मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.

यनावाला · · काथ्याकूट
श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।....यनावाला ............................................................................................................. भगवद्गीतेतील 4 थ्या अध्यायात पुढील दोन श्लोक आहेत : 1) श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तीं अचिरेणाधिगच्छति ॥39॥ अन्वय:- संयतेन्द्रिय: , तत्पर: , श्रद्धावान् ज्ञानं लभते । ज्ञानं लब्ध्वा (स:) अचिरेण (एव) परां शान्तिं अधिगच्छति । अर्थ : -- जितेंद्रिय आणि साधनपरायण अशा श्रद्धावंताला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान मिळाल्यावर लौकरच त्या श्रद्धाळूला परम शांतीचा लाभ होतो. 2) अज्ञश्च अश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । नायं लोकोSस्ति न परो न सुखं संशयात्मन:॥40॥ अन्वय :- अज्ञ: च अश्रद्दधान: च संशयात्मा विनश्यति । संशयात्मन: न अयं लोक: अस्ति, न पर: (लोक: अस्ति) न च सुखं (अस्ति)। अर्थ :-- श्रद्धारहित असलेला माणूस अज्ञानी आणि शंकेखोर असतो. तो नाश पावतो. ज्याच्या मनात (धर्मग्रंथातील वचनांच्या सत्यतेविषयी ) शंका येतात तो इहलोकाला तसेच परलोकालाही मुकतो. त्याला कधी सुख लाभत नाही. गीतेच्या चौथ्या अध्यायातील या दोन श्लोकांचा मथितार्थ असा की, गीतेतील वचने खरी आहेत यावर जो पूर्ण श्रद्धा ठेवतो तो ज्ञानी होतो. त्याला विनाविलंब परमशांती लाभते. जो शंकेखोर असतो तो अज्ञानी आणि अश्रद्ध होय. त्याचा नाश होतो. या वचनांच्या सत्यतेविषयी ज्याच्या मनात शंका उद्भवते त्याला ना अरत्र ना परत्र असे होते. त्याला कधीच सुख लाभत नाही. यावरून गीतेत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे, श्रद्धेचे उदात्तीकरण केले आहे हे स्पष्ट होते. गीतेतील ही वचने "श्रीभगवान् उवाच " म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून आली आहेत. म्हणून ती सत्य असलीच पाहिजेत असा समज निर्माण केला आहे. (गीतेत "धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच, अर्जुन उवाच " असे म्हटले आहे. मात्र "श्रीकृष्ण उवाच" असे लिहिले नाही. "श्रीभगवानुवाच" असे म्हटले आहे. महाभारतात श्रीकृष्णाला श्रीभगवान असे केवळ गीतेतच म्हटले असावे. इतरत्र कुठे नसावे. हे इथे लक्षात घ्यावे.) वरील दोनांतील पहिल्या श्लोकात श्रद्धाळूला ज्ञान आणि परमशांती यांच्या लाभाची आशा दाखवली आहे. तर दुसर्‍या श्लोकात अश्रद्धाला भीती घातली आहे की त्याचा विनाश होतो. तो इहलोक आणि परलोक या दोघांनाही मुकतो. प्रत्येक धर्मग्रंथात आशा आणि भीती या दोन भावनांचा उपयोग करून धार्मिकांना जखडून टाकलेले असते. श्रद्धांच्या दाव्याला बांधलेले असते. सगळ्याच धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे. गीतेत अश्रद्धाला विनाशाची भीती घातली आहे तर बायबल आणि कुराण या धर्मग्रंथांत अश्रद्धाला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे म्हटले आहे. धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत. त्यांतील सर्व वचने ईश्वराचे बोल आहेत. त्यांच्या सत्यतेविषयी शंका घेणे , त्या विधानांची चिकित्सा करणे, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरावर अविश्वास दाखविणे आहे. म्हणजे एका अर्थी ईश्वराची निंदा करणेच (ब्लासफेमी) आहे. म्हणून या ईश्वर निंदकांना मृत्युदंड द्यावा असे धर्मग्रंथांत आहे. धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व देऊन अश्रद्धांना मृत्युदंडाच्या शिक्षेची भीती घालण्याचे कारण काय ते उघड आहे. धर्मग्रंथातील वचनांची चिकित्सा केली तर त्यांतील कित्येक वचने खोटी आहेत, बुद्धीला न पटणारी आहेत, असे सहज दिसून येते. एकदा हे कळले की धार्मिकांची श्रद्धा उडून जाईल. मग धर्मग्रंथांना, धार्मिक कर्मकांडांना, धर्मगुरूंना आणि धर्माला कोण मानणार ? श्रद्धाळूच नसले तर मंदिरांपुढे रांगा कोण लावतील ? मग देवापुढच्या दानपेट्या तुडुंब कशा भरतील ? देवस्थानांची उत्पन्ने कोटीच्या कोटी उड्डाणे कशी घेतील ? देवाला सोन्या-चांदीचे दागिने, वस्तू कोण वाहतील ? सोने मोठ्या प्रमाणात जमले नाही तर लंपास कसे करता येईल ? श्रद्धांचे विसर्जन झाले तर होम-हवने, अभिषेक-अनुष्ठाने, एकादष्णी-लघुरुद्र अशी निरर्थक कर्मकांडे कोण करतील ? मग पुरोहित-पुजार्‍यांना फुकाफुकी लक्षावधी रुपये कसे मिळतील ? स्वबुद्धीने विचार केला की श्रद्धा संपते. मग दहावे-अकरावे-बारावे-तेरावे, मासिक श्राद्ध अशी अन्त्यविधी कर्मकांडांची लांबच लांब माळ कोण कशाला करून घेतील ? म्हणून धार्मिकांची श्रद्धा दृढ राहायला हवी. ती मुळीच ढळूं देता नये. समाजसुधारक प्रबोधन करू लागले तर प्रखर विरोध करायला हवा. तात्त्विक विरोध करता आला नाही तर त्यांना धमक्या द्यायला हव्या. त्यालाही बळी पडले नाहीत तर त्यांचे खून पाडायला हवेत. पण काही करून श्रद्धा टिकवायलाच हवी. नाहीतर आपले अस्तित्वच टिकणार नाही. असे धर्ममार्तंडांना वाटणे साहजिक आहे. यासाठी धार्मिकांनी धर्मग्रंथावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. धर्मग्रंथातील वचनांविषयी शंका उपस्थित करायची नाही. संशय घ्यायचा नाही. केवळ श्रद्धा ! ती ढळू द्यायची नाही. श्रद्धेचे बळ मोठे असते. असे हितसंबंधी धूर्तांनी श्रद्धाळूंच्या मनावर सतत बिंबविले आहे. सत्य शोधनाची नावड निर्माण केली आहे. त्यामुळे ,"श्रद्धा म्हणजे अज्ञानात गुरफटून राहण्याची आवड आणि सत्यशोधनाची तीव्र नावड " अशी समर्पक व्याख्या करता येते. अर्थात श्रद्धाळूंना लुबाडण्याचे हे प्रकार गेल्या पाच-सहाशे वर्षांत ऊर्जितावस्थेला आले. तत्पूर्वी अशी लुबाडणूक नसावी. मात्र श्रद्धेच्या आधारे जनसामान्यांवर नियंत्रण ठेवलेले असे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा सर्वाधिकार जनता विनाअट मान्य करील याची दक्षता घेतलेली असे. या सत्ता अबाधित राखण्यासाठी जनसामान्यांच्या श्रद्धेचा पुरेपूर उपयोग केला होता. तर्कशुद्ध युक्तिवादाला, सुसंगत विचारसरणीला , डोक्यात उद्भवलेल्या शंका उपस्थित करण्याला धर्माच्या क्षेत्रात स्थानच नसते. तिथे अपेक्षित असते संपूर्ण शरणागती आणि असीम श्रद्धा. जो श्रद्धेचे विसर्जन करतो, गतानुगतिक होत नाही , स्वबुद्धी वापरतो, परंपरांची चिकित्सा करतो, आपला अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) वापरतो त्याचीच बौद्धिक प्रगती होऊ शकते. श्रद्धावंत जन्मभर अज्ञानीच राहतो. तसा सुखी असतो. कारण तो त्या अज्ञानातच सुख मानतो. "श्रद्धावान् लभते ज्ञानम्।" हे गीता वचन न पटणारे आहे. माणसाने अज्ञानी राहावे, धर्माला शरण जावे, धर्मगुरूंना पूज्य मानावे. म्हणून अशी वचने सर्व धर्मग्रंथांत असतात. श्रद्धा हे ज्ञानप्राप्तीचे साधन असूच शकत नाही. श्रद्धा हे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. श्रद्धाळू माणसे अज्ञानालाच ज्ञान समजतात. अतूट श्रद्धेविषयी कोणी काही म्हणो, श्रद्धेची कितीही वाखाणणी करो, गोडवे गावो, मला तर श्रद्धा ही माणसासाठी लाजिरवाणी भावना आहे असेच वाटते. श्रद्धावंत हा त्या श्रद्धाविषयाचा दास बनतो. तो श्रद्धेची चिकित्सा करूच शकत नाही. तसेच श्रद्धा ही अतिशय घातक असू शकते. निष्पाप, निरागस बालकांच्या संस्कारक्षम, संवेदनशील मेंदूत श्रद्धेचे संस्कार बिंबविणे हा मोठा अपराध आहे. बहुसंख्य माता-पिता शिक्षक हा अपराध करतात. श्रद्धा आणि भक्ती यांमुळे माणसाला मानसिक आधार मिळत असेल. मानसिक समाधान लाभत असेल. पण ते केवळ मानीव असते. श्रद्धा आणि भक्ती यांच्या योगे ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. अगदी वेदकाळापासून आपल्या पूर्वजांची सूर्यावर श्रद्धा होती. त्यांनी सूर्याची उपासना केली. सूर्यामुळे प्रकाश मिळतो, उष्णता मिळते एवढे अनुभवाने समजत होते. ते प्रतिदिनी सूर्याला अर्घ्य देत असत. त्याची स्तुतिगीते गात असत. संध्या करताना म्हणायचा गायत्री मंत्र हा सूर्याच्या तेजाविषयी आहे. ते त्रिकाल संध्या करीत. (सकाळ-दुपार -संधाकाळ) . या श्रद्धेने, भक्तीने, स्तुतीने त्यांच्या मनाला बरे वाटत होते एवढेच. ग्रह सूर्याभोवती फिरतात हे ज्ञान त्यांना या श्रद्धेने प्राप्त झाले नाही. सूर्यदेवाने दिले नाही. वैज्ञानिकांनी शोधून काढले. ज्या पृथ्वीवर आपण राहतो तो सूर्याभोवती फिरणारा एक ग्रह आहे हेही त्यांना श्रद्धेने समजले नाही. भूमातेचीसुद्धा ते स्तुती, भक्ती करीत. "समुद्रवसने देवि, पर्वतस्तनमंडले विष्णुपत्‍नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।" असे म्हणत. पण पृथ्वीविषयी सत्यज्ञान त्यांना झाले नाही. ते ज्ञान "संशयात्मा" असणार्‍या वैज्ञानिकांना झाले. श्रद्धेमुळे ज्ञान प्राप्त होत नाही हे यावरून दिसून येते. श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. असते ती गतानुगतिक मेषवृत्ती. "देवावर अनेकजण श्रद्धा ठेवतात. म्हणून मी पण ठेवायला हवी." असे श्रद्धाळू मानतो. सत्य काय आहे हे जाणून घ्यायची ज्याला इच्छाच नसते असा माणूस सहजपणे श्रद्धेचा स्वीकार करतो. नुसते होय म्हणायचे. मान डोलवायची. बुद्धी वापरायची नाही. विचार करायचा नाही. हे सोपे, सुखकर वाटते. डोक्याला काही ताप नाही. श्रद्धेमागे कोणताही विचार नसतो. श्रद्धा ठेवण्याच्या अनिवार ओढीमुळे ती अपरिहार्यपणे बसते. अशी श्रद्धा घालविणे महाकर्मकठीण असते. श्रद्धावंत त्याच्या श्रद्धाक्षेत्रांतील विषयांवर विचार करतच नाहीत. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी त्या क्षेत्रात ठप्पच झालेली असते. मात्र श्रद्धाक्षेत्राच्या बाहेरील विषयावर ते व्यवस्थित, तर्कसुसंगत विचार करू शकतात. कारण तिथे त्यांची बुद्धी कार्यप्रवण होते. माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) आहे. तर्कशुद्ध , सुसंगत विचार करणे, युक्तिवाद करणे हे माणूस असण्याचे प्रमुख लक्षण आहे. पण त्यासाठी त्याची बुद्धी स्वतंत्र, पूर्वग्रह विरहित हवी. मुक्त हवी. श्रद्धेने बरबटलेली नसावी. कशावर श्रद्धा ठेवली की तिथे बुद्धी गहाण पडते. ती स्वतंत्र राहत नाही. मग तर्कबुद्धी कुंठित होते. श्रद्धेला तर्काचे वावडे असते. किंबहुना तर्कबुद्धी जागृत झाली की श्रद्धा गळून पडते. बसलेली श्रद्धा उडून जाते. दहा-बारा हजार वर्षांपूर्वी माणूस रानटी अवस्थेत होता. गुहेत राहात होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. शिकार करणे आणि फळे-कंदमुळे गोळा करणे हे त्याच्या उपजीविकेचे मार्ग होते. त्याकाळी त्याची तर्कबुद्धी विकसित झाली नव्हती. प्राथमिक अवस्थेत होती. विचार करायला वेळच नव्हता. अन्न शोधार्थ सबंध दिवस जात होता. हींस्र श्वापदांची , साप-विंचू अशा विषारी प्राण्यांची सतत भीती होती. त्याकाळीं त्याला श्रद्धेचा आधार वाटला असेल. श्रद्धेमुळे जगणे सुसह्य झाले असेल. पण आतां गतानुगतिक श्रद्धा , धार्मिक कर्मकांडे , इत्यादि सर्व गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. परंपरेच्या नावाखाली आता त्यांना कवटाळून राहणे योग्य नाही. त्यात मानव समाजाचे हित नाही. म्हणून असल्या गोष्टींचा त्याग करायला हवा. त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित आहे. जगप्रसिद्ध निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिन्स श्रद्धेविषयी लिहितात, "एडस्, डेंग्यु, स्वाईन फ्लू, झायका अशा साथीच्या रोगांमुळे मानवजातीवर भविष्यकाळी मोठे संकट कोसळणार आहे." असे भाकीत वर्तविण्याची एक पद्धत सध्या पडली आहे. पण मला वाटते श्रद्धा हा मानव जातीला जडलेला सर्वात भीषण आणि गंभीर रोग आहे. त्याची तुलना पूर्वीच्या देवीच्या साथीशी करता येईल. मात्र श्रद्धारोगनिर्मूलनाचे काम देवीनिर्मूलनाच्या कामापेक्षा अधिक बिकट आहे." *****************************************************************************************

