मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हायटेक चितळे बंधू

आनंद भातखंडे · · जनातलं, मनातलं
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते. संध्याकाळी ५:३० वाजता चितळ्यांच्या दुकानात ताजी बाकरवडी येते अशी ताजी बातमी कानावर पडली आणि दुकाना पर्यंत जायला पाऊले चळवळ करू लागली. अवघ्या ५ मिनिटात मी सपत्नीक चितळे बंधूच्या कोथरूड शाखे समोर येऊन थडकलो. या आधी पण तिथे गेलेलो असल्याने दुकान परिचयाचं होतं. पण त्या दिवशी मात्र बराच फरक/बदल जाणवत होता. दुकानात शिरण्यासाठी जो दरवाजा होता तिथे बरेच अडथळे ठेवलेले दिसले. किंबहुना फालतू, वेळकाढू किंवा उगीच “चवी पुरत्या” येणाऱ्या गिऱ्हाईकाला मज्जाव करण्यासाठी केलेली ही तरतूद असावी. ते अडथळे पार करून आत शिरणार तितक्यात दुकानाच्या बाजूला असलेल्या बोळकांडी वजा जागेतून आवाज आला ” अहो शुक् शुक्, इकडे या …प्रवेश इथून आहे”. त्यातच दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाने आपली तर्जनी जमिनीला समांतर धरून वाटेकडे बोट दाखवले. मग लक्षात आलं पूर्वीचा मार्ग जो येण्या जाण्या साठी वापरला जायचा त्याचा आता एकदिशा मार्ग झाला होता. पुण्यातील शिस्तबद्ध वाहतुकीला अजून शिस्त लागावी म्हणून एखादा मार्ग अचानक पणे एकदिशा मार्ग घोषित करतात तेच सूत्र इथे पण लागू झालेले बघून मला जरा आश्चर्यच वाटले. कदाचित उगीच गिऱ्हाईकांची गर्दी वाढली असावी. मग परत त्या अडथळ्यातून बाहेर पडून त्या प्रवेश करण्याच्या जागे पर्यंत गेलो. “मग आधी नाही सांगता येत? जरा एक पाउल अजून पुढे पडले असते तर झालेला अपमान कुणी सहन केला असता? बाकरवडी विकत घ्यायला आलोय बाहेरून बरणीतले लाडू बघण्या साठी नाही” मी जरा तुसडेपणानेच विचारले. “इथे बरणीत लाडू ठेवत नाहीत. बरणीत सुकामेवा आहे” या त्याच्या थंड प्रतिक्रियेने मी सराईत पुणेकर आहे हे भासवण्याचा निरर्थक प्रयत्न फोल ठरला. आणि त्याच्या सकट सगळ्या दुकानाला कळले मी पुणेकर नसून ३/४ विजार घालून आलेला एक मुंबईकर आहे. आम्ही त्या प्रवेश दरवाज्यातून आत शिरणार तितक्यात या शुक् शुक् गृहस्थांनी परत थांबवले. मला वाटले इथे येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकाची झडती घेत असावेत असं समजून मी त्याच्या जवळ गेलो आणि कवायतीत करतात त्या प्रमाणे खांद्याच्या सरळ रेषेत हात करून उभा राहिलो. ते गृहस्थ तितक्याच थंडपणे म्हणाले “याची काही गरज नाही आणि अजून ही सिस्टीम चालू झालेली नाही” आणि त्याने माझ्या हातात चक्क एक पोस्टकार्डा किंवा शुभेच्छापत्रा पेक्षा थोडं मोठं प्याड वजा आयताकृती प्लायवूडचे फळकुट दिले. त्या वर कसली तरी स्क्रीन होती. तो जेंव्हा हीच अगम्य वस्तू माझ्या पत्नीला द्यायला लागला तेंव्हा मी म्हणालो “एकच पुरे आम्ही एकत्रच आहोत” परत कुणीही प्रतिप्रश्न करायचे धाडस करू नये अश्या ठसक्यात तो गृहस्थ म्हणाला “जो कुणी इथून आत जाईल त्याने हे बरोबर घेऊन जायचे आहे. आणि जाताना काउंटर वर परत द्या. काहीही खरेदी करताना आणि झाल्यावर हे बरोबर लागेल. तुम्हांला काहीही करायचे नाही फक्त मागितल्यावर हे कार्ड द्या”. एका हातात ते फळकुट ज्याला हे कार्ड म्हणतात ते घेऊन आम्ही उभयतांनी चितळे बंधूंच्या दुकानात एकदाचा प्रवेश केला. आमचा एक हात या फळकुटाने व्यापला होता त्यामुळे उरलेल्या एका हाताने जमेल इतकीच खरेदी करावी लागणार होती. गिऱ्हाईकांना कमीत कमी खरेदी करायला मिळावी, उगाच अनावश्यक वस्तू घेऊन पैश्याचा अपव्यय करू नये असा उदात्त हेतू केवळ पुण्यातच असू शकतो. दुकानात मस्त बाकरवडीचा घमघमाट सुटला होता. आत शिरल्या शिरल्या बाकरवडीच्या काउंटर जवळ गेलो. काउंटर वरचा माणूस एका मोठ्या क्रेट मधील बाकरवड्या पाव पाव किलो मोजून त्याचे हवाबंद पाकीट बनवत होता. मी पाव पाव किलोचे ४ पुडे बनवून देण्यास सांगितले आणि त्याने त्याचं तत्परतेने पुडे भरायला सुरुवात पण केली. मुंबईच्या सवयीने मी त्याला म्हणालो “आत्ता ५:३० ला जी ताजी येते तीच भर” हे वाक्य ऐकताच त्याने हातातले काम थांबवले आणि माझ्याकडे एकच पुणेरी कटाक्ष टाकला. मला वाटलं आता हा मला म्हणणार निघा …बाकरवड्या मिळणार नाहीत आणि वरून काहीतरी उपदेशाचे चार शब्द माझ्यावर फेकणार हे एखाद्या शेंबड्या पुणेकर पोराने देखील सांगितले असते. सौजन्य सप्ताह चालू आहे, कधी नव्हे ते येणाऱ्या गिऱ्हाईकाचा सन्मान करून त्याला दुर्मुख करू नये असा चेहेऱ्यावर सोज्वळ भाव आणून तो काउंटरवरचा पुणेरी दुकानदार मझी मंजुळवाणीने कानउघाडणी करू लागला “सकाळी आलेली बाकरवडी संध्याकाळी विकत नाही ….