मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काल

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सजगता किंवा अवेअरनेस म्हणजे वास्तव आणि कल्पना यात तारतम्य करण्याची आपली क्षमता (The ability to differentiate between a fact & fiction). आपला अवेअरनेस जितका जास्त तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं. अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही. वेळ वस्तुस्थिती मानणं ही आपली केवळ धारणा आहे (जस्ट अ कन्विक्शन) आणि अशा अनेक धारणा आपल्याला आपण बंधनात आहोत असा आभास घडवतात. `काल' या अत्यंत बेसिक धारणेचं निरसन करण्याचा हा प्रयत्न. ____________________ या बोधाला अध्यात्मात काल रहितता (इटर्निटी) म्हटलंय आणि कालरहितता जाणणार्‍याला कालज्जयी (कालावर विजय मिळवणारा) म्हटलय. कालरहितता हा सिद्धत्वाचा गुणविषेश मानला गेलाय आणि कालमुक्तीला असाधारण महत्त्व आहे. इटर्निटी जाणणं हे दीर्घ आणि अथक साधनेचं फलित समजलं गेलय पण तो उलगडा व्हायला खरं तर कोणत्याही साधनेची गरज नाही. ___________________ अस्तित्वात प्रक्रिया, प्रसंग आणि घटना आहेत ही गोष्ट उघड आहे आणि त्यांचा कालावधी मोजण्यासाठी आपण काल हे भासमान परिमाण वापरलय. आपण नेहमी कोणत्याना कोणत्या प्रक्रियेत मग्न असल्यानं कालाचा सतत वापर करतो त्यामुळे काल वास्तविक आहे अशी आपली धारणा झालीये. ______________________ वेळ ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण वेळ ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे मनावर वेळेचं सतत दडपण आहे. वेळ भास आहे हे ज्याला कळतं तो वेळेपासून मुक्त होतो! वेळेपासून मुक्ती आणि वक्तशीरपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट कल्पना आहे असं कळलं की आपण ती वापरू शकतो पण ती खरी आहे असं वाटलं की मग तणाव सुरू होतो. वेळ या कल्पनेतून व्यक्तिमत्त्व निर्माण होतं म्हणजे आपण स्वतःला वक्तशीर किंवा वेंधळे समजायला लागतो किंवा बाकीचे आपल्याला तसं समजायला लागतात; मग प्रत्येक वेळी वेळ गाठताना आपली स्वतः विषयीची प्रतिमा आपल्याला सहजतेनं काम पूर्ण करणं किंवा वेळ गाठणं मुष्किल करते. वेळेच्या बाबतीत असा ताण दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना असतो, वक्तशीर व्यक्तीला स्वतःचा वक्तशीरपणा टिकवायचा असतो आणि वेंधळ्या व्यक्तीला वेंधळेपणा चुकवायचा असतो. वेळ कल्पना आहे अशी पक्की खूणगाठ एकदा मनात बसली की तुमच्या मनावरचं वेळेचं दडपण एकदम नाहीसं होतं, तुमची सृजनशीलता पराकोटीची वाढते, तुम्हाला कोणत्याही प्रसंगात अनेक पर्याय दिसायला लागतात. ________________________ वेळ भास आहे हा तुमचा अनुभव झाला, मनोमन खात्री पटली की दुसरी एक अद्भुत घटना आपसूक घडते: आपण स्वत: `कालाबाधीत' आहोत हे तुमच्या लक्षात येतं, आपण अकाल आहोत! ज्याला काल भास आहे हे कळलं त्याच्यावर कालात घडणार्‍या घटनांचा परिणाम हळूहळू न्यून होऊ लागतो. शरीराची निर्मिती कालात आहे त्यामुळे आपण शरीरापासून वेगळे आहोत. शरीर आहे, आपणही आहोत पण आपण 'शरीर झालेलो' नाही, आपल्याला शरीराची जाणीव आहे. तुम्हाला तुमचं `विदेहत्व' लक्षात येतं आता तुम्हाला हे देखील लक्षात येतं की `वय' शरीराला आहे, आपल्याला नाही, आपण सदैव एकसारखे आहोत, आपल्याला बालपण कळलं, तरुणपण कळलं आणि उत्तररंग देखील कळेल पण आपण जसेच्या तसे राहू! शरीराशी तादात्म्य कमी झाल्यामुळे तुम्ही कमालीचे उत्साही होता. याचा अर्थ शारीरिक क्षमता कमालीची वाढून एखादा इंग्लिश खाडी पोहून जाईल किंवा एकदम मॅरेथॉन जिंकेल असा नाही पण शारीरिक क्षमता आणि तुमचा उत्साह याची गल्लत होणार नाही. असेल त्या शारीरिक क्षमतेनं, शरीराला झेपेल ते काम तुम्ही उत्साहानं करू शकाल. थोडक्यात आपलं वय झालं असं वाटल्यामुळे येणारा निरुत्साह संपूर्णपणे नाहीसा होईल कारण आपल्याला वय नाही! वेळ ही कल्पना आहे हा बोध आपल्याला चिरतरुण करतो, शारीरिक वयाचा आपल्यावर चित्तस्थितीवर परिणाम होत नाही. _______________________ वेळ हा भास आहे हे ज्यानं जाणलं त्याला हे देखील कळतं की वेळेत घडणार्‍या प्रत्येक घटनेपेक्षा आपण वेगळे आहोत, त्यामुळे प्रसंग हाताळण्याची त्याची क्षमता कमालीची वाढते. प्रसंगात न सापडता आपण प्रसंग हाताळू शकतो, साक्षी या आध्यात्मिक शब्दाचा नेमका अर्थ तो आहे. वेळेपासून जेवढे आपण मुक्त तितके जाणीवेशी संलग्न होत जातो, म्हणजे किती वाजले? जेवायची वेळ झाली, यापेक्षा भूक लागली की जेवण असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं. जाणीवेनं जगणं किती सुखाचं आहे हे कळायला थोडा वेळ जावा लागतो पण एकदा त्यातली सहजता कळली की मग अनायासे आपण अस्तित्वाशी एकरूप होत जातो. नुसत्या सूर्यप्रकाशावरनं आपल्याला केव्हा जेवावं, केव्हा फिरायला जावं, केव्हा झोपावं आणि कधी उठावं ते कळायला लागतं! जाणीव एकदम प्रगल्भ व्हायला लागते. ____________________ कालरहितता कळणं तुम्हाला `अवकाश' किंवा `स्पेस' या परिमाणाला उपलब्ध करतं. अवकाश हे स्वास्थ्याचं निधान आहे, वेळेमुळे ताण आहे, अवकाशाशी संलग्न होणं तुम्हाला स्वस्थ करतं. अवकाश हे अस्तित्वातलं सर्वात रहस्यमय परिमाण आहे, एका अर्थानं ते सर्वत्र आहे आणि दुसर्‍या अर्थानं ते इतकं अपरंपार आहे, इतकं सर्वव्यापी आहे की नक्की कुठेय ते दर्शवता येत नाही. टाईम फ्रस्टेट करणारा अवकाश परिमाणाला उपलब्ध होतो असं म्हणणं ही तितकंस योग्य नाही, तो स्वत:च अवकाश होतो, कमालीचा निवांत होतो, या निवांतपणाला अध्यात्मात समाधी म्हटलय! _____________________ पैसा निदान कल्पना तरी आहे पण काल तर निव्वळ भास आहे, अर्थात हे तुम्हाला जरी पटलं तरी इतरांना लगेच पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. हा विषय वादाचा नाही, बोधाचा आहे. तुम्ही लगेच त्यावर मानसिक उहापोह करु नका त्या उलगड्यात काही काळ जगा, कालरहिततेचं वेळीअवेळी स्मरण करत तीचा निवांतपणा, त्या बोधातून येणारं स्वास्थ्य उपभोगा. जेव्हा तुम्ही या बोधातून काही दिवस जगाल तशी तुमच्या जगण्यात, हालचालीत सहजता यायला लागेल. ओशोंचं एक अप्रतिम वाक्य आहे, ते म्हणतात : समझ आचरणमें बदल जाती है! जेव्हा हा बोध तुमच्या आचरणात येईल तेव्हा मग तुम्हीही दुसर्‍याला एकदम बिनधास्तपणे सांगू शकाल की `अरे, वेळ हा निव्वळ भास आहे! ' आणि मग ते त्याला पटो न पटो तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तो तुमचा अनुभव झालेला असेल!

वाचन 41699 प्रतिक्रिया 127

अर्धवटराव Mon, 07/16/2012 - 00:55
आणखी काहि वेळा शांतपणे वाचावं लागेल. अवांतर : "पैसा" लेख जर या लेखानंतर आला असता तर त्यावर फार वेगळ्या पर्स्पेक्टीव्ह ने चर्चा झाली असती बहुतेक. हे दोन्ही लेख समांतर वाटताहेत. अर्धवटराव

नगरीनिरंजन Mon, 07/16/2012 - 08:50
शरीराची निर्मिती कालात आहे त्यामुळे आपण शरीरापासून वेगळे आहोत. शरीर आहे, आपणही आहोत पण आपण 'शरीर झालेलो' नाही, आपल्याला शरीराची जाणीव आहे. तुम्हाला तुमचं `विदेहत्व' लक्षात येतं
काळ हा जसा भास आहे तसाच "आपण शरीरापासून वेगळे आहोत" हाही एक भासच आहे.

