मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यक्कू क्रूरसिंग..

गवि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
यकुविषयी ती घाणेरडी बातमी इथूनतिथून पहिल्यांदा कानावर आली तेव्हापासून सुरुवातीला डिनायलमधे जाणं पसंत केलं. नंतर वर्तमानपत्राची लिंक आणि त्यातला स्पष्ट उल्लेख.. आणि सगळीकडून येणारी कन्फर्मेशन्स यामुळे एकदम लटपटायलाच होत होतं. आता लिहिण्याइतपत बाहेर आलोय असंच नव्हे, पण लिहायला बसलो की आपण शब्दांशी खेळतो. मॅन्युप्युलेट करतो. या बिलंदरपणामुळे आपण लिहीता लिहीता, आकर्षक शब्दरचना करता करता सावरत सावरत आपल्या रोजच्या स्थिरस्थावर जगण्याकडे येतो. त्यामुळे या लिहिण्याच्या मार्गे तरी विचारसाखळीतून बाहेर येता येईल या आशेने लिहीतोय. पण अजूनही उजव्या कॉलममधे "हजर सभासद" मधे यकु दिसेल म्हणून नजर तिथे जातेच आहे. अजूनही संदेश (१ नवीन) असं पाहून क्लिक करु आणि "गवि.. हे वाचलंत का?" अशा टायटलने एखाद्या अत्रंग धाग्याची लिंक यकुने दिली असेल म्हणून डोळे तिथे फेरी मारुन येताहेत. यकुच्या युजींबद्दलच्या लेखांनी मी माझे सर्व स्केप्टिक गंड सोडून युजींच्या विचारधारेवर मनापासून विचार करायला लागलो होतो आणि स्वतःच्या अशा धारेला लागल्यासारख्या वागण्याने दचकलोही होतो. मुंबईत लोकलने प्रवास करताना एक छोटीशी भिकारी मुलगी यकुला दिसली. आपल्यालाही अशी भिकारी पोरं रोज दिसतात. पण तिला बघून यकु मात्र ढसाढसा रडला. असह्य होऊन त्याने मला फोन लावला आणि श्वास कोंडेपर्यंत रडला. समोरच्या क्षणाशी पूर्ण भिडून जगणारा आपला यकुच आहे.. यकुची मैत्रिण इजिप्तमधेही होती. इतक्या दूर असलेल्या आणि भेट शक्य नसलेल्या तिच्याशी असलेल्या अनाम नात्याची हुरहुर मला जाणवली होती. वाळूत यशवंत असे शब्द रेखाटत बसलेली तिची मुद्रा फोटोंमधे पाहून मला गलबललं होतं. जेव्हा माझी आई इजिप्तला टूरवर जाणार होती तेव्हा त्या मैत्रिणीला भारतीय साडी बांगडी आणि काय काय पाठवणार होता. ते आणूनही ठेवलं होतं बहुतेक. इजिप्तमधे सिव्हिल वॉर होऊन ते जाणं कॅन्सल झालं तेव्हा यकु काहीच बोलला नाही. मी मात्र मनात आणखी जास्त कळवळलो. त्या इजिप्तच्या अराजकामधे इंटरनेटसह तिचे सर्व काँटॅक्ट्स बंद झाले.. यकु काहीच बोलला नाही. मीही विचारायला धजावलो नाही. मिपामधे यकुचा बहि:स्थ प्राण आहे. मिपावरुन त्याचा आयडी ब्लॉक झाल्यावरही जुन्या आयडीने येऊन पहिल्या दमातच "मी मिपाशिवाय राहू शकत नाही" असं दिल खोल के कबूल करणारा यकुच आहे. रात्री दोन वाजता जडावल्या डोळ्यांनी मोबाईलवर मिपा लोड करणार्‍या माझ्यासारख्या