मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"

विकास · · काथ्याकूट
बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात अधिक लिहीता येईल. त्यांचे हेतू आणि त्यांच्या विरोधकांच्या आरोपाप्रमाणे असलेले अंतस्थ हेतू याबद्दल पण बरेच उलट सुलट बोलता येईल. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे बाबा रामदेव यांनी उपोषण करणार नाही असा काहीसा दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून काही निर्णय घेणे देखील समर्थनीय ठरू शकले असते. पण मात्र जे आंदोलन पूर्णपणे शांततेने चालले होते, जे आंदोलक आणि त्यांचा नेता (बाबा रामदेव) हे कुठल्याही हिंसेची भाषा करत नव्हते त्यांना अपरात्री उठवून हद्दपार करून, एनडीटीव्हीवर पाहीले त्याप्रमाणे रामदेवबाबांवर नाही पण आंदोलकांवर लाठीहल्ला करत हे आंदोलन उध्वस्त करून सरकारने आपण घाबरलो आहोत हे मान्य केले आहे का? अनेक बायकांनी तक्रारी केल्या आहेत एका वृद्धाला स्टेजवरून ढकलून दिलेले दाखवले आहे. बरोबर का चूक, कसे केले तो मुद्दा सोडला तरी ज्या सरकारने अण्णा हजार्‍यांचे आंदोलन संयमाने "मॅनेज" केले त्यांचा इतका तोल कसा काय ढळा? सरकारला खरेच याचे परीणाम कळत नाहीत का? कधीकाळी निरंजकूश सत्ता असलेल्या ब्रिटीशांनी केले, नंतर जयप्रकाशजींच्या विरोधात इंदीरा गांधींनी केले आणि आता हे सरकार तेच करत आहे असे वाटते. हा एका अर्थी टिपिंग पॉईंट ठरू शकतो आणि आधीच नाडल्या गेलेल्या भारतीयांकडून भारताचे इजिप्त होऊ शकते. फरक इतकाच की आपल्याकडे लोकशाही आहे, तिलाच धक्का लागू शकण्याची भिती आहे. हा प्रश्न रामदेव बाबांचा नाही की सरकार टिकेल का नाही, हा नाही, तर देशाच्या व्यवस्थेचा आहे. दोष आंदोलकांचा नसून सरकारचा आहे आणि त्यात कायद्यापेक्षा राजकीय चूक अधिक आहे...

वाचने 23101 वाचनखूण प्रतिक्रिया 126

तिमा Sun, 06/05/2011 - 21:21
बाबा रामदेवांचा मार्ग बरोबर की चूक, त्यांच्या मागण्या ह्या वास्तव की अवास्तव याविषयी वाद होऊ शकेल. पण अहिंसक जमावावर असा क्रूर हल्ला हा सर्वथा निंद्यच आहे. चांगली आंदोलने करायला गेले की त्यात संधिसाधू घुसतातच. पण हे प्रकरण सरकारने अतिशय गचाळपणे हाताळले आहे आणि त्याचा फटका काँग्रेसला भविष्यातल्या निवडणुकांमधे बसणारच आहे.

पैसा Sun, 06/05/2011 - 21:53
रामलीला मैदानात शांतपणे जमलेल्या लोकांवर लाठीचार्ज, रामदेवना अटक हे तर झालंच. पण सरकारतर्फे निवेदन द्यायला आले ते पर्यटनमंत्री. अजूनपर्यंत तरी काँग्रेसतर्फे किंवा सरकारतर्फे कोणी महत्त्वाच्या व्यक्तीने निवेदन दिलेलं पाहिलं नाही. कदाचित जे झालं ते फार महत्त्वाचं नाही असं दाखवायचा सरकारचा हेतू आहे का? पोलिसांनी जे निवेदन दिलं ते आणखीच हास्यास्पद आहे. म्हणे, रामदेव यांच्या जिवाला धोका आहे असं कळल्यामुळे पोलीस तिथे गेले. हे लोकांना इतके मूर्ख समजताहेत का? की आता शांततेने आंदोलन करणे आणि सरकारविरुद्ध निषेध व्यक्त करणे हेही आता गुन्हा या सदरात गणले जाते? एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की विरोधी पक्षांमधे फार दम नाही हे आताच्या सरकारला माहिती आहे, आणि सरकारच्या या कृतीविरोधात काही आंदोलन झालंच तर ते आपण मॅनेज करू शकतो असा आत्मविश्वास सरकारला आहे!

In reply to by पैसा

श्रावण मोडक Sun, 06/05/2011 - 22:17
सरकारतर्फे निवेदन द्यायला आले ते पर्यटनमंत्री.
वेल... त्यात काही गैर नसावे. म्हणूनच रामदेव यांनीही त्यांना स्वीकारले. कारण सुबोधकांत सहाय यांनी फक्त निवेदन दिलेले नाही. ते वाटाघाटींमध्येही होते. तेवढ्यासाठी अमेरिकेचा दौरा अर्ध्यावर सोडून आले आहेत. खरे तर, सुबोधकांत सहाय आणि रामदेव यांचे मधूर नातेसंबंध जुने आहेत. सुबोधकांत सहाय अन्नप्रक्रिया मंत्री होते पूर्वी. तेव्हाच रामदेव यांच्या फुड पार्कना परवानग्या मिळाल्या आहेत. त्या काळात दोघं एकमेकांचे जणू मित्र झाले आहेत. इतके की, असं म्हटलं जातं की झारखंडमध्ये जातील तेव्हा रामदेव सहाय यांच्याच बंगल्यावर मुक्कामाला असतात. या नात्याचा लाभ उठवण्याचा सरकारने प्रयत्न केला, तो सहाय यांनी मान्य केला आणि रामदेव यांनी स्वीकारला. 'एकमेका सहाय्य करू' असा आणि इतकाच हा प्रकार आहे.

In reply to by श्रावण मोडक

विकास Mon, 06/06/2011 - 04:19
त्यात काही गैर नसावे. म्हणूनच रामदेव यांनीही त्यांना स्वीकारले. मला वाटते कपील सिबल आणि सुबोधकांत सहाय हे सरकारकडून वाटाघाटी साठी नेमलेले होते (निगोशिएटर्स) आणि त्यात काही गैर नाही. खरे तर, सुबोधकांत सहाय आणि रामदेव यांचे मधूर नातेसंबंध जुने आहेत......'एकमेका सहाय्य करू' असा आणि इतकाच हा प्रकार आहे. ही अवांतर माहिती म्हणून ठिक आहे, माझ्यासाठीपण नवीन आहे. योग्य ठिकाणी त्याचा रामदेवबाबांवर टिका करताना वापर केला तरी ते योग्यच ठरेल. पण आत्ता, त्याचा संबंध नकळत सरकारने आत्ता जे काही केले त्याचे "डायल्यूशन" / दुर्लक्ष करण्यात होत असेल तर मात्र ते आक्षेपार्ह आहे. कारण सरकारने कायदा अत्यंत गैरपद्धतीने हातात घेतला आहे. तसा कायदा जर एखाद्या दहशतवाद्याच्या अथवा नक्षलवाद्याच्या विरोधात घेतला असता तर आपण (म्हणजे कोणिही) कसा आवाज उठवला असता ह्याचा देखील विचार व्हावा. येथे तर सातत्याने रामदेवबाबा, मला अटक झाली तरी शांततेने आंदोलन पाळा असे सतत (हा प्रकार घडण्याआधी) सांगत होते आणि संपूर्ण आंदोलन शांतपणेच चाललेले होते. त्यामुळे जे काही झाले आहे ते लोकशाहीवरील हल्ला आहे आणि तितकेच या संदर्भात म्हणावेसे वाटते.

In reply to by विकास

श्रावण मोडक Mon, 06/06/2011 - 09:01
ती माहिती अवांतरच आहे. तिचा संदर्भ फक्त वाटाघाटींपुरता मर्यादित आहे, लाठीमाराशी नाही; म्हणूनच "या नात्याचा लाभ उठवण्याचा सरकारने प्रयत्न केला, तो सहाय यांनी मान्य केला आणि रामदेव यांनी स्वीकारला" असे वाक्य त्या परिच्छेदाच्या शेवटी लिहिले आहे. :)

अप्पा जोगळेकर Mon, 06/06/2011 - 08:22
याच धाग्यावर दुसर्या एका संस्थळावर प्रतिक्रिया देउन झाल्यामुळे आता इथे पुन्हा तेच टाईप करायचा कंटाळा आलाय. धागाकर्त्याशी सहमत आहे इतकंच म्हणेन.

ऋषिकेश Mon, 06/06/2011 - 09:14
इतक्या प्रकारच्या बातम्यांचे मोहोळ उठले आहे की नक्की काय झाले हे समजायला थोडा अवधी जाऊ देणे योग्य आहे असे वाटते. यातील ऐकलेली एक सर्वात घातक शक्यता अशी (संदर्भ: रविवारची सीएन्एन् आयबीएन् वरील विषेश चर्चा) की रविवारी पहाटे अतिउजव्या गटाचा हा रामदेवबाबाचा तंबु पेटवून देण्याचा मानस होता व त्यायोगे पुन्हा देशभर दंगल / गोंधळ माजवून ध्रुवीकरण करायचे असा 'प्लान' होता. याला कोणताही पुरावा त्या सदर व्यक्तीकडे नव्हता. (मात्र जेव्हा पोलिस आले होते तेव्हा मंडपाला बारीकशी आग लागल्याचीहि बातमी आहे, जी लगेच विझवण्यात आली. शिवाय पोलिसांबरोबर अनेक अग्निशामकांचे जवान, गाड्या पाठवण्यात आहे होते असेही वृत्त आहे) यात सत्य किती, वावड्या किती हे सरकार, गृहखाते जाणे. मात्र जर असा काहि धोका सरकारला कळला होता तरी सरकारने, गृहखात्याने याची कल्पना बाबाला दिली होती का? वगैरे अनेक प्रश्न उठतातच. प्रथमदर्शनी आंदोलन चिरडायची पद्धत, वेळ चुकीची वाटतेच त्याबरोबर पारदर्शकतेचा भयावह अभाव जाणवतो ज्यामुळे लोकांमधील संभ्रमाची व त्यायोगे व्य्वस्थेवरील अविश्वास वाढत जातोय हे घातक आहे असे वाटते. सरकारपक्षाने अजूनही त्यांची अधिकृत भुमिका मांडलेली नाही. गृहमंत्रालयाकडून प्रतिक्रीया येईपर्यंत माझे मत (जरी कोणी विचारत नसले तरी ;) )राखून ठेवत आहे

In reply to by ऋषिकेश

आंदोलन चिरडायची पद्धत, वेळ चुकीची वाटतेच त्याबरोबर पारदर्शकतेचा भयावह अभाव जाणवतो ज्यामुळे लोकांमधील संभ्रमाची व त्यायोगे व्यवस्थेवरील अविश्वास वाढत जातोय हे घातक आहे असे वाटते. सहमत आहे........! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ Mon, 06/06/2011 - 09:29
सहमतीबद्दल सहमती....!!! अवांतर : दुर्दैवाने प्रसारमाध्यमांची विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाची भूमिका ही as usual अत्यंत उथळ (टीआरपीसाठी धावणे) वाटते. ( एक निवेदिका : क्या बाबा ने अपने बाल खुले छोडे थे? संबंध काय? अरे काय तुम्ही त्यांना न्हाऊ माखू घालणार आहात काय?)

मदनबाण Mon, 06/06/2011 - 09:35
रामदेव बाबांवर झालेली कारवाई हा दडपशाहीचा उत्तम नमुना मानायला हवा. शांतपणे उपोषण करणार्‍यांवर ही कारवाई अयोग्यच आहे,आणि हीच कॉग्रेस म्हणते त्यांचा आदर्श महात्मा गांधी आहेत. ! रामदेव बांबांवर आता सरकार आरोप करते आहे की ते भ्रष्टाचारी आहेत...पण मग हे जर त्यांना अगोदर माहित होत तर त्यांचे स्वागत करायला कॉग्रेसचे मंत्री संत्री का गेले ? त्यांच्या बरोबर बैठकी का झाल्या ? स्वामीजी भ्रष्टाचारी आहेत याचा साक्षातकार किंवा आत्मज्ञात कॉग्रेस पक्षास कसे झाले ? जर स्वामीजींच्या सारख्या माणसावर ही वेळ सरकारने आणली तर सामान्य जनतेचे काय ? सरकारच्या या कॄतीचा मी निषेध करतो.

In reply to by मदनबाण

बाणा, दडपशाहीबरोबर सरकार वरील सर्व कृतीतून एक संदेश देत आहे की, आमच्यावर 'आंदोलनाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे दडपण आणण्याचा प्रयत्न कराल तर ते आंदोलन कसे मोडायचे हे आम्हाला माहित आहे. आंदोलनाच्या निमित्ताने आठ तारखेला उपोषणाला बसणार्‍या अण्णा हजारेंनाही हा इशारा आहे. आणि यापुढे कोणतेही आंदोलन करतांना जनतेच्या मनात भिती निर्माण होत राहील. बाकी, लोकशाहीला काळिमा वगैरे काही नसतं रे... हे केवळ शब्दाचे बुडबुडे आहेत असे वाटायला लागले आहे. झोपलेल्या लोकांवर लाठीहल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून रामलीला मैदानाच्या बाहेर उत्स्फूर्तपणे सरकारचा निषेध करायला लोकांनी यायला हवं होतं. (कमीतकमी दिल्लीच्या लोकांनी तरी) किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठीकाणी शांतपणे लोकांनी झाल्या घटनेचा निषेध व्यक्त करायला हवा होता असे वाटते. परंतु आपणही टीव्ही समोरदिग्विजयसिंग काय म्हणतात, सिब्बल काय म्हणतात, सरकार काय म्हणते, रामदेव बाबा काय म्हणतात, हे मन लावून ऐकत असतो. आणि झाल्या घटनेबद्दल आपण केवळ 'च्चच्च' करायचं यापेक्षा आपण काही करु शकत नाही. काय म्हणता ? (का लिहिता पंतप्रधानांना पत्र) ''काला धन भारतमे कैसे लायेंगे और उसको राष्ट्रीय संपत्ती बनाने के लिय क्या कदम उठायेंगे'' हा मुद्दा आता हवेत विरला असेल. -दिलीप बिरुटे (हतबल भारतीय नागरिक)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Mon, 06/06/2011 - 10:12
अगदी बरोबर. आणि काला धन कोणाकडे नाही ? कोण म्हणू शकतो छातीवर हात ठेवून की माझ्याकडे नाही काळा पैसा..