In reply to by नगरीनिरंजन

प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, मी शब्दालाशब्द जोडून उगीच शब्दविभ्रम करत नाहीये तर एक तथ्य तुमच्यासमोर मांडतोय. शब्दाशिवाय अभिव्यक्तीला पर्याय नसला तरी प्रयत्न अर्थ पोहोचवण्याचा आहे. भास होण्यासाठी किमान एक गोष्ट तरी वास्तविक हवी; या विषयाच्या संदर्भात `आपण' वास्तविकता आहोत, `मी नाही' असं आपण म्हणू शकत नाही. दुसरी गोष्ट, शरीर देखील वास्तविक आहे नाही तर मग लिहिणार कश्यानं? त्यामुळे आपण आणि शरीर या दोन्ही वास्तविकता आहेत. `भास' चा अर्थ आपल्याला आपण शरीर आहोत असं वाटणं आहे कारण आपण शरीर असतो तर आपल्याला शरीराची जाणीव कशी झाली असती? एखाद्या गोष्टीची जाणीव व्हायला ती आपल्यापेक्षा `अन्य' हवी. वेळ खरी वाटण्याच कारण त्या `भासाचा' सतत केला गेलेला `वापर' आहे तसं आपण शरीर आहोत असं वाटण्याच कारण `भाषा' आहे. शरीर चालतं आणि आपल्याला कळतं पण आपण डायरेक्ट `मी आलो' `मी येतो' `मी निघालो' असं म्हणतो. अर्थात, शरीर या माझ्या आधीच्या लेखावर ही चर्चा समर्पक ठरली असती पण काही हरकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

नगरीनिरंजन Tue, 07/17/2012 - 10:15
वाद घालायचा म्हणून नाही, पण खरोखर मला नीट पटत नाहीय म्हणून लिहीतोय. त्या धाग्यावर समर्पक झाली असती खरी पण इथे केली चर्चा तरी काही बिघडत नाही असे वाटते. तर,
एखाद्या गोष्टीची जाणीव व्हायला ती आपल्यापेक्षा `अन्य' हवी.
हा नियम कसा ठरला? या नियमात एक पॅराडॉक्स आहे. जर एखाद्या गोष्टीची जाणिव व्हायला ती आपल्यापेक्षा अन्य हवी तर 'आपण' आपण आहोत हे कधीच जाणवायला नको. म्हणजे शरीर आपल्याला जाणवतंय म्हणून आपण वेगळे आहोत ही अप्रत्यक्ष सिद्धता झाली, निरपेक्षपणे आपण आहोत हे यातून सिद्ध होत नाही. याचाच दुसरा अर्थ असा की आपण शरीर नाही हे जाणवण्यासाठी शरीर असणे आवश्यक ठरते. म्हणूनच आपण शरीर आहोत हा भास नसून शरीरापेक्षा वेगळे काहीतरी आहे हा भास आहे. शरीर जाणवते कारण हाताची प्रतिमा डोळे मेंदूकडे पाठवू शकतात, हाताने डोळ्यांना स्पर्श करून त्याची संवेदना मेंदूकडे जाते म्हणून आपल्याला डोळे जाणवतात. मेंदूला मेंदू जाणवत नाही कारण मेंदूला स्पर्शज्ञान नाही किंवा स्वतःची प्रतिमा त्यावर पडत नाही. जर डोक्यात कॅमेरा घातला तर टीव्हीवर मेंदू दिसेल (म्हणजे मेंदूवर मेंदूचीच प्रतिमा उमटेल) याचा अर्थ टीव्हीतला मेंदू 'अन्य' आहे असा होत नाही. सगळ्या संवेदना मिळून मेंदूत असा एकसंध भास तयार होतो की शरीराच्या आवरणातून 'मी' नावाचे कोणीतरी वावरत आहे. शरीर वास्तविकता आहे आणि 'मी ' हा भास आहे. जर 'मी' ही वास्तविकता असती तर शरीर नष्ट झाल्यावरही ती उरली असती. तसे होत नाही, पण त्याउलट मात्र होते. मी यावर विचार करत असताना एक कल्पना केली. समजा, AI आणि Robotics मध्ये जे दावे केले जातात ते खरे ठरले आणि काही वर्षांनी माणसाइतका बुद्धिमान आणि माणसासारखा अनुभवातून शिकणारा यंत्रमानव आपण तयार केला तर त्या यंत्रमानवाचे शरीर आणि तो या दोन वेगळ्या गोष्टी असतील का?

In reply to by नगरीनिरंजन

येस! हीच तर सिद्धावस्था आहे, मी शून्य आहे, मी नाही किंवा मी पूर्ण आहे ही सगळी विधानं `आपल्याला आपण न जाणवणं' या अत्यंत तरल स्थिती चं वर्णन आहे. आपण निराकार आणि सार्वभौम किंवा सर्वत्र आणि सदैव आहोत हा उलगडा म्हणजे साक्षात्कार पण इतक्या चटकन तुम्हाला ते मंजूर होणार नाही. एकेका धारणेचं निराकरण करावं लागेल, वेळ वस्तुस्थिती नसून भास आहे ही एक महत्त्वाची धारणा आहे, ती या लेखात उलगडतोय. आपण विदेह आहोत या धारणेविषयीची चर्चा `शरीर' या लेखात घडवण्याचा प्रयत्न होता. श्वास आणि पैसा यात `श्वासानं जीवन चाललंय, पैसा दुय्यम आहे', हे `पैसा'मधे सांगण्याचा प्रयत्न होता.

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त Tue, 07/17/2012 - 12:55
....आपण निराकार आणि सार्वभौम किंवा सर्वत्र आणि सदैव आहोत हा उलगडा म्हणजे साक्षात्कार .... .... हे अमूक एका विशिष्ट व्यक्तीचे, अमूक एका विशिष्ट वेळी झालेले मत होय. कालानुसार हे मत बदलू शकते, तसेच अन्य व्यक्तींचे "साक्षात्कार" म्हणजे काय, याविषयी अगदी वेगळे मत असेल, तेही कालानुसार बदलू शकेल... तुम्हाला कोण्/काय सेक्सी वाटते" या धाग्यात अनेकांनी त्यांना-त्यांना सेक्सी वाटणार्‍या गोष्टी सांगितल्या, त्यातील अमूकच खरे, असे म्हणता येणार नाही, तद्वतच "साक्षात्कार" म्हणजे अमूकच, असे म्हणता येणार नाही. हीच गोष्ट "मोक्ष" "निर्वाण" "प्रेम" "कर्तव्य" "सौंदर्य" "परमेश्वर".... अश्या शेकडो गोष्टींविषयी. साक्षात्कार म्हणजे जे काही आहे असे मला आज वाटत आहे, ते "आपण निराकार आणि सार्वभौम किंवा सर्वत्र आणि सदैव आहोत हा उलगडा " या पेक्षा अगदी वेगळे आहे. परंतु तेच सत्य असा आग्रह मी धरत नाही, आणि ते काय हे सांगण्याच्या भानगडीतही पडत नाही. ज्याचे त्याने ठरवावे. आणि न ठरवले, तरी काहीच बिघडत नाही.

In reply to by चित्रगुप्त

काल न जाणवणं हे साक्षात्काराचं एक लक्षण आहे. मी साक्षात्कार म्हणजे काय हे त्या अंगानं `(सतत जाणवणारी तरलता किंवा आपण आहोत ही जाणीव शून्य होणं किंवा केवळ आपणच आहोत याचं दर्शन होणं ) लिहिलय. आपलं असणं हे निरपेक्ष सत्य आहे त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही या दृष्टीनं लिहिलय. हा लेख साक्षात्काराच्या विविध अंगाचा उहापोह (सत्य, शिवं, सौंदर्य, चिदानंद) वगैरे करत नाही. मी फक्त `काल भास आहे' हे सांगतोय.

In reply to by संजय क्षीरसागर

नगरीनिरंजन गुरुवार, 07/19/2012 - 09:20
तुम्ही खुबीने मुद्दा टाळलात असेच म्हणावे लागेल. असो.

In reply to by नगरीनिरंजन

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/19/2012 - 11:21
ती गोष्ट कशा सापेक्ष आहे असं तुम्हाला वाटतं, मुद्दा कुठे टाळलाय?

In reply to by संजय क्षीरसागर

नगरीनिरंजन गुरुवार, 07/19/2012 - 12:19
तुम्ही म्हणालात शरीर जाणवते म्हणून आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत. ही सापेक्ष सिद्धता नाही काय? मग शरीराशिवाय (शरीर नष्ट झाल्यावर) आपण आहोत हे कसे सिद्ध होईल? नसेल होणार तर आपण म्हणजेच शरीर हे आपोआप सिद्ध होते. शरीर नसेल तर आपलं असणं याला नक्कीच इतर पुराव्याची गरज आहे.