व्यसनींना त्यावेळी मिपावर हमखास जर दिसणारा यकुच आहे. कोणताही लक्षवेधी धागा आला की त्याविषयी व्यनि करुन मला ढोसकलून जागं करणारा, निगुतीने इकडच्या तिकडच्या लिंका पेस्टवणारा यकुच आहे. मिपावरच्या धाग्यांमधे इतका दिलो जान से इन्व्हॉल्व होणारा यकुच आहे. "गुंजग्रामीचे दिवस" मधून गावाच्या धुळीत घेऊन जाणारा आणि रात्रीच्या भजनात गुंगी आणून देवळाच्या मंडपातच सर्वांना झोपवणारा यकुच आहे. "आमचा पाव एक गाव" मधे मिसळपावला शब्दशः एक गाव बनवून सर्वांच्या कल्पनेत उभं करणारा यकु आहे. शब्दाशब्दात किती प्रचंड ताकद असते ते जाणून किंवा न जाणता जबरदस्त ताकदीने शब्द लिहीणारा यकु आहे. मधेच एक सरकलेली पोस्ट लिहायला घेणारा यकु.. नव्यानव्या विचारसरणींना उत्कटपणे भिडणारा यकु.. हे काय सालं कोडं आहे ते उलगडलंच पाहिजे असं पोटतिडकीने म्हणणारा यकु.. आणि हो.. इतक्या सगळ्यानंतरही मला आजपर्यंत समोरासमोर कधीही न भेटलेला यकु.. यकुने मला मिपावर आणलं. मी प्रवासात होतो म्हणून माझ्या एका शब्दाखातर यकु माझ्याऐवजी "ब्लॉग माझा" स्पर्धेचा पुरस्कार घ्यायला त्याच्या गावापासून पूर्ण प्रवास करुन मुंबईत आला आणि माझ्याजागी शूटिंगला गेला, दिवसभर ताटकळूनही संध्याकाळी फ्रेश मनाने लोकलला लटकून केवळ माझं पुस्तक शोधायला मुंबईच्या दुसर्‍या टोकाला भरलेल्या पुस्तक प्रदर्शनात गेला. यकुच्या प्रतिक्रिया माझ्या ब्लॉगच्या वेळेपासून आत्तापर्यंत मला सर्वात जास्त आवडणार्‍या प्रतिक्रिया आहेत. मला आलेला पहिला स्वागताचा व्यनि यकुचा आहे आणि मला आलेले सर्वात जास्त व्यनि यकुचे आहेत. यकुच्या मिपा होमपेजवर आवडत्या लिखाणात पहिलं नाव माझ्या पुस्तकाचं आहे. माझ्या कोणत्याश्या लिखाणावर बेहद्द खूष होऊन यकुने मला एक आख्खी आरसी बॉटल लागू केली आहे. ती त्याच्यावर पेंडिंग आहे. यकु माझ्यासोबत मासे खायला सुरुवात करणार आहे. यकुला आधी इंदोरमधे आणि आता औरंगाबादेत माझ्यासोबत आणि इतर मिपामित्रांसोबत कट्टा करायचा आहे. त्याचे रिमाईंडर तो नेहमी नवे व्यनि काढून उत्साहाने पाठवतो. मी पुन्हा तीच चूक करतोय. लिखाण करण्याच्या भरात मी वर्तमानकाळावर उतरलोय. नुसतं वर्तमानकाळात लिहून आमचा तिकडचा यकु इकडे थोडाच येणार आहे ? ... एकदम भान येतं आणि यकुच्या जाण्याच्या धाग्यावर आलेल्या आणखी प्रतिक्रिया वाचतो. त्यात दिसतं की प्रत्येक मिपाकराला यकु अगदी तस्साच आणि तितकाच भिडला आहे. प्रत्येकाशी असंख्य धागे जुळवून मग एकदम उसवलेन हलकटाने. सगळी टोकं उघडी आणि तुटलेली राहिली.. . A यकुच्या पिकासावर चढवलेली ही एक कविता सापडली.. : B

