मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जबाबदारी - मुलींची आणि मुलांची

उडन खटोला · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी आज एका नवीन अन संवेदनशील विषयावर चर्चा करून आपली मते आजमावायची आहेत ... आजकाल भारतीय / हिंदू समाजामध्ये एकाच अपत्य होऊ देण्याची प्रथा रूळली आहे. आईवडिलांची आर्थिक परिस्थिति ,मुलांच्या शिक्षणावर होणारा अफाट खर्च याबरोबरच मुलगा-मुलगी समान समजून "मुलाची वाट पाहत अधिक अपत्ये " वाढवण्या विरुद्ध सरकारचा जोरदार प्रचार तसेच अन्य काही घटक या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल किंवा पती -पत्नीना अधिक मुले होऊ देणे योग्य वाटत नसल्याने म्हणा , समाजात एकच अपत्य असणार्‍या अथवा एकाच मुलगी असणार्‍या कुटुंबांची संख्या प्रचंड वाढत असलेली दिसून येते... अतिप्राचीन भारतीय हिंदू संस्कृतीतील आध्यात्मिक समजुतीनुसार मातापित्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्राने त्याचे उत्तरकार्य अथवा श्राद्धकर्म केले असता त्या पितरांस सद्गती लाभते असा शास्त्रादेश असल्याने "घराण्याचा कुलदीपक " म्हणून एक तरी मुलगा हवाच ... असा हट्ट असे. आज मुलांप्रमाणेच मुलीदेखील उच्चशिक्षण घेवून पैसा कमावत असतात व जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे आहेत , असे असताना एक करूणाजनक चित्र देखील डोळ्यासमोर उभे राहत आहे ,ज्यामुळे एकाच अपत्यावर थांबण्याचा अथवा एकाच मुलगी पुरे म्हणण्याचा हा हट्ट उद्या तुंहलच खड्ड्यात टाकणार ठरू शकेल अशी सार्थ भीती वाटते ... त्यासाठीच हा लेखनप्रपंच ...... समाजात अनेक ठिकाणी असे दृष्टीस पडते की एकाच मुलगी असलेल्या घरांत मुली शिक्षित होवून नोकरी करून स्व-निर्णयाने नवरा निवडतात , तो कदाचित (बर्‍याच वेळेला ) आंतरजातीय अथवा आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध असतो . मग लग्नानंतर नाइलाजाने जावयाशी जुळवून घेतले जाते .अथवा कटुता तशीच राहते ..आणि ... आईबाप वृद्ध होतात ,अन एके दिवशी या जगाचा निरोप घेतात ..मग जावयाला आयटी प्रॉपर्टी मिळते ..... म्हणजे त्याची फुकट मजा ..... इकडे ज्या आईबापाने आपल्या स्व-कमाईचा मोठा हिस्सा खर्चून मुलीला चांगले शिक्षण व सोयीसुविधा दिलेल्या असतात ,त्याचे त्यांना काय रिटर्न्स मिळतात? नुसत्या मायेपोटी एवढा मोठा त्याग करणे कितपत सयुक्तिक? आज अनेक ठिकाणी अशी परिस्थिति आहेकी मुलगी व जावई करोडपती असून महिन्याला लाखात उत्पन्न असताना देखील मुलीचे आईबाप मात्र हलाखीच्या परिस्थित जगत आहेत... म्हणून मला वाटते की हे कायद्याने कंपल्सरी करावे की मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या उत्पन्नातील ठराविक वाटा लग्नानंतर आईबापाला दिलाच पाहिजे ... आणि ते उपकार म्हणून नव्हे तर आईबापाणी तुमच्या पालन-पोषण/ शिक्षणावर केलेल्या खर्चाची परतफेड म्हणून...! आपल्याला काय वाटते?

वाचने 13703 वाचनखूण प्रतिक्रिया 41

श्रीरंग_जोशी Mon, 01/25/2016 - 23:29
अपत्यांनी त्यांच्या आई वडिलांची (आई वडिलांच्या) उतारवयात काळजी घ्यावी किमान आर्थिक पाठबळ देणे हे अपेक्षितच आहे पण त्यासाठी कायदा करणे पटत नाही. याउलट सर्वांनीच स्वतःच्या निवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज गांभिर्याने करावी. अपत्यांच्या उच्च शिक्षणावर परवडत नसताना खर्च करणे टाळावे. ज्यांच्या कडे योग्यता व धडाडी आहे ते शैक्षणिक कर्ज काढूनही उच्च शिक्षण घेऊ शकतात. अवांतर - भारतात रिव्हर्स मॉर्टगेज सुरु व्हायला हवेच. या समस्येवर तो एक परिणामकारक उपाय ठरू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

