आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
24 Feb 2013 - 1:30 am

आयटीच्या गोष्टी - नमन
आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच

शिक्षण संपलेलं असतं. नोकरीलाही आता जवळपास दोन वर्ष होत आलेली असतात. इथे आता कामात मन लागत नसतं, डोळ्यांना तिकडचे वेध लागलेले असतात. मॅनेजरला तसं आडून आडून सुचवणं चालू असतं. मनात आशा निराशेचा हिंदोळा झुलत असतो. कारण, आयटीत नोकरीला लागल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीसाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले असतात ती गोष्ट वास्तवात उतरण्याची वेळ आलेली असते. दोन वर्ष ऑफशोअरला (म्हणजे भारतात) काम केलं आता मला कंपनीने ऑनसाईटला पाठवायलाच हवं असं तो ठामपणे इतरांना सांगत असतो.

काय असतं एव्हढं ऑनसाईटमध्ये की ज्यामुळे आयटी इंडस्ट्री जॉईन करणारा जवळपास प्रत्येक कॉलेज पासआऊट अगदी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून एक दिवस ऑनसाईटला जाण्याची स्वप्नं पाहू लागतो? काय असतं एव्हढं ऑनसाईटमध्ये की ज्यामुळे प्रत्येक अनुभवी आयटी ईंजिनीयर नविन नोकरीसाठी मुलाखत देऊन झाल्यानंतर "हाऊ अबाऊट ऑनसाईट?" असा प्रश्न मुलाखतकाराला न चुकता विचारतो?

काय असतं एव्हढं ऑनसाईट असाईनमेंटमध्ये? ऑनसाईट म्हणजे बरंच म्हणजे बरंच काही असतं.

आपण ऑनसाईटबद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊया.

या आधीच्या लेखात आपण दोन प्रकारच्या आयटी कंपन्यांची ओळख करुन घेतली, एक प्रोडक्ट बेस्ड आणि दुसरा प्रकार सर्व्हीस बेस्ड. प्रोडक्ट बेस्ड कंपनीची एक किंवा अनेक संगणक प्रणाली उत्पादने असतात. आणि ही उत्पादने ती कंपनी आपल्या ऑफीसमध्ये डेव्हलप करुन ईतर नित्योपयोगी वस्तूंसारखी संगणकाच्या दुकानांमार्फत किरकोळ विक्री करत असते. ही सारी उत्पादनं एका सीडीत किंवा अनेक सीडीच्या संचात मिळतात. आपण सीडी घरी आणायची, त्यातला सेटप प्रोग्राम रन करायचा, सेटप प्रोग्रामच्या सुचनांनुसार माहिती द्यायची की झालं. जेमतेम पंधरा वीस मिनिटांत ते सॉफ्टवेअर आपल्या संगणकामध्ये वापरण्यास उपलब्ध होतं. विंडोज सारखी संचालन प्रणाली संगणकावर स्थापित करायची असेल तर दिड दोन तास लागतात. अर्थात हे झालं वैयक्तिक वापरातील सॉफ्टवेअरबद्दल.

काही संगणक प्रणाली उत्पादनं मोठमोठया उद्योगसंस्थांमध्ये त्यांचा पुर्ण कारभार संगणकीकृत करण्यासाठी वापरली जातात. अशा संगणक प्रणालींना उद्योग संसाधने नियोजन प्रणाली (ईआरपी - एंटरप्राईज रीसोर्स प्लानिंग सिस्टीम) म्हणतात. आणि या सिस्टीम बरेच वेळा ग्राहकाच्या गरजेनुसार बनवल्या जातात किंवा आयटी कंपनी जी ईआरपी सिस्टीम बाजारात विकते तिच्यात ग्राहकाच्या गरजेनुसार फेरफार (कस्टमायझेशन) केले जातात. हे अर्थात उपलब्ध असलेल्या ईआरपी सिस्टीम मध्ये फेरफार करुन ती ग्राहक कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या वापरायोग्य करण्यासाठी किंवा पुर्णतः नविन ईआरपी सिस्टीम बनवण्यासाठी संगणक प्रणाली विकासकांना (सॉफ्टवेअर डेव्हलपर्स) ग्राहक उद्योगाची सखोल माहिती (डोमेन नॉलेज) असावी लागते. त्या ग्राहक उद्योगाचे वेगवेगळे विभाग एकमेकांशी कशा पद्धतीने जोडलेले आहेत, त्यांच्यात कशा पद्धतीने माहितीची देवाण घेवाण होते ही माहिती गोळा करणे आवश्यक असते. तसेच एकदा हवी तशी संगणक प्रणाली बनवून झाली, तिच्या आवश्यक त्या चाचण्या झाल्या की ती प्रणाली ग्राहक उद्योगासाठी वापरात आणावी लागते. अर्थात आता ही प्रणाली एकाचवेळी त्या उद्योगाचे शेपाचशे किंवा हजारो कर्मचारी वापरणार असल्याने ती वापरात आणणे एक सेटप प्रोग्राम रन करुन होणार नसते. त्यासाठी सेवादाता (सर्व्हर), विदागार (डेटाबेस) अशा उच्च शक्तीच्या संगणक यंत्रणा बसवाव्या लागतात. आणि ही सारी कामे करण्यासाठी आयटी कंपनीला आपली काही माणसे त्या ग्राहक उद्योगाच्या कार्यालयात पाठवावी लागतात. संगणक प्रणालीच्या निर्मितीचं किंवा तिच्या स्थापनेचं किंवा तिच्या देखभालीचं काम ग्राहकाच्या कार्यालयातूनच करणे म्हणजे ऑनसाईट असाईनमेंट.

सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांमधल्या कामामध्ये काही वेळा थोडासा फरक असतो. बरेच वेळा प्रोजेक्टच्या सुरुवातीला एक दोन माणसे ग्राहकाच्या कार्यालयात संगणक प्रणालीच्या गरजांची माहिती (रिक्वायरमेंट गॅदरींग) मिळवण्यासाठी जातात. त्यानंतर ती संगणक प्रणाली पुर्णपणे आयटी कंपनीत विकसीत केली जाते. काही ग्राहक कंपन्यांचे स्वतःचे संगणक विभाग असतात. अशावेळी आयटी कंपन्यांचे काही विकासक ग्राह्काच्या कार्यालयातून ग्राहक कंपनीच्याच संगणक तज्ञांच्या देखरेखीखाली काम करतात. कामाचा व्याप जास्त असेल तर जोडीला आयटी कंपनीच्या कार्यालयातूनही काही माणसे काम करतात. म्हणजे आता एकाच प्रोजेक्टवर काम करणार्‍या दोन टीम तयार झालेल्या असतात. ग्राहकाच्या कार्यालयातून काम करणारी ऑनसाईट टीम आणि आयटी कंपनीच्या कार्यालयातून काम करणारी ऑफशोअर टीम. ऑनसाईट टीममधला आयटी कंपनीचा ज्येष्ट विकासक ऑफशोअर टीम आणि ऑनसाईट टीम मधला दुवा (ऑनसाईट कॉऑर्डीनेटर) म्हणून काम करतो.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठून तरी कामच करायचे आहे. मग ते ग्राहकाच्या कार्यालयातून केले काय किंवा आयटी कंपनीच्या कार्यालयातून केले काय. काय फरक पडतो.

फरक पडतो. ग्राहक जर परदेशातील असेल तर खुपच फरक पडतो.

एव्हाना तुमच्या हे लक्षात आले असेल की मोठया संगणक प्रणालींचे दोन प्रकारचे ग्राहक असतात.
१. देशांतर्गत ग्राहक (डोमेस्टीक क्लायंट)
२. आंतरराष्ट्रीय ग्राहक (ईंटरनॅशनल क्लायंट)

जर देशांतर्गत ग्राहकाच्या कार्यालयात जाऊन विकासकांना काम करावयाचे असेल आणि हे ग्राहकाचे कार्यालय दुसर्‍या शहरात असेल तर आयटी कंपनी आपल्या विकासकांना प्रवासभत्ता देते. विकासकांची त्या शहरात राहण्याची सोय करते. पगार मात्र जो आहे तोच चालू राहतो.

ग्राहक जर परदेशातला असेल तर आयटी ईंजिनीयर्ससाठी ती सुवर्णसंधी असते. कामानिमित्त का होईना, कंपनीच्या खर्चाने परदेशवारी घडते. काम जास्त दिवस चालणार असेल तर कंपनीच्या खर्चाने सहा महिने वर्षभर त्या देशात राहताही येते. पगार मात्र दोन प्रकारे दिला जाऊ शकतो. एक म्हणजे कंपनी भारतातलाच पगार देते परंतू परदेशातला राहण्याचा आणि जेवणाचा खर्च कंपनी करते. म्हणजे भारतातला पगार पुर्णपणे बचत करता येऊ शकतो. दुसरा प्रकार म्हणजे आयटी कंपनी आपल्या आयटी ईंजिनीयर्सना ग्राहकाकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून पाठवते. ग्राहक कंपनी आयटी कंपनीला प्रत्येक कंत्राटी कर्मचार्‍याच्या कामाचा मोबदला महिना अखेरीस देते. आयटी कंपनी त्या रकमेतून आपले खर्च, फायदा वगैरे वजा करुन एक ठराविक रक्कम (त्या देशातील चलनात) आपल्या त्या देशातल्या कर्मचार्‍यांना देते. या पद्धतीत राहण्याची आणि जेवणाची सोय कर्मचार्‍यांनी आपली आपण करायची असते. तसेच तो कर्मचारी जेव्हढे दिवस परदेशातून काम करेल तितके दिवस भारतातील पगार बंद असतो. कामाचा कालावधी एक वर्षापेक्ष जास्त असेल तर बर्‍याचशा आयटी कंपन्या अकरा महिन्यानंतर आपल्या कर्मचार्‍यांना एक महिन्याची बिनपगारी सुट्टी घेऊ देतात. या सुटटीत त्या कर्मचार्‍याला भारतात येऊन परत जायचे असेल तर प्रवासभाडयाचा खर्च कंपनी करते.

देशांतर्गत ग्राहकाकडे ऑनसाईटला जाऊन काम करण्यास आयटी ईंजिनीयर्स तितकेसे उत्सुक नसतात. कारण एक दुसर्‍या शहरात जाऊन राहण्याचा अनूभव सोडला तर त्यात विशेष काही फायदा नसतो. कंपनी जरी प्रवासभत्ता देत असली आणि राहण्याची सोय करत असली तरी काही काळासाठी स्थलांतरीत होण्याच्या दगदगीमुळे आयटी ईंजिनीयर्स या प्रकाराला नाक मुरडतात.

