मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एखाद्याची लायकी

सोत्रि · · काथ्याकूट
एखाद्याची लायकी म्हणजे काय? हा प्रश्न मला बर्‍याच दिवसांपासून पडला आहे. ही एखाद्याची लायकी नेमकी कशी सिद्ध होते आणि कोण सिद्ध करतो? म्हणजे मलातरी अजुन कळलेले नाही. खरेतर माझी स्वत:चीच लायकी अजुन सिद्ध झाली नसल्याने दुसर्‍याची लायकी काढायचा प्रश्नच उद्भवत नाही. एकदा पुण्यावरून मुंबैला येताना रात्री खूप उशीरा दादर स्टेशनवर, विरारला जाण्यासाठी, लोकलच्या तिकीट खिडकीवर तिकीट काढायच्या वेळी माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. तिक़ीट देणारा क्लार्क सुट्या पैशांसाठी हुज्जत घालत होता. बाजूच्या कोपर्‍यात एक एटीम मशीन होते आणि तिथला वॉचमन त्या काउंटरवरच्या क्लार्कशी मी यायच्या आधि गप्पा मारत तिथेच उभा होता. तोही जरा गमजेतच होता. त्याने उगाचच, "वरती त्या पाटीवर सुट्टे पैसे द्यावे असे लिहीले आहे ते सुध्दा वाचता येत नाही लोकांना, दिसतात तर सुशिक्षीत" अशी कमेंट पास केली (हिंदीत). माझ्या अंगाचा तिळपापड झाला. आधिच रात्रीचे 12 वाजत आले होते, प्रवासाने शिणलो होतो. त्यात त्याचा हा अगोचरपणा, माझा तोल गेला आणि मीही त्याला 'अबे XXX औकात मे रेह, समझा ना' वैगरे बोलून गेलो. नंतर कसेबसे तिक़ीट घेतले सुट्ट्या पैशावर पाणी सोडून. पण गाडीत बसल्यावर, थंड हवा लागल्यावर जरा शांत झालो आणि त्या वॉचमनला बोललेलं माझ वाक्य मला आठवून मला पश्चाताप होऊ लागला. त्याची अशी लायकी काढायचा मला खरंच अधिकार होता का? तेव्हापासून काही प्रश्न आजतागायत पडले आहेत. 1. एखाद्याची अशी लायकी काढायचा मला अधिकार आहे का? 2. एखाद्याची अशी लायकी काढताना माझी स्वत:ची लायकी सिद्ध झाली आहे हे कसे सिद्ध होणार? 3. एखाद्याला असेल स्वत:बद्दल पराकोटीचा अभिमान म्हणून मला त्याची लायकी काढायचा अधिकार प्राप्त होतो का? 4. असेल एखाद्याचे तोंड फाटके तर लगेच मलाही जीभ टाळ्याला लावून लगेच त्याची लायकी काढायचा अधिकार प्राप्त होतो का? ह्या प्रश्नांची उत्तरे इथे लायक असणार्‍यांकडून मिळतील अशी आशा आज जागृत झाल्यामुळेच हा काथ्याकूट...

वाचने 25623 वाचनखूण प्रतिक्रिया 49

अर्धवटराव Fri, 12/07/2012 - 00:17
>>ह्या प्रश्नांची उत्तरे इथे लायक असणार्‍यांकडून मिळतील अशी आशा आज जागृत झाल्यामुळेच हा काथ्याकूट... -- म्हणजे काय, तर प्रतिसाद देण्यापुर्वी आपलं थोबाड बघा आरशात... अशी भलती कण्डीशन का टाकता राव. 1. एखाद्याची अशी लायकी काढायचा मला अधिकार आहे का? -- नाहि 2. एखाद्याची अशी लायकी काढताना माझी स्वत:ची लायकी सिद्ध झाली आहे हे कसे सिद्ध होणार? -- नाहि होणार 3. एखाद्याला असेल स्वत:बद्दल पराकोटीचा अभिमान म्हणून मला त्याची लायकी काढायचा अधिकार प्राप्त होतो का? -- नाहि 4. असेल एखाद्याचे तोंड फाटके तर लगेच मलाही जीभ टाळ्याला लावून लगेच त्याची लायकी काढायचा अधिकार प्राप्त होतो का? -- नाहि पण या जगात वावरायचं तर चारही प्रश्नांचं उत्तर होकारार्थी धरुन चालल्याशिवाय गत्यंतर नाहि. (आगाऊ) अर्धवटराव

मिसळपाव Fri, 12/07/2012 - 00:29
आपली पातळी न सोडता त्या वॉचमनला सिंपली इग्नोअर कर पुढच्या वेळेला! अर्थात दर वेळेला हा उपाय लागू पडतो असं नाहि. (मला उत्तर देणं भाग पाडलंस. नाहितर "प्रतिसाद न देउन मी तुला अनुल्लेखाने तर मारलं नाहि ना?" याची बोच मला जाणवत राहिली असती!!)

