मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"इलेक्ट्रॉनिक्स!!!!"

उपयोजक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"मे आय कम इन सर?" "येस, प्लीज" "थँक यू!" "आकाश देशमुख! बरोबर?" "हो सर." "आपण बोललो होतो फोनवर" "हो" "ते मिस्टर दातार ज्यांच्या रेफरन्सने तुम्ही आलायंत ते तुमचे कोण?" "ते बाबांच्या अॉफिसात आहेत." "अच्छा!" "बरं! तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मधे काय केलंयत?" "मी BE केलंय सर Electronics ब्रँचमधून" "अरे बापरे! इलेक्ट्रॉनिक्स?" "हो सर.का? काय झालं?" "अरे यार ! जरा मेक,इलेक्ट्रिकल,केमिकल असलं काहीतरी घ्यायचं ना!" "पण आता पूर्ण केलंय सर इलेक्ट्रॉनिक्स तर...." "अोके आकाश.मुद्द्यावर येऊया.तुमच्या ब्रँचशी रिलेटेड असं फारसं काम इथे नाहीये.आपली कंपनी मेकॅनिकलच्या फिल्डमधे काम करते.त्यामुळे इथं जो काही इलेक्ट्रॉनिक्सचा मेंटेनन्स लागेल तो देऊ शकाल का? अर्थात मेंटेनन्स काय म्हणा? कधी गेलं तर आतलं कार्ड किंवा बसवता येणारा एखाद-दुसरा कॉम्पोनन्ट गेला तरंच.कराल हे?" "हो चालेल सर!" "ठिक.मग उद्यापासूनच या.महिना ६ हजार रु.देऊ तुम्हाला" "६?" "खराब सर्किट बोर्ड बदलणे,किरकोळ सोल्डरिंग,किरकोळ टेस्टींग याचे किती द्यायला हवेत तुम्हाला?" "पण ६ म्हणजे?" "अहो SMD कॉम्पोनन्ट बसवलेले असतात PCB वर.त्यातले किरकोळ खराब कॉम्पोनन्ट काढून बसवणं ठिक आहे पण जास्त असतील तर सरळ बोर्डच बदलतो आम्ही.स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी आहे सरळ सरळ!" "दुसरं एखादं डिपार्टमेंट नाही का? जिथे बर्‍यापैकी काम असेल?" "आहेत की.पण तिथं इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांचं काम नाही.आमच्या इलेक्ट्रिकल मेंटेनन्सच्या हेडनी तर सरळ सांगितलंय.इलेक्ट्रिकल वाला असेल तरंच इंटरव्ह्यूला पाठवा म्हणून!" "बाकीची कामं सगळी मेकची.तिथंही तुमचा उपयोग नाही." "ठिकै सर! मी अजून एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिलाय.तिथून अजून काही कळलं नाहीये.उद्या कळवतील बहुधा." "हाहाहा!" "काय झालं सर? हसलात का?" "मिस्टर आकाश बसा दोन मिनिटं! बसा बसा!" "हे केस उन्हात नै पांढरे झाले.मी ६ हजार महिना म्हणालो म्हणून इथून कल्टी मारताय हे कळलं नाही असं वाटलं का तुम्हाला?" "सॉरी सर!" "इट्स अोके.समजू शकतो मी" बसा जरा माहिती देतो तुम्हाला.उपयोगी पडेल." "पण ही फॅक्ट आहे.इलेक्ट्रॉनिक्सला नोकरी,व्यवसायाच्या दृष्टीने भारतात फारसा स्कोप नाहीये." "साध्या मोबाईल फोनपासून ते लाखो रुपयांच्या टिव्हीपर्यंत सगळं चीन किंवा कोरियातून येतं.जास्तकरुन चीनमधूनंच.पूर्ण वस्तू तरी येते किंवा स्पेअर पार्ट आणून इथं असेंब्लीतरी होते.भारतात १०० कोटीच्या आसपास मोबाईल हँडसेटस असतील.त्यातले पूर्णपणे भारतात किती बनतात? अगदी थोडे." "रिपेअरीचं म्हणालं तर इलेक्ट्रॉनिक्समधे फेल्युअरचं प्रमाण आताशा कमी झालंय." "आणि असेंब्ली म्हणाल तर तिथं आयटीआयवाले घेेतात किंवा क्वचित डिप्लोमावाले.बीईवाला असेंब्लीला घेणं ही कोणत्याही कंपनीसाठी रिस्कंच असते.त्यांना जास्त पगाराची अपेक्षा असते.त्याऐवजी कमी पगारात आयटीआयवाला अनेक वर्षं सेवा देतो.सोडून जात नाही." "आणि आता तर अॉटोमेशन वाढेल तसं मॅन्युअल वर्क अजून कमी होत जाईल.अॉटोमेशनमधेही इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांना इन्स्टॉलेशन हेच जरा बरं काम आहे" "सर! मेकॅट्रॉनिक्समधे काही स्कोप असेलंच की!" "रोबोटिक्ससुध्दा फक्त मोठ्या कंपन्यांनाच परवडणारं आहे.आणि रोज उठून काही रोबोटीक अार्म्समधे बिघाड होत नाही.झाला तरी परत त्यातंलं तंत्रज्ञान इतकं किचकट असतं की तुमच्यासारख्या फक्त बीई झालेल्याच्या हातात देतील असं नाही वाटंत" "म्हणजे मला एखाद्या आयटी कंपनीतच जॉब बघायला हवा." "नीट माहिती करुन मगच जा तिथे! अन्यथा इलेक्ट्रॉनिक्समधे डाळ शिजत नाही म्हणून तिथं जात असाल तर नका जाऊ!" "तसंही आयटीत आता इथून पुढे किती काळ टिकता येईल हा प्रश्नंच आहे.तिथंही हल्ली बुडावर लाथ बसण्याचं प्रमाण वाढलंय.अचानक काढलं जाण्याला विरोध म्हणून आयटीवाल्यांनी बंगळूरात कसलीशी संघटनाही बांधल्याचं वाचलं होतं पेपरात." "मग काय करावं? तुम्हीच सांगा" "एक सुचवू? बघा पटतंय का?" "बोला सर" "कोणतीही कंपनी इंजिनिअरिंगच्या कुठल्याही शाखेत का काम करेना त्यांचा सगळा डोलारा उभा असतो तो सेल्स आणि मार्केटिंगवर.एकतर MBA करा किंवा ते शक्य नसेल तर निदान एखाद्या खाजगी संस्थेतून सेल्स,मार्केटिंग चा छोटा कोर्स करा.पण MBA झालं तरंच सेल्स जमतो हा भ्रम काढून टाका. चांगल्या मार्कांनी MBA करुनसुध्दा प्रत्यक्षात सेल्समधे माती खाल्लेले लोक आहेत." "तुम्ही फारसे बोलके किंवा गो गेटर वाटत नाही आहात पण करियर घडवायचं असेल तर हा बदल करा.सेल्समधे हाच जास्त लागतो.बोलणी खावी लागतात.म्हणूनंच बरेचजण तयार नसतात सेल्समधे जायला.जरा निगरगट्ट व्हा." "पण सेल्समधे पैसेही बर्‍यापैकी मिळतात.हे सुध्दा विसरु नका.बनवणार्‍या कंपन्या भरपूर आहेत.बनवलेलं विकणारा मात्र दुर्मिळ आहे" "हो सर.तुम्ही सांगितलंत त्यावर नक्की विचार करतो" " विचार नको आता अॅक्शन घ्या." "हो" "अजून एक करा" "काय?" "कोणी जात असेल इलेक्ट्रॉनिक्सला तर मी जसं तुमचं बौध्दिक घेतलं तसंच त्याचंही घ्या.एखादा धारेला न लागता वाचला तर वाचू देत बिचारा!" "हो.अगदी नक्की!" "थँक्स सर!"

वाचने 21610 वाचनखूण प्रतिक्रिया 62

पुंबा 16/04/2018 - 12:33
अगदी खरे आहे. लेख अतिशय आवडला आणी पटला.. ही ब्रँच निदान ७५% कॉलेजांमधून बंद करायला हवी. १२० वगैरे जागा प्रायव्हेट कॉलेजांतून इ & टिसी ला असणे हा फार मोठा स्कॅम आहे. खरे तर ५०% कॉलेजलाच टाळे ठोकावे असे वाटते, कारण या कॉलेजांतून जराही लायकीचे इंजिनियरींगचे शिक्षण दिले जात नाही.

विशुमित 16/04/2018 - 12:43
सहज सुंदर लिहले आहे. आमच्याकडे नवीनच इंजिनियर (जवळपास सगळ्याच फिल्डची) झालेली पोरं पोलीस/मिलटरी भरतीच्या तयारीसाठी कॉलेजच्या ग्राउंडवर पळताना सकाळ संध्याकाळ दिसत असतात.

