मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...

यनावाला · · काथ्याकूट
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत. " ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्‍या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो? आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे. यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ? देवदर्शनाला जाणार्‍या तसेच दर्शन घेऊन परत येणार्‍या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ? कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्‍या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही. वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ? अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते. अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्‍नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे, "दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली. आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥ विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली. रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ? पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥" तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल. .................................................................................

वाचने 82853 वाचनखूण प्रतिक्रिया 247

मागील जन्मी केलेल्या पापांमुळे माणुस या जन्मी नास्तिक बनतो; आणि या जन्मी नास्तिक होऊन आस्तिक लोकांना सतत पिडण्याच्या पापाची फळे त्याला त्याच्या पुढच्या जन्मी मिळतात, असं आम्हाला...  या देवदुताने सांगितले आहे. पण, तरीही आम्हाला तुमच्या प्रचंड चिकाटीने चालवलेल्या कामाचे  प्रचंड कौतूक आहे, हे सुद्धा नमूद करत आहोत !   हघ्याहेवेसांनल.

In reply to by प्रचेतस

मिपाच्या सगळ्याच आयड्यांना यनावालांनी झपाटले आहे आणि ते ती "झाडे" सोडायला अजाबात तयार नाहीत ! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाखु Tue, 02/20/2018 - 12:34
झाडेच त्याच्या मागं मागं जाताना दिसत असतात. अता झाडाचं मूळ आणि ऋषींचे कूळ शोधू नये असं कुठेतरी वाचलंय. मुकाट्याने पायवाटेने चालत असलेल्या​ सामान्य जनतेतील एक क्षुल्लक पांथस्थ नाखु

मार्मिक गोडसे Mon, 02/19/2018 - 22:14
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?..... त्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट त्याने त्याच्या भेकड भक्तांना दिले आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी .....

वालावलकर सेठ, ईश्वर आपल्याला काय शिक्षा देणार ? तुम्हाला आणि माझ्यासहीत सर्व निरीश्वरवाद्यांना देव उकळत्या तेलाच्या कढ़ईत आपल्याला भज्यासारखे तळून काढतील. लक्षात ठेवा. ;) धन्स सर, तुम्ही माझ्यातला देवाचे खुळ काढल्याबद्दल. देवा तू असशील तर ना सर्व भाबड्या मिपकरांच्या खात्यात रात्रीतून एक एक कोटी जमा कर... लै कड़कीत आहेत बिचारे....;) -दिलीप बिरुटे

मारवा Mon, 02/19/2018 - 22:25
दोन्ही कडे पेटलेलीय ................. डोळ्यात धुर गेल्याने समोरुनच पेटल्याचा भास होत असावा. हलक्यात अजिबात न घेणे हे वेगळे सांगणे नलगे. असो बाकी यनावाला सर तुम्ही मेटाएथिक्स वाइज कसा विचार करत असणार याचे एक अकारण कुतुहल आहे तुमच्या लेखात एकसुरीपणा जाणवतो विरोधी आर्ग्युमेंट्स मध्ये व्हरायटी नाही याचे कारण तुम्ही मर्यादीत स्टॅन्ड्स वा पवित्रे हाताळलेले असावेत अशी शंका येते. बहुधा तुम्ही वाचल नसल्यास एक पुस्तक सुचवावेसे वाटते When Bad Things Happen to Good People- Harold Kushner फार रोचक आहे ,

क्रिप्ट Tue, 02/20/2018 - 01:07
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ---> केवळ विश्वास नाही म्हणून त्याने शिक्षा का करावी? उद्या यनावाला असे कोणी नाहीच असे केवळ म्हणले तर तुम्ही जाऊन त्याला शिक्षा कराल का? मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील>>> एखाद्या नास्तिकाने देवावर विश्वास ठेवला काय किंवा नाही ठेवला काय त्याने देवाला काहीच फरक पडत नाही. त्याची इच्छा एवढीच आहे की तुम्ही त्याच्या शोधासाठी स्वतःहून प्रयत्न करावेत. आणि तसे प्रयत्न करण्याची प्रेरणा तुम्हाला व्हावी म्हणूनच हे द्वंद्वयुक्त जग आहे. इथे सुख असेल तर दुःख देखील आहे. जोपर्यंत दुःखाचे चटके सोसायची तुमची तयारी आहे आणि ईश्वर प्राप्तीची इच्छा नाही तोपर्यंत तुम्ही सुख दुःख भोगत राहाल. ज्याक्षणी तुम्हाला या सुख दुःखाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते मला प्राप्त करायचे आहे अशी इच्छा, निर्धार होईल आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न कराल तेंव्हा शेवटी तो या मार्गावर भेटेलच. ज्या लोकांवर त्याचा विश्वास नाही केवळ त्यांची उत्सुकता शमवायला त्याने यावे असे का म्हणून? निरीश्वरवाद्यांनी असे काय केले आहे कि त्यांच्यासमोर तो उभा ठाकेल? त्याला जाणून घ्यायचे असेल तर त्याने स्वतः अथवा इतर संतांनी जे मार्ग सांगितले आहेत त्यावर चालून पाहावे. थोडी न थोडकी प्रचिती नक्कीच येईल. परंतु काहीच न करता निरीश्वरवाद्यांसमोर त्याने उभे ठाकावे हि अपेक्षाच चुकीची आहे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही.>>> असे का? या सृष्टीचे काही नियम आहेत. त्यातला एक म्हणजे कार्यकारणभाव. त्यालाच कर्म असेही म्हणतात. कर्मसिद्धांत असे सांगतो कि आत्ता तुम्ही भोगत असलेले आयुष्य हे तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माचा परिपाक आहे. त्याचा तुमचा आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काही संबंध नाही. तुमचे कर्म चांगले असेल आणि तुम्ही ईश्वर मानत नसाल तरी तुमच्या कर्माचे फळ मिळेलच. पण तुम्ही आस्तिक असाल आणि अनेक वाईट कर्मे करून केवळ आस्तिकतेच्या नावाखाली त्यातून सुटून जाऊ पाहत असाल तर ती शुद्ध फसवणूक ठरेल. परंतु याला थोडेसे अपवाद असू शकतात. जर केलेले कर्म नकळतपणे झाले असेल किंवा केलेल्या कृत्याचा खूपच पश्चाताप झाला असेल आणि त्या कृत्यामुळे ओढवलेल्या संकटातून तरून जाण्यासाठी अत्यंत निर्मल मनाने तुम्ही ईश्र्वरभक्ती केलेली असेल तर कदाचित सुटूही शकाल. 'कर्मणे गहन: गती: असे कृष्णाने म्हणून ठेवले आहे. परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. >>> . तुम्हाला जर असे वाटत असेल कि घशाचा कॅंन्सर मुळे परमहंसांना एका सध्या माणसाला होतात तश्या वेदना होत असतील तर ते चुकीचे आहे. ते मनाच्या अश्या अवस्थेत जाऊन पोहोचले होते कि त्यांना झालेल्या शारीरिक व्याधीचा बऱ्याचदा जाण पण नसे. अशी माणसे शरीराच्या पलीकडे गेलेली असतात व त्यांना अश्या व्याधीमुळे कोणताही फरक पडत नसतो. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे>>>>> खरे आहे. ह्या विश्वाचा कारभार कर्मसिद्धतांवर आहे आणि केलेली चांगली कर्मे फलद्रुप होतात. अश्या कर्मात देवाच्या उपासाऐवजी भुकेल्या माणसाला दिलेल्या जेवणाचा हि समावेश होतो. परंतु असे कर्म हि नकळतपणे केलेली ईश्वराची सेवाच आहे कारण ह्या जगात ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे.

क्रिप्ट Tue, 02/20/2018 - 01:11
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ---> केवळ विश्वास नाही म्हणून त्याने शिक्षा का करावी? उद्या यनावाला असे कोणी नाहीच असे केवळ म्हणले तर तुम्ही जाऊन त्याला शिक्षा कराल का? मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील----- एखाद्या नास्तिकाने देवावर विश्वास ठेवला काय किंवा नाही ठेवला काय त्याने देवाला काहीच फरक पडत नाही. त्याची इच्छा एवढीच आहे की तुम्ही त्याच्या शोधासाठी स्वतःहून प्रयत्न करावेत. आणि तसे प्रयत्न करण्याची प्रेरणा तुम्हाला व्हावी म्हणूनच हे द्वंद्वयुक्त जग आहे. इथे सुख असेल तर दुःख देखील आहे. जोपर्यंत दुःखाचे चटके सोसायची तुमची तयारी आहे आणि ईश्वर प्राप्तीची इच्छा नाही तोपर्यंत तुम्ही सुख दुःख भोगत राहाल. ज्याक्षणी तुम्हाला या सुख दुःखाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते मला प्राप्त करायचे आहे अशी इच्छा, निर्धार होईल आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न कराल तेंव्हा शेवटी तो या मार्गावर भेटेलच. ज्या लोकांवर त्याचा विश्वास नाही केवळ त्यांची उत्सुकता शमवायला त्याने यावे असे का म्हणून? निरीश्वरवाद्यांनी असे काय केले आहे कि त्यांच्यासमोर तो उभा ठाकेल? त्याला जाणून घ्यायचे असेल तर त्याने स्वतः अथवा इतर संतांनी जे मार्ग सांगितले आहेत त्यावर चालून पाहावे. थोडी न थोडकी प्रचिती नक्कीच येईल. परंतु काहीच न करता निरीश्वरवाद्यांसमोर त्याने उभे ठाकावे हि अपेक्षाच चुकीची आहे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही.------ असे का? या सृष्टीचे काही नियम आहेत. त्यातला एक म्हणजे कार्यकारणभाव. त्यालाच कर्म असेही म्हणतात. कर्मसिद्धांत असे सांगतो कि आत्ता तुम्ही भोगत असलेले आयुष्य हे तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माचा परिपाक आहे. त्याचा तुमचा आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काही संबंध नाही. तुमचे कर्म चांगले असेल आणि तुम्ही ईश्वर मानत नसाल तरी तुमच्या कर्माचे फळ मिळेलच. पण तुम्ही आस्तिक असाल आणि अनेक वाईट कर्मे करून केवळ आस्तिकतेच्या नावाखाली त्यातून सुटून जाऊ पाहत असाल तर ती शुद्ध फसवणूक ठरेल. परंतु याला थोडेसे अपवाद असू शकतात. जर केलेले कर्म नकळतपणे झाले असेल किंवा केलेल्या कृत्याचा खूपच पश्चाताप झाला असेल आणि त्या कृत्यामुळे ओढवलेल्या संकटातून तरून जाण्यासाठी अत्यंत निर्मल मनाने तुम्ही ईश्र्वरभक्ती केलेली असेल तर कदाचित सुटूही शकाल. 'कर्मणे गहन: गती: असे कृष्णाने म्हणून ठेवले आहे. परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. ----- तुम्हाला जर असे वाटत असेल कि घशाचा कॅंन्सर मुळे परमहंसांना एका सध्या माणसाला होतात तश्या वेदना होत असतील तर ते चुकीचे आहे. ते मनाच्या अश्या अवस्थेत जाऊन पोहोचले होते कि त्यांना झालेल्या शारीरिक व्याधीचा बऱ्याचदा जाण पण नसे. अशी माणसे शरीराच्या पलीकडे गेलेली असतात व त्यांना अश्या व्याधीमुळे कोणताही फरक पडत नसतो. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे------ खरे आहे. ह्या विश्वाचा कारभार कर्मसिद्धतांवर आहे आणि केलेली चांगली कर्मे फलद्रुप होतात. अश्या कर्मात देवाच्या उपासाऐवजी भुकेल्या माणसाला दिलेल्या जेवणाचा हि समावेश होतो. परंतु असे कर्म हि नकळतपणे केलेली ईश्वराची सेवाच आहे कारण ह्या जगात ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे.

In reply to by क्रिप्ट

सतिश गावडे Tue, 02/20/2018 - 07:46
असं अधिकार वाणीने लिहीलेले वाचून तुम्ही "अवतारी" पुरुष असून नुकताच अवतार धारण केलेला असणार असे उगाचच वाटले.

In reply to by सतिश गावडे

गुरु माऊलींनी परमेश्वराची वाट दाखवली आहे, नमस्कार करा. जय जय राम कृष्ण हारी, जय जय राम कृष्ण हारी. बाकी, धन्यासेठ, मला तुकडोजी महाराजांचं भजन मात्र आवडतं. सांगा मी काय करु, भक्ती करु का पोट भरु. आवडलं तर चहा पाजा आज. -दिलीप बिरुटे ( एक जालअवतारी महापुरुष)

मूकवाचक Tue, 02/20/2018 - 09:40
आपण नास्तिक आहोत असे स्पष्टपणे सांगणार्‍या एका सदगृहस्थाने भगवान रमण महर्षींना चिरडीला आणण्यासाठी प्रश्न विचारला, "ईश्वर असतो का, ईश्वराचे अस्तित्व आपण सिद्ध करू शकाल काय?" महर्षींनी स्मितहास्य केले आणि त्यांनी उत्तर दिले, "ईश्वराची चिंता आपण कशाला करता आहात? त्याला त्याची चिंता वाहू द्या! हा प्रश्न ज्याला पडला आहे त्याच्या स्वरूपाचा शोध घ्या". तो नास्तिक बुचकळ्यात पडला. श्री रमणांनी त्याने "मी कोण आहे?" हे पुस्तक वाचावे अशी शिफारस केली. त्यामुळे जेमेतेम काही तास आश्रमाला भेट देण्याच्या हेतूने आलेल्या या आगंतुकाने तेथेच काही दिवस मुक्काम केला. शेवटी तो म्हणाला, "मी इथे येताना ईश्वराला नाकारणारा एक नास्तिक म्हणून आलो, आणि त्या वेळी मी सुखी होतो. आता मात्र स्वतःलाच "मी कोण आहे" असा प्रश्न केल्याने मी जाम गोंधळून गेलेलो आहे. मला वाटते आहे की आपली (मानसिक) स्थिती बिघडत चालली आहे आणि त्यामुळे मी नाखूश आहे" श्री रमणांनी त्याच्याकडे बघत स्मितहास्य केले आणि म्हणाले, "तुझा हा वैचारिक गोंधळ बिघडलेल्या मनस्थितीचे द्योतक नाही. आपल्याच अस्तित्वामागच्या सत्याकडे, स्वस्वरूपाकडे तू आजवर पूर्णपणे दुर्लक्ष करत आलेला आहेस. आता कुठे तू एक मूलगामी स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहेस, ज्यामुळे तू या (स्वस्वरूपाकडे) दुर्लक्ष करण्याच्या स्थितीपासून दुरावत चालला आहेस. त्यामुळे झालीच असेल तर एक सुधारणा झालेली आहे! (स्वस्वरूपाकडे) दुर्लक्ष करण्यापासून आत्ताचा वैचारिक गोंधळ, या गोंधळातून सुस्पष्टतेकडे, त्या बौद्धिक स्पष्टतेकडून प्रचितीकडे आणि प्रचितीकडून अंती ठामपणे (सच्चिदानंद) स्वरूपातच स्थित होउन राहणे - अशा चढत्या भाजणीनेच अध्यात्मिक साधनेची वाटचाल होत असते. मूळ स्त्रोतः http://realizedone.com/post/when-a-confessed-atheist-provocatively-asked...

चौकटराजा Tue, 02/20/2018 - 10:02
ईश्वर हा साक्षीदार - भक्ताच्या भाषेत "सर्वसाक्षी" आहे. व साक्षीदार हा त्रयस्थ असतो सबब त्याला दुसर्याला शासना करण्याचा अधिकार असेलच कसा ?

जेवढे आस्तिक मंडळी देवाचं नाव घेत नस्तील किंवा लेख पाडत नस्तील, तेवढे, नास्तीक लोकं करतात अस वाटतंय :)

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला कदाचित् निरीश्वरवाद्यांकडे लक्ष द्यावे इतकेही त्यांचे महत्व इश्वराला वाटत नसावे ! मात्र, यनावाला कळत नकळत ईश्वराची सतत इतकी आठवण काढत असतात की स्वर्गाच्या लाईनमध्ये त्यांचा नंबर सगळ्या आस्तिकांच्या पुढे असेल* असेच वाटते ! :) * : संदर्भ : कुठल्याश्या कथेत सांगितले आहेच ना की, "शिकारीची वाट पहात बेलाच्या झाडावर बसलेल्या एक पारधी केवळ वेळ घालवण्यासाठी बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला, ती झाडाखालच्या शंकराच्या पिंडीवर पडत राहिली आणि काही वेळाने शंकराने प्रसन्न होऊन पारध्याला दर्शन दिले."

