user

अनादि मी अनंत मी...

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला,
मारील रिपू जगती असा कवण जन्मला...

असे म्हणणार्‍या आणि लहानपणीच शिवाजीच्या थाटात "देशाच्या स्वातंत्र्याकरता मारीता मारीता मरेतो झुंझेन" अशी शपथ घेणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज म्हणजे २८ मे ला, १२५ वी जयंती आहे. आज म.टा. मधे त्यांच्यावर विशेष ऑनलाईन पुरवणी काढण्यात आली आहे. त्यातील श्री. भारतकुमार राउत यांचा "तात्यांच्या सहवासात" हा लेख वेगळ्याच अनुभवावर आधारीत असल्याने वाचनीय वाटला.

त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे: (ती वाचताना एकच गोष्ट खटकली, ती म्हणजे म.टा./बातमीदाराने त्या प्रत्येक शब्दाचा इंग्रजी अथवा समानार्थी दिलेला प्रतिशब्द/अर्थ)

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
प्राध्यापक (प्रोफेसर)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
परीक्षक (एक्झामिनर)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

वंदन...!

तात्यारावांच्या स्मृतीस वंदन...

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

प्रतिभा

यातले अनेक शब्द रोजवापरात आलेले आहेत. ही असामान्य प्रतिभा म्हणावी.

असामान्य प्रतिभा

नम्र अभिवादन.

वंदन

सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही.

(नम्र) आजानुकर्ण

मात्र, भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे. :B एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. #o अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे.

उदा. दूध, मासा, डुक्कर, कोंबडा असे रोजच्या वापरातले शब्द सोडून भाषाशुद्धी करून सोवळे केलेले दुग्ध, मत्स्य, वराह, कुक्कुट असे शब्द वापरण्याचा आग्रह भाषाशुद्धी करणारे सफाईकामगार करतात. #:S अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय Wink) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? (|:

आपला,
(स्पष्ट) आजानुकर्ण

अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. ~X(

आपला,
(तौलनिक) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)

मूळव्याध!

अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे.

माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते!

कोलू राहिला दूर, आधी एक सबंध दिवस नारळ तरी सोलून दाखव, किंवा बिनधास्त भर समुद्रात उडी मारून दाखव, किंवा बेरीसायबाला त्याच्याच कैदेत असतांना निडरपणे, 'पण ब्रिटिश राजवट या देशात ५० वर्षे टिकेल काय?' हा प्रश्न विचारून दाखव आणि मग अगदी हव्वी तेवढी मतं मांड म्हणावं तात्यारावांबद्दल!

आला मोठा मतं मांडणारा फोकलिचा!! =))

असो, बाकी चालू द्या!

आपला,
(कट्टर सावरकरभक्त!) तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

सहमत ...

अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे.
माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते!

सहमत आहे ...

बाकी सावरकरांचे कर्तुत्व पहायचे सोडून असल्या फालतू गोष्टीकडे आवर्जून लक्ष देणे ह्यालाच कदाचीत "काँग्रेसी मानसीकता" म्हणत असावेत ...
असो. विषयांतर नको ...

"न घेतले हे व्रत अंधतेने " अशी भुमीका असणार्‍या "स्वातंत्रसुर्य तात्याराव सावरकरांच्या " स्मॄतीस आमचे अभिवादन ...

(कट्टर सावरकरभक्त!) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

काय संबंध?

कोलू पिसण्याचा आणि भाषाविषयक धोरणांचा काही संबंध म्या अडाण्याला स्पष्ट कराल का तात्यासाहेब.

(वरच्या आळीतला) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)

भाषातज्ञ ?

अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे.

सावरकरानी जेवढे म्हणुन प्रती शब्द दिलेत ते शक्यतो मराठी शब्दच दिले आहेत. जिथे शक्य नाही तिथे आई (संस्कृत ही मराठीची आईच)कडून काही शब्द घेतले तर काय बिघडले? का त्यानी फारसी वा अरबी भाषेतील शब्द घ्यायला पाहिजे होते? इंग्रजी, फारसी,उर्दू,अरबी शब्द काढून संस्कृतप्रचूर शब्द दिल्याने मराठीचे अत्यंत नुकसान कसे काय झाले?

अंदमानात कोलू पिसत असतानाही मातृभूमी आणि मातृभाषे बद्दल विचार करणार्‍या महामानवाला वंदन!

आंबोळी

मराठी

दिनांक
क्रमांक
उपस्थित
प्रतिवृत्त
नगरपालिका
महापालिका
महापौर
पर्यवेक्षक
विश्वस्त
त्वर्य/त्वरित
गणसंख्या
स्तंभ
मूल्य
शुल्क
हुतात्मा
निर्बंध
शिरगणती
विशेषांक
सार्वमत
झरणी
नभोवाणी
दूरदर्शन
चित्रपट
मध्यंतर
अर्थसंकल्प
क्रीडांगण
प्राचार्य
विधिमंडळ
क्रमांक
बोलपट
नेपथ्य
वेशभूषा
दिग्दर्शक
प्राध्यापक
मुख्याध्यापक
शस्त्रसंधी
टपाल
दूरध्वनी
ध्वनिक्षेपक
परीक्षक
तारण
संचलन
गतिमान
नेतृत्व
सेवानिवृत्त
वेतन

यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? संस्कृत ही मराठीची आई आहे. मग फारसी आणि अरबी काय पूतना मावश्या आहेत का? ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते.

आपला
(पूतनामामा) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)

मामासाहेब

मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले?
इथे प्रश्न नुकसान भरून निघण्याचा नसून तुम्ही उपस्थीत केलेल्या मराठीचे अत्यंत नुकसान झाले याचा आहे. या शब्दांमुळे असे काय नुकसान झाले हो मराठीचे? आणि पुतनामावशी अरबी/फारसी शब्द वापरुन असा काय फायदा होणार होता मराठीचा?

त्वर्य, हुतात्मा, मूल्य हे शब्द जर अवघड आहेत तर प्लेबिसाइट,अर्जंट,शहीद वगैरे शब्द सोप्पे कसे ते ही सांगा.

सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते.
आयला..... मग मराठीला बिचकून ते कुठली भाषा वापरतात? अरबी , फारसी की इंग्रजी?

आंबोळी

मराठीचे नुकसान

मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला.

हे विधान खोटं वाटत असेल तर बिरूटेसरांनी येथे येऊन हे खोटे आहे हे सांगावे -

मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली.

नाळ

मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला.
यात संस्कृतच्या नाळेचा काय संबंध?
आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?

आंबोळी

तुम्हाला कळत नाहीये

का कळून घ्यायचं नाहीये...म्हणजे कळून घ्यायचं नसेलच तर हा शेवटचा प्रतिसाद.

आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?

संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? तसे नसल्यास हा उगीच शब्दच्छल कशाला?

इंग्रजी भाषा भारतात वापरली जाते. तिची परिस्थिती संस्कृत, अरबी किंवा फारसीप्रमाणे नाही तेव्हा तिला एकाच तागडीत का तोलताय?

संस्कृतात

संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का?
भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे.ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? हे मामासाहेबांचे(कर्ण) वाक्य काय सुचवते?
संस्कृतातून नवे शब्द आणा आणि अत्ता प्रचलित मराठी शब्दांच्या ऐवजी वापरा असेही कोणी म्हणत नाही (उदा.डुक्कराला वराह्,कोंबड्याला कुक्कुट).
पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले?

वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?

आंबोळी

मला तसे वाटत नाही

पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले?

हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे.

वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?

या वाक्यावरून वाद सुरू झाला म्हणून वाद वाढवण्यासाठी टॉल क्लेम्स करावेत असे आहे काय?

मला बोजड

मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत.
अहो प्रियाली ताई हेच तर सांगतोय मी..... तुम्हाला अरबी-फारसी शब्द जवळचे वाटतायत तर तुम्ही ते वापरा. सावरकराना संस्कृत शब्द जवळचे वाटले म्हणुन त्यानी ते आणले.... दोघांच्याही मराठीप्रेमाविषयी शंका घेण्याचा प्रश्नच असु नये...
पण सावरकरानी मराठीचे नुकसान केले अश्या दुगाण्या लोक का झाडातायत ?

आंबोळी

सहमत आहे.

मराठी भाषेचा स्वतंत्र असा प्रवास होईपर्यंत संस्कृत शब्दांनी, रचनांनी, मराठीची दुर्दशाच झाली असे वाटायला लागते. प्रमाण संस्कृत जेव्हा बोलल्या जात असावी तेव्हा बहुजनांना इतर भाषेकडे वळवले असले तरी प्रारंभीच्या मराठीला संस्कृत शब्दांच्या भरणांमुळे बीचकावे लागेल अशी अवस्था नक्कीच असेल, तसे नसते तर प्राकृत बरोबरचा मराठी भाषेचा प्रवास अधिक जोमदारपणे झाला असता असे म्हणन्यास हरकत नसावी असे वाटते.


मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली.

इतिहासाच्या एका जाणकार अभ्यासकांने, सतत ज्यांचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण असतात, अनेक ऐतिहासिक संदर्भासहीत लेखन असते, अशा लेखन करणा-या एका लेखकाने केलेले कौतुक अभ्यासाचे बळ देते. आपले मनापासून आभार !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संस्कृत मराठीची आई

तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत.

बाकी, सावरकरांना प्रणाम. त्यांनी आपल्या परीने कार्य केले. त्यांनी दिलेले सर्व शब्द स्वीकारावे असे तर नाही. जे शब्द रूजू होतात ते आपोआप स्वीकारले जातात, जे होत नाहीत ते मागे पडतात. भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते.

शंका

"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का.

अभिज्ञ

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

कशासाठी

काही माहित नाही बॉ. असा शब्द कशासाठी हवा आहे?

(प्रश्नार्थक) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)

हाहाहा!

"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का.

या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका.

मला फारसी, मागधी, पाली भाषा येत असत्या तर शब्द जरूर सांगितला होता. दुर्दैवाने, शाळेत संस्कृतच शिकवली, तरीही एखाद्या मराठी शब्दाला संस्कृत शब्द सुचवा असे सांगितले तर तेही मला जमायचे नाही.

असो, तुमची शंका हास्यास्पद आहे.

गळचेपी?

या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा.
फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी? हे कळत नाही... आणि मग फारसीच का? हिब्रु, स्वाहीली, सिंहली झालेच तर आफ्रिकेतील भाषा यांचा विचार का नाही करायचा? असो.
विषय फारच भरकटत चाललाय....
आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले?

अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही.
अतिअवांतर :१) संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. म्हणजे संस्कृत येत असणार्‍यानी मारुन मुटकून बाकीच्या भाषांची गळचेपी केली.
२)भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते.
ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही.

अभिज्ञ

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

आक्षेप

आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले?

अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही.

सहमत.

प्रशासकीय सेवेतील लोकाना जाज्वल्य देशा/भाषाभिमानापेक्षा सेवा महत्वाची असते.

आंबोळी

हाहा!!

फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी?

मग संस्कृतात तरी का करावी? मजेशीरच दिसताय.

ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही.

आणि चष्मे उतरवल्याशिवाय कळणारही नाही.

मारून मुटकून भाषेची गळचेपी करणे आणि मारून मुटकून भाषा तयार करणे या एकच गोष्टी आहेत काय? हाहा!!

प्रियालीताई..

कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या. पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे.
दुसर्‍याला उपदेश करणे सोपे असते पण स्वतः ते आचरणात आणणे अवघड असते.

पुण्याचे पेशवे

पुण्याचे पेशवे
|| हल्ली आम्ही संवेदणशील 'वाचण' बंद केले आहे ||

आचरटपणाचा कळस

कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या.

हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही.

पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे.

संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. :=)) पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा.

आम्हाला आचरट म्हणोनी काम होणार नाही...

तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत.
हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही.
वरील विधाने आपल्याच वेगवेगळ्या प्रतिसादातून निवडली आहेत. आता ठरवा बुवा आचरट कोण ते.

संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका.
संस्कृताचा चष्मा नाही का? मग कोणता बरे??? संस्कृत मराठीची आई हा संस्कृताचा चष्मा नाही होत का? वा! मला चष्मे कळत नाहीत का ! असेल बॉ.. आम्ही नाही ना तुमच्यासारखे भाषातज्ञ.
संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. : पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा.
आपण हसे लोकाला आणि *** आपल्या नाकाला. अशी सध्या गत तुमची मला वाटत आहे.

हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे.
अहो आता 'संस्कृताला मराठीची जननी' म्हटलेले तुम्हाला नाही ना सहन होत तसेच आहे इतरांचे. त्याना उगाच पाली का फारसी काय त्या भाषा मराठीच्या जनन्या का काय ते म्हटलेले नाही सहन होत.

(आचरट)
पुण्याचे पेशवे

पुण्याचे पेशवे
|| हल्ली आम्ही संवेदणशील 'वाचण' बंद केले आहे ||

धन्य आहे

आचरटपणाची.

पेशव्यांशी

बर्‍याच अंशी सहमत.
आजही जर मराठीतील मूळ शब्द काढुन पाहिले, तर संस्कृत शब्दांचा किंवा संस्कृत मधुइन आलेल्या शब्दांचा भरणा जास्त असावा असं वाटतं. अगदि लेखन शैली पासुन.
मराठी डाविकडुन उजवीकडे लिहितात (संस्कृत प्रमाणे)
अरबी उजवीकडुन डावीकडे.
मराठित अरबी शब्द आले, त्या काळात आख्ख्या भारतावर इस्लामिक पगडा चढला होता.
खुद्द मोठ मोठ्या मराठा सरदारांची नावं पीर्-जी, शेखु-जी,शहा-जी,मौला-जी अशी ठेवली जात होती.
(मग इथल्या भाषेमध्ये या शब्दांचा प्रवेश झाला त्यात नवीन काय?)
आता ती/तशी नावं सुद्धा अगदि मराठी संस्कृतीला धरुन आहे का?
तशी नावं तुम्ही आज ठेवाल का?

आपलाच,
मनोबा

आपलाच,
मनोबा

पाली भाषेतील पर्यायी शब्द

"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का.

अभियांत्रिकी, या शद्बाला पाली भाषेत ' सिप्पस्तथ्य' असा शब्द आहे.
सिप्प = शिल्प
स्तथ्य = शास्त्र
शिल्पशास्त्र .

बाकी भाषेचे जाणकार भेटल्यावर 'अभियांत्रिकी' शब्दास पर्यायी शब्द असल्यास इथे नक्कीच टंकेन Smile
चुभुदेघे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समजा

"अभियांत्रिकी"चे पर्यायी शब्द या भाषांत आहेत ते:-

फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी
मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. )
पाली:- बिरुटे सरांनी दिलेला शब्द
स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो

हां मिळाले?
आता सांगा,हे शब्द कशासाठी हवे आहेत?
मला तरी ह्या "अभियांत्रिकी"साठी पर्यायी शब्द शोधत बसायचं प्रयोजन कळलं नाही.
आपण स्पष्ट केलत, तर खरच बर होइल.

आपलाच,
मनोबा

आपलाच,
मनोबा

अवघड.

फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी
मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. )
पाली:- सिप्पस्तथ्य
स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो

हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद.
हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय?

अभिज्ञ

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

धन्यवाद आजानुकर्ण साहेब

>>सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही.

धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व.

:)

धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व.

हा हा हा! हे मस्त! Smile)

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

भाषाशुद्धी

सावरकरांनी सुचवलेली भाषाशुद्धी ही परभाषेतील शब्दांना मराठी भाषेत प्रतिशब्द तयार करण्यासंदर्भात होती. त्यात त्यांना जे वाटले तसे शब्द त्यांनी तयार केले. प्राकृत भाषेतील शब्दांना संस्कृतप्रचूर केल्याचे ऐकलेले नाही. आपण म्हणलेल्या शब्दांबद्दल (दूध, मासा, डुक्कर, कोंबडा इत्यादी) आणि त्यांच्या नेहेमीच्या वापराबद्दल त्यांना काही पडले असेल असे वाटत नाही.

अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे.

म्हणजे इतर भाषातज्ञ आणि भाषावैज्ञानिकांनी म्हणलेले बरोबर ... बरं मग अशा भाषातज्ञांचे नक्की योगदान तरी काय? माधवरावांच्या मराठी भाषेतील योगदानाबद्दल शंका नाही, पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार हा एक प्रश्न येतोच.

बाकी सरकारने शासकीय मराठी भाषा तयार करताना काय केले हा वेगळाच मुद्दा आहे. त्यांच्या हयातीत तर तमाम काँग्रेसची सरकारे होती - ज्यांना सावरकरांबद्दल फार प्रेम होते अशातला भाग नाही...

म्हणून आपण म्हणत असलेला मुद्दा योग्य जरी वाटला तरी सावरकरांसंदर्भात (आणि या लेखा/चर्चेसंदर्भात) थोडाफार अवांतर वाटला.

अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा.

हे बाकी बरोबर. त्यासाठी मूळ बातमीतील खालील परीच्छेद वाचल्यावर त्यांच्या इतर लेखात/बातम्यात काय अवस्था असते असा विचार माझ्याही डोक्यात आला होता...

आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ’ , ‘ यू सी ’ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं.

विकासराव तुम्ही सुद्धा?

धन्यवाद विकासराव, तुमचा प्रतिसाद जरा संयमित आणि भक्तीच्या नशेखाली दिलेला नाही असे दिसते पण

पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार

हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे!

अहो सावरकरांचाच वारसा अनेक वर्षे त्यांनी पुढे चालवला आणि उतारवयात आपले भाषाविषयक धोरण चुकीचे आहे ही जाणीव झाल्यावर भाषाशुद्धीवर सडकून टीका केली आणि पुन्हा म्लेंच्छ आणि यवनांचे फारसी-अरबी शब्द जोमाने वापरले.

(चकित) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)

आश्चर्य

हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे!

