मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वृद्ध मातापित्यांची समस्या

३_१४ विक्षिप्त अदिती · · काथ्याकूट
एकत्र कुटुंबपद्धतीच्या घरांमधे वृद्धांचा प्रश्न फारसा त्रासदायक नव्हता. पणज्या, आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मुलं, नातवंडं सगळीच मंडळी एका घरात रहायची. घरात अनेक माणसं असल्यामुळे वृद्धांना एकटेपणा काय ते माहित नव्हतं, घरातले कर्ते पुरूष पैसा कमावण्यासाठी घराबाहेर असायचे, स्त्रिया घर चालवण्याच्या (ज्याला आपण आता बॅकएंड किंवा पडद्याआडची कामं म्हणू शकतो) कामात गर्क असल्या तरी पोरांकडे लक्ष द्यायला आजी-आजोबा होतेच, अतिवृद्धांची काळजीही घरात घेतली जायची. औद्योगिकीकरणानंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. आपल्या मूळ गावात नोकरी-धंदा नसल्यामुळे किंवा त्यात आवड नसल्यामुळे अनेक मुलं आणि कालांतराने मुलीही तालुका, शहरांच्या ठिकाणी येऊन राहू लागल्या. मुलं जगण्याची शक्यता खूपच वाढली, त्याचबरोबर घरांच्या, स्थावर मालमत्तांच्या किंमतीही वाढल्या, विशेषतः शहर आणि आजूबाजूच्या भागात. आता एकत्र कुटुंब असणं जागा कमी असणे, जीवनपद्धतीमधला फरक यामुळे थोडं कठीण होतं आहे. पण त्याच्याच जोडीला इतर अनेक घटकांच्या बरोबरीनेच आधुनिक औषधांच्या मदतीने जीवनमान उंचावत आहे. एकेकाळी माणसांची साठी आली की उत्सव असायचा, आता आपल्या आजूबाजूला ऐशी वर्ष जगणारे अनेक वृद्ध दिसतात. पण अनेक कारणांमुळे मुलग्यांबरोबर रहाणं वृद्ध मातापित्यांना शक्य नसतं. एकच अपत्य आणि ती मुलगी असणं, पुरूष अपत्य नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मूळ गावापासून फार लांब किंवा परदेशात असणं आणि परगावी, परदेशात अजिबातच न करमणं, व्यक्तीस्वातंत्र्याच्या पुरूष अपत्यांच्या कल्पना इत्यादी अनेक कारणांमुळे वृद्ध पालकांवर आपल्या लग्न झालेल्या मुलीकडे रहाण्याची वेळ येऊ शकते. तसंही मुलीचं बाळंतपण माहेरी करण्याची पद्धत आहे. जेव्हा मुलीला काही कारणांमुळे माहेरी येऊन रहाणं शक्य नसतं तेव्हा तिचे पालक तिच्याकडे जाऊन रहातात आणि कौतुकाने मुलगी आणि नातवंडांची देखभाल करतात. जर हे शक्य आहे तर म्हातारपणाची काठी म्हणून मुलीकडे का पाहू नये? मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये?
-------
जाता जाता: (घरच्या घरी केलेलं एक निरीक्षण. या निरीक्षणात आई-मुलींच्या साधारण दहा जोड्याच अंतर्भूत आहेत, पण सगळीकडे एकसारखंच निरीक्षण आढळलं म्हणून नोंदवावसं वाटलं.) विभक्त कुटुंबात, जिथे नवरा-बायको एकत्र रहात आहेत आणि पुढे मुलं झाल्यानंतर ती, तिथे घरातल्या पद्धती या मुलीच्या घरासारख्या होतात. उदा: घरचं जेवण बनवण्याची पद्धत; आई भाजीत गूळ घालत नसेल तर मुलगीही घालत नाही. मुलीचा नवरा घरी स्वयंपाक करत असेल तरीही मुलगी त्याला तिच्या आवडीप्रमाणेच जेवण बनवायला शिकवते/सांगते. पुरूषप्रधान व्यवस्थेत घर पुरूषाचं असतं पण आतला बहुतांश किंवा सर्व कारभार मुलीच्या घरासारखा असतो. तर मग मुलाने सासर्‍याकडेच रहाण्यास काय हरकत आहे? तिथे सासर्‍याची सहानुभूतीही मिळेल आणि सासू कौतुकही करेल. ;-)

वाचने 36216 वाचनखूण प्रतिक्रिया 82

प्रियाली Wed, 08/17/2011 - 19:51
मुलाने सासर्‍याकडेच रहाण्यास काय हरकत आहे?
मला तरी काहीच अडचण दिसत नाही. त्यानिमित्ताने सासू प्रेमळ असते अशी धारणा होण्यास मदत होईल.
म्हातारपणाची काठी म्हणून मुलीकडे का पाहू नये? मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये?
नक्कीच पाहावे. आपल्याकडे वृद्धांना सोशल सिक्युरिटी नसते तेव्हा त्यांना आधार त्यांच्या मुलांनीच द्यायला हवा. त्यांना मुलगा असेल तरीही मुलीने मदत करावी. आपल्यावरली जबाबदारी टाळू नये आणि नवरा टाळू पाहत असेल तर त्याला टाळायला देऊ नये आणि हे मुली जितक्या जास्त स्वतंत्र तितके त्यांना अधिक जमेल असे वाटते. --- माझ्या व्यक्तीगत मताप्रमाणे लग्न झाल्यावर जोडप्याने स्वतंत्र राहावे. शक्य असल्यास आपल्या आईवडिलांची प्रायवसी आणि आपली प्रायवसी यांना महत्त्व द्यावे परंतु प्रत्यक्षात तसे करणे शक्य असेलच असे नाही. तेव्हा अशाप्रसंगी सारासार विचार करून निर्णय घ्यावा. उदा. बायको एकटी मुलगी आहे पण मुलाला भाऊ/ बहिण आहे तर त्याने मुलीकडे राहायला जाणे मला योग्य वाटते. अडचण करून राहण्यापेक्षा अधिकाधिक मोकळेपणी कसे राहता येईल हा विचार करावा.

In reply to by प्रियाली

राजेश घासकडवी गुरुवार, 08/18/2011 - 04:00
चर्चाप्रस्ताव आवडला.
तेव्हा अशाप्रसंगी सारासार विचार करून निर्णय घ्यावा.
पटलं. पण सारासार विचार म्हणजे नक्की कशाकशाचा हे महत्त्वाचं आहे. 'समाजाची रीत' या फॅक्टरला अतिरेकी वेटेज देऊनसुद्धा सारासार विचार होऊ शकतो. तसा व्हावा का हा खरा प्रश्न आहे. मूळ चर्चाप्रस्तावात म्हटल्याप्रमाणे वास्तव बदललेलं आहे. एकाच वेळी एकत्र कुटुंबपद्धतीचा त्याग व त्याचबरोबर वाढती आयुर्मर्यादा यामुळे हा प्रश्न आईवडिलांसाठी बिकट झालेला आहे. स्वातंत्र्याचा निर्णय तरुण पीढी घेते, कारण त्यात त्यांचा फायदा असतो. तसा तो घ्यावाही. पण त्याचबरोबर एकत्र कुटुंबाचे काही फायदे काही प्रमाणात जपण्यासाठी व्यवस्था करणं आवश्यक आहे. खाली रमताराम यांनी म्हटल्याप्रमाणे मुलं व आईवडील शक्य तितक्या जवळ पण स्वतंत्र राहिले तर सगळ्यांसाठीच तो सुवर्णमध्य ठरू शकतो. मात्र हे सगळ्यांना शक्य नसतं. तुम्ही मांडलेला 'घरजावई होणे' हा उपाय जरूर अमलात आणावा असं मला वाटतं. शेवटी हा प्रश्न भावनिक नसून तांत्रिक आहे. जर सगळ्यांचंच भलं होत असेल तर समाजाने नाकं मुरडण्याकडे दुर्लक्ष करावं.