कारण ती विकण्यासाठी उरतंच नाही. इथे रोज सकाळ संध्याकाळी ताजा माल येतो. देऊ का? खात्री नसेल तर उद्या संध्याकाळी ५:३० वाजता क्रेट मोजायला या” सकाळच्या का संपतात म्हणजे कमी बनवता की विकल्या जातात असा खोडसाळ प्रश्न विचारण्याचे मुद्दाम टाळले आणि त्याला चार पुडे बांधून देण्याची विनवणी वजा आर्जव केलं. पटापट त्याने ४ पुडे भरले आणि म्हणाला “कार्ड द्या”. प्रवेश करताना दिलेल्या मोठ्या आयताकृती फळकुटाला कार्ड म्हणणं जरा हास्यास्पदच होतं. कार्ड कसलं ते कार्ड बोर्ड होता तो … तुमच्या दरवाज्यावरची पाटी लिहिता येईल इतका मोठा. “तुमच्या हातात आहे तेच कार्ड द्या. त्याच्या वर तुम्ही घेतलेल्या वस्तूंची नोंद होईल आणि पुढे याच कार्डचा उपयोग तुम्ही काय काय वस्तू घेतल्यात त्या प्रमाणे बिल बनवले जाईल. बिला प्रमाणे पैसे द्यावे लागतील.” मी परत एकदा त्या फळकुटाकडे बघितलं आणि ते “कार्ड” त्याला देता देता म्हणालो “अरे वा … एकदम अत्याधुनिक प्रणाली आहे तुमच्या कडे” त्याला बहुदा माझा खोचकपणा देखील कळला नाही किंवा माझं “प्रणाली” वगैरे पण त्याच्या डोक्यावरून गेलं. त्या सद्गृहस्थाने ते कार्ड माझ्याकडून खेचून घेतले आणि त्याच्याकडील मोजणी यंत्रावर ठेवले. त्यावर असलेली काही बटणे दाबून ते कार्ड मला परत दिले. मी त्या बाकरवडीच्या वासाने इतका अधीर झालो होतो की काउंटर सोडता सोडता मी बाकरवडीची एक पुडी फोडली. आणि त्यातली एक बाकरवडी उचलून तोंडात टाकणार इतक्यात बाकरवडी काउंटरवरचा इसम ओरडला “बिल बनवायच्या आगोदर इथे खाऊ नका.” आणि त्याच्या सुरात माझ्या बायकोने पण सूर मिसळला “तुला काही कळतं की नाही … लहान मुला सारखं इथेच काय पाकीट फोडून खायला सुरुवात केलीस?” दोन बोटांनी पकडलेली बाकरवडी तशीच पुडीत सोडून द्यावी लागली. पुढे लाडू, पेढे, बर्फी यांचा काउंटर होता. काय मस्त मस्त रंगांच्या बर्फ्या ठेवल्या होत्या … अगदी बघता क्षणी एक डिश भर घेऊन तिथेच फस्त कराव्याश्या वाटत होत्या. लाडूंची तर रेलचेल होती. मेथी लाडू, बुंदी लाडू, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू झालच तर डिंक लाडू … पण या सगळ्या लाडवांमधून “पौष्टिक” लाडूने माझे लक्ष वेधून घेतले. “हा पौष्टिक लाडू काय प्रकार आहे?” असे विचारताच त्या काउंटर वरील माणसाने पौष्टिक लाडू, त्याचे घटक, पौष्टीकतेचे परिमाण सविस्तर सांगितले. पाव किलो पौष्टीक लाडू घेतले आणि सराईतपणे कार्ड पुढे केले. परत ते कार्ड त्या मोजणी-नोंदणी यंत्रावर ठेवले गेले आणि त्या कार्डावर नोंद करून ते मला परत दिले. अजून बाकी काही चकणा आयटम नको ना असं विचारताच भर चितळ्यांच्या दुकानातच कुणाचाही मुलाहिजा नं ठेवता बायको म्हणाली “नको इथून नको. या पेक्षा चांगले आणि स्वस्त चकणे आपल्या डोंबिवलीला मिळतात तुझ्या त्या गुजराथ्याकडे मिळतात”. ती असं म्हणताच मी इकडे तिकडे बघायला लागलो आणि मेन काउंटर वरचा मालक माझ्या हावभावांकडे बघून मिश्किलपणे हसत होता. … अश्या काही प्रसंगावरून मला नेहेमी वाटतं की माझी बायको पूर्व जन्मीची पुणेकर असावी. ;) एका हातात सामान आणि दुसऱ्या हातात माझे आणि माझ्या बायकोचे कार्ड घेऊन मी सामानाचे पैसे देण्यासाठी शेवटच्या काउंटरवर आलो. कुठल्याही काउंटर वर गेलं की कार्ड पुढे करायचं हे माहीत झाल्यामुळे मी माझ्या हातातील दोन्ही कार्ड त्याच्या समोर धरली. त्याने त्यातले एक फळकुट घेतले आणि त्याच्या कडील मोजणी यंत्रावर ठेवले. ते बहुतेक बायकोच्या हातातले असल्याने त्या कार्डावर कुठलीही नोंद आढळली नाही. आधी मला वाटले वा …काहीच नोंद नाही म्हणजे काही तरी गल्लत झाली असणार आणि आता हा माल चकटफू मिळणार. “दुसरे कार्ड द्या” या मालकाच्या वाक्याने मी वास्तवात आलो. दुसऱ्या कार्डात सगळ्या नोंदी सापडल्या मालकाच्या चेहेऱ्यावर प्रसन्न भाव बघितले. किती झाले हे विचारायच्या आताच मालकाने त्याची तर्जनी संगणकाच्या पटलावर जिथे मोठ्या अक्षरात किंमत दिसत होती तिथे ठेवली. आणि त्याचं तर्जनीने बिल छापण्यासाठी असलेले बटन दाबले. छापील बिलाप्रमाणे रक्कम दिल्यावर मालक आदबीने म्हणाला “डोंबिवली मधून आलात का? बघा अजून काही नकोय ना?” मी म्हटलं “हो, डोंबिवलीहून आलोय. नको अजून काही नको” (आणि जरी हवं असेल तरी हा माणूस मला परत प्रवेश द्वारावर जाऊन फळकुट घेऊन यायला सांगेल”) “इथे प्लास्टिकच्या पिशव्या मिळणार नाहीत” अशी हुकुमावरून स्वरातील पाटी ठळकपणे दिसत असताना सुद्धा पिशवी आहे का? असे विचारले असते तर कदाचित त्याने बाकरवड्या काढून घेतल्या असत्या आणि मला रिकाम्या हाताने पाठवले असते या भीतीने मी पिशवी बद्दल विचारले नाही. पण काय आश्चर्य मालकांनी माझ्या कडून समान घेतले ते प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि ती पिशवी चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवून मला परत केली. मी परत एकदा ‘पिशवीचे किती झाले?’ हे विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही कारण एकच भीती ….ताज्या बाकरवड्या हातून निसटल्या तर???

