मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जोधा अकबर

कोलबेर · · जनातलं, मनातलं
आशुतोष गोवारिकरचा हा भव्य दिव्य वादग्रस्त चित्रपट एकदाचा पाहायला मिळाला. भारतात हा चित्रपट बंद पाडण्यासाठी लोक रस्त्यावर का उतरले आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. इतिहास वगैरे मारो गोली पण आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा त्या बदल्यात पदरात असले काही पडणार असेल तर लोकं रस्त्यावर येणारच. असो.. तर हा भव्य दिव्य चित्रपट सुरू होतो अमिताभ बच्चन ह्यांच्या खर्जातल्या आवाजाने. मुघल भारतात कसे आले इथपासून ते छोटा अकबर पानिपतावर कसा पोहोचला इथपर्यंत त्यांचा आवाज आपली सोबत करतो. पानिपतात मुघल सैन्याने हिंदू राजाला छोट्या अकबरा समोर पेश केले असता अकबर त्याला मारत नाही. 'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्‍या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हा चित्रपट ८०%च इतिहासावर असून २०% गोवारिकरांचे स्वप्न रंजन आहे हे तुम्हाला माहीत नाही का?) नंतर थोड्या लढाया स्पेशल इफेक्ट वगैरे झाले की कथा वळते राजपूत राज घराण्यांकडे. इथे आमेर नावाच्या संस्थानात एक वेडसर राजा असतो. त्याची मुलगी म्हणजे जोधा (ऐश्वर्या राय-बच्चन) जी फावल्या वेळात आपल्या भावाशी ढाल तलवार वगैरे (एकदम रजपूत ष्टाईल) खेळत असते. तर हा राजा लवकरच आपला वारीस जाहीर करणार असतो आणि जोधाला आपला ढाल तलवारवाला भाऊ नॉमिनेशन जिंकणार अशी खात्री असते. शेवटी दसर्‍याच्या दिवशी हा राजा (अर्थातच वेडसर असल्याने) दुसर्‍याच कुणाची तरी निवड वारस म्हणून करतो आणि आपल्या जोधाचा विवाह देखिल तिच्या बालपणीच ठरलेल्या राजकुमाराशी जाहीर करून टाकतो. इकडे सत्ता आपल्याला मिळत नाही म्हणून हा चिडलेला भाऊ राजाच्या विरोधात कट शिजवू लागतो. हे पाहून राजाची मात्र चांगलीच टरकते आणि तो सरळ जाऊन मुघलांशी हातमिळवणी करायचे ठरवतो आणि कहानीमे ट्वीस्ट इथे येतो. मुघलांना मी माझे राज्य अर्पण करेन पण त्यांच्या बादशहाने माझ्या मुलीला देखिल त्याच्या जनानखान्यात भरती केले पाहिजे अशी 'अट' (जोधाला न विचारताच) परस्पर घालून टाकतो. आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. शेवटी थोडेसे आढेवेढे घेतल्यावर अकबर ऑफर एकदाचा कबूल करतो. परंतु आता जोधा मात्र ह्या प्रकाराने वैतागलेली असते.. ती म्हणते माझ्या मना विरुद्ध लग्न ठरवताय? काही हरकत नाही! पण माझ्या सुद्धा दोन अटी आहेत. आता हा राजा, लग्न ठरवताना मुलीला कसलेही मत विचारत नाही पण ह्या अटींचे प्रकरण मात्र एकदम मान्य करतो... का? अहो शेवटी वेडसरंच ना तो! तर ह्या अटी ती फक्त अकबरालाच सांगणार म्हणे बाकी कूण्णालाही नाही असा क्लॉज देखिल असतो..झाले सगळे पुन्हा एकदम टेन्शन मध्ये.. एकदम सीरियस म्युझिक. शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना? असा एक अविचार मनात डोकावून जातो. पण नाही जोधाच्या दोन शुल्लक अटी अकबर कबूल करतो आणि धूमधडाक्यात लगीन लावून तिला घेऊन जातो. इथं एक 'ख्वाजा मेरे ख्वाजा' नावाचे गाणे येते त्याच्या शेवटी ह्रीतीकने केलेला नाच अगदी बघण्यासारखा आहे. त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत (दुवा बघुन खात्री करा!). पांढरे वेष घातलेल्या जपानी रेस्टॉरंटातल्या आचार्‍यां सारख्या दिसणार्‍या कलाकारांनी केलेली कवायत देखिल पहाण्या सारखी आहे. (तुमच्या संगणकाचा आवाज बंद करुन एकदा ही कवायत बघाच!) इथून पुढे मात्र गोवारीकरांनी दिग्दर्शन एकता कपूरच्या कुशल नेतृत्वाकडे सोपावाले आहे. प्रेम करणारा पती कजाग नसणारी सासू असे सगळे असूनही एकता कपूरने तिचे टॅलंट दाखवले आहे अकबराच्या दाईचे पात्र रंगवण्यात. अकबराचा सांभाळ आईपेक्षा म्हणे ह्या दाईनेच केलेला असतो. आणि सासू मवाळ असली तरी ही उपसासू मात्र महा कजाग असते. त्यांतून एक समज गैर समजांची मानवी नाते संबंध दाखवणारी घरेलू घर घर की कहानी सुरू होते जी पडद्यावरच बघावी..कारण मी तो पर्यंत झोपून गेलो होतो आणि मधून मधून 'किती घोरतोयस?' असं बायकोच्या आवाजात कुणीतरी म्हणत असल्याच पुसटसं आठवतंय! शेवटी काहीतरी ढढँ ढढँ वाजते आणि चित्रपट एकदाचा संपतो इतकेच आठवते आहे!!

वाचन 35753 प्रतिक्रिया 0