मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

सोत्रि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत. “ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या. “अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत. “कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या. “मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत . “काय? आज चक्क मटा ? अहो, संध्यानंद बंद होईल की हो अशाने? खी. खी.. खी… ”, इति नारुतात्या. “डोम्बल तुमचं नारुतात्या, अहो एवढा सिरीयस विषय आणि तुम्ही दात काय काढताय?”, घारुअण्णा तणतणत. “बरं…बरं! त्यांना म्हणावे जळजळ पोहोचली बरं का, घारुअण्णा”, इति शामराव बारामतीकर. “अहो बारामतीकर, तुमच्या साहेबांचा ह्यात हात आहे. एवढा मोठा सामाजिक प्रश्न आणि तरीही तुम्ही साहेबांचीच बाजू कशी काय घेऊ शकता हो, ऑ? ”, घारुअण्णा अजून घुश्श्यात, “एवढा शेतीचा जाणकार माणूस पण त्यानेच सर्व कॄषीक्षेत्राची वाताहत करावी यासारखे दुर्दैव नाही ह्या देशाचे. आता नसती अवदसा सुचली आणि दारूचे परवाने देत सुटले आहेत तुमचे साहेब.” “अहो, ह्यात नेमका मुद्दा काय ते कळेल का? म्हणजे जर हे सत्तास्थान नागपुरात असते आणि एका ड्रायव्हरला एका कंपनीचा डिरेक्टर बनवून त्याला परवाने दिले तर आपला महाराष्ट्र, मद्यराष्ट्र बनता इथे रामराज्य अवतरले असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?”, बारामतीकर बरेचसे उपरोधाने आणि किंचित रागाने. “अहो पण साहेबांचा ह्यात ‘हात’ कसा काय असेल? त्यांनी तर हातातला ’हात’ हळूच काढून त्यावर घड्याळ चढवले ना? खी. खी.. खी…”, नारुतात्या तेवढ्यातही आपली विनोदबुद्धी पाजळत. “गपा हो नारुतात्या! अहो बारामतीकर, दारूने समाजाचे नुकसान होते, समाजविघातक आहे ही दारू आणि तिचा असा उदोउदो केला जावे जे काही पटत नाही!”, चिंतोपंत नागपूर विनाकारण चर्चेत आल्याने कळवळून जात. “हा! असे म्हणा की मग काहीतरी मुद्दा घेउन, उगाच राजकीय चिखलफेक करण्यात काय आहे?”, इति बारामतीकर. “बरं बुवा! दारूने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, होत आहेत आणि होत राहतीलच, त्यामुळे दारू समाजविघातक आहे ह्यावर काय म्हणणे आहे तुमचे? ”, नारुतात्या सिरीयस होत. “अहो नारुतात्या, कुठल्याही गोष्टीला तारतम्य असावे लागते की नाही, दारूचेही तसेच आहे, तारतम्य न पाळता दारू ढोसल्यास विनाश हा होणारच. पण त्यामुळे दारूवर सरसकट बंदी घालणे जरा आततायीपणाचे आणि मूर्खपणाचे लक्षण आहे, ह्यावर काय काय म्हणणे आहे तुमचे?”, बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका चर्चेत सामील होत. “भले शाबास! बहुजनह्रदयसम्राट, देशात जनतेला खायला अन्न नाहीयेय! त्यामुळे त्यांच्या दोन वेळेच्या अन्नाची सोय बघायची की दारुचा महापूर आणायचा? गरज कशाची आहे?”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत. “अहो तसे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत देशात, नव्हे एकंदरीतच जगात, म्हणून काय बाकीचे सगळे सोडून द्यायचे का?”, भुजबळकाका शांतपणे. “हे बघा बहुजनह्रदयसम्राट, वाईनर्‍या बांधुन कितपत समाजकल्याण साधले जाणार आहे ?”, चिंतोपंत जरा तडकून. “गरीबाला भाकर तुकडा,शेतकर्‍याच्या मालाला रास्त भाव, समाजकल्याण हे सर्व मुद्दे बरोबर आहेत पण त्यांचा दारु बनविणे आणि न बनविणे किंवा त्यासाठी परवाने देणे ह्याच्याशी थेट संबंध जोडणे