परदेशात ऑनसाईट जाण्यासाठी मात्र आयटी कंपन्यांमध्ये गळेकापू स्पर्धा असते. कंपनीच्या खर्चाने परदेशवारी, वर्ष दोन वर्ष परदेशात राहावयास मिळाल्यास होणारी दहा वीस लाखांची बचत, परत आल्यानंतर मिळणारा "फॉरीन रीटर्न्ड" टॅग आणि आयटी मार्केटमध्ये मिळणारा भाव असे अनेक फायदे असल्यामुळे बरेच वेळा एखादया ऑनसाईट जागेसाठी आयटी ईंजिनीयर पाठवताना कधी कधी राजकारणाईतकेच गलिच्छ राजकारण खेळले जाते. मॅनेजर लोक आपल्या चमच्याचा नंबर लावण्यासाठी कधी कधी अनाकलनिय कोलांटया उडया मारतात. तसेच एकदा कोण जाणार हे नक्की झाले की तो जाणार्‍या पहिल्यांदाच त्या देशात जाणार असेल तर व्हिजा ईंटरव्ह्यू नावाचं एक दिव्य जाणार्‍याला पार पाडावं लागतं.

या सार्‍या गमती जमती आपण पुढच्या भागात पाहू.

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

24 Feb 2013 - 2:59 am | दादा कोंडके

वर्ष दोन वर्ष परदेशात राहावयास मिळाल्यास होणारी दहा वीस लाखांची बचत

एव्हडी बचत होते काय! म्हणुनच कै-कै जण अक्षरशः बरोबरच्यांना अँबॅरेसिंग वाटण्यासारखं वागतात. :)

ऑनसाईट बद्द्लच एक गोष्ट मोठ्या आयटी कंपनी मधल्या रूममेटनी सांगितली होती. यु.यस. मध्ये एके ठिकाणे त्यांना रहाण्यासाठी एक अपार्टमेंट लिज वर घेतलं होतं. तिथं श्वार्ट आणि ल्वांग टर्मवर असणारे शेकडो लोकं रहायची. बहुतेक जणं २३-२८ या वयोगटातली असायची. अडनिडं वय, स्वातंत्र्य यामुळे असंख्य मुलं-मुली वन-नाइट स्टॅन्ड घेउन रहायचे. इकडे आल्यावर कुणाला सांगण्याचा/माहित व्हायचा प्रश्नच नाही. जी अदरवाइज रिस्क असते ती यात कमीच. एसटीडीचं विशेष भय नाही, नंतरचं ब्ल्याकमेलींग वगैरे. आणि हे बहुतेक ठिकाणी तरुणाईची गर्दी असलेल्या अपार्टमेट्स मध्ये चालतं असं तो म्हणायचा. त्यामुळे तो लग्न ऑनसाईटला न गेलेल्या मुलीशी करणार आहे असं म्हणायचा. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Feb 2013 - 3:06 am | विश्वनाथ मेहेंदळे

कै च्या कै !!!! तद्दन बकवास....
या मुद्यावर सध्या इतकेच. त्यापेक्षा जास्त लायकी नाही या अफवेची सध्या.

धन्या's picture

26 Feb 2013 - 1:26 am | धन्या

ऑनसाईट बद्द्लच एक गोष्ट मोठ्या आयटी कंपनी मधल्या रूममेटनी सांगितली होती. यु.यस. मध्ये एके ठिकाणे त्यांना रहाण्यासाठी एक अपार्टमेंट लिज वर घेतलं होतं. तिथं श्वार्ट आणि ल्वांग टर्मवर असणारे शेकडो लोकं रहायची. बहुतेक जणं २३-२८ या वयोगटातली असायची. अडनिडं वय, स्वातंत्र्य यामुळे असंख्य मुलं-मुली वन-नाइट स्टॅन्ड घेउन रहायचे. इकडे आल्यावर कुणाला सांगण्याचा/माहित व्हायचा प्रश्नच नाही. जी अदरवाइज रिस्क असते ती यात कमीच. एसटीडीचं विशेष भय नाही, नंतरचं ब्ल्याकमेलींग वगैरे. आणि हे बहुतेक ठिकाणी तरुणाईची गर्दी असलेल्या अपार्टमेट्स मध्ये चालतं असं तो म्हणायचा.

विमेशी सहमत.

तुम्ही ती थियेटरच्या सीटवरची सूई आणि तिच्यासोबतची ती "वेलकम टू एडस क्लब" वाली चिठठीची अफवा ऐकलीच असेल ना. तशीच ही अफवा आहे. कदाचित एखादी अपवादात्मक घटना घडतही असेल. पण सर्रास नक्कीच नाही.

सुहास..'s picture

26 Feb 2013 - 12:37 pm | सुहास..

धन्या शी सहमत !!

" अफवा " एकुन आहे ( विषेशता: कॅलिफोर्नियन साईडला), पण सत्यापसत्याची खात्री नसल्याने....थत्ते चाचा मोड !

आजानुकर्ण's picture

26 Feb 2013 - 6:45 pm | आजानुकर्ण

सत्याची खात्री नाही. मी ही 'अफवा' पहिल्यांदाच ऐकली.

मन१'s picture

26 Feb 2013 - 6:00 pm | मन१

पण त्या ऑनसाइटला गेलेल्या मुलींना हे उद्योग करायला मुलांची गरज पडत असावी.
तसे असेल तर "ऑनसाइट"ला गेलेल्या मुलांना जोरदार मागणी आहे; हे कसें?
male chauvinism निषेध.
.
बादवे, "बहुतेक ठिकाणी तरुनाईची गर्दी" असलेल्या पुण्यातल्या जागा ठाउक आहेत का?
तिथे असे काहीच होत नाही ह्याची खात्री आहे का?
.
ऑनसाइटला गेलेला; पण "तरुणाईची गर्दी" अनुभवायची संधी न मिळालेला -------

आजानुकर्ण's picture

26 Feb 2013 - 6:45 pm | आजानुकर्ण

तसे असेल तर "ऑनसाइट"ला गेलेल्या मुलांना जोरदार मागणी आहे; हे कसें?

अनुभवी उमेदवारांना प्राधान्य?

रेवती's picture

26 Feb 2013 - 1:05 am | रेवती

एका प्रॉग्राम म्याणेजर असलेल्या मैत्रिणीकडून कळलेला प्रकार विचित्र वाटला. इथे भारतातून बरीच मुलं, मुली येतात. अनेक बायका अगदी लहान मुलं तिकडेच सोडून येतात. त्यांना त्यात फारसे काही वाटत नसावे. बहुदा तेलुगु असतात हे मी दोन तीन वेळा पाहिले आहे. नुकतेच ३ जणांना कंपनीने परत भारतात पाठवले. एक अगदी दोन महिन्याचे बाळ सोडून आली म्हटल्यावर बाकीच्यांनाच कसेसे वाटले. तिच्या बिल्डींगीत राहणारे आणि त्याच कंपनीत काम करणारे दोन भारतीय ओळखीचे कोणीतरी असावे म्हणून मैत्री केली आणि एकेदिवशी चक्क बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा दावा (खरा/खोटा ते देवालाच माहित) केल्यावर कंपनीला प्रकरण वाढवायचे नव्हते म्हणून तिघांनाही परत पाठवून दिले आहे. ही घटना पंधरा नाहीतर वीस दिवसांपूर्वीची! स्त्री असल्याने तिने एकटीने येऊ नये असे माझे म्हणणे नाही. बाळ वगैरे मागे ठेवून किंवा धोकादायक परिस्थिती निर्माण होईल असे मुद्दाम होऊन काही करू नये. एवढेच!
एकीदोघींशी अशीच कुठे कुठे भेट झाल्यावर गेली ३ वर्षे मूल भारतात आहे वगैरे ऐकून वाईट वाटते.
पैसे मिळतात वगैरे ठीक आहे पण पार जीव जाईपर्यंत कसली स्पर्धा! एका मराठी मनुष्याने ऑनसाईट आलेला असताना इथे नीयम तोडण्याच्या पलिकडे जाऊन गुन्हा नोंदवला जाण्यासारखे काम केले आणि त्याची इच्छा होती की महाराष्ट्र मंडळाने त्याला सोडवावे. आता ही जबाबदारी कोण घेणार? मग त्याचे नातेवाईक फोनवर मराठी लोक असे नी तसे अशी दुषणे देत बसले. एक सिनियर मैत्रिण मनाने फार चांगली आहे तर तिच्यावरच त्याच्या फ्यामिलिने दबाव आणायला सुरुवात केल्यावर तिला पोलीसांची मदत घ्यावी लागली.
सगळेच असे असतात असे माझे म्हणणे नाही, किंबहुना फारच कमी उदाहरणे आहेत. माझा या क्षेत्राशी फारसा संबंधही नाही पण हे प्रकार अगदी विश्वासू व्यक्तींकडून ऐकवले गेल्याने भुवया उंचावल्या.
वरील लेखन वाचून ते आठवले.

श्रीरंग_जोशी's picture

26 Feb 2013 - 1:24 am | श्रीरंग_जोशी

नियम मोडण्याची व गुन्हे करण्याची व त्याकारणाने होणार्‍या कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी पळवाट शोधण्याची प्रवृत्ती हि व्यक्तिगत बाब असते. धन्या यांच्या वरील लेखाचा हा विषयही नाहीये.

परदेशात जाऊन काम करणार्‍यांत अशी काही उदाहरणे सापडली म्हणून त्याचा प्रामुख्याने उल्लेख केला जाणे बरोबर वाटले नाही. अशा मानसिकतेचे लोक सगळीकडेच मिळतील.

दादा कोंडके's picture

26 Feb 2013 - 2:27 am | दादा कोंडके

विषयाला धरूनच एकोळी तिरकस प्रतिसाद देण्यापेक्षा प्रामाणिकपणे त्या विषयावरून आपल्याला काय आठवलं ते सांगण कधिही चांगलं.

धनाजीरावांनी या विषयावर आख्खी मालिका सुरु केलीये ती आमच्यासारख्या नॉन आयटीवल्यांसाठी (आयटीवाल्यांना यातील बर्‍याच गोष्टी माहित आहेत आधीच)! त्यांच्या लेखमालेच्या सुरुवातीलाच त्या क्षेत्राच्या बाहेर असलेल्यांच्या गैरसमजाचा उल्लेख आलाय. उदा. एसीमध्ये बसून बक्कळ कमावणे माहित असणे पण बेंचवर असण्याचा वैतागवाणा अनुभव माहित नसणे. याचबरोबर इतरही गोष्टी कानावर येत असतात ज्यांच्यापैकी एका गोष्टीचा उल्लेख मी केलाय, तसेच हे सर्रास नव्हे हेही माहित आहेच. नुकतेच माझ्या कानावर जे आले तेवढेच लिहिले आहे. आरोप कोणावरही नाहीत. मात्र मी आतापर्यंत ३ जणी बायका घरचे गडगंज असतानाही बाळंतपणातून उठून (बाळाला भारतात सोडून)या कामासाठी आलेल्या पाहिल्यात. त्यावेळी आपल्याला वाईट वाटते ते एखादीने कश्यासाठी कोणती महत्वाची गोष्ट गमवावी? कोणते सुख जास्त महत्वाचे हे ठरवता येऊ नये याचे! एखादी गरीब बाई अश्या अवस्थेत आली तर एकवेळ समजण्यासारखे आहे. आता बाळाला भारतात सोडून येणे किंवा इथे कामाला आलेल्या मुलामुलींमध्ये नको तेवढी (म्हणजे त्यांना पाहिजे तेवढी) मैत्री ही फक्त आयटीवाल्यांमध्येच नसेल (म्हणजे नसावीच). इतरही व्यवसायांमध्ये असावी (म्हणजे आहे हे ऐकून आहे). सध्या आयटीचा विषय चाल्लाय म्हणून ते उदाहरण दिले कारण ताजे घडलेले आहे. दुसर्‍यांवर आरोप करण्याआधी माझेही एक मूल इथे मोठे होत आहे, अजून मलाही दुनियादारी कळतीये याची जाणीव आहे. आपल्या कामाच्या क्षेत्रावर माझा राग अजिबात नाही श्रीरंगपंत! माझा भाऊही याच क्षेत्रात काम करतो (पण मला काही सांगत नाही.).

