Skip to main content

कोकणस्थांची कुलदेवता अंबेजोगाई

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 10/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी पहिलेच स्पष्ट करतो की मला या धाग्यात श्रद्धा ,अंधश्रद्धा,नियती,नशीब,कर्तुत्व वगैरे बाबींचे घोळ घालायचे नाहीयेत.ज्याने त्याने आपापल्या परीने अर्थ घ्यावा. आपण प्रत्येक जण थोड्या फार फरकाने शिक्षण ,नोकरी, लग्न,मुले या चक्रातून फिरता असतो.हळूहळू वय वाढता असते .अनेक चिंता विवंचना मागे लागलेल्या असतात .कधी त्यावर तात्पुरता उपाय काढला जात असतो तर कधी त्या प्रलंबित ठेवल्या जातात .अशातच कधीतरी कोणी घरातील अथवा बाहेरील वयस्कर माणूस सुचवतो की वर्षातून एकदा किंवा जेव्हा जमेल तेव्हा ,घरात मंगलकार्य झाले किंवा ठरले असल्यास कुलदेवतेला जाऊन या .आणि मग बरीच वर्षे मनात घोळत असलेला बेत डोके वर काढतो . मला कोकणस्थांची कुलदेवता अंबेजोगाई आहे हे माहीत होते आणि पूर्वी मी एकदा तिथे जाऊन दर्शनही घेतले आहे. त्यानंतर बरीच वर्षे मध्ये गेली.जीवनात अनेक चढ उतार आले .घरात अनेक वेळा मंगल कार्य झाली पण अंबेजोगाईला पुन्हा जायचे राहून गेले होते.आता एकदा अंबेजोगाईला जाऊन या म्हणून घरची मंडळी मागे लागली . ट्रेनने जाण्यासाठी मी आरक्षण बघत होतो पण एकतर जवळचे स्टेशन परळी वैजनाथ किंवा परभणी येथे जाणाऱ्या फार कमी ट्रेन आणि त्यांचे बुकिंग आधीच फुल झालेले.रस्त्याने जावे तर कुटुंबासहित रात्रभराचा प्रवास जर त्रासदायक वाटत होता आणि दोन दिवसात जाऊन येणे धावपळीचे झाले असते. चौकशी करत असताना मला कर्जत जवळ कोन्ढाणे येथे गोगटे बंधूनी स्थापन केलेल्या अंबेजोगाई मंदिराची माहिती मिळाली. पुण्याहुन कर्जतला एका दिवसात जाऊन येणे शक्य होते.फार तर एक दिवस मुक्कामही करता आला असता. श्री. अनिल गोगटे यांना फ़ोन करून माहिती विचारून घेतली. मी दुपारी पोचणार असल्याने देऊळ दिवसभर दर्शनाला उघडे असते का हे ही विचारले . त्यांनी सुद्द्धा उत्साहाने माहिती दिली.पुरुषांनी साधी शर्ट पॅण्ट (जीन्स/ थ्री फोर्थ/ शॉर्ट नाही) व बायकांनी साडी नेसुन दर्शनाला येण्याचा नियम आहे असेही सांगितले. =============================== थोडी अधिक माहिती सांगतो. कोकणस्थांची कुलदेवता मराठवाड्यात कशी गेली याबद्दल एक आख्यायिका सांगतात. कोकणातील आडिवरे येथील देवीचे परळी वैजनाथ बरोबर लग्न ठरले .वऱ्हाड निघाले परंतु वाटेत अंबेजोगाई येथे नवरा पसंत नाही म्हणून देवी रुसून बसली आणि लग्न मुहूर्त टळून गेला. तेव्हापासून देवीने तिथेच वास्तव्य केले. ही देवी कोकणस्थांचे कुलदैवत कशी बनली याविषयीचे एका गोष्ट . कोकणप्रांताची निर्मिती केल्या नंतर श्री परशुरामांनी तिथे शेती करण्यासाठी १४ गोत्रांमधुन साठ कुटुंबे नेली.तसेच समुद्र किनारी अर्धमृत अवस्थेत लागलेल्या १४ व्यक्तींना संजीवनी देऊन त्यांचे विवाह लावण्यासाठी अंबेजोगाई येथून वधू नेल्या.तेव्हा आपल्या मुलींची पाठवणी करताना अंबेजोगाईच्या लोकांनी अट घातली की या सर्व कुळांनी योगेश्वरी देवीला कुलदैवत मानावे. ================================= . 1 . ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी पुण्याहून निघालो. कर्जत स्टेशनला पोचुन कोन्ढाणे गावात जाण्यासाठी एका परतीची रिक्षा ठरवली .तिथे जायला सिक्स सीटर पण मिळतात फक्त थांबायची तयारी पाहिजे कारण सर्व सीट भरल्याखेरीज ते निघत नाहीत.रिक्षा कोन्ढाणे गावात जायला निघाली.पावसाळ्याचे दिवस असल्याने अर्थातच बाहेर मस्त वातावरण होते.उल्हास नदीच्या काठाकाठाने रस्ता चालला होता.हळूहळू शहराची गजबज मागे पडत चालली आणि छान गावाचे वातावरण जाणवू लागले .छोटी छोटी घरे, हिरवीगार शेते, पावसाचे ढग ओठंगलेले डोंगर आणि बाजूने वाहणारा उल्हास नदीचा खळाळ. साधारण दहा किलोमीटरवर कोन्ढाणे गाव लागले .मंदिराचे जुळे कळस लांबूनच दिसू लागले आणि बघता बघता रिक्षा मंदिराच्या दारात पोचली. . 1 . बाहेरच चप्पल बूट काढून हात पाय धुवून मंदिरात प्रवेश केला.पुढे शेणाने सारवलेला सभामंडप एका बाजूला यज्ञ कुंड व पूजेची जागा तर दुसऱ्या बाजूला एक टेबल व काही खुर्च्या ठेवलेल्या आहेत. गोगटे बंधूंपैकी दोघेजण मंदिरात आल्यागेल्याची चौकशी करायला आणि माहिती द्यायला हजर होते.अजून एक बंधू कामानिमित्त बाहेर गेले होते. श्री. अनिल गोगटे यांनी गप्पा मारता मारता मंदिराची माहिती द्यायला सुरुवात केली. गोगटे यांची आठवी पिढी सध्या येथे वास्तव्यास आहे.गांधी वधानंतर जे ब्राम्हणांचे शिरकाण चालू झाले त्यात कोन्ढाणे गावातील वीस पंचवीस ब्राम्हण कुटुंबे घरे सोडून परागंदा झाली .पण गोगटे घराण्यातील एक बाई खमकी होती.रोज घोड्यावरून ती शेतात जाई.माणसे कामाला लावून शेत कसे, आमराईतील आंबे काढी.जेव्हा दंगेखोर लोक घरे जाळायला आले तेव्हा तिने स्पष्ट सांगितले की मी घर सोडून तर जाणार नाहीच.पण स्वत:कडची पोतेभर काडतुसे आणि बंदूक सज्ज ठेवीन आणि माझे घर जांळणाऱ्या घराचे पुरुष मारून टाकीन. बायका पोरांना हात नाही लावणार.बाईची जिद्द सगळ्या गावाला माहित असल्याने घर वाचले पण गोठा आणि इतर सगळे जाळून दंगेखोर निघून गेले. ही बाई म्हणजे अनिल यांची पणजी. मध्ये बराच काळ गेला. काही वर्षापूर्वी अनिल यांना स्वप्नात देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की तुझ्या जागेत जुळ्या जांभळीच्या झाडाखाली माझे वास्तव्य आहे.तर मला बाहेर काढ. मग ते झाड शोधून काढून आजूबाजूची माती उकरून त्यानी देवीचा तांदळा बाहेर काढला आणि त्याच जागी देवीचे प्रतिष्ठापना केली.दर पौर्णिमेला आणि मार्गशीर्ष महिन्यात देवीचा उत्सव असतो. तेव्हा अनेक भाविक येथे येत असतात. इतरही जण ज्यांना मराठवाड्यात अंबेजोगाईला जाणे शक्य होत नाही ते इकडे येतात. 1 दोन षटकोनी देवळा पैकी एकामध्ये श्री योगेश्वरी देवी तर दुसर्यामध्ये व्याडेश्वराची स्थापना केली आहे.व्याडेश्वराच्या समोर काळ्या पाषाणातला नंदी आणि दरवाज्यावर गणेशाची सुंदर मूर्ती आहे. 1 देवीच्या गाभाऱ्या मागे कुशमांडा,स्कंद माता,कात्यायनी ,कालरात्री ,महागौरी, सिद्धीदात्री,शैलपुत्री,ब्रम्हचारिणी आणि चंद्रघंटा अशा नवदुर्गा अवताराच्या नऊ मूर्ती आहेत. 1 दर्शन झाल्यावर बराच वेळ श्री. गोगटे बंधूंशी गप्पा मारत बसलो होतो.त्यांना आलेले देवीच्या अस्तित्वाचे अनुभव ते सांगत होते.तसेच इतरही बरीच माहिती देत होते.वातावरण फार प्रसन्न वाटत होते.बघता बघता एक तास होऊन गेला. मला परतीची गाडी गाठायची असल्याने वेळेत निघणे भाग होते. 1 आता पुन्हा एकदा येईन तेव्हा भरपूर वेळ हाताशी ठेवून यायचे अशी खुणगाठ मनाशी बांधून जड अंतकरणाने आणि प्रसन्न मनाने शेवटी तेथून निघालो. 1
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22913
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

पुरुषांनी साधी शर्ट पॅण्ट (जीन्स/ थ्री फोर्थ/ शॉर्ट नाही) व बायकांनी साडी नेसुन दर्शनाला येण्याचा नियम आहे असेही सांगितले. हे एक सोडुन सगळे पटले, गोगटे ह्यांचे पूर्वसुकृत जोरदार असणार ह्यात वाद नाहीच, तुमच्या लेखनशैली मधुन क्षेत्र पावित्र्य सुद्धा जाणवले (मतलबी आस्तिक अर्थात अग्नोस्टिक) बापु

In reply to by आदूबाळ

ते सौदिंडियन लोकांकडून आलंय. ते तर पुरुषांना लुंगी आणि बायकांना साडी नेसल्याशिवाय आत सोडत नैत. आपल्याकडेही खूप ठिकाणी हे प्रकार चालू झालेत. धोतर आणि नौवारी कम्पल्सरी नाही हे नशीब समजा. एखाद्याच्या खाजगी मालकीच्या ठिकाणी येणार्‍याने काय घालावे याबद्दल तो मालक सूचना देऊ शकतो असे वाट्टे. मला वाटते डेरवणलाही असा नियम आहे. हा खाजगी मालकीचा मुद्दा सांगून गोव्यातल्या अनेक देवळांत अजूनही जातीच्या आधारावर एखाद्याला गाभार्‍यात प्रवेश द्यावा का हे ठरवतात.

In reply to by पैसा

२००६ पर्यंत तर नक्कीच होता. सध्याची स्थिती माहित नाही. देवाच्या दर्शनाला जातांना योग्य त्या वेषात असावे, अशा द्रूष्टीने हे नियम आखलेले असावेत. "देवळांत धोतर आणि समुद्रकिनार्‍यावर पोतेरं", असे आमचे बाबा म्हणतात.

In reply to by पैसा

हा खाजगी मालकीचा मुद्दा सांगून गोव्यातल्या अनेक देवळांत अजूनही जातीच्या आधारावर एखाद्याला गाभार्‍यात प्रवेश द्यावा का हे ठरवतात.
खेदकारक :(

In reply to by पैसा

ते सौदिंडियन लोकांकडून आलंय.
नाही हो, कोल्लापूरात अंबाबाईच्या गाभार्‍यात सोवळं नेसूनच जावं लागत असे. काही पाशवी शक्तिंनी केलेल्या उठावामुळे गाभार्‍यात आता भक्तगणांना प्रवेश बंद केला आहे. तरी अभिषेक-कुंकुमार्चन सोवळं नेसूनच!!

In reply to by सूड

गाभार्‍यात आणि अभिषेकाला वगैरे ते सोवळे किंवा ओलेत्याने वगैरे असतंच. हे आम्ही बोलतोय ते देवळात फक्त सभामंडपात जाण्यासाठी ड्रेसकोड लागू केल्याबद्दल.

In reply to by पैसा

काल गोगट्यांशी ह्याबाबत थोडे बोललो. त्यांच्या मतानुसार, १. त्यांचे मंदिर खाजगी आहे. २. स्त्रियांनी साडी आणि पुरुषांनी शर्ट-पँट अशा वेशात यावे, असा त्यांच्या देवळाचा नियम आहे. ३. बर्‍याच स्त्रियांना प्रवास करतांना साडी थोडी त्रासदायक वाटू शकते, तर अशा स्त्रियांनी येतांना जर साडी आणली, तर ते स्त्रियांना कपडे बदलायला वेगळी खोली देतात. ४. एक-एक कप चहा फ्री आहे. ५. पौर्णिमेला नवचंडी होम असतो आणि स्त्रियांचे कुंकुमार्चन असते. मला तरी नियम फार जाचक वाटले नाहीत, गुरुद्वारात डोक्यावर रुमाल आणि मंदिरात धोतर, देवाचा आदर महत्वाचा.

In reply to by पैसा

डेरवणला असा नियम आहे असे मी ही ऐकले होते. मागीलवर्षी डेरवणला गेलो होतो. त्या ठिकाणी शिवाजीच्या जीवनासंबंधी काही चित्रशिल्पे आहेत आणि मागील बाजूस कोण्या महाराजाचा मठ आहे. शिवाजीच्या शिल्प परिसरात वेशभूषेसंबंधी काही नियम नाही. आतील मठात प्रवेशकरण्यासाठी मात्र (स्त्रियांसाठी) साडीचा नियम आहे.

In reply to by पैसा

हो डेरवनला आहे आजुण आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांच्याशी वाद झालेले कि नियम बायकांसाठीच का पुरषाना हि लावा.

In reply to by आदूबाळ

इथे ह्या मंदिराच्या बद्दल उल्लेख आले कारणे ते ठळक करुन लिहिले आहे बाकी सगळीकडे असलेल्या असल्या नियमांस सुद्धा मी तोच नियम लावणार, मुळात कितीतरी गोष्टी प्रागतिक हिंदुत्वाने त्यागल्या आहेतच न? जास्त मागे नाही तर ७०-८० वर्ष मागे खानावळीत बाराबंदी कुर्ते वगैरे घालून बसता येत नसे उघड्या अंगानेच जेवायला बसावे लागे, ते आपण कधीच त्यागले आहे अन ते समयोचित आहेच (कदाचित ही लुसिडिटी आहे ज्याच्यामुळे हिंदु अतिरेकी नसतात सहसा), ह्याच्या विरुद्ध जाऊन हिंदु धर्माचे रिवर्स indoctrination करणाऱ्या वृत्ती खरेच विघातक वाटतात, बाकी काही नाही)

बरे झाले ही माहिती सांगितलीत. माझ्या सासूबाईंना अचानक देवदर्शनाला आम्हा सगळ्यांना नेण्याची इच्छा होते आणि ते ठिकाण लांब असले की तेथे जाण्याचा योग तीन ते चार वर्षांनी येतो. तोपर्यंत त्यांच्या मनात ती रुखरुख राहते. मागीलवेळी त्यांनी भारतातून निघायला २ दिवस बाकी असताना अंबेजोगाईला जाण्याची इच्छा सांगितली. असे धावपळत शक्य नव्हते. हे ठिकाण कर्जतजवळ म्हणजे तसे सोयिस्कर दिसते. तिकडेच जावे असे आता वाटत आहे.

@कंजुस सर- सहल म्हणुनही जायला छान ठिकाण आहे. येथुनच राजमाचीला जाणारी वाट सुरु होते. @रेवती ताई-पुढच्या भारत भेटीत नक्की जाउन या ईथे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मला तिथली सर्व माहिती आहे.राजमाचीला साताठवेळा गेलो आहे.मागच्या बाजूस कोंडाणे धरण नियोजित आहे त्यात यांची आणि अंजली दमानिया यांची बरीच जमीन जाणार आहे. बाकी आता जो रम्यपणा इथे दिसतो आहे तो दहा वर्षांनी दिसणार नाही.सर्व प्लॅाट विकले गेले आहेत.इथूनच अर्ध्या तासावर कोंदिवडे/कोंडाणे लेणी आणि धबधबा आहे.गोगटे जेवणाचीही व्यवस्था करतात त्याचे नाव वनविहार आहे.गायी पाळल्या आहेत .शंभर लिटर्स दुध आदिवासी मुलांना देतात.

In reply to by कंजूस

मला तिथली सर्व माहिती आहे. होय ना? मग होऊन जाऊ दे एक कट्टा कोंदिवड्याला.. कोंडाणे लेण्यांना दोन वेळा गेलो आहे. एकदा तर १०० जण गेलो होतो. जागा खूप आवडली. गोगटे यांचं आतिथ्यही आवडलं. गप्पिष्ट आहेत. ऑफिसमधल्या काही जणांबरोबर तिथे दोन किंवा तीन आठवड्यांनी एक सहल करायचा विचार करतोय. लेणी बघायची आहेत. महाराष्ट्रातल्या लेण्यांबद्दल एक पुस्तक लवकरच प्रकाशित करत आहोत. त्याच्या लेखकाला तिथे घेऊन जायचंय. @मुवि : kind attention @प्रचेतस - येणार का?

In reply to by मुक्त विहारि

संपर्क करायचा तेव्ढचं विचारतो आणि दोन शब्द संपवतो. बुवांबरोबर्प्रगोसकट्धन्याबॅट्यासहीत प्रचेतस यांचे सोबत येण्यास उत्सुक. नाखु. (चिमण आणी दातरू पक्षीनिरिक्षणासाठी (तिथे)अगोदरच जाणार आहेत टक्या आणि मुनीबरोबर म्हणून त्यांची नावे धरली नाहीत याची जाहीर (नम्र) नोंद

ज्याने त्याने आपापल्या परीने अर्थ घ्यावा.
कोकणस्थ ब्राह्मण लोकं असल्या पौराणिक भाकडकथात अडकतात हे पाहुन त्यांच्या तथाकथित स्वयंघोषित हुच्च बुध्दीश्रेष्ठत्वाच्या संकल्पना किती फोल आहेत ह्याची खात्री पटते !! "धातु, पाषाण, मृत्तिका । चित्रलेप, काष्ठ देखा । तेथे देव कैचा मूर्खा । भ्रांति पडिली । " --------------------------------------------------------------------------------

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हो, बदलते. आमचीही ही देवी कुलदेवता नाही पण एकंदरीत कोकणस्थांची सर्वमान्य देवी म्हणून तिच्याकडे बघितले जाते (असे ऐकलेय). मी तशीही अतोनात भक्त नाही म्हणूनच जिथे शिनियर लोक्स नेतील तिथे जाते. फार वाद घालत बसत नाही. ;)

फोटो डकवायला मदत केल्याबद्दल पैसाताईंचे खुप खुप आभार !!!

मागच्या वर्षी येथे जाणे झाले होते. देऊळ सुंदर आहे आणि गोगटे बंधूंदेखील अतिशय स्नेहाने सर्वांची विचारपूस करीत होते. परत भारतवारी झाली की नक्की जाणार.

आमची ही कुलस्वामिनी योगेश्वरी असल्याचे लहानपणापासुन ऐकत आलो.अनेक वेळा अंबाजोगाईला दर्शनालाही जाऊन आलो.साधारण १० वर्षापुर्वी आमच्या कुलन्यासाच्या काही लोकांनी एक रितसर शोधमोहिम काढुन असं शोधुन काढलं की आमची कुलदेवी ही अंबाजोगाईची योगेश्वरी नसुन कोकणातील पिरंदवणे येथिल जोगेश्वरी आहे. कथाकिर्तनासाठीच्या गोष्टी ठिक आहेत पण मला नेहमी एक शंका येते की लोकांचे वस्तव्य हे बहुसंख्य घराण्यांचा कुलदेव कोकणात असताना, कुलदेवी मराठ्वाड्यात कुठुन आली? की नाम साधर्म्यामुळे काही गोंधळ झाला आहे? दंतकथा/अख्यायिका सोडुन काही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत का?

गुहागरची दुर्गा व्याडेश्वरी हि बहुतेक करून 'खरे' आडनाव असलेल्या मंडळींची कुलदेवी आहे . तेथील देवीचे मंदीर , भक्तनिवास , परिसर , स्व्च्छता खुपच चांगली आहे .

मंदिर चालविणार्‍या माणसाची आस्था आणि आपल्याला तेथे मिळालेली वागणुक यातून एका चांगल्या सेवेचा आशय लेखात सहज आणि सर्वत्र व्यक्त झालेला आहे. सध्या प्रसिद्ध आणि क्षेत्राचा दर्जा असलेली देवालये या मार्गांवर यायला हवी आहेत. माणुस अश्या ठिकाणी दर्शनाला गेला, तर शेळ्यामेंढ्या हुसकल्याप्रमाणे जी हकलाहकली चालते..त्यामुळे माझ्यासारख्याचे मन अश्या ठिकाणी अजिबात रमत नाही. त्यापेक्षा आपण म्हणता हे ठिकाण निश्चितच भेट देण्यासारखे आहे,असे वाटते. धन्यवाद.

आस्था आणि चांगली वागणुक याशिवाय समाजोपयोगी कामेही येथुन चालतात. उदाहरणार्थ वधु वर सुचक मंडळ आणि थोड्या प्रमाणावर नोकरीविषयक मदत वगैरे. श्री. गोगटे यांनी दिलेल्या माहीतीनुसार आत्तापर्यंत ४१ जणांना नोकरी आणि ४८ लग्ने येथुन जमली आहेत.

देऊळ म्हणून, ठिकाण म्हणून श्रद्धास्थान म्हणून सगळं आवडलं. नक्की जायला आवडेल. माहिती दिल्याबद्दल अनेक आभार. रिस्ट्रिक्शन वर काहीच भाष्य करत नाही कारण तो मोठा विषय आहे. पटत नाही इतकंच म्हणतो.

देवळात जाताना ठराविकच पेहराव असावा हे प्रथमदर्शनी मलाही पटणार नाही पण सहज एक विचार मनात आला की काही ठराविक क्लब्स मधून किंवा काही पार्टीज ना वगैरे ठराविक पेहरावाचा आग्रह असतो - फॉर्मल्स ओन्ली वगैरे. तेव्हा आपण काय करतो बरे?

In reply to by यशोधरा

ड्रेसकोडवाल्या पार्ट्यांमध्ये कपड्यावरून स्टेटस ठरवतात...तो निव्वळ दिखाउगीरीचा प्रकार अस्तो आणि त्याबाबत सगळेच आग्रही अस्तात...दिखाउगीरीकरूनसुध्धा "आम्ही कपड्यांपेक्षा भावनांना महत्व देतो" असा उल्टा आव आणलेला नस्तो देवळात जाताना जाण्यार्याची भक्ती कपड्यांवरून ठरते? ३ पिस सुटातल्याची भक्ती आणि फक्त धोतरातल्याची भक्ती वेगळी?

In reply to by टवाळ कार्टा

नक्कीच नाही. तसे नव्हते म्हणायचे मला. इतकेच म्हणायचे आहे की काही ठिकाणी आपण/ लोक ड्रेस कोड पाळतोच/ पाळतातच ना. तिथे तर कोणी का विचारायला जात नाही. मग ज्याला देवालाच भेटायचे आहे आणि भक्तीच करायची आहे, त्याने तरी नियमांचा बाऊ कशाला करायचा? खरे तर देवळात जायचीही गरज नाही :)

In reply to by यशोधरा

खरे देवळात जायचीही गरज नाही... ह्याबद्दल सहमत.... पण प्रत्येक ठिकाणचे, पेहरावाचे काही नियम असतात आणि ते पाळावेत. पुणेरी पगडी आणि धोतर नेसून कुणी बार मध्ये जाईल का? आणि अर्धी-मुर्धी चड्डी घालून कुणी लग्नाला उभी राहिल का? किंवा हाफ पँट घालून कुणी ईंटरव्ह्युला जाइल का? मंदिराचे पावित्र्य राखलेच पाहिजे, असे माझे मत आहे.

In reply to by मुक्त विहारि

मंदिराचे पावित्र्य राखलेच पाहिजे, असे माझे मत आहे.
१००% अनुमोदन मुवी ! मी एकदा सज्जनगडावर गेलो होतो तेव्हा असाच हाफ पॅन्ट वाला एक दीड शहाणा एका खांबाला टेकुन रामाच्या मुर्तीकडे / समर्थांच्या समाधी कडे पाय करुन बसला होता . त्याला कोणी समजावयाला गेले तर , म्हणतो कसा की देव तर सगळी कडे आहे ना ? काय फरक पडतो कोठेही पाय करुन बसले तर ? त्याला जाऊन सणसणीत कानाखाली द्यायची इच्छा झाली होती , त्याला बोलणार होतो , अरे बाबा देव तुझ्या गालातही आहे , माझ्या हातही अन ह्या झालेल्या आवाजातही ! पण संस्थानच्या लोकांन्नीच त्याला सौजन्याने समजावुन शहाणे केले !

In reply to by मुक्त विहारि

मुवि, तुम्ही जे म्हणत आहात तेच मी म्हणत आहे. देवळातल्या नियमांचा बाऊ करताना इतर ठिकाणचे कपड्यांविषयक नियम आपण पाळतो, हेच लिहीलेय मी. तुमची पोस्ट वाचताना "पण प्रत्येक ठिकाणचे, पेहरावाचे काही नियम असतात आणि ते पाळावेत." हे वाक्य वाचले त्यामुळे हा पोस्ट प्रप्रंच.

In reply to by यशोधरा

पण तसे स्पष्टपणे लिहायचे राहून गेले. (गलती से मिस्टेक हो गयेली हय...आय अ‍ॅम सॉरी...) माझ्याकडून चूक झाली.... क्षमस्व

In reply to by मुक्त विहारि

ओ सॉरी बॉरी काय! मला वाटले तुमचा काही गैरसमज झालाय म्हणून सांगितले, इतकेच :)

In reply to by टवाळ कार्टा

देवळात जाताना जाण्यार्याची भक्ती कपड्यांवरून ठरते? ३ पिस सुटातल्याची भक्ती आणि फक्त धोतरातल्याची भक्ती वेगळी?
मनाची स्थितप्रज्ञता हा सात्विकतेचा महत्वाचा गुण असावा, स्थितप्रज्ञताचा लोप आणि सात्विकतेचा लोप हे फार दूर दूर नसावेत. सात्विक भाव ही मनःस्थिती आहे पोषाख हा गौणच असला पाहीजे. (हे माझ व्यक्तीगत मत आहे). बहुसंख्य लोक धोतर घालत त्याकाळात प्यांटवाला नको हे झालेच असणार आहे. नऊवारी घालणार्‍या घरात माझी आई गोलसाडी वापरणारी पहिलीच त्यामुळे निंदेस पात्र ठरत असे. भारतीयांना साडी अत्यंत साधी वाटते. बाहेरच्या देशातले बर्‍याच जणांना त्यातील पोट आणि बेंबी दर्शन खटकते. एकातोंडानी आमच्या धर्मात भेदभाव नाही म्हणावयाचे आणि तो मागच्या दाराने आणायचा. आक्षेप ड्रेसकोड पाळण्यास नाही. आक्षेप मागच्या दाराने लादलेल्या भेदभावा बाळगू इच्छिणार्‍या थेअरींना आहे, पोषाखाच्या माध्यमातून नैतीक देखरीकीस आहे. आक्षेप सर्वसमावेश्कता संपवण्याला आहे, आक्षेप विवीधता संपवण्याला आहे. आक्षेप सात्विकतेचा खोटा बागुलबुवा उभा करत त्या मागे दडलेल्या दांभिकतेस आहे. आक्षेप त्या मागे दडलेल्या शब्दप्रामाण्याच्या सक्तीला आहे. ज्या देशाची संस्कृती भक्तीत लीन होताना काहीही न घालण्याचे दिगंबरावस्थेचे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते तेथे मागच्या दाराने भक्तीच्या नावे सक्ती लादणार्‍यांना स्वतःचा धर्म स्वतःस व्यवस्थीत समजला आहे का हे तपासण्याची कुठेतरी आवश्यकता असू शकते किंवा कसे. क्लब मध्ये पुणेरी पगडी न घालणे अथवा लग्नाला अर्धीचड्डी न घालणे हे लोकोपचार बहुतांशवेळा सामाजिकरण (सोशलायझेशनच्या) प्रभावाने आपोआप पाळले जातात. पुणेरी पगडी घातली काय किंवा हॅट घातली काय किंवा टक़्कल करून गेले काय पार्टी जशी व्हायची तशीच होते लग्नाची यशस्वीता चड्डी किंवा पेहरावावरून निश्चित ठरत नसावी. मंदीर मालकांच्या दोन पिढ्यानंतर त्यांची मुले कदाचित जिन्सची थ्री फोर्थ घालून अत्यंत सात्विकपणे पुजा सांगतील उद्याच कुणी सांगीतलय :) एवढ निश्चित सात्विक भाव हि मनःस्थिती आहे अंशतः पोषाख सात्विक भावास मदत करणारे असू शकतात हि भूमिका मांडणे वेगळे आणि आपल्याच भूमिकेची सक्ती हे वेगळे. म्हणून त्या बाबत टोकाची सक्ती स्पृहणीय वाटत नाही.