शेखर काळे Fri, 12/07/2012 - 02:02
एखाद्याची लायकी सामान्यपणे इतर लोक ठरवतात. "तू काय लायकीचा आहेस मला माहीत आहे" ... "त्याची ती लायकीच नाही" .. "मला काय लायकीचा समजलास तू ?" ... वगैरे .. आता त्या चौकीदाराची स्वतःच्या दॄष्टीने जी लायकी असेल ती असो .. तुमच्या दॄष्टीने ती दीडदमडीची नव्हती. -शेखर काळे

पिवळा डांबिस Fri, 12/07/2012 - 02:21
वरील प्रसंगामध्ये, "कॉकटेलफेम सोत्रि रात्री खूप उशीरा पुणे-मुंबई प्रवास करत होते" ही माहिती अत्यंत महत्वाची आहे... कारण एकदा ती बात उमजली की मग, आधी त्यांचा तिळपापड झाला, मग तोल गेला, मग थंड हवा लागल्यावर ते शांत झाले, आणि सर्वात शेवटी त्यांना पश्चात्त्ताप झाला, हा घटनाक्रम सहज समजून घेता येतो!!!! ;) (सोत्रि, ह. घ्या!!)

श्रीरंग_जोशी Fri, 12/07/2012 - 02:28
एकदा पुण्यावरून मुंबैला येताना रात्री खूप उशीरा दादर स्टेशनवर तिकीट खिडकीवर तिकीट काढायच्या वेळी
नेमके कुठून कुठे जायचे होते आपल्याला?

In reply to by श्रीरंग_जोशी

पिवळा डांबिस Fri, 12/07/2012 - 02:38
अवो त्ये पुन्यास्नं म्हमईला आले. आता दादर ठेसनावरून जिथं कुटं त्यांचं घर आसलेलं उप्नगर आसंल त्याचं तिकीट काडत हुते ते!!! काय तुमच्यासारक्या जंटलमन मान्साला समदं उलगडून सांगावं लागतंय की!!! त्यापरीस आमच्यासारके पिवळा डांबिस बरे... :)

In reply to by पिवळा डांबिस

श्रीरंग_जोशी Fri, 12/07/2012 - 02:43
आमी ग्रामीन भागाकडली मानसं मुंबै कधी फारशी पायली न्हाय म्हनून असा घोटाळा व्हतो बघा... 'लोकलचं तिकिट' असा उल्लेख असता तर सोपं झालं असतं आमाच्यासाठी...

In reply to by श्रीरंग_जोशी

पिवळा डांबिस Fri, 12/07/2012 - 02:54
आता आमी तरी कुटं म्हमई पघितलीया? पन हितं मिपावर ल्वॉकं काय बोलत्यात त्ये आयकून आयकून शिकतो झालं!!! बाकी त्यांनी गावकल्ड्या लोकांसाटी 'लोकलचं तिकीट' आसं सपष्ट सांगाया पायजे हुतं खरं!! तितं आमी तुमच्याशी 'सहमत' (आसं बोलायची मिपावर जनरीत हाये म्हनं!!) :)

औदुंबर Fri, 12/07/2012 - 03:03
अ. वॉचमन ऐवजी तिथे एखादा उच्च दर्जाचा ऑफिसर उभा असता आणि त्याने हे उद्गार काढले असते तर तुम्ही त्याला शिव्या देऊन त्याची लायकी काढली असती का? की फक्त 'तुम्हाला मध्ये बोलण्याची गरज नाही' असं सभ्य शब्दात सुचवलं असतं? ब. आपण काय बोलले आहे याऐवजी कोण बोलले आहे यावरून रिअ‍ॅक्ट होतो का? क. आपल्या देशात एखाद्याची किंमत तो करत असलेल्या कामाच्या पातळीवरून ठरते का? वॉचमन, न्हावी, वेटर, सफाई कर्मचारी अशा लोकांना आपण नेहमीच आपल्याहून (पांढरपेशांहून) कमी लेखतो का? ड. वरच्या मुद्द्यात केवळ क्लास-प्रेज्युडिस आहे का त्याला जातीचं देखील एक अदृश्य परिमाण आहे? इ. वर काही लोकांनी 'वॉचमनची लायकी दीडदमडीचीही नव्हती' असं डिक्लेअर केलं आहे, त्याची बेसिस काय? फ. तत्वतः वॉचमनचं बरोबरच आहे का? सुटे पैसे द्यावेत असं लिहिलं असून सुट्ट्या पैशांवरून हुज्जत घालणे जंटलमनला शोभते का?