In reply to by गवि

मृत्युन्जय Mon, 06/06/2011 - 12:41
गवि आश्चर्य वाटले हे वाचुन. अजुन या देशात प्रामाणिक लोक जिवंत आहेत. कमी असले तरी आहेत. आणि हो मी म्हणुन शकतो की माझ्याकडे काळा पैसा नाही. तुम्ही नाही म्हणु शकत?

In reply to by मृत्युन्जय

गवि Mon, 06/06/2011 - 12:51
अहो.. पैसाच नाही म्हणून काळाही नाही हे वेगळं. पण बहुसंख्य लोक उदा. घर विकताना जी रक्कम सेलडीडवर असते तीच घेतात का? व्यवहारांत "कॅश"मधे काहीच घेत नाहीत का? कार्ड स्वाईप केल्यावर अमुक इतके जास्त द्यावे लागतील, किंवा बिल हवे असेल तर तमुक टक्के जास्त लागतील म्हटल्यावर, राहू दे बिल.. तेवढेच कमी पैसे गेले. असा विचार हे सर्व काळ्या पैशाचे जनक आहेत. तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात हे छानच आहे. असेच रहा. पण कितीजण असेच असतात. तुम्ही मला भेटलेले पहिलेच.

In reply to by गवि

>>>>आणि काला धन कोणाकडे नाही ? अहो, सर्वांकडेच काळा पैसा नसतो राव.....! >>>कोण म्हणू शकतो छातीवर हात ठेवून की माझ्याकडे नाही काळा पैसा.. माझ्याकडे कोणताही काळा पैसा नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Mon, 06/06/2011 - 12:56
तुमचे उदाहरण वेगळे असेल. जनरली नोकरदार वर्गाला कर कापूनच पगार हातात मिळतो म्हणून काळ्या धनाचा संचय करण्याचा संबंधच येत नाही. पण आपले इतर उत्पन्नाचे सोर्स असतील तर आपण त्यात किती पावत्या देतो, किती उत्पन्न मिळवतो आणि किती दाखवतो हे ठरवणे अवघड आहे. पण एकूण निरीक्षणाने हेच दिसतं की काळा पैसा हा फक्त करोडपतींकडेच असतो असं नाही. असो. पुढे येऊन कोणी मान्य करणे शक्यच नाही म्हणा. ;) त्यामुळे माझे विधान परसेप्शनवर अवलंबून आणि त्यामुळे मर्यादितच राहणार. ज्याने त्याने मनाशीच विचारण्याचा प्रश्न आहे.

In reply to by गवि

स्मिता. Mon, 06/06/2011 - 13:31
बहुतांशी आपल्या(आमच्या)सारख्या नोकरदारांना हातात मिळणारा पगार सर्व कर, इ. कापूनच मिळतो आणि आपण कोणत्याही गैरमार्गाने पैसा कमवतही नाही त्यामुळे आपल्याजवळ काळा पैसा नाही असेच आपल्याला वाटते. परंतु, ५-१० रुपये वाचवण्यासाठी आपण जेव्हा पावतीशिवाय खरेदी करतो तेव्हा ती रक्कम काळा पैसाच असते. अवांतरः मी पाहिलेल्या मोठमोठ्या सोनारांच्या दुकानात कधीच, कुणालाही(माझ्यासमोर तरी) रितसर पावती देत नाहीत. कागदाच्या एका चिटोर्‍यावर दागिन्याचे वजन आणि त्या दिवशीचा सोन्याचा भाव यांचे गणित करून दिलेले असते. या कागदावर दुकानाचे नाव, विक्रेत्याची सही/शिक्का काहिही नसते. हेही काळे धनच आहे ना? तेथे पावती घेतल्यास सोन्याचा भाव जास्त लावतात का? कोणीही पावतीची मागणी का करत नाही?

In reply to by स्मिता.

रणजित चितळे Mon, 06/06/2011 - 13:39
स्मिता - मला, आपल्या एवढी, सोनारांची माहिती नाही पण मी जेव्हा जेव्हा काही (सोन्याची) खरेदी केली तेव्हा तेव्हा रीतसर पावती मिळाली प्रिंटेड ज्याच्यात सगळे टिन क्र वगैरे असलेले. बाकी जाणकारांना जास्त माहीती असेल.

In reply to by रणजित चितळे

स्मिता. Mon, 06/06/2011 - 14:12
मला सोनारांची खूपच माहिती आहे अश्यातला भाग नाही. कळायला लागल्यापासून २-३ वेळा सोनाराच्या दुकानात जावून जरी आपल्याला आणि आजूबाजूंच्या ग्राहकांना पावती मिळताना दिसत नसल्यास एवढी माहिती आपोआपच मिळते. माझा अनुभव जळगावमधील दोन अतिशय सुप्रसिद्ध सोनारांकडचा आहे. इतर ठिकाणचे माहिती नाही. बाकी नक्षत्र, जिली, इ. 'ब्रँडेड' दुकानातून मात्र रितसर पावती मिळते असे वाटते.

In reply to by स्मिता.

इरसाल Mon, 06/06/2011 - 17:00
जळगाव म्हणजे राजमल लखीचंद आणि बाफना शिवाय आहे कोण. तिथे एस्टीमेट असे छोट्या अक्षरात छापलेल्या चिटोऱ्या व्यतिरिक्त काहीही देत नाहीत जरी लाख दोन लाखाचे सोने घेतले तरी. स्वानुभव.

In reply to by रणजित चितळे

गवि Tue, 06/07/2011 - 13:36
एस्टीमेट वेगळे व व्यवहार झाल्यावर पावती वेगळी नव्हेच.. फक्त एस्टिमेटच.. व्यवहाराची वेगळी पावती नाहीच.. असा त्याचा अर्थ आहे. हाच बेहिशेबी अर्थात काळा पैसा..

In reply to by गवि

स्मिता. Tue, 06/07/2011 - 14:23
अगदी असेच असते. एका चिटोर्‍यावर फक्त एस्टिमेट मिळत असल्याने सगळा बेहिशेबी काळा पैसा असतो. पण या बाबतीत वर अप्पांनी म्हटलंय की हा दोष सिस्टीमचा आहे, यात तथ्य वाटतं. म्हणजे, आपल्यासारखे सुशिक्षीत लोक हा व्यवहार चालवून घेत असतील तर ती आपली चूक आहे हे मान्य. पण तिथे अनेक अशिक्षीत कामगार, शेतकरी, इ. लोकही आपापल्या ऐपतीप्रमाणे थोडेफार सोने खरेदी करत असतात. रितसर पावती घेतलीच पाहिजे, तसे न करून आपण काळ्या पैश्यात भर घालतोय याची तर त्यांना जाणीवसुद्धा नसते. त्यामुळे असे वाटते की अगदी अडाणी ग्राहकाचे 'अवेअरनेस' वाढवणारी किंवा कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार मॉनिटर करणारी सिस्टीम सुधारायला हवी.

In reply to by स्मिता.

गवि Tue, 06/07/2011 - 15:33
अनेक अशिक्षीत कामगार, शेतकरी, तसे न करून आपण काळ्या पैश्यात भर घालतोय याची तर त्यांना जाणीवसुद्धा नसते. आणि समजा जाणीव झाली (अवेअरनेस प्रोग्रॅमने) तर त्यांना (कर बुडतोय. काळा पैसा तयार होतोय याची) पर्वा / फिकिर असणार आहे का?? उलट पावती न देण्याच्या युक्तीने स्वतःचे आणि आपलेही चार पैसे वाचवण्याची नामी युगत काढणर्‍या सराफाला दुवा देतील.

In reply to by रणजित चितळे

इरसाल Wed, 06/08/2011 - 14:18
हो ते दोन्ही वेगवेगळे मिळतात. एस्टीमेट म्हणजे खरेदी केलेल्या मालाचा हिशोब चिटोर्यावर लिहून देतात. जसे ५ तोळे घेतले तर आजची तारीख, आजचा तोळ्याचा भाव आणि ५ तोळ्याचे किती हे क्यालक्यूलेशन बस. जर पक्की पावती मागितली कि मग VAT आणि इतर tax ची भरमार. कोण करतो इतके लफडे. लग्न सराईत आधीच गांजलेले लोक कुठून २/३ हजार उगाच वाढवून घेतील.

In reply to by स्मिता.

गवि Mon, 06/06/2011 - 13:43
अशीच असंख्य उदाहरणं आहेत. आपापल्या "औकात" प्रमाणे काळा पैसा प्रत्येकजण तयार करतो. काळा पैसा म्हणजे काय याविषयी कन्सेप्ट क्लियर नसल्याने आपण त्याला कारणीभूत नाही अशी समजूत करुन घेणे सोपे जाते. डॉक्टरच्या फीचे बिल (बडीबडी हॉस्पिटल्स वगळता), अगदी लाखांची विक्री असलेला हॉटेलवाला उडपी (आठवा त्याची चिठ्ठीवजा "पावती"), अगदी करपात्र रक्कम कमावणारा वडापाववाला किंवा अनेक मध्यम विक्रेते कधीच व्हॅलिड पावती देत नाहीत आणि आपणही घेत नाही. भाडेकरुकडून भाडे घेणारे कित्येकजण पावती कमीची करतात. आणि कायकाय सांगावे ? कोणी म्हणेल की हे सर्व लहान स्केलवर आहे. मी म्हणतो "थेंबे थेंबे तळे साचे" न्यायाने असा जनताजनार्दनात तयार होणारा काळा पैसा एका-दोघा उद्योगपतीच्या कोटींमधे असलेल्या स्विस बँकेतल्या काळ्या पैशापेक्षाही जास्त होत असेल.

In reply to by गवि

अप्पा जोगळेकर Mon, 06/06/2011 - 14:04
काळा पैसा म्हणजे काय याविषयी कन्सेप्ट क्लियर नसल्याने आपण त्याला कारणीभूत नाही अशी समजूत करुन घेणे सोपे जाते. आपल्या अज्ञानातून जर काळा पैसा तयार होत असेल तर तो दोष सिस्टिमचा आहे. एन्ड युजर हा नेहमी अडाणीच असतो. त्याला चुका करण्याची संधीच न देणे हे चांगल्या सॉफ्टवेअरचे लक्षण आहे. हाच नियम इथेही लागू होऊ शकेल. म्हणून व्यवस्थेत बदल करणे हाच यावर उपाय आहे. अशा बदलाची मागणी जेंव्हा कोणी करते तेंव्हा त्याला विशिष्ट लोकांकडुनच विरोध होतो ही बाब सूचक आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

गवि Mon, 06/06/2011 - 14:20
आपल्या अज्ञानातून जर काळा पैसा तयार होत असेल तर तो दोष सिस्टिमचा आहे. आपल्या अज्ञानातून काळा पैसा तयार होत नाही. उत्तम ज्ञानानेच आपण तो तयार करतो ..पण ही जे काही आपण केले त्यातून वाचलेला / तयार झालेला तोच तो प्रसिद्ध "काळा पैसा" आहे हे आपल्याला "वळत" नाही, जाणवत नाही. याला अज्ञान म्हणायचं किंवा काय ते तुम्हीच पहा. शिवाय रामदेव बाबा जे करत आहेत त्याला पाठिंबाच द्यायला हवा हे शंभर टक्के सत्य आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांनी सामान्यजनांतील काळा पैसा जर कमी झाला तर अधिकच उत्तम. कारण तो अधिक मुरलेला आणि "डिफ्यूज्ड" आहे. शोधून काढायला अशक्य. (नाना पाटेकरः चित्रपट प्रहार: दुश्मन दोनो बाजू में है. एक सरहद के उस पार एक इस पार. इस पारका दुश्मन ज्यादा खतरनाक है.. असा काहीसा डायलॉग आठवतो.) आपल्या अज्ञानातून जर काळा पैसा तयार होत असेल तर तो दोष सिस्टिमचा आहे. एन्ड युजर हा नेहमी अडाणीच असतो. त्याला चुका करण्याची संधीच न देणे हे चांगल्या सॉफ्टवेअरचे लक्षण आहे. इथे मी थोडे सुधारित उदाहरण देऊन स्पष्ट करतो. समजा एका सॉफ्टवेअरमधे युजरनेम पासवर्ड टाकण्याऐवजी कंट्रोल आणि एफ ५ दाबले तर थेट निनावी लॉगिन होते आणि बिनबोभाट चोरून माहिती काढता येते / काम करता येते असे कोणाच्या लक्षात आले. त्यानंतर ही गोष्ट सर्वत्रांत पसरुन विनालॉगिन गुपचुप काम करणार्‍यांचे प्रमाण वाढले तर हा दोष त्या सिस्टीमचा तर आहेच पण एन्ड युजर अडाणी आहे, त्याने नकळत चूक केली असं नाही म्हणता येत. त्याला या क्रियेचे फायदे नक्की माहीत होते आणि लॉगिन वापरायचा पर्याय त्याच्याकडे असूनही "जाणूनबुजून" त्याने हे केले. फक्त आपण जे करतोय त्याचा एकूण सिस्टीमवरचा इम्पॅक्ट त्याने समजून घेतला नाही/ त्याला पर्वा नव्हती.. तस्मात दोष त्याच्याकडेही जातो. (फक्त उदाहरण आहे. आय पी लेव्हलपर्यंत जाउ नका प्लीज ;) )

In reply to by गवि

आम्हाला तर क्रांतीवीर मधला सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भार महान हा डायल्वॉक लई आवडतो.

In reply to by गवि

अप्पा जोगळेकर Tue, 06/07/2011 - 20:05
प्रत्येक एन्ड युजर नकळत चूक न करता मुद्दामूनच चूक करतो आहे असे मी वादाकरता गॄहीत धरतो आहे (मान्य करत नाहीये). अशा परिस्थितीत सिस्टिम तशीच राहावी अशी त्याची इच्छा असली पाहिजे. प्रत्यक्षात अण्णा आणि रामदेव यांच्या आंदोलनाला मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहून सिस्टिम सुधारावी अशी एन्ड युजरची इच्छा आहे असे दिसते आहे आणि सरकार सिस्टिम सुधारण्याच्या दॄष्टीने पावले टाकण्याऐवजी मुद्दामहून वेळाकाढूपणा करत आहे असे दिसते. तर मग दोष कोणाचा आहे हे तुम्हीच ठरवा.

