मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

यनावाला · · काथ्याकूट
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता. प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले, " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" " मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. " "कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?" " हो. कुठल्याच देवाला नाही." थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला. " मग मंदिरात कसे आला ?" " तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो." " तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?" "नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो. "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे. "नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो." " देवाला नाही आणि माणसांना का बरे?" "कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." "तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला. "जशी तुमची इच्छा" मी म्हणालो. थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच. तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती. "आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला. बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या, "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल." " आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला. "ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. " "आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले. "खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते." " ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला. " त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?" " सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. " " ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?" " अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या. " चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो. " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या. " आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे. "तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही." " पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला. " ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. " "गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले. " ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा." गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे. .................................................................................

वाचन 108228 प्रतिक्रिया 421

In reply to by ट्रेड मार्क

नगरीनिरंजन Wed, 12/16/2015 - 05:26
ज्या काही श्रद्धा आहेत त्या घरात पाळून बाहेर त्याची वाच्यता/प्रचार न केल्यास कोणाही नास्तिक माणसाची हरकत नसेलच. खरेतर लेखात लेखकाची मंदिराला वगैरेही हरकत दिसत नाहीय. आस्तिक लोक मात्र देवाला भीतात आणि दुसऱयाला पीडतात एवढेच लेखात अधोरेखित केले आहे.

In reply to by नगरीनिरंजन

मंत्रशक्तिने उपचार म्हणजेच आत्ताचे अल्ट्रा साऊंड असे अगदी आत्ताच वाचलय... म्हणजे बघा आपल्याकडे त्यावेळी सुद्धा अल्ट्रा साऊंड होते...

In reply to by स्वप्नांची राणी

आनन्दा Tue, 12/15/2015 - 10:26
मला अल्ट्रासाऊंड वगैरे माहीत नाही.. माझ्या आजूबाजूला अश्या होक्स मानणारी बरीच माणसे आहेत, ज्यांच्यामुळे आस्तिक कसा नसावा हे मी शिकलो. परंतु त्याच वेळेस एखाद्या गोष्टीला प्रचलित विज्ञानात आधार नाही म्हणून त्या गोष्टीचे अस्तित्वच नाकारणे हे देखील मला मान्य नाही. विशेषतः इंद्रियजन्य विश्वापलिकडचे अनुभव घेतल्यानंतर तर नाहीच नाही. परत एकदा सांगतो नास्तिकांवर माझा राग मुळीच नाही, माणसाने नास्तिक असावे, अनुभव नाही तर कशाला विश्वास ठेवावा? मी देखील आयुष्याच्या एका काळात नास्तिकपणाकडे झुकत चाललो होतो. पण म्हणून दुसर्‍याच्या अनुभवाची खिल्ली उडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे पण लक्षात ठेवले पाहिजे. नेमके तेच हे नास्तिक म्हणवणारे करतात आणि मग इतरांच्या रोषास कारण होतात. बाकी जाता जाता, चाचपडत सुरुवातीनंतर धाग्यावर अखेरीस बॅटिंग सुरू झालेली आहे. हा धागा पण द्विशतक मारणार असे दिसतेय. तसे झाले तर सलग ३ डबल सेंच्युरींचा विक्रम यनांच्या नावावर जमा होईल.

In reply to by स्वप्नांची राणी

मार्मिक गोडसे Tue, 12/15/2015 - 10:56
अल्ट्रा साऊंड होते, अणूभट्ट्या होत्या, विमाने होती, हे इंग्रज आले आणी त्यांनी आपले ज्ञान चोरले व आपल्या प्रगतीच्या खाणाखुणा आपल्या प्रगत लोकांच्या डोळ्यासमोर पुसून टाकल्या अगदी आपल्या लोकांचा मेंदूचा प्रगत कप्पा फॉरमॅट केला. त्यामुळे रेल्वेचे इंजीन बघून आपले लोक घाबरून पळू लागले... आपल्या मेंदूचा अप्रगत कप्पा अजूनही त्याचे काम व्यवस्थीत करतो हे ही नसे थोडके.

In reply to by आनन्दा

मार्मिक गोडसे Tue, 12/15/2015 - 15:14
पहिला अनुभव माझ्या बाबांचा आहे - माझा जन्म तेव्हा व्हायचा होता/ नुकताच झाला होता. आमची म्हैस किडे पडून उठवणीला आली होती. आतापर्यंतच्या लोकांच्या अनुभवानुसार आता तिला वाचवणे कोणालाही शक्य नव्हते, अगदी गुरांच्या डोक्टरनी पण हात टेकले होते.
सर्व तथाकथोत वैद्यकीय उपाय थकल्यावर मंत्राने त्या बैलाला गुण आलेला मी पाहिला आहे. पण त्यावेळेस त्या माणसाने एक पाळ त्या बैलाच्या तोंडासमोर माळ्यावर ठेवायला सांगितले होते, त्यामुळे या प्रसंगाला एक गुण कमी. तरी सुद्धा औषध आणि रोग्याचा प्रत्यक्ष शारिरिक संपर्क नाही
आणि प्रत्येक वेळी मांत्रिकाचे पाय धरायला नकोत म्हणून शेवटी अश्या जखमांमध्ये पेट्रोल टाकायला सुरुवात केली.
अहो जेथे गुरांच्या डोक्टरनी हात टेकले होते व व मंत्राने किडे निघुन जात होते तर तुम्हाला मांत्रिकाचे पाय धरायला कमीपणा का वाटला? वर खुशाल गुराच्या जखमेवर पेट्रोल टाकले. ह्या पेट्रोलने किडे निघून जायचे का हो?

In reply to by मार्मिक गोडसे

आनन्दा Tue, 12/15/2015 - 15:46
खरे तर हा प्रतिसाद अस्थानी आहे, पण तरीही देतो. पेट्रोलने किडे निघून जातात. पण त्या जनावराला भयंकर त्रास होतो. बाकी आम्ही मांत्रिकाकडे सारखे का जात नाही हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर मी खाजगीपणाच्या अधिकारात राखून ठेवत आहे. गावकडच्या परिस्थितीत यातल्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे आहेत.

In reply to by आनन्दा

मार्मिक गोडसे Tue, 12/15/2015 - 19:41
ओके. परंतू जनावरांच्या जखमेवर पेट्रोल ओतणे हा अघोरी प्रकार आहे , वैद्यकीय उपचार पद्ध्तीत अयोग्य समजले जाते. जखमेतले कीडे कोणत्या प्रकारचे आहेत हे गुरांच्या डॉ.ला माहीती असते व त्यावर खात्रीशीर इलाजही असतो. जखमेची स्वच्छता व मलमपट्टी महत्वाची असते.

In reply to by मार्मिक गोडसे

आनन्दा Wed, 12/16/2015 - 10:40
या सार्‍याशी मी सहमत आहे. पण तुम्हाला गावाकडच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. डॉ. ला माहीत असते म्हणावे तर आमची एक गाय देखील अशीच गुरांच्या डॉ. नी आता काही इलाज नाही, ही आता मरणार असे सांगितले असताना काही अन्य उपचारांनी बरी झालेली आहे. त्यामुळे गुरांच्या डॉ. कडे या सगळ्यांचे उपाय असतात हीच मुळात अंधश्रद्धा आहे. राहता राहिला प्रश्न त्यांच्या उपलब्धतेचा. गावाकडे साधारण ५०+ गावांमध्ये मिळून एकच, तो पण सरकारी गुरांचा डॉ. असतो, त्यामुळे त्याला तुमच्या घरापर्यंत घेऊन येण्यापेक्षा त्या जनावराला गाडीत टाकून त्याकडे नेणे जास्ती सोपे असावे अशी परिस्थिती. पण तेही शक्य नाही, कारण तो कायम फिरतीवर असतो, त्यातही जर्सी गायींचे फलन करण्यातून त्यांना पण ईझी मनी मिळतो, त्यामुळे तसेही त्यांचा ओढा तिकडे असणे सहाजिक आहे. आज बोलवावा तेव्हा तो १५ दिवसांनी येणार, त्यामुळे बर्‍याच वेळेस नाइलाजातून अश्या गोष्टी होतात. आम्हाला पण दु:ख होते, पण काय करणार?

In reply to by आनन्दा

मार्मिक गोडसे Wed, 12/16/2015 - 21:24
@ आनन्दा. तुमच्या गावाकडील गुरांच्या डॉक्टरांची उपलब्धता त्यांच्या ज्ञानाबद्दल माहीत नव्हते. @डॉ. खरे.
जनावरांच्या जखमेवर पेट्रोल टाकणे हा अघोरी प्रकार आहे असे मला वाटत नाही. ( पेट्रोल टाकून जाळत असतील तर भाग वेगळा). पेट्रोल किंवा तत्सम सेंद्रिय विद्रावक ( ORGANIC SOLVENT) जखमेवर टाकल्याने जखम जळजळत नाही.
पेट्रोलने किडे निघून जातात. पण त्या जनावराला भयंकर त्रास होतो. असे आनन्दाही म्ह्णतात. १० वर्षांपूर्वीची घटना. कुत्र्याच्या शेपटीखाली पेट्रोलची पिचकारी मारून त्या कुत्र्याच्या वेदनांचा आनंद घेणार्‍या काही टवाळ मुलांनी रस्त्यावरील एका कुत्र्याच्या डोक्यावरील किडे पडलेल्या जखमेवर पेट्रोल ओतले होते,जवळजवळ अर्धा तास ते कुत्रे विव्हळत आमच्या सोसायटीत पळत होते. आमच्या येथे नाक्यावर एका सेवाभावी संस्थेची जनावरांवर मोफत उपचार करणारी अँब्युलंस उभी असायची. आम्ही त्यांना बोलावून घेतले. त्यांनी त्यांच्याकडील औषधाने जखम साफ केली,किडेही काढले व आठवडाभर त्याची व्यवस्थीत मलमपट्टीही केली. जखम पुर्णपणे बरीही झाली. कधीही जनावरांच्या जखमेवर पेट्रोल किंवा सपट लोशन टाकू नका, त्यांना जनावरांच्या डॉक्टरांकडे नेल्यास ते पुर्णपणे बरे होउ शकतात असे त्या डॉक्टरानी सल्ला दिला होता. त्यामुळे जखमेवर पेट्रोल टाकणे हे मला अघोरी वाटले.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे Wed, 12/16/2015 - 11:49
जनावरांच्या जखमेवर पेट्रोल टाकणे हा अघोरी प्रकार आहे असे मला वाटत नाही. ( पेट्रोल टाकून जाळत असतील तर भाग वेगळा). पेट्रोल किंवा तत्सम सेंद्रिय विद्रावक ( ORGANIC SOLVENT) जखमेवर टाकल्याने जखम जळजळत नाही. मधुमेहाचे दुर्लक्षित रोगी किंवा कुष्ठरोगी( यांच्या नसा बधीर झाल्याने जखमेची संवेदना त्यांना होत नाही. त्याव्रबास्नार्या माशा सड्णाऱ्या मासांत अंडी घालतात. या अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्य़ा हे सडके मास खातात.) अशांच्या जखमेत वळवळणारे किडे चिमट्याने ओढून काढण्याचे दुर्भाग्य मला लाभलेले आहे. सैनिकांचे आई वडील खेड्यात राहतात आणी तेथे झाडपाल्याचे औषध करत राहतात. त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंती जोवर सैनिक स्वतः लक्ष घालू शकत नाही तोवर वाढत राहतात. श्रीलंकेत असलेल्या सैनिकाच्या वडिलांचे किंवा सियाचेनला असणार्या सैनिकाच्या आईच्या पायातील अशा जखमांचा मी इलाज केलेला आहे. सुरुवातीला सैनिकांचा राग येत असे पण राजा मिळून हा सैनिक प्रत्यक्ष आई बापाना रुग्णालयात आणेपर्यंत ३-४ महिने जातात. हे किडे स्पिरीट हायड्रोजन पेरॉक्साइड सारख्या जन्तुनाशकाना दाद देत नाहीत. त्यामुळे जखमेवर टरपेन्टाइन टाकले कि किडे त्यातून वळवळत बाहेर येतात ते चिमट्याने काढून टाकावे लागतात आणी त्यावर पट्टी करावी लागते. हि प्रक्रिया एखाद्या रुग्णात दोन तीन वेळा करावी लागते जखम पूर्ण बरी होईपर्यंत. तेंव्हा जनावरांवर असा इलाज अघोरी आहे असे मला वाटत नाही. वर्णन किळसवाणे आहे हे मला मान्य आहे पण मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आवश्यक होते. क्षमस्व.

In reply to by आनन्दा

मार्मिक गोडसे Tue, 12/15/2015 - 15:17
पहिला अनुभव माझ्या बाबांचा आहे - माझा जन्म तेव्हा व्हायचा होता/ नुकताच झाला होता. आमची म्हैस किडे पडून उठवणीला आली होती. आतापर्यंतच्या लोकांच्या अनुभवानुसार आता तिला वाचवणे कोणालाही शक्य नव्हते, अगदी गुरांच्या डोक्टरनी पण हात टेकले होते.
सर्व तथाकथोत वैद्यकीय उपाय थकल्यावर मंत्राने त्या बैलाला गुण आलेला मी पाहिला आहे. पण त्यावेळेस त्या माणसाने एक पाळ त्या बैलाच्या तोंडासमोर माळ्यावर ठेवायला सांगितले होते, त्यामुळे या प्रसंगाला एक गुण कमी. तरी सुद्धा औषध आणि रोग्याचा प्रत्यक्ष शारिरिक संपर्क नाही
आणि प्रत्येक वेळी मांत्रिकाचे पाय धरायला नकोत म्हणून शेवटी अश्या जखमांमध्ये पेट्रोल टाकायला सुरुवात केली.
अहो जेथे गुरांच्या डोक्टरनी हात टेकले होते व व मंत्राने किडे निघुन जात होते तर तुम्हाला मांत्रिकाचे पाय धरायला कमीपणा का वाटला? वर खुशाल गुराच्या जखमेवर पेट्रोल टाकले. ह्या पेट्रोलने किडे निघून जायचे का हो?

सस्नेह Mon, 12/14/2015 - 16:13
श्री यनावाला यांच्या लेखातून असे ध्वनित होते की, १. आस्तिक = मंदिरात जाऊन मूर्तीला नमस्कार करणारे/ कर्मकांड, कुलधर्म पाळणारे/ देवाकडून कसली ना कसली अपेक्षा करणारे/देवाला भिणारे. २. नास्तिक = मूर्तीला नमस्कार न करणारे/ देव या संकल्पनेला निरर्थक मानणारे/ कर्मकांड कुळाचार यांना किंमत न देणारे. ३. मूर्ती/देवत्व हे चांगुलपणाचे/ नैतिक अधिष्ठानाचे/पवित्रतेचे/मांगल्याचे प्रतीक मानता येत नाही. ४. कर्मकांड/कुळधर्म/कुळाचार हे सामान्य जनांसाठी मतीची मलीनता झाडून मन शुद्ध करत राहण्याचे साधन असू शकत नाही. ५. नास्तिक म्हणवणारे सर्व लोक नीतिमत्ता, पावित्र्य, मांगल्य, परोपकार इ. चांगल्या गुणांना श्रेष्ठत्व(देवत्व) समजत नाहीत. ६. देव/धर्म ही संकल्पना सोडली तर सामान्य लोक खात्रीने अधिक उच्च/नैतिक/पवित्र/शुद्ध विचारांनी जीवन जगू शकतील. यनावाला यांचे विचार शास्त्रशुद्ध आहेत, तथापि त्यांच्याइतके परखड अन शास्त्रोक्त विचार सर्वसामान्य लोकांना झेपतील काय ? अफूच्या गोळीने का होईना, समाजात स्थैर्य राहत असेल तर उघड्या सत्याचा अट्टाहास कशासाठी हवा ? पारंपारिक कल्पना बाजूला ठेवल्या तर देवत्व हे सर्व चांगल्या गोष्टींचे प्रतीक आणि योग्य पद्धतीची कर्मकांडे चित्त/विचार शुद्ध ठेवण्याचा मार्ग असे का मानता येऊ नये ? बुद्धीवाद्यांनी देव तत्वाच्या माध्यमातून पहावा, सामन्यांनी कर्माच्या माध्यमातून यात वाईट ते काय ?

In reply to by जेपी

नाखु Mon, 12/14/2015 - 16:32
निमित्त दोन दळणाचे डब्बे,एक दोर्याचे बंडल आणि ऊडवायला ५-६ पतंग असे साहीत्य तयार आहे.

विजुभाऊ Mon, 12/14/2015 - 17:44
पुरुष जर नास्तिक असेल आणि त्यात सुद्धा उच्च विद्याविभुषित, तर त्याला आस्तिक सासराकडुन असा काही उपद्रव होत नाही. अगदी स्वताच्या घरातही काही उपद्रव होत नाही. उलट झालेच तर त्याच्या नास्तिकतेचे कौतुक होते
आमाला तर ह्याच्या अगदी उलट्ट अनुभव आहे.

सप्तरंगी Mon, 12/14/2015 - 19:10
प्रसाद नाकारण्याचे कारण काय ? जर देव नाही यावर तुम्ही ठाम आहात तर तो प्रसाद देवाचा नाही तर तो एक तुमच्या आमच्या सारख्यांनी बनवलेला पदार्थ आहे नाही का ? मग नाकारून तो बनवणार्या त्या व्यक्तीचा अपमान होईल, देवाचा नाही. सत्य जाणुन न घेता ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. आस्तिकाने तो देवाचा प्रसाद म्हणुन खावा आणि नास्तिकाने पदार्थ म्हणुन खायला काय हरकत आहे. तुम्ही जर देव मानतच नाही तर तो देवाचा प्रसाद आहे आणि म्हणून तो मी खाणार नाही अशी श्रद्धा कशी काय बाळगु शकता ??

In reply to by सप्तरंगी

मराठी कथालेखक Mon, 12/14/2015 - 19:25
प्रसाद म्हणजे एक पदार्थ आहे आणि तो नास्तिकाने खाण्यास काय हरकत हा मुद्दा ठीक आहे. पण प्रसाद म्हंटले की अनेक नियम आले ,जसे उजव्या हातानेच स्वीकारावा , आवडला नाही तरी पुर्ण खावाच खावा, त्यावेळी काहीही खाण्याची इच्छा नसली तरी खावा ई. यामुळे मी बहुधा प्रसाद म्हणून मिळणारा खाऊ नाकारतो, त्याऐवजी मंदिरांबाहेर विकले जाणारे कंदी पेढे हा माझा विक पॉईंट, ते मी आवर्जून विकत घेतो. तसेच नास्तिक माणसाच्याही भावना असू शकतात हे अस्तिक लोक समजून घेत नाहीत आणि प्रसादाचा उगाच आग्रह करतात हे मला पटत नाही. प्रसाद खावा न खावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

In reply to by मराठी कथालेखक

सप्तरंगी Mon, 12/14/2015 - 20:09
पदार्थ म्हणून खाताना प्रसादास लागू पडणारे नियम नास्तिकाने पाळायची गरज नाही. फार फार तर जर आपण देवाला नाही पण माणसांना मानतो म्हणुन आस्तिकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून स्वतःला त्रास न होऊ देत थोडे flexible राहायला हरकत नसावी. अति rigid राहुन टोकाच्या भूमिका घेऊन आपण फार काही साध्य करत नसतो, उलट तो देवाचा प्रसाद आहे हे मानून आपण खाणार नसाल तर प्रसाद आहे असे आपण मानता आहात असाच अर्थ होईल न ? तो पदार्थ असता तर तुम्ही तो न खाण्यासाठी वेगळी करणे दिली असती , ex. मला आवडत नाही , पोट भरले आहे etc . बाकी काय खावे काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न , फक्त मला 'प्रसाद म्हणून खाल्ला नाही ' हे कारण काही पटले नाही :)

In reply to by सप्तरंगी

मराठी कथालेखक Tue, 12/15/2015 - 12:21
आस्तिकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून स्वतःला त्रास न होऊ देत थोडे flexible राहायला हरकत नसावी.
अस्तिकांनाच फक्त भावना असतात का ? नास्तिकांना असू नये का ? आणि दुसर्‍यांवर एखाद्या गोष्टीचा दबाव आणण्यात कसल्या आल्यात भावना ? अस्तिक लोक जेव्हा कर्मकांड करत असतात तेव्हा मी माझ्या 'नास्तिक /निरिश्वरवादाच्या भावना दुखावल्या जात आहेत" म्हणून कांगावा करत नाही, तेव्हा मी सदर प्रसाद खाऊ ई नाकारले तर अस्तिकांनी बोंब मारण्यात अर्थ नाही. अर्थात मला फारसा अनुभव आलेला नाही मी फक्त लेखकाच्या बाजूने लिहिले आहे, त्यांच्या भावना समजण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिश: मला मंदिरात दिला जाणारा प्रसाद बनवताना कितपत स्वच्छता पाळली जाते याबद्दल शंका असते म्हणून मी तो नाकारतो. तर कधी हात अगदी स्वच्छ नसतात (फिरत असल्याने धूळ वगैरे लागलेली असू शकते) व चमचाभर प्रसाद खाण्याकरिता नळ शोधायचा कंटाळा येतो. मात्र कुणाच्या घरी सत्यनारायण , वास्तू पूजा ई साठी गेल्यास (सदर व्यक्तिच्या आनंदात सहभागी होण्याकरिता मी कधी जातो) मी पुजेला नमस्कार करत नाही मात्र प्रसादाचा शिरा घेतो.