In reply to by औदुंबर

श्रीरंग_जोशी Fri, 12/07/2012 - 03:12
सुटे पैसे द्यावेत असं लिहिलं असून सुट्ट्या पैशांवरून हुज्जत घालणे जंटलमनला शोभते का?
सुटे पैसे द्यावेत ही विनंतीवजा सूचना आहे (गर्दीच्या वेळी वेळ वाचवण्यासाठी). दरवेळी प्रत्येकाकडे सुटे पैसे असतीलच असे नाही. जवळ सुटे पैसे नसतील तर आपण ते कसे देणार? सुटे पैसे देऊ न शकणे हा काही गुन्हा नाहीये. आपला देश तंत्रज्ञानात एवढा प्रगत असूनसुद्धा तिकिट काढण्यास केवळ रोख चलन का लागावे? गेल्या काही वर्षांपासून वाणसामनाचे दुकान, उपहारगृह या ठिकाणीसुद्धा क्रेडीट / डेबिट कार्डावरून बील चुकते करण्याची सोय असते. हिच सुविधा देणे २०-२१ वर्षांपूर्वी संगणकीकृत आरक्षणाची (संपूर्ण देशात कुठूनही कुठले) सोय उपलब्ध करून देणार्‍या भारतीय रेल्वेला जमू नये?

In reply to by श्रीरंग_जोशी

औदुंबर Fri, 12/07/2012 - 03:59
सुट्ट्या पैशांचा मुद्दा अवांतर आहे पण अगदी थोडक्यात लिहितो. ट्रेनच्या तिकिटाची किंमत ट्रेन चालवण्याच्या खर्चाच्या तुलनेत अत्यल्प आहे. क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शनमागे कार्ड कंपनीला ठराविक पैसे द्यावे लागतात. मासिक पासची सुविधा मायबाप सरकारने उपलब्ध करून दिली आहे. वर क्रेडिट कार्डवर तिकिटं द्यायला त्यांना परवडणार नाही, शिवाय रांगा दुप्पट लांब होतील ते वेगळंच (स्वाईप टाईम). प्रगत देशांतही खूप कमी किंमतीच्या ट्रान्झॅक्शनसाठी बरेच दुकानदार कार्ड अ‍ॅक्सेप्ट करत नाहीत. उपाहारगृहवाला कार्ड घेतो म्हणून आपण भेळवाल्याने कार्ड घ्यावं अशी अपेक्षा ठेवतो का? टॅक्सी = उपाहारगृह , लोकल = भेळवाला.