दीपक११७७ 16/04/2018 - 12:46
"कोणी जात असेल इलेक्ट्रॉनिक्सला तर मी जसं तुमचं बौध्दिक घेतलं तसंच त्याचंही घ्या.एखादा धारेला न लागता वाचला तर वाचू देत बिचारा!"
या साठी लिहिला आहे का लेखं असो छान लिहिले आहे

सुबोध खरे 16/04/2018 - 12:59
भयानक वास्तव En T C या विषयाला फारशी मोठी प्रयोगशाळा लागत नाही.( हीच स्थिती आय ती आणि संगणक विषयांची आहे परंतु त्या विषयात आजमितीला तरी बऱ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत) त्यामुळे कुठल्याही झाडगाव खुर्द /भोकरी बुद्रुक इंजिनियरिंग कॉलेजात या विषयाच्या सीट्स काढल्या जातात. आईबापाच्या कष्टाने मिळवलेल्या पैशावर उज्ज्वल भविष्याच्या आशेने मुले प्रवेश घेतात आणि शेवटी मूळ विषयात नोकऱ्या मिळतच नाहीत म्हणून एक तर एम इ/ एम टेक करून आजचे मरण उद्यावर ढकलतात किंवा आय टी संगणक विषयात रस नसतानाही नोकऱ्या करतात अथवा एम बी ए च्या परीक्षांच्या वाटेला जातात. मुलांना असे प्रवेश देताना/ घेताना स्पष्ट शब्दात कल्पना देणे आवश्यक आहे. म्हणजे चार वर्षे अवघड अशा गणिताच्या परीक्षा( M १ ते M ७) देऊन( आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत वाऱ्या करून) आपण नक्की काय मिळवले अशी निराशा तरी या मुलांच्या वाटेस येणार नाही.

In reply to by sagarpdy

उपयोजक 16/04/2018 - 13:28
१. लेख यासाठीच आहे की इलेक्ट्रॉनिक्स मधे किती संधी उपलब्ध आहेत?आपल्याकडील माहिती जरुर द्या. २.एम्बेडेड, आयअोटी करणार्‍या सर्वांना मेक,इलेक्ट्रिकल यांच्याइतक्या सहज संधी उपलब्ध आहेत का? इलेक्ट्रॉनिक्स नंतर एम्बेडेड,IOT करणं जास्त फायद्याचं की कॉम्प्युटरनंतर? ३. IOT मधे इलेक्ट्रॉनिक्सचा भाग किती? आपल्याकडील माहिती जरुर द्या.

In reply to by उपयोजक

sagarpdy 16/04/2018 - 14:01
१. आकडेवारीत माहिती विचाराल तर नक्की सांगता येणार नाही. पण काहीच काम नाही असं नाही. २.१ मेक,इलेक्ट्रिकल यांच्याइतक्या सहज संधी उपलब्ध आहेत का ? -> मेक, इलेक्ट्रिकल याना सहज संधी उपलध आहेत का ? (कदाचित २.२ इलेक्ट्रॉनिक्स नंतर एम्बेडेड,IOT करणं जास्त फायद्याचं की कॉम्प्युटरनंतर? - तुलना समजली नाही, या फिल्ड मध्ये दोन्ही गोष्टी हव्यात, उमेदवाराची अट - मी कॉलेज ला शिकलो त्याचा सबसेट कामच करणार असे असेल तर कठीण आहे, प्रोग्रामिंग (जे इलेक्ट्रॉनिक्स च्या विद्यार्थ्यांना जुजबी प्रमाणात का असेना अभ्यासक्रमात असत) करावाच लागेल. कॉम्प्युटर इंजि ला पण जुजबी सोल्डरिंग, सेन्सर ची माहिती करून इ करावं लागतं. एकाच टीम मध्ये १ कॉम्प, १ इलेक्ट्रॉनिक्स, १ मेक इंजि बघितलेत. तिघेही सोल्डरिंग, डिव्हाईस ड्रायवर लिहिणं, जावा मध्ये प्रोग्रॅम करणं हे सर्व करत होते. ३. https://en.wikipedia.org/wiki/Internet_of_things : पोटापाण्यापुरता नक्की. पण एकमार्गी विचार उपयोगी नाही. सध्या IT कंपन्या यातही काम करतायत. "IT" बऱ्यापैकी मोठी छत्री आहे. यात यायला हरकत नाही - फक्त सतत शिकायची तयारी हवी - लवकर आउटडेटेड व्हायला होतं. बाकी इंजिनिअरिंग म्हणजे व्यंकटेश स्तोत्र नाही - २१ पारायण कर - मग सगळा आनंदी-आनंद. अभ्यास चांगला हवाच , आणि नव्या गोष्टी शिकायची तयारी देखील. (गुगल बाबा झिंदाबाद, क्वॉरा ताईंचा विजय असो) https://www.quora.com/Is-the-IoT-course-worth-to-learn-to-improve-core-electronics-What-are-the-job-opportunities-as-a-fresher-after-doing-IoT https://www.quora.com/in/How-is-IoT-related-to-ECE https://www.quora.com/Why-are-there-no-core-electronics-engineering-jobs-in-India

In reply to by sagarpdy

विजुभाऊ 16/04/2018 - 16:37
Embedded सिस्टिम्स मधील नोकर्‍या फारशा उपलब्ध नाहीत. लोकांना उगाचच स्वप्ने दाखवली जातात. तीच गोष्ट बायो इलो़ट्रीनीक्स ची

नितिन थत्ते 16/04/2018 - 14:12
सीओईपी मध्ये फार्फार पूर्वीपासून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ची ब्रँच आहे. पण संपूर्ण मोबाईल संपर्क क्रांती सीओईपीला बायपास करून गेली बहुधा !!

In reply to by नितिन थत्ते

उपयोजक 16/04/2018 - 15:01
पुण्यामुंबईचं ठिक आहे पण तो भाग वगळता दक्षिण महाराष्ट्रात या शाखेची हालत वाईट आहे. ही शाखा आडगावच्या कॉलेजांमधेही चालवली जाते. किंबहुना कारण माहित नाही पण हीच शाखा मंजूर केली जाते.

उपयोजक 16/04/2018 - 15:44
रच्याकने, हे चॅनेल पहा... हा माणूस कंपोनेंट लेव्हल रिपेअरी करतो... किती कठीण काम आहे पहा... https://www.youtube.com/user/rossmanngroup म्हणून लोक डोक्याला ताप नको म्हणून अख्खा बोर्ड बदलवतात.

मला वाटते एकुणच ईंजीनीयरिंग आणि एम.बी.ए. चे मार्केट पडले आहे (जसे डी.एड./बी. एड. चे). तसेही कुठल्यातरी खुर्द आणि बुद्रुकमधील कॉलेजात डिग्री घेउन (जिथे धड लॅबची सोयही नसते) बिचारी मुले काय दिवे लावणार? ३०-४० वर्षांपुर्वी मेकॅनिकल स्विचेसची जागा काचेच्या डायोडनी घेतली आणि नंतर सॉलिड स्टेट ट्रान्झिस्टरनी. त्यावेळचे लाकडी दरवाजे असलेले टी.व्ही. संच आणि नंतर आलेले पॉकेट रेडिओ किती लोकप्रिय होते. लवकरच ट्रान्झिस्टरची जागा ईंटीग्रेटेड सर्कीटने (आय. सी.) घेतली आणि ईलेक्ट्रॉनिक्सचे नवे युग सुरु झाले. तेव्हा मेकॅनिकल/सिव्हील ला अ‍ॅडमिशन घ्यायलाही कोणी तयार नव्हते. एलेक्ट्र्रीकल वाले तर पडीक असायचे.सगळ्यांना कॉम्प्युटर आणि ईलेक्ट्रॉनिक्सच हवे असायचे. आता काळाचे चक्र परत फिरले आहे आणि एकुणातच प्युअर सायन्सेस किवा ब्रँचेसना मागणी आली आहे. मग ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलोजी बायोटेक्नॉलॉजी असो किवा ईलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हील. असो. आय.टी चा पर्याय आजमावुन बघा. तसेही फ्रेशर म्हणजे प्रोजेक्टच्या हिशोबाने काहीतरी नवीन शिकावेच लागेल. मग ते सी, जावा असो किवा हाडुप,बिगडाटा किवा आबिनिशिओ ,रोबोटिक्स,अ‍ॅनालिटिक्स, नाहीतर क्रोनोस् कॉग्नोस वगैरे. मग तुमची बेसिक डिग्री कोणती याने काय फरक पडतो?

मर्द मराठा 16/04/2018 - 21:19
इलेक्ट्रोनिक्स आणि इन्स्ट्रुमेन्शन साठी प्रोसेस ओटोमेशन हाही एक पर्याय असु शकतो.. प्लान्ट ओटोमेशन, पी एल सी प्रोग्राम्मिन्ग, स्काडा ईम्प्लेमेन्टेशन ही चान्गली क्षेत्रे आहेत.. ही टिपिकल आय टी नाहीत पण वरील तन्त्रासोबत अ‍ॅनालिटिक्स, डेटा मायनिन्ग ची जोड दिलीत तर एक स्पेशालिस्ट म्हणून पाहिले जाईल.

एवढं सगळं करण्यापेक्षा सरळ प्लंबर / वायरमन व्हावं. आजकाल त्यांची व्हिजिट फी डॉक्टरांपेक्षाही जास्त झालीय.

एस 17/04/2018 - 04:09
धागा आणि त्या अनुषंगे येणारे प्रतिसाद वाचतो आहे. उपयुक्त चर्चा सुरू आहे. अभियांत्रिकी क्षेत्राची फारशी सखोल माहिती नाही. तस्मात्, कुणा होतकरू तरुणाला कधी चार गोष्टी युक्तीच्या सांगायच्या झाल्या तर या चर्चेचा उपयोग नक्कीच होईल. धन्यवाद!