In reply to by मराठी कथालेखक

सप्तरंगी Tue, 12/15/2015 - 20:58
भावना नक्कीच सगळ्यांनाच असतात , पण प्रसादाबद्दलच्या भावना आस्तिकांनाच असतात, नास्तिकांना नाही. नास्तिकांना प्रसादाबद्दल , देवाबद्दल त्या नसतात म्हणूनच कदाचित ते त्याचा पदार्थ म्हणून स्वीकार करू शकतात. अर्थात तुमचे स्वच्छता वगैरे बद्दल चे विचार बरोबरच आहेत ते त्या वेळेस लागू पडत असतील तर आणि तेच निकष सगळ्याच (धाब्यावरच्या हि ) पदार्थांना लावत असाल तर ! खुपदा आपण गोष्टींना brain पेक्षा भावनेने तोलत राहतो, भावना बाजूला ठेवुन विचार केला तर दुसर्यांना समजून घेणे जर सोपे होते. आस्तिक माणसाला देव या संकल्पनेबद्दल असा ब्रेन ने विचार करणे जर अवघड असते त्यामुळे त्यांच्या भावना न दुखावता मत मांडले तर कदाचित नाही पटले तरी ओपिनिअन दिफ्फेर्स असा विचार करत जगणे सोपे होऊ शकते… by the way इथे कोणताच आस्तिक नास्तिकाच्या नावाने बोंब मारत नाहीये हो, उगीच मुद्दा सोडून काहीही बोलू नका.

In reply to by सप्तरंगी

मराठी कथालेखक Wed, 12/16/2015 - 16:26
पण प्रसादाबद्दलच्या भावना आस्तिकांनाच असतात
मान्य, पण नास्तिकांनी प्रसाद न घेतल्याने अस्तिकांच्या भावना दुखावल्या जातात हे अमान्य. अस्तिकांनी खावा मनसोक्त प्रसाद नास्तिक अडवत नाहियेत. पण उगाच दुसर्‍याला आग्रह करण्यात काय अर्थ आहे. आणि मनाविरुद्ध काही करायला लागणे वा मनात असूनही करायला न मिळणे (कुणी तरी मनाई केल्याने) या दोन्ही गोष्टींनी भावना दुखावल्या जावू शकतात त्याअर्थी नास्तिकास मनाविरुद्ध प्रसाद खावा लागल्यास त्याच्या भावना दुखावल्या जावू शकतात याचे भान अस्तिकांनी ठेवावे हीच अपेक्षा. थोडक्यात काय तर अस्तिक त्याच्या धर्मभावना / श्रध्दा संभाळ्ताना नास्तिकाबद्दल "ठीक आहे , त्यालाही त्याची नास्तिकता संभाळू देत" असे म्हटले तर काही बिघडणार आहे का ?

In reply to by मराठी कथालेखक

प्रभाकर पेठकर Wed, 12/16/2015 - 02:27
>>>>व्यक्तिश: मला मंदिरात दिला जाणारा प्रसाद बनवताना कितपत स्वच्छता पाळली जाते याबद्दल शंका असते म्हणून मी तो नाकारतो. एकदा एका एस्टी प्रवासात एक ८० वर्षाची गरीब म्हातारी काठी टेकत टेकत एस्टीत चढली. एकाहातात काठी आणि दुसर्‍या, मुठ वळलेल्या, हाताने एक बोचकं कमरेवर सांभाळलं होतं. दुपारची वेळ. म्हातारी कुठून चालत आली होती माहित नाही. मी दरवाजाजवळ शेवटच्या बाकावर बसलो होतो. मी शेजारच्याला विनंती करून जरा सरकून घेतले आणि त्या आजींना माझ्या शेजारी बसायला जागा दिली. बसल्यावर आजींनी मला भरपूर आशिर्वाद दिले, खुप लांबून आले बाबा वगैरे सांगितले. पंढरपूरला गेली होती हेही समजले. मग आजींनी त्यांच्या हातात (कधी पासून गच्च धरून ठेवलेला) धरून ठेवलेला प्रसाद मला दिला. तो एक घास काळा पडलेला शिरा होता. त्याच्या दर्शनानेच मला मळमळले. आजींना वाईट वाटू नये म्हणून मी घेऊन ठेवला. खाल्ला नाही. पण आजी मागेच पडल्या, ' अरे! खा. देवाचा प्रसाद आहे.' मी तो काळा पडलेला शिरा तोंडात टाकून गिळून टाकला. चावण्याचे, चव पाहण्याचे धाडस झाले नाही. पांडूरंगाला दोन हात जोडले आणि मनोमन विनंती केली की कांही विपरीत घडू नये. तेंव्हा मी २०-२२ वर्षांचा होतो आणि देवावर बर्‍यापैकी विश्वास ठेवणारा होतो. मी प्रसाद खालेल्ला पाहिल्यावर आजीबाईंना बरे वाटले.

In reply to by प्रभाकर पेठकर

असंका Wed, 12/16/2015 - 11:10
मग जे झालं ते चांगलं झालं की वाईट? मी तर अजुनही एकझॅक्टली तेच करीन जे आपण त्या वयात केलं असं म्हणताय...

In reply to by असंका

प्रभाकर पेठकर Wed, 12/16/2015 - 14:04
चांगले की वाईट पेक्षा अस्वच्छ प्रसाद/शिरा खाणे चुकीचे आहे. आता मी काळा पडलेला प्रसाद/शिरा खाणार नाही. त्या आजीबाईंना तसे सांगेन की प्रसाद/शिरा अस्वच्छ झाला आहे. चांगला असेल तर मी खाईन. निदान आजी बाई पुढच्यावेळी योग्य ती काळजी घेतील.

In reply to by मराठी कथालेखक

sagarpdy Tue, 12/15/2015 - 12:24
आपण पाहतोय ते हे नास्तीकत्त्व साधारणतः पहिल्या पिढीतील आहे. म्हणजेच स्वतःच्या तार्किक दृष्टीकोनातून आलेले नास्तीकत्त्व, पालकांनी शिकवलेले नास्तीकत्त्व नाही. त्यामुळे "प्रसाद का घेऊ नये?" वगैरे तत्त्वज्ञान चालू आहे. तिथेच आस्तीकत्त्व हे पालकांकडून आलेले, त्यामुळे तशी विचारसरणी हि तर्काने नाही तर संस्काराने मिळालेली. अशा परिस्थितीत
नास्तिक माणसाच्याही भावना असू शकतात हे अस्तिक लोक समजून घेत नाहीत आणि प्रसादाचा उगाच आग्रह करतात हे मला पटत नाही.
हा तार्किक विचार सर्वसाधारण आस्तिक करणार नाही. आणि स्वतःला बुद्धिवादी नास्तिक म्हणवणाऱ्याने हा विचार केला पाहिजे, असे माझे मत. एका फिरंगी नास्तीकाकडून मिळालेले उदाहरण :
या नास्तिक माणसाला प्रश्न विचारला होता कि "तुम्ही तुमच्या मुलाला संता क्लोज बद्दल काय सांगाल?", तेव्हा त्याचे उत्तर होते, मी माझ्या मुलाला सांगतो कि " 'संता क्लोज' वगैरे काही नसतं, पण तुझे मित्र समजतात कि तो खरा आहे, आणि तो येउन त्यांना भेटवस्तू वगैरे देतो याचा त्यांना आनंद होतो. त्यामुळे जरी तुला माहित असल कि संता क्लोज खरा नाहीये, तरी तुझ्या मित्रांना बरं वाटण्यासाठी म्हणून तू त्यांच्यासमोर 'तो खरा आहे' असेच म्हण."
हि विचाराची संयतता हि आपले नास्तीकत्त्व "मिरवण्यापेक्षा" अधिक महत्त्वाची! आपण जी नास्तिकांच्या भावना दुखावण्याची गोष्ट करताहात हि नास्तिकांच्या ३-४ व्या पिढीसाठी ठीक आहे (पण येथे नास्तीकात्त्वापेक्षा "नि"धर्म अस्तित्त्वात येतो). बाकी स्पा, पेठकर काकांशी सहमत.

In reply to by sagarpdy

मराठी कथालेखक Tue, 12/15/2015 - 14:41
हि विचाराची संयतता हि आपले नास्तीकत्त्व "मिरवण्यापेक्षा" अधिक महत्त्वाची!
वर्षभर वेगवेगळे उत्सव , त्यातून होणारा गोंगाट, त्यातून होणारे ट्रॅफिक जॅम ई बिचारा नास्तिक मुकाटपणे सहन करतच असतो अस्तिक लोक वर्षभर त्यांची अस्तिकता मिरवतच असतात ना ? मग प्रसाद न घेणे , मुर्तीला नमस्कार न करणे किंवा देवळात प्रवेशच न करणे असे स्वतःच्या मनाप्रमणे वागणे म्हणजे जर मिरवणे होत असेल तर का मिरवू नये बरे नास्तिकांनी ?केवळ संख्येने कमी आहोत म्हणून ? म्हणजे अस्तिकांच्या झुंडशाहीला शरण जा असेच ना ? नास्तिकांनी स्वतःच्य मनाप्रमाणे न जगता इतरांच्या भावना दुखवू नयेत याची काळजी का करत बसाव ? आणि वर कुणीतरी म्हणत आहेत की बॉसचं ऐकता मग आपल्याच माणसाच का नाही वगैरे... अहो बॉसचं कामापुरतं ऐकतो...काय त्याच्या घरी पाणी भरायला जात नाही. संस्थेचे नियम असतात अधिकाराची उतरंड असते ती मान्य करावीच लागते ? नाहीतर संस्था चालणार कशी ? पण अस्तिक माणसांना बॉस समजावे आणि त्यांचे ऐकावे असं म्हणायचं आहे का आपल्याला ? व्यक्तिश : मी पत्नीला एकदा शिर्डीच्या साईमंदिरात घेवून गेलो होतो, तिने एकटीने रांगेत उभे राहणे योग्य वाटले नाही म्हणून रांगेत दीड दोन तास उभाही राहिलो. मात्र दर्शनाच्या वेळी नमस्कार न करता बाहेर आलो. अर्थात पत्नीनेही मी नमस्कार करावा असा आग्रह धरला नाही. पूढे नवीन फ्लॅटवर रहायला गेल्यावर एक पूजा ठेवावी असे पत्नीला फार वाटत होते. मी पूजेचे सामान आणयला बरोबर गेलो. मी सोबत बसल्याशिवाय पूजा पुर्ण होणार नाही असे ती मानत असल्याने मी पूजेला सोबत बसलो , भटजींनी सांगितलेल्या विधीत पण भाग घेतला. कारण एरव्ही मला पत्नी कोणत्याच कर्मकांडाकरिता आग्रह करीत नाही. मग यावेळी तिच्या भावनांचा मान राखणे मला गरजेचे वाटले.

उगा काहितरीच Tue, 12/15/2015 - 00:24
मला वाटते अतिरेक वाईट, मग तो अती आस्तीकतेचा असो वा नास्तीकतेचा. देवाची पुजा न केल्याने किंवा देवाच्या पाया न पडल्याने वा प्रसाद न खाल्ल्याने काही घडणार नाही. पण सहजासहजी विशेष श्रम न पडता चांगल्या तुपातला लाडू ॲज ऐ प्रसाद खायला मिळत असेल अन् त्यामुळे कुणाला आनंद वाटत असेल तर खायला काय हरकत आहे? ट्रस्ट मी आस्तीकतेतच जास्त फायदा आहे ! ;-)

कानडाऊ योगेशु Tue, 12/15/2015 - 08:01
ह्यात दुसरा एक प्रकार ही असू शकतो. कदाचित टूरमधल्या कोणी एकाने यनावालांची टाईमपास म्हणुन फिरकी ही घेतली असू शकते. एखादा टोकाची मते असलेला पकडायचा व त्याला मुद्दामुन उकसवायचे. कॉलेज सहलीमध्ये असे प्रकार पाहीले आहेत व कधी कधी अश्या प्रसंगाचा हिस्साही होतो. अर्थात हा प्रकार जेवढ्यास तेवढ्यापुरता असाच असतो. इथेही गाडी सुरु झाल्यानंतर मंडळी पुन्हा उत्साही झाली व मागचे सार विसरुन ही गेली असे लिहिले आहे म्हणुन ही शंका आली. (कदाचित फक्त त्या बाईंनी यनावालांची मते गांभिर्याने घेतली असावीत.)

भंकस बाबा Tue, 12/15/2015 - 09:19
वर दिलेले प्रतिसाद वाचले. चर्चा चांगल्या मार्गाने चालली आहे. मी स्वतः नास्तिक आहे पण माझी आई व् बायको बऱ्यापैकी आस्तिक आहेत. आता यामुळे संघर्ष होणारच. अगदी पहिला वाद इथून फुटतो. मी घरातील कचरा बाहेर टाकायला मनाई करतो. त्यावर प्रक्रिया करुन कम्पोस्ट बनवून मी तो घरातील कुंडयात वापरतो. आईचे व् बायकोचे म्हणणे असे की तो मी तो मी तुळशीची कुण्डी सोडून इतरत्र वापरावे. यावरुन वाद होतात.त्यामुळे मला ती कुंडी टाळावी लागते. तसेच मासे धुवून टाकलेले पाणी देखिल त्यात टाकू शकत नाही. यात पाण्याची बचत होतेच वर झाडाना ख़त देखिल मीळते. आता मी जर माझा हेका धरून बसलो तर पर्यावरण रक्षण होईल पण माझ्या घरात गृहकलह पण नक्की होईल. हेच बाहेर गेल्यावर देखिल होईल. त्यामुळे नास्तिकानी आपल्या भावना दुसऱ्याला दुखावेल अशा व्यक्त करु नये. हां माझा व्यक्तिगत सल्ला आहे. प्रवचन नाही. जर माझ्या नमस्कार करण्याने माझी नाती जपली जात असतील तर काय हरकत आहे? तसेच माझ्या आयुष्यात ज्यानी मला घडवले असे फ्रान्सिस डिमेलो सर व् पगार मैडम(आर.एम्.भट्ट.हायस्कूल, परळ)हे जर मला रस्त्याने जाताना भेटले तर त्यांना वाकुन नमस्कार करण्यात मला काहीच कमिपणा वाटणार नाही.तिथे मी १०१% आस्तिक आहे

सुबोध खरे Tue, 12/15/2015 - 13:36
आपण बहुतेक लोक ( आस्तिक किंवा नास्तिक) संधिसाधू असतो. किती नास्तिक लोक बॉसने तिरुपतीचा प्रसाद दिला तर मी यावर विश्वास ठेवत नाही म्हणून नाकारण्याचे धाडस दाखवतील फार तर १० %. अशावेळी "मौनं सर्वार्थ साधनं" सारखा श्लोक आठवतील. जर वरिष्ठ लोकांच्या पाया पडण्याने त्याचे समाधान होणार असेल तर त्यांच्या पाया पडल्याने काय नुकसान आहे असा फायदेशीर विचार मी करतो/ केला. याचा मोठा फायदा मला बर्याच वेळेस दिसला. लग्नानंतर ज्या कुठल्या घरी मी गेलो तेथील वरिष्ठ लोकांच्या पाया पडल्यावर बहुसंख्य लोकांच्या तोंडून "बघा दोघे डॉक्टर असून किती नम्र आहेत" हे उद्गार ऐकायला मिळाले. ( जसे काही डॉक्टर असलो कि उद्धट असलेले चालते). जर देखल्या देवाला नमस्कार केला तर नुकसान काय असा साधा विचार मी करतो. श्रद्धा आहे कि नाही हे मला स्वतःलाच माहित नाही. बर्याच वेळेस आपण नक्कीच श्रद्धा नाही अशा ठिकाणी सुद्धा जातो (कधी कधी नमस्कारही करतो). उदा गोव्याचे चर्च किंवा फतेहपुर सिक्री तेथील दर्गा. त्यामुळे आपले काय नुकसान होते? मंदिरात गेल्याने ज्याला समाधान होते त्याने जावे. हवं तर नमस्कार करावा. नाही तर मूर्तीतील ( आणी आजूबाजूचं) सौंदर्य पाहावं. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." यना वाला साहेबांच्या या एकाच वाक्यात द्वंद्व आहे एकीकडे ते म्हणतात माणसांच्या भावना दुखवू नये आणी लगेच म्हणतात तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे. मी त्यांच्यावर टीकाही करीत नाही कारण मला स्वतःलाच मी कोण आहे ते समजलेले नाही. याच बरोबर मी आजतागायत तिरुपती शिर्डी च काय मुंबईत जन्म काढून अजूनही सिद्धिविनायकाला गेलो नाही. पण परवाच देव दिवाळीला आमच्या जवळच्या देवळात दिव्यांची आरास केली होती सर्व विजेचे दिवे बंद करून ठेवलेले होते. ते दृश्य इतके मनोहारी होते कि तेथे पाच मिनिटे बसल्याशिवाय माझे मन बाहेर येण्यास तयार नव्हते. देवळात शिरून देवाला नमस्कार करून तेथे पाच मिनिटे बसल्याने जी मानसिक शांती मिळते( हे तुमच्या संस्कारांचे परिणाम असे मान्य केले तरीही) त्यांची किंमत कशी करणार? म्हणून यनावाला यांच्याशी मी अंशतः सहमत आहे तरीहि पूर्ण सहमत होऊ शकत नाही.

