सत्यसाईबाबांची ती भेट !

पाषाणभेद काथ्याकूट
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-27-04-2011-f631f&ndate=2011-04-27&editionname=main आजच्या लोकमतमधील बातमी जशीच्या तशी खाली डकवित आहे. सत्यसाईबाबांची ती भेट ! (27-04-2011 : 12:43:11) (दिनकर रायकर)::- पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबांचे पार्थिव आज अनंतात विलीन होईल. त्यांच्याकडून होणारे चमत्कार आणि त्यातून निर्माण होणारे वादविवाद हे जसे कायम चर्चेत राहिले तेवढे त्यांनी उभे केलेले समाजोपयोगी, गोरगरिबांना मदत करण्यासाठीचे काम मात्र कधीच चर्चेत आले नाही. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे कदाचित त्यांच्याही बाबतीत सत्य ठरले असावे. बाबा कधी कोणाला हवतून अंगठी काढून द्यायचे तर कधी कोणाला सोन्याची साखळी. अनेकांना ते अंगाराही द्यायचे. या अशा त्यांच्या चमत्काराच्या कथा प्रत्येकजण आपापल्यापरीने रंगवून सांगत असे. मात्र हे सांगत असताना पुट्टपर्थी येथे किडनी, हृदरोग यासारख्या दुर्धर आजारावर पूर्णपणे मोफत औषधोपचार केले जायचे याची कधी तशी चर्चा कोणी करत नसे. या दोन्ही बाजू समजून घ्याव्यात म्हणून सत्यसाई बाबांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील विविध वर्तमानपत्रांच्या ज्येष्ठ पत्रकारांना पुट्टपर्थीला नेण्याची योजना सत्यसाई बाबांवर श्रद्धा असणाऱ्या कॅनको अॅडव्हरटायझिंगचे रमेश नारायण व इंडियन बँक्स असोसिएशनचे अधिकारी जोशी यांनी आखली होती. आधी त्यांनी बाबांची यासाठी परवानगी घेतली. या दौऱ्यात माझ्यासह नवभारत टाइम्सचे त्यावेळचे संपादक विश्वनाथ सचदेव, टाइम्स ऑफ इंडियाचे एस. बालकृष्णन्, महाराष्ट्र टाइम्सचे अशोक जैन, बिझनेस इंडियाचे सरोष बाना, मुंबई समाचारच्या पिकी दलाल, इंडियन एक्सप्रेसचे वरिष्ठ मॅनेजर राजा राव यांचा समावेश होता. त्यात मीही एक होतो. जातानाच आम्ही सगळ्यांनी त्यांना कोणकोणत्या अँगलने तपासून पाहायचे याचे आडाखे बांधले होते. कोणी खुर्चीकडे लक्ष ठेवायचे, कोणी हाताकडे तर कोणी लांब हाताच्या बाह्यांकडे लक्ष द्यायचे हे ही आम्ही ठरविले होते. सत्यसाई बाबांनी देखील आमच्या या पत्रकारांच्या टीमसाठी एक तास वेळ ठेवला होता. बाहेर लाखोंची गर्दी असताना देखील त्यांनी तो वेळ ठेवला होता. बाबा ज्या खोलीत बसतात तेथे आम्ही सगळे गेलो. एक साधी लाकडी खुर्ची होती. ती देखील आम्ही आधी तपासली होती. कारण त्या खुर्चीच्या दांडीला कुठे अंगठी, चेन तर लपवली नाही ना अशी आमची शोधपत्रकारिता तेथे पार पडली. आम्ही सगळे खुर्ची समोरील सतरंजीवर बसलो. काहीवेळाने बाबांचे आगमन झाले. स्मितहास्य करीत, काहीही विचारा, दिलखुलासपणे बोला असे म्हणत त्यांनी सुरुवात केली. स्वत:हून त्यांनी आपली दिनचर्याही आम्हाला सांगितली. मी झोपत नाही, केवळ एका अंगावर डोळे उघडे ठेवून विसावतो, दिवसभर जेवत नाही, गूळ-शेंगदाण्याचा एक लाडू खातो... मी ९३ वर्षे जगणार आहे... पण त्याआधी दुसऱ्या साईने कुठेतरी जन्म घेतलेला असेल... असे ते खूप काही बोलले... बोलता बोलता त्यांनी हवेत हात फिरवला आणि एक हिरव्या खड्याची अंगठी रमेश नारायण यांना दिली. आमच्या गप्पा चालू होत्या. त्याचवेळी अंगठी आल्याने आम्ही आणखी शोधक नजरेने त्यांच्याकडे पहात बोलत होतो. पुन्हा त्यांनी क्षणात दुसरी अंगठी काढून बालकृष्णन् यांना दिली. ती त्यांच्या बोटात जात नव्हती. सरोष बाना यांनी ती अंगठी बालकृष्णन् कडून घेतली व स्वत:च्या बोटात घातली. मात्र त्यावर बालकृष्णन् यांनी पत्रकारी