In reply to by अप्पा जोगळेकर

गवि Wed, 06/08/2011 - 09:02
आप्पा अहो इथेच असलेला विरोधाभास मी उघड करु इच्छितोय हो.एंड युजरला सिस्टीम सुधारायला हवीय ती कोटीवाली बडी धेंडे आणि नेत्यांबाबतीत. पण त्याचवेळी आपल्या पाठीशी काही जळते आहे हे लक्षात येत नाहीये. आपली चवन्नीअठन्नीची चलाखी हाही काळा पैसाच आहे हेच एंड युजर विसरतोय. आणि अशा चवलीपावलीच्या पण खूप पसरलेल्या गैरप्रकारांना रामदेव सिस्टीममधे आळा नाहीच आहे.त्यांच्या अजेंड्यावर स्विस ब्यांकेतील पैसा आणि मोठे मासेच आहेत.खालच्या पातळीवर पावती न घेता व्यवहार चालू राहीलच..

In reply to by गवि

नरेशकुमार Wed, 06/08/2011 - 09:21
त्यांच्या अजेंड्यावर स्विस ब्यांकेतील पैसा आणि मोठे मासेच आहेत.खालच्या पातळीवर पावती न घेता व्यवहार चालू राहीलच..
आन्ना, बाबा मोठ्या माश्यांच्या मागं लागतील, त्यांचि भाजी करुन खातील. लहान माश्यांच तुमि घ्या मनावर. (हवं तर आमि येउ मदतीला). करा तुमि पन आन्दोलन, कोनी अडवलय का ? आना पकडुन लहान माश्यांना, एकत्र भाजी करुन खाऊ ? (वाटलं तर इथं रेसिपि पन टाकु फटुसकट) . हलकेच घ्या. बरंका !

In reply to by गवि

नरेशकुमार Wed, 06/08/2011 - 10:57
गवि मि वरचा रिप्ल्याय थोडा गमतिने म्हना कि उपासाहाने दिलेले होते असे म्हना. पन त्याचा अर्थ इतकच होता कि, भ्रश्टाचाराच्या समुद्रात लहान माश्याचे पुढे मोठे मासे होतात कि मोठ्या माश्यांमुळे लहान मासे सोकावतात ? सुरुवात कुठुन होते ? हे सगळे वादातीत प्रश्न आहेत. (खरेतर शब्दांचे बुडबुडे). हे माशे काढुन टाकायचे तर कोनितरी कुठुन तरी सुरुवात कराविच लागनार आहे. बाबा, अन्नांनि मोठ्यापासुन सुरुवात केली. जर आपल्याला जमत असेल तर, आपन देखिल मोठ्यांपासुन सुरुवात करा, अन्यथा लहान माश्यांपासुन सुरुवात करा. आपन पन आन्दोलन सुरु करा. आमि येतो आपल्या बरोबर साथिला. नुसते प्रेक्शकां सारखे बसुन आनि उपदेश देउन कसे चालेल ? आपन म्हनता .
आणि अशा चवलीपावलीच्या पण खूप पसरलेल्या गैरप्रकारांना रामदेव सिस्टीममधे आळा नाहीच आहे.
मग घाला भर त्या सिस्टिम मधे, नाही घालता येत तर तुमिच एखादि गवि-सिस्टिम सुरु करा. कोनिहि अडवलेल नाही. जो कोनि काही करायचा प्रयत्न करतोय त्यात खोडा घालन्यापेक्शा त्यातिल उनिवा दुर करन्याचा प्रयत्न करावा, असे मला वाटते. असे दोन शब्द बोलुन मि माझे भाशन संपवतो.

In reply to by नरेशकुमार

गवि Wed, 06/08/2011 - 11:08
कोणाच्या सिस्टीममधे खोडा घालण्याची बात केली मी? हा तिरपा झालेला धागा सरळ वरपर्यंत वाचा. मी उलट आपल्या स्वतःची आणि स्वतःसारख्या सामान्यांची निर्भर्त्सना करत होतो. आपण स्वतःही हेच करतो ज्याला बाबा विरोध करताहेत हे मी पहिल्यापासून हायलाईट करतोय.. त्यांना विरोध करु नकाच उलट त्याउप्पर जाऊन आपली आणि आजूबाजूची ही चवल्यापावल्या वाचवण्याची आचमनं बंद करा असा त्याचा अर्थ आहे. बाबांच्या सिस्टीममधे या छोट्या माश्यावर उपाय नाही हे माझं वाक्य बाबांच्या आंदोलनाला किंवा पद्धतीला विरोध करण्यासाठी नसून, उलट एन्ड युजर (म्हणजे सामान्य लोक जे छोटा काळा पैसा निर्माण करतात, बिनपावतीचे व्यवहार करुन), त्यांचाच चळवळीला पाठिंबा कसा? अशा आप्पांच्या प्रतिसादातून उत्पन्न झालेल्या प्रश्नाला ते उत्तर होतं. म्हणजेच आंदोलन करणार्‍या लाखो लोकांचा रोखही बाबांप्रमाणेच स्विस बँकवाल्या बड्या धेंडांवर आहे. पण स्वतःच्या मागे सोडत असलेला प्रदूषणकारी धूर त्यांना जाणवतच नाही अशा अर्थाने म्हणत होतो. असे लोक तरीही पाठिंबा देतातच कारण त्यांना माहीत आहे की बाबांच्या मागण्या पूर्ण झाल्या तरी अशा छोट्या बिनपावतीच्या व्यवहारांवर काही परिणाम होणार नाही. किंबहुना अशा प्रकारच्या मायक्रो लेव्हलच्या काळ्या पैशाकडे आपण दुर्लक्षच करत आलो आहोत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इरसाल Wed, 06/08/2011 - 14:25
आणि मी माझ्या खिश्यावर हात ठेवून म्हणतो कि माझ्याकडे काळा पैसा नाहीये. असलाच तर पिवळा, लाल, आणि हिरवा आहे.

मराठी_माणूस Mon, 06/06/2011 - 10:12
http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/3018780.cms ह्या लेखात बाबांना उपटसुंभ म्हटले आहे. भ्रष्टाचाराला विरोध करणार्‍यासाठी खालील भाषा वापरली आहे . सरकार कमजोर असले की, रामदेवांसारख्या उपटसुभांचे फावते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो, त्याची चिंता आहे. खर तर वरील म्हण राजकारण्यासाठी ज्यास्त चपखल आहे . ह्या राजकाण्याना वेळीच न ठेचल्याने ते सोकावले आहेत आणि वरील महाशय सरकारची बाजु घेत आहेत. ते लेखात असेही म्हणतात की परदेशातील काळी संपत्ती बाबांच्या उपोषणामुळे परत येणार नाही, सरकारलाच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवस्थेत परिवर्तन घडवणे, कपालभारती अथवा प्राणायम करण्याइतके सोपे नाही, हे बाबांना कोण समजावून सांगणार? सरकारलाच प्रयत्न करावे लागतील .... पण जर सरकार ह्या बाबतीत निष्क्रिय असेल तर काय करायचे.. व्यवस्थेत परिवर्तन घडवणे, कपालभारती अथवा प्राणायम करण्याइतके सोपे नाही...... अगदी बरोबर, भ्रष्टाचार करणे , काळा पैसा निर्माण करणे तो परदेशी बँकात जमा करणे हे तर त्याहुन सोपे आहे

In reply to by मराठी_माणूस

छोटा डॉन Mon, 06/06/2011 - 13:49
उपरोक्त लेख वाचला. ह्या लेखात 'न पटण्यासारखे' काय आहे तेच मला समजेना, उलट परिस्थितीची योग्य माहिती घेऊन ऐकिव बडबडीवर विश्वास न ठेवता ह्या आंदोलनामागचा (मिडियाने झाकुन ठेवलेला) दुसरा पैलू त्यांनी परखडपणे मांडला असे वाटते. लेखाशी बहुतांशी सहमत आहे ... ह्या चर्चेत एका प्रतिसादात आलेले 'हजारोजणांवर लाठीचार्ज करावा लागला असता ते आता शेकड्यात भागले' हे वाक्यही अत्यंत पटले, आम्ही सहमत आहोत. बाकी 'बाबां'विषयी आमची मते आम्ही नंतर सविस्तरपणे मांडू असे सांगतो. बाकी तुर्तास सरकारने केले ते बहुदा सुयोग्य मार्गाने नसले तरी अत्यंत बरोबर केले आहे असे आमचे मत आहे :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

मराठी_माणूस Mon, 06/06/2011 - 14:10
तो लेख बराचसा "पेड" वाटतो . बाबांना विरोध करताना , सरकार ला "क्लिन चिट" दिल्या साराखा कुठेही आंदोलनाच्या मुद्याला स्पर्श न करणारा. मुद्याला महत्व न देता , कोण करतोय , तो कसा आहे ह्याला महत्व देणारा .

In reply to by मराठी_माणूस

छोटा डॉन Mon, 06/06/2011 - 14:21
>>तो लेख बराचसा "पेड" वाटतो . हां, आता कसे बोललात. अहो लेख 'पेड' असल्याशिवाय चालतच नाही, इनफॅक्ट तसे 'पेड' लेख यावे लागतातच आणि ते तसे आले तरच 'आंदोलन' यशस्वी होते. अहो फौज असते असे लेख लिहणार्‍यांची. मिडिया मॅनेजर्सनी फक्त 'क्ल्यु' द्यायचा अवकाश, लेख लिहणारे व ते छापणारे लगेच तयार असतात. अहो हे लोक नसतील कोण कसले 'आंधी' आणि कोण कसला 'गांधी' होतोय ? असो. बाकी राहता राहिला प्रश्न सरकारला क्लिन चीट देण्याचा, तर मला असे वाटते की 'आंदोलकांवर (प्रथमदर्शनी दिसत असलेला) बेछुट लाठीमार' आणि 'उगाच आधी रामदेवबाबाला दिलेला भाव, नंतर ते डोक्यावर बसणे व त्यामुळेच शेवटचा उपाय म्हणुन केलेली कारवाई' इत्यादी दोष सरकारकडे जातात. मी तर म्हणेन की रामदेवबाबांना मैदानात पोहचण्याच्या आधीच त्यांची उचलबांगडी करुन त्यांना परतीचा रस्ता दाखवला जात असता तर बरे झाले असते, पण बाबांच्या भुलथापांना सरकार बळी पडले हा दोषही त्यांच्याकडेच जातो, मुळात त्यांना अजिबात एन्टरटेन न करता पहिल्यापासुनच कडक धोरण अवलंबले असते तर आज ही नामुष्कीची वेळ आली नसती, सरकार ह्यात फसलेच. इतके दोष सरकारकडे जात असताना 'क्लिन चीट' कसली ? - छोटा डॉन

रणजित चितळे Mon, 06/06/2011 - 12:42
व्यक्तीशहा मला बाबा रामदेव जरा इममॅच्युअर वाटतात. पण त्यांनी भ्रष्टाचारा विरुद्ध मोहीम काढली हे चांगले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाबा कोणताही धाकधपटशहा करत नव्हता. सरकारनेत्याच्या वर रात्री कारवाई करुन उधळून लावले हे दुटप्पी पणाचे खास उदाहरण झाले. अरुंधती रॉय व गिलानी सगळी कडे जाऊन कश्मिर हा भारताचा भाग का नाही होऊ शकत असे बोंबलत आहेत त्यांच्या विरुद्ध सरकार काही करत नाही. राहूल गांधी मायावतीवर का उखडले माहीत नाही त्यांच्या पक्षाने हेच केले की. ह्या गोष्टीवरुन काँग्रेसची मानसिकता कळते.

राही Mon, 06/06/2011 - 12:44
ज्या प्रकारे रामदेवांच्या उपोषणाची हवा निर्माण केली जात होती, ज्याप्रकारे हजारो माणसे अधिकृतरीत्या एकत्र येण्यासाठी क्लृप्त्या लढवल्या जात होत्या,(योगशिबिराच्य नावाखाली विशाल मैदान बुक करून ठेवणे, हजारो माणसे ए.सी. वगैरेसह आरामात राहू शकतील असे आलीशान तंबू उभारणे,) ज्याप्रकारे नको त्या व्यक्ती व्यासपीठावर अचानक प्रगटू लागल्या होत्या त्यावरून बाबरीविद्ध्वंसपूर्व वातावरणाकडेच जाणारी ही पावले आहेत अशी शंका मनात उद्भवू लागली होती. त्यावेळीही,असाच जमाव जमवला जात होता,अशीच आश्वासने (कोर्टासमक्ष) देऊन मोडली गेली होती,केंद्रसरकारला असाच कात्रजचा घाट दाखवला गेला होता.त्यावेळी केंद्र सरकार गाफील आणि निष्क्रिय राहिले. यावेळी मात्र त्वरित कृती केली गेली.रामदेवांना 'रॉ' च्या खास विमानात बसवून संभाव्य हिंसास्थानापासून दूर नेले गेले हे योग्यच झाले. काही हजारांवर लाठीमाराची पाळी येण्यापेक्षा काही शेकड्यांवर भागले ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट.