राजेश घासकडवी's picture

26 Feb 2013 - 9:02 am | राजेश घासकडवी

कोणते सुख जास्त महत्वाचे हे ठरवता येऊ नये याचे!

मी काय म्हणतो, ज्याचं त्याचं सुख ज्याने त्याने ठरवावं. इतरांना त्यांचं सुख कशात असावं याची खात्री आपण का बाळगावी?

पैसा's picture

26 Feb 2013 - 11:38 am | पैसा

इथे सुख कोणाला कशाला वाटेल एवढाच प्रश्न नाही. मुलाला जन्माला घातलं की जबाबदारी संपत नाही तर सुरू होते. एक वर्षापर्यंत मुलाला आईचे दूध आवश्यक असते. त्यातून भावनिक जवळीक सुद्धा होते, हे माझ्यापेक्षा एखादा डॉक्टर जास्त चांगल्या तर्‍हेने सांगू शकेल. बरं अशी लहान बाळं बहुतेक वेळा आईबापाकडे सोडून यावे लागते कारण दुसरे कोणी त्यांची जबाबदारी घेणे कठीण आहे. म्हणजे आईबापांनी त्यांच्या सुखाचा विचार करू नये का?

फक्त आपले सुख पहायचे असेल तर मूल घाईने जन्माला घालू नये. तो त्या मुलावर अन्याय असतो आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या घरातल्या इतर माणसांवर सुद्धा. स्वातंत्र्य असलंच पाहिजे पण त्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या टाळून उपयोगी नाही. करियर करायची असेल तर त्यात मुलांचे आणि आपल्या आईबापाचे हक्क बळी देता कामा नयेत.

पिलीयन रायडर's picture

26 Feb 2013 - 1:36 pm | पिलीयन रायडर

इथे सुख कोणाला कशाला वाटेल एवढाच प्रश्न नाही. मुलाला जन्माला घातलं की जबाबदारी संपत नाही तर सुरू होते

अगदी बरोबर..
मुलं येउन म्हणत नाहीत की आम्हाला जन्माला घाला.. त्यामुळे मुल होऊ दिलं तर त्याला सांभाळणं पण आपलंच काम आहे. ऑनसाईट खुप महत्वाची गोष्ट असु शकते करिअर आणि पैशाच्या द्रुष्टीने.. पण बाळापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. त्यामुळे आई ने बाळाला सोडुन जाणे माझ्यामते तरी गुन्हा आहे.्यात तुम्ही बाळावर आणि स्वतःच्या शरीरवरही खुप अन्याय करता. आणि कंपनीने सुद्धा पाठवायला नाही पाहीजे.
मुळात ऑनसाईट = खुप पैसा असं असल्यामुळे लोक नाकारत नाहीच.. शिवाय शिकायला खुप मिळतं, exposure ही खुप मिळतं..रेझ्युम वर दिसतं.. पण तरीही आई-मुलाची ताटातुट करावी इतकं ते निश्चित महत्वाचं नाही..

राजेश घासकडवी's picture

26 Feb 2013 - 5:42 pm | राजेश घासकडवी

मुद्दा जबाबदाऱ्यांचा नसून सुखाचा आहे. मुलांना सांभाळण्यात नोकरी करण्यापेक्षा महाप्रचंड सुख असतं आणि त्या बायका चुकीची निवड करताहेत हे त्या करंट्यांना कळतही नाही असा मूळ मुद्दा रेवतीताईंनी मांडला होता. त्यावर माझं मत असं आहे की प्रत्येकाची गणितं वेगवेगळी असतात, आणि आपल्या दृष्टीकोनातून इतरांचे विचार 'जज' करणं योग्य ठरत नाही.

एक वर्षापर्यंत मुलाला आईचे दूध आवश्यक असते.

हे तितकंसं बरोबर नाही. आजकाल उत्कृष्ट सब्स्टिट्यूट्स तयार झालेली आहेत.

फक्त आपले सुख पहायचे असेल तर मूल घाईने जन्माला घालू नये.

हे मान्य. पण मुलाच्या जन्माचा निर्णय ऑनसाइटच्या ऑफरच्या किमान वर्ष-दोन वर्षं तरी आधी झालेला असतो. त्यामुळे त्या काळात विचार बदलू शकतात. या मुलाला तीन वर्षं आईची जवळीक द्यायची की त्या तीन वर्षांत जे तीस लाख साठतील त्यातून अधिक चांगलं आयुष्य द्यायचं हा विचारही नव्याने करावा लागतो. तसाही नोकरी करणाऱ्या आयांची मुलं दिवसातले दहाबारा तास दुसरं कोणीतरी सांभाळतं. ती व्यवस्था जर योग्य केलेली असेल, तर गणिताची दुसरी बाजू सहज वरचढ ठरू शकते.

त्यामुळे आई ने बाळाला सोडुन जाणे माझ्यामते तरी गुन्हा आहे

मला एक प्रश्न पडतो. आत्तापर्यंत अनेक पुरुष आपल्या मुलांना सोडून परप्रांतात पैसा मिळवायला अनेक वर्षं रहात आलेले आहेत. त्यांना कधी कोणीच 'बापाने बाळाला सोडुन जाणे माझ्यामते तरी गुन्हा आहे' यासारखी दूषणं दिल्याचं आठवत नाही. स्त्रिया नोकऱ्या करायला लागल्यावरच का हे सुरू झालं?

पिलीयन रायडर's picture

26 Feb 2013 - 6:19 pm | पिलीयन रायडर

कसय ना.. प्रत्येक गोष्टीमध्ये "स्त्री - पुरुष" वाद घालण्यात अर्थ नसतो (जो घालण्यात मी प्रचंड उत्सुक असते..)..
काही ठिकाणी आईच लागते..आता बाप नाही जन्म देत, दुध पाजत ह्याला कोण काय करणार?.. आणि आईला सुद्धा बाळाची गरज असते. आईच्या दुधाला सब्स्टीटुट आले असतील पण बाळाला दुध पाजणे ही आईची पण गरज असते.मानसिक आणि शाररिक सुद्धा.. (तरीही माझ्या माहिती नुसार पावडर चे दुध antibodies देउ शकत नाही जे आईचे दुध देते. त्यामुळे मुलाच्या पोटात अगदी थेंबभर दुध जरी गेले तरी ते खुप महत्वाचे असते.. असं माझ्या मुलाच्या वेळी मला सांगितलं होतं डॉक्टरने).. माझ्या सारख्या आया ज्या १०-१२ तास मुला जवळ नसतात त्या दुपारी घरी जाऊन दुध पाजणे, दुध काढुन ठेवणे असे उपाय करु शकतात..
मला वाटतं की वाद हा अगदी लहान मुलाला सोडुन रहण्या बद्दल आहे.. मोठी मुले राहु आईला सोडुन राहु शकतात आणि आया पण थोडी कमी काळजी करतात..

कमी पैशात पण आयुष्य काढता येतं..पण आईला बाळापाशी राहुन जे मिळतं आणि बाळाला ती जे देते ते पैशात कसं मोजता येईल?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2013 - 8:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाळाला दुध पाजणे ही आईची पण गरज असते.मानसिक आणि शाररिक सुद्धा..

नैसर्गिकतःच. अनेक बायकांना प्रसूतीनंतर पुरेसं दूध येत नाही, वेळेच्या आधीच बंद होत. त्यांच्या मुलांना पूर्वी अन्य स्त्रिया दूध पाजत. आता नेस्ले* कंपनी दूध पाजते. तशी काहींना ही मानसिक गरज फार निकडीची वाटत नसेल. आत्ता वर्षभर त्याग केला तर पुढचं आपलं आणि पोराचं आयुष्य चांगलं असेल, असा विचार त्यांनी करण्यात काय गैर आहे हे सांगणारे आपण कोण? (याउलट "मी तिच्या जागी असते तर मी असं केलं नसतं", असं म्हणणं ना त्या स्त्रीवर अन्यायकारक आहे, ना स्वतःचं मत मांडण्यात आडकाठी येते.)

सरोगेट आईसुद्धा 'स्वतःच्या मुलांना' दूध पाजत नसावी.

त्यातून ही मानसिक गरज समाजाने निर्माण केलेली आहे का नैसर्गिकतः, खरोखर हॉर्मोन्समुळे अशी गरज वाटते याबद्दल काही काम झालेलं आहे का? आपले स्वतःचे अनुभव आणि/किंवा आपल्या आजूबाजूला असणार्‍या स्त्रियांशी झालेल्या गप्पागोष्टींमधून विज्ञानाबद्दल अशी सरसकट/ब्लँकेट विधानं करणं पटत नाही.
दुसरं म्हणजे समजा हॉर्मोन्समुळे अशी मानसिक गरज असेलही, पण ती स्त्री यावर मात करू शकत असेल तर तिला दोष देण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही. उत्क्रांतीमुळे असे हॉर्मोन्स तयार होणार्‍या स्त्रियांचीच मुलं जगली, पण आता नेस्ले* कंपनी त्याची जबाबदारी घेते. अशा प्रकारच्या मानसिक अवलंबित्त्वाची आवश्यकता आता संपलेली आहे.

*हे एक उदाहरण, एवढंच.

पिलीयन रायडर's picture

26 Feb 2013 - 8:30 pm | पिलीयन रायडर

नेस्ले कंपनी दुधाची जबाबदारी घेते. पाळणाघरं सांभाळायची जवाबदारी घेतात. टीव्ही - मोबाईल करमणुकीची, शाळा शिक्षणाची.. मग आपण काय फक्त पैसे देत रहायचे का? म्हणजे आपलं मुलं पहिल्यांदा बोलतं, चालतं.. दात येतात.. अजुन कय काय १००० गोष्टी चालु असतात.. ते सगळं सोडुन आपण पैसे कमवायलाच जायचं का? म्हणजे
is that the ultimate thing in our life?
दुसरं असं.. मी फक्त तान्ह्या मुलांच्या आयां बद्दल बोलतेय जिथे खरच आई मुलाला एक्मेकांची गरज असते. बाळ उगाच आईच्या कुशीत शांत होत नाही. आता ते आजीच्याही कुशीत शाम्त होत असेल, पण मग त्यांनी का म्हणुन तुमच्या लेकराला म्हातारपणात सांभाळाव आणि तुम्ही तिकडे निवांत राहणार (आणि निवांतच... कारण मुल सांभाळणं हे एक भयंकर मोठं काम आहे ज्यातुन तुम्ही दुसर्‍या कुणाला तरी अडकवुन सुटता..)
जर मुल मोठ असेल तर आईने नक्की जावं.. वडिल नक्की सांभाळतील मुलाला.. पण तान्ह बाळ सोडुन.. अजिबात जाऊ नये..