In reply to by औदुंबर

श्रीरंग_जोशी Fri, 12/07/2012 - 07:04
सर्वप्रथम स्पष्ट करतो की भारतीय रेल्वे कार्ड देयक स्वीकारते. या उदाहरणात उपनगरी रेल्वे सेवा स्वीकारत नसावी असे दिसत आहे. मी स्वतः २००६ मध्ये कार्ड वापरून तिकिट काढले होते तिकिट खिडकीवर जाऊन. थोडा अधिभार लावला गेला होता तो मी आनंदाने भरला. एवढेच नाही तर मी १५-१६ वर्षांपूर्वीसुद्धा इतर व्यक्तीला कार्ड वापरताना पाहिले होते. तेव्हा यांत्रिक पद्धत नव्हती कार्बनचा वापर करून कागदावर क्रेडिट कार्ड क्रमांकाची प्रतिमा उमटवण्यात येत असे. आता वळूया रोख रक्कम व कार्ड / इलेक्ट्रॉनिक देयक सुविधा यांच्या तुलनेकडे.
  • चलनाच्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडतो, कारणेः
  • चलन छापणे, त्याचे देशभर वाटप करणे, त्याच्या सुरक्षेचा खर्च व त्याच्या काळजीचा खर्च
  • एवढे करूनही छापलेली प्रत्येक नोट काही वर्षांत वापरायच्या योग्यतेची उरत नाही (रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांना बरेच लोक जुमानत नाहीत). त्यामुळे त्या किमतीचे चलन पुन्हा छापावे लागते म्हणजे वर लिहिलेला सर्व खर्च पुन्हा एकदा.
  • कितीही प्रयत्न केले तरी आपले शेजारी देश जवळ जवळ मूळ चलनाच्या दर्जाएवढा दर्जा असणारे खोटे चलन भारतात पोचवतात. त्याच्यामुळे इतर अनेक समस्या निर्माण होतात व अनेक निरपराध नागरिकांना झळ बसते.
  • रोख रक्कमच नाही तर धनादेश व डिमांड ड्राफ्टच्या वापरामध्येही अनावश्यक खर्च होतोच.
  • रोख चलनामुळे जागोजाग भ्रष्टाचार सहजपणे करता येतो.
या सर्वांवर परिणामकारक उपाय म्हणजे कार्डांचा किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर पैशांच्या देवाण घेवाणीसाठी करणे. बरेच ठिकाणी ग्राहकावर २.xx% अधिभार लावला जातो, काही ठिकाणी मात्र असे होत नाही. मी स्वतः कमवायला लागल्यावर सुरुवातीचे काही दिवसच रोख रकमेचा १००% वापर केला. त्यानंतर जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे मी कार्ड अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे खर्च केले (माझा वाणसामानाचा दुकानदार सुद्धा या माध्यमाने देयक स्वीकारतं असे). त्यासाठी आजवर हजारो रुपये माझ्या खिशातून अधिक गेले. पण देशाच्या संपत्तीचा गैरवापर टाळण्यात अमीबाएवढा का होईना मी माझा वाटा उचलला. अवांतर - महाराष्ट्रातले एक जगप्रसिद्ध मिठाईचे दुकान ज्याची अनेक लोक थट्टा करत असतात ते केवळ रोख रकमेद्वारेच बिलाची रक्कम स्वीकारत असे. तिथे कार्ड-देयकाबाबत विचारणा केल्यावर नकारात्मक उत्तर मिळत असे. सप्टेंबर २००८ मध्ये त्याचे कर्मचारी दुपारपर्यंत जमा झालेली रक्कम (जवळ जवळ ६ लक्ष रुपये) बँकेत पोचवत असताना हल्ला होऊन लुटली गेली. ईसकाळ वर बातमी प्रकाशित झाल्यावर अनेक जालिय वाचकांनी असुरी आनंद व्यक्त केला होता. त्या दुकानाने जर पूर्वीपासून कार्ड देयक स्वीकारले असते तर अनेक ग्राहकांचीही सोय झाली असती अन नाममात्र रकमेसाठी कुणी त्या कर्मचाऱ्यांवर हल्ला पण केला नसता. मी लहान असताना पाकीट / पर्स हरवल्याने किंवा चोरट्यांनी पळवल्याने अनेक लोकांचे अपरिमित नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. आज तसे झाल्यास बऱ्याच लोकांचे नाममात्र नुकसान होते कारण कार्डांचा वापर. आपल्या देशाने इतकी तांत्रिक प्रगती केली आहे की इतर कुणाशी तुलना करण्याचे काही कारण उरलेले नाही. येणाऱ्या काही वर्षांत किरकोळ भाजीविक्रेते, चाट भंडार, रिक्षा चालक हे लोक सुद्धा त्यांच्या चतुरभ्रमणध्वनीला जोडलेल्या कार्ड रीडरद्वारे देयक स्वीकारताना दिसतील असा मला विश्वास वाटतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

नगरीनिरंजन Fri, 12/07/2012 - 08:26
अत्यंत सहमत. आणि कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड हवे असेही नाही. कॅश कार्ड व्यवहारही तिकीटे देण्याची यंत्रे प्रत्येक स्टेशनवर लावता येतील. तसे केले तर या तिकीट कारकुनांच्या नोकरीवर गदा येईल त्यामुळे येणार्‍या प्रत्येक ग्राहकाशी अत्यंत अदबीने आणि अगत्याने वागणे त्यांच्या हिताचे आहे हे त्यांना कळत नाही.असो. बाकी जगात सगळ्यांची लायकी सारखीच असते असे वाटते.

In reply to by श्रीरंग_जोशी

विजुभाऊ Sun, 12/09/2012 - 14:28
चतुरभ्रमणध्वनीला जोडलेल्या कार्ड रीडरद्वारे देयक स्वीकारताना काही शंका? १) ही नक्की कोणती भाषा आहे. इंग्राठी की मंग्लीश कार्ड रीडर = ???? २) मट्ठभ्रमणध्वनी असू शकतो का?

In reply to by विजुभाऊ

मंग्रठी भाषा आहे ती चतुरभ्रमणध्वनी चे कार्ड मठ्ठभ्रमणध्वनीत वापरा फायदा होइल्,एक म्हणजे कोनताही प्रश्न अडनार नाही इंग्राठी की मंग्लीश की मंग्रठी सगळ सगळ समजेल