भाषेत ती अंगठी मला दिली आहे असे ठासून सांगितले. मग सत्यसाई बाबांनी ती अंगठी बाना यांच्याकडून परत घेतली. सगळ्यांच्या देखत ती दोन बोटात धरुन त्यावर नऊवेळा फुंकर घातली आणि तीच अंगठी नवरत्नाची झाली. ती त्यांनी बालकृष्णन्ला दिली जी त्याच्या बोटात अगदी माप घेतल्यासारखी व्यवस्थित बसली देखील ! विश्वनाथ सचदेव मागेच बसले होते. हम भी पिछे बैठे है स्वामीजी... असे ते म्हणाले. मात्र बाबांनी तिकडे दुर्लक्ष केले. चर्चा पुढे सुरुच होती. बोलता बोलताच त्यांनी पिकी दलाल यांच्यासाठी सोन्याची चेन काढून दिली. तासाभराची चर्चा संपत आली तसे ते सरोष बाना यांना म्हणाले, आप नाराज मत होना... आणि त्यांनाही बाबांनी अंगठी दिली जी त्यांच्या बोटात व्यवस्थित बसली...! बोलता बोलता ते हवेत हातवारे करत असत. त्यावर विश्वनाथ यांनी विचारले देखील, आप ऐसे हवा में हाथ क्यों उडाते हो... अच्छा नहीं दिखता... त्यावर ते म्हणाले होते... माझ्या समोर जे भक्त नाहीत पण जे माझा मनापासून धावा करत आहेत त्यांच्याशी मी त्याद्वारे संवाद साधत असतो... काही वेळाने आम्ही सगळे खोलीच्या बाहेर आलो. बाहेर त्यावेळचे कंेद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर बसलेले होते. अन्य राज्यातून आलेले असंख्य व्हीव्हीआयपीज् होते. नंतर शिवराज पाटील यांच्याशी गप्पा मारताना ते आम्हाला म्हणाले, इथे आल्यामुळे मला मन:शांती मिळते, माझी सतत उन्नती होत गेली आहे... त्यांचे व्याही देखील तेथे होते. ते नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यांनी ही तीच भावना व्यक्त केली होती. आम्ही सगळे मुंबईत आलो. आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली की नाही हा वादविवाद पत्रकार म्हणून आजही माझा माझ्याशीच चालू आहे. पण जे दिसले, जे अनुभवले ते अदभुत होते. कोणाच्या तरी बोटाच्या मापाची अंगठी आपल्या डोळ्यादेखत समोर येते कशी आणि फुंकर घालण्याने तीच नवरत्नाची कशी होते हा वैज्ञानिक सवाल आजही मला सतावतो. मात्र जे बालकृष्णन् विचाराने लेनिनवादी, माक्र्सवादी होते, जे नियमित मद्यप्राशन करायचे, नॉनव्हेज आवडीने खायचे त्यांनी या भेटीनंतर आजतागायत ना कधी मद्याला हात लावला ना नॉनव्हेजला... कालांतराने एकदा बालकृष्णन स्वत:च्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांच्या बोटातून अंगठी गळून बाजूच्या डस्टबीनमध्ये पडली. रात्री घरी गेल्यावर हे त्यांच्या लक्षात आले. सकाळी लवकर उठून ते ऑफीसमध्ये आले. तर सगळे ऑफीस स्वच्छ झालेले होते. मात्र त्यांचे डस्टबीन तसेच होते. साफ न केलेले... आणि त्यात त्यांना ती अंगठी सापडली. नंतर ही गोष्ट बालकृष्णन् यांनीच मला सांगितली. बाबांचे पार्थिव आज अनंतात विलीन होईल. पण जे पाहिले, जे अनुभवले तो सगळा पट आजही डोळ्यासमोर आहे. अगदी काल घडल्यासारखा... चमत्कारांच्या बाबतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन जसा मला छळत राहिला तसाच त्याच्या दुसऱ्या बाजूने वेगळा दिलासाही दिला... ज्ञानदेवांनी भित चालवली किवा रेड्याच्या तोंडून वेद वदवले म्हणून शहाण्या माणसाने ज्ञानेश्वरीला हातच लावायचा नाही की काय? ========================== तर वर आलेली ही लोकमत मधील बातमी. सत्यसाईबाबा एक मानव होते. ते गेल्यानंतर त्यांच्याविषयी काही वाईट बोलणे योग्य नाही पण हे जे काही चमत्कार होते ते खरोखर सत्य होते का? अन अशा प्रकारचे लेख लिहून लोकमतसारख्या वृत्तपत्राने एकप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घातली नाही का?