पिलीयन रायडर Tue, 12/15/2015 - 15:06
इथे खुप लोक यनावालांच्या आजवरच्या लिखाणाला विचारात घेऊन लिहीत आहेत. म्हणुन कदाचित "नास्तिक स्वतःला शहाणे समजतात" वगैरे प्रतिक्रिया येत असाव्यात, जर व्यक्तिसापेक्ष चर्चा करायची नसेल आणि केवळ आस्तिक - नास्तिक हाच मुद्दा असेल तर माझी विचारप्रक्रिया मांडायला मला आवडेल. मी एक सर्वसाधारण कुटुंबातली व्यक्ति आहे. माझे आई-वडील हे अगदी धार्मिक म्हणावेत असे नसले तरी सश्रद्ध. वडीलांचे वडील पुजा सांगणारे भट, म्हणुन कर्मठ. अगदी शिवाशिव पाळणारे. तर आईचे वडील नास्तिक. माझे आई वडील ह्यांच्या कुठे तरी अध्येमध्ये.. वडीलांचा खरं तर श्राद्ध पक्ष ह्यावर विश्वास नाही. पण आई-भावांचे मन राखायचे आणि कुणाला दुखवायचे नाही म्हणुन सर्व काही करतात. आईने माहेरी कधीच गौरी-गणपती, पुजा-अर्चा केलेल्या नाहीत. पण तरीही ती हौसेने करते कारण तिच्यामते त्यानिमित्ताने गोडधोड होते, लोक घरात येतात. नेहमीपेक्षा वेगळा दिवस जातो. मी इतक्या विचारांमधुन नेमकी नास्तिकताच कशी निवडली ते मलाही नीटसं माहिती नाही. पण मी कधीच देवावर विश्वास ठेवुच शकले नाही हे नक्की. तुमचा देवाला विरोध नसुन, कर्मकांडाला आहे असंही अनेकांनी मला सांगितलेले आहे. पण मुळात माझा देव ह्या संकल्पनेवरच विश्वास नाहीये. ह्या अफाट, अथांग सॄष्टीवर नियंत्रण ठेवणारे कुणी एक आहे...त्याचे/तिचे माझ्याकडे लक्ष आहे. माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना त्या एकाच्या मर्जीने घडत आहे. माझ्या कर्माचा हिशोब कुणी ठेवत आहे इ. कोणत्याही कल्पनेवर माझा विश्वास नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने येणार्‍या पाप-पुण्य, पुजा, उपास-तापास, नवस, अभिषेक (थोडक्यात.. कर्मकांड!) ह्यावरही माझा विश्वास नाहीच. साधारणतः आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटना ह्या आपल्याच निर्णयांचे परिणाम असतात. अर्थात २+२=४ इतकंही ते सोप्पं नाही. पण प्रत्येक गोष्ट घडण्याची एक प्रोबॅबिलिटी असतेच. सापशिडी खेळताना १,२,३,४,५ किंवा ६ पैकी एकच काहीतरी पडणार असतं. पण तो एक आकडा येण्याची प्रत्येक आकड्याची शक्यता असतेच. त्यातला एक कोणता तरी पडतो. ह्याला नशीब म्हणावे असा प्रकार सगळी कडे दिसतो. २-३ दा सलग तोच आकडा आला तर तो योगायोग..! पण त्याची सुद्धा प्रोबॅबिलिटी होतीच की! मला प्रत्येक घटनेमागे कार्यकारण भाव असला पाहिजे असं वाटतं. अनेकदा तो शोधण्याचा मी प्रयत्न करते, अनेक गोष्टी मला समजत नाहीत. पण माझ्या इवल्याशा मेंदुला ह्या अफाट सॄष्टीतलं सगळं कळायलाच हवं असा काही माझा आग्रह नसतो. माणसाला फार थोडं कळालय.. अजुन खुप काही बाकी आहे. And it is okay! पण मला जे समजत नाही ते तातडीने "दैवी" होत नाही. काहींना त्या गोष्टी चमत्कार वाटतात. मला त्या फक्त अनाकलनीय वाटतात. गुढ दोन्ही कडे आहे, पण चमत्कार म्हणलं की विचार बंद होतो.. माणुस त्या घटनेला शरण जातो. दैवी म्हणतो. नास्तिक मनुष्य म्हणुन मी फक्त तेवढं करत नाही. अनेकदा नवस बोलुन लोकांची कामं होतात, मग त्यांना "प्रचिती" आली असं ते म्हणतात. मला किती लोकांनी नवस बोलला आणि किती लोकांची कामं झाली असे प्रश्न पडतात. मला प्रत्येक गोष्टीत प्रश्न पडतात. आंधळेपणानी मी काहीच करु शकत नाही. माझ्या बुद्धीला पटायला हवं इतकंच. जेव्हा आस्तिक "मनाला शांत वाटतं".."प्रचिती आली".. "कुणाला का दुखवायचं"..."देवाची माझ्यावर कृपा असावी"... अशा कोणत्याही कारणाने देव ही संकल्पना मानतात तेव्हा ते नक्की बुद्धिवादी असतात का? निश्चित नसतात. पण ह्याचा अर्थ ते निर्बुद्ध असतात असाही नसतो.. प्रत्येकाची आपल्या आजुबाजुच्या घटनांचीस संगती लावायची आणि त्यातुन निष्कर्ष काढण्याची आपली एक पद्धत असते. त्यांना जो मार्ग सर्वात योग्य वाटतो, तो ते अवलंबतात. माझ्या वडीलांच्या आई-वडीलांनी हे मान्य केलं होतं की देव असतोच. आपण करतोय त्या सत्यनारायण पुजेचा नक्की अर्थ काय वगैरे फंदात ते कधीच पडले नाहीत. त्यांना पाप-पुण्य, मोक्ष कल्पना मान्य होत्या. ते कर्मठही होतेच. आणि त्यात त्यांचा आनंद होता. माझ्या आई वडीलांना देव आहेच, आणि तो आपलं नशीब ठरवणार असलं काही वाटत नाही.. पण त्यांनी आहे त्याला फारसा विरोध न करता आनंदात रहाण्याचा मार्ग शोधला. त्यामुळे विश्वास नसतानाही सर्वकाही एका मर्यादेत करुन त्यांनी आनंद मिळवला. माझे आजोबा जे नास्तिक होते, त्यांनी आयुष्यभर देवधर्म काही पाळला नाही. कॅन्सरच्या यातनाही त्यांना आस्तिकतेकडे वळवु शकल्या नाहीत. आपण आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहिलो ह्यात त्यांचा आनंद होता. शेवटी प्रत्येकजण आनंदच तर शोधत असतो.. आणि तो शोधण्याचा प्रत्येकाला अधिकार असावा. नास्तिकाने आस्तिकाला अमुक तमुक करुच नकोस म्हणुन आग्रह करु नये... आणि आस्तिकानेही आमच्या भावनांसाठी तरी अमुक तमुक करच असा आग्रह करु नये. नाही एखाद्याने नमस्कार केला.. प्रसाद घेतला तर त्याचाही मान राखायला हवा. राहता राहिला प्रश्न की बॉस समोर तुम्ही ही "मिजास" दाखवाल का? हा प्रत्येकाच स्वभाव झाला. मी दाखवते. काहींना बॉसची इतकी भीती असते की ते बॉस जे जे म्हणेल ते ते सर्व काही खालीमान घालुन ऐकतात. ह्यात आस्तिकता- नास्तिकता कुठुन आली? बॉस नास्तिक असेल तर त्याला घाबरणारा आस्तिक मनुष्य बॉसच्या सोयीप्रमाणे स्टॅण्ड घेऊच शकतो. डबल स्टॅण्डर्ड सगळेच दाखवतात. केवळ नास्तिक नाही. लाडु प्रसाद म्हणुन न खाता, एक पदार्थ म्हणुन खायला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही, मी तर खाते. पण ह्या प्रसंगात यनावालांकडे आलेला माणुस पावतीपुस्तक घेऊन आला होता. मी सुद्धा लाडु नसता घेतला अशावेळी. असे पावती फाडुन लाडु देणारे किंवा रस्त्यावर देवीची परडी फिरवुन कुंकू लावुन पैसे मागणारे ह्यात फरक तो काय? अशा प्रकारचे सर्वच लोक मी सुद्धा टाळते. पण कुणी प्रसाद वाटत असेल तर तो ही खाते.

In reply to by पिलीयन रायडर

+१ तारतम्य कसे असते याचे हा प्रतिसाद म्हणजे उदाहरण. मला तर वाटते की अस्तिक नास्तिक अज्ञेयवादी असणे या मनाच्या अवस्था आहेत. मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रियांचा तो रिझल्टंट आहे. समाजधुरीणांनी समाजाच्या पुढे किती असावे? इतके असू नये की तुम्ही गेलात पुढे निघून व समाज राहिला मागे! समाजसुधारणेचा सरासरी वेग हा समाजाला अंतर कापून पुढे सरकता येईल इतकाच असावा.काळाच्या रेट्याने समाज बदलतो आहेच. फक्त त्याच्या बदलाचा वेग हा तुमच्या अपेक्षेपेक्शा कमी आहे.प्रबोधन हे आक्रमकतेने करता येत नाही. डॉ नरेंद्र दाभोलकरांना याची चांगली जाण होती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

संदीप डांगे Tue, 12/15/2015 - 15:50
सहमत. मानवी बुद्धी व आकलनाला मर्यादा आहेत हे स्वच्छ सिद्ध असतांनाही काही लोक स्वतःला बुद्धीवादी का म्हणवून घेतात हा एक प्रश्न सतत पडत आला आहे.

In reply to by संदीप डांगे

नाखु Tue, 12/15/2015 - 16:01
सर्वात वाचनीय आणि वाखू साठवण्याचे प्रतिसाद फक्त हे (डांगे यांच्या वरील)दोन आहेत . धन्यवाद.घाटपांडे सर आणि त्यांना उद्युक्त करणार्या "रणरागीणी" यांना... प्रतिसाद मात्र आणि भविष्यात फक्त वाचनमात्र मिपाकर.

In reply to by संदीप डांगे

पिलीयन रायडर Tue, 12/15/2015 - 16:09
डांगे.. बुद्धिला मर्यादा आहेतच. पण आपल्या तोकड्या का होईना, आकलनातुन माणसाला जे ज्ञान होते ते वापरायला बंदी थोडीचे? भले एखाद्याला विश्वाचे आर्त वगैरे काही कळत नसेल, पण किमान तर्कसुसंगत काय हे तरी समजु शकतेच ना. जितपत समजते तितपत मते बनवावीत, जिथे आकलनाच्या पलीकडे गोष्टी घडतात तेव्हा त्या सोडुन देता येतात. शरणच जायला हवं असं काही नाही.

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे Tue, 12/15/2015 - 16:22
बुद्धिला मर्यादा आहेतच >>> हेच बर्‍याच बुद्धीवाद्यांना स्विकारणे अवघड जाते असा अनुभव आहे. बाकी तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहोतच.

In reply to by पिलीयन रायडर

सप्तरंगी Tue, 12/15/2015 - 21:20
खूप छान लिहिले आहे, तुमची बुद्धिवादी बद्दल चे वाक्य सोडले तर बाकी सगळे पटले. कारण मला जे आज वाटते , पटते आहे ते बुद्धिवादी असे कसे ठरवणार !

In reply to by पिलीयन रायडर

यनावाला Tue, 12/15/2015 - 21:50
@पिलीयन रायडर ... पिलीयन रायडर यांनी हा विस्तृत प्रतिसाद फार छान लिहिला आहे. तो उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त झाला आहे असेही जाणवते. त्या लिहितात,
मी कधीच देवावर विश्वास ठेवु शकले नाही.... तुमचा देवाला विरोध नसुन, कर्मकांडाला आहे असंही अनेकांनी मला सांगितलेले आहे. पण मुळात माझा देव ह्या संकल्पनेवरच विश्वास नाहीये. ह्या अफाट, अथांग सॄष्टीवर नियंत्रण ठेवणारे कुणी एक आहे...त्याचे/तिचे माझ्याकडे लक्ष आहे. माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना त्या एकाच्या मर्जीने घडत आहे. माझ्या कर्माचा हिशोब कुणी ठेवत आहे इ. कोणत्याही कल्पनेवर माझा विश्वास नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने येणार्‍या पाप-पुण्य, पुजा, उपास-तापास, नवस, अभिषेक (थोडक्यात.. कर्मकांड!) ह्यावरही माझा विश्वास नाहीच.
वाहवा! भले भले! साधु ! साधु ! ब्राहो ! हियर ! हियर !! ....अगदी सुस्पष्ट आणि ठाम बुद्धिवादी विचार. पिलीयन यांचे हे लेखन प्रसंसनीय आहे.

In reply to by यनावाला

ट्रेड मार्क Wed, 12/16/2015 - 01:55
पिरातैंनी एवढा मोठ्ठा प्रतिसाद लिहिला पण यनावालांनी फक्त प्रतिसादातला त्यांना आवडला तेवढा भाग घेतला आणि उत्तर दिलं. तसेही ते फक्त त्यांना सोयीस्कर असेल त्याच प्रतिसादांना उत्तरे देतात. याचा अर्थ असा आहे का की त्यांना चर्चा करायची नाहीये. एकूण प्रकार असा दिसतोय की एक तर माझं मत माना नाहीतर मग तुम्ही निर्बुद्ध घोषित झालेले आहातच. महाशय, जर का स्वतःला एवढे बुद्धिवादी म्हणवता तर मग बाकी प्रतिसादांना पण उत्तर द्या की, निदान तार्किक प्रश्नांना तरी उत्तर द्या. समाज प्रबोधन करायचं तर चर्चेनी होईल. फक्त मी सांगतो तेच बरोबर असं म्हणत राहिलात, इतरांना मूर्ख ठरवत राहिलात तर तुम्हाला विरोधच जास्त होईल.

In reply to by ट्रेड मार्क

मराठे Wed, 12/16/2015 - 22:40
>> पिरातैंनी एवढा मोठ्ठा प्रतिसाद लिहिला पण यनावालांनी फक्त प्रतिसादातला त्यांना आवडला तेवढा भाग घेतला आणि उत्तर दिलं. काय उत्तर दिलं बुआ? त्यांनी जिथे उत्तरं द्यायला हवीत तिथं दिली आहेत. उग्गाच लाडू का नाही खाल्ला?? का नाही खाल्ला? याला तेच तेच उत्तर किती वेळा देणार? काही लोकांना मूर्ख "ठरवायला" लागतच नाही हेच खरं.

In reply to by मराठे

ट्रेड मार्क गुरुवार, 12/17/2015 - 02:57
तुम्ही मात्र एकदम तुमच्या बुद्धीची चमक दाखवलीत. मी पिरातैन्च्या विचारांवर भाष्य नाही केलं म्हणतोय आणि तुम्ही मात्र त्या अनोळखी बाइला दिलेल्या उत्तरात गुंतून पडलात. तुम्ही उल्लेख करताय ती उत्तरं त्यांनी तिथल्या बाईला दिली. आता खरंच दिली का? नक्की काय झालं हे आपल्याला माहित नाही आणि आणि यनावालांनी पुरावा पण दिलेला नाही. मी जे म्हणतो आहे ते असे - पिरातैन्च्या प्रतिसादात पहिला परिच्छेद सरळ सरळ यनावाला जे म्हणतात त्याचं समर्थन करणारा आहे. त्याचे लगेच यानावालांनी कौतुकपण केले. पण उर्वरित प्रतिसादात पिरातैंनी बाकी पण बरेच विचार मांडलेत, जे कदाचित यानावालाच्या विचारांशी जुळत नसावेत. म्हणून त्यांनी उल्लेख सुद्धा टाळला, कारण उत्तर दिलं कि अजून प्रश्न आले. कशाला उगीच फंदात पडा? त्यापेक्षा ते कसं करतात, आपण काडी टाकायची आणि गम्मत बघत बसायची त्यांच्या मताला मानणारा एखादा दिसला तर हात द्यायचा नाहीतर बाकीचे नगण्यच आहेत. फक्त याच नाही तर इतर धाग्यांवर सुद्धा यानावालांना कित्येक तार्किक प्रश्न विचारलेत, अनुभव सांगून त्याचं विश्लेषण करा म्हणून सांगितलय. पण ते असल्या गोष्टींची दाखल सुद्धा घेत नाहीत. खालील दुव्यांना भेट द्या - http://www.misalpav.com/comment/778798#comment-778798 http://www.misalpav.com/comment/770627#comment-770627 http://www.misalpav.com/comment/773576#comment-773576 या ठिकाणी यानावालांचे मिपावरील सर्व लेखन मिळेल. त्यातील प्रतिसाद वाचून तुम्हाला कळण्याची शक्यता असावी मी काय म्हणतोय ते. ता. क. शेवटचं वाक्य तुमच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतंय मात्र.

In reply to by पिलीयन रायडर

राजेश घासकडवी Tue, 12/15/2015 - 22:36
अगदी अचूक मांडणी. प्रतिसाद ऑफ द इयर!
पण प्रत्येक गोष्ट घडण्याची एक प्रोबॅबिलिटी असतेच....अनेकदा नवस बोलुन लोकांची कामं होतात, मग त्यांना "प्रचिती" आली असं ते म्हणतात. मला किती लोकांनी नवस बोलला आणि किती लोकांची कामं झाली असे प्रश्न पडतात.
मी नवस केला, आणि मला फायदा झाला हे वैयक्तिक अनुभवावर आधारित असतं. त्यामुळे 'नवस करणं उपयोगी ठरतं' असा विश्वास बसू शकतो. पण ते सिद्ध होण्यासाठी 'नवस केल्याने काही वेगळा फायदा होत नाही' हे नल हायपोथेसिस खोडून काढण्याची गरज असते. आणि त्यासाठी शंभर नवस न केलेले लोक आणि शंभर नवस केलेले लोक यांची तुलना करावी लागते. ही वैज्ञानिक पद्धत अशाच प्रॉबेबिलिस्टिक विचारावर आधारित आहे. आपल्याला दिसतं त्यावर किंवा खरं तर फक्त आपल्यालाच दिसतं केवळ त्यावरच विश्वास ठेवण्याऐवजी इतरांना वेगळं दिसत असेल का? मला जे दिसतं ते कुठल्यातरी नियमातून आलेलं सत्य आहे की प्रॉबॅलिटीतून, रॅंडमपणे हाती लागलेली गोष्ट आहे? असे प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. नास्तिक आणि आस्तिक विचारसरणीत व्यक्तिसापेक्ष सत्यावर की वस्तुनिष्ठ सत्यावर विश्वास, हाच फरक आहे.

In reply to by राजेश घासकडवी

सुबोध खरे Wed, 12/16/2015 - 12:02
गुरुजी मी नवस केला, आणि मला फायदा झाला हे वैयक्तिक अनुभवावर आधारित असतं. असंच काही लोक होमियोपथी बद्दल बोलतात. होमियोपथी च्या औषधांच्या आपण म्हणता तशा लक्षावधी रुग्णांवर चाचण्या झाल्या आहेत आणी त्यातून होमियोपथी हे प्लासिबो पेक्षा जास्त गुणकारी नाही असेही सिद्ध झाले आहे. मग होमियोपाथीची औषधे घेणार्यांना आस्तिक (किंवा अंधश्रद्ध) म्हणणार का? किंवा देव न मानणाऱ्या लोकांनी होमियोपथी ची औषधे घेतली तर ते अंधश्रद्ध होतात का? पहा मी सांगतो ना माझा गोंधळ आहे तो ( I AM NEITHER FORWARD NOR BACKWARD BUT JUST AWKWARD)

In reply to by पिलीयन रायडर

ट्रेड मार्क Wed, 12/16/2015 - 01:41
असे कोणी एक नाही पण एक वैश्विक शक्ती आहे जी तुम्हाला नियंत्रित करत नसेल पण तुमच्या क्रिया / प्रतिक्रिया, विचार यांमुळे आपल्यावर परिणाम होत असावा. थोडक्यात एक पॉझिटीव आणि निगेटीव शक्तीचं एक भांडार आहे आणि त्यातून तुमच्या कृतीप्रमाणे, विचारांप्रमाणे तुम्ही गोष्टी आकर्षित करता.
असे कोणी एक नाही पण एक वैश्विक शक्ती आहे जी तुम्हाला नियंत्रित करत नसेल पण तुमच्या क्रिया / प्रतिक्रिया, विचार यांमुळे आपल्यावर परिणाम होत असावा. थोडक्यात एक पॉझिटीव आणि निगेटीव शक्तीचं एक भांडार आहे आणि त्यातून तुमच्या कृतीप्रमाणे, विचारांप्रमाणे तुम्ही गोष्टी आकर्षित करता.
साधारणतः आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटना ह्या आपल्याच निर्णयांचे परिणाम असतात.
बरोबर आहे पण परिस्थिती सुद्धा परिणाम करतच असते, तुमची कृती तर महत्वाची असतेच. म्हणून तो कलेक्टीव परिणाम असतो. बाकी मुद्द्यांशी बाडीस. तरी पण मला एक प्रश्न नेहमी पडतो. काही लोकांची आयुष्य कशी अगदी आखीव असतात. सर्व गोष्टी त्यांना वेळच्या वेळी फारशी तोशीश न लागता मिळतात. एखादी चूक झाली यांच्या हातून तरी कोणीतरी ती शकतो वा सुधारून घेतो. या उलट काही लोक, काही पण करा कुठलीच गोष्ट धड होत नाही. खरं तर आपल्यापैकी काहींना अनुभव आला असेल के एखाद्या कालखंडात अश्याच सगळ्या गोष्टी अलगद घडत जातात. पण काही वेळा तुम्ही कितीही योग्य निर्णय घ्या, शेवटी त्रास होतोच. कधी कधी तर अनुभवांमधून शहाणं हॊउन आपण जर जास्त काळजीपूर्वक पावलं टाकावी आणि अगदी शेवटच्या क्षणी सगळं हातातून निसटावं. यावर काही विचार?