म्हणजे जरा भावनिक किंवा सेन्टीमेन्टल होते आहे, व्यावहारिक नाही. व्यावहारिक पाताळीवरुनही विचार करून बघा जरा!”, भुजबळकाका ठामपणे . “वा रे व्यावहारिक, अहो संस्कृति नावाचा काही प्रकार आहे की नाही? आपल्या हिंदू संस्कृतीत हे बसते का?”, घारुअण्णा चिडून. “कोणत्या संस्कृतीच्या गप्पा सांगता आहात तुम्ही घारुअण्णा? रामायण आणि महाभारतातही दारू प्राशन केल्याचे दाखले आहेत, तेही एक प्रथा म्हणून प्राशन केल्याचे.”, भुजबळकाका हिरीरेने, “आणि बहुजनांच्या संस्कृतीचा तर तो आजही भाग आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये दारूचे स्थान मानाचे आहे.” “अरें देवा! विश्वेश्वरा बघ रे बाबा तुच आता. धर्मच बुडवायाचा प्रयत्न आहे हा, म्हणून तर घोर कलियुग आले आहे असे म्हणत होतो मी, ते काही खोटे नाही!”, घारुअण्णा हताश होत . “डोंबलाचे कलीयुग! अहो लोकांनी, दारु कशी पिउ नये व कशी प्यावी, हे समजावून घेतले की झाले, त्याचीच गरज फक्त, बास्स!”, भुजबळकाका. “अहो भुजबळकाका, हे तर दारूचे उदात्तीकरण झाले असे नाही का वाटत?”, चिंतोपंत. “नाही चिंतोपंत, उदात्तीकरण नाही वाटत मला तरी!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना. “सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून. “हो, हे वाटणे खूप सापेक्ष आहे असे मला वाटते. म्हणजे तुम्ही नेमके कसे आणि काय बघता ह्यावर ते अवलंबून आहे.”, सोकाजीनाना मंद हसत, “म्हणजे असे बघा, नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा दोन बाजू प्रत्येक गोष्टीला असतात. अगदी प्रत्येक मानवनिर्मीत आणि नैसर्गिक गोष्टीला सुद्धा. आपण त्या गोष्टीकडे कुठल्या बाजूने बघतो, म्हणजे आपली सापेक्षता काय आहे ह्यावर, काय दिसणार हे अवलंबून आहे. आता बघा, सूर्यही नैसर्गिक गोष्ट आहे पण त्यालाही एक बोचरी आणि मानवासाठी हानिकारक बाजू आहे!” “काय बोलताय काय सोकाजीनाना, हे काही पटत नाही ब्वा!”, नारुतात्या बुचकळ्यात पडून. “सूर्याच्या उष्णतेमुळे घाम येतो आणि घामामुळे शरीराला दुर्गंध येतो तसेच काताडीचा रंग काळा पडतो ही सूर्याची एक दुसरी बाजू आहे की नाही. पण त्यामुळे आपण सूर्याला झाकून टाकण्याचा वेडेपणा करतो? तर नाही. त्यावर उपाय शोधतो. तसेच आहे, जे भुजबळकाका म्हणत आहेत ते. अहो ज्यांना ती भावते ते पितात, ज्याला जी परवडते ती तो पितो. जे तारतम्य ठेवून पितात ते त्यातला आनंद लुटतात, ज्यांना त्यातली मर्यादा कळत नाही आणि पाळता येत नाही ते बहकले जातात आणि त्याचे दुष्परिणाम तेच भोगतात. त्यावर तुम्ही आम्ही कोण संस्कृतीरक्षक बनून पोलिसिंग करणारे? ज्याचे त्याला ठरवू देत की काय करायचे ते. राहीला मुद्दा ह्यातल्या राजकारणातला, तर तुमच्यात धमक आहे ते परवाना राजकारण थांबविण्याचे? मग उगा बोंबाबोंब कशाला?” “अहो, त्या दारुताही काहीतरी मजा असेलच की, उगाच नाही तो गालिब म्हणून गेला ‘ला पिला दे साकियां, पैमाना पैमाने के बाद’. फार कशाला आपले केशवसुतही म्हणून गेलेत ‘काठोकांठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळूं द्या ! ’ ” सोकाजीनाना मिश्कील हसत. “अहो घारूअण्णा असे डोळे फाडून काय बघता आहात, मी काही ‘एकच प्याला’ मागवणार नाहीयेय आता, चहाच हवा ब्वा आपल्याला! चला तर आपला चहा मागवा कसें!”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत. घारुअण्णांनी हसणे आवरात चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