उगा काहितरीच Mon, 01/25/2016 - 23:32
अपत्यांनी त्यांच्या आई वडिलांची (आई वडिलांच्या) उतारवयात काळजी घ्यावी किमान आर्थिक पाठबळ देणे हे अपेक्षितच आहे पण त्यासाठी कायदा करणे पटत नाही. याउलट सर्वांनीच स्वतःच्या निवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज गांभिर्याने करावी. अपत्यांच्या उच्च शिक्षणावर परवडत नसताना खर्च करणे टाळावे. ज्यांच्या कडे योग्यता व धडाडी आहे ते शैक्षणिक कर्ज काढूनही उच्च शिक्षण घेऊ शकतात.
सहमत! किंबहुना हेच लिहीणार होतो.

रेवती Mon, 01/25/2016 - 23:31
खटोलाजी, लैच्च ताण येतो असं काही वाचलं की! ज्याला त्याला आपापले संसार करू दिले की बरेचसे प्रश्न येणार नाहीत असा अंदाज आहे. अजून तुम्ही म्हणता तश्या वयापर्यंत पोहोचले नसल्याने काही सांगता येणार नाही. माझं एक नक्की आहे. वृद्धाश्रमात जाणार, तमाम सिरियला पाहणार. आपल्या उत्पन्नातील वाटा पालकांना देण्याचा कायदा मागे कधीतरी आल्याचे ऐकिवात आहे. मिपावरच अनेक बुजुर्ग सांगून गेलेत की समोरचे ताट मुलांना द्या पण बसायचा पाट देऊ नका. म्हातारपणची सोय अशी खर्च करू नका. आपल्याला परवडतील अशाच सुविधा मुलांना पुरवल्या तर अवाजवी पैसे खर्च होणार नाहीत. आवश्यक त्या सुविधा- अन्न, वस्त्र, निवारा या देऊ शकत असू तर मूल जन्माला घालावे असा साधा विचार असताना ते पुरवताना आपण खूप मोठेठे काही करतोय असे वाटण्याची गरज नसते. जाणीव तरीही करून द्यावी लागते व ते सगळे आईवडील करतच असतात. एकूणातच माझी वैचारिक उडी फार मर्यादित आहे. प्रतिसाद संपला.

In reply to by मुक्त विहारि

कुणीही भविष्य काळाबद्दल अस काही बोलतात तेंव्हा मला नोट टू MYSELF मधील पुढील वाक्य आठवते WHAT MAKES YOU THINK YOU ARE WISER TODAY THAN TOMARROW

स्रुजा Mon, 01/25/2016 - 23:42
मुलींचंच का उदाहरण दिलंय फकत? सगळे आंतरजातीय विवाह केलेले मुलगे आणि सुना बिनशर्त आई वडीलांकडे बघतात असा काही विदा आहे का? आपापली सोय करावी आणि ती न जमल्यास अपत्यांनी समजुन घ्यावं. यात मुला -मुलीचा संबंध नाही. एकच मुल असण्याचा तर मुळीच नाही.

आधुनिक काळात फारच नगण्य संख्येच्या मातापित्यांना आपला धंदा-व्यवसाय मुलांवर (मुलगा/मुलगी) सोपऊन त्यांच्यावर अवलंबून रहावे लागते. समजा काही कुटुंबांत धंदा-व्यवसाय मुलांवर सोपवला जात असला तरी, पालकांची स्वतःसाठी वेगळी अर्थव्यवस्था करण्याची क्षमता असते. मात्र, त्यासाठी काही अर्थ व इतर व्यवस्थापन करावे लागेल, जे शक्य असते. ते करून पालकांनी मुलांवर भार न बनता आपल्या म्हातारपणाची व्यवस्था स्वतः करावी हेच योग्य आहे. जुन्या काळातली, "मुलांनी आईवडिलांच्या म्हातारपणाची काठी व्हावे" हा विचार कालबाह्य होत आहे... व्हायला हवा. किंबहुना आजची मुले आपले भवितव्य उज्वल करण्यासाठी मूळ गाव सोडून दूरवर (दुसर्‍या गावा-शहरा-देशात) जाण्याचे प्रमाण लाक्षणियरित्या वाढले आहे, व भविष्यात वाढत राहील. अश्या परिस्थितीत पालकांनी आपल्या सेवेसाठी त्यांना मूळ गावी जखडून ठेवणे अथवा आपण त्यांच्याबरोबर कायमचे जाऊन राहणे, म्हणजे त्यांच्या पायातली धोंड बनण्यासारखे होऊ शकते. पालकांनी आपल्या मुलांवर कायमचा भार बनण्याऐवजी किंवा त्यांचे पंख छाटण्याऐवजी (त्यांच्या आकांक्षांवर बंधने आणण्याऐवजी), त्यांना त्यांच्या भवितव्याच्या गगनात भरार्‍या मारण्यास मदत करणे हेच आपले कर्तव्य समजले पाहिजे. हे ज्याना जमत नाही, ते पालक आजच्या जगात पालक म्हणून कोठेतरी कमी पडत आहेत असेच म्हणावे लागेल. ====== जरा जास्त परखडपणे म्हणायचे झाले तर मुले पालकांकडे विनंती करून त्यांच्या पोटी जन्म घेत नाहीत. या न्यायाने, स्वतःच्या निर्णयाने, स्वतःच्या आनंदासाठी, जन्माला घातलेल्या आपल्या मुलांचे संगोपन-शिक्षण करणे हे पालकांचे कर्तव्य असते... त्याबदल्यात मुलांकडे आपल्या म्हातारपणाची सोय म्हणून बघणे हेच मला अत्यंत अयोग्य व व्यापारी मनोवृत्तीचे वाटते. पूर्णविराम !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Mon, 01/25/2016 - 23:50
रच्याकने, डॉक्टरसाहेबांशी सहमत. वर रंगाभाऊ म्हणताहेत तसे रिव्हर्स मॉर्गेज भारतात सुरू झालेले आहे. माझ्या मते आपण व्यक्तिस्वातंत्र्याला अजून महत्त्व देऊ लागलो की परस्परावलंबित्त्व कमी होऊन या प्रश्नाची तीव्रता घटेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