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे Wed, 02/21/2018 - 11:16
* : संदर्भ : कुठल्याश्या कथेत सांगितले आहेच ना की, "शिकारीची वाट पहात बेलाच्या झाडावर बसलेल्या एक पारधी केवळ वेळ घालवण्यासाठी बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला, ती झाडाखालच्या शंकराच्या पिंडीवर पडत राहिली आणि काही वेळाने शंकराने प्रसन्न होऊन पारध्याला दर्शन दिले."
शिवलीलामृत अध्याय २

लागुंचा एक किस्सा आठवला. त्यांच्या मुलाचा तन्वीर चा लोकल मधे वर्मी दगड लागून मृत्यू झाला. त्यांना काही कठोर सश्रद्धांनी सागितले," बघा तुम्ही देव मानीत नाही ना? देवाने तुम्हाला शिक्षा केली". लागू म्हणाले की मी त्याला मानीत नाही म्ह्णून तो माझ्या मुलाला शिक्षा करणार असेल तर तो देव कसला? राक्षस असला पाहिजे.
अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते.
यात बाबा आमटे राहिले की! या सगळ्या मंडळींच नास्तिक्य कुणाला खुपत नव्हत. ते देव न मानणारे असतील पण देवाला शत्रू मानणारे नव्हते. तसेच असंख्य लोक जे देवाला मानतात त्यांना दुखवणारे नव्हते.त्यांच्या श्रद्धेची टिंगल किंवा अवहेलना करणारे नव्हते.तसेच चिकित्सा करणारे ही नव्हते. बाबांना तर लोक देव न मानणारा देव माणूस म्हणायचे. अनेक सौम्य नास्तिक लोकांची साधारण भूमिका अशी असायची मी माझ्या पुरता देव मानीत नाही. तुम्हीही तो मानू नये असा माझा आग्रह नाही. तुम्ही तो मानत असल्यास तुमच्या भावनेचाही आदरच आहे. त्याला मानण्या न मानण्यामुळे आपल्या माणूस पणात कुठलीही बाधा येत नाही. अस्तिक व नास्तिक या केवळ सोयी साठी वापरलेल्या संज्ञा आहेत. ते काही वॊटर टाईट कंपार्टमेट नाही. मधे अज्ञेयवादाचा पट्टा मोठा आहे. शिवाय ही वर्गवारी चल आहे.परमेश्वर हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र आहे अशीही संकल्पना आहे. प्रथम तो निर्गुण निराकार. त्याची कल्पना करण सामान्यांना अवघड झाल. मग तो सगुण साकार झाला. तो ही पुरेनासा झाला मग भक्तवत्सल करुणा घन. सर्वगुण संपन्न सर्वशक्तीमान असणे परमेश्वराला भाग आहे नाही तर त्याला कुणी विचारणार नाही. असशील तू लै भारी पण मला त्याचा उपयोग नसेल तर? तुही भिकारी व मी ही भिकारी. बसू दोघे भीक मागत. असे झाले असते ना! त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या, द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं ममः देवदेवा || सगळी नाती चिकटवून टाकली इथे. विरोध भक्ती मधे देवाला शिव्या द्यायची परमीशन आहे. आमच्या गावाकडे लव्हाराचा शंकर्‍या व मुसलमानाचा पाप्या हे एकमेकांना घट्ट मैत्रीत आईबहिणी वरुन शिव्या द्यायचे. त्याच्या शिवाय मैत्रीच नात घट्ट झाल्याचे त्यांना वाटायच नाही. असो मुद्दा असा आहे की प्रत्येकाच्या देव या संकल्पना सुद्धा वेगळ्या आहेत. त्याला एकच पदर नाही. मानला तर देव नाही तर दगड असे म्हणणारे अनेक सश्रद्ध मी गावाकडे लहानपणी पाहिले आहेत. आजही शहरात पाहतो. मी व माझा देव हे विं श चौघुले संपादित पुस्तक जरुर वाचावे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडे साहेब, तुम्ही देवावर श्रद्धा ठेवता का म्हणजे त्याला मानता का ? हो किंवा नाही इतकेच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमचा देवावर विश्वास आहे का? असा प्रश्न भल्याभल्यांना बुचकळयात, संभ्रमात, चिंतनात टाकतो. मग तुम्हाला कोणता देव अभिप्रेत आहे? अशा प्रतिप्रश्नाने उसंत मिळते अस मी ग्रंथ परिचयात म्हटले आहे. हो कि नाही? अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. माझ्या जगण्याच्या गरजेनुसार मेंदु ठरवतो. कधी मी नास्तिक तर कधी अस्तिक तर कधी अज्ञेयवादी असतो. हे एक उत्तर दुसर अस की माना मानू नका काही फरक पडत नाही. मूळात ती एक संकल्पना आहे म्हणजे मानवी मेंद्चा अविष्कार. मी कुठल्याही प्रतिमेत अडकत नाही. तसे अस्तिक म्हणजे सनातनी बुरसटलेला व नास्तिक म्हणजे रॅशनल सुधारक असेही मी मानत नाही. यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् | भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : || अर्थ जीवनात सुखेनैव जगावे. गरज पडल्यास कर्ज काढून तूपरोटी खावी. एकदा देहाची राख झाल्यावर परत कोण येणार आहे? अस मानतो. उद्या माझ्या मेंदुत जैवरासायनिक बदल झाले तर माझे म्हणणे बदलेलही. अर्थात ते कुणाचेही बदलेल. अगदी यनावालांचेही. निसर्ग नियम तुमच्या माझ्यासाठी वेगळे नाहीत. कुणाच्याही मेंदुत केमिकल लोच्या होउ शकतात. शिवाय प्रत्येक गोष्टीवर आपले काहीतरी मत असलेच पाहिजे असेही मी मानीत नाही. अनेक गोष्टी आपल्यासाठी अदखलपात्र असू शकतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बिटाकाका Tue, 02/20/2018 - 12:16
वरचा आणि हा, दोन्ही प्रतिसाद आवडले. ******************************************** प्रतिष्ठित नास्तिकांची नावे देताना असे अगणित प्रतिष्ठित आस्तिकही होऊन गेले आहेत हा मुद्दा सरळ सरळ बाजूला टाकला जातो. देव त्याची भक्ती केली नाही तर शिक्षा देतो हे जणूकाही सर्व आस्तिकांचे ब्रह्मवाक्य आहे अशा थाटात वरील लेख लिहिला गेला आहे असे मला वाटते. देव शिक्षा नाही तर न्याय करतो, देव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळे देतो असे मानणारे (चान्गली आणि वाईट कर्मे ठरवण्याचे सामर्थ्य ईश्वरात आहे असे मानण्यात काहीच गैर नसावे) आस्तिक लेखकाच्या खिजगिणतीतही नसतात त्यामुळे असे लेख नेहमी स्वतः तयार केलेल्या मुद्द्यांवर, एकांगी होतात असे मला वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मला माहिती होतं तुम्ही हो किंवा नाही मधे उत्तर देनार नाहीत. एक मोठा वर्ग असा आहे की, जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर सृष्टीला मानतो. पण, मध्यस्थ, मंदिरं, बाबा-बुवा, दगड, देव, खडे, अंगठ्या, आकार उकार यांना मानत नाही. मला हे बरं वाटतं. या लोकांचा तान नसतो. ही मंडळी कोणालाही त्रास देत नाही. मला तुमचं मत समजलं आहे. तुम्ही हो आणि नाही मधे पक्के अडकलेले आहात.

उद्या माझ्या मेंदुत जैवरासायनिक बदल झाले तर माझे म्हणणे बदलेलही.

मान्य.

अर्थात ते कुणाचेही बदलेल.

हं. जीवनात संकटं. आली की मतं बदलतात, असं एक निरिक्षण आहे.

 

अगदी यनावालांचेही.

यनांचे आता मत कधीच बदलनार नाही, बदलूही नये असं माझं ठाम मत आहे. जालावर माझे दोन सर आदर्श आहेत, एक दैववादी जे आहे ते आहे असं मानणारे शरद सर, आणि कंप्लेट दैव नाकारणारे वालावलकरसेठ. बाकी, सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. एकदा भेटूया....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यनांचे आता मत कधीच बदलनार नाही, बदलूही नये असं माझं ठाम मत आहे
यनावालांचे मत कधीच बदलणार नाही हे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही. हा जो च आहे ना तो काही अढळ नाही. फार तर असे म्हणा की एकूण परिस्थितीचा विचार करता यनावालांचे मत बदलण्याची शक्यता कमी वाटते. आणि बदलूही नये हे तुमची इच्छा आहे ठाम मत नव्हे. एक प्रतिसाद अशा चर्चांमधे सारखा द्यावा लागतो. तो चिकटवतो आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... हा प्रतिसाद मिपावर दिला आहे कुठे तरी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

arunjoshi123 Tue, 02/20/2018 - 13:32
जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर सृष्टीला मानतो.
मंजे काय हे काही कळायला भाग नाही. -------------------- अवांतर - तांत्रिकदृश्ट्या अद्भूत हे विशेषण नास्तिकांनी वापरू नये.

In reply to by arunjoshi123

मंजे काय हे काही कळायला भाग नाही. आपणास प्रतिसादातला काही भाग कळला नसेल तर आपण प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे, ही लम्र विनंती. मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत असा काही नियम नाही. आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

arunjoshi123 Tue, 02/20/2018 - 16:07
मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत असा काही नियम आहे असं गृहित धरून मी प्रश्न विचारला नव्हता. परंतु त्याच वेळी सर्वच गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत आणि त्यांनी तद्नुसार वागायलाच पाहिजे इ इ कोणाची विचारसरणी असू शकते (जशी इथे यनावालांची आहे.) हे ही मला कळतं असा माझा समज आहे. शिवाय प्रत्येक गोष्ट कळावी अशी माझी जैविक रचना, बुद्धिमत्ता, अर्हता, आवश्यकता इ इ नाही हे देखिल मला कळतं असा माझा समज आहे. पण अर्थातच प्रा आणि डॉ लावल्यामुळं तुमच्या विधानाचा अर्थ काढायचा प्रयत्न करत होतो. ते अनावश्यक नि मूर्खपणाचं असलं तरी इन्स्टिंक्टिव आहे हो. बच्चे को गलती कि माफी दे दो.

In reply to by arunjoshi123

बच्चे को गलती कि माफी दे दो. आपले प्रतिसाद पाहता आपल्याला केव्हाच माफ केलंय आणि इग्नोरही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by arunjoshi123

ईश्वराने आम्हाला असंच वेडं बनवलंय. किती लोड घेणार काका सोडून द्या. आपले एकमेकांचे विचार नाय पटत सोडून द्यायचं. लै मनावर नै घ्यायचं. तुमचा वेंगी आवडला. चांगलं लेखन करता तुम्ही. बाकी काय चाललंय नवीन. :) उदगीरला मागच्या महिन्यात आलो होतो प्रचाराला. काय रस्ते आहेत राव. भेटलो असतो तिकडे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 19:41
बाकी मस्त. आमच्या उदगीरला कोण्या का निमित्ताने जाणारे लोक विशेष आवडतो. ( सध्याला मी पुण्यात राहतो.) ============== मी कै लोड इ नै घेतंय. नि समोरचेही घेत नसतात हे ही माहित आहे. गंमत म्हणून गपाट्या करायच्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Tue, 02/20/2018 - 23:05
एक दैववादी जे आहे ते आहे असं मानणारे शरद सर... माझी जरी व्यक्तिगत ओळख नसली तरी श्री. शरद यांच्या लेखनावरून ते "दैव"वादी आहेत असे अजिबात वाटत नाही.

In reply to by विकास

चौकटराजा Wed, 02/21/2018 - 07:17
दैव वाद व देव वाद हे पूर्ण भिन्न आहेत असे मी ६५ वर्षाच्या अनुभवा नंतर ठाम पणे विधान करीत आहे. दैव याची माझी सोपी व्याख्या अशी की जे आपल्या हातात नाही असा सर्व गोष्टीचा आपल्यावर होणारा समुच्चय परिणाम. तुम्ही देवाचे अस्तित्व माना अगर नका मानू दैवाचे अस्तित्व तुम्हाला मान्य करावेच लागते कारण या जगात कोणीच परिपूर्ण कोणत्याच अर्थाने नाही. सबब पराधीनता यातून कोणाही माणसाचीच नवे तर एकूणच सर्वांची सुटका नाही. पराधीनता आली की दैव आलेच ! देवाचे तसे नाही. काहीतरी अचाट, अगम्य शक्ती आहे असे देवाचे स्वरूप मानणारे ही अनेक आहेत. पण जगाच्या कारभारात हेतूपूर्वक भाग घेणारा नियंता म्हणून देव अस्तित्वात आहे ही जी भक्त लोकांची धारणा आहे ती मान्य करता येत नाही. म्हणूनच तुम्ही देववादी असलात तर प्लासिबो म्हणून काही फायदे होत असतीलही पण देव वादी नसलात तर होणारे फायदे अधिक आहेत असा माझा तरी अनुभव आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

arunjoshi123 Tue, 02/20/2018 - 13:27
प्रा. डॉ. दिलिप बिरुटे, तुम्हाला मी या ही पेक्षा एक सोपा प्रश्न विचारतो. फक्त हो किंवा नाही मधे उत्तर द्या. ============== प्रश्नः प्रा. डॉ. दिलिप बिरुटे, तुम्हाला प्रश्न विचारता येतो का?

