मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०६ : दुसरी महाआपत्ती आणि पुढच्या प्रवासाची सुरुवात (७४,००० ते ५२,००० वर्षांपूर्वी)

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)... ===================================================================== ...ऑगस्ट २०१२ मध्ये "बीच कोंबिंग लाइफस्टाइल" थियरीला एक हलकासा सुखद धक्का बसला. त्या महिन्यात शास्त्रज्ञांना लाओसच्या उत्तर भागातील एका चुनखडीच्या गुहेत आधुनिक मानवी कवटीचे तुकडे सापडले. त्यांचे वय ६३,००० ते ४६,००० वर्षांच्या मध्ये कोठेतरी असल्याचे ठरवले गेले. म्हणजे एकंदरीत हे दुसर्‍या सफरीतले प्रवासी अगदीच भित्रे नव्हते म्हणायचे ! कारण समुद्रकिनारा सोडून शेकडो किलोमीटर आत जात त्यांनी लाओस, चीन, व्हिएतनाम आणि थायलंडमधील डोंगर पालथे घातले होते असे दिसते ! आतापर्यंत १०,००० वर्षे मानवाची सफर कोणत्याही मोठ्या अपघाताशिवाय पुढे चालली होती. पण बराच काळ शांत राहिलेल्या नियतीचे जरा वेगळेच बेत चालले होते. ७४,००० वर्षांपूर्वी इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरच्या गेल्या २० लाख वर्षांतला जगातील सर्वात जास्त सक्रिय असलेल्या तोबा ज्वालामुखीचा महाभयानक उद्रेक झाला. हा उद्रेक इतका मोठा होता की त्याच्यामुळे १०० X ३० किलोमीटर आकाराचे तोबा सरोवर तयार झाले...  या महाउद्रेकाने इतकी राख वातावरणात उधळली गेली की त्यामुळे आताचा सर्व भारत, पाकिस्तान आणि मध्यपूर्वेचा काही भाग १ ते ५ मीटर जाडीच्या राखेच्या थराने झाकले गेले. ही राख ग्रीनलँडमधील बर्फाच्या आणि भारतीय महासागराच्या समुद्रतळाच्या को‌अरमध्ये सापडते. या पुराव्याच्या साहाय्याने हा उद्रेक ७४,००० वर्षांपूर्वी झाला असे निदान करण्यात आले आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते ह्या ज्वालामुखीने वातावरणात उधळलेल्या राखेने पुढच्या काही काळात (काही शे अथवा हजार वर्षे) सूर्यकिरणांना अडवल्यामुळे आणि हवा दूषित केल्यामुळे जगभर महाभयानक जीवहानी झाली. या ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राख आणि धुराचा मुख्य रोख उत्तरपूर्वेकडे होता आणि त्याच्या चपाट्यात मुख्यतः भारताचा भूभाग येऊन तेथील जीवन समूळ नष्ट (mass extinction) झाले आणि काही काळाने (म्हणजे काही शे अथवा हजार वर्षांनी) तेथे परत मानवी वस्ती झाली. ह्याचा जनुकशास्त्रीय पुरावा भारतातील M आणि R मायटोकाँड्रियल उत्परिवर्तनांत सापडतो तो असा: १. मानव प्रथम भारतात आला आणि त्यानंतर पूर्व आशियात गेला हे आपण पाहिले आहेच. म्हणजे भारतातील मूळ उत्परिवर्तने पूर्व आशियातील उत्परिवर्तनांपेक्षा जुनी असायला पाहिजेत. पण खरी परिस्थिती याउलट आहे, भारतातील काही मूळ मायटोकाँड्रियल उत्परिवर्तने पूर्व आशियापेक्षा जास्त 'तरुण' आहेत. हे ज्वालमुखीच्या उद्रेकानंतर उलट दिशेने प्रवास झाल्यानेच शक्य आहे. २. पूर्वेकडील R मायटोकाँड्रियल उत्परिवर्तन व पश्चिमेकडील M मायटोकाँड्रियल उत्परिवर्तन ही दोन्ही भारतात असणे आणि ती तोबाच्या उद्रेकानंतर भारतात येणे हे तोबाच्या कहराने भारतातील मानवी जीवन बराच काळ पूर्ण नष्ट झाले आणि नंतर दोन्ही बाजूचे लोक भारतात आले असल्यासच शक्य आहे. ३. दक्षिण भारतात ज्वालापूरम येथे तोबा ज्वालामुखीच्या राखेच्या वरच्या आणि खालच्या जमिनीच्या थरांत सापडलेली दगडी हत्यारे आणि त्यांची वये हे सिद्ध करतात की तोबाच्या उद्रेकापूर्वी आणि नंतर