मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जोधा अकबर

कोलबेर · · जनातलं, मनातलं
आशुतोष गोवारिकरचा हा भव्य दिव्य वादग्रस्त चित्रपट एकदाचा पाहायला मिळाला. भारतात हा चित्रपट बंद पाडण्यासाठी लोक रस्त्यावर का उतरले आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. इतिहास वगैरे मारो गोली पण आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा त्या बदल्यात पदरात असले काही पडणार असेल तर लोकं रस्त्यावर येणारच. असो.. तर हा भव्य दिव्य चित्रपट सुरू होतो अमिताभ बच्चन ह्यांच्या खर्जातल्या आवाजाने. मुघल भारतात कसे आले इथपासून ते छोटा अकबर पानिपतावर कसा पोहोचला इथपर्यंत त्यांचा आवाज आपली सोबत करतो. पानिपतात मुघल सैन्याने हिंदू राजाला छोट्या अकबरा समोर पेश केले असता अकबर त्याला मारत नाही. 'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्‍या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हा चित्रपट ८०%च इतिहासावर असून २०% गोवारिकरांचे स्वप्न रंजन आहे हे तुम्हाला माहीत नाही का?) नंतर थोड्या लढाया स्पेशल इफेक्ट वगैरे झाले की कथा वळते राजपूत राज घराण्यांकडे. इथे आमेर नावाच्या संस्थानात एक वेडसर राजा असतो. त्याची मुलगी म्हणजे जोधा (ऐश्वर्या राय-बच्चन) जी फावल्या वेळात आपल्या भावाशी ढाल तलवार वगैरे (एकदम रजपूत ष्टाईल) खेळत असते. तर हा राजा लवकरच आपला वारीस जाहीर करणार असतो आणि जोधाला आपला ढाल तलवारवाला भाऊ नॉमिनेशन जिंकणार अशी खात्री असते. शेवटी दसर्‍याच्या दिवशी हा राजा (अर्थातच वेडसर असल्याने) दुसर्‍याच कुणाची तरी निवड वारस म्हणून करतो आणि आपल्या जोधाचा विवाह देखिल तिच्या बालपणीच ठरलेल्या राजकुमाराशी जाहीर करून टाकतो. इकडे सत्ता आपल्याला मिळत नाही म्हणून हा चिडलेला भाऊ राजाच्या विरोधात कट शिजवू लागतो. हे पाहून राजाची मात्र चांगलीच टरकते आणि तो सरळ जाऊन मुघलांशी हातमिळवणी करायचे ठरवतो आणि कहानीमे ट्वीस्ट इथे येतो. मुघलांना मी माझे राज्य अर्पण करेन पण त्यांच्या बादशहाने माझ्या मुलीला देखिल त्याच्या जनानखान्यात भरती केले पाहिजे अशी 'अट' (जोधाला न विचारताच) परस्पर घालून टाकतो. आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. शेवटी थोडेसे आढेवेढे घेतल्यावर अकबर ऑफर एकदाचा कबूल करतो. परंतु आता जोधा मात्र ह्या प्रकाराने वैतागलेली असते.. ती म्हणते माझ्या मना विरुद्ध लग्न ठरवताय? काही हरकत नाही! पण माझ्या सुद्धा दोन अटी आहेत. आता हा राजा, लग्न ठरवताना मुलीला कसलेही मत विचारत नाही पण ह्या अटींचे प्रकरण मात्र एकदम मान्य करतो... का? अहो शेवटी वेडसरंच ना तो! तर ह्या अटी ती फक्त अकबरालाच सांगणार म्हणे बाकी कूण्णालाही नाही असा क्लॉज देखिल असतो..झाले सगळे पुन्हा एकदम टेन्शन मध्ये.. एकदम सीरियस म्युझिक. शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना? असा एक अविचार मनात डोकावून जातो. पण नाही जोधाच्या दोन शुल्लक अटी अकबर कबूल करतो आणि धूमधडाक्यात लगीन लावून तिला घेऊन जातो. इथं एक 'ख्वाजा मेरे ख्वाजा' नावाचे गाणे येते त्याच्या शेवटी ह्रीतीकने केलेला नाच अगदी बघण्यासारखा आहे. त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत (दुवा बघुन खात्री करा!). पांढरे वेष घातलेल्या जपानी रेस्टॉरंटातल्या आचार्‍यां सारख्या दिसणार्‍या कलाकारांनी केलेली कवायत देखिल पहाण्या सारखी आहे. (तुमच्या संगणकाचा आवाज बंद करुन एकदा ही कवायत बघाच!) इथून पुढे मात्र गोवारीकरांनी दिग्दर्शन एकता कपूरच्या कुशल नेतृत्वाकडे सोपावाले आहे. प्रेम करणारा पती कजाग नसणारी सासू असे सगळे असूनही एकता कपूरने तिचे टॅलंट दाखवले आहे अकबराच्या दाईचे पात्र रंगवण्यात. अकबराचा सांभाळ आईपेक्षा म्हणे ह्या दाईनेच केलेला असतो. आणि सासू मवाळ असली तरी ही उपसासू मात्र महा कजाग असते. त्यांतून एक समज गैर समजांची मानवी नाते संबंध दाखवणारी घरेलू घर घर की कहानी सुरू होते जी पडद्यावरच बघावी..कारण मी तो पर्यंत झोपून गेलो होतो आणि मधून मधून 'किती घोरतोयस?' असं बायकोच्या आवाजात कुणीतरी म्हणत असल्याच पुसटसं आठवतंय! शेवटी काहीतरी ढढँ ढढँ वाजते आणि चित्रपट एकदाचा संपतो इतकेच आठवते आहे!!