In reply to by औदुंबर

बन्या बापु Fri, 12/07/2012 - 07:20
प्रगत देशांतही खूप कमी किंमतीच्या ट्रान्झॅक्शनसाठी बरेच दुकानदार कार्ड अ‍ॅक्सेप्ट करत नाहीत.
प्रगत देशात म्हणजे कुठल्या देशात ?? अमेरिका, कॅनेडा, युके, जर्मनी, फ्रांस मधला माझा अनुभव कि १ डॉलर / युरो किमतीच्या वस्तूसाठीही कार्डचा वापर करता येतो. आणि जिथे कार्ड घेतले जात नाही तिथे "सुट्टे पैसे द्या" असा बोर्ड लावलेला नसतो.. तिथे १०, ५० डॉलरची / युरोची मोड मिळते.. जिथे मायबाप सरकार रेल्वेची रिझर्वेशन कार्डने करू देते मग परगावाहून आलेल्या प्रवासी मंडळीसाठी लोकलचे तिकीट देऊ शकत नाही का ? की मुंबईला येताना मासिक पास काढूनच मग लोकांनी यायचे का सुट्टे पैसे थैलीत भरून आणायचे? नाणेटंचाई आहे तर मार्ग काय ? उगाच "जंटलमन दिसतात xxxx" सारखे उखाणे घेण्यात काय हशील आहे ? अवांतर :- आमचा कॅल्गेरीचा पानवाला २ डॉलरच्या पानासाठी कार्ड घेतो ह्याची जाणीव होऊन डोळे पाणावले..

आपल्या राज्यात तर आपणच राजे असतो. त्यामुळे एक तर आपण असल्या तुच्छ लोकांकडे लक्ष देतच नाही. पण त्यातून कोणी बळच नडला, तर त्याला 'चड्डीत राहा ना भौ' असे ऐकवून मोकळे होतो. साला आपण आपल्या घरचे खातो आन दारच्या लोकांची बडबड कशाला ऐकायची ? आपल्याला जर कोणी "वरती त्या पाटीवर सुट्टे पैसे द्यावे असे लिहीले आहे ते सुध्दा वाचता येत नाही लोकांना, दिसतात तर सुशिक्षीत" असे ऐकवले असते, तर आपण त्याला 'काये ना दादा, मगाशी शेम तुमच्या सारखाच एक चिल्लर माणूस हात पसरत आला. आपले मन तर एकदम राजाचे आहे बघा; खिशातली सगळी चिल्लर काढली आणि त्याला देऊन टाकली. तुम्हाला नोट चालेल का?" असे ऐकवले असते.

तिमा Fri, 12/07/2012 - 11:44
पूर्वी एक फिल्मी गाणं लागायचं, ते आम्हाला, 'लायक नही, नालायक हूं मै' ! असं ऐकू यायचं. त्यातला नायक हा आम्हाला तेंव्हा नालायक वाटायचा. त्याच्याबद्दल चीड यायची. आता वाढत्या वयानुसार फक्त कींव येते. एखाद्याची लायकी ही त्याच्या वागण्यावरुन स्पष्ट होतच असते. त्याची वाच्यता करण्याची आवश्यकता नसते. कारण तशी ती केली की त्याच्यातला आणि तुमच्यातला फरक आणखीनच कमी होतो.

ऋषिकेश Fri, 12/07/2012 - 11:50
समोरच्याची बिंदास लायकी काढावी! फक्त आपली कोणी काढली की भडकू नका म्हंजे झाले! ;)

बन्या बापु Fri, 12/07/2012 - 12:06
सोत्री अण्णा : चीनी देशात काय प्रथा होती ? आपले अनुभव ऐकायला आवडतील... मागील पेय हिट होते म्हणून... आपल्या नवीन पेयासाठी नाव सुचवीत आहे: "लायकी नालायकी.." जाणकारांना आपण आमंत्रण द्याल ही अपेक्षा ... अवांतर : काही प्रतिक्रिया वाचून आज्जीचे बोल आठवले.." ऐट राजाची आणि वागणूक कैकाड्याची.. आपण पुस्तके लिहितो तेव्हा शिवराळ भाषा वापरू नये एवढा संयम नसेल तर.. कसले राजे..नावाचे कागदी घोडे.. "

In reply to by परिकथेतील राजकुमार

वपाडाव Fri, 12/07/2012 - 12:56
यालाच आम्च्याकडं "आ बैल मुझे मार" काहीसं असं म्हंतात??? बरीच शॉर्टफॉर्म्स सुद्धा आहेत. इ.व्य.स.क. (इच्छुकांनी व्यनितुन संपर्क करावा)!!!

मृत्युन्जय Fri, 12/07/2012 - 13:17
लायकी काढणे हा अपमान करण्याचा एक प्रकार असतो. कोणी आपला अपमान केला असेल तर आपन त्याचा अपमान करण्यात (तो मान देण्याच्या लायकीचा असेल तर) काहीच पिराब्लेम नाही. बाकी सोक्या लेका चावडीवर गप्पा हाणताना एकदम विवेकी असतोस आणि मग हे असे कसे काय करतोस? वो पिडाकाका सही बोल्ताय. ;) मारतय सोक्या आता. पळा पळा.