वाचने 22809 वाचनखूण प्रतिक्रिया 128

मृत्युन्जय गुरुवार, 11/08/2012 - 19:12
१. ज्यांना भावले तेच पितात. ज्यांनी त्यांनी स्वतःचे लिमिट ठरवावे हे सगळे खरे असेल तर एका मर्यादेत अफूदेखील औषधाचे काम करते हे लोक अमान्य करतील काय? शेवटी आपले लिमिट ज्याचे त्याने ठरवावे असे म्हणुन अफू देखील राजमान्य करावी काय? २. अभय बंग दारुला विरोधा करत आहेत असे वाटत नाहित तर दारुच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी जो राजकीय सामर्थ्याचा अयोग्य वापर केला जात आहे त्याला त्यांचा विरोध आहेसे दिसते. यावर कोणाला आक्षेप आहे काय? ३. "शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न " असा दृष्टीकोन असेल तर सिगरेट च्या पाकीटावर वैधानिक इशारा का असतो? गुटख्यावर बंदी का आहे? वेश्याव्यवसाय अवैध का आहे? समलिंगी संबंध कायद्याने गुन्हा का आहे? हेल्मेटसक्ती का आहे? ४. वैचारिक पातळीवर विचार न करता व्यावहारिक पातळीवर विचार करुन निर्णय घेतले जाणार असतील तर सावकारी पतपेढी आणि लोकशाही सरकार यामध्ये फरक काय उरला? ५. गुटखा, सिगरेट, अफू या पदार्थांएवधी दारु अपायकारक नसल्याने त्यावर बंदी नसावी असे जर मत असेल तर त्याचा अन्वयार्थ "दारु कमी अपायकारक असली तरी अपायकारक आहे" हे अमान्य करता येइल काय? ६. पुराणांमध्ये व्यक्त केले आहे म्हणुन मद्यपान ग्राह्य ठरते काय? तसे असल्यास बहुभार्यापद्धती, अश्वमेधात सांगितलेले नियम, राक्षस / पिशाच्च विवाह, चातुर्वर्ण्य पद्धती इत्यादी इत्यादी आजच्या समाजास मान्य व्हायला हवे असा आग्रह धरता येइल काय? ७. दारुने झालेले फायदे आणि दारुने उद्ध्वस्त झालेले संसार याचा आलेख मांडायचा झाल्यास कुठला आलेख उंच असेल? ८. शेरलॉक होम्स मज्जा म्हणुन अफू ओढायचा. अफूमुळे त्याच्या बुद्धीला चालना मिळते आणि मरगळ दूर होते असा त्याचा दावा होता. अर्थात तो माफक प्रमाणात अफू घेत असेल हे उघड आहे. तर मग तो माफक प्रमाणात अफू घेउन त्याचा लुत्फ उठवतो / उठवायचा, एखादा अतिसेवन करत असेल तर तो ज्याचा प्रश्न असे म्हणुन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येइल काय? यापैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर काहीही आले तरी मला शष्प फरक पडत नाही. मात्र दारु अवैध ठरवली तर दारुड्या मित्रांबरोबर बसल्यानंतर जेवणापेक्षा चविष्ट असा जो चखना असतो त्याला मुकावे लागेल हे लक्षात घेउन अतीव दु:ख होते. शिवाय तिसर्‍या पेगनंतर (काही केसेसमध्ये पहिल्या घोटानंतरच) काही लोक पार्टीमध्ये जी बहार आणतात ती नाहिशी होइल ही जाणीत होते. आणी त्यामुळेच मी दारुंबंदीचा तीव्र निषेध करतो. साहेबांचा विजय असो.