त्यातून ही मानसिक गरज समाजाने निर्माण केलेली आहे का नैसर्गिकतः, खरोखर हॉर्मोन्समुळे अशी गरज वाटते याबद्दल काही काम झालेलं आहे का? आपले स्वतःचे अनुभव आणि/किंवा आपल्या आजूबाजूला असणार्‍या स्त्रियांशी झालेल्या गप्पागोष्टींमधून विज्ञानाबद्दल अशी सरसकट/ब्लँकेट विधानं करणं पटत नाही.
दुसरं म्हणजे समजा हॉर्मोन्समुळे अशी मानसिक गरज असेलही, पण ती स्त्री यावर मात करू शकत असेल तर तिला दोष देण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही. उत्क्रांतीमुळे असे हॉर्मोन्स तयार होणार्‍या स्त्रियांचीच मुलं जगली, पण आता नेस्ले* कंपनी त्याची जबाबदारी घेते. अशा प्रकारच्या मानसिक अवलंबित्त्वाची आवश्यकता आता संपलेली आहे.

मला तरी तसं वाटत नाही.. बाळासाठी छाती भरुन येत असेल तर आई आणि बाळ अजुनही एकमेकांवर अवलंबुन आहेतच.. आणि मुळात स्वतःच्या इतक्या छोट्या बाळाला सोडुन जाववत कसं हा मला पडलेला प्रामाणिक प्रश्न आहे. कुणी मजाच करायला जातय असं मला म्हणायचं नाही.. पण ३ वर्ष?? मग बाळालाच का नाही घेऊन जात सोबत?
पैशा साठी नवरा - बायको आणि मुल ह्यांनी इतका काळ वेगळं रहावं ( मुल लहान असताना) इतका पैसा मला महत्वाचा वाटत नाही..

अपत्याला दूर ठेऊन काम करत बसलेल्या ३ बायका माहीत आहेत. तीघीही मध्येच रडायच्या/ डिप्रेशन च्या शिकार व्हायच्या.

पैसा's picture

26 Feb 2013 - 8:47 pm | पैसा

आईच्या दुधातून मुलाला जी नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते ती कोणत्याही फॉर्म्युल्यातून मिळत नाही. आईने मुलाला सांभाळणे आणि स्वतःचे दूध पाजणे हे आवश्यक नसते तर नव्या मातेला ६ महिन्यांची भरपगारी रजा दिली गेली नसती. माझी मुले लहान असताना डॉक्टरनी सरळ सांगितले होते की तू मुलाला दूध पाजणार असशील तर तुला कितीही महिन्यांचे सर्टिफिकेट द्यायला आपण तयार आहोत. ते कोणी कुडमुडे डॉक्टर नव्हेत तर प्रसूतीशास्त्र आणि फर्टिलिटी या विषयातले नामांकित तज्ञ आहेत.

बाहेर जाऊन पैसा मिळवा, सुखे मिळवा, पण त्या जन्म दिलेल्या पोराची जाबाबदारी दुसर्‍यावर, म्हातार्‍या आईबापावर ढकलून नव्हे. मग कंपनीला सांगा की मला मुलाला बरोबर न्यावे लागेल म्हणून. ही मुले पुढे आईला किती जवळची राहतील की पैसे देणारे यंत्र समजतील याबद्दल मला कुतुहल आहे. तसे २० ३० लाख रुपये हे लोक मुलासाठी गोळा करतात यावर माझा विश्वास नाही. ते सगळे स्वतःसाठीच असते. मग आपली जबाबदारी दुसर्‍यावर का ढकलावी?

अगं पिलियन रायडर, एवढच असतं तरी ठीक होतं. ३ वर्षे मूल लांब होतं. तिची आई बाळंतपणाहून जाताना घेऊन सासूसासर्‍यांकडे पोहोचवलं. नंतर नवरा भेटायला आला तर आता दुसरं मूलही व्हायला हवं म्हणाला म्हणून ही बाई दुसर्‍यांदा गर्भारशी होती आणि सांगत होती की की मी एकटीच हे बाळंतपण करणार आणि बाळ दोन महिन्याचं झालं की आईला बोलावून पुन्हा सासरी पाठवून देणार. आता काय बोलावे? म्हणजे मूल जन्माला घालायचं आणि तिकडे सोयीस्कर होतेय म्हणून पाठ्वायचं याला काय अर्थ आहे? आता मूल ही जबाबदारीच वाटत नसेल तर ठीक आहे. अनेक न समजावता येणार्‍या गोष्टी असतात. आपल्या मुलांचं हसणं, बोलणं, मोठं होणं, आजारी पडणं, धडपडणं, पौष्टीक खाण्यापिण्याची जबाबदारी ही आईवडील दोघांची आहे. आजीआजोबांनी त्यांच्या मुलांचे करून झाले आहे. त्यांनी ती का म्हणून घ्यावी. नाही म्हणणारे म्हणतात पण काहींना जमत नसेल म्हणून पुन्हा जबाबदारीत अडकतात. त्यापेक्षा आपल्याला झेपणार नाही म्हणून न होऊ देणे ठीक! प्रत्येक बाईला बाई असल्याने मूल झालेच पाहिजे असे काही नाही.

त्यातून ही मानसिक गरज समाजाने निर्माण केलेली आहे का नैसर्गिकतः, खरोखर हॉर्मोन्समुळे अशी गरज वाटते याबद्दल काही काम झालेलं आहे का?

ही गरज मानसिक नाही आहे. बरेच संशोधन झालेले आहे.

येथे वाचा काही महत्त्वाचे परिच्छेद

One large study by the National Institute of Environmental Health Sciences showed that children who are breastfed have a 20 percent lower risk of dying between the ages of 28 days and 1 year than children who weren't breastfed, with longer breastfeeding associated with lower risk.

Your breast milk is specifically tailored to your baby.

नेस्ले कंपनी हे करू शकणार आहे का? त्यातून जीवनसत्व मिळतील हे मान्य

वर लिहीले आहेस

नैसर्गिकतःच. अनेक बायकांना प्रसूतीनंतर पुरेसं दूध येत नाही, वेळेच्या आधीच बंद होत.

त्याच अनुषंगाने मग असेही म्हणता येईल की मग काही लोकांना नसतात आयटी मधले जॉब किंवा जातात recession मुळे त्यांची मुले काय चांगलं आयुष्य जगत नाहीत का?

बाकी कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आईचे दूध सर्वोत्तम हे संशोधनांती सिद्ध झाले आहे येवढेच म्हणणे आहे.

मन१'s picture

26 Feb 2013 - 9:08 pm | मन१

धागा ऑनसाइअटचा असला, नि अवांतर होत असलं तरी स्वस्थ बसवेना म्हणून लिहितोय.वरील आख्खे विचार बरेचसे टोकाचे आणि एकांगी वाटले.
का वाटले?
कारण नेस्ले काय किंवा इतर प्रॉडक्ट काय हे कशाचे तरी "सब्स्टिट्यूट" म्हणून आणले गेले आहेत. ज्यांना कमी दुधाचा वा त्यासारखा इतर प्रॉब्लेम असेल त्यांना नाइलाजाने त्याचा वापर करण्यात साम्गण्यात येत असावं.(हा माझा तर्क आहे.)
.
एखादं प्रॉडक्ट मार्केट मध्ये आहे ह्याचा अर्थ गरज पडल्यास ते वापरु शकतो असा घ्यावा असं मला वाटतं. ते सरसकट सर्वाम्च्या वापरासाठी आनलय असं मला वाटात नाही.तसेही हे मला मार्केट ओरिएंटेड इकॉनॉमीचे दुष्परिणाम वाटतात. त्यावर सविस्तर नंतर कधीतरी. आईचे दूधही विकत घ्यायची गोष्ट बनवली जाते आहे; आणि त्यात कुणाला खटकत नसेल तर आश्चर्य आहे.
.
आधी नवीन आलेल्या प्रॉडक्टची हाइप करायची; मग ते प्रॉडक्ट उपलब्ध आहे म्हणून आपल्याला त्याच्ची गरज आहेच असं स्वतःच स्वतःला समजवायचं. आख्ख्या समजाला त्या चक्रात धकललं की मग पुन्हा "ह्या गोष्टी स्वाबहविकपनेच झालेल्या बर्‍या. ऑर्गॅनिक शेतीचे महत्व" ह्यावर उलट संशोधन सुरु करायचं हे मार्केटचं तत्व भयंकर आहे; तसच विचित्र आहे. मानवाच्या गरजा निर्माण आणि नियंत्रित करण्याचं असं तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा उद्घोष करत येतं("आता तुम्हाला तमुक तमुक गोष्टीला पर्याय उपलब्ध आहे" असं म्हणत येतं) हा ही एक विरोधाभासच.
.

आईचे दूधही विकत घ्यायची गोष्ट बनवली जाते आहे; आणि त्यात कुणाला खटकत नसेल तर आश्चर्य आहे.

अगदी अगदी!!!
आई जेव्हा बाळाला दूध पाजते तेव्हा तिच्या कुशीची ऊब, जवळीक बाळात नक्कीच चैतन्य व आत्मविश्वास भरत असणार. त्याच्या भावनिक स्थैर्याचा पाया नक्कीच घातला जात असणार. यावर संशोधन झालय का आणि कसं ते माहीत नाही पण बाळाचा समाधानी चेहरा खूप बोलून जातो.
"ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" मध्ये योगानंद म्हणतात - बाळ पहीलं पाऊल टाकताना त्याचं केलेलं कौतुक जीवनभरच्या आत्मविश्वासाचा पाया होउ शकतं.
आता "अपत्य संगोपन" कोणाला आऊटसोर्स करायचं असेल तर करेना का बापडे. ते आणि त्यांची लाचारी!!!!!!!!!!!

अर्थात अदितीचा मुद्दा मला पटतो. फक्त स्त्रीने "अपत्यसंगोपनात" अडकवून घेता कामा नये त्यात तिच्या भरारीचे पंख छाटले जातात. पण मला वाटतं काही वर्षे त्याग करायला हरकत नसावे. तसेच पुरषांनी जबाबादारी घेतली पाहीजे तर कुटुंब पुढे जाऊ शकतं.

"ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" मध्ये योगानंद म्हणतात - बाळ पहीलं पाऊल टाकताना त्याचं केलेलं कौतुक जीवनभरच्या आत्मविश्वासाचा पाया होउ शकतं.

बालमानसशास्त्र, वेगवेगळे मानसिक विकार यावरचं कुठलंही पुस्तक उघडलं तर त्याच्या पहिल्या लेखात अशा आशयाचं एकतरी वाक्य असतं.

बाळाच्या पहिल्या एक वर्षांत "प्रायमरी केअरटेकर" जी बहूतांशी वेळेला बाळाची आई असते, बाळाची कशी काळजी घेते, त्याच्या वेगवेगळ्या गरजांना कसा प्रतिसाद देते यावर ते बाळ पुढील आयुष्यात मानसिक किंवा भावनिक दृष्टया किती सुदृढ असेल हे अवलंबून असते.