भारतात मानव संस्कृती होती. ही गोष्टही या सिद्धान्ताचे समर्थन करते. ४. जनुकशास्त्राने ठरवलेला कालखंड आणि इतर पुराव्यांनी ठरवलेले कालखंड एकमेकाशी जुळणेही या मताला बळकटी देते. तोबाच्या महाउद्रेकाचा झालेला अजून एक परिणाम म्हणजे भारताच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील आशियाई मानवांत झालेला जनुकीय फरक आणि त्यामुळे त्यांच्या बाह्यरूपात पडलेला फार मोठा फरक... "दक्षिण आशियावर झालेल्या ज्वालामुखीच्या राखेने तेथील पूर्णपणे नष्ट झालेले जीवन व त्यामुळे फार मोठ्या कालखंडाकरिता विभाजित राहिलेले त्याच्या दोन बाजूचे मानवसमूह" याचा हा परिणाम आहे... जनुकशास्त्रात या genetic furrow असे म्हणतात. या महाआपत्तीतून उरलेल्या आणि सावरलेल्या मानवांची वंशविच्छेदाला तोंड देत परत भटकंती सुरू झाली. ही वाटचाल मुख्यतः चार दिशांनी झाली...  १. एक जथा पुढे मार्गक्रमण करत चीनमध्ये पुढे जाऊ लागला. २. दुसरा जथा थोडा दक्षिणपूर्वेस निघाला आणि पापुआ न्यू गिनीत साधारण ४०,००० वर्षांपूर्वी पोहोचला. ३. तिसरा जथा जरा जास्त धाडशी होता. तो होडक्यांचा वापर करून दक्षिणेकडील टिमोर बेटावर पोहोचला आणि तेथून पुढे त्याने उत्तर ऑस्ट्रेलियात Arnhem Land येथे पदार्पण केले. या चवथ्या जथ्यातील मानवांनी नेहमीची बीच कोंबिंग लाइफस्टाइल सोडून जरा धाडसी प्रवास केला. त्यांच्याबद्दल थोडी जास्त माहिती घेऊया. या मानवांनी बोटीचा वापर केला या दाव्याला बळकटी देणारे हे उत्तर ऑस्ट्रेलियात सापडलेले जगातील सर्वात जुने होडीचे चित्र... येथे पहा. प्रथम यांच्या ऑस्ट्रेलियन पदार्पणाचा काल ४०,००० वर्षांपूर्वीचा असावा असा समज होता. पण radiocarbon dating पेक्षा जास्त सुधारीत luminescence dating of silica हे तंत्र प्रगत झाल्यावर हा काळ ६०,००० ते ५०,००० वर्षापूवीच्या कालखंडातील असावा असे ठरविले गेले आहे. या काळात समुद्राच्या पाण्याची पातळी सद्याच्या पातळीपेक्षा ८० मीटर खाली होती, याचीही या मानवांना मदत झाली. त्या काळानंतर ही पातळी भरभर वाढू लागली, इतरांना ऑस्ट्रेलियात जाणे कठीण झाले आणि नंतरची काही दशसहस्त्र वर्षे त्या खंडाचा आणि तेथील मानवांचा इतर जगाशी संबंध तुटला ही तथ्येही जुन्या कालखंडाच्या बाजूनं आहेत. मात्र जनुकशास्त्राचे पुरावे अजून पुढे जाऊन असे दर्शवितात की ऑस्ट्रेलियात मानवाचा शिरकाव ६८,००० वर्षांपूर्वींइतका जुना असावा. त्या काळात समुद्राच्या पाण्याची पातळी गेल्या एक लाख वर्षांतली सर्वात कमी होती, हे तथ्यही या काळाच्या अंदाजाला बळकटी देते. मात्र याला आधार देणारे जीवावशेष मिळेपर्यंत तो एक सिद्धांतच राहील. असो. या मानवांनी त्यानंतर हळू हळू त्या काळी सुपीक, जंगलांनी भरलेले आणि प्राणिजीवनाने समृद्ध असलेले ऑस्ट्रेलिया पादाक्रांत करून ५०,००० वर्षांपूर्वीपर्यंत त्याचा दक्षिण किनारा गाठला. ४. तोबाच्या कहरातून सावरलेले मलाय व्दिपकल्पातील काहीजण उलट फिरून ब्रह्मदेशाच्या दक्षिण किनार्‍यावरून परत भारतात शिरले. ते त्यांच्या पूर्वजांच्या मार्गानेच पण या वेळेस विरुद्ध दिशेने प्रथम भारताच्या पूर्व किनार्‍याने आणि नंतर पश्चिम किनार्‍याने सिंधू नदीच्या खोर्‍यापर्यंत आले. तेथे त्यांची आफ्रिकेतून बाहेर पडणार्‍या पुढच्या टोळ्यांशी गाठ पडत राहिली असणारच. मात्र या सगळ्यांना पुढची १०,००० वर्षे हिमयुगाच्या प्रभावाने तयार झालेल्या मध्य आशियातील वाळवंटाने आणि थंडीने रोखून धरले. ५०,००० वर्षांपूर्वी हवामानात बदल होऊन अरेबियन वाळवंट आणि 'सुपीक चंद्रकोरी' चे पाणथळ हिरव्या भूमीत परिवर्तन झाले तेव्हाच त्यांना उत्तरपश्चिमेकडे पुढची वाटचाल करणे शक्य झाले.  