41 टिप्पण्या 26,786 दृश्ये

Comments

इनोबा म्हणे नवीन

च्यायला, लोकलमधून लोकांचे पाकीट मारणारा, पुढे काहीतरी धोका आहे म्हणून दागीने काढून रुमालात बांधायला लावणारा चोरटा ही असले चमत्कार करुन दाखवतो. बादवे, वरदराजन मुदलीयार, अरुण गवळी, छोटा राजन किंवा अगदी दाऊद इब्राहीम हि लोकं सुद्धा कोणा ना कोणासाठी आज ही दैवते आहेत. पण, चोरटे राजकारणी, क्रिकेटपटू, अभिनेते, धनदांडग्यांना अंगठ्या, चैनी काढून देणारा बाबा, आणि याच लोकांकडून पैसा गोळा करुन त्यातला काही अंशी पैसा गरीबांमधे वाटणारा 'गुंड' यांच्यामध्ये काहीच फरक नाही. असलाच तर तो 'जाहिर राजाश्रय' एवढाच आहे.

रामपुरी नवीन

"लोकमतसारख्या वृत्तपत्राने एकप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घातली नाही का?" लोकमतकडून फार उच्च अपेक्षा कधीच नव्हत्या. त्यामुळे अपेक्षाभंग अजिबात झाला नाही. बातमीबद्दल बोलायचे झाले तर या दिनकर रायकराना जादूचे प्रयोग दाखविण्याची गरज आहे. ९३ वर्षे जगणार होते तर आधीच कसे खपले? ओकांना विचारायला पाहीजे त्यांची नाडी मिळेल काय. नाहीतरी ते आता काही परत येत नाहीत नाडी बघायला. अवांतरः राशीभविष्य छापणे हे सुद्धा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखेच आहे काय? किंवा "नाडी" चे लेख प्रकाशित करण्याची परवानगी देऊन मिपा सुद्धा अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे काय?

आनंदयात्री नवीन

In reply to by रामपुरी

>>बातमीबद्दल बोलायचे झाले तर या दिनकर रायकराना जादूचे प्रयोग दाखविण्याची गरज आहे. रामपुरी साहेब दिनकर रायकर चिल्लर माणुस नाही. - तोतापुरी

आळश्यांचा राजा नवीन

In reply to by आनंदयात्री

दिनकर रायकर चिल्लर माणुस नाही
बरोबर. म्हणूनच त्यांच्यावर अधिक जबाबदारी येते. त्यांनी ही जबाबदारी नीट पार पाडलेली नाही. लेखन एकांगी आहे. बाबांवरची श्रद्धा प्रकट करण्याच्या नादात (किंवा त्यांच्यावर पडलेला प्रभाव सांगण्याच्या नादात) त्यांनी घातच केलेला आहे. (त्यांचे लेखन औपरोधिकही वाटत नाही.) त्यांनी चमत्कारांचा निषेध वगैरे करायला हवा होता असे म्हणायचे नाही, परंतु लेखाच्या सुरुवातीला जे "दुसरी बाजू" वगैरे म्हटले, त्याविषयी बोलायला हवे होते. ते प्रभावित होण्याबद्दल काही म्हणायचे नाही, त्यांची श्रद्धा असल्यास त्यावरही काही बोलायचे नाही. पण ज्या कारणामुळे ते प्रभावित झाले, ते पाहता "ते चिल्लर नाहीत" हे विधान शंकास्पद वाटते.

आनंदयात्री नवीन

In reply to by आळश्यांचा राजा

बाकी सर्व मतांशी सहमत आहे राजेसाहेब, पण >>पण ज्या कारणामुळे ते प्रभावित झाले, ते पाहता "ते चिल्लर नाहीत" हे विधान शंकास्पद वाटते. रिफ्रेझ : सत्यसाईबाबांच्या चमत्काराने रायकर सर प्रभावित झाले म्हणुन ते चिल्लर ठरतात का ? अवांतरः आपल्या कडच्या चर्चांमध्ये घडोघडी एखाद्याच्या तोंडाला काळे फासण्याचा आंतरजालीय व्हर्जन सारखा दिसुन येतो तो नकोसा वाटतो एवढेच.

रामपुरी नवीन

In reply to by आनंदयात्री

कोणी कोणाच्या तोंडाला काळे फासले? मी तरी रायकरांच्या तोंडाला काळे फासलेले नाही. गरजही नाही. साध्या जादूच्या प्रयोगाने रायकर जर प्रभावित होत असतील तर असल्या जादू कुठलाही जादूगार करू शकतो हे त्यांना जादूचे प्रयोग बघितल्यावरच समजेल, नाही का? म्हणून त्यांना "जादूचे प्रयोग दाखविण्याची गरज आहे" असं म्हणालो. अवांतर: दिनकर रायकर हे नाव कधी कानावरून गेल्याचं आठवत नाही. कशाबद्दल प्रसिद्ध आहेत ते? अर्थात पत्रकार आहेत एवढं लेखावरून समजलं पण ते थोर कशाबद्दल आहेत ते माहीत नाही.