वाचने 30320 वाचनखूण प्रतिक्रिया 203

शुचि Sun, 09/02/2012 - 02:30
आत्ता इतक्या उशीरा वाचले की हा लेख भातखंडे यांनी लिहीला आहे :(. मला त्यां लेख आवडतात. मोर्‍या बापट, मी आणी सुट्टी, डॉक्टर डॉक्टर हे लेख विशेष आवडले. पण हा विषय इतका ज्वलंत (पेटनशील) असल्याने , लेखकाचे नावच पहायला विसरले एकदम "डुक्करमुसंडी" मारून टीकात्मक प्रतिसादच देणे सुरु केले. असो ......... हा लेख आवडला नाही :( पण पुलेशु.

In reply to by शुचि

आनंद भातखंडे Wed, 09/05/2012 - 12:49
हा हा हा .... बऱ्याच जणांनी डुक्करमुसुंडी, धडक, चापट्या, चिमटे काढून झालेले आहेत. पण मज्जा वाटली असे टीकात्मक प्रतिसाद वाचून.

पक्या Sun, 09/02/2012 - 13:02
लेखनशैली आवडली. चितळे हे नाव न लिहिता लेख लिहिला असता तर वेगळ्या प्रतिक्रिया आल्या असत्या. मी एक पक्का पुणेकर असूनही सांगू शकतो की लेख चांगला जमला आहे. काही लोकांनी एकच दृष्टिकोन ठेवून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्यारे१ Sun, 09/02/2012 - 18:45
काल प्रतिसाद टाकायचा होता तो टाकताना मिपा गंडलं....! आज प्रयत्न करतो. "नेहमीचा यशस्वी ट्यार्पी खेचक धागा विथ नेहमीचेच यशस्वी कलाकार नि नकलाकार!"

मृत्युन्जय Mon, 09/03/2012 - 10:51
कुछ जम्या नही. विनोदी धाटणीचा लेख आहे आणि त्यातील मांडणी उत्तम आहे याबद्दल शंकाच नाही. पण मूळात प्लॉट थोडा कच्चा असल्याने एकुण अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही. हेकट , तिरकस, कुजकट पुणेरी दुकानदार अशी प्रतिमा न तयार होता एका थोड्या सरकलेल्या, पुर्वग्रहदूषित, आगाऊ चिडचिड्या, अडाणी आणि किरकिर्‍या ग्राहकाशी सौजन्याने वागणारा दुकानदार अशी प्रतिमा डोळ्यासमोर तयार झाली. त्यामुळे मोठाच भ्रमनिरास झाला. बाकी लेखकाचे बाकीचे लेखन बघता ते याहुन चांगले लिहु शकतात याची खात्री आहे. अवांतरः हॅप्पी कॉलनीजवळील चितळेंच्या दुकानात बर्‍याचदा जाणे होते. दुकानाचे मालक अतिशय सौजन्यशील आहेत. ग्राहकांशी अतिशय व्यवस्थित आणि हसतमुखपणे बोलतात. इतका चांगला दुकानदार पुण्यात मिळणे हे संध्याकाकाळी ६.३० वाजता मुंबईत लोकलमध्ये घामट माणूस शेजारी उभा नसण्याइतकेच अवघड आहे असे नम्रपणे नमूद करु इच्छितो. माझा चितळ्यांशी आणि कर्व्यांशी काही संबंध नाही (एक ग्राहक - दुकानदार हा संबंध सोडुन ) परंतु केवळ लेखाचा लहेजा लक्षात घेउन (बरीच अनुकुल स्तुतिसुमने असुनदेखील) प्रतिकूल मत बनवु नये यासाठी हा प्रतिसाद(अवांतर)प्रपंच.

In reply to by मृत्युन्जय

हेकट , तिरकस, कुजकट पुणेरी दुकानदार अशी प्रतिमा न तयार होता....
आयला, म्हणून पुणेकर चिडले आहेत होय ? पुढील वेळेस बरोब्बर प्रतिमा तयार करायला सांगूया लेखकांना. काय म्हणता ? ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय Tue, 09/04/2012 - 10:21
व्हय ना राव. तेवढं वाइच जमवा म्होरच्या टायमाला. कस आहे ना की " माझा अनुभव " या सदरात काय पण वाट्टेल ते लिह्यलं तरी कोणाच्या बापाला कळतय? फेकुन द्यायच बिन्धास्त काहिही. थोडी करमणुक झाली म्हणजे झाले. काय? ;) बाकी पुणेकर चिडत नाहित हो. त्यांचा सात्विक संताप होतो.

गवि Mon, 09/03/2012 - 13:36
थांबा. पुणे, मुंबई, अस्मिता, दुकानदारांचे औद्धत्य, टेक्नॉलॉजी वगैरे यांच्याशी अजिबात संबंध नसलेला प्रश्न विचारु इच्छितो. पुण्यात येऊन अमुक एक वेळ अजिबात न पाळताही इथेच बसल्याजागी (पक्षी मुंबई /ठाणे) या बाकरवड्या मिळू शकतात. (दोनतीन दिवसांपूर्वीच्या प्याकिंग डेटने). इथे दोन प्रकारच्या बाकरवड्या चितळे नावाने मिळतात. एक लांबट किंचित कमी खुटखुटीत खालीलप्रमाणे ट्रे टाईप पॅकमधे असते. चवीला ठीक. : याला चितळे बंधू असं नाव आहे. दुसरे पॅकेट म्हणजे साधे प्लॅस्टिक बॅगसारखे असते. त्याचा फोटो मिळत नाहीये. ती बाकरवडी लहान गोल आणि खुटखुटीत असते. वाळक्या पोळीसारखं कव्हर असतं. ही चवीला जरा कुरकुरीत. यावर नुसते "चितळे बाकरवडी" असं लिहिलेलं असतं. बंधू नव्हे. ही देखील तशी चांगली असते पण अनेक स्थानिक दुकानांतून मिळणार्‍या "बटर बाकरवडी", "मिनी बाकरवडी' यांच्या इतकीच.. पूर्वी कोणीतरी इथेच मिपावर मला "बंधू"वाली बाकरवडी हीच ओरिजिनल असं सांगितलं होतं. पण तरीही घोळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा कोणीतरी क्लॅरिफाय करावे. या दोन्हीतल्या नेमक्या कोणत्या बाकरवडीसाठी मूळ दुकानी रांगा लागतात आणि जीव टाकून लोक ती मिळवतात ते जाणून घ्यायचे आहे.

In reply to by गवि

रेवती Mon, 09/03/2012 - 17:50
तुम्ही चित्रात दाखवलेली बाकरवडी हिरव्या देशातही मिळते. त्यावर दिलेली 'इंस्त्रक्षणं' फॉलो करून मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास बर्‍यापैकी खुटखुटीत लागतात. आमच्यायेथे पोहोचेपर्यंत त्या 'अँटीक'ही पदवीप्राप्त करत्या झालेल्या असतात. त्याच्या किंचित जुना वास जाण्यासाठी गरम केल्यास बरी चव येते. नुसतं 'चितळे' छापलेल्या प्याकिंगबद्दल शंका आहे.

In reply to by गवि

बाळ सप्रे Tue, 09/04/2012 - 11:29
पण ताज्या पॅक केलेल्या बाकरवडीची सर या पॅकमधील बाकरवडीला नाही. ताजी बाकरवडीदेखिल त्याच दिवशी (उरली तर जास्तीत जास्त दुसर्‍या दिवशी खावी) कारण त्यानंतर तो खुसखुशीतपणा रहात नाही कितीही हवाबंद ठेवली तरी..

In reply to by गवि

गवि Wed, 09/05/2012 - 06:35
सापडली दुसरी चितळे बाकरवडी. दुकानातून आणून आता फोटो काढला. ही वरिजनल आहे का हे कोणी सांगेल का? मी आजपर्य त हीच खरी अस्सल असं समजतोय. इथे प्याकिंगवर चितळे बंधू ऐवजी चितळे स्वीट होम लिहिलंय. बंधू ही वेगळी कंपनी असल्यास मू ळ जुने कोण?

In reply to by गवि

रेवती Wed, 09/05/2012 - 07:26
गवि, दुसर्‍या चित्रातील बाकरवडी ही केवळ नामसाधर्म्यामुळे खपणारी आहे. मूळ चितळे हे चितळे बंधू. मूळ चितळ्यांची मिनी बाकरवडी नव्हती कधी (गेल्या सहा आठ महिन्यात चालू केली असली तर माहित नाही). यंत्राने मोठ्या आकाराच्या वड्याच तयार करतात. पूर्वी त्यात भरपूर सुके खोबरे घालीत असत पण आजकाल शेवेचा वापर होतो.