वाचने 46497 वाचनखूण प्रतिक्रिया 79

यनावाला, आपल्या व्यासंगाविषयी आणि प्रखर बुद्धिवादाविषयी आदर दाखवून पुढचे लिहीत आहे. तुमचे लेखन वाचून मला अनेकदा असे वाटत आले आहे की आपल्या लेखाला सामुग्री मिळावी म्हणून तुम्ही (वेड घेऊन पेडगावला गेल्यासारखे करून) कुशंकांची भुते उभी करता आणि नंतर त्यांना उद्ध्वस्त करण्याचा बहाणा बनवता जिथे खड्डयाची मुळातच गरज नव्हती तेथे एक खड्डा खणून नंतर तो बुजवायला तुम्ही बाहेर पडता. हे थोडेसे tilting at the windmills सारखे वाटते. तुमच्या वरील लेखातील दोन उदाहरणे घेऊन हे स्पष्ट करतो. तुमचा आक्षेप गीतेतील ’श्रद्धावॉंल्लभते ज्ञानम्’ ह्या विधानाला आहे आणि श्रद्ध कशी ज्ञानप्राप्तीला अपुरी आहे ह्याचे विवरण पुढील सर्व लेखात आहे. ग्रह सूर्याभोवती फिरतात असल्या प्रकारचे ज्ञान श्रद्धेने मिळत नाही हे तुमचे प्रमुख प्रतिपादन आहे. 'ग्रह सूर्याभोवती फिरतात असल्या प्रकारचे ज्ञान श्रद्धेने मिळत नाही' हे समजण्यासाठी इतक्या खटाटोपाची काय आवश्यकता होती? असले ज्ञान श्रद्धेने मिळते हे गीतेलाहि म्हणायचे नाही पण गीतेची तशी शिकवण आहे अशी स्वतःची सोयीस्कर समजूत करून घेऊन तुम्ही ती पवनचक्की पाडायला सरसावलेले आहात. गीता (आणि अन्य प्राचीन ग्रंथांमध्ये) जेव्हा 'ज्ञान' ही संकल्पना वापरली जाते तेव्हा संदर्भावरून लक्षात येते - यायला हवे - की ते ब्रह्मज्ञान असते. 'चूल कशी पेटवावी आणि चहा कसा करावा' असले भौतिक ज्ञान ते नसते. 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः' हे ते ज्ञान असते आणि गीतेला तेच प्रतिपादन करावयाचे आहे. हेच दर्शविण्यासाठी आदिशंकराचार्यांनी गीताभाष्य हे प्रस्थानत्रयीमधील एक भाष्य लिहिले आहे. हे ज्ञान अर्थातच बुद्धिगम्य नाही, ज्याला पटेल त्याच्यासाठी ते आहे, इतरांसाठी ते नाही अशा अर्थाने ’श्रद्धावॉंल्लभते ज्ञानम्’ हे शब्द समजावून घेतले पाहिजेत. गीतेमध्ये श्रीकृष्णाच्या वचनांना 'श्रीभगवानुवाच' ह्याचे अनाठायी वजन प्राप्त झाले आहे हा तुमचे असलेच एक विधान. तुमच्यासारख्या बुद्धिवाद्याला विचार केल्यास लगेच जाणवेल की भगवद्गीता ही काही युद्धभूमीवर जे काही झाले अथवा बोलले गेले त्याचे शब्दशः reportage नाही आहे. ही घटना घडून गेल्यानंतर काही हजार अथवा शे वर्षे गेल्यानंतर कोणीतरी - वेदव्यास अथवा कोणी अन्य अज्ञात रचयिता - ही रचना गीतेमध्ये घातली आहे. त्याला ही माहिती परंपरेने कळली होती किंवा त्याने संपूर्ण कपोलकल्पित स्वतःची रचना येथे घुसडली हेहि आजच्या घडीला आपणाला माहीत नाही. मात्र हे सहज शक्य दिसते की भारतीय युद्ध आणि गीतेची रचना ह्यांच्यातील दोन अडीच हजार वर्षांच्या काळामध्ये श्रीकृष्णाला देवत्व प्राप्त झाले होते आणि रचयित्याची श्रीकृष्णापायी अशी पूज्यबुद्धि निर्माण झाली होती. परिणामतः रचयित्याने श्रीकृष्णाचा उल्लेख 'भगवान' असा केला. ह्यात तुम्हाआम्हाला न समजण्याजोगे अथवा आक्षेपार्ह काय आहे? तरी पण त्या आक्षेपाची एक नवी पवनचक्की उभी करून तुम्ही ती पाडण्यासाठी सरसावलेले आहात. हा अव्यापारेषू व्यापार कशाला?

In reply to by अरविंद कोल्हटकर

आनन्दा गुरुवार, 01/18/2018 - 00:24
आयला तुम्ही पण, अजून वॉशिंग्टनाची कुऱ्हाड यायचीच आहे. अवांतर हा यनावाला यांचा दोष नाही.. त्यांनी डोळ्यावर अश्रद्धेचा चष्मा लावला असण्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये श्रद्धाच दिसते.. आता वरच्या श्लोकात जितेंद्रिय नावाचा एक शब्द आहे, त्याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलंय.. प्रत्यक्षात संप्रज्ञात किंवा असंप्रतज्ञात समाधी असो, काही अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की समाधी अवस्थेमध्ये मेंदूचे काही भाग अधिक उत्तेजित होतात, आणि त्यामुळे अल्फा (बहुधा) लहरी वाढतात, म्हणजेच ते जे काही सांगितले होते तेव्हा ते अगदीच कुचकामी नव्हते, देवाच्या साक्षात्काराबद्दल माहीत नाही, पण भावातीत ध्यानाचा अभ्यास भौतिक जगात नक्कीच फायदेशीर ठरतोय आणि हा एक अभ्यासाचा विषय देखील आहे. जेव्हा अध्यात्मात श्रद्धा हा शब्द वापरला जातो तेव्हा बऱ्याच वेळेस त्याचा अर्थ विश्वास ठेऊन प्रयत्न करून प्रत्यंतर घ्या असाच असतो, फक्त मी म्हणतो म्हणून मान्य करा असे नसते, आपण अभ्यास करून प्रत्यंतर घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपण मात्र श्रद्धा श्रद्धा म्हणून सरसकट सगळ्यांना झोडपात बसतो. असो, इति लेखनासीमा.

In reply to by अरविंद कोल्हटकर

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/18/2018 - 08:42
श्रद्धा ही यनावालांची पंचिंग बॅग आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. तुम्ही आता यनावालांना नवीन लेखाचा विषय दिलात. ज्ञान कशाला म्हणावे? बाकी आपले विवेचन पटण्यासारखे आहे. गीतेत प्रक्षिप्त भाग असू शकतो तसेच त्याचे अन्वयार्थ हे वेगवेगळ्या विद्वानांनी आपापल्या आकलनानुसार लावले असल्याने सामान्यांचा जरा जास्तच गोंधळ वाढतो.

In reply to by अरविंद कोल्हटकर

यनावाला गुरुवार, 01/18/2018 - 21:28
श्री. अरविंद कोल्हटकर यांचे संस्कृत भाषेचे, विशेषत: व्याकरणाचे, ज्ञान उच्चप्रतीचे आहे. लेखातील दोन श्लोक ,त्यांचा अन्वय आणि मराठी अर्थ यांत काही त्रुटी असती तर ती त्यांनी निदर्शनाला आणून दिलीच असती. पूर्ण अन्वय दिला आहे. तसेच त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठी अर्थही दिला आहे. एकही शब्द अनवधानाने अथवा हेतुत: गाळलेला नाही.

In reply to by यनावाला

यनावालासाहेब, नेहमीप्रमाणेच क्वचितच एखादा प्रतिसाद देण्याचा रिवाज पाळलात आणि ते करतानाही तुम्ही चलाखीने गोलपोस्ट बदलली आहे !!! :) :) :) कोल्हटकरसाहेबांना "त्यांचे संस्कृत भाषेचे व विशेषत: व्याकरणाचे ज्ञान कसे आहे" यासंबंधीचे सर्टिफिकेट तुमच्याकडून अपेक्षित नव्हते. हे तुम्हालाही पूर्णपणे माहित असणारच... कारण, ते तुम्हाला कळले नाही असे म्हणणे म्हणजे तुमच्या बुद्धीमत्तेचा अपमान होईल, जो मी करू इच्छित नाही ! :) मात्र, कोल्हटकरसाहेबांच्या प्रतिसादातील मूळ मुद्द्याला तुम्ही चलाखीने बगल दिलीत असे तुम्हाला वाटत असल्यास, तो तुमचा भ्रम असेल... कारण, (तसे कोणी स्पष्ट लिहिले, न लिहिले तरी) अशी चलाखी ओळखण्यात मिपाकर लै हुश्शार आहेत असा पूर्वानुभव आहे ! =)) तरीही, तुम्हाला संशयाचा फायदा देऊन, कोल्हटकरसाहेबांचा तो मूळ मुद्दा खाली परत देत आहे... तुमचे लेखन वाचून मला अनेकदा असे वाटत आले आहे की आपल्या लेखाला सामुग्री मिळावी म्हणून तुम्ही (वेड घेऊन पेडगावला गेल्यासारखे करून) कुशंकांची भुते उभी करता आणि नंतर त्यांना उद्ध्वस्त करण्याचा बहाणा बनवता जिथे खड्डयाची मुळातच गरज नव्हती तेथे एक खड्डा खणून नंतर तो बुजवायला तुम्ही बाहेर पडता. हे थोडेसे tilting at the windmills सारखे वाटते. याबाबत तुमचे अमुल्य मत काय आहे ? मलाही तुमचे मत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. :)

गामा पैलवान गुरुवार, 01/18/2018 - 00:12
यनावाला, श्रत् म्हणजे ऐकलेलं धा म्हणजे धारण करायची शक्ती. म्हणूनंच श्रद्धा म्हणजे ऐकलेलं धारण करायची मनाची क्षमता. इथे चिकित्सा नाकारण्याचा प्रश्नंच आला कुठे? उगीच काहीतरी विपरीत अर्थ काढीत बसू नका. श्रद्धा ठेवणे म्हणजे चिकित्सक बुद्धीस फाटा देणे नव्हे. तुम्ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे ज्ञान वैज्ञानिकांनी प्राप्त करवून दिलं म्हणता. पण ही कल्पना अगोदर कोपर्निकसच्या मनांत यायला हवी. मग त्याने ती श्रद्धापूर्वक जोपासायला हवी. मग त्यातून त्याला निरीक्षणे काय करावीत हे ताडता आलं. अशी निरीक्षणे करून वा जुन्या निरीक्षणांचा आधार घेऊन त्याने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे गृहीतक मांडलं. मुळात श्रद्धा नसती तर गृहीतक मांडता आलं असतं का? आ.न., -गा.पै. जाताजाता : भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हाला? ज्याच्याकडे भग असतो तो भगवान. भग = यश + श्री + ऐश्वर्य + वीर्य +ज्ञान + वैराग्य या सहांचा संगम.

In reply to by गामा पैलवान

आनन्दा गुरुवार, 01/18/2018 - 00:28
अध्याय 6 आइका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य। हे साही गुणवर्य, वसती जेथ ॥ ३७ ॥ म्हणोनि तो भगवंतु, जो निःसंगाचा सांगातु। तो म्हणे पार्था दत्तचित्तु, होई आतां ॥ ३८ ॥

In reply to by गामा पैलवान

राही गुरुवार, 01/18/2018 - 23:02
श्रद्धा याचा अर्थ विश्वास असाच सर्वत्र दिलेला दिसला. पी आय ई मूळ असलेल्या शब्दावरून क्रेडो (लॅटिन), क्रेडन्स, इन्क्रेडिबल असे शब्द आले आहेत. 'C' चा उच्चार स (श) आणि क असा भाषेच्या दोन शाखांमध्ये बदलला आहे हे अनेकांना माहीतच असेल. भगवान विष्णु , भगवान शंकर असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला ईश्वर हाच अर्थ अभिप्रेत असतो. बाकी ठीक.

In reply to by राही

माहितगार Fri, 01/19/2018 - 12:43
श्रद्धा याचा अर्थ विश्वास असाच सर्वत्र...
तांत्रिक दृष्ट्या विश्वास आणि श्रद्धा यात अंशतः फरक आहे, सहसा विश्वास ही श्रद्धेची पहिली पायरी असावी, एखाद्या गोष्टीवर / व्यक्तीवर मी विश्वास ठेवतो म्हणजे श्रद्धे पर्यंत पोहोचलो आहे असे निश्चित सांगता येत नाही. श्रद्धेच्या पायरीला पोहोचलो नसेन तर परिस्थितीनुरुप विश्वास बदलू शकतात, श्रद्धा परिस्थितीनुरूप बदलणे अशक्य नाही पण अवघड असते. विश्वास शब्दाचे श्रद्धेत परिवर्तन होणासाठी निष्ष्ठा, कर्तव्य , भक्तीभाव या तीन पैकी एखादा तरी अ‍ॅट्रीब्यूट कमी अधीक प्रमाणात जरूर असावी. कर्तव्य भाव निष्ठा अथवा श्रद्धा न बदलताही बदलता येऊ शकत असावा. पण मला वाटते निष्ठा सुद्धा परिस्थिती आणि स्वभावानुरुप बदलू शकतात, पण निष्ठा बदलल्या शिवाय श्रद्धा बदलणे कठीण असावे त्यामुळे प्रबोधनकारंनी श्रद्धे विरुद्ध जोर लावण्यावर लक्ष केंद्रीत करण्या पेक्षा बदललेल्या परिस्थितीनुरुप विश्वास आणि कर्तव्य बदलांवर लक्ष केंद्रीत केल्यास त्यांच्या शक्ती आणि वेळेचा अपव्यय कमी व्हावा असे वाटते. असो.

In reply to by माहितगार

राही Fri, 01/19/2018 - 16:21
तेच तर यनावाला सांगताहेत. विश्वास बदला असे तार्किकदृष्ट्या म्हणता येत नाही. कारण विश्वास हा एक भाव आहे. (शब्द भाववाचक आहे.) त्यामुळे विश्वास राखण्याची ठिकाणे बदला असे म्हणता येईल. उदा. आनंद बदला असे म्हणता येत नाही, आनंदमिळवण्याची साधने, ठिकाणे बदला असे म्हणता येते. तद्वत्.

In reply to by राही

माहितगार Fri, 01/19/2018 - 16:50
Difference between Believe and Faith हा दुवा वर दिला आहेच. व्यक्ती आणि समुहाचे विश्वास आणि श्रद्धा काळाच्या ओघात बदलतात. अगदी काही पिढ्यांपुर्वी पिण्याच्या पाण्याची खरेदी विक्री अयोग्य मानली जात होती लोकांचा हा विश्वास काळानुरुप बदलला. मेसाई नावाची देवी महारास्।ट्राची लोक देवता होती हे आज कुणाला सांगून खरे वाटणार नाही एवड्।ई ती देवता विस्मरणात गेली . मार्केटींगचे लोक अभ्यास करुन बिहेवीअरल चेंज करुन घेण्यात अधीक यशस्वी होतात , अ‍ॅडव्होकसी मध्ये गाजावाजा अधिक होतो किमान ती पिढी भूमिका सहसा बदलत नाही पुढच्या पिड्।ई पर्यंत वाट पहावी लागते. त्यामुळे सोशल अ‍ॅडव्होकसी पेक्षा सोशल मार्केटींग ची तंत्रे मला व्यक्तीशः अधिक प्रभावी वाटतात. How Can You Change Somebody's Opinion? हा यूट्ञू आधीच्या प्रतिसादातून शेअर केला होता त्याचा पुन्हा एकदा दुवा.

सतिश गावडे गुरुवार, 01/18/2018 - 10:50
श्रद्धेचे अर्थकारण हा अतिशय रोचक विषय आहे. जाहीरात क्षेत्रातील दिग्गज अंबि परमेश्वरन यांनी लिहीलेले For God's Sake हे पुस्तक वाचण्याजोगे आहे.