In reply to by राजेश घासकडवी

प्रियाली गुरुवार, 08/18/2011 - 06:06
'समाजाची रीत' या फॅक्टरला अतिरेकी वेटेज देऊनसुद्धा सारासार विचार होऊ शकतो. तसा व्हावा का हा खरा प्रश्न आहे.
समाजाची रीत असते हे टाळता येत नाही. ज्या समाजात राहायचे त्या समाजाशी फटकून लोकांना राहता येईलच असे नाही. तसे करणारे थोडके असतात. अर्थातच, सारासार विचार करताना अतिरेकी विचार टाळावे हेच योग्य.
रमताराम यांनी म्हटल्याप्रमाणे मुलं व आईवडील शक्य तितक्या जवळ पण स्वतंत्र राहिले तर सगळ्यांसाठीच तो सुवर्णमध्य ठरू शकतो. मात्र हे सगळ्यांना शक्य नसतं.
जो पर्यंत धडधाकट आहेत तोपर्यंत स्वतंत्र राहणे योग्यच पण तसे नसेल शारीरिक किंवा आर्थिक परावलंबनामुळे मुलांचा आधार गरजेचा असतो/ होतो. निदान आपल्या देशांत तरी मुलांकडे म्हातारपणाची काठी अशाच नजरेने पाहिले जाते.
तुम्ही मांडलेला 'घरजावई होणे' हा उपाय जरूर अमलात आणावा असं मला वाटतं. शेवटी हा प्रश्न भावनिक नसून तांत्रिक आहे. जर सगळ्यांचंच भलं होत असेल तर समाजाने नाकं मुरडण्याकडे दुर्लक्ष करावं.
धन्यवाद आणि सहमत. फक्त आपण घरजावई हा शब्द टाळायला हवा असे वाटते. सुनेला कोणी घरसून म्हणत नाही. घरजावई शब्दातून जी हेटाळणी आणि तुच्छता दाखवली जाते ती त्या शब्दाचा वापर न केल्याने टळेल आणि कदाचित मग हा सासरी राहू इच्छिणार्‍या जावयाला ते लाजिरवाणे वाटणार नाही अशी आशा करते.

In reply to by प्रियाली

बहुगुणी Fri, 08/19/2011 - 19:50
"फक्त आपण घरजावई हा शब्द टाळायला हवा असे वाटते. सुनेला कोणी घरसून म्हणत नाही. घरजावई शब्दातून जी हेटाळणी आणि तुच्छता दाखवली जाते ती त्या शब्दाचा वापर न केल्याने टळेल आणि कदाचित मग हा सासरी राहू इच्छिणार्‍या जावयाला ते लाजिरवाणे वाटणार नाही अशी आशा करते." १००% सहमती! उत्तम मुद्दा: असले social stereotypes बदलले तरी खूप मदत होईल समाजमन मोकळं व्हायला.

विकास Wed, 08/17/2011 - 19:52
चांगला विषय आहे. सन्माननीय सदस्य श्री. युयुत्सुंचे मत काय आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. :-) मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये? किमान शहरी आणि सुशिक्षित भागात तरी हे होते असे वाटते. कधी कधी परीस्थितीप्रमाणे होत असेल. म्हणजे, मुलगी-जावई यांचे काम, त्यांच्या घरातील समस्या, ऐपत आदी. पण तेच मुलाच्या बाबतीतही होऊ शकते. मुलाने सासर्‍याकडेच रहाण्यास काय हरकत आहे? सासर्‍याची असली तर? ;) (जरा कुठे मुलीची पाठवणी केल्यावर "याह्हू!" असे म्हणायला लागला असेल तेव्हढ्यात :( ) बाकी यावरून एक जुनी म्हण आठवली (मतितार्थ जरा वेगळा आहे): जावई माझा भला, लेकीपाठी आला अन मुलगा माझा दिवटा, सुनेपाठी गेला! :-)

In reply to by विकास

विकास यांचा प्रतिसाद आवडला. सासर्‍याची हरकत असण्यास अजिबातच हरकत नाही. ;-) गरज, व्यवहार्यता इत्यादींचा विचार करूनच असे निर्णय घेतले जावेत.
जावई माझा भला, लेकीपाठी आला अन मुलगा माझा दिवटा, सुनेपाठी गेला!
अहो सायबाच्या भाषेतही म्हणतात की, a son is a son till he takes him a wife, a daughter is a daughter all of her life. 'जाता जाता' म्हणून मी जे काही लिहीलं आहे ते याच गोष्टीचं व्यवहार्य उदाहरण नाही का?

In reply to by विकास

नगरीनिरंजन Wed, 08/17/2011 - 20:36
>>सासर्‍याची असली तर? मुलीचं लग्न म्हणजे आपल्या अंगणातला फटाका दुसर्‍याच्या अंगणात टाकणे अशी एक व्याख्या नुकतीच ऐकण्यात आली :) (सगळ्यांनी ह. घ्या.)

शुचि Wed, 08/17/2011 - 20:03
मुली आजकाल आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असतात. त्यांनी जरूर आई-वडीलांना आधार द्यावा. पण नवरा - सासू-सासरे-आई-वडील हे कडबोळं जमायचं कसं हा व्यावहारीक प्रश्न आहेच. सर्वांनाच यात तडजोड खूप आहे. निदान मुलींनी माहेरी पैसे पाठवावेतच. काहीसे अवांतर - मुलीच्या घरी पाणी न पिणे वगैरे खुळचट कल्पना अजूनही काही जण पाळतात. माझी एक मैत्रिण आहे जिची वृद्ध, विधवा आई तिच्या घरी पाणीही पित नाही आणि हे ती मुलगी अभिमानाने सांगते. हे खटकण्यासारखे नाही काय?

In reply to by शुचि

प्रियाली Wed, 08/17/2011 - 20:05
मुलीच्या घरी पाणी न पिणे वगैरे खुळचट कल्पना अजूनही काही जण पाळतात. माझी एक मैत्रिण आहे जिची वृद्ध, विधवा आई तिच्या घरी पाणीही पित नाही आणि हे ती मुलगी अभिमानाने सांगते. हे खटकण्यासारखे नाही काय?
हे तुम्हाला खटकते हे तुम्ही तिला सांगितले का? कारण सांगितले नसेल तर ही गोष्ट इतरांना खटकण्यासारखी आहे हे तिच्या गावीही नसेल तर?

In reply to by प्रियाली

शुचि Wed, 08/17/2011 - 20:10
नाही प्रियाली फार पूर्वी (१५ वर्षे झाली) हे तिने मला सांगीतले होते. तेव्हा मी तिचे व्यक्तीगत मत म्हणून म्हणा किंवा अन्य कशात लक्ष गुंतल्याने असेल दुर्लक्ष केले होते. आता ती माझ्या संपर्कात नाही.

मुक्तसुनीत Wed, 08/17/2011 - 20:16
चांगला चर्चाविषय. सर्वप्रथम मी हे नमूद करतो की हा धागा मिसळपाववर गेल्या काही दिवसांत आलेल्या लिंगभेदादि विषयक धाग्यांच्या संदर्भात असला तर मी ते आधीचे धागे वाचलेले नाहीत माझा भलाबुरा प्रतिसाद प्रस्तुत धाग्यापुरताच मर्यादित आहे. धाग्यातल्या एकंदर विचारांशी मी संपूर्ण सहमत आहे. प्रागतिक विचारसरणीमधे रुढींचे , बुरसटलेल्या विचारांचे जे अनेकानेक बालेकिल्ले ढासळत आहेत त्यात हा "जेंडर बायास" सुद्धा आलाच. धाग्यामधे चालू काळातल्या परिस्थितीच्या रेट्यामुळे मुलींच्या वृद्ध मातापित्यांच्या संदर्भातल्या नातेसंबंधांबद्दलचे जे विवेचन आले आहे ते योग्य आहेच; परंतु मुलींच्या माहेरच्या माणसांसंबंधीचा हक्क हे मला तत्वतःच बरोबर गोष्ट वाटते - सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती काहीही असो. मुलगा परदेशी गेलेला असणे, किंवा एकुलती एक मुलगी असणे या परिस्थितीमधे वृद्ध आईवडील मुलीकडे जाणं हे नैसर्गिक , अपरिहार्य आहे आणि इथे बहुदा वादाचा मुद्दा संभवत नाही. माझ्यामते विवाद्य परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा मुलगा असतो, जवळ असतो. अशा वेळी, जर का मुलाचे उत्पन्न, वृद्धांची काळजी घ्यायची त्याची क्षमता , एकंदर कौटुंबिक सौहार्द , आई-वडलांना घरात मिळणारी वागणूक , माणसांचे एकमेकांशी असलेले संबंध या बाबतीत जर का काही गंभीर समस्या असेल तर आईवडलांनी मुलीकडे जावे का ? मुलीने त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी उचलावी का ? इथे गुंतागुंत येते. मुलीच्या सासरची आर्थिक परिस्थिती चांगली असेल परंतु त्यांची मुलीच्या आईवडलांच्या शुश्रुषेचा खर्च किंवा कष्ट उचलण्याला विरोध असेल तर सर्वपक्षीय पंचाईत संभवते. याचबरोबर, मुलाच्या उपस्थितीत आईवडलांनी मुलीकडे जाणे याचा अर्थ आईवडलांच्या मालमत्तेवर मुलीचा नैतिक हक्कही प्रस्थापित होतो असं म्हणायला हवं. इथेही अर्थातच एक संघर्षबिंदू आहेच. अशा परिस्थितीमधे वडील आधी निधन पावले तर इस्टेटीच्या मारामार्‍यांमधे मुलींना त्यांचा हक्क मिळायला झगडायला लागू शकल्याची उदाहरणे आहेतच. एकंदर, कुठल्याही जटिल प्रश्नाची समग्र उकल जरी गुंतागुंतीची असली तरी, लिंगभेदाचे निर्मूलन करणे, समतेच्या प्रागतिक मूल्याची कास धरणे यासारख्या कळीच्या गोष्टी इथेही लागू होतात.