In reply to by ट्रेड मार्क

पिलीयन रायडर Wed, 12/16/2015 - 11:29
वैश्विक शक्ति म्हणा किंवा इतर काही. त्याचे परिणाम हे नक्की किती असतील आपल्या आयुष्यावर? मला वाटतं अगदी ठळक डायरेक्ट इफेक्ट नसावा. मग आपल्या आयुष्यात त्याला किती महत्व असावे? किती वेळ आपण त्याला द्यावा? अर्थात काहींना देवापाशी बसुन शांतता मिळते. त्यांच्यासाठी ते महत्वाचे आहे. पण तरीही अगदीच देव देव करत बसणे, देवाचे अवडंबर करणे, त्यापायी आजुबाजुच्या सर्वांनाच वेठीस धरणे, आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित न करता दैवावर हवाला ठेवुन बसणे इ गोष्टी घातकच. अशी माणसे देवधर्म पाळत असुनही आपल्याभोवती प्रचंड निगेटिव्ह व्हाईब्स तयार करत असतात. अनेकदा कडक सोवळे ओवळे पाळणार्‍या पुरुषांच्या बायका किंवा बायकांच्या सुना भयंकर करवादलेल्या दिसतात. कारण एकाच्या धार्मिकतेच्गे ओझे दुसर्‍याच्या खांद्यावर पडलेले दिसते. थोडक्यात, आस्तिकता आणि नास्तिकता ह्याही पेक्षा जास्त माणसाचा स्वभाव, आचार विचार हे जास्त महत्वाचे पैलु आहेत. त्यावर त्याचे निर्णय, प्रतिक्रिया अवलंबुन असाव्यात. ह्या सर्वात "वैश्विक" शक्ति नक्की कसा प्रभाव टाकते ते माहिती नाही.
कधी कधी तर अनुभवांमधून शहाणं हॊउन आपण जर जास्त काळजीपूर्वक पावलं टाकावी आणि अगदी शेवटच्या क्षणी सगळं हातातून निसटावं. यावर काही विचार?
असं घडताना दिसतं खरं. पण मला वाटतं ह्यात "नशीब" किंवा "भाग्य" ह्या हातात नसलेल्या गोष्टींसोबतच किंवा नास्तिकाच्या दृष्टीने विचाराल तर नशीबापेक्षा सुद्धा तुमचे निर्णय, स्वभाव, परिस्थिती, वेळ (टायमिंग) हे सुद्धा फार महत्वाचे घटक आहेत. आमची एक बहिण आहे. तिच्या आयुष्यात अगदी असंच घडताना दिसतं. कशालाच यश येत नाही. वरकरणी हा नशिबाचाच भाग वाटतो. पण नीट विचार केला तर भावजींची नोकरी करतानाची धरसोड वॄत्ती, ताईचे शिक्षणात एक ना धड भाराभार चिंध्या..डिग्र्या दहा, पण पैसा आजवर एकातुनही मिळवला नाही. निर्णय घेताना भावनिक विचार, व्यावहारिक नाही. चुकांतुन शिकण्याची समज नाही, तेच तेच परत करत रहातात. भोळसट स्वभाव. अशी एक ना दोन, हजार कारणं देता येतील. आता मला ताईच्या नशीबात काही दोष दिसत नाही. हे वरचे गुण असतील तर भाग्यवंतसुद्धा आपटी खाईल नाही तर काय?

In reply to by पिलीयन रायडर

प्रभाकर पेठकर Wed, 12/16/2015 - 12:14
>>>>तिच्या आयुष्यात अगदी असंच घडताना दिसतं. कशालाच यश येत नाही. 'आपल्याला यश येतच नाही' ह्या विचारांमधून एक नकारात्मक वृत्ती तयार होत जाते. नकारात्मक आत्मविश्वास तयार होऊन १०० टक्के प्रयत्न होत नाही. परिस्थितीचा सर्वांगीण विचार केला जात नाही, आढावा घेतला जात नाही. केलाच तरी त्यातील नकारात्मक गोष्टीच प्रभावाने जाणवतात. आपल्याला यश मिळणारच नाहिये ह्या नकारात्मक विचारातून आणि डळमळीत मनोवस्थेतून पुरेपुर प्रयत्न होत नाही. आणि पुन्हा अपयशच येतं. ह्या उलट जर सकारात्मक दृष्टीकोन असेल तर परिस्थितीचे, प्रसंगाचे अवलोकन करताना सकारात्मक गोष्टी नजरेस पडून आत्मविश्वास वाढतो. 'येस्स! मी करू शकते किंवा करू शकतो'. हा विचार परिश्रमात थकवा निर्माण करत नाही आणि व्यक्ती १५० टक्के प्रयत्न करते आणि यश येतं. दोन्ही गोष्टींचा, सकारात्मक आणि नकारात्मक, अतिरेक न करण्यातच बौद्धीक समतोल दिसून येतो. यश मिळणारच नाही ह्या टोकाच्या भुमिकेतही जाऊ नये आणि यश मिळणारच हा फाजिल आत्मविश्वासही असू नये. प्रयत्न मात्र जीवाच्या आकांताने करावेत पण डोळे उघडे ठेवून आणि सतत बदलत्या परिस्थितीचे अवलोकन करीत करावेत. 'अपयश ही यशाची पहिली पायरी असते' ह्या विचाराने पुन्हा जोमाने कार्यास लागावे.

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ Wed, 12/16/2015 - 10:56
इथे खुप लोक यनावालांच्या आजवरच्या लिखाणाला विचारात घेऊन लिहीत आहेत. म्हणुन कदाचित "नास्तिक स्वतःला शहाणे समजतात" वगैरे प्रतिक्रिया येत असाव्यात, जर व्यक्तिसापेक्ष चर्चा करायची नसेल आणि केवळ आस्तिक - नास्तिक हाच मुद्दा असेल तर माझी विचारप्रक्रिया मांडायला मला आवडेल.
पिरा : आस्तिक नास्तिक चर्चा जालावर आणि खर्‍या आयुष्यात पण वर्षानु-वर्ष चालू आहे. मला त्या चर्चे चा प्रचंड कंटाळा आला असल्यामुळे कित्येक वर्षापूर्वीच ती चर्चा करणे मी सोडले. मिपावर पण तश्या प्रकारची चर्चा चालूच असते. इथे माझ्या कडुन तरी चर्चा फक्त यनावाला आणि त्यांच्या सारखे लोक बाकीच्यांना निर्बुद्ध, समज नसलेले, "इतके साधे कसे कळत नाही" वगैरे आडुन आडुन किंवा कधी कधी स्पष्टपणे म्हणत असतात त्या बद्दल च होती.
राहता राहिला प्रश्न की बॉस समोर तुम्ही ही "मिजास" दाखवाल का? हा प्रत्येकाच स्वभाव झाला. मी दाखवते. काहींना बॉसची इतकी भीती असते की ते बॉस जे जे म्हणेल ते ते सर्व काही खालीमान घालुन ऐकतात. ह्यात आस्तिकता- नास्तिकता कुठुन आली? बॉस नास्तिक असेल तर त्याला घाबरणारा आस्तिक मनुष्य बॉसच्या सोयीप्रमाणे स्टॅण्ड घेऊच शकतो. डबल स्टॅण्डर्ड सगळेच दाखवतात. केवळ नास्तिक नाही.
माझा प्रश्न एकदम बरोबर होता. . कोणी नमस्कार कर म्हणले किंवा प्रसाद घे म्हणल्यवर आप्ली तर्कबुद्धी वापरुन नाही म्हणण्याची हिम्मत दाखवणारे बॉस च्या मूर्खपणाला नाही म्हणतात क?? आस्तिक कधीच मॉरल हायग्राऊंड घेउन बोलत नाहीत. त्यामुळे नास्तिकांकडे माझा पॉईंटर आहे. तो सुद्धा यनावालांसारख्या

In reply to by प्रसाद१९७१

पिलीयन रायडर Wed, 12/16/2015 - 11:43
मी वर तेच म्हणतेय.. बॉसला न घाबरता बोलणारे बोलतीलही. हा स्वभावाचा भाग झाला. न बोलणारे हे नेहमी घाबरत असतीलच असही नाही, तो त्यांच्या स्ट्रॅटजीचाही भाग होऊ शकतोच. नोकरी हे प्रकरण राजकारणाने भरलेले असते. तिथे नक्की किती लोक आपले खरे विचार उघड करतात हाच एक प्रश्न आहे. माणसाचे अनेक अंतस्थ हेतु असतात इथे. बॉसला नाही म्हणायचं नाही म्हणुन दारु सिगरेटही नाही म्हणत नाही लोक.. प्रसाद का नको म्हणतील..?! शिवाय बहुदा यनावालांनीच इथे लिहीलय वाटतं, की एरवी प्रसाद खाल्ला असताच. पावती पुस्तक घेऊन आल्याने त्यांनी नाकारला. लक्षात घ्या, इथे फरक आहे. मी तरी आजवर कुण्या नास्तिकाने केवळ प्रसाद म्हणुन अन्न नाकारले हे पाहिलेले नाही. गोडधोड खायला कोण नाही म्हणतय हो!! पण पावतीपुस्तक आले की परत तो सगळा कर्मकांडाचा व्यवहार आला.. पैसाताइ म्हणते की ती ११/- ची पावती फाडुन मो़कळी होते. कोण डोकं लावणार? तिला तो मार्ग सोयीचा वाटतो. पण यनावाला किंवा ह्या प्रसंगात अगदी मी सुद्धा देवस्थानात एक रुपयाही देऊ शकत नाही. मला कळत नाही की ह्यात आम्ही आमच्या पुअरते आमचे विचार फॉलो करत असताना, लोकांनी प्रश्न उपस्थित करावेच कशाला? हा नास्तिकाचा खाजगी प्रश्न नाही का? यनावाला लोकांना बोलले असते की प्रसाद खाऊ नका तर तुम्ही प्रश्न उभे करा. रादर करालच. पण कुणी प्रसादाचे काय करावे हे आस्तिकच ठरवणार का आता? हो हो.. तुम्ही परत तेच म्हणणार की हे सगळं बॉस समोर कराल का वगैरे वगैरे... परत पहिली ओळ वाचा..
आस्तिक कधीच मॉरल हायग्राऊंड घेउन बोलत नाहीत.
नक्की? खुपच ठाम विधान आहे हे. एकदा फेरविचार करुन सांगा. मग बोलु.

कवितानागेश Tue, 12/15/2015 - 19:12
सगळी चर्चा वाचली. बनेल होमो सेपियन च्या बनेल वागणूकीबद्दलची चर्चा नेहमीच गमतीदार असते! तशीच वाटली! देवाचे काय म्हण णे आहे या सगळ्याबद्दल ते मात्र कळले नाही! ;)

गामा पैलवान Tue, 12/15/2015 - 19:59
लोकहो, यनावाला समारोपाच्या वाक्यात म्हणतात की माणसाने आशावादी असावे. पण आशा म्हणजे नक्की काय? च्यामारी, नास्तिकाने दाखवला की आशावाद आणि अस्तिकाने दाखवला की अंधश्रद्धा ! लय भारी ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मराठे Wed, 12/16/2015 - 22:44
देवाला नवस केल्याने मुल(गा) होईल असे म्हणणे म्हणजे अंधश्रद्धा, आणि मुल होत नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करून घेऊन घेणे आणी कोणताच दोश नसेल तर आज न उद्या (प्रयत्नांती) मुल होईल ही अपेक्षा बाळगणे म्हणजे आशावाद.

In reply to by मराठे

संदीप डांगे Wed, 12/16/2015 - 22:51
कोणताच दोश नसेल तर
"उपलब्ध वैद्यकिय विज्ञान शरीरातील सर्व दोषांचा खात्रीशीर शोध लावू शकते व उपलब्ध आधुनिक विज्ञानाने शरीरात कुठलाही दोष नाही म्हटले म्हणजे नसणारच" हे मानणे म्हणजे अंधश्रद्धा. बाकी चालु द्या..

In reply to by संदीप डांगे

मराठे Fri, 12/18/2015 - 22:25
जर आपल्याकडे पैसा आणि वेळ असेल तर सर्व वैज्ञानिक प्रयोग स्वतः करून आपण खात्री करून घेऊ शकतो. त्यामुळे ती अंधश्रद्धा ठरत नाही. मूळ फरक इथे आहे. "आजवरच्या ज्ञानाप्रमाणे आपल्या शरिरात दोष नसेल" असंही म्हणू शकतो पण ते प्रत्येक बाबतीतच लागू होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा म्हणायची गरज नाही. याउलट देवाची मर्जी असं एकदा म्हटलं की पुढे बोलणंच खुंटलं! शिवाय देव स्वतः काहीच बोलत नाही, त्यामुळे तिथे अंधपणे विश्वास ठेवण्यापलिकडे काहीच करता येत नाही.

In reply to by मराठे

गामा पैलवान Sat, 12/19/2015 - 01:55
मराठे, जर एखाद्या रोगाचं निदान (उदा. कर्करोग) सर्व ज्ञान व पैसा पणाला लावूनही झालं नाही. मग जर देवाची मर्जी म्हंटलं तर चालेल का? इथे मानवी प्रयत्न अगोदरच खुंटलेले आहेत. आ.न., -गा.पै.

सप्तरंगी Tue, 12/15/2015 - 20:56
भावना नक्कीच सगळ्यांनाच असतात , पण प्रसादाबद्दलच्या भावना आस्तिकांनाच असतात, नास्तिकांना नाही. नास्तिकांना प्रसादाबद्दल , देवाबद्दल त्या नसतात म्हणूनच कदाचित ते त्याचा पदार्थ म्हणून स्वीकार करू शकतात. अर्थात तुमचे स्वच्छता वगैरे बद्दल चे विचार बरोबरच आहेत ते त्या वेळेस लागू पडत असतील तर आणि तेच निकष सगळ्याच (धाब्यावरच्या हि ) पदार्थांना लावत असाल तर ! खुपदा आपण गोष्टींना brain पेक्षा भावनेने तोलत राहतो, भावना बाजूला ठेवुन विचार केला तर दुसर्यांना समजून घेणे जर सोपे होते. आस्तिक माणसाला देव या संकल्पनेबद्दल असा ब्रेन ने विचार करणे जर अवघड असते त्यामुळे त्यांच्या भावना न दुखावता मत मांडले तर ...कदाचित नाही पटले तरी ओपिनिअन दिफ्फेर्स असा विचार करत जगणे सोपे होऊ शकते… by the way इथे कोणताच आस्तिक नास्तिकाच्या नावाने बोंब मारत नाहीये हो, उगीच मुद्दा सोडून काहीही बोलू नका.

आस्तिकांचा बाय डिफॉल्ट चमत्कारावर विश्वास असल्याने काही गोष्टींच्या बाबतीत त्यांनी सारासारविवेक सोडणे सहज शक्य आहे; पण आम्ही फक्त शास्त्रिय विचारच करतो असा दावा करणारे नास्तिक जेव्हा सारासारविचार सोडून बोलतात/करतात व "फक्त मलाच्च अंतिम सत्य माहित आहे आणि ते इतरांवर लादण्याचा हक्कही आहे" असे म्हणतात तेव्हा ते खूपच विनोदी दिसते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रभाकर पेठकर Wed, 12/16/2015 - 11:21
डॉक्टरसाहेब, "फक्त मलाच्च अंतिम सत्य माहित आहे आणि ते इतरांवर लादण्याचा हक्कही आहे" असं कुठे दिसलं तुम्हाला? मलातरी लेखात असे विचार मांडलेले दिसले नाही. नास्तिकांना नेहमीच वाटते की चर्चा करून, उदाहरणे देऊन, स्वानुभव सांगूंन एखद्याचे मतपरिवर्तन करता आले तर करावे. जमलंच तर ठिकच आहे नाहीतर त्यांची मते त्यांच्याजवळ, आपली मते आपल्याजवळ असं म्हणून वादातून माघार घेतली जाते. (नास्तिकाकडून). आस्तिकाला माघार घेणे पसंद नसते. त्याच्या भावना जास्त तीव्र असतात. त्यामुळे तार्किक उत्तरे नाहीच जमली (जी जमत नाहीतच) तर 'आमची/माझी श्रद्धा आहे' असे म्हणून चर्चेला पूर्णविराम दिला जातो. निर्भया प्रकरणाच्या काळात अनिरुद्ध बापूंनी म्हंटले होते,' निर्भयाने अनिरुद्ध चालीसा वाचलं असतं तर तिच्यावर बलात्कार झाला नसता.' एव्हढच काय पण 'अनिरुद्ध चालीसा वाचूनही कोणी बलात्कार केलाच तर तो पुरुष नपुसंक होईल.' माझ्या एका अनिरुद्ध भक्त मित्राला हे सांगून यूट्यूब वरील त्यांचे भाषण ऐकवून जेंव्हा विचारलं तुला हे पटतं का? त्यावर तो गप्प बसला त्याच्याकडे उत्तर नव्हतं. पण आपलं कांही चुकतंय, आपण चुकीच्या ठिकाणी आपल्या श्रद्धा अर्पण करतो आहोत हे कबूल करायचे धाडस त्याच्यापाशी नव्हते, अजूनही नाही. तो उच्चशिक्षित आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर, एमबीए आहे. पण त्याने 'आमची श्रद्धा आहे' हे पूर्णविरामी वाक्य माझ्या तोंडावर फेकून पुढील चर्चेलाच बूच मारून ठेवलंय. अर्थात ह्या वादातून आमचे संबंध बिघडले वगैरे नाहीत. अजूनही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत पण जेंव्हा जेंव्हा भेटतो तेंव्हा त्याला माझी आणि मला त्याची मते माहित असल्यामुळे हा विषय टाळून बोलतो. अजूनही त्याची अनिरुद्ध भक्ती तितक्याच तीव्रतेने आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ Wed, 12/16/2015 - 11:34
नास्तिकांना नेहमीच वाटते की चर्चा करून, उदाहरणे देऊन, स्वानुभव सांगूंन एखद्याचे मतपरिवर्तन करता आले तर करावे.
इथेच लादणे दिसते पेठकर काका. कोणी आस्तिक माणुस जर निमंत्रण देत असेल नास्तिकाला की या आणि माझ्या विचार्/मता ची चिकित्सा करा तर ठीक आहे. पण हे नास्तिक थेट चर्चा झाली च पाहीजे असे म्हणतात. तुमचेच उदाहरण बघाना, तुमचा मित्र संभ्रमात पडला होता का आणि तुमच्या कडे सल्ला मागायला आला होता का? नाही पण तुम्हीच त्याला प्रश्न विचारुन चर्चेला आव्हान देत आहात.