SHASHANKPARAB गुरुवार, 01/18/2018 - 12:31
1) या श्लोकांतिल "श्रद्धा" कोणत्या गोष्टिप्रति आहे? म्हणजे हे श्रद्धापुराण कोणत्या सन्दर्भात वापरले आहे? 2) ही देवाप्रति किंवा धर्माप्रति श्रद्धा असावी असे दिसत नाही. तर ज्ञान मिळविण्याच्या मार्गावरिल श्रद्धेसाठि हे श्लोक रचलेत अस मला वाटत. लेखकाचे मत काय? अशुद्धलेखनाबद्धल क्षमस्व

माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 13:15
माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) आहे. तर्कशुद्ध , सुसंगत विचार करणे, युक्तिवाद करणे हे माणूस असण्याचे प्रमुख लक्षण आहे. पण त्यासाठी त्याची बुद्धी स्वतंत्र, पूर्वग्रह विरहित हवी. मुक्त हवी. श्रद्धेने बरबटलेली नसावी. कशावर श्रद्धा ठेवली की तिथे बुद्धी गहाण पडते. ती स्वतंत्र राहत नाही. मग तर्कबुद्धी कुंठित होते. श्रद्धेला तर्काचे वावडे असते. किंबहुना तर्कबुद्धी जागृत झाली की श्रद्धा गळून पडते. बसलेली श्रद्धा उडून जाते.
इथे मुलतः म्हणजे बाय डिफॉल्ट म्हणावयाचे आहे का ? धागा लेखक म्हणतात तसे बाय डिफॉल्ट माणूस तर्कनिष्ठ प्राणी (रॅशनल आनिमल ) असता तर आता पर्यंत मनुष्य प्राणी कुठल्या कुठे पोहोचला असता नाही का ? तर्कसुसंगत असतातच असे नव्हे, पण तरीही श्रद्धावंतही तर्कशास्त्राचा पुरेपूर वापर करताना दिसतात
श्रद्धेमागे कोणताही विचार नसतो. श्रद्धा ठेवण्याच्या अनिवार ओढीमुळे ती अपरिहार्यपणे बसते. अशी श्रद्धा घालविणे महाकर्मकठीण असते. श्रद्धावंत त्याच्या श्रद्धाक्षेत्रांतील विषयांवर विचार करतच नाहीत. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी त्या क्षेत्रात ठप्पच झालेली असते. मात्र श्रद्धाक्षेत्राच्या बाहेरील विषयावर ते व्यवस्थित, तर्कसुसंगत विचार करू शकतात. कारण तिथे त्यांची बुद्धी कार्यप्रवण होते.श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. असते ती गतानुगतिक मेषवृत्ती. "देवावर अनेकजण श्रद्धा ठेवतात. म्हणून मी पण ठेवायला हवी." असे श्रद्धाळू मानतो. सत्य काय आहे हे जाणून घ्यायची ज्याला इच्छाच नसते असा माणूस सहजपणे श्रद्धेचा स्वीकार करतो. नुसते होय म्हणायचे. मान डोलवायची. बुद्धी वापरायची नाही. विचार करायचा नाही. हे सोपे, सुखकर वाटते. डोक्याला काही ताप नाही.
मला वाटते श्रद्धावंतांकडे यासाठी माझ्यापेक्षा चांगली उत्तरे असावित ती त्यांनीच द्यावीत , इथे मी फक्त निर्देश करत आहे.

माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 13:36
जगप्रसिद्ध निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिन्स श्रद्धेविषयी लिहितात, "एडस्, डेंग्यु, स्वाईन फ्लू, झायका अशा साथीच्या रोगांमुळे मानवजातीवर भविष्यकाळी मोठे संकट कोसळणार आहे." असे भाकीत वर्तविण्याची एक पद्धत सध्या पडली आहे. पण मला वाटते श्रद्धा हा मानव जातीला जडलेला सर्वात भीषण आणि गंभीर रोग आहे. त्याची तुलना पूर्वीच्या देवीच्या साथीशी करता येईल. मात्र श्रद्धारोगनिर्मूलनाचे काम देवीनिर्मूलनाच्या कामापेक्षा अधिक बिकट आहे."
आपला तर्क स्विकारला जात नाही म्हणून एखाद्या व्यक्तीस अथवा समुहास आजारी ठरवणे, हा समुहलक्ष्य तर्कदोष आहे ? आस्तिकही नास्तिकांना आजारी ठरवू शकतात ? किंबहूना त्यांना सैतानग्रस्त ठरवले जातेच, आस्तिकांना त्यांच्याच अर्ग्यूमेंटने हरवण्याचा प्रयत्न , अर्ग्यूमेंट जिंकत नाही केवळ परस्पर न संपणारा संघर्ष चालू ठेवतो

माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 13:39
...त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित आहे.
श्रद्धा आणि परंपरांच्या जे चांगल्या बाजू पहातात त्यांना त्यातच त्या व्यक्तीचे , समाजाचे आणि अंतत: देशाचे हित दिसत असेल तर आश्चर्य नाही ना ?

माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 13:48
केवळ वर्तमानता अथवा कालबाह्यता ऑन इटस ओन योग्यायोग्यतेचे निकष होउ शकत नाही.

माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 15:13
टिका करताना सुद्धा यनावाल श्रद्धेच्या काही उजव्या बाजू कबूल करतात असे दिसते. १) श्रद्धेमुळे मनाला बरे वाटते. २) श्रद्धेने मानसिक आधार मिळतो

In reply to by माहितगार

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/18/2018 - 15:23
श्रद्धा=अंधश्रद्धा फरक फक्त एकच पहिला दोन अक्शरी आहे व दुसरा चार अक्षरी आहे अंधश्रद्धेमुळे मनाला बरे वाटते अंधश्रद्धेने मानसिक आधार मिळतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 16:55
श्रद्धा=अंधश्रद्धा फरक फक्त एकच पहिला दोन अक्शरी आहे व दुसरा चार अक्षरी आहे
हेच लॉजिक यनावाला आणि अंधयनावाला या दोन शब्दांना लागू पडतं का? का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 15:50
मनाला बरे वाटते , मानसिक आधार मिळतो. ह्या वस्तूस्थिती बाकी विशेषण आणि प्रवचना पेक्षा अधिक महत्वाच्या वाटतात. विशेषणे सब्जेक्टीव्ह असतात किंवा कसे. भारतातील वैचारीक बहुविधता जपण्यास नेमके कोण कारणी भूत ठरले ? तर्क शास्त्री कि तर्कांना गुंडाळून ठेवणारे कथित अंधश्रद्ध असाही प्रश्न पडतो. आणि बहुविधते साठी मला नुकसानकारक नसलेल्या श्रद्धा अंधश्रद्धाही जोपासाव्या वाटतात.

arunjoshi123 गुरुवार, 01/18/2018 - 15:28
प्रथेप्रमाणे आता यनावाला वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याइतकी बुद्धी मला नाही असं सोपं उत्तर देतील. ------------------------- ते अजून दोन ओळी टाईप करू शकले तर "सहमतांचे आभार" हे देखील लिहितील. -------------------------- तुम्ही लोक त्यांचे लेखन वाचून मग प्रतिसाद लिहित असाल तर आईवडीलांनी लिहायवाचायला शिकवलं ते वाया गेलं असं म्हणेन.

माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 15:42
....धर्मग्रंथात आशा आणि भीती या दोन भावनांचा उपयोग करून धार्मिकांना जखडून टाकलेले असते. श्रद्धांच्या दाव्याला बांधलेले असते. सगळ्याच धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व दिले आहे. गीतेत अश्रद्धाला विनाशाची भीती घातली आहे तर बायबल आणि कुराण या धर्मग्रंथांत अश्रद्धाला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे म्हटले आहे. धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत. त्यांतील सर्व वचने ईश्वराचे बोल आहेत. त्यांच्या सत्यतेविषयी शंका घेणे , त्या विधानांची चिकित्सा करणे, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरावर अविश्वास दाखविणे आहे. म्हणजे एका अर्थी ईश्वराची निंदा करणेच (ब्लासफेमी) आहे. म्हणून या ईश्वर निंदकांना मृत्युदंड द्यावा असे धर्मग्रंथांत आहे. धर्मग्रंथांत श्रद्धेला अवास्तव महत्त्व देऊन अश्रद्धांना मृत्युदंडाच्या शिक्षेची भीती घालण्याचे कारण काय ते उघड आहे. धर्मग्रंथातील वचनांची चिकित्सा केली तर त्यांतील कित्येक वचने खोटी आहेत, बुद्धीला न पटणारी आहेत, असे सहज दिसून येते. ....
जसे श्रद्धेच्या काही सकारात्मक बाजू आहेत, तसे काही मर्यादा असू शकतात . शंकेचे चिमूटभर मीठ आरोग्यकारक असते . आपापल्या श्रद्धा वेळोवेळी तपासून पाहण्यात आणि अयोग्य भाग दूर ठेवण्यात साशंकता आणि सतर्कता साहाय्यक ठरतात . अयोग्य भाग दूर केल्याने श्रद्धेस बळकटी प्राप्त होण्यास मदत होते म्हणून नास्तिकांना दंडित करण्या पेक्षा ते माझ्या शेजारी असतात ते बरे वाटते म्हणून मी तरी इतर विविध विचारांप्रमाणे यनावालां आणि यनावाला भक्तांचे विचार हि वाचत असतो.

यनावाला गुरुवार, 01/18/2018 - 21:23
गीतेत "श्रीकृष्ण उवाच " असे न लिहिता "श्रीभगवानुवाच " असे हेतुत: लिहिले आहे. " हे शब्द प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आले आहेत. अत एव ते सत्यच आहेत. चिकित्सेची आवश्यकताच नाही." असे भाविकांच्या मनावर बिंबविणे हा हेतू आहे. ( इथे भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हांला? असा प्रश्न करणे अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे आहे .) तो हेतू साध्य झाला हे "गीतामाहात्म्या" तील पुढील दोन ओळींवरून दिसून येते: ...."या (गीता) स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनि:सृता । ...ॐपार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयम् ।

In reply to by यनावाला

अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजस तुच आहेस रे यनावाला ! तु इतरंना तसं बोललस कि चालत पण इतरंनी तुला तसं म्हणलं की व्यक्तिगत टीका म्हणुन त्याचे प्रतिसाद संपादित केले जातात !! आता बघु हा प्रतिसादही संपादित होतो का ते !!
गीतेत "श्रीकृष्ण उवाच " असे न लिहिता "श्रीभगवानुवाच " असे हेतुत: लिहिले आहे. " हे शब्द प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आले आहेत. अत एव ते सत्यच आहेत. चिकित्सेची आवश्यकताच नाही
." बाकी श्रध्दाळु भाविकानी भगवद्गीता स्वतः पहावी , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य ही पहावे. बरेचसे साहित्य अ‍ॅनड्रॉईड अ‍ॅप्प्स वर उपलब्ध्द आहे ! स्वःहुन अभ्यास केल्यास कोणाचाही लक्शात येईल की खुद्द अर्जुनानेच कित्येक वेळा चिकित्सा करणारे प्रश्न विचारले आहेत गीतेत. आचार्यांनी , लोकमान्यांनी चिकित्सा केलेली आहे , किंबहुना दोघेही जवळपास विरिध अर्थी निष्कर्शांप्रत पोहचले आहेत ! आचार्यांनंतरच्या इतर चार प्रमुख आचार्यांनी गीतेवर अन्वयार्थ करणारी भाष्ये लिहिली आहेत ! चिकित्सा हवीच ! मग कोणतेही क्शेत्र असो ! जशी विज्ञानात चिकित्सा अहे तशीच अध्यात्मातही आहे ! दासबोधातही कैकवेळा कल्याणास्वामींनी चिकित्सा करणारे प्रश्न विचारले आहेत ! अध्यात्मात तीन प्रकारच्या प्रचीते सांगितल्या अहेत : ग्रंथ प्रचिती , गुरु प्रचीती आणि आत्मप्रचीती ! जे ग्रंथात सांगितले आहे तेच गुरु सांगत आहेत का , आणि तेच स्वतःला नुभवता येत आहे का ही चिकित्सा केलेच पाहिजे ! त्रिविधा प्रचीतीने झालेले ज्ञानच खर्‍या अर्थाने झाले असे म्हणता येईल ! यनावालाचे धागे वंध्यामत्सरासारखे आहेत ! स्वतःला समजत नाही म्हणुन इतरांनाही समजले नाही असा खोलवर गाढ समज घेवुन ते जगत आहेत, त्यांनी स्वतः संपुरण गीता वाचली आहे का नाही ह्या विशयीच शंका अहे ! ज्या प्रमाणे वंध्या स्त्री पुत्रवती स्त्रीचा मत्सर करते तसेच काहीसे ! असो. केवळ एकांगी टिप्पण्णी करणारे , तेही अर्धवट वाचनातुन आलेले लेखन , तेही एका विशिष्ठ समुहाला बावळट ठरवणारे, संपादित होत नाही हे पाहुन हा सारा काही तरी अजेंड्याच्या भाग वाटतो .... म्हणुन इकडे न फिरकलेलेच बरे !! भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥ भाविकांनी दुर्जनांचे । मानू नये काही साचे ॥ होईल तैसे बळ । फजित करावे ते खळ ॥ तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥ || पांडुरंग | पांडुरंग ||

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार Fri, 01/19/2018 - 11:29
भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥ भाविकांनी दुर्जनांचे । मानू नये काही साचे ॥ होईल तैसे बळ । फजित करावे ते खळ ॥ तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥
यनावालांच्या मांडणी पद्धतीत उणीवा असतील -त्या जरूर निर्दर्शनास आणाव्यात- , पण मूळ उद्देश चांगला आहे त्यामुळे खलत्वाची बाधा असल्याचा आक्षेप अवाजवी वाटतो आणि म्हणून त्यांना अगदीच दुर्जनांच्या पंगतीत बसवणे श्रेयस्कर वाटत नाही.
केवळ एकांगी टिप्पण्णी करणारे , तेही अर्धवट वाचनातुन आलेले लेखन , तेही एका विशिष्ठ समुहाला बावळट ठरवणारे, संपादित होत नाही हे पाहुन हा सारा काही तरी अजेंड्याच्या भाग वाटतो .... म्हणुन इकडे न फिरकलेलेच बरे !!
अजेंडा असेल अथवा नसेल , त्यांच्या लेखनात उणीवा असतात पण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि मिपा धोरणांच्या कक्षे बाहेर जात नाहीत तो पर्यंत त्यांचे लेखन संपादीत करण्याची अपेक्षा रास्त नसावी. त्यांच्या विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा सभ्यता बाळगून कठोर टिका करण्याचे स्वातंत्र्य आणि प्रतिवाद इतर अनेक जण करतच आहेत . आपल्या उपरोक्त विचारातून केवळ यनावालांच्या लेखना बद्दल साशंकता व्यक्त होत नाही , इतर सश्रद्ध जे त्यांचा मुद्देसूद प्रतिवाद करताहेत तो यशस्वी होत असल्या बद्दल आपण अविश्वास दाखवल्या सारखे होते किंवा कसे.
तुच आहेस रे ...! तु .... तसं बोललस .....तुला
आपली अध्यात्मावर श्रद्धा असेल आणि आपल्या मनाचा समतोल बिघडत असेल तर त्याने आपण प्राप्त अध्यात्म शिक्षणास अपुरे पणा येतो आणि अध्यात्मा चे अप्रत्यक्ष अपयश सिद्ध होते. त्यामुळे आदरार्थी बहुवचनांचा वापर टाळून एकेरीवर येणे आणि पुढे प्रतिसाद संपादित होतो का पाहू म्हणणे हे अहंकारा कडे नेणारे नाही ना ?