In reply to by मुक्तसुनीत

विकास Wed, 08/17/2011 - 20:20
याचा अर्थ आईवडलांच्या मालमत्तेवर मुलीचा नैतिक हक्कही प्रस्थापित होतो असं म्हणायला हवं. मला वाटते, कायद्याने मुलगा-मुलगी ह्यांना मालमत्तेत समान हक्क दिले आहेत. सर्वप्रथम मी हे नमूद करतो की हा धागा मिसळपाववर गेल्या काही दिवसांत आलेल्या लिंगभेदादि विषयक धाग्यांच्या संदर्भात असला तर मी ते आधीचे धागे वाचलेले नाहीत माझा भलाबुरा प्रतिसाद प्रस्तुत धाग्यापुरताच मर्यादित आहे. हे माझ्या देखील प्रतिसादास लागू आहे. :-)

In reply to by मुक्तसुनीत

... अशा परिस्थितीमधे वडील आधी निधन पावले तर इस्टेटीच्या मारामार्‍यांमधे मुलींना त्यांचा हक्क मिळायला झगडायला लागू शकल्याची उदाहरणे आहेतच.
असा विषय निघाला आहेच म्हणून. कायद्याप्रमाणे वडलोपार्जित* मालमत्ता सर्व भावंडांमधे समसमान विभागली जाते. जर मृत पालकांनी स्वकष्टार्जित मालमत्तेची विभागणी कशी करावी हे लिहून ठेवलं नसल्यास ती मालमत्ताही सर्व भावंडांमधे समसमान विभागली जाते. भावांनी हा हक्क बहिणींना न दिल्यास त्यांना झगडायला लागू शकतं हे ही मान्य आहे. मालमत्तेवर हक्क सांगता येतो तर नैतिक जबाबदारी का पार पाडू नये? मुली जर सासू सासर्‍यांच्या घरी राहू शकतात तर मुलगे का नाही? मुलग्यांमधे काही कमतरता असते असं नाही, तर जी गोष्ट मुलींना जमते ते मुलग्यांना का नाही? व्यक्तीगत मतः शक्यतोवर सर्व जोडप्यांनी आणि/किंवा मिळवत्या व्यक्तींनी आपापली घरं बनवून तिथे रहावं. व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कमीतकमी झालेला उत्तम. * या शब्दावरही आता आक्षेप आहे, कारण आताच्या काळात आईनेही कष्ट करून मालमत्ता जमा केलेली असते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शुचि Wed, 08/17/2011 - 20:47
>> मुली जर सासू सासर्‍यांच्या घरी राहू शकतात तर मुलगे का नाही? मुलग्यांमधे काही कमतरता असते असं नाही, तर जी गोष्ट मुलींना जमते ते मुलग्यांना का नाही? >> समाजात परिवर्तन हळूहळू येत असते. जमेल नक्कीच जमेल. किंबहुना ही विचारप्रक्रिया सुरू होणे हीच यशाची पहीली पायरी म्हणायला हरकत नाही. असे लेख मिपावर अधिकाधिक यावेत. *जामातो दशम ग्रह* सारखे विचार जाऊन त्याजागी जावई म्हणजे माझी म्हातारपणाची काठी असे विचार येतील. वेळ लागेल पण हे होईल. जवई = मुलगी+जावई

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली Wed, 08/17/2011 - 21:08
मुलग्यांमधे काही कमतरता असते असं नाही, तर जी गोष्ट मुलींना जमते ते मुलग्यांना का नाही?
या वाक्याला पूरक असे वाक्य बाजूच्या चर्चेत वाचले. (शब्दशः देण्याचा कंटाळा आल्याने त्याचे सार लिहिते -) एका प्रतिसादात मुलींना सांभाळायला, मोठं करायला अधिक कष्ट पडतात असे म्हटले आहे. त्याचा नेमका रोख मला कळला नाही पण त्याचा एक पैलू असाही आहे की मुलगी हे परक्याचे धन म्हणून वाढवल्या जातात. (परक्याचे धन म्हणण्यापेक्षा परक्याची दुभती, आखूडशिंगी गाय असे म्हणता यावे.) त्यांनी सोशिक असावे, उद्धट नसावे, मिळून मिसळून राहणारे असावे, त्यांना स्वयंपाकादी कामे जमायलाच हवीत या अनुषंगाने त्यांना आजही ट्रेन केले जाते. याचबरोबर जमाना बदलल्याने मुलींनी शिकावे, स्मार्ट असावे, पैसा कमवण्याची हिम्मत ठेवावी, धडाडी ठेवावी ही अपेक्षाही हळूहळू रुजली आहे. याउलट, मुलांनी सोशिक असावे, अपमान गिळावा, स्वयंपाकादी कामे शिकावी ही अपेक्षा त्यांच्यावर लादलेली दिसत नाही. दुसर्‍याच्या घरात जाऊन मिळून मिसळून राहावे लागेल ही शिकवणूक मुलांना दिल्याचे आढळत नाही त्यामुळे म्हटली तर कमतरता आहे असे वाटते.

In reply to by प्रियाली

अनेक माध्यमांतून, प्रत्यक्ष संवाद, चित्रपट, कादंबर्‍या, टीव्ही, इ. इ., सुपरमॉम्सचं होणारं अतोनात कौतुक, उदात्तीकरण हा याचाच परिपाक म्हणता येईल. आखुडशिंगी, बहुदुधी गाय चटकन 'खपते' अशा विचारांमुळे मुलींवर लहानपणापासूनच वर प्रियालीने उल्लेख केलेल्या सर्वच गोष्टींचा बोजा असतो. आजची भारतातली स्थिती पाहिली तर अजूनही बहुतांशी घरांमधे मुलांना "घडवलं जात नाही".* आजूबाजूला पाहून मुलगे त्यांचं त्यांचं काय ते शिकतात. आई कमावती नसेल, फार कर्तृत्ववान नसेल तरीही मुलीकडून कर्तृत्ववान असण्याच्या अपेक्षा असतातच. मुलांच्या बाबतीत मात्र घरची जबाबदारी उचलण्याची शिकवण दिली जाते असं दिसत नाही. बदलत्या परिस्थितीत मुलग्यांना घडवण्यात आपला समाज आणि/किंवा कुटुंबव्यवस्था, मूल्य कमी पडतात त्यामुळे का होईना कमतरता नसली तरी दिसते असं म्हणावंसं वाटतं. *सुप्रसिद्ध फ्रेंच, स्त्रीवादी विचारवंत सिमोन दी बोव्हार हिचं वाक्य आहे, "स्त्री जन्माला येत नाही, ती घडवली जाते." कारकीर्दीच्या शेवटी तिने हे ही मान्य केलं, पुरूषही जन्माला येत नाही, घडवला जातो.

In reply to by प्रियाली

शुचि Wed, 08/17/2011 - 21:36
अगदी अगदी. "बायकोच्या ताटाखालचे मांजर" हा डेरोगेटरी वाक्प्रचार पुरषांच्या बाबतीतच का रूढ व्हावा? बाईला कधी "नवर्‍याच्या ताटाखालची भाटी" म्हटले जात नाही ते. कारण तिने सोशीक, सहनशील असावे यात नावीन्य नाही पण जरा पुरुष तसा वागला की त्याला डिवचून त्याचा अहंकार जागृत करण्यात येतो. "डोक्यावर चढवून ठेवली आहे" हा वाक्प्रचारही तसाच बाईच्या बाबतीत वापरला जातो. बायकोने कधी नवर्‍याला डोक्यावर चढवून ठेवल्याचे ऐकीवात नाही. भाषेच्या माध्यमातून आपण आपले सुप्त मन प्रकट करत असतो.