थोडक्यात, मुलांनी पालकांची काळजी घेणे हे मुलांची प्रगती न खुंटता, प्रेमापोटी व आनंदवर्धकरित्या झाले तरच ते स्वागतार्ह ठरेल. याला फारतर एखाद्या हालाखीच्या परिस्थितीतील पालकांचा अपवाद असावा... पण नियमाने नव्हे. भावनिक ब्लॅकमेल करून तर नसावेच नसावे. पालकांच्या हाताबाहेर असलेल्या वैद्यकीय कारणाने तसे काही झाले तर मात्र वेगळी गोष्ट असेल. व्यक्तिशः मला माझ्या उर्वरीत आयुष्यात माझ्या मुलावर अवलंबून रहावे लागले आणि / किंवा माझ्या मुलाला माझ्यासाठी त्याच्या भवितव्याबाबत तडजोडी कराव्या लागल्या तर मला ते प्रचंड लाजीरवाणे वाटेल... मी पालक म्ह्णून कोठेतरी कमी पडलो असेच वाटेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उडन खटोला Tue, 01/26/2016 - 08:49
डॉक्टर साहेब... आपण जे म्हणता ते कदाचित सुशिक्षित पांढरपेशा पालकांना लागू होऊ शकेल ... परंतु भारतात तसा सुशिक्षित पांढरपेशा वर्ग फार कमी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या जेमतेम 20% असेल नसेल ... बाकीच्याञ्चे काय? खेडोपाडी असे अनेक पालक पाहिलेत की मुलगा/मुलगी मजेत शहरात पैसा कमवून मजा मारतायत ,आणि हे इकडे कसेबसे दिवस ढकलतायत ..... ज्यांनी मुलांना शिकवण्यासाठी खस्ता खाललेल्या असतात आणि असेही सुशिक्षित पांढरपेशा पालकांपैकी बर्‍याच जणांनी देखील आपण मुला-मुलींवर केलेल्या अफाट शिक्षणासाठी स्वत:ची पदरमोड करून , हौसमौज बाजूला ठेवून काटकसरीने जीवन जगलेले असते , त्यांनी उतारवयात मुलांकडून आर्थिक आधाराची अपेक्षा ठेवली तर त्यात गैर ते काय?

In reply to by उडन खटोला

आर्थिक परिस्थिती चांगली नसणार्‍या पालकांनी मुलांच्या नावे शैक्षणिक कर्जाचा उपयोग करून मुलांना त्यांच्यावरच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला शिकले पाहिजे. हे करताना आपल्या उतारवयाचे भानही ठेवावेच. कारण वस्तुस्थिती कोणालाच चुकली नाही... आणि भिडेखातर किंवा अज्ञानाने तिचे भान न ठेवणे शहाणपणाचे नाही. किंबहुना असे करणे मुलांना त्यांच्या भविष्यात तोंड द्यावे लागणार्‍या वस्तुस्थितीचे शिक्षण दिल्यासारखेच होईल. अर्थातच, आपण केलेल्या सर्व उपायांमध्ये वस्तुस्थितीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेलच... याला जीवन ऐसे नाव. त्यांचा माझ्या मूळ प्रतिसादात मी उल्लेख केला आहेच. खर्‍या जीवनात सर्वानाच सर्व संसाधने मुबलकपणे उपलब्ध नसतात. आहे त्याच परिस्थितीत, आहेत तीच संसाधने वापरून दूरवरचे नियोजन करणे भाग असते. पण तरीही... "मुले माझ्या म्हातारपणाची काठी आहेत" या गृहितकावर आधारीत आपल्या उतारवयाचे नियोजन करणे म्हणजे आपल्या नियोजनात हेतुपुर्रसर तृटी ठेवणे होय. पालकांनी हे शक्यतोवर टाळले तरच पालकांचे व मुलांचे भवितव्य अधिक सुकर व आनंदी होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुलांकडून गरजेला मदत होणे वाईट नाही, पण त्यांच्या मदतीवरच सर्वस्वी अवलंबून राहणे अनेक आर्थिक-भावनिक समस्यांना जन्म देते, हे नि:संशय !