In reply to by प्रसाद१९७१

नाखु Wed, 12/16/2015 - 12:05
पेठकर काका तुमचा मित्र आस्तीक आहे क ते माहीत नाही पण जरा जगातल्या वेगवेगळ्या छटा पहा आणि ठरवा सगळयांना एकाच श्रेणीत ठेवायचे का ?
रूढार्थाने काही व्याख्या अशा करता येतील. देव - या विश्वाचा कारभार सहेतुकपणे चालविणारा कोणीतरी . आस्तिक- असा सहेतुकपणे चालविणारा नियंता मानवाप्रमाणेच मंगल अमंगलाच्या कल्पना बाळगून आहे व त्याचीच कृपा आपल्यावर असावी असे वाटणारे लोक. ( सगुण परमतत्व) अस्तिक नास्तिकाच्या मधले.- देव दिसला नाही तरी तो असू शकेल असे मानणारे सबब असलाच तर तो प्रसन्न व्हावा म्हणून धडपडणारे. नास्तिक- असा सहेतुकपणे जग चालविणारा कोणीही नाही. जग्॑ हे एक परस्परावलंबी संरचना आहे. तिला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर तिने मांडलेले स्प्ष्ट नियम पाळले पाहिजेत असे मानणारे लोक. हटवादी नास्तिक - यात देवळात काय जायचे? दगडाला काय नमस्कार करायचा ? पूजा कशाला करायची? असा पराकोटीचा व्यवहारवाद पाळणारे लोक. अध्यात्मवादी - नेहमीच्या अर्थाने - गुरू, अनुग्रह, जप, साधना, सप्ताह, पोथीवाचन, मंत्रजागर, संप्रदाय, पुनर्जन्म, ई त रमणारे कर्मकांडवादी- पूजा,कुळाचार, व्रतवैकल्ये, उद्यापने, उपासतापास, भोजने, पितरशान्ती, ई गोष्टी आदराने भीतीने वा आवडीने करणारे. वेगळा अध्यात्मवाद - बाह्य शक्ती उदा देव गुरू ई ई च्या कृपेच्या शोधात निघण्यापेक्षा आतल्या अवाजाच्या जवळ जाणे मी इथे कशासाठी आलो. त्यात कितपत गुंतायचे ? ममत्वाच्या लफड्यात कितपत पडायचे मी स्वतः ला कसे बघायचे व बोधायचे याचा अभ्यास .
संपूर्ण माहीती चौराकाकांच्या माहीती पूर्ण प्रतिसादातून : तुम्ही स्वतः च वरती कुठे तरी सांगीतले की, तत्व निष्ठा+कठोरता तुम्ही घरच्या सदस्यांबाबत तेवढी टोकाची दुराग्रहाची ठेवत नाहीत ( त्या वेळी त्यांचे मन राखणे, भावनांची बूज हा जास्ती महत्वाचा निकष असतो) तीच बाब सर्व जण सांगण्याचा प्रयत्न करतात तुमचा मित्र अध्यात्मवादी आहे आणि तुमच्या सांगण्याने त्याला काहीही फरक पडणार नाही. एखाद्याने नुसता देवाला किंवा जेष्ठ व्यक्तीला नमस्कार केल्याने काही ब्रम्हांड कोसळणार नाही. अर्थात त्याने दे रे हरी खाटल्यावरी असे करू नये (हाच फरक जुण्या खरोखरच्या संतांमध्ये आणि आत्ताच्या "संस्कार्/आस्था फेम निरमल बाबा/आसाराम यांच्यात आहे. साप समजून भुई धोपटू नये या करिता हा प्रतिसाद प्रपंच. सहजीवनात भावनांनाही व्यवहाराईतकेच महत्व आहे असे जाणणारा नाखु

In reply to by नाखु

प्रभाकर पेठकर Wed, 12/16/2015 - 12:31
>>>> तत्व निष्ठा+कठोरता तुम्ही घरच्या सदस्यांबाबत तेवढी टोकाची दुराग्रहाची ठेवत नाहीत ( त्या वेळी त्यांचे मन राखणे, भावनांची बूज हा जास्ती महत्वाचा निकष असतो) तीच बाब सर्व जण सांगण्याचा प्रयत्न करतात. इथे मित्राच्या बाबतीतही मी तोच निकष लावला आहे. त्याच्या अंधश्रद्धेमुळे मी त्याच्याशी मैत्री तोडलेली नाही. आम्ही अजूनही चांगले घनिष्ट मित्र आहोत. एव्हढ्या एका विषयात आमच्यात मतभिन्नता आहे हे दोघांनीही स्विकारले आहे. त्यामुळे घरच्या सदस्यांबाबत एक भूमिका आणि इतरांबाबत दूसरी भूमिका असा दुटप्पीपणा माझ्या वागण्यात नाहीये. दुर्दैवाने मी दिलेली लिंक कोणी उघडून पाहिलेली दिसत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

प्रभाकर पेठकर Wed, 12/16/2015 - 12:23
>>>>इथेच लादणे दिसते पेठकर काका. नाही. हे लादणे होऊ शकत नाही. मैत्रीत, विविध विषयांवर, चर्चा नेहमीच होत असतात, व्हाव्यात. वादे वादे जायते तत्व बोधः मैत्रीत आपण देशाच्या पंतप्रधानांपासून गल्लीतल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तींच्या वागण्यावर चर्चा करीत असतो. ह्या चर्चेतूनच आपले ज्ञान वाढत असते. नाहीतर ते तसेच पडून राहून गंजू लागेल. आपल्या धर्मातही चर्चेला, मतप्रदर्शनाला अडकाठी नाही म्हणून आपण विचारांनी लवचिक आहोत. मुसलमान धर्मात अशी परवानगी नसल्यामुळे त्यांची प्रगती खुंटली आहे. चर्चा करणे, उदाहरणे देणे, स्वानुभव सांगणे हे दोन्ही बाजूंनी होत असते. त्यात कोणी कोणावर आपले विचार लादत नसून ती समोरच्याचे विचार जाणण्याची प्रक्रिया आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण आपलं कांही चुकतंय, आपण चुकीच्या ठिकाणी आपल्या श्रद्धा अर्पण करतो आहोत हे कबूल करायचे धाडस त्याच्यापाशी नव्हते, अजूनही नाही. तो उच्चशिक्षित आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर, एमबीए आहे. पण त्याने 'आमची श्रद्धा आहे' हे पूर्णविरामी वाक्य माझ्या तोंडावर फेकून पुढील चर्चेलाच बूच मारून ठेवलंय.
यावरुन मला औषध उतारे आणि आशिर्वाद हे आठवले

शब्दबम्बाळ Tue, 12/15/2015 - 23:04
निम्मी चर्चा तर प्रसादाच्या लाडू वरच चाललीये!! :D प्रसादाच लाडू तू का न्हाई खाल्ल, भक्तांच्या देवाला तू का र डावल्ल!! (चाल सांगायची गरज नसावी!)

प्रभाकर पेठकर Wed, 12/16/2015 - 03:27
श्री यनावाला ह्यांनी कुठेही त्यांच्या लेखात आस्तिक निर्बुद्ध आणि नास्तिक बुद्धीवान असे म्हंटल्याचे मला जाणवले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार आस्तिक आणि नास्तिक मध्ये भावनेने विचार करण्याचा आणि भावनेला बाजूला ठेवून मेंदूने विचार करण्याचा फरक आहे. >>>> आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. ह्या मध्ये, 'तुम्हा सर्वांना बुद्धी आहेच फक्त त्यावर भावना नियंत्रण ठेवते आहे म्हणून कांही गोष्टी तुम्हाला समजू शकत नाहित' असे ते म्हणताहेत. म्हणजेच आस्तिकांनाही बुद्धी असल्याचेच त्यांचे म्हणणे आहे. आस्तिकांना त्यांनी निर्बुद्ध म्हंटलेले नाही. बरं, आस्तिकांचे वागणे कसे होते? " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." म्हणजे पाहा. संवादाला सुरुवात आस्तिकांनी केली. नास्तिकाने नाही. त्यांना 'अहंकारी' ही संज्ञा आस्तिकांनीच दिली. नास्तिकाचे वागणे पटले नसल्याचे, कारण नसताना, एका आस्तिकानेच बोलून दाखविले. प्रसादाचा लाडू नाकारण्याचा निषेध करून त्याचे दुष्परीणाम भोगायला लागण्याची गर्भित सूचनाही आस्तिकाने दिली. आस्तिकानेच नासक्या आंब्याची उपमा नास्तिकाला दिली. जो सहप्रवासी स्वखर्चाने आणि आयोजकाच्या विनंती नुसार आला आहे त्याला 'तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते' असे अवमानकारक बोलणेही आस्तिकाचेच. गप्प बसा. खूप ऐकले तुमचे. हे कांही अधिकार नसताही एखाद्याला रागे भरणे आस्तिकाचेच. एव्हढे होऊनही नास्तिक स्वतःला बुद्धीवादी समजतात. आस्तिकांना निर्बुद्ध समजतात. आस्तिकांच्या भावना दुखावतात वगैरे वगैरे आरोप हे निखालस खोटे आणि असहिष्णूतेचे आहेत. चर्चा जरूर करावी. त्यासाठीच हा धागा आहे. पण तारतम्य सोडून लेखन करू नये. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

राही Wed, 12/16/2015 - 07:19
लेख आणि त्यावरचे सगळे प्रतिसाद वाचताना नेमके हेच जाणवत होते. यनावालांची भाषा सौम्य, जे घडले ते काही अतिशयोक्ति न करता वर्णन करणारी, तिरकसपणा टाळलेली अशी होती. त्यांनी कुणावरही असले आरोप केलेले दिसले नाहीत. उलट कित्येक विरोधी प्रतिसाद हे थेट आरोप करणारे, टिंगलटवाळी टोंमणे वापरलेले, आक्रमक असे होते. नेहमीच दिसते की आस्तिकांच्या श्रद्धा ह्या समूहाने किंवा कधीकधी झुंडीने प्रगट होणार्‍या, समूहाचे मानसशास्त्र बाळगणार्‍या असतात. विरोधी विचारांच्या अल्पसंख्यांना त्रास होईल इतपत विज़िबिलिटी असणार्‍या असतात. शिवाय आपल्या श्रद्धांचा आवाजी प्रसार करणार्‍या, कसली तरी भीती अथवा कसले तरी आमिष दाखवून कळपात ओढू पाहाणार्‍या असतात. नास्तिकांचा गट असू शकतो पण त्याची झुंड बनत नाही कारण विवेक हेच त्यांचे अधिष्ठान असते. सध्या ते अल्पसंख्य आहेत म्हणून दबून राहातात असेही नाही. त्यांची बहुसंख्या झाली तरी त्यांच्या सामाजिक वर्तनात फरक पडत नाही. कारण एकच, विवेक, सदसद् विवेक. जे चैतन्य विश्वात दिसते, ते आहे, इतके म्हणणे पुरेसे आहे. त्याला लोटांगण घालण्याची जरूरी नाही हे पिरांचे वाक्य अगदी मार्मिक आहे. पिरा, प्रभाकर पेठकर, मराठी कथालेखक यांचे प्रतिसाद विशेष आवडले.

In reply to by राही

आनन्दा Wed, 12/16/2015 - 14:12
नास्तिकांचा गट असू शकतो पण त्याची झुंड बनत नाही कारण विवेक हेच त्यांचे अधिष्ठान असते. सध्या ते अल्पसंख्य आहेत म्हणून दबून राहातात असेही नाही. त्यांची बहुसंख्या झाली तरी त्यांच्या सामाजिक वर्तनात फरक पडत नाही. कारण एकच, विवेक, सदसद् विवेक.
बाकी चालू द्या. सदसद्विवेक ही व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. त्याचा अस्तिकतेशी किंवा नास्तिकतेशी काहीही संबंध नाही. असो. यावर अधिक न बोलणे उत्तम.

In reply to by प्रभाकर पेठकर

हि एका नास्तिकाने कथन केलेली घटना आहे. याचा अर्थ हि नास्तिकाने मांडलेली आपली बाजू आहे असं मला वाटतं. हि घटना अशीच्या अशी घडली असं गृहीत धरून नास्तिक कसे आणि आस्तिक कसे (वागले किंवा वागतात) हे मांडणंच मुळी चुकीचं वाटतं. त्या घटनेतला एखादा आस्तिक बाजू मांडायला असता तर जमला असता हा तिय्या! बाकी निर्बुद्ध नव्हतं म्हणायचं तर "पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते" यातून नेमकं काय म्हणायचं होतं. नास्तिकांना (सगळ्या नसलं तरी यनावाला यांसारखे काही) अभिप्रेत असलेले आस्तिक लोक बुद्धी लावून श्रद्धेने लिप्त होत नाहीत तर बुद्धी न लावता श्रद्धेने लिप्त होतात असं? याबद्दल नास्तिकांना काही अडचण असण्याचं कारण नसावं असे मज पामरास वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आनन्दा Wed, 12/16/2015 - 19:41
"पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते"
याचा अर्थ मनात श्रद्धा असेल तर तुम्ही त्या बाबतीत सारासार विचार करत नाही. हे काही फक्त देवाच्या बाबतीतच नव्हे, तर जर तुम्ही एखादी गोष्ट श्रद्धेने मानली की तुम्ही त्या बाबतीत चिकित्सा करणे सोडून देता. अगदी साधे उदा. पहा - तुमचा एक मित्र आहे जो तुम्हाला शेअर बाजाराच्या टिप्स देतो, त्या टिप्स खर्‍या ठरतात, असे समजा. जर तसे झाले तर तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्याअ टिप्सची चिकित्सा कराल का? अगदी उद्या त्याच्या टिपच्या विरुद्ध बाजार जाताना दिसला तरी देखील तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेऊन व्यवहार कराल. पण हेच जर तुमची श्रद्धा नसेल, आणि तुम्ही त्याच्या टिपचा डोळसपणे स्वीकार करत असाल, तर मात्र तुम्ही ती टिप तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहाल, कआचित तुम्हाला पटेल, कदाचित नाही. म्हणूनच जिथे श्रद्धा आहे, तिथे बुद्धी नाही. हे अगदी मी आस्तिक असलो तरी देखील मान्य करेन. जिथे मला बुद्धी लावता येते, तिथे मी बुद्धी लावेनच. श्रद्धा ठेवण्यापूर्वी सगळी शक्य असलेली चिकित्सा करीन, पण नंतर बुद्धीचा वापर कमी, असलाच तरी तो समोरच्या व्यक्तीचे म्हणणे खरे आहे की खोटे आहे हे शोधायला होणार नाही, तर समोरच्या व्यक्तीला नेमके काय अभिप्रेत आहे हे शोधायला होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

ट्रेड मार्क गुरुवार, 12/17/2015 - 03:25
कृपया त्यांचे सर्व लेख वाचा. इथेच त्यांच्या लेखांची यादी दिलेली आहे. त्या लेखांचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की जे नास्तिक असतात तेच बुद्धिवादी असतात आणि बहुतेक सर्व बुद्धिवादी नास्तिक असतात. देवाला मानणे हि एक मूर्खपणाची गोष्ट आहे, एवढेच नव्हे तर या ठिकाणी ते लिहितात "आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते." यातच पुढे लिहितात "जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो." त्यांचा हा लेख तर वाचाच. मंत्रांचा वापर कसा करून बघताहेत ते वाचून करमणूक होईल. बादरायण संबंध कसा लावलाय ते बघा. आता एखाद्याला एक मंत्र म्हणून बरं वाटत असेल तर केवळ तो मंत्र आहे म्हणून ते चुकीचं आहे? माझी मुलगी अगदी लहान असल्यापासून रात्री झोपताना रडायची. काही केल्या थांबायची नाही. डॉक्टरनी पण सांगितलं होतं की तिला शारीरिक तसा काही त्रास नाहीये. विविध प्रयोगांचा एक भाग म्हणून एकदा रामरक्षा लावली तर अक्षरशः ५ मिनटात झोपली. नंतर तिला काय कळतंय म्हणून दुसरी (विविध चालींची) गाणी लावली तर ते नको होतं तिला. फक्त रामरक्षाच ऐकून झोपायची. आता याचं काही बुद्धिवादी स्पष्टीकरण आहे का? मग आता या ठिकाणी एखादा नास्तिक असता तर म्हनला असता का की मुलगी कितीही रडली तरी चालेल पण असले मंत्र वगैरे लावायचे नाहीत? आपण कुठले अनुभव सांगितले की तुम्ही विश्लेषण करा, आपलं म्हणणं मांडल तर त्याला ते उत्तर देतच नाहीत कारण ते त्यांच्या समजूतीविरोधात आहे. एवढेच कशाला, प्रतिसादातला आपल्याला अनुकूल भाग घेवून उत्तरं देतात. पाहिजे तर तुम्ही एकदा प्रयोग करून बघा. असो. ज्याचा त्याचा देव ज्याच्या त्याच्या जवळ, तुम्ही मानलं तरी किंवा नाही मानलं तरी.

मनीषा Wed, 12/16/2015 - 09:38
विचारप्रवर्तक लेख ... शुभ- अशुभ, पवित्र-अपवित्र .. या प्रकारांच आपल्याकडे अति अवडंबर माजवले जाते असं मलाही वाटतं . त्यातही पायगुण हा प्रकार अति भयंकर . त्या पायी कित्येक निषपाप मुलींचे आयुष्य इध्वस्तं झाले असेल याला गणतीच नाही. देवळात गेल्यावर मी देवापुढे हात जोडते, अंगारा लावून घेते . असं म्हणतात ना .. व्हेन इन रोम.. डु अ‍ॅज रोमन्स डु . पण मी असे केले नाही तर आकाश कोसळेल असं मला वाटत नाही. एक कथा आठवते.... मुसळधार पाऊस पडत असतो. सगळ गाव पाण्याखाली बुडलेले असते. टेकडीवरच्या देवळात काही जीव वाचवून आश्रयाला आलेले असतात. त्यात पुजारी, जमिनदार, गुरूदेव, डॉक्टर असे प्रथितयश असतात. त्यात एक स्त्री असते. समाजात मान्यता नसलेली, वाळीत टाकलेली आणि तिरस्करणीय. पावसाचा जोर वाढतच असतो. विजा चमकत असतात. देवळाच्या अगदी माथ्यावर. लोक जीव मुठीत धरून बसलेले. ती वीज कधीही पडेल असे वाटत असते, पण पडत नसते. धर्मगुरूला लोक याचा अर्थ विचारतात. ते सागतात, आपल्यात कुणीतरी पापी आहे. त्याला घेऊन जाण्यासाठी वीज येते, परंतु काही पुण्यात्मांच्यामुळे परत जाते. मग ते सांगतात ,, प्रत्येकाने काही काळासाठी देवळाचा आश्रय सोडून अंगणात जायचे. जो पापी असेल त्याच्यावर वीज पडेल. आणि बाकीचे वाचतील. प्रथम जायचे कुणी. मग त्यांनी प्रत्येकाचा क्रमांक ठरवला. प्रत्येकजण आपल्या पापपुण्याची मनात उजळणी करत होते. ती बाई मात्रं एका कोपर्‍यात शांत बसलेली. एकेकजण बाहेर जाऊन परत येत. येताना त्यांचा चेहरा उजळलेला असे. आता फक्त ती स्त्री राहीली होती जायची. सगळे तीच्यावर तोंडसुख घेत होते. हीच्यामुळे.. हीच्यामुळे.... ती उठली . देव्हार्‍याकडे पाहून हात जोडले. मग तेथल्या प्रथिष्ठितांना अभिवादन केले, आणि पायर्‍या उतरू लागली. आता वीजांचा जोर फारच वाढला. सारा अंधारलेला परिसर वीजांच्या प्रकाशात उजळलेला. मग जोरात कानठळ्या बसणारा आवाज झाला आणि आकाशातली वीज जमिनीवर झेपावली. दुसर्‍यादिवशी पाउस ओसरला , उबदार सूर्यकिरणे पसरली. आणि आपले ओले कपडे सावरत ती स्त्री टेकडी उतरू लागली. उध्वस्त झालेले देऊळ परत बांधायचा मनोमन निश्चय करीत...

http://www.misalpav.com/user/91/authored इथे मिसळपाव वर यनावालांचे अन्य लेख असले तरी त्यांनी आंतरजालावर प्रचंड लेखन केलेले आहे. उपक्रम या संकेतस्थळावर त्यांचे भरपूर लेखन आहे तिथे त्यांनी तर्कक्रिडा ही मालिका चालवली होती. यनावाला हे कठोर नास्तिक म्हणून बुद्धीवादी वर्तुळात प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेखनातील काही लिंक खाली देत आहे वाचून दमाल.पण त्यातून त्यांची शैली व विचार यांचा परिचय होईल. या पार्श्वभूमीवर मग प्रतिक्रिया दिल्यास ते उचित ठरेल. अंगारकी चतुर्थी http://mr.upakram.org/node/3844 गॅस गणराज http://mr.upakram.org/node/3941 गुरुविण कोण लावितो वाट http://mr.upakram.org/node/3789 विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात http://mr.upakram.org/node/3719 कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प http://mr.upakram.org/node/3665 नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०) http://mr.upakram.org/node/3645 त्या मोरयाची कृपा http://mr.upakram.org/node/3597 महाकाव्याचा विषय http://mr.upakram.org/node/3579 ज्ञानेश्वरील अकरा ओव्या http://mr.upakram.org/node/3526 चालविली भिंती मृत्तिकेची http://mr.upakram.org/node/3474 बुद्धीदाता http://mr.upakram.org/node/3379 अध्यात्मिक प्रवचन http://mr.upakram.org/node/3356 बिनडोकपणाचा कळस http://mr.upakram.org/node/3362 देव धर्म आणि गाजरचित्रे http://mr.upakram.org/node/3323 उदकी अभंग रक्षिले http://mr.upakram.org/node/3313 अशी एक शक्यता केवळ तर्क http://mr.upakram.org/node/3276 भयसूचक बातमी http://mr.upakram.org/node/3216 चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश http://mr.upakram.org/node/3161 ईश्वरे तृणे करुन रक्षण केले http://mr.upakram.org/node/2928 यात आश्चर्य ते काय? http://mr.upakram.org/node/2883 हा खेळ बाहुल्यांचा http://mr.upakram.org/node/2820 गूढ आश्चर्यकारक अनुभव http://mr.upakram.org/node/2525 कार्यकारण भाव http://mr.upakram.org/node/2503 विवेकवादी लेखनावर आक्षेप http://mr.upakram.org/node/2580 भ्रमाचा भोपळा http://mr.upakram.org/node/2388 सामान्य समज (कॉमनसेन्स) http://mr.upakram.org/node/2450

In reply to by प्रकाश घाटपांडे

यनावाला Wed, 12/16/2015 - 21:18
@ प्रकाश घाटपांडे ............ धन्यवाद प्रकाशजी ! अनेक लेखांचे दुवे (लिंक्स्) असे एकाच प्रतिसादात द्यायचे मला जमले नसते. आधी हे सगळे लेख शोधून काढायचे म्हणजे कठिणच. त्यांतील "बिनडोकपणाचा कळस " हा लेख माझा नाही.तो श्री.प्रभाकर नानावटी यांचा आहे. तुम्ही उल्लेख केला त्या तर्कक्रीडा कोड्यांचे उपक्रमच्या सदस्यांनी चांगले स्वागत केले. डॉ.धनंजय यांनी बहुतेक कोडी अचूक सोडवली. असो.पुनश्च धन्यवाद !.. यनावाला.