In reply to by नगरीनिरंजन

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/19/2012 - 20:29
आपल्याला अनेक गोष्टी जाणवतायत (शरीर जाणवतय, विचार जाणवतायत, शरीरामुळे ध्वनी, दृष्य, स्पर्श, गंध जाणवतायत) पण या सर्वात `आपण' कॉमन आहोत. जरी सर्व गोष्टी मेंदूमार्फत डिकोड होत असल्या तरी ज्याला त्या जाणवतायत ते `आपण' आहोत. हे `आपलं असणं', हा `अनुभवणार्‍याचा शोध' अध्यात्म आहे; ज्या क्षणी तुम्हाला कळेल की हा अनुभवणारा एक आहे त्या क्षणी तुम्हाला लक्षात येईल की तो निरपेक्षपणे सिद्ध आहे किंवा तो इतका उघड आहे की त्याला स्वतःला सिद्ध करायची आवश्यकताच नाही मग तुम्हाला हे देखील कळेल की तो आणि आपण वेगळे नाही, याला सिद्धत्व म्हटलय. ज्या क्षणी तुम्ही सिद्ध होता त्या क्षणी तुम्हाला कळतं की आपल्या अनुभवावर कुणाच्या शिक्कामोर्तबाची गरज नाही कारण तुमचा अनुभव कशाही सापेक्ष नसतो. मी उत्तर अत्यंत प्रामाणिकपणे दिलय, तुमच्या लक्षात येईल न येईल कल्पना नाही पण हे उत्तर जतन करा तुम्हाला उपयोगी होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

नगरीनिरंजन Fri, 07/20/2012 - 09:14
माझ्या लक्षात येईल असे वाटत नाही. मी तुमच्या विरूद्ध बाजूच्या टोकावर उभा आहे असे दिसतेय. पृथ्वीपासून दूर जाऊन काळ वगैरे सगळं भास आहे हे दिसतही असेल कदाचित किंवा वाळूच्या एका कणासारखी पृथ्वी दिसत असेलही कदाचित पण तसं मी कधीच बघणार नाहीय. आयुष्य क्षणभंगुर आहे हे माहित असूनही एक खेळ म्हणून मला ते खेळायचंय, त्यातले सुख-दु:ख, ताण-तणाव सगळ्याचेच नियम पाळून आणि त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन. त्यामुळे शरीर म्हणजेच मी एवढे अध्यात्म मला सध्या पुरेसे आहे.

In reply to by नगरीनिरंजन

गवि Fri, 07/20/2012 - 09:42
ननि... फार सुंदर बोललास.. शेवटची वाक्यं म्हणजे बुल्स आय. स्टीफन हॉकिंग्जच्या द ग्रँड डिझाईन या थरारक पुस्तकात त्याने जगाच्या अस्तित्वाविषयी जे काही विचार मांडले आहेत ते मुळापासून वाचण्यासारखे आहेत. ग्लास बाऊलमधल्या गोल्डफिशला बाहेरचं जग अत्यंत डिस्टॉर्टेड, मेग्निफाईड आणि भलतंच दिसतं. त्याचा तोच पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याने त्या आभासाशी जुळवून घेतलं आहे. आपणही गोल्डफिश आहोत आणि आपल्याला जे भासतं (काळ म्हणा किंवा स्पेस म्हणा किंवा आणि काही मसण म्हणा) ते आपल्याला भासतं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जरी गोल्डफिशने हे परसेप्शन आहे, भास आहे आणि बाऊलबाहेर खरं जग आहे किंवा नाही इत्यादि तात्विक शक्यता कितीही चर्वण केल्या तरी बाऊलमधून जे दिसतंय त्याला खरं मानून जगण्याखेरीज गोल्डफिशला दुसरा ऑप्शनही नाहीये..

In reply to by गवि

अर्धवटराव Fri, 07/20/2012 - 09:50
आपण गोल्डफिश आहोत हा एक भास आहे असं त्याने स्वतःला पटवुन दिले म्हणजे झाले ;) पण यात एकच गोची आहे... हा सारा युक्तीवाद त्याने पाण्यात राहुनच करावा आणि बगळे, मांजरी वगैरे समोर करु नये... हि मंडळी त्याला तु नेमका कोण आहेस वगैरे प्रश्न विचारणार नाहित... सरळ गट्टम करतील. अर्धवटराव

In reply to by गवि

कारण आता ही चर्चा आकार आणि निराकार या डायमेन्शनला जाईल म्हणून इथे थांबतो पण जाताजाता संदीप खरेच्या या ओळी पाहा: मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरि स्वच्छंदी मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो तो लंघून चौकट पार निघाया बघतो तुम्ही शरीरच अंतीम मानून जगा, तो तुमचा ऑप्शन आहे पण ही चौकट लंघून पार निघण्याचं साहस करणारेही आहेत याची जाणीव असू द्या, काही प्रॉब्लम नाही!

In reply to by नगरीनिरंजन

मन१ Sat, 08/11/2012 - 22:16
आयुष्य क्षणभंगुर आहे हे माहित असूनही एक खेळ म्हणून मला ते खेळायचंय, त्यातले सुख-दु:ख, ताण-तणाव सगळ्याचेच नियम पाळून आणि त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन. त्यामुळे शरीर म्हणजेच मी एवढे अध्यात्म मला सध्या पुरेसे आहे. ह्या दोन ओळिंसठी धाग्यावर येणं सार्थक झालं.

In reply to by नगरीनिरंजन

अर्धवटराव Tue, 07/17/2012 - 11:10
"आपण शरीर नाहि" या प्रमेयाला "कर्मस्वातंत्र्याची धारणा" हे एक एक्स्प्लेनेशन असु शकतं. शरीर म्हणजे काहि रसायनांचा गलबला. हा गलबला भौतीक शास्त्राच्या नियमांनी चालतो. पदार्थाला कंट्रोल करणारे भौतीक शास्त्राचे सर्व नियम स्थल /काल सापेक्ष्य आहेत, म्हणजे ते नियम स्थळ आणि काळ या परिमाणांतुन डिफाईन केले जातात.( अशी मतं ठोकुन द्यायला काय मजा वाटते...व्व्वा ) S = f(s, t) where S is the state of system, s is space and t is time. function f() नुसार आपल्याला आपल्या कुठल्याहे स्थितीचे स्थळ/काळानुसार १००% अचुक वर्णन करता येईल कारण आपली स्थिती function f() च्या बाहेर असुच शकत नाहि. (बोंबला... म्हणजे ज्योतीषशास्त्र आलं). थोडक्यात काय, तर "मी माझ्या कर्माने माझं भविष्य घडवील" या दाव्याला कुठलाही आधार राहाणार नाहि... पण जर आपलं भविष्य आपण "ठरवु" शकतो, ते प्रिडिफाइन्ड / लादलेलं नाहि असं आपल्याला वाटत असेल, तर हे "कर्म करण्याची" शक्ती असणारा function f() च्या बाहेरचा असल्यावाचुन पर्याय नाहि, म्हणजे हा कर्म करणारा स्थळ/काळ अबाधीत आहे (ही आत्म्याची व्याख्या आहे). भौतीक शास्त्रात हाच सिद्धंत The Will Factor Of Universe अशा काहिश्या नावाने अभ्यासला जातो ( आपली मतं ठोकुन द्यायची... संदर्भ वगैरे तसही फारसं मनावर घेऊ नये शहाण्या माणसाने ;) ) कृत्रीम बुद्धीमत्तेला कितीही विकसीत केले तरी शेवटी ते अल्गोरिदम आहेत... आणि शेवटी "अगणीत शक्यतांमधुन एक शक्यता उचलणे" या पलिकडे ते काहि करु शकणार नाहि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

नगरीनिरंजन Wed, 07/18/2012 - 11:19
ठोकाठोकी मजेशीर आहे. त्या फंक्शनमध्ये प्रोबॅबिलिटी असते आणि कोणत्या घटकाला किती प्रोबॅबिलिटी लावायची हे आधी कळत नाही (असे मी ही ठोकून देतो.)
कृत्रीम बुद्धीमत्तेला कितीही विकसीत केले तरी शेवटी ते अल्गोरिदम आहेत... आणि शेवटी "अगणीत शक्यतांमधुन एक शक्यता उचलणे" या पलिकडे ते काहि करु शकणार नाहि.
आपले विचार हे अल्गोरिदम्स नाहीत? आपला मेंदूही अल्गोरिदम्स चालवतो आणि भिन्न पातळ्यांवर भिन्न अलगोरिदम्स चालवतो (म्हणजे एका अलगोरिदमचे मूल्यमापन करणारे दुसरे अल्गोरिदम वेगळ्या पातळीवर). अशी भिन्न पातळ्यांची बुद्धिमत्ता तयार करण्यावर संशोधन चालू आहे.

In reply to by नगरीनिरंजन

बॅटमॅन Wed, 07/18/2012 - 11:34
गोडेल, इशर, बाख या पुस्तकात डग्लस हॉफस्टॅडटर तर फूल्ड बाय रँडमनेस या पुस्तकात तालेब (विशेषतः ४था चॅप्टर) याबद्दल डिस्कशन करतो. हॉफस्टॅडटरचे विवेचन खतरनाक आहे. तालेब पण रोचक कैतरी बोलतो, पण जरा कन्फ्यूजिंग आहे.