In reply to by शुचि

भाषेच्या माध्यमातून आपण आपले सुप्त मन प्रकट करत असतो.
सूप्त मन काय, संस्कृती म्हणा शुचिताई. भाषा आणि संस्कृती वेगळी काढता येणार नाही. मग भाषेतून (पुरूषप्रधान) संस्कृतीच दिसली तर त्यात आश्चर्य काय? आता पहा ना, जॉन अब्राहम हा लक्ष्मी बार आहे तर राजेंद्रकुमार टिकली, तर हे फटाक्यांचा परिभाषेत वाचायला कसं वाटेल?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय Wed, 08/17/2011 - 21:49
जॉन अब्राहम हा लक्ष्मी बार आहे तर राजेंद्रकुमार टिकली, तर हे फटाक्यांचा परिभाषेत वाचायला कसं वाटेल?
असे शब्दप्रयोग सवयीने लिहायला-वाचायला सहज वाटतील.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत Wed, 08/17/2011 - 21:57
अशा स्वरूपाच्या सैल विधानांना "लॉकर रूम टॉक" म्हण्टले जाते. म्हणजे मुलामुलांनी मुलींच्या शरीरविषयक बाबींची चर्चा करणे. स्त्रीवादाच्या उदयानंतर अर्थातच स्त्रियांच्याही संदर्भात "लॉकर रूम टॉक" ही संज्ञा अस्तित्त्वात आली. "लॉकर रूम टॉक्स" मधे विरुद्धलिंगी व्यक्तींचे वस्तुकरण असतेच. या संदर्भातला अजून एक बोलका प्रसंग आठवतो. "फिलाडेल्फिया" चित्रपटात टॉम हँक्स ची व्यक्तीरेखा छुप्या समलैंगिक व्यक्तीची आहे. तो जेव्हा त्याच्या सहकार्‍यांबरोबर "लॉकर रूम संभाषणा"त सामील झालेला असतो तेव्हा त्याला समलैंगिकांबद्दलचे अपमानव्यंजक विनोद ऐकायला लागतात आणि गप्प बसावे लागते असा एक प्रसंग आहे.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय Wed, 08/17/2011 - 22:21
लॉकररूम शैली अस्तित्वात असते, आणि ती लॉकररूममध्येच शोभून दिसते. विस्तृत समाजासाठी झालेल्या लेखनात (किंवा सिनेमाप्रयोगात) सुद्धा "त्या ठिकाणी ऐकलेली वाक्ये" म्हणून ती शैली ठीक आहे. उदाहरणार्थ दिलेल्या "फिलाडेल्फिया" चित्रपटामध्ये पटकथालेखकाने लॉकररूम टॉक खुद्द वापरलेला नसून त्या शैलीचे वार्तांकन केलेले आहे. ("वार्तांकन विरुद्ध प्रकटन शब्दप्रयोग" याबाबत व्याकरणात मौलिक चर्चा आहे, वगैरे. पण हा विषय भरकटत चाललेला आहे.) पुरुषांचे शरीर किंवा शरिरावयव यांच्याबाबत स्त्रिया आपापसात वस्तुनिर्देश करून बोलल्याचा संवाद एखाद्या लघुकथेत असला, तर मी संवाद सहजरीत्या वाचेन असे मला वाटते. त्याचप्रमाणे फिलाडेल्फिया चित्रपट... इतकेच काय आकर्षक शरिराचा वस्तुनिर्देश केलेली मनस्वी रचना असेल, तर मी आस्वादही घेईन. (शरिरावयवांचे वस्तुवर्णन करणारी कविता मी खुद्द मिसळपावावर दिलेली आहे. लॉकररूमच्या बाहेर वाचली जाईल, हे ठाऊक असून ती दिलेली होती.)

धनंजय Wed, 08/17/2011 - 20:28
चांगली चर्चा आहे. वृद्धांनी अपत्यांच्या मदतीने किंवा स्वतंत्र राहावे. अपत्य म्हण़ए मुलगी वा मुलगा. याचा बदललेल्या अर्थव्यवस्थेशी संबंध आहे हे अदिति यांनी चांगले समजावून सांगितले आहे. (यापुढच्या पिढीत अनेक वृद्ध - आजपेक्षा अधिक प्रमाणात - जोडीदारापासून विभक्त असतील. अशा परिस्थितीत जर मूलही एकुलते असेल, तर राहाण्याच्या सोयीबाबतीत घासघीस होऊ शकेल. पण तो मुद्दा खूपच वेगळा आहे. आणि सध्या संख्येच्या दृष्टीने कमी महत्त्वाचा आहे.)

नितिन थत्ते Wed, 08/17/2011 - 20:55
चुकून वृद्ध मातापित्यांची अमावास्या असं वाचलं. (युयुत्सु इफेक्ट) :) बाकी लेखाशी सहमत आहे. दुर्दैवाने मी आजतागायत एकत्र कुटुंब प्रत्यक्षात एकच पाहिले आहे. आमच्या (दोम्हीकडच्या) आजोबांच्याही आधीपासूनच्या पिढीत विभक्तच कुटुंबे आहेत. (माझ्या पिढीतल्या मित्रांपैकी) एकुलत्या एक असलेल्या काही मित्रांचे पालक त्यांच्याबरोबर राहतात. त्यांना मी एकत्र कुटुंब समजत नाही.

In reply to by नितिन थत्ते

चित्रा गुरुवार, 08/18/2011 - 04:28
कायमची पनवतीच की. म्हणजे अमावस्याच. मुलीमुलांची एकदा घालवून दिलेली ब्याद घरात परत आलेली कोणाला हवी असेल? बिल कॉसबीच्या एका शोची आठवण झाली. खरेतर अनेक. जर हे शक्य आहे तर म्हातारपणाची काठी म्हणून मुलीकडे का पाहू नये? मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये?तर मग मुलाने सासर्‍याकडेच रहाण्यास काय हरकत आहे? पहावे. करावी. रहावे. सासर्‍याकडेच का हे कळले नाही. लेखातील विचारांशी विसंगत आहे असे वाटते. सासूकडेच असेही म्हणता आले असते की. माझे खाजगी मत - मुलांनी आपापल्या आईवडिलांची जबाबदारी अगदीच झटकू नये. आणि मनाला आनंद होईल तेथे रहावे.

In reply to by चित्रा

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/18/2011 - 04:32
सासर्‍याकडेच का हे कळले नाही. लेखातील विचारांशी विसंगत आहे असे वाटते.
विसंगती आहे हे मान्य. सासरी जावे हा शब्दप्रयोग वापरायला पाहिजे.

पल्लवी Wed, 08/17/2011 - 21:05
गरज आणि सोय ह्याचे गणित सोडवुन वृद्धांनी आणि अपत्यांनी रहावे असे वाटते. म्हणजे एकंदरीत आर्थिक परिस्थिती, उपलब्ध जागा, वृद्धांची काळजी घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ हे जोखुन वृद्धांची जबाबदारी घेण्यात यावी व ही जबाबदारी मुलगा घेतो की मुलगी, हा मुद्दा ideally गौण ठरावा. >>>>>मुलीच्या सासरची आर्थिक परिस्थिती चांगली असेल परंतु त्यांची मुलीच्या आईवडलांच्या शुश्रुषेचा खर्च किंवा कष्ट उचलण्याला विरोध असेल तर सर्वपक्षीय पंचाईत संभवते. मुलीच्या आईवडलांचा extended family म्हणुन स्वीकारच झाला नसेल, तर ही परिस्थिती उद्भवतेच उद्बवते. परंतु मुलगी जर पुरेशी कमावती असेल तर चित्र वेगळे असू शकेल.

In reply to by पल्लवी

शुचि Wed, 08/17/2011 - 21:12
>> परंतु मुलगी जर पुरेशी कमावती असेल तर चित्र वेगळे असू शकेल.>> मला एक उदाहरण असे माहीत आहे ज्यात स्त्री कमावत होती पण सर्व पैसे नवरा काढून घेत असे आणि रोजच्या खर्चाकरता हातावर थोडे टिकवत असे. तेव्हा आर्थिक स्वातंत्र्य = (आत्मसन्मान + धैर्य) किंवा (निर्णयक्षमता) अशी गल्लत करता येणार नाही. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र तर अनेक स्त्रिया आताशा दिसतात पैकी सर्वच जणी हवा तो निर्णय घेण्यास स्वतंत्र असतात असे नाही. पण निदान कमावत असेल तर आईवडीलांना आधार द्यायचे चान्सेस वाढतात हे खरे आहे.

In reply to by शुचि

पल्लवी Wed, 08/17/2011 - 21:21
>>मला एक उदाहरण असे माहीत आहे ज्यात स्त्री कमावत होती पण सर्व पैसे नवरा काढून घेत असे आणि रोजच्या खर्चाकरता हातावर थोडे टिकवत असे. अशी उदाहरणे आहेतच. परंतू अशीही काही आहेत, ज्यामधे सासरकडून असलेला विरोध पाहुन, मुलीने आर्थिक बळावर तिच्या घरापासुन जवळ अश्या घराची सोय करणे, देखभालीसाठी मनुष्यबळ उभे करणे इ. केले आहे. >>आर्थिक स्वातंत्र्य = (आत्मसन्मान + धैर्य) किंवा (निर्णयक्षमता) अशी गल्लत करता येणार नाही सहमत आहे. पण more often than not, मुली घराबाहेर पडुन बिन्धास्त होतात असं एक निरिक्षण आहे.