वाचने 23170 वाचनखूण प्रतिक्रिया 69

किसन शिंदे Tue, 11/20/2012 - 11:59
प्रत्येकाशी असंख्य धागे जुळवून मग एकदम उसवलेन हलकटाने. सगळी टोकं उघडी आणि तुटलेली राहिली..
नका लिहू हो असं काही. प्रचंड त्रास होतोय वाचताना..

५० फक्त Tue, 11/20/2012 - 12:11
हे वाचुन असं वाटतंय की आपणच चुकतोय समोरच्याला समजुन घ्यायला, त्याच्या प्रत्यक्ष्य दिसणा-या रुपावर भाळतोय आपण, त्या देखाव्यामागं एक अनाम भिती, आकर्षण, दुरावा, दुस्वास, हट्ट असं काही असेल याचा विचारच करत नाही, जेवढे आहोत त्यापेक्षा अजुन थोडं जास्त संशयी व्हायला हवंय. उपाय नाही त्याशिवाय दुसरा. नाहीतर ही अशी लोकं आपल्याला फसवत राहतील आणि आपल्या आयुष्याचे धागे उसवत राहतील, मग ते आवरता आवरता आपल्या नाकी दम येईल. असो.

In reply to by श्रावण मोडक

वाहीदा Tue, 11/20/2012 - 13:59
अगर वोह बेवकुफ था, लेकीन हम और आप तो समझदार थे ना जनाब ? उसे जिंदगी से ताअरुफ करवाने के लिए नाकामियाब रहें हैं हम लोग ... :-( कैसी दोस्ती निभाई हमलोगोंने :-( ~ वाहीदा

आताच्या काळात इतके संवेदनशील राहणे हेच मुळात पाप आहे असे वाटू लागलंय. कितीही भावना मनात आल्या तरी व्यक्त न करता येणे किंवा लोक आपल्याला काय म्हणतील ह्या विचाराने त्या मनातच दाबल्या जातात आणि मग त्यांचा असा नको तेव्हा उद्रेक होतो. यकुचे तेच झाले असावे. अशी माणसे कितीही चांगली असली तरी त्यांना काळाबरोबर जुळवून घ्यायला अवघडच जाते.

धर्मराजमुटके Tue, 11/20/2012 - 12:32
यकुच्या आतापर्यंत मिपावर प्रकाशीत झालेल्या लेखांची यादी / दुवे एका नवीन धाग्यावर प्रकाशीत करता येतील काय ? त्यानिमित्ताने नवीन सदस्यांना त्यांची ओळ्ख होईल आणी जुन्या सदस्यांना त्यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा देता येईल.

इनिगोय Tue, 11/20/2012 - 12:39
जगताना सगळ्यांचा होऊन मनापासून जगला आणि मरताना एकटा एकटा होऊन मेला आपला यकु. यार यकु, तेव्हा तुला फोन करून बोलता यायचं, वेड्यासारखा वागू नको, सांगता यायचं. आता काय करू? पुन्हा बोलू तेव्हा हे बोलू, नवं वाचलं तर तुला कळवू, त्रास होतोय का अजून हे विचारू.. आणि एकदम सगळं ठप्प. संपलंच. हे सगळं वाचून आता तरी परत यावंसं वाटतंय का तुला? पोचतंय का काही?? का केलंस असं? प्रत्येकातलं काहीतरी मरून गेलं तुझ्यासोबत.

गणपा Tue, 11/20/2012 - 12:46
माझा त्याचा व्यनी-मनीच्या गोष्टीं करण्या इतका घनिष्टं संबंध नव्हता. पण यक्कु अधुन मधुन खवतुन, चेपुवरुन डोकावून जायचा. त्याचं हे असं अचानक जाणं माझ्या मनाला इतका चटका लावून गेलय तर तुम्हा सर्वांची काय अवस्था असेल हे मी पुरेपुर जाणतो. :(

In reply to by गणपा

स्मिता. Tue, 11/20/2012 - 14:34
अगदी असेच माझ्या बाबतीतही झाले. १-२ खरडी आणि धाग्यावरचा संवाद याखेरीज जास्त संबंध नसूनही यकुबद्दल कळकळ वाटायची. त्याचं लिखाण अस्वस्थ करून जायचं. मनात आशा होती की त्याच्या मनातलं हे वादळ लवकरच शमेल आणि तो शांत होईल. पण त्यानेच स्वतःला शांत करून टाकलं. काल ही दुर्दैवी बातमी कळल्यापासून कश्यात मन लागत नाहीये :( ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!

चिगो Tue, 11/20/2012 - 12:50
आज अत्यंत चीड येतेय स्वतःची.. त्याच्या भरकटलेल्या धाग्यांवर त्याची खिल्ली उडवणार्‍या प्रतिक्रीया वाचून करमणूक व्हायची, त्याची.. हळूहळू त्याचाशी होणार्‍या खव-गप्पा कमी केल्या/झाल्या, ह्याची.. कशाला, त्याच्या भरकटलेपणावरुन सुचलेल्या कवितेची.. सगळ्याचीच.. सॉरी दोस्ता, तूला समजून घेण्यात आमचीच संवेदनशीलता कमी पडली असेल कदाचित. तू तर साला, "एकदा मरण्याचा अनुभव घेऊन बघूयात" म्हणूनही कदाचित त्याच्या कुशीत झेपावला असशील.. :-( असो, आहेस तिथे तरी सुखात, आनंदात रहा..

प्रत्यक्ष ओळख जरी नसली तरी हे वाचून खूप त्रास झालाय... त्याचे लेख वाचताना काहीतरी वेगळेपणा जाणवायचा पण तो असे काही करून बसेल असे वाटलेसुध्दा नाही जेव्हा पासून ही बातमी समझली तेव्हापासून मन उदास आणी खिन्न झाले आहे :(

दिव्यश्री Tue, 11/20/2012 - 13:35
:( पण हा काही पर्याय होऊ शकतो का ? प्रत्येकालाच आपले दुख्ख खुप जास्त आहे असे वाट्त असते. जाणारा फक्त एकदाच जातो आणि मागे राहिलेले आप्तस्वकीय मात्र क्षणाक्षणाला रोजच मरत असतात त्यान्च्या आठवणीन्नी.........:(

वाहीदा Tue, 11/20/2012 - 13:56
मिपा के जरिये एक हसास तेहरीर लिखने वाले शख्स से मुलाकात होती रहीं .. हम अक्सर अपनी धुनमें गलत नजरियात किसी के बारेमें कायम कर लेते हैं .. 'मुर्ख होता तो' बडे आसानी से मोडक साहब ने कह दिया :-( काश खुदा उसका दिल पलट देता .. जिंदगी से तो वोह भी प्यार करता था ..बडा अजीब था वोह मगर जिंदगी के गहराईंकों समेंटें हुए था ..अगर वोह बेवकुफ था तो क्या हम में से कोई समझदार उसे समझाने में नाकामियाब न रहा ? :-( खुदा जिसको हसास दिल अता करता हैं, वोही यह सोच रख सकता हैं, आंसुओंका खिराजभी वही देता हैं .यकु, एक भिकारी बच्ची को देख कर फुट-फुट कर रो सकता था. खुदा हम सबकी सोचको पॉसीटिव्ह बनाये रखें ! MAY HIS SOUL REST IN PEACE ! Aameen !! (हसास दिल : Sensitive heart , तेहरीर : लेख ) ~ वाहीदा

नक्शत्त्रा Tue, 11/20/2012 - 14:05
ही बातमी समझली तेव्हापासून मन उदास झाले आहे...आताच्या काळात संवेदनशील राह नये. यकुच्या आतापर्यंत मिपावर प्रकाशीत झालेल्या लेखांची यादी / दुवे एका नवीन धाग्यावर प्रकाशीत करता येतील काय ? त्यानिमित्ताने नवीन सदस्यांना त्यांची ओळ्ख होईल आणी जुन्या सदस्यांना त्यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा देता येईल.

स्पंदना Tue, 11/20/2012 - 17:05
नको झालाय स्वतःचा विवेक. नको झालाय भिडस्तपणा . कुणी बोलो न बोलो, एक आई म्हणुन कळा सोसलेली मी इथुन पुढे कुनी फरफटतय अस वाटल तर जरुर बोलणार. यशवंतलाही सांगत होतेच, पण त्यान नका सांगु म्हण्टल म्हणुन दुरावा केला. पण काय्म त्यच्या खरडी वाचल्या. कायम त्याच काय चाललय ते पाहिल. समजत होत उमजत होत पण हरामी इगो मध्ये आला का काय कुणस ठाउक. शेवटचा संवाद दसर्‍याच्या शुभेच्छा अन त्याच आलेल ठसकेदार "ठ्यँक्यु" वर एक जोडीला हसरी स्मायली. जास्त कुणाच्या खवत नसते मी, पन तेव्हढी सेन्सिइटीव्हीटी आहे समजुन घ्यायची. सगळ्या तरुण पोरांना एकच साम्गण वयाच्या चाळीसाव्य वर्षी साधारण तुमचा तुमच्या जगण्यावर हक्क आहे. तोवर तुमच जगण हे आईबापासाठी. एव्हढ मोठ करुन घेतल्यावर, अशी त्यांच्यावर पाठ नका फिरवु. हेअसक्ल ओझ नका उचलायला लाउ. प्लिज.