मला राहुल बोस ची पूजा बेदी ने घेतलेली मुलाखत आठवली. त्यात तिने राहुल ला मुंबई शहर आवडत नसल्याचे कारण विचारले. त्याने हाय शहरात सामाजिक विषमता असल्याचे कारण सांगितले. व उदाहरण देताना पानपट्टी वर जर गाडीतून एखादा इसम येऊन जर सिगरेट चे पाकीट विकत घेतले व त्याच्या कडे सुटे पैसे किंवा कमी पैसे असतील तर दुकानदार त्याला साब बाद मे दिया ,तो भी चलेगा ,असे सांगतो , पण हेच शेजारच्या झोपडपट्टी मधून एखादा व्यक्ती आला तर त्याला ही सवलत मिळत नाही. आपल्याकडे इंग्रजी बोलणारे किंवा एक नूर आदमी ,दस नूर कपडा असे बरेच निकष आहेत ज्यांची लायकी सहजासहजी काढली जात नाही. मागे मिपावर महिला दिनाच्या निमित्ताने एक लेख लिहिला हित त्यात ह्याच मुद्द्यांवर लिहिले होते. आपण एरवी हॉटेलात किंवा सिनेमासाठी अव्वा च्या सव्वा पैसे देतो मात्र अजूनही भाज्या खरेदी करायच्या वेळी आपण २ ते ३ रुपया साठी घासाघीस करतो. घरातील मोलकरीण पैसे वाढवून मागितले ,तर ते सहजासहजी देत नाही. आणि कितीतरी जण तिची फार लवकर शुल्लक गोष्टीवरून लायकी काढतात. श्रमाला आपल्याकडे महत्त्व नाही. त्यामुळे सोत्री तुम्ही जे वागलात जे तत्कालीन आद्य समाजातील चालीरीती ला सुसंगत वागणे होते.

राजेश घासकडवी Sun, 12/09/2012 - 07:25
सोत्रि, होतं असं कधीकधी. पुलंसारख्या पूजनीय व्यक्तिमत्वाला ते आजारी होते तेव्हा ‘‘सरकारच्या विरोधात बोलायचं होतं तर घेतली कशाला पदवी?—- या साहित्यिकांना काय कळतंय? उपयोग काय यांचा समाजाला?..या मोडक्या ‘पुला’कडून कोण ऐकणार उपदेश?.." असं बोलणं ऐकून त्यांचीही लायकी निघाली होती. मग त्या वॉचमनचं काय एवढं मोठंसं? 'तू कौन है, तेरा नाम है क्या? सीता भी यहॉं बदनाम हुई' असंच म्हणावं...

सुहास.. Sun, 12/09/2012 - 09:06
छान , काही प्रतिसाद वाचुन अंमळ मौज वाटली :) प्रश्न लायकी किंवा लायकी न काढण्याचा आहेच का मुळात? तु जे बोललास ते रागात बोललास , अन्यथा तो करत असलेल्या व्यवसायाशी नाममात्र देखील संबध नाही, होय की नाही ? :) त्यामुळे याबद्दल काथ्या कुटण्यात ही ( अर्थात सगळ घडल्यावर ;) ) अर्थ ही नाही. आता जेव्हा खरोखरच लायकी काढण्यात येते तेव्हा ( मोस्टली लॉकर रूम टॉक्स मध्ये ) बर्‍याच श्या गोष्टी, विषेशता: कमाई ( पुरूषांची ) , तो करत असलेला व्यवसाय , त्याच रहाणीमान ई.ई. वर अवलंबुन असते. मला चांगल आठवतय याच मिपावर एका सभ्य, सुशिक्षित आणि समाजसेवक म्हणुन मिरवणार्‍या एका व्यक्तीने मी " झोपडपट्टीचा आहे" म्हणून माझी लायकी काढली होती. असो. मला त्या वेळी त्याचा महा प्रचंड राग आला होता, पण नंतर मला कळुन चुकले की त्याला माहीतच नाही मी कोण आहे, काय करतो , म्हणजे माझ्या विषयी गैरसमज असावा. ज्याचे मी काहीच करू शकत नाही. वेळ ही निघुन गेली होती .सोडून दिले. आणि तु का ईतका विचार करतो आहेस ;) मस्त कॉकटेल्स आणि चावडी रंगात असताना कशाला विचारवंत बनतो आहेस ;)

In reply to by सुहास..