In reply to by अर्धवटराव

बॅटमॅन Wed, 07/18/2012 - 21:44
मजा सांगतो. फ्री विल हा डिसायडिंग लाईफ फॅक्टर नसून, इलेक्ट्रॉनसारख्या कणांमध्येदेखील फ्री विल असते, असे जॉन हॉर्टन कॉनवे या प्रथितयश गणितीने सिद्ध केले आहे. त्याचे नाव आहे फ्री विल थिओरम.

In reply to by बॅटमॅन

अर्धवटराव Wed, 07/18/2012 - 21:51
fin, spin, twin ला जेंव्हा f() मध्ये बसवलं जाईल तेंव्हा त्यात फ्री वील राहाणार नाहि. पण त्या करता काळाची फार सुक्ष्म परिमाणं तयार करावी लागतील. अर्धवटराव

In reply to by बॅटमॅन

अर्धवटराव Wed, 07/18/2012 - 22:29
हो, आहे... पण सध्यातरी भौतीकशास्त्र S, T कक्षेच्या संपूर्णपणे बाहेर असं काहिही मांडु शकलं नाहि. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष S, T येतातच येतात. याचं कारण असं, कि शेवटी सर्वकाहि उर्जेच्या रूपपरिवर्तनाच्या अंगाने मांडावं लागतं... आणि परिवर्तनाला S, T शिवाय पर्याय नाहि. अर्धवटराव

चित्रगुप्त Mon, 07/16/2012 - 10:09
... किती वाजले? जेवायची वेळ झाली, यापेक्षा भूक लागली की जेवण असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं... 'ब्रम्हचर्य' याचा वस्तुतः हाच अर्थ आहे. ब्रम्हाला (वा निसर्ग म्हणा हवं तर) अनुकूल असे आचरण. सूर्य मावळला, की अन्य जीव झोपी जाऊ लागतात, मनुष्य मात्र करमणुकीच्या नावाखाली मध्यरात्रीपर्यंत जागतो, परिणामी 'ब्रम्ह-मुहुर्तावर' आपसूकच उठण्या ऐवजी गजर लावून, चडफडत कामावर जायलाच हवे म्हणून उठतो. सुट्टीच्या दिवशी दहा-अकरापर्यंत झोपणारी तरूण मंडळी बघून मला तर सखेद आश्चर्य वाटते. आम्ही नेहमी पहाटे चार वाजता आपोआप उठून शहराबाहेर सायकलने निसर्ग-चित्रणासाठी जायचो, त्यात कोणताही नाइलाज नव्हता, तर निव्वळ आंतरिक ऊर्मीने जगणे होते. 'ब्रम्हचर्य' या शब्दाचा असा साधा सोपा अर्थ विलयास जाऊन 'काम-निषेध' असा अर्थ कुणी, केंव्हा आणि का प्रचलित केला, कुणास ठाऊक. मागे एकदा एका जैन मंदिरात महावीरांची काही वचने आणि त्याखाली त्यांचा अतिशय विपर्यास केलेला अर्थ दिलेला बघितले होते. कृष्ण, पतंजली, बुद्ध, महावीर, येशू, महंमद आदि सर्वांच्या उपदेशाचा अतिशय चुकीचा अर्थ प्रचलित केला गेलेला दिसतो. 'ओशो' हा शब्द उच्चारणे म्हणजे सुद्धा जणू पाप वा मूर्खपणा, असा एक अतिशय आचरट प्रचार अजून सुद्धा केला जातो. वस्तुतः ओशोंनी जगभरातल्या या सर्व महामानवांच्या वचनांचा वास्तविक आणि आजच्या मानवाला कळेल, रुचेल, पचेल, आणि उपयोगी पडेल, असा अर्थ उलगडून सांगितलेला आहे. याचा अनुभव ज्याचा त्याने घेऊन बघावा. बाकी त्यांच्याकडे किती गाड्या वा घड्याळे होती, अमेरिका का सोडावे लागले, वगैरे चर्चेत अडकणे निष्फळ कालापव्यय आहे.

In reply to by चित्रगुप्त

ब्रह्मचर्य म्हणजे कामसंयम नाही हे नक्की पण त्याचा अर्थ आणखी गहन आहे; ब्रह्मचर्य म्हणजे आपणच सत्य आहोत असं जगणं, तसं आचरण. तो वेगळा चर्चा विषय होईल, सध्या फक्त `काल भास आहे' या अनुरोधानं चर्चा चालू रहावी म्हणून अधिक लिहित नाही. याच अनुषंगानं आणखी एक सांगावसं वाटतं की ओशोंचे काही क्वोटस माझ्या लेखनात आले तरी मी ओशोंना सरकट समर्थन देत नाही, माझं आकलन मी माझ्या पद्धतीनं मांडतो त्यामुळे त्यांच्या संबधित विधाना व्यतीरिक्त इतर विधानांचं स्पष्टीकरण देण्याची जवाबदारी माझी नाही. विषय लाईनवर रहावा म्हणून खुलासा केलाय, प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

अर्धवट Tue, 07/17/2012 - 09:48
>>यापेक्षा भूक लागली की जेवण असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं. हे जरा अवघडच आहे ब्वॉ. असं सगळं नैसर्गिकच जगणं सुरू झालं तर अवघडच की. सगळ्या लेखात असं बरंच कायकाय फालतू आणि शेंडाबुडखा नसलेलं दाखवता येइल पण सध्या असोच.

In reply to by अर्धवट

अर्धवटराव Tue, 07/17/2012 - 09:59
आता आमच्या अर्धवटपणावर देखील शंका यायला लागली आहे... मला तर हे नैसर्गीक जगण्याची कल्पना फार इण्टरेस्टींग वाटत होती .. अर्धवटराव

अर्धवटराव Tue, 07/17/2012 - 10:04
काळ फक्त प्रक्रिया, घटना वगैरेचा कालावधी मोजायचा एकक नाहि. जर प्रक्रिया सत्य आहे तर प्रक्रियेची गाडी इर्रिव्हर्सेबली काळाच्या रुळावरुन धावतेय. मग काळ भासमान कसा? अर्धवटराव

पण आपण ती अनंत कालापासून वस्तुस्थिती मानत आलोय त्यामुळे आपल्याला आपण कालबद्ध आहोत असं वाटतंय इतकंच माझं म्हणणय, यात न समजेलस किंवा इल्लॉजिकल काय आहे? आपल्याला वेळ बघून जेवायची सवय झालीये त्यामुळे भूकेनं जेवणाची मजा काय आहे हे वेळेची भासमानता संपूर्ण अंगीकारल्याशिवाय कसं समजेल?( एखादे वेळी ट्रिपला ती मजा तुम्ही अनुभवली असेल) बोध आचरणात आणल्याशिवाय निष्कर्श कसा निघेल? प्रथम मनःपूर्वक वाचावं लागेल, मग ते पटलं तर आचरणात येईल, (आचरण बदलणं साहस आहे), आचरणात आलं तर तुमच्यासाठी ते सार्थ होईल आणि नंतर तिरकस प्रतिसाद देण्याची आवश्यकता नव्हती हे लक्षात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव Tue, 07/17/2012 - 10:37
१) काल ही वस्तुस्थिती नसून भास आहे आणि २) आपण ती अनंत कालापासून वस्तुस्थिती मानत आलोय जर प्रक्रिया #२ सत्य आहे (अनंत "कालापासुन" ) तर प्रमेय #१ मध्ये गोची आहे. >>प्रथम मनःपूर्वक वाचावं लागेल, मग ते पटलं तर आचरणात येईल, (आचरण बदलणं साहस आहे), आचरणात आलं तर तुमच्यासाठी ते सार्थ होईल आणि नंतर तिरकस प्रतिसाद देण्याची आवश्यकता नव्हती हे लक्षात येईल. -- यातला तिरकसपणाचा आरोप आमच्यासाठी नाहि असं गृहीत धरतो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

विटेकर Tue, 07/17/2012 - 16:59
प्रामाणिक पणे प्रश्न विचारला.... त्यात तिरकसपणा कोठून आला ? शप्पत ..काही ही कळले नाही हो . मला तर आता आपण मि.पा. वर आहोत हाच भास वाटू लागला आहे..... काय चाललय काही म्हणता काही ..ही कळत नाही. ..आणि विचारायची पण चोरी.. तिरकस म्हणतात!

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवट Tue, 07/17/2012 - 18:18
>प्रथम मनःपूर्वक वाचावं लागेल, मग ते पटलं तर आचरणात येईल, (आचरण बदलणं साहस आहे), आचरणात आलं तर तुमच्यासाठी ते सार्थ होईल आणि नंतर तिरकस प्रतिसाद देण्याची आवश्यकता नव्हती हे लक्षात येईल. थोडक्यात काय, लिहिलंय ते वाचा, प्रश्न विचारू नका, वाचल्यावर तुम्हाला समजेलंच, समजलं नाही तर पुन्हा मनापासुन वाचा, तरी नाही समजलं तर, पुन्हा मनापासून वाचा वगैरे वगैरे

शिल्पा ब Tue, 07/17/2012 - 10:22
शरीर अन आपण वेगवेगळे म्हणे तर माझा एक गंभीर प्रश्न आहे. : माझी कंबर दुखते, म्हणजे शरीराची कंबर दुखते पण मग माझ्या मनाला का त्रास होतो? शरीराचा त्रास तिथेच कसा ठेवायचा याबद्दल मार्गदर्शन केलंत तर सगळ्यांनाच उपयोगी होईल.