ढब्बू पैसा Wed, 08/17/2011 - 21:28
मुलगी कमावती असेल आणि आर्थिक निर्णय स्वतः घेऊ शकत असेल तर तिने तिच्या पालकांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय संपूर्णपणे तिचा असू शकेल. एकत्र राहण्याबद्द्ल म्हणायचं झालं तर ज्या केसमध्ये नवरा बायको एकेकटे अपत्य असतील तर दोघांचे आईवडील एकत्र राहण्यात खरंच वैयक्तिक स्पेस चा प्रश्न निर्माण होऊ शकतो! अश्या वेळी एकत्र न राहता जवळच्या अंतरावर राहता येईल. असं केल्याने, आई बाबाना ही अगदीच परावलंबित्व येण्याची भावना निर्माण होणार नाही. आणि वर पल्लवी म्हणते तसं : ही जबाबदारी मुलगा घेतो की मुलगी, हा मुद्दा ideally गौण ठरावा.

रमताराम Wed, 08/17/2011 - 21:41
आधी माझे वैयक्तिक मत सांगायचे तर - ज्यांना परवडेल त्यांच्यासाठीच - शेजार शेजारचे (किमान हाकेच्या अंतरावर) प्लॅट अथवा घरे घ्यावीत नि दोन्ही/तीनही कुटुंबानी बाह्यतः स्वतंत्र रहावे. यात म्हटले तर एक कुटुंब आहे, म्हटले तर वेगळी कुटुंबे. यामुळे पुरेशी प्रायवसीही मिळावी नि आवश्यक तेव्हा एकमेकाची मदतही. आता मूळ मुद्यावर येतो. हा मुद्दा इतका सरळसोपा आहे असे मला वाटत नाही. कारण यात एकाहुन अधिक 'डिग्रीज ऑफ फ्रीडम'चा प्रश्न येतो. मुळात आधी मुलाचे आई-वडिल अथवा सासू-सासरे काही वर्षे एका गावात रहात असतील तर अन्य गावी रोजगारार्थ गेलेल्या मुला/मुलीने जरी सांभाळावे म्हटले तरी ते आपले मूळ गाव सोडण्यास तयार नसतात, जे अनेकदा योग्यच असते. सर्वच दृष्टीने सेटल्ड असलेल्या ठिकाणाहून सर्वस्वी वेगळ्या जगात - बहुधा अधिक धकाधकीच्या जीवनात - येण्यास नाखूष असणे स्वाभाविकच आहे. माझ्या एका मित्राची आई - त्याच्या वडिलांच्या निधनानंतर - गावी एकटी राहते. सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह जबरी आहेच वर ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशनही झालेले आहे. तरीही तिथे त्यांचे आयुष्य गुंतलेले असल्याने त्या इकडे येण्यास तयार नाहीत (त्यामुळे इकडे मित्राला त्यांच्या चिंतेने रक्तदाबाचा त्रास व्हायची वेळ आली आहे.) आणि मला त्यांचा दृष्टिकोन समजू शकतो. इकडे आल्यावर, सर्वस्वी नव्या जगात त्यांना रुजणे कठीण आहे. दिवसभर - मुलगा-सून रोजगारार्थ बाहेर असल्याने - एकटेपण खायला उठते. गावी त्या शिक्षिका असल्याने घरी कायम राबता असल्याने आयुष्याला वेग रहातो नि माफक शिकवण्या - फुकट - घेत असल्याने अर्थही. आता इथे मुलाने संभाळावे की मुलीने हा प्रश्नच गैरलागू होऊन जातो. काही लोक तसेही म्हणतील की मुलानेच/मुलीनेच आईजवळ जाऊन रहावे तर ते अव्यवहार्य आहे. त्यांच्या आजारपणाचा खर्च पाहता आवश्यक उत्पन्न मिळवायचे तर त्याला गावी राहणे शक्यच नाही. हे आणि अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात केवळ मुलगा संभाळणार कि मुलगी या किमान पर्यायांपलिकडे जाऊन जास्तीच्या Constraints चाही विचार करावा लागतो. प्रश्न असा सोपा करून उत्तर शोधणे धोकादायक आहे. आईवडील वृद्ध असतील पण अ‍ॅक्टिव असतील, त्यांचे स्वतःची अशी काही कुटुंबबाह्य गुंतवणूक (मित्र, समाजसेवा, अगदी रोजगारदेखील) असेल तर मुलगा की मुलगी हा प्रश्नच गैरलागू होईल. क्रमाने एकेका प्रश्नाचे उत्तर देत जावे लागेल. उदा. पहिला प्रश्न मुलगा/मुलगी यांच्यापैकी कोण त्याच गावात आहे. दोघेही असतील तर कोणाकडे रहावे हा प्रश्न संयुक्तिक होईल. इथे तुमच्या धाग्यातील प्रश्न नि त्याबाबत इतरांनी व्यक्त केलेली मते लागू होतील. पण दोघांपैकी एकच कोणी असेल तर माझ्यामते त्या व्यक्तीची पहिली जबाबदारी असावी, कारण गाव न बदलता आई-वडिलांना आपल्या मुला/मुलीच्या सहवासात राहण्याची संधी मिळते. कोणीच त्या गावात नसेल तर पुन्हा मुलगा की मुलगी हा प्रश्न विचारला जाईल. इथेही त्याआधी त्या आई-वडिलांना स्वत: गाव सोडण्याची इच्छा आहे का हा पहिला प्रश्न विचारावा लागेल, तसे नसेल तर पुन्हा मुलाकडे की मुलीकडे हा प्रश्न गैरलागू होईल. थोडक्यात समस्या गुंतागुंतीची आहे, साधे सोपे उत्तर देणे आमच्या अल्पबुद्धीला तरी जमेलसे वाटत नाही.

In reply to by रमताराम

प्रियाली Wed, 08/17/2011 - 21:51
प्रतिसाद योग्य आहे. पटणारा आहे. हेच मी बाजूच्या चर्चेत लिहिले होते की वृद्ध जेथे अनेक वर्षे सेटल झालेले आहेत त्यांना तिथून हलवून त्यांचा बाग़बान करण्यात फारसा अर्थ नसतो. अशावेळी शक्य असेल (वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवून) तर मुलांनी तिथे राहायला जाण्यात काय अडचण असते?

वृद्ध मातापित्यांची समस्या असे धाग्याचे शीर्षक आहे. या अनुषंगाने पुढील सर्व चर्चा मुलीचे माता पिता / मुलाचे माता पिता याच मुद्यांवर झाली आहे. सध्याचे जीवनमान असे आहे की, अनेक कुटुंबांमध्ये एकच अपत्य आहे. काहींना एकही अपत्य नाही. ज्यांना एक अपत्य आहे अशांपैकी काहींचे ते अपत्य देखील काही कारणाने दुरावले (जसे की - मृत्यू, परदेशगमन, भांडण, इत्यादी) किंवा ज्यांना अपत्यच नाही अशा लोकांनाही वृद्धापकाळी काही समस्या उद्भवू शकतात. त्या अनुषंगाने ही चर्चा व्हायला हवी. वृद्धांच्या समस्येवर एक मुद्दा मला सूचतोय. रिवर्स मॉर्टगेज http://en.wikipedia.org/wiki/Reverse_mortgage याविषयी आपल्याला काय वाटते? हा विषय काहीशा विनोदी ढंगाने या http://www.imdb.com/title/tt0304204/plotsummary चित्रपटात देखील मांडण्यात आला होता.

सहज गुरुवार, 08/18/2011 - 06:36
'मिपाश्रम' उत्तम पर्याय ठरु शकेल. नाहीतरी कुटुंबियांपासुन दूर किंवा समावेत अनेकतास जालावर / मिपावर पडीक असणे. काथ्याकूट २४ बाय ७ करणे. जर मिपाश्रमात राहीलात तर भले संगणक बिघडो, वीज, इंटरनेट कनेक्श्न बिघडो, आजुबाजुला अन्य मिपाकर असल्याने काथ्याकुटात बाधा येणार नाही. शिवाय समोरुन ठोसा मिळू शकतो हे जाणुन किमान सभ्य चर्चा होईल. चला मिपाश्रम फेज १ साठी नावे नोंदवा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रमताराम गुरुवार, 08/18/2011 - 09:22
तरी आम्ही म्हणत असतोच, सहजमामा हे उद्याचे टाटा, परवाचे अंबानी आणि तेरवाचे......... हॉस्पिटल. (धीरूभाईंच्या नावे हॉस्पिटल नाहीये का आता... नितू मांडकेचे ढापलेले)

In reply to by रमताराम

सहज गुरुवार, 08/18/2011 - 09:29
विनापाश, विनापत्य रहाणार्‍या लोकांना निवारा, आधार नको का? हॉस्पीटल ऐवजी नर्सींग एन्ड हॉस्पीस काढूया किंवा ढापूया की....