In reply to by राही

काही हजारांवर लाठीमाराची पाळी येण्यापेक्षा काही शेकड्यांवर भागले ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. सुंदर...! याला म्हणतात दृष्टी. :) एक गोष्ट मान्य करु की, बाबांच्या काही मागण्या अवाजवी होत्या. सक्तीची शेती, काळापैसेवाल्यांना फाशी,सक्तीची हिंदी भाषा इत्यादि मुद्दे हे मूळ मुद्यापासून म्हणजे काळा पैसा भारतात आणने आणि काळ्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करणे यापासून दूर जाणार्‍या होत्या. आंदोलनाच्या मुद्यांवर सहमती झाली नाही. किंवा बाबांना वाढता पाठिंबा मिळाला म्हणून बाबांचे मुद्दे वाढत गेले असेही म्हणू पण म्हणून उपाशी पोटी झोपलेल्या आंदोलकांवर विशेषतः महिलांवर लाठीमार करणे हे काही योग्य झाले नाही, त्यासाठीचे युक्तिवाद अपूरे पडतील असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Mon, 06/06/2011 - 13:06
उपाशी पोटी झोपलेल्या आंदोलकांवर विशेषतः महिलांवर लाठीमार करणे हे काही योग्य झाले नाही, पुरुषांना कमी लागते असा एक सामान्य समज आहे त्याची गंमत वाटते. लाठीमार अत्यंत लज्जास्पद आणि निर्घृण होता. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच. पण उपाशीपोटी झोपणे आणि महिला असणे यांचा लाठीमार देण्यातल्या अमानुषतेच्या पातळीतल्या ग्रेडशी संबंध पटला नाही. अमानुष ते अमानुषच. बादवे.. अपघात झाला तरी मृतांत अमुक इतक्या स्त्रियांचा समावेश होता असं वेगळं सांगतात.. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राही Mon, 06/06/2011 - 14:32
'सुन्दर...! याला म्हणतात दृष्टी.' आपला उपरोध समजला. पण जेव्हा मोठी हानी होण्याची शक्यता असते आणि अजिबात हानी न होण्याचे पर्याय उपलब्ध नसतात तेव्हा कमीतकमी हानीचा पर्याय स्वीकारणे शहाणपणाचे ठरते.(सर्वनाशे समुत्पन्ने वगैरे) रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती नव्हे.ते एक योगशिक्षक,योगगुरू आहेत. त्यांचा locus standi काय, असा प्रश्न विचारता येऊ शकेल .त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे.(ती असू नये असेही नाही पण..) आपल्या महाराष्ट्रात योग आणि स्वास्थ्यप्रसाराचे काम निकम गुरुजी,अय्यंगार गुरुजी,व्यवहारे,निंबाळकर आणि इतर अनेकांनी शांतपणे केलेले आहे. त्यांच्यापेक्षा रामदेवबाबांचे ज्ञान आणि अनुभव अधिक असेल असे नाही.त्यांचा तिथे जमलेला शिष्यवर्गही साधूप्रवृत्तीचा होता असेही नाही.एकाच विचाराने भारलेले,भारावलेले केडरबेस्ड लोक काय करू शकतात ते शिवाजीपार्कच्या सभेनंतर सामान्य सैनिकांकडून घडणार्‍या वर्तनातून पूर्वी दिसून येत असे. ज्याअर्थी रॉ ला यात पडावे लागले,त्याअर्थी मामला गंभीर असणार आणि इरादे नेक नसणार असे मानायला मी तयार आहे.

In reply to by राही

छोटा डॉन Mon, 06/06/2011 - 14:34
सहमती ... तुमच्या मतांशी आणि तुम्ही देत असलेल्या स्पष्टीकरणाशी सहमत आहे, आधीच्या वाक्याशीही सहमत होतो. रामदेवबाबाहे हे प्रचंड राजकिय महत्वाकांक्षा ( इनफॅक्ट सर्वसत्ताधीश होण्याची इच्छा बाळगुन ) असलेला इसम वाटतात. त्यांचे 'योग आणि तत्सम' क्षेत्रात कार्य मोठ्ठे आहे म्हणुन त्यांनी देशाच्या कारभारात केलेली ढवळाढवळ आणि व्यवस्थेला वेठीस धरुन केलेली आंदोलने जस्टिफाईड होत नाहीत. ' माझा २० वर्षाचा राजकिय अनुभव आहे, आण्णांना येऊन केवळ २ वर्षे झाली आहेत' असे गंमतशीर विधान करुन त्यानंतर त्याहुन गंमतशीर पद्धतीने हासणार्‍या रामदेवबाबांकडुन आम्हाला निदान राजकिय आणि सरकारी व्यवस्था ह्या क्षेत्रात कसल्याही अपेक्षा नाहीत. त्यांनी 'योग'दान करावे, त्यात ते महान आहेत आणि असतील. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

ऋषिकेश Mon, 06/06/2011 - 15:11
राहि व डॉन्याशी सहमत! रामदेवबाबांचे हे आंदोलन सुरवातीपासूनच 'राजकीय' वाटत होते. आणि यात जनाआंदोलनापेक्षा शक्तीप्रदर्शनाचा भाग जास्त होता. त्यात रामदेवबाबांची (बालिश) राजकीय समज त्या जनसमुदायाला व इतर जनतेलाही फक्त गोंधळात टाकत होती.

In reply to by ऋषिकेश

विकास Mon, 06/06/2011 - 19:40
रामदेवबाबांचे हे आंदोलन सुरवातीपासूनच 'राजकीय' वाटत होते. या संदर्भात आत्ताच एक मजेदार ट्वीट पाहीली: Forget Anna Hazare and Baba Ramdev, I think Manmohan Singh should enter politics :-) बाकी ह्या कशामुळे ही दडपशाहीचे समर्थन होत नाही हा भाग आहेच... बाबा जर राजकारणात आले तर कपालभाती होईल का कपाळ्मोक्ष हे ठरवायला मतदार समर्थ आहेतच. शिवाय जर तसे ते येणार असतील तर त्यांना पाठींबा देणार्‍या भाजपाला थोडेच चालतील? कारण असे वाटते की, मते विभागली जातील ती भाजपाचीच...

In reply to by विकास

ऋषिकेश Mon, 06/06/2011 - 20:25
बाबा जर राजकारणात आले तर कपालभाती होईल का कपाळ्मोक्ष हे ठरवायला मतदार समर्थ आहेतच.
सहमत आहे.
Forget Anna Hazare and Baba Ramdev, I think Manmohan Singh should enter politics
हा हा हा.. :)) डॉक्टर राजाबद्दलचा उद्वेग मी ह्या विडंबनातून व्यक्त केला आहे

In reply to by विकास

समंजस Mon, 06/06/2011 - 22:53
सहमत. बाबा रामदेव यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असेलही आणि त्यात गैर काही नाही. लोकशाहीत हे पुर्णपणे समर्थनीय आहे. भारतिय संविधान सुद्धा याला नाकारत नाही. कोणीही व्यक्ती राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवू शकतो आणि ती पुर्ण करण्या करीता प्रयत्न करू शकतो. कॉंग्रेस सरकारचं जर हे म्हणणे असेल की बाबा रामदेव यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला वेसण घालण्या करीता या प्रकारची दडपशाही करण्यात आली आहे तर हा सरकारचा मुजोरपणा आहे आणि लोकशाही धो़क्यात आणणारा प्रकार आहे. आज बाबा रामदेव यांच्या विरूद्ध, उद्या अण्णा हजारेंच्या विरूद्ध, परवा आणखी कोणा व्यक्ती विरूद्ध जर हे सरकार या पद्धतीने वागायला लागलं तर चीन मधील हुकुमशाही सरकार, लिबिया मधील गद्दाफि चं सरकार, इजिप्त मधिल मुबारक चं सरकार, सौदी मधील किंग अब्दुल्ल्लाचं सरकार, अफगान मधील पुर्वाश्रमीचं तालिबान सरकार आणी भारतातील काँग्रेस सरकार यात फरक काय?

In reply to by छोटा डॉन

विकास Mon, 06/06/2011 - 19:27
' माझा २० वर्षाचा राजकिय अनुभव आहे, आण्णांना येऊन केवळ २ वर्षे झाली आहेत' असे गंमतशीर विधान करुन हे कुठे वाचलेत? कारण फारच "इंटरेस्टींग विधान" आहे! पण मला गुगलून कुठल्याही बातमीत दिसले नाही. म्हणून खात्री करून घेत आहे.

In reply to by राही

रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती नव्हे.................... रामदेव ही नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती नसेल, असे गृहित धरु. रामदेव बाबांनी योगासनेच करावीत, सामाजिक कार्य आणि व्यवस्था बदलण्याच्या भानगडीत पडू नये. इ. इ. समाजात व्यवस्थेविरुद्ध कोणी बोलू लागला की, बोलणा-यकडेच संशयाने पाहण्याची वृत्ती काही नवी नाही, अशात तर तिच्यात वाढ होतांनाच दिसत आहे. बोलणा-याचीच उलट तपासणी होऊ लागते. उलट तपासणीत काही गैर नाही. आंदोलनाच्या निमित्ताने दिग्विजयसिंगांनी ते काम सुरु केलेच होते. मला असं म्हणायचं आहे काळ्यापैशाची समस्या आणि भ्रष्टाचाराबाबत लोकजागृती होऊन शासन निर्णय घेत नसेल, विरोधी पक्षाला कोणी मोजतच नसेल अशावेळी सरकारावर दडपण आणून त्याबाबत कायदे करुन असलेल्या समस्यांवर तोडगा निघत असेल, कायद्यात उत्तम तरतुदी होत असेल तर अशा वेळी लढणा-याच्या बाजूने राहीले पाहिजे की त्याला विरोध केला पाहिजे ! उद्या कितीही नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती जरी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बोलू लागली तरी आपण त्याच्याकडेही उलटतपासणीच्या चष्म्यातूनच पाहात राहणार आहोत, हेही मला माहित आहे. बरं....! कोणी काही करत नसते तेव्हा आपण आपल्याच समाजाला संवेदना हरवलेला समाज, स्वार्थी समाज, आपल्यापूरतेच पाहणारा समाज अशा शेलापागोट्यांनी वर निर्भत्सनाही करत असतो. अशा दुटप्पी समाजामुळे आणि शासनाच्या दडपशाहीमुळे आपल्या कोणत्याही सामाजिक चळवळी आहेत तिथेच थांबतील आणि संपतील असेही वाटते. बाकी, अजून आमच्या काही भावना धमाल मुलगा यांच्या हम्म शिर्षकाच्या प्रतिसादात आल्याच आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by राही

विकास Mon, 06/06/2011 - 16:21
ज्याअर्थी रॉ ला यात पडावे लागले,त्याअर्थी मामला गंभीर असणार आणि इरादे नेक नसणार असे मानायला मी तयार आहे. नक्की असे कुठे वाचले की रॉ मधे पडले म्हणून? बाकी रॉ म्हणजे तीच संघटना का जी ची स्थापना अमेरीकन सीआयएच्या धर्तीवर देशाच्या बाहेरील देशविघातक घटनांना आणि व्यक्तींचा पाठपुरावा करण्यासाठी केली गेली आणि जे केवळ त्या संघटनेचे काम आहे? ६२ चे चीन युद्ध आणि ६५ चे पाकीस्तानचे युद्ध यातून शिकून पुढे जाण्यासाठी म्हणून दूरदृष्टी असलेल्या बाईंनी ती संस्था स्थापली होती. त्याचा काहीप्रमाणात बांग्लादेश मुक्तीसंग्रामात उपयोग ही झाला पण नंतर आणिबाणीच्या काळात बाईंची आणि त्यांच्या लाडक्या मुलाची कटपुतळी म्हणूण हेटाळणी देखील झाली... म्हणजे या रॉ चे घटने/काय्द्याप्रमाणे काम हे २६/११ चा सुत्रधार अतिरेकी इल्यास काश्मिरी आणि तत्सम अतिरेक्यांना पकडून नायनाट करणे असे असले पाहीजे. कदाचीत आपण ते काम अमेरीकेस आउटसोअर्स केले असावे. तसे असेल तर मग ठीक आहे,नुसतेच बेंचवर बसवून ठेवण्याऐवजी आपल्याच (म्हणजे भारतीय नागरीकांच्या) मागे त्यांना सोडले तरी हरकत नसावे.

In reply to by विकास

तिमा Mon, 06/06/2011 - 17:22
हेडिंगमधे एकदम 'रॉ म्हणजे विकास' असे वाचले गेल्याने क्षणभर गोंधळ उडाला. बाकी चालू द्या.

In reply to by राही

रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती नव्हे.................... ह्या वाक्याबद्दल कोणीकाही पुरावे देऊ शकेल काय? अन्यथा सदर वक्तव्य करणार्‍या व्यक्ती या देखील तशाच उथळ आहेत असे आम्ही सोयिस्कररित्या समजू. वरील प्रतिसादात सर्व विधाने जर तर, असतील-नसतील अशा मोघम स्वरूपाची आहेत. ज्याअर्थी रॉ ला यात पडावे लागले,त्याअर्थी मामला गंभीर असणार आणि इरादे नेक नसणार असे मानायला मी तयार आहे. CBI ला सार्थपणे Congress Invistigatino Bureau असे म्हटले जाते. सरकारी यंत्रणेचा वापर स्वार्थासाठी करणे ही काँग्रेसची निती नवीन नाही त्यामुळे रॉ ला यात पडावे लागले असली विधाने राजकीयदॄष्ट्या अपरिपक्व वाटतात. आणि अगदी रॉला यामधे पडायचेच होते तर सकाळपासून रॉ काय माशा मारत बसले होते का? येवढी मोठी रिस्क जर असेल तर रॉ ने इतका वेळ काढला यातूनच सरकारचे (काँग्रेसचे) इरादे नेक नव्हते हे स्पष्ट होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आनंदयात्री Mon, 06/06/2011 - 20:26
>>>>रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक अधिष्ठान असलेली व्यक्ती नव्हे.................... >>ह्या वाक्याबद्दल कोणीकाही पुरावे देऊ शकेल काय? पेशव्यांशी सहमत आहे. हेच रामदेवबाबा काँग्रेस प्रो असले असते तर काय झाले असते असाही विचार येतो (अर्थात सरकार त्यांचे असल्याने त्याची सुतरामही शक्यता नाहीच पण प्रतिसादात बरेच फरक दिसले असते.) उगाच रामदेवबाबा योगगुरु आहेत म्हणुन त्यांना राजकारण/समाजकारंण करण्याची संधी नाही असे गळे काढणार्‍यांना तुम्ही कारकुंडे आहात तुम्हाला सद्यस्थितीवर मत प्रदर्शित करण्याची संधी नाही असे म्हणावे वाटते. आणि, जर अयोध्येसारखी घटना होणार असा कयास जे लोक लावतायेत त्यांनी या वेळेस टारगेट काय होते हे सांगावे. रामदेवबाबा जमाव जमा करुन स्विस बँक तर लुटायला जाणार नव्हते ?

In reply to by आनंदयात्री

अप्पा जोगळेकर Tue, 06/07/2011 - 20:12
हेच रामदेवबाबा काँग्रेस प्रो असले असते तर काय झाले असते असाही विचार येतो तसे असते तर थत्ते काका वेगवेगळ्या संस्थळांवर त्यांच्या बाजूने मनापासून लढले असते असा विचार येतो.