इष्टुर फाकडा गुरुवार, 11/08/2012 - 20:55
"अभय बंग दारुला विरोधा करत आहेत असे वाटत नाहित तर दारुच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी जो राजकीय सामर्थ्याचा अयोग्य वापर केला जात आहे त्याला त्यांचा विरोध आहेसे दिसते. यावर कोणाला आक्षेप आहे काय?" >>>> हा मुद्दा महत्वाचा ! वाईन उत्पादन आणि निर्यात याला चालना मिळायलाच हवी. सध्या युरोपमध्येही 'न्यू वर्ल्ड' वाईन ची हवा आहे, ती भारताने वापरून घेतली पाहिजे. याचबरोबर अभय बंगांच्या इशार्याप्रमाणे वाईन उत्पादनाचे 'गृहोद्योगामध्ये' परिवर्तन होवू नये, त्याचा खरच बागायतदारांना फायदा झाला पाहिजे. भारतात वाईन संस्कृती नाही म्हणून आम्ही ती विकणारही नाही हे म्हणणे चुकीचे आहे. शिवाय इथे प्रत्येकाने गृहीत धरले आहे कि वाईन पिणारा प्रत्येक माणूस हा नव्याने दारू सुरु करणाराच असणार आहे. प्रत्यक्षात भारतात २० कोटी लोक व्हिस्की, रम आणि बिअर नियमितपणे पितात त्यातले काही जर वाईन कडे वळले तर पिणार्यांच्या तब्बेतीच्या दृष्टीने ते चांगलेच आहे. (अर्थात असे म्हणताना मी जबाबदार पिणार्यांना गृहीत धरतोय, आधी व्हीस्कीने मरत होता आता वाईन ने मरा ! असा अर्थ काढू नये.) दारूचे उदात्तीकरण होवू नये हे खरच पण सरसकट सगळ्याच दारू घेणार्यांकडे संशयास्पद, वक्रदृष्टीने पाहू नये हेही तितकेच खरे. इथले काही प्रतिसाद पाहता मला थोडंसं तसंच फिलिंग येतंय खरं :)

आनंदी गोपाळ गुरुवार, 11/08/2012 - 23:13
"दारु बद्दलच जर बोलायचे झाले तर मुस्लिम आक्रमणाखाली भारत शेकडो वर्षे भरडला गेला आणि त्यांच्या संस्कृतीने आपल्या संस्कृतीवरही आक्रमण केले होते. त्याप्रमाणे इस्लाममध्ये दारु निषीद्ध आहे. त्यामुळे त्या इस्लामी रेट्यामुळेही दारु संस्कृती लोप पावली असू शकेल. हे फक्त वानगी दाखल." हे असे सांगितले, तर बोलणे कुंठते. मग कुंथत येणारे उप प्रतिसाद बंद पडतात हे पाहून मजा वाटली. बाकी सोकाजीराव, तुम्हास अणुमोदन

In reply to by आनंदी गोपाळ

आशु जोग गुरुवार, 11/08/2012 - 23:24
त्या राजवटीत सगळ्याच वाइट गोष्टींना बंदी होती. इथे रामराज्यच अवतरले होते, असे नोन्दवावेसे वाटते. आता रामराज्य केवळ सौदी अरेबियामधे शिल्लक आहे. (दारु पिली तरी बुद्धी गहाण न टाकणारा) जोग

In reply to by आनंदी गोपाळ

"दारु बद्दलच जर बोलायचे झाले तर मुस्लिम आक्रमणाखाली भारत शेकडो वर्षे भरडला गेला आणि त्यांच्या संस्कृतीने आपल्या संस्कृतीवरही आक्रमण केले होते. त्याप्रमाणे इस्लाममध्ये दारु निषीद्ध आहे. त्यामुळे त्या इस्लामी रेट्यामुळेही दारु संस्कृती लोप पावली असू शकेल. हे फक्त वानगी दाखल." बाकी एखाद्या संशोधकाने लिहीले म्हणजे ते मानायला पाहीजे असे नाही. अनेक संशोधकांनी लिहीलेली संस्कृतीपर मुक्ताफळे वाचली की भरपूर मनोरंजन होते . बाकी जैन धर्म इस्लामपूर्वीचाच ना हो? मग त्यात देखील दारू वर्ज्यच आहे. तरीपण त्याला इतके अनुयायी इस्लामप्रमाणे कत्तली न करता कसे काय मिळाले याचे आश्चर्य वाटते. का त्या अनुयायाना माहीत नव्हते की जैन झाल्यावर मांसाहार करता येणार नाही, दारू पिता येणार नाही. शंकराचार्यांची अनेक चरित्रे वाचली आहेत त्यातही शंकराचार्यांनी दारू प्यायल्याचा उल्लेख कुठे येत नाही. जो काही आहे तो मंडनमिश्र यांनी शंकराचार्यांना शिव्या देताना तुम्ही पिवळी दारू पिऊन आल्यासारखे बोलत आहात असा निर्भत्सनापूर्वक येतो त्यामुले वरील इस्लामविषयक मताचा शहाजोगपणा ज्याना मानायचा आहे ते मानतात बाकीचे मानत नाहीत. :) शेवटी ज्याना समर्थन करायचे आहे ते करतात कशाही पद्धतीने. आणि त्यात योग्य अयोग्य ठरवणे कठीण आहे असे स्वतःच म्हणतात. असो, कमीत कमी इथे जे काही थोडे लोक विरोधी मते मांडत आहेत ते दारू अयोग्य अशा मतावर ठाम तरी आहेत हे चांगले. म्हणूनच एका प्रतिसादात आधीच म्हणून ठेवले आहे की आपला तो संतुलितपणा आणि इतरांचा तो दुराग्रह हे असे सांगितले, तर बोलणे कुंठते. मग कुंथत येणारे उप प्रतिसाद बंद पडतात हे पाहून मजा वाटली. कुंठते? का खुंटते? कारण कुंठते हा शब्द मती , बुद्धी अशा ठीकाणी वापरतात.