मालोजीराव Wed, 12/12/2012 - 17:24
आणि तु का ईतका विचार करतो आहेस मस्त कॉकटेल्स आणि चावडी रंगात असताना कशाला विचारवंत बनतो आहेस

चिगो Sun, 12/09/2012 - 22:45
स्पष्ट सांगायचं झाल्यास.. अर्धशिक्षीत / अशिक्षीत लोकांना खासकरुन, आणि बहूतेक सगळ्यांनाच त्यांच्यापेक्षा "वरच्यांची” चूक शोधायला आणि त्यावर टोमणे मारायला आवडतं.. तुम्ही पेटलात हे मान्य, पण त्या चौकीदारालाही शहाणपणा करायची गरज नव्हती.. बाकी वर म्हटल्याप्रमाणे, दुसर्याची लायकी काढलीच तर कुणी आपली काढलीच तर हलके घ्या..

दादा कोंडके Sun, 12/09/2012 - 23:03
त्याने उगाचच, "वरती त्या पाटीवर सुट्टे पैसे द्यावे असे लिहीले आहे ते सुध्दा वाचता येत नाही लोकांना, दिसतात तर सुशिक्षीत" अशी कमेंट पास केली (हिंदीत).
माझ्या अंगाचा तिळपापड झाला.
ठंड रखो सोत्रीजी दिसतात काहीजणं सुशिक्षीत त्याला काय करणार? ;)

बाबा पाटील Wed, 12/12/2012 - 12:58
मला हा अनुभव पुन्याचा अप्पा बळवंत चौकात आला आहे.एकादा ४० रु चे पेन घेतल्यावर त्याला सुट्टे नाही म्हणुन ५०० ची नोट दिली तर जहागिरदार लागुन गेला आहे म्हणुन अक्कल काढली होती,त्यानंतर मात्र खिश्यात सुट्टे नसतील तरी गाडीत मात्र कंप्लसरी शे दोनशे सुट्टे ठेउ लागलो......{अवांतर यापेक्षा ही अधीक अनुभव हवे असल्यास स्दाशिव पेठेत जावे,एकदम झक्कास अनुभव मिळतील.}

In reply to by बाबा पाटील

मोदक Wed, 12/12/2012 - 20:11
पाटील साहेब.. दुकानदाराला शिस्तीत विचारायचे, "कुलूप आहे का?" हा प्रश्न कळण्याइतका तो शहाणा असेल तर गपगुमान सुट्टे देईल. जर सुट्टे नसले आणि इकडून तिकडून आणायची तयारी नसेल तर तसले पेन दुसरीकडून विकत घ्यायचे. दुकानदाराने जास्ती माज केला तर सुट्टे आणायला लावून (यासाठी वेळप्रसंगी आणखी मोठ्या खरेदीचे आमिष दाखवायचे!) शेवटी काहीच विकत घ्यायचे नाही. सरळ सांगायचे, "तुम्हाला फायदा करून देण्यापेक्षा दुसरा दुकानदार बघतो." तुम्ही १० रू च्या पेनसाठी ५०० ची नोट काढली असती तर परिस्थिती वेगळी असती.. पण "किती रू च्या खरेदीसाठी किती पैसे 'सुट्टे पैसे' या कॅटगरीत बसतात" हे लॉजीक दुकानदार आणि गिर्‍हाईकावर आणि त्यावेळच्या परिस्थितीवर जास्ती अवलंबून असते. ----- वरील प्रतिसाद विशिष्ठ अशा गावातील पेश्शल एरीयातल्या दुकानदाराला लागू नसून कोणत्याही गावातील जास्ती माज करणार्‍या* दुकानदाराला लागू आहे. ----- * गिर्‍हाईकाला "जहागिरदार लागुन गेला आहे" म्हणणारा व त्याची "अक्कल काढणारा" दुकानदार हा माज करणारा समजला जाण्यास हरकत नसावी.

In reply to by मोदक

बाबा पाटील Wed, 12/12/2012 - 20:46
चालत हो मोदकराव्,मी फार वैतग करुन घेतला नाही,त्यापेक्षा या अनुभवावरुन सुट्टे पैसे जवळ ठेउ लागलो. (बाकी त्याचा माज उतरवायला जर मी माझ्या पाटीलकीवर असतो तर अवघड काम होवुन बसल असत..)

In reply to by बाबा पाटील

दादा कोंडके Wed, 12/12/2012 - 21:09
असे अनेक अनुभव आलेत. माझी पर्सनॅलिटीच अशी आहे की दुकानदार सगळं गिर्‍हाईक गेल्यावर केवळ भूतदया म्हणून मला काय हवंय ते विचारतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीच्या दुपटीपेक्षा जास्त रकमेची नोट नाहीना याची खात्री केल्याशिवाय दुकानाची पायरीच चढत नाही. अवांतरः तुम्ही चाळीस रुपयांचं पेन घेता/वापरता आणि तुमच्याकडे चारचाकी गाडी आहे हे समजलं. ;) -(सेलोग्रिपर वापरणारा आणि बसने प्रवास करणारा गरीब) दादा

बाकीच्यांचे माहित नाही. पण माझी काडीची लायकी नाही आहे, निदान जालावर तरी. आता हेच बघा, माझा अपमान झाला म्हणून आजवर कुणीही पेशल धागा काढला नाही कधी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

स्पा Wed, 12/12/2012 - 17:08
माझा अपमान झाला म्हणून आजवर कुणीही पेशल धागा काढला नाही कधी.
लोल्स्स्सस .. मान गये उस्ताद .