सर्वप्रथम मी माधव ज्युलीयनना सावरकरांचे शत्रू अथवा विरोधक वगैरे म्हणले असे मला तरी वाटत नाही. माझा मुद्दा सरळ होता, जो माणूस स्वतःच्या टोपण नाव म्हणून "ज्युलीयन" हा शब्द वापरतो त्याचे भाषा विषयी सावरकरांशी मतभेद असले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. शिवाय माझे तेथे असेही म्हणणे होते की जे कोणी भाषाततज्ञ वगैरे आहेत (ज्यांचे सावरकरांशी त्या संदर्भात मतभेद होते, असे) त्यांचे नक्की भाषेच्या बाबतीत एक तज्ञ म्हणून योगदान काय होते? पण, आपण ह्या मूळ मुद्यांना बुद्धीवादीपणा दाखवण्याच्या नशेत बगल मारलीत.

सावरकरांना वाटले की मराठी भाषेत परभाषेतील शब्दांना समान तयार शब्द होऊ शकतात आणि त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होऊ शकते, त्यांनी तसे केले. त्यावर आपला आक्षेप काय, तर, "यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? ... ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते."

म्हणजे आपला मुद्दा हा संस्कृत भाषेवर आणि संस्कृत प्रचुर शब्द वापरले यावर आहे. बाकी त्वर्य हा शब्द मला माहीत नाही पण हुतात्मा आणि मूल्य हे शब्द नक्की कोणाला वापरताना बिचकायला होते ते माहीत नाही.... तसे म्हणाल तर "अजानु" आणि "कर्ण" असे दोन संस्कृतप्रचूर शब्द वापरून केलेले नाव देखील आम्हाला वापरताना बिचकायला होते (ह.घ्या.) तेंव्हा एखादे फार्सी नाव कसे सुचले नाही याचे पण आश्चर्य वाटते. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण मराठी भाषेतील संस्कृतोद्भव शब्द हे वजा केल्यास ना धड तुम्हाला लिहीता येईल ना धड तुम्हाला आवडणारे अधुनीक अथवा संतसाहीत्य पुरे होऊ शकेल. "न लगे मुक्ती आणि संपदा" असे म्हणत तुकारामाने संस्कृत शब्द का वापरले, त्यामुळे सामान्य "हे ची दान देगा देवा" असे म्हणताना बिचकून जातात असे उद्या म्हणाल... (ह. घ्या.) थोडक्यात तुम्ही संस्कृतशी नाळ आहे असे माना अथवा मानू नका, तो केवळ शब्दच्छल आहे, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. हे आपल्याला समजत नसेल तरच आश्चर्य आहे.

आता थोडेफार भक्ती आणि नशेबद्दल

मी काही कुणाएका भक्तसंप्रदायतील नाही ज्याचे जे आवडते/भावते त्याला तेथे हार घालायला मला कमी वाटत नाही. थोडक्यात ज्याच्यात जे चांगले दिसते त्याचे तेव्हढ्यापुरते गुणगान करतो. नाहीतर, "गुणगाईन आवडे हेची माझी सर्व जोडी" असे म्हणायचा मला अधिकार कसा राहील?

आणि राहता राहीली नशा - त्यात काही फक्त भक्तीचाच सहभाग नसतो तर एखादी गोष्ट एकेरी पद्धतीने पाहत, मनात वेगवेगळी ओझी बाळगत आकसाने बघणार्‍या वृत्तीचापण सहभाग असतो, इतकेच म्हणावेसे वाटते.

+१ विकासराव.

हेच म्हणतो मी.
पुण्याचे पेशवे

पुण्याचे पेशवे
|| हल्ली आम्ही संवेदणशील 'वाचण' बंद केले आहे ||

भाषाशुद्धी

ब्रिटीशांच्या राजवटी मध्ये इंग्रजीचा नको इतका पुरस्कार होणार आणि अनावश्यक इंग्रजी शब्द घुसडले जाणार हे निश्चितच आहे. हे 'अनावश्यक' शब्द काढून टाकून त्याला पर्यायी सुटसुटीत मराठी शब्द रुळवणे हे गरजेचे होते/आहे. त्यासाठी सावरकरांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. पण काही ठीकाणी हा आग्रह जेव्हा 'हट्ट' बनतो तेव्हा वाद उत्पन्न होतो. उदा. वरील यादीतील काही शब्द - झरणी - हा शब्द मी आयुष्यत कधीही वापरला नाही. 'शाईचे पेन' हा सुटसुटीत प्रकार शाळेत असल्यापासून वापारला.
वेतन - 'पगार' हा रुळलेला (कोणत्या का भाषेतला असेना!) शब्द उपलब्ध असताना 'वेतन' हा (आणखी दुसरर्‍या भाषेतुन उधार आणलेला) शब्द लादण्याचे काय कारण?

सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही.

रामेश्वरा ऐवजी सोमेश्वर

सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही.

कारण सोप्पे आहे! लेख लिहीताना केवळ त्यांची १२५ वी जयंती आहे त्यानिमित्ताने नुसते अभिवादन लिहीण्याऐवजी आणि दरवेळेस त्यांची उडी अथवा अंदमान लिहीण्याऐवजी म.टा. मधे आयती शब्दांची यादी लिहीली होती ती येथे दिली आणि त्यांची एक वेगळीच ओळख दिली.

पण झाले भलतेच. रामेश्वरची चर्चा सोमेश्वर जाऊन आदळली...

सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना आणि त्यांना सक्रीयराजकारणात येण्याची बंदी असताना भाषाशुद्धि आणि इतर सामाजीक कामाने लोकजागृती सुरू केली. थोडक्यात जे काही शस्त्र हातात होते त्याचा उपयोग प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्रिटीशांच्या विरोधातील धार वाढवायला करणे हा उद्देश. झरणी हा शब्द आपण दाखवल्यावर वाचला आणि "व्हॉट अ पेन!" असे उद्गार डोक्यात आले Smile थोडक्यात प्रत्येक शब्द पटला पाहीजे असे कोण म्हणते? पण उद्देश समजणे महत्वाचे. पण त्या ऐवजी संस्कृत आणि इतर असला वाद चालू झाला.