नितिन थत्ते गुरुवार, 08/18/2011 - 08:15
मुलाने सासरी जाण्याच्या संकल्पनेबाबत सहमत आहे. पण.... मुलगा/मुलगी सासरी जाणे हा व्यवस्थेतला सुटा इव्हेण्ट नाही. या इव्हेण्टमागे सक्सेशन ऑफ प्रॉपर्टी वगैरे बरेच व्यूह नव्याने बदलून घ्यावे लागतील. पितृनिवासी-पितृपरंपरेच्या व्यवस्थेकडून मातृनिवासी मातृ/पितृपरंपरेच्या व्यवस्थेकडे जावे लागेल. त्याच्या सोयी कराव्या लागतील. वडिलोपार्जित प्रॉपर्टी नसेल तर अडचणी फार येणार नाहीत. परंतु (मुलीकडच्यांची) जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असेल- घर, जमीन वगैरे- तर कटकटी होतील; नवे नियम बनवावे लागतील. ही उत्तरे आधी शोधली नाहीत तर मुलगा सासरी जाण्याची सूचना ही केवळ "छान कल्पना" म्हणूनच राहील.

In reply to by नितिन थत्ते

रमताराम गुरुवार, 08/18/2011 - 09:17
थत्तेंचा मुद्दा एकदम रास्त आहे. कदाचित त्याला सासर्‍याच्या मालमत्तेमधे वारसा-अधिकार द्यावा लागेल (आज सुनेला तिच्या सासर्‍याच्या मालमत्तेवर तसा अधिकार असेल तर, मला ठाऊक नाही.) मालमत्ता अधिकार या मुद्यापलिकडे जाऊन जावयाचे पत्नीच्या घरातील स्थान याबाबत त्याच्या सासरच्या व्यक्तींचा दृष्टीकोनही बदलण्याची गरज आहे. नाहीतर एका बाजूने घरजावई म्हणून दुय्यम वागणून मिळेल किंवा एवढं मोठं मन करून आला म्हणून फाजील लाड तरी केले जातील, दोन्हीच्या मधे समानतेच्या आसपास (हो थोडा टॉलरन्स ठेवावा लागेलच) हे स्थान जाणीवपूर्वक निर्माण करावे लागेल. आणि हो एक महत्त्वाचे म्हणजे पतीने आपल्या आई-वडिलांना काही अर्थिक मदत केली तर 'सग्गळं मेलं माहेरी लावतो' असे सासूने तक्रार करता कामा नये. :) मुळात मुलाने त्याच्या सासरी रहावे की मुलीने तिच्या ह्या मुद्याऐवजी आई-वडिलांनी मुलाकडे रहावे की मुलीकडे असा मुद्दा उलटा मुद्दा मी समोर ठेवून विचार करेन. कारण उमेदीच्या रोजगाराच्या वयात असलेल्या मुला/मुलीना मी निर्णयाच्या दृष्टीने अधिक झुकते माप देईन, यात मुलगा/सून या दोघांनाही समान पातळीवर राहता येईल, कोणी कुणाच्या घरी रहावे यापेक्षा घर यांचे दोघांचे असावे (या संदर्भात पाहिले तर मुलाने सासरी रहावे हा प्रकार समस्यापूर्तीपेक्षा retribution च्या प्रकारातच अधिक मोडेल. ;) ) नि माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे आई-वडिलांनी अन्य constraints च्या मर्यादेत कुणाकडे रहावे, वा स्वतंत्र रहावे हा निर्णय घ्यावा, ते स्वातंत्र्य त्यांना असावे नि मुला/मुलींनी त्यांचा आदर करावा (अर्थात मुलीकडे रहावे असा निर्णय घेतल्यास मुलीने त्याला 'शक्यतो' सहमती द्यावी.)

In reply to by नितिन थत्ते

>>>>>मुलगा सासरी जाण्याची सूचना ही केवळ "छान कल्पना".... सहमत आहे. पुरुष प्रधान संस्कृतीत मुलगा सासरी राहतो ही कल्पनाच आहे असे मला वाटते. काही समाजात मुलगा सासरी राहतो, मागे ईशान्य भागातील चर्चेत अशी परंपरा असल्याचे वाचल्याचे आठवते. संस्कृतीत काळाबरोबर बदल होत असतात. संस्कृतीचे हस्तांतरण होत असते असे जरी समजले तरी अशा व्यवस्थेला अजून बराच काळ जावा लागणार आहे. मुलगा सासरी जातो म्हणजे प्रश्न संपतो असे नव्हे. आपल्याकडे कुटुंबप्रमुखाचा शब्द अंतिम असतो. पितृसत्ताक कुंटुंब पद्धती अजून काही विस्कळीत झालेले नाही. कुंटुंबावर कुटुंबप्रमुखाची असलेली सत्ता निरंकुश असते आणि अजूनही दिसते. सर्वांच्या बरोबर राहणे आणि सर्वांची संपती सामाईक असते अशावेळी कुंटुबातील प्रेम,आदर, त्याग,सहिष्णुता व बंधुभाव या सर्व गोष्टी कुटुंबातील प्रमुखाशी आणि त्याच्या घटकाशी जोडलेल्या असतात कोणत्याही घटकाचा वयक्तिक स्वार्थ डोकावत नाही. मुलगा सासरी जाण्याची कारणे म्हणण्यापेक्षा शहरीकरण, औद्यागिकरण, किंवा अंतर्गत कुटुंबाच्या कलहामुळे संयुक्त कुटुंबाचे विघटन होत आहे, होतांना दिसते. मुलाकडे पर्याय नसतो, तेव्हा इतरत्र राहण्यापेक्षा सासरी राहण्याचा पर्याय स्वीकारलेला दिसतो. सासरची मंडळी मोठ्या आनंदाने सांभाळणारे जावई बोटावर मोजता येतील इतके असतीलही. काही आनंदाने म्हणजे मुलीचे आई-वडील म्हणजे माझे आई-वडील आहेत असे समजून राहातही असतील. पण सर्र्रास असे होत आहे हे समजण्याचे धाडस मी तरी करणार नाही. मुलीकडे जाण्याने आपल्या व्रुद्ध माता-पित्याची जी ससेहोलपट होते, होईल तो एक प्रश्न पुन्हा नव्याने उभाच राहतो. -दिलीप बिरुटे

In reply to by नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर Fri, 08/19/2011 - 21:26
या अनुषंगाने उपस्थित होणारा आणखीन एक मुद्दा हा की नवरा जर बायकोच्या उत्पन्नावर पूर्णवेळ अवलंबून असेल तर घटस्फोट झाल्यावर त्याला पोटगी मिळणार की नाही हादेखील महत्वाचा मुद्दा आहे.

युयुत्सु गुरुवार, 08/18/2011 - 09:08
तर मग मुलाने सासर्‍याकडेच रहाण्यास काय हरकत आहे? तिथे सासर्‍याची सहानुभूतीही मिळेल आणि सासू कौतुकही करेल.
तरी बरं हिदूंचे दोन देव (शंकर आणि विष्णु ) त्यांच्या सास-यांच्या कडेच मुक्काम ठोकून आहेतह. बाय द वे : माझ्या तेरा वर्षाच्या मुली ने तरी ठरवले आहे की लग्न झाल्यावर नव-याला घेऊन माझ्या कडेच राहायचे ( मनोमन सुखावायला आणखी एक कारण)