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

स्पा Wed, 12/12/2012 - 17:12
तु चावडीवर जायला लागलास कि तुलाही स्वताला "विवेकी" म्हणून आपल्याला शष्प माहित नसलेल्या प्रकारांबद्दलाही काड्या सारायची सवय होईल

In reply to by स्पा

सोत्रि Wed, 12/12/2012 - 18:54
"अरे वा! आमच्या चावडीची महती स्पाबाळापर्यंतही पोहोचली म्हणायचे. स्पा, बाळा, आता कसे बोललास. कारण 'विवेकी' असायलाच हवे. तसा 'विवेक' एकदा का अंगी बाणवला की मग आमच्या सोत्रिंनां फेसबुकवर गाठून सारवासारव करण्याच्या, एखादा कसा 'खास' मित्र आहे हे सांगण्याच्या, फोन करुन गैरसमज दूर करतो असे म्हणण्याच्या मर्कटलीला करण्याची 'शष्प' गरज भासणार नाही. काय? तर, येत जा चावडीवर नियमितपणे, बघ काही फायदा होत असेल तर", मंद हसत सोकाजीनाना. - (स्वतःचे दात घशात स्पाडून घ्यायची सवय नसलेला) सोकाजी :)

स्पा Wed, 12/12/2012 - 20:32
मिपावर काही विशेष घडत नाही म्हणून काड्या सारल्या.. असे "विवेकी" उत्तर ऐकून धन्य देणार्यांची बौद्धिक पातळी समजलि काही विशेष लिहिता येत नसेल. तर दोन पेग मारून स्वस्थ राहा आणि असले धागे काढत जाऊ नका , tyamule आमचा लेखन विराम. (दुसर्याच्या काड्या त्याच्याच ... सारणारा) -- स्पोकाजी बाम्बुसारुकार

In reply to by स्पा

सोत्रि Wed, 12/12/2012 - 20:55
काही विशेष लिहिता येत नसेल तर
बरं बरं! लेखाच्या विषयाशी आणि आशयाशी अतिशय सुसंगत असा प्रतिसाद देऊन पूर्णविराम दिल्याबद्दल धन्यवाद! :) - (मिश्कील हसणारा नालायक) सोकाजी

माणसाला एक अदभूत शक्ती मिळालेली आहे.या शक्तीने तो कोणतीही भूमिका साकारू शकतो. असामान्य माणूस ही शक्ती वापरत नाही.तो त्याची एकच भूमिका वठवतो. सामान्य माणूस प्रत्येक वेळी सोयीस्कर भूमिका वठवतो आणि स्वतःचा अहंकार सांभाळतो. वेळोवेळी वठवलेल्या भूमिका लक्षात राहणे कठीण असते.त्यामुळे त्याच्या वागण्यात विसंगती येते. दुसर्याची लायकी काढताना आपण स्वतःस त्याच्याहून श्रेष्ठ समजतो हे श्रेष्ठत्व फार काळ टिकवून ठेवणे कठीण होते.दुसरी भूमिका साद घालू लागते. आणि चूक केली या भावनेच्या मार्गाने आपली भूमिका बदलली जाते.

अप्पा जोगळेकर Sun, 12/16/2012 - 12:33
योग्यायोग्यतेच्या नियमांचा आणि नीतीचा बागुलबुवा करुन नैसर्गिकतेला खीळ कशाला घालायची. त्याने आगाऊपणा केला आणि तुम्ही शिव्या हासडल्यात हे योग्यच झाले. अत्यंत निरागस असे हे वागणे आहे. बाकी इतक्या साध्या प्रसंगात देखील काही जणांना अन्याय, सामाजिक विषमता वगैरे काय काय दिसले याचे कौतुक वाटते आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 12/20/2012 - 08:37
आरेय त्यानी तुमचा सुशिक्शित पणा काढला. मी तुमच्या जागी अस्तो तर हेच केल अस्त वरुन अजुन ४ शिव्या दिल्य अस्त्या. उगाचच शहाणपणा सहन करुन नाही घ्यायचा कोणाचाच. त्याला म्हणायच चड्डीत रहा. :).