In reply to by रेवती

गवि Wed, 09/05/2012 - 10:09
धन्यवाद. आता काही निरिक्षणे. -चितळे स्वीट होम बाकरवडी (डुप्लिकेट)च्या पॅकेटवर सदाशिव पेठ पुणे ३० असा पत्ता आहे. -घरगुती उत्पादनांच्या सिलेक्टेड दुकानांमधे दोन्ही प्रकार एकत्र विकले जातात. -चितळे बंधू (ओरिजिनल) बाकरवडीपेक्षा चितळे स्वीट होम बाकरवडी अत्यंत जास्त कुरकुरीत, टेस्टदार आणि तोंडात विरघळणारी आहे. ओरिजिनल बाकरवडी कितीही ताजी (पॅकिंग दोनतीन दिवसांपूर्वीचं पण एकदम हायटेक असल्याने किमान कुरकुरीतपणा टिकून रहायला हरकत नसावी. तरीही ती मुळातच जरा मऊ असते असं दिसतंय.. ) -यापूर्वी कधी प्रत्यक्ष चितळेंच्या पुण्यातल्या दुकानात जाऊन बाकरवडी घेतलेली नसल्याने मूळ कशी असते माहीत नव्हतं म्हणून इतके प्रश्न विचारले. उत्तराबद्दल पुन्हा धन्यवाद. आता चवीला चांगली , कुरकुरीत अशी स्वीट होम बाकरवडी आणत जाईन.

In reply to by गवि

मैत्र Wed, 09/05/2012 - 15:27
चितळे स्वीट होम शनिपाराच्या दुसर्‍या बाजूला छोटेसे दुकान आहे. इतर कुठल्याही हलवायांचे असते तेवढे. सदाशिव पेठ पत्ता बरोबर आहे. शनिपार बस स्टॉप / गणपती ते नागनाथ पार या पट्ट्यात कुठेतरी आहे ते. पराला माहित असेल नक्की जागा. एकूण दर्जा फार काही विशेष नाही. एके काळी त्यांच्या कडे आंबा बर्फी चांगली मिळायची. आता माहीत नाही. चितळे बंधू हेच वर्जिनल. आता स्टायलिश पॅकिंग आलं आहे. कित्येक वर्ष निळ्या पांढर्‍या रंगातल्या प्लॅस्टिक पिशव्या हेच पॅकिंग होतं. पण त्या पहिल्या फोटोत जसं नाव आहे लाल चौकोनात तो फॉर्मट सध्या त्यांच्या बहुतेक उत्पादनांवर वापरला जातो.

In reply to by गवि

५० फक्त Wed, 09/05/2012 - 08:11
याला म्हणतात हाडाचे प्रतिसादक आणि डुप्लिकेट बाकरवडी, गेला बाजार साता-यात राजपुरोहितमध्ये समोसे, बाकरवड्या आणि पेढे चांगले होते.

In reply to by ५० फक्त

मैत्र Wed, 09/05/2012 - 15:27
सामोसे नक्कीच. पण एक-दोन चौक पुढे अशोक मोदी आणि लाटकर हे पिढीजात कंदी पेढ्यांचे हलवाई असताना राजपुरोहित चे मारवाडी पेढे इतके उत्तम वाटत नाहीत. विशेषतः मोदी..

आदिजोशी Mon, 09/03/2012 - 15:46
जुन्या कढीला नवा ऊत आणण्याचा प्रचंड अयशस्वी प्रयत्न

In reply to by आदिजोशी

धागा इंचाइंचाने शतकाकडे चालला आहे आणि तुम्ही म्हणता "प्रचंड अयशस्वी प्रयत्न" ? बाकी, ऊत तरी नवा कुठे आहे, वरती उतलेली काही नावे पाहिली, बरीच तशी जुनीच होती ;-)

तिमा Mon, 09/03/2012 - 19:58
हिरव्या देशातही हिरवा देश म्हणजे कुठला ? 'हिरव्यांचा हैदोस' वाला नाही ना ?

रघुपती.राज Mon, 09/03/2012 - 21:06
मी ९५ नम्बर. आपल्या डोम्बिवलीत देशपान्डेन्च्या खाउघर मध्ये किन्वा बाजीप्रभु चौकातील कुलकर्णीन्च्या दुकानात जावे. खावे. फळकुट नाही की प्रणाली नाही. असो.

इरसाल Tue, 09/04/2012 - 10:04
१०० वा मुबारका भै मुबारका

किसन शिंदे Tue, 09/04/2012 - 10:47
लेखकाने हा अनुभव पुण्यातल्या चितळेंऎवजी(चितळेच काय अगदी दुसरं कोणतंही दुकान) दुसर्या एखाद्या शहरातील नामवंत दुकानाचा लिहिला असता तर धागा कदाचित पन्नाशीही गाठू शकला नसता असे निरीक्शण नोंदवतो.

ऋषिकेश Tue, 09/04/2012 - 16:56
लेखन.. निरिक्षण.. मस्तच! फक्त दुकानदाराचे (आणि शहराचे) नाव लिहून रोष ओढवून घेतलात

In reply to by ऋषिकेश

आनंद भातखंडे Wed, 09/05/2012 - 14:05
पण दुकानदार आणि शहराचे नाव नसते तर कदाचित खऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या नसत्या आणि तितकी मजा पण आली नसती. बाकी रोष वगैरे ठीक आहे.....;)

रमताराम Tue, 09/04/2012 - 18:44
एकुण प्रतिसाद वाचताना पर्‍याचा एक मोठा नि आमच्यासारखे चार-पाच फुटकळ वगळता पुण्याच्या 'बाजूने' आलेले प्रतिसाद दिसले नाहीत. थोडेफार तटस्थ प्रतिसाद वगळता सुमारे ७५ विरुद्ध पाच असे असून 'पुणेकर उगाचच आरडाओरड करताहेत, गळू आले' वगैरे दावे वाचून गोबेल्स आठवला. अर्थात गोबेल्स बहुधा मिपावरूनच शिकून गेला असावा असा आम्हाला पूर्वीपासून दाट संशय आहेच. रच्याकने: हल्ली इनोचा तुटवडा आहे असे दिसते.

In reply to by रमताराम

रेवती Tue, 09/04/2012 - 19:23
नाय हो ररा, मीही पुण्याच्या बाजूनेच प्रतिसाद दिलाय पण नंतर तो प्रतिसाद मलाच तटस्थ वाटायला लागला. भाषा मनाला पुरेशी झोंबणारी वाटत नाही. असो, पुढीलवेळी काळजी घेते. ;) तसेही पुणे प्रेमाचे दुथडी भरून वाहणारे धागे येतच असतात. त्यांची कमतरता नाही.