वीणा३ Fri, 11/09/2012 - 11:46
मुद्दा १ दारूच उत्पादन वाढलं किंवा दारू स्वस्त झाली तर व्यसनाधीन लोकांचं प्रमाण वाढेल - मला कुठल्याच दारूच्या किमतीची नीट माहिती नाही. पण जे काही आजपर्यंत ऐकलं आहे त्यावरून देशी दारूच्या दुकानात मिळणारी दारू आणि बियर सारखे काही प्रकार आत्ताही बरेच स्वस्त आहेत. त्यामुळे लोकांना व्यसन लागायची शक्यता आत्ताही तेवढीच आहे. माझ्या माहितीतील असंख्य लोकं वर्षातून एक दोन वेळा दारू पितात. अचानक मित्रांचं भेटणं झालं तर असावी म्हणून घरात दारूची एकतरी बाटली पडून असते ती कधीच मित्र जमाल्याशिवाय संपत नाही (आणि मित्रही सहसा वाढदिवस किंवा नवीन वर्ष अशा वेळीच जमतात). दारू कितीही मुबलक उपलब्ध असली अथवा स्वस्त असली तरी त्यांच्यापैकी कोणीही उठसूट दारू पिईल हि शक्यता खूपच कमी वाटते. मुद्दा २ दारूचा उत्पादन वाढलं तर धान्य उत्पादन कमी होईल. शेतीतली माहिती नाही, पण शतकरी पैसे देणारी पिकं घेणार हा सरळ व्यवहार आहे. उद्या गरीबाला भाजी भाकरी मिळावी म्हणून शेतकर्याने कापूस लावू नयेत किंवा फुलांची शेती करू नये असं अजून पर्यंत तरी कोणी म्हंटला नाही. मागे मी एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे (संदर्भ आठवत नाहीये) द्राक्ष उत्पादन करून जर वायनरीला देऊन फायदा कमावण फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच / बागायतदारांनाच शक्य आहे. म्हंजे छोटे शेतकरी अजूनही पारंपारिक पिकं घेतच राहतील.