In reply to by यनावाला

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/17/2015 - 15:31
त्यांतील "बिनडोकपणाचा कळस " हा लेख माझा नाही.तो श्री.प्रभाकर नानावटी यांचा आहे. होय.नजरचुकीने झाले.

तिमा Wed, 12/16/2015 - 11:31
इतके रेफरन्सेस दिल्यावर, आता या धाग्याची वाचनखुण साठवलीच पाहिजे.

तुडतुडी Wed, 12/16/2015 - 12:01
ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे.जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी.
वेळ आली कि ते हि होईल . काळजी नसावी . माज उतरेल
देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही.
कर्म करताना लोकांना अडवण हे देवाचं काम नाहीये . आपल्या जबाबदारीवर चांगली वैईत कर्म प्रत्येकाने करावीत . देवाचं काम कर्मांची फळ देण्याचं आहे .
देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय?
फक्त गाडीतून देवदर्शनाला जाणारी माणस देवभक्त असतात हा भयानक मोठा गैरसमज आहे . तुमची कर्म वाईट . देवाला दाखवण्यासाठी मात्र देवदर्शनाला जायचं. मग तुम्हाला अपघातातून वाचवायला देव काय तुमच्या बापाचा नोकर आहे ? एखादी चांगली गोष्ट झाली कि देवाच्या कृपेने झाली असं आपल्याला म्हणता येत नसेल तर वाईट गोष्ट घडल्यावर सुधा देवाच्या कोपामुळे झाली असं म्हणण्याचा अधिकार कुणाला नाही . सात्यानारायानाच्या पूजेबद्दल माझ्या पण मनात संभ्रम आहे . पण हि पूजा करताना आधी गणेश , भूमी , विष्णू , नवग्रहांची पूजा सुधा करतात . म्हणून आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो . देव विनाकारण तुमचा अपमान करत नाही . मग तुम्हालाही देवाचा अपमान करण्याचा हक्क नाही

In reply to by तुडतुडी

पिलीयन रायडर Wed, 12/16/2015 - 12:10
मला इन जनरलच एक प्रश्न पडलाय. ताईंच्या प्रतिसादाने तो उफाळुन आला!
देव विनाकारण तुमचा अपमान करत नाही . मग तुम्हालाही देवाचा अपमान करण्याचा हक्क नाही
नास्तिकाने देवाबद्दल जे प्रश्न पडतात (आणि ज्यामुळेच त्याला नास्तिकता जास्त सुसंगत पर्याय वाटत असतो) ते विचारले तर तो आस्तिकांना देवाचा अपमान का वाटतो? देवाच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करायला नक्की काय हरकत आहे? कुणी संयत भाषेत प्रश्न विचारत असेल, अक्कल काढत नसेल आणि प्रामाणिकपणे विचारत असेल तर नक्की आक्षेप कशाला असतो? आणि त्याला माज का म्हणतात?

In reply to by पिलीयन रायडर

मराठी कथालेखक Wed, 12/16/2015 - 13:17
अहो पिरा असं काय करताय... (मिपावर अस्तित्वात असलेल्या समस्त पाटीलांची माफी मागून) गावात एखादा नवीन माणूस /अधिकारी आला आणि त्याने पाटलांच्या वाड्यावर रितसर हजेरी लावली नाही आणि उलट "का जायचे आहे ? कशासाठी ?" असे अगदी नम्रपणे जरी विचारले तरी पाटलाच्या चेल्यांना वाटतेच ना की "लईच माज दिसतोय याला, पण पाटील लवकरच माज उतरवतील याचा मग कळेल" इथे तर आपण ईश्वराचे अस्तित्व नाकारतोय मग भले आपण कितीही सभ्य भाषेत बोलत असलो तरी लोकांची डोकी भडकणारच हो..

In reply to by तुडतुडी

एखादी चांगली गोष्ट झाली कि देवाच्या कृपेने झाली असं आपल्याला म्हणता येत नसेल तर वाईट गोष्ट घडल्यावर सुधा देवाच्या कोपामुळे झाली असं म्हणण्याचा अधिकार कुणाला नाही .
याचा अर्थ असा घ्यायचा का कि जो चांगल्या गोष्टीचे क्रेडिट देवाला देतो त्यालाच वाईट गोष्टींचे बदक्रेडिट देवाला देण्याचा अधिकार आहे इतरांना नाही.
फक्त गाडीतून देवदर्शनाला जाणारी माणस देवभक्त असतात हा भयानक मोठा गैरसमज आहे
खर आहे. देवळात जाणारे सगळेच भक्त वा सश्रद्ध अस्तिक असतात असे नाही. दरोडा घालणारा दरोडेखोर देखील माझा दरोडा यशस्वी होउ देत से देवाला साकडे घालत असतो. तसे तपास करणारा पोलिस देखील माझा तपास यशस्वी होउ दे असे देवाला साकडे घालतो. खर तर ईश्वर ही संकल्पना म्हणजे सर्वसामान्यांचा स्वस्तातला सायकियाट्रिस्ट/ सायकोथेरपीस्ट/कौन्सिलर आहे. तो निर्गुण निराकार ही आहे सगुण साकार ही आहे भक्तवत्सल करुणाघन ही आहे.जळी स्थळी काष्ठी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र आहे. ईश्वर हा आपल्या हृदयात आहे याचा अर्थ त्याचे स्थान आपल्या मेंदूत आहे असा आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 12/17/2015 - 10:36
>>>>देवळात जाणारे सगळेच भक्त वा सश्रद्ध अस्तिक असतात असे नाही. दरोडा घालणारा दरोडेखोर देखील माझा दरोडा यशस्वी होउ देत से देवाला साकडे घालत असतो. तसे तपास करणारा पोलिस देखील माझा तपास यशस्वी होउ दे असे देवाला साकडे घालतो. दरोडेखोर आणि पोलीस दोघेही श्रद्धेनेच देवाकडे येत असतात. ते भक्त वा आस्तिक असतातच. भलेही त्यांची कार्ये एकमेकांविरुद्ध असू देत. पण म्हणून त्यांची देवावरील श्रद्धा-भक्ती कमी कशी होते?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/17/2015 - 15:25
१) देवळात जाणारे सगळेच भक्त वा सश्रद्ध अस्तिक असतात असे नाही. २)दरोडा घालणारा दरोडेखोर देखील माझा दरोडा यशस्वी होउ देत से देवाला साकडे घालत असतो. तसे तपास करणारा पोलिस देखील माझा तपास यशस्वी होउ दे असे देवाला साकडे घालतो दोन वेगळे मुद्दे आहेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 12/17/2015 - 19:29
तुमचा मुद्दा नीट कळला नाही. देवळात जाणारे सगळेच सश्रद्ध आस्तिक असतात असे नाही. असे विधान केल्यानंतर देवळात जाणार्‍या अश्रद्ध नास्तिक माणसाचे उदाहरण यायला हवे होते. जसे, तिथला सफाई कामगार किंव माझ्यासारखा (स्वतःच्या) पत्नी बरोबर फक्त तिचे मन राखण्यासाठी जाणारा नवरा. पण जो देवळात जाऊन देवाकडे कांही मागणे मागतो त्याचा देवावर विश्वास असतो आणि तो सश्रद्ध आस्तिकच असतो. दरोडेखोर आणि पोलीस देवाकडे कांही मागणे मागत आहेत आणि ते पूरे व्हावे अशी मनोकामना व्यक्त करीत आहेत तेंव्हा तेही सश्रद्धच झाले. 'देवळात जाणारे सगळेच सश्रद्ध आस्तिक नसतात' ह्या विधानाला बळकटी देऊ शकत नाहीत.

In reply to by प्रभाकर पेठकर

जत्रेत जसे हौशे गवशे नवशे असतात तसेच देवळात जाणारेही असू शकतात एवढाच मुद्दा आहे तो. ते तुम्हाला पटेल असे सिद्ध करण्याची बौद्धीक क्षमता माझ्यात नाही. त्या माझ्या मर्यादा समजाव्यात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रभाकर पेठकर Sat, 12/19/2015 - 11:07
>>>>> ते तुम्हाला पटेल असे सिद्ध करण्याची बौद्धीक क्षमता माझ्यात नाही. अहो घाटपांडे साहेब, भलतेच काय? तुम्हाला काय मी आज ओळखतो का? तुमचे अनेक लेख/प्रतिसाद वाचले आहेत मला पटले आहेत. ज्योतिष, अंधश्रद्धा ह्यावरील तुमच्या अभ्यासपूर्ण लेखनाचा मी चाहता आहे. मला लाज वाटेल अशी वाक्ये पेरू नका. मनाला क्लेष होतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

:) अहो हल्ली टंकलेखनाचा त्रास होतो व या विषयाच्या मंत्रचळाची भीती वाटते म्हणून मी असे विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो.

In reply to by मराठी कथालेखक

अजया Wed, 12/16/2015 - 18:45
+१ संयत प्रतिसाद दिला तरी आपले म्हणणे मांडता येईलच.प्रत्येक वेळी कोणाच्या तरी अंगावर धावुन गेल्यासारखे प्रतिसाद दिले की आपले म्हणणे खरे ठरते असे वाटते का तुडतुडी?

तुडतुडी Wed, 12/16/2015 - 12:11
नावाला हे कठोर नास्तिक म्हणून बुद्धीवादी वर्तुळात प्रसिद्ध आहेत.
म्हणजे आस्तिक निर्बुद्ध असतात ? खिक . ह्यालाच माज म्हणतात . जितकी बुद्धी जास्त तितका माज, अहंकार , दुसर्याला तुछ लेखण्याची वृत्ती जास्त असा ह्याचा अर्थ असेल तर अश्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी

In reply to by तुडतुडी

भंकस बाबा Wed, 12/16/2015 - 20:14
नास्तिकाने आपण नास्तिक असल्याची जाहिरात का करावी? आस्तिक करतो म्हणुन? जगाचे लक्ष वेधावे म्हणुन? ताई, सयंमी प्रतिसाद हवा होता.

प्रसाद१९७१ Wed, 12/16/2015 - 12:18
नास्तिकाने देवाबद्दल जे प्रश्न पडतात (आणि ज्यामुळेच त्याला नास्तिकता जास्त सुसंगत पर्याय वाटत असतो) ते विचारले तर तो आस्तिकांना देवाचा अपमान का वाटतो? देवाच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करायला नक्की काय हरकत आहे?
नास्तिकाने दुसर्‍या नास्तिकाशी हे प्रश्न विचारुन चर्चा करावी. आस्तिकालाच हा प्रश्न विचारायला का जावे? आस्तिक आमंत्रण करतोय का ही माझ्या विचारांची चिकित्सा करा म्हणुन? एक उदाहरण गे लोकांनी त्यांना गे संबंध ठेवायचे असतील तर ठेवावेत, पण स्ट्रेट लोकांना तुमचे संबंध कसे चुकीचे आहेत हे का सांगावे. हेच उदाहरण तुम्ही उलटे करुन पण वापरु शकता. प्रश्न इतकाच आहे की नास्तिकांना दुसर्‍यांची मतांची चिकीत्सा त्यांच्या बरोबर च ( हे महत्वाचे आहे ) करण्याची परवानगी कोणी दिली. काय हवे ते नास्तिक क्लब काढावेत आणि यथेच्छ चिकीत्सा करावी आपापसात.

In reply to by प्रसाद१९७१

मराठी कथालेखक Wed, 12/16/2015 - 12:56
नास्तिकाने दुसर्‍या नास्तिकाशी हे प्रश्न विचारुन चर्चा करावी. आस्तिकालाच हा प्रश्न विचारायला का जावे? आस्तिक आमंत्रण करतोय का ही माझ्या विचारांची चिकित्सा करा म्हणुन?
मला वाटतंय पहिली खोड अनेकदा असिकच काढतात , सहसा हा संवाद (की वाद ?) "तुम्ही मंदिराच्या आत का येत नाहीत ?" असा सुरु होतो. "मी नास्तिक आहे" इतक्या छोट्या आणि स्पष्ट उत्तराने त्यांचे समाधान होत नाही. मग "कधीच जात नाही का ? कुठेच श्रध्दा ठेवत नाही का ? कुठेतरी ठेवायला हवी" ई ई पुराण चालू होते. मग इतके आमंत्रण दिल्यावर नास्तिक कशाला माघार घेतोय ... वरील लेखातही "तुम्ही प्रसाद का घेत नाही" म्हणत अस्तिकानेच सुरुवात केली. भक्तिभावाने दर्शन घेतानाही त्यांचे लक्ष बाजूचा काय करतोय याकडे होतेच..आणि तो चुकीचा वागत असेल तरी देव काय ते पाहून घेईल असा विश्वास पण नाही म्हणून स्वतःच मैदानात उतरला ...असो.

आता इतका वादविवाद झाला, आणि आपापला प्रतिसाद तर्कावर आधारलेला आहे असा बहुतेक सर्व प्रतिसादकांचा प्रामाणिक दावा असणारच... आणि म्हणुनच एक शास्त्रिय व सारासारवादी प्रश्न उपस्थित करणे आवश्यक वाटते. तो असा... ( ;) ) लेखक स्वघोषित आणि इतरांनाही पूर्वीपासून माहीत असलेले नास्तिक आहेत. त्यांनी आपले (पक्षी नास्तिकाचे) म्हणणे या लेखात लिहीलेले आहे. पण, आस्तिक काय म्हणाले हे पण त्यांनीच लिहीले आहे. म्हणजे दोन्ही बाजू एकाच बाजूच्या व्यक्तीने लिहील्या आहेत. म्हणजे केवळ हा लेख इतके मटेरियल शास्त्रिय व सारासारवादी वादविवादासाठी पुरेसे नाही. कारण, संभाषणातील एखादा शब्द लेख लिहिताना इकडे-तिकडे झाला (?केला) असला तर संपूर्ण वाक्याचा अर्थ बदलू शकतो. अर्थात, यनावालांना त्यांचा मुद्दा खरोखरच सिद्ध करायचा असेल तर त्यांनी त्या प्रसंगातल्या इतर लोकांपैकी कोणा एक/अनेकांना तोच प्रसंग त्यांच्या शब्दात लिहायला सांगितला पाहिजे. अन्यथा हे त्या प्रसंगाचे एकांगी आणि म्हणून शास्त्रिय वादाला योग्य नसलेले वर्णन होईल... किंवा साध्या मराठीत, "बाजारात तुरी...." सारखे ! बोला, यनावाला सर, काय म्हणता ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ट्रेड मार्क गुरुवार, 12/17/2015 - 03:29
यनावालांसारख्या बुद्धिवादी माणसाला असं कसं वाटलं की मिपा वरची मंडळी पुरावा दिल्याशिवाय आपलं म्हणणं मान्य करतील? पण आश्चर्याची गोष्ट अशी की बाकीच्या नास्तिक बुद्धिवादी लोकांनी पुरावा मागितलाच नाही. गम्मत आहे! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/17/2015 - 10:01
आस्तिक काय म्हणाले हे पण त्यांनीच लिहीले आहे. म्हणजे दोन्ही बाजू एकाच बाजूच्या व्यक्तीने लिहील्या आहेत
+११११११११. अगदी सहमत. मी पण हेच मत वर माडले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 12/17/2015 - 19:42
डॉक्टर साहेब, मिपावर जेव्हढे म्हणून स्वानुभव कथन आहे (मिपाचे कट्टे वगळता) ते सर्व त्या त्या सदस्याच्या शब्दातच आले आहे. (जिथे जिथे आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ कांही लिंक देणं शक्य असतं ते वगळता) म्हणजे एकतर्फीच आहे. तिथे तिथे आपण मुद्देसुद वाद घातले आहेतच. आत्ताच इथे वेगळा न्याय का? हाच मुद्दा पुढे न्यायचा म्हंटल्यास त्या घटनेत कोणी मिपाकर (आस्तिक मिपाकर) नव्हते मग अशा वेळी अनुभव शेअर करायचा असेल तर मिपाकराने काय करावे? एक मार्ग म्हणजे, मिपाकराने सर्व संभाषण रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाकून इथे लिंक दिली पाहिजे. अशी अट सध्यातरी अस्तित्वात नाही. हे कोर्ट नाही. मित्रमंडळींचे चर्चास्थान आहे. त्यामुळे धागाकर्त्याने कथन केलेला प्रसंग तसाच असणार ह्या गृहितकावरच आजपर्यंतच्या सर्व चर्चा, काथ्याकुट आधारीत आहेत. यनावाला ह्यांच्यासाठी वेगळा न्याय का?