इनोबा म्हणे नवीन

In reply to by रामपुरी

माफ करा, पण आपल्या "नाडी" चे लेख प्रकाशित करण्याची परवानगी देऊन मिपा सुद्धा अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे काय?" या मुद्द्याशी असहमत आहे. मिपा हे कोणत्याही प्रकारे वर्तमानत्र अथवा साप्ताहिक या सारख्या धंदेवाईक मिडीयासारखे 'धंदेवाईक संस्थळ' नाही. त्यामुळे कुणाचातरी टाईमपास व्हावा अथवा खप वाढावा या उद्देशाने कुठल्याही चुकीच्या प्रकारांना मिपा प्रशासनाने पाठीशी घालण्याचा प्रकार मी तरी पाहीलेला नाही. ज्योतिष हे शास्त्र आहे अथवा नाही, याबाबत आपण चर्चा करु शकतो, मात्र ज्योतिष हे थोतांड आहे अथवा नाही हे ठरवायचा पुर्ण अधिकार हा मिपाकरांचा आहे. त्यांच्यावर अशाप्रकारची कुठलीही बंधने लादणे हे मला(वैयक्तिक) गैर वाटते.

शशिकांत ओक नवीन

In reply to by रामपुरी

९३ वर्षे जगणार होते तर आधीच कसे खपले? ओकांना विचारायला पाहीजे त्यांची नाडी मिळेल काय. नाहीतरी ते आता काही परत येत नाहीत नाडी बघायला.
रामपुरी आणि मित्रहो, श्रीसत्यसाईबाबांची नाडी साधारण १७-१८ वर्षांपुर्वी हुडकली गेली होती. त्यावरून तयार केलेली श्लोकांची वही इंटरनेटवर आजही उपलब्ध आहे. वहीमधील श्लोक क्र. ३१, ३२, ३३ मध्ये श्रीसत्यसाईबाबांच्या महानिर्वाणाबद्दल भाष्य केलेले आहे. त्याचे भाषांतर मी एका मित्राकडून मिळवले होते. हे बालका, तुझ्यावर अनंत आशिर्वाद आहेत, की तुझ्या तत्त्वाचा मृत्यू न व्हावा. तू साहजिकच एका जीवनातून दुसर्‍या जीवनामध्ये प्रकटशील. ज्याने भक्तजनांना धर्मतत्त्वे उमगतील. तुझा पुढील जन्मसुद्धा गुणी अवताराचा राहील. येत्या जन्मात तू प्रेमसाईअवतार म्हणून ओळखला जाशील. तू अनेक लीला दाखवशील आणि देवत्त्व पावशील. तू लोकांना मार्गदर्शन करशील आणि कर्मसिद्धांत शिकवशील. त्यानंतर तू शिवतत्त्वात राहत येशील.

रामपुरी नवीन

In reply to by शशिकांत ओक

हे बेष्टच झालं की. म्हणजे आता अंगठ्याचा ठसा नाही म्हणून गळा काढायचा प्रश्न नाही. ती नाडी आता कार्बन डेटींग वा ईतर प्रयोगांसाठी देऊन टाकायला काहीच हरकत नसावी. आता नक्की कुठे आहे ती नाडी? निदान स्कॅन तरी करून टाका. बघू तरी "सत्यसाईबाबा" हे कूट तमीळ मध्ये कसं लिहितात ते. :)

पाषाणभेद नवीन

In reply to by शशिकांत ओक

"फक्त मिपावरचे लोक तुला मानणार नाही", असा उल्लेख तेथे नसल्याने ती नाडीपट्टीका खोटी असावी असा निष्कर्ष काढण्यात यावा.