उपास's picture

26 Feb 2013 - 9:45 pm | उपास

स्वतः यातून गेल्यामुळे एकच सांगू शकेन, पैसा हवं तितका/ हवं तेव्हा मिळू शकतो (बरेचदा कितीही असला तरी तो कमीच) पण लहान मुलाबरोबर (विशेषतः आपल्या) घालवलेला वेळ हा शब्दातित आणि पैशातित आहे! तसही दोन्ही जोडीदारांपैकी एकाने पैसे आणायचे आणि दुसर्याने घर बघायचं हे अगदी सिंहाच्या कळपातही दिसून येतं. दोघांनी घरी बसून मुलांच बघावं हे ही टोकाचं आणि दोघांनी मुलांची बाहेर सोय करुन पैसे कमवत राहावं हे ही तितकंच टोकाचं. हा कितिही वैयक्तिक प्रश्न म्हटला तरी त्याला सामाजिक पैलू आहेत हे नाकारता येणार नाही. वरती तेलगू कम्युनिटीची उदाहरणं दिली आहेत, गुजराथी कम्युनिटी मध्ये स्त्रियांचा मुलांच्या स्वत:हून करण्याच्या पोषणाकडे नक्कीच जास्ती कल असतो, हे ही खरं आहे.
हे असे अनुभव वाचता, 'हिरव्या नोटांपलिकडली सुखं' शोधायला परदेशात लोक येत असावेत असं म्हणण्यात तितकसं गैर वाटू नये.
वरती मन चे पोस्ट आवडले, आधी सोय म्हणून आलेली प्रोडक्ट्स हळू हळू आपला ताबा घेऊन त्याला 'गरज' म्हणून गळी उतरवतात हा सामाजिक परिणामच म्हणायचा.

नगरीनिरंजन's picture

28 Feb 2013 - 7:06 am | नगरीनिरंजन

गरज निर्माण करणे आणि तिचे संस्थानीकरण होणे याबद्दल इवान इलिचने छान विवेचन केले आहे. जुलूस मध्ये त्याकडेच लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला होता (झैरात!).

अशी पेशंट जर माझ्या ओपिडीत आली तर केपाटात लाथ घालुन हाकलुन देइल.आम्ही स्वतः आमचे बाळ लहान असताना ओपिडीत जाताना बरोबर घेउन जात असु. बाळाला लहानपणी फक्त आईचीच गरज असते. त्यामुळे ज्या आईला बाळाला संभाळायचे नसेल तर झक मारावी त्याला जन्मालाच घालु नये.

आनन्दिता's picture

27 Feb 2013 - 5:40 am | आनन्दिता

केपाटात?.?

हायला डॉक्टर हे 'केपाटात' काय आहे?. पेकाटात म्हणायचय का तुम्हाला??
कपाटात बंदुक, तलवार आणि केपाटात लाथ!!! =)) =))

बाबा पाटील's picture

27 Feb 2013 - 12:07 pm | बाबा पाटील

आनंदिता ताई माफ करा...पण आमची भाषाच अशी रांगडी आहे आणी आता ती बदलन शक्य नाही,पथ्य न पाळणार्‍या पेशंटचाही असाच उध्दार होत असतो,त्यामुळे काही पेशंट आज ओपीडीत सर आहेत का मॅडम हे पाहुनच येतात...

अधिराज's picture

27 Feb 2013 - 8:16 pm | अधिराज

बाबा पाटील सर, एक नंबर आहे प्रतिसाद तुमचा. मान गये.

यशोधरा's picture

27 Feb 2013 - 5:19 pm | यशोधरा

LOL!

नगरीनिरंजन's picture

28 Feb 2013 - 7:01 am | नगरीनिरंजन

हे असे विचार अजून भविष्यात डोकावू न शकलेल्यांना पटणारे नाहीत. अमेरिकेत राहण्याचा फायदा हा की आपल्या सगळ्या गरजांचा ताबा कंपन्यांना घेऊ देणे यात काहीच वावगे वाटत नाही. अमेरिका वगळता इतर देशांमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला इतके महत्त्व दिले जात नाही हेही कारण त्यामागे असू शकते.
प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असली पाहिजे आणि तिचे दुसर्‍या व्यक्तीवरचे (विशेषतः स्त्रीचे नवर्‍यावरचे आणि सासरकडच्या नातेवाईकांवरचे) अवलंबित्व शून्य असले पाहिजे हा विचार आज प्रमुख आहे आणि त्यासाठी बाजरातल्या उत्पादनांवर अवलंबित्व वाढणे हे सहज मान्य आहे. अर्थात ही गोष्ट मार्केट आणि इकॉनॉमीला चांगली असल्याने त्याला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याला विरोध करणे म्हणजे मागासलेपणाचा शिक्का स्वतःवर मारून घेणे आहे.
"The Overworked American:The Unexpected Decline of Leisure" या आपल्या पुस्तकात Juliet Schor या लेखिकेने इतकी प्रगती होऊनही, इतकी यंत्रे सेवेला असूनही कामाचा वेळ कमी का होत नाही याचा उहापोह केला आहे आणि त्यावरून असे दिसते की घरातल्या कामाचा वेळ कमी झाला आहे आणि त्यासाठी लागणार्‍या सुविधा मिळवण्यासाठी लोकांचा 'मार्केट टाईम' वाढलेला आहे.
अर्थातच 'मार्केट टाईम' म्हणजे घराबाहेर काम करणे हे घरात काम करण्यापेक्षा जास्त प्रतिष्ठेचे असल्याने अमेरिकेत व्यक्तिगत प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आहे असा निष्कर्ष आपण काढू शकतो.
स्त्रीला गर्भारपण, मातृत्व आणि बालसंगोपन यात कैद करून मार्केट टाईमपासून वंचित करू पाहणार्‍या शक्तींना नामोहरम करण्यासाठी तंत्रज्ञ झटत आहेत ही अत्यंत आशादायी गोष्ट आहे.
ज्याप्रमाणे आईच्या दुधाला पर्याय शोधला गेला आहे (खरं म्हणजे काही चिनी व अर्जेंटिनियन शास्त्रज्ञांनी आईच्या दुधासारखे दूध देणार्‍या गाईच तयार केल्या आहेत) त्याप्रमाणेच लवकरच गर्भाशयाला पर्याय शोधण्यात यश मिळेल यात मला शंका नाही. गाढविणीच्या किंवा डुकरिणीच्या किंवा गाईच्या उदरात माणसाचे पिल्लू वाढवता येईल असा शोध फारसा लांब नसावा.
मार्केट टाईममुळे ताणतणाव वाढून प्रजोत्पादनशक्ती कमी होते अशी तक्रार काही दुर्बळ पुरुष करतात म्हणून शास्त्रज्ञांनी आता प्रयोगशाळेत शुक्रजंतू तयार करण्याचे तंत्र शोधून काढले आहे.
या अशा शोधांमुळे मानवजात प्रजोत्पादनासारख्या अतिवेळ आणि ऊर्जाखाऊ कामातून अखेरीस मुक्त होईल अशी आशा वाटते. एक दिवस असा येईल की नवरा आपल्या ऑफिसमधून बायकोला तिच्या ऑफिसमध्ये फोन करेल आणि मग बाळाची डिलिव्हरी घ्यायला कोणी जायचं यावर एक छानशी चर्चा होऊन कोणी बाळ घ्यायला लॅबमध्ये जायचं ते ठरवलं जाईल. त्या चर्चेचे फलित म्हणून जेव्हा नेहमी पुरुषांनाच बाळ घ्यायला जावे लागेल तेव्हाच स्त्री खर्‍या अर्थाने मुक्त झाली असे मी म्हणेन!
तोवर आपल्याला नतद्रष्ट लोकांचे मागास विचार सहन करावे लागतील.

५० फक्त's picture

28 Feb 2013 - 7:16 am | ५० फक्त

सहमत व्हावं की होउ नये या विचारात गुंग आहे तुमचा प्रतिसाद वाचुन.

मन१'s picture

28 Feb 2013 - 12:58 pm | मन१

+१

राघवेंद्र's picture

5 Mar 2013 - 12:37 am | राघवेंद्र

+१

५० फक्तशी सहमत

चौकटराजा's picture

28 Feb 2013 - 7:22 am | चौकटराजा

त्यासाठी लागणार्‍या सुविधा मिळवण्यासाठी लोकांचा 'मार्केट टाईम' वाढलेला आहे.
हा टाईम कसा वाढतो याची काही उदाहरणे पहा आवश्यकता नसताना घरातल्या टाईल्स बदलणे, तीन हजाराच्या चपला साठी सात हजाराचा शू रॅक विकत घेणे, चार हजाराच्या भांड्यांसाठी पंचवीस हजाराची किचन ट्रोली घेणे , कार डेकोरेशन वर पन्नास हजार खर्च करणे. या सर्वाचे कारण " लेटेस्ट ट्रेंड" नावाचा किडा मार्केट वाल्यानी आपल्या मेंदूत घुसविलेला असतो. मग आठ तासाच्या ऐवजी बारा तासांच्या नोकरीची ओढ लागली तर नवल नाही.

पैसा's picture

28 Feb 2013 - 9:17 am | पैसा

या जगाचे चित्र रेखाटणारा एक भयावह लेख तू आधीही लिहिला होतास.

http://www.misalpav.com/node/20152

तेव्हा मी हेच म्हटलं होतं की माझी एक्सपायरी डेट त्याच्या आधीची असलेली मला आवडेल. आजही तेच म्हणते.

आणखी एक

http://www.misalpav.com/node/22575

भावनाशून्य आणि चंगळवादी जग आपल्यासारख्यांसाठी नाही. मी तरी लवकरच शेती करायला जाणार आहे. मातीत हात घातल्यानंतर एक्सपायरी कधीही होवो. फिकर नाही!

नाना चेंगट's picture

28 Feb 2013 - 9:25 am | नाना चेंगट

या अशा शोधांमुळे मानवजात प्रजोत्पादनासारख्या अतिवेळ आणि ऊर्जाखाऊ कामातून अखेरीस मुक्त होईल अशी आशा वाटते. एक दिवस असा येईल की नवरा आपल्या ऑफिसमधून बायकोला तिच्या ऑफिसमध्ये फोन करेल आणि मग बाळाची डिलिव्हरी घ्यायला कोणी जायचं यावर एक छानशी चर्चा होऊन कोणी बाळ घ्यायला लॅबमध्ये जायचं ते ठरवलं जाईल. त्या चर्चेचे फलित म्हणून जेव्हा नेहमी पुरुषांनाच बाळ घ्यायला जावे लागेल तेव्हाच स्त्री खर्‍या अर्थाने मुक्त झाली असे मी म्हणेन!

मला एक कळत नाही की इतकं जर सगळं आधुनिक आणि मस्त होणार आहे तर स्त्री पुरुष हा भेद तरी का शिल्लक ठेवायचा? जर सगळं प्रयोग शाळेत होणार असेल तर प्रजोत्पादनासाठी आवश्यक असलेला आणि आता कुचकामी ठरणारा हा फरक आणि वैशिष्ट्ये मुळातूनच रद्द का करु नये? जेणेकरुन स्त्री हक्क, समानता, पुरुषी मनोवृत्ती ह्या सर्व दुरितांमधून मानवाची (एकदाची) सुटका होईल आणि अनेकांना अधिक उत्पादनक्षम कार्याकडे आपला वेळ कारणी लावता येईल, जीडीपीत सुद्धा वाढ झाल्याने आनंदीआनंदच!