In reply to by उडन खटोला

रेवती Tue, 01/26/2016 - 19:29
अगदी रोजचे माझ्या माहितीतले उदाहरण आहे म्हणून तेच देते. मध्यमवर्गीय आईवडिलांनी मुलीचे लग्न हामेरिकेत नोकरी करणार्‍या भारतीय मनुष्याशी करून दिले. ताई हामेरिकेत गेली म्हणून धाकट्या भावाने वडिलांना गळ घातली. त्यांनीही आपल्या रिटायरमेंट खात्यातील पैसे याला देऊन टाकले. इकडे येऊन जे फुटकळ शिकला त्यात आता त्याला ना धड नोकरी व स्वत:ची दोन मुले बायको यांना कसेबसे सांभाळतोय. आईवडिलही त्याच्याबरोबर राहतात पण कोणाचेच काही निभत नाही. ही सासरी आलेली मुलगी मात्र रोज डोळ्याला टिश्यू लावू बसलेली असते. तिने करण्याची मदत ही मर्यादित आहे. आईवडीलांकडे बडोद्यात जाऊन करण्यासारखे काही नाही. ना पैसा ना नोकरीचे वय! मुलाने आईवडिलांना सांभाळण्याचे कबूल केले आहे म्हणून साम्भाळातोय पण वडिलांच्या उपचारांना पैसे नाहीत आणि म्हातारी आई पोळ्या लाटून घरखर्चाला हातभार लावते. मजा कोणीच मारत नाहीये. चुकलेल्या निर्णयांची शिक्षा आख्खे घरदार भोगतेय. मुलाच्या/मुलीच्या शिक्षणावर खर्च करणे व आपले रिटायरमेंट खाते रिकामे करणे यात फरक आहे. याचेच दुसरे टोक म्हणजे येथे येऊन मुलाने व सुनेने हुच्च नोकर्‍या करून मेलेल्या वडिलांचे कर्ज फेडले, भाऊ व बहिणीचे शिक्षण केले. आता त्यांना भारतात परत जायचे आहे पण आईला पैशांचा मोह आहे. परत येऊ नका, अजून धाकट्या दोघांची लग्ने व्हायची आहेत. ते झाले की घर बांधायला काढू वगैरे संपत नाही. आपल्या मर्यादांची जाणीव असली म्हणजे उडी मारता येते वाटते. मुलांना पैशाचा मोह असतो असेच काही खरे नाही. पालकांनाही मोह पडू शकतो. आमच्या मित्राच्या वडिलांनी भारतात रेसवर इतके पैसे खर्च केलेत की ते फेडताना बिचार्‍याला इकडे हृदयविकार झालाय. कितीही पाठवले तरी पुरत नाहीत. आता वडील मेलेत. शेवटी मुलगी व जावई आईला घेऊन गेले की आम्ही करतो तिचे सगळे! पण असे सगळ्यांना थोडीच मिळते? हाल काही संपत नाहीत. त्यापेक्षा आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार मुले जन्माला घालावीत व त्यांना परिस्थितीची योग्य जाणीव सतत करून देत पैसे खर्च करावेत. आपली म्हातारपणाची सोय सोडणे योग्य नाही. त्यातून आईवडिलांसाठी/भावंडांसाठी गरज म्हणून पैसे देण्यास मुले नाही म्हणत नाहीत. सुदैवाने आमच्यासकट अनेक लोक असे पाहिलेत. आमच्याकडील ज्येष्ठांनीच स्पष्टपणे त्यांच्या उपचारासाठी आम्ही पैसे देण्याची गरज नाही, योग्य तरतूद केल्याचा परिणाम वगैरे सांगितले. अनेकांपुढे अशी योग्य उदाहरणे असताना ती फॉलो करताना मनाला खूप आधार मिळतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेमंत लाटकर Tue, 01/26/2016 - 16:40
आपल्या मुलांचे संगोपन-शिक्षण करणे हे पालकांचे कर्तव्य असते... मग मुलांचे कर्तव्य काय असते. मुलांना उत्तम प्रकारे शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी पालक खुप खस्ता खातात. पालकांनी म्हातारपणी मुलाजवळ राहण्याची अपेक्षा करण्यात काय गैर आहे. म्हातारपणी पैशाची गरज नसते तर प्रेमाची वागणूक हवी असते.