खिलजि Tue, 02/20/2018 - 12:44
यनावाला , नमस्कार .... आस्तिक आणि नास्तिक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ... आस्तिक : जो युगानुयुगे एका दैवी शक्तीला सदैव सलाम करत आला आहे ... नास्तिक : जो हे सार थोतांड आहे आणि त्याचा स्वतःवर ठाम विश्वास आहे . ( इथे " कर्मयोग लागू होतो बरं का ) देव आहे कि नाही : मानलं तर हो आणि नाही तर नाही .. पण ह्या साऱ्या निर्थक गोष्टी आहेत .. कारण आपल्या धर्मात दोन्ही पक्षासाठी ( आस्तिक आणि नास्तिक ) ध्येय प्राप्तीच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत .. आस्तिक लोक , देवाला स्मरून कर्म करतात तर नास्तिक लोक स्वतःवर विश्वास ठेवून कर्म करतात .. कर्मयोग हीच खरी ईश्वरभक्ती आहे ... अंधश्रदधा ठेवून जर कोणी " असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी " असे जर कोणी म्हणत असेल तर त्याच्या पेकाटात लाथ मारानेच उचित ठरेल ... तुम्ही काय करता , कमावता आणि त्याचा व्यय कसा करता यावर ठरते ... माझा देवापेक्षा , हि जी आपल्या ऋषीमुनींनी स्तोत्रे लिहून ठेवली आहेत ना त्याच्यावर फार विश्वास आहे ... मी लहानपणापासून गणपती स्तोत्रे आणि नवग्रह स्तोत्र म्हणत आलो आहे .. आता सध्या त्याच्यासोबतच रुद्रपाठ नित्य चालू असतो .. त्यासाठी देवासमोर बसून राहत नाही .. मनातल्यामनात घोकत असतो .. त्यातून मला शांती मिळते आणि मला वाटत ,, प्रत्येकाला ती हवी असते .. अगदी नास्तिकाला सुध्दा ... तेव्हा शांतीची व्याख्या आणि त्याचे वाद , हाच खरा वादाचा विषय आहे ... इथे ईश्वराचे काहीही देणेघेणे नाही ... या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव , माणूस सोडला तर , सृष्टीचे नियम अगदी काटेकोरपणे पाळतो ... अगदी समुद्राला येणारी भरती ओहोटीसुध्द्धा ... असो .. स्तोत्रांबद्दल मी माझे अनुभव तुम्हाला सांगतो नवग्रह स्तोत्र फळ : "इति श्री वेदव्यास मुखोदगीतं यापठेतसुसमहितौ दिवावयादिवा रात्रौ विघनशांतीभविष्यति नरनारीनृपनाचं भावेददुस्वप्न नाशानं ऐश्वर्यं अतुलाम तेषां आरोग्यम पुष्टिवर्धनाम ग्रहनक्षत्रजा पिडांतस्कराग्नि समुद्भवाम ता सर्वा प्रशामम यान्ति व्यासो ब्रूट निसंशयह " माझे आतापर्यंतचे जीवनमान : १) मला एकही स्वप्न पडत नाही २) मला कसलेही भय वाटत नाही .. अगदी मृत्यूचेसुध्दा ३) कधी अडचणीत सापडलो तर मार्ग मिळण्यासाठी फार तिष्ठत बसावे लागत नाही ४) एक बंडखोर , आणि आगाऊ मुलगा , ज्याच्या भविष्याचा फार यक्ष प्रश्न बापासमोर उभा होता , तो आज संपूर्ण कुटुंबात एक चांगले उदाहरण बनला आहे .. माझ्या डॉक्टर बनण्यामागे एक अविश्वसनीय प्रवास होता .. ज्याची मलादेखील कल्पना नव्हती .. पण तो घडून आला .. आणि हे सांगण्यामागचे कारण हेच कि तो निदान माझ्याकडून तरी शक्य नव्हता .. मी एम एस सी झाल्यावर या सगळ्याला मूठमाती दिली होती .. पण ते व्हायचाच होते .. गाईड स्वतः मागे लागले आणि ते घडून आले .. नुसतंच डिग्री नाही बरं का .. चांगले बारा तेरा पेपर पब्लिश झालेत आणि तीन पेपरने तर अवॉर्ड मिळवलेत .. आता बोला .. आहे कि नाही या स्तोत्रांची कमाल .. तुम्हाला स्तोत्र फळ खोटे ठरवायचे आहे तर एकदम सोप्प काम आहे .. पण जर ते खरं ठरवायचं असेल तर ती ऋषीमुनींनी दिलेली संख्या पार पदवीच लागते .. ते करा म्हणजे हा वाद कायमचा मिटेल ... अहो सोप्पी गोष्ट आहे .. ऋषीमुनींना हे मनाचे खेळ फार आधीच समजले होते ... त्यांनी दिलेला हा अगाध ठेवा जातं होण्यासाठीच देव हि संकल्पना साकारली गेली ... निरीश्वरवादी आणि ईश्वरवादी हे सारे थोतांड आहे ... पण एक मात्र नक्की , हि शृष्टी एका अनामिक आणि अगाध दैवी शक्तीवर कार्यरत आहे आणि ते विज्ञानापलीकडचे आहे ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

खिलजि Tue, 02/20/2018 - 12:48
नवग्रह स्तोत्र फळ : "इति श्री वेदव्यास मुखोदगीतं यपठेतसुसमहितौ दिवावायदिवा रात्रौ विघनशांतीभविष्यति नरनारीनृपनाचं भवेददुस्वप्न नाशनं ऐश्वर्यं अतूलम तेषां आरोग्यम पुष्टिवर्धनम ग्रहनक्षत्रजा पिडांतस्कराग्नि समुद्भवाम ता सर्वा प्रशामम यान्ति व्यासो बृते निसंशयह "

In reply to by arunjoshi123

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?
मध्यंतरी ईश्वर भेटला होता. त्याला मी हाच प्रश्न केला. तो म्हणाला," ते जरी मला मानत नसले तरी मी त्यांना मानतो. मी त्यांना शिक्षाही करत नाही व बक्शीस ही देत नाही." :)

दीपक११७७ Tue, 02/20/2018 - 15:04
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही
ईश्वराने मानवास ईश्वर आहे की नाही हे ठरवा किंवा केवळ ईश्वर प्रार्थना करा यासाठी पृथ्वीवर पाठवलेले नाही. चांगले वाईट भोग, भोगण्यास पाठवले आहे, परिणाम स्वरुप निरीश्वरवाद्यांना ईश्वराने शिक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही. असे मी म्हणल्यास

यश राज Tue, 02/20/2018 - 17:29
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही आणि आस्तिकांनाच ईश्वर शिक्षा करतो हीच मुळात निरीश्वरवाद्यांची सर्वात मोठी अंधश्रध्दा आहे. एनि वे फारच महा लोल लेख आहे.

सुबोध खरे Tue, 02/20/2018 - 17:30
बापरे लोक एवढा गूढ आणि गहन विचार करतात? आणि एवढा त्याना वेळही असतो? आणि असा विचार करायला आवडतो? आमचे जीवन *शरद तळवलकर* आहे. काना मात्रा वेलांटी नसलेले सरळसोट. असला विचार सुचत नाही आणि सुचला तर झेपत नाही.

सुबोध खरे Tue, 02/20/2018 - 17:30
बापरे लोक एवढा गूढ आणि गहन विचार करतात? आणि एवढा त्याना वेळही असतो? आणि असा विचार करायला आवडतो? आमचे जीवन *शरद तळवलकर* आहे. काना मात्रा वेलांटी नसलेले सरळसोट. असला विचार सुचत नाही आणि सुचला तर झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

डॉ.नितीन अण्णा गुरुवार, 02/22/2018 - 17:09
आमचे जीवन *शरद तळवलकर* आहे. देव बाप्पा कान कापेल म्हणून आमचे बालपण देखील शरद तळवलकर होते. आता वाटते "देव बाप्पा कान कापेल" हे तपासायला हवे होते.

सप्तरंगी Tue, 02/20/2018 - 18:40
मला एक प्रश्न पडलाय - जो नाहीच्चे त्याबद्द्ल (त्या देवाबद्दल ) यनावालासर इतके सतत का लिहीत राहतात. तो नाहीये हे मान्य ना मग त्याला जरा आरामात बसू द्या ना, नास्तिकांनी का इतके enguage करून ठेवायचे , थोडा तर आस्तिकांच्या वाट्याला येऊ द्या त्याला ! कि यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे ??

In reply to by सप्तरंगी

समाजात वावरतांना लोक देवधर्माचे प्रचंड बळी ठरतात. विवेक गमावून बसतात, त्याचं आपलं प्रबोधनाचं काम. पटलं तर घ्या नाय तर सोडून द्या. अशिक्षित लोकांचं एक वेळा प्रबोधन करता येईल पण उच्चशिक्षितांचं प्रबोधन करणे फ़ार अवघड आहे, ही वाढत्या देवधर्माच्या ठिकाणी वाढलेली गर्दी पाहता आणि भोंदुबाबांच्या नादी लागलेल्यांच्या बातम्या पाहता काही गोष्टी लक्षात येतात , त्यामुळे त्याचं एकमेव काम प्रबोधनाचं आहे, असे वाटते. एक अभंग आहे, जरासा वेगळा फ़क्त कामापूरत्या ओळी डकवतो. देव न लगे देव न लगे । साठवणेचे रुधले धागे ।। देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करू ।। -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

arunjoshi123 Tue, 02/20/2018 - 22:17
आधुनिक समाजात वावरताना माणसानं थोडं व्यवहारी असावं. धर्मव्यवस्थेअंतर्गत सव्वा रुपया दक्षिणा लूटून पळणार्‍या भटाच्या मागे पळण्याऐवजी अर्थव्यवस्थेअंतर्गत ११५०० कोटी रुपये लूटणार्‍या मोदीच्या मागे लागावे.
वाढत्या देवधर्माच्या ठिकाणी वाढलेली गर्दी पाहता
असली आत्मसृजित स्वप्नं कुठून येतात कुणास ठाऊक. आम्हीही याच भारतात राहतोय. उच्चशिक्षित भारतीय आणि युरोपीय गोरे यांच्या संस्क्रुतीत फरक उरलेला आम्हाला दिसत नाही. देवाधर्माच्या जागी गर्दी वाढलेली कुठे दिसते? आमच्या शेजारच्च्या मॉलमधे देवपूजेची आणि दारूची दुकानं शेजार शेजारी आहेत. कुठलं ओसाड असतं हे लिहायची गरज नाही. दारुच्या अड्डयावर गर्दी करण्यापेक्षा देवळात केलेली कधीही बरी. देवळात, चर्चात वा मशिदीत सणासुदीला जमा झालेले जमाव बिनडोक नास्तिकांना एक प्रचंड भयप्रद झुंड वाटते, मूल्यहिन असा एकूल एक बसलेला नास्तिक देखील तितकाच भयप्रद लांडगा असू शकतो. आपण रिचर्ड डॉकिन्सचं उदाहरण घेऊ. https://www.huffingtonpost.com/2013/09/09/richard-dawkins-pedophilia_n_3895514.html हा इसम एक प्रतिष्ठित नास्तिक आहे. जगातला अग्रगण्य. ओबामाला आमच्या देशात सर्व धर्मांचा/विचारांचा आदर होतो इ इ करिता प्रत्येक धर्माचे लोक व्हाईट हावसात बोलावले होते त्यात हा नास्तिकांचा प्रतिनिधी म्हणून भेटायला आलेला. हा इसम म्हणतो कि बालकांवर धर्मसंस्कार करणं त्यांच्यावर बलात्कार करण्यापेक्षा घृणास्पद आहे. नि विधान कितीही विरोध होऊन त्यानं आजतागायत मागं घेतलं नाही. बालबलात्कारानं कायमचं असं कोणतंही नुकसान होत जे धार्मिक झाल्यामुळं आयुष्यभर होतं असा या इसमाचा युक्तिवाद आहे. म्हणजे उद्या एक पादरी आणि एक पेडोफाईल याच्याकडे आला तर आपलं मूल पेडोफाइलला देईल!!! https://www.youtube.com/watch?v=8EC42_2KIx0 ==================== विकृती या सर्वच प्रकारच्या व्यवस्थांत निर्माण होऊ शकतात. ज्या ज्या व्यवस्थांचे फेस व्हॅल्यू वर उद्दिष्टं चांगली आहेत नि आताचे चालक बरे आहेत तिच्यात सहभागी. तिच्या विरोधी व्यवस्थेशी सहिष्णोता असावी. नि परस्परविरोधी अशा दोन्ही व्यवस्थांतील वाईटपणा घालवण्यासाठी प्रयत्न करावेत, ती व्यवस्थाच नष्ट करायला जाऊन कलह माजवू नये.

In reply to by arunjoshi123

बाकी दैववादी असेच बिथरलेले असतात. त्यांचं प्रबोधन होऊ शकत नाही. मी आजच्या साठी थांबतो. आपलं प्रवचन सुरु ठेवा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिटाकाका Wed, 02/21/2018 - 00:21
तुम्हाला त्यांच्या मुद्द्यांचं खंडन करता येत असेल तर बघा, नाहीतर तुम्ही इतरांना देता तो सल्ला लागू करून पहायला हरकत नसावी! इग्नोर करणे...उगाच बिथरल्यासारखं करून काय उपयोग? ============================== अजो...तुमचा मुद्दा पटतोय थोडा थोडा! शहरातल्या मंदिरात गर्दी नसली तरी, ठराविक देवस्थानांना होणारी तुफान गर्दी लक्षणीय आहे. अर्थात ती गर्दीही एकूण ईश्वरवादी लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे म्हणा. सगळेच ईश्वरवादी मंदिरात गर्दी करून अंधश्रद्धांना बळी पडतात हे स्वतःच्या नास्तिकतेला फुलवण्यासाठी नास्तिकांनी तयार केलेलं तुणतुणे आहे जे सदानकदा वाजवून स्वतःची नास्तिकता जागृत ठेवण्याची अपरिहार्यता नास्तिकांवर असते असे मला वाटते.

In reply to by बिटाकाका

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 13:54
ठराविक देवस्थानांना होणारी तुफान गर्दी लक्षणीय आहे. अर्थात ती गर्दीही एकूण ईश्वरवादी लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे म्हणा.
मुद्दा शांतपणे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. ------------------ जनरली थोडसं आक्रामक वा तत्सम स्टाईलनं संवाद केला तर अंततः जी मंडळी तरीही सुसंवाद्य वा फक्त शांतपणे मुद्द्याचं बोलतात ती लवकर कळतात. ही एक रिलेशन बिल्डिंग वा कम्यूनिकेशन स्ट्रॅटेजी आहे नि त्यात हेतू कुणाला दुखवायचा इ. नसतो. व्यक्तिगत आयुष्यात मोस्टली सगळी मंडळी छानछानच असतात. जालावर ज्वरपूर्ण संवाद त्यामानानं सेफ असतो. --------------------------------- आता ईश्वरवादी लोक गर्दी करतात हि काय तक्रार झाली? देशात काय १४४ लागू असतं का नेहमी? नास्तिक लोक किती नगण्य आहेत तरी किती पार्ट्या करतात! तुच्छात तुच्छ नास्तिक त्या त्या सर्कल मधे प्रसिद्ध असतो. ते अंधश्रद्धावाले किती तरी मोर्चे मेळावे काढतात. दाभोळकरांच्या भाषणाला होते तिला गर्दीच म्हणतात ना? ------------------ लोक झेंडावंदन करायला किती गर्दी करतात. सरकारी खर्चानं देखावे इ इ होतात. काय गरज आहे? झेंडा नि देव त्याच अर्थांनी नि त्याच नियमांनी निरर्थक नाहीत का? देश असायला झेंडा कशाला लागतो? बिनझेंड्याचा देश का असू शकत नाही (बाय द वे, उगाच ७ बिलियन मधल्या काही लोकांचा एक उपगट बनवणे हे सुद्धा निरर्थकच आहे म्हणा, पण ते असो. असला निर्थकतेचा पाढा लै लांब जातो म्हणून माणसानं अस्तिक बनून सर्वाथ पाहिलेला परवडतं)? बिचार्‍या लहान्या पोरांना छळतात तालमी करवून करवून. --------------------- आता ठराविक जागांचं काही असतं म्हणून तिथं जास्त गर्दी होते. लाल किल्याच्या झेंडावंदनाला जास्त गर्दी होते. मग? नास्तिकी नियमांनुसार सर्व भूमींचे थोड्या फार फरकाने तेच रासायनिक कंपोझिशन असले तरी अस्तिकाच्या दृश्टीने स्थळाची वेगळा महिमा, पावित्र्य, वैशिष्ट्य, महात्म्य, इ इ असतं. ----------------------- गर्दी हा शब्द नास्तिकाकडनं वापरला जातो तेव्हा त्याला एक तुच्छता अभिप्रेत असते. नास्तिकाचं म्हणणं असतं कि मला कशाचाच डिफेन्स करायचा नाही तेव्हा मी जिंकणारच. पण कशाचाच डीफेन्स न करायच्या नादात शेवटी स्वतःचाच डिफेन्स करता येत नाही मग म्हणून चार गोष्टींना हो चार गोष्टींना नाही करायच्या नादात ते विचित्रविचारधारी बनतात. धागालेखक याचं आदर्श उदाहरण आहे.