In reply to by रेवती

रमताराम Wed, 09/05/2012 - 13:31
आमच्यासारखे चार-पाच फुटकळ प्रतिसाद.... हे वाचलं नाय का? ता.क. प्रतिसादाला फुटकळ (म्हणजे जितक्या अहमहमिकेने पुणे विरोधी आपली जळजळ व्यक्त करताहेत तितके तीव्र नाहीत) म्हटले आहे, तुम्हाला नाही या.कृ. नों. घ्या. (उगाच तुमच्याशी पंगा घ्याय्ला येडाय का मी.) तसेही पुणे प्रेमाचे दुथडी भरून वाहणारे धागे येतच असतात. असा एखादा धागा दाखवल्यास आजन्म उपकृत होईन. जमाखर्च मांडून बघू या किती धागे पुण्याच्या प्रेमाची दुथडी भरून वाहणारे आहेत नि किती पुणे आणि पुणेकरांची टवाळी करणारे आहेत. ते होणारच नाही. 'गृहित-सत्य' असा एक शब्द आम्ही वापरला होता आमच्या 'जंगलवाटांवरचे कवडसे' मधे, तसेच हे. एकदा स्वतःलाच प्रचंड न्यूनगंड असलेले 'आम्ही लै शहाणे नि पुणेकर चूक' हे गृहितक धरून लोक जमा झाले की साप साप म्हणून भुई धोपटणे चालू होणारच. (म्हणून जीएंची 'कावळे, राजहंस नि मानससरोवर' ही उपकथा आम्हाला आवडणारी) साप केवळ आपल्या मनात आहे हे समजले तर पाहिजे. तेवढी समज असणारे चूप बसतात. इतरांना सापांबरोबर गळवांचेही भास होऊ लागतात्य

In reply to by रमताराम

तसेही पुणे प्रेमाचे दुथडी भरून वाहणारे धागे येतच असतात. असा एखादा धागा दाखवल्यास आजन्म उपकृत होईन.
उपरोधाने म्हणताहेत त्या. ( स्वगत:- जीएंनी उपरोधावर काही लिहिले नाही बहुतेक ;-) )

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

रमताराम Wed, 09/05/2012 - 17:58
गळवांनी त्रस्त असलेल्यांच्या दोघांमधे निरोगी लोकांनी बोलायचे कारण नाही. आमचे दु:ख आम्हाला ठौक. स्वगतः धत्तेरे की रेवतीतैंनी सचिनप्रमाणे आपली दांडी उडवली की..... नाही नाही म्हणजे मी सचिन नि रेवतीतै टिम साउदी आहेत असे नाय म्हणायचे आपल्याला. ती स्मायली शेवटी टाकली असती तर घोळ झाला नसता.

In reply to by रमताराम

प्रथम म्हणजे मी पूर्ण लेख परत नीट वाचला. त्यात चितळ्यांवर अशी काही खास टीका केली नाही आहे. खरे तर लेखकाने थोडासा सेल्फ डीप्रीकेटींग पद्धतीने लेख लिहिला आहे, असे मला वाटले. काही ताशेरे आहेत, पण लेख विनोदी आहे हे लक्षात घेता ते असणारच. शिवाय लेखकाने आपल्याला चितळ्यांचे पदार्थ आवडतात असे अनेकदा दर्शवले आहे, म्हणजे त्यांचा चितळ्यांवर काहीं तसा फार राग नसावा. असो, तो तसा वेगळा मुद्दा आहे. आता महत्त्वाचा मुद्दा. समझा केली चितळ्यांवर टीका तर केली. चितळ्यांवर टीका म्हणजे त्यांचा अपमान, मग तो समस्त पुणेरी दुकानदारांचा अपमान आणि पर्यायाने समस्त पुणेकर आणि पुणे शहर यांचा अपमान असे समजायचे, त्याला शहराच्या आणि स्वतःच्या अस्मितेचा प्रश्न बनवायचा आणि मग लगेच आपले शहर आणि अस्मिता यांचा बचाव करण्यासाठी बोरू झिजवायला उतरायचे हा प्रकार मला प्रचंड विनोदी वाटतो. उद्या कुणी केली टीका डी दामोदर वर किंवा गौरीशंकर छीतरमल वर तर मी काही लगेच त्याला माझ्या अस्मितेशी जोडणार नाही. चितळेच कशाला, मागे पुण्यातील एका विशिष्ट प्रसंगाबद्दल कुणीतरी लिहिले होते. त्यातील पुणेरी घरमालकच्या विक्षिप्त वागण्यामुळे झालेले विनोदी प्रसंग लिहिले होते. येथील काही सव्यसाची लेखक लगेच धागालेखकच कसा गाढव आणि घरमालक कसा बरोबर हे पटवून द्यायला लागले होते. जणू तो घरमालक यांचा होणारा सासराच आहे आणि त्याची अब्रू यांनी नाही वाचवली तर मुलगी देणार नाही असे म्हणाला आहे. इथेही तसेच झाले आहे म्हणा. माझे अजून एक निरीक्षण आहे ते म्हणजे पुण्याबद्दल काहीही विधान केले, मग भले ते विधान तक्रारवाचक नसले तरीही पुणेकरांना त्यात टीका दिसते. (इथे पुणेकर म्हणजे मिसळपाव वरील पुणेकर म्हणवणाऱ्या काहीं आयडींना. माझे अनेक पुणेकर मित्र आहेत. त्यांच्याशी बोलताना वेगळा अनुभव येतो. जालावर पण मी मिसळपाव व्यतिरिक्त फार कुठे नसतो त्यामुळे तूर्तास मिसळपाव च्या संदर्भात बोलतो आहे) मग अशा तथाकथित टीकेला प्रत्युत्तर देताना शाब्दिक कसरती, समोरच्याचा अपमान करून पुणेरी स्टीरिओटाईप पक्का करणे अशा केविलवाण्या धडपडी सुरु होतात. आधी आश्चर्य वाटायचे. मग राग यायचा. आता मज्जा वाटते. पण आत्ता गंभीर पणे सांगतो आहे, प्रत्येक विधानात टीका शोधायची गरज नसते. "गळू" शब्द काहीं लोकांना चांगलाच झोम्बलेला दिसतो. कुणा महाभागाने तर चक्क मी असभ्य प्रतिसाद दिला अशी तक्रार केली. त्यात असभ्य काय आहे देव जाणे. गळू म्हणजे फोड. तो तळहाताला येऊ शकतो, कपाळाला येऊ शकतो. कुठेही येऊ शकतो. वाचकाच्या डोक्यात काय काय कल्पना विस्तार येतात त्याची जबाबदारी माझी नाही. माझ्या प्रतिसादाला गोबेल्सनीती म्हणण्यापूर्वी जरा विचार करायला हवा होता, की त्या मागे काय काय झाले आहे. दुसरे म्हणजे ब्याम्याने प्रेडीक्शन केले आणि मी त्यामागचे मला जे वाटले ते कारण लिहिले. फारसे "पुणेकरी" प्रतिसाद यायच्या आधी हे लिहिले आहे. सगळ्या तारखा आणि वेळा नीट पहा. शिवाय "एकदा स्वतःलाच प्रचंड न्यूनगंड असलेले 'आम्ही लै शहाणे नि पुणेकर चूक' हे गृहितक धरून लोक जमा झाले की साप साप म्हणून भुई धोपटणे चालू होणारच. साप केवळ आपल्या मनात आहे हे समजले तर पाहिजे." हेच वाक्य स्वत:लाही लागू होते हे ध्यानात आले तर उत्तम. आपल्यावर सतत उगाच टीका होते हा गंड कोण बाळगते, विधानांच्या (किंवा विनोदांच्या) भुईला टीकेचा साप समजून कोण धोपटते याचा एकदा विचार करा. आणि हो, नेहमी मी प्रतिवाद करतोच असे नाही पण माझ्या प्रतिसादाचा एकदा नव्हेत तर दोनदा उल्लेख केलात म्हणून उत्तर दिले आहे. आणि हो, मुख्य म्हणजे तुम्ही केलात म्हणून. इतर कुणी नेहमीचे पांचजन्यधारी असते तर तसदी नसती घेतली. यापुढे दर वेळेला इतके सविस्तर उत्तर देणार नाही (त्यापेक्षा एक काडी टाकून तमाशा बघणे सोपे जाईल :-) )