पाषाणभेद नवीन

ससाबा दैवी चमत्काराने अंगठी, चेन, अंगारे वगैरे काढायचे हे एकवेळ मान्य केले. मग त्यांनी ते चमत्कार फक्त काही गोष्टींपुरतेच का मर्यादीत ठेवले? त्यात त्यांना प्रगती करता आली नाही काय? (म्हणजे आधी १० सेमी ची चेन काढणे, पुढल्या महिन्यात २० सेमी नंतर दोन फुटी.) किंवा एखाद्या रुग्णाला बरे केले नाही का? मग त्यांनी औषधोपचाराला रुग्णालये का काढली? अवांतर १: जे काही बाबा असले चमत्कार दाखवतात त्यांची मर्यादा ते का घालून घेतात? उदा. समजा सोन्याची चेन काढणे: जर समजा तो खरोखर चमत्कार असेल तर जास्त प्रमाणात सोन्याच्या चेन्स काढून ते सोने ते राष्ट्राच्या तिजोरीत का भरत नाही? (भले मग देशासाठी दिवसाकाठी काही तोळेच काढा पण काढा ना!) रुग्णांना बरे करता येणे: दररोज १०० रुग्ण बरे करा अन दिवसभर आराम करा ना! ऐवीतेवी ते बाबा झालेलेच असतात म्हणजेच ते समाजाचे झालेले असतात. मग त्यांचे चमत्कार शक्ती पुर्ण समाजासाठी का वापरत नाही. (येथे आलेल्या पैशाने रुग्णालये काढली, आलेल्या पैशाने शाळा काढल्या, आलेल्या पैशाने गावाचा विकास केला अन चमत्कार करून रुग्ण बरे केले, चमत्काराने लोकांची मने सुधरवली, चमत्काराने गावाचा विकास केला यात गल्लत करू नका. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.) अवांतर २: महाराज, बाबा आदिंच्या नादाला अनेक राजकारणी मंत्री, अधिकारी, न्यायमुर्ती, हॉलीवूडी, बॉलीवूडी, श्रीमंत, कारखानदार व्यक्ती लागलेले असतात. त्यांचे अनुकरण समाजातील (स्व:ताच्या विचारांवर पक्के नसलेले) लोक करतात. असल्या नादाला लागल्यानंतर किती प्रमाणात असल्या व्यक्ती अमुलाग्र बदलतात? किती प्रमाणात ते भ्रष्टाचार, अनितीने वागणे थांबवतात? (मंत्री घोटाळे टाळतात, कारखानदार भेसळीच्या वस्तू बनवत नाही, बॉलीवूडी सर्व इन्कम टॅक्स भरतात व व्हाईट मध्येच चित्रपट साईनअप करतात आदी., न्यायमुर्ती प्रामाणीकपणे न्याय देतात आदी.) अवांतर ३: असल्या बाबा, महाराजांना भेटतांना समाजातील इतर मोठ्या लोकांशी ओळख होते. ती ओळख मग आपआपल्या कार्यक्षेत्रात शिडी म्हणून उपयोगी ठरते. हा प्रॅक्टीकल विचार करूनच कमी मोठे लोक जास्त मोठे होण्यासाठी या बाबा, महाराजांच्या नादी लागलेले असतात असे विचारांती वाटते. उदा: आज मनमोहन सिंग तेथे गेले. त्यांच्याबरोबर त्यांचे एखादे मंत्री असतील. मग ते मंत्रीही मनमोहन सिंगांचे मन राखण्यासाठी 'काय पॉवरबाज बाबा होते' असे म्हटले असेल. मग त्या मंत्र्याचा पीए म्हटला असेल. मग त्या पीए चे पाहून एखादा काम नडलेल्या व्यक्तीनेही तसलेच उद्गार काढले असतील.

किशोरअहिरे नवीन

In reply to by पाषाणभेद

पाषाण भेद मला नाही वाटत आपल्या प्रश्नांची ऊत्तरे द्यायला लेखक किंबा कोणी साई भक्त समर्थ आहे अहो असे हजारो जादुचे प्रयोग करुन दाखवणारे जादुगार जगात पहायला मिळतील (शरिराचे १० तुकडे करुन जोडुन पण दाखवतात :) ).. अर्थातच ते खोटे असते किंवा काहीतरी ट्रीक करुन ते आपल्याला बनवतात हे माहीत असते म्हणुन त्यांना साईबाबा नाही म्हणत ना लोक. पण जे पोपट लोक स्वता:ला बाबाचा अवतार म्हणवुन जादुचे प्रयोग करुन लोकांना चमत्कार म्हणून दाखवतात त्याला काय म्हणणार.. जर कोणाला साई बाबा(ज्युनीअर) वरच्या ह्या वाक्यावर आक्षेप असेल त्यांनी आधी पाषाण भेद ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तरे द्यावीत..

प्राजु नवीन

हम्म रोचक आहे!! चर्चा वाचण्यास प्रचंड उत्सुक!! बाय द वे.. पाभे साहेबांची शंका मात्र रास्त आहे. रोज साधारण २० तोळे सोनं काढायचं आणि ते सरकारच्या तिजोरित भरायचं.. मस्त आहे ना उद्योग! करायला हरकत नव्हती. असं केलं असतं तर भारत केव्हाच महासत्ता झाला असता ना!

आळश्यांचा राजा नवीन

या दोन्ही बाजू समजून घ्याव्यात म्हणून सत्यसाई बाबांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील विविध वर्तमानपत्रांच्या ज्येष्ठ पत्रकारांना पुट्टपर्थीला नेण्याची योजना
रायकर साहेबांचा भर एकाच बाजूवर आहे. जी दुसरी बाजू समजून घेण्यासाठी हे पत्रकार मंडळ पुट्टपार्थीला गेले होते, त्याचे काय झाले, त्या ठिकाणांना, संस्थांना या लोकांनी भेटी दिल्या काय, याविषयी काहीच भाष्य नाही. केवळ "ती भेट" असे म्हणून मिळालेल्या अंगठ्यांचे कौतुक सांगण्यात लेख वाया घालवलेला आहे. त्यांना बाबांविषयी आदर वाटला असेल, तर तो अंगठ्यांमुळे वाटला की त्यांच्या समाजोपयोगी कार्यामुळे वाटला की काही आध्यात्मिक सत्ये बाबांनी यांना समजावली त्यामुळे वाटला हे स्पष्ट होत नाही. (अंगठ्यांमुळे वाटला असावा अशी शंका येते.) इथे ना बाबांच्या समाजोपयोगी कार्यावर भाष्य आहे ना आध्यात्मिक कार्य/ योग्यता यांवर भाष्य. (साक्षही कुणाची तर शिवराज पाटील.)
चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे कदाचित त्यांच्याही बाबतीत सत्य ठरले असावे.
हे वाक्य अतिशय चुकीच्या पद्धतीने वापरलेले आहे. याचा अर्थ होतो, बाबांनी चमत्कार दाखवले नाहीत, म्हणून त्यांना नमस्कार मिळाला नाही. प्रत्यक्षात मात्र स्वतः लेखकाने बाबांना नमस्कार केवळ चमत्कार दिसला म्हणूनच केलेला आहे असे दिसते. बाबांवर टीका करणारे, आणि बाबांची भक्ती करणारे, दोन्ही, फक्त आणि फक्त चमत्कारांविषयीच बोलतात, हे लक्षणीय आहे. लेखकाने बाबांची ज्ञानेश्वरांशी तुलना केलेली आहे, ती अनाठाई आहे. ज्ञानेश्वरांची चर्चा रेड्या-भिंतीपेक्षा ज्ञानेश्वरीविषयी होत असते. आपली आठवण "एक चमत्कारी/ फ्रॉड बाबा" अशी ठेऊन बाबा गेले. भक्तांसाठी, टीकाकारांसाठी, आणि ज्यांना याच्याशी देणेघेणे नाही, त्यांच्यासाठीही. माझ्या मते हे त्यांचे घोर अपयश आहे.