आजच्या विज्ञान दिनी असा दिवस लवकर येवो ही (नसलेल्या) देवाला (मनापासुन) प्रार्थना.

स्पा's picture

28 Feb 2013 - 10:38 am | स्पा

=)) =)) =))

चेंगटा कहर प्रतिसाद

काय सांगता येत नाही. माझ्यापण मनात कैकदा हाच विचार येतो, तिच्यायला काय पुरुष अन काय स्त्री, सगळे एकच बनवा च्यामारी, कंडका पाडून टाका काय तो एकदाचा.

शुचि's picture

1 Mar 2013 - 6:00 am | शुचि

उत्तम तिरकस प्रतिसाद

नगरीनिरंजन's picture

2 Apr 2013 - 2:23 pm | नगरीनिरंजन

मी तिरकस लिहीलेलं असलं तरी हे गंभीरपणे खरं करण्याचे प्रयत्न चालू आहेत.लोकप्रभातला हा लेख बघा.

प्रसाद१९७१'s picture

27 Feb 2013 - 2:25 pm | प्रसाद१९७१

तुम्ही कधीतरी पिलिअन सीट सोडुन गाडी चालवा ना

पिलीयन रायडर's picture

27 Feb 2013 - 3:02 pm | पिलीयन रायडर

अग बाई.. का ते?? मजेत बसलेय मी आयती.. कुणीतरी चालवतय गाडी.. मी निवांत बसलेय मागे.. तुम्हाला का बघवना?

आजानुकर्ण's picture

26 Feb 2013 - 6:46 pm | आजानुकर्ण

प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Feb 2013 - 1:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

सदर प्रतिसाद स्वतःच्या जबाबदारीवर वाचवा. कानकोंडे झाल्यास मंडळ जबाबदार नाही.
स्त्री आयडी असाल तर परत वरची ओळ वाचा.

हे तितकंसं बरोबर नाही. आजकाल उत्कृष्ट सब्स्टिट्यूट्स तयार झालेली आहेत.

पुढील लॉजिक पटते का ते बघा
"आजकाल मार्केट मध्ये उत्कृष्ट डील्डो मिळतात म्हणून......"

राजेश घासकडवी's picture

28 Feb 2013 - 3:35 am | राजेश घासकडवी

मी तुम्हाला जज करणार नाही.

न जज करण्याचाही अतिरेक वाईटच. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Feb 2013 - 4:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तू बायबलात लिहीलेलं सगळं खरंच मानतेस का काय? (या बाबतीत आमचे पूर्वज निश्चितच फार महान होते. त्यांनी सदर उपकरणाची साद्यंत माहिती लिहून, कोरून ठेवली असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. )

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Feb 2013 - 10:22 am | विश्वनाथ मेहेंदळे

आवेशात मर्यादाभंग झाला असेल तर माफ करा, पण माझा उद्देश कुणाचाही अपमान करण्याचा नव्हता. एखादी गरज कृत्रिमरित्या भागवायची सोय बाजारात आहे म्हणून नैसर्गिक मार्ग सोडून ती सोय आवर्जून वापरावी असे नाही, इतकेच म्हणायचे होते. आता वाटते की कोल्ड ड्रिंक आणि पाणी हे उदाहरण वापरून पण काम झाले असते :-)

असो, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे आणि तुम्ही चुकीचा अर्थ काढणार नाही हे माहित होते म्हणून फार विचार केला नसेल मी.

मन१'s picture

26 Feb 2013 - 6:04 pm | मन१

अत्यंत सेन्सिबल प्रतिसाद .
आधी "ज्याचे सुख त्याला ठरवू दे" हे वरवर ठीक वाटलेलं. पुन्हा प्रतिसाद वाचून दुसरी बाजू जाणवली.

राजेश घासकडवी's picture

26 Feb 2013 - 1:56 am | राजेश घासकडवी

या सगळ्यामागचं अर्थशास्त्र काय आहे यावरही कधीतरी वाचायला आवडेल. वेगवेगळ्या क्लायंट्सकडून कंत्राटं मिळवणं, त्यासाठीची स्पर्धा, त्यात नक्की काय पणाला लागलेलं असतं, त्यात लबाड्या कशा होतात वगैरेवरही येऊ द्यात. (यातल्या काही बाबींचा ओझरता उल्लेख केलेला आहेच...)

पूर्वी आखाती देशांत जाण्याची क्रेझ होती. तिथे जाणारे लोक अशिक्षित मजूर म्हणून जायचेच, पण काही सुशिक्षित लोकही व्हाइट कॉलर जॉब करायला जायचे. अर्थातच सगळेच लोक आपापल्या क्षेत्रातली कमी स्किलची कामं करायचे, फक्त पैसा दाबून मिळायचा म्हणून जायचे. सध्याच्या ऑफसाइटी लाटेतही तेच चित्र आहे का? एकंदरीत भारतीय आयटीची कौशल्य-पातळी गेल्या दशकांत वाढलेली आहे का? अशा इतरही अनेक विषयांवर वाचायला आवडेल.

तूर्तास सगळे लेख वाचतो आहे.

आनन्दिता's picture

26 Feb 2013 - 2:14 am | आनन्दिता

सहमत...
या एकंदर अर्थकारणाबद्दल ऐकायला आवडेल. per diem बद्दल थोडं लिहा की राव!! ;)

येडा अण्णा's picture

26 Feb 2013 - 2:43 am | येडा अण्णा

ऑनसाईट जाण्यामागे मुख्य उद्देश हा पैसा आणि अनुभव मिळविणे असतो. माझा तरी आहे :). कंपनीच्या खर्चाने परदेशवारी हा अजुन एक फायदा असतोच.

per diem बद्दल थोडं लिहा की राव!!

per diem हे जेव्हा तुम्ही बिझनेस विजावर ऑनसाईट जाता तेव्हा लागू होते. कम्पनि तुमचा रहाण्याचा आणि प्रवासाचा खर्च करते आणि काहि रक्कम वरखर्चाला देते. या वरच्या रकमेतुन जेवढे वाचतिल तेवढे पैसे तुम्हाला मिळतात. भारतात तुमचा पगार चालूच रहातो.

कामाचा कालावधी एक वर्षापेक्ष जास्त असेल तर बर्‍याचशा आयटी कंपन्या अकरा महिन्यानंतर आपल्या कर्मचार्‍यांना एक महिन्याची बिनपगारी सुट्टी घेऊ देतात. या सुटटीत त्या कर्मचार्‍याला भारतात येऊन परत जायचे असेल तर प्रवासभाडयाचा खर्च कंपनी करते.

आमची कंपनी २ आठवड्याच्यावर सुट्टी देत नाहि आणि प्रवासभाडयाचा खर्च हि देत नाहि. मला ३ वर्षे झाली पण अजुन एकदाहि सुट्टी नाही मिळाली :(

बाकि अफवे बद्दल विमेशी सहमत.

आमची कंपनी २ आठवड्याच्यावर सुट्टी देत नाहि आणि प्रवासभाडयाचा खर्च हि देत नाहि. मला ३ वर्षे झाली पण अजुन एकदाहि सुट्टी नाही मिळाली.

आणि तरीही तुम्ही दुसरी नोकरी शोधत नाही? आयटीत एकाच नोकरीला वर्षानुवर्षे चिकटून राहण्याचा काय अर्थ घेतला जातो हे तुम्हाला माहिती असेलच. ;)

येडा अण्णा's picture

26 Feb 2013 - 9:47 pm | येडा अण्णा

आणि तरीही तुम्ही दुसरी नोकरी शोधत नाही? आयटीत एकाच नोकरीला वर्षानुवर्षे चिकटून राहण्याचा काय अर्थ घेतला जातो हे तुम्हाला माहिती असेलच

कुणी काहीही अर्थ घेतला तरी आपल्याला फरक पडत नाही. आणी दुसरी नोकरी ऑनसाईट्ला असे पर्यन्त शोधायची गरज नाहि धनाजीराव. कारण दुसरी नोकरी शोधायचे मुख्य कारण ऑनसाईट अथवा बढती मिळवणे असते. मला दोन्हि आहे तिथेच मिळतेय. मग कशाला दुसरीकडे जावु?

आणी असेही एल १ विजा वर नोकरी नाही हो बदलता येत :(

आणी दुसरी नोकरी ऑनसाईट्ला असे पर्यन्त शोधायची गरज नाहि धनाजीराव. कारण दुसरी नोकरी शोधायचे मुख्य कारण ऑनसाईट अथवा बढती मिळवणे असते. मला दोन्हि आहे तिथेच मिळतेय. मग कशाला दुसरीकडे जावु?

गंमतीत म्हटलं होतं राव. लईच सिरीयसली घेतलं तुम्ही.

आणी असेही एल १ विजा वर नोकरी नाही हो बदलता येत.

हा खुप छोटा प्रॉब्लेम आहे. जेमतेम दोन वर्षांच्या करीयरनंतर एल १ वर गेलेल्या पोरांनी समोरच्या अमेरिकन कंपनीला एच १ काढायला लावून एल १ वर अमेरिकेत पाठवणार्‍या भारतीय कंपनीला तिकडूनच टाटा बाय बाय केल्याची खुप उदाहरणे पाहीली आहेत.

बर्‍याच वेळा ऑनसाईटला जायला मिळतेय म्हणून मनाला न आवडणारे कामही करावे लागते.
सध्या मी हे अनूभवतोय ......

नर्मदेतला गोटा's picture

26 Feb 2013 - 3:10 am | नर्मदेतला गोटा

> > एक प्रोडक्ट बेस्ड आणि दुसरा प्रकार सर्व्हीस बेस्ड

एक मालक कंपनी दुसरी नोकर कंपनी असे का म्हणत नाही

धन्या's picture

26 Feb 2013 - 8:15 pm | धन्या

>> एक प्रोडक्ट बेस्ड आणि दुसरा प्रकार सर्व्हीस बेस्ड
>> >>एक मालक कंपनी दुसरी नोकर कंपनी असे का म्हणत नाही

नाही. इथे कंपनी मालक किंवा नोकर असण्याचा संबंधच नाही. त्यामुळे दोन्ही मराठी शब्द चुकीचे ठरतील.

प्रोडक्ट बेस्ड = स्वतःची संगणक प्रणाली उत्पादने बाजारात विकणारी कंपनी.
या प्रकाराला आपण उत्पादक कंपनी किंवा उत्पादनाधिष्टीत कंपनी म्हणू शकतो. हे म्हणजे एखाद्या घरगुती खानावळीने पोळ्या विकण्यासारखे आहे. आपल्याला पोळ्या हव्या असतील तर त्या खानावळीत जायचे, पैसे द्यायचे आणि पोळ्या घेऊन यायच्या.