In reply to by arunjoshi123

बिटाकाका Wed, 02/21/2018 - 15:15
गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक उल्लेख याबतीतील मुद्दा इतर उदाहरणामुळे पटला. त्यामुळे ते नास्तिकांचं एक राहू देतो. ------------------------------------------- पण धार्मिक स्थळी ते ज्या देवाला मानतात त्याचे काही सेकंदासाठी दर्शन घेण्यासाठी जी रेटारेटी, फसवणूक (स्वतःची आणि दुसऱ्यांची) चालते, हे कसे समर्थनीय आहे? देव चराचरात आहे हि शिकवण सर्व ईश्वरवाद्यांना का मान्य नसावी? हे एकूणच ईश्वरवादी व्यवस्थेचे फेल्युअर मानावे का? यामुळेच नास्तिकांचे फावते असे म्हणणे चुकीचे ठरेल काय? ------------------------------------------ अर्थात गर्दीच्या तशा वागण्याने कोणाचेच काही नुकसान होत नाही असे मला वाटते. मात्र अंधश्रद्धा बोकाळवणारी गर्दी मात्र डोक्यात जाते. उदा. नवस फेडायचा म्हणून मंदिरावरून लहान मुलांना खाली फेकणारी गर्दी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 10:55
न बिथरलेले असतानाही लोकांना लोक दैववादी आहेत का अजून काही आहेत हे कळत नाही. बिथरण्या न बिथरण्यात कै फरक असला पायजे राव. ============== बाय द वे, दैववादी मंजे काय?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मामाजी Tue, 02/20/2018 - 22:22
प्रा. साहेब माफी असावी पण सध्या येथे होणारे लेखन बघता मला "देवधर्म" हा शब्द बदलून त्या ऐवजी "मोदिद्वेष"हा शब्द वापरावसा वाटतो. कारण आपण केलेले सर्व वर्णन "मोदिद्वेष" या शब्दाला तंतोतंत लागू पडत आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

arunjoshi123 Tue, 02/20/2018 - 22:23
पण उच्चशिक्षितांचं प्रबोधन करणे फ़ार अवघड आहे,
जगात नास्तिकवादाचे अनेक विकृत उपप्रवाह जन्माला आलेत. हे उच्चशिक्षित असल्यानं, नि अकलेचा महाभयंकर माज असल्यामुळं, त्यांचं प्रबोधन असो त्यांचेशी संवाद साधणं सुद्धा असंभव आहे. त्याचं एक उदा. मिलिटंट अथेईझम नावाचा पंथ. धर्म नष्ट करण्यासाठी काहिही मंजे काहिहि केलं पाहिजे असं अनॉफिशियल सूत्र असलेले लोक. दुसरे हे बालबलात्कारवादी. --------------------------- आपण फक्त जास्त शहाणे आहोत इतकंच दाखवण्यासाठी जे लोक नास्तिक होतात पण ज्यांची नैतिक मूल्यं व्यवस्थित असतात नि ज्यांच्याकडून उपदेशांचे डोस प्यावे लागतात, असे नास्तिक डोकेदुखी आहेत, पण इतकी डोकेदुखी जगरहाटीचा भाग आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Tue, 02/20/2018 - 23:38
हा लेख तसेच इथले आधीचे आणि या आधी उपक्रमावरील लेखन, अर्थात armchair activism पाहून हसायला येते. खरेच जर प्रबोधन करायचे असेल तर ते करण्यासाठी आभासी जाला पेक्षा वास्तवातील जगात करावे लागते. जसे नजीकच्या भूतकाळात दाभोलकरांनी केले होते, अजूनही ते कार्य करणारे ज्ञात अज्ञात भरपूर आहेत आणि न बोलता केवळ कृतीतून करणारेतर अनेक आहेत. यातील प्रत्येकाचा प्रत्येक विचार पटेलच असे नाही. पण त्यांच्या तळमळी बद्दल आदर वाटतो. इथे मात्र दिवाळीतील atom bomb च्या वातीला उदबत्ती लावून लांब उभे राहून अथवा कानावर हात ठेवून वागल्याप्रमाणे लेखन वाटते. लेखकाबद्दल आदर राखून म्हणावेसे वाटते, की खरेच असे half hearted प्रबोधन आणि मुख्यत्वे लेखनातला तिरस्कार पाहून वाटते की त्याना अशा एखाद्या भोंदू ईश्वरवादीचा अथवा एखाद्या बाबा- महाराजाचा व्यक्तिगत वाईट अनुभव आला आहे म्हणून हे सर्व चालले आहे. कालानुरूप प्रबोधनात पण बदल करणे गरजेचे असते. नाहीतर काय तो पण एक पंथच होतो आणि त्यावर चालणारे, महाजनो येन गत: स पंथ: प्रमाणे वाटचाल करत राहतात. दुर्दैवाने "निरीश्वरवाद पंथीय प्रबोधन" हे पण असल्या लेखात एखाद्या जुनाट पोथी सारखे वापरले जात आहे आणि त्यावर आधारित जिथे गरज नाही अशा ठिकाणी लेखन करून प्रबोधनाचे फळ मिळणार आणि आपल्याला हवा तसा समाज बदलणार अशी अंधश्रद्धा आहे. शेवटी काय, "साक्षात" मार्क्स बाबांनी म्हणल्याप्रमाणे रिलीजन (म्हणजे पंथ. भारतीय भाषांमधील "धर्म" नाही) अफूची गोळी आहे. हा रिलीजन भल्या भल्यांना नशा चढवतो. ती नशा हि निश्रीश्वारवादी पंथीयांना पण चढते. विशेष करून दुसर्या बाजूकडील जनतेला तुच्छ लेखायचे झाले की...

In reply to by विकास

पैसा Wed, 02/21/2018 - 08:14
>>>>>इथे मात्र दिवाळीतील atom bomb च्या वातीला उदबत्ती लावून लांब उभे राहून अथवा कानावर हात ठेवून वागल्याप्रमाणे लेखन वाटते. >>>> नुसते सुतळीबॉम्ब नाहीत, तडतड्या, साप गोळ्या, फुलबाज्या, भुईचक्र, भुसनळे, फुसके फटाके, लवंगी, केपा सगळे प्रकार प्रतिक्रियामध्ये पण बघायला मिळत आहेत. मजा आली! =))

In reply to by विकास

प्रबोधनाची अशी एक कोणती जागा नसते. चळवळींची सुरुवात कुठूनही होत असते, गल्ली बोळातून, कट्ट्यातून, कुठूनही. वास्तव जग असो की आभासी असो, विचारांची गरज असतेच असते. विशेषतः आपण जेव्हा स्वतःला सुशिक्षित म्हूणन घेतो तेव्हा तर त्याची खूप आवश्यकता असते. उच्चशिक्षित असून तुम्ही तुम्ही जर देवाळू लोकांच्या प्रवृत्तीमुळे अजूनही अज्ञानी म्हणून जगत असाल तर गेली अनेक दशके ज्या समाजधुरीनांनी प्रबोधन म्हणून जे प्रयत्न केले ते वायाच गेले असे म्हणावे लागेल. मला वाटतं यनांसरांचा प्रयत्न त्याचाच भाग आहे. कोणाला पटो ना पटो. अनेक शतकांच्या वहिवाटीमुळे हिंदू धर्मात कित्येक आततायी रुढी तयार झाल्या. व्रतवैकल्य, नवससायास, शुष्क कर्मकांड, निरर्थक-शाब्दिक तत्वचर्चा, विधिनिषेधात्मक क्रियाकर्म, हे आजही सुरुच आहे असे दिसते. विविध प्रकारचे देव, त्यांचे ते वेगवेगळे मंत्र, त्याचे ते क्लिष्ट तंत्र, त्यांची गुंतागंतीची पूजा यावर पहिलं प्रबोधन संतांनी केलं. अशा हाडामासात जाऊन बसलेल्या नव्हे रुतलेल्या गोष्टीतून बाहेर येणं इतकं सोपं नाही, कारण तो संस्काराचा भाग होता. आता त्यावर नक्कीच विचार केला पाहिजे. बाकी, भोंदू बाबा, चोवीस बाय सात चालत असलेली वाहिन्यांवरील विविध बापू, महाराज, मा, अक्का यांच्या अनुभवातून काय काय बाहेर येतं ते पाहिलंच पाहिजे. उगाच डोळेझाक करुन किंवा कोणाला त्याचा वाईट अनुभव असेल तर त्याचा विचार केलाच पाहिजे. देवाळू लोकांच्या अंधश्रद्धेमुळे देवाच्या नावावर दलाली करणारे मूर्ख, लबाड, ढोंगी निघत असूनही त्यांच्यावर बोलण्याऐवजी प्रबोधन करणार्‍यांकडे शंकेने पाहावं, त्यांच्या नावाने शिमगा व्हावा हे पाहून मात्र नवल वाटते. महाराष्ट्रात प्रबोधनाचा फार मोठा इतिहास आहे, तुम्हाला तो सर्व माहितीही आहे. आपलं वाचनही मला माहिती आहे. प्रबोधनाचा विडा उचलणारे संत असतील, आधुनिक विचारांचा पुरस्कार करणारे लोकहितवादी आणि त्यांच्या परंपरेतील सहकारी असतील म. फुले असतील या लोकांनी नेहमीच वास्तवाचं भान दिलं आहे हे नाकारुन चालणार नाही. आजही जागोजागी देवाच्या नावावर फसणारी मंडळी आहे, आजारपणात दवाखान्यात जाण्याऐवजी अंगारे धुपारे, गंडे दोरे यावर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या पाहता आपण कोणत्या पुरातन काळात जगत आहोत असे वाटायला लागते. आराम खूर्चीतली चळवळ म्हणा किंवा आणखी काही म्हणा मिपावरच्या काही प्रतिक्रिया पाहता प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे, यनासरांचे विचार भले कोणाला पटत नसतील, पण त्याच्या जागराला समर्थन देण्याची मला गरज वाटते. आता पन्नाशीला पोहचणारी पिढी बदलेल असे म्हणने तसे धाडसाचे आहे, पण येत्या पिढीला शहाणे सुरते करता आले, आधुनिक विचाराकडे घेऊन जाता आले तरी ते पुरे आहे. आपल्या आवडत्या संताचा दाखला देऊन या धाग्यावर थांबतो. (चुभुदेघे) सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Fri, 02/23/2018 - 10:36
बिरुटे सर लौकिकार्थाने मी काही आस्तिक नाही ( कदाचित नास्तिकही नाही) मी आजवर मुंबईत राहून सिद्धिविनायकाला गेलो नाही शिर्डी किंवा तिरुपतीलाही गेलो नाही. ( लष्करी अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यास तात्काळ प्रवेश मिळत असतानाही). पण तरीही यनावाला यांचा अभिनिवेश कि नास्तिक लोकच हुशार असतात आणि आस्तिक लोक मूर्ख आहेत हा पटत नाही. जर समाजात जागृती करायची असेल तर मीच शहाणा हा अविर्भाव घेऊ चालत नाही. यनावाला प्रत्यक्ष तसे नसतील परंतु त्यांच्या एकंदर लेखामध्ये असा अविर्भाव नक्कीच जाणवतो. मागच्या लेखात त्यांनी श्रद्धेवर जहाल टीका केली होती. अशा तर्हेने टीका करण्यासाठी त्या माणसाला "तितका अधिकार" असावा लागतो आणि समाजमनात अधिष्ठान असावे लागते.(जसे महात्मा फुले किंवा संत तुकाराम यांचे होते) आज अनेक लोक वेगवेगळ्या मर्त्य माणसांवर श्रद्धा बाळगून असतात ज्यात स्वतःचे वडील, शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशी माणसे असतात. हि माणसे काही अस्खलनशील नसतात पण माणसे त्यांच्यावर निरागस पणे निस्सीम श्रद्धा ठेवून असतात. अशा माणसांना आपण तुमची श्रद्धा हि अंधश्रद्धा आहे असे सांगून प्रबोधन करू शकत नाही. कारण आपली श्रद्धा हि दुसऱ्याची अंधश्रद्धा असते. उदाहरण म्हणून देतो-- एखाद्या अतिलठ्ठ माणसाला "तू मूर्ख आहेस आणि इतकं साधं कळत नाही का कि अति खाऊ नये" हे सांगितले तर तो तुमचे म्हणणे ऐकेल का? बाकी उच्च पातळीवरची चर्चा काही मला झेपत नाही तरी यनावालांचा प्रबोधनाचा हेतू स्तुत्य असला तरीही त्यांचा असा आक्रमक पवित्रा मात्र उलट परिणाम करेल असेच वाटते. असो.

In reply to by सुबोध खरे

प्रबोधन काही वेळा आंजारुन गोंजारुन करावे लागते तर काही वेळा काहींसाठी प्रहार करुन. यना वाला हे प्रहार करुन प्रबोधन करतात. ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या परिक्षणात जयंत नारळीकर म्हणतात," 'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्‍याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्‍याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्‍याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला. आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का? घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे."

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रदीप Fri, 02/23/2018 - 19:33
घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे.
अर्थातच, प्रकाशच तो! तुमचे सगळेच लिखाण, त्यामागील संयत भूमिका नेहमीच अतिशय आवडत आलेले आहे. आता ह्या धाग्यावरही तुमचे प्रतिसाद, तुमच्या ह्या संयत भूमिकेला अधोरेखित करणारेच आहेत. वयाने वाढत असतांना माणसे अधिकाधिक नम्र व्हावीत, दुसर्‍यांबद्दल त्यांच्या मनांत आदर वाढावा, शब्द जपून बोलावेत व लिहावेत असे अपेक्षित असते. तुमची वाटचाल अशीच आहे. दुर्दैवाने, इतर काही मात्र जुन्याच, पोरकट म्हणाव्या अशा आक्रस्ताळी भूमिकेस चिकटून बसले आहेत. त्यांच्याविषयी काय म्हणणार?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिटाकाका Fri, 02/23/2018 - 10:45
काही अतिशयोक्त वक्त्यव्ये ज्यांचं इथे मिपावर कोणीच समर्थन केल्याचं दिसत नाही. केलं असल्यास दाखवून द्या, मी माझे वक्तव्य मागे घेण्यास तयार आहे. १. उच्चशिक्षित असून तुम्ही तुम्ही जर देवाळू लोकांच्या प्रवृत्तीमुळे अजूनही अज्ञानी म्हणून जगत असाल......म्हणजे नेमके कसले अज्ञान? जगात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या अज्ञानात असतो. जोपर्यंत त्या अज्ञानाचा काही दुष्परिणाम नाही तोपर्यंत त्याचा काय त्रास आहे? तुम्ही म्हणता त्या अज्ञानाचा नेमका त्रास काय? २. समाजधुरीनांनी प्रबोधन म्हणून जे प्रयत्न केले ते वायाच गेले असे म्हणावे लागेल.....यात कोणते समाजधुरीनी तुम्ही गृहीत धरता? सगळे समाजधुरीनी नास्तिक (किंवा तुमच्या भाषेत अ-देवाळू) होते असा आपला दावा आहे का? ३.भोंदू बाबा, चोवीस बाय सात चालत असलेली वाहिन्यांवरील विविध बापू, महाराज, मा, अक्का यांच्या अनुभवातून काय काय बाहेर येतं ते पाहिलंच पाहिजे.....नक्की पहाच. ते त्यांच्या प्रवचनांमधून समाज प्रबोधन करतात कि अंधश्रद्धा पसरवतात हे कळण्यासाठी ते आधी पाहणे गरजेचे आहे. ४. ...ढोंगी निघत असूनही त्यांच्यावर बोलण्याऐवजी प्रबोधन करणार्‍यांकडे शंकेने पाहावं, त्यांच्या नावाने शिमगा व्हावा हे पाहून मात्र नवल वाटते.....शंका येते कारण ढोंगी निघण्याचे प्रमाण १००% गृहीत धरण्यात येत आहे. शिवाय जे देवाळू आहेत आणि अशा भोंदू लोकांवर विश्वास ठेवतात त्यांचे प्रमाणही सहेतुक १००% धरण्यात येत आहे. ५. आजारपणात दवाखान्यात जाण्याऐवजी अंगारे धुपारे, गंडे दोरे यावर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या पाहता.....हे अतिशय परिस्थितीला धरून नसणारे वक्तव्य आहे. दवाखान्यात जाणाऱ्यांची संख्या वाढतेय कि कमी होतेय? मग खेड्यापाड्यात दवाखाने नाहीत, शहरात जावे लागते हि ओरड बरेच वेळेस ऐकण्यात का येते? कि शहरातले लोक गंडे दोरे आधी करतात आणि मग दवाखान्यात जातात? ते "संख्या" मध्ये नेमके प्रमाण किती गृहीत धरत आहात आपण? आणि कोणते देवाळू लोक त्याचे समर्थन करतात? ६. तुकारामांचा अभंग तुम्ही मानता, तुकाराम देवाला मानीत याबद्दल आपले काय म्हणणे आहे? ----------------------------------- स्वतःच्या सोयीसाठी देवाळू लोक म्हणजे अंधश्रद्धाळू लोक हे गृहीतकच मुळी नास्तिकांवर घेण्यात येणाऱ्या शंकांचं कारण आहे असे मला वाटते. ---------------------------------- तुम्ही प्रतिसादाला उत्तर नाही दिलेत तरी चालेल, प्रत्येक प्रतिसादाला उत्तर दिलेच पाहिजे हा मिपाचा नियम नाही. पण चर्चा अशी झाली पाहिजे, तशी झाली पाहिजे असे सांगणे म्हणजे....लोका सांगे...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 14:56
अशिक्षित लोकांचं एक वेळा प्रबोधन करता येईल
ठ्ठो!!! यावरून नास्तिक इफेक्टिवली अशिक्षित असतात असं सिद्ध होतं.