आमची वाहन-भाग उत्पादन क्षेत्रातील कंपनी आहे. सध्या आमच्या कडे इंडस्ट्री ४.० सुरू आहे. त्यामध्ये माझं प्रोफाइल आयटी बदलून आयएस झालंय. मी आणि आमचा पी एल सी इंजिनीअर दोघे मिळून सध्या एम इ एस वर काम करतोय. तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर आहेच, मीसुद्धा इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळे गोष्टी समजावून घ्यायला सोप्या जातात. दोघेही बी इ इलेक्ट्रॉनिक्स, पण तो पी एल सी इंजिनिअर असून त्याला माझ्या अँप्लिकेशन्स मधलं समजवून घ्यावं लागतं आणि मला त्याच्या पी एल सी मधलं. कोणत्याही शाखेच्या बहुतांश पदवीधारकांना त्या क्षेत्रातील काहीच व्यावहारिक ज्ञान नसतं. त्यामुळे इंजिनिअर झाल्यावर 2-4 वर्षे घासायची तयारी असली तर अनुभव मिळवून पुढच्या संधी शोधता येतात. पण आपल्याकडे सिव्हिल इंजिनियरिंग करताना कॉलेज संपल्यावर आपण पिवळं हेल्मेट घालून धरणाच्या भिंतीवर उभे राहून हातातल्या A2 आकाराच्या कागदावर डिजाईन बघतोय, असं स्वप्न सगळे विद्यार्थी व त्यांचे भाबडे पालक बघतात. मीही बघितलं होतं. डिग्री पूर्ण करून मैदानात आल्यावर वास्तवाशी सामना होतो. (वरील गोष्टींना अपवाद - सुशिक्षित, विशेषतः इंजिनियर पालक)

खिलजि 17/04/2018 - 12:09
हे असंच चाललंय इथे . बाजार बाजार नि बाजार . बाजाराचा आजार झालाय लोकांना . सरळ साधं शिक्षण घ्यायचं नि वाटेला लागायचं तर नाही . कुणी एक पायरी वर चढला कि दहा लोक त्याच्या मागून चढायला तय्यार . त्या दहामधले मी म्हणतो नऊ जण सपशेल शरणागती पत्करतात . हे शैक्षणिक जोडधंदे जेव्हा थांबतील तेव्हाच काहीतरी भलं होईल असं वाटतंय . सुदर आणि समयोचित लिखाण आणि जोडीला शालीन शालजोडे भेट दिलेत . मार्मिक विनोदाची फोडणी फ्री बरं का. सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दानुज 17/04/2018 - 16:45
मेकॅनिकला स्कोप आहे हे वाक्य वाचून हसावे की रडावे हे कळेना. मी सुद्धा या तथाकथीत फ्रेश मेक. इंजिनियर म्हणवल्या जाण्या-या भाऊगर्दीतला एक चेहरा नसलेला पोरगा/ तरूण आहे. मुळात कोणतेही कॉलेज प्रवेश घ्या. सगळ्यात जास्त मेरीट मेकसाठी लागलेले दिसेल. माझाच मेकचा जवळचा मित्र घरच्या परिस्थितीमुळे लवकर नोकरी मिळावी म्हणून विद्यापिठातला पहिल्या पाचमधला नंबर सोडला नाही. पण जेव्हा नोकरीची वेळ आली तेव्हा कुठकुठे चक्क वशिला लावून नोकरी मिळवावी लागली. आणि असाच एक विद्यापीठात पाचात असणारा आज फायनान्स कंपनीत कामाला आहे. बाकीच्यांचेही हाल फारसे चांगले नाहितच. सगळेच ५-१० हजारच्या आसपास काम करत आहेत. अगदी बोटावर मोजता येतील असे १५ ते २० च्या आसपास आहेत. मार्कचा आणि नोकरीचा संबंध नाही असे मानले तरी एकच बौध्दिक पातळी असणारा एक वर्ग चांगले पॅकेज घेत असतो तर दुसरीकडे रेल्वेचे डी पोस्ट( ज्याची आवश्यक पात्रता "दहावी" पास आहे) भरावी की भरू नये याची चर्चा आम्हाला करावी लागते. फ्रेशरला एवढेच मिळतात म्हणाव एकाच कॉलेजचे कॉप्यूटरचे मित्र सुरवात २-३ लाखच्या पॅकेजने का करतात ह्यावर उत्तर नाही. आणि आम्हा मुलांना ८हजारवर काम करायला लाज वाटते असे नाही. आता समोरच्या भागाचे माप मोजायचे आणि एक्सेल शिट भरायचे हे काम अगदी दहावीचा पोरगा पण करू शकतो. पण कंपनी इंजिनियरला बोलावते. का , कारण आय टी आय पेक्षा जास्त शिकलेला त्याच पगारात काम करत असतो आणि शक्यतो ही मुले चांगल्या घरातून आलेली असतात आणि कोणतीही कामे करून घेता येतात. आम्हाला पहिल्याच महिन्यात रोबोटवर उभा करावे असे नाही. पण ज्या कंपनीत पुढच्या पोस्ट काय असतील याचा अंदाज आहे तिथे काम करण्यात काय हशिल ? ह्याना काहीच जमत नाही...कंपनीला ही मुले सुट होत नाहीत ही एक नेहमीची बोंब. आता १९-२० वर्षाच्या मुलाला कॉलेजमद्धे बसून मार्केटच्या गरजा कळाव्यात ही अपेक्षा कशी असू शकते ? (अवांतर इंडस्ट्रीयल ट्रेनिंगासाठी आम्ही ज्या कंपनीकडे गेलो होतो. त्या कंपनीने आम्हाला साधा स्क्रुपण दाखवला नाही आणि पुढच्या आठवड्यात आम्ही सरांच्या सांगण्यावरून ४० पानांचा रिपोर्ट तयार केला होता. कंपनीत तरी काय वेगळे होत असते ? न झालेली काम कागदावर दाखवणे हाच तो खेळ.) आणि जर आम्ही पात्र नसू तर आम्ही डिस्टींगशनसह पास कसे होत गेलो ? आम्हाला विद्यापिठाने लावलेली पुस्तकेच किती कमी दर्जाची होती हे आत्ता आत्ता आम्हाला उमजु लागले आहे. कमी दर्जाची पुस्तके वाचा , साधारण जास्तीत जास्त मुले पास होतील असे बघा हेच विद्यापिठांचे धोरण असते.थोडक्यात इंजिरनियरिंगची अवनिती विद्यापिठातूनच चालू झालेली असते. किंबहुना ती सरकारी पातळीवरून चालू झालेली असते. समजा १०० इंजिनियरची गरज चार वर्षानंतर लागले हे सरकारला माहिती असताना सरकार १००० इंजिनियर बाहेर का पडू देते ? शेवटी सरांच्या नोट्सच्या पळवाटा असतात. आता हे सर म्हणवले जाणारे कोण असतात हे सांगणे न लगे. माझा एक मित्र (जो कसाबसा पास होत होता) पॉलिटेक्नीकमद्धे (बंद पडत आलेल्या) शिकवत आहे. यानंतर पास झालेली मुले मग गेट (एमटेक / एमई साठीची ही १०० मार्कची प्रवेश परीक्षा असते. ह्यामद्धे ही सगळ्यात जास्त कट अॉफ मेकचाच असतो. जिथे ५० ला काही दुस-या ब्रान्चच्या मुलांना चांगले कॉलेज मिळू शकते तिथे मेकच्या पोरांना ७०च्या पुढे मार्क पाडावे लागतात) युपीएससी असे करत राहतात. विद्यापिठांच्या मार्केटमधून कोचिंग क्लासेचच्या मार्केटमद्दे आपला बळी देत राहतात. आणि मेक नव्हे किंबहुना थोड्याफार फरकाने सगळ्याच ब्रान्चचे हे हाल आहेत कोणास हा प्रतिसाद सगळीकडे बोट दाखवून , दुस-यांच्या चुका काढणारा वाटू शकेल पण दुर्देवाने ही वस्तुस्थिती आहे. (मेकला स्कोप आहे हे वाक्य आजही आम्ही विनोद म्हणून कित्येकदा म्हणत राहतो. पु. ल. च्या भाषेत या विनोदाला कारुण्याची काळी किनार आहे.)

