मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओरिजिनल म्हणी

Pearl · · काथ्याकूट
कालच मला १ इंटरेस्टिंग गोष्ट कळाली. (इंटरेस्टिंग ला तंतोतंत समानार्थी शब्द सुचवा. मला तरी आत्ता सुचत नाहिये :-/) आपण वर्षानुवर्षे वापरत असलेल्या २ म्हणींचे खरे रूप कळाले. त्या २ म्हणी आहेत, १) पुराणातली वांगी पुराणात २) अठरा विश्वे दारिद्र्य (लहानपणी ह्या म्हणींचा अर्थ मला खरेच कधी लागला नव्हता. नंतर मी तो लावून घेतला ;-)) पण या म्हणी अपभ्रंश झालेल्या म्हणी असून ओरिजिनल म्हणी अशा आहेत १) पुराणातली वानगी पुराणात (वानगी = दाखला, उदाहरण) २) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०. म्हणजेच वर्षातले ३६५ पैकी ३६० दिवस दारिद्र्य, जेमतेम ५ दिवस खायला मिळते.) तुम्हालाही मराठी शब्द/म्हणी/वाक्प्रचार शी संबंधित अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी मराठी शब्द/म्हणी/वाक्प्रचार माहिती असतील तर शेअर करा.

वाचने 43156 वाचनखूण प्रतिक्रिया 74

पर्ल.....फारच "इंटरेस्टिंग" विषय निवडला आहे तुम्ही इंटरेस्टिंग = वेधक, कुतूहलजनक वरील दोन उदाहरणातील क्रमांक २ चा उलगडा असाच एकदा शिक्षकांकडूनच झाला होता...पण 'वांगी' हे वांगी नसून वानगी आहे, हे भन्नाट आहे. पहिल्यांदाच समजले आणि वांग्याच्या भाजीचा आणि पुराणाचा काहीही संबंध नाही हेही उलगडले. पूर्वी (आणि आत्ताही बरेच...) आम्ही "त्याच्या अपरोक्ष ती घटना घडली..." असे म्हणत असू. म्हणजे ती 'घटना' त्याला ज्ञात नाही असा अर्थ गृहित धरला जायचा. पण तिथे खरे तर "परोक्ष" असे हवे. परोक्षचा अर्थ 'परक्याच्या नजरेसमोर ती घटना घडली..'. अपरोक्ष म्हणजे परक्याच्या नसून खुद्द त्याच्याच नजरेसमोर घटना घडली असे सूचीत होते. म्हणी आणि वाक्यप्रचारही पाहतो. इन्द्रा

प्रदीप Fri, 02/25/2011 - 10:16
माहिती. मला ह्या दोन्ही म्हणी चुकीच्या स्वरूपात माहिती होत्या ('पुराणातील वांगी पुराणात' आणि 'अठरा विश्वे दारिद्र्य' अशा!) 'इंटरेस्टिंग' ला अलिकडे 'रोचक' असा शब्द जालावर रूढ झालाय. हा शब्द पूर्वी मी कधीही ऐकला अथवा वाचला नव्हता. 'रंजक' असा शब्द सर्रास वापरात होता, पण तो 'इंटारेस्टिंग' चा शब्दशः अर्थ ध्वनित करीत नाही. 'नाविन्यपूर्ण' हे प्रयोजनही चुकिचे वाटते. (नाविन्यपूर्ण म्हणजे 'नॉव्हेल').

लवंगी Fri, 02/25/2011 - 10:17
ओरीजिनल म्हणींसाठी विजुभाऊंच्या 'http://www.misalpav.com/node/16907' धाग्यावरील प्रतिसाद वाचावे. "आंधळा दळतो आणि गणपा चिकन तंदुरी बनवतो " "भित्र्या पाठी ब्रम्हराक्षस आणि नाना पाठी संपादक " " काळ आला होता पण नळाला पाणी नव्हतं ! " "काखेत कळसा आणि गाई ला चश्मा " वगैरे बर्‍याच नाविन्यपुर्ण म्हणी वाचावयास मिळतील.. अधिक 'नाविन्यपुर्ण' म्हणींसाठी टारुबाळास सम्पर्क करावा..

In reply to by लवंगी

Pearl Fri, 02/25/2011 - 10:58
'http://www.misalpav.com/node/16907#comment-290827' हे वाचले. नाविन्यपुर्ण म्हणी आणि टारगट प्रतिसाद वाचला :-) हा हा हा :-) खरच ह. ह. पु. वा. =))) लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद.