In reply to by राही

रणजित चितळे Mon, 06/06/2011 - 13:07
अरुंधती रॉय व गिलानी सगळीकडे जाऊन कश्मिर हा भारताचा भाग का नाही होऊ शकत असे बोंबलत आहेत त्यांच्या विरुद्ध सरकार काही करत नाही. बाबरी विध्वंस बद्दल बोलायचे तर माझे विचार येथे व्यक्त आहेत. http://rashtravrat.blogspot.com/2010_09_01_archive.html

In reply to by राही

मराठी_माणूस Mon, 06/06/2011 - 13:45
बाबरीचा आणि आताचा मुद्दा , ह्यात फरक आहे . बाबरीचा मुद्दा हा बराचसा नकरात्मक आणि राजकीय होता. आताचा मुद्दा प्रत्येकाच्या (धर्म , जात विरहीत) जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे , ह्यात सरकारने केलेल्या कारवाईचे कसले समधान ?

धमाल मुलगा Mon, 06/06/2011 - 14:56
गडबड आहे खरी. परंतू, मला गंमत वाटतेय ती दुसर्‍याच गोष्टीची. जो माणूस, काहीतरी विधायक कार्य करायचा प्रयत्न करतोय, (मग भले त्यात त्याचा हिडन अजेंडा का असेना) तर त्या कामात बिब्बा घातलाच पाहिजे. राजकारण्यांची रखेल बनलेली प्रसारमाध्यमं जे ओकतील त्यावर निर्बुध्दपणे माना डोलावल्याच पाहिजेत, अडचणीत येणार्‍या भ्रष्टाचारी सरकार आणि त्याच्या नोकरशाहीच्या दडपशाही आणि अंदाधुंद कारभाराला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या मदत केलीच पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं काही विधायक काम करण्याची काहीशी का होईना इच्छा असलेला मनुष्य प्रयत्न करु लागला रे लागला, की ताबडतोब त्याचं खच्चीकरण केलंच पाहिजे ह्या हस्तीदंती मनोर्‍यातील विचारांना कुरवाळणार्‍या 'मला काय त्याचं?' ह्या नवउच्चमध्यमवर्गिय मानसिकतेचं जे जाहीर प्रदर्शन दिसतंय त्याचं काय? हे सगळेच तर उभा देश मातीत घालायला निघालेत की. *(हिडन अजेंड्याबद्दलचं वैयक्तिक मतः आजच्या घडीला कोण माईचा लाल आहे उभ्या १००कोटीच्या ह्या देशात, की जो स्वत:च्या हिडन अजेंड्याविना काम करतोय? मग त्यातल्या त्यात जरा बरं असलेलं जरी दिसलं तरी त्याची बाजू काळीकुट्ट ठरवण्यातून लोकांना काय आसूरी आनंद मिळतो कोण जाणे. )

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Mon, 06/06/2011 - 15:23
ओके, तुमच्या मताचा आदर ठेऊन असे सांगतो की मला ( काही पक्षी आम्हाला ) १०० भ्रष्टाचारी राजकारणी परवडले पण उगाच असले अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन स्वतःच्या विचित्र आणि अचाट संकल्पनांपायी (टोटल विदेशी बंदी) देशाच्या प्रगतीत बिब्बा घालणारे व काही अंशी देशाला पुन्हा अ-विकसित अवस्थेकडे न्हेणारे बाबा/काका/आण्णा/मामा/ताई वगैरे लोक नको आहेत असे सांगतो. हे लोक तर नकोच नको पण ह्यांची उगाच मिडिया मॅनेज करुन चमकोगिरी करणारी आंदोलने नको असेही सांगतो. सरकारने विकासाकडे पहावे की असल्या उपटसुंभ मागण्या करत जमाव जमवुन त्यायोगे सरकारला 'ब्लॅकमेल' करत हिंडणार्‍या महाभागांच्या नाकदुर्‍या काढत हिंडावे ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा Mon, 06/06/2011 - 15:53
>>ओके, तुमच्या मताचा आदर ठेऊन असे सांगतो धन्यवाद.
की मला ( काही पक्षी आम्हाला ) १०० भ्रष्टाचारी राजकारणी परवडले पण उगाच असले अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन स्वतःच्या विचित्र आणि अचाट संकल्पनांपायी (टोटल विदेशी बंदी) देशाच्या प्रगतीत बिब्बा घालणारे व काही अंशी देशाला पुन्हा अ-विकसित अवस्थेकडे न्हेणारे बाबा/काका/आण्णा/मामा/ताई वगैरे लोक नको आहेत असे सांगतो.
सहमती आहेच. मुळात त्यांनी हुकुमशहागिरी केली आहे किंवा तयारी आहे असं आहे का? ते जरी लाख म्हणाले, तरी आजची अर्थव्यवस्था त्यांचा अट्टाहास सामावून घेऊ शकते का? तर नाही. पण मग, ह्याचा अर्थ असा काढायचा का की, अमुक एक मुद्दा चुकीचा आहे किंवा अमुक इतके मुद्दे चुकीचे आहेत म्हणून ह्या व्यक्तीची प्रत्येकच गोष्ट चुकीची आहे असा सरळसोट ग्रह करुन घ्यायचा' ? जे मुद्दे चूक आहेत त्याकडे लक्षही देण्याची गरज नाहीच. पण, जे बरोबर आहेत तेही कचर्‍यातच जमा केले जावेत का? प्रगतीला एव्हढी मोठी खीळ घालणारा कोणीही फार काळ टिकू शकणार नाही हे सांगण्यासाठी कोणाही विश्लेषकाची गरज नाही. आजचा काळ हा पन्नास-शंभर वर्षापुर्वीच्या व्यक्तीपूजेच्या काळापेक्षा फार निराळा आहे. आपलीच कुचंबणा होते आहे हे कळालं की सगळे समर्थक दूर जाण्याला जास्त वेळ लागत नाही. तरीही जर कोणाशी अशी भावना असेल की, केवळ रामदेवबाबा किंवा तत्सम प्रभृती आपल्या सामाजिक ताकदीचा वापर अशा रितीने देश आणि देशाची व्यवस्था हाती घेण्यात यशस्वी होतील तर समस्त मुरब्बी राजकारण्यांची कीव करावीशी वाटते. >>हे लोक तर नकोच नको पण ह्यांची उगाच मिडिया मॅनेज करुन चमकोगिरी करणारी आंदोलने नको असेही सांगतो. ह्या भानगडी अमेरिकन मिडियाकडून उचलून इथे राबवल्या कोणी ह्याचा शोध घ्या. जर ते चालतं तर हे का नाही? :)
सरकारने विकासाकडे पहावे की असल्या उपटसुंभ मागण्या करत जमाव जमवुन त्यायोगे सरकारला 'ब्लॅकमेल' करत हिंडणार्‍या महाभागांच्या नाकदुर्‍या काढत हिंडावे ?
  • देशातील काळा पैसा आर्थिक घडीच्या मुख्यप्रवाहात आणावा,
  • परदेशात दडवलेला काळा पैसा भारतात परत आणावा आणि प्रवाहात आणावा.
  • (टोकाची भूमिका सोडल्यास काही अंशी, ) देशी उद्योगधंद्यांना बाजारपेठ मिळावी, ज्यायोगे देशातील पैसा देशात खेळता राहील...
ह्यापैकी कोणती मागणी सरकारला देशातील परिस्थितीचा विकास करण्यात आडकाठी करणारी आहे ते मला तरी कळालेलंच नाही. जाता जाता: राजकिय हेतू काही का असेना, महिन्या दिड महिन्याच्या फरकानं झालेल्या दोन आंदोलनांबाबतच्या सरकारच्या धोरणांमधील जमीन आस्मानाच्या फरकाबद्दल कोणालाच आश्चर्य वाटलेलं दिसत नाही काय?

In reply to by धमाल मुलगा

आंबोळी Mon, 06/06/2011 - 22:05
जाता जाता: राजकिय हेतू काही का असेना, महिन्या दिड महिन्याच्या फरकानं झालेल्या दोन आंदोलनांबाबतच्या सरकारच्या धोरणांमधील जमीन आस्मानाच्या फरकाबद्दल कोणालाच आश्चर्य वाटलेलं दिसत नाही काय? प्रिय धमालराव कोळसे-पाटलांचे अभिनंदन! अत्यंत योग्य आणि महत्वाचा मुद्दा उपस्थित केल्या बद्दल.... घटनाक्रमः १) अण्णांचे उपोषण : जनमानसात प्रसिध्धी, लोकांचा पठिंबा, सरकार (झक मारत) बॅक फूट वर.... २) अण्णा - बाबा बेबनाव : अण्णा रामदेवबाबा यांच्यात काहि कारणाने मतभेद.... ३) सरकारने (अगोदर मान्य करुन नंतर) अण्णांचे काही मुद्दे फेटाळले, अण्णा परत देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत... ४) बाबांचे वेगळे आंदोलन..... ५) सरकारने आंदोलन चिरडले.... यातून घडलेल्या गोष्टी : (माझ्या टाळक्या नुसार) १) अण्णांचे सुपरस्टारपद एकारात्रीत बाबांकडे.... २) जनतेचे लक्ष लोकपाल विधेयकावरुन उडून बाबांच्या अत्ताच्या अवस्थेवर आणि पुढच्या हालचालींवर... सरकारला दिलासा.... ३) बाबा एका रात्रीत देशाचे (मिडिया थ्रु) हिरो..... पर्फेक्ट विन्-विन सिचुएशन... सरकारला पण आणि बाबांना पण.... धमालराव कोळसे-पाटलांचा विजय असो!!!

In reply to by सुहास..

आंबोळी Tue, 06/07/2011 - 19:49
निवडणुकांचे टायमिंग ?? प्रश्नच नाही! या प्रकारामुळे रामदेवबाबांना जनतेची प्रचंड सहानुभुती मिळतेय.... ही एन्कॅश करण्यासाठी बाबा राजकारणात उतरले तर ' भगव्या कपड्यातला' बाबा भाजप आघाडाचीच मते खाणार आणि त्याचा काँग्रेसला फायदा होणार हे शेंबड पोरग सुद्धा सांगेल.... बाबांनी भाजप बरोबर युती करू नये व स्वतंत्र जागा लढवाव्यात हे मॅनेज करायला सुबोधकांत सहाय्य करतीलच....

In reply to by छोटा डॉन

मराठी_माणूस Mon, 06/06/2011 - 17:16
बाबा/काका/आण्णा/मामा/ताई वगैरे लोक नको आहेत असे सांगतो. ए राजा, शरद, सुरेश, अजित, विलास, अशोक, आदर्श मधील सर्व ....(सगळ्या मान्यवरांची नावे घेतलि तर प्रतिसाद खुप मोठा होईल) हे लोक देशाला खुप प्रगतीपथावर नेतील असे वाटते का ?

In reply to by छोटा डॉन

समंजस Mon, 06/06/2011 - 22:59
सरकारने विकासाकडे पहावे की असल्या उपटसुंभ मागण्या करत जमाव जमवुन त्यायोगे सरकारला 'ब्लॅकमेल' करत हिंडणार्‍या महाभागांच्या नाकदुर्‍या काढत हिंडावे ?>> सरकार कुठला विकास करतेय? कोणाचा विकास करतेय? देशाचा? सामान्य जनतेचा? स्वत:चा ? की स्वतःच्या राजकीय पक्षाचा?? यावर आणखी जास्त आणि मुद्देसुद वाचायला आवडेल...

In reply to by धमाल मुलगा

विकास Mon, 06/06/2011 - 16:01
उद्या जर "विकास" या आयडी ने भिमसेनांच्या गाण्यावरून एखादा लेख लिहीला तरी पब्लीकला त्यात हिडन अजेंडा वाटू शकेल. ;) असो. केवळ गंमत म्हणून असे लिहीले आहे, कुणाचीही थट्टा करायचा हिडन अजेंडा यात नाही.:-) इतकेच म्हणायचे आहे की आपल्याला भ्रष्टाचाराची आणि तो करणार्‍या भ्रष्टाचार्‍यांची इतकी सवय झाली आहे की कोणिही काही चांगले काम करत असेल तर त्यातही काहीतरी लफड असणार असेच बघायची नकळत सवय लागलेली आहे. आज भ्रष्टाचाराने आपल्याला रसातळाला पोचवलेले आहे. पण, वास्तवातील (भ्रष्टाचाराच्या) भुतापेक्षा कल्पनेचे भूत नाचवले तर त्याचा खेळ जास्त रंगू शकतो... हे काही मी बाबा रामदेवांच्या बाजूने लिहीत नाही. उद्या त्यांचे लफडे बाहेर आले तर आहे ना कायदा आणि मेडीया लक्तरे वेशीवर टांगायला... पण आज, भ्रष्टाचाराच्या विरोधात जो कोणी आंदोलन करेल त्याला माझे समर्थन आहे. मग ते अण्णा, बाबा अथवा अगदी जामा मशिदीचे बुखारी असुंदेत अथवा अमीर खान असुंदेत. त्यांचा जर काही हिडन अजेंडा असेल तर त्याच्याकडे नक्कीच नंतर बघता येईल. आणि तसे देखील आपले पब्लीक लई इरसाल आहे. उगाच कुणाच्या मागे जास्त काळ रहात नाही, सगळे "पळभरच" असतय...

In reply to by विकास

नितिन थत्ते Mon, 06/06/2011 - 16:30
>>पण आज, भ्रष्टाचाराच्या विरोधात जो कोणी आंदोलन करेल त्याला माझे समर्थन आहे. आंदोलन करणे म्हणजे आत्ताच्या आत्ता अमूक करा अश्या मागण्या करणे नव्हे. भ्रष्टाचारी व्यक्तीला फाशी द्या असा वटहुकूम काढला तर भ्रष्टाचार नाहीसा/बराच कमी/थोडा कमी/किंचित कमी होईल असा भ्रम रामदेवबाबा किंवा कोणाला का होतो आहे? भ्रष्टाचार्‍याला फाशी द्यायला भ्रष्टाचार सिद्ध होणे ही प्रीकंडिशन असावी आणि तो अधिक मोठा प्रश्न आहे. त्यासाठी लोकपाल विधेयकावर अगोदरच काम चालू आहे. स्विस बँकेतला पैसा राष्ट्रीय संपत्ती घोषीत करा.... केली. त्याने काय होणार आहे? ती तुमच्याकडे कशी येणार? स्विस बँकेतला पैसा देशात परत आणा. तो (बाबांचे उपोषण चालू असण्याच्या काळात) कसा आणायचा याबाबत रामदेव यांनी काही मार्गदर्शन केले आहे का? (म्हणजे तो पैसा देशात परत येईपर्यंत बाबा उपोषण सोडणार नव्हते असे गृहीत धरले आहे). अवांतर: बाबांच्या जिवाला धोका होता हे पोलीसांचे म्हणणे काही बाबासमर्थक म्हणून आसपास वावरणार्‍या अतिरेक्यांच्या तेथील वावरावरून खरे असावे असे वाटू लागले आहे. म्हणजे बाबांना अपाय करून त्याचे खापर इतरत्र फोडले जावे असा हेतू असावा. अतिअवांतर : सरकारने बाबांच्या म्हणण्याप्रमाणे भ्रष्टाचार्‍यांना (म्हणजे नक्की कोणाला हा प्रश्न बाजूला ठेवू) फाशी देण्याचा वटहुकूम काढला तर ते लोकपाल विधेयकाची जी प्रोसेस चालू आहे तिला बायपास केल्यासारखे होईल का?