वाचने 35755 वाचनखूण प्रतिक्रिया 81

'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' हहपुवा!! आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! परत एकदा हहपुवा!! एकदम जबरा परिक्षण.....मान गये गुरु.... - टिंग्या गोवारीकर

सर्किट Tue, 03/18/2008 - 01:24
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 03/18/2008 - 02:30
हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात?
म्हणजे काय? आम्ही खोटं बोलतो आहोत की काय? .. गांधीजी , एकता कपूर, जपानी आचारी हे सगळं 'खरंच' आहे या सिनेमात :))

चित्रा Tue, 03/18/2008 - 02:23
उगाच नावे ठेवता आमच्या हृतिकला. चांगले केले आहे त्याने काम. तुमच्या पत्नीचे काय मत झाले? हवे तर स्वतःला झोप येत होती म्हणून चित्रपट आवडला नाही असे म्हणा. आणि महाम आगाचे काम एकता कपूरने केले आहे असे म्हणता? हे तर तुम्हाला नक्की झोप आल्याचे लक्षण. ती एकता कपूर नसून इला अरूण आहे. विश्वास बसत नसल्यास हे पहा.. http://www.jodhaaakbar.com/ ह. घे. हे. सां. न. ल.

In reply to by चित्रा

कोलबेर Tue, 03/18/2008 - 02:28
नाही हो!..एकता कपुरने 'दिग्दर्शन' केले आहे असे आम्ही म्हणालो आहोत.. 'अभिनय' इला अरुणचाच आहे. बाकी ह्रितीक विषयी काय बोलणार?

In reply to by कोलबेर

चित्रा Tue, 03/18/2008 - 02:50
माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत - तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय? दुसरा एक प्रश्न - ऐश्वर्या कशी वाटली? हृतिकलाच फक्त का नावे ठेवायची? बाकी चित्रपट "हिंदी" आहे हे नक्कीच, पण इतके न आवडण्यासारखे त्यात काय आहे? मला तर चित्रपट आवडला बुवा. आणि कंटाळाही आला नाही. मग कोणी मला त्यावरून मला चित्रपट कळत नाहीत असे म्हटले तरी चालेल.

In reply to by चित्रा

कोलबेर Tue, 03/18/2008 - 03:07
तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय?
एकंदरीत आज कालच्या मुली/महिला एकतर हृतिक गटात असतात किंवा अभिषेक गटात असे आमचे एक सुक्ष्म निरिक्षण आहे. आमची ही अभिषेक गटात असल्याने ह्रितीक विषयी आमचे सहसा एकमत होते. :)
ऐश्वर्या कशी वाटली?
ऐश्वर्या ठीक वाटली.

In reply to by कोलबेर

चित्रा Tue, 03/18/2008 - 05:16
बरोबर आहे. पण मी (सध्या) दोन्ही गटात आहे! असो. ऐश्वर्या ठीक वाटली हेच बरोबर, पण हृतिक अधिक मनापासून काम केले आहे असे आपले माझे मत.

धनंजय Tue, 03/18/2008 - 02:46
हा भन्नाट विनोदी चित्रपट आमच्या क्यूमधून काढून टाकावा की वरती चढवावा हे कळत नाही. मस्त परीक्षण.

In reply to by धनंजय

लिखाळ Wed, 03/19/2008 - 21:37
धनंजयशी सहमत. मस्त परिक्षण. गांधींबद्दलचे वाक्य ऐकण्यासाठी तरी पहावा म्हणतो. :) --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

व्यंकट Tue, 03/18/2008 - 02:54
>>आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. हा हा हा !!!!!! व्यंकट

In reply to by व्यंकट

इनोबा म्हणे Tue, 03/18/2008 - 03:20
आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे आयला! ह्याच्यात त्या हृतीकची काय चूक हाय रे! गोवारीकराच्या आशूने त्येला जे सांगीतलं ,त्यानं त्येच केलं ना! (जिल्हे-तालूका ईलाही इनोबा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु Tue, 03/18/2008 - 03:14
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्‍या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हे वाक्य मी दोनदा तो चित्रपट बघूनही मला त्यात नाही आढळले..(तुम्हाला बरे आढळले!!) आणि जरी माझे दुर्लक्ष झाले असा विचार केला तरी "लगान' आणि 'स्वदेस" सारखे अप्रतिम चित्रपट देणारा आशुतोष अशी काही घोडचूक करेल हे न पटणारे आहे. आणि त्यात जे पात्र 'माहम अंगा' दाखवले आहे ते काल्पनिक नसून खरोखरच त्या दाईने अकबराला सांभाळले होते आईप्रमाणे पण नंतर काही कूट कारस्थानही केल्यामुळे अकबराने तिला मक्का-मदिना ला पाठवून दिले यात्रेसाठी.. हा इतिहास आहे. एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे. आणि एकता कपूर सारख्या क ची बाराखडी करणार्‍या निर्मातीशी आशुतोष गोवारीकर यांची तुलना करणे चुकीचे आहे. अकबराची जी प्रतिमा अभ्यासात होती तिच (९०%) तशीच रेखाटली आहे. आता जोधाचे अकबराची लग्न ठरल्यावर तिचि मनःस्थिती काय आणि कशी झाली असेल याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही याला आशुतोष गोवारिकर जबाबदार असू शकत नाही. त्यामुळे एका दिग्दर्शकाच्या बुद्धीला जे पटेल आणि एका हिंदू मुलीचा मुस्लिम मुलाशी विवाह ठरल्यावर (मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ...ठरल्यावर म्हणण्यापेक्षा लादल्यावर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे त्याने त्यात दाखवले आहे. पण मूळ कथेला ते कुठेही मारक ठरत नाही. दाखवलेली युद्धे.. अतिशय परिणाम कारक, घोडे, हत्ती यांचा यथायोग्य वापर याने त्या प्रसंगांना उठाव आला आहे. जोधा - अकबराचे एकमेकाला स्पर्शही न करता केवळ नजरेतून खुलणारे प्रेम ... कुठेही कोणत्याही प्रकारची ओंगळता न दाखवता, कोणतेही कामुक दर्शन न घडवता केलेले चित्रण.. हा या चित्रपटाच्या यशात वाटा(सध्याच्या काळात तरी) म्हणावा लागेल. आतापर्यंत कोणी मुघल हिंदुस्थानात आपले पाय रोवू शकला नाही याचे कारण त्यांनी केलेले धार्मिक आत्याचार हे जेव्हा अकबर म्हणतो... आणि पूर्वी पासून इथे राहणारे हिंदू आणि नंतर येऊन स्थायिक झालेले मुस्लिम दोघेही हिंदुस्थानी आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे धार्मिक आत्याचार करणे योग्य नव्हे.. हे वाक्य "एक सम्राटाला" शोभते. इतिहासाला कोठही धक्का न लावता केलेला हा चित्रपट.. हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