In reply to by सप्तरंगी

गामा पैलवान Tue, 02/20/2018 - 21:27
सप्तरंगी, यनावाला हे नास्तिपक्षाचे आस्तिक आहेत. एकदा का आस्तिक म्हंटलं की देवाचा विचार मनांत यायलाच हवा, बरोबर? ईश्वराच्या मनांत ईश्वरासंबंधी विचारंच नसतो. म्हणूनंच या अखिल ब्रह्मांडात केवळ ईश्वर हा एकमेव खराखुरा नास्तिक आहे. बाकी सगळे यनावालांसारखे स्युडो-नास्तिक. आ.न., -गा.पै.

arunjoshi123 Tue, 02/20/2018 - 21:05
जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात.
यनावाला, आपण देव मानणार्‍या लोकांना अस्तिक आणि यनावालांना मानणार्‍या लोकांना यनास्तिक म्हणू. तुम्ही ही सारे विशेषणे लावून आणि अन्य काही इतकी विशेषणे स्वतःला लावून लोकांचा एक सर्वे करा. तर देवाची विशेषणे आणि देवाचे स्वरुप असू द्या, पण यनावालांची विशेषणे, स्वरुप आणि सर्व्हेमधे आलेली उत्तरे चेक करा. आता तुम्हाला नक्की काय विशेषणे बसतात नि काय नाही याची माहिती ते तुम्ही स्वतःच असल्याने माहित असेलच. तर लोकांची उत्तरे नि स्वस्वरूप मॅच करून बघा. पॉइंट असा आहे कि तुम्ही काहीही भारंभार विशेषणे वापरून कशाला काहीही म्हणणार का? लोकांनी काय विशेषणे लावली यावरून यनावालांचे स्वरुप कसे काय ठरू शकते? यावरून तर मोदींचेही स्वरुप ठरू शकत नाही. लोक असं असं म्हणतात तो ईश्वर? ही मेथडॉलॉजी कित्ती अशास्त्रीय आहे? आणि देव स्थिर स्वरुपाचा असतो कशावरून? त्याचं स्वरुप बदलत असेल नि लोक त्यावेळेस नविन विशेषणं लावत असतील. म्हणून कदाचित देव त्या त्या वेळी तसा तसा असेल. उदा. ईश्वर जर सर्वशक्तीमान असेल, तर माझ्याकडे जी शक्ती आहे तिचा काय हिशेब? ती तर मी स्वतः सोडून कोणाच्या बापाला वापरू देत नाही. वा कदाचित ते मला शक्यही नसावं. ह्या सगळ्या वजाबाक्या अ‍ॅडजेस्टमेंट्स न लिहिता तुम्ही लोक काय मानतात हे आपलं आपण काहीही गृहित धरणार का? आणि ही सगळी विशेषणं लागू असणारा, देव असेल तरी तो बाकीचं सगळं डिट्टॉ त्याच्यासारखं का बनवेल? मग त्याला काही महत्त्व उरेल का? देव थोड्या वेगळ्याच टाईपचा असावा. व्हायरस दर मायक्रोसेकंडाला मरतात, करोडोनी. तेव्हा देवाला मरणाबिरणाचं फार कौतुक नसावं, बाकी छुटपुट दु:खांचं असोच. माणसात नि व्हायरसात फरक काय? आकाराचा? क्लिष्टतेचा? देवाला आकार नि क्लिष्टता यांना जास्त भाव द्यावा असं वाटायचं कारण काय? त्यामुळे देव कसा हिशेब करत असेल वा त्याचा हिशेब कसा चूकिचा आहे असल्या हिशेबात पडू नये.
आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे.
मंजे मागे खूप चांगला अर्थ होता? जेव्हा वेगळा अर्थ होता तेव्हा काय होता?
( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.)
जग हे निर्माण झालं हे कुणी सांगीतलं? जग असणं वेगळं आणि निर्माण झालेलं असणं वेगळं? निर्माण झालं तर मूळात कशातून निर्माण झालं? का निर्माण झालं? कधी निर्माण झालं? कोणत्या प्रक्रियेनं निर्माण झालं? जसं निर्माण झालं आहे तसंच का झालं, दुसरं कसं का झालं नाही? काय जबरदस्ती होती का जग अस्संच असायची? हे सगळं ब्लूप्रिंट कुणी केलं का ते मधे मधे शून्यातनं पैदा होत असतं मधे मधे? शून्यातनं कसं काहीतरी अशून्य पैदा होतं? या निर्मिकांच्या मूर्खपणात नि अस्तिकांच्या मूर्खपणात काहीतरी फरक आहे का? मूर्ख तो मूर्ख. एक मूर्खपणा, एका अनालिसिस मधे एक लॉजिकल चूक करणारा निर्मिक आणि दहा हजार चूका करणारा दोन्ही सारखेच मूर्ख. उगाच त्या निर्मिकांना चढवून ठेऊ नका. त्यांचा बौद्धिक स्तर वरचा मानायची वा हानिदायक नाही मानणं हे चूकिचं.
जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत.
आपल्याला असं करता येतं केवळ या इतक्या एक कारणानं, याची कोणतीही सिद्धता न देता येता, नि असं करणं पूर्णतः आपल्या मर्जीची गोष्ट आहे म्हणून, लोक जेव्हा आपलं आणि आपलेतर विश्वाचं काही कनेक्शन आहे असं मानू इच्छितात तिथं अस्तिकपणाची पहिली ठिणगी पडते.

सतिश गावडे Wed, 02/21/2018 - 11:37
मग योद्धे ते अवसरी । युद्धास ठाकले झडकरी । प्रतिसादाच्या झडल्या फैरी । हारजीत काही ठरेना ।। एक म्हणे तुम्ही वाचाळ । उगाची लाविता पाल्हाळ । करीता बडबड बाष्कळ । म्हणता देव आहे हो ।। कुणी देवदर्शनासाठी गेला । तिथे चेंगराचेंगरीत मेला । कुणी वाटेत ट्रकखाली आला । नाही वाचवले देवाने ।। येरु म्हणती मग सात्विक । मरत नाही का रे नास्तिक । विरोधी भक्त तू तात्विक । दिसे देव मिपाधागी ।। अशा त्या काळाच्या गोष्टी । काळापव्यये इतरांस हाणीती । आपलीच पाठ थोपटती । रिकामटेकडे लेकाचे ।।

In reply to by सतिश गावडे

धन्यासेठ, अजुन प्रतिसाद लिहायचेत मला. देव जो पर्यन्त म्हणत नाय की राजा, आता थांब रे... तो पर्यन्त काथ्या कुटनार आहे. ;) देवभजनी लागलेल्या उच्च शिक्षित अंधभक्ताची थोड़ी ज़रा झोपमोड़ झाली तर निरीश्वरवादी यशस्वी झाले म्हणू ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 14:15
मनःशांतीसाठी सगळे नास्तिक योगा करताहेत जगभरात. आणि योगा नास्तिकी उपचारपद्धती नाही. =================== सवड मिळाली तर कधी फेथ आणि स्लिप यांचं कोरिलेशन वाचा. ===================== माझी (तसा मी यावेळी झोपलेलो नसतो म्हणा) झोपमोड केल्याचा आनंद घ्या.

In reply to by सतिश गावडे

=)) =)) =)) कुणी देवदर्शनासाठी गेला । तिथे चेंगराचेंगरीत मेला । कुणी वाटेत ट्रकखाली आला । नाही वाचवले देवाने ।। असे झाले की डायरेक्ट स्वर्गात जागा मिळते, त्याचे काय ?! :) ;)

गामा पैलवान Wed, 02/21/2018 - 13:25
यनावाला, तुमच्या प्रश्नातंच घोळ आहे. 'निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही' हा प्रश्न मुळातून चुकीचा आहे. समजा ईश्वराने यनावाला नामक एखाद्या निरीश्वरवाद्यांस शिक्षा केली. पण यनावाला तर ईश्वराचं अस्तित्व मानणारे नाहीत. मग त्यांना कसं कळणार की आपल्याला ईश्वराने शिक्षा केलीये ते? शिवाय ही शिक्षा निरीश्वरवादाच्या अपराधासाठी केली आहे हे देखील कसं कळणार? तुमच्याकडे ईश्वराशी संपर्क साधण्याचा काही मार्ग आहे का? तो नसतांना उपरोक्त प्रश्न निरर्थक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ईश्वर ही नुसती कल्पना आहे, त्यामुळे तो कोणाचे काही करू शकत नाही. त्यामुळे तो ना निरीश्वर वाद्यांना शिक्षा करतो ना दिवस रात्र देवळात जाऊन डोकं उठवणा-या घन्टा वाजवून भजनं म्हणून म्हणून कोणा विवेक बुद्धी गमावणा-यांना प्रसन्न होतो. मुळात जिथे कोणत्याही क्रियेवर जिथे काही प्रतिक्रियाच येत नाही, तिथे कोणत्याच कृतीचा परिणाम होत नाही. म्हणून देव नावाची कल्पना कोणाला मदत करीत नाही आणि ती कोणालाही शिक्षा देत नाही, हेच सत्य आहे. म्हणून त्यांचा प्रश्न योग्य आहे. देव देव म्हणून उर बडवून घेणा-यांना ते एक समजून सांगितलेलं उत्तर आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिटाकाका Wed, 02/21/2018 - 17:02
मुळात ईश्वरच नाही असे मानणार्यांनी मग तो अमुक का नाही करत नाही म्हणणे चुकीचे आहे असे त्यांना म्हणायचे असावे बहुदा! हे म्हणजे गंपाच्या गाभण म्हशीची कथ्था!

अ‍ॅक्चुअली यनावाला आस्तिक आहेत व या सगळ्यामागे यनावालांना ईश्वराला भेटायचा कावा आहे असे वाटते. असे आस्तिकंना सतत सतावत राहीलो तर, ईश्वर समोर उभा राहून, "मी स्वतः ईश्वर आहे आणि बघ आता मी तुला शिक्षा देतो." असे म्हणेल. म्हणजे, यनावालांची चलाखी यशस्वी ठरून त्यांना याची देही याची डोळा ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन मिळेल... आला का ध्यानात सगळा प्रकार मंडळी ???!!! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खर तर परमेश्वरच नास्तिक आहे. पण अस्तिकांमधे त्याची गोची होते म्हणून तो यनावालांच्या माध्यमातून लिहितो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 14:02
घाटपांडे साहेब, वास्तवाचा असा विपर्यास कदापि सहन होणार नाही. यनावालांचा असा अपमान करता तुम्ही? ते विधान असं हवं: "खरं तर यनावालाच परमेश्वरच आहे. पण नास्तिकांमधे त्याची गोची होते म्हणून तो परमेश्वराच्या माध्यमातून लिहितो."

In reply to by गामा पैलवान

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 19:47
अहो त्याच अर्थानं मी लिहिलं होतं. त्यांचा नि आमचा तिथून कनेक्ट आहे म्हणूनच नै का आम्ही त्यांचा ट्यार्पी वाढवत असतो? हा हा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 14:09
तुम्हाला यनावालांवर विश्वासच नाय राव. यनावालांची अश्रद्धा काय इतक्या हिन दर्जाची आहे देवानं अजूनही त्याची दखल घेतली नसणार? फ्लॅश दर्शन काय मंता देवानं त्यांना कंप्लीट लाईट टूर घडवून आणलीय स्वर्गाची. आता देव युद्धपातळीवर संशोधनाला लागलाय कि एखादी गोष्ट भास नाही हे "सायंटिफिक मेथडनं" मेंदूत कसं घुसडायचं!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वालावलकर यांच्या लेखनाबद्दल बोलण्या ऐवजी सर्व लोक यनांबद्दल व्यक्तिगत बोलतात त्याची मात्र गम्मत वाटते. :) देवाचा अस्तित्वाविषयी प्रेमाने टाहो फोड़णा-याना तो सर्वात अगोदर दर्शन देईल... कारण त्या विषयीचं ममत्व आस्तिकाना अधिक आहे. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 18:33
यनांचं एकूण अस्तित्वच एक व्यक्ति म्हणून आहे असं तेच म्हणालेच. (ते तर फक्त स्वतःला आधार कार्ड नंबर म्हणतात, आम्ही तितकी कृपणता करणार नाही.) मग व्यक्तिगत नाही बोलायचं तर काय? वाईट बोलू मंजे झालं.

शिवाय Wed, 02/21/2018 - 14:36
सर्वाना कामाला लावून यनावाला फरार . दर्शन दे रे दे रे भगवंता किती अंत पाहाशी यना तू महंता

प्रसाद_१९८२ Wed, 02/21/2018 - 14:41
अरुण जोशी यांचे सर्व प्रतिसाद पटले ! ==== === हे स्वत:ला नास्तिक म्हणवून घेणारे लोक, एका आस्तिकांने मांडलेल्या मुद्द्याला शांतपणे कधीच प्रतिवाद करत नाहीत. फक्त आक्रास्तळेपणा व तुम्हा आस्तिकांचे प्रबोधन करणे शक्यच नाही वगैरे म्हणत मुद्दा मांडणार्‍यालाच मुर्खात काढायला बघतात

In reply to by प्रसाद_१९८२

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 15:34
हे स्वत:ला नास्तिक म्हणवून घेणारे लोक,
संवाद्यतेने बाटण्याची रिस्क वाढते. ================= अर्थातच अनेक नास्तिक संवाद करतात. अशा नास्तिकांचे दोन मूलभूत प्रकार आहेत. एक ईश्वर ही एक सामाजिक अनिष्टता आहे असं म्हणणारे. दुसरे ईश्वर ही एक अशास्त्रीय संकल्पना आहे असं मानणारे. The words I implied are undesirable social construct and scientific impossibility. भाषांतरात जो लॉस होतो एक मिनिट असू द्या. पण या दोन्ही गोष्टी भयंकर उथळ आहेत. सर्व सामाजिक अनिष्टतांची मूळ सारखीच आर्बिट्ररी आहेत मग ती ईश्वरप्रणित असोत वा अन्य काही प्रणित असोत. आणि मूलभूत सत्यं मांडायची कोणती शास्त्रीय पद्धतच नाही!!! मूलभूत फक्त गृहितकं आहेत, सत्य सगळी या गृहीतकांवर आधारलेली आहेत. त्यामुळं तुम्ही संवाद्य झालात तर तुमची अस्तिक नि नास्तिक हे दोन्ही बनायची शक्यता समसमान असते.

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 15:21
१. गोरा नसला तरी किमान गोरापान २. सहा फूट आठ इंच. पण १००% तन्य आणि मूर्धन्य. ३. पिवळ्या फॉस्फरसाप्रमाणे उजेड मारणारा. ४. कोणत्याही रेप्यूटेड ब्रँडचे नसलेले पण तितक्याच क्वालिटीचे कपडे घातलेला. ५. मूर्ख अस्तिक भक्तापासून १० फूटावर उभा असलेला ६. तिच बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, अनाटॉमी, सायकॉलॉजी असली तरी माणसांपेक्षा स्वतःला लै झंड समजणारा. ७. डोळ्यात "बघून घेतो बेट्ट्या" असे भाव असणारा आणि ते दर्शवायकरता नेहमी तशी बुबुळे फिरवत ठेवणारा ८. असा सहजभावाने थांबलेला नसून काहीतरी फोटोबिटो देण्यासाठी पोज करतात तसा थांबलेला ९. अंगावर जगातली सगळी शक्ती साचवायचा अवयव बराच वेळ धुंडाळले तरी न दिसत असलेला १०. जगातल्या एकूण ज्ञानाच्या नि माहितीच्या मानाने भयंकरच छोट्या आकाराचे डोके असलेला ११. स्वतःच्या असण्याचा असा उद्देश नसलेला, नोकरी वैगेरे न लागलेला १२. मायबाप माहित नसण्याला मायबापच नाहीत म्हणणारा १३. आर्जवांच्या गोंगाटाशिवाय चैन न पडणारा १४. पाताळयंत्री, खुनशी, स्वामित्ववादी, गुलामगीरिवादी, प्रबोधनाच्या पलिकडचा १५. चुंबकीय क्षेत्रे इ वापरून जमीनीपासून फूटावर वर १६. अन्नाकडे नुसते पाहत बसणारा, अपचन झालेला १७. स्तुती ऐकून मती नष्ट होणारा १८. बोलघेवडा, स्वस्तुतीमग्न.