In reply to by शब्दानुज

उपयोजक 17/04/2018 - 19:08
मेकसारखी दुभती शाखा मिळाल्याबद्दल अभिनंदन, पुण्या मुंबईकडे कदाचित मेकबाबत सॅच्युरेशन झालंही असेल पण कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर इकडे अजूनही मेकला चांगला स्कोप आहे.फाऊंड्रीज,टेक्सटाईल मिल्स बर्‍याच आहेत. या शहरांमधल्या स्थानिक वृत्तपत्रांमधे मेकसाठी नोकर्‍यांच्या भरपूर जाहिराती असतात.पाहू शकता. मुळात कोणतेही कॉलेज प्रवेश घ्या. सगळ्यात जास्त मेरीट मेकसाठी लागलेले दिसेल.>> बर्‍यापैकी नोकर्‍या उपलब्ध आहेत म्हणूनच हे मेरीट जास्त आहे. असाच एक विद्यापीठात पाचात असणारा आज फायनान्स कंपनीत कामाला आहे.>> हे हल्ली बरेच चांगले अभियंते करतायत.कदाचित तिथे अभियांत्रिकीपेक्षा अधिक पैसे मिळत असावेत.(हे इंजिनिअर आमच्या फिल्डमधे कशाला येतात ही कॉमर्सवाल्यांची अोरड हल्ली वाढतेय.) बाकीच्यांचेही हाल फारसे चांगले नाहितच. सगळेच ५-१० हजारच्या आसपास काम करत आहेत. अगदी बोटावर मोजता येतील असे १५ ते २० च्या आसपास आहेत.>> याबाबतीत लेखक,संगणकतज्ञ राजीव साने यांनी एक छान प्रश्न विचारला होता. "अॉर्केस्ट्रामधे जेवढे वादक लागतील तेवढे संगीतकार लागतील का?" अर्थातच नाही. संगीतकार पक्षी उमेदवार प्रतिभावंत असेल तर चांगला जॉब आणि लठ्ठ पगार मिळेलंच. मार्कचा आणि नोकरीचा संबंध नाही असे मानले तरी एकच बौध्दिक पातळी असणारा एक वर्ग चांगले पॅकेज घेत असतो तर दुसरीकडे रेल्वेचे डी पोस्ट( ज्याची आवश्यक पात्रता "दहावी" पास आहे) भरावी की भरू नये याची चर्चा आम्हाला करावी लागते.>> याचं कारण कंपन्यांची पॉलिसी बदललीय.किती शिकलायत यापेक्षा काय येतंय, जे काम द्यायचंय त्यात कल आहे का हे आता पाहिलं जातंय. आम्हाला पहिल्याच महिन्यात रोबोटवर उभा करावे असे नाही. पण ज्या कंपनीत पुढच्या पोस्ट काय असतील याचा अंदाज आहे तिथे काम करण्यात काय हशिल ?>> खरंतर अशा कंपनीत फार काळ राहूच नये.पण इंजिनिअरिंग शिकायला केलेला खर्च लवकरात लवकर घरच्यांना परत करणं ही आपलीच जबाबदारी असते.त्यामुळे आहे ते सोडून घरी बसण्यापूर्वी विचार करणं योग्य! भुक्कड कॉलेजमधून केलेलं BE हे डिप्लोमाच्या पातळीपेक्षाही खालचं असू शकतं.लोकांना काही करुन इंजिनिअरिंग करायचं असतं.मग अशी टुकार कॉलेजेस ती सोय उपलब्ध करुन देतात.सर्टीफिकेट मिळाल्याबद्दल विद्यार्थी खुश आणि 'बकरा कट गया' म्हणून टुकार कॉलेजमालक खुश असा सगळा धंदा आहे!

In reply to by उपयोजक

शब्दानुज 18/04/2018 - 00:15
> माझी ही सगळी कथा सोलापुर शहरातीलच आहे आणि ज्या जाहिराती बघून तुम्हाला ते जॉब वाटत आहेत त्याची सत्यपरिस्थिती काय हे वर नमुद केलेले आहेच. > मेरीट केव्हा वाढेल ? जेव्हा जागा कमी आणि मुले जास्त असतील तेव्हा. > या फिल्ड मधे अभियंते पैशासाठी नाही तर घरी बसण्यापेक्षा हाताला काम असाव म्हणून घेत आहेत. या मित्राने डिप्लोमाची तिन आणि इंजिनियरची तिन अशी सहा वर्ष टेक्निकलमद्धे घालून घेतलेला हा निर्णय केवळ आणि केवळ हतबलतेतुन घेतला होता. तुम्ही अखेरच्या जे म्हणत आहात की कंपनी सोडून देणार नाही हे त्या कंपनीसाठी लागू होते जिचा विस्तार होत आहे. दुर्दैवाने तुम्ही नमूद केलेल्या शहरातील कंपन्या या 'सेट' झालेल्या आहेत. त्यांची गि-हाईक (विशेषतः टेक्सटाईलची) बदलत नाहित , गरजा बदलत नाहित , उत्पनही वाढत नाहित(टेक्सटाईल चालकचा एक मुलगाही माझा मित्र आहे. त्याचेच वडिल त्याला या कारखान्यात पडू देत नव्हते. कारण ह्या क्षेत्राचे भविष्य त्यांना दिसले आहे.) त्यामूळे कंपनीला नवीन स्किल्ड लोकांची गरजच पडत नाही. त्यांना लागणारे आवश्यक मनुष्यबळ आधीच त्यांच्याकडे काम करत आहेत जे वर्षानुवर्ष तेच काम करत आहेत. बाकी टेक्निकल बाबी त्यांना माहित असो वा नसो त्यांच्या कामाच्या या बाबतीत त्यांना टक्कर देणे अशक्य असते. ह्या कंपनीच्या मालकांना बदल अर्थात नको असतो. आहे ते कसेबसे पुढे ढकलणे हाच उद्देश. यानंतर जे उरते ते गाढवकाम असते त्यासाठी त्यांना लागण्या-या गरम रक्ताचा वापर ते खुबीने करतात. ह्या जॉबवर कमी पगारावर सतत नवनवीन मुले ती राबवून घेतात. यात पगारवाढ , बढती हा प्रकारच नसतो. पेपरच्या जाहिराती या अश्या जॉबच्या असतात. अपवाद असतील पण ते नियमाला सिद्द करण्यापुरते. प्रश्न आहे तो मार्केटचा. कंपन्यांचे पडलेले मार्केट आणि अभियांत्रिकीचे वाढणारे मार्केट यांचा विचित्र मिलाफ झालेला आहे. > मी कंपनीचे ट्रेंड कळू शकत नाहित असे म्हणलेले नाही तर मार्केटच्या गरजा कळू शकत नाहित हे म्हणले आहे. आता वरचेच सोलापुरातल्या कंपनीचे उदाहरण घ्या. तुम्हाला पेपरवरती सर्व कंपन्या जॉब देत आहेत हा भास निर्माण करते. हेच काम नेटवरूनही होते. > अॉर्केस्ट्रावाल्याला मालकाला नवीन शो भेटत नसतील तर संगितकार आणि वादक दोघांनाही किंमत रहात नाही. > कदाचित सगळेच मिपाकर अभियंते कॉलेज सोडुन ५-६ वर्ष झाली असतील. या कालावधी पर्यंतचे पासआऊट हेच खरे अभियंते. नंतर अभियंताचा दर्जा खलावत गेलेला आहे तो याच ५-६ वर्षातला. तद्दन गल्लाभरू पुस्तके अभियांत्रिकीसाठी लावण्याचे काम झाले. सामान्य मुलांना कळावेत ह्यासाठी त्यांनी कंन्सेप्टचा ही बळी दिला आहे. या पिढीने मोठमोठी रेफरन्स पुस्तकांपेक्षा काही परिक्षेला वाहिलेल्या पुस्तकांची चाळणी केलेली आहे. जी काही चांगली पुस्तके वा मार्गदर्शन अपेक्षित असते ते दिले गेलेच नाही. गल्लाभरू पुस्तके म्हणजेच अभियांत्रिकी असा समज आमच्यात जाणिवपुर्वक पसरवण्यात आला डिप्लोमाला ज्या सरांच्या हाताखाली शिकलो त्याच सरांचे तेव्हाचे आणि आताचे अध्यापन यात जमिनअस्मानचा फरक आहे. ह्यात स्वताःची किंमत कमी झाल्याचा राग आहे की समोरची मुले टुकार आहेत असा समज आहे हे काय उमजले नाही. आणि हे एका सरांपुरते मर्यादित नाही. > मी अथवा वर नमूद केलेल्या माझ्या मित्रांनी अभियांत्रिकीला जाण्याचा निर्णय स्वताः स्वताःच्या आवडीने घेतला होता. आमचे कॉलेजही ब-यापैकी चांगलेच होते. आपल्याला आवडणारे क्षेत्र सॅच्यरेट झाले आहे म्हणुन तिथे प्रवेश न घेणे अर्थातच योग्य नव्हते. सॅच्यूरेशनच्या या काळात खरेच ज्यांना याविषयी आवड होती त्यांचे यात खुपच नुकसान झाले. आम्ही काम करण्यालायक नव्हतो वा वादक होतो तर आम्ही डिस्टिंशनसह कसे पास झालो ह्याचे उत्तर मिळाले नाही. वरील उदाहरणे कसेबसे पास होणा-या मुलांची नव्हे तर विद्यापिठात क्रमांक काढणा-यांचि आहेत. जर हीच मुले काम करु शकत नसतील तर विद्यापिठाचे निकष चुकीचे आहेत हे मान्य करावे लागेल. म्हणूनच ही सरकार , विद्यापिठ , अध्यापक आणि शेवटी विद्यार्थी यांच्या चुकांची मोठी साखळी आहे. यात आम्ही पुर्ण निर्दोष आहोत हा दावा अर्थातच नाही ज्या वेगाने आम्ही स्वताःला अपडेटेट ठेवायला हवे तसे ठेवलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. केवळ दोषारोप करणे हाही हेतू नाही. हे केवळ एक परिस्थितीकथन आहे. (आधीच्या उत्तम अध्यापकांखाली शिकलेल्या अभियंतांना हे दोषारोपण वाटेल म्हणून)