अमित देवधर Fri, 02/25/2011 - 10:47
चांगला विषय आहे. यातून नवीन शब्दनिर्मिती व्हायला हवी. अनेक जुने चांगले शब्दही, जे वापरात नाहीत त्यांचं पुनरूज्जीवनही करायला हरकत नाही या निमित्ताने. आणि मग ते शब्द आपण दैनंदिन भाषेत वापरायला हवेत. 'इंटरेस्टिंग'ला 'रोचक' (रूची~रोचक) हा समानार्थी शब्द बरोबर वाटतो. 'सरस' (स-रस~रसासहित/रस असलेली गोष्ट) हाही शब्द चालू शकेल. अमित.

Pearl Fri, 02/25/2011 - 11:12
१) 'बैल गेला नि झोपा केला' यातल्या 'झोपा' चा अर्थ काय आहे? २) 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' या मागची काय गोष्ट आहे?

In reply to by Pearl

गणेशा Fri, 02/25/2011 - 11:13
वरील दोन्ही म्हणी तश्याच माहिती होत्या मला. अर्थ सांगितल्यामुळे धन्यवाद. --- इंट्रेस्ट = आवड इंट्रेस्टींग = आवडयुक्त आपले साधे अर्थ ----- 'बैल गेला नि झोपा केला' हि म्हण पण कायम ऐकत होतो .. अर्थ माहित नाही .. पण कदाचीत बैलगाडी बैल गेल्यावर तशीच राहिली असेल म्हणुन त्याखाली लहान मुलांसाठी साडीची झोळी केली जाते म्हनुन अशी म्हण असेल ही कदाचीत ..

In reply to by गणेशा

Pearl Fri, 02/25/2011 - 11:22
झोपा = गोठा असा अर्थ आहे का? झोपा = गोठा असं कुठंतरी वाचल्यासारखं वाटत आहे. म्हणजे 'बैल गेला नि झोपा केला' चा असा अर्थ असावा की, बैल गेल्यावर (मेल्यावर) गोठा बांधून काय उपयोग? असा आपला १ अंदाज.

In reply to by Pearl

गणेशा Fri, 02/25/2011 - 11:33
हा हे योग्य वाटते आहे. कोणाला तरी बोलताना .. त्याने बैल गेला आणि गोठा बांधला काय उपयोग ? असे बोलण्यासाठी हे वापरले असेन .. ---- मला तर वाटते ह्या जुनी म्हनी .. ओव्या यातुन खुप मोठे .. अर्थवादी शब्द छोट्याश्या वाक्यात सांगितलेले आहे. शब्द संपदा आणि त्यांचा वापर आधीच्या लोकांनी खुप छान केला आहे. त्यांची जान खरेच खुप मोठी होती ---- या धाग्यासारखाच रुढी-परंपरा आणि त्यांचे अर्थ याचा धागा सुद्धा होयील मस्त .. लगेच काढत नाही.. कॉपी वाटेल तो या धाग्याचा.. या धाग्या नंतर बघु.

स्पंदना Fri, 02/25/2011 - 11:03
खरच जरा खटकायच्या या म्हणी म्हणताना पण इतक लक्ष द्यावस वाटल नव्हत. अठरा विस तर अगदीच चक्रावुन गेली . अतिशय चांगला विषय. निदान आत्ता तरी आम्ही जरा विचार करुन बाकिच्या म्हणी वापरु.

कच्ची कैरी Fri, 02/25/2011 - 11:26
हे पर्ल मस्त विषय निवडला आहे .मला बर्याचश्या अहिराणी म्हणीही माहित आहेत पण त्यांचे अचुक अर्थ माहित नाहीत. @स्पा स्टॅपलरला टाचणी टोचक नाहीतर टाचणी खोचक म्हणत असावे कदाचित (स्मायली )

अमित देवधर Fri, 02/25/2011 - 12:02
'टाचणीटोचक' हा लांबलचक शब्द होइल. त्याचा 'टाचक (=टाचण क्रिया करणारा :))' असं सुटसुटीत छोटा शब्द होऊ शकेल.

वारकरि रशियात Fri, 02/25/2011 - 12:08
>> २) अठरा विश्वे दारिद्र्य - २) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०. म्हणजेच वर्षातले ३६५ पैकी ३६० दिवस दारिद्र्य, जेमतेम ५ दिवस खायला मिळते.) अ)पूर्वी व्यवहारात सर्वसाधारण लोक वीसाच्या पटीत गणन करीत - दहा हाताची व दहा पायांची मिळुन वीस बोटे मोजायला सोपी जात असावीत कां! ब) या गणितात ३६० = पूर्ण वर्ष असेच अभिप्रेत आहे. (१२*३० चांद्रवर्ष. म्हणजे आजच्या भाषेत २४*७ किंवा dayin-dayout सतत / कायमचे >> १) 'बैल गेला नि झोपा केला' यातल्या 'झोपा' चा अर्थ काय आहे? अ) 'झोपा' म्हणजे गोठ्याचे दार असे (समजले होते असे)वाटते. बाकी तज्ञ / जाणकारांनी भर घालावी / दुरुस्ती सुचवावी. