मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भात

प्रसाद गोडबोले · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भात हां तर झाले असे की गणेशा म्हणाला "समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कोणी आले तर आले नाही तर आपले आपण! " . 'आपले हाल होणार' हे स्पष्ट दिसत असल्याने आमच्या शाकाहारी मित्राने टांग दिली , आणि मग दुसर्‍या शाकाहारी मित्राला बोलावण्यात काही पॉईंट नाही असे वाटल्याने त्यांन्ना फोन करण्याचे टाळेल पण अस्मादिकांन्नी विचार केला की हे अत्ता लगेचच चातुर्मास सुरु होत आहे त्या आधी एकदा जोरदार बेत होऊनच जाऊदे ! मग काय , अप्रतिम मटन भाकरी खाल्ल्या नंतर पाना मध्ये आला

भात

... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु ! लगेच वेटर कडुन माहीती कळाली की हा "इंद्रायणी" आहे , गणेशा आधी म्हणालाच होता की इथे अप्रतिम भात मिळतो म्हणुन ! खरेतर मी अजिबात म्हणजे अजिबात भात न खाणारा माणुस पण चक्क मागुन मागुन भात खल्ला ! घरी येवुन विचारले की आपण कोणता भात खातो तर उत्तर आले "आपण ? तु तर हातही लावत नाहीस भाताला :-\ " मी : ":-\ बरं तुम्ही कोणता भात खाता ? " " बासमती आणि आंबेमोहोर " माझ्या डोक्यात एकदम ट्युब पेटली !! हायला , आपण ह्या बासमतीच्या नादाने भाताच्या कित्येक व्हरायटीज ला मुकतोय ! इंद्रायणी सारख्याच अशा कित्येक व्हरायटीज असतील वेगवेगळ्या चवीच्या ! इथेच मावळातच कित्येक व्हरायटीज आसतील !! एकदा तेजस होटेल ला खल्ला होता तोही हातसडीचा भात अप्रतिम लागला होता ! तुम्हाला भाताच्या अशा अजुन व्हरायटीज माहीत आहेत का ? त्या चवीला अ‍ॅपीयरंसला स्वादाला कशा असतात ? विकत कूठे मिळतील ? इंटरनेटवर आणि आजुबाजुला चिंचवडात माहीती शोधत आहेच मी , पण मिपाकरांच्या माहीतीत असे काही खास असेल तर सांगा ! अवांतर : १)गणेशाने त्या हॉटेल मालकाला तो इंद्रायणी तांदुळ मागितला पण त्याने ह्याना त्या निमित्ताने टाळले ...ल्ल्ल्लूऊऊऊउ २) मुंबईत असताना , हेल्ठ कॉन्शस असल्याने ब्राऊन राईस खायचो पण त्याला भात म्हणवत नाही हो . ३) आणि ह्यावरुन आठवले , आमच्या सातार्‍यातील तांदुळाअळी मधील एका दुकानातील पाटी "एकदा घेतलेला माल कोणत्याही सबबीवर ताबडतोब बदलुन मिळेल ! "आता एकदा तांदुळ आळीत चक्कर टाकायलाच हवी !! ४)https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=9998&start=1

वाचन 46171 वाचनखूण प्रतिक्रिया 97

जडभरत Fri, 07/24/2015 - 16:36
भातप्रेमी असल्याने कल्पना खूप आवडली. बासमती सतत खाण्यापेक्षा बरेच वेळा साध्या दुकानातून आणलेले साधे तांदूळ सुद्धा खूप मस्त लागतात. कोकणात अनेक ठिकाणी छोट्याशा होटेलात किंवा घरगुती खानावळीत खूप छानसा साधा भात खाल्लाय. मात्र नाव कधी विचारले नाही. त्या द्रिष्टीने कधी पाहिलेच नव्हते तांदळाकडे. आता मात्र पहाणार.

In reply to by पैसा

अवांतर ४) मधे दिलेल्या विश्व कोशाच्या लिन्कच्या नुसार ...
जगात भाताचे तीस हजारांपेक्षा जास्त प्रकार आहेत. एकट्या भारतात ५,००० ते ६,००० प्रकार आहेत, असे मानण्यात येते.
आधी वेगवेगळया प्रकारचा भात शोधु मस्त आणि मग डाळींच्या मागे लागु ! हा.का.ना.का. बाकी परवा खल्लेला इंद्रायणी भात नुसत्या तुप मिठा बरोबरही अप्रतिम लागला असता ! त्याला स्वतःची अशी जेन्युईन चव होती वास होता ! अशा काही अजुन भाताच्या व्हरायटीज मिपाकरांच्या माहीतीत असतील तर जरा टेस्ट बड्स ना प्यँपर करावे असे म्हणतो =))

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Sat, 07/25/2015 - 14:33
तूप मिठाबरोबर खायला भात हवाय? कोकणात आणि गोव्यात जाड, बुटके आणि तांबड्या रंगाचे तांदूळ मिळतात. त्यांचा मऊ भात जबरदस्त लागतो. अगदी मऊ शिजतो. गोव्यात मऊ भातापेक्षा पेज जास्त लोकप्रिय. त्यात उकडे तांदूळ असतील तर बघायला नको. त्याबरोबर अगदी साध्या पद्धतीने केलेल्या ठराविक भाज्या मस्त लागतात. तसेच उकडे-हुमण असलेले जेवण गोंयकाराला मिळाले तर तो स्वर्गाचे राज्य पण तुच्छ म्हणेल. उकड्या तांदुळाची चव आणि वास मात्र डेव्हलप व्हावी लागते. ते सगळ्यांचे काम नाही. साधा भात पटकन पचून जातो. उकड्या तांदुळाचे तसे नाही. ते जेवल्यावर बराच वेळ भूक लागत नाही.

In reply to by पैसा

उकड्या तांदुळाचे तसे नाही. ते जेवल्यावर बराच वेळ भूक लागत नाही.
वाह ! हे तर बेस्टच ! भाताचा एकच प्रॉब्लेम असतो कि तो पटकन पचतो आणि परत खा खा होते आणि आपण विनाकारण जास्त खातो . मुंबैत बईठे काम असल्याने आम्ही आणि आमच्या काही मित्रांन्नी प्रायोगिक तत्वावर म्हणुन असा हळु हळु पचणारा ब्राऊन राईस खायला सुरुवात केली होती ! आता एकदा हा उकड्या तांदुळाचा भात खाऊन पहायला पाहिजे !!

स्पंदना Fri, 07/24/2015 - 16:41
बासमती उरलाय कोठे बासमती? पार वाट लावलीय बासमतीची जेनेटिक बदल करुन. आता बासमती कायमचा हद्दपार केलाय आम्ही घरातुन, हल्ली सोना मसूरी खातो गपचुप!

प्रचेतस Fri, 07/24/2015 - 16:49
मावळात बहुसंख्य शेतकरी इंद्रायणी वाणाचेच उत्पादन घेतात. आंबेमोहोर परवडत नै शिवाय पीक लहरी. इंद्रायणी अमाप उत्पादन देते. थोडासा चिकट भात असतो पण अतिशय चवदार. कधी ऑक्टोबर नोव्हेंबर मधे मावळात फिरायचे. लोंब्यांमधे दाणे भरू लागलेले असतात. सम्पूर्ण मावळपट्टा भाताच्या सुगंधाने घमघमलेला असतो.

नाखु Fri, 07/24/2015 - 16:58
खात्रीशीर माणसाची गाठ घालून देतो. तळटीप : माझा त्याचा काहीही व्यावसायीक संबंध नाहीम, तसेच त्याच्याकडे अस्सल इंद्रायणी मिळतो इतकेच माहीती आहे, मी आजून आणला नाही कारण घरी कन्येला-लेकाला आवडत नाही. पुढच्या मोसमात आणून थोडी थोडी सवय लावणार आहे. (मला व्यक्तीशः आवडतो पण हसूं नकोस बर्याचदा दुकानात आंबेमोहोरसारखाच भेसळ मिळतो. आणि मला इंद्रायणीत थोडासा कोलम घालून चांगला वाटतो .लेकरं कायम गरगट्या भात खात नाहीत म्हणून तडजोड-प्रकल्प) संसारी अनुभवी नाखु

In reply to by जडभरत

पगला गजोधर Fri, 07/24/2015 - 17:14
आदिवासी शेतकर्यांकडे मिळू शकतो, पण आजकाल ते बिचारे सुद्धा त्याची शेती परवडत नाही म्हणून, जास्त (संख्येणे) आणि फास्ट (उगवण्याचा कालावधी) च्या संकरीत पिकांकडे वळले बहुतेक.

In reply to by पगला गजोधर

जडभरत Fri, 07/24/2015 - 17:20
हायब्रिड जातींमुळे अनेक दुर्मिळ आणि चवदार अशा भाज्या व धान्यांच्या जाती नष्ट होत आहेत. अर्थात याला जंगलतोड, लोकसंख्या वाढ ही पण कारणीभूत आहेत. कुठे तरी या जातींचे संगोपन करून ठेवलं जात असेल का? एखादी जात कायमची नष्ट झाली तर केवढं नुकसान?

In reply to by भिंगरी

भुमन्यु गुरुवार, 07/30/2015 - 15:56
घोटी त्र्यंबकेश्वर भागात मिळतो. इंद्रयणी भात असेल तर मस्त मेतकुट घालून त्यावर घरच्या ताज्या तुपाची धार ओता आणि खा.

सोंड्या Fri, 07/24/2015 - 17:06
कालच आवनी उरकली. 2 दिवस पाऊस चांगला परला, खाचरान पानी आसल तरच वाही चांगली होते. पावरटेलरनी सावा बरबाटात चंगला दरपलाना तर एक गोन युरीया कमी लागतो आसा आज्या बोलाचा. यंदा गरव्या मधी झीनी लावले 3 रोमटी, आनी हालवारात दोन रोमटी रत्ना, 3 रोमटी जया लावले. आमचा झीनी चा बियाना घरचाच आस्तो, आई आगोटचे निसून ठेवते. झीनी चा तांदूल येकदम बारीक जिर्या सारखा आनी कवडीपन नसते येकदम पानीदार खायला मऊ. बाजारात दुर्मीळ. बाकी रत्ना आनी जया राकट जाती, हत्तीच्या पावसात पन काडी झोपत नय. भाकर खायची तर जयाच्या तांदलाची, तोंडात इरते.

शंतनु _०३१ Fri, 07/24/2015 - 17:32
कृष्णासाळ तांदुळ :- ह्या तांदळात लाल रंगाची रेघ असते ( ओळखण्याची खुण ) , हा तांदुळ शिजवल्यावर यावर तुपासारखा तवंग येतो, पण हा तांदुळ फक्त अकोला ( भंडारदरा) कोतूळ या ठिकाणीच मिळतो. अत्यंत पौष्टिक असतो हा तांदुळ

तुषार काळभोर Fri, 07/24/2015 - 17:38
आम्ही भोर तालुक्यातल्या शेतकर्‍यांकडून दरवर्षी वर्षभराचा विकत घेतो. चव अशी की कशाबरोबरही: साधं वरण, फोडणीचं वरण, डाळीची आमटी, दूध, तुप, साखरः एकदम झकास लागतो.

In reply to by सोंड्या

स्पंदना गुरुवार, 07/30/2015 - 06:35
आम्ही "हावळा" म्हणतो त्या तांदळाला. फार गुरगुरीत भात. लालसर. दुध घालुन इतका मस्त लागतो ना!! वर पैसा तै पण तेच म्हणते आहे.

रुस्तम Fri, 07/24/2015 - 17:58
Rice Knowledge Management Portal http://www.rkmp.co.in/node/8817 १. संशोधन केंद्राचे नाव - वडगाव २. जारी केल्याचे वर्ष -१९८७ ३. कूळ - आंबेमोहोर १५७xआयआर ८ ४. दाण्याचा प्रकार – लांब बारीक ५. उत्पन्न (टन/हे) - ४ ४.५ ६. परिपक्वतेसाठी लागणारे दिवस- १३०-१३५ ७. वैशिष्ट्ये - सुगंधी, उष्णतेच्या लाटेस, जीवाणूंच्या पानकरप्यास मध्यम सहनशील, ८. सुचविलेला प्रदेश - पश्चिम महाराष्ट्रातील तांदूळ पिकविणारे प्रदेश

छान धागा. माहितीपूर्ण चर्चा चालू आहे ! सहज मनात आले म्हणून: १. भाताचे जे बीज शेतात पेरतात त्याला 'भात' म्हणतात व ते पेरल्यावर उभे राहणार्‍या पिकालाही 'भात' म्हणतात, (उदा : भातशेती). २. शेतातले भात कापून आणून आणि त्याला झोडून वेगळे केलेले दाणे सालासकट साठवलेले असतात किंवा वाहतूकीत असतात तेव्हा ते एकत्रितपणे 'भात'च असतात. ३. भात सडून* त्यांचे साल (तूस) काढून टाकले की त्यांचे 'तांदूळ' बनतात. ४. तांदूळ शिजविले की त्यांचा 'भात' बनतो. भाताचे अनेक शाकाहारी आणि मांसाहारी प्रकार मला अत्यंत आवडतात... तांदळाचे पीठ चूलीवरच्या/शेगडीवरच्या उकळत्या पाण्यात मिसळून केलेल्या भाकरीची चव इतर कोणत्याच भाकरीला नाही असे माझे आवडते मत आहे :) ====== * : इथले सडणे हे क्रियापद मराठीतले आहे, हिंदीतले नाही; आणि ही क्रिया केली जाते, होत नाही :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चिगो गुरुवार, 07/30/2015 - 12:43
भाताचे जे बीज शेतात पेरतात त्याला 'भात' म्हणतात व ते पेरल्यावर उभे राहणार्‍या पिकालाही 'भात' म्हणतात, (उदा : भातशेती).
मला वाटतं, त्याला 'धान' म्हणतात, डॉक्टरसाहेब.. धान-तांदूळ-भात, असा प्रवास असतो.. अवांतर : माझ्यामते, धानाच्या/भाताच्या वेगवेगळ्या प्रजातींची जपवणूक करायला हवी. म्हणजे 'मास प्रोडक्शन' साठी जरी एचएमटी किंवा 'बासमती'च्या नावानी खपणार्‍या वारेमाप जाती पिकवल्या जात असल्या तरी ह्या खास प्रजातींच्या तांदळाना आपण मुकू नये.. 'काला नमक' आणि इथे सांगत असलेल्या अनेक भातांच्या जाती नुसत्या स्मरणातच ऊरु नये म्हणून हा विचार.. अतिअवांतरः आसाम/मेघालयमध्ये 'जोहा' भात मिळतो, तोपण अत्यंत चविष्ट लागतो..

In reply to by चिगो

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/30/2015 - 14:40
धान हा हिंदी शब्द आहे... काही ठिकाणी मराठीतही तसे म्हणत असतील, विषेशतः हिंदी भाषीक राज्यांच्या सीमेजवळ. पण महाराष्ट्रातल्या भात हे मुख्य पीक असलेल्या ठिकाणी भातच म्हणतात... भातशेती, भाताचे पीक, इ शब्द त्यावरूनच आले आहेत. अवांतराशी १००% टक्के सहमत.

In reply to by चिगो

जेम्स वांड Wed, 12/15/2021 - 07:29
वंदना शिवा ह्यांचे कार्य मोठे आहे, पण त्या डाव्या राजकीय विचारांच्या असल्यामुळे जास्त त्याज्य असाव्यात, तरीही, एतद्देशीय तांदळाची वाणे (त्यात काही काही तर पार नैसर्गिकरित्या जांभळ्या रंग असलेले तांदूळ वगैरे) जपण्यासाठी त्यांनी सीड बँक्स कॉन्स्टिट्यूट करून जवळपास ५०+ जमातींचे संवर्धन करून ते बियाणे स्थानिक शेतकऱ्यांना वाटले होते. मला वाटते हे एक मोठे काम आहे.

सुबोध खरे Fri, 07/24/2015 - 18:24
आमची आई अलिबाग जवळच्या नागावची त्यामुळे ती असे वेगवेगळे तांदूळ आणून भात करत असे. असा गुलाबी तांदूळ "पटणी" म्हणून तिला एका कोळीण मैत्रिणीने दिला होता. या पटणीच्या भाकरया खाउन पहिल्या आहेत. या भाकर्या ते माशांच्या कालवणा बरोबर खात असत. शिवाय झीना कोळंबा, जिरेसाळ, साधा कोलम, सुरती कोलम, आंबेमोहोर हे तांदूळ लहानपणी खाल्लेले आहेत. तांदूळ शिजवताना त्यात कसलेतरी लांब पान घालत असे त्याने तांदुळाला अगदी बासमती सारखा वास येतो. वडिलांनी भोपाळ हून काली मुच म्हणून अत्यंत सुवासिक तांदूळ आणला होता तो बासमतीच्या तोंडात मारेल असा होता.

In reply to by सुबोध खरे

भिंगरी Fri, 07/24/2015 - 20:33
ते लांब पान म्हणजे आंबेमोहराचे. म्हणजे त्या पानांना आंबेमोहर तांदळासारखा वास असतो.भात शिजताना त्यात ते पान टाकले की घरभर सुगंध दरवळतो.

घरी पिकतोय इंद्रायणी तांदूळ आणि तांदूळ चे बद्दल वाचून ऊर भरून आला ह्या मावळ्याचा. फक्त दुधाबरोबर खाऊन बघा १दा. अप्रतिम चव. व्यनि द्या हवा तेवढा अस्सल इंद्रायणी देऊ

राही Fri, 07/24/2015 - 19:13
मुंबईत सहसा कोलम खाल्ला जातो. इंद्रायणीचे नाव पुण्यात सहा सात वर्षांपूर्वी ऐकले. पाषाण गावात ओझा म्हणून मला वाटते कच्छ्याचे घाऊक दुकान आहे. पाषाण भाजीबाजारात आलेले शेतकरी टेंपोतून पोतीच्या पोती इंद्रायणी घेऊन जात तेव्हा कुतूहलाने थोडासा आणून घरी भात केला होता. पण तितकासा आवडला नव्हता. इतरत्र पुण्यात बहुतेक आंबेमोहोर चालतो असे वाटते. मुंबईत मात्र कोलम जास्त चालतो. पूर्वी आम्ही भिवंडीहून कोलम आणीत असू. अगदी सुईसारखा बारीक. जिभेवर एक एक दाणा वेगळा तरीही मऊ जाणवे. अलीकडे चांगला कोलम मिळत नाही. जिरेसाळसुद्धा पूर्वीसारखा नसतो. सुरती कोलमही जाड असतो. अलीकडे सहा सात वर्षे वाडा कोलम आणत आहोत. पण मध्यंतरी एक बातमी वाचली की वाडा कोलमला चांगला दर मिळतो (सध्या किरकोळ विक्री ७५-८० रु. किलो) म्हणून व्यापारी लोक इतर पेठांतून वाड्याला भात आणून ते वाड्यात सडून घेतात आणि वाडा कोलम म्हणून विकतात. मुंबईत सध्या लाल तांदूळ, चिनी तांदूळ, उकडा तांदूळ हेल्दी म्हणून खाण्याचे प्रस्थ दिसते. पण या तांदुळाचा भात भयाण होतो. लाल तांदूळामध्येसुद्धा जाती असतात. एक राते भात किंवा खारे भात असते. ते खारटाण जमिनीत मुठीने पेरत. ते उपजत जोरकस असल्यामुळे पुन्हा उपटून लावणी करण्याची गरज नसे. पण दाणा चांगलाच टणक. हे भाकरीसाठी किंवा इतर पिठात मिसळून उत्तम असे. राते म्हणजे रक्ती-रक्तवर्णी. ह्यालाच कोणी पटणी म्हणतात. तांदूळ दळून पीठ करायचे असल्यास आय.आर.८ उत्तम. ह्याच्या भाकरी छान होतात. आता आय.आर.मध्ये आणखी वाणेसुद्धा शोधली/निर्माण केली गेली आहेत. मोदक-धिरडी-घावन-शेवयांसाठी मात्र नवा आंबेमोहोरच चांगला. बासमतीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो. भातही फडफडीत होतो. कर्जतबाजूला केवळ पोह्यांसाठी एक वेगळे वाण होते. पोह्यांसाठीचे आणखी एक वाण म्हणजे कोथिंबिरे भात. पोहे कुटल्यावर आणि शिजवताना त्याला ओल्या कोथिंबिरीसारखा सुगंध येई. एक गरवा कोलम असे. हे भात पेरल्यानंतर उशीराने म्हणजे दीडदोन महिन्यांनी रोपे चांगली वाढल्यावर लावायचे. ते उशीरानेच म्हणजे दिवाळीनंतर तयार होई. अगदी बारीक दाणा. ही उंच वाढणारी जात होती. त्यामुळे पावसात रोपे लोळत आणि नुकसान होई म्हणून मग याचे पीक घेणे बंद झाले. त्याऐवजी तायचुंग आले. हे आग्नेय आशियातले बुटके वाण. पावसाच्या मार्‍याने लोळत नसे. पण चव आणि टेक्स्चरमध्ये मार खाल्ला या वाणाने. वाण्याकडे कमीत कमी दहापंधरा जाती असतात. त्यात बासमतीचेच सहासात प्रकार. दुबराज हा तांदूळ बासमतीत भेसळीसाठी वापरला जातो. बाकी कमोद, परिमल चिनोर, लुचाई वगैरे जाती असतातच.

In reply to by राही

इंद्रायणी आवडला नाही म्हणता. शिजवताना पाण्याचे प्रमाण नेहमीचे नाही लागत तर १ वाटीस साधारण पाऊण वाटी पाण्यात शिजवा नक्कीच आवडेल आणि पाषाणचा ओझा दुकानदार काय किंवा इतर दुकानदार भेसळ ची शक्यता असते. जमल्यास कामशेत बाजारात जा तिथे भात गिरणी आहे अस्सल तांदूळ मिळेल

सोना मसुरी
हे नाव मी पहिल्यांदाच ऐकले ! आता चेक करुन पहातो !
जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ नावाचा तांदूळ मिळातो , कोल्हापूर कडे.बिना पॉलिश चा घेतला तर अतीउत्तम.
कोठे मिळेल बिना पॉलिश ? कल्लापुरात जरा चवकशी करुन कळवाल का ? तसेही डिसेंबरात एक चक्कर होणार आहेच कल्लापुर मिरज भागात ;)
गरी-कोळपी
कोठे मिळेल ? कोणत्या आदिवास भागात ? नगर ला एक ओळखीचे आहेत तिकडे चौकशी करुन पहातो :)
कृष्णासाळ तांदुळ :- पण हा तांदुळ फक्त अकोला ( भंडारदरा) कोतूळ या ठिकाणीच मिळतो.
>>> ह्म्म . ओके . ट्राय केलाच पाहिजे एकदा . पहातो कसे जमते ते !
म्हाडी , रानटी देवभात
सोंड्या भाऊ , तुम्ही कुठले ? तुम्हाला ह्या विषयातील बरीच माहीती आहे असे दिसत आहे , व्यनि करतो :)
गुलाबी तांदूळ "पटणी" झीना कोळंबा, जिरेसाळ,काली मुच
ह्यातले एकही नाव ऐकले नव्हते आजपर्यंत मी ! ह्या धाग्या निमित्त कळाले :) हे हे सारे कधी ना कधी टेस्ट करायला मिळायला पाहिजेत राव !!
लाल तांदूळ
म्हणजे तामसाळ का ? की ब्राऊन राईस ?
काली मुछ ?
एस भात मे कुछ तो काला है दया =)) टेस्ट केलाच पाहिजे !! सोनपती भात काय प्रकार आहे ? सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद !

In reply to by सुबोध खरे

होबासराव Fri, 07/24/2015 - 20:51
हो ते kali much च आहे..आय माय स्वारी.. विदर्भात दुकानदार अपभ्रंश करतात तर त्याचा काली मुछ म्हणुन :)

In reply to by होबासराव

सुबोध खरे Sat, 07/25/2015 - 19:43
अहो, तो प्रतिसाद तुमच्या साठी नव्हता. मुच काय आणी मुछ् काय काय फरक पडतो? सॉरी कशासाठी म्हणताय? लोकांना भात या विषयावर थोडे कुतूहल जागृत करावं यासाठी होतं. लोभ असावा.

In reply to by सुबोध खरे

सचिन कुलकर्णी गुरुवार, 07/30/2015 - 11:31
काली मुच मला इथे डोंबिवलीत दिसला. मिपावर या धाग्यावर या भाताची महती कळल्यामुळे लगेच घेऊन टाकला. वर म्हंटल्या प्रमाणे बासमतीच्या तोंडात मारणारा वास आहे. चव आज घेऊन बघेन..

In reply to by सचिन कुलकर्णी

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 11:55
काली मुच डोंबिवलीत कुठे मिळतो सांगाल काय? जुन्या आठवणी खातर एकदा परत खाउन पहायचा आहे

In reply to by सुबोध खरे

सचिन कुलकर्णी गुरुवार, 07/30/2015 - 13:03
मला माझ्या घराजवळच्या दुकानातच (श्रीखंडेवाडीत) मिळाला. अधिक चर्चेसाठी माझा नंबर व्यनि करतो.

सविता००१ Fri, 07/24/2015 - 20:39
कित्तीतरी प्रकार पहिल्यांदा ऐकले मला आवडतो इंद्रायणी. मस्त हल्ली कुठलाही तांदूळ घेतला तरी शिजवताना काही वासच येत नाही. तो निदान इंद्रायणीचा नक्की येतो. म्हणजे घरात वरणभाताचा कुकर लागला आहे हे कळतं तरी.घमघमाट. आणि अगदी नुसताच पातेल्यात शिजवला तर अल्टिमेट लागतो.

राही Fri, 07/24/2015 - 21:07
गुजरातीत झीणा म्हणजे बारीक, तलम. झीणा कोलंबा म्हणजे बारीक कोलम. उत्तर ठाणे-आता पालघर- ते थेट सुरतेपर्यंत हा तांदूल पिकवला जातो. पूर्वी संपूर्ण ठाणे आणि उत्तर रायगडमध्ये हे भात होई. पण आता या भागात शेतजमिनी फारश्या उरलेल्या नाहीत. पण वरील काही प्रतिसादांवरून वाटते की इतरत्रही हे भात होते.

सोंड्या Fri, 07/24/2015 - 21:36
बरोबर राहीजी आणी आता फार थोड्या शेतकर्यांकडे याचे मुळ विनासंकरीत बियाणे शिल्लक आहे कालौघात ते ही नाहीसे होईल :(

अभिरुप Sat, 07/25/2015 - 13:55
आम्ही घरी इंद्रायणी भातच आणतो.अप्रतिम चव दूध्,तूप अगदी साध्या कालवणासोबत किंवा मटणा सोबत सुद्धा छान लागतो.सत्याचे प्रयोग साहेब,आम्हाला पण हवा आहे तांदूळ. लागेल तेव्हा नक्कि सांगेन.

स्मिता. Sat, 07/25/2015 - 17:12
घरातला बासमती ऐनवेळी संपल्याने घराजवळच्या एका दुकानातून सुटा तांदूळ आणला आहे. त्याचा सुगंध आणि चव इतकी मस्त आहे म्हणून सांगू! तो भात शिजायला पाणी तसे जास्तच लागते पण पाणी जरा जास्त झाले किंवा कूकरच्या २ शिट्या जास्त झाल्या तरी हा भात चिकट होत नाही हे आणखी एक वैशिष्ट्य! पुलाव/बिर्याणी अगदी उत्तम लागेल त्या भाताची. आता बासमतीला सुट्टी देवून हाच भात वापरायचे ठरवले आहे. एरवी मी कधी त्या तांदळाचे नाव विचारायच्या भानगडीत पडले नसते, पण या धाग्याच्या निमित्ताने १-२ दिवसात त्या तांदळाचे नाव दुकानदाराला विचारून इथे देते.

वामन देशमुख Sat, 07/25/2015 - 22:54
सोना मसुरी म्हणजे कर्नुल सोना मसुरी. हा तांदूळ आंध्रात पिकतो. मराठवाड्यात मिळणार्या BPT HMT सारखा असतो. रोज खायला चांगला.

अत्रन्गि पाउस Sat, 07/25/2015 - 23:48
ठाण्यात तांदूळ महोत्सवात दफ्तरी घेतला २० किलो .... अप्रतिम चव ...जव्हारचे कुणी पारंपारिक शेती करणारे होते .. ठाण्यात ठक्कर कडे जुना कृष्णकमोद मिळतो (मधून मधून)...उघड्या पातेल्यात भात शिजायला लावला तर आजू बाजूने जाणारे हमखास थांबून विचारतात तसेच ठक्कर कडे 'जुना निलगिरी बासमती मिळतो ...तोही असाच अप्रतिम... तथापि भात हा कुकर मध्ये करण्यापेक्षा उकळत्या पाण्यात शिजवलेला ज्यास्त चांगला लागतो ...

पगला गजोधर Mon, 07/27/2015 - 11:47
खडकवासल्याच्या पाणलोट क्षेत्रातला इंद्रायणी खातोय, (नवीन बँच वर्षाअखेरीस येईल) दोन घास त्याचे खाल्याशिवाय, जेवण-झालंय, असं वाटतंच नै.

In reply to by ब़जरबट्टू

डांगे चौकातून रावेत कडे निघा बास्केट ब्रिज च्या अलीकडेच आहे. एकदम गावाकडचा फिल येईल. जमीन सारवलेली वगैरे वगैरे.

In reply to by सत्याचे प्रयोग

नितिन५८८ गुरुवार, 07/30/2015 - 11:29
दोन वेळा गेलो होतो तिथे पण सांगूनही मटणाची भाजी कमी तिखट नाही केली, मटकीची उसळ पण एवढी तिखट कि खावत नाही. राहिला प्रश्न इंद्रायणी भाताचा तर तो हॉटेल वाला नविन इंद्रायणी वापरतो, त्यामुळे भात खूपच चिकट होतो. हॉटेलचा दिखावा चांगला आहे पण चव मात्र खूप बेकार ….

किसन शिंदे Wed, 07/29/2015 - 20:28
इंद्रायणी कूकरमध्ये न टाकता, पातेल्यात शिजायला ठेवायचा. शिजत असताना घरभर वास पसरतो, आणि मग तो मऊ भात वरून तुपाची धार सोडून दुध-साखरेबरोबर खायचा. भन्नाट चव लागते!!

रेवती Wed, 07/29/2015 - 21:45
भारतवारीत इंद्रायणी नक्की बघणार. जितका आणाता येईल तितका आणणार. आम्ही सोना मसूरी वापरतो. खरंतर हा भात साम्बाराबरोबर मस्त लागतो. सध्या एक नवीन तांदूळ दिसलाय. म्हणजे तो आधीपासून असेल, मला आत्ता दिसलाय. बासमती पण कमी पॉलिशचा, जरा काळपट! त्याचा पुलाव बरा होतो. आंबेमोहर आमच्यायेथे फार महाग मिळतो. एकाच दुकानात पहायला मिळाला. जास्मिन तांदूळ जरा चिकट व ढब्बू असतो. तो थाई फूडबरोबरच जमतो. कितीही चांगली आमटी केली तरी त्याची चव बरी लागत नाही.

प्रसाद प्रसाद गुरुवार, 07/30/2015 - 18:05
कोल्हापुरात दरवर्षी डिसेंबरमध्ये तांदूळ महोत्सव होतो (मेरी वेदर ग्राउंड, न्यू पॅलेस जवळ). डायरेक्ट शेतकरी तांदूळ आणून विकतात तेथे. तुलनेने स्वस्त तांदूळ मिळतो. आजरा भागातले बरेच शेतकरी घनसाळ, साधा जिरगा, काळा जिरगा (खरंच तांदूळ थोडा काळा असतो), जोंधळा जिरगा (किंचित जोंधळ्या सारखा गोल आकार), आंबेमोहोर, इंद्रायणी (इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा पुण्यात मिळणारा इंद्रायणी वासाला थोडा सरस आहे) आणि अनेक इतर वासाचे तांदूळ आणि बिनवासाचे पण चवीला उत्तम असे दफ्तरी, रत्नागिरी २४ आणि माहीत नसलेले अनेक प्रकार घेऊन येतात. हे तांदूळ साठवणुकीसाठीपण खूप चांगले, जिरगा तांदूळ तर जसा जुना होईल तसा जास्त चवीला लागतो. ह्यापूर्वी मला घमघमाट वास असणारा आंबेमोहोर क्वचित मिळाला होता, तो ह्या महोत्सवात मिळतोच. तसेच इडली, डोसा यासाठी लागणारा मोठा जाडा तांदूळही स्वस्त असतो. सारखा सारखा एक प्रकारचा तांदूळ खाऊन कंटाळा येतो तेंव्हा असे दोन चार प्रकारचे वेगळे तांदूळ बरे वाटतात.

In reply to by प्रसाद प्रसाद

रेवती गुरुवार, 07/30/2015 - 18:33
इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा पुण्यात मिळणारा इंद्रायणी वासाला थोडा सरस आहे माहितीबद्दल धन्यवाद. स्नेहा, ऐकतियेस ना! ;)

नुकतेच वल्ली सरांसोबत मावळात एक उनाड भटकंती झाली ! येता येता कामशेत मध्ये चांगला इंद्रायणी शोधत होतो . एका मिल मध्ये गेलो , ३८ रु किलो म्हणाला नवीन इंद्रायणी पण इंद्रायणी ला जसा अपेक्शित आहे तसा घमघमाट अजिबात नव्हता म्हणुन घेतला नाही . ( नंतर जाणवले की बेंचमार्क म्हणुन घ्यायला हरक्त नव्हती !) नंतर मामाभांचे नावाची अजुन एक राईस मिल दिसली बेबडहोळ रस्तावर . तिथुन ३ वेगवेगळे भात घेतले - नवीन इंद्रायणी , कोलम आणि हात्सडीचा इंद्रायणी ! पण हाही इंद्रायणी आमच्या अपेक्षांना पुर्ण करु शकला नाही , चव आणि टेक्ष्चर उत्तम आहे , टिपिकल आपल्या आवडतो तसा गिजगा भात होतो पण इंद्रायणीचा सुगंध अपेक्षे येवढा नाही ! बाकी कोलम ओके. हातसडीचा इंद्रायणी चक्क आवडला नाही , त्याचे तेक्ष्चर एकदमच ब्राऊन राईस सारखे वाटले . थोडक्यात सांगायचे तर वल्ली सर म्हणाले तसे - आपल्या कंपु मध्ये सगळ्यांचे खाण्याचे जिभेचे चोचले वाढले आहेत ! अजुन उत्तम भाताचा शोध सुरु आहे ! एखाद्या वीकेन्डला राजगड तोरणा ट्रेक करावा अन नरसापुर वेल्हा भागातुन मधुन काही चांगला आंबेमोहोर मिळतो का ते पहावा असा विचार आहे !~ तुमच्या माहीतीत असलेली ठिकाणे सुचवा ! ( लगेच आजरा घनसाळ सुचवु नका , तुर्तास तरी कोल्लापुरला जाण्याचा योग नाही , काही दिवसांनी लोलयेच्या वेताळाला भेटायला जायचा प्लॅन आहे तेव्हा जाता जाता तिकडे चक्कर टाकु :ड )

In reply to by rain6100

जालिम लोशन Wed, 05/29/2019 - 00:38
आणी Agriculture department भोसलेनगर ground वर प्रदर्शन लावते तेंव्हा. तारखा बाबत न.ता. वाडी शि.नगर आॅफिस मध्ये चौकशी करा. ५० ते ६० रु किलो असतो. जुन्नर भागातील चांगला असतो

मी नुकताच जिरग्याची काळी साळ हस्तगत केली आहे. मागच्या वर्षी महत्प्रयासाने कोथमिरसाळ मिळाली होती. आंबेमोहोर आणि घनसाळ मित्राच्या शेतात पिकतो तेव्हा माझा शाळू आणि त्यांचा तांदूळ आम्ही बार्टर करतो. सध्या सुगंधी इंद्रायणी, तिबार बासमती, साधा जिरगा, सुरती कोलम आणि पिवळसर असा एचेमटी कोलम, दोन-तीन प्रकारच्या कण्या, आंबेमोहोर तुकडा, आणि जुना बासमती तुकडा इतके तांदूळ घरी आहेत. मी भातप्रेमी असल्याने आठवड्यात एक प्रकारचा भात रिपीट होता कामा नये असा स्पष्ट दंडक आहे.