कोलबेर Tue, 03/18/2008 - 03:21
लेखाच्या शेवटी ह.घ्या. टाकायला विसरलो ही घोडचूक झाली खरी! पण आता ती चूक फक्त जनरल डायरच सुधारू शकतो!! :) -आशुतोष कोलबेरकर

In reply to by प्राजु

मुक्तसुनीत Tue, 03/18/2008 - 03:25
>>> हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. अहो, कशापाई रागावताय ? कोलबेररावसुद्धा म्हणताहेत की जरूर पहावा ....हास्यास्पद आहे म्हणूनच जरूर पहावा असा आहे की. (हघ्याहेसांनल)

In reply to by प्राजु

कोलबेर Tue, 03/18/2008 - 03:29
एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे.
आपल्या ह्या मताचा आम्ही (असहमत असलो तरी) आदरच करतो! परंतु तरीही आम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे न राहवल्याने आम्ही इथे मांडले (जे परिक्षण असल्याचा लेखकाचा दावा नाही!) तर ते चुकीचे कसे?

In reply to by प्राजु

आनंदयात्री Tue, 03/18/2008 - 10:40
प्राजुशी सहमत ! अवांतरः फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपट (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ? (अभिरुचीहीन अन तद्दन लो बजेट चित्रपटांचा चाहता) -आनंदयात्री

In reply to by आनंदयात्री

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 10:44
फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपटच (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ?
खरे आहे हे. (प्रतिसादक) आजानुकर्ण इराणी व चिनी चित्रपटही चांगले असतात असा अनुभव आहे. (अनुभवी) आजानुकर्ण हिंदी चित्रपटांइतके बटबटीत मनोरंजन कदाचित हॉलीवूडमधल्या काही मेनस्ट्रीम सिनेमांतच बघायला मिळेल. मात्र तरीही ते अधिक सुसह्य असेल. (परखड) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आनंदयात्री Tue, 03/18/2008 - 10:51
प्रतिसादक अनुभवी अन परखड रा.रा. आजानुकर्ण साहेब तुमची अभिरुची कळविल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः चला आम्ही पण आजपासुन हिंदी शिनेमांना शिव्या देणार.

चतुरंग Tue, 03/18/2008 - 03:37
आशुतोषचा हा एक चांगला प्रयत्न आहे. ऐतिहासिक चित्रपट हा खरोखर इतिहासाला धरुन काढताना बराच संयम दाखवावा लागतो नाहीतर त्याचा बोजवारा उडायला वेळ लागत नाही. जोधा-अकबर मध्ये बर्‍यापैकी संयतपणे काम झाले आहे. काही प्रसंग अर्थातच दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असतात आणि शेवटी अभिनेत्यांवर तर असतातच. हृतिकने ह्यात काम चांगले केले आहे. त्याने सम्राटाचा बाज चांगला सांभाळलाय. ऐश्वर्यापेक्षा तो अभिनयात सरस ठरलाय असे माझे मत. त्याचा फिटनेस ही वाखाणण्याजोगा आहे (ही बाब नगण्य नाही). लढाईची दृश्येही चांगली आहेत. असे चित्रपट सध्याच्या काळात काढणे खरोखरच कठिण आहे. परीक्षणात ज्याप्रकारे हा तद्दन चित्रपट असल्याचे भासवले आहे तसा तो नक्कीच नाहिये. (अवांतर - आशुतोषला 'लगान' नंतर लगेचच पाठीच्या त्रासाने ग्रासल्याने त्याने ह्या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन झोपून केले आहे. तो खुर्चीत बसू शकत नाही. काहीसा कै. बाबा आमट्यांसारखा त्रास.) चतुरंग