In reply to by माहितगार

arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 13:12
पण मूळ उद्देश चांगला आहे
दुसरे महायुद्ध करण्यात, ज्यू मारण्यात हिटलरचा मूळ उद्देश चांगलाच होता. बिचार्‍याने पलंगावर लोळत, जनानखाने भरत, चेस खेळत अवधच्या नवाबांसारखे जीवन कुठे जगला? ---------------- मूर्ख लोकांना आपले उद्देश चांगलेच वाटतात. असे असले तरी त्यांना जगाच्या भाषेत त्यांची लायकी सांगणे आवश्यक असते. -------------- मागच्या ३-४ धाग्यांवर या माणसाला मी अतिशय प्रेमळ* शब्दांत साधे प्रश्न विचारलेले. याला साधी द्रखल घ्यावीशी वाटली नाही. -------------------- मी स्वतः श्रद्धावान आहे, माझी बायको आहे, आई वडील आहेत, अनेक मित्र नि स्नेही आहेत. या माणसाने कोणताही अपवाद न ठेवता सरसकट सर्व श्रद्धावान निर्बुद्ध, डोके नसले, डोके सडलेले, नॉन्सेन्स, इ इ असतात असे म्हटले. --------------------------- आत्ता इथे जे संवादाची मर्यादा लोकांना शिकवत आहेत, त्यांनी तिथे अगोदर त्या विशेषणांवर आपत्ती घ्यायला पाहिजे होती. असा अचानक एका बाजूचा पुळका टिपिकल पुरोगामी दांभिकता आहे. -------------------------------- एकेरी बोलणं हे "तुझा मेंदू निष्क्रिय आहे" यापेक्षा फार सन्मान्य आहे. यनावाला अर्धेरी वा पावेरी बोलायच्या पात्रतेचे आहेत का प्रश्न आहे. ----------------- मी सध्याला सर्वसाधारणपणे उजव्या बाजूचा विचार करतो. इथे अनेक लोक कडवट डावे आहेत. पण शेवटी ते संवाद करतात. बाजू मांडतात. दखल घेतात. यनावाला हा एकमेव आयडि अत्यंत विक्षिप्त वागतो. अर्थात तो हे सगळं संस्थळाच्या मर्यादांतच करतो, पण संस्थळाच्या मर्यादा हेच सगळं का? स्वतःच्याही काही मर्यादा हव्यात ना?आणि कोल्हटकर बोलले मंजे मला आलेली चीड एवढी अस्थानी नाही. आमच्या जालीय लहानपणापासूनचा अनुभव आहे कि ते विपरित भूमिका आरामात ऐकून घेतात. इथे त्यांनी हेत्वारोप केला आहे हे लक्षणीय आहे. ----------- आणि हाईट मंजे यनावालांनी त्यांना पण मुद्द्याचं काही उत्तर दिलेलं नाही. =================== * पहिल्या २-३ मधे तरी

In reply to by arunjoshi123

माहितगार Fri, 01/19/2018 - 13:36
.....असा अचानक एका बाजूचा पुळका .... ????
आपण माझे सगळे प्रतिसाद नक्की वाचले आहेत का ? मी तर माझी सुरवात यनावालांच्या मांडणीच्या मर्यादा दाखवतच केली आहे आणि त्यांच्या विशेषण वापरावर आधी त्यांचे लक्ष वेधले आहे. आणि नंतर सश्रद्धांना त्यांच्या अध्यात्माची आठवण दिली आहे. त्यामुळे माझ्या लेखनात एकाच बाजूचा पुळका असल्या बद्दल आपल्या साशंकते बाबत आश्चर्य वाटते. एवढेच नाही माझे काही धागे श्रद्धावंतांच्या बाजूने काही पुरोगाम्यांची बाजू समजून घेणारे असतात. त्यामुळे कोणत्याही एका बाजूने एका बाजूचा पुळका असा आक्षेप विस्मयाचा वाटतो !

In reply to by माहितगार

arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 14:09
तुम्हाला उद्देशून नाहीत सर्व वाक्ये वा फ्रेजेस. तुमची भूमिका योग्य आहे, आपापल्या ठिकाणि योग्य आहे, भाषा सयंत आहे. ज्याला अप्लिकेबल आहेच त्यालाच ते उद्दिशिलेलं अभिप्रेत आहे. उतार्‍याच्या संपूर्णतेसाठी ते एकत्र लिहिलं आहे. ==================== त्यांच्या मागच्या ५-६ धाग्यांवर "यनावाला तुम्ही लिहित रहा. असल्या लोकांच्या टिकेकडे लक्ष देऊ नका" असं म्हणणारी एक पुळका लॉबी तयार झाली आहे. या लॉबी मुळे हा मनुष्य "सहमतांचे आभार" मानत धाग्यांचे रतीब टाकत आहे. यामुळं पुरोगामी या टायटलखाली चित्रविचित्र विक्षिप्तपणा खपवून दिला जात आहे. उदा. श्रद्धा न बाळगणं, देव/धर्म न मानणं हे तुमचं संवैधानिक कर्तव्य आहे. आपलं मिसळपाव अशा विचित्र गोष्टी पसरवण्यासाठी नाही. म्हणून पुळका लॉबीला लागू असलेली काही वाक्य आहेत.

In reply to by arunjoshi123

राही Fri, 01/19/2018 - 16:48
काय हरकत आहे? यनावालांची बाजू घेण्यास काय हरकत आहे? त्यात एव्हढे वाईट वाटण्यासारखे (राग येण्यासाराखे) काय आहे? पुळका या शब्दाला सध्याच्या मराठीमध्ये भौतिक हितसंबंधांतून घेतली गेलेली बाजू असा काहीसा अर्थ माझ्या समजुतीप्रमाणे प्राप्त झाला आहे. तेव्हा यनांची बाजू घेण्यात तसे काही इंटरेस्ट्स नाहीत, निव्वळ वैचारिक सहमती आहे इतकेच. आणि कोणीही त्यांची बाजू घेतली नसती तरी ते लेख लिहीतच राहिले असते हे आपल्या ध्यानात आले नाही काय? रतीबच म्हणायचे तर अनेक जण प्रतिसादांचे रतीब टाकतच असतात. कुणावर व्यक्तिगत हल्ले होत नाहीत, आक्रस्ताळेपणा होत नाही आणि असंसदीय शब्द वापरले जात नाहीत तोवर ठीकच आहे की. शिवाय इथे फारच थोडे जण त्यांच्या बाजूने लिहित असतात. इतक्या थोड्या सपोर्टर्समुळे त्यांना बळ येते किंवा येईल असे वाटत नाही. हां, आता त्यांना एकही सपोर्टर मिळू नये अशी तुमची इच्छा असू शकते. ती तुमची इच्छा. त्याला नाइलाज. आणि मिसळपाव हे नुसतं 'आपलं' नाही, तर 'आपल्या सर्वांचं' आहे. एरवी आपल्या प्रतिसादावर लिहिले नसते. पण 'तुम्ही लिहीत राहा' असे मीच मागील एका लेखात लिहिले होते. तेव्हा रोख माझ्याकडे आहे असे रास्तरीत्या समजून प्रतिसाद दिला आहे.

In reply to by राही

arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 17:32
राही, यनावालांची वा कोणाचीही बाजू घ्यायला माझं काही म्हणणं नाही. पण "जे लोक तुमचे विरोधक आहेत त्यांना इग्नोरून आपले जिवितकार्य असेच चालू द्या" असे (मंजे अशा अर्थाचे) प्रतिसाद होते मागच्या ३-४ धाग्यांवर. आमची काय वैयक्तिक दुश्मनी आहे का त्यांचेशी? तुमची वैचारिक सहमती तसा काहींचा वैचारिक विरोध! (स्वतः मी तर विरोध पण करत नाही. फक्त प्रश्न विचारतो. निट उत्तर दिलं तर आमचीही सहमती होते. (बरेच विरोधक वाकड्यात जातात. नीट भाषा वापरत नाहीत. अनेक जण अशांना इग्नोरतात. यनावाला ग्रॉसली "असहमतांना" इग्नोरतात. प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. मागच्या धाग्यावर त्यांनी कोणाकोणाचे आभार मानले ते पहा.)). =============================== राही, मी अधिकारांबद्दल बोलत नाहीये. यनावाला कोणाला उत्तर द्यायला बांधिल नाहीत वा कोणी कोणाची बाजू घ्यावी यावर कोणाची बंधनं नाहीत. प्रश्न औचित्याचा आहे. केवळ मांडलेले विचार पुरोगामी आहेत इज नॉट रिजन इनफ फॉर जस्टिफिकेशन.
शिवाय इथे फारच थोडे जण त्यांच्या बाजूने लिहित असतात.
मागच्या ३-४ धाग्यांवर एकदम विपरित अनुभव आहे. त्यांचं इतकं मोराल बुस्टिंग झालंय कि आता ते कितीही धागे पाडू शकतात. या धाग्यावर सीन पलटला आहे हे मान्य.
एरवी आपल्या प्रतिसादावर लिहिले नसते. पण 'तुम्ही लिहीत राहा' असे मीच मागील एका लेखात लिहिले होते. तेव्हा रोख माझ्याकडे आहे असे रास्तरीत्या समजून प्रतिसाद दिला आहे.
रोख तुमच्यावर तर आहेच पण मूलतः अनेक अन्य मान्यवर आहेत त्यांच्यावर जास्त आहे. लिहित रहा म्हणणं वेगळं, पण "यांना इग्नोरुन" आपला रथ दौडावत राहा असं सुस्पष्ट म्हणणारे माझं खरं लक्ष्य आहे. त्यात गोची अशी आहे कि उत्तरे द्याच असं मी म्हणू शकत नाही, मला उत्तरे द्याच असं म्हणू शकत नाही. त्यामुळे यनावाला फार शहाणे आणि आम्ही अदखलपात्र मूर्ख असा सीन झाला होता. म्हटलं आपण खरोखरच मूर्ख असू, वा आपले मुद्दे अस्थानी असतील, वा त्यांच्या क्षेत्रातले नसतील वा आपली भाषा फार उसकावणारी असेल, तेव्हा जे संयमित/ सयंत भाषेत प्रतिवाद इ करताहेत त्यांना लिहा म्हटलं, तर ते ही नाही. असं १-२ धाग्यावर झाल्यावर मला असं जाणवलं कि पुळका लॉबीचा समाचार घेणं आवश्यक आहे. =================== त्यांनी कितीही रॅडिकल विचार मांडावेत, कितिही टिका करावी. मात्र माझ्यासारख्या निष्पाप, निरागस, सच्च्या, इ इ "श्रद्धावंत लोकांचा" थेट अपमान करू नये. केला तर किमान आमची लायकी तीच कशी होती हे नीट समजावून सांगावे. बुद्धाप्रमाणे गप्प बसू नये.
एरवी आपल्या प्रतिसादावर लिहिले नसते.
तुमचं ओरियंटेशन काही का असेना, तुम्ही जब्बाबदार सदस्य म्हणून इच्छा नसताना देखील मला लिहिलंत. तेच यनावालांनी करावं.

In reply to by arunjoshi123

राही Fri, 01/19/2018 - 18:03
विरोधाला तोंड देऊन, नच जमल्यास दुर्लक्ष्य करून आपल्या (विवेकाने ठरवलेल्या) ईप्सिताकडे जावे हेच तर जीवनाचे साध्य असते ना? शिवाय अगदी'इग्नोअर' असेच काही नाही, 'एन्ड्युअर' सुद्धा असते. 'If you can not resist then endure' हे तर सुप्रसिद्ध आहे.

In reply to by माहितगार

नमस्कार माहीतगार ! आपण चिकित्सा करीत आहात म्हणुन प्रतिसाद देत आहे, इरव्ही यनाच्या धाग्तावर वेळ घाल्वण्यात अर्थ नस्तो हे फार पुर्वीच लक्शात आले आहे !
पण मूळ उद्देश चांगला आहे
चांगला उद्देश ? आर यु किडिंग मी ? यनाच्या लेखांचा एकमेव उद्देश म्हणजे इतरंवर टीका करणे बस्स !! ते ही स्वतःच्या अर्धवट अभ्यासातुन आलेल्या अर्धवट समजाच्या आधारावर !! यना अभ्यासपुर्वक चिकित्सा करत असते तर भारीच वाटले असते ! पण मुळ उद्देशच इतरांवर टीका करणे हा असल्याने अभ्यास नसला तरी चालते , नुसत हेका पुरेसा असतो ! हे आधीही कैकवेळा लक्शात आल्याने त्यांच्या लेखनावर बोलणेच बंद केले आहे ! इथेहे बोलणार नव्हतो पण आधी संपादकांनी वैयक्तिक टीका म्हणुन माझे प्रतिसाद संपादित केले होते , आज खुद्द महामहीम यना च च इतरांना असंजस असमजुतदार अन काय काय अशी विशेशणे वापरत असल्याने प्रतिसाद द्याय्चहा मोह आवरला नाही ! यना ला म्हणावं उगाचच अर्धवट संदर्भ देण्या आधी गीता नीट वाचुन ये , तुझे मुद्दे नीट संदर्भासकट मांड , मग पुढे बोलु !
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
परत तेच ते ! हा मुद्दा आधी कैकवेळा चर्चिला गेला अहे , यना ला कोणी सक्ती केली आहे का सश्रध्द होण्याची ? व्हायचे असल्यास हो , नसेल व्हायचे नको होवु ! आम्हाल काय फरक पडतो ! आता अम्ही कैकदा मंदिरात जातो तेव्हा आमचे नास्तिक मित्र बाहेर उभे नास्तिक, राहु दे बापडे , आम्ही त्यांना अग्रहाने ओढुन मंदिरात नेणार नाही , आणि मंदिरात जातो म्हणुन ते आम्हाल हिणवत नाहीत ! ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात ! उगाचच मंदिरात जातो म्हणुन ते हिणवायला लागले तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाहीत त्याल आतातायी पणा म्हणतात ! आम्ही मटणभाकरी फॅन आहोत , पण आम्चहे मित्र शुध्द शाकाहारी आहेत ! आम्ही त्यांना हिणवत नाही अन ते आम्हाल हिणव्त नाहीत ! ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात ! एकदा जोरदार वाद विवाद झाल्यावर ते शाकाहारी मित्र म्हणाले की असेलही शरीराला प्रोटीनची गरज पण मी नॉनव्हेज खाणार नाही म्हणजे नाहीच ! त्यानंतर त्यांना कोणी परत नॉनव्हेज चे महत्व पटवुन द्यायचा प्रयत्नही केलेला आठवत नाही. ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्रय म्हणतात !
आदरार्थी बहुवचन
आदर नसेलच तर खोटा आदर का दाखवावा ?
पुढे प्रतिसाद संपादित होतो का पाहू म्हणणे हे अहंकारा कडे नेणारे नाही ना ?
प्रतिसाद संपादित होत नाहीये हे पाहुन आश्चर्यच वाटले ! अजुनही वाटतच आहे ! मधे तर सगळा सावळा गोंधळच चालु होता , यना ने यावे टपली मारुन जावे असे चालले होते , अन यना ला टपली मारली की प्रतिसाद संपादित ! ह्या असल्या वन साईडेड गेम ला काय अर्थय ? ! मिपा पुर्वपदावर आले असेल तर परत अ‍ॅक्टीव्ह व्हायला हवे :) असो. सोडा ! यना वर वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही ! ह्या निमित्ताने आठवले काही अभंग टाईप करतो आणि ईथुन काढता पाय घेतो ! आपण आपला अभ्यास करु ! उध्दरेत आत्मना आत्मानम ! बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥ आंधळ्यासी जन अवघेचि आंधळे | आपणासि डोळे दृष्टी नाही || रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न | तोंडासी कारण चवी नाही | तुका म्हणे शुध्द नाही जो आपण | तया त्रिभुवन अवघे खोटे || छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥ येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥ नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥ तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥३॥