प्रभाकर पेठकर Fri, 11/09/2012 - 11:51
काही काही प्रतिसादांमध्ये अगदी टोकाची मते वाचायला मिळाली. दारू म्हणजे गटारात लोळणे, संसार उद्ध्वस्त होणे, दारू म्हणजे मृत्यूला आमंत्रण. तर दारू पित नाही तो आयुष्यातील अत्युच्य आनंदाला मुकतो, क्षणभंगुर जिवनात 'प्रत्येक' गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. दोन्ही मते विरुद्ध 'टोकाची' आहेत आणि अगदी 'टोकाची' आहेत. तसेच, बापाने मुलाच्या हाती दारूचा ग्लास का द्यावा? तशी अपेक्षा का? तरूण वयात मुलं (आजकाल मुलीही) उत्सुकतेपोटी कधी कधी दारू चाखतात. 'मित्रांच्या आग्रहाखातर' हे तर फारच अशक्त कारण आहे. स्वतःच्या मनांत असल्याशिवाय 'मित्रांचा आग्रह' परिणाम साधत नाही. 'गरजेच्या' गोष्टी आई-वडिलांनी पुरवायच्या असतात, 'चैनी'च्या गोष्टी स्वकमाईतून उपभोगायच्या असतात. आई-वडील 'घेत' असतील (सोशल ड्रिंकिंग) तर त्यांनी वागणे बेताल होईल एवढी घेऊ नये. कुठल्याही प्रसंगात स्वनियंत्रण न गमवता घेतलेल्या मद्याने नकळत मुलावरही ते (स्वनियंत्रणाचे)संस्कार होतात. तसेच, ह्या विषयावर प्रसंगोपात्त चर्चाही व्हावी जेणे करून मुलांनी 'हा' आनंद उपभोगायचाच ठरवला (स्वकमाईतून) तरी त्यांना स्वनियंत्रणाचा लगाम कायम राहिल आणि ते भरकटणार नाहीत. फक्त बापच दारू पितो का? मी तर अनेक स्त्रियांनाही मद्यपान करताना पाहिले आहे. मला तर त्यात काही गैर वाटत नाही.( स्वनियंत्रण गृहीत धरलेले आहे). 'व्यसन' कशाला म्हणायचं? जेंव्हा एखाद्या गोष्टीवाचून राहवत नाही. चहाचं व्यसन, सिगरेट-तंबाखूचं व्यसन्, दारूचं व्यसन, वेश्यागमनाचे व्यसन ही जशी व्यसनं आहेत तसेच आध्यात्म्याचेही व्यसन असते, वाचनाचे व्यसन असते, ऑफिसच्या कामाचे व्यसन असते, क्रिकेटचे व्यसन असते, खादाडपणाचे व्यसन असते तर झोपेचेही व्यसन असते.कुठलेही व्यसन म्हणजेच 'स्वनियंत्रणा'चा अभाव. अशा प्रत्येक व्यसनाचे दुष्परिणाम असतात. ते त्या त्या व्यक्तीला तर भोगावे लागतातच पण कित्येकदा कुटुंबातील इतर व्यक्तींनाही भोगावे लागून संसार मोडण्यापर्यंत मजल जाते. स्वतःच्या मर्जीनुसार सुखाचा आनंद उपभोगताना तो कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुखाआड येणार नाही एवढे तारतम्य बाळगलेच पाहिजे. प्रसंगी स्वतःच्या मनाला मुरड घालून. तोही मुलांवर एक चांगला संस्कार असतो. हे दारू पिण्याचे समर्थन नसून, 'टोकाच्या भूमिका टाळाव्यात' हे ठसविण्याचा प्रयत्न आहे.

निश Fri, 11/09/2012 - 15:45
प्रभाकर पेठकरसर, जेव्हा त्रास होतो तेव्हाच टोकाची मत होतात. एक विचारतो , पाकिस्तानची सपशेल हार व्हावी आपण म्हणतो त्याबाबत बहुतेक भारत वासियांची मत टोकाची तिव्र आहेत. बहुतेक तुमचही असच मत असेल.कारण पाकिस्तानने आपल्याला फक्त त्रासच दिला आहे. भारताच भल नाही केल आहे. तसच दारु च आहे. माणसाच कल्याण करायची ताकद दारुत नाही तर माणसाला बरबाद करायची ताकत तिच्यात आजे म्हणुन तिव्र विरोध. व तो तसाच राहणार आहे. माझ्या साठी तरी पाकिस्त्तान व दारु दोनही एकच काम करतात त्रास द्यायच व माझी ह्या दोन्ही साठींची मत तिव्र व टोकाची आहेत. दोन्ही गोष्टि समुळ नष्ट झाल्याच पाहिजेत. कर तर ह्या धाग्यावर परत प्रतिसाद द्यायचा नाही अस ठरवल होत पण तुमच मत वाचल व राहवल नाही म्हणुन लिहिल. माझा ह्या धाग्याला राम राम

In reply to by निश

गणपा Fri, 11/09/2012 - 17:03
पाकिस्तान उपद्रवी आहे यात शंका नाही, पण आपला भारतही धुतल्या तांदळाचा नाही हे जाता जाता नमुद करावेसे वाटते. (भारतिय नौसेना दलाचे आयटीकरण करताना बर्‍याच आतल्या गोष्टी समजल्या होत्या.) :)