In reply to by चतुरंग

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 03:53
गोवारीकर लगानच्या संघाचा (न खेळणारा - नॉनप्लेइंग)कर्णधार झाल्यापासून सुरू झालेला पाठीचा त्रास भारतीय क्रिकेट संघाच्या (प्लेइंग) कर्णधारांकडे (सध्या धोनी) वारशाने चालत आला आहे, असेही इतिहास सांगतो. (ट्वेल्थ मॅन)बेसनलाडू बाकी जोधा अकबर येथे वर्णिला गेलाय तितका हास्यास्पद नाही; मात्र (ऍज क्लेम्ड इन द मूवी) चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग (सोप्या मराठीत 'उधळपट्टी'') लक्षात घेता निदान नितीन देसाई-गोवारीकरांसारखी मराठी माणसे विनोदी चित्रपट काढायचे धाडस करायची नाहीत, असे वाटते. (मध्यमवर्गीय)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग Tue, 03/18/2008 - 08:17
आणि कालखंडाला आवश्यक असलेली वेशभूषा, हत्तीघोडे इ. लवाजमा दाखविणे खर्चिक असणारच पण म्हणून ते चूक कसे? >>चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. >> हो शक्य आहे. त्याकाळातल्या काही कॄती ह्या आज हास्यास्पद वाटू शकतात आणि म्हणूनच मी वरती म्हटले आहे की इतिहासाला धरुन चित्रपट काढायचा असला तर हे अवघड काम धाडसाने करावे लागते आणि गोष्टी हास्यास्पद वाटतील ह्या भीतीने विपर्यास करता कामा नये! एकदम टोकाची भूमिका घेऊन ती व्यक्तिरेखा अगदी पूजनीय वगैरे करुन टाकली जाण्याची दाट शक्यता अशावेळी असते. ते होणार नाही ह्याची काळजी घेण्यात आशुतोष यशस्वी झाला आहे आणि ते त्याचे यश आहे असे मी मानतो. बाकी भूमिका, अभिनय इ. मधे वैयक्तिक मतमतांतरे असू शकतात. चतुरंग

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 09:51
भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग लक्षात घेतला तरी 'जाणता राजा' आम्हाला विनोदी वाटले होते. चित्रपटावर खर्च केलेला पैसा हा कलाकृतीचा दर्जा मोजण्यासाठीचा निकष ठरू नये असे वाटते, (कंजूस) आजानुकर्ण चिदंबरम

सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 05:25
पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायतखासच. तरी मला एक प्रश्न आहे. असला हिंदी सिनेमा पाहायला जातांना आपण मेंदू आणी घड्याळ बरोबर का नेता? जवळवळ प्रत्येक हिंदी चित्रपट एकताचाच असतो. असोधमाल आली. मस्त परीक्षण. अशीच येऊ द्यात.

सृष्टीलावण्या Tue, 03/18/2008 - 08:17
आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा... मी त्यावर एक चांगले उपाय काढले आहेत. १) सर्व मराठी वृत्तपत्रांत जो सगळ्यात जास्त टीका करतो अश्या समीक्षकाचे परीक्षण वाचायचे. २) आपली आणि ज्यांची चित्रपटांची आवड कणभर सुद्धा जुळत नाही त्यांना चित्रपट आवडला असेल तर तो चित्रपट मुळीच पाहायला जायचे नाही. ३) तो चित्रपट घरी आधी केबलवर पाहायचा आणि अगदी फारच आवडला तरच पाहायला जायचे. ४) शक्यतो मल्टिप्लेक्स मध्ये जायचे टाळायचे. इ.इ. असो. अकबर कोणी महात्मा नव्हता असे इतिहास सांगतो. सविस्तर इथे वाचा. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

जोधा-अकबर चांगला चित्रपट आहे, पण त्याच्या या सुंदर हसर्‍या परिक्षणाने आमची ह. ह.पु. वा. झाली. :) बाकी त्या 'ख्वाजा मेरे ख्वाजा' या गाण्याने रडावे की हसावे कळत नाही, हे मात्र खरेच आहे. पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायत या उपमांना तोड नाही. :))))))))))

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 09:24
कोलबेरराव, परीक्षण चित्रपटापेक्षा मनोरंजक आहे. अधिक काय लिहू. (आनंदित) आजानुकर्ण

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 09:31
वरूणदेवा, झक्कास परिक्षण केले आहेस... मजा आली.. माझं वैयक्तिक मत विचाराल तर मला हा चित्रपट जामच बोअर वाटला होता. गाढ झोप लागण्याकरता या चित्रपटाचा उत्तम उपयोग होऊ शकेल असे वाटते! :) तात्या.