"रत्नागिरीला असताना सावरकरांकडे गुप्तपणे इतिहासकार र.गो.सरदेसाई त्यांना भेटायला गेले. तेंव्हा सावरकर त्यांना म्हणाले की लोकं मला भेटायला घाबरतात कारण असा एक समज आहे की माझ्याशी संबंध आला तर काही तरी त्रासच होणार, तेंव्हा तुम्ही कसे आलात? "

बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत!

+१

>> बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत!

+१.

आपलाच,
मनोबा

आपलाच,
मनोबा

तात्यारावांच्या स्मृतीला अभिवादन

स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. तात्यांचा भाषाशुद्धीचा प्रयत्न खरोखरच फार उत्तम आहे असे वाटते.

एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते.
मुळात मग नवीन शब्द सुचवण्याचे प्रयोजनच काय जर तो वापरायचा नसेल तर?

मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे.

आणि वरील मते ही फक्त आपल्यालाच भाषेतले काहीतरी कळते असा पुरोगामी अहंकार जोपासणार्‍याची असतात असे मला वाटते.

अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय?
असाच एक बदनाम कोष शिवाजी महाराजानी 'राज्यव्यवहारकोष'या नावाने मराठी भाषा फारसीच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी तयार करवून घेतला होता.

त्यामुळे भाषाशुद्धीचा प्रयत्न मला मुळीच भंपक वाटत नाही.
(सनातनी)
पुण्याचे पेशवे

पुण्याचे पेशवे
|| हल्ली आम्ही संवेदणशील 'वाचण' बंद केले आहे ||

अभिवादन

प्रतिभावंताला विनम्र अभिवादन !!!

अभिवादन

स्वातंत्रसुर्य तात्याराव सावरकरांच्या " स्मॄतीस आमचे अभिवादन ...

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

माझीही विनम्र आदरांजली!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलेल्या महान कार्याच्या १लक्षांश जरी कार्य आपल्या सारख्यांना करता आले तरी आपण कृतकृत्य होऊ. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. Smile

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सहमत..!

काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही .

सहमत आहे!

अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय.

अवांतर - फडके, टिळक, चाफेकर, सावरकर, कान्हेरे, या मंडळींनीही मधल्या आळीला अभिमान वाटावा असे कर्य केले आहे! Smile
असो, आपण विषय काढलात म्हणून चोख उत्तर द्यावं लागलं, नाहीतर आम्हाला कोणत्याही आळीत शिरण्याची काहीही आवश्यकता नव्हती! मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखन एन्करेज करत नाही!

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

स्वातंत्र

स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. !!!!!

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विनम्र अभिवादन

ह्या महान स्वातंत्र्यसैनिकाला शतशः प्रणाम!

प्रशांत.

हे पुलंचे वाक्य आहे.

"मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय.

हे पुलंचे वाक्य आहे आणि ते कोणत्या संदर्भातले आहे हे मी तात्यासारख्या भाईकाका भक्ताला सांगावे लागतेय हे काही बरे नाही.
मधल्या आळीतल्या लोकांच्या गुणांना नव्हे तर अवगुणांना उद्देशून हे वाक्य आहे.(हिणकस शेरा मारण्याची वृत्ती)
बाकी वैयक्तिक रित्या मी जातीपातींचा समर्थक मुळीच नाही हेही इथे नमूद करतो.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

च्यायला

भाषाशुद्धीच्या नावाने गावगोंधळ घालणार्‍यांना माधव जूलियन हे स्वतः भाषाशुद्धिसाठी झटणारे होते हे माहिती नसावे हे दुर्दैव व त्यांच्या अडाणीपणाचे प्रदर्शन करणारे आहे. सावरकरांपासून प्रेरणा घेऊन माधवरावांनी भाषाशुद्धीची चळवळ चालवली आणि स्वतःच्या चांगल्या कवितांची वाट लावली.

भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी आता आमच्या लक्षात आली आहे. केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते

आपला,
(समजूतदार) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)

जा की मग!

भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी

पातळी कुणाची काढतोस रे? जा की मग उच्च पातळी असलेल्यांकडे!

विषय आहे तो तात्यारावांनी इंग्रजी भाषेतल्या काही शब्दांकरता मराठी भाषेत काही शब्द सुचवले आहेत याचा! मूळ विषय काय आहे हे लक्षात न घेता विकासरावांनी म्हटल्याप्रमाणे अवांतर लेखन करणार्‍यांनी प्रथम स्वत:ची बौद्धिक पातळी पाहावी आणि मग इतरांना पातळीच्या गप्पा शिकवाव्यात!

केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते

हो! काय म्हणणं आहे मग?

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

सहमत..!

मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखनाला प्रोत्साहन देउ नये. सावरकरांचे जातपातनिर्मुलन कार्य पण लक्षात घ्यायला हवे.
रत्नगिरीतले 'पतित पावन मंदीर' याची साक्ष देत उभे आहे.

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

अरे

आमचे काही प्रतिसाद उडालेले दिसताहेत Smile

आपला,
(संशोधक) आजानुकर्ण

-- आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)

विनम्र अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.

त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान,
मराठी तसेच भारतीय तरूणांना क्रांतीकार्यासाठी प्रेरणास्त्रोत निर्माणाचे कार्य,
भारतीय समाजातील जातीपाती निर्मुलनासाठी कार्य,
त्यांचा मुळातच लढवय्या असलेला स्वभाव,
त्याचे लेखन, काव्य आदी क्षेत्रातील वावर,
त्यांना मराठीचा असलेला अभिमान....

या सर्वांचा मी चाहता आहे.

नीलकांत

अभिवादन

स्वातंत्र्यवीराला माझे कोटी,कोटी प्रणाम...

म.टा. ऑनलाईन पुरवणीची 'सलाम सावरकर' ही पंचलाईन खटकली.
'प्रणाम सावरकर' असे योग्य दिसले असते. मी संस्कृताळलेला आहे असे समजू नये. सावरकरांना ते अधिक आवडले असते, नाही का? - बस, इतकेच!