In reply to by नितिन थत्ते

गवि Mon, 06/06/2011 - 16:45
बाबांच्या मागण्या आणि त्यातील फीजिबिलिटी यावर वेगळा धागा असल्यास चांगले होईल. कारण तो विषय चर्चिलाच जात नाहीये या मुख्य नाट्यमय प्रसंगमालिकेमुळे. मला वाटते उद्देश चांगला आहे पण मागण्या अव्यवहार्य आहेत. (मागण्यांचा गाभा सदहेतूने प्रेरित आहे पण प्रेझेंटेशन आणि मुदती / पद्धती अशक्य कोटीतल्या अतिरेकी वाटतात.. हाय होप्स टाईप.) पण तेवढ्याने त्यांच्या मूळ उद्देशाविषयीच शंका घेऊन त्याला विरोध करणं चुकीचं वाटतं.

In reply to by नितिन थत्ते

छोटा डॉन Mon, 06/06/2011 - 16:58
अवांतर: बाबांच्या जिवाला धोका होता हे पोलीसांचे म्हणणे काही बाबासमर्थक म्हणून आसपास वावरणार्‍या अतिरेक्यांच्या तेथील वावरावरून खरे असावे असे वाटू लागले आहे. म्हणजे बाबांना अपाय करून त्याचे खापर इतरत्र फोडले जावे असा हेतू असावा.
नक्की कोण हो ? आम्ही अगदी डोळे फाडु फाडुन पाहिले पण त्यात आम्हाला एकही अतिरेकी दिसला नाही. बाकी बाबांना अपाय होण्याची शक्यता होती असे बाबा म्हणतात, खरे असावे, एकदा का प्रसिद्धीचा मोह चढला की काहीही भास होऊ लागतात व कुणीही शत्रु वाटु लागतो असे आम्हाला वाटते.
अतिअवांतर : सरकारने बाबांच्या म्हणण्याप्रमाणे भ्रष्टाचार्‍यांना (म्हणजे नक्की कोणाला हा प्रश्न बाजूला ठेवू) फाशी देण्याचा वटहुकूम काढला तर ते लोकपाल विधेयकाची जी प्रोसेस चालू आहे तिला बायपास केल्यासारखे होईल का?
ओ थत्तेचाचा, आण्णांचा अनुभव २ वर्षे आणि बाबांचा २० वर्षे असे खुद्द त्यांनी ( व नंतर मी मिपावर ) सांगितले आहे ना, मग शिनियर कोण ? कुनाचे ऐकायचे मग ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

आंबोळी Mon, 06/06/2011 - 22:37
एकदा का प्रसिद्धीचा मोह चढला की काहीही भास होऊ लागतात व कुणीही शत्रु वाटु लागतो असे आम्हाला वाटते सहमत आहे... पण या प्रकरणात मला तरी बाबांची आणि सरकारची भुमिका ही ' तु मारल्या सारखे कर मि रडल्यासारखे करतो' अशीच वाटते.... अण्णांच्या लोकपाल वरुन लोकांचे लक्ष उडवण्यासाठी.... सुबोधकांतांची मैत्री कामी आली बहुतेक....

In reply to by नितिन थत्ते

मराठी_माणूस Mon, 06/06/2011 - 22:19
आंदोलन करणे म्हणजे आत्ताच्या आत्ता अमूक करा अश्या मागण्या करणे नव्हे गांधिजींनी "चले जाव" चे आंदोलन केले तेंव्हा त्यांना , ब्रिटीशांनी माघारी जाण्याची प्रक्रीया लगेच चालु करावी हेच अभिप्रेत होते . कोणतीही समीती नेमुन वेळकाढु पणा करणे हे नक्कीच नको होते

In reply to by विकास

उद्या जर "विकास" या आयडी ने भिमसेनांच्या गाण्यावरून एखादा लेख लिहीला तरी पब्लीकला त्यात हिडन अजेंडा वाटू शकेल हो मग आम्ही तुमच्या गाण्यातल्या (बालिश) जाणकारी बद्द्ल संशय व्यक्त करून तुम्ही पब्लिकला गोंधळात टाक आहात असे लिहू. :) -पुपेकेश ह.घ्या.हे.वे.सां. न.ल.

In reply to by विकास

चेतन Mon, 06/06/2011 - 16:50
हिडन अजेंडा नक्की वाटु शकेल (कुठला चष्मा चढवलाय त्यावर अवलंबुन आहे) कदाचित या धाग्यावर कुठल्या स्पेसिफिक आयडींकडुन प्रतिसाद आले तर तो कम्युनलही वाटु शकेल. आणि तसेही या धाग्यावर ५० पेक्षा जास्त प्रतिसाद आल्याने काही गडबड करण्याचा हेतु होता का ही शंकाही मनात येईल. रॉ ला विचारुन कोणि हिंदु अतिरेकी प्रतिसाद देत असेल तर धाग्याची उचलबांगडी ही करता येईल. ;-) चेतन अवांतरः अशी थातुरमातुर कारणे देउन बहुतेक प्रत्येक सभेला विरोध करता यावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुहास.. Mon, 06/06/2011 - 20:02
छान करमणुक झाली काही प्रतिसाद वाचुन ;) वृती आणि प्रवृत्ती चा घोळ घालण्यात विचारवंताना यश आले आहे असे वाटुन गेले , बाकी वाद होणार होता याची खात्री होतीच. कारण हल्ली काय बोलतो आहे या पेक्षा कोण बोलतो आहे याला विचारवंत नेहमीच जास्त महत्त्व देतात.(सौजन्य : पका काका ) असो ! आय डेफिनेटली सपोर्ट बाबा रामदेव ! किमान त्याने उपोषणाला बसण्याची , त्यानंतर सरकार शी बोलण्याची, अटकेत मार खाण्याची , त्याला प्रतिकार करण्याची, स्त्री वेषात पोलीसांना भुल देण्याची, मिडीया समोर बोलण्याची हिम्मत तरी दाखविली. तिथे जो पोलीस गेला तो देशातल्या सगळ्यात सुपरपावर्ड इसमाकडुन ऑर्डर्स घेवुन गेला होत. तो तिथे उपोषणाला बसणार नाही हे निश्चितच ! पण जे उपोषणाला बसले आणि ज्या हेतुने बसले होते त्यांना मात्र काही ही पावर नव्हत्या , किती ही काही ही बोलले तर तो अत्याचारच ! बाकी राहिली हिडन अ‍ॅजेडाची गोष्ट ! वर्षानुवर्षे एकच प्रश्नाच घोंगड भिजत ठेवले यात कोणाला काही हिडन एजेंडा कसा दिसत नाही ? मुळात स्विस बँकेत (आणि नंतर इतर परदेशी बँकेत) पैसा ठेवण्याची सुरुवात कोणी केली ? या प्रश्नाचे बोफोर्स रुपी उत्तर बाहेर येणार होते का ? त्यानंतर सरकार पक्षातल्या कोणा-कोणाचे (काय युवराज का काय ते ? ) बाल्यावस्थेत असणारे कोमल करियर संपणार होते का ? छ्या ! पण नकोच ते प्रश्न , नकोच ! म्हणुन अगदी हेच म्हणतो ! कोण रामदेवबाबा ?

In reply to by सुहास..

नितिन थत्ते Mon, 06/06/2011 - 20:21
>>मुळात स्विस बँकेत (आणि नंतर इतर परदेशी बँकेत) पैसा ठेवण्याची सुरुवात कोणी केली ? या प्रश्नाचे बोफोर्स रुपी उत्तर बाहेर येणार होते का ? आँ? म्हणजे स्विस बँकेत पैसे ठेवण्याची सुरुवात बोफोर्सच्या वेळी झाली? आम्हीतर ब्वॉ आणिबाणीच्या काळापासून स्विस बँकेत पैसे ठेवले असल्याचे ऐकत आलो.

पोलिसांची कार्यवाही दुर्दैवी पण, कार्यवाहीशिवाय पर्याय नव्हता- इति पंतप्रधान. सलवार कपडे घालून बाबा पळून गेले. अहिंसेची पुजारी आणि स्वांतत्र्यसैनिक असे कुठे पळून जात असतात काय. आम्ही बाबांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या पण बाबांनी दिलेले वचन पाळले नाही. काँग्रेसचे द्विवेदीवर चप्पल फेकून मारली यामागे भाजप, आरएसएस वगैरे आणि इतर कारणामूळे मूळ आंदोलनातील सर्व मुद्दे आपोआप दूर राहीले आहेत. आपण शांतपणे आहे ते स्वीकारण्यास तयार राहीले पाहिजे मागच्या पानावरुन पुढे. देशाचा कारभार अगदी व्यवस्थित चालू आहे.:) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा Mon, 06/06/2011 - 20:46
पंतप्रधान बोल्ले न्हवं? मग झालं तर. देशाचा कारभार वेवस्तित चालू है! उगं कुनी आरडू नगा. खोटंनाटं कांगावा करु नगा. यु.पी.ए., एन.डी.ए., आन्खी कोन कोन ए टू झ्येड....ऐका.. "आऽऽऽऽल इज वेऽऽऽऽल" ! जन्ता जनार्दना, आता झोपा कांबरुनात गुरगटून.

In reply to by धमाल मुलगा

श्रावण मोडक Mon, 06/06/2011 - 21:50
आमच्या धम्याचं मोठेपण ते हेच. पंतप्रधान बोलताच त्याला "आऽऽऽऽल इज वेऽऽऽऽल" हे कळलं. मग तो तसा संदेश लगेच देऊ लागला. तेव्हा मंडळी... ;)

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा Tue, 06/07/2011 - 14:34
काल दिसभर तुमी नव्हता चावडीत, मंग म्हनलं बगावं वाईच खुर्चीत बसून कसं वाट्टंय. मज्जाय हौ तुमच्या खुर्चीत. -धम्या तराळ. :D

टारझन Mon, 06/06/2011 - 22:44
काय पेटलंय एकेक पब्लिक :) इथे कोणी पेड लेखक नसल्यामुळे सगळी माहिती अंत:करणातुन आली असावी ह्यावर विश्वास आहे . तरीही .. श्री थत्ते यांचे काँग्रेसकृती वर मत ऐकण्यास उस्तुक :) बाबा कामदेव

विकास Mon, 06/06/2011 - 22:45
सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणाचा गांभिर्याने विचार करत syo moto (स्वदखल) नोटीस केंद्रावर बजावली आहे...

In reply to by विकास

समंजस Mon, 06/06/2011 - 23:36
या वर अर्थातच सरकारचं उत्तर हे नेहमीच्या पठडीतलं राहणार. जसे की, १) बाबा रामदेव यांच्या जिवाला धोका होता अतिरेक्यां पासून २) मैदानावर मोठ्या प्रमाणावर जनता जमली होती त्या मुळे लॉ एन्ड ऑर्डर ची समस्या निर्माण होणार होती. ३) बाबा रामदेव हे त्यांच्या समर्थंकासह हिंसक आदोलन करणार होते. ४) मोठ्या प्रमाणावर जनता जमलेली असल्या मुळे अतिरेकी हल्ला होउन जिवहानी होण्याची शक्यता होती. वगैरे कारणांमुळे ही पोलीसी कारवाई करावी लागली. आता सरकारच्या वरील संभाव्य उत्तरांना प्रश्न, जसे की, १) बाबा रामदेव यांच्या जिवाला धोका आहे हे ५ तारखेलाच कळलं का? या आधी धोका नव्हता का? २) मैदानावर या पुर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनता जमलेली आहे आणी भविष्यात सुद्धा जमणार मग प्रत्येक वेळेस ह्याच प्रकारची पोलीसी दडपशाहीची कारवाई केली जाणार का? जेव्हा राजस्थानात गुज्जर लाखो च्या संख्येनी महामार्गावर जमा होतात, महामार्ग बंद करतात, रेल्वे लाइनवर बसून रेल्वे गाड्या बंद पाडतात तेव्हा लॉ एन्ड ऑर्डर ची समस्या निर्माण होत नाही का? तेव्हा त्यांना पांगवण्याकरीता अश्रूगोळ्यांचा/लाठ्यांचा वापर का केला जात नाही?? हेच हरयाणातील जाटांच्या आंदोलनाबाबत. ३) हा तर्क या पुढे प्रत्येक आंदोलनाबाबत, सरकार विरोधातील आंदोलनाबाबत लावण्यात येणार का? ४) पुढील निवडणूकीच्या वेळीस जेव्हा या सरकारातील नेत्यांच्या प्रचारसभेत लाखोंची गर्दी झाल्यास हिच अतिरेक्यांच्या हल्याची आणि जिवीत हानीची भितीची कारणे पुढे करून प्रचार सभेवर पोलीसांतर्फे लाठीमार/अश्रुगोळे फेकून जमावाला पांगवण्यात येणार का?? हा देश आणि या देशातील जनता तशीही असुरक्षीत आहे. इथे केव्हाही कुठेही बॉम्ब स्फोट होत आहेत, अतिरेकी केव्हाही लोकांना गोळ्या घालत आहेत अश्या परिस्थीत या सरकारचा वरील तर्क मान्य करायचा झाल्यास, या देशात कुठेही लोकांना जमा होण्यास, गर्दी करण्यास, सभा घेण्यास (निवडणूकीची सुद्धा) मनाई करण्यात यावी आणि कायम स्वरूपी संपुर्ण देशात धारा १४४ लावण्यात यावी. आणि अश्या परिस्थीती बद्दल म्हणावं की सगळं कंट्रोल मधे आहे आणि भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे!!!!