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 09:50
अवांतर - कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी बघितली की 'गोलमाल' सारखे निखळ चित्रपट देणारे आमचे हृषिदा खरंच किती मोठे होते हे समजतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 09:56
कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी --- आक्षेप आहे. जो मनुष्य शाहरूख खानकडून योग्य इन्टेन्सिटीचा अभिनय (स्वदेस) करून घेऊ शकतो :) :) आणि आमिर खानसारख्या कसलेल्या अभिनेत्यासोबत, त्याची दादागिरी (दिग्दर्शक मराठी माणूस आणि आमिर खान निर्माता - पैसा पुरवणारा, मेहनताना देणारा इ. असून!) नियंत्रणाखाली ठेवून काम करू शकतो, तो दिग्दर्शक मोठा आहे, हे मान्य करण्यास हरकत नसावी.त्यातून आशुतोषने स्वत:च स्वतःच्या तोंडाने स्वतःचे गोडवे गायल्याचे (निदान माझ्या तरी) पाहण्यात/वाचनात/ऐकण्यात नाही. मग असा बिनबुडाचा आरोप करण्यात काय हशील? (विश्लेषक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 10:02
कबूल आहे, अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात! असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 10:05
अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात --- हे वादातीत आहे. विषय वेगळे, कलाकार वेगळे, काळ वेगळा हे लक्षात घेऊन मी तरी बेनिफिट ऑफ डाउट देऊ शकतो. (सहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु Wed, 03/19/2008 - 08:31
काळ वेगळा, कलाकार वेगळा.... आणि गोलमाल सारख्या पूर्णपणे विनोदी चित्रपटाशी जोधा-अकबर ची तुलना नाही होऊ शकत. तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. हा चित्रपट तर ऐतिहासिक आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 08:41
तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. भन्नाट?? अहो आमच्या उत्पल दत्तची साधी एन्ट्री, पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. शिवाय गोलमाल है भाई सब गोलमाल है, आनेवाला पल यासारखी सुंदर गाणी गोलमाल मध्ये आहेत त्याचीही हेराफेरीत बोंब आहे. असो.. आपला, (गोलमाल, उत्पल दत्त प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 08:50
पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. --- असहमत. परेश रावलचा अभिनेता म्हणून विचार करावयाचा झाल्यास त्याची स्टेजवरील नाटके, 'सरदार', 'सर' सारखे चित्रपट यांची उदाहरणे देता येतील. विथ ड्यू रेस्पेक्ट टु उत्पल दत्त, केवळ उठणं-बसणं, दिसणं, श्रीराम लागूंसारखी ठराविक पठडीतील संवादफेक इतकेच चांगल्या अभिनयाचे निकष नसतात, असे वाटते. खरे पाहता परेश रावल, नासिरुद्दीन शहा, के के मेनन, मनोज बाजपाई यांसारख्या अभिनेत्यांनी उठण्याबसण्यात किंवा दिसण्यात असणार्‍या उणिवांची कमतरता भरून काढून 'अभिनेता' म्हणून नाव कमावले आहे, हे विसरता येणार नाही. शिवाय हेराफेरीतील हिंसा ही सामान्य हिंसा नाही, तर निमित्तमात्र, प्रासंगिक मारामारी आहे. हिंसा बघायची असल्यास स्मोकिंग एसेस हा इंग्रजी चित्रपट पहावा :) यात पाहिलेली हिंसा (निदान माझ्या तरी पाहण्यात )इतरत्र आलेली नाही :) (अभिनेता)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Wed, 03/19/2008 - 09:12
बेसनलाडवाशी सहमत आहे. हिंसा बघायची असेल तर टॅरेंटिनोचा सिनेमा बघा. विशेषतः पल्प फिक्शन किंवा किल बिल. जमल्यास सिटी ऑफ गॉड बघा त्यातलीहिंसा पाहून मन बधीर झाले नाही तर मग जोधा अकबर बघा. नक्की बधीर होईल. आपला, (हिंसकलाडू) आजानुकर्ण

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग Wed, 03/19/2008 - 20:38
'गोलमाल' आणि 'हेराफेरी' ह्याचीही तुलना बरोबर नाही. दिग्दर्शकीय कौशल्याचा भाग घेतलात तर त्यात हृषीदा हे प्रियदर्शनपेक्षा कैक पटीने मोठे आहेत ह्यात वाद नाही. पण त्यात परेश रावलचा रोल हा वाखाणण्याजोगा होता आणि तो एक सशक्त अभिनेता आहे ह्यात शंकाच नाही. शेवटी दिग्दर्शक चांगला असला तर सोन्याला सुगंध येतोच पण मुळात सोने हवे ना? तेव्हा तुलना ही काळानुरुप हवी. (अवांतर - नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. पण त्यातही अशोककुमार, संजीवकुमार, अमिताभ, अशा लोकांनी त्यांचे वेगळेपण दाखवून दिलेच.) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु Wed, 03/19/2008 - 22:08
नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. उदाहरणच द्यायचे तर.. भारत भूषण.. केवळ उत्तम सहनायिका मिळाल्या आणि पट्टीचे संगितकार आणि गायक... यांच्या जोरावर चालून गेला. नाहितर चेहर्‍यावरची माशी हलेल तर शप्पथ! तसाच तो राजेंद्र कुमार..जॉय मुखर्जी... काही प्रमाणात मनोज कुमार (चेहर्‍यावरचा हात काढला तर संवाद ऐकू येतील) यांना अभिनेता का म्हणायचे असा प्रश्नच पडतो. या सगळ्यांच्या बाबतीत एक अभिनय ही गोष्ट सोडली तर बाकीच्या चित्रपट हिट्ट होण्यासाठी लागणार्‍या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे, स्टोरी, गीतकार, संगितकार, गायक... आणि प्रोड्युसर.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Wed, 03/19/2008 - 22:13
हृषिकेशदां एक उत्तम दिग्दर्शक होते यांत काडी इतकी सुद्धा शंका नाही. पण त्यांनी सुद्धा, गोल माल मधले संवाद जसेच्या तसे त्यांच्याच नरम गरम या चित्रपटात वापरले आहेत. आणि मुख्य म्हणजे ते संवाद उत्पलदत्त यांच्याच तोंडी आहेत. आणि अभिनयही अगदी सारखा आहे.. ते असे.. "कितना पवित्र घर है, जैसा पवित्र घर है वैसा ही पवित्र वातावरण, जैसा पवित्र वातावरण वैसेही पवित्र विचार..... आपके पवित्र कहा है.. आपकी माताजी कहाहै??" - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 10:52
लगान हा चित्रपट टुकार व तद्दन नव्हता. सुरवातीला नव्हता परंतु दुसर्‍या की तिसर्‍या दिवशीच्या खेळाआधी रात्री मंदिरात सगळी मंडळी भावनाविवश होऊन भजनबिजन गाऊ लागतात तिथे या चित्रपटाचा बॅलन्स पार जातो आणि चित्रपट तद्दनतेकडे वळतो! आपला, (हृषिदा, गुलजारच्या चित्रपटांचा प्रेमी) तात्या.‍