In reply to by शब्दानुज

उपयोजक 18/04/2018 - 07:59
...या फिल्ड मधे अभियंते पैशासाठी नाही तर घरी बसण्यापेक्षा हाताला काम असाव म्हणून घेत आहेत. या मित्राने डिप्लोमाची तिन आणि इंजिनियरची तिन अशी सहा वर्ष टेक्निकलमद्धे घालून घेतलेला हा निर्णय केवळ आणि केवळ हतबलतेतुन घेतला होता..... मग हा मित्र घेतलेल्या शिक्षणावर आधारित स्वत:चा छोटा व्यवसाय नाही का उभारु शकणार? कारण तसंही फायनान्सच्या क्षेत्रात तो हतबल होऊनंच गेलाय.जिथं मन रमत नसेल तिथं आऊटपुटसुध्दा चांगलं येण्याची शक्यता कमी असते. शिवाय मेकची हालत ही असेल तर विचार करा इलेक्ट्रॉनिक्सची काय असेल? ....तुम्ही अखेरच्या जे म्हणत आहात की कंपनी सोडून देणार नाही हे त्या कंपनीसाठी लागू होते जिचा विस्तार होत आहे.... हे नीटसं समजलं नाही.कंपन्यांचा विस्तार थांबतो कसा?फायद्यात चालत असणार्‍या कंपनीज तर संधीच शोधत असतात विस्ताराची.दुसरं असं की ज्या कंपन्या स्वत: प्रॉडक्ट डेव्हलप करतात,स्वत: R&D करतात त्यांना हुशार अभियंते लागतातंच. R&D मधेच तल्लख असणार्‍यांना थेट संशोधनांचं काम मिळायला अडचण नसावी. BE वाल्यांना डावलून एका तल्लख डिप्लोमा होल्डरला R&D मधे घेतल्याचं उदाहरण प्रत्यक्ष पाहिलंय.कामाबद्दल किती सखोल माहिती आहे यावर सगळं ठरतं. ....त्यामूळे कंपनीला नवीन स्किल्ड लोकांची गरजच पडत नाही. त्यांना लागणारे आवश्यक मनुष्यबळ आधीच त्यांच्याकडे काम करत आहेत जे वर्षानुवर्ष तेच काम करत आहेत. बाकी टेक्निकल बाबी त्यांना माहित असो वा नसो त्यांच्या कामाच्या या बाबतीत त्यांना टक्कर देणे अशक्य असते.... सरधोपटपणे होणार्‍या कामांकडेच का पाहता? तिथून लोक हलणार नाहीतंच. त्याऐवजी नवीन डिझाईन्स,नव्या आयडिया देणार्‍या,कंपनीला फायद्यात आणणार्‍या कल्पना सुचवण्याकडे का पाहू नये? अभियंत्याने मशिन अॉपरेटरपेक्षा वरचा विचार करणं योग्य नाही का? ....ह्या कंपनीच्या मालकांना बदल अर्थात नको असतो. आहे ते कसेबसे पुढे ढकलणे हाच उद्देश.... सगळ्या कंपन्या अशाच आहेत का? ढकलगाडी अवस्थेतल्या? ....यानंतर जे उरते ते गाढवकाम असते त्यासाठी त्यांना लागण्या-या गरम रक्ताचा वापर ते खुबीने करतात. ह्या जॉबवर कमी पगारावर सतत नवनवीन मुले ती राबवून घेतात. यात पगारवाढ , बढती हा प्रकारच नसतो. पेपरच्या जाहिराती या अश्या जॉबच्या असतात.... परत तोच मुद्दा.गाढवकाम करणारं होताच का मुळात?निदान मेक,इलेक्ट्रिकल,केमिकलसारख्या क्षेत्रात तरी अजूनही innovation,product development ला भारताततरी चिक्कार स्कोप आहे.पण तितका अभ्यास हवा. .....कदाचित सगळेच मिपाकर अभियंते कॉलेज हे एका सरांपुरते मर्यादित नाही...... तुम्ही शिकलेल्या कालावधीतून बाहेर पडलेले सगळेच अभियंते सटरफटर काम करताहेत का? कोणालाच न्याय मिळाला नाही का? .....मी अथवा वर नमूद केलेल्या माझ्या मित्रांनी अभियांत्रिकीला जाण्याचा निर्णय स्वताः स्वताःच्या आवडीने घेतला होता. आमचे कॉलेजही ब-यापैकी चांगलेच होते.... चांगला जॉब मिळवून देऊ शकत नसेल तर कॉलेज चांगलं कसं? चांगलं असेल तर जॉब मिळायला हवे होते.असो. ...आपल्याला आवडणारे क्षेत्र सॅच्यरेट झाले आहे म्हणुन तिथे प्रवेश न घेणे अर्थातच योग्य नव्हते.... हाच मुद्दा धाग्यात शेवटी मांडलाय.'बाजारभाव बघा' फक्त आवड आहे यावरंच विसंबून राहू नका. .....आम्ही काम करण्यालायक नव्हतो वा वादक होतो तर आम्ही डिस्टिंशनसह कसे पास झालो ह्याचे उत्तर मिळाले नाही...... तुमच्यानंतरही कॉलेजमालकांचं पोट भरलं पाहिजे. आमच्याइथून इतकी इतकी मुलं डिस्टींक्शनमधे पास झाली हे नवीन येऊ इच्छिणार्‍यांना दाखवायला नको का? बकरे कटते रहने चाहिए म्हणूनही मार्कांची खिरापत वाटली असेल.शक्यता नाकारता येत नाही. ...वरील उदाहरणे कसेबसे पास होणा-या मुलांची नव्हे तर विद्यापिठात क्रमांक काढणा-यांचि आहेत.... बर्‍याच वर्षांपूर्वी पुण्यामुंबईच्या नोकर्‍यांच्या जाहिरातीत काहीवेळा तळटीप असायची.' छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीतून पास झालेल्यांनी कृपया अर्ज करु नयेत.' अशी. नंतर बहुधा राजकीय दबावामूळे बंद झाली ती तळटीप. ....यात आम्ही पुर्ण निर्दोष आहोत हा दावा अर्थातच नाही ज्या वेगाने आम्ही स्वताःला अपडेटेट ठेवायला हवे तसे ठेवलेले नाही ही वस्तुस्थिती आहे..... अजूनही उशीर झालेला नाही. Better late than never. यासाठी अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जीचा मंझिल हा सिनेमा बघा असे सुचवतो.

जेम्स वांड 17/04/2018 - 17:54
इलेक्ट्रॉनिक्स, मेक, सिविल, इतर शाखा, नोकऱ्या नाहीत, भुछत्र उगवावी तशी कॉलेज उगवलीत, तरीही अभियांत्रिकीच शिक्षण घ्यायचं(च) हा अट्टाहास कश्यासाठी? कोणी जबरदस्ती तर करत नाही न अभियांत्रिकीचा कोर्सच करा बीई बीटेक करा म्हणून? बारावी पास होता होता पोरांना इंडस्ट्री ट्रेंड कळू शकत नाहीत हे तर्कच मुळात पटण्यासारखे वाटत नाहीत, विशेषतः आजच्या जमान्यात जेव्हा इंटरनेट रूपाने ज्ञानगंगा दारी अवतरलेली असताना. मिपावर आर्टिस्ट (पक्षी अभ्या शेठ) ते मिलिटरी मॅन, डॉक्टर्स (पक्षी खरे साहेब, म्हात्रे काका) , सीए, सीएस, हॉटेल मॅनेजमेंट सगळं केलेली माणसे भेटतील, आपल्याकडे अभियांत्रिकीचे नको तितके स्तोम माजवले जाते असे माझे प्रामाणिक मत होय, थोड्या कक्षा रुंदावणे आपलेही कर्तव्य आहे, भाराभर अभियांत्रिकी महाविद्यालयं उघडतात कारण आपली डिमांड वेडी आहे, ह्यावरही विचार व्हावा.

In reply to by जेम्स वांड

अभ्या.. 17/04/2018 - 18:17
च्यामारी वांडोबा, "करता कशाला इंजिनिअरिंग?" हेच विचारणार होतो पण आता प्रतिसादात तुम्ही आमचे नाव घेऊन टाकला मग कानकोंडे व्हायला होते. . . असो. आमचे मिपावरचे लै मोठमोठे विंजीनेर दोस्त आहेत आनि ते समाधानी आहेत तर छानच आहे म्हणतो आणि तमाम विंजीनेरांना शुभेच्छा देतो. . (तसा एका अर्थाने मी इंजिनिअरच आहे ;) )

In reply to by अभ्या..

जेम्स वांड 17/04/2018 - 21:13
पण सॅच्युरेशन दिसतानाही तिकडं कडमडणाऱ्या पोरांवर हसावे का रडावे कळत नाही. देवा जग कुठं चाललंय अन आपण कुठं अडकतोय ह्यावर थोडा तर विचार करावा की नाही राव. आमच्याच कंपनीत एकदा एक पोरगी आली , दिल्लीची, एका प्रथितयश बँकेची ज्युनिअर इकॉनॉमिस्ट, पोरगी शिक्षणाने बी.ए! परत वाचा बी.ए. फक्त बी.ए. नंतरच्या गप्पात मी माझं आश्चर्य व्यक्त केलं तेव्हा म्हणाली 'कोई ना जेम्स, हमको ये प्रोफायलिंग की आदत होती है, खास कर साऊथ में नॉन टेक्निकल बंदो को रेस्पेक्ट अर्न करना थोडा टफ पडता है' तिने सांगितले की तिने बारावी (वाणिज्य) , मधून बारावी केलं, त्यात ९८% का काहीतरी मिळवले तेव्हाही दिल्लीत श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स (एस आर सी सी) मध्ये ते ही सेकंड राऊंड मध्ये बी.कॉम मिळणे निश्चित नव्हते मग 'नाईलाजाने' हंसराज कॉलेज मध्ये बी.ए. अर्थशास्त्राला ऍडमिशन घेतली त्या नंतर एकच्युरियल सायन्स मध्ये एक डिप्लोमा केला, डी यु मधून. कॅम्पस मधून लागली होती ज्युनिअर इकॉनॉमिस्ट म्हणून, माझ्या टीमच्या अडीच मेम्बर्सचे वार्षिक पेकेज होते तितके तिचे एकटीचे होते, अन तरीही कसलाही माज (व्यावसायिक) नव्हता. त्या दिवशी कळले जग बी.ई. पेक्षा लै मोठं आहे.

In reply to by जेम्स वांड

उपयोजक 17/04/2018 - 20:40
.....बारावी पास होता होता पोरांना इंडस्ट्री ट्रेंड कळू शकत नाहीत हे तर्कच मुळात पटण्यासारखे वाटत नाहीत, विशेषतः आजच्या जमान्यात जेव्हा इंटरनेट रूपाने ज्ञानगंगा दारी अवतरलेली असताना. मिपावर आर्टिस्ट (पक्षी अभ्या शेठ) ते मिलिटरी मॅन, डॉक्टर्स (पक्षी खरे साहेब, म्हात्रे काका) , सीए, सीएस, हॉटेल मॅनेजमेंट सगळं केलेली माणसे भेटतील,...... वांडसाहेब, तुम्ही नावं दिलेल्या मिपाकरांचं आधीपासूनंच काय करायंच ते व्यवस्थित ठरलं आणि ते त्यांनी कष्ट घेऊन करुन दाखवलं.इथे व्हिजन क्लिअर असणं महत्वाचं. मी वर सानेंचं वाक्य दिल्याप्रमाणे आपल्याकडे वादकांची संख्या खुप आहे; आणि प्रश्न या वादकांचाच आहे. संगीतकारांची चिंता नाही. 3 इडियट्स मधे दाखवल्याप्रमाणे प्रतिभावंताला जग शोधत येतं. इंजिनिअरिंगमधे आता फारसा दम नाही,या आजच्या इंजिनिअर्सना काही येत नाही याची अनेकदा चर्चा होऊनही फक्त बाजारभाव कमी असलेल्या शाखा बंद होताहेत आणि बाजारभाव जास्त असणार्‍या शाखेत सीटससाठी धडपड चालूच राहते. आता हे वादक पक्षी बेताची हुशार मुलं इंजिनिअरिंगला का जातात यामागे कारणही रंजक आहे. मुलींच्या जोडीदाराबद्दलच्या वाढत्या अपेक्षा. ग्लॅमरस शिक्षण+रग्गड कमाई असं असलं की लग्न लवकर जमतं. शेतीतून इंजिनिअरिंगपेक्षाही अधिक कमाई होत असूनही बर्‍याचशा मुलींना शेती करणारा जोडीदार नको असतो.मुलींनाही मातीत हात घालायला आवडत नाही.यामुळेच बर्‍यापैकी कमाई असूनही फारसं ग्लॅमर नसलेले कोर्सेस किंवा व्यवसाय जसं की पौरोहित्य,ITI किराणा मालाचा दुकानदार,दुचाकी-चार चाकीचे मेस्त्री अशी पार्श्वभुमी असणारी मुलं मुलींकडून नाकारली जातात.(अर्थात याला काही मुली अपवादही आहेत.पण अपवादच!) तथाकथित गोरी,स्मार्ट,सुंदर मुलगी आपल्याला बायको म्हणून मिळावी,जमल्यास बर्‍यापैकी हुंडा मिळावा यासाठी ही इंजिनिअरिंगची वाट धरली जाते. अनेक डिप्लोमा इंजिनिअर मुलं तर लग्न होईपर्यंत कारखान्यात नोकरी करतात आणि लग्न झालं की १-२ वर्षाने पूर्णवेळ शेतीकडे जातात.आता एवढ्या उशीराने नवरा शेती करतो म्हणून बायको सोडून थोडीच जाते? त्यात मुल झालं असेल तर अजून सोप्पं! शेती न करणार्‍या बहुतांश शहरी मुलांचंही कारण हेच! आर्टस/कॉमर्सपेक्षा इंजिनिअरिंग केल्यावर चार अॉप्शन्स जास्त खुले होतात.शिवाय आर्टस,कॉमर्स पेक्षा इंजिनिअरिंगला ग्लॅमर जास्त.डोक्याचं काम! ज्यांना बेताचं डोकं आहे त्यांनी जावं आर्टस,कॉमर्सला हा दिव्य विचार!! याचाच परिपाक म्हणून ITI वाला डिप्लोमा व्हायला बघतो, डिप्लोमावाला डिग्री घ्यायला बघतो,डिग्रीवाला ME व्हायला बघतो.जेणेकरुन प्रतिष्ठा वाढेल,पर्यायाने चारचौघात अभिमानानं सांगावं असं शिक्षण घेतलंय अशी टिमकीही वाजवता येते.

In reply to by उपयोजक

जेम्स वांड 17/04/2018 - 21:19
पोरी यंव म्हणतात, पोरीच्या अपेक्षा त्यांव, ह्याच्यात मला कवडीचा रस नाही, तुमचा धागा परिपाक एजंडा तो असल्यास आम्ही इथे काहीच बोलणे इष्ट समजत नाही, उगाच नसत्या रडारडित आम्हांस रस नाही.

In reply to by जेम्स वांड

उपयोजक 18/04/2018 - 06:53
पण काय नडलंय इंजिनिअरिंगमधे? बाकीचे कोर्स आहेत की असा नेहमीचा सूर वाटला.तस्मात त्याची १-२ कारणं सांगायचा प्रयत्न केला इतकंच.

In reply to by उपयोजक

जेम्स वांड 18/04/2018 - 07:52
आधी स्वतः म्हणताय की अभियांत्रिकीत नोकऱ्या नाहीत, युनिव्हर्सिटी टॉपर पण अमुक इतक्या चार आकडी पगारात बसलेत अन यंव त्यांव, मग कोणी साहजिकच 'कश्याला केलेत मग अभियांत्रिकी' म्हणले की फिरून 'काय नडलंय इंजिनियरिंग मध्ये?' विचारताय! काय काय नडलंय ह्याची जंत्री अन रडणावळ तुम्हीच मांडलीये की वरती, परत फिरून ते मला काय विचारताय? 'नेहमीचे सूर' तुम्ही लावताय, स्वतःच्या कक्षा रुंद करा जमले तर शुभेच्छा.

In reply to by जेम्स वांड

उपयोजक 18/04/2018 - 08:05
..आधी स्वतः म्हणताय की अभियांत्रिकीत नोकऱ्या नाहीत, युनिव्हर्सिटी टॉपर पण अमुक इतक्या चार आकडी पगारात.... कोणासाठी लिहिलंय आणि काय लिहिलंय हे काही कळत नाहीये या प्रतिसादातून.असो. वांड माणसाबरोबर वाद घालणे योग्य नव्हे.

महेश हतोळकर 17/04/2018 - 18:29
सध्या हे वाचा, http://www.misalpav.com/node/32977 http://www.misalpav.com/node/30876 http://misalpav.com/node/18126 https://www.misalpav.com/node/17920 आजूनही बरच काही आहे पण इंजिनिअर झाल्यावर या गोष्टीही करता येतात.

उपयोजक 17/04/2018 - 19:28
http://www.misalpav.com/node/32852 या धाग्यावरचा "कुठल्याही यंत्राची,उपकरणाची ..... यावरुन कल्पना यावी." एवढा मजकूर वाचावा. आपल्या कामाबद्दल एवढं सखोल ज्ञान असेल तर कोणती कंपनी तुम्हाला तुटपुंज्या पगारावर राबवत बसेल?उलट तुम्ही कंपनी सोडून जाऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्नच करेल ना?