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार Sat, 01/20/2018 - 11:43
नमस्कार, प्राजंळपणे सांगायचे तर पहिल्या वाचनात आपला प्रतिसाद आवडला. सोबतच प्रसंगी मीही आपल्या किंवा इतर कुणी सर्वसाधारण प्रमाणे व्यक्त होतो तसा व्यक्त होतो तेव्हा मला इतर कुणाला काही सांगण्याचा नैतिक अधिकार पोहचतो का असा प्रश्न हि पडून गेला . पण मग आपणच एकमेकांना सावरण्यास मदत करणार नाही तर कोण करणार , नाही का ?
आदर नसेलच तर खोटा आदर का दाखवावा ?
आपला हा दृष्टिकोन प्रथम दर्शनी पटतो. पण पब्लिक डिस्कोर्स मध्ये काही अडचणी येतात. पहिले व्यक्ती/ समूह आणि विचार किंवा वागणे या दोनची गल्लत होता राहाते . आदर व्यक्तीस दाखवायचा असतो विचार किंवा कृतीला नव्हे . युद्धात अर्जुन भीष्म किंवा द्रोणाचार्यास नमस्कार करतो नंतर युद्धही करतो . समोरच्या व्यक्तीनेही गल्लत केली असेल तर तसेच प्रत्युत्तर देण्याचा मोह होतो - इथे दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात समोरचा घसरला म्हणून आपणही घसरण्यात शहाणपण नसते (-हे सांगणे सोपे तेवढे मलाही वळणे अवघड हे मान्यच- पण मुख्य मुद्दा एकूण चर्चा रुळावरून घसरल्याने प्रतिपक्षाचा मूळ मुद्दा खोडण्याचे राहून जाते. ) उलटपक्षी आपण ना घसरता समोरचा घसरला हे दाखवून देण्याने पॉइंट अधिक व्यवस्थित स्कोअर होतो. दुसरे एकेरी उल्लेखाने आपल्याही नकळत एका पाठोपाठ अपशब्दांचा लांबण वाढण्याची शक्यता असते ती आदरार्थी बहुवचनाने टळते . प्रतिपक्षातील व्यक्तीत आपल्याला अद्याप माहीत नसलेले काही चांगले गूण असू शकतात असा विचार केला कि आदरार्थी बहू वचन वापरण्यात आपले मन अडथळा आणत नाही. ज्या गोष्टी पटल्या नाही त्यावर टीका करण्यास आपण मुक्त असतोच . यनांच्या सर्व चुका मान्य केल्या तरी त्यांना (दुर्जनतेची व्याख्या सब्जेक्टिव्ह आहे हे मान्य करूनही ) दुर्जनांच्या पंक्तीत कितपत बसवता येते या बद्दल साशंकता अद्यापही वाटते . मांडणी पद्धती आणि दुराग्रह वर आधीच्या धाग्यातील प्रतिसादातून मीही वेळोवेळी टीका केली आहेच नाही असे नाही . पण समाजातील अहितकारक अंधश्रद्धा दूर व्हाव्यात प्रबोधन व्हावे या मूळ हेतुत काही गैर नाही . म्हणून मूळ उद्देश चांगला आहे असे म्हटले आहे. प्रतिपक्षां च्या स्ट्रेंथ आपण आपल्याकडे करून घेतल्या कि प्रति पक्षाचे एडव्हान्टेज कमी होते हे इथे लक्षात घ्यावे . यना ने यावे टपली मारुन जावे असे चालले होते असे काही होत नाही, त्यांच्या लेखनाने असुरक्षित वाटण्यासारखे काही नसावे . मिपावर आणि मिपा बाहेर बहुमत श्रद्धावंतांचे आहे. सोशल एडव्होकसी आणि सोशल मार्केटिंग मधला फरक मी या धागा चर्चेत इतरत्र दिला आहे . यना सोशल एडव्होकसी वाले आहेत, सोशल एडव्होकसीवाल्यांचा गाजावाजा असतो तेवढा प्रभाव पडत नसतो. यनांनी किती हातपाय मारले तरी आणि नजीकाच्य काळात काय मोठा फरक ते पाडू शकणार नाहीत श्रद्धासोबत माणसाच्या निष्ठा जोडलेल्या असतात आणि निष्ठा बदलून घेणे हातचा खेळ नसतो, सर्वसाधारणपणे निष्ठा बदलण्या पूर्वी लोक फार गोष्टी तपासतात त्यामुळेच यनांच्या लेखावर सगळे मिळून एवढा किस पाडतात. संत तुकारामांच्या बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ आंधळ्यासी जन अवघेचि आंधळे | आपणासि डोळे दृष्टी नाही || रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न | तोंडासी कारण चवी नाही | तुका म्हणे शुध्द नाही जो आपण | तया त्रिभुवन अवघे खोटे || या ओळी आवडल्या अर्थात नेमके काय लटिकें आहे हा केस टू केस अभ्यासाचा विषय आहे. छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥ येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥ हे ठीक आहे -पण छळ असेल तरच सर्वच टीका छळ असतात असेही म्हणता येत नाही. कुणाच्या मतीला भ्रष्ट म्हणण्यासही अभ्यासूनी तेवढी हरकत नसावी . संत महोदयाबद्दल आदर करूनही “नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥” हे मात्र पटले नाही. एखाद्या वक्तीस हरिकथा न आवडण्याचे खापर त्याच्या मातेच्या सेक्स्च्युअल चॉईस वर का फोडावे ? स्त्री पुरुषांच्या सेक्स्च्युअल चॉईस वरुन तसेही का हिणवावे ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयक आपल्या मतां बद्दल अगदीच छिद्रान्वेषण केल्यास अंशतः: काही वेगळे मत देता येऊ शकेल पण हा धागा मुळात त्या बद्दल नाही, तरीही छिद्रान्वेषण सोडल्यास बहुतांशाने अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दलच्या आपल्या मताचा आदर वाटला. मनमोकळ्या चर्चेसाठी आभार

In reply to by प्रसाद गोडबोले

राही Fri, 01/19/2018 - 12:37
प्रतिसाद आवडला नाही. सुरुवातीच्या एकेरी संबोधनातून जो तुच्छतेचा टोन दिसतोय तोही आवडला नाही. अर्थात खुद्द यनावालांना काहीच फरक पडणार नाही म्हणा. त्यांना सवय आहे. इथे या अशा तर्‍हेच्या (विज्ञान-अध्यात्म-श्रद्धा वगैरेवर चर्चा असणार्‍या) धाग्यांवर प्रतिसाद देणार्‍या बहुतेकांना गीता, ज्ञानेश्वरी, गीतारहस्य वगैरे माहीत असते आणि बहुतेकांनी ते वाचलेलेही असते. आणि या लेखातील प्रतिपादनाच्या विरुद्ध मते असणारे श्रद्धाळू तर हे सर्व वाचीतच असणार असा अंदाज. तेव्हा हे सर्व वाचा असे या धाग्यावरील श्रद्धाळू आणि अश्रद्धाळू या दोघांनाही सांगणे म्हणजे 'वृथा दीपो दिवाsपि च' असे आहे.

In reply to by राही

arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 13:34
राही, संवाद करायचा अधिकार फक्त सर्वपठित लोकांनाचा आहे का? आम्ही ज्ञानेश्वरी वाचली नसली तरी पसायदान वाचलं आहे, त्यांचे अभंग आणि गाणि ऐकलीत, स्टोर्‍या ऐकल्यात आणि एवढं मोप झालं. इथे श्रद्धेच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍या यनावालांना विज्ञानाचं व देखील माहित नाही. ----------------------- मिसळपाव वाचकांच्या आवडत्या विषयांवरील चर्च्चांसाठी आहे. सहमतांचे आभार नि चिकित्सकांच्या बुद्धीची हेटाळणी करायची जागा नाही. मिसळपाव मी असं पाहिलं आहे लेखकाच्या निष्ठांची, अभ्यासाची, बुद्धीची, लॉजिकची, व्याकरणाची, आशयाची, इ इ प्रतिसादक व्यवस्थित, कडक हजेरी घेतात, मजा उडवतात. मग या यनावालाचा फार बाऊ करण्यात अर्थ नाही. हा पुरोगामी मते मांडतो पण आहे टोटली गंडलेला (जिवन मोहिते कथा वा मोकलाया टाइप). ------------------------- हा मनुष्य वाईट दर्जाची वैयक्तिक टिका करतो म्हणून फार सन्मानाच्या पात्र वाटत नाही. फक्त भूमिका पुरोगामी आहे म्हणून आपण त्याच्या बाजूने उतरू नकात.

In reply to by प्रसाद गोडबोले

arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 13:55
तु इतरंना तसं बोललस कि चालत पण इतरंनी तुला तसं म्हणलं की व्यक्तिगत टीका म्हणुन त्याचे प्रतिसाद संपादित केले जातात !!
एकतर सर्वच एकेरी संबोधने असावीत वा सर्वच सन्मानजनक असावीत. फक्त काही सदस्यांना एकेरी संबोधू नये असं का? निर्बुद्धपणे पुरोगामी भूमिका मांडली तर माणूस सन्मान्य थोडाच होतो? ======================= लक्षात घ्या, कि अनुभवाने मी या धाग्यावर विषयावर काही बोलतच नाहीये. कारण त्याचा काही फायदाच नाही. कोल्हटकरांनी विषयाला धरून प्रश्न केलेले आहेत, अर्थ काढलेत, प्रतिसाद दिला, मुद्दे काढले. उत्तर काय - मी म्हणतो ते बरोबर आहे. अरे, याला काही अर्थ? ============================ पुरोगामी लोकांना बुद्धिमंत मानायची प्रथा असली तरी ते बर्‍यापैकी बिनडोक असतात असा माझा अनुभव आहे. अर्थातच हा बिनडोकपणा ९९% वेळेस हार्मलेस असतो, शुद्ध भावनेने असतो आणि काही काही लोकांना तो क्यूटपणे* शोभतो. पण यांच्या केसमधे हार्मलेस शब्द लागू नाही कारण हे श्रद्धावान लोकांचा अपमान करत असतात. वास्तविक यांनी प्रबोधन करून आम्हाला अश्रद्ध बनवले तर हरकत नाही. पण आज आम्ही ज्या प्रकारचे लोक त्यांचा आज अपमान करणे मंजे आमचाच अपमान आहे. ------------------------- * काही व्यक्ति रागावल्यावर अधिक चांगल्या दिसतात, इ तसे.

In reply to by यनावाला

arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 16:47
चिकित्सेची आवश्यकताच नाही." असे भाविकांच्या मनावर बिंबविणे हा हेतू आहे.
हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही त्या लेखकाच्या मनात काय होतं हे इतकं खात्रीपूर्वक कसं सांगू शकता? ======================== आता आम्ही जेव्हा फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, पुस्तके, पेपर, इंटरनेट, इ इ वाचतो तेव्हा अनेक ठिकाणी आम्हाला असे आईन्स्टाईनने सांगीतले आहे म्हणून काही भंकस आणि भिकार वाक्ये सांगीतली जातात. https://www.brainyquote.com/authors/albert_einstein यातली अनेक अत्यंत मेडिऑकर आणि भिकारचोट आहेतच, पण सांगणारास आईंस्टाननं सांगीतलंय, चिकित्सा करू नका असं अभिप्रेत होतं हे मला तुमच्यासारख्या खात्रीनं म्हणता येणार नाही. ========================= तुमच्या वाक्यांची आम्ही इतकी चिकित्सा करतो तेव्हा तुम्ही आमची चिकित्सा हेतुपुरस्सर आहे इ इ मानता. अर्थात यानं तुमचा चष्मा (शब्दसौजन्य - अंतरा आनंद) कसला आहे हे स्पष्ट कळतं. ============================= आपण स्वतः चिकित्सेच्या पलिकडचे आहात असा अनुभव आहे. पण आपल्यासारखे विचार "थेट" कोणी आपणावू नयेत म्हणून हा विरोधाचा शब्दप्रपंच.

यनावाला गुरुवार, 01/18/2018 - 21:38
गीतेत "श्रीकृष्ण उवाच " असे न लिहिता "श्रीभगवानुवाच " असे हेतुत: लिहिले आहे. " हे शब्द प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आले आहेत. अत एव ते सत्यच आहेत. चिकित्सेची आवश्यकताच नाही." असे भाविकांच्या मनावर बिंबविणे हा हेतू आहे. ( इथे भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हांला? असा प्रश्न करणे अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे आहे .) तो हेतू साध्य झाला हे "गीतामाहात्म्या" तील पुढील दोन ओळींवरून दिसून येते: ...."या (गीता) स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनि:सृता । ...ॐपार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयम् ।

In reply to by यनावाला

माहितगार गुरुवार, 01/18/2018 - 22:35
( इथे भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हांला? असा प्रश्न करणे अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे आहे .)
कुणालाही अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे ठरवण्याची घाई का असावी ( तसे गा. पै . नी नुसता प्रश्न केला नाही त्यांना पटणारा तर्क त्यांनी दिला आहे त्याचे खंडन करण्याची जबाबदारी यनावालाजी आपली बनते.) त्या एवजी आपण अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे या शेलक्या विशेषणांचा आधार घेऊन आपण व्यक्तीलक्ष्य तर्कदोषाचा आधार घेत आहात. याच तर्क दोषांचा आधार घेऊन सश्रद्ध नास्तिकांना अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे अशीच शेलकी विशेषणे वापरत असतातच . त्यांच्यात आणि तुमच्यात मग फरक तो काय राहीला ?

ट्रेड मार्क गुरुवार, 01/18/2018 - 22:24
इतके टोकाचे अश्रद्ध असूनही तुम्ही गीता आणि इतर ग्रंथ वाचून वेळ वाया घालवत आहात. जाताजाता हे मात्र नमूद करू इच्छितो की कुठल्याही पुस्तकाचे आकलन हे वाचणाऱ्याच्या बुद्धीवर, ज्ञानावर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. एकच पुस्तक वेगवेगळ्या वेळी वाचले तर त्यातला अर्थ/ विचार यांचे वेगळे आकलन होते.

गामा पैलवान Fri, 01/19/2018 - 02:27
यनावाला,
इथे भगवान म्हणजे परमेश्वर हे कोणी सांगितलं तुम्हांला? असा प्रश्न करणे अज्ञानमूलक, बालिश आणि असमंजसपणाचे आहे .
छे छे! हा प्रश्न मी विचारला तो भगवान या शब्दाची चिकित्सा तुम्ही केलीये का हे विचारण्याच्या हेतूने. तुम्ही ती केलेली दिसंत नाही. पण काही हरकत नाही. पूर्वी काही जणांनी केलीये. विष्णुपुराणानुमते भगवान म्हणजे यश + श्री + ऐश्वर्य + वीर्य +ज्ञान + वैराग्य या सहांचा संगम. आ.न., -गा.पै.