जुना अभिजित Tue, 03/18/2008 - 13:55
(मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ह्यावरुन सुचलं. स्वप्निल बांदोडकरचं 'राधा ही बावरी' गाणं थोडा फेरफार करून 'जोधा ही बावरी' असं वापरता आलं असतं.. स्वदेस आणि लगानच्या तुलनेत हा चित्रपट गंडला आहे हे नक्की.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

मनस्वी Tue, 03/18/2008 - 10:38
वेगळ्या धाटणीचे परिक्षण आवडले. मजा आली. वाचकांनी इतके सिरियसली घेउ नये. असे हलकेफुलके वाचायला छान वाटते. मनस्वी

धम्मकलाडू Tue, 03/18/2008 - 13:12
सुरेख परीक्षण कोलबेर. अभिनंदन.
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'
हा संवाद ऐकून डोळ्यांत पाणी आले. खरंच कसं काय सुचतं हे सारं काही. दिग्दर्शकाला. प्राजू, पुन्हा एकदा चित्रपट नीट बघा बरं.
त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत.
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 13:23
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. हा हा हा! जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. खोजा-अकबर!! हहपुवा.... :) आपला, (ज़नानखान्याचा खोजा) तात्या.

In reply to by धम्मकलाडू

मनस्वी Tue, 03/18/2008 - 13:54
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो.
आमच्या हृतिकला नावे ठेवलेली मुळीच खपवून घेणार नाही. गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे. ह.घ्या. मनस्वी

In reply to by मनस्वी

जुना अभिजित Tue, 03/18/2008 - 14:03
गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे अहो अजून रुत्थिकला मणिरत्नम भेटलेला नाही. ते भेटूनसुद्धा जर रुत्थिकने मंदपणा कायम ठेवला तर मानलं. अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

मनस्वी Tue, 03/18/2008 - 14:10
अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय..
आणि अभिनय करण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षक मरतील! मनस्वी

In reply to by मनस्वी

टारझन Wed, 07/09/2008 - 03:14
मनस्वी से १००% सहमत ....किसने हमारे हृतिक को नाव ठेवणेकी गुस्ताखी की ? अर्रे ओ सांभा , ऊठा तो जरा बंदूक और लगा तो निसाना ये गुस्ताखी करने वाले पे .. आरे तुमको तो चू__ अभिषेक (बाप अमिताभ नसता तर दादर स्टेशन वर बिल्ला लाऊनच फिरला आसता ..) आणि ती भटकभवानी ऐश्वर्या नाही का दिसत ('हे आमचे वैयक्तिक मत... जगातले ९९.९९९९९९९% लोकांनीच काय पण ब्रम्हदेवानी जरी सांगितलं तरी बदलनार नाही.') हमारे हृतिक के पास ईटालियन लूक्स है, बॉडी है, ऍक्शन है, अफलातुन डान्स स्किल है(जरा अभिशेक च्या "नाचरे मोरा " बरोबर कंपेअर करा) बाकी त्या ऐश्वर्यामधे मला काही एक सूंदरता दिसलेली नाही (कत्रिना प्रियांका लाख पटीने बर्‍या) ती पिक्चरमधे फार बोर मारते राव .. आई शप्पथ... आपल्या ईथे बाहेरून गाजा-वाजा झाला की विचार न करता त्याकडे पळायची पारंपारिक प्रथा आहे... ऐश्वर्या कौतुक त्यातलाच एक भाग बाकी त्या आख्ख्या बच्च्न कुटूंबाला पैशाचीच हाव.. तो मोठा ब आता फक्त हार्पिक च्या जाहिरातीत , ह्या प्रॉडक्ट ने तुमचे तयखाने साफ करा ..(मी यानेच करतो ) असे सांगायचा बाकी राहिलाय. त्यांच्या धर्मपत्नी चार फुटी राजकारन करून आपलीच रंगीत करून घेतात.. आणि ऊरलेल्या दोघांचा महीमा सांगायला महीना अपूरा पडेल अवांतर : (ईथे बाकीचा चर्चा जास्त झाल्याने मुळ मुद्द अवांतर मधे का घेतला याची हुशार लोकांना कल्पना येईल) कुणाचे काही मत असो. आपल्याला समिक्षण भयानक आवडले.... मला चित्रपटात आपला हृतिकच आवडला फक्त... बाकी बकवासच होता... ईतिहासपट बघावा तर ट्रॉय सारखा... आपल्याला तर बुआ हृतिक ब्रॅड च्या जोडीचा नक्कीच वाट्टो.. (ब्रॅड ने हृतिक सारख नाचून दाखवावे) हृतिकप्रेमी आणि बच्चन शत्रु ) कु. ख
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