In reply to by हेमंत लाटकर

माझे प्रतिसाद परत वाचलेत तर तुमच्या वरच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत असे दिसेल, तेव्हा पुनरुक्ती टाळत आहे. मुलांशी खर्चाचे व तो वसूल करण्याचे (पक्षी : व्यापारी) संबंध ठेवावे असे म्हणताना त्याच वाक्यात भावनेचा उल्लेख करणे म्हणजे इमोशनल ब्लॅक मेलिंग होय !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चैतन्य ईन्या Wed, 01/27/2016 - 15:03
अगदी अगदी. म्हणजे आधीच आपल्या म्हातारपणी सोय म्हणून बघायचे आणि मग तसे नाही झाले कि फुकट कांगावा करायचा.

संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 23:48
माझी मते: १. अपत्ये किती आहेत ह्याने वृद्धापकाळातील अवस्थेवर फरक पडत नाही. २. आयुष्य जगतांना कुठलेही नियोजन नसेल तर परिस्थितीवर खापर फोडणे स्वाभाविक असते. ३. मुलगा वा मुलगी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने वाढवत असल्यास मोबदला म्हणून पेन्शन मागणे योग्य असेल. ४. अपत्याने 'जन्माला घाला कसंही करुन' असा अर्ज केला नसल्याने अपत्यावर पालनपोषणाची जबाबदारी येणे चुकीचे आहे. ५. निसर्गनियम तुडवतांना काही वाटत नाही, पण जेव्हा निसर्गनियम आपल्याला तुडवतो तेव्हा जाम जीवावर येतं असं निरिक्षण आहे. ६. मुलांकडे फ्युचर इन्वेस्टमेंट म्हणून पाहणारे वृद्धावस्थेत डस्टबिन म्हणून वापरले जातात. ७. शंभर वर्षांआधीची सामाजिक, आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलांना प्रगती वा जगण्यासाठी पुर्वीसारखा बापाच्या नावाचा आधार लागत नाही. त्यामुळे वडीलधार्‍यांची मर्जी राखणे आउटडेटेड होत आहे. ८. "आम्ही तुला एवढे कष्ट करुन वाढवले" छाप पालुपदे मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देत नाहीत तर बालक-पालकांमधले परकेपण अधोरेखित करतात. पुढे हेच बालक पालकांना त्रयस्थपणे वागवतात तेव्हा त्रास होतो. ९. आयुष्यात सन्मानाने जगायचे असेल तर कुणावरही कधीही अवलंबून राहण्याचा विचार करू नये. १०. मुलांशी निखळ मैत्री हे सर्व सुखाचे आगर आहे हे वयोवृद्ध होत जाणार्‍यांनी पक्के मनाशी बांधून घेतले पाहिजे.

अजया Tue, 01/26/2016 - 09:01
मी मुलीला जन्माला घातलं,शिक्षण दिलं ,वाढवलं हे त्याच्यावर किंवा तिच्यावर उपकार केले आहेत असा अॅटिट्युड ठेवुन पालकांनी वाढवले तर नंतर तीच कोरडी व्यवहारी ट्रीटमेंट मुलांकडून मिळाली तर पेरले ते उगवले म्हणून अशा पालकांना शांत राहता येईल का? केवळ मुलगा कमावतो जास्त म्हणून मुलाला इमोशनल ब्लॅकमेलींग करुन त्याच्याकडून सतत पैसा मागणारे सधन पालक पाहिले आहेत.ते सतत त्याला पैसे मागतात.न पुरवल्यास कायदा वापरण्याच्या धमक्या देतात!अशा पालकांबद्दल आपण काय म्हणाल? परतफेड या भावनेने आईबापांनी मुलांना वाढवायचे असते का? मुलीकडून किती रिटर्नस् मिळतील तसे तिला शिकवायचे का ?आणि मुलीच का म्हणे? मुलमुलगा मुलगी कोणीही असेल ते आपले मूल मोठे करण्याचा आनंद मूल होण्यात आहे.जर अशी मुलामुलींकडून परतफेडीची भावना आईबाप मनात ठेवत असतील तर त्यांचे आर्थिक नियोजन शून्य आहे आणि अशी वेळ येऊ देणे हे मूर्खपणाचे आणि लाजिरवाणे आहे.