शिल्पा ब नवीन

ज्ञानदेवांनी भित चालवली किवा रेड्याच्या तोंडून वेद वदवले म्हणून शहाण्या माणसाने ज्ञानेश्वरीला हातच लावायचा नाही की काय? वा रे पठ्ठे!! रेड्याच्या तोंडून वेद वदवले हि उपमा आहे हेसुद्धा या प्रकांड पंडीत पत्रकार महाशयांना कळु नये यावरुनच त्यांची स्वत:ची महती समजते.... ज्ञानेश्वरांशी तुलना केलेली पाहून डोळे डबडबून आले...

गणेशा नवीन

In reply to by शिल्पा ब

अवांतर : रेड्याच्या तोंडून वेद वदवले हि उपमा आहे ?? मला खरेच माहित नव्हते की ही फक्त उपमा आहे.. पण ज्ञानेश्वर यांच्यावरील पिक्चर मध्ये तर तसे दाखवले आहे ... आणि मध्ये आता तो रेडा बोलल्याला काही वर्षे झाली तो पण साजरा केला होता बहुतेक ..

गणेशा नवीन

"सत्यसाईबाबांची ती भेट !" कालच लोकमत न्युज वर आयकले यांच्याकडुन .. त्यांचे म्हणने हे होते की आजपर्यंत याचे उत्तर सापडले नाही असे का ? माझे मन मानत नाहिच हे .. म्हणुन आतापर्यंत ही न्युज आम्ही दिली नव्हती .. कारण वाचक लगेच म्हणणार तुम्हीच सांगा चमत्कार असतात वगैरे ... जाउद्या त्यांचा अनुभव त्यांनी लिहिला./. आपल्याला पटु वा न पटु... पाभेंचे उत्तर कोणी देवु शकेल तर ते फक्त सत्यसाईबाबा होते .. निदान त्यांना रायकरांसारखे भेटुन आलेले तरी उत्तर देवुदे .. नाहितर त्यांच्यावरील ऐकने वाचने यावरुन हवेत काय गोळ्या मारायच्या ..

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहमत आहे. पाभेंनी बाबांवर एखादी कविता, वग लिहून जागृती घडवून आणावी असे आम्ही त्यांना सुचवतो. -बुद्धीभेद

योगी९०० नवीन

मला या लेखाची थोडी गंमत वाटते.. सत्यसाई बाबांनी देखील आमच्या या पत्रकारांच्या टीमसाठी एक तास वेळ ठेवला होता. बाहेर लाखोंची गर्दी असताना देखील त्यांनी तो वेळ ठेवला होता. बाबा ज्या खोलीत बसतात तेथे आम्ही सगळे गेलो. एक साधी लाकडी खुर्ची होती. वरील वाक्यांवरून बाबाचा उदो उदो करायचे हे आधीच ठरले होते असे वाटते.. बोलता बोलता त्यांनी हवेत हात फिरवला आणि एक हिरव्या खड्याची अंगठी रमेश नारायण यांना दिली. त्यासाठी हवेत हात का फिरवला...जेव्हा हवेत हात फिरवला म्हणजे हातचलाखी केली असे मी तरी मानतो.. फुंकर घालण्याने तीच नवरत्नाची कशी होते हा वैज्ञानिक सवाल आजही मला सतावतो. कालच फेसबुकावर एका जादूगाराने एका मुलीचे दात हाताने काढले आणि नुसती फुंकर मारून त्याच मुलीला ते दात बसवले असा व्हिडीओ पाहिला. कालांतराने एकदा बालकृष्णन स्वत:च्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांच्या बोटातून अंगठी गळून बाजूच्या डस्टबीनमध्ये पडली. रात्री घरी गेल्यावर हे त्यांच्या लक्षात आले. सकाळी लवकर उठून ते ऑफीसमध्ये आले. तर सगळे ऑफीस स्वच्छ झालेले होते. मात्र त्यांचे डस्टबीन तसेच होते. साफ न केलेले... आणि त्यात त्यांना ती अंगठी सापडली. नंतर ही गोष्ट बालकृष्णन् यांनीच मला सांगितली. ह. ह. पु.वा.