सृष्टीलावण्या Tue, 03/18/2008 - 15:15
तो अमिताभ बच्चनचा मुलगा आहे. एकच ओळख. ते खरे पण सध्या अमिताभच अभिषेक बरोबर एकावर एक योजनेत ( under One plus one free scheme) मोफत येतो जिकडे तिकडे उदा. झुबझु, बंटी-बबली. अभिषेकचा 'रन' चित्रपटातला बथ्थडपणा खासच विशेषत: 'जरा जरा' गाण्यातला. हृतिकला त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. अर्थात दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

जुना अभिजित Tue, 03/18/2008 - 15:46
दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल. मै प्रेम की दिवानी हूं चित्रपटासाठी. आणि नायिकांमध्ये करिनाला एकटीला. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by सृष्टीलावण्या

एक Tue, 03/18/2008 - 22:54
हिट गेल्यावर अमिताभ महाराजांनी एक मोठ्ठा विनोद केला होता. ते म्हणाले, "धूम २ चा खरा हिरो अभिषेक आहे. लोकं त्याला बघायला येत आहेत..." आंधळी लोकं जात असतील. मी तर ऐशू ला बघायला गेलो होतो (बायको हृतिक ला). जो पर्यंत ऐशू अभिनयासाठी तोंड उघडत नाहीत तो पर्यंत बेश्ट दिसते..हृतिकची एंट्री तर आपल्याला पण जाम आवडली..असा फिटनेस ठेवणं आणि ग्रेसफुली नाचणं खायचं काम नाही..

In reply to by एक

आजानुकर्ण Wed, 03/19/2008 - 09:07
असा फिटनेस ठेवणं हे न खायचं काम आहे.. असे म्हणायचे आहे का एक शेठ! (दीडशहाणा) आजानुकर्ण

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 16:31
मै प्रेम की दिवानी हूं... खर॑य. च्यायला शिणेमाच्या प्रोमोजमध्ये त्या अभिषेकला सायकलीवर बसून गरागरा चकरा मारताना पाहून मला खरच वाटल॑ होत॑ की हे येड॑ मतिम॑दाचा रोल करत॑य :-))) त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्‍यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-)))) असो, बहुतेक अभिषेकच्या जी कोणती गाडी असेल तिच्या मागे नक्की लिहिलेल॑ असणार..... "आई-वडिला॑ची कृपा" हृतिकशेठबद्दल पण आपल॑ काही खास मत नाहीय्ये. नाच-बिच चा॑गला करतो, चा॑गला लवचिक आहे...पण प्रभुदेवा पण तसाच आहे की :-))

In reply to by धमाल मुलगा

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 16:45
त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्‍यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-))))
चोख समीक्षा. (न्हावी) आजानुकर्ण

कोलबेर Tue, 03/18/2008 - 20:23
लेख आवडला/ नाही आवडला हे आवर्जुन कळवणार्‍यांचे आणि सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार! - आशुतोष कोलबेरकर

शरुबाबा Wed, 03/19/2008 - 11:19
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? >(दुवा मिळेल का ).

प्रसन्न Wed, 03/19/2008 - 13:33
मला हा चित्रपट आवड्ला, पण तुमच हे परिक्षणसुधा आपल्याला लै आवडल, बेस्ट आहे. लगे रहो.......

आणि हा विनोदी चित्रपट फार आवडला बुवा मला.. किती उच्च प्रतिचे विनोद होते यात सुरुवातीपासून... :"भारतावर प्रेम करणार्‍या मुघल सल्तनतीचा उदय झाला "म्हणे.यात होते कोण कोण तर "हुमायून, बाबर.. आणि या परंपरेत दाखल झाला अकबर". वाहवा! हो ना! आणि याच परंपरेत पुढे जहांगीर, शाहजहान, औरंगझेब असे राजे निर्माण झाले असे सुधा म्हणतील हे लोक. मग काही दिवसानी औरंगझेबावर पण सिनेमा लागेल आणि त्यात त्याचा उल्लेख "प्रेमळ, मनमिळावू, सहृदय" असा झाला तर आश्चर्य वाटायला नको. पुण्याचे पेशवे

