आता डिप्लोमाला मी कधीतरी भाषणे दिली होती. आमच्या मित्रांनाही ती आवडत असत. पण असे एकदम तयारी न करता बोलायचे म्हणजे ?
असे विचार मी मनात घोळवत आहे इतक्यात तर त्या पुजारांचे भाषण संपलेदेखील. सरांनी माझे नाव आभारप्रदर्शणासाठी घेतले. मी समोर जाऊन माईक हातात घेतला आणि सरांकडे पाहिले.सर माझ्याकडे पाहून आश्वस्थपणे हसले. मी भाषण चालू केले , " आजची तरूण पिढी अध्यात्मिक नाही असा आरोप नेहमीच केला जातो. पण खरी परिस्थीती ही आहे की त्या अध्यात्माचे स्वरूप बदललेले आहे. तरूणांचे अध्यात्म आता देव्हा-यापुरते बंदिस्थ राहिलेले नाही. माणसामाणसातील देव आम्ही पाहू शकतो. आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्यांच्या रुपाने आम्हालाही देवाच्याच रुपाकडून अध्यात्माचे ज्ञान मिळाले. मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो..." मी असाच काहीबाही बोलत राहिलो आणि एकदाचे ते भाषण संपले. मी थांबलो आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. सरांच्या विश्वासाचे आपण सार्थक केले ह्या भावनेने मन भरुन आले.
बाजूला प्रथमेश बुके घेऊन उभा होता. त्याने एवढ्या कमी वेळेतही कुठून तरी बुके पैदा केला होता. सरांनी त्या पुजा-यांचा सत्कार केला आणि कार्यक्रम संपला.
ह्या कार्यक्रमात फक्त मी आणि प्रथमेशच नव्हे तर ब-याच जणांचे हात लागले होते . अगदी थोड्याच वेळेचा अवधी मिळालेला असतानाही आम्ही सगळ्यांनीच उत्तम काम करुन दाखवले होते. सरही आमच्यावर प्रचंड खुष होते. सरांसोबत क्लासचा प्रत्येक मुलगा - मुलगी भावनिकरित्या जोडला गेला होता.एक टीम इथे तयार झाली होती.
जाताना मी आणि प्रथमेश सोबतच निघालो. प्रथमेश म्हणाला "चल आज तूला चहा पाजवतो" नेहमी पैसे काढायला का कू करणारा हा आज अचानक पैसे द्यायला तयार झाला होता. मी त्याला तसे विचारले. तेव्हा डोळे मिचकावून प्रथमेश म्हणाला ," सरांनी बुके साठी शंभर दिले होते. बुके तर सत्तरलाच मिळाला. माझ्या अोळखीचा तर आहे तो.."
प्रथेमशच्या अशा असंख्य अोळखी. प्रथमेशने कॉलेजचे दोन वर्ष जनरल सेक्रेटरीचे काम बघितले होते. कामाला हा पोरगा वाघ होता. पण कामात असे राहिलेले पैसे तो अॅडजस्ट करायचा. तो चोर होता वा चोरी करायचा अशातला भाग नाही , पण पै अन पैचा हिशोब ठेवणे त्याच्या स्वभावात नव्हते.
"अरे पण सरांचे पैसे आहेत ना ते ?" इति मी. "अरे मग एवढ काय त्यात ! तीस रुपयाची पण नाय गोष्ट. तेवढ चालत रे.. तू आता सत्यवादी बनणार आहेस का येतोस चहाला ते सांग.." प्रथमेश उत्तरला. मी गूपचूप चहाला सोबत गेलो.
चहा पिताना आम्हाला मोहितने बघितले. मोहित हा आमचा सिनियर.सरांचा अगदी जवळचा. सर सांगितील ते काम हा मुकाट्याने करी.त्याला सरांनी आर्थिक मदत केल्याचेही कानावर आले होते.
एक दोनदा तर चक्क झाडू मारतानाही आम्ही त्याला पाहिले होते. काहीसा गुढ स्वभाव होता त्याचा. फारसा बोलायचा नाही.
प्रथमेशने त्यालाही आमच्यासोबत चहासाठी बोलवले. तोही फारसे आढेवेढे न घेता आमच्यासोबत आला. प्रथमेशने त्याला विचारले ," काय रे मोहित पुढचा कार्यक्रम काय आहे हे सरांशी बोललास का ? " " हो. पुढच्या आठवड्यात आपल्याला 'आसरा' अनाथाश्रमात जायचे आहे. मी तिथली परवानगीही घेऊन आलो आहे. येत्या शनिवारी बोलावले आहे. तयारी करावी लागेल. काहीतरी वेगळ करा असे म्हणत आहेत सर. " मोहितने उत्तर दिले.
वेगळ काय करावे या विचारत मी चहाचा शेवटचा घोट घेऊन कप परत दिला. जाताना एका माणसाचा धक्का लागला आणि बाजूच्याच एका पोस्टबॉक्सला मी धडकलो. " अशा ठिकाणी कशाला ठेवलाय पोष्टबॉक्स देव जाणे. " कावलेल्या स्वरात मी तक्रार केली. त्यावर प्रथमेश म्हणाला ," अरे आत्ताच्या काळात ही पत्र तरी कोण पाठवत बसलयं काय माहिती."
प्रथमेशचे ते उत्तर ऐकले आणि मी उत्तरलो , " कोणी कशाला ? आपणस पाठवू. " प्रथमेश आणि मोहित काही न समजल्यासारखे माझ्याकडे बघू लागले. तेव्हा मी माझी कल्पना त्यांना पटवून देऊ लागलो. ," हे पहा आपण ना अथानाश्रमातल्या मुलांसाठी आपण सरळ पत्र पाठवून देऊ. अगदी आपल्या हाताने लिहून. त्यांनाही आपली कोणीतरी आठवण काढून पत्र पाठवत आहे ह्याचा आनंद नक्कीच होईल." दोघेही यासाठी लगेच राजी झाले. नंतर जेव्हा सर आणि इतरांना ही कल्पना सांगितली तेव्हा सगळ्यांनीच ती उचलून धरली.