In reply to by शिल्पा ब

अर्धवट Tue, 07/17/2012 - 19:47
शरीराचा त्रास तिथेच कसा ठेवायचा याबद्दल मार्गदर्शन केलंत तर सगळ्यांनाच उपयोगी होईल. अगदी असेच म्हणतो.

चित्रगुप्त Tue, 07/17/2012 - 10:25
काळ आणि पैसा या गोष्टी भासमान मानव्यात वा सत्य हा मुद्दा तूर्त बाजूला ठेऊन या दोन्हीतेल एक फरकः पैसा हा प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रमाणात (कमी -जास्त) उपलब्ध असतो, तर वेळ मात्र प्रत्येकाला दर दिवशी चोवीस तासच उपलब्ध असते... अनुभवांचे ओरखडे मनावर उमटू न देता, बालकाप्रमाणे क्षणोक्षणी जगणं, जसं जे. कृष्णमूर्ती सांगत, आनंदायक आहे खरं, पण त्याच्या परिणामी स्मरणशक्तीची पार वाट लागते, आणि व्यवहारातील साध्या साध्या गोष्टी अवघड होत जातात, हे स्वानुभवानं सांगू शकतो.

एकदम सगळे उठून उभे राहू नका! हा लेख फालतू आहे, एक अक्षर कळत नाही, विदेहत्व एक्स्प्लेन करा, पैसा आणि आयुष्य, बालवत जगणं आणि स्मृती इतक्या विविध विषयावर तुम्ही एकाच वेळी कल्ला केलात तर मला सर्वांची उत्तरं माहिती असून देखील काहीही सांगता येणार नाही. ज्यांना लेख उपयोगी वाटतोय त्यांनी `काल भास आहे' (किंवा नाही) यावर वाट्टेल तो प्रश्न विचारा, काल भास आहे ही खात्री झाली की अनुषंगिक बदल (विदेहत्वाची जाणीव, जाणीवेनं जगणं, स्वास्थ्यं) तुमच्या आयुष्यात नक्की घडतील याची मी ग्वाही देतो ज्यांना कळत नाहीये पण कळावंस वाटतय त्यांनी कृपया लेख सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून पुन्हा वाचा, साध्या- सोप्या भाषेत आणि अनुभावातनं लिहिलय, त्यात न समजेलसं काही नाही. ज्यांना निव्वळ तिरकस प्रतिसाद द्यायचेत ते काय साधतायत याची कल्पना नाही त्यामुळे त्यांच्या विषयी मला काहीही म्हणायच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

नितिन थत्ते Tue, 07/17/2012 - 15:40
>>ज्यांना लेख उपयोगी वाटतोय त्यांनी `काल भास आहे' (किंवा नाही) यावर वाट्टेल तो प्रश्न विचारा, काल भास आहे ही खात्री झाली ..... सर्क्युलर रेफरन्स. :( काल भास आहे ही खात्री झाल्याशिवाय हा लेख उपयुक्त आहे हे कसे पटावे?

In reply to by नितिन थत्ते

अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही न पटण्यासारखं यात काय आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

शैलेन्द्र Sun, 08/12/2012 - 00:49
दिवस व रात्र होणे म्हणजेच तर काल नाही ना.. ती फक्त काल मापणाच्या अनेक परिणामांपैकी एक आहेत..

चित्रगुप्त Tue, 07/17/2012 - 12:31
पैसा आणि आयुष्य, बालवत जगणं आणि स्मृती इतक्या विविध विषयावर तुम्ही एकाच वेळी कल्ला केलात..... सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात... त्यांचे तुकडे पाडून विचार करण्यातूनच उलट गोंधळ उद्भवतात.

In reply to by चित्रगुप्त

पण त्याचाच व्यत्यास म्हणून दुसरी गोष्ट तितकीच निर्विवाद आहे की एक उलगडा होऊ द्या, बाकीचे उलगडे आपसूक होतील. इतका साधा विचार करुन पाहा : रोजच्या जगण्यात वेळेचं दडपण आहे की नाही ? आणि वेळ हा निव्वळ भास आहे या अनुभवानं ते दूर होईल की नाही ? हे दडपण दूर झाल्यावर जे स्वास्थ्य येईल त्यातनं उत्साह येईल, त्यातनं बालवत (किंवा स्पाँटेनियस) जगणं शक्य होईल आणि स्मृतीसंयोजन सुविहित होईल. जे लिहिलय ते जगून लिहिलय त्यामुळे सर्व लेखात एकसमान धागा आहे, तुम्हाला एक उकल झाली की इतर गोष्टीही आपोआप कळतील.

या सिनेमातला एक प्रसंग या लेखाच्या निमित्ताने आठवला इतकेच.. काल आपण काळ शिकलो (सुबोध भावे) काळ आपण काल शिकलो (अशोक सराफ) दादा, काल आप्ण काळ शिकलो (सुबोध भावे) तेच तर मी म्हन्तोय ना. कालच तर आपण काळ शिकलो ना? (अशोक सराफ) :):)

Dhananjay Borgaonkar Tue, 07/17/2012 - 15:46
टाइम आणि स्पेसबद्दलची जाणीव प्रगत झाल्यानेच माणूस जनावरांपेक्षा वेगळा ठरला. यातून थोडाफार तणाव येणारच. त्याचे समायोजन करायचे सोडून हा उलटा प्रवास कशासाठी?

आत्मशून्य Tue, 07/17/2012 - 18:06
काल भास आहे की सत्य यापेक्षाही त्यामुळे आपल्याला ज्या भौतीक मर्यादा येतात त्या जर बदलत नसतील तर काल भास आहे की सत्य जाणून काय फरक पडतो ? समजा एखाद्या मुलाला परीक्षेला अभ्यास करायला दोन महीने लागतात जे त्याला काही कारणाने मिळाले नाहीयेत म्हणुन मार्क कमी पडले आहेत. आता याक्षणी त्याच्या लक्षात आलं की काळ हा भास आहे तर तो त्याला पडलेले मार्क बदलु शकणार आहे काय ? हेच जर त्याला आधीच्या काळात २ महीने वेळ अभ्यासाला मिळाला असता तर मात्र त्याची तयारी नक्किच पुर्ण झाली असती. थोडक्यात काळाने एकदा परीणाम साधला (तो साधला जातोच) की तो भास होता की न्हवता याने कोणताही फरक साध्या भौतीक गोश्टीत पडत नाही तर एखाद्या काल्पनीक हुच्च अध्यात्मीक अवस्थेची बातच नको ? नाही का ?

In reply to by आत्मशून्य

राघव गुरुवार, 07/19/2012 - 18:06
काल भास आहे की सत्य यापेक्षाही त्यामुळे आपल्याला ज्या भौतीक मर्यादा येतात त्या जर बदलत नसतील तर काल भास आहे की सत्य जाणून काय फरक पडतो ? खरंय! ही सगळी चर्चाच रोचक आहे. :) काही मूलभूत प्रश्न पडतात ही सगळी चर्चा वाचून. - समजणे अन् उमजणे यातला फरक इथं लागू पडणार नाही का? - कालज्जयी या शब्दाचा शब्दशः अर्थ काळावर ज्यानं विजय मिळवला आहे असा होतो. तोच अर्थ अभिप्रेत आहे असे मला वाटत नाही. कालरहितता जाणणं हे काळाकडे दुर्लक्ष करण्यामुळे साध्य होणार नाही. खरोखर कुणी ठरवून कालज्जयी होऊ शकतो का? - व्यवहारात राहून व्यवहार विसरणं [म्हणजे दुर्लक्ष करणे नाही] ही भौतिक पातळी की अध्यात्मिक? एकत्रितपणे "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या" हे सांगणं अन् असं टप्प्याटप्प्यानं हे सर्व फोल आहे असं सांगणं यातला हेतू म्हणजे, सगळयांना समजेल अशा भाषेत सांगणं आहे; हे मी गृहित धरतो. पण हे सर्व फोल आहे हे मान्य करून सुद्धा सर्वसाधारण आयुष्यात काही विशेष फरक पडत नाही. त्याचं कारण आपल्याला ते उमजत नाही हे होय. आता प्रत्येक वस्तू, विचार म्हणजे भास आहे हे पटवून घेत बसण्यापेक्षा जे सत्य त्याचीच अनुभूती घेण्याची इच्छा बाळगणं हे जास्त सोपं आहे, नाही? जे सत्य त्याची अनुभूती आली तर बाकी मिथ्य हे समजून घ्यायची गरजच पडणार नाही असं वाटतं. राघव