छोटा डॉन Wed, 03/19/2008 - 22:37
कोलबेरराव जबरा परिक्षण लिहले आहे. मलाही पिक्चर जास्त आवडला नव्हता, झोपलो नाही इतकेच .... "'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'" हे वाक्य खरोखर आहे का नाही ते लक्षात नाही पण अकबराने असे सोडून दिलेले अजिबात आवडले नाही.... च्यायला पिक्चर बघण्यामागे आमच्या काही अपेक्षा असतात आणि त्या जर तुम्ही पूर्ण करणार नसाल तर आम्हाला 'दगडफेक' करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे आम्ही मानतो... शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना?..." हा हा हा. आणि समजा घातली असती तर अकबराने म्हणायला हवे " बारातीयों का स्वागत हम रेडियो मिर्ची लगाकर करेंगे " अजून एक खटाकलेला प्रसंग म्हणजे अकबराचे "खलिफा-ए-तुर्कस्तानच्या" आवेशात बाजारात काय जातो, तिथे सवाल्-जबाब काय करतो, लोक पण त्याला अत्यंत "महत्वपूर्ण व आतल्या गोटातली" माहिती देतात ... सगळेच हस्यास्पद ... मला शंका आली की आता अकबराला बाजारात "मार तर नाही खवा लागणार". आता तुम्ही अकबराला येवढे "दिलवाले जिल्लेईलाही" दाखवले आहे तर त्याच्या दरबारातील "नवरत्ने " दाखवता नाहित आली ... बाकी तुमच्या उपमा जपानी आचारी , मतिमंद, पान पराग ह्याला तोड नाही ... छोटा डॉन-ए- बंगरूळूस्तान [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर गुरुवार, 03/20/2008 - 02:47
ह ह पु वा झाली... ........... अतिशयोक्त वर्णन आवडले....( अर्थात तुम्ही जितकी वाट लावून ठेवली आहे, तितकी फिल्म वाईट नाही... आमच्या मते काही प्रसंग झकास जमले आहेत उदा. तलवार बाजी करणार्‍या हृतिक ला जोधाने लपून पाहणे, युद्धे,हत्ती ला काबूत आणणे वगैरे)... ते असो) सर्व लोक तुमचे गान्धीजी डायलॉग फार सीरियसली घेत आहेत...का कोण जाणे?? अहो, तुम्ही फार लवकर झोपलात..... पुढे फार विनोदी विनोदी प्रसन्ग तुम्ही मिस केलेत..... उदा. १.ते २६ जानेवारील दिल्लीला असते तसे गाणे किंवा गॅदरिन्ग ला असते ना प्राथमिक शाळेच्या , तसे , ( अझीमो-शाह-शहन्शाह).....त्यात तर नन्तर नन्तर डोक्यात पिसे खोवलेले ईशान्येचे आदिवासी डांस करताना पाहून खूपच करमणूक झाली...आणि टिपिकल कोरिओग्राफी, गोलात नाचतायत , एकदा पुढे, मग मागे, एकदा क्लॉक्वाईज मग बाहेरचा गोल अँटिक्लॉकवाईज)वगैरे.... २. अकबर आपल्या बायकोसमोर आपण निरक्षर असल्याचे कबूल करतो तो प्रसंग महा विनोदी आहे....( सत्य असले तरी लेखकाने आपल रिसर्च दाखवायची ती वेळ नव्हती) ३.हृतिक ने काम बरेच बरे केले आहे, पण एकूणच सारखे प्रश्न पडत राहतात सिनेम पाहताना.... जेव्हा तो म्हणतो , " हम हिन्दुस्तान को गलत हाथोमें नाही जाने देंगे"..अरे जलालुद्दिन, तू स्वतःच गलत नाहीस का रे लब्बाडा, कुठून बाहेरून येतोस , आणि हिन्दुस्थानावर राज्य करतोस?? ______________________ ते ख्वाजा मेरे ख्वाजा गाण्यातले हावभाव आणि नृत्य मलाही भयन्कर विनोदी वाटले होते...परन्तु "तुर्कनामा " ( ले. मीना प्रभु) या पुस्तकात या धार्मिक गाणे गात गोल गोल फिरणार्‍या तुर्की मंडळींचे फोटो आहेत, ती तशीच पद्धत असते म्हणे गात नाचण्याची.... थोडक्यात गोवारीकरांचा रिसर्च तुम्हाला -आम्हाला झेपला नाही इतकेच.... ______________________________ माझ्या बायकोच्या मते अकबर सिनेमात लहानपणापासून कोणाच्या तरी इच्छेने चालणारा दाखवला आहे, आधी बहराम खान, मग ती दाई, मग जोधा ( ती म्हणते म्हणून जनतेच्या कल्याणाची कामे करतो तो..... आणि तीर्थयात्रेचा टॅक्स कमी करणे इतकेच काय ते महान काम दाखवले आहे....)....शेवटी शेवटी सिनेमा सम्पता सम्पत नाही....आवरा हो आवरा, असे म्हणायची वेळ येते प्रेक्षकावर, मला जाम कंटाळा आला..._______________एवढ्या पैशांत किमान पन्नास चांगले मराठी सिनेमे निघाले असते....

देवदत्त Sun, 03/30/2008 - 01:32
मला तर सिनेमा एवढा खराब नाही वाटला. एकदा तरी पाहू शकतो. हो, एवढे आहे की इतर आवडलेल्या सिनेमांप्रमाणे नंतर टीव्ही वर त्याची जाहिरात पाहताना चित्रपट पाहिल्याची खास आठवण येत नाही ( हा माझा चित्रपट आवडणे/ न आवडणे ह्याचा निकष काढण्याच्या पद्धतीतील एक आहे. माझ्या फिल्लमबाजीवर नंतर लिहिनच :) ) मी सिनेमा पहायला गेलो तो हृतिक रोशन करीता, आणि त्यावेळी नववधूबरोबर तोच एक चित्रपट पहावासा वाटला ;) सर्वांचे काम आहेच चांगले, गाणी एवढी खास नाही वाटली. आताही माहित नाही त्यात किती व कोणती गाणी आहेत

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 11:54
जबरा!!!!.. परिक्षण वाचून ह ह लो पो :))))))) त्यातही जपानी आचारी, पान पराग आणि गांधी तर क्लास !!! जियो! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

ऐश्वर्या राय Mon, 04/07/2008 - 00:11
मी हा चित्रपट पाहीला नाही. पाहण्याचे काही कारणही नाही. पण, तुमच्या 'आग्रहा'मुळे हे अत्यंत कंटाळवाणे गाणे उगिच बघितले. हे गाणेतर विनोदीही नाही. नुसतेच रटाळ साडेसहा मिनिटे........................................................................................................... अशी. कंटाळलेली, ऐश

बबलु Wed, 07/09/2008 - 02:05
जोधा अकबर चांगला सिनेमा आहे. अकबराचा थोडा उदो उदो आहे which is bad. पण in general या परिक्षणा इतका वाईट नक्किच नाहि.