In reply to by स्पंदना

प्यारे१ Tue, 11/20/2012 - 18:40
आपाताई, प्रत्येक व्यक्तीचं एक प्रारब्ध असतं. जेवढी वेळ लिहीलेली असते ना त्या उप्पर एक क्षण देखील 'जेल'मध्ये राहू नाही शकत. लगेचच दुसरीकडं रवाना व्हावंच लागतं. वाईट एवढंच की स्वतःच्या हातांनी असं मातेरं करुन घ्यायची गरज नाही. येणारा क्षण येतोच... तुम्ही हो म्हणा अथवा कितीही पळण्याचा प्रयत्न करा. जावं लागणार आहेच. मात्र असं 'पळण्याचा' प्रयत्न केला तर 'परत यावं' लागतंच. असो. हा वेगळा विषय आहे. सांगायचं एवढंच की स्वतःला अपराधी मानू नका...! ज्या त्या व्यक्तीच्या प्रारब्धानुसार जी ती गोष्ट घडत असते.

In reply to by स्पंदना

इनिगोय Tue, 11/20/2012 - 19:05
कुणी बोलो न बोलो, एक आई म्हणुन कळा सोसलेली मी इथुन पुढे कुनी फरफटतय अस वाटल तर जरुर बोलणार.
अपर्णा, अगदी हेच. यकुला एवढंतरी देणं लागतोय आपण. कोणी कितीही नाराज झालं, गप्प बस म्हणलं तरी आपण बोलायला हवं. यकुच्या बाबतीत बहुतेकांना हेच वाटतंय, थोडं आणखी सांगायला, बोलायला, खडसावायलाही, पाहिजे होतं. आपण सगळेच त्याला नॉर्मलला आणायला प्रयत्न करत होतो. अजून थोडा केला असता, तर याही वेळी सावरला असता. असता, नसता, निदान आपली बोच कमी झाली असती. याला सांभाळलं पाहिजे, असं जरा जरी कोणासाठी वाटलं, तर प्लीज बोला, तुम्हाला नाही जमलं तर कोणाला तरी सांगा. पण गप्प राहू नका. हसत हसत एखाद्याला 'वेडा आहे हा..' असं म्हणताना तो कदाचित खरंच कोणत्या तरी टोकावर उभा असेल या शक्यतेचाही विचार करा.

अशोक पतिल Tue, 11/20/2012 - 18:28
फार वाइट बातमी .... शेवटी मानवी मनाचा थांगच लागत नाही . एक उमदं व्यक्तिमत्व गेलं ... यकुच्या आत्म्याला शांती लाभो !

मनाचा रोग आधी आहे, शरीराचा रोग व्याधी आहे, पदाचा रोग उपाधी आहे आणि या तीनही रोगांवर औषध समाधी आहे. ज्ञानवंतांचा विश्वास आधी, व्याधी, उपाधी यावर नसतो, तर समाधीवर असतो. समाधी म्हणजे आपण स्वत: मृत्यूला दिलेले निमंत्रण असते. मृत्यू आणि समाधी यात फरक आहे. जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करणे म्हणजे मृत्यू आहे आणि जीर्ण वस्त्र टाकणे; पण नंतर नवीन वस्त्र धारण न करणे म्हणजे समाधी आहे. दिवंगत पत्रकार व सक्रिय मिसळपाव सदस्य श्री. यशवंत एकनाथ कुलकर्णी हे खर्‍या अर्थाने ज्ञानवंत होते.

अर्धवटराव Tue, 11/20/2012 - 20:08
यक्या, अरे असं कुठलं सुख-दु:ख असह्य झालं तुला, असली कसली घाई होती, कि इतक्या सगळ्या सुहृदांच्या मनाची हाक तुला थांबवु शकली नाहि... अरे फार थोड्यांना मिळतं रे असं भाग्य. लिमाऊजेटचा काहि पत्ता?? तिची हालत पण फार वेगळी नसेल. अर्धवटराव