झुळूक नवीन

मागे एकदा मी मिपावरतीच एक लेख वाचला होता,त्यात या बाबाच्या रुग्णालयात आलेल्या एका व्यक्तिच्या वडिलांवरती उपचार झाले पण काही वर्षानंतर त्या व्यक्तीची एक किडनी नसल्याचे लक्शात आले होते,असे बरेच प्रसंग घडले असतील म्हणुन तर एवढी संपत्ती गोळा केली ना या माणसाने! कुणाला माहित असल्यास दुवा द्यावा.

भडकमकर मास्तर नवीन

गप्प राहायचे ठरवले आहे. अवांतर : सचिन तेंडुलकर नावाचे बाबा सुद्धा हवेत ब्याट फिरवून तमाम भक्तांना रन्स काढून देत असत, अशी एक आठवण शंभर वर्षांनी सांगितली जाईल......

श्रावण मोडक नवीन

ज्ञानेश्वर आणि रेडा या कथेवर माझा आता पूर्ण विश्वास बसू लागला आहे. ती भाकडकथा नाही. ;) ज्ञानेश्वरच्या जागी धनेश्वर टाकल्यानंही फारसा फरक पडत नाही. कोणी तरी ईश्वर रेड्याला वेद म्हणायला लावतो हे पुरेसे आहे!

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by श्रावण मोडक

ज्ञानेश्वर आणि रेडा या कथेवर माझा आता पूर्ण विश्वास बसू लागला आहे.
"देजा वी" झालं!

चिरोटा नवीन

अन अशा प्रकारचे लेख लिहून लोकमतसारख्या वृत्तपत्राने एकप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घातली नाही का?
चमत्कार अर्थातच खोटे आहेत.रायकर ह्यांना जो अनुभव आला तो त्यांनी सांगितला. केवळ सत्य साईबाबाच नाही तर ईतर राज्य/जिल्हापातळीवरही असे अनेक बाबा/स्वामी दिसून येतात्.चमत्कार वगैरे बाजुला सोडले तर ह्या सर्व बाबा/बाईंमध्ये एक समान सूत्र असते म्हणजे solution. लोकांना instant सोल्युशन हवे असते.आणि हे सोल्युशन त्यांच्या पद्धतिने द्यायचे काम बाबा करतात. एखाद्या ग्रहाची आंगठी,माळ्,अमुक देवतेची पूजा वा समाजोपयोगी संस्थांना देणगी वगैरे. लोकांना सोल्युशन मिळाले की मग चमत्कार त्यांच्या दृष्टिकोनातून दुय्यम असतात. आणिबाणीच्या काळात लालकृष्ण अडवाणी ह्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी स्.सा. ना भेटायला गेल्या आणि कधी सुटका होईल हे विचारले. "बरोबर दोन दिवसांनी त्यांची सुटका होईल". स्.सा. म्हणाले. बरोबर दोन दिवसांनी अडवाणी ह्यांची सुटका झाली.आता ह्याला काय म्हणणार? योगायोग्/चमत्कार् की आणखी काही? अडवाणी नंतर त्यांचे भक्त झाले हे वेगळे सांगायची गरज नाही.

शिल्पा ब नवीन

In reply to by चिरोटा

"बरोबर दोन दिवसांनी त्यांची सुटका होईल". स्.सा. म्हणाले. इतक्या पावरबाज लोकांबरोबर उठबस असल्याने टीप मिळाली नसेल कशावरुन? एक आपला अंदाज.

चिरोटा नवीन

In reply to by शिल्पा ब

अडवाणी सध्या जेवढे 'मोठे' आहेत तेवढे तेव्हा(१९७५-७७) ते नव्हते आणि स्.सा्. ही नव्हते. अशा टिप्स संजय गांधी आणि त्यांच्या कोंडाळ्याला असायच्या. कदाचित लिंक इंदिरा गांधी---> धीरेद्रब्रम्हचारी---> स.सा. अशी असू शकेल.अर्थात हा माझा अंदाज!! http://en.wikipedia.org/wiki/Dhirendra_Brahmachari