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन Sat, 09/08/2012 - 00:57
+१११ ^ (१११११११११११ ). वाक्यावाक्याशी सहस्रशः सहमत. विशेषतः
आता महत्त्वाचा मुद्दा. समझा केली चितळ्यांवर टीका तर केली. चितळ्यांवर टीका म्हणजे त्यांचा अपमान, मग तो समस्त पुणेरी दुकानदारांचा अपमान आणि पर्यायाने समस्त पुणेकर आणि पुणे शहर यांचा अपमान असे समजायचे, त्याला शहराच्या आणि स्वतःच्या अस्मितेचा प्रश्न बनवायचा आणि मग लगेच आपले शहर आणि अस्मिता यांचा बचाव करण्यासाठी बोरू झिजवायला उतरायचे हा प्रकार मला प्रचंड विनोदी वाटतो. उद्या कुणी केली टीका डी दामोदर वर किंवा गौरीशंकर छीतरमल वर तर मी काही लगेच त्याला माझ्या अस्मितेशी जोडणार नाही. चितळेच कशाला, मागे पुण्यातील एका विशिष्ट प्रसंगाबद्दल कुणीतरी लिहिले होते. त्यातील पुणेरी घरमालकच्या विक्षिप्त वागण्यामुळे झालेले विनोदी प्रसंग लिहिले होते. येथील काही सव्यसाची लेखक लगेच धागालेखकच कसा गाढव आणि घरमालक कसा बरोबर हे पटवून द्यायला लागले होते. जणू तो घरमालक यांचा होणारा सासराच आहे आणि त्याची अब्रू यांनी नाही वाचवली तर मुलगी देणार नाही असे म्हणाला आहे. इथेही तसेच झाले आहे म्हणा. माझे अजून एक निरीक्षण आहे ते म्हणजे पुण्याबद्दल काहीही विधान केले, मग भले ते विधान तक्रारवाचक नसले तरीही पुणेकरांना त्यात टीका दिसते. (इथे पुणेकर म्हणजे मिसळपाव वरील पुणेकर म्हणवणाऱ्या काहीं आयडींना. माझे अनेक पुणेकर मित्र आहेत. त्यांच्याशी बोलताना वेगळा अनुभव येतो. जालावर पण मी मिसळपाव व्यतिरिक्त फार कुठे नसतो त्यामुळे तूर्तास मिसळपाव च्या संदर्भात बोलतो आहे) मग अशा तथाकथित टीकेला प्रत्युत्तर देताना शाब्दिक कसरती, समोरच्याचा अपमान करून पुणेरी स्टीरिओटाईप पक्का करणे अशा केविलवाण्या धडपडी सुरु होतात. आधी आश्चर्य वाटायचे. मग राग यायचा. आता मज्जा वाटते. पण आत्ता गंभीर पणे सांगतो आहे, प्रत्येक विधानात टीका शोधायची गरज नसते.
इथे तर अभिनव बिंद्रास्टैल बैलांचे डोळे फोडलेत. उगीच नाही म्हणत बलीवर्दनेत्रभञ्जक विमे :) जियो!

In reply to by चिंतामणी

तुमच्या प्रतिसादाच्या शीर्षकाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तेव्हा दीर्घ प्रतिसादाची वाट वाट पाहत आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आनंद भातखंडे Sat, 09/08/2012 - 13:05
तुमच्या या प्रतिसादावरून तुम्ही एकंदरीत या मिपासंस्कृतीचा एकदम गाढा अभ्यास केलेला दिसतो. (या वाक्यात खोचक पणा नाही हे ध्यानात घ्यावे. ;) आता कुठलाही विनोदी लेख लिहिताना काही वाक्यांनंतर असं कंसात मला काय वाटते ते टाकावे लागेल.) आता हा माझा धागा (खरं तर सुंभ म्हणायला हवं इतका जाडा झालाय ... पण जाळला तरी पिळ जाणार नाही असा.) लवकरच द्विशतक पूर्ण करणार. :) जसं चितळे यांनी कधीच मला निमंत्रण दिलं नव्हतं (तसं ते इतर पुणेकरांना देत असतील का? हा शोधाचा मुद्दाच आहे) तरी पण चितळ्यांच्या दुकानात मिळणाऱ्या दर्जेदार उत्पादनांसाठी तिथे जायचा मोह आवरत नाही. असो. 5563 वाचने आणि १८०+ प्रतिक्रिया. (ही नोंद दि. ८ सप्टेंबर २०१२ रोजी १२ वाजून ५५ मिनिटे नोंदवली आहे) ते सुद्धा कुठल्याही प्रकारचे आमंत्रण न देता. खरच मजेशीर आणि अजब आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

चिंतामणी Sat, 09/08/2012 - 17:36
ही उपरती १७५+ पोस्ट झाल्यावर का झाली?? >>>त्याला शहराच्या आणि स्वतःच्या अस्मितेचा प्रश्न बनवायचा आणि मग लगेच आपले शहर आणि अस्मिता यांचा बचाव करण्यासाठी बोरू झिजवायला उतरायचे हा प्रकार मला प्रचंड विनोदी वाटतो. पुणेकरांची खिल्ली उडवण्यासाठीच असले लेख टाकले जातात हे उघड सत्य आहे. >> उद्या कुणी केली टीका डी दामोदर वर किंवा गौरीशंकर छीतरमल वर तर मी काही लगेच त्याला माझ्या अस्मितेशी जोडणार नाही. म्हणजे ते त्या दर्जाचे नाहीत हे तुम्हीच सिद्ध करीत आहात. >>>"गळू" शब्द काहीं लोकांना चांगलाच झोम्बलेला दिसतो. आणि हा गळवाचा उल्लेखसुद्धा कुत्सीतपणानेच केला आहे ना. ही व्याधी हा शब्द फारच चांगला आहे असे आपले म्हणणे आहे का? >>>(त्यापेक्षा एक काडी टाकून तमाशा बघणे सोपे जाईल Smile ) प्रस्तुत धागाकर्त्याने हेच तर केले आहे.