प्रचेतस Fri, 01/19/2018 - 12:54
यनावालांचा मार्ग शाम मानव/श्रीराम लागूंप्रमाणे आहे (श्रद्धेवर थेट प्रहार करणारा), त्यांनी दाभोलकरांसारखा मध्यममार्ग स्वीकारला तर त्यांचे समर्थन करणारे जास्त सदस्य येथे दिसावेत. मिपावर मात्र सश्रद्ध आस्तिक खूपच जास्त संख्येने असल्याने यनावाल्यांच्या कडव्या विचारांना त्यापेक्षाही अधिक कडवा प्रतिवाद होताना दिसतोय. ह्या धाग्यावरील अरविंद कोल्हटकर, माहितगार, राही ह्यांचे संतुलित प्रतिसाद अतिशय आवडले.

In reply to by प्रचेतस

माहितगार Fri, 01/19/2018 - 13:25
श्रीराम लागू , श्याम मानव (लागूंना वृत्तमाध्यमातून तर श्याम मानवांना महाविद्यालयत प्रत्यक्ष बोलताना पाहिले आहे) आणि यनावाला (इथे मिपावर ) दाभोळकरां ची प्रसिद्धी वृत्तमाध्यमांमुळे माहिती झाली पण बाकी त्यांच्या साहित्य आणि भाषणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा फारसा योग आला नाही. या तिघांमध्ये श्रीराम लागू आपल्याच घरातला एखादा व्यक्ती कुटूंब सदस्य 'मी इश्वराला मानत नाही ' असे निक्षून सांगतो तसा अनुभव येतो. आपण घरातल्या / परिचयातल्या नास्तिकांना विनासायास सामावून घेत असतो. यनावाला टाईप नास्तिक्यापेक्षा आपल्या आचरणातून श्रद्धा अभ्यासावयास लावणार्‍या आपल्या ओळखीच्या व्यक्ती जास्त इफेक्टीव असाव्यात असे वाटते. या चर्चेवरुन माझे एक शिक्षक आठवले. भानामतीवर विश्वास असलेल्या काळात हे शिक्षक महोदय सकाळी प्रभात फेरीस निघत वापस येताना, भानामतीसाठी रस्त्यावर जागोजागी पसरलेले नारळ लिंबू मिरची ( रस्ता स्वच्छ करुन ठेवलेले असत) हे शिक्षक महोदय वेचून आणून घरी छानशी चटणी करत असा त्यांचा वर्षोंवर्षांचा नित्य क्रम त्यांचे विद्यार्थी जवळून पहात ऐकत आणि अंधश्रद्धा निर्मूलन विषयक वेगळे लेक्चर देण्याची गरज रहात्त नसे. श्याम मानवांच्या कार्यक्रमांना नेमक्या अंधश्रद्धा , विज्ञानाच्या प्रयोगशाळेत प्रयोग केल्या प्रमाणे विशीष्ट प्रयोग करुन कशा चुकीच्या आहेत हे दाखवणार्‍या प्रयोगांची जोड होती. का कोणजाणे , यनावाला अश्रद्धांच्या वेगळ्या कँपात बसून वैचारीक वार करतात ज्यात केवळ वैचारीक पोलरायझेशन होते जो तो आपापल्या विचारांना अधिक चिटकतो असे वाटत रहाते हे माझे व्यक्तीगत मत इतराम्चें वेगळे असू शकते. असो.

यनावाला Fri, 01/19/2018 - 13:49
राही लिहितात,
"श्रद्धा याचा अर्थ विश्वास असाच सर्वत्र दिलेला दिसला."
नेहमीच्या बोलण्यात आपण विश्वास-श्रद्धा-निष्ठा हे तीन शब्द सर्वसाधारणपणे समानार्थी वापरतो. पण या तीन शब्दांचे अर्थ भिन्न भिन्न आहेत. एखाद्या विषयावर चर्चा करताना प्रत्येक शब्द त्याच्या विशिष्ट् अर्थाने वापरणे आवश्यक असते. जी गोष्ट खरी नाही, तिचा त्याग करणे आवश्यक आहे, हे बुद्धीला कळते पण भावनेला ती सोडवत नाही. अशी गोष्ट भावनेच्या प्रभावामुळे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. थोडक्यात म्हणजे जिची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला कोणत्याही प्रकारे पटत नाही, पटविता येत नाही ती गोष्ट पूर्वग्रहांमुळे,शब्दप्रामाण्यामुळे केवळ भावनेच्या आधारे खरी मानण्याची तर्कविहीन मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय. "देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. बुद्धीला पटत नसता केवळ भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे. विश्वासाचा संबंध बुद्धीशी आहे. तर श्रद्धेचा संबंध मनोभावनेशी आहे.

In reply to by यनावाला

arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 14:15
पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे.
त्या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी जे बिंदू, रेषा नि प्रतले वापरली जातात ती असत्य, श्रद्धेच्या क्षेत्रातली, वास्तवात नसलेली, खोटारडी, केवळ संकल्पनात्मक, निसर्गात नसलेली, इ इ आहेत. असे असतानाही तुम्हाला का बरे हा प्रमेय बुद्धिगम्य वाटतो?

In reply to by यनावाला

माहितगार Fri, 01/19/2018 - 14:45
प्रतिसादाच्या पहिल्या परिच्छेदात ' म्हणजे ‘ हा शब्द दोनदा वापरला गेला असला तरी त्यातून ' श्रद्धा ' संकल्पनेची निष्पक्ष व्याख्या पुढे येत नाही. केवळ यनावाला त्यांना व्यक्तिशः जाणवणारी काही वैशिष्ठ्य सब्जेक्टिव्हली मांडत आहेत असे वाटते. श्रद्धा शब्दाची निष्पक्ष व्याख्या इतर मिपा सदस्यांनी व्यवस्थित अभ्यासून यानावालांच्या निदर्शनास आणण्याची आवश्यकता असावी.
..."देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ?
बेसिकली श्रद्धेच्या काही अयोग्य प्रयोजनांमुळे यनावाला श्रद्धेच्य प्रयोजनाबद्दल साशंक झाले आहेत. श्रद्धेची काही प्रयोजने अयोग्य ठरणे म्हणजे सर्व प्रयोजने अयोग्य असा सरसकट निर्ण यास येताना यनावाला दिसतात आणि इतरांनीही आपल्या सरसकट करणात सहभागी व्हावे असा त्यांचा अत्याग्रह स्पष्ट होत राहातो. देवावरच्या श्रद्धेचे प्रयोजना बद्दल इतर सश्रद्ध लोक उत्तरे देतील . मी माझे लक्ष श्रद्धेच्य इतर प्रयोजनां बद्दल अधिक अभ्यास करून लिहिण्याची आवश्यकता असावी पण तरीही मी तिकडे लक्ष केंद्रित करतो. केवळ भक्ती हा श्रद्धेचा एकमेव कॉम्पोनंट नाही निष्ठा आणि कर्तव्य हि दोन कॉम्पोनंट सोबतीस असतात आणि त्यांना आपले स्वतंत्र प्रयोजन असते जे श्रद्धावंत अधिक चांगल्या पद्धतीने राबवताना दिसतात म्हणून श्रद्धेस वेगळे प्रयोजन प्राप्त होते. राजस्थानातील काळवीट एका समूहांच्य श्रद्धेचा म्हणून निष्ठेचा म्हणून त्याची हत्या करू नये हे एक कर्तव्य झाले . समजा हि श्रद्धा नसलेले चार सिने कलाकार विशिष्ट काळवीट प्राणी दुर्मिळतेमुळे संरक्षित आहे संरक्षित प्राण्यांची हत्या करू नये कायदा मोडू नये या वर विश्वास आहे तरीही संवेदना हरवलेल्या मौजेच्य क्षणी काळवीट मारतात तेच श्रद्धा असलेले लोक काळवीट मारणे टाळतात एवढेच नाही श्रद्धा नसलेले लोक पैसे घेऊन कोर्टात खोटी साक्ष देण्याची शक्यता अधिक असू शकेल पण श्रद्धा असलेले पैसे घेऊन कोर्टात खोटी साक्ष देण्याची शक्यता नसेलच असे नाही पण अशी शक्यता कमी असेल असे मानण्यास जागा उरते . आणि म्हणून श्राद्धेच्य प्रयोजनाचे हे एक उदाहरण झाले. भारतात काही वनांचे संरक्षण देवराईच्य स्वरूपात आपसूकच झालेले दिसते ते केवळ स्थानिकांचा श्रद्धा मुळे . श्रद्धांची विविध प्रयोजनांबद्दल अधिक अभ्यास करून लिहिणे रोचक ठरू शकेल असे वाटते.

In reply to by यनावाला

राही Fri, 01/19/2018 - 14:50
खरे आहे. माहीतगारांच्या प्रतिसादावर तसे लिहायचेच होते. इंग्लिशमध्ये फेथ, बिलीफ, ट्रस्ट असे भिन्न छटा असणारे थोडेफार समानार्थी शब्द आहेत. मराठीत त्यासाठी स्पष्टीकरणाची वाक्ये लिहावी लागतात. भारतीय हिंदू मानसिकतेत श्रद्धा ही केवळ विश्वास, ट्रस्ट, फेथ न राहाता त्यात पावित्र्य आणि धार्मिकतासुद्धा मिसळलेली असते. त्यामुळे श्रद्धा आणि अश्रद्धा यांचा लढा हा शेवटी धर्म आणि अधर्म, मंगल आणि अमंगल असा (आपण म्हणता त्याप्रमाणे भावनेच्या पातळीवर) येऊन पोचतो. मग अश्रद्ध म्हणजे अधार्मिक, अहिंदू या निष्कर्षावरही काही लोक येऊन ठेपतात. खरेतर याला लढा म्हणूच नये कारण इथे तलवारींचा खणखणाट, रणदुंदुभींचा नभ व्यापणारा स्फुरणध्वनी अपेक्षित नसतो. इथे फक्त एका विचारधारेचा शाब्दिक विरोध असतो. आभासी माध्यमांत इतर काही साक्षात असे शक्य नसते. पण विरोध हा प्रखरच असावा, अशी अपेक्षा आणि समजूत असते. आणि प्रखर वाक्यांमुळे वीरश्री संचारते. असो.

In reply to by यनावाला

माहितगार Fri, 01/19/2018 - 15:21
विश्वासाचा संबंध बुद्धीशी आहे. तर श्रद्धेचा संबंध मनोभावनेशी आहे. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. बुद्धीला पटत नसता केवळ भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे. हे सरळ सरळ माहित असताना बुद्धीने बुद्धीशी चर्चा करण्यावर जोर देण्या एवजी भाव्नांशी टाळता येण्यजोगा पंगा घेऊन भावनांवर लक्ष का केंद्रीत आपल्या मुख्य उद्दीष्टापासून दूर तर जात नाहीत ना अशी शंका वाटते. वस्तुतः "बुद्धीला पटत नसता केवळ भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे." हि व्याख्याच स्ब्जेक्टीव्ह गृहीत धरणारी आणि म्हणून परिपुर्ण नाही. बुद्धीला पटणार्‍या गोस्।टींवरही मी भावनेच्या आधारे श्रद्धा ठेऊ शकतोच की. बुद्धीला पटणे हे सुद्धा सब्जेक्टीव्ह आहे. बेसिकली श्रद्धा = विश्वास + निष्ठा + भक्ती ( + कर्तव्य ) अशी तात्पुरती व्याख्या केली तर; श्रद्धावंतांना यनावाला विश्वास ठेवा, पण निष्ठा आणि कर्तव्या सोबतच भावना पासून दूर जाण्यास सांगत आहेत . सुज्ञ व्यक्तीस एकवेळ भावने पासून सांभाळून राहता येते, पण निष्ठा आणि कर्तव्य बदलताना , तडजोड करताना कोणतीही सुज्ञ व्यक्ती तुमच्या प्रपोझिशनचा कार्यकारण भाव तर्क सुसंगतता हजार वेळा तपासून पहाणार नाही का ? तुमच्या प्रपोझिशनचा कार्यकारण भाव आणि तर्क सुसंगतता तपासू इच्छिणाऱ्या प्रत्येकावर भावनेच्य आहारी गेला असे चुकीचे वर्गीकरण इतरांना नव्हे तुम्हाला स्वतः:लाच फसवत असते किंवा कसे. त्यामुळे आपल्या विचारांना रॅशनल असल्याचे स्व समर्थनार्थ प्रमाणपत्र इतरांनी कबूल करावे असे वाटतं असेल तर, विविध लॉजिकल फॉलसी खासकरून व्यक्ती आणि समूह लक्ष्य तर्कदोष यनावाला आणि इतर प्रबोधन करू इच्छितांनी टाळावे , तर्क सुसंगतते बद्दल असलेल्या शंकांना उत्तरे देणे जरुरी असावे असे वाटतें .

In reply to by माहितगार

राही Fri, 01/19/2018 - 17:54
निष्ठा म्हणजे लॉयल्टी. यात थोडीशी दास्यत्वाची छटा येते. दास्य हे नवविधा भक्तिसाधनांपैकी एक साधन आहेच. आपल्याकडे जाणवते की श्रद्धेला भक्तीची डूब दिसते. आता अगदीच अवांतर : प्रेम, मोह, माया यांना विकारांमध्ये गणले गेले आहे. हे 'विकार' आहेत. विकारी म्हणजे बदल होण्याजोगे, अस्थिर. (आपल्या सगळ्यांना विकारी अविकारी शब्द माहीतच असतात.) माणसाचे उन्नयन म्हणजे हे भावनात्मक विकार दूर करून सद् असद्विवेकबुद्धी जागृत होणे. 'रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन्' अशा स्वाधीन अंतःकरणाच्या पुरुषाला समाधान प्राप्त होते..(राग म्हणजे प्रीती) वगैरे. (अशी अनेक वचने गीतेत आहेत. कित्येक विरुद्धार्थीसुद्धा आहेत. 'त्रैगुण्यविषया वेदा:, निस्त्रैगुण्यो भवार्जुन' असेही आहे. अनेक मार्ग वर्णिले आहेत. ज्याच्या मानसिकतेला जे प्रिय ते घ्यावे. तसेच अनेकांनी अनेक प्रकारे गीतेचा अर्थ सांगितला आहे. पण शेवटी विषयांमध्ये वाहावून न जाता विवेक जागृत करणे, बुद्धी स्थिर करणे, विवेकबुद्धीने निर्णय घेणे हे गीतेत सर्वत्र आहे. या अवस्थेला कसे पोचावे याचे अनेक मार्ग आहेत. सगळेच तीप्रत पोचतील असे नाही. किंबहुना नाहीच पोचत/ पोचणार. पण किमान ते उद्दिष्ट तरी असावे असा गीतेचा अर्थ मला जाणवला.

In reply to by राही

आनन्दा Fri, 01/19/2018 - 19:46
मी एक उदाहरण देतो... डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते. काही लोक ही अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांची हेटाळणी करत होते.. त्यातील काही श्रद्धावान लोकांनी त्या हायपोथीसिस वरून काही प्रयोग केले, आणि अनुभव घेतला, त्यावरून त्यांना ही खात्री झाली की हा हायपोथॅसिस खरा आहे, त्यानंतर निर्माण झाला तो विश्वास.. आईनस्टाईन बोललोय म्हणजे खरेच असणार ही श्रद्धा, आणि प्रयोगाअंती बसलेला तो विश्वास.. अध्यात्मात पण साधारण असेच आहे.. तुम्ही अगोदर श्रद्धा ठेवता, मग प्रयोग करून, प्रयत्न करून अनुभव घेता, आणि मग तुम्ही हळूहळू विश्वास आणि निष्ठा या पायऱ्या चढत जाता. दुर्दैवाने हा अत्यंत वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याच्या प्रत्ययाची हमी देणे शक्य आहे पण आणि नाही पण, त्यामुळे हा सगळा वाद होतो.