हवामानाच्या बदलांचे दाखलेही यालाच अनुमोदन देतात. गेल्या एक लाख वर्षांमध्ये लेव्हांत किंवा "सुपीक चंद्रकोर" काही छोटे सुधारलेल्या हवामानाचे काळ (interstadials) सोडले तर कडकडीत थंड वाळवंट होते. या वाळवंटाने मानवाची युरोपमध्ये जाण्याची वाट रोखून धरली होती. मात्र ६५,००० वर्षांनंतरच्या कालखंडात चार वेळा हवामानात काही काळ फरक पडून हा भाग काहीसा गरम आणि पाणथळ झाला होता. यातला शेवटचा सर्वात जास्त गरम व मोठा (५,००० वर्षे) असलेला कालखंड ५१,००० वर्षांपूर्वी सुरू झाला. हा काल इतका गरम होता की त्यामुळे दक्षिण आशियातही जास्त पर्जन्यवृष्टी होऊन झालेल्या अन्नाच्या मुबलकतेमुळे तेथील लोकसंखेतही परिणामकारक वाढ झाली. या सगळ्याचा परिणाम दक्षिण आशियातून टर्की व बल्गेरिया मार्गे दक्षिण युरोपाकडे मानवी स्थलांतर होण्यात झाला. दुसरा शक्य असणारा मार्ग म्हणजे सिंधूच्या खोर्‍यातून काश्मीरमार्गे मध्य आशिया. येथे ४०,००० वर्षांपूर्वी मॅमथची (प्राचीन अजस्त्र आणि केसाळ हत्तीसदृश प्राणी) शिकार करण्याइतपत कौशल्य असलेले मानव होते. ते पुढे उरल पर्वतांतून पश्चिमेकडे आताच्या रशिया, झेक रिपब्लिक मार्गे जर्मनीत गेले असावेत. या पाचीन प्रवासात सहाजीकच माणूस आपली भाषा बरोबर नेत राहिला. अर्थात तिच्यात काल आणि स्थलमानाप्रमाणे बदल होत गेले. पण आजही मानवाच्या भारत ते युरोप या मार्गांवरील ४३९ आधुनिक भाषांचा इतका जवळचा संबंध आहे की त्यांचे भाषाशास्त्रात "इंडो-युरोपियन" या सुपरफॅमिलीत वर्गिकरण केलेले आहे. यातल्या २११ भाषांचे वर्गिकरण "इंडो-आर्यन" असे आहे. इंडो-युरोपियन भाषांची यादी येथे मिळेल. आजच्या घडीला जगातील निम्मे म्हणजे अंदाजे ३०० कोटी लोक इंडो-युरोपियन भाषा बोलतात. जगातल्या जास्तीत जास्त भाषिक असणार्‍या २० पैकी १२ भाषा इंडो-युरोपियन आहेत, त्या अशा: स्पॅनिश, इंग्लिश, हिंदी, पोर्तुगीज, बंगाली, रशियन, जर्मन, मराठी, फ्रेंच, इटालिअयन, पंजाबी आणि उर्दू. इंडो-युरोपियन भाषांची स्थाने दाखवणारा नकाशा (जालावरून साभार)...  सद्याच्या युरोपातील लोकांमध्ये असलेले जनुकीय पुरावेही त्यांचे पूर्वज ५०,००० वर्षांपूर्वी दक्षिण आशियातून आले असे दाखवतात असे सिद्ध झाल्यावर तर "युरोपमध्ये वेगळ्या मानवी संस्कृतीची स्वतंत्र सुरुवात होऊन ती वेगाने प्रगत झाली आणि मग त्यांनी ती प्रगती इतर ठिकाणी पसरवली" ही कल्पना पूर्णपणे खोटी ठरली. अजून एका कपोलकल्पित स्वप्नावर आधारलेल्या सिद्धान्ताला (थियरीला) जनुकशास्त्राने सुरुंग लावला आणि अगोदर आशियात झालेल्या सगळ्या मानवी सुधारणांचा फायदा युरोपात उशीरा घुसणार्‍या मानवांना झाला हे तथ्य सर्वमान्य झाले ! (क्रमशः ) ===================================================================== महत्त्वाचे दुवे १. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens २. https://genographic.nationalgeographic.com/ ३. http://www.smithsonianmag.com/ ४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration ५. http://www.bradshawfoundation.com/ ===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)... =====================================================================

वाचन 53509 प्रतिक्रिया 40