In reply to by माहितगार

+१

In reply to by माहितगार

आक्षेप सर्वसमावेश्कता संपवण्याला आहे, आक्षेप विवीधता संपवण्याला आहे. क्या बात ! अख्ख्या प्रतिसादाला लई वेळा +

In reply to by यशोधरा

+१ टोकाचा आग्रह किंवा सक्ती कुठेच नको. एखादा नियम असेल तर तो सर्वांनीच नीट पाळावा. मात्र भारतीय लोकांच्या कपड्यांच्या बाबत आग्रही असणारे पुजारी फारेनर लोकांना कसल्याही दीड चतकोर कपड्यात गाभार्‍यापर्यंत घेऊन जातात आणि आग्रहाने तीर्थप्रसाद देऊन देवांच्या मूर्तीचे फोटो आपल्यासोबत काढा म्हणतात तेव्हा ते जाम हास्यास्पद वाटते.

In reply to by पैसा

मात्र भारतीय लोकांच्या कपड्यांच्या बाबत आग्रही असणारे पुजारी फारेनर लोकांना कसल्याही दीड चतकोर कपड्यात गाभार्‍यापर्यंत घेऊन जातात आणि आग्रहाने तीर्थप्रसाद देऊन देवांच्या मूर्तीचे फोटो आपल्यासोबत काढा म्हणतात तेव्हा ते जाम हास्यास्पद वाटते.
गोर्‍यांना रंगपाहून वेगळी विशेष वागणूक देणे हे निश्चित हास्यास्पद आहे. माझ्या अंदाजानुसार त्यातही गोर्‍यांना आणि काळ्यांना वेगवेगळी वागणूक दिली जाण्याची स्थिती अत्यंत चुकीची. म्हणजे एका आफ्रीकन स्त्री आधिकारीला मी सहज बोलता बोलता हिंदू धर्म तिच्या समोर एवढ्यामोठ्या लेव्हलला नेऊन ठेवला, मी ज्या शहरात त्या स्त्रीशी बोलत होतो त्या शहरातिल पुजारीमंडळी कर्मठ असण्याची शक्यता होतीती, ती स्त्री आधिकारी जेव्हा मंदिराना बघण्यास येते म्हणाली तेव्हा मंदिरातले पुजारीलोक नेमके कसे वागतील याची मलाच शंकावाटून गेली. मिशेल ओबामा साडीत कितीही सुंदर दिसू शकली तरीही आपल्याकडची नवीन जनरेशनची पंजाबी ड्रेसघालणारी मुलगीही दिवसभराच्या ट्रेंनिंगनंतरही दुसर्‍याच दिवशी मंदिरात साडी व्यवस्थीत सांभाळू शकेल का हा प्रश्न असतो. तेव्हा आपण मिशेल ओबामाकडून लगेच साडी घालून दाखव अशी अपेक्षा करणे रास्त असू शकते का ? त्रिनीदाद टोबॅगो मॉरिशस अशा कुठल्या कुठल्या बेटांवर आणि देशात धर्म पोहोचला आहे. तिथल्या किंवा आपल्या एनाअरएम च्या नवीन जनरेशच्या मुली इथल्या मंदिरात आल्या तर लगेच अगदी साडी घाला हि अपेक्षा ठेवणे कितपत रास्त असेल ?