सर्व्हीस बेस्ड = ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार हवी तशी संगणकीकरण्सेवा देणे. याला सेवादाता कंपनी म्हणता येईल.
हा प्रकार अगदी घरकामाला येणार्‍या बाईंसारखा आहे. त्या बाई ज्यांच्याकडे घरकामाला जातात त्यांच्या गरजेनुसार पोळ्या बनवतात, घराची साफसफाई करतात, कपडे धुतात वगैरे. बरीचशा भारतीय आयटी कंपन्या याच प्रकारचे काम करतात. म्हणून तर भारतीय आयटी ईंजिनीयर्सना आयटी हमाल म्हणतात.

खबो जाप's picture

27 Feb 2013 - 3:51 pm | खबो जाप

दोनी उदाहरण बेस हयता ......... :-)

नर्मदेतला गोटा's picture

28 Feb 2013 - 1:27 pm | नर्मदेतला गोटा

>> म्हणून तर भारतीय आयटी ईंजिनीयर्सना आयटी हमाल

म्हणजे तेच ना मालक कंपनी आणि हमाल कंपनी . हे हे ...

या प्रकाराच्या अर्थकारणाबद्दल डिट्टॅल मध्ये वाचायला आवडेल. आमचा बराचसा धंदा यावर अवलंबुन आहे म्हणुन.

मृत्युन्जय's picture

26 Feb 2013 - 11:52 am | मृत्युन्जय

वाचतोय. जबर्‍या मज्जा येते आहे. पुलेशु.

प्रसाद१९७१'s picture

26 Feb 2013 - 12:07 pm | प्रसाद१९७१

ही गोष्ट शिकागो ची, २००% खरी.

जसे वर कोणीतरी म्हणले आहे तसे शिकागो मधे एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मधे बरेसचे तेलगू आटी वाले लोक रहात होती. त्यांच्या बायका भारतातल्या सवयीनुसार साड्या खिडकीत वाळत घालायच्या त्यामुळे त्या बाहेर लोंबायच्या. अपार्ट्मेट मॅनेजमेंट ला हा प्रकार बघुन काही कळेना, मग थोडे दिवस वाट बघुन त्यांनी एक नोटिस circulate केली. "खिडक्यांना आतुन पडदे लावावेत. बाहेरुन लावले तर त्यामुळे अपार्टमेंट ची शोभा जाते"

वर उल्लेखलेल्या बायकाच त्या कॉम्प्लेक्स च्या जलतरण तलावात पूर्ण कपडे घालुन पोहायच्या ( म्हणजे डुंबायच्या ). तेंव्हा सुद्धा अपार्ट्मेट मॅनेजमेंट ला नोटिस काढावी लागली

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2013 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार

वर उल्लेखलेल्या बायकाच त्या कॉम्प्लेक्स च्या जलतरण तलावात पूर्ण कपडे घालुन पोहायच्या ( म्हणजे डुंबायच्या ). तेंव्हा सुद्धा अपार्ट्मेट मॅनेजमेंट ला नोटिस काढावी लागली

काय नोटीस काढली म्हणे ?
पूर्ण कपडे घातले असतील तर तलावाच्या बाहेरच उताणे पडून हातपाय हलवावेत ?

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2013 - 1:42 pm | संजय क्षीरसागर

तलावाच्या बाहेर पालथे पडून हातपाय हलवावेत !

(अशी नोटीस असेल) किंवा

` कपडे उतरवायचे नसतील तर घरच्या टबातच डुंबावे'

समीरसूर's picture

26 Feb 2013 - 2:01 pm | समीरसूर

ही गोष्ट शिकागोमधल्या प्रेसिडेन्शियल टॉवर्स मधली आहे का? तिथे खूप भारतीय आणि त्यातल्या त्यात तेलुगु खूप राहतात. पण अपार्टमेंट मस्त आहे हे खूप. तुम्ही म्हणता तसे मी कधी पाहिले नाही तिथे.

आजानुकर्ण's picture

26 Feb 2013 - 6:49 pm | आजानुकर्ण

प्रेसिडेन्शियल टॉवर्सचा ऐकलेला एक किस्सा असा की एका मराठी माणसाचे आईबाबा प्रेसिडेन्शियल टॉवरच्या बाहेर खुर्ची टाकून ऊन खात बसले होते. एक अमेरिकन युटिलिटी कंपनीचा नोकर कोणालातरी शोधत तिथे आला आणि त्याने कोणा जॉन स्मिथ बाबत यांच्याकडे चौकशी केली. यावर या मराठी महाशयांनी उत्तर दिले की 'नो फॉरिनर्स लिव हिअर. ओन्ली इंडियन्स'

वर उल्लेखलेल्या बायकाच त्या कॉम्प्लेक्स च्या जलतरण तलावात पूर्ण कपडे घालुन पोहायच्या ( म्हणजे डुंबायच्या ). तेंव्हा सुद्धा अपार्ट्मेट मॅनेजमेंट ला नोटिस काढावी लागली

तसे केले नसते तरी चाल्ले असते. नोटिशीचे पालन त्या बैकांनी केल्यावं परत दुसरी नोटीस काढायला लागली असती ती वेगळीच =))

सेवादाता (सर्व्हर), विदागार (डेटाबेस) मस्तच....
सहा वर्षाच्या कालावधीत / अनुभवत कधीच हे शब्द वापरले नव्हते कि माहित नव्हते

इथुन पुढचे सर्व भाग इनो घेऊनच वाचायला लागणार बहुतेक

अरारा जामच जळजळ होतेय ;)

अग्निकोल्हा's picture

26 Feb 2013 - 12:43 pm | अग्निकोल्हा

अजुन येउदे.

चौकटराजा's picture

26 Feb 2013 - 2:12 pm | चौकटराजा

धन्याजी बाबा, मालिका चांगली आहे. अगदी सिडने शेल्डन किंवा आर्थर हेली ची कादंबरी वाचल्या सारखे वाटतेय !( आपण त्याचा मराठी अनुवादच वाचतो म्हणा ) स्पर्धा, राजकारण, सूड, फसवणूक अशी त्या कादम्बर्‍यांची जाहिरात करतात.मला तर हिंजवडीच्या साईडला फिरायला गेले की भलताच कॉम्प्लेक्स येतो. त्यावेळी पुण्यात पंचवीसेक संगणक होते ( १९८६ ) त्या वेळी त्यातील एका संगणका वर मी काम करायचो. ( त्यावेळी एसी रूमला घाबरायची पद्धत होती) . आज त्या पांढर्‍या गाड्यातून ते विंजनेर जाताना पाहिले ना की " कोण होतास तू काय झालास तू ? किंवा कशी नशीबानं थट्टा आज मांडली या गाण्यांची आठवण येते.

समीरसूर's picture

26 Feb 2013 - 2:30 pm | समीरसूर

लेख छान आहे.

ऑनसाईट एक चांगली संधी असते खरी. नवीन देश, नवीन माणसे, नवीन संस्कृती अनुभवणे, बर्‍यापैकी पैसे कमवणे, एक अनुभव म्हणून परदेशात राहून बघणे या सगळ्या दृष्टीने ऑनसाईट ही एक चांगली संधी असते. पण काही काही लोकं पैशापायी कुठल्याही थराला जातात. बायको ऑनसाईटला आणि नवरा भारतात किंवा अगदी उलट असा ३-४ वर्षे सलग रिमोटली संसार करणारी कितीतरी जोडपी माझ्या ओळखीची आहेत. मुलगा/मुलगी आणि नवरा भारतात आणि बायको ६ महिने - १ वर्ष अमेरिकेत असे ही एक जोडपे माझ्या पाहण्यात आहे. सासू-सासर्‍यांशी पटत नाही म्हणून घरच्या जबाबदार्‍या (वृद्ध आणि आजारी आई-वडील, त्यांच्या देखभालीसाठी कुणी नसणे, बहीण लग्नाची असणे परंतु लग्न न जुळणे, इ.) असून देखील नवर्‍याला २-३ वर्षे परदेशी घेऊन जाणार्‍या बायका माहित आहेत.

सलग ३-४ वर्षे कुटुंबासहित अमेरिकेला जाणारी कुटुंबे तिकडे जातात पण इकडे भारतात कधीतरी अवचित दुर्दैवाने दोघांपैकी (नवरा किंवा बायको) कुणाचे बाबा किंवा आई किंवा आजी-आजोबा यांचा अकस्मात अकाली मृत्यू होतो. माझ्या एका मित्राचे वडील अचानक हृदयविकाराचा धक्का येऊन पहाटे ४ च्या सुमारास गेले. मुलगा, सून, नातू, नात असे चौघे अमेरिकेत होते. त्यांना तेथून निघून त्यांच्या अमरावतीजवळच्या गावी पोहोचण्यात ३०-३२ तास उलटून गेले. तो घरी पोहोचल्यावर हबकला. सगळे विधी आधीच पार पडले होते. ज्यांनी जन्माला घातले, वाढवले, शिकवले, अलोट निरपेक्ष माया केली त्यांनी असे एकदम निघून जाणे, त्यांची वर्षा-दोन वर्षात भेट न होणे, आणि त्यांचे शेवटचे दर्शनही न मिळणे याचे दु:ख त्याला इतके बोचले की तो पुन्हा अमेरिकेत जाऊन सगळं आवरून दीड महिन्यात भारतात कायमचा परत आला. आईच्या सोबत जास्तीत जास्त राहून तिच्या सहवासाचा अमूल्य ठेवा मला गमवायचा नाही असे तो गप्पांमध्ये म्हणाला. माझ्या एका दूरचा भावाच्या बाबतीत असेच घडले. आई-वडील वृद्ध आणि आजारी! हा भाऊ बायको-मुलांसकट बरीच वर्षे दुबईमध्ये! अचानक वडीलांनी जगाचा निरोप घेतला. पण केवळ सुनेचे सासूशी पटत नाही म्हणून सासू असेपर्यंत भारतात परत यायचे नाही हा तिचा ठाम निर्धार! आता त्याची आई खूप आजारी आणि जवळपास पलंगावर झोपूनच असते. तिच्यासाठी २४-तास नर्स, बाई वगैरे सगळं आहे पण जिवाभावाचं कुणीच नाही. तिची मुलगी तिची काळजी घेते आणि मुलगा परदेशात राहतो. बघा, मुलगा असणं चांगलं की मुलगी?

बरेच (मुख्यतः तेलुगु) लोकं दाटीवाटीने अमेरिकेत एका १बीएचके फ्लॅटमध्ये बेकायदेशीररीत्या ६-७ जणं राहतात. अतिशय गचाळ राहतात. त्यांचे भात-सांबाराचे पदार्थ ऑफीसमध्ये घेऊन तिथल्या कँटीनमध्ये ओंगळ पद्धतीने हादडतात. गोरे लोकं त्यांच्या त्या किळसवाण्या प्रकाराकडे बघून नाके मुरडतात आणि त्यांच्याविषयी तक्रारही करतात. हीच मंडळी स्थानिक (कृष्णवर्णीय) लोकांशी पैशाचे व्यवहार करतात आणि गुंडगिरीमध्ये क्वचित मरतातही. कसे ही करून अमेरिकेत रहायचे, अतिशय किळसवाणी काटकसर करून पैसे साठवत रहायचे हाच यांचा खाक्या असतो. भारतीय लोकं वस्तू विकत घेऊन, वापरून आवडली नाही म्हणून परत करण्यात ही अग्रेसर असतात.