In reply to by निश

प्रभाकर पेठकर Fri, 11/09/2012 - 23:54
पाकिस्तानची सपशेल हार व्हावी
कुठे आणि कशात हार व्हावी? क्रिकेट मध्ये? मिडियाने स्वार्थासाठी तयार केलेली हवा आहे ती.
बहुतेक तुमचही असच मत असेल.
अजिबात नाही. माझं मत आहे भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्याइतकं सक्षम व्हावं.
भारताच भल नाही केल आहे.
भारताचं भलं(?) पाकिस्तानने का करावं? भारताकडे तेवढी ताकद नाही?
माझ्या साठी तरी पाकिस्त्तान व दारु दोनही एकच काम करतात त्रास द्यायच
मुळात तुलनाच चुकीची आहे. आणि तुम्हाला तुमचे काहिही मत बनवायचा अधिकार आहे पण तसेच तो इतरांनाही आहे, खरं आहे नं? साखरेने, मैद्याने, अति उष्मांक (हाय कॅलरीज)पदार्थांनी कोणाचं भलं केलं आहे? इतके प्राणी (गाई, म्हशी, डुक्कर, बकरा, कोंबडी, मासे इ.इ.इ.) मारून कोणाचं भलं झालं आहे? आणि झालं तरी स्वतःचं भलं होण्यासाठी मुक्याप्राण्यांचे जीव का घ्यावेत? गेली ४० वर्षं, स्वनियंत्रण ठेवून, मी कधी कधी मद्यप्राशन केले आहे, करतो आहे. माझं, माझ्या कुटुंबियांचं काय वाकडं झालं आहे? माझ्या सारखे कित्येक आहेत जे प्रत्येक बाबतीत स्वनियंत्रणाचा लगाम वापरतात. तुम्हाला काय त्रास झाला, जेणे करून तुमचे मत टोकाचे बनले, ते मी विचारत नाही. पण ज्यांना कांहीच त्रास झालेला नाही त्यांची मते इतकी टोकाची नाही बनली त्यात त्यांचा काय दोष?
तसच दारु च आहे. माणसाच कल्याण करायची ताकद दारुत नाही तर माणसाला बरबाद करायची ताकत तिच्यात आजे म्हणुन तिव्र विरोध.
बरबाद करायची कितीही ताकद तिच्यात असू दे, तिचा वापर करणार्‍याने स्वतःचे डोके गहाण टाकले नाही तर काय बिशाद आहे ती त्याला बरबाद करू शकेल. कुठल्याही स्वयंचलीत वाहनात (मोटरसायकल, कार, रेल्वे, विमान इ.इ.इ.) भयंकर संहारक शक्ती दडलेली असते पण त्या शक्तीवर नियंत्रण ठेवून आपण त्या त्या वाहनाचा वापर करून आनंद उपभोगतोच नं? रोजच्या जेवणात पोषणमुल्ये असतात पण म्हणून आपण स्वतःचा मेंदू न वापरता भरमसाठ खात सुटलो तर परिणाम काय होतो? वाढत्या वजनाने हृदयविकार होऊन तरूणपणी कर्ता पुरुष म्ररतो, कुटुंब उघडयावर पडते. मग जेवण वाईट ठरवायचे की स्वतः वर नियंत्रण न ठेवता भरमसाठ जेवण्याची सवय वाईट ठरवायची? हा स्वनियंत्रणाचा नियम आयुष्यात प्रत्येक गोष्टीला लावावा लागतो नाहीतर कुठलिही गोष्ट प्राणघातक ठरू शकते.

मी_आहे_ना Fri, 11/09/2012 - 17:07
अजूनही ज्यांच्यात एनर्जी बाकी आहे त्यांनी द्या आता १००वा प्रतिसाद बरं

In reply to by निनाद मुक्काम …

दारू पियून भयकथा वाचायला खूप मजा येते . ज्याला झेपते त्याने प्यावी हे जरी खरे असले तरी जगातील सर्वात जास्त मद्य सेवन करणाऱ्या पहिल्या १० देशात बहुतांशी रशिया व त्याच्या जवळपासचे देश आहेत. समाजवादी राजवटीत भुकेल्या पोटी दुख विसरण्यासाठी मद्य पिण्याची परंपरा येथे रुजली. आता सुबत्ता येऊन सुद्धा व्यसनाधीन माणसांचे प्रमाण तेथे खूप आहे. दारिद्र्य आणि व्यसनाधीनता हे समानार्थी शब्द आहेत. मूळ समस्येवर उपाय शोधायचा सोडून....