मोगा Tue, 01/26/2016 - 09:19
सासर्‍याची प्रॉपर्टी म्हणे जावयाला मिळते ! नवरा , त्याचे आईबाप यांच्या सर्व संपत्तीचा उपभोग सून घेत नसते का ? की , ती लग्नानंतर झाडाखाली जाऊन झोपते ? नवरा दारुडा असेल , बायकोचा पगार व माहेरची इस्टेट मोडून खात असेल तर ते चूक आहे. पण कर्तबगार स्वावलंबी असेल तर बायको / माहेरच्यानी त्रागा करुन घेउ नये. नवर्‍याची व बायकोची वाडवलिर्जित एस्टेट त्यांच्या भावी पिढीकडे सुरक्षितरीत्या जाते का , इतके बघणे महत्वाचे आहे. सासर्‍याच्या इस्टेटीचा जावई फारसा उपभोग घेत नसतो. सासर्‍याचे शेत , बंगला यात जावई स्वतःचा नोकरी धंदा सोडून जाईल का ? उलट , बायकोच नवर्‍याकडल्या गोष्टींचा जन्मभर उपभोग घेत असते. इतका त्रागा होत असेल तर मुलीनी स्त्रीसत्ताक पद्धत आणावी.

In reply to by मोगा

मोगा Tue, 01/26/2016 - 20:43
सासर्‍याची इस्टेट ( १ एकर शेत ) यदाकदाचित मला मिळालीच तर मी तर त्याचा आनंदाने उपभोग घेणार . माझ्या एकुलत्या एक मुलीला व जावयालाही माझी इस्टेट आनंदाने देऊन टाकणार ! मागच्या पिढीतल्या लोकानी मनसोक्त संसारसुख भोगून पोरं काढली , म्हणूनच नव्या पिढीला एका अपत्यावर थांबावे लागत आहे. त्याबाबत पश्चाताप न करता उलट नवीन पिढीच आमचं खाते म्हणुन उलट बोंब मारणं ही लबाडीच आहे. ........ सासर्‍याची इस्टॅट कालांतराने जावयाला मिळालीच , तर तोवर जावईही मध्यमवय उलटुन गेलेला असतो. आपले अन्न वस्त्र निवारा यांचे स्वतंत्र सोर्सेस आधीच शोधलेले असतात. ते सोडुन तो सासर्‍याच्या घरा शेतात कशाला जाऊन बसेल ? सासर्‍याकडुन आलेलं पुढच्या पिढीला देणं , इतकाच जावयाचा त्यात लिमिटेड रोल असतो. ........... नरसोबावाडीत गुप्तदानपेटी आहे. इस्टेट्त्यात ढकलुन्द्यावी. उगाच जावयाच्या नावाने बोंबलत फिरु नये. किंवा सदेह सहप्रॉपर्टी सरणं गच्छामि करावे

कविता१९७८ Tue, 01/26/2016 - 09:26
उडन खटोला, तुम्ही पालघरला राहता तो सर्व भाग (केळवे, सफाळे, बोईसर, तारापुर, चिंचणी, डहाणु) या भागात मुले आई—वडीलांचे हाल करतात आणि मुलीच त्यांना पाहतात हे चित्र जागोजागी पाहायला मिळत असताना तुम्ही फक्त मुलगी आणी जावई यांच्याबद्दलच का लिहीलय कळाले नाही. आजकाल ईथे रीतच झालीये की मुलगा त्याच्या सासरचे पाहतो म्हणजे मुलगी तिच्या आईवडीलांची काळजी घेते (याला काहीजण अपवाद आहेत पण कमी) भाउ असतानाही. थोडक्यात वंशाचा दिवा, मुलगा म्हणुन ज्याचे लाड लाड केले जातात तो त्याच्या सासरची काळजी घेतो आणि मुलगी अन जावई जो दुरर्‍याच्या वंशाचा दिवा असतो तो स्वत:च्या सासरची काळजी घेतोय हे चित्र ईथे जागोजागी पाहायला मिळतय.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ Tue, 01/26/2016 - 09:51
तसेच उडन खटोला तुम्ही लेखाचे शिर्षक "जबाबदारी— मुलींची अन मुलांची" असे लिहीले असुन मुलाबद्दल काहीच लिहीले नाहीये.

कायदा नसावा असे वाटते.कारण ज्या आईवडीलांनी मुलांना लहानपणी सांभाळलेलेच नाही.त्यांनी का म्हणून आई बापाची जबाबदारी घ्यावी.त्यांनी आपल्याला या जगात आणले म्हणून त्यांचे आभार मानायचे का? स्वताची जबाबदारी लोकाच्या गळ्यात सोडून दिली म्हणून त्यांचा अपत्याला राग येणे स्वाभाविक नाही का?उद्या कायद्याने अशांची कुचंबणा नाही का होणार.आश्रीताचे जीवन जगायला लागलेल्याला आता कायदा म्हणतो म्हणून बापाला सांभाळायला लावणे हा त्याच्यावर किंवा तिच्यावर अन्याय नाही का?ती व्यक्ती पण माणूस आहे,संत नाही ना.कितीही नाही म्हटले तरी वागण्यात सहजता येईल का?