In reply to by राघव

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/19/2012 - 22:18
माझ्या लेखी अध्यात्म म्हणजे उगीच काही तरी फँटॅस्टिक होईल आणि कुणी काही आधिभौतिक चमत्कार घडवेल असा नाहीये, खरं तर अशा कल्पनेनच अध्यात्म बदनाम झालय. तुमचा प्रश्नये : काल भास आहे की सत्य जाणून काय फरक पडतो ? = तुम्हालाच काय प्रत्येकाला आपलं आयुष्य `जन्म ते मृत्यू' या कालावधित बद्ध वाटत नाही काय? ते एक सोडा, वेळेचं रोजच्या जगण्यात टेंशन आहे हे कुणी नाकारु शकेल का? जर कालातीतता जाणली तर या कालात घडणार्‍या घटनांनी आपण अबाधित होतो, वेळेप्रती आपण निर्धास्त होतो (आणि तरीही बहुदा त्याचमुळे सगळं वेळेत करतो!) >कालरहितता जाणणं हे काळाकडे दुर्लक्ष करण्यामुळे साध्य होणार नाही. = तेच तर सांगतोय, तुम्ही काल `इफेक्टीवली मॅनेज करु शकता' कारण तो भास आहे हे जाणल्यावर त्याचं मनावरचं दडपण शून्य होतं. >पण हे सर्व फोल आहे हे मान्य करून सुद्धा सर्वसाधारण आयुष्यात काही विशेष फरक पडत नाही.... = कृपया हा गैरसमज संपूर्णपणे काढून टाका, मी अध्यात्माला जीवन सोपं आणि आनंदी करणारं शास्त्र मानतो आणि माझं स्वतःचं आयुष्यावर सॉलिड प्रेम आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य गुरुवार, 07/19/2012 - 23:00
= तेच तर सांगतोय, तुम्ही काल `इफेक्टीवली मॅनेज करु शकता' कारण तो भास आहे हे जाणल्यावर त्याचं मनावरचं दडपण शून्य होतं.
मला सांगा मनावर कालाचं दडपण असतं हा जावैशोध शोध कोणी लावला ? मुळातच मनावर प्रक्रियेचं दडपण असतं कालाचं न्हवे. उदा... अवघड पेपर आहे अथवा उशीर केला तर लोकल सुटेल मग ती सकाळी ११ वाजताची लोकल असो की रात्री ७.३० वाजताची लोकल असो. लोकल चुकेल या प्रक्रीयेचे मनावर दडपण असतं, ती चुकण्याचा "काल" सकाळ, दुपार, संध्याकाळ, भुतकाळ , वर्तमान काळ अथवा भविष्यकाळ किव्हा अगदी १,२.३ पासुन ते ११,१२ असा कोणताही असो फरक पडत नाही कारण मनावर कालाचं न्हवे प्रक्रियेचं दडपण असतं ही बेसीक गोश्ट राधव साहेब जरा संजय सरांना समजवाल काय ? स्वतःला असलेला अनावश्यक फोबीया पकडुन त्यावर मात करायची व हाच जगदोध्दाराचा मार्ग आहे आहे असं सर्व लोक विरोध करत असताना ठासुन सांगायचे म्हणजे काय ? मुळातच तुम्हाला काय म्हणायचय हेच संजय सरांनी तुमचा प्रतीसादात नीट लक्ष देउन वाचलेले नाही...

In reply to by आत्मशून्य

लोकल चुकेल ही प्रक्रिया वेळेशी संबधित आहे म्हणून दडपण आहे, जर मला कोणतीही लोकल चालणार असेल तर दडपण कसं येईल? साधं स्टेशनपर्यंत चालणं देखील मजेचं होईल. जिथे जिथे कालशून्यता आहे तिथे तिथे आनंद आहे आणि त्या स्थितीतली प्रत्येक प्रक्रिया स्वच्छंद आहे. मला फोबीया वगैरे काही नाही तुम्ही तुमचा फंडा गंडलाय का ते पाहा

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त Fri, 07/20/2012 - 01:38
कोणतीही लोकल तेंव्हाच चालणार असते, जेंव्हा गंमत म्हणून फिरायला वगैरे जायचे असते, तेंव्हा तसेही दडपण नसतेच. विमानाची, मीटींगची, ऑफिसची, डॉक्टरच्या भेटीची इ. ठरलेली वेळ गाठायला कोणातीही लोकल चालत नसते, हे उघड आहे. एकाद्या स्वच्छंद, पोटासाठी अमूकच वेळी अमूकच करायचे बंधन नसलेल्या वा रिटायर्ड वगैरे असलेल्यासाठी कोणतीही लोकल गाठली, किंवा न गाठता घरी येऊन निवांत झोपले, तरी चालेल. सर्वांनाच हे कसे शक्य आहे? यावर तुम्ही म्हणाल, करून तर पहा वगैरे...

In reply to by संजय क्षीरसागर

राघव Fri, 07/20/2012 - 02:46
माझ्या लेखी अध्यात्म म्हणजे उगीच काही तरी फँटॅस्टिक होईल आणि कुणी काही आधिभौतिक चमत्कार घडवेल असा नाहीये, खरं तर अशा कल्पनेनच अध्यात्म बदनाम झालय. माझीही अध्यात्माबद्दल अशी काही चुकीची धारणा नाही आणि अध्यात्म या शब्दाला बदनाम करण्यात मला काहीही रस नाही. मला काय म्हणायचं आहे याचा काहीही विचार न करता तुम्ही दिलेली ही प्रतिक्रिया आहे. असो. जे समोर येतंय ते शक्य तेवढ्या आनंदानं, चागल्यानं जगावं हे साधं, सरळ तत्त्वज्ञान तुम्ही मांडता आहात अन् त्यासाठी काही उपाय, जे तुम्ही आचरणात आणलेत ते सांगण्याचा प्रयत्न करता आहात. इथपर्यंत सर्व ठीक आहेच. पण त्यापलीकडे जाऊन तुम्ही त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतांना चुकीची गोष्ट मांडत आहात. या लेखा संदर्भानं मला इतकंच म्हणायचं आहे की असं ठरवून तुम्ही कालातीत/कालरहित अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. जसं बाल्यावस्था, कौमार्यावस्था, प्रौढावस्था अन् वृद्धावस्था या सर्व अवस्था जगतांना आपोआप प्राप्त होत असतात.. ठरवून त्या प्राप्त करून घेता येत नाहीत.. तस्सं. सर्व विश्व एकात्म आहे याची जाणीव होणं म्हणजे कालातीत/कालरहित अवस्था होय. ते अद्वैत झालं. साधनमार्गावर शेवटच्या टप्प्यावर येणारी ही अनुभूती आहे. तुम्ही म्हणता आहात ते काळाकडं दुर्लक्ष करणं आहे, त्याचा विसर पडणं आहे. त्यानं काळजी थोडी कमी होऊन जगणं सुखकर होईल हे मान्य. पण यास कालातीत/कालरहित अवस्था म्हणणं अयोग्य आहे. आणिक काय अन् कसं सांगणार. राघव

In reply to by राघव

अर्धवटराव Fri, 07/20/2012 - 03:25
>>सर्व विश्व एकात्म आहे याची जाणीव होणं म्हणजे कालातीत/कालरहित अवस्था होय. ते अद्वैत झालं. साधनमार्गावर शेवटच्या टप्प्यावर येणारी ही अनुभूती आहे. __/\__ अर्धवटराव

In reply to by राघव

मी सत्य आणखी दहा प्रकारे मांडू शकतो पण जिथे `काल हा भास आहे' इतकी साधी गोष्ट मंजूर होत नाही तिथे अद्वैतावर बोलून कसा उलगडा होईल आणि तो या लेखाचा विषयही नाही. >तुम्ही म्हणता आहात ते काळाकडं दुर्लक्ष करणं आहे, त्याचा विसर पडणं आहे. त्यानं काळजी थोडी कमी होऊन जगणं सुखकर होईल हे मान्य. पण यास कालातीत/कालरहित अवस्था म्हणणं अयोग्य आहे = मी काळ बेदखल करा असं कुठेही म्हटलेलं नाही तो भास आहे इतकं साधं विधान केलय आणि मी स्वतः कालात जगतोय आणि त्याची उपयोगीताही जाणतो हे तुम्ही लेख पुन्हा बघितला तर तुमच्या लक्षात येईल. >सर्व विश्व एकात्म आहे याची जाणीव होणं म्हणजे कालातीत/कालरहित अवस्था होय. ते अद्वैत झालं. साधनमार्गावर शेवटच्या टप्प्यावर येणारी ही अनुभूती आहे. = हा उलगडा तुम्हाला झाला असता तर कालातीततेचा बोधच अद्वैताचं दर्शन घडवतो हे तुमच्या लक्षात आलं असतं. कालातीतता आणि अद्वैत हे एकाच सत्याचे पैलू आहेत आणि ते `बाल्यावस्था, कौमार्यावस्था, प्रौढावस्था अन् वृद्धावस्था' असे क्रमिक प्राप्त होत नाहीत कारण सत्याची एक फार मोठी खुबी आहे, ते एकतर समजलं किंवा नाही समजलं!