स्वधर्म Wed, 02/21/2018 - 18:09
तुमच्या ईश्वरविषयक मतांचे सार: - जगात सत्य कुणालाच समजत नाही - असलीच तर अास्तिकच काही किमान नैतिकता पाळू शकतात - म्हणून अास्तिक चांगले, ते परवडले. - नास्तिक कसे कोणत्याही नितीनियमांना न मानणारे, अहंकारी, सर्व जगाला ताप देण्यासाठी निर्माण झालेत ई. ई. मला जराही पटले नाही, तरी तुमची स्टाईल खूप अावडली. समोरच्याचे मुद्दे अतिप्रमाणाबाहेर ताणून त्यांना निकाली काढणे हे मोठे कौशल्य अाहे. शिवाय ते वापरले जात अाहे हे फार कमी जणांना समजते. टीप: अाता वरचे सार कसे मुळातूनच गंडलेले अाहे, असा एका एका मुद्द्याचा सविस्तर समाचार तुंम्ही नक्की घेऊ शकता याची, अाणि मी त्याचा प्रतिवाद करु शकणार नाही याची, मला पूर्ण खात्री अाहे.

In reply to by स्वधर्म

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 18:30
- नास्तिक कसे कोणत्याही नितीनियमांना न मानणारे, अहंकारी, सर्व जगाला ताप देण्यासाठी निर्माण झालेत ई. ई.
सहिष्णू नास्तिकांबद्दल मला प्रेम आहे. अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात त्याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात असं मी मानतो. =================== असहिष्णू नास्तिक मात्र मला असहिष्णू अस्तिकांपेक्षा खतरनाक वाटतात. ===============================================================
- जगात सत्य कुणालाच समजत नाही
असं पण नाही. सत्य कसं स्थापावं वा मानावं याबद्दल एक सर्वसंमत चौकट निर्माण करावी असा आग्रह आहे. =========================== बाकी आपला प्रतिसाद अजिबातच गंडलेला नाही नि मतं अत्यंत व्यवस्थित रित्या व्यक्त केली आहेत.

In reply to by arunjoshi123

स्वधर्म Wed, 02/21/2018 - 23:21
अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात त्याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात असं मी मानतो.> — अॉं? हे वाक्य कंप्लीट गंडलेलं अाहे. कसं ते पहा: — निराधार असा ईश्वर> अहो, अास्तिकांच्या मते ईश्वरच सगळ्याचा अाधार अाहे! तुंम्हाला अास्तिक्य कळलेलेच नाही. मुद्दलातच खोट. पहिला भाग: अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात > — अास्तिक हे अापला काहीतरी फायदा होईल म्हणून, नुकसान टळेल म्हणून, भीतीमुळे (उगीच असलाच ईश्वर तर, नंतर प्रॉब्लेम नको) ईश्वर मानतात. एखादाच तुकाराम महाराजांसारखा निस्सिम अास्तिक. जास्त विचार करायची सवय नसल्यानेही (अाळस, बाबा वाक्यं प्रमाणम्) काही जण अास्तिक असू शकतात. फक्त हा क्लास कदाचित मूर्ख असू शकतो, बाकीचे नाही, कारण ते व्यवस्थित विचार करून, अापला फायदा कशात अाहे हे बघून अास्तिक अाहेत. मूर्ख असे करू शकतच नाहीत. सबब वाक्याचा पहिला भाग गंडलेला. दुसरा भाग: याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात.> — नास्तिक व्हायला तुंम्ही बहुसंख्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत असता. अापल्या समाजात हे सहज, नैसर्गिक नाही. त्यासाठी विचार करावाच लागतो, तर्काचा अाधार शोधावा लागतो. असा माणूस मूर्ख असू शकत नाही, सुरुवातीला असलाच तरी नंतर मूर्ख राहू शकणार नाही, कारण तो विचार करतो. ========================== तुंम्ही शेवटी तुमचे मतही अावर्जून लिहीता. तसेच माझे मत: एखादा माणूस अास्तिक अाहे, की नास्तिक हे महत्वाचे नाहीच मुळी! तो तसा का अाहे, त्या मनोभूमिकेतून तो कोणते निर्णय घेतो? कुणाचा लाभालाभ/ हित-अहीत पाहतो, हे महत्वाचे. ========================== प्रयत्न बरा जमलाय का? टीप: दुसर्या वाक्यही असेच ताणून भोके पाडता येतील व चुकीचे ठरवता येईल, पण जोशी स्टाईल करायची तर त्यासाठी वेगळा प्रतिसाद लागेल.

In reply to by arunjoshi123

स्वधर्म Wed, 02/21/2018 - 23:31
== वरचा प्रतिसाद नीट दिसत नसल्याने दुरूस्ती करून परत टाकला अाहे. संपादकांनी वरचा प्रतिसाद काढून टाकावा, ही विनंती. “अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात त्याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात असं मी मानतो.” — अॉं? हे वाक्य कंप्लीट गंडलेलं अाहे. कसं ते पहा: — “निराधार असा ईश्वर” अहो, अास्तिकांच्या मते ईश्वरच सगळ्याचा अाधार अाहे! तुंम्हाला अास्तिक्य कळलेलेच नाही. मुद्दलातच खोट. “पहिला भाग: अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात “ — अास्तिक हे अापला काहीतरी फायदा होईल म्हणून, नुकसान टळेल म्हणून, भीतीमुळे (उगीच असलाच ईश्वर तर, नंतर प्रॉब्लेम नको) ईश्वर मानतात. एखादाच तुकाराम महाराजांसारखा निस्सिम अास्तिक. जास्त विचार करायची सवय नसल्यानेही (अाळस, बाबा वाक्यं प्रमाणम्) काही जण अास्तिक असू शकतात. फक्त हा क्लास कदाचित मूर्ख असू शकतो, बाकीचे नाही, कारण ते व्यवस्थित विचार करून, अापला फायदा कशात अाहे हे बघून अास्तिक अाहेत. मूर्ख असे करू शकतच नाहीत. सबब वाक्याचा पहिला भाग गंडलेला. “दुसरा भाग: याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात.” — नास्तिक व्हायला तुंम्ही बहुसंख्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत असता. अापल्या समाजात हे सहज, नैसर्गिक नाही. त्यासाठी विचार करावाच लागतो, तर्काचा अाधार शोधावा लागतो. असा माणूस मूर्ख असू शकत नाही, सुरुवातीला असलाच तरी नंतर मूर्ख राहू शकणार नाही, कारण तो विचार करतो. ========================== तुंम्ही शेवटी तुमचे मतही अावर्जून लिहीता. तसेच माझे मत: एखादा माणूस अास्तिक अाहे, की नास्तिक हे महत्वाचे नाहीच मुळी! तो तसा का अाहे, त्या मनोभूमिकेतून तो कोणते निर्णय घेतो? कुणाचा लाभालाभ/ हित-अहीत पाहतो, हे महत्वाचे. ========================== प्रयत्न बरा जमलाय का? टीप: दुसर्या वाक्यही असेच ताणून भोके पाडता येतील व चुकीचे ठरवता येईल, पण जोशी स्टाईल करायची तर त्यासाठी वेगळा प्रतिसाद लागेल.

In reply to by स्वधर्म

सतरंगी_रे गुरुवार, 02/22/2018 - 04:38
म्या पामराचे वाक्चातुर्य फारच वाईट असल्याने मला काय म्हणायचे ते मांडू शकलो नाही ते तुम्ही लीलया केल्याबद्दल धन्यवाद ....

In reply to by स्वधर्म

arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 23:10
मूळात आपण मूर्खता ही संकल्पना बायनरी मानली आहे. माझ्या विधानात मी तिच्या प्रमाणाबद्दल बोललो आहे, असण्या-नसण्याबद्दल नव्हे. ईश्वरावर नसल्याचा वा निराधारतेचा आरोप आहे. हा आरोप काही प्रमाणात सत्य असेल तर काही प्रमाणातल्या मूर्खपणाने ईश्वर मानला असं म्हटलं जाईल. दुसरीकडे ईश्वरप्रणित धर्म अधिकृतरित्या केवळ चांगल्या तितक्याच मूल्यांनी वागा असे म्हणतो. मनुष्याची नैसर्गिक प्रेरणा त्याला चांगल्या वा वाईट मूल्यांमध्ये फरक करू देत नाही. तेव्हा ईश्वर न मानणार्‍या नास्तिकांनी फक्त चांगलीच मूल्ये पाळायचा प्रश्न येत नाही. त्यांनी दोन्ही मूल्यं समसमान पाळली पाहीजेत. पण असं होत नाही. ते देखील फक्त चांगली मूल्येच पाळतात. अकारण! अर्थातच हा एका प्रमाणात मूर्खपणा आहे. चांगली मूल्ये पाळणार्‍या अस्तिकांसोबत वाईटमूल्ये पाळून नास्तिक खूप मस्त जीवन जगू शकतात. पण तसं ते अकारण वा एकप्रकारे मूर्खपणानेच करत नाही. ================================
तुंम्हाला अास्तिक्य कळलेलेच नाही.
अर्थातच. मी अस्तिक असेन तर त्या प्रमाणात मी देखील मूर्ख असेनच! पण त्या प्रमाणात हे महत्त्वाचं आहे. ==================================
अास्तिक हे अापला काहीतरी फायदा होईल म्हणून, नुकसान टळेल म्हणून, भीतीमुळे (उगीच असलाच ईश्वर तर, नंतर प्रॉब्लेम नको) ईश्वर मानतात.
हे एक तद्दन भंकस विधान आहे. त्यांचे कोणतेही विशिष्ट अधिकतेचे नैतिक प्रतिष्ठान नसताना संपूर्ण न्यायव्यवस्था प्रोफेशनल मानायला तुम्ही तयार असता. अस्तिक म्हटलं कि विशेषणं सुचणं हे फालतू फॅड आहे. आपल्या मनाचा आरसा सर्वत्र लावू नये. तुकारामाला चित करतील असे अस्तिक नि नास्तिकही मी स्वतःच पाहिलेले आहेत (त्यात त्यांना कुणालाच रस असेल, पण आपल्या दोघांच्या डेमोसाठी कल्पना केली तर...) ===========================
नास्तिक व्हायला तुंम्ही बहुसंख्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत असता. अापल्या समाजात हे सहज, नैसर्गिक नाही. त्यासाठी विचार करावाच लागतो, तर्काचा अाधार शोधावा लागतो.
असं काही असतं तर नास्तिकांची संख्या जगात सर्वत्र समान डेन्सिटीची असली असती. जगात फक्त काही भूभागांतच विचार करू शकणारे डोके उत्क्रांत झाले आहे काय? नास्तिक असायला अजिबात विचार करावा लागत नाही. ती फक्त एक फॅशन आहे. ईश्वराच्या असण्याचं गृहितक नेहमी चालू ठेवणं कर्मकठीण असतं. =============================
एखादा माणूस अास्तिक अाहे, की नास्तिक हे महत्वाचे नाहीच मुळी! तो तसा का अाहे, त्या मनोभूमिकेतून तो कोणते निर्णय घेतो? कुणाचा लाभालाभ/ हित-अहीत पाहतो, हे महत्वाचे.
पर्फेक्ट.

राही Wed, 02/21/2018 - 18:47
क्रमांक दोनच्या शिवजयंतीची धामधूम सुरू झाली आहे. काल आमच्या येथे रस्त्यावर भर रहदारीत एक भव्य स्वागतकमान उभारण्याचे काम सुरू झाले. फुटपाथमध्ये खड्डा खणून एक खांब रोवला. आज दिसले की दुसर्‍या बाजूचा फुटपाथ उकरणे चालू आहे आणि आधीच्या खांबाची पूजा केली गेली आहे. हळद, कुंकू, हार फुले वगैरे. पायथ्याशी फुले. रांगोळी. आता आली का पंचाईत? आधीच अरुंद फुटपाथवर डोळ्यांत तेल घालून चालणे आले. बरेच आहे म्हणा ते. अपघात कमी होतील. मात्र आपल्याला काही झाले तरी चालेल पण त्या खांबाचा अवमान अथवा विटंबना नको. उगीच फट म्हणता दंगा उसळायचा, ही धास्ती मागे लागली. पाय लागता कामा नये, फुले- रांगोळी पायाखाली येता नये वगैरे काळज्या शिरावर घेऊन चालणे प्राप्त आहे. इतरत्रही असेच घडते आहे का? दरवर्षी घडते का? निदान आमच्या येथे तरी हे नवीन आहे.

In reply to by राही

arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 22:58
आता यनावाला उद्या आमच्यासाठी कोणती उपमर्दकारक विशेषणं घेऊन लेख पाडतील या काळज्या शिरावर घेऊनच आम्ही मिपावर लॉगिन करत नाही का? आता आमच्याही उपमर्दास काही महत्त्व असावे ही अपेक्षा करतो आहोत ती मूलस्थानीच चूकीची असू शकते हे मान्य आहेच, पण तरीही. ============== समाजाच्या आस्थांचा आदर करणं असो, पण ज्या लोकांनी सामाजिक उत्सव स्वतःच्या पुढाकाराने केले त्यांच्यात बुद्धीवाद्यांचं, इ इ प्रमाण कमी वा नष्ट झालं तरी त्यांनी ते उत्सव जणू काही अनेक बुद्धिवादी तिथे आहेत असे करावेत हि अपेक्षा चूक नाही का?

In reply to by राही

>>>>आधीच्या खांबाची पूजा केली गेली आहे. हळद, कुंकू, हार फुले वगैरे. अवघड झालंय सर्व. अशा जागोजागी पूजाअर्चा मांडून रस्ता अडवून ठेवलेल्या लोकांबद्दल कुठे काही बोलायची सोय नाही. हेच म्हणून नव्हे, पण मती कुंठित झालेल्या लोकांना काही सांगायला जाणे म्हणजे भ्रमिष्ट लोकांच्या झुंडी अंगावर घेणे आहे. अशा वेळी अशा वेळी आपणास कितीही पटले नाही तरी रस्ता बदलून गेले पाहिजे. विचार करणा-या माणसांना एक वेळ समजावून सांगता येते पण देवाळू वगैरेंच्या एकदा मिठ्या पडल्या की त्या सूटत नाही, त्या स्वत:हुनच सुटल्या तर सूटल्या... नै तर अवघड होऊन जातं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रेड मार्क गुरुवार, 02/22/2018 - 07:11
यनावाला त्यांना अडचणीच्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. पण त्यांचे किंवा त्यांच्या विचारांचे खंदे समर्थक दिसता आणि या लेखावर बरेच प्रतिसाद दिले आहेत त्यामुळे तुम्ही मला पण उत्तर द्याल अशी आशा करतो. तर खांबाला हळदीकुंकू लावणं वगैरे मूर्खपणा आहे याबद्दल दुमत नाही किंवा दुसरा उद्देश म्हणजे आपली ओळख किंवा दहशत निर्माण करायची. पण मग श्रद्धा आणि कर्मकांडं यात गल्लत होते आहे का? रोज किंवा एखाद्या ठराविक दिवशी महत्वाची कामं बाजूला सारून देवळात जाणं, एखाद्या कुडमुड्या जोतिष्याने, भटजीने सांगितलं म्हणून नसत्या पूजा करणारे, कर्मकांड करणारे किंवा असेल हरी तर.. म्हणीप्रमाणे वागणारे यांना विरोध करणे आणि त्यांचे प्रबोधन करणे समजू शकतो. पण म्हणून सगळे सश्रद्ध त्याच पारड्यात का तोलायचे? कुठलेही कर्मकांड वा दिखावा न करता देवावर श्रद्धा ठेवणारे आणि तरीही आपापल्या परीने जीवन सुखावह होईल यासाठी प्रयत्न करणारे पण मूर्खच म्हणायचे का? दुसरी गोष्ट म्हणजे खांबाला हळदीकुंकू लावणारे, रस्त्यावर उतरून गणपती किंवा इतर सण साजरे करणारे हे निव्वळ कामधंदा नसणारे किंवा स्वतःचा फायदा बघणारे असतात असं माझं मत आहे. मग या लोकांच्या पंक्तीत सर्व साधुसंताना, अध्यात्मिक गुरूंना बसवायचं का? देवावर श्रद्धा असणं नसणं हा अत्यंत वैयक्तिक मुद्दा आहे. फक्त त्या श्रद्धेमुळे आपण कोणाचं जाणते अजाणतेपणी नुकसान तर करत नाही ना हे बघणं महत्वाचं! एखादा माणूस रोज ऑफिसला जाण्याआधी देवाची पूजा करत असेल, ऑफिसला वेळेत जात असेल, काम व्यवस्थित करत असेल, श्रद्धाळू असल्याने लाच घेत नसेल, आपण बरं आणि आपलं काम बरं असा असेल तर तो मूर्ख आणि बिनडोक ठरतो का? श्रद्धाळू एकवेळ देवाच्या भीतीने कोणाला हानी करणार नाही. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायक असतो, यात सश्रद्धही आले आणि अश्रद्धही.