ऑनसाईट ही संधी असते खरी पण सगळा सारासार विचार करून घेतलेली संधी जास्त आनंद देते. नुसत्याच पैशाच्या हव्यासाने घेतलेली संधी बर्‍याच वेळा पराकोटीच्या तडजोडी करण्यास भाग पाडते असे एक निरीक्षण आहे. मग त्यातून बर्‍याच इतर गुंतागुंती उद्भवतात. त्या टाळायच्या असतील तर फक्त पैसा ध्येय न ठेवता नीट विचार करून ऑनसाईटची संधी घेणे/ न घेणे जास्त श्रेयस्कर असे मला वाटते.

मैत्र's picture

26 Feb 2013 - 5:59 pm | मैत्र

खोटे रेझ्युमे, बेकायदेशीर एकत्र राहणे, गचाळपणे खाणे, कामात फेका मारणे
हे प्रकार अनेक प्रांतीय करतात. तेलूगू लोक म्हणजे कानफाट्या प्रकार झाला आहे.
अतिशय खोटेपणा करणारे, डोक्यात जाईल असा चिंधीपणा करून सहकार्‍यांना वात आणणारे, अत्यंत गचाळ घरे असलेले, अनेक इतर प्रांतीय - बिहारी/मराठी/उत्तर भारतीय्/मारवाडी/तमीळ इ. बघितले आहेत.
आणि अति बुद्धिमान्/एम एस / पीएचडी उत्तम प्रकारे केलेले भारतात अतिशय नामवंत ऑर्गनायझेशन्स मध्ये महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळणारे तेलूगू पाहिले आहेत.
अर्थात अमेरिकेचे वेड घेतलेले आणि अक्षरशः इतर देशांचं ऑनसाईट - युके / ऑस्ट्रेलिया सारखं सुद्धा नाकारून अमेरिकेचीच वाट पाहणारेही खूप तेलूगू पाहिले आहेत.
पण आयटी मध्ये कसलाही नाव ठेवण्याचा विषय आला की लोक बेधडक तेलूगू म्हणून ठोकून देतात.
भात सांबार गचाळपणे असंख्य दक्षिण भारतीय खातात. आणि व्यवस्थितही खातात.
तेलूगू थोडे खत्रूड असतात हे खरं पण जनरलायझेशन जास्त होतंय.

आजानुकर्ण's picture

26 Feb 2013 - 6:50 pm | आजानुकर्ण

अनेक तेलुगू सहकाऱ्यांचा अनुभव चांगला आहे.

नगरीनिरंजन's picture

27 Feb 2013 - 11:22 am | नगरीनिरंजन

सहमत आहे.
घाणेरडेपणा करणे, पै-पै वाचवून परदेशात गरिबीत दिवस काढणे, जाऊ तिथे घाण करणे यात कोणत्याही एका प्रांताच्या लोकांची मक्तेदारी नाही. सगळ्या प्रांतांमधले असे नमुने पाहिलेले आहेत.
ऑनसाईटवर असताना एका देशातून दुसर्‍या देशात जायला नेमकी अडचण होऊ नये म्हणून बायकोचा गर्भपात करून घ्यायला तयार असल्याचे सांगणारा महाभाग पाहिलेला आहे.

ऑनसाईटवर असताना एका देशातून दुसर्‍या देशात जायला नेमकी अडचण होऊ नये म्हणून बायकोचा गर्भपात करून घ्यायला तयार असल्याचे सांगणारा महाभाग पाहिलेला आहे.

काय भयंकर असतात लोक...

दादा कोंडके's picture

26 Feb 2013 - 6:20 pm | दादा कोंडके

नुसत्याच पैशाच्या हव्यासाने घेतलेली संधी बर्‍याच वेळा पराकोटीच्या तडजोडी करण्यास भाग पाडते असे एक निरीक्षण आहे.

हा हा.
आमच्या क्यांटीनमध्ये अगदी मांसाहारी पदार्थ नाहीत तरी सकाळी नाष्ट्याला अंड्याची पोळीतरी ठेवा अशी सुचना एका फोरम मध्ये केली होती. त्याच वेळी हॉलमधलली ९०% लोकं (बहुतांशी साउथ इंडीयन) इइइइ, यक्क म्हणून चिरकली होती. त्यापैकीच माझा एक सहकारी युयस मध्ये रेड मीट खाणार्‍या गोर्‍याच्या मांडीला मांडी लाउन रस्सम ओअरपत होता ते आठवलं. :)

ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू आणण्याची चढाओढ चालू असते असे नीरीक्षण नोंदवते. एकाने आणले की मग दर खेपेस येणारे लोक आणतातच. कशाकरता हा भुर्दंड व मस्कापॉलीश त्यांचे तेच जाणो.
_______________________
काहीजण नाईट क्लबला वगैरे कधीही मिळाले नाहीत ना मिळणार नाहीत अशा रीतीने जातात. आसपासच्या ऑनसाईट सहकार्‍यांच्या टोमण्यांवरुन ते लक्षात येते.

ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू आणण्याची चढाओढ चालू असते असे नीरीक्षण नोंदवते. एकाने आणले की मग दर खेपेस येणारे लोक आणतातच. कशाकरता हा भुर्दंड व मस्कापॉलीश त्यांचे तेच जाणो.

आयटीत याला चाटूगीरी म्हणतात. हा आयटीमधला प्रगतीचा महामार्ग आहे. एकवेळ प्रामाणिकपणे, उत्तम दर्जाचे काम करुन पगारवाढ किंवा ऑनसाईटला जाण्याची संधी मिळणार नाही. पण या वाटेने गेल्यास "प्रगतीची" हमखास हमी असते.

काहीजण नाईट क्लबला वगैरे कधीही मिळाले नाहीत ना मिळणार नाहीत अशा रीतीने जातात.

खरं आहे हे. स्ट्रीपर्स क्लबबद्दल पुढच्या भागात सविस्तर लिहिनच. नाईट क्लब आणि स्ट्रीपर्स क्लब बर्‍याच देशांत अधिकृत व्यवसाय आहेत. भारतात मात्र या गोष्टी मसाज पार्लर वगैरे नावांनी चोरीछुपे चालतात. त्यात पुन्हा रेड पडली तर दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये चेहरे लपवलेले फोटो छापून यायची शक्यता असते. त्यामुळे ऑनसाईटला जाणार्‍या ज्या पब्लिकला अशा गोष्टींमध्ये रस असतो ते "पुन्हा यायला भेटेल न भेटेल" अशा धारणेनेच नाईट क्लब आणि स्ट्रीपर्स क्लबला जातात.

चौकटराजा's picture

26 Feb 2013 - 9:32 pm | चौकटराजा

अरे वा ! स्ट्रीपर्स क्लब वगैरे ? आता कोलंबिया पिकचर प्रेझेंट्स ...महेश भट्स .. आय टी'ज आफ्रडायटी... स्टारिंग डेमी मूर...
असे काही बाही सुचायला लागले. धन्या तुझ्या या कादंबरीचे जागतिक हक्काचे काय ते बघ बुवा !

चिरोटा's picture

26 Feb 2013 - 10:43 pm | चिरोटा

आयटीत याला चाटूगीरी म्हणतात. हा आयटीमधला प्रगतीचा महामार्ग आहे. एकवेळ प्रामाणिकपणे, उत्तम दर्जाचे काम करुन पगारवाढ किंवा ऑनसाईटला जाण्याची संधी मिळणार नाही. पण या वाटेने गेल्यास "प्रगतीची" हमखास हमी असते.

आय.टी. हा व्यवसाय आहे.सांगितलेले प्रोग्रॅम न बोलता लिहिणे हा व्यवसायातला एक घटक आहे. ईतर नोकरी/धंद्यात असलेले अनेक घटक-मार्केटिंग्,विक्री,पोपटपंची आयटी.तही असतात.खाते/ग्राहक टिकवायचा तर तुम्ही algorithm कसा लिहिता ह्यापेक्षा आलेली वेळ कशी मारून नेता,ग्राहकाशी कसे जुळवून घेता ह्याला जास्त महत्व असते.कंपनी यशस्वीरित्या चालवण्यासाठी सर्व प्रकारचे लोक लागतात.

धन्या's picture

26 Feb 2013 - 10:59 pm | धन्या

खाते/ग्राहक टिकवायचा तर तुम्ही algorithm कसा लिहिता ह्यापेक्षा आलेली वेळ कशी मारून नेता,ग्राहकाशी कसे जुळवून घेता ह्याला जास्त महत्व असते

आयटी कंपन्यांमध्ये अल्गोरिदम इम्प्लिमेंट करणारे आणि ग्राहकाला गुंडाळून वेळ मारुन नेणारे वेगळे असतात. प्रकल्प पातळीवर हे काम ऑनसाईट कॉर्डीनेटर करतो. ऑफशोअर टीम प्रामुख्याने डेव्हलपमेंटचं काम करते. काही कारणास्तव ऑफ्शोअर टीमला काम वेळेत पुर्ण करणे जमले नाही. तर मग ऑनसाईट कॉर्डीनेटर ग्राहकाला खरी खोटी कारणे सांगून शांत करतो. यात त्याच्या "सॉफ्ट स्किल्स"चा कस लागतो.

मैत्र's picture

27 Feb 2013 - 1:54 pm | मैत्र

ऑनसाईट कोऑर्डिनेटर अथवा फंक्शनल कन्सल्टंट बरेचदा फेकाही मारतात पण
क्लायंट सांभाळणे, विश्वास निर्माण करणे हे कौशल्याचे आणि महत्त्वाचे काम असते.
विश्वास - ट्रस्ट असला की जेव्हा पुढे लहान सहान बग्ज येतात तेव्हा क्लायंट आकाश पाताळ एक करत नाही.
काही वेळा ऑफशोअर किंवा ऑनसाईट टेक टीम क्लायंटची गरज समजून घेऊ शकत नाही आणि सर्व फोकस हा तांत्रिक सोल्युशन वर राहतो. अशा वेळी क्लायंटचा प्रॉब्लेम समजून घेणे / शोधणे आणि तो तांत्रिक टीमला त्यांच्या गरजेप्रमाणे /माहितीप्रमाणे समजावणे हे अतिशय महत्त्वाचे असते. जर हे क्लायंट मॅनेजमेंट / रिक्वायरमेंट अ‍ॅनालिसिस आणि 'ट्रान्सलेशन' नीट झाले नाही तर भले भले प्रोजेक्ट फेल होतात.
फक्त ग्राहकाला गुंडाळून वेळ मारुन नेणारे एवढंच किंवा हेच काम नसतं.

शुचि's picture

26 Feb 2013 - 11:25 pm | शुचि

धागा आय टी चा आहे की अपत्यसंगोपनाचा तेच कळना झालय =))

चिरोटा's picture

26 Feb 2013 - 11:38 pm | चिरोटा

+१
बघ ताई हा ऑनसाईट आला,फेकून रिस्युमेवर भरजरी स्कील्स.
डॉलरचे पाठवले हे चेक्स भूवरी, त्यावरून डौलाने ये त्याची स्वारी.