मन१ नवीन

पण हात शिवशिवताहेत. पूर्वी सत्य साई बाबा ह्यांच्या बद्दल कल्पना होती. श्री ओक जाहिरपणे, इतक्या खंबीरतेने पुनः पुनः काही गोष्टी सांगायचे. इथे प्रतिसाद बघुन एक खात्री होतिये की ते आणि सत्य साई बाबा ह्यांच्याविषयी वेगवेगळी मतं ठेवता येणार नाहित. दोघही एकाच मार्गावरचे दिसतात. आता मूळ लेखाबद्दलः- रायकरांनी त्यांना मिळालेल्या ह्या सोन्याच्या का मौल्यवान खड्याच्या अंगठीवर प्राप्तीकर भरला आहे का? नसेल तर त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे का? शक्य आहे का? अंगठ्या मिळाव्यात म्हणुन ह्यांनी पुन्हा किती वेळेस पुट्टपार्थीला प्रस्थान केलं? हा लेख लिहिण्याबद्दल रायकरांना काही मानधन मिळालय का? कुणाकडुन मिळालय? त्यांच्याकडे जादुच्या प्रयोगाचे तिकिट काढायचे पैसे आहेत का? तसे ते नसतील आणि मी देउ केले तर ते जाउन नक्की बघणार आहेत का? रायकर पाचवी पास आहेत का? पहिल्याच प्रयत्नात पास झालेत का? रायकरांचं वय काय? हे आपल्या ज्युनिअर्सना घरी-दारी आणि व्यवसायातही काय सल्ला/शिकवण देतात? मागे लोकप्रभा मध्ये अकबराबद्दल एक छोटेखानी पण माहितीपूर्ण लेख लिहिणारे हेच ते रायकर का? हा लेख वाचुन त्यांच्याबद्दलचा आदर जाउन कीव जमा होइल ह्याची त्यांना कल्पना आहे का? मला उपप्रतिसाद अपेक्षित आहे. --मनोबा.

पाषाणभेद नवीन

In reply to by मन१

मनोबा, खरे आहे आपले म्हणणे. हा लेख लोकमत मध्ये वाचण्याआधी दिनकर रायकर कोण होते ते माहीत नव्हते. आज गुगलून काढले असता ते लोकमत चे Editor in Chief या पदावर आहेत असे कळते. वृत्तपत्र हे समाजाचे प्रबोधन करते. म्हणजे 'झोपलेल्या' समाजाच्या मनाला जागृत करते. या लेखाने जागृत समाज पुन्हा अंधश्रद्धेच्या झोपेत जाण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. एखाद्या चिल्लर भक्ताने असा लेख लिहीला असता तर काही वाटले नसते. पण जेव्हा एक Editor in Chief या पदावरचा माणूस असला लेख लिहीतो अन तो लेख राज्यस्तरावर आवृत्तीत पहिल्या पानावर छापला जातो याचे वैषम्य वाटले म्हणून हा धागा काढावा वाटला, जेणे करून आपल्या मिपावरची सुज्ञ मंडळी त्यांच्या घरापर्यंतका होईना पण 'अंधश्रद्धेची' झोप घेणार नाहीत. असल्या मोठ्या पदाच्या माणसाने काय छापले जाते अन त्याचा समाजावर काय परिणाम होईल याची काळजी घेवून लेख लिहीले पाहीजे. (उद्याच्या १ मे २०११ रविवारच्या लोकमतमध्ये 'लोकमतचे मालक खा. विजय दर्डा यांचा लेख - "'सत्या'साठी लढणार्‍या बाबांची आता कधीही होणार नाही भेट" हा लेख प्रकाशीत होणार आहे. आता ससाबा यांनी 'कोणत्या' सत्यासाठी लढा दिला हा मनोरंजनाचा भाग कदाचित खा. दर्डा समजावून देतील. ) सदर येणार्‍या लेखाची समिक्षा मिपावर झाली तर बरेच होईल. श्रद्धांजलीपर लेखात त्या माणसाचे कर्तॄत्व, खंबीरपणा, ध्येय्यनिष्ठा, कर्तव्यपरायणाता आदींचा उल्लेख होतो. लोकमतमधील सदरहू लेख म्हणजे केवळ चमत्कार हेच ससाबा यांचे कार्य होते अन त्या चमत्कारामुळेच नमस्कार होत होते यावर अधोरेखन करतो. (मोठमोठे लोक संपादकांसाठी एखादी मिटींग नेहमी वरचेवर आयोजीत करतात. त्यास 'पत्रकार परिषद' म्हणतात. असल्या परिषदांमध्ये संपादकांना भेटी दिल्या जातात. ससाबा यांचीही असलीच 'पत्रकार परिषद' आयोजित केली असावी अन त्यात रायकर गेले असावेत. पण रायकर सोडून इतर संपादकांना अंगठ्या भेटी मिळाल्या अन रायकरांना मिळाली नाही हे सत्य मात्र त्यांच्या लेखात आले आहे.) अवांतर: रायकरांच्या मुळ लेखात शिवराज पाटील चाकूरकर, अन्य मंत्री अन न्यायाधीय यांचा उल्लेख असलेला पॅरा खरोखर काहीच कामाचा नाही. उगीच ससाबा कडे किती फालतू लोक जात होते याची ती जंत्री आहे. कदाचित सर्व काळाबाजार करणार्‍या लोकांच्या एकमेकांच्या भेटी घेण्याचे ते ठिकाण असावे.