अनाथ आश्रमात प्रथमेश आणि मोहितने आधी काही चक-या मारल्या आणि लागणारी माहिती गोळा केली. हळूहळू सगळी सुत्रे प्रथमेशच्या हाती जाऊ लागली. एक एक करता सगळी तयारी एकदाची झाली.
कार्यक्रमाचा दिवस उजाडला. आमच्या आधीच आमची पत्रे तिथे पोहचली होती. आम्ही त्या लहानपोरांहून लहान होत मनसोक्त दंगा केला , खाऊवाटप केले. एकीकडे आम्ही त्या पोरांसोबत दंगा करत होतो आणि तेव्हाही तो मोहित हिशोबच करत बसला होता. हिशोबाचे त्यानी स्वताःच्या अंगावर घेतले होते. काही केल्या त्याला हिशोब लागेना. तोपर्यंत पत्रवाचनाची वेळ झाली होती. मी तसेच मोहितला अोढत त्या कार्यक्रमात आणले. आमच्या पत्रांना उत्तर म्हणून त्या चिमूकल्यांनीही पत्रे लिहिली होती. आपण करत असलेले काम सार्थकी लागत आहे ही एकच भावना आमच्यात होती.तिकडे मोहित मात्र अजूनही अस्वस्थच होता. तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला. मी सहज बघितले तर फोन सरांचा होता.
सरांचा फोन ? या वेळी तर सर कुठल्या तरी कार्यक्रमात जाणार होते. आणि त्यासाठीच ते इकडे आमच्या सोबत आले नव्हते. असेल काही तरी काम म्हणून मी दुर्लक्ष केले.
थोड्यावेळात मोहित फोनवर बोलून परत आला. मी काय झाले याअर्थी खूण केली. तेव्हा मोहित म्हणाला ," तुला टायगर्स असोसिएशन माहिती आहे ना ? समाजकार्य करणारी ती एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आपले सर तिचे सभासद होते. त्यांची त्या संघटनेच्या नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. हा कार्यक्रम संपला की त्यांनी सगळ्यांना घरी बोलावले आहे. "
कार्यक्रम संपताच आम्ही सरांच्या घरी गेलो. चहापाणी झाले आणि सरांनी आमच्या कार्यक्रमाची माहिती घेतली. एकूण कार्यक्रमात सगळ्यांनाच मजा आल्याने प्रत्येकाने आपला अनुभव सांगितला. विशेषतः पत्रवाचनाचा उल्लेख सारखा होत राहिला.
त्यानंतर सगळ्यांनी सरांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. सर सगळ्यांना थांबवत म्हणाले , " मलाच नाही तर स्वताःलाही शुभेच्छा द्या. कारण केवळ मीच नाही तर तुम्हा सगळ्यांना मी टायगर्स असोसिएशनमद्दये सहभागी करून घेतले आहे." सरांनी ही घोषणा केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.
सर पुढे बोलू लागले ," महत्वाची बातमी तर पुढे आहे.आता आपल्या टिमला एक अध्यक्ष असेल. मी अध्यक्ष निवडताना खूप विचार केला. " एवढे बोलून सर थांबले.
ब-याचजणांच्या नजरा प्रथमेशकडे लागल्या. काहीजण एकदा प्रथमेशकडे तर एकदा मोहितकडे पहात राहिले.दोघांनीही उत्तम काम केले होते
सरांनी परिस्थितीचा पुरेपुर अंदाज घेतला आणि आपले बोलणे पुढे चालू ठेवले. ," आपल्याला अध्यक्ष असा पाहिजे जो उत्तम वक्ता असेल. कारण ब-याचवेळेस अध्यक्षाला आमच्या कमटीबरोबर गावातल्या लोकांसमोर भाषण द्यावे लागते. अध्यक्ष म्हणजे केवळ सांगितेले कामे पार पाडणारा असून चालत नाही. त्यास स्वताः च्या कल्पना असणे आवश्यक असते. ही दोन्ही गुण प्रवीणकडे आहेत. म्हणून प्रवीण अध्यक्ष व्हावा असे वाटते. "
आता सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे लागल्या होत्या. मी मात्र प्रथमेशकडे पहात होतो. तो खाली मान घालून बसला होता.
सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन मी घरी निघालो. प्रथमेश अजूनही माझ्याशी बोलायला आला नव्हता. एक एक करून सगळे निघून गेले. आता फक्त मी प्रथमेश आणि मोहित राहिलो. प्रथमेशने गाडीला किक मारली आणि तो पुढे निघाला. मोहित माझ्या बाजुला आला आणि बोलू लागला , "टीममद्धे आता मित्र नाही तर पदे आली. पदे आली आणि पदांसोबत प्रतिष्ठाही आली. पैसा तर आधीच आला आहे. यात्र मित्र कुठे असतील कुणास ठाऊक ! "
पाठमो-या प्रथमेशकडे मी केवळ पहात राहिलो. तेवढ्यात दोन अनोखळी लोक पळत माझ्याकडे येताना दिसले. एकाच्या हातात काठी दिसत होती. मला पुढच्या संकटाची जाणिव झाली आणि जिवाच्या आकंताने मी अोरडलो, " प्रथमेश..."
क्रमशः...
वाचने
7047
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाग एक इथे आहे.
योग्य ठिकाणी क्रमशः टाकले आहे
छान...
वाचतो आहे
छान लिहिलंय
ज्या वेळी भाग क्र 3 येईल