नन्दादीप Wed, 09/05/2012 - 12:38
एक पुणेरी लोककथा.. चितळ्यांचं कुमठेकर रस्त्यावरील दुकान. वेळ रात्री आठ वाजता म्हणाजे दुकान बंद होण्याची.मालक चितळे स्वत: कुलूप लावायच्या तयारीत.. त्याच क्षणी एक माणूस बंद होणार्‍या शटरच्या खालून जवळपास लोळण घेत आत घुसला...चितळ्यांनी त्याला आडवायचा प्रयत्न केला पण तरीही तो चिवट माणूस शेवटी घुसलाच.चितळ्यांनी खवळून त्याला काय पाहिजे म्हणून विचारलं... " बाकरवडी.." अपेक्षित उत्तर आले. "किती वाजले घड्याळात...? आठ वाजले ते दिसत नाही. का घड्याळ चुकीची वेळ दाखवतंय..तसं असेल तर बाकरवडी ऐवजी घड्याळ घ्या... " चितळे त्याच्यावर वतागले. ... " मला बाकरवडी हवीय.." " मिळणार नाही.. दुकान बंद झालेय... उद्या या.." " बाकरवडी.." " शक्य नाही... आता बाहेर पडा आधी... " चितळ्यांचा संताप अनावर झाला. तो माणूस बाहेर पडत नाही हे बघून चितळ्यांनी शटर ओढले आणि तो माणूस आणि चितळे स्वत: दुकानात कोंडले गेले..दोन मिनिटांनी आतला वाद वाढला तशी बाहेर गर्दी जमा झाली. गर्दी वाढतच गेली तसे वादही वाढले. मग आतून मारामारीचे, आपटाआपटीचे आवाज ऐकायला येऊ लागले.. काहीतरी फुटल्याचे आवाज आणि माग कुणाचातरी जोरात ओरडण्याचा आवाज... गर्दी अवाक होऊन बघत होती. इतक्यात शटर परत किलकिले झाले आणि तो माणूस जिवाच्या आकांताने बाहेर पडला आणि पळायला लागला... मागोमाग चितळे बाहेर आले. चिडलेले, घामेजलेले पण तरीही चेहर्‍यावर एक समाधान घेऊन... " काय झालं हो...?" गर्दीतून कुणीतरी विचारले. " बाकरवडी पाहिजे होती... आठ वाजल्यानंतर आत आला .. आणि नाही म्हटले तर हातघाईवरच यायला लागला... मग दाखवले चौदावे रत्न... आठ वाजता बाकरवडी मागतो म्हणजे काय... वेळेचे भान आहे की नाही.." " कोण होता हो...?" गर्दीतील उस्तुक प्रेक्षकाने विचारले... " होता कुणीतरी मद्रासचा भामटा ... शिवाजी गायकवाड म्हणून... "

किसन शिंदे Wed, 09/05/2012 - 13:29
चितळेंच्या बाबतीतला माझा अनुभव तर अगदीच वाईट आहे. मागे एकदा कोणत्यातरी सणाच्या दिवशी आमच्या नेहमीच्या किराणावाल्याकडून चितळ्यांच आम्रखंड घेऊन आलो. पण पहिल्याच घासाला चितळे इतकं वाईट्ट आम्रखंड बनवतात का? असा प्रश्न पडला. इतकं कि बर्‍याच दिवसाचं डब्यात बंद करून ठेवलेलं असावं. कदाचित आणलेलं आम्रखंड डुप्लिकेट असावं म्हणून त्या किराणावल्याने चौकशी केली तर त्यानेही अगदी निग्रहाने सांगितलं कि हेच ओरीजनल आहे. अगदी वितरकाचा नंबरही त्याने मला दिला. वितरकाजवळ चौकशी केल्यानंतर त्यानेही हेच खरं असल्याचं सांगितलं. वितरकाकडून चितळ्यांच्या संस्थाळाचा पत्ता मिळाला जो आम्रखंडाच्या डब्यावर होताच. मग परत चितळ्यांच्या आम्रखंडाच्या नादी लागलो नाही. माझं तर वैयक्तिक मत असंय कि चितळ्यांच्या आम्रखंडापेक्षा वारणाचं आम्रखंड चवीला खुप चांगलंय आणि माझ्या या मताला एका पुणेकरानेही दुजोरा दिलाय. :) आत्ता बोला.!

In reply to by किसन शिंदे

बॅटमॅन Wed, 09/05/2012 - 14:10
वारणाचं आम्रखंड लै मस्त असतं :) बाकी आपला पर्सनल फेव्हरीट म्हंजे मिरजेची विटा डेअरी. त्यांचं श्रीखंड जगात भारी. बाकी पेढा-बासुंदीसाठी नरसोबावाडीला पर्याय नाही.

In reply to by किसन शिंदे

मृत्युन्जय Wed, 09/05/2012 - 15:46
खरय. चितळेपेक्षा वारणाचे आम्रखंड / श्रीखंड जास्त चांगले असते. देसाई बंधुंचे आम्रखंड देखील उत्तम. पण चितळेचे वाईट असते असे मात्र नाही. एकदा परत ट्राय कर. तुला एक वन ऑफ अनुभव आला असावा असे वाटते. असो. चितळेचा मलई चक्का मात्र क्या कहने. लाजवाब. अर्थात यावर कोणीतरी "पंढरपुरचा चक्का खाउन बघा राजाहो. चितळे विसरुन जाल" अशी प्रतिक्रिया देउ शकेल. तर ते ही म्हणणे मान्य आहे. पंढरपुरात एकुणच गल्लोगल्ली उत्तम चक्का / श्रीखंड मिळते. पण ते आता ताजे ताजे पुण्यात कसे मिळावे :) ?

In reply to by मृत्युन्जय

विजुभाऊ गुरुवार, 09/06/2012 - 14:52
पंढरपुरात एकुणच गल्लोगल्ली उत्तम चक्का / श्रीखंड मिळते. पण ते आता ताजे ताजे पुण्यात कसे मिळावे हल्ली पंढरपुरातले बरेचसे चक्केवाले पुण्यात असतात. डान्याला विचारून बघा. नक्की सांगेल तो

In reply to by किसन शिंदे

सिद्धार्थ ४ गुरुवार, 09/06/2012 - 00:55
माझे वैयक्तिक मत असेच आहे कि चितळ्यांची बाकरवडी सोडली तर बाकी सगळे जिन्नस सर्वसाधारण आहेत. (बाकरवडी ला मात्र पर्याय नाही.. :) एक नंबर ) इथे कोणी कल्याणच्या अनंत हलवाईचे आम्रखंड आणि श्रीखंड खाल्ले आहे का? अनंत हलवाईचे आम्रखंड एकदा खाल्ले कि तुम्हाला दुसर्या कोणताही ब्रांड चे आम्रखंड आवडणार नाही.

In reply to by आनंद भातखंडे

मैत्र Fri, 09/07/2012 - 20:35
अजंठा, शास्त्री रस्ता, पुणे -- संकल्प मंगल कार्यालयाजवळ, काका हलवाईच्या समोर शास्त्री रोडला अजंठा नावाचं एक जुनं खाऊ / मिठाई / स्नॅक्स असं दुकान आहे. त्यांच्याकडे मिळणारं सीताफळ आणि बटरस्कॉच श्रीखंड अप्रतिम असतं.. जरुर ट्राय करा...

स्पा Wed, 09/05/2012 - 15:26
मी आणि विमे चितळ्यांच्या दुकानात गेलेलो होतो.. अतिशय सामान्य दुकान वाटले मिठाई वेग्रे पण अतिशय सामान्य दर्जाची.. विशेष काही नाही.. एकदा नाव झालं कि काहीही खपत माझा नुकताच पुण्यात स्थाईक झालेला मित्र मला म्हणाला होता.. कि चितळ्यांचा शेंबूड सुद्धा फेमस हाये म्हणे .......!

पैसा Wed, 09/05/2012 - 18:00
धागा खुसखुशीत शैलीत लिहिला आहे. आम्ही पुणेकर नाही त्यामुळे जाज्ज्वल्य अभिमान वैग्रे वाटेत न येता आरामात वाचू शकलो आणि सर्वच प्रतिक्रियांची मजा घेऊ शकलो. हे माझे मत नोंदवते. असा ज्वलंत विषय धाग्यासाठी सुचणे इथेच लेखकाने अर्धी बाजी माराली आहे, त्याबद्दल हाबिणंदण! तुम्ही आणखी चांगले लिहू शकता याबद्दलही सहमत आहे!