उपयोजक 18/04/2018 - 08:06
...या फिल्ड मधे अभियंते पैशासाठी नाही तर घरी बसण्यापेक्षा हाताला काम असाव म्हणून घेत आहेत. या मित्राने डिप्लोमाची तिन आणि इंजिनियरची तिन अशी सहा वर्ष टेक्निकलमद्धे घालून घेतलेला हा निर्णय केवळ आणि केवळ हतबलतेतुन घेतला होता..... मग हा मित्र घेतलेल्या शिक्षणावर आधारित स्वत:चा छोटा व्यवसाय नाही का उभारु शकणार? कारण तसंही फायनान्सच्या क्षेत्रात तो हतबल होऊनंच गेलाय.जिथं मन रमत नसेल तिथं आऊटपुटसुध्दा चांगलं येण्याची शक्यता कमी असते. शिवाय मेकची हालत ही असेल तर विचार करा इलेक्ट्रॉनिक्सची काय असेल? ....तुम्ही अखेरच्या जे म्हणत आहात की कंपनी सोडून देणार नाही हे त्या कंपनीसाठी लागू होते जिचा विस्तार होत आहे.... हे नीटसं समजलं नाही.कंपन्यांचा विस्तार थांबतो कसा?फायद्यात चालत असणार्‍या कंपनीज तर संधीच शोधत असतात विस्ताराची.दुसरं असं की ज्या कंपन्या स्वत: प्रॉडक्ट डेव्हलप करतात,स्वत: R&D करतात त्यांना हुशार अभियंते लागतातंच. R&D मधेच तल्लख असणार्‍यांना थेट संशोधनांचं काम मिळायला अडचण नसावी. BE वाल्यांना डावलून एका तल्लख डिप्लोमा होल्डरला R&D मधे घेतल्याचं उदाहरण प्रत्यक्ष पाहिलंय.कामाबद्दल किती सखोल माहिती आहे यावर सगळं ठरतं. ....त्यामूळे कंपनीला नवीन स्किल्ड लोकांची गरजच पडत नाही. त्यांना लागणारे आवश्यक मनुष्यबळ आधीच त्यांच्याकडे काम करत आहेत जे वर्षानुवर्ष तेच काम करत आहेत. बाकी टेक्निकल बाबी त्यांना माहित असो वा नसो त्यांच्या कामाच्या या बाबतीत त्यांना टक्कर देणे अशक्य असते.... सरधोपटपणे होणार्‍या कामांकडेच का पाहता? तिथून लोक हलणार नाहीतंच. त्याऐवजी नवीन डिझाईन्स,नव्या आयडिया देणार्‍या,कंपनीला फायद्यात आणणार्‍या कल्पना सुचवण्याकडे का पाहू नये? अभियंत्याने मशिन अॉपरेटरपेक्षा वरचा विचार करणं योग्य नाही का? ....ह्या कंपनीच्या मालकांना बदल अर्थात नको असतो. आहे ते कसेबसे पुढे ढकलणे हाच उद्देश.... सगळ्या कंपन्या अशाच आहेत का? ढकलगाडी अवस्थेतल्या? ....यानंतर जे उरते ते गाढवकाम असते त्यासाठी त्यांना लागण्या-या गरम रक्ताचा वापर ते खुबीने करतात. ह्या जॉबवर कमी पगारावर सतत नवनवीन मुले ती राबवून घेतात. यात पगारवाढ , बढती हा प्रकारच नसतो. पेपरच्या जाहिराती या अश्या जॉबच्या असतात.... परत तोच मुद्दा.गाढवकाम करणारं होताच का मुळात?निदान मेक,इलेक्ट्रिकल,केमिकलसारख्या क्षेत्रात तरी अजूनही innovation,product development ला भारताततरी चिक्कार स्कोप आहे.पण तितका अभ्यास हवा. .....कदाचित सगळेच मिपाकर अभियंते कॉलेज हे एका सरांपुरते मर्यादित नाही...... तुम्ही शिकलेल्या कालावधीतून बाहेर पडलेले सगळेच अभियंते सटरफटर काम करताहेत का? कोणालाच न्याय मिळाला नाही का? .....मी अथवा वर नमूद केलेल्या माझ्या मित्रांनी अभियांत्रिकीला जाण्याचा निर्णय स्वताः स्वताःच्या आवडीने घेतला होता. आमचे कॉलेजही ब-यापैकी चांगलेच होते.... चांगला जॉब मिळवून देऊ शकत नसेल तर कॉलेज चांगलं कसं? चांगलं असेल तर जॉब मिळायला हवे होते.असो. ...आपल्याला आवडणारे क्षेत्र सॅच्यरेट झाले आहे म्हणुन तिथे प्रवेश न घेणे अर्थातच योग्य नव्हते.... हाच मुद्दा धाग्यात शेवटी मांडलाय.'बाजारभाव बघा' फक्त आवड आहे यावरंच विसंबून राहू नका. .....आम्ही काम करण्यालायक नव्हतो वा वादक होतो तर आम्ही डिस्टिंशनसह कसे पास झालो ह्याचे उत्तर मिळाले नाही...... तुमच्यानंतरही कॉलेजमालकांचं पोट भरलं पाहिजे. आमच्याइथून इतकी इतकी मुलं डिस्टींक्शनमधे पास झाली हे नवीन येऊ इच्छिणार्‍यांना दाखवायला नको का? बकरे कटते रहने चाहिए म्हणूनही मार्कांची खिरापत वाटली असेल.शक्यता नाकारता येत नाही. ...वरील उदाहरणे कसेबसे पास होणा-या मुलांची नव्हे तर विद्यापिठात क्रमांक काढणा-यांचि आहेत.... बर्‍याच वर्षांपूर्वी पुण्यामुंबईच्या नोकर्‍यांच्या जाहिरातीत काहीवेळा तळटीप असायची.' छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीतून पास झालेल्यांनी कृपया अर्ज करु नयेत.' अशी. नंतर बहुधा राजकीय दबावामूळे बंद झाली ती तळटीप. ....यात आम्ही पुर्ण निर्दोष आहोत हा दावा अर्थातच नाही ज्या वेगाने आम्ही स्वताःला अपडेटेट ठेवायला हवे तसे ठेवलेले नाही ही वस्तुस्थिती आहे..... अजूनही उशीर झालेला नाही. Better late than never. यासाठी अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जीचा मंझिल हा सिनेमा बघा असे सुचवतो.

शब्दानुज 18/04/2018 - 09:15
> 'विस्तार न पावणा-या कंपन्या' हे सोलापुरातील टेक्स्टाईल कंपन्याबाबत आहे. याच त्या ढकलगाड्या. फक्त आपण सोलापुरचे उदाहरण दिले त्यामूळे तिथली खरी परिस्थिती सांगणे भाग पडले. हे वाक्य सगळ्याच कंपन्यासाठी लागू अर्थातच होत नाही. > बाकी मेक , इलेक्टॉनिक्स वा इतर हा वाद न संपणारा आहे. प्रत्येकाला दुस-याची बायको सुंदर वाटते. असो. > न्याय असा मिळत असेल अशी स्थिती नाही. तो मिळवावा लागेल. > इनोव्हेशन मध्येच जाण्याचा विचार आहे. स्पर्धा तिव्र आहे आणि त्यासाठी लागणारी टेक्निकल खोली कॉलेजने दिलेली नाही. ती खोली आता स्वताः वाढवत जात आहे आपल्या शुभेच्छांसाठी आभारी आाहे. सगळेच आशावादी राहूया

अभ्या.. 18/04/2018 - 09:44
विस्तार न पावणा-या कंपन्या' हे सोलापुरातील टेक्स्टाईल कंपन्याबाबत आहे..
तेवढे सोडून बोला, एकतर हे स्टेटमेंट खोटे आहे, दुसरे म्हणजे फक्त फिल्ड सोडून इतर जनरल नॉलेज कमी पडतेय. टेक्सटाईल आणि फाउंडरी आणि फार्मा इंडस्ट्रीज व्यवस्थित चालू आहेत पण राज्य सरकारच्या काही धोरणामुळे त्या विभाजित अथवा स्थलांतरित होत आहेत. टेक्सटाईल उद्योग हा मालकांनी शिस्तीत धंदा करून रडण्यासाठी आधीपासून फेमस आहे. त्याला इलाज नाही. किर्लोस्कर सारख्या फाउंडरीज बंद पडल्या पण प्रिसीजन सारख्या फाउंडरीने ब्रिटिश कंपन्या टेक्वोहर केल्या. हा मालकाच्या दूरदृष्टीचा परिणाम होता. अजूनही एमआयडीसी मध्ये निम्मे प्लॉट ओपन राहतात, डियासि मुद्राचा कोटा भरला जात नाही , ह्याचा अर्थ कमी कष्टयाची कमी तणावाची जास्त सुखाची नोकरी हेच अंतिम ध्येय वाटते. व्यवसाय नकोच वाटतो. अर्थात ह्याला समाज, धारणा, लग्न अपेक्षा, धडाडीच्या वयातले कष्ट, रिस्क नको घ्यायची इच्छा आनि तुलना करत बसायची सवय हे सारेच घटक कारणीभूत आहेत म्हणा. एकट्या इंजिनिअराना दोष देण्यात अर्थ नाही.

In reply to by अभ्या..

जेम्स वांड 18/04/2018 - 10:07
तुमच्याशी पण वाद घालणे व्यर्थ आहे! जोवर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर किती बिचारे आहेत हे मान्य करत नाही तोवर तुम्ही मुद्द्यावर आलेले नाही हे सुचवतो अन माझा वांड पणा ह्या चार शब्दांसोबत संपवतो.

In reply to by जेम्स वांड

विशुमित 18/04/2018 - 12:11
जेम्स भाऊ पेटवा पेटवा पोरांना आणखी. ==== काबील बनो सक्सेस तो झक मारके पीछे आयेगी-- इति रणछोड दास उर्फ "वांड" सुख वांगडू

In reply to by अभ्या..