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब, आपल्याबरोबर चर्चा करण्या मजा येते, आपल्या विचारांचा आदर आहे आणि ते आवडतात हे काही पहिल्यांदा सांगत आहे असे नाही. म्हणूनच केवळ गैरसमज टाळण्यासाठी हा प्रतिसाद लिहिला आहे... आणि तो या लेखाशी संबंधित असल्याने, सगळ्यांसाठीही आहे, त्यामुळे इथेच लिहिला आहे. प्रथम म्हणजे मी आस्तिक किंवा नास्तिक यांची कोणाचीच बाजू घेत नाही. कारण मी दोन्ही नाही तर "अज्ञेयवादी" आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे विचार ऐकण्यात मला रस असतो... कारण "देव आहे की नाही ?" हा अनादी प्रश्न अजून अनुत्तरीत आहे आणि कोणाकडूनही काही ज्ञानवर्धन झाले तर ते मला हवेच आहे. मात्र एक गोष्ट नक्की की, देव म्हणजे कोणी "हिशेब ठेवून त्याप्रमाणे शासन अथवा प्रमोशन देणारी यंत्रणा किंवा लालूच दाखवून (नवस, इ) आपले काम करवून घेऊ शकतो अशी यंत्रणा" नाही. देवाच्या नावाखाली जे रुढी-प्रथांचे अवडंबर बनवले गेले आहे त्यात माझा अजिबात विश्वास नाही, ती मानवी स्वभावाचा फायदा घेऊन स्वतःचे हितसंबंध साधण्यासाठी केलेली मानवी व्यवस्था आहे असे मी मानतो. परंतू त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही, किंबहुना अश्या प्रकारात नमस्कार करून प्रसाद खाण्यास व त्या माणसाचे समाधान वाढवण्यात माझी ना नसते. असो. इतक्या जरूर असलेल्या प्रस्तावनेनंतर मुख्य मुद्द्यावर वळूया... लेखकने धागा मुद्दा समंजसपणे आणि शास्त्रिय पद्धतिने विचार करून लिहिला आहे असा आभास निर्माण केला आहे असे म्हणायला वाव आहे. ते का ? तर त्याची कारणे अशी आहेतः १. बाविस नास्तिक व एक आस्तिक (लेखक) यांचे हे संभाषण आहे. यात एक नास्तिक (लेखक) सगळे अगदी समंजसपणे, एकही चुकीचा शब्द न वापरता बोलतो आहे. हे सगळे एकतर लिहून काढलेल्या वाक्यांचे पाठांतर करून (उदा: नाटकातले उतारे) अथवा अगदी उत्तम प्रतीच्या वादविवादपटूच्या तोंडून नैसर्गिकपणे वेचक वाक्ये यावी तसे वाटते. इथल्या वादासाठी व लेखकावर अन्याय नको म्हणून आपण त्याच्यामध्ये दुसर्‍या प्रकारचे कसब आहे असा संशयाचा फायदा त्याला देऊया. २. मात्र, एकूण २२ आस्तिकांपैकी बोलणारे सगळेच असमंजस आणि असहिष्णू बोलत आहेत, एकाही आस्तिकाला "प्रत्येकाला आचार-विचाराचे व त्याप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आहे" असे किंवा तत्सम बोलल्याचे लेखात लिहिलेले नाही. बावीस आस्तिकांत एकही समंजस, समतोल आणि सहिष्णू व्यक्ती नसावी आणि असल्यास तिने एकही समंजस शब्द उच्चारू नये, हे काही पचनी पडत नाही, बुवा ! आणि मग लेखनाला एकांगी म्हटले तर फारसे वावगे होणार नाही... आणि म्हणूनच मी "लेख विश्वासू होण्यासाठी" आस्तिकांची बाजू त्यांच्यापैकी कोणीतरी मांडायला पाहिजे असे म्हटले होते. ३. इतर २२ जणांत एखादा नास्तिक असू शकतो. तशी स्पष्ट विचारणा केल्याचे लेखकाने लिहिले नाही. तर मग तो नव्हताच हे गृहितक समंजस व शास्त्रिय विचार करणार्‍या लेखकाने लेखाच्या शीर्षकात लिहिण्याइतके महत्वाचे का मानले? हा प्रश्नही उरतोच ! थोडक्यात, लेख एकांगी आणि काही विशिष्ट हेतूने लिहिलेला आहे असे म्हणण्याला वाव आहे... त्याची खालील इतर काही कारणे यनावालांच्या या व इतर धाग्यांवरील (माझ्या नव्हे, इतरांच्या) प्रतिसादांत नोंदलेली आढळतील : १. यनावाला धागा/काडी टाकून गायब होतात. २. फारतर कोणाच्यातरी फक्त त्यांच्या बाजूच्या एखाद्या मुद्द्याची वाहवा करतात व विरोधी मुद्द्यांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात. ३. स्वतःच्या विधानांचे स्पष्टीकरण करण्याकडे त्यांचे तितकेसे लक्ष दिसत नाही. उलट इतरांमध्ये होणार्‍या उलटसुलट वादविवादाची मजा बघण्यात त्यांना जास्त मजा येते असे वरील मुद्दा २ मधील कृतीतून दिसते असे म्हणायला वाव आहे. यनावालांचे धागे व प्रतिसांद डोळ्याखालून घातले तर वरच्या निरिक्षणांमध्ये अर्थ आहे असे दिसते. आता माझा प्रतिसाद वरच्या पार्श्वभूमीवर बघितलात तर तुमच्या ध्यानात येईल की माझा प्रतिसाद तुमच्यासाठी किंवा तुमच्यासारख्या इतर समंजस व समतोल प्रतिसादकांसाठी नव्हता, तर परखड शास्त्रिय भूमिका मांडण्याचा आभास निर्माण करण्यार्‍या लेखनासंबंधी, परखड शास्त्रिय भूमिका कशी असावी याबाबतचे सामान्य नियम सांगणारा प्रतिसाद होता. लेखाच्या लेखकाला जर हे निरिक्षण मान्य नसेल तर त्याची बाजू वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"पीडीत मानसिकतेचा (व्हिक्टीम मेंटॅलिटीचा) तडका मारलेला, समतोलपणा-समंजसतेचा आभास निर्माण करता येणे", हे राजकारणात अत्यंत उपयोगी हत्यार समजले जाते... आणि ते बर्‍याचदा दोन गटांना एकमेकांशी खेळवून स्वतःचा फायदा साधणे आणि / अथवा गंमत बघणे यासाठी यशस्वीपणे वापरले जाते :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रभाकर पेठकर Sat, 12/19/2015 - 10:59
डॉक्टर साहेब, श्री. यनावाला ह्यांचे ह्या आधीचे लेखन मी वाचलेले नाही. मी सद्य लेखातील शब्द नाही, तर मुद्दा लक्षात घेऊन त्यावर मी माझे भाष्य केले आहे. जसे हिंदीत वाक्प्रचार आहे, 'बाल की खाल निकालना' तसा प्रकार खुपशा प्रतिसादांंमध्ये दिसून येतो. मूळ मुद्दा बाजूला ठेवून लाडू का खाल्ला नाही, देणगी न देता लाडूचे मुल्य देऊन तो प्रसाद न समजता लाडू (पक्षी: मिठाई) म्हणून का नाही खाल्ला वगैरे वगैरे मुद्द्यांवर भर दिला जाऊन चर्चा भरकटविण्याचे यशस्वी प्रयत्न दिसून येतात तेंव्हा एक मिपाप्रेमी म्हणून वाईट वाटतं. तुम्ही म्हणता की आजवरचा श्री यनावाला ह्यांच्या बाबतचा अनुभव असा आहे की, 'त्याना हवे असतील ते मुद्दे मिपावर मांडून एकतर गायब होतात आणि फक्त निवडक मुद्द्यांना (जे त्यांच्या बाजूचे आणि सोयिस्कर असतात) उत्तरे देतात.' असे असेल तर नक्कीच अत्यंत चुकीचे आहे. श्री यनावाला ह्यांनी चर्चेला तोंड फोडले आहे त्यांनी त्यांच्या मुद्द्याच्या विरोधातील प्रतिसादांना देखिल उत्तरे देऊन आपली भूमिका विस्तृत आणि तपशिलवार मांडावी अशी मी त्यांना ह्या प्रतिसादाद्वारे विनंती करेन. तुमचा एक मुद्दा आहे, त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही ह्यात कोणा एका वक्तीला त्रास होतो अशातला भाग नाही तर ह्यातून अव्यवहार्य कर्मकांडाचे महत्व वाढील लागून आख्या समाजाच्या वर्तनावर परिणाम होतो असे मला वाटते. आजूबाजूची माणसे नवस बोलतात, नैवेद्य ठेवतात, देणग्या देतात, तिर्थस्थानांना भेटी देतात, जुलूस काढतात वगैरे वगैरे पाहून हे आज पर्यंत न केलेला माणुसही करायला सुरुवात करतो. आणि आपल्या कर्मावर, कृतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी देवाच्या कृपेवर अवलंबून राहायला शिकतो, हातावर हात ठेवून अनुकुल घटना घडतील अशी निष्क्रिय विचारसरणी अवलंबितो. सती प्रथा का बंद केली गेली? हुंडा विरोधी चळवळ चालविण्यामागे काय हेतू आहे, हे लक्षात घ्यावे. जीला सती जायचे आहे तिला जाऊ द्यावे, किंवा ज्यांना ज्यांना हुंडा देणे परवडते त्यांना देऊ द्यावा. इतरांनी त्यावर आपली मते लादू नयेत असे म्हणणे सयुक्तिक होईल का? हे भोळ्या देवधर्मालाही लागू होते. आस्तिकता, नैवेद्य, देणग्या ह्याचा तुम्हा-आम्हाला थेट त्रास होत नसला तरी गरीब, भोळ्या जनतेवर ह्याचा खोलवर पारिणाम होतच असतो. कुठल्याही संकटाला तोंड देण्याचे मानसिक बळच ते हरवून बसतात. देवाला संकट निवारण्यासाठी कामाला लावले (नवस, नैवेद्या मार्फत) की आपण कांही करण्याची गरजच नाही विचारसरणी रुजत जाते. कांही जणांच्या कांही ठोस मागण्या असत नसतीलही पण ' हे देवा माझ्यावर कृपादृष्टी असू दे रे बाबा!' ही सर्वसामान्य मागणी असतेच. कोणी म्हणेल सती आणि हुंडा ह्या सारख्या अनिष्ट चालींशी देवधर्माशी तुलना चुकीची आहे. पण मला वाटते ही आस्तिकता, नवस, नैवेद्य, तिर्थक्षेत्रे आदींमुळे समाजाला 'स्लो पॉईझनींग' होत रहाते. समाजाची कृतीशिलता नष्ट पावत राहते. प्रयत्नवाद मागे पडतो. पर्यायाने समाज, प्रदेश आणि देश मागे पडतो. पुन्हा सांगतो, श्रद्धा जरूर असावी. ती तुमच्या घरापुरती सिमित असावी. सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर देवापुढे दिवा लावणे, एखादे स्तोत्र म्हणावे, एखादी आरती करावी किंवा शांत बसून नामस्मरण करावे आणि देवाने मला आवश्यक ती शक्ती बहाल केली आहे ह्या विचाराने, आत्मविश्वासाने दिवसाला सुरुवात करून, आपल्या समस्या आपणच सोडविण्यासाठी १००% प्रयत्नशील असावे. बस, ह्याहून जास्त देवधर्म करण्याची, व्यक्तीशः मला तरी आवश्यकता भासत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमचा एक मुद्दा आहे, त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही ह्यात कोणा एका वक्तीला त्रास होतो अशातला भाग नाही तर ह्यातून अव्यवहार्य कर्मकांडाचे महत्व वाढील लागून आख्या समाजाच्या वर्तनावर परिणाम होतो असे मला वाटते. मानवी मनाची जडणघडणच अशी आहे की बहुसंख्य माणसांना स्वबळावर स्वतंत्रपणे परखड आचारविचार जमत नाही. त्यांना कोणा ना कोणाचा कमीजास्त प्रमाणात मानसिक आधार लागतो. यामुळेच धर्मापासून राजकारणापर्यंत नेते तयार होतात व लोक त्यांच्या मागे कधी डोळसपणे, तर बहुदा अंधपणे जाते. ही जीवशास्त्रीय वस्तूस्थिती आहे. आता माझ्या मताने सामान्य जीवनातली वस्तूस्थिती : या जगात पूर्ण पांढरे किंवा पूर्ण काळे असे काहीच नाही... सगळ्या करड्या रंगाच्या छटा आहेत. तेव्हा एका टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाने दुसर्‍या टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाचे काही एका ठराविक सीमेपर्यंत मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण त्या सीमेपलिकडे अश्या प्रयत्नांचा परिणाम हवा त्यापेक्षा उलटा होऊन टाळू शकणारी त्रासदायक / दुखःद परिस्थिती अथवा संघर्ष निर्माण होतो. अश्या वेळेस माझ्या वर म्हटल्याप्रमाणे, "इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही, किंबहुना अश्या प्रकारात नमस्कार करून प्रसाद खाण्यास व त्या माणसाचे समाधान वाढवण्यात माझी ना नसते." अश्या सगळ्या माणसांपासून माझी वरच्या प्रतिसादात लिहिलेली मते लपलेली नसतात... किंबहुना मी ती स्पष्टपणे सांगितलेली असतात. हे जग विविधतेने भरलेले आहे आणि काही थोडे अतिरेकी अपवाद सोडल्यास ही विविधताच जग जास्त सुंदर, मनोरंजक व आनंददायक बनवते. सर्वच बाबतीत सगळे जग माझ्यासारखेच वागले पाहिजे नाहीतर ते माझ्या जीवनाचा भाग होऊ शकत नाही (याला इंग्लिश्मध्ये सुंदर चपखल वचन आहे : माय वे ऑर हाय वे.) हे म्हणणे मला ठीक वाटत नाही. असे करणे अतिरेकी / ऑटोक्रॅटीक / कम्युनिस्ट व्यवस्थेचे लक्षण आहे. नव्या पिढीचा कर्मकांडांसंबंधी विचार/कृती पाहिली तर त्यांचे महत्व काळाबरोबर कमी होईल असेच दिसते... जसे मागच्या पिढीच्या तुलनेत आपल्या पिढीत झाले आहे. शिवाय आधुनिक काळातल्या वाढत जाण्यार्‍या धकाधकीत निरुपयोगी प्रथा-कर्मकांडे कमी कमी होत जातील असेच दिसते. काही गोष्टींना थोडा वेळ देणे जास्त श्रेयस्कर होईल असे वाटते. प्रत्येक कृती करण्यात वा न करण्यात फायदा आणि तोटा असतोच... त्यांचे तौलनिक प्रमाण पाहून ते फायदेशीर असल्यासच ती कृती करावी अथवा न करावी असे मला वाटते. मानवी इतिहास पाहिला असती हेच दिसते की सतत जुन्या प्रथा-कर्मकांडे जाऊन त्यांची जागा नवीन प्रथा-कर्मकांडे घेत असतात... ज्या काळात सामाजिक-मानसशास्त्रियदृष्ट्या लोकांना जरूर वाटते व परवडते ते टिकते, नाहीतर ते नष्ट होते व त्याची जागा नवीन काहीतरी घेते. कारण, मानसशास्त्रिय/वैचारीक/तात्वीक निर्वात अवस्थेत (आयडियालॉजिकल व्हॅक्क्युम) माणूस आनंदी/खुशाल राहू शकत नाही. जसे सर्व १००% मानवांची शरीरे (उंची, वजन, आरोग्य, इ बाबतीत), १००% वेळेस, १००% एकसारखी नसतात, तसेच मनाचे आहे. अर्थातच, वास्तव जीवनात छोटे-मोठे विसंवाद अपेक्षितच आहेत... जोपर्यंत हे विसंवाद धोकादायक किंवा असह्य नसतात, तोपर्यंत त्यांना शल्यचिकित्सेची गरज नसते, सुसंवादाने त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करावा, तेही न जमल्यास "असहमतीवर सहमती (अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री)" या तत्वावर आनंदी सहजीवन शक्य असते; असे माझे मत आहे. वरच्या कृतीने ; (अ) आजचे आनंदी सहजीवन (जगा आणि जगू द्या) शक्य होईल, (आ) मी माझी मते स्पष्टपणे सांगत असल्याने, आत्ता कर्मकांडांवर विश्वास ठेवणार्‍यांचे भविष्यात मतपरिवर्तन होण्याची शक्यता असते... याउलट संघर्षाचा परिणाम अहं (इगो) दुखावून माणूस मूळ मतांशी (चूकीची असली तरी) जास्त घट्ट चिकटण्याची शक्यता वाढते. हा प्रतिसाद जरा मोठा झाला. पण माझा निर्णय केवळ "सोपी तडजोड" म्हणून केलेला नसून त्यामागे मला पटलेला काही विचार आहे हे सांगण्यासाठीच हा खटाटोप केलेला आहे. मुख्य म्हणजे : लेखकाने इतर काही सोईस्कर प्रतिसादावर मतप्रदर्शन केले आहे. पण, माझ्या प्रतिसादात मांडलेल्या मुद्यांकडे दुर्लक्ष केले आहे (जे इतरांच्या अगोदरच्या प्रतिसादांप्रमाणे अपेक्षित होते). याचा अर्थ माझे मुद्दे लेखकाला मान्य आहेत असे वाटते आहे. असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रभाकर पेठकर Sun, 12/20/2015 - 02:14
>>>>तेव्हा एका टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाने दुसर्‍या टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाचे काही एका ठराविक सीमेपर्यंत मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण त्या सीमेपलिकडे अश्या प्रयत्नांचा परिणाम हवा त्यापेक्षा उलटा होऊन टाळू शकणारी त्रासदायक / दुखःद परिस्थिती अथवा संघर्ष निर्माण होतो. आपले विचार परखड पणे मांडणारी तथाकथित नास्तिक मंडळी ही एका टोकावर असतात हे गृहीतकच चुकीचे आहे. अन्यायकारी आहे. >>>>सर्वच बाबतीत सगळे जग माझ्यासारखेच वागले पाहिजे नाहीतर ते माझ्या जीवनाचा भाग होऊ शकत नाही (याला इंग्लिश्मध्ये सुंदर चपखल वचन आहे : माय वे ऑर हाय वे.) हे म्हणणे मला ठीक वाटत नाही. असाही आग्रह नास्तिकांचा कुठे दिसून आला नाही. नास्तिकांचे 'मी असा आहे' हे प्रतिपादन असते. त्याशिवाय त्यांची भूमिका इतरांना कशी समजावी. प्रसाद म्हणुन नाही तर मिठाई म्ह्णून लाडू खायला पाहिजे होता ही आस्तिकांची सततची मागणी ते दुसर्‍या 'टोकाला' आहेत असे दर्शवित नाहीत का? ते कुठे ग्रे एरियात दिसत नाहीत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता प्रत्येकाने चर्चेवर विचार करून आपली मते बनवावित.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब, वर तुम्ही उधृत केलेली वाक्ये तुमच्याबद्दल किंवा इतर कोणाबद्दलही व्यक्तीगत वचने नव्हती. माणसाने सर्वसाधारणपणे कसे असावे / नसावे याबद्दलचे माझी मते होती. शिवाय, ती मते आस्तिकाच्या अथवा नास्तिकाच्या भूमीकेतून नव्हती तर एका अज्ञेयवादीच्या भूमीकेतून होती... अज्ञेयवादी त्या दोघांपैकी कोणाचीच बाजू घेत नाही, पण (देव आहे की नाही याबाबतचे) आपले अज्ञान लपवायची त्याला गरज वाटत नाही आणि स्वतःचे ज्ञान वाढविण्यासाठी, पूर्वग्रह न ठेवता, आस्तिक-नास्तिक-(इतर)अज्ञेयवादी या तिघांचेही मत जाणून घ्यायला मात्र तो उत्सुक असतो. सर्वच आस्तिक, नास्तिक आणि अज्ञेयवादी शेवटी माणसेच आहेत. वरच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, सर्वच विचारप्रणाली गटांतले मानव, पूर्ण पांढरे अथवा पूर्ण काळे (पूर्णतः एकसारखे) नाही तर वर्णपटातील विविध करड्या छटांत येतात, काही जण वर्णपटांच्या या किंवा त्या टोकांजवळ तर इतर जण मधे कोठेतरी असतात. त्यामुळे, सर्वच गटांत संयमाने आपले मत सांगणारे असतात, तसेच अत्यंत टोकाची भूमिका घेऊन दुसर्‍यावर जहरी टीका करणारे असतात आणि या दोन्ही टोकांच्या मधल्या वर्णपटातील अनेकविध छटांचे लोकही असतात... पिडित मानसिकतेचा बुरखा घेउन आपले म्हणणे गळी उतरवणारेही सुद्धा यात असतातच असतात. त्यामुळे मला स्वतःला कोण काय दावा करतोय याबरोबरच किंवा कणभर जास्तच (अ) तो दावा कोणत्या अंगाने प्रस्तुत होतोय व (आ) त्या प्रस्तुतीमागे दडलेले नक्की खरे ध्येय काय आहे (रिडिंङ बिटविन द लाईन्स) हे जाणून घेण्यातही रस असतो... हे करताना त्या व्यक्तीला कोण्या एका गटाचा सदस्य असे न बघता, केवळ एक व्यक्ती असेच बघण्याचा माझा प्रयत्न असतो... कारण, म्हणतातच ना की, "व्यक्ती तितक्या प्रकृती" !