In reply to by ट्रेड मार्क

राही गुरुवार, 02/22/2018 - 10:16
कुणाच्या पंगतीत कुणाला बसवायचे हाच तर विवेक आणि सत् असत् बुद्धी आहे. काही फार थोडे लोक आध्यात्मिक वृत्तीचे असतात. मी 'धार्मिक 'वृत्ती' असे म्हणत नाहीय. रिलिजन आणि स्पिरिचुअलिटी या भिन्न गोष्टी आहेत. त्या तशा वेगळ्या ओळखणे हेच तारतम्य आणि विवेक. हवे तर नीरक्षीरविवेक म्हणा. आणि, 'आपली विवेकबुद्धी वापरा' असेच तर सारे (खरे) संतजन, विभूती सांगत आले आहेत. सुधारणावाद्यांचे आणि प्रबोधनवाद्यांचेही त्यांच्या त्यांच्या परीने आणि क्षमतेनुसार हेच सांगणे असते. ऑफिसला वेळेत जाण्याचे,लाच न घेण्याचे आणि व्यवस्थित काम करणार्‍यांचे उदाहरण आपण दिले आहे. पण त्यात विशेष ते काय? हे त्यांचे कर्तव्यच असते. ते त्यांनी केलेच पाहिजे. त्यासाठी त्यांची इतर सांसारिक/सामाजिक कर्तव्ये त्यांना माफ होऊ शकत नाहीत. श्रद्धाळू असणे हा एखाद्यायाचा व्यक्तिगत स्वभाव झाला पण स्वतःच्या नकळत त्याचा अतिरेक होऊ लागला तर ते त्याला आणि समाजाला हानिकारक आहे. उदा. देवपूजेत जो वेळ जातो तो जर त्याने मुलाला शाळेत सोडण्यात किंवा इतर काही छोटी नित्यकर्मे करण्यासाठी वापरला तर घरातले काही ताण काही प्रमाणात कमी होतील, जे फक्त साग्रसंगीत देवपूजेने कदाचित कमी होणार नाहीत. खरे आध्यात्मिक लोक असतात ते प्रपंचही व्यवस्थित 'नेटका' करीत असतात. ते पहाटे तीन वाजता उठतील, ध्यानकर्म सर्व आवरतील आणि हसतमुखाने, स्थिरचित्ताने प्रापंचिक गोष्टींना त्या त्या वेळी सामोरे जातील. सामान्य माणसाला हे जमू शकत नाही. त्यामुळे त्याने आपली ऐहिक कर्तव्ये विवेकबुद्धीने पार पाडावी, विकारांवर विजय मिळवून स्थिरचित्त राहावे, मोहवश अथवा भ्रमित होऊ नये अशीच शिकवण भले लोक देत असतात. दासबोधाच्या दुसर्‍या अध्यायात समर्थांनी 'हे ज्ञान नव्हे' असे म्हणत अनेक उदाहरणे दिली आहेत ती सर्व सामान्य माणसासाठीच आहेत. यंत्र, तंत्र, जपतप, घटपट, यात्रा, समाराधना, पारायणे इ. हे ज्ञान नव्हे असे ते आग्रहपूर्वक सांगतात. सुधारणावादी आणि प्रबोधनवादी लोकही या भोळ्याभाबड्या जनतेसाठीच विचार मांडत असतात. स्वतःची विवेकबुद्धी जागवावी, गहाण टाकू नये हे त्याचे सार असते.

In reply to by राही

ट्रेड मार्क गुरुवार, 02/22/2018 - 23:07
काही मुद्दे मांडलेत तेच तुम्ही दुसऱ्या शब्दात मांडलेत. तर काही मुद्दे माझ्या प्रतिसादात आलेच नव्हते. रिलिजन आणि स्पिरिचुअलिटी या भिन्न गोष्टी आहेत. मुद्दा फक्त देव मानणे वा न मानणे याचा आहे. मी ना धर्माविषयी बोलतोय ना अध्यात्माविषयी आणि त्याची तुलना पण चर्चेत नाहीये. सर्वसामान्य लोक जे सतत कुठल्या ना कुठल्या अडचणींचा सामना करत असतात, ते थोडा मानसिक आधार, शांतता मिळण्यासाठी देवाचे स्मरण/ पूजा करत असतील किंवा देवळात जात असतील किंवा सकाळसंध्याकाळ घरातल्या देवापुढे हात जोडत असतील किंवा स्तोत्र मंत्र म्हणत असतील तर त्यांना मूर्ख बिनडोक का म्हणायचं? ऑफिसला वेळेत जाण्याचे,लाच न घेण्याचे आणि व्यवस्थित काम करणार्यांचे उदाहरण आपण दिले आहे. पण त्यात विशेष ते काय? हे त्यांचे कर्तव्यच असते. ते त्यांनी केलेच पाहिजे. तुम्ही उदाहरण अर्धवट वापरलेत. मुद्दा असा आहे की देवभोळे पापभिरू लोक निदान देवाच्या कोपाच्या वा नरकात जायला लागेल या भीतीने तरी चुकीचे काम करणार नाहीत. पण देव न मानणाऱ्यांना ही भीती नसेल. मग फक्त या "विवेकबुद्धी"वर अवलंबून राहायचं म्हणलं तर किती जणांकडे ती असते? असं म्हणतात की प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने बरोबरच असतो. माझ्या विवेकबुद्धीला जे पटते ते तुमच्या विवेकबुद्धीला पटेल असं नाही. मग याचे प्रमाण कोणते मानायचे? श्रद्धाळू असणे हा एखाद्यायाचा व्यक्तिगत स्वभाव झाला पण स्वतःच्या नकळत त्याचा अतिरेक होऊ लागला तर ते त्याला आणि समाजाला हानिकारक आहे मी तेच तर म्हणलंय. यात सश्रद्ध आणि अश्रद्ध दोघेही आले. मी माझ्या प्रतिसादात लिहिलंय की आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या नीट सांभाळून जर कोणी देवदेव करत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? कोणी जर प्रवासातल्या वेळेत मनातल्या मनात जप किंवा स्तोत्र म्हणत असेल तर इतर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? बाकी देवपूजा करण्यात वेळ घालवल्यामुळे घरात निर्माण ताणाबद्दल म्हणाल तर अश्रद्धांमुळे किंवा त्यांच्या विरोधामुळे घरात ताण निर्माण होत नसेल? नाहीतर मग अश्रद्धाचे आईवडील, जोडीदार, मुले हे सर्वच तितकेच अश्रद्ध असले पाहिजेत. सर्वसाधारणपणे नवरा आणि बायको वेगवेगळ्या स्वभावाचे असतात आणि आवडीनिवडीसुद्धा अगदी सारख्या नसतात. अगदी टोकाच्या नास्तिक नास्तिक व्यक्तीचा जोडीदार थोडा जरी आस्तिक असेल तर किती तणाव किंवा कुचंबणा असेल याचा विचार करा.

In reply to by ट्रेड मार्क

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/22/2018 - 18:41
राहींनी अतिशय उत्तम प्रतिसाद लिहिला आहे, अधिक लिहिण्याची गरज पडू नये. पण, आपल्या प्रतिसादातील एका मुद्द्यावर बोललं पाहिजे. देवावर श्रद्धा असणं नसणं हा अत्यंत वैयक्तिक मुद्दा आहे. फक्त त्या श्रद्धेमुळे आपण कोणाचं जाणते अजाणतेपणी नुकसान तर करत नाही ना हे बघणं महत्वाचं! देवावर श्रद्धा असणं ही व्यक्तीगत बाब आहे, हे कोणालाही मान्य व्हावं. पण त्या श्रद्धेमुळे आपण स्वतःच नुकसान करुन घेत असतो पण देवाळू मोडमुळे माणूस कितीही नुकसान झालं तरी ते नुकसान होतंय, हे कळतंय तरी ते कबूल न करणे आणि त्यातच डुंबत जाणे हे घातक होत जाते. ”पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति’.... सुद्धा नको. आपली श्रद्धा घरातही असली तरी त्यामागे कर्मकांडं येतातच आणि बाहेरच्या चार लोकांना भलेही त्याचा त्रास होत नसेल , तो घरातल्या लोकांना होतच असतो. पण, मुकेपणाने सहन करावे लागते. म्हणून मी देवाळूंच्या बाबतीत कुठे तरी म्हणालो की तुमची एका अज्ञात शक्तीवर श्रद्धा आहे, ती तशीच ठेवा. त्याला कोणतीही कर्मकांडे चिकटली की त्याचा त्रास तुम्हाला नको आणि समाजालाही नको. बाकी, अश्रद्धांळूचा मात्र असा कोणताही गजर नसतो. असं माझं मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रेड मार्क Fri, 02/23/2018 - 02:56
म्हणजे तुमचा कर्मकांडांना विरोध आहे तर. तो तर बहुतेक सर्व सुज्ञ लोकांचा असतोच, मग ते सश्रद्ध असो व अश्रद्ध. पण त्या श्रद्धेमुळे आपण स्वतःच नुकसान करुन घेत असतो पण देवाळू मोडमुळे माणूस कितीही नुकसान झालं तरी ते नुकसान होतंय, हे कळतंय तरी ते कबूल न करणे आणि त्यातच डुंबत जाणे हे घातक होत जाते. हे वाक्य हे गृहीतक जास्त वाटतंय. श्रद्धेमुळे का आणि कसं स्वतःचं नुकसान होतं? कशावरून सर्व श्रद्धाळू कर्मकांडांच्या मागे लागतातच? घरातल्या लोकांच्या सहन करण्याबद्दल बोलायचं तर घरातले सर्व जण सारख्याच लेव्हलचे नास्तिक असायला पाहिजेत तरच वाद होणार नाहीत. कारण एक टोकाचा अश्रद्ध असेल आणि दुसरा थोडा जरी सश्रद्ध किंवा अज्ञेयवादी असेल तरी कोणा एकाची कुचंबणा होणार. या सगळ्यात आपण कुठे थांबायचं हे कळणं महत्वाचं. एखादा नास्तिक मुलगा आस्तिक मुलीच्या प्रेमात पडला तर केवळ आपलं नास्तिक्य टिकवण्यासाठी प्रेमाचा अव्हेर करेल का? आपण प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी (आई, वडील, जोडीदार, मुलं, मित्र) जर कधी देवासमोर हात जोडावे लागले किंवा प्रसाद घ्यावा लागला तर काय फरक पडतो? बाकी, अश्रद्धांळूचा मात्र असा कोणताही गजर नसतो. असं माझं मत आहे. यनावाला सारखा हा गजर करतात ना, इतरांना मूर्ख बिनडोक पण म्हणतात. वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण देण्याचं सौजन्य दाखवत नाहीत.

In reply to by ट्रेड मार्क

यनावाला सारखा हा गजर करतात ना, इतरांना मूर्ख बिनडोक पण म्हणतात. वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण देण्याचं सौजन्य दाखवत नाहीत. यनावाला सरांचा गजर प्रबोधनाचा आहे, त्याचा झाला तर फायदाच होतो नुकसान होणार नाही. यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख बिनडोक म्हणाले असतील असे मला वाटत नाही. मिपावर टाकलेल्या लेखनाला प्रतिसादाला उत्तर दिलंच पाहिजे असा काही नियम नाही, ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रेड मार्क Fri, 02/23/2018 - 22:55
यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख बिनडोक म्हणाले असतील असे मला वाटत नाही. तुम्ही त्यांचे बाकीचे लेख वाचले असतील असं मला वाटलं होतं. त्यांनी सरसकट सगळ्या श्रद्धा ठेवणाऱ्यांना तत्सम विशेषणांनी गौरविलेले आहे. यनावाला सरांचा गजर प्रबोधनाचा आहे, त्याचा झाला तर फायदाच होतो नुकसान होणार नाही. हे तुमचं वैयक्तिक मत झालं. मला जर रोज गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसा म्हणल्याने छान वाटत असेल तर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? हे मंत्र म्हणणे मूर्खपणाचे आहे असं मला सांगून माझा काय फायदा होणार आहे? मिपावर टाकलेल्या लेखनाला प्रतिसादाला उत्तर दिलंच पाहिजे असा काही नियम नाही, ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे. हे तुम्ही कोणासाठी म्हणताय ते कळलं नाही. जर यनावाला उत्तर देत नाहीत या म्हणण्यावर असेल तर त्यांनी काढलेल्या धाग्यांवर विचारलेल्या प्रश्नांना तरी उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे की त्यांना सोयीस्कर असेल त्या ठिकाणी मात्र ते प्रतिसाद देतात. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे - हा ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Fri, 02/23/2018 - 23:32
इतकी वर्षे तेच तेच लिहूनही फायदा होताना दिसत नाही. म्हणून वेळेचा अपव्यय/नुकसान होते आहे असेच म्हणावे लागेल. याचा अर्थ देव शिक्षा करतोय असाच आहे! ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Fri, 02/23/2018 - 06:37
सर, तुम्ही स्वतःला कुठल्या बाजूचे मानता? संक्रांतीपासून, होळी, पाडवा, राखी पौर्णिमा, गणेशोत्सव ते दिवाळी पर्यंत कुठले सण साजरे करता का सगळे कर्मकांड म्हणून बाद?

In reply to by विकास

सर, तुम्ही स्वतःला कुठल्या बाजूचे मानता? आधुनिक विचारांचा. संक्रांतीपासून, होळी, पाडवा, राखी पौर्णिमा, गणेशोत्सव ते दिवाळी पर्यंत कुठले सण साजरे करता का नाही. सगळे कर्मकांड म्हणून बाद? बाद....!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रेड मार्क Sat, 02/24/2018 - 05:26
म्हणजे बहिणीला जरी राखी बांधायची असेल, बायकोची इच्छा पाडवा म्हणून ओवाळायची असेल तरी तो मूर्खपणा म्हणून नाकारणं म्हणजे आधुनिक विचार का? आजूबाजूला उत्सव (फटाके, लाऊडस्पीकर नव्हे) चालू असताना कोणी एवढं कोरडं राहणं याला काय म्हणावं? या हट्टापायी या नास्तिक लोकांनी किती जवळच्या माणसांची मनं दुखावली असतील काय माहित! अजूनही मला असं वाटतंय की कर्मकांड आणि श्रद्धा यात गल्लत होते आहे.

इरसाल गुरुवार, 02/22/2018 - 13:30
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?... देव म्हणतो, तुम्ही (निरीश्वरवादी) माझ्या फंदात पडत नाहीत मग मी कशाला तुमच्या (निरीश्वरवाद्यांच्या) फंदात पडु, तुम्ही तुमचे कर्म भोगाल !!!!!