In reply to by समंजस

विकास Tue, 06/07/2011 - 00:39
प्रतिसादाशी सहमत... "बाबा रामदेव यांच्या जिवाला धोका होता अतिरेक्यां पासून म्हणून मध्यरात्री पोलीस अ‍ॅक्शन अमलात आणली" या बचावात्मक मुद्यावरून कधीकाळी एका दाक्षिणात्याने सांगितलेला मुद्दा आठवला: त्याच्या म्हणण्याप्रमाणे दक्षिणेत काहीजण रावणाला व्हिलन मानत नाहीत. वास्तवीक सीता त्याची मुलगी होती म्हणून तो तीला माहेरपणाला घेऊन जात होता! :-)

In reply to by विकास

श्रावण मोडक Mon, 06/06/2011 - 23:37
सुप्रीम कोर्टाने ही जी स्वदखल घेतली तीही थोडी इण्टरेस्टिंग आहे. याच कोर्टातले जनहितयाचिकाफेम वकील अनील अग्रवाल यांची एक याचिका आज सुप्रीम कोर्टात सुनावणीला येणार होती. न्यायमूर्ती चौहान आणि स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठापुढे. अग्रवालांनी नेहमीप्रमाणे आधी प्रसिद्धीचा खुळखुळा वाजवला होता. त्यामुळं काल मध्यरात्रीच्या लाठीहल्ल्याविषयीच्या याचिकेचे तपशीलही आज सकाळीच वृत्तसंकेतस्थळांवर झळकले होते. इतके की, त्यात सुप्रीम कोर्टात केव्हा सुनावणी होणार याचीही माहिती देण्यात आली होती. न्यायमूर्तींपुढे ही याचिका सुनावणीला आली तेव्हा त्यांनी या पूर्वप्रसिद्धीविषयी आश्चर्य व्यक्त केले (जणू कोर्टात येणाऱ्या याचिका गुप्तच असतात). मग त्यांनी ती याचिका दाखल करून घेण्याचा कल दाखवला नाही. तर स्वतः नोटीस काढली, असे दिसते. या नोटीशीला तीन आठवड्यांची मुदत आहे. पाहू काय होते ते...

पुष्करिणी Tue, 06/07/2011 - 02:29
४ तारखेला म्हणे त्या मंडपात कोणीतरी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तिला फारशी काही इजा झाली नाही. पण झाली असती किंवा इतर लोकांनीही असं काही करायला सुरूवात केली असती तर दंगे पेटले असते असं टिव्हीवर एकजण ( पहिला काँग्रेसचा प्रतिनिधी ज्यानं निवेदन दिलं) म्हटले..., असं सगळं वेळीच आटोक्यात आणण्यासाठी पोलिस कारवाइ करण्यात आली. पण ही आत्मदहनाच्या प्रयत्न करण्याची बातमी काही सापडत नाहीये आता बाबांचे पट्टशिष्य आचार्य बाळ्कृष्ण काल पहाटेपासून बेपत्ता आहेत, यांनीच सरकार बरोबर सगळ्या वाटाघाटी केल्या होत्या. आता ते एक सरावलेले नेपाळी गुंड आहेत अशा बातम्या येतायत :)

समंजस Tue, 06/07/2011 - 13:54
परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?">> या सरकारच्या कार्यकाळात हे असे म्हणण्याची वेळ बरेचदा सामान्य जनतेवर आलेली आहे, आता खरे तर हेच विचारण्याची वेळ आली आहे की, "सरकारला डोके तरी आहे का?"

नरेशकुमार Tue, 06/07/2011 - 15:16
एक खुप सोप्पा उपाय आहे. सरकारनी एक समीती नेमावि, तिच्याकडुन सगळ्या भारतीयान्ना एका कार्डात (जसे ते आधार कार्ड वगेरे दिले जात आहे त्यात) 'तो मानुस प्रामानीक आहे का नाही (Yes/No)' याचि तपासनि करुन त्यात नोन्द करावी. जर तो मानुस प्रामानीक असेल तर त्याला आन्दोलन करता येइल, आन्दोलनात भाग घेता येईल आनि त्याहुन महत्वाचे त्यालाच मतदान करता येईल. जो प्रामानीक नसेल म्हंजे ज्याच्या कडे असे कार्ड नसेल तो अप्रामानीक समजला जाईल. त्याला आन्दोलन करता येनार नाही, त्यात भाग घेता येनार नाही. मतदानात करता येनार नाही.(नाहीतरि जो प्रामानीक नाही त्याला मतदानाचा हक्क तरी कशाला, नाही का ?) मंग सगळे प्रामानीक लोकंच आन्दोलन करतील, मतदान करतील. भारत एकदम सुखि होईल.

In reply to by नरेशकुमार

विकास Tue, 06/07/2011 - 20:32
जो प्रामानीक नसेल म्हंजे ज्याच्या कडे असे कार्ड नसेल तो अप्रामानीक समजला जाईल. त्याला आन्दोलन करता येनार नाही, त्यात भाग घेता येनार नाही. मतदानात करता येनार नाही आणि त्या (अप्रामाणिकाला) फक्त निवडणूक लढवता येईल! ;)

नारयन लेले Tue, 06/07/2011 - 16:40
बाबा॑चे मुद्दे व त्यानिउभे केलेले प्रश्न्न सर्वसामान्य जनतेस पट्णारे होते म्हणुनच येव्हड्या मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठि॑बा मिळाल्यचे पहिले. सरकारची पोलिसी कारवा‍ई नपट्णारीच होती. त्यासाठि सरकारचा धिक्कार विनित

मृत्युन्जय Wed, 06/08/2011 - 12:31
असे बघा गवि, अण्णा म्हणा किंवा बाबा म्हणा मोठ्या धेंडाच्या मागे लागले आहेत कारण ते आकडे डोळे दिपवणारेच काय संवेदना बधीर करणारे आहेत. आकडा जेवढा मोठा तेवढे आंदोलन मोठे हवेच. आपल्यासारखे सामान्य लोक काळा पैसा तयार करत असतातच असे तुम्ही म्हणता हे ही मान्य. हे बंद झाले पाहिजे हे ही मान्य. पण आता काही मूळ मुद्दे लक्षात घ्या. ज्या लोकांविरुद्ध हे आंदोलन चालु आहे त्यांनी अनिष्ट मार्गाने प्रचंड काळा पैसा उभारला आहे. अर्थात त्यावर काहीही कर भरलेला नाही. हा काळा पैसा आला कुठुन तर २ मार्गांनी: १. सामान्य माणसाने भरलेल्या करातुन किंवा इतर प्रकारच्या करातुन या लोकांनी भ्रष्टाचार करुन स्वतःच्या तुंबड्या भरल्या किंवा २. सामान्य माणसाकडुन लाच स्वरुपात मिळवला. दोन्ही बाबतीत राजकारणी श्रीमंत झाले आणि प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरुपात सामान्य माणूस लुबाडला गेला म्हणजेच गरीब झाला. हा पडला प्रत्यक्ष मार. आता राजकारण्यांनी जो काळा पैसा जमवला त्यातुन फक्त तेच श्रीमंत झाले. देश कामासाठी पैसा कुठुन आणणार? मग काय झाले तर कर वाढले. प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कर वाढले ज्यातुन प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष फायदा सामान्य माणसाला फारसा काहीच नाही. कारण कर स्वरुपात गोळा होणारा पैसा त्या प्रमाणात समाजकार्यासाठी वापरलाच गेला नाही. हा पडला सामान्य माणसाला पहिला अप्रत्यक्ष मार. या सगळ्या लाचखोरीत कंत्राटे मिळवण्यासाठी व्यावसायिकांनी प्रचंड प्रमाणात लाच दिली. त्यांचा खर्च झाला. मग तो पैसा ते कुठुन मिळवणार? किंमती वाढवुन. म्हणजे महागाई वाढली. थोडक्यात जी गोष्ट क्ष रुपयांना मिळणे अपेक्षित होते तीच काही मुठव्हर लोकांना अमाप पैसा खाल्ला म्हणुन क्ष + य रुपयांना मिळायला लागली. हा पडला दुसरा अप्रत्यक्ष मार. थोडक्यात जे श्रम सामान्या माणूस करतो आणि त्यातुन जो मोबदला मिळतो त्यात ज्या प्रकारचे राहणीमान त्याला परवडले पाहिजे ते परवडत नाही. जर हा माणूस नौकरदार असेल तर त्याच्याकडे काहीच उपाय नसतो. कारण त्याला पैसे खाण्याच्या संधी नसतात (किमान खाजगी नौकरीत तरी नाही) आणि उत्पन्नावरील कर ही बुडवता येत नाही कारण तो पगारातुन परस्पर कापला जातो. मग तो पैसे वाचवतो अश्या छोट्या मोठ्या उद्योगातुन. त्यातुन फारसा फायदा होत नाही. पण त्याकडे लक्ष देण्याची फारशी कोणाला गरजही वाटत नाही कारण त्याकडे लक्ष देउन वेळ, पैसा आणि साधनसंपत्ती खर्च करावी एवढा तो जास्त नसतोच. वरच्या पातळीवरचा भयानक भ्रष्टाचार थंडावला की लोकांची ही जी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पिळवणुक चालली आहे ती आपोआप थांबेल. आज ज्या गोष्टीसाठी १० रुपये खर्च करायला लागत आहेत त्यासाठी ५ च रुपये खर्च करायला लागले की हा भ्र्ष्टाचार कमी होइलच. त्यामुळे त्यासाठी वेगळे आंदोलन करायची गरज नाही

In reply to by मृत्युन्जय

गवि Wed, 06/08/2011 - 12:53
वरच्या पातळीवरचा भयानक भ्रष्टाचार थंडावला की लोकांची ही जी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पिळवणुक चालली आहे ती आपोआप थांबेल. आज ज्या गोष्टीसाठी १० रुपये खर्च करायला लागत आहेत त्यासाठी ५ च रुपये खर्च करायला लागले की हा भ्र्ष्टाचार कमी होइलच. त्यामुळे त्यासाठी वेगळे आंदोलन करायची गरज नाही योग्य लॉजिक. उत्तम विचार. एकदम मान्य.. आपण कर भरतो म्हणजे "लुटले" जातो आणि मोठी धेंडे सर्व चुकवून उजळ माथ्याने फिरतात ही सामान्यांची भावना सर्वाच्या मुळाशी आहे. आणि ती अशा मार्गाने जाईल असे तुम्हाला म्हणायचे आहे असे दिसते. आणि ते योग्य वाटते.

In reply to by मृत्युन्जय

राही Wed, 06/08/2011 - 15:01
माझे मत याच्या अगदी उलट आहे.लोकशाहीमध्ये भ्रष्टाचार वरून खाली झिरपत नाही.आपण सारेच भ्रष्ट आहोत म्हणून आपल्यातून आलेले आपले लोकप्रतिनिधीसुद्धा भ्रष्ट आहेत. जे आडात तेच पोहोर्‍यात."नागरिकांत कर्तव्यभावना जागृत असेल तर सरकारी बंधनांची आवश्यकता व कर देण्याचे महत्त्व लोकांच्या सहजी लक्षात येईल."(डॉ.माधव दातार-म.टा.७/६.-अवश्य वाचनीय) आपली सोसायटी एक अनिर्बंध आणि बेबंद अशी भटक्या,विमुक्त स्थितीतली सोसायटी आहे. सिविल लॉ न जुमानणे,आपल्या टोळी(जात)पंचायती भावकी यांनाच मानणे व घाबरून असणे या स्वरूपाचे ट्रायबल इंस्टिंक्ट्स अजूनही आपल्यात शिल्लक आहेत्.जपान,अमेरिका,फ्रांस इथे वरच्या पातळीवर खूप भ्रष्टाचार चालतो पण सामान्य माणसाला त्याची झळ पोचत नाही वा तो राज्यकर्त्यांचे अनुकरण करून भ्रष्टही वागत नाही.याचे कारण रनाय्सांस पासून पुढे ६००-७०० वर्षे तिथे आधुनिकीकरणाची आणि नागरिकीकरणाची(सिविलायझेशन म्हणावे का?)प्रक्रिया ट्रायल्-एरर पद्धतीने तावून सुलाखून निघून लोकांच्या अंगवळणी पडलेली आहे.आधुनिक संस्कृतीचे वेगळे कायदेकानून असतात,वेगळी स्वयंशिस्त असते हे आपल्या अजून गळी उतरलेले नाही.आपण मोकाट,अंदाधुंद वागतो,कुणी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला की चवताळून उठतो.आणि ही अनागोंदी आजकालची नव्हे,सुमारे एक हजार वर्षे ती चालू आहे. आधीच्या प्रतिसादांतील ग.विं चे म्हणणे बरेचसे पटते की विखुरलेला भ्रष्टाचार हा केंद्रित भ्रष्टाचारापेक्षा कितीतरी मोठा आणि हुडकून काढण्यास कठिण आहे. प्रतिसाद लांबतोय आणि थोडेसे अवांतर होतेय पण एक निरीक्षण नोंदवण्याचा मोह आवरत नाहीय. कच्छी किराणा विक्रेत्यांशी बोलण्याचा प्रसंग आला. ते लोक आपापल्या गावांत कशी प्रगती सुरू आहे,अडाणी उद्योग रिलायन्सला कसा मागे टाकीत आहे,मुंदरा बंदरामुळे स्थावर मालमत्ता व विकासकामांना कशी तेजी आली आहे,बिहारी मजुरांचे तांडे कसे गावात घुसत आहेत,जनजीवन असुरक्षित होते आहे,गावात मागे वृद्ध आणि बायकामुलेच कशी उरली आहेत,गावागावातून त्यांच्यासाठी वृद्धाश्रमांतून राहाण्याची आणि 'टिफ्फिन' चीही मोफत अथवा नाममात्र पैशात सोय कशी आहे वगैरे सांगत होते.मी विचारले,नि:शुल्क सेवा परवडते कशी? तर सर्वांना ठाऊक असलेलेच उत्तर मिळाले,'इथे गावागावातून एकदोन तरी अब्जाधीश अथवा श्रीमंत एनाराय असतात.ते पुष्कळसा खर्च उचलतात त्यांना ते जड नाही".आता गणित करावे,कच्छमध्ये किती खेडेगावे आणि किती अब्जाधीश? हा सर्व पैसा काळा नसणार हे खरे, पण तो संपूर्णपणे पांढराही नसणार हेही खरे. आणखीही मनोरंजक माहिती(आधीच माहीत असलेली) निघत होती, पण अवांतरामध्ये अवांतर नको. असो.