सर्वसाक्षी Tue, 01/26/2016 - 13:40
एकाऐवजी दोन मुले असती म्हणुन सद्यस्थितीत फरक पडला असता असे अजिबात वाटत नाही. अनेकदा चार मुले असतील तर आइ वडीलांच्या वाट्ण्या होतात आणि त्यांच्या कडे दुर्लक्ष्य होताना दिसते. उलट एखाद दुसरं असलेलं अपत्य आई वडीलांबरोबर राहताना दिसतात. तात्पर्य मनोवृत्ती आणि मुलांची संख्या यांचा संबंध नाही. मुलां/ मुलींवर आई बाप खर्च करतात ती व्यापारी गुंतवणुक नसते, वार्धक्यात आई वडीलांना मुलांचा पैसाच नाही तर सहवास अधिक हवासा वाटतो. परदेशात राहणार्‍या आणि इथे आई वडीलांना मोठा फ्लॅट घेउन देणार्‍या मुलांचे आई वडील त्यात सुखाने राहतातच असे नाही, त्यांना एकाकीपण जाणवते. आणि बदलत्या परिस्थितीनुसार मुले आपापल्या व्यापानुसार घरा बाहेर पडणे अपरीहार्य आहे. परदेशातच नव्हे तर देशात असुनही मुले प्रगतीसाठी घराबाहेर राहतात आणि अनेकदा आई वडीलांना तिथे जाणे पसंत नसते आर्थिक प्रश्न हा माझ्या मते हातावर पोट असणार्‍यांना अधिक भेडसावतो कारण प्रस्थापित व्यावसायीक, उद्योजक वा चाकरमान्यांप्रमाणे त्यांना आपल्या भविष्याची तरतूद करणे अनेकदा शक्य नसते. अल्प शेती धारक, किरकोळ व्यवसाय - भाजी विक्री/ चहा टपरी, वाहन चालक, मजुर या स्तराला हात पाय थकत आले तरी काम करावं लागत आणि मग नाईलाजानं मुलांवर अवलंबुन राहावं लागतं. दुर्दैवाने त्यांची मुलेसुद्धा आर्थिकदृष्ट्या सबळ नसली तर हाल अपरिहार्य. जरी कायदा झाला तरी रोजच्या वाढत्या खर्चात घर संसार चालवणे ज्या मुलांना जड जात असते ती आई वडीलांना काय वाटा देणार? पांढरपेशा समाजात आजचे खर्च, मुलांचे खर्च व निवृत्तीनंतरची तरतूद असे उत्पनाचे तीन भाग केले जातात. अनेकदा सामंजस्याने मुलांच्या उच्च्शिक्षणासाठी त्यांच्या नावे कर्ज घेतले जाते. आणि तसे व्हायलाच हवे. समजा उच्च शिक्षणा नंतर मुलांना परदेशात स्थायिक व्हावेसे वाटले तर निदान आई वडीलांचे आर्थिक हाल होणार नाहीत. मात्र असे नियोजन करताना एक मुल असेल तर मुलाला वेळ, पैसा व लक्ष अधिक देता येते कारण आई वडील दोघेही नोकरी करत असतात. मुलगा वा मुलगी असा भेद आता आपल्या समाजात नक्की कमी होत आहे. अनेकदा वृद्धापकाळात अनेक आई वडील आपल्या मुली-जावया बरोबर वा जवळ पास राहतात. मुलगा नाही अशी खंत ते करताना दिसत नाहीत. मात्र अशिक्षीत/ कमी शिक्षीत व आर्थिक दृष्ट्या कनिष्ठ वर्ग हा भेदाभेद दुर्दैवाने अजुन जोपासताना दिसतो. कचेरीत चतुर्थश्रेणीत काम करणारे, कामगार या सारख्या वर्गात अनेकदा आई वडील दोन / तीन मोठ्या मुली आणि शेंडेफळ मुलगा असे चित्र दिसुन येते. हव्यासाने/ हट्टाने मुलगा जन्माला घालणारे हे लोक आपल्या मुलाला कोणते राज्य देणार असतात आणि तो मुलगा त्यांना स्वर्गात कसा नेणार असतो हे तेच जाणे.