शब्दानुज 18/04/2018 - 12:37
नफा कमवणे आणि काही कालखंडानंतर नवीन रोजगारनिर्मितिची क्षमता असणे या भिन्न बाबी आहेत. टेक्साईल कंपन्या बंद पडल्या आहेत असे नाही. कंपन्या विस्तार पावत नाहित हा मुद्दा आहे. कंपनी चालू असणे आणि त्याचा विकास सतत होत राहणे या गोष्टी वेगळ्या नव्हेत का ? आधीचा वारसा बघता टेक्स्टाईलने जेवढे रोजगार द्यायला हवे होते तेवढे देत आहे का ? नवनवीन मशीन्स आणुन आधुनीकरण होऊन विक्री वाढून रोजगारनिर्मिती झालेली नाही हा मुद्दा आहे. माझ्याच एका मित्राचे वडिल जे एका अशाच कारखान्याचे मालक आहेत ते स्वताःच्या मुलाला कारखाना पुढे चालवण्यास मनाई करत आहेत. प्रिसीजन ही केवळ एकच कंपनी विस्तारणारी आहे. आणि केवळ त्या मालकांच्या धोरणांमुळेच ते पुढे जात आहे. पण दुर्दैवाने ह्यांचाही अोढा कमी कालखंडांसाठी नवनवीन मुले निवडण्याकडे आहे. अर्थात (याच) कंपनीने नोक-या दिलेल्या आहेत हे अमान्य नाही करता येणार. पण एकच असल्याने ही कंपनी अपवाद ठरते. बाकी व्यवसायबद्दलचे मत मान्य. त्यासाठीची धडाडी ,गूण ,कौशल्ये अभियंतात (मी पकडून) नाहीत हे मान्य करावे लागेल.

सिव्हील सोडल्यास बाकीच्या शाखेतील इंजिनियर्स स्वतःचा व्यवसाय करण्यापेक्षा नोकरीलाच प्राधान्य देताना आढळतात. याविरुद्ध परिस्थिती वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची असते, त्यांचा नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याकडे कल असतो.

माझे काही मुद्दे: - एक तर मराठी मुलांमध्ये घर, गाव, राज्य सोडायची तयारी कमी असते, आपली शहरात अथवा जवळपासच नोकरीच ठिकाण असावं अस वाटत असत. - हे थोड पर्सनल आहे, मी स्वतः फक्त वाणिज्य पदवीधर (बारावीला डबल), पण तेच बॅक ऑफिस चा काम नाही करायचं असा ठरवलेलं, VAS (Value Added Servises) मध्ये अगदी executive म्हणून जॉईन झालो, पगार माफक, पण फील्ड नाही सोडली, १० वर्षांनी आज भारतातल्या एका मोठ्या दूरसंचार कंपनी मध्ये मॅनेजर आहे, मोठेपणा नाही पण मनासारख काम करतोय यात आनंद आहे. वेगळा विचार करायलाच हवा. - नोकरी नाही अस ओरडणं थांबवा, कॉलेज नंतर रस्त्यावर उभ राहून सिम कार्ड्स विकली आहेत, ओळखी वाढवल्या त्यातूनच VAS बद्दल कळलं. हा माझा पहिला प्रयत्न लिहिण्याचा, जमलं तसं लिहिलं आहे, शुद्धलेखन भयानक आहे याची जाणीव आहे, कृपया समजून घ्यावे

In reply to by अमित मुंबईचा

प्रतिसात खूप आवडला. सर्वसामान्य मराठी माणूस असा विचार करायला लागेल तो सुदिन. नाहीतर पदवी मिळवून नोकरी मिळत नाही या कारणासाठी अनंत काळपर्यंत वाट पाहण्याची (आणि ते करताना सिस्टिम व एकंदरीत सर्व जगाला दोष देत बसण्याची) तयारी असणारे जागोजागी दिसतात. :( दुसर्‍याची नोकरी करण्यापेक्षा, दुसर्‍यांना नोकरी देणारा व्यवसाय करण्याची भावना किमान १०% मराठी माणसांत यावी अशी फार महत्त्वाकांक्षी आशा आहे. तुम्ही इथे अजून लिहाच असा आग्रह आहे.

बी ई झाल्या झाल्या माझ्या मते मुलांनी ताबतोब वर्षभर अभ्यास करुन संरक्षण दलात कमिशन मिळविण्याचा प्रयत्न करावा. थोड्या प्रयत्नाने हे सहज शक्य आहे असे मला वाटते.

In reply to by जयंत कुलकर्णी

जेम्स वांड 19/04/2018 - 16:14
त्यानंतर मराठी समाजात युनिफॉर्म सर्विसची नोकरी म्हणलं का सगळ्यांना मरणच दिसतं, मिलिटरी नको मधेच बहुसंख्य मध्यमवर्गीय जातात, इंजिनियरिंग वर चार वर्षे लाखो खर्च केलेली माणसे 'आता इतका पैसा खर्च करूनही फौजेत मरायला जायचं की काय' विचार करतात तेव्हा आपण काय बोलणार कप्पाळ!

उपयोजक 01/05/2018 - 06:33
उपस्थित केलेल्या फ्रेशरला एवढेच मिळतात म्हणावं तर एकाच कॉलेजचे कॉप्यूटरचे मित्र सुरवात २-३ लाखच्या पॅकेजने का करतात ह्यावर उत्तर नाही.>> या प्रश्नाची कोणी उकल करा राव!

उपयोजक 01/05/2018 - 06:36
उपस्थित केलेल्या या प्रश्नाची कोणी उकल करा राव! ...फ्रेशरला एवढेच मिळतात म्हणावं तर एकाच कॉलेजचे कॉप्यूटरचे मित्र सुरवात २-३ लाखच्या पॅकेजने का करतात ह्यावर उत्तर नाही....

कपिलमुनी 01/05/2018 - 12:51
गेले ते दिवस ! काही ठराविक मुले ठराविक कंपन्यांमध्ये प्लेस होतात त्यांना मिळतात . मी स्वतः 2008 च्या मंदीत फुकट काम करणारी मुल पाहिली आहेत. सध्या टॉप 10 कंपन्या सोडल्या तर 10/15 हजार मिळतात फ्रेशरला . आणि कधीही हाकलून देतात . Grass on the other side is always green. नोकारीसाठी मार्कसोबत स्मार्टपणा हवा . बोलबचन हवा. दुर्दैवाने गावाकडच्या मुलांकडे communication skills सुधारायला कॉलेज मदत करत नाही.

मदनबाण 01/05/2018 - 21:33
Doctors, lawyers, MBAs in the race to be Mumbai Police constables आत्ताच ही अवस्था आहे, पुढच्या पिढीला किती संघर्ष करावा लागेल याचा अंदाज लावणे देखील कठीण !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- The Ventures - Wipeout live in Japan 1966

उपयोजक 26/05/2018 - 18:48
परवा आयटीआय ला टेक्निशियन मुलं घ्यायला गेलो होतो. पंचवीस कंपन्या हजर होत्या. अन मुलं आली होती दहा. तिथले ऑफिसर सांगत होते, टाटा ग्रुप ला २५० मुलं पाहिजेत, पण मिळत नाही आहेत. आयआयटी च्या मुलांचं पण लागलीच प्लेसमेंट होत असावं. म्हणजे थोडक्यात आयटीआय ते आयआयटी चेन मध्ये वांदे झालेत ते डिप्लोमा आणि बीई मुलांचे. याला काही कारणं आहेत. एकतर इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक उदंड झाले आहेत. आणि त्यातून तयार होणाऱ्या लोकांची क्वालिटी शंकास्पद आहे. डिप्लोमा मुलं तर अक्षरशः कुठलाही जॉब करायला तयार असतात. काम कुठलंही चांगलं, पण घेतलेल्या शिक्षणाला न्याय देणारं तर असावं. जी कामं आय टी आय टेक्निशियन करू शकतो तीच कामं डिप्लोमा वा ग्रॅज्युएट इंजिनियर ने करण्यात काय मतलब आहे. हेल्परचं काम मागायला येतात हो. वाईट वाटतं. त्यात सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस इंडस्ट्री वाल्या मंडळींनी ही मुलं पळवायला चालू केली. कोअर ब्रँच करायची आणि की बोर्ड बडवत बसायचा, याला काय अर्थ आहे. फक्त मॅथ्स शिकल्यामुळे लॉजिक चांगलं या एका क्वालिफिकेशन वर प्रोग्रामर बनत गेले आणि कोअर विसरत गेले. पोरांची भौतिक स्थिती सुधारली पण शैक्षणिक विषमता तयार झाली. आम्ही इंडस्ट्रीवाल्यानी सुद्धा यावर तात्पुरते उपाय योजले. जे मिळतात ते घ्या. आणि अजून कमी पगार देऊन घ्या. आणि मग त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी लेव्हलचं काम द्या. पोरं पोरी सुद्धा सुखनैव जीवनाला चटावले. त्यांनीही धोंडा पाडून घेतला पायावर. आता तिथे अनिश्चितता तयार झाल्यावर साळसूदपणे म्हणतात "I want to make career in core". एकंदरीत एकेकाळी ज्या इंजिनियरिंग साखळी चा बोलबाला होता, त्याचं आज हसं झालंय. त्या चेन मधील डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट ह्या सगळ्यात कमजोर कडी आहेत. आणि या अधोगतीला समाजातील प्रत्येक घटक, अगदी तुम्ही, मी, शिक्षणसम्राट, इंडस्ट्रीवाले, हे सगळे जण कारणीभूत आहेत. आपल्याकडे बेरोजगारी या प्रश्नापेक्षा रोजगारासाठी लायक युवक उपलब्ध आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. राजेश मंडलिक