तयार केलेले

सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे

स्तंभ, मूल्य, शुल्क, वेशभूषा, परीक्षक, गतिमान, नेतृत्व हे शब्द 'निर्माण' (तयार?) केलेले वाटत नाहीत. वेतन या शब्दाविषयी नक्की माहीत नाही पण हा शब्द हिंदीतही वापरला जातो. (उदा. वेतन तो हम पूरा लेंगे, दंड चाहे दस बार कर लिजिये - चुपके चुपके) बातमीदाराने कश्याच्या आधाराने हे लिहिले आहे ते नमूद केलेले नाही.

बातमीतील "इतर (फारसी/इंग्रजी) भाषांमधील शब्द म्हणजे आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत" हा विचार काही पटला नाही.

येथेही छान माहिती

सावरकरांविषयी येथेही छान माहिती वाचायला मिळाली.

http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/savarkar/

(भोचक)
जाणे अज मी अजर

भाषाशुद्धीबाबत सावरकर म्हणतात...

भाषाशुद्धीचा उहापोह पुष्कळच झाला आहे. त्याची मुख्य सुत्रे दोन १. आपल्या भाषेत ज्या अर्थाचे शब्द होते, आहेत किंवा उद्भवणे सुसाध्य आहे, अशा अर्थाचे परकीय शब्द काय ते आपण वापरू नयेत. मग ते जुने असोवत वा नवे. आपले तदर्थक शब्द मारून जे परशब्द रूळतात त्याने काही आपली शब्दसंपत्ती वाढत नाही. २. ज्या अर्थाचे शब्द त्या वस्तू आपल्याकडे नसल्याने मुळातच नाहीत किंवा नवी न पाडणे शक्य नाही, असे परकीय शब्द वापरण्यास आडकाठी नाही. जसे. कोट, बूट आदी.

ही भाषाशुद्धीची दोन सुत्रे नीट वाचून लक्षात ठेवली तर तिच्यावर घेतले जाणारे ९० टक्के आक्षेप आपोआप नाहीसे होतील. याच तत्वाला अनुसरून मी अनेक नवे मराठी शब्द निर्मिले आहेत.

(सावरकर विविध भाषणे पुस्तकातून)

(भोचक)
जाणे अज मी अजर

थोर माणुस,

थोर कार्य्,प्रेरणादायक आणि मार्गदर्शक विचार. ह्याशिवाय काय म्हणणार.

बाकी, "भाषा शुद्धी"चा विषय काढुन त्यांचे उणे-दुणे काढणं म्हणजे जरा जास्तिच वाटतयं.
हे म्हणजे, "शिवाजी जर आठ-आठ बायका करुन रामाचा आदर्श मोडणार असतील, तर थोर कसे ठरतात? "
किंवा "जर गौतम बुद्ध आनी त्याचं अहिंसा तत्वज्ञान महान असेल, तर त्याची पायमल्ली करणार्‍यांना नराधम का म्हणु नये"?
(किंवा हिंसा करणारे महान असतील अतर बुद्धाला कमी का लेखु नये?) असले प्रश्न विचारण्यासारखं आहे.
किंवा आणखी एक उदाहरण म्हणजे:-
"शिवाजीनं थेट युद्ध न करता दगाबाजीनं शाहिस्त्यास हाणला.
आपल्याच आश्रयदात्या पुरंदराच्या किल्लेदारास बंदी करुन किल्ल्यावर कब्जा केला.
कित्येक तह्,वाटाघाटी चुटकीसरशी मोडल्या."
हे कसं वाटतं वाचायला?
हे चुक आहे ह्याचं कारणच मुळी आपण लक्षात घेतो तत्कालीन स्थिती, उप्लब्ध पर्याय आणि कृती मागचा उद्देश.
ह्याच निकषांवर शिवाजी ठरतात छत्रपती,
गौतम बुद्ध ठरतो महात्मा(की भगवान?)
आणि सावरकर ठरतात एक जाज्व्ल्य, अतुलनीय कार्य असणारे स्फुर्तिदायी चारित्र्याचे स्वातंत्र्यवीर.

थोर माणसं, मोठं कार्य हे मोठच असतं.त्यातील वादग्रस्त भागासहित, त्यातील आपल्या असहमतीसहित.
चंद्र सुंदर असतो डागांसहित. (मलिनम् अपि हिमांशु लक्ष्-लक्ष्मीं तनोति| )

आपलेच,
जनसामान्यांचे मन

आपलाच,
मनोबा

चांगला प्रतिसाद

आपला प्रतिसाद आवडला...पटण्यासारखाच आहे.

स्वातंत्र्यवीरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

सावरकरांच्या अतुलनीय क्रांतिकारी देशभक्तीबरोबरच त्यांची भाषाशुद्धी, अस्पृश्यता निर्मूलन आणि इतरही कार्ये ही देशप्रेमातूनच उमलली होती.
इतकेच नव्हे तर त्यांची काव्ये, नाटके, पुस्तके इत्यादी सर्व मातृभूमीला केंद्रस्थानी ठेवूनच निर्मिलेले दिसते.
त्यांनी सुचविलेले बहुसंख्य मराठी शब्द हे आज व्यवहारात रुढ झालेले आहेत आणि थोडेफार होऊ शकले नाहीत पण त्यामुळे त्यांचे कार्य अजिबात छोटे ठरत नाही.
मराठी प्रतिशब्द सुचवण्यामागे त्यांचे जाज्वल्ल्य मातृभूमी प्रेमच आहे. ज्या काळात त्यांनी ते केले त्या काळाचे संदर्भ, पारतंत्र्याचे, गुलामगिरीचे संदर्भ सोडून त्याकडे बघितले तर ते अन्यायकारक ठरेल.
काही शब्द जड/अवघड वाटल्याने सामान्य माणसे मराठीकडे वळली नाहीत किंवा बिचकली असे मानण्याचे काही कारण दिसत नाही. उलट अल्पशिक्षित सामान्य माणसांपेक्षा स्वतःला शहाणे समजणारी माणसेच 'कुर्‍हाडीचा दांडा' ठरली की काय असे मानायला मात्र भरपूर वाव आहे. Smile
ते शब्द वापरले गेले नाहीत म्हणजे सूचना टाकाऊ होत्या असे नव्हे.
किंवा त्यांचे भाषाशुद्धीचे कार्य पुढे नेणार्‍या इतर माणसांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिका (जसे माधव ज्यूलियन) ह्या त्यांच्या वैयक्तिक होत्या त्याचे खापर सावरकरांच्या माथी फोडण्याची गल्लत आपण करता कामा नये.
असो. सावरकर महान होते, द्रष्टे होते आणि राहतील. त्यांच्या कार्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो. त्यांना त्रिवार वंदन.