In reply to by निनाद मुक्काम …

आशु जोग Tue, 11/13/2012 - 00:12
>> समाजवादी राजवटीत भुकेल्या पोटी दुख विसरण्यासाठी मद्य पिण्याची परंपरा येथे रुजली. आता सुबत्ता येऊन सुद्धा व्यसनाधीन माणसांचे प्रमाण तेथे खूप आहे. खरेच येथे आता सुबत्ता आली आहे ? हे खरे आहे

In reply to by निनाद मुक्काम …

मध्यंतरी रशियामधे ब्रॅंडींग नसलेला व्होडका विकण्यास मनाई केल्याची बातमी वाचली होती. त्यातल्या अनेक कारणांपैकी पिणार्‍यांमधे व्होडका पिऊन पिऊन रक्तवाहीन्या अरुंद आणि कडक होऊन ४०-४५ व्या वर्षी मरणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली होती हे एक कारण होते असेही वाचल्याचे आठवते आहे. आणि ब्रँडेड व्होडका अनब्रॅंडेड व्होडक्यापेक्षा फार महाग असल्यामुळे कमी घेतला जाईल अशी रशियन सरकारची अपेक्षा असावी असे वाटते.

गवि Fri, 11/09/2012 - 17:51
आँ? चेटकीण, पाकिस्तान.. अयायाया... थांबा, धाग्याचं शीर्षक परत बघून येतो.. माझं मत आता सपशेल बदललं आहे. दारु खरंच वाईट आहे.

In reply to by गवि

चावडीवरच्या गप्पा म्हणल्यावर थोडं इकडं तिकडं होईनच ना...! >>> दारु खरंच वाईट आहे. धन्यवाद. विषयांतरामुळे का होईना चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणावं लागलं हे काय कमी आहे. [चला, पळा आता] -दिलीप बिरुटे ते

In reply to by गवि

सोत्रि Fri, 11/09/2012 - 19:02
माझं मत आता सपशेल बदललं आहे. दारु खरंच वाईट आहे.
गविंशी बाडिस! - (हसून हसून लोळणारा) सोकाजी

चाणक्य Tue, 11/13/2012 - 16:32
मयखाना बंद हो यह साकी के बस की बात नही तमाम शहर हैं दो चार दस की बात नही

मन१ Fri, 03/29/2013 - 17:48
आता चाललेली दारुवरील एक दंगल(http://www.misalpav.com/node/24149) वाचून गविंच्या ह्या भन्नाट प्रतिसादासाठी धागा वरती आणत आहे. आँ? गवि - Fri, 09/11/2012 - 17:51 आँ? चेटकीण, पाकिस्तान.. अयायाया... थांबा, धाग्याचं शीर्षक परत बघून येतो.. माझं मत आता सपशेल बदललं आहे. दारु खरंच वाईट आहे.

In reply to by मन१

श्रीरंग_जोशी Sat, 03/30/2013 - 00:20
सहमत!! मी सुद्धा माझ्याकडे नसलेला स्कॉच व उत्तमोत्तम वाइन्सचा साठा हत्तीच्या पायाखाली तुडवून नष्ट करायचे ठरवले आहे. त्यासाठी भाड्याच्या हत्तीचा कसून शोध घेत आहे ;-).

In reply to by श्रीरंग_जोशी

प्यारे१ Sat, 03/30/2013 - 00:32
हत्ती भाड्याचा का हवा ? शब्दांचे विविध अर्थ होतात म्हणून विचारले. -निरागस प्यारे हल्ली मुक्काम... माहितीये वो तुम्हाला!

उपास Fri, 03/29/2013 - 23:46
सोत्रि, छान जमवलाय चावडीवरचा संवाद.. बरेच महिने गायब असल्याने बरचं काही वाचायला मिळालं नव्हतं. एकंदर चर्चा वाचली, दुसरा धागाही ह्याच वळणाने गेला.. देजा वू, दुसरे काय :) सोत्रिंचा समाजप्रबोधन हा मिपावर लिहायचा उद्देश नसला (म्हणजे नसावा असा माझा आपला अंदाज..) तरी बर्‍याच पोटतिडकीने झालेय चर्चा :) पण काही म्हणा, घारुअणा रॉक्स ;)

तुषार काळभोर Fri, 04/11/2014 - 17:45
बर्‍याच दिवसांनी चेसुगु यांचेनाव स्व्गृही बघायला मिळाले. त्यावरून आत्मतिडकीने प्रतिसाद-उपप्रतिसाद देणार्‍या गवी-निश-सोत्रि-दादा कोंडके इ च्या या धाग्याची आठवण झाली व शोधून काढला...