तिमा Wed, 12/16/2015 - 14:36
ज्यांना आपापल्या आस्तिक वा नास्तिकपणाचा माज आला असेल, त्यांना "स्व'स्तिक म्हणावे.

In reply to by पिलीयन रायडर

पैसा गुरुवार, 12/17/2015 - 09:23
वाद घालण्यात फुकट जाणारी १० मिनिटे आणि डोक्याचा ताप वाचवण्यासाठीची ११ २१ ५१ रुपये जी काय असेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. गळ्यात रुमाल, कपाळी शेंदूर टिळा आणि हातात कडीवाले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते देणग्या मागायला येतात तेव्हा आपण वाद घालणे कितपत शहाणपणाचे ठरेल हे आपले आपण ठरवायचे. ते लाडू पण देत नाहीत. =))

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 12/17/2015 - 11:14
>>>>>ते लाडू पण देत नाहीत. तुमचं दु:ख मोठं आहे. ......ह.घ्या. देवालयांमधून दिल्या जाणार्‍या देणग्या, मिठाई, नारळ, लांब लांब रांगांमधून होणारा वेळेचा व्यय आणि देवावर भरवसा ठेवून येणारी निष्क्रियता विचार करण्याजोगी आहे. मिठाई, नारळ जरी भक्तांनाच परत मिळत असले तरी त्या निमित्ताने ग्रहण होणार्‍या अनावश्यक कॅलरीज भक्तांच्या आरोग्यास घातकच असतात. दुष्काळग्रस्त आणि कुपोषित प्रदेशांमध्ये सकस अन्नाचे वाटप होण्याऐवजी, न खाणार्‍या देवाच्या मुर्तिंसमोर कोट्यावधीची मिठाई प्रसाद रुपाने देण्यात काय शहाणपण आहे? निदान....निदान सुशिक्षितांनी तरी ह्यावर सखोल विचार करावा. दोन हात, मस्तक आणि मनातील सद्विचार एव्हढेच पुरते देवाला. देवालयाकडे वाहणारा पैशांचा ओघच देवालयांची दुकाने होण्यास कारणीभूत आहेत. ह्या गुळासाठीच मुंग्या-मुंगळे गोळा होतात. मुळात गुळच ठेवला नाही तर मुंग्या-मुंगळे येणार नाहीत. कडीवाले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते येतीलच कशाला? समाजाला सुधारण्याच्या प्रयत्ना पेक्षा प्रत्येकाने स्वतःला सुधरावं. समाज आपोआप सुधारेल. चराचरात देव भरलेला आहे. प्रत्येक माणसात देव आहे अशी शिकवण आहे आपल्या धर्मात. त्या शिकवणीचा स्विकार न करता आपण देवालयाकडे धाव घेतो. घरातला देव वेगळा, सार्वजनिक उत्सातला देव वेगळा, देवालयातील वेगळा आणि तिर्थस्थानातील देव वेगळा असा देवांच्या बाबतीत भेदभाव करणे किती सयुक्तिक आहे? कशाकरीता जावे लागते मंदिरात आणि तिर्थक्षेत्री? सार्वजनिक उत्सवांना जाऊन तिथल्या देवाच्या पायी प्रसाद, वर्गणी आणि आपली भक्ती वाहण्यात काय हशील आहे? तुमच्या घरचा देव तुमच्या इच्छा आकांक्षा पुर्‍या करण्यास असमर्थ आहे? सद्वर्तन, सद्विचार, परोपकार आणि सहिष्णूता हिच इश्वरभक्ती ह्या विचारांची आस धरा तसा प्रसार करा.

In reply to by पैसा

पिलीयन रायडर गुरुवार, 12/17/2015 - 11:22
तायडे.. मी सगळीकडेच वाद घालत फिरत नाय गो!! तसं वाटायचा फुल स्कोप आहे खरा ;) गणपतीलापण आपण पावती फाडत नाय! दारावर येणार्‍या कोणत्याच देवाधर्माच्या गोष्टीला आपण एन्टरटेन करत नाय.. सॉरी आम्ही पैसे देत नाही असं म्हणुन दार लावतो. रस्त्यावरच्या लोकांशी हुज्जत कोण घालणार बाय!

In reply to by पिलीयन रायडर

इरसाल गुरुवार, 12/17/2015 - 10:00
नाय नाय अस्सा नाय करायचं. नास्तिकाला फुकट देताना पावतीबुक घेवुन आला तर कृपया प्रतिसाद पहिल्यापासुन परत सुरु करायचे . ;)

मांत्रिक Wed, 12/16/2015 - 21:00
यनावाला सर तुम्हाला ईश्वर ही कन्सेप्टच मुळी कळलेली नाही. तो कशात आहे? तुमच्यात आहे माझ्यात आहे. निष्पाप बालकात आहे पापी माणसात आहे. पतिव्रतेत आहे तर रस्त्यावर उभे राहून गिर्हाईक शोधणार्या वारांगनेत आहे. रस्त्यावर तडफडणार्या रोग्यात आहे तर गाद्यागिरद्यांवर लोळणारा माणसात आहे. बेफिक्र गर्दुल्ल्यात आहे तर संशयी काटेकोर माणसातही आहे. सरळमार्गी मास्तरात आहे तर कुमार्गी चोरट्यातही आहे. भोळसट माणसात आहे तर लबाड कपटी ठकातही आहे. हे सर्व विवेकानंद ग्रंथावलीत लिहिलेलं आहे. वाचा पाहीजे तर एक ते दहा खंड. अजून खूप बोलायचंय पण ते तुम्ही समजू शकत नाही... दुःख त्याचंच आहे.

In reply to by मांत्रिक

मांत्रिक Wed, 12/16/2015 - 21:12
जे ज्ञानोबा तुकोबा, नामदास, संत कबीर, संत रोहीदास यांनी अनुभवलं, समजून घेतलं तेच मी मांडतोय. प्रभु येशूनंही तेच सांगितलं. भगवान गौतम बुद्धानं, महावीर जैनानंही तेच सांगितलं. त्याच विभूतींची आण घेऊन सांगतो, हेच सत्य आहे. किती किती प्रेमळ होते हे लोक! जरा वाचा! कुठेही तुमच्यासारखी निगेटीव्हिटी, कटुता, नैराश्य दिसणार नाही. अगदी क्षुद्रातील क्षुद्र व्यक्तीसाठी पण हे महात्मे जीव देऊ शकत होते. तुमच्यासारखे निगेटीव्हिटीने भरलेले नव्हते. तुम्ही पण ते अनुभव करा. किमान प्रभू येशूची ४ गाॅस्पेल तरी वाचा. मग कळेल की खरे आस्तिक कसे असतात. बंद करा आता ही निरर्थक चिखलफेक. तुम्ही उद्याच्या उद्या जरी मृत्यू पावलात(देव करो असे न होवो) तरी लोक तुमचे मुळीच स्मरण करणार नाहीत. ते या महान विभूतींनाच आठवणार. कारण जे बीज त्यांनी पेरलंय ते ईतकं मजबूत सशक्त पेरलंय की कोटी कोटी यनावाला आले तरी ते बीज मरणार नाही तर फुलणारच!!!!!

In reply to by मांत्रिक

मांत्रिक Wed, 12/16/2015 - 21:19
बंद करा हे सर्व. लोकांच्या दुःखात तुमचे विचार कुचकामी निरर्थकच आहेत. ते त्यांना काहीही मदत करु शकत नाहीत. विज्ञानाच्या विरोधात इथे कुणीच नाहीये. विज्ञान हा तर प्रत्येकाचा पहिला आश्रय आहे. पण जिथे विज्ञान काहीच करु शकत नाही तिथे दमल्या भागल्या जीवाला ईश्वर हाच आधार आहे. तो आधार तुमच्या भ्रमित विचारांनी दूर केलात तर शिल्लक काहीच नाही राहणार. उरेल ती फक्त निष्फळ वांझोटी हताशा, जी तुमच्या स्वभावात डोकावते.

In reply to by मांत्रिक

मांत्रिक Wed, 12/16/2015 - 21:29
प्रभू येशू: अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण मजकडे या. मी तुम्हाला विसावा देईन. द्वारकाधीश कृष्ण: अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् भगवान बुद्ध: अरे देव आहे की नाही याच्याशी तुला काय करायचंय? तू माणसाशी माणसासारखं वागतोस की नाही हे महत्वाचं! बोला यनावाला सर! यातलं काय आश्वासन तुम्ही देता? कोण तुम्हाला जवळ करेल? जेव्हा काळाची निर्मम हाक ऐकू येईल, जेव्हा परिस्थितीचा निर्मम घाला पडेल तेव्हा लोक तुम्हाला नाही तर या महात्म्यांनाच आठवणार आहेत. फुकाचा भ्रम आणि चारदोन दीडशहाण्यांच्या टाळ्या सोडून द्या. कुणीच तुमची आठवण नाहीये ठेवणार.

In reply to by मांत्रिक

राही गुरुवार, 12/17/2015 - 07:08
खेदाने लिहावं लागतंय की हे आपले काही प्रतिसाद वाचून क्लेश होताहेत. 'बंद करा हे लिहिणं' असं आपण कसं काय लिहू शकता? एक तर हे संस्थळ खासगी मालकीचं आहे. आणि संयत भाषेत, व्यक्तिगत न होता इथे व्यक्त होण्याची मुभा सर्वांना आहे. 'मृत्यूनंतर तुमचे नावही लक्षात राहाणार नाही, तुमची कुणी आठवणही काढणार नाही' ही शापवाणी अत्यंत अनुचित आहे. ह्याला तळतळाट म्हणतात. (यामुळे काही होणार आहे असे अजिबात नाही) आणि आस्तिकांच्या साध्या सोप्या भाषेत, तो स्वतःवरच उलटतो. शिवाय अशी आठवण तर कधीच कुणाची राहात नसते. आस्तिक काय किंवा नास्तिक, सगळे मातीतच जाणार असतात. 'चारदोन दीडशहाणे' अशी बोळवण तुम्ही कशाच्या आधारावर करू शकता? मलाही लेख आवडलेला आहे. आम्ही सर्व 'टाळ्या देणारे' तुमच्या भाषेत दीडशहाणे ठरतो काय? दीडशहाणेपणाचे तुमचे मोजमाप काय आहे? आणि यनावालासाहेब अतिशय संयमी शब्दांत आपला आशय मांडत असताना त्यावर अशा आक्रमक तळतळाटी प्रतिक्रिया याव्यात म्हणजे विरोधकांकडे शांतपणे प्रतिवाद करण्याचे सौजन्य नाही असे म्हणावे का? आणि, जे लोक स्वच्छ, निरलस, निरपेक्ष वृत्तीने समाजात, कुटुंबात वावरत असतात, त्यांच्या बुद्धीला एक वेगळे परिमाण, एक वेगळी मिती(डाय्मेन्शन) लाभत असते. बुद्धीचा वापर समतोलपणाने केल्यामुळे एक वेगळी क्षमता अंगी येते. धोका किंवा संकटे आधीच कळतात, मनुष्यव्यवहार कळतो. हे सगळे 'दैवी' नसते. आणि शेवटी, वैयक्तिक पातळीवर उतरायचे तर यनावालासाहेबांचे सामाजिक वर्तुळ मोठे आहे, त्यांचे अनेक हितचिंतक आहेत. ते आणि त्यांच्यासारखे अनेक आज जे काही करताहेत ते समाजाच्या भल्यासाठी आहे अशी हजारोंची धारणा आहे, आणि त्यांना मूक पाठिंबाही आहे. तुम्ही या सर्वांना दीडशहाणे म्हणून झटकून टाकू शकत नाही, सिम्प्ली बिकॉज़, ते तुमच्या ज्यूरिस्डिक्शनमध्ये नाही. आणि मृत्यूनंतर कुणाचा न्यायनिवाडा करणे तर मुळीच नाही.

In reply to by राही

मांत्रिक गुरुवार, 12/17/2015 - 08:59
@ राहीजिः मला तो अर्थ नक्कीच अपेक्षित नव्हता किंवा मी कुणाला शापवाणी पण देत नाहीये. बोलण्याच्या भरात काही चुकीचा अर्थ निघणारे बोलून गेलो असेन तर त्याबद्दल यनावालांना क्षमस्व. बाकी मी कुठेही त्यांना अरेतुरे केलेलं नाहीये. फक्त बोलण्याच्या भरात असं एखादं चुकीचं वाक्य जाऊ शकतं. मीच नव्हे कुणाकडूनही असं होऊ शकतं. असो, दिलगिरी व्यक्त करून संपादक मंडळास विनंती की खालील प्रतिसाद डिलीट करावाः http://www.misalpav.com/comment/784436#comment-784436

In reply to by राही

मांत्रिक गुरुवार, 12/17/2015 - 09:01
@ राहीजिः मला तो अर्थ नक्कीच अपेक्षित नव्हता किंवा मी कुणाला शापवाणी पण देत नाहीये. बोलण्याच्या भरात काही चुकीचा अर्थ निघणारे बोलून गेलो असेन तर त्याबद्दल यनावालांना क्षमस्व. बाकी मी कुठेही त्यांना अरेतुरे केलेलं नाहीये. फक्त बोलण्याच्या भरात असं एखादं चुकीचं वाक्य जाऊ शकतं. मीच नव्हे कुणाकडूनही असं होऊ शकतं. असो, दिलगिरी व्यक्त करून संपादक मंडळास विनंती की खालील प्रतिसाद डिलीट करावाः http://www.misalpav.com/comment/784436#comment-784436

In reply to by मांत्रिक

मांत्रिक गुरुवार, 12/17/2015 - 09:05
आणि हो माझ्या सर्व प्रतिसादांचा टोन नक्कीच यनावालांना अपमानित करणारा नाही. पुन्हा एकदा वाचा सर्व नीट. कदाचित एखादा नको असलेला अर्थ डोकावत असेल तर संपादक मंडळास परत विनंती की तो उडवून टाकावा. माझे काही ऑब्जेक्शन नसेल.

In reply to by मांत्रिक

यनावाला Fri, 12/18/2015 - 22:18
श्री.मांत्रिक यांच्या प्रतिसादांविषयी माझी कोणतीही तक्रार नाही. कोणाविरुद्ध, कोणत्याही कारणासाठी मी कोणाहीकडे कोणतीही तक्रार कधीही केलेली नाही. तेव्हा श्री. मांत्रिक यांनी मला "क्षमस्व" म्हणण्याचे कांहीच कारण नाही.[अवांतर;-- "क्षमस्व" हे क्रियापदरूप आज्ञार्थ द्वि.पु.ए.व. आहे. त्याचा अर्थ "तू (मला) क्षमा कर असा होतो." अनेक व्यक्ती असतील (वाचक,श्रोते इ. ) तर "क्षमध्‍वम्" (आपण सर्वांनी -मला- क्षमा करावी) असे रूप वापरायला हवे. असो. संस्कृत भाषेची आवड म्हणून लिहिले. सर्वठिकाणी "क्षमस्व" असे म्हणण्याची पद्धत आहे. तेव्हा ते ठीकच. शास्त्राद्रूढीर्बलीयसी।] २/ माझ्या मरणाविषयी कोणी काही लिहिले तरी मला त्याचे काहीच वाटत नाही. प्रत्येक सजीवाला मरण अटळ आहे. ती एक नैसर्गिक घटना आहे. मरणाची, मरणासंबंधीच्या शब्दांची( प्रेत, तिरडी, मसण, गोवर्‍या इ.) माणसाला भीती वाटू नये. समाजात अशी भीती रूढ आहे ती अनावश्यक आहे. मला मरणाची यत्किंचितही भीती वाटत नाही. मात्र वेदना, यातना, पराधीनता नको. मरणभयाविषयी एक लेख लिहिला आहे. तो कधीतरी मि.पा.वर टाकीन.

In reply to by यनावाला

मांत्रिक Sat, 12/19/2015 - 13:58
धन्यवाद सर... तुम्ही जिंकलात, मी सपशेल हरलो. शांतता आणि स्थिरता हे सद्गुण मी तुमच्यापासून आता शिकण्याचा प्रयत्न करतो. आपले विचार कधीच जुळणार नाहीत. मी एक भाविक आस्तिकच राहणार. कारण माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट काळखंडात या ईश्वरी शक्तीवरील विश्वासानेच, श्रद्धेनेच मला साथ केली. जेव्हां मित्रांनी, नातेवाईकांनी माझी साथ सोडली तेव्हां केवळ जगदंबेच्या विश्वासावरच, श्रद्धेवरच कुणाही माणसाचा आधार नसताना अतिशय मोठी लढाई लढत लढत हळू हळू सर्व त्रासांतून बाहेर आलो. पण असो, एक शांतता व स्थिरता अंगी बाणवलेला मनुष्य म्ह्णून तुमच्याविषयी कायमच आदर राहील. कधीतरी आयुष्यातील काही प्रसंगी मला राग, क्रोध अनावर होईल, तेव्हां तुमचं नाव नक्कीच आठवेल मला. असो सर, आप जियो हजारो साल!!! आपली मैत्री आजपासून! रागाच्या भरात काही बोललो असेन, त्रास दिला असेन तर क्षमा करा. एक खंत नक्कीच व्यक्त करेन, की मी माझी चूक कबूल केली, चुकीचे दिले गेलेले प्रतिसाद डिलीट करण्याची विनंती केली तरी त्याकडे अजिबात लक्ष दिले गेले नाहीये. माझा आयडी बंद करण्याची अनेकवेळा मागणी करुन देखील तेही कॅरी आउट झालेले नाही. या दोन गोष्टींकडे कृपया लक्ष द्यावे ही पुन्हा पुन्हा विनंती.

In reply to by मांत्रिक

मांत्रिक Wed, 12/16/2015 - 21:29
प्रभू येशू: अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण मजकडे या. मी तुम्हाला विसावा देईन. द्वारकाधीश कृष्ण: अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् भगवान बुद्ध: अरे देव आहे की नाही याच्याशी तुला काय करायचंय? तू माणसाशी माणसासारखं वागतोस की नाही हे महत्वाचं! बोला यनावाला सर! यातलं काय आश्वासन तुम्ही देता? कोण तुम्हाला जवळ करेल? जेव्हा काळाची निर्मम हाक ऐकू येईल, जेव्हा परिस्थितीचा निर्मम घाला पडेल तेव्हा लोक तुम्हाला नाही तर या महात्म्यांनाच आठवणार आहेत. फुकाचा भ्रम आणि चारदोन दीडशहाण्यांच्या टाळ्या सोडून द्या. कुणीच तुमची आठवण नाहीये ठेवणार.

In reply to by मांत्रिक

मांत्रिक Wed, 12/16/2015 - 21:45
प्रभू येशूनं एका वेश्येला दगडमार करणार्या जमावाला रोखलं. भगवान बुद्धाने एका उपाशी वाघाला स्वतःचं मांस खाऊ घातलं. नामया भाकरी चोरुन पळणार्या कुत्र्याला ऊद्देशून म्हणाला "अरे देवा, थोडं तूप पण लाव त्या भाकरीला नाहीतर पोट दुखेल." संत कबीराचा मुलगा गवत कापायला गेला तर गवतावरचे दव पाहून म्हणाला की गवत रडतंय, मी त्याला नाही तोडणार. मला सांगा यनावाला सर! तुमचं विज्ञान हे शिकवेल का? नाही विज्ञान म्हणते मीच सर्वोच्च. मीच दुसर्यावर राज्य करणार. अहो सर, आम्ही विज्ञानाची पण मदत घेतो आणि अध्यात्माची पण. ज्या योगे मानवी जीवन सुखी होईल तो प्रत्येक रस्ता शोधायला हवा हे आम्हाला नक्कीच कळते. पण ते तुम्हाला कळत नाही. कारण तुम्ही तुमचे पर्सनल अजेंडे घेऊन ईश्वरावर थुंकायचा प्रयत्न करताय, की जी थूंक तुमच्याच तोंडावर पडतेय.

In reply to by मांत्रिक

शनी..शनी....विसरलात की हो...!! सगळी पृथ्वीवरचीच उदाहरणं दिलीत ना म्हणून नम्रपणे आठवण करुन द्यायला आले... मी एक अम्बज्ञ...