चतुरंग

कवी सावरकर

सकाळी सारसबागेवरून जाताना मुद्दाम थांबलो अन आपपोआप हात जोडले गेले. ह्या माणसाबद्दल जे काय ऐकलं वाचलं आहे त्यावरून एक कळतं की शंभर नंबरी अस्सल घडीव सोन्याचा माणूस होता. 'ने मजसि ने' वाचताना समजतं की हा 'माझ्या देशावर राज्य करनार्‍या गोर्‍यांचा खूनी' नाही तर देशप्रेमान पेटलेला एक धगधगीत लोखंडाचा गोळा होता. 'जयो ऽस्तुते' मधल्या एक एक शब्दाला तलवारीची धार आहे. 'शतजन्म शोधितांना' असो... 'हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' असो... वा बाजीप्रभूंचा पोवाडा असो.... असं वाटतं की ह्या माणसानं एक हिन्दुस्थानाशिवाय बाकी कशाचा विचारही केला नाही.

सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

- वळू

उच्चाराला

उच्चाराला सोपे असलेले इतर भाषांतील शब्द वापरणे हा निव्वाळ आळशी पणा आहे असे मला वाटते. कारण आपण सरसकट दुसरी भाषा बोलत नाही. त्यातले फक्त सोयीस्कर शब्दच उचलतो. आणि बर्‍याच पिढ्यांनी केलेल्या ह्या आळसामुळेच इतर भाषांतील शब्द मराठीत रूढ झालेत. भाषाषुद्धीला संकुचीतपणा म्हणणार्‍यांची कीव करावीशी वाटते.

अवांतर - अमेरिकेत गेलेली मराठी कुटूंबे आपल्या मुलांना 'प्रॉपर' मराठी यावं ह्याचा अग्रह का धरतात?

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

हो ना...

म्हणुनच मग आपण लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका असला का कोणता शब्द तो बिंदास वापरावा
आळस झटकुन. कशाला उगिच सिग्नल्,ट्रेन्,बटन असले "विदेशी" शब्द वापरायचे?

अवांतरः-""लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका " येव्हढ्या पट्टिची मर्‍हाटी मला येत नाय.
शिकवण्या घेण्यास तयार हाय का कोण?
एक शंका:- मर्‍हाटीचा आग्रह करणारे लोक महाविद्यालयाच्या शेवटल्या वर्षाला म्हणतात"अंतिम वर्ष"
मग पदवी-प्रदान करण्याच्या विधीला काय "अंत्य्-विधी " म्हणणार का?
आणि सकाळच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यास ऍडमिशन ऐवजी "प्रातर्विधी" म्हणणार का?

ह्.घ्या.

आपलाच,
मनोबा

आपलाच,
मनोबा

सावरकरा॑व

सावरकरा॑वरचा गुप्त-पोलिसा॑चा पहारा स्वात॑त्र्य मिळाल्यावरही.. अगदी त्या॑च्या मृत्यूपर्य॑त कायम होता हे सावरकरा॑चे अ॑गरक्षक अप्पा कासार ह्या॑च्या मुलाखतीते वाचलेले आठवते आणि काळजाला घरे पडतात.
तसेच मणिश॑कर अय्यर सारख्या निवृत्त आयएएस अधिकार्‍याने (म्हणजे एका बुद्धीमान माणसाने, इतर बुद्धू म॑त्र्यासारखा नाही) अ॑दमान येथील सावरकर-वचने बेमूर्वतखोरपणे काढलेली आठवतात आणि पुन्हा खूप वाईट वाटते.
काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अ॑दमान बेटावर पाऊल ठेवणार्‍या सावरकरा॑नी पहिलेच उदगार काढले होते, " उद्या भारत स्वत॑त्र झाल्यावर हेच अ॑दमान भारतीय नाविक दलाचा तळ म्हणून वापरता येईल!" केव्हढे द्रष्टेपण! असा महामानव पुन्हा होणे नाही.. त्या॑ना कोटी कोटी प्रणाम

विनम्र अभिवादन !

या थोर स्वातंत्र्य वीराला विनम्र अभिवादन.

येथे

येथे सावरकरांनी संस्कृतप्रचुर मराठी आणले म्हणुन माधव ज्युलियन यांचे मत देउन बराच घोळ घातला गेलाय. मला १९८३ साली पु.ल.देशपांडे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग इथे टाकावासा वाटतोय्.पुल स्वतः दिग्गज साहीत्यिक होते त्यामुळे त्यांचे म्हणने लक्षात घेणे जरूरीचे आहे.तर पुल म्हणतात