श्रावण मोडक Tue, 11/20/2012 - 20:11
या जगात अशी काही मंडळी आहेत की ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना मदत करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी ती वास्तवात करावी. ती करता येत नसेल तर जरूर 'शिवाजी जन्माला यावा...' ही प्रार्थना करावी. पण हे सारे उद्योग आपल्यातच मर्यादित ठेवावेत. हे उद्योग, प्रामाणिकपणे बोलायचे तर कौन्सेलिंग, असे जाहीरपणे कधी करायचे, कधी नाही याची ज्यांना जाण नाही, त्यांनी एक माध्यम मिळाले आहे म्हणून त्याविषयी काहीही लिहू नये. कारण अशा जाहीर मांडलेल्या गोष्टींचे(ही) परिणाम त्या मंडळींवर होतात. ते सकारात्मक असतात (असाच काहीसा एक प्रकार मिपावरून झाला आहे, तो इथल्याच एका जबाबदार माणसाने अत्यंत जबाबदारीने करून घेतला आहे) किंवा नकारात्मक असतात. त्यांचे व्यवस्थापन करणे म्हणजे एखाद्या माणसाला समजावणे, रागावणे, दम देणे वगैरेच्या पलीकडे असते. नकारात्मक परिणामात ती माणसे अधिक टोकाकडे जातात, आणि पुढे सारेच अवघड होऊन बसते.

In reply to by श्रावण मोडक

आजानुकर्ण Tue, 11/20/2012 - 21:03
हे कौन्सेलिंग वगैरे प्रकार त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनीच केलेले बरे. अन्यथा रोगापेक्षा उपाय भयंकर अशी गत होऊ शकते.

दशानन Tue, 11/20/2012 - 23:59
देव सर्वांचे भले करो वा न करो... पण, थोडी विचार करण्याची बुद्धी व थोडे तारतम्य सर्वांना नक्की देवो.... खूप त्रास होतो जे मागे राहतात त्यांना! एका वर्षात दोन मित्र गमवणे हा तोट्याचा धंदा आहे राव!

मराठमोळा Wed, 11/21/2012 - 01:28
कधी नव्हे ते मिपा उघडलं आणि नेमका हाच धागा उघडला.. एक दोन मित्र होते असे जे गेले.. आता बरीच वर्षे झाली.. कुणी आयुष्यातून गेलं किंवा आंतरजालावरुन, मला नेहमीच वाईट वाटतं,इथे येऊन गेलेले किती जण जीवंत आहेत याची काही खात्री नाही, किती जणांना आहे? मेलेल्या माणसाविषयी वाईट बोलु नये म्हणतात, पण मेलेल्या माणसाला त्याने काय फरक पड्तो का? हे सगळं वाचायला तो नसतोच. या केस मधे त्याच्या मानसिक तणावामागे आंतरजाल आणि त्यावरचे लोक कारणीभूत आहेत का? हे मला पडलेले प्रश्न आहेत. दिवस रात्र आंतरजालामागे धावणार्‍या माणसाला वैयक्तीक आयुष्य जगण्यात किती स्वारस्य उरते हादेखील एक ज्वलंत प्रश्न आहे. फक्त लोकांना आठवण रहावी म्हणून आत्महत्या करणारा एक पॉपस्टार जीव होता कधी काळी.. आज किती लोकांना तो आठवतो? असो, मी वैयक्तीक रित्या आत्महत्या करणार्‍या लोकांना सहानुभुती देत नाही. कारण आयुष्य सगळ्यांना यातना देतं, त्यातून जो मार्ग काढतो तोच खरा माणूस असतो.. अन्यथा इथले बरेच आयडी असेच गेले असते.. (माझ्यासहित)

In reply to by मराठमोळा

५० फक्त Wed, 11/21/2012 - 10:48
'या केस मधे त्याच्या मानसिक तणावामागे आंतरजाल आणि त्यावरचे लोक कारणीभूत आहेत का? हे मला पडलेले प्रश्न आहे'' - अगदी हेच मला देखील विचारायचं आहे, यकुच्या इथल्या धाग्यावर गमतीत का होईना त्याला पाठिंबा देणारे प्रतिसाद होतेच, आता त्या प्रतिसादांनी त्याला ह्या मार्गावर पुढं जाण्यास जास्त उद्युक्त केलं असं म्हणता येईल. म्हणजे बादरायण संबंधानी का होईना त्याच्या या कृत्याला आपणदेखील जबाबदार आहोत असं वाटत नाही का ?