विसुनाना गुरुवार, 08/18/2011 - 13:04
चर्चाविषय महत्त्वाचा आहे.
जर हे शक्य आहे तर म्हातारपणाची काठी म्हणून मुलीकडे का पाहू नये? मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये?
- प्रश्नच नाही. दोन्ही प्रश्नांना कोणतेही कारण नाही. असे आपोआपच झाले पाहिजे. चर्चेत दोन मुद्दे मांडू इच्छितो - १. ही चर्चा स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य आणि निर्णयाचा अधिकार या दिशेने जाते काय? किंवा स्वतंत्र कुटुंबात जी स्त्री कमावती नाही तिला निर्णयाचा अधिकारच नाही असे सुचवले जात आहे काय?अशी शंका वाटली. कुणीही असे मानण्याचे कारण नाही. कारण यशस्वी विवाहात एका विशिष्ट वयानंतर (४५-५०) नवरा-बायको यांच्या विचारांत सामंजस्य आपोआपच निर्माण होते. (मग बायको-नवरा कमावते असोत की नसोत.) लेखात नमूद केलेली समस्या उपस्थित होईपर्यंत हे वय आलेले असते. (कुणी याला बायकोच्या मुठीत असणे/ताटाखालचे मांजर होणे असे भले म्हणाले तरी ते सत्य आहे.) २. असे गृहित धरलेले आहे की आईवडिलांना मुलगे आणि मुली दोन्ही आहे. काही कुटुंबात जिथे केवळ मुलीच आहेत त्या मातापित्यांनी काय करावे? किंवा ज्यांना मुलेच नाहीत त्यांनी काय करावे? - अ. ज्यांना केवळ मुलीच आहेत अशा मातापित्यांना मुलींचा आधार घेणे गरजेचेच आहे. तेथे मुलीचा नवरा घरजावई आहे?की मुलगी कमावती आहे? की आपण जावयाच्या घरी/जिवावर रहात आहोत? हे प्रश्नच डोक्यातून काढून टाकावे. बाहेरचे लोक काहीही म्हणत असले तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. ब. ज्यांना मुलेच नाहीत त्यांनी काय करावे हा प्रश्न मात्र गुंतागुंतीचा आहे. कदाचित वृद्धाश्रम हा पर्याय असू शकेल.

Nile गुरुवार, 08/18/2011 - 13:30
एकंदर देशाची वैचारिक क्रांती का काय सुरू आहे हे पाहून फार बरे वाटले. आता पन्नाशीच्या आत सुखाने मरायला मी मोकळा!

In reply to by श्रावण मोडक

Nile गुरुवार, 08/18/2011 - 23:41
तू आजही पन्नाशीच्या आतच आहेस रे!
तुम्हा म्हातार्‍यांच्या तरूणांप्रती असलेल्या अशा वृत्तींमुळेच तरूणाई अशी वागू लागली आहे असे निरीक्षण नोंदवतो! ;-)

In reply to by Nile

प्रियाली Fri, 08/19/2011 - 00:22
तुम्हा म्हातार्‍यांच्या तरूणांप्रती असलेल्या अशा वृत्तींमुळेच तरूणाई अशी वागू लागली आहे असे निरीक्षण नोंदवतो
'तरुणाई' शब्दातलं कारुण्य (की करुणाई) जाणवलं असं नोंदवते. ;)

पैसा गुरुवार, 08/18/2011 - 23:45
प्रत्येक घराचे आणि त्या घरातल्या माणसांचे प्रश्न वरवर एकसारखे वाटणारे असले तरी खूप वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर सगळीकडे लागू पडेल असं नाही. पण घरातल्या माणसांमध्ये संवाद असेल तर कोणताही प्रश्न त्या त्या परिस्थितीत शक्य तेवढ्या चांगल्या प्रकारे सोडवणे शक्य आहे. त्याचवेळी कोणावरही भावनिक अन्याय होऊ न देणे हेही महत्त्वाचे आहे. घरातल्या सगळ्यांचे स्वातंत्र्य, हक्क आणि जबाबदार्‍या यांचा समतोल साधूनच जर कोणताही निर्णय घेतला तर तो सगळ्यांच्याच सुखाचा होईल.

कवितानागेश Fri, 08/19/2011 - 00:20
खरे तर मला आजपर्यंत कधीच कुठेच मुलानीच/मुलीनीच जबाबदारी घ्यावी असा कडक नियम दिसला नाही. एक सरळ निरिक्षण असे आहे, की ज्याला/जिला जबाबदारीची जाणीव असेल, मनात माया असेल, तो/ती कुठल्याही सामाजिक नियमांशिवाय आणि प्रलोभनांशिवाय जबाबदारी उचलतो/ते. तिथे कायदे/नियम वगरै चौकटींना अर्थ नसतो. कुठल्याही सामाजिक म्हणवल्या जाणार्‍या नियमांचा उपयोग फक्त समाजाला गॉसिप करण्यासाठीच होत असतो...'यांच्याकडे किनै अस्से करतात, .....आणि त्यांच्याकडे किनै तस्सेच रहातात' ...इ...

अप्पा जोगळेकर Fri, 08/19/2011 - 00:28
स्वतःच्या मालकीचा फ्लॅट असणे हा मुलीशी लग्न करु इच्छिणार्‍या मुलग्यांसाठी आवश्यक असणारा बेअर मिनिमम क्रायटेरिया आहे असे दोन-चार उभ्या असलेल्या मित्रांनी सांगितले. शिवाय स्वतःची सांपत्तिक स्थिती, शिक्षण, सॅलरीचा आकडा होणार्‍या नवर्‍यापेक्षा कमी असावी असाही मुलींचा अट्टहास असतो असेदेखील कळले. त्या दॄष्टीने विशेषतः शहरी स्त्रियांचे प्रबोधन होण्याच्या दॄष्टीने या लेखाचे विशेष महत्व वाटते. तुमचा तो मित्र म्हणजे तुम्हीच तर नाही ना ? असा प्रश्न विचारल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. :)

In reply to by अप्पा जोगळेकर

सविता Fri, 08/19/2011 - 11:34
शिवाय स्वतःची सांपत्तिक स्थिती, शिक्षण, सॅलरीचा आकडा होणार्‍या नवर्‍यापेक्षा कमी असावी असाही मुलींचा अट्टहास असतो असेदेखील कळले
- आम्हाला तर उलटेच कळले होते जेव्हा आम्ही या मार्केट मध्ये "उभे" होतो. मुलाचा पगार - ३५०००, बाकी माहिती ओके टाईप्स, मुलीबद्दल अपेक्षा - सुंदर, गॄहकॄत्यदक्ष , मिळून मिसळून वागणारी वगैरे वगैरे तर बाय डिफॉल्ट पण त्याहूनही महत्वा ची अपेक्षा - मुलगी नोकरी करणारी हवी, पगार किमान १०००० पण मुलापेक्षा कमी असावा! उद्या मुलीच्या कुंपणी मध्ये तिला जास्त पगार वाढ मिळाली आणि तिला अपेक्षित नसताना सुद्धा तिचा पगार चुकून नवर्‍यापेक्षा जास्त झाला तर हे महाभाग घटस्फोट घ्यायचा विचार करतील का? असा विचार करत आम्ही त्या स्थळाची माहिती ( मेलेला उंदीर शेपटी पकडून टाकावा) तशीच बाजूला टाकली

In reply to by सविता

पैसे जास्त हवे असणं हे समजण्यासारखं आहे, पण कमी पैसे मिळवणारीच व्यक्ती हवी हे थोडं अतीच नाही का वाटत?

In reply to by सविता

अप्पा जोगळेकर Fri, 08/19/2011 - 21:09
'अमुक' विधानाच्या उलटेच तुम्हाला कळले होते असे लिहून त्याखाली जो प्रतिसाद तुम्ही टंकला आहे, त्या प्रतिसादामध्ये त्या 'अमुक' विधानाच्या उलटे असे काहीच आढळले नाही. त्यामुळे प्रतिसाद असंबद्ध वाटतो आहे. कदाचित तुम्हाला काहीतरी वेगळेच म्हणायचे असेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

प्रियाली Fri, 08/19/2011 - 18:55
लग्नाच्या बाजारात आता अटी दोन्हीकडून येणारच. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती तेव्हा फक्त -
  • गोरी आणि सुंदर बायको हवी.
  • किमान ५-१० तोळे सोनं तिच्या अंगावर पालकांनी घालायला हवं.
  • सासूसासर्‍यांच्या आज्ञेत राहणारी हवी
  • बँकेत नाहीतर शाळेत नोकरी करणारी हवी
अशा अटी येत. मुलीकडच्यांनी अपेक्षा मांडल्या तरी त्यात दम नसे, तडजोड अधिक असे. आता परिस्थिती बदलली आणि दोन्ही कडून अटी येणे सुरू झाले, निदान तेथे समानता येऊ पाहते आहे ते उत्तम झाले.