सावरकरांचे विचार आणि उच्चार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे.मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक घटक असतो.सामर्थ्याच्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राजवटीच्या गुलामगिरीतुन ,अवलबिद्वातुन वाचवण हा विवेक सावरकरांच्या भाषाशुध्दीच्या चळवळीमागे होता.वास्तविक इंग्रजीवर त्यांच चांगलच प्रभुत्व होत.मराठी भाषणाच्या ओघात एखादा मुळचा इंग्रजी उतारा ते स्मरणाने घडाघड म्हणायचे.कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रह्मण्यम मानले नाही.त्यांना अमान्य होत ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतील शब्दांची घुसखोरी चालू देण.सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजवुन घेतली नाही,त्यांनी त्यांच्या भाषाशुध्दीची चेष्टा केली.हे शब्द रुढच होणे शक्य नाही असे म्हणायला सुरुवात केली.पण ते सरकारी शब्दांच्या टाकसळीत तयार केलेले शब्द नव्हते.एका प्रतिभावंत कवीची ती निर्मिती होती.सरकारात मोले घातले रडाया (का खरडाया) या भावनेने भाषाशुध्दीचे पगारी कर्मचारी जेंव्हा बसतात तेंव्हा 'घे इकडची इंग्रजी डिक्शनरी अन कर त्याचा मराठी शब्दकोष'असा व्यवहार चालतो.सावरकरांना तो शब्द कोशात पडुन रहाणारा नको होता.तो कवितेसारखा लोकांच्या तोंडी रुळायला हवा होता.त्यांनी रीपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला.वार्ता खेचुन आणणारा.इथे इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द असे न होता एक कविनिर्मित प्रतिमा तयार झाली.प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले.हे शब्द सावरकरनिर्मित आहेत याचादेखील लोकांना विसर पडला.आज महाराष्ट्रात लोकांना मेयरपेक्षा महापौरच जास्त परीचित आहे.वृत्तपत्राच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक शब्द त्यांनी दिले आहेत.तीच गोष्ट चित्रपटसृष्टीची. दिग्दर्शक,संकलन्,ध्वनीमुद्रण,पटकथा ही त्यांचीच निर्मिती.मराठीला त्यांच हे स्वत्व जागवण्यासाठी दिलेले एक मोठ देण आहे.शिवाय ते एक उत्तम वक्ते असल्याने शब्दनिर्मिती करताना उच्चारातील सोपेपणाही त्यांनी सांभाळला.पुष्कळदा मला वाटत की भाषेचे सामर्थ्य म्हणजे काय ,ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडुन सावरकरांचे 'माणसाचा देव्,विश्वाचा देव',दीन शब्दात संस्कृती हे निबंध मोठ्यानी म्हणुन घ्यावेत.

याप्रकारे सावरकरांच्या भाषाशुध्दीवर टिका करणार्‍यांना उत्तर पुलंनी दिले आहे. एक नविन प्रकार इथे वाचला तो म्हणजे 'संस्कृतप्रचुर शब्दांमुळे बहुजन समाज मराठीला बिचकुन राहु लागला'. याच भाषणात पुढे पुलंनी एक घटना सांगितलीय ती अशी.
काही वर्षांपुर्वी मी सांगलीमधे म्हैसाळ म्हणुन एक गाव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा एक प्रयोग आहे तो पहायला गेलो होतो.भारताच्या उत्तम शेति प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे .एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रीयांच्या अंगावर लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नसायची म्हणुन त्यांच झोपडीच्या बाहेर पडण मुश्किल होतं. त्या समारंभाला आम्ही गेलो तेंव्हा त्या दलित वस्तीतील सर्व स्त्रीपुरुष आपल्याकडे लग्नसमारंभाला जावे तसा पोषाख करुन तिथे जमली होती.सहकारी शेतीने त्यांच्या आयुष्यात आर्थिक परीवर्तन घडवुन आणल होत आणि ते केवळ आर्थिक परीवर्तन नव्हत हे लगेच माझ्या लक्षात आलं.त्या स्त्रीया समारंभाला गाणे म्हणनार होत्या.हल्ली कुठेही सभेला गेलो की गाणी ऐकावी लागतात. ती बहुदा सिनेमातली अथवा प्रसंगाला साजेशी अशी तिथल्याच शाळेतल्या गुरुजींनी कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करुन जुळवलेली स्वागतपर पद्द्य.आणि येथे पेटीवाल्यांनी सुर धरला,तबलजींनी ठेका सुरु केला आणि अस्खलीत वाणित त्या दलित भगिनींनी गाणे सुरु केले ' जयोस्तुते,श्री महन्मंगले श्रीवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती' . माझ्या अंगावर सर् कन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारण्यासाठी,त्यांना मोकळेपणानी गाता याव ,बागडता याव म्हणुन सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करीत ज्या सावरकरांनी जीवाच रान केल त्या सावरकरांनी रचलेल हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रीया बिनचुकपणे उत्तम सुरतालात गात होत्या.एखाद्याच पुण्य फळाला जाण म्हणजे काय याचा मला त्याक्षणी अनुभव आला.

आता एका छोट्याशा खेड्यातल्या दलित स्त्रीया २५ वर्षांपुर्वी न घाबरता बिनचुकपणे ' जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गीत गाउ शकतात तर आजचे सुशिक्षीत बहुजन अशा भाषेला का बिचकतात्??आणि ते बिचकतात याला काही तथ्य आहे का?? आम्हाला तर असे बिचकणे काही दिसले नाही. आणि बिचकतात म्हणजे नक्की काय करतात???

मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

बरोबर

आमची ५० शीची अशिक्षित मोलकरीण आमच्या पोराच्या सोबतीनं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणते ना तेव्हा असेच शहारे येतात आमच्या अंगावर. गाणं आलं, गाता आलं, म्हणजे भाषा येते का राव?

पण, आमची अडाणी ठकू गाते तेव्हा मजा वाटते आणि कौतुकही. पु. लंना तेच वाटलं.

-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.

काय लोक

काय लोक बोलतील सांगता येत नाही. अहो,पुल त्या लोकांमधे गेल्यावर त्यांचाशी बोलले नसतील का???त्या लोकांच्या बोलण्यातुन त्यांना कळले असेलच ना काय ते??????आणि 'जयोस्तुते' हे स्तोत्र तसे अवघड आहे. ट्विंकल ट्विंकली तशी गोष्ट नाही. त्या मोलकरणिला शेक्स्पिअरचे साहीत्य अथवा इतर अवघड कविता म्हणायला सांगा म्हणजे लक्षात येईल काय ते. मुख्य मुद्दा हा आहे की बहुजन जर बिचकत असते तर त्यांनी कुठलही दुसर साध गाण म्हटल असत. त्यांना कोणी सक्ती केली नव्हती तेच गाण म्हणायची. ट्विंकल ट्विंकलची आणि जयोस्तुतेची तुलना करणे म्हणजे माणसाचे बोलणे आणि पोपटाचे बोलणे यांची तुलना करण्यासारखे आहे.

मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

अरेच्चा!!!!!!!!

अरेच्चा!!!!!!!!!कुणाचेच उत्तर नाही??????????

मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

Scroll to Top