In reply to by पुष्करिणी

विकास Wed, 06/08/2011 - 16:07
नक्कीच जमले तर तेथे मत मांडेन. (का नाही जमणार? जर इथे इतक्या पिंका टाकतोय तर तिथे एकच टाकायला काय हरकत आहे? ;) ) असो. तो पर्यंत कॉलींग सुधीर जी! :-)

विजुभाऊ Wed, 06/08/2011 - 15:13
रामदेव बाबांचे आंदोलन ज्या पद्धतीने मोडून काढले तशाच पद्धतीने टेल्को कामगारानी ( नायर) केलेले एक आंदोलन त्यावेळच्या मुख्यमंत्र्याच्या सहाय्याने असेच चिरडून काढण्यात आले होते. त्यावेळेस कोणीच निषेधाचे सुर काढले नाहीत.

In reply to by विजुभाऊ

विकास Wed, 06/08/2011 - 16:21
जितके आठवत आहे त्याप्रमाणे, नायरची माणसे गुंडगिरी करत कुणाला कामाला जाउन देत नव्हती. सगळ्या कामगारांचा त्या संपाचा भाग होयची इच्छा नव्हती. त्या आधीच्या दत्ता सामंतांच्या गिरणीकामगार संपाच्या आठवणी ताज्या होत्या आणि त्यात देशोधडीला लागलेले कामगार आणि मुंबईतून उठलेल्या गिरण्यांसारखी पुण्यातल्या कामगारांची आणि टेल्कोची अवस्था व्हावी अशी कुणाचीच इच्छा नव्हती. परीणामी कामगार/कर्मचार्‍यांचा पाठींबा नसलेल्या गुंडगिरीस सरकार आणि एकत्रित कामगारांनी असफल केले. इथे एका सामाजीक मागणीसाठी उपोषण चालले होते. त्यात सहभागी असणारे काँग्रेसच्या सभांसारखे ट्रक्स आणि सरकारी बसेस भरून आणल्याचे कोणी लिहीलेले देखील नाही अथवा माध्यमांद्वारे ऐकीवातही आलेले नाही. त्यामुळे असली तुलना म्हणजे मूळ मुद्यास बगल देऊन दिशाभूल करणे आहे. म्हणूनच, वास्तवीक असा संदर्भ देऊन म्हणायचेच असेल तर टेल्को प्रमाणे तसेच इंदीरा गांधींनी जसा रेल्वे कामगार संप चिरडला तसाच गिरणीकामगार संप चिरडून गिरण्या चालू ठेवण्यास मदत का केली नाही हा आहे. ते न केल्याने मुंबईला सामान्य मराठी माणूस पारखा देखील झाला आणि त्यातूनच आधी नसलेले टोळीयुद्ध आणि अरूण गवळीसारखे अनेकजण तयार झाले... असो.

In reply to by विजुभाऊ

समंजस Wed, 06/08/2011 - 18:47
निषेधाचे सुर थोडे फार निघाले असतील परंतू मोठ्या प्रमाणावर निघाले नसतील तर त्याला काही कारणे असावीत जसे की, १) ते आंदोलन फक्त काहि मर्यादित लोकांच्या मागण्यांशी/हिताशी संबंधीत (म्हणजेच त्या कंपनीचे कर्मचारी आणि त्यांचे हित) असल्यामुळे इतर जनतेला त्या बद्दल विशेष काही वाटलं नसेल, परंतू इथे हे आंदोलन फक्त काही मर्यादित लोकांच्या हिताशी संबंधित न राहता देशातील जास्तीत जास्त नागरीकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे प्रभावित करणार्‍या समस्येशी होतं या मुळे ह्या आंदोलनाशी जास्तीत जास्त नागरीकांचा भावनिक संबंध होता त्या मुळेच ज्या पद्धतिने सरकारने हे आंदोलन चिरडले, ज्या नेत्यांचा वारसा हा पक्ष सांगत आला (महात्मा गांधी/नेहरू) आहे त्याच पक्षाने सत्तेच्या लोभापायी, सत्ता हातातून सुटणार या भितिपायी रात्रीच्या अंधारात पोलीसी कारवाई केली, लोकशाही मुल्ये तुडवीली, नागरीकांच्या मुलभूत अधिकारांवर हल्ला चढवला त्या मुळे निषेधाचे आणि संतापाचे सुर निघालेत. हिटलरने सुद्धा काहिश्या अश्याच पद्धतिने आपल्या निंदकांचा, विरोधकांचा काटा काढला, ज्यूंना वेगळे करून मारलं आणि नंतर विरोधी जर्मन नागरीकांना सुद्धा. सुरवातीला रशियाशी हात मिळवणूक केली आणि नंतर संधि मिळताच, वेळ येताच त्यांच्यावरही हल्ला केला. हुकूमशाहीची सुरवात ही अशीच असते. फूट पाडायची, समाजातील गट वेगवेगळे होतील, राहतील आणि एकमेकांना मदत करणार नाहीत ही काळजी घ्यायची आणि मग एक-एक करत सगळ्या विरोधकांना चिरडून काढायचं. हिटलरने हेच केलं, ब्रिटीशानी हेच केलं आणि हे राजकीय नेते सुद्धा हीच पद्धत अवलंबत आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी ह्या प्रकरणाचा निषेध केला हे बरंच झालं या देशातील संभाव्य हुकूमशाही आणखी काही काळ लांबली.

In reply to by विजुभाऊ

मैत्र Fri, 06/10/2011 - 15:00
शनिवार वाडयावर आंदोलन केलं होतं. उपोषण वगैरे नसावं. मदन पाटील नामक तत्कालिन कोणी मंत्री व इतर लोकांवर अत्यंत इरसाल गाणी आणि घोषणा केल्या होत्या. दुसर्‍या का तिसर्‍या दिवशी पहाटे २-३ वाजता तुफान पोलिस दल आणून ५-६ वाजण्याच्या आत सगळ्यांना नाशिक / ठाणे ई. जेलमध्ये घेऊन गेले होते. राजन नायर तसा गुंडच होता. तेव्हा शनिवार वाड्याच्या अगदी समोर राहत असल्याने आणि पहाटे जोरदार गोंधळ माजल्याने जाग आली आणि सर्व प्रकार प्रत्यक्ष पहायला मिळाला होता. खरं तर रामलिला मैदानावरची सरकारची कृती पाहून जुन्या घटनेची प्रकर्षाने आठवण झाली पण रामदेव या मनुष्याच्या उद्दिष्टाबद्दल खात्री नसली तरी अगदी राजन नायर सारख्या युनियन लिडर गुंडाबरोबर तुलना करणं योग्य वाटलं नाही म्हणून आत्ता पर्यंत संदर्भ दिला नव्हता. आणि त्यामुळेच तेव्हा फार मोठा गदारोळ झाला नव्हता. त्याच्या विरुद्ध बाजूच्या एका युनियनचे काही कामगार संपात सहभागी नव्हते. ज्या पद्धतीने कारवाई केली आणी रातोरात सगळ्यांना पुण्याबाहेर नेलं. त्यावर टीका झाली. पण २० वर्षापूर्वी मीडिया इतका स्ट्राँग नव्हता. आणि चॅनेलवरची ठोठो आरडा ओरड ही नव्हती. आता झालं असं तर सगळ मराठी चॅनेल्स - माझा तुझा, बाणा आणि ठाम मत तुफान फटकेबाजी करून प्रसिद्धि मिळवतील. ही घटना माहीत असलेले मिपाकर नसावेत असं वाटलं होतं. विजूभाउंनी जरा सरप्राईझ केलं.

समंजस Wed, 06/08/2011 - 19:15
या संपुर्ण घडामोडींदरम्यान (अण्णा हजारेंचं आंदोलन, आताचं बाबा रामदेव यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला चिरडण्याचा झालेला प्रयत्न आणि त्या नंतरच्या घडामोडी) एक गोष्ट जी बर्‍याच लोकांच्या नजरेतून सुटली परंतू ज्यांच्या लक्षात आली आणि त्या मुळे झालेला एक मोठा अपेक्षाभंग तो म्हणजे, देशाला समर्थ नेतृत्व देउ शकणारा, या देशाच्या प्रगतीला, राजकारणाला एक चांगली दिशा देउ शकणारा, एका जुन्या राजकीय पक्षाला मजबूत नेतृत्व देउ शकणारा, भविष्यात प्रधानमंत्रि होउ पाहणार्‍या ज्या व्यक्तीकडे देशातील एक मोठा भाग, एक मोठा समाज मोठ्या आशेने बघत होता ती व्यक्ती म्हणजे राहूल गांधी कुठेच दिसली नाही. अचानक हवेत गायब झाल्या सारखी ही व्यक्ती अदृष्य झाली म्हणजे जेव्हा कॉंग्रेस पक्षाला, कॉंग्रेस सरकारला सक्षम नेतृत्वाची, लढवय्या नेत्याची, समजूतदारपणा असलेली तसेच भान सुटलेल्या आणि जिभेवरचा ताबा सुटलेल्या, सत्तेचा नशा चढलेल्या, सत्ता हातातून जाणार ही भिती असलेल्या पक्षातील नेत्यांना आवरण्याची, सावरण्याची ताकद असलेला नेता हवा होता/आहे अश्या वेळेस ही व्यक्ती कुठेच समोर दिसत नाहिय आणि पराकोटीचा अहंकार असलेली, पक्षाला जनतेपासून दुर घेउन जाणारी, वास्तव्य स्विकारण्याची तयारी नसलेली नेते मंडळीच काय ती दिसत आहेत. काय ही व्यक्ती खरोखरच एका जुन्या राजकिय पक्षाला, या देशाला समर्थ नेतृत्त्व देउ शकणार?

In reply to by समंजस

धमाल मुलगा Wed, 06/08/2011 - 19:17
उत्तर 'हो' असो किंवा 'नाही' , काय फरक पडतो? "युवराज" ना? वंशपरंपरेनं मुकुट चढणारच डोक्यावर. सिंपल.

In reply to by नितिन थत्ते

विकास Wed, 06/08/2011 - 20:21
राहुल गांधीला देशाचा नेता बनवण्यात म्हणजे राहुल गांधी देशाचे नेते नाहीत असे म्हणायचे आहे? अहो जो पक्ष स्वतःला १०० वर्षांपेक्षा जुना म्हणून क्लेम करतो त्या पक्षाचे ते विद्यमान जनरल सेक्रेटरी आहेत ना?

In reply to by नितिन थत्ते

समंजस गुरुवार, 06/09/2011 - 17:44
राहुल गांधीला देशाचा नेता बनवण्यात काँग्रेसपेक्षा काँग्रेसच्या विरोधकांनाच जास्त विण्टरेष्ट दिसतो आहे>> मी काँग्रेस पक्ष विरोधक नाही परंतू काँग्रेसी विचारांचा विरोधक नक्कीच आहे. राहुल गांधींना देशाचा नेता बनवण्यात किंवा नेता बनण्यात विण्टरेष्ट नाही असा काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता मला ठाउक नाही. आपणांस ठाउक असल्यास मला नाव/नावे जाणून घ्यायला आवडेल :) काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता हा देशाचा नेता असतोच (पक्षाचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी आंदोलन चिरडण्यामागे जे कारण दिलं आहे ते बघता असे दिसून येतंय की या देशात फक्त काँग्रेस पक्षच सत्ताधारी राहू शकतो, सत्ता भोगू शकतो, सत्ता मिळवू शकतो इतर कोणीही तसा प्रयत्न केल्यास destabilising the Government त्यांना अश्या प्रकारे चिरडले जाणार). फक्त इथे प्रश्न आहे तो सामर्थ्याचा, क्षमतेचा आणि त्या बाबतीत राहूल गांधींपासून जास्त अपेक्षा आहेत. सिनेमातील हिरोच्या स्टंटबाजी सारखी स्टंटबाजी राहूल गांधींकडुन अपेक्षीत नाही जसे की लोकल मधून प्रवास करणे, अचानक पणे कुठेही निघून जाणे, एखाद्या गरिबाच्या घरी जाउन जेवण करणे, राहणे वगैरे. अपेक्षीत आहे ते अश्या प्रसंगी जेव्हा देशातील राजकीय/सामाजीक वातावरण ढवळून निघत असताना समोर येउन, जबाबदारी घेउन परिस्थीला सामोरे जाउन समस्येचं उत्तर शोधून सरकारला/पक्षाला योग्य मार्गदर्शन करावं जे सामान्य जनतेला उपयोगी ठरणार, देशाला उपयोगी ठरणार. देशात सत्ता कोण उपभोगतंय काँग्रेस पक्ष की भाजपा की समाजवादी की आणखी कोणी हे सामान्य जनतेला महत्त्वाचं नाही.

In reply to by समंजस

विकास Wed, 06/08/2011 - 20:25
एकाने (रामदेव) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करायचा प्रयत्न केल्यावर आंदोलन चिरडले गेले तर दुसर्‍याने (राहुल) राज्यपातळीवर आंदोलन करायचा प्रयत्न केल्यावर आंदोलन चिरडले गेले. त्यामुळे मला खात्री आहे की राहुलजींना मनातून आणि मनापासून रामदेवबाबांबद्दल कणवच वाटत असणार. पण भले ते पार्टी जनरल सेक्रेटरी असतील, पण शेवटी पार्टी अ‍ॅड्वायजर म्हणून पण काही प्रकार असतोच ना! त्यांना वाटते तसेच बोलावे लागते.. :( बाकी राहुलजींची मायावतींनी उचलबांगडी केली तेंव्हा काँग्रेस काय म्हणाली ते बघितले पाहीजे. ;)

In reply to by विकास

आंबोळी Wed, 06/08/2011 - 20:56
त्यामुळे मला खात्री आहे की राहुलजींना मनातून आणि मनापासून रामदेवबाबांबद्दल कणवच वाटत असणार.. =)) =)) =)) विकासराव दंडवत स्विकार करावा --^--

वेताळ गुरुवार, 06/09/2011 - 17:55
त्यामुळे मला खात्री आहे की राहुलजींना मनातून आणि मनापासून रामदेवबाबांबद्दल कणवच वाटत असणार.. हे वाक्य अगदीच मनाला स्पर्श करुन गेले.