In reply to by सर्वसाक्षी

नाखु Wed, 01/27/2016 - 09:12
तंतोतंत सहम्त. कचेरीत चतुर्थश्रेणीत काम करणारे, कामगार या सारख्या वर्गात अनेकदा आई वडील दोन / तीन मोठ्या मुली आणि शेंडेफळ मुलगा आणि दिवटा बर्याचदा (अग्दी ५०% टक्क्यांपेक्षा जास्त लाडावलेला,पुरुषी वर्चस्वाने अहंगड असलेला आणि कमी शिकलेला असतो. शिवाय सुदैवाने बापाने घर घेतले असेल तर मिळणार्च आहे आप्सूक तेंव्हा कर्तव्यात कुचराई करणारा असतो. ( हे अगदी जवळच्या उदाहरणात पाहिले आहे भांडेवाली,कंपनीतील सफाई कामगार)

मोगा Wed, 01/27/2016 - 11:30
जावई आंतरजातीय .... मुलगी जावयाशी एकनिष्ठ .... श्रीमंत सासरा .... आपली इस्टेट त्या आंतरजातीय जावयाला मिळणार म्हणून जावयाचा दु:स्वास करणारा श्रीमंत सासरा .... .... सुमन कल्याणपूरच्या धाग्यावर ' उमा म्हणे यज्ञी माझे जळाले म्माहेर ’ हे गाणे वाचल्यावर हा धागा आठवला

अरुण मनोहर Wed, 01/27/2016 - 12:48
अर्थात सगळे काही कायद्याने करवून घेता येत नाही हे खरे आहे. शेवटी इच्छा नसेल तर,या बाबतीत कायद्याची जबरदस्ती देखील काही फार उपयोगी ठरत नाही. पण बुडत्याला काडीचा आधार अशा स्थितीत मात्र, गांजलेला बाप किंवा आई कायद्याचा आधार नक्कीच घेऊ शकतील. सिंगापूरला देखील बराच उहापोह होऊन शेवटी १९९४ साली असा कायदा केल्या गेला. त्यानंतर ह्याचा फायदा खूप लोकाना झाला आहे. कायदा असला की केवळ बडगा दाखवूनच मुलगा/मुलगी सरळ होतात. अगदी खटलाच भरला पाहिजे असे नाही. असो. ही सिंगापूरच्या कायद्याची लिंक -

अपत्यांची संख्या हा कैच्याकै मुद्दा आहे , (सद्धया विदा हाताशी नाही पण) मागे एक आंध्रप्रदेशातली केस वाचण्यात आली होती जिच्यात, म्हाताऱ्या आई ला पोसणार कोण ह्या वादात चार भावंडांनी आई कचरापेटी मधे नेऊन ठेवली होती. तसेच अमुक सणा पासुन तमुक सणा पर्यंत आई थोरल्या कड़े मग धाकट्याकड़े इतके महीने वगैरे ससेहोलपट सुद्धा सहज पहायला मिळते आजूबाजूला आपल्याच पांढरपेशा समाजात

शि बि आय Mon, 02/15/2016 - 16:44
आपल्या म्हातारपणाची सोय करतच मुलांचे हि शिक्षण करणे केव्हाही चांगले… कायदा आला कि त्याला पळवाटा ही आल्याच त्यापेक्षा आपणच आपली सोय करावी हे उत्तम...नंतर पश्चताप करण्यापेक्षा दोन्ही गोष्टीला समान महत्व द्यावे कारण वेळ बदलली कि संदर्भ बदलतात. ऒळखिचे एक उदाहरण आहे पाहण्यात…. त्रिकोणी कुटुंब होते यथावकाश त्रिकोणात सून नावाच्या चौथ्या कोनाचा समावेश झाला. घराचे चारही कोन कमावते कोणीही कोणावरही अवलंबून नाही तरी घराच्या कर्त्या पुरुषाला ते पटेना झाले. आपल्या घरात ही दोघ राहतात आपण घर संसार जमा केला म्हणून त्यांना काही तोशीस लागली नाही म्हणून ते आयते बसून खात आहेत त्यामुळे त्यांनी घरखर्चा व्यतिरिक्त काही रक्कम आम्हाला दिली पाहिजे. येत जाता, उठता बसत हे एकच पालुपद.. दुसर्याबाजुने लेक आणि सून आयकर वाचवण्यासाठी सेविंग करणे किंवा इतर काही उपाय योजणे चालू होते त्यामुळे फारशी रकम हातात राहत नव्हती. सगळ्या घराचा जमा खर्च मांडल्यावर ७०% घर खर्च मुलगा आणि सून करत होते तरी हे सद्गृहस्थ एकुलत्या एक लेकाकडे अजून पैशाची मागणी करत होते. शेवटी एकदा सगळ्याचा स्फोट झाला आणि लेक आणि सुनेला घराबाहेर जायला सांगितले.