In reply to by यनावाला

arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 16:31
जी गोष्ट खरी नाही, तिचा त्याग करणे आवश्यक आहे,
का? सत्यतेचा नि त्याज्यतेचा संबंध काय? ब्रह्मांडात जे जे काय असत्य आहे ते ते सर्व केवळ सजीवांच्या चेतासंस्थेत आहे. सजीवांच्या चेतासंस्था वगळून विश्वाची कल्पना केली तर त्यात सर्व काही विशुद्ध सत्य आहे. मग म्हणून काय सर्व सजीवांनी आपली डोकी त्यागली पाहिजेत का? --------------------- अर्थव्यवस्थेत एखाद्या गोष्टीला (उदा. एक किलो आंबे) मूल्य असते, ते मोजता येते, त्याला अंकांत मांडता येते, त्याची अन्य गोष्टीशी (उदा. पेरु) तुलना करता येते, हे नसलेले पण मानलेले मूल्य दुसर्‍या नसलेल्याही आणि न मानलेल्याही गोष्टीने (उदा. पैसे) हस्तांतरित करता येते, इ इ ही सगळी असत्ये नाहीत तर काय? यनावाला आंब्याच्या पोटात हात घालून त्याचे मूल्य वा किंमत आम्हाला दाखवू शकतात का? इतक्या सगळ्या प्रकारच्या खोटारडेपणांचे एकमेकांवर मुकुट असताना आपण अर्थव्यवस्था मानतो ना? यनावाला पगार घेतातच ना? ------------------------ यनावाला, मनुष्यांनी मानायच्या गोष्टी सोडून (उदा. माझं नाव अरुण आहे.) जगात एकही केवल सत्य सिद्ध झालेलं नाही. प्रत्यक्ष केवल सत्य असोच, जगात केवल सत्य सिद्ध करायची फ्रेमवर्क देखील अजून प्रस्थापित झालेलं नाही. ------------------- तुम्ही कोणतेही शब्द उचलता नि लोकांना मूर्ख मानायला चालू करता.

यनावाला जेव्हा इतरांच्या श्रद्धेची चिकित्सा करतात त्यावेळी त्यांच्या श्रद्धा जशा दुखावल्या जातात तसेच इतर जेव्हा यनावालांच्या अश्रद्धेची चिकित्सा करतात तेव्हा त्यांच्याही अश्रद्धा दुखावल्या जातात. असे होणे स्वाभाविक आहे. पण यातून एक वैचारिक घुसळण होते हे नाकारता येत नाही.

ओरायन Fri, 01/19/2018 - 16:11
यनावाला ,आपण नक्कीच चांगला प्रयत्न करत आहात..आपले मत मांडण्याचा..पण सर्व बुद्धिने समजायला पाहिजे हा अट्टहास चुकीचा वाटतो. अति तिथे माती ही म्हण इथेपण लागु पडते. जसे बुवा, माता करत दांभिक भोंदुच्या मागे फिरतांना बुद्धि गहाण ठेवणे जेवढे चुकीचे, तेवढेच मानवी बुद्धि ला ज्याचे आकलन होते, तेच व तेच खरे मानणे व त्यापलिकडे न बघणे हे पण तेवढेच चुकीचे... तुमचे म्हणणे, बुद्धीला पटत नसता केवळ भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे. हे बरोबरच आहे. कारण श्रद्धा व तत्संबधीच्या गोष्टी ह्या बुद्धिच्या परिघात मुळीच येत नाहीत.. संभाव्य चांगल्या गोष्टी होण्यासाठी , मनाची ऐकाग्रता साधण्यासाठी, चिकित्सा टाळून, तरीही डोळसपणे केलेली गोष्ट म्हणजे श्रद्धा होय . हेच जर डोळसपणाने नाही केली तर ती अंधविश्वास ठरेल. डोळसपणे म्हणजे डोळे उघडे ठेवून.. काँमन सेन्स वापरून..तिथे बुद्धि ने फार चिकित्सा अपेक्षित नाही.

सर्वसाक्षी Fri, 01/19/2018 - 16:14
मा. यनावालासाहेब आपण व्यासंगी विद्वान आहात, ज्ञानीआहात. आपण करत आहात ते कार्य महान आहे. मात्र आपण श्रद्धा या प्रकारात केवळ माणसानं ईश्वरावर ठेवलेली श्रद्धा यावरच सातत्याने प्रहार करताना दिसता. समाजात अनेक घातक श्रद्धा आहेत. आपण त्यावर कधी प्रहार करणार? - अमुक पोषक द्रव्य दिल्याने मुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवते - अमुक एक मिठ खाल्ल्याने मुल जिल्हाधिकारी होते - नवर्‍याचा सदरा अमुक साबणाने धुतल्यास नवर्‍याचे वरिष्ठ त्याला परदेशी पाठवतात - अमुक मद्य प्राशन केल्याने अपरिचित मुली आपल्याशी प्रेमाने वागतात व मैत्री वाढवतात - अमुक सौंदर्यप्रसाधनाने काळ्या कुरुप मुली अल्पमोलात अल्पावधीत सुंदर व गोर्‍यापान होतात अशा अनेक श्रद्धा आजकाल बोकाळलेल्या दिसतात. देवावरची श्रद्धा निदान संस्काराने वा अनुकरणाने आलेली असते. वरील उल्लेखित श्रद्धा या अब्जावधी रुपये मिळवण्यासाठी कोट्यावधी रुपये ओतून रुजविल्या जात आहेत. या विरुद्ध प्रबोधन केल्यास समाजाचे व अर्थातच राष्ट्राचे भले होईल.

In reply to by सर्वसाक्षी

राही Fri, 01/19/2018 - 18:23
अनेक श्रद्धा असतात हे म्हणणे योग्य आहे. पण त्या सर्वांशी एकाच वेळी एकाच माणसाने लढा द्यावा ही अपेक्षा व्यवहार्य नाही. काहीतरी चांगले करू इच्छिणारी पण सामान्य अशी माणसे कुठले तरी एक जीवितकार्य मानतात आणि त्यातच आयुष्य वेचतात. तेच प्रॅक्टिकल असते कारण मनुष्याची ताकद कमी असते. सगळीकडे एकाच वेळी भिडण्याइतकी नसते. आणि या आपण उल्लेखिलेल्या श्रद्धां /प्रथांविरुद्ध लढणारीही अनेक माणसे आहेतच. पण आपली उदाहरणे ही व्यावसायिक जाहिरातीतील आहेत. हे दावे खोटे आहेत असे वाटल्यास त्याविरुद्ध योग्य अथॉरिटीकडे धाव घेता येते.काही लोक ते करतातही आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे काही दावे मागेही घ्यावे लागले आहेत. आमच्याइथे एक सद्गृहस्थ गळ्यामध्ये एक मोठा सादेचार फुटी फलक अडकवून गर्दीच्या ठिकाणी उभे राहात. त्या फलकावर वाटेल तिथे थुंकू नका असा संदेश आणि अशा थुंकण्याचे दुष्परिणाम तीन भाषांत लिहिलेले असत. लोक त्यांचीही टवाळी करीत. राष्ट्रहित अनेक मार्गांनी साधता येते. मी माझ्या घरातील वीजपाण्याचा वापर मर्यादित राखला तरीही राष्ट्रहित साधल्यासारखे होईल. विवेकबुद्धीने वागल्यानेही राष्ट्रहित साधेल. किंबहुना वीजपाण्याच्या बाबतीत मी विवेकाने वागतो असेही होईल.

In reply to by सर्वसाक्षी

वरील उदाहरणांना श्रद्धा म्हणणे मला पटत नाही. अतिशयोक्ति अलंकार हा जाहिरातींमधे आपले उत्पादनाची प्रभावी प्रतिमा लोकांमधे निर्माण करण्यासाठी,सर्वश्रुत करण्यासाठी व सर्वदूर पोहोचवण्यासाठी वापरतात. कित्येक म्हणी वाक्यप्रयोग यात अतिशयक्ती असतेच ना? कविता साहित्य यात आपल्या भावनोत्कटता व्यक्त करण्यासाठी हा प्रतिभालंकार आहे. आज मै उपर आसमा नीचे अस कधी असत काय? पण ती भावना चित्रित करणारे सुंदर गाण आपल्याला भावतच ना? या ज्योतिषाच काय करायच? मधे मी शुक्रतारा च उदाहरण दिले आहे.

arunjoshi123 Fri, 01/19/2018 - 17:49
ग्रह सूर्याभोवती फिरतात हे ज्ञान त्यांना या श्रद्धेने प्राप्त झाले नाही.
ग्रह सूर्याभोवती फिरतात ही एक श्रद्धाच आहे. काय कसे (वा कशाभोवती) फिरत आहे हे कळायला पाहणाराने ब्रह्मांडातल्या एका स्थिर जागी बसून फिरणार्‍या गोष्टींकडे पाहिले पाहिजे. अब्सॉल्यूट स्पेसमधल्या कोणत्याही एका बिंदूला पुन्हा कसं जायचं याचं गणित अजून सुटायचं आहे.

In reply to by arunjoshi123

आनन्दा Fri, 01/19/2018 - 19:53
असंच नाही काही.. ज्याअर्थी मंगळाची सूर्याभोवती फिरण्याची गणिते करून आपले मंगळयान तिथपर्यंत पोचले त्याअर्थी हे सिद्ध झालेले आहे असे मानण्यास हरकत नसावी

यनावाला Fri, 01/19/2018 - 21:34
राही लिहितात,
"इंग्लिशमध्ये फेथ, बिलीफ, ट्रस्ट असे भिन्न (अर्थ) छटा असणारे थोडेफार समानार्थी शब्द आहेत.
हो. त्यांतील फेथ म्हणजे श्रद्धा तर बिलीफ म्हणजे विश्वास असे अर्थ ग्राह्य आहेत. सुप्रसिद्ध अमेरिकन निरीश्वरवादी सॅम हॅरीस लिखित : End of faith (एण्ड ऑफ् फेथ ) हे गाजलेले पुस्तक आहे. २/ तुम्ही दुसर्‍या एका प्रतिसादात निष्ठा शब्दाविषयी लिहिले आहे. श्रद्धेचा संबंध व्यक्तीच्या मनोभावनांशी आहे. विश्वास शब्दाचा बौद्धिक विचारांशी तर निष्ठेचा संबंथ आचरणाशी आहे. "अ" ची जर योगासनांवर निष्ठा असेल तर "अ" ने नियमितपणे योगासने केली पाहिजेत. "निष्ठा आचरणे कळे ।" असे म्हटले आहे.

In reply to by यनावाला

arunjoshi123 Sat, 01/20/2018 - 12:50
आपण समानार्थी शब्द सोडवणे बाजूला ठेऊ. ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धा आवश्यक तर नाहीच पण निश्चितपणे अडथळा असते असं आपलं प्रतिपादन. तुमच्या विद्यमान लेखाचं सार. त्यात तुमचं ज्ञानाचं उदाहरण! तुम्ही कोणता ग्रह कोणत्या तार्‍या भोवती फिरताना पाहिलात? किती चकरा पाहिल्या? सतत पाहिल्या? का मधे मधे जेवायला इ उठत होतात? कोणत्या वेधशाळेत पाहिला? भोवती म्हणजे काय? एका अर्थानं तुम्ही तुमच्या घरात शतपावली करत असलात तरी तुम्ही माझ्याभोवती फिरत आहात असं मी म्हणू शकतो. तसे हायपराबोला प्लॉट करता येतील. श्रद्धा न ठेवता तुम्हाला झालेल्या ज्ञानाची मला उलटतपासणी घ्यायची आहे. जे फिरत आहे तो एक ग्रह आहे हे कसं ठरवलंत? वा ज्या भोवती फिरत आहे हे तारा आहे हे कसं ठरवलंत? ग्रह म्हणजे काय? तारा म्हणजे काय? ती जी गती होती ती कोणत्या प्रकारची होती? किती होती? ते मागे असेच फिरत होते हे इतक्या ठामपणे कशावरून सांगता? "फिरतात" म्हणजे भविष्यातही फिरणार. कशावरून? ते कशामुळे असे फिरतात? एकाजागी निवांत का नाही थांबत? असला मूर्खपणा करण्याऐवजी हे सारे तारे व ग्रह विश्वाच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हीटीकडे का नाही जात नियमाप्रमाणे? मूळात हे आलेच कुठून? कधी? कशामुळे? कशाला? कृष्णाने वा भगवानाने वा परमात्माने वा त्यांच्या नावाने आपला मूर्खपणा खपवणाराने वा अजून कोणी जसे श्रद्धाळू लोकांना श्रद्धा मोड मधे तथाकथित ज्ञान देऊन फसवले आहे तसं ग्रह तार्‍याच्या गोष्टी सांगणारांनी तुम्हाला फसवलं नाही कशावरून? ===================== ज्ञानप्राप्तीचं उदाहरण देताना अर्धवट नि काहिही देऊ नये, थोडं वाचून इ इ द्यावं. मूळात ग्रहांची सूर्याभोवती जी गती आहे ती तुच्छ नि नगण्य आहे. ते खरे सूर्य जिकडे चालला आहे मंजे आपल्या ध्रुवीय अक्षाच्या दिशेने जात असतात. नि वास्तवात ही सगळी असेंब्ली आकाशगंगेच्या एकूण दिशेने अजून जास्त वेगाने जात आहे. आपले विश्व उकळत्या पाण्यातला एक बुडबुडा मानला तरी असे अनंत बुडबुडे क्षणोक्षण उत्पन्न होत आहेत (असे म्हणतात.). शिवाय स्पेसटाईम कुठे इतका वाकडा असू शकतो कि ताराच ग्रहाभोवती फिरत असू शकतो. असं असायला काही बॅन नाही. ====================== आता तुम्ही म्हणाल कि या सगळ्याचं नि माझ्या महान प्रमेयाचं काय देणंघेणं. यनावाला, प्रत्येकाला असा वरकरणी उथळ विचार करून झेंडा गाडायला आवडत नाही. काही लोक सकल, संपूर्ण, सुसंगत, समाधानकारक निदान करू इच्छितात. तुम्ही तुमच्या ज्ञानाचं कोणतंही पिस घ्या, त्याच्यावर इतके अनुत्तरित प्रश्न निघतात कि काढलेल्लं अनुमान चूक असायची शक्यता उरतेच. अंततः मनुष्यास सत्य प्रस्थापित करता येतेच का वा मूळात सत्य असे काही असतेच का असे विक्षिप्त प्रश्न उभे राहतात. अस्तित्वाचे, ज्ञानांचे, सत्यांचे इतके विरोधाभार विश्वात असले तरी व्यवहारातलं जीवन आपण मज्जेत जगत असतो. तुम्ही ज्याला ज्ञान म्हणता ते "सायंटिफिक मेथड" नावाच्या पद्धतीने विकसित केलेले आहे. मुद्दा असा आहे: १. आपण जी विधाने करता त्यांचा नि सायंटिफिक मेथडचा काहीही संबंध नसतो. एक बेसिक विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी आपण आपले प्रमेय या प्रद्धतीने मांडले पाहिजेत. २. अगदी या पद्धतीनं सिद्ध झालेल्या विधानाच्या सत्यतेचे पण पॅरामीटर असतात नि काही लिमिटींग स्टेटमेंट्स असतात. ३. या पद्धतीच्याच काही मर्यादा असतात. ======================== हा किंवा असे प्रतिसाद व्यक्तिशः यनावालांसाठी नाहीत. पण नास्तिकतेकडे कललेल्या लोकांसाठी आहेत. जनमानसात ईश्वर, धर्म यांच्या ज्या धारणा आहेत त्या पाहून त्या खोट्या वाटून नास्तिक बनणे इथे नास्तिकता संपत नाही. अशा व्यक्तिनं आपलं असं विश्वकारणाचं तत्त्वज्ञान विकसित केलं पाहिजे नि आपली निरिक्षणं या तत्त्वज्ञानात बसतात का हे पाहिलं पाहिजे. नैतर मग जगात तुमचे कंसेप्ट क्लिअर करायला खूप मंडळी बसली आहेत. श्रद्धेचे तत्त्वज्ञान सांगायला यनावाला आहेत. देशाचे तत्त्वज्ञान सांगायला नक्षल आहेत. कुटुंबांचं तत्त्वज्ञान सांगायला स्त्रीवादी आहेत. मूल्यांचं तत्त्वज्ञान सांगायला अभिव्यक्तिवादी आहेत. लिबरल आहेत. घटनावादी अधिकारवादी आहेत. भांडवलवादी आहेत. लिस्ट अनएंडिंग आहे.