In reply to by प्रियाली

>> आता परिस्थिती बदलली आणि दोन्ही कडून अटी येणे सुरू झाले, निदान तेथे समानता येऊ पाहते आहे ते उत्तम झाले. Two wrong do not make one right अशा अर्थाची म्हण आठवली ;-) बाकी चालू द्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रियाली Fri, 08/19/2011 - 19:39
Two wrong do not make one right अशा अर्थाची म्हण आठवली
तसं सांगायचा प्रयत्नही नाही पण एक बाजू राँगच होती हे मान्य केल्याबद्दल विशेष धन्यवाद. ;)

In reply to by प्रियाली

अप्पा जोगळेकर Fri, 08/19/2011 - 21:19
लग्नाच्या बाजारात आता अटी दोन्हीकडून येणारच. जन्माला आलेल्या मुलींना खचाखच मारुन टाकणे सुरुच असल्यामुळे मुलींची उपलब्धता कमी होत जाणार. त्यामुळे यापुढील काळात मुलीकडच्या बाजूने लादल्या जाणार्‍या अटी आणि माजोरडेपणा वाढतच जाणार हे उघड आहे. पूर्वीच्या काळात वरपक्षाकडच्यांनी जो मस्तवालपणा दाखवला त्याचा काळाने घेतलेला सूड म्हणा हव तर. त्यामुळे समानता येईल ही आशा फोल वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

पंगा Sun, 08/21/2011 - 06:21
त्यामुळे समानता येईल ही आशा फोल वाटते.
आमचे मानसगुरुवर्य श्री. जॉर्ज मिकॅश यांनी भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यातला भेद अतिशय थोडक्यात पण चपखलपणे समजावून सांगितला आहे, त्याची या निमित्ताने आठवण झाली. "They say that Capitalism is the exploitation of one man by another. Communism is the other way round."
(टीप: उद्धरण आठवणीतून उतरवलेले आहे. या क्षणी पुस्तक डोळ्यांसमोर नाही. शब्दांत किंचित फेरफार निघाल्यास चूभूद्याघ्या.)

In reply to by अप्पा जोगळेकर

रेवती Mon, 08/22/2011 - 19:56
जन्माला आलेल्या मुलींना खचाखच मारुन टाकणे एखाद्या व्यक्तीला/बाळाला मारून टाकणे यात कमालीचे क्रौर्य आहे. पूर्वीही मुलगी झाली असताना (तेंव्हा आधीच लिंगनिदान व्हायचे नाही) पालकांना नको वाटायचे पण रडत कुढत का होइना लग्नाच्या वयाची होईपर्यंत सांभाळून पाठवणी केली जायची. आपण म्हणता तशी खचाखच मारामारी सुरु झाल्यावरही लगेच आवर घातला असता (सगळ्यांनीच) तर समझोता होण्याची शक्यता होती. आता सहनशक्तीच्या बाहेचा विषय होत चाललेला आहे. आपले जगणे (हक्क), अस्तित्व आईवडीलांकडून नाकारले जाते किंमान नावडले जाते हे आणि सासरीही त्यानुसारच वागणूक मिळते हे पाहिल्यापासून मुलींनी दुसरे टोक गाठले आहे. काही गोष्टींना नाईलाज आहे. हळूहळू त्यातही समतोल येईल अशी आशा करणे मात्र सोडून चालणार नाही.

In reply to by रेवती

पंगा Mon, 08/22/2011 - 21:16
आपले जगणे (हक्क), अस्तित्व आईवडीलांकडून नाकारले जाते किंमान नावडले जाते हे आणि सासरीही त्यानुसारच वागणूक मिळते हे पाहिल्यापासून मुलींनी दुसरे टोक गाठले आहे.
या कार्यकारणभावाबद्दल साशंक आहे. तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्‍या मुली (हूएवर दे मे बी) (गट 'अ'), आणि 'आपले जगणे (हक्क), अस्तित्व नाकारले गेलेले पाहणार्‍या, सासरी त्यानुसारच वागणूक मिळते हे अनुभवणार्‍या' एवंगुणविशिष्ट मुली (गट 'ब') हे दोन्ही एकच गट आहेत, या प्रतिपादनातील तथ्याबद्दल खात्री नाही. ('अ' आणि 'ब' हे) दोन्ही गट हे मुलींचेच उपगट आहेत, याव्यतिरिक्त त्यांच्यात कितीसा परस्परसंबंध असावा, याबद्दल शंका आहे.
(अगदी टोकाचे आणि ट्रिवियल उदाहरण घ्यावयाचे झाल्यास, खचाखच मारल्या जाणार्‍या मुली या पुढील आयुष्यात 'दुसरे टोक' गाठीत असतील, असे वाटत नाही. उलटपक्षी, तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्‍या मुली या जन्मतःच खचाखच मारून टाकल्या गेल्या असतील, ही शक्यतादेखील धूसर वाटते. किंचित गंभीर व्हावयाचे झाल्यास, (अ.) तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्‍या मुलींपैकी (पुन्हा, हूएवर दे मे बी) किती टक्क्यांना स्वतःच्या कुटुंबांत जन्मतःच खचाखच मारून टाकणे किंवा दुय्यम दर्जाची वागणूक हे प्रकार अनुभवायला मिळाले असावेत, आणि उलटपक्षी (ब.) स्वतःच्या कुटुंबात जन्मतःच खचाखच मारून टाकणे किंवा दुय्यम वागणूक मिळालेल्या मुलींपैकी किती टक्के मुली या पुढे जाऊन तथाकथित 'दुसरे टोक' गाठत असाव्यात, याबद्दल काही आकडेवारी किंवा परस्परसंबंध प्रस्थापित करणारी अन्य काही माहिती मिळू शकल्यास ती उद्बोधक ठरावी.)

In reply to by पंगा

रेवती Mon, 08/22/2011 - 21:26
गट अ आणि ब हे साहजिकच वेगळे आहेत. पण काय आहे ना, मुली आजूबाजूला काय घडतय याकडेही बघत असतात, घरात चाललेल्या चर्चा (उदा. मुच्या लग्नाची, खर्चाची चिंता इ.) ऐकत असतात. त्याबद्दल म्हणतिये.

In reply to by रेवती

पंगा Mon, 08/22/2011 - 21:35
पण मग याचा गर्भलिंगनिदान, स्त्रीभ्रूणहत्या वगैरेंशी संबंध काय? उगाच 'कोठेतरी कुणीतरी आपल्या मुलींना मारून टाकते (अगदी 'खचाखच' वगैरे), आता फारच झाले हं, म्हणून मुली सरसकट मुलांशी लग्नाच्या बाबतीत आडमुठेपणा करतात' वगैरे म्हणण्यात काय अर्थ आहे?

In reply to by पंगा

आजूबाजूला 'असले'* अनेक MCPs बघूनही मुली असा आडमुठेपणा करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. *असले म्हणजे पंगाशेटसारखे नव्हे, पंगाशेटना MCP ठरवण्याचा क्षीण प्रयत्न कृपया करू नये.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पंगा Mon, 08/22/2011 - 23:33
असले म्हणजे पंगाशेटसारखे नव्हे
ठीक. 'असले' म्हणजे नेमके कसले?
पंगाशेटना MCP ठरवण्याचा क्षीण प्रयत्न कृपया करू नये.
जोरदार प्रयत्न करावा काय?

In reply to by पंगा

ठीक. 'असले' म्हणजे नेमके कसले?
अहो म्हणजे आजूबाजूला, इतस्ततः प्रतिसादांमधे पसरलेले हो.
जोरदार प्रयत्न करावा काय?
तो तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. :p

In reply to by प्रियाली

इरसाल Tue, 08/23/2011 - 15:20
गोरी आणि सुंदर बायको हवी. आश्चर्य आहे.आमच्याकडे गोरी आणि सुंदर मुलगी हवी असे असते.बायको म्हणून . कोण आपली गोरी आणि सुंदर बायको देईल.

चतुरंग Fri, 08/19/2011 - 19:57
माझ्या एका चुलतमामाकडे त्याचे सासू-सासरे राहायचे. त्यांना दोन मुलीच. आता सासरे नाहीत परंतु सासूबाई आहेत. मलातरी त्यांच्या वावरण्यात कधी अवघडलेपण जाणवलं नाही. तसंच मामीच्याही वागण्यात 'आता काय बाई करु, माझे आईवडील येऊन राहिलेत!' असंही कधी जाणवलं नाही. त्या त्या परिस्थितीत योग्य तो उपाय काढणे हे सगळ्यात महत्त्वाचे. किंचित अवांतर - वपुंच्या एका कथेतलं वाक्य इथे चपखल लागू होतं - लोक काय म्हणतील ह्या कल्पनेनीच आपण आपलं जगणं मुश्किल करुन घेतो! (सुटसुटीत)रंगा

विजुभाऊ Mon, 08/22/2011 - 15:40
एका भरटण्याची शक्यता असलेल्या चांगल्या विषयावर संयत चर्चा काढली हे बरे आहे. वपुंच्या एका कथेतलं वाक्य इथे चपखल लागू होतं - लोक काय म्हणतील ह्या कल्पनेनीच आपण आपलं जगणं मुश्किल करुन घेतो हे मात्र एकदम बरोबर. मुलाबरोबर राहीले तरी पंचाईत / मुलीकडे राहीले तरी पंचाईत / स्वतन्त्र राहीले तरी पंचाईत