मदनबाण Sun, 12/05/2021 - 11:17
सध्या पोळी खाणे पूर्णपणे बंद केले असुन हा देह सध्या फक्त भात प्रेमी झालेला आहे, तस्मात... चांगला तांदुळ शोधणे आले. वरती अनेकांनी त्यांचे अनुभव सांगितल्या प्रमाणे मी प्रथमच ऑनलाइन तांदळाची खरेदी केली.वाडा कोलम, सोना मसुरी आणि इंद्रायणी हे तांदुळ आणुन पाहिले. वाडा कोलम हा खाऊन खरं तर कंटाळाच आला होता,पण म्हंटल ऑनलाइन खरेदीत चांगला दर्जा मिळतो का ते पहावे...विशेष काही फरक जाणवला नाही उलट दर्जा तितका चांगला वाटला नाही. सोना मसुरी आणि इंद्रायणी हे दोन्ही पहिल्यांदाच खरेदी केले. इंद्रायणीचा सुगंध लयं भारी आहे,पण चिकट भात होतो आणि माझ्याच्याने तो तितका आवडीने खाववत नाही. यावेळी आता दोन वेगळ्या उत्पादकांकडुन केवळ सोना मसुरीच मागवले आहे. सोना मसुरी हा भात असा आहे जो अधिक खावा वाटतो आणि तो जातो सुद्धा. :) भात खाण्याचे / जेवण्याचे एक विलक्षण समाधान यामुळे मिळते हा माझा अनुभव सिद्ध झाला आहे.जालावर सोना मसुरीवर एक उत्तम माहितीपर व्हिडियो मिळाला आहे तो इथे देउन ठेवतो. [ या व्हिडियोमुळे यंदाच्या सोना मसुरी तांदुळ खरेदीत मला मदत झाली. ] जाता जाता :- तुम्हाला माहित असलेल्या उत्तम भात वाणाची इथे अधिक माहिती ध्या... कुठला वेगळा भात तुम्ही खाल्ला असेल तर त्याचे नाव आणि जमल्यास ऑनलाईन उपलब्ध असेल तर त्याची लिंक दिल्यास अजुन उत्तम ! मी आता काळा भात [ हो काळा भातच म्हणालोय ] उत्तम कुठला ते पाहतोय... मला हा देखील एकदा चाखुन पहायचा आहे. याची Forbidden Rice अशी देखील हटके आणि प्राचीन ओळख आहे. अती अवांतर :- मी पहिल्यांदाच भुत जोलोकिया / भूत झोलकिया या मिर्चीची चव [ मिर्ची पेस्ट स्वरुपात ] चाखली... गंध उग्र आहे या मिर्चीचा... ही पेस्ट मी घरी ठेचा करताना त्यात वापरली. चव आवडली. [ प्रमाण कमी वापरले आहे आणि अजुन अनुभव घेणे सुरुच आहे. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati... :- Sunny (1984)

In reply to by मदनबाण

इंद्रायणीचा सुगंध लयं भारी आहे,पण चिकट भात होतो आणि माझ्याच्याने तो तितका आवडीने खाववत नाही.
ह्यावर दोन तीन उपाय आहेत , सर्वात सोप्पा उपाय म्हणजे आमचे परममित्र नाखु ह्यांनी सुचवलेला : संपुर्ण इंद्रायणी घ्यायचा नाही , ५०% इंद्रायणी अन ५०% फडफड्या असा कोणातातरी वेगळा भात घ्यायचा शिजवायला , म्हणजे अगदीच गिजगा होत नाही अन सुगंधही येतो. दुसरा उपाय म्हणजे संपुर्ण इंद्रायणी भात घ्यायचा पण जमेल तितक्या कमी पाण्यात , अन बहुतांश करुन वाफेवर शिजवायचा तीसरा उपाय म्हणजे नवीन ताजा इंद्रायणी घायचा नाही कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, जुना एक दीड वर्ष जुना इंद्रायणी गिजगा होत नाही . चौथा उपाय म्हणजे आमचे मित्र पन्नास ह्यांनी सुचवलेला (हा उपाय मी करुन पाहिलेला नाही बट इट्स वर्स्थ अ ट्राय ) , वैदिक पधतीने भात शिजवायचा , म्हणजे कसे तर भात धुवायच्या आधीच पण रट रट उकळवुन घ्यायचे , अन भात धुतला कि लगेच उकळत्या पाण्यात घालायचा , कुकर बिकर शिट्टी वगैरे भानगडीत पडायचेच नाही ! आणी पाचवा उपाय - जो की सगळ्यात बेस्ट - गिजगा इंद्रायणी भात ही एक अ‍ॅक्वायर्ड टेस्ट आहे , तेव्हा आमच्या सारखे मित्र शोधुन , त्यांन्च्या सोबत मटण रस्सा असा गिजगा इंद्रायणी भातात कुस्करुन खाण्याची प्रॅक्टिस करणे ! =))

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण Tue, 12/14/2021 - 20:46
ओक्के, उपाय चांगले आहेत...करुन [ बायडीस सांगुन ] पहायला हवे ! आजच एक लेख वाचनात आला होता, तो इथे देऊन ठेवतो. पारंपरिक भात वाणांचे जतन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video