In reply to by पैसा

आनंद भातखंडे गुरुवार, 09/06/2012 - 10:11
हा धागा ज्वलंत, पेटनशील आहे ते मला नंतर कळले ;) .... धागा पेटता ठेवणाऱ्या प्रतिक्रिया मिळायला लागल्यावर.

In reply to by शिल्पा ब

किसन शिंदे गुरुवार, 09/06/2012 - 10:37
विंग्रजी..??? शिल्पा तै, सरळ तुमच्या भाषेतल्या खणखणीत शब्दात लिवा की..

In reply to by शिल्पा ब

आनंद भातखंडे गुरुवार, 09/06/2012 - 11:36
खरंच इतकं पथेटिक वाटत असेल तर मी हा लेख मिपा वरून काढून टाकण्याची विनंती करत आहे. कारण आता "अती झालं आणि हसू आलं" या सदरात प्रतिक्रिया मिळायला लागल्या आहेत.

In reply to by आनंद भातखंडे

रमताराम गुरुवार, 09/06/2012 - 13:36
ज्या प्रकारचं लेखन तुम्ही टाकलं आहे ते पाहता याहून वेगळं घडेल अशी तुमची अपेक्षा होती? भलतेच भाबडे आहात किंवा 'वेड पांघरून पेडगाव'ला जाण्यात पटाईत. टीआरपीसाठीच सारा अट्टाहास असतो. पुणे, चितळे हे विषयच प्रतिसादखेचक म्हणून त्यावर धागे येतात. त्यात वाचण्यालायक काही नसतेच. नुसतीच फटाक्याची वात पेटवण्यासाठी ओढलेली काडी इतकेच त्यांचे काम असते. हे सारे तुम्हाला ठाऊक नाही हे आम्हाला पटणे अवघड आहे. (चला अजून दोन चार प्रतिसाद नक्की करून तुमच्या दीडशतकाची सोय करून ठेवली बघा.) धाग्याने जवळजवळ दीडशे प्रतिसाद घेतलेत साहेब. एखादे अभ्यासपूर्ण लेखनही एवढे प्रतिसाद घेत नाही. तुम्ही हत्तीवरून साखर वाटायला हवी खरं म्हणजे.

In reply to by रमताराम

आनंद भातखंडे गुरुवार, 09/06/2012 - 14:32
>>ज्या प्रकारचं लेखन तुम्ही टाकलं आहे ते पाहता याहून वेगळं घडेल अशी तुमची अपेक्षा होती? इतका उदंड प्रतिसाद मिळेल याची खरंच अपेक्षा नव्हती. >>भलतेच भाबडे आहात किंवा 'वेड पांघरून पेडगाव'ला जाण्यात पटाईत. मी तुम्ही म्हणता त्या पैकी कुणीच नाही. >>टीआरपीसाठीच सारा अट्टाहास असतो. इथे पण टीआरपी चा अट्टाहास असतो हे माहित नव्हते. >>हे सारे तुम्हाला ठाऊक नाही हे आम्हाला पटणे अवघड आहे. हे तुमचे मत झाले. मी आधीच सांगितल्या प्रमाणे मी मिपावर जुना सदस्य असलो तरी लेखन आत्ताच चालू केले. मिपावर हा माझा ७वा आणि पुणे/चितळे यांच्यावर पहिलाच लेख आहे. मी या आधीचे मिपावरचे लेख वाचलेले नाहीत त्यामुळे कुठला धागा किती टीआरपी खेचतो आणि कुठला नाही या बद्दल तुमच्या इतका तरी माझा अभ्यास नाही.

In reply to by आनंद भातखंडे

किसन शिंदे गुरुवार, 09/06/2012 - 15:11
मी आधीच सांगितल्या प्रमाणे मी मिपावर जुना सदस्य असलो तरी लेखन आत्ताच चालू केले. मिपावर हा माझा ७वा आणि पुणे/चितळे यांच्यावर पहिलाच लेख आहे. मी या आधीचे मिपावरचे लेख वाचलेले नाहीत त्यामुळे कुठला धागा किती टीआरपी खेचतो आणि कुठला नाही या बद्दल तुमच्या इतका तरी माझा अभ्यास नाही.
भातखंडे साहेब, यासाठी मिपावरचे इतरही धागे वाचत चला आणि त्यावर प्रतिक्रिया देत चला म्हणजे तुम्हाला लोकांच्या म्हणण्याचा रोख कळेल.

In reply to by किसन शिंदे

आनंद भातखंडे गुरुवार, 09/06/2012 - 15:22
किसन शिंदे साहेब, आपली सूचना आवडली. पण ती "मी मिपा वर फक्त लेखन करायला येतो" अशी पुर्वग्रहदुषित वाटली. असो. पुणेकरांवरील इतर लेख मी वाचलेले नाहीत त्यामुळे या विषयावर लोकांचा रोख काय असतो हा सर्वस्वी धागा-वलंबून मामला आहे. बर... लोकांचा रोख कळण्यासाठी "प्रतिक्रिया" द्यायलाच पाहिजेत का?

In reply to by रमताराम

पुणे, चितळे हे विषयच प्रतिसादखेचक म्हणून त्यावर धागे येतात. त्यात वाचण्यालायक काही नसतेच.
नसते ना काही वाचण्यालायक? तरी उघडलात धागा आणि प्रतिसाद पण दिलेत. मग का नाही येणार असे धागे?

विजुभाऊ गुरुवार, 09/06/2012 - 17:53
चितळेंच्या दुकानातील व्यवस्था खूपच चांगली आहे. अद्ययावत प्रणाली वापरण्यात ते अग्रेसर आहेत. ते फळकुट प्रकारची व्यवस्था तेथे बरेच वर्षांपासुन सुरू आहे ( साधारणतः १९८९ पासून) त्यांचेकडे बाकरवडी घ्या म्हणून त्यानी आग्रह केलेला नव्हता. तेथे मिळणार्‍या पदार्थांच्या चवीसाठी /उत्तमप्रतीसाठी तुम्ही तेथे गेला होता. त्यांच्या दुकानातील शिस्त तुम्हाला अवघडल्या सारखी वाटत असेल यात त्यांचे काय चूक? कधीतरी टिळकरोडवरच्या बादशाही मेस मधे जावून बघा. क्वालीटी इज "कस्टमर्स डिलाईट " हे पटेल

खुशि Fri, 09/07/2012 - 14:31
अहो भातखन्डे चितळे कोकणस्थ्,कर्वे कोकण्स्थ तुम्ही आणि आम्हीही कोकणस्थ!शिस्तप्रिय. मग चितळ्यान्कडची ती शिस्तीची सिस्टीम आपल्याला आवडली नाही का? पण विनोदाने लिहिले आहेत असे वाटते.छान आहे लेख.

खुशि Fri, 09/07/2012 - 14:36
अहो भातखन्डे चितळे कोकणस्थ्,कर्वे कोकण्स्थ तुम्ही आणि आम्हीही कोकणस्थ!शिस्तप्रिय. मग चितळ्यान्कडची ती शिस्तीची सिस्टीम आपल्याला आवडली नाही का? पण विनोदाने लिहिले आहेत असे वाटते.छान आहे लेख.