यनावाला Sat, 01/20/2018 - 20:38
श्रद्धेची व्याख्या : जे विधान, जे तत्त्व, जो निसर्गनियम, जी संकल्पना, जी गोष्ट : १) पंच ज्ञानेंद्रियांतील एकाही इंद्रियाने प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. अथवा २) जिच्या कथित गुणधर्मांचा कोणताही प्रत्यय येत नाही, अथवा ३) जी वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध करता येत नाही, अथवा ४) जी खरी असण्याची शक्यता अनुभवाने, कॉमनसेन्सने, किंवा तर्कसंगत युक्तिवादाने दाखविता येत नाही, अथवा ५) जिचे सत्यत्व मानवाच्या अधिकृत ज्ञानसंग्रहातील तत्त्वांच्या आधारे सिद्ध करता येत नाही, थोडक्यात म्हणजे जिची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला कोणत्याही प्रकारे पटत नाही, पटविता येत नाही. ते तत्त्व, ती संकल्पना, ती गोष्ट पूर्वग्रहामुळे/शब्दप्रामाण्यामुळे केवळ भावनेच्या आधारे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय. ...यनावाला

In reply to by यनावाला

गामा पैलवान Sun, 01/21/2018 - 04:40
यनावाला, मानवी मन खरं मानावं की खोटं? मनाचं अस्तित्व वरीलपैकी कोणत्याही अटींत बसंत नाही. मानवी मनाच्या उदाहरणाने समाधान झालं नसेल तर स्वप्न खरं की खोटं ते ठरवून पहा. मला पडलेलं स्वप्न वरीलपैकी कोणत्याही चाचणीने सत्य वा असत्य ठेरवता येत नाही. मग मला काल रात्री स्वप्न पडलं आणि आज सकाळी ते लख्खं आठवतं ही श्रद्धा मानावी की अंधश्रद्धा? आ.न., -गा.पै.

In reply to by यनावाला

माहितगार Sun, 01/21/2018 - 09:39
यना कृत तथा कथित व्याख्या मुलतः टिका आणि टिका ज्यात निष्कर्ष आधीच ठरवले आणि टिकेचे मुद्दे तेवढे शोधले सकारात्मक मुद्द्यांवर पाणी सोडले त्या मांडणीस ना परीपूर्णतेचा प्रयास होत ना समतोल येत ना व्याख्येच्या दर्जास प्राप्त होत. एकांगी पुर्वग्रहीत टिकेस व्याख्येचा दर्जा मिळू शकत नाही

मूकवाचक Sat, 01/20/2018 - 21:01
मी अलीकडेच विख्यात संतूरवादक पं शिवकुमार शर्मांची एक मुलाखत ऐकली. पंडितजींचे वय आता ८० असेल. ते सांगत होते की कित्येक वेळा संतूर उचलून मांडीवर ठेवणे आणि तिच्या तारांचा स्वरमेळ साधणे अत्यंत कर्मकठीण वाटावे इतकी त्यांची प्रकृती कधीकधी खालावते. पण कार्यक्रम सादर करताना त्यांना असा अनुभव येतो की एखादी 'दैवी शक्ती ' त्यांच्याकडून काही काम करून घेत आहे. त्या प्रभावाखाली ते तास दोन तास अत्यंत दर्जेदार वादन सादर करतात. तो प्रभाव ओसरला की पुन्हा वाद्य उचलणे जड जावे अशा स्थितीत परत जातात. वानगीदाखल हे एक उदाहरण दिले. तात्पर्य असे की टोकाची सश्रद्ध/ आस्तिक असलेली किंवा उघडपणे काहीशा अंधश्रद्धेकडे झुकलेली माणसे क्रीडा, संगीत, चित्रकला ते किरकोळ आकडेमोड लागणारे दैनंदिन व्यवहार ते मूलभूत विज्ञानातील अत्यंत क्लिष्ट समजल्या जाणार्‍या संशोधन क्षेत्रापर्यंत सगळ्याच क्षेत्रात लीलया संचार करताना, यशस्वी होताना आणि भरीव कार्य करताना दिसतात. त्यांच्या चिकीत्सा करण्याच्या, विश्लेषण करण्याच्या, सतत नवनवीन प्रयोग करण्याच्या किंवा आपल्या कार्यक्षेत्रात सतत काहीतरी शिकत राहण्याच्या क्षमतेत काडीमात्र उणीव येत नाही. क्रीडाक्षेत्रासारख्या अत्यंत बेभरवशाच्या आणि कमालीच्या स्पर्धात्मक क्षेत्रात सातत्य टिकवण्यासाठी आणि मनोबळ वाढवण्यासाठी श्रद्धाच कामी येते. कलेच्या प्रांतात अत्यंत आवश्यक असलेल्या सृजनशीलतेला, उत्कट भावदर्शनाला तर श्रद्धेच्या आणि भक्तीच्या पाठबळावरच बहर येतो. तळहातावर शिर घेउन निघालेल्या सैनिकालाही 'हर हर महादेव' ही गर्जनाच प्रेरणा देते. कधी काळी हाडाची काडे झालेल्या माउलीला आपल्या कुटुंबासाठी दळण दळण्याचे कष्टप्रद काम करतानाही 'जात्यावरच्या ओव्याच' पाठबळ देत असत. भारतात किती टक्के बायका जात्यावर दळण दळतात, दरवर्षी किती सैनिक धारातीर्थी पडतात किंवा किती कलाकारांना पद्म पुरस्कार मिळतात यांचा 'विदा' वाचून त्यापासून या सामान्यातल्या असामान्य माणसांना कुठलीच प्रेरणा मिळताना दिसत नाही. थोडक्यात 'भाव तेथे देव' इतकेच नसून भाव तेथेच मानवी जीवनातले सारे सत्य, शिव आणि सुंदर प्रकट होते असे म्हणावे लागेल. निव्वळ डॅटॉलने हात धुवून स्वच्छतेची काळजी घेणे वेगळे आणि त्यापलीकडे जाउन धूप दीप लावून, रांगोळी घातलेल्या पानावर जेवायला बसताना मांगल्य आणि पावित्र्य अनुभवणे वेगळे. असो. सश्रद्ध माणसे अत्युच्च बौद्धिक आणि तार्किक क्षमता अनिवार्य असलेल्या क्षेत्रात लीलया वावरू शकतात. वेदांतात व्यावहारिक, प्रातिभासिक आणि अध्यात्मिक सत्य असे म्हणतात ती संकल्पना कळत नकळत त्यांना उमगून जाते. त्यानुसार आवश्यक तेथे तर्क, चिकित्सा, विश्लेषण इत्यादिंचा वापर करून व्यावहारिक जीवन सफल करतानाच गुरूप्रचिती, आत्मप्रचिती वगैरे 'सब्जेक्टिव्ह' प्रचितीच्या गोष्टींना थोतांड न ठरवता आपापल्या रूचीनुसार, परंपरेनुसार किंवा प्रचितीनुसार एखाद्या सत्पुरूषावर श्रद्धा ठेवत आणि नित्यनेमाने ध्यान/ उपासना वगैरे करत जीवन अधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतात. उलट श्रद्धेचा तिरस्कार करणार्‍या आणि चिकीत्सेला फाजील महत्व देणार्‍यांना इहवाद्यांना त्यांनी बांधलेल्या काल्पनिक भिंतीपलीकडल्या भावविश्वाबद्दल काडीमात्रही प्रचिती नसते, अनुभव नसतो. त्यामुळे अशा लोकांनी श्रद्धेच्या बुरख्याआडून होणारी बुवाबाजी, फसवणूक, शोषण अशा अपप्रकारांबद्दल टीका करणे अगदी सयुक्तिक असले तरी सरसकट श्रद्धानिर्मूलनाचे त्यांचे प्रयत्न मात्र सत्य, शिव आणि सौंदर्याचेच निर्मूलन ठरत असल्याने माझ्यासारख्या सामान्य माणसाला एकांगी, अतिरेकी आणि दुर्दैवी वाटतात इतकेच. बाकी श्रद्धानिर्मूलनालाच कुणी आपल्या जीवनाचे ध्येय मानत असेल तर 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' या उक्तीप्रमाणे समाजात काही प्रमाणात अशा व्यक्ती आणि त्यांचे अनुमोदक असणे साहजिकच आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांचा बुवाबाजी आणि शोषणापासून सामान्यजनांना सावध करण्यासाठी सदुपयोग होउन त्या योगे सतश्रद्धेच्या विराट वृक्षावर पोसलेल्या बांडगुळांचे काही प्रमाणात तरी निर्मूलन व्हावे अशी ईश्वरचणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

नाखु Sun, 01/21/2018 - 08:31
धाग्याचं फलित म्हणजे: मार्कृस लिहायला लागले यना किमानपक्षी दोनदा तरी धाग्यावर अवतरले जाता जाता मना यांना आणि कट्टर भक्त यांना विनम्र विनंती कुणालाही कसल्याही शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा वेळ वाया घालवू नये,, कारण तो सगळा कल्पनेच्या भावभावनांचा खेळ आहे अगदी दु:खद्द प्रसंगी सांत्वन असल्या मनाच्या शब्द बुडबुडे यात आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये जुनाट नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

पिगी Sun, 01/21/2018 - 10:09
प्रतिसाद धागे सोडून वैयक्तिक आहे (म्हंटलं तर आहे, म्हंटलं तर नाही.) यनावालासाहेब यांचे लेख व जोशीसाहेब यांचे प्रतिसाद वाचनीय असतात. खरे सांगायचे तर मनोरंजक असतात. मी पूर्वीचे सर्व धागे वाचले आहेत, आणि खरंच खूप मज्जा येते. (दोघांचाही उपमर्द करायची ईच्छा नाहीये, प्रामाणिक काय वाटते ते सांगितले.) खरेतर यनावालांची वाचकांच्या पत्रव्यवहारातील पत्रे यापेक्षा जास्त चांगली असतात. (Assuming that दोन्ही यनावाला एकच व्यक्ती आहेत.) यनावालांचे मुद्दे बर्‍याचदा तत्वत: योग्य असतात पण ते ज्या प्रिमायसेसवर आधारित असतात ते भयंकरच गंडलेले असते. ज्यांनी अंशत: तरी सहमती दाखवली आहे अशांनाच ते सिलेक्टीव्हली प्रतिसाद देतात, आणि काहीवेळा अशा उपप्रतिसादात, विरोधकांवर टीका करतात. हे चूक आहे, पॅसिव-ॲग्रेसिव आहे. एकेरीने संबोधणे जसे चूक आहे तसेच, मी अज्ञानी आहे-तुमच्या प्रश्नांना नाही बाबा उत्तरे, किंवा जोशींबरोबर संवादात एंगेजच व्हायचे नाही हे एकेरीवर येवून अपमान करण्याएवढेच चूक आहे. जोशींचे मुद्दे फारफेच्ड वाटले तरी त्यावर सविस्तर उत्तरे देणे आवश्यक आहे. तेवढा वेळ नसेल (कारण ते प्रचंड बारीक तपशिलवार लिहीतात.) तर किमान मुख्य एक-दोन मुद्द्यांवर रितसर संवाद करावा. (आत्तापर्यंतचे जोशींचे ॲटीट्यूड बघता त्यांना असेही मान्य असावे) On a global scale, पुरोगामी लोकांच्या अशा फटकळ ॲटीट्यूडमुळेच extreme right विचारसरणी जोमात आहे.

In reply to by पिगी

माहितगार Sun, 01/21/2018 - 10:23
On a global scale, पुरोगामी लोकांच्या अशा फटकळ ॲटीट्यूडमुळेच extreme right विचारसरणी जोमात आहे.
सहमत आहे. कथित पुरोगामी लोकांचा (extreme right सारखाच असलेला) एकांगी हेकेखोरपणाची जोड, ज्यांना बदलण्याची इच्छा आहे त्यांच्याशी संवाद नाकारणे, extreme right विचारसरणीस साहाय्यकारी होते.

In reply to by पिगी

arunjoshi123 Sun, 01/21/2018 - 16:20
यनावालासाहेब यांचे लेख व जोशीसाहेब यांचे प्रतिसाद वाचनीय असतात. खरे सांगायचे तर मनोरंजक असतात.
वास्तविक मिसळपाववर बरेच लेखक अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण, तार्किक, सयंत, शुद्ध भाषेतील, तसेच संतुलित इ इ लिहित असतात. यातलं एकही विशेषण मला लागू होत नाही. मी फक्त टाईमपास म्हणून लिहित असतो. जालावर लिहिताना तुम्ही कुठेही मधेच तुमचा प्रतिसाद खुपसू शकता हे अशा फोरमचं अडव्हांटेज आहे. हेच प्रत्यक्ष बोलणं चाललं असतं तर मी बावरून साईडला उभा राहिलो असतो. आपल्यासारख्या तटस्थाचं मनोरंजन व्हावं असाच उद्देश ठेवून मी लिहित असतो.

चौकटराजा Sun, 01/21/2018 - 17:15
न हि द्न्यानेन सदृशं पवित्रं ए विदयते - आवडले श्रद्धावान लाभते ज्ञानं - न आवड्लेले आता खरे तर काहीही लिहिणार नव्हतो तरीही - जून महीना आहे. पश्चीम भारतात एक जागी चार जण बसलेले आहेत . चारही जन तापल्या उन्हात बसलेले आहेत . आकाशात एक ही ढग नाही . शुद्ध तर्क वाला - ( अॅण्ड आणि ऑर गेट चा फरक समजणारा ) - अहो तीच्र ताप आहे तरीही अचानक ढग येणे ५० टक्के शक्य आहेच ना ! विश्वास वाला - जून आहे , प भारत आहे उन असले म्हणून काय झाले पाउस येइल . अभ्यास वाला -माझा मोबाईल सांगतोय ढग अगदी मुंबई पर्यंत सरकत आहेत इतर घटक जुळले तर पाउस पडेल . श्रद्धा वाला - निसर्ग ( देव शब्द मुद्धाम काटला आहे ) इतका निर्दय नक्कीचं नाही . पाउस जरूर पडेल . असो सूद्न्यास अधिक काय सांगावे ?