In reply to by arunjoshi123

डॉ.नितीन अण्णा गुरुवार, 02/22/2018 - 17:21
गनिमी कावा वगैरे तर मला इथे दिसत नाही. सरळ सरळ मत प्रदर्शन आहे ... दोन्ही बाजूंनी चर्चा होतेय विचारांची घुसळण होतेय ... चांगले आहे. बाकी मला तर सोप्या सोप्या गोष्टीमध्ये वैचारिक खोली दिसते उदा. सुस्मिता सेन जेव्हा म्हणते की कूच दर्द हे मेरे सिने में मुझे मस्त माहोल में जिने दे तेव्हा मला ती मेहबूब बद्दल न बोलता काहीतरी अध्यात्मिक बोलत असल्याचा भास होतो... असे वाटते की तिला तिचे दुखणे विसरायला अध्यामाची धुंदी उपयोगी पडत असेल तर पडू द्या बाबा ... आपल्याला काय करायचे

In reply to by डॉ.नितीन अण्णा

कूच दर्द हे मेरे सिने में कुछ म्हणायचं आहे का तुम्हाला ? "कूच/कुच"चा अर्थ जरा वेगळा होतो :) ;)

दाभोलकर नेहमी म्हणायचे की देवावर श्रद्धा ठेउन जर कुणी विवेकी राह्त असेल तर आमच भांडण नाही. फक्त देवाच्या नावाने कुणी शोषण करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. खोट बोललेल देवाला आवडणार नाही म्हणून कुणी खोट बोलत नसेल तर माझ्या सदसद विवेक बुद्धीला पटत नाही म्हणून मी खोट बोलणार नाही असे कुणी असतील. आता माझे मत. देव बहुसंख्यांसाठी स्वस्तातला सायकियाट्रिस्ट आहे. अनेकांना आपले मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. शेवटी ती अ‍ॅबस्ट्रॅक्ट संकल्पना आहे. सायकॉलॉजी हा ही तसाच अ‍ॅबस्टॅक्ट आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

बिटाकाका Fri, 02/23/2018 - 10:53
दाभोलकर नेहमी म्हणायचे की देवावर श्रद्धा ठेउन जर कुणी विवेकी राह्त असेल तर आमच भांडण नाही.
परफेक्ट आणि प्रिसाईझ...कारण त्यात भांडण करण्यासारखं काहीच नाही. देवावर विश्वास ठेवा पण विवेकी रहा हा प्रबोधनाचा मार्ग सोडून (जो अनेक संतांनी/समाजसुधारकांनी अवलंबला होता) सोडून देवच नाही हे सिद्ध करण्याचा मार्ग (म्हणजे ना राहेगा बांस ना बजेगी बासुरी स्टाईल) या आजकालच्या अ-देवाळुनी का अवलंबला असेल हे कोडेच आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गरज विवेकी धर्मजागराची हा दाभोलकरांचा लेख वाचल्यास हे नक्कीच लक्शात येईल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 11:19
दाभोलकर नेहमी म्हणायचे की देवावर श्रद्धा ठेउन जर कुणी विवेकी राह्त असेल तर आमच भांडण नाही.
नास्तिकांना दाभोळकर कळत नाही, देव काय कळणारे?

गामा पैलवान Fri, 02/23/2018 - 19:20
प्राडॉ,
देव नावाची कल्पना कोणाला मदत करीत नाही आणि ती कोणालाही शिक्षा देत नाही, हेच सत्य आहे.
हे विधान 'सत्य' हा भाव न वापरता लिहिता येईल काय? तसं लिहिलंत तर मी ते मान्य करेन. आत्मभाव देखील सत्याचाच भाग आहे. त्यामुळे 'मी सांगतो म्हणून ....' अशा तऱ्हेचा युक्तिवाद देखील नको. शिवाय आजून एक खटकलेली बाब म्हणजे 'यदाकदाचित ईश्वर अस्तित्वात असलाच तर त्याने निरीश्वरवाद्यांना शिक्षा केलीच पाहिजे' हे गृहीतक. आ.न., -गा.पै.

यनावाला Fri, 02/23/2018 - 20:58
तर्कसुसंगत निष्कर्ष " देव नास्तिकांना शिक्षा का करीत नाही ?" हे वाचून सहज लक्षात येते की नास्तिकाने आस्तिकांना विचारलेल्या या प्रश्नाचा प्रारंभीचा अध्याहृत भाग "जर देव अस्तित्वात आहे तर तो...."असा आहे. आस्तिक लोक देवाचे अस्तित्व सत्य मानतातच. तसेच सर्व माणसे देवाची लेकरे आहेत असेही ते म्हणतात. आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात. तद्वतच नास्तिकांनी देवा-धर्मावर श्रद्धा ठेवावी म्हणून मायबाप देवाने त्यांना शिक्षा करायला हवी, अशी अपेक्षा योग्यच आहे. देव सर्वज्ञ आहे. नास्तिकतेच्या कुमार्गाला कोण लागले आहेत ते त्याला समजतेच. तसेच देव सर्वसमर्थ असल्याने तो कोणतीही शिक्षा सहज देऊ शकतो. पण असे होताना दिसत नाही. आपले जे परिचित आणि नातेवाईक आस्तिक आहेत त्यांचे जीवन सुखमय आणि आनंदी आहे. तर आपल्या आयुष्यात दु:खे, त्रास इ.गोष्टी लक्षणीय प्रमाणात अधिक आहेत असे नास्तिकांना दिसले असते तर आपल्या नास्तिकतेचा हा दुष्परिणाम आहे असे त्यांच्या लक्षात आलेच असते आणि त्यांनी आस्तिकतेचा स्वीकार केला असता. पण सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात . तिथे आस्तिक-नास्तिक असा भेद दिसतच नाही. म्हणजे प्रतिदिनी फुलपुडी आणून नित्यपूजा, तसेच परंपरे अनुसार नैमित्तिक पूजा करणारा भाविक आणि देवाचे अस्तित्व नाकारून कधीही देवपूजा न करणारा नास्तिक हे दोघे देवाच्या लेखी सारखेच! यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.

In reply to by यनावाला

गामा पैलवान Fri, 02/23/2018 - 21:28
यनावाला,
म्हणजे प्रतिदिनी फुलपुडी आणून नित्यपूजा, तसेच परंपरे अनुसार नैमित्तिक पूजा करणारा भाविक आणि देवाचे अस्तित्व नाकारून कधीही देवपूजा न करणारा नास्तिक हे दोघे देवाच्या लेखी सारखेच! यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.
साफ चूक. यावरून देव समदर्शी आहे असं दिसून येतं. आ.न., -गा.पै.

In reply to by यनावाला

arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 21:31
नास्तिकाने आस्तिकांना विचारलेल्या या प्रश्नाचा प्रारंभीचा अध्याहृत भाग "जर देव अस्तित्वात आहे तर तो...."असा आहे.
हे सांगायची गरज नाही. लोकांनी बरेच प्रतिसाद असं मानूनच लिहिलेत. चर्चा याच्या फार पुढे गेलेली आहे. तुम्ही माझा तुमच्या पहिल्याच पॅराग्राफवरचा प्रतिसाद वाचलेला असेलच नि नेहमीप्रमाणे तुम्हाला कळला नसेल. ------------------------------------------
आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात.
शिक्षा करत नाही. केली तरी लूटूपूटूची करतात, आंतरिक प्रेम असतंच. लहान मुलांना पालकांच्या शिक्षांनी आपले जीवन दु:खी इ वाटते का??तुमचा नियम इतका सरळधोट असता तर जगात असंस्कारित मुले मोठी होउच शकली नसती. --------------- देव म्हणजे हिरण्यकश्यपू हे कुणी शिकवलं तुम्हाला? लोकशाहीत सार्वभौम सत्ता असून विरोधकांना वा विरोधी मतदारांना मर्त्य अतिशय स्वार्थी लोकांनी बनलेलं सरकार काही करत नाही इतकं ते सज्जन असतं. मग देव काय इतका फालतू असतो का त्याला नाही मानलं तर शिक्षा करत सुटेल?
यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.
नास्तिकांना काय असतं नि काय नसतं हे फार व्यवस्थित कळतं असं दिसतंय. तेव्हा गुरुत्वाकर्षण तरंग आहेत कि नाहीत हे कळण्यासाठी प्रयोग करूच नये. थेट नास्तिकाला विचारावं, 'सांग रे बाबा, हे तरंग असतात कि कसे?' ------------------------- यना, देव असतो का नसतो ते जाऊ द्या, पण जे काय महातार्किक लिहिलंय त्यावरनं हे सिद्ध होतंय कि जो जो कोणी अस्तित्वात असतो तो तो त्याला न मानणारांचे जगणे हराम करत असतो. बस्स.

In reply to by यनावाला

बिटाकाका Fri, 02/23/2018 - 21:31
कोणातरी, टिपिकल अंधश्रद्धाळू, देवभिरु क्ष आस्तिकाला आणि त्याच्या देवाच्या, देवाच्या न्याय करण्याच्या पद्धतीच्या कल्पनेला बेसलाईन पकडून मुद्दे मांडले की असं होतं. ************************* देव कोणालाही अशीच शिक्षा करत नाही, देव शिक्षाच करत नाही न्याय करतो, नास्तिक देवावर विश्वास ठेवत नाही हा अस्तिकतेच्या पुस्तकातील गुन्हा नाहीये असे समजणारे आस्तिक असतात हेच मुळात (आधीच, पूर्वग्रहाने) नाकारलेले असल्याने बाकीची चर्चा वांझोटी ठरते.

In reply to by यनावाला

arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 21:33

देव असतो का नसतो ते जाऊ द्या, पण जे काय महातार्किक लिहिलंय त्यावरनं हे सिद्ध होतंय कि जो जो कोणी अस्तित्वात असतो तो तो त्याला न मानणारांचे जगणे हराम करत असतो. बस्स.

In reply to by यनावाला

गवि Fri, 02/23/2018 - 21:36
यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.
देव ही संकल्पना नेमकी काय आहे याची विशिष्टताच अशा मांडणीने पुसली जाते. देव , as we think of अशा प्रकारचा देव अस्तित्वात नाही इतकंच सिद्ध करायचंय का? देव अशी व्यक्ती किंवा एक युनाइटेड शक्ती अस्तित्वात नाहीच आहे. पण देव हे "चांगुलपणा", "व्यक्तिगत तात्कालिक हितापेक्षा दीर्घकालीन सार्वत्रिक हित पाहणारा सद्विचार" इत्यादि अनेक गोष्टींचं "प्रतीक" आहे. ज्यांना समूर्त झेपतं त्यांना समूर्त, ज्यांना अमूर्त झेपतं त्यांना अमूर्त. हे सद्विचार, चांगुलपणा वगैरे कितपत उपयुक्त किंवा योग्य आहेत यावर मतभेद संभवतो. पण त्या चांगुलपणाचं देव ही कल्पना हे एक आदर्श प्रतीक आहे. त्याचं भौतिक अस्तित्व फिजिक्सच्या नियमांनी शोधायला जाल तर तातडीने "त्याचं अस्तित्व नाही" असं सिद्ध करता येईल. पण प्रतीकाशिवाय स्मरण राहात नाही हो लोकांना. वडील वारुन वीसतीस वर्षं झाली की लोकांना माहीत असतं हो की आपले वडील अस्तित्वात नाहीत. कोणी फोटो लावतो, कोणी लावत नाही. पण आयुष्यातल्या एका मोठ्या भागाचं, अनेक गुणांचं प्रतीक म्हणून ते वडील असतातच. मलाही माहीत नाही की देव आहे का किंवा कसा आहे. पण त्याला एक भौतिक अस्तित्व म्हणून सिद्ध किंवा असिद्ध करण्यातला तर्क समजत नाही. आपल्या अस्तित्वातला चांगुलपणा याचंच देव ही "संकल्पना" हे एक प्रतीक आहे. त्याचं स्मरण भजन पूजन हे चांगुलपणा या गुणाला दिलेला सन्मान आहे असा विचार करुन पाहता येईल का?

In reply to by गवि

arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 21:40
त्याचं भौतिक अस्तित्व फिजिक्सच्या नियमांनी शोधायला जाल तर तातडीने "त्याचं अस्तित्व नाही" असं सिद्ध करता येईल.
गवि, असं अजिबात नाही. ईश्वराचं भौतिक अस्तित्व विज्ञान नाकारत नाही.

In reply to by सतिश गावडे

arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 21:56
अस्तित्व ही संकल्पना विज्ञानाच्या दायर्‍या बाहेर आहे. जे अस्तित्वात आहे नि समोर आहे ते आतापर्यंत कितपत समजलं आहे इतकंच विज्ञान सांगतं. काय असू शकतं नि काय असू शकत नाही हे विज्ञानाच्या स्कोपमधेच येत नाही. https://science.howstuffworks.com/innovation/scientific-experiments/scientific-method10.htm
Clearly, the scientific method is a powerful tool, but it does have its limitations. These limitations are based on the fact that a hypothesis must be testable and falsifiable and that experiments and observations be repeatable. This places certain topics beyond the reach of the scientific method. Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity. Sometimes, scientific principles are used to try to lend credibility to certain nonscientific ideas, such as intelligent design. Intelligent design is the assertion that certain aspects of the origin of the universe and life can be explained only in the context of an intelligent, divine power. Proponents of intelligent design try to pass this concept off as a scientific theory to make it more palatable to developers of public school curriculums. But intelligent design is not science because the existence of a divine being cannot be tested with an experiment.
विज्ञानाच्या नावाने आपले ईश्वरविषयक अज्ञान खपवण्यात उत्साही पुरोगामी नास्तिक तरबेज असतात. हा. हा.

In reply to by arunjoshi123

सतिश गावडे Sat, 02/24/2018 - 09:34
विज्ञानाच्या नावाने आपले ईश्वरविषयक अज्ञान खपवण्यात उत्साही पुरोगामी नास्तिक तरबेज असतात. हा. हा. बरोबर ओळखलंत तुम्ही. आणि अशा लोकांना उघडे पाडण्याचे तुम्ही जे धर्मकार्य अंगिकारले आहे त्यासाठी तुमच्याबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे.

In reply to by arunjoshi123

गवि Fri, 02/23/2018 - 22:32
ईश्वराचं भौतिक अस्तित्व विज्ञान नाकारत नाही.
विज्ञान कशाचंच अस्तित्व नाकारत नाही. शब्द बदलून असं म्हणावं की एखादी थियरी सिद्ध करताना "देव जसा आज लोकांच्या समजुतीत आहे तशा रूपात तो अस्तित्वात आहे" असं गृहीतक सध्यातरी "इनव्होक" करण्याची गरज विज्ञान (आजरोजी) मानत नाही. मुद्दा तो नाही. देवकण किंवा अन्य त्यापुढचंही काही सध्याच्या ज्ञाताच्या जरा जरा पलीकडचं दिसायला लागलं तरी लगेच देवाचं भौतिक अस्तित्व सिद्ध, मान्य वगैरे होऊ शकत नाही. यांचं मुख्य कारण म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मानणं हे कशाचंच उत्तर असू शकत नाही. ते फक्त "प्रश्न ट्रान्सफर करणं" आहे. विज्ञान "उत्तरं" शोधत असतं. तेव्हा सध्या तरी देव ही संकल्पना भल्याचं प्रतीक आहे आणि म्हणून ज्याच्या मनात ते आहे त्याच्या मनात ते असू दे. आवर्जून त्याचं भंजन करु नये असं मत आहे.

In reply to by यनावाला

arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 21:48
तसेच सर्व माणसे देवाची लेकरे आहेत असेही ते म्हणतात. आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात.
यना, यना जरा धीरानं घेत जा. अहो, सर्व माणसे देवाची जैविक लेकरे आहेत असं कोणी मानत नाही हो. हे एक बोलायची पद्द्धत झाली. ब्रह्मांडातील सर्व अस्तित्वांमधे (वा जगातल्या सर्व चेतनाचेतन गोष्टींमधे वा असेच काही) एक आंतरसंबंध आहे असा नि असाच त्याचा व्यवहार्य अर्थ निघू शकतो. या आंतरसंबंधाचे स्वरुप म्हणजे जैविक बंधु वा भगिनी नव्हे. जरी एक आत्मियतेचा भाव असला तरी डायरेक्ट कुटुंबाचं उदाहरण देत सुटावं असा अभिप्रेत अर्थ नाही.