In reply to by संजय क्षीरसागर

राघव Fri, 07/20/2012 - 13:55
हे फक्त बुद्धीभेद करणं आहे, अजून काहीही नाही. असो. तुम्हाला काहीही सांगणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे हे कळाले. मी आपणांस तसदीदिल्याबद्दल क्षमस्व. राघव

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन Fri, 07/20/2012 - 13:59
मी सत्य आणखी दहा प्रकारे मांडू शकतो पण जिथे `काल हा भास आहे' इतकी साधी गोष्ट मंजूर होत नाही तिथे अद्वैतावर बोलून कसा उलगडा होईल आणि तो या लेखाचा विषयही नाही.
म्हणजे काहीही करून तुमचा मुद्दा पटलाच पाहिजे तर.कुठे गेला तो वैचारिक मोकळेपणा?
मी काळ बेदखल करा असं कुठेही म्हटलेलं नाही तो भास आहे इतकं साधं विधान केलय आणि मी स्वतः कालात जगतोय आणि त्याची उपयोगीताही जाणतो हे तुम्ही लेख पुन्हा बघितला तर तुमच्या लक्षात येईल.
इथले बरेच प्रतिसाद आणि हे वरचे वाक्य यांत काही फरक नसताना निव्वळ "भास" या लेबलसाठी का अडून बसावे हेदेखील कलत नाही.

चित्रगुप्त Tue, 07/17/2012 - 18:44
बर्‍याचश्या गोष्टी ऐकायला, वाचायला बर्‍या वाटतात... त्या मिळाव्यात वा घडून याव्यात असेही वाटू लागते, पण त्यांचे "साईड इफेक्ट्स" त्या कालांतराने प्रत्यक्षात उतरल्यावरच कळतात...

In reply to by चित्रगुप्त

नाही कारण ती वस्तुस्थिती आहे. कोणत्याही धारणा मुक्तीमुळे काहीही धोका नाही, मी गेली वीस वर्ष घड्याळ वापरत नाही तरीही प्रत्येक काम डेडलाइन पूर्वी पूर्ण असतं आणि जगणं संपूर्ण स्वच्छंद आणि मुक्त झालय.

चित्रगुप्त Tue, 07/17/2012 - 20:57
कालजयी होण्याविषयी प्रत्यक्षात काय करावे, यातील एक गोष्ट सांगितलीत, ती म्हणजे "घड्याळ न वापरणे" आता बाकीच्याही सांगा की.

In reply to by चित्रगुप्त

घड्याळ वापरणं सोडल्यानं मी कालज्जयी झालो नाही; त्या उलगड्यामुळे आयुष्यात झालेला हा बदल आहे. आता या अनुभवातून तुम्ही जगणं सुरु करा. दर वेळी `किती वाजले' हा रेफरन्स घेऊन जगणं सोडा, तुमच्या जगण्यात निवांतपणा येईल, तुमची जाणीव तीव्र होईल. देअर वील बी अ शिफ्ट फ्रॉम थॉट टू फिलींग, तुम्हाला नुसती भूक लागली इतकंच कळणार नाही तर काय खावं, किती खावं हे पण कळेल. वेळेचा रेफरन्स गेल्यानं तुमची झोप निवांत होईल, वेळ झाल्यावर उठण्याऐवजी झोप झाल्यावर तुम्ही उठाल. सवयींचा मनावर इतका पगडा आहे की बदल सावकाश घडतात पण घडतात निश्चित. एक मात्र आहे `वेळ भास आहे' यावर मनाशी तुमचा वाद कायमचा संपायला हवा, देअर कॅनॉट बी एनी आर्ग्युमेंट ऑन धीस इशू इतका ठामपणा तुमच्यात यायला हवा मग प्रगती इरिवर्सिबल होते, यू मूव युनिडिरेक्शनल! तुमच्या लक्षात येतय? इथले विवादी प्रतिसाद मूळ सिद्धांताचा (काल भास आहे) प्रतिवाद करत नाहीयेत (कारण ती उघड गोष्ट आहे) ते धारणेचं काय करायच? या विवंचनेतून येतायेत

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य Tue, 07/17/2012 - 22:05
तुमच्या लक्षात येतय? इथले विवादी प्रतिसाद मूळ सिद्धांताचा (काल भास आहे) प्रतिवाद करत नाहीयेत (कारण ती उघड गोष्ट आहे) ते धारणेचं काय करायच? या विवंचनेतून येतायेत
माझ्यापुरतं बोलाल तर मूळ सिद्धांताचा मला प्रतिवाद करायचा नाही कारण त्यावर चर्चेत तुम्ही पळ काढाल असं गृहीत धरत आहे, तुमची इच्छा असल्यास काळ हा भास न्हवे हे सप्रमाण सिध्द करणेत येइल. फक्त तुमची तयारी हवी , कारण सवयींचा मनावर इतका पगडा आहे की बदल सावकाश घडतात पण घडतात निश्चित. एक मात्र आहे `वेळ हा भास न्हवे' यावर मनाशी तुमचा वाद कायमचा संपायला हवा, देअर कॅनॉट बी एनी आर्ग्युमेंट ऑन धीस इशू इतका ठामपणा तुमच्यात यायला हवा मग वस्तुस्थितीची जाणीव होते, यू मूव इन राइट डिरेक्शन. अवांतर :- इतकचं काय सवयींचा मनावर इतका पगडा आहे की बदल सावकाश घडतात पण घडतात निश्चित. एक मात्र आहे `तुमचं एलियन्सनी अपहरण केलं होतं' यावर मनाशी तुमचा वाद कायमचा संपायला हवा, देअर कॅनॉट बी एनी आर्ग्युमेंट ऑन धीस इशू इतका ठामपणा तुमच्यात हवा मग वस्तुस्थितीची जाणीव होते, यू मूव इन युनीडिरेक्शनल. आणी या जन्मात तुमचं एलियन्सनी कधीही अपहरण केलं न्हवतं ही भासमय धारणाही दुरं होते

In reply to by संजय क्षीरसागर

दर वेळी `किती वाजले' हा रेफरन्स घेऊन जगणं सोडा, तुमच्या जगण्यात निवांतपणा येईल, तुमची जाणीव तीव्र होईल. मी गेले ४ दिवस 'किती वाजले' याचा विचार न करता हापिसात जातोय. ९ च्या ऐवजी ११/ १२ वगैरे. (राजिनामा दिलाय म्हणून एवढी मस्ती) पण तरीही बॉस काही माझ्या जीवनात निवांतपणा येऊ देई ना हो. रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या मेंबरची 'के.टी.' कशी चालू आहे? इ. प्रश्न रोज असतात... आणि असा उशिरा येत जाऊ नकोस वगैरे लेक्चर पण दिले आज.. आता उद्या त्याला हा तुमचा 'फंडा' सांगतो.. त्याला म्हणतो, अरे हे 'काल वगैरे सगळं झूठ आहे. कशाला उगाच त्रास करून घेतोस आणि माझ्याही डोक्याला करतोस? त्यापेक्षा तुझ्या जाणिवा तीव्र कर' बघूया असं म्हटल्याने माझा नोटिस पिरियड तरी कमी होतोय का ते..

नितिन थत्ते Tue, 07/17/2012 - 23:05
तुम्ही हा लेख लिहिल्या"नंतर" लोकांनी प्रतिसाद दिले. आता हे आधी लिहिणे आणि नंतर प्रतिसाद येणे ही गोष्ट काल प्रत्यक्ष अस्तित्वात असल्याचे निदर्शक नाही का? की लोकांनी नंतर प्रतिसाद दिले हाच भास आहे. (लोकांनी प्रतिसाद दिल्यावर तुम्ही लेख लिहिला का)? आधी माझ्या डोक्यावरचे केस काळे होते आणि नंतर पांढरे झाले हा पण भासच आहे का?

In reply to by नितिन थत्ते

घटनाक्रम देखील वास्तविक आहे पण इतके वाजले, तितके वाजले असं काही होत नाहीये. केस पांढरे झालेत पण ते शरीराच वय झाल्यानं, आपलं नाही, आपण जसेच्या तसे आहोत. लेख लिहिण्यापूर्वीचा मी, लेख लिहिल्या नंतरचा मी आणि प्रतिसाद दिल्यावरचा मी सदैव एकसारखा आहे, हा `मी' तुमचा आणि माझा एकच आहे आणि त्याला काल भास आहे हे कळतय त्यामुळे तो कालातीत आहे. सर्व ज्ञानी लोकांनी वर्तमानात रहा असं सांगीतलय पण कालच नसेल तर वर्तमान तरी कुठेय? हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला कळेल की कालरहितता ही एक अपरिवर्तनीय स्थिती आहे आणि ती स्थिती हेच आपलं स्वरुप आहे आपण त्या स्थितीपेक्षा वेगळे नाही त्यामुळे आपण देखील प्रत्येक घटनेनं, प्रक्रियेनं किंवा प्रसंगानं अनाबाधित आहोत. (चला, पहिला व्यवस्थित प्रश्न आला!)

In reply to by संजय क्षीरसागर

नितिन थत्ते Wed, 07/18/2012 - 07:44
>>घटनाक्रम देखील वास्तविक आहे पण इतके वाजले, तितके वाजले असं काही होत नाहीये. केस पांढरे झालेत पण ते शरीराच वय झाल्यानं, आपलं नाही, आपण जसेच्या तसे आहोत. जौंद्या. मी माझ्याविषयी बोलतो आहे. तुम्ही "मला ठाऊक नसलेल्या आणखी कुठल्यातरी माझ्या"विषयी बोलत आहात.