In reply to by ५० फक्त

मराठमोळा Tue, 11/27/2012 - 01:35
५०, इथे प्रतिसाद देणं भाग आहे, पण त्याची उत्तरे येतील की नाही याची खात्री नाही.. आणि अशा प्रश्नांची तर कधीच नाही.. आंतरजाल हे जे लोक निगरगट्टपणे सहन करु शकतात त्यांनाच हे जमते हो. यकुसारखे हळवे जीव बळी जातात इथल्या "फेक" आणि "फोल" लोकांच्या हाती.. माझा तर पुर्ण विश्वास होता की त्याचा बळी इथल्या सो कॉल्ड "मान्यवरांनी" घेतला. कारण इथले बरेच लोक हे स्वतःची लाल करायला येतात, त्यांना कुणाचा जीव गेला तरी काही सुख दु:ख नसते हो.. असले तरी ते लिखाण आणि टीआरपी पुरते.. मी आधीही म्हंटले होते आणि आजही तेच पुन्हा म्हणायला इथे आलो होतो (खरं तर बातमी कानावर आली आण मिपा उघडलं होतं), आयडी जीवंत आहे म्हणून. फोलपणा आणि खोटेपणा करु नका. आयडी आणि मी.. यात फरक आहे, पण बरेच लोक आयडी मधेच जगतात मग त्यातच निर्णय घेतात, वैयक्तीक आयुष्य उरतच नाही त्यांना. आंतरजाल हे कोणत्या कारणासाठी निवडायचं हे आपापल्या हाती आहेच, पण एखादा भरकटला तर त्याला केवळ स्वतःची लाल करण्यासाठी पाठींबा किंवा समर्थन देऊ नये एवढेच.

In reply to by मराठमोळा

बॅटमॅन Tue, 11/27/2012 - 02:20
माझा तर पुर्ण विश्वास होता की त्याचा बळी इथल्या सो कॉल्ड "मान्यवरांनी" घेतला.
अतिशय कैच्याकै विधान. असं लिहिताना २दा विचार करावा असं वाटलं नाही का आँ?
कारण इथले बरेच लोक हे स्वतःची लाल करायला येतात, त्यांना कुणाचा जीव गेला तरी काही सुख दु:ख नसते हो.. असले तरी ते लिखाण आणि टीआरपी पुरते..
हे असले गळेकाढू विधान करून काय मिळवलंत नक्की? की स्वतःचा सिद्धांत स्वत:च प्रूव्ह करताहात?

In reply to by बॅटमॅन

गवि Tue, 11/27/2012 - 08:00
शांत गदाधारी भीम..शांत. ते बरोबर म्हणताहेत. इथे आपण सगळेच व्यक्त होत असतो. व्यक्त होणे आणि लाल करणे यांना समानार्थी शब्द म्हणता येईल किंवा त्यातल्या फ़रकांवर कांद्याची सालं काढता येतील. हा लेख फ़ेक आहे हे पहिल्या काही ओळींत मी स्पष्ट कबूल केलं आहेच.
आता लिहिण्याइतपत बाहेर आलोय असंच नव्हे, पण लिहायला बसलो की आपण शब्दांशी खेळतो. मॅन्युप्युलेट करतो. या बिलंदरपणामुळे आपण लिहीता लिहीता, आकर्षक शब्दरचना करता करता सावरत सावरत आपल्या रोजच्या स्थिरस्थावर जगण्याकडे येतो. त्यामुळे या लिहिण्याच्या मार्गे तरी विचारसाखळीतून बाहेर येता येईल या आशेने लिहीतोय.
हा मूळ लेख.. त्यावर आलेल्या दु:ख दाखवणा-या प्रतिक्रिया.. यकुला दु:खापोटी वा अदरवाईज शिव्या घालणार्‍या प्रतिक्रिया. त्याच्या मृत्यूची जबाबदारी कोणावर द्यावी याच्या चर्चा.. यकुशी कोण कायकाय बोलले आणि त्याच्यासाठी कायकाय केले याचा कोणताही संदर्भ माहीत नसताना या "फ़ेक मिसळपाववरचे"(१) वाचन करुन मत लिहीलेल्या प्रतिक्रिया. आता राहवत नाही म्हणून बोलतो अशा पद्धतीचे फ़ेक नसलेले अगदी "रियल" प्रतिसाद.. ही सर्व त्याच एकाच "व्यक्त होण्या"ची रुपं. .. मी व्यक्त होणं हाच शब्द वापरतो. ...तेव्हा त्रागा करुन व्यक्त होण्याचा तुझा हक्क असला तरी उगीच त्रास करुन घेऊ नको. :) (१)- उपहासात्मक शब्दरचना. मिसळपावचा अपमान करण्याचा हेतू नव्हे.