In reply to by माहितगार

वरील भावनेशी सहमत परंतु मंदिर खाजगी असेल तर तेथे वेशभूषेबद्दल त्यांचा आग्रह आपल्याला मान्य करावा लागतो. सार्वजनिक मंदिरांची गोष्ट वेगळी आहे तेथे अंगभर कपडे असावेत आणि बीभत्स पणा नसावा हा शिष्टाचार आहे. मग ती साडी असावी कि झगा हा मुद्दा नसून अंगप्रदर्शन होऊ नये असे असावेत. माझ्या घरात मी पादत्राणे घालून स्वयंपाकघरात येत नाही आणि आणि कुणाला येउहि देत नाही.अशीच गोष्ट ज्या खोलीत देवघर आहे त्याबाबतही आहे. मग पुण्याची थंडी असली तरीही पायाला गार लागते म्हणून पाहुण्यांना बूट आणले तरी चालतील हे मला मान्य नव्हते आणि नाही. माझ्या घरात मी कधी दारू आणली नाही किंवा आणुही दिली नाही. लष्करात असताना देखील हे कटाक्ष पाळले होते. एखाद्या गोष्टीचे पावित्र्य हे मानण्यावर आहे. चर्च मध्ये बूट घालून गेलेले चालते याचे कारण ज्या परिस्थितीत तो धर्म उदयाला आला तेथे थंडीमुळे पायातील बूट काढणे शक्य नाही किंवा मेणबत्त्या जाळतात कारण थंडीमुळे तेल गोठते. म्हणून मी देवळात मेणबत्त्या जाळायला जात नाही. साधन शुचितेचे आपले एक महत्त्व मानले तर असते. शिक्षक घरी आले किंवा वर्गात आले तर तुम्ही उभे राहता. उभे राहिले नाही तर आदर कमी होतोच असेही नाही. कोणताच विधिनिषेध नसेल तर प्रश्नच मिटला.

In reply to by सुबोध खरे

अंगप्रदर्शन होऊ नये असे असावेत.
अंगप्रदर्शन होऊ नये हाच मुद्दा असेल तर बुरखा नाहीतर किमान पंजाबी ड्रेससारखा पोषाख हवा. पण या धागालेखाच्या विशीष्ट केस मध्ये त्यांना पंजाबी ड्रेसपण चालत असावा असे पण दिसत नाही. असो.

In reply to by यशोधरा

सांगते तुला. इथे तसे अवांतर आहे म्हणून जास्त बोलत नाही आता. एक आहे, या गोष्टीला ७/८ वर्षे झाली. मात्र तोच अजून तिथे मुख्य पुजारी आहे आणि हे सगळे त्याच्याकडूनच ऐकले आहे. ते लोक दक्षिणा जास्त देतात आणि आपले फोटो बिटो तिकडे छापतात हे त्याचे कारण सांगितलेले त्याने.

In reply to by खटपट्या

फारेनर. पुढच्या वेळी जाईन तेह्वा ऑफिसमध्ये चवकशी करते का नाही ते बघ! असं कसं करता म्हणून!

In reply to by यशोधरा

खूप छान भटकंती. आवडली. यशोधरा यांचा प्रतिसाद पटला. क्लब्स, हॉटेल्स मधे ड्रेस कोड असतोच आणि तो फॉलो करतोच आपण. चर्चेस मधे तर आत स्त्रियांनी स्लिव-लेस किंवा गुढ्ग्याच्या वर स्कर्ट घातलेले इत्यादी चालतच नाही. थोडाफार ड्रेस कॉड, नियम पाळले तर काय हरकत असावी.

In reply to by यशोधरा

असल्या ठिकाणी शक्यतो जात नाही. जिथे अगदीच नाईलाज असतो, तिथे झक मारत तो पेहराव करायलाच लागतो. मग चिडचिड करत करतो. (टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर - टीएमटीसी - मधला बुढ्ढा पारशी मॅनेजर डायनिंग रूममध्ये येताना बूट नसतील तर बाहेर काढत असे.)

कोकणातल्या योगेश्वरीचे लग्न बळजबरीने ठरवण्यात आले होते. ते तिला मान्य नव्हते म्हणून तिने एक अट घातली की कोंबडा आरवण्याआधी जर लग्न झाले तरच लग्न होईल अन्यथा सर्व वर्हाडी दगड होवुन जातील. परळीच्या लोकाना जसे हे समजले तसे त्यानि एक भुयार खणले जे परळी च्या देवळातुन निघुन अंबेजोगाई च्या योगेश्वरी देवळा मागे असलेल्या मुलीकड्च्या सभामण्डपात उघडते. या जागेला हत्तीखाना असे म्ह्णतात. आजही या ठिकाणी सहजपणे जाता येते. पण मुलाकडची मन्डळी सकाळी जागी नाही झाली आणी देवी ने सान्गितल्याप्रमाणे सगळे लोक दगडात रुपान्तरीत झाले

जायचे राहून गेलेय, आपल्या लेखामुळे परत आठवण झाली. आता नक्की ठरवायला हवे.

मस्त वाटले. शक्यतो शनिवार-रविवार टाळा. तिथे जाण्यापुर्वी, आदल्या दिवशी खालील व्यक्तीं पैकी कुणालाही फोन केलात तरी चालेल.म्हणजे मग जेवणाची सोय होवू शकेल. स्त्रियांना साडी बदलायची सोय आहे. अनिल गोगटे : 9271618184 अभय गोगटे : 9271618183 विनायक गोगटे : 9271618185