वीणा३ Wed, 07/18/2012 - 00:03
"भूक लागली कि जेवा झोप आली कि झोपा" म्हंजे शरीराला भूक लागली कि जेवा आणि शरीराला झोपेची गरज वाटली कि झोपा, आणि हे सगळं शरीर हे एक भासच आहे हे गृहीत धरून करा. मला मागच्या हि लेखात वाटलं कि तुम्हाला सांगायचं कि आयुष्य सुखात जगायचा प्रयत्न करा, जास्त काळजी चिंता करून नका, कशाचाच जास्ती विचार करू नका. पण तेच तुम्ही खूप मोठे मोठे शब्द वापरून सांगताय.

In reply to by वीणा३

जास्त काळजी चिंता करून नका, कशाचाच जास्ती विचार करू नका. पण तेच तुम्ही खूप मोठे मोठे शब्द वापरून सांगताय. = इतकं सोपं असतं सगळं तर मग काय बोलायच? >म्हंजे शरीराला भूक लागली कि जेवा आणि शरीराला झोपेची गरज वाटली कि झोपा, आणि हे सगळं शरीर हे एक भासच आहे हे गृहीत धरून करा. = शरीर भास नाहीये हो, आपल्याला आपण शरीर आहोत असं वाटतय हा भास आहे; पण ते कळणं दुर्लभ आहे (शरीर या लेखावरचे प्रतिसाद पाहा). सध्या वेळ खरी आहे की भास आहे यावर विवाद चालू आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा ब Wed, 07/18/2012 - 01:24
त्याचं काय ए की जर काळ निर्माण न करता जर पृथ्वी किंवा इतर कोणताही ग्रह नुसतीच सुर्याभोवती फिरला तर मग मानवजातच नसेल अन त्यामुळे असे प्रश्न पडायला तुम्ही पण नसणार! कसं जमायचं ?

नितिन थत्ते Wed, 07/18/2012 - 07:56
३१ जुलै हा "भासच" असल्याने आता मी इन्कम टॅक्सचे रिटर्न भरत नाही. "नंतर" इन्कम टॅक्सवाले माझ्याकडे जाब विचारायला आले की त्यांना "अहो कसली तारीख? कसले "वर्षातले" एकूण उत्पन्न? कसले प्रिव्हिअस इयर? कसले अ‍ॅसेसमेंट इयर? हे सगळे नुसते भास आहेत. तुमच्या काल आहे या खुळचट कल्पनेपायी तुम्ही केवढा फोलपटांचा डोलारा उभारला आहे?" असे सांगून पाहतो. शिवाय तुमचा लेखही वाचायला देतो. छान ऐड्या सांगितली बरं का तुम्ही. हे त्या इन्कम टॅक्सवाल्यांना पटलं तर तुमचा धंदाही बुडीत जाणार बहुतेक आमच्या "भविष्यकालात". :(

In reply to by नितिन थत्ते

वेळ ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण वेळ ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे मनावर वेळेचं सतत दडपण आहे. वेळ भास आहे हे ज्याला कळतं तो वेळेपासून मुक्त होतो! वेळेपासून मुक्ती आणि वक्तशीरपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत एखादी गोष्ट कल्पना आहे असं कळलं की आपण ती वापरू शकतो पण ती खरी आहे असं वाटलं की मग तणाव सुरू होतो हे तुम्ही लक्षातच घेतलेलं नाही! आणि मी स्वतः सीए असून ते तारतम्य असल्यानं "इन्कम टॅक्सवाले माझ्याकडे जाब विचारायला आले की त्यांना "अहो कसली तारीख? कसले "वर्षातले" एकूण उत्पन्न? कसले प्रिव्हिअस इयर? कसले अ‍ॅसेसमेंट इयर? हे सगळे नुसते भास आहेत. तुमच्या काल आहे या खुळचट कल्पनेपायी तुम्ही केवढा फोलपटांचा डोलारा उभारला आहे? असं मला सांगायला लागणार नाही, माझं काम वेळेपूर्वीच पूर्ण असेल. इतक्या डेडलाइनवर मी कामही करतोय आणि उत्तरंही देतोय यातच सर्व येतय ना! याला मी स्वछंद जगणं म्हणतो आणि तो तुमच्या जीवनात यावं म्हणून लिहितो.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य Wed, 07/18/2012 - 11:57
माझं काम वेळेपूर्वीच पूर्ण असेल. इतक्या डेडलाइनवर मी कामही करतोय आणि उत्तरंही देतोय यातच सर्व येतय ना! याला मी स्वछंद जगणं म्हणतो आणि तो तुमच्या जीवनात यावं म्हणून लिहितो.
तुम्ही स्वतः आता स्वतःच्याच विरुध्द मत व्यक्त करत आहात. काल तुम्ही मानत नाही पण एखाद्या कामाची डेडलाइन तुम्ही मानताय म्हणजेच कोणत ना कोणत युनीट व बंधन तुम्ही अजुनही मनात पकडुन आहात आणी डेडलाइनपुर्वी एखादे काम झाले पाहीजे हे ही तुम्हाला बंधनकारक आहे म्हणजेच भलेही घ्ड्याळ तुम्ही वापरु नका पण समजा समोर टीव्हीवर चित्रपट सुरु आहे तर तो संपायच्या आत आमुक अमुक टास्क पुर्ण झाला पाहीजे हे तरी तुम्ही ठरवताच.... थोडक्यात तुम्ही कालमापनाचे काल्पनीक पण सुटसुटीत "युनीट" जे २४ तास आहोरात्र काटेकोर चालते पणं दुर्दैवाने काही कारणामुळे ज्याचा फोबीया/ट्रॉमा तुमच्या मनात लहानपणापासुन घर करुन बसल्याने त्याचा तुम्हाला फार त्रास झालाय इतका की जगणही मुश्कील वाटु लागलं , त्यापासुन सुटकेची काल्पनीक धडपड करुन इतर दुसर्‍या युनीटचा वापर करत आहात त्यामुळे तुम्हाला असं जगण्यात फार कंफर्टेबल वाटतय. जरुर करा तसं आपल्याला असलेल्या फोबीयावर इतर कोणाच्याही सल्ल्या शिवाय असं मात करता येणं अत्यंत कौतुकास्पद गोश्ट आहे . ज्या प्रकारे तुम्ही स्वत्तःच्या मानसीकतेच्या कमकुवत दुव्यावर नेमका अभ्यास करुन इतक्या सुरेखपणे मात करत आहात न्हवे तर त्याचा योग्य वापर करुन पॉझेटीव्ह रिझल्टही देत आहात (जर तुम्ही खरच वेळ पाळत नसाल तर) ते बघता मिपाकर म्हणुन मला तुमच्याबद्दल साहानुभुती न्हवे तर चक्क अभिमान आहे अगदीच ब्युटीफुल मांइड सारखा नाही पण एखादा मराठी विनोदी चित्रपट तुमच्या फिलोसॉफीवर नक्किच काढता येइल.

चित्रगुप्त Wed, 07/18/2012 - 11:10
काल म्हणजे काय, भास की सत्य, वगैरे काहीही माहित नसून, वा अश्या चर्चेत रस नसलेली माझी पत्नी दिवस भर अनेकानेक आवश्यक कामे, घरगुती व्यवहार इ.इ. समर्थपणे, प्रसन्नपणे पार पाडत असते, म्हणून मी मिपावर 'काल'क्रमण करू शकतो, हे मला दिसत आहे, आणि हे कालक्रमण हा 'कालापव्यय' आहे, असेही कधी कधी वाटू लागले आहे.... ब्रम्हसत्य... जगन्मिथ्या... 'मी' हा अनादि, अनंत, अविनाशी, अमर, अनाकलनीय, अतर्क्य, अविछिन्न, आत्मा आहे... साक्षीभाव आहे, विश्व चैतन्य आहे, अमूक आहे, तमूक आहे ... तो वस्त्र बदलावे, तसे देह बदलतो.... त्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र भोक पाडू शकत नाही, त्याला कालाचे बंधन आही, इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. हे सर्व नीट जाणून घेतलेस, की अर्जुना,मग तुझी मजाच मजा आहे. हाच साक्षात्कार. हाच मोक्ष. हेच निर्वाण. हेच परमज्ञान. ... आणि हे धनुर्धर पार्था, हे परमगुह्य ज्ञान फक्त तुलाच मिपामुळे लाभत आहे. जय मिपा, जय महाराष्ट्र.

In reply to by चित्रगुप्त

पण `ब्रम्हसत्य... जगन्मिथ्या' असं मी कुठेच म्हटलं नाहीये. मी सुद्धा संसार करतो, गॅस संपला की बुक करतो, घरच्यांना काय हवं नको ते बघतो, सध्या मामा हॉस्पिटलमधे आहे त्याची उद्या मेजर सर्जरी आहे त्यांच्या कुटुंबाला सपोर्ट करतो, लोकांची रिटर्न्स भरतो, इतक्या हॅपनींग लाईफमधे ब्रह्म देखील जाणलय आणि लेखनही करतो! मला जग आणि ब्रह्म दोन्ही सार्थ वाटतात आणि तीच खरी मजाये हे सांगायचा प्रयत्न करतोय

In reply to by नितिन थत्ते

तो खरा वाटतोय म्हणून तर टेंशन आहे आणि तेच तर मी पहिल्यापासनं सांगतोय!