In reply to by गवि

इनिगोय Tue, 11/27/2012 - 09:54
यकुशी कोण कायकाय बोलले आणि त्याच्यासाठी कायकाय केले याचा कोणताही संदर्भ माहीत नसताना या फ़ेक मिसळपाववरचे वाचन करुन मत लिहीलेल्या प्रतिक्रिया.
अगदी खरं. ज्यांनी आंतरजाल हेच आयुष्य मानू नका वगैरे वगैरे इथे लिहून ठेवलंय, त्यांनी यकुचं मिपापलीकडचं आयुष्य काय होतं, ज्याच्याबद्दल बोलतो आहोत तो 'यशवंत कुलकर्णी' (यकु हा आयडी नव्हे) हा माणूस तरी नेमका काय होता हे समजून घेण्याची तसदीही घेतली नसणार. नाहीतर एखाद्या वेबसाईटवर आयुष्य पणाला लावणार्‍यातला तो होता का, याचं उत्तर त्यांना सहज मिळालं असतं. इन अ वे, इथे त्याच्याशी (जाहीरपणे) झालेल्या चर्चा वाचूनच मनाला येईल तो निष्कर्ष काढण्याचा सोपा आणि बॅटमॅन म्हणतोय तसं स्वतःचाच सिद्धांत स्वतःच प्रूव्ह करणारा मार्ग स्वीकारून मोकळी झालीयेत मंडळी.

In reply to by इनिगोय

बॅटमॅन Tue, 11/27/2012 - 12:13
ज्यांनी आंतरजाल हेच आयुष्य मानू नका वगैरे वगैरे इथे लिहून ठेवलंय, त्यांनी यकुचं मिपापलीकडचं आयुष्य काय होतं, ज्याच्याबद्दल बोलतो आहोत तो 'यशवंत कुलकर्णी' (यकु हा आयडी नव्हे) हा माणूस तरी नेमका काय होता हे समजून घेण्याची तसदीही घेतली नसणार.
तंतोतंत!!! असो, गवि, आता मी शांत हाये :)

यकुच्या इथल्या धाग्यावर गमतीत का होईना त्याला पाठिंबा देणारे प्रतिसाद होतेच, आता त्या प्रतिसादांनी त्याला ह्या मार्गावर पुढं जाण्यास जास्त उद्युक्त केलं असं म्हणता येईल. म्हणजे बादरायण संबंधानी का होईना त्याच्या या कृत्याला आपणदेखील जबाबदार आहोत असं वाटत नाही का ?
भारतीय मानसिकतेला चमत्कारांच मोठं आकर्षण आहे. त्याच्या लेखनावरून जवळच्या लोकांचा त्याला सपोर्ट दिसत होता. त्याच्या इथल्या शेवटच्या पोस्टवर (सगळा धोका पत्करून) साधनामार्ग चुकीचा आहे असं सांगीतलं होतं. या अपग्रेडेशनमुळे जुन्या पोस्टस, प्रतिसाद, व्य. नि. काही म्हणता नीट दिसत नाही. ही वेंट टू द एक्स्ट्रीम. अध्यात्म हा मनाशी सामना आहे त्यात वेड लागू शकतं याची कल्पना आहे पण (ते त्याच्या वैफल्याच मूळ कारण असेल तर) साधकांनी `संसार आणि अध्यात्म' यांचा योग्य समन्वय साधून साधना करायला हवी असं वाटतं. दुर्दैवी घटना आहे.

ज्ञानराम Wed, 11/21/2012 - 13:07
साधकांनी `संसार आणि अध्यात्म' यांचा योग्य समन्वय साधून साधना करायला हवी असं वाटतं.>>> खरच , मी सुधा हा शेवटचा लेख वाचला होता , त्या वरून त्यांची मानसीकता समजत होती , पण, ही व्यक्ती इतकी स्वतःला त्रास करून घेईल अस खरच वाटल नव्हत. कुठल्याही गोष्टीचा अतीरेक झाला की त्याचा शेवट असाच काहीसा होतो. सकाळ पासून मनात यांचे विचार येतात . तसा कधी सबंध आला नाही , पण आज ब्लोग वर जाऊन पाहीले त्यांच्या , मनाला आणी बुदधीला विचार करायला लावणारे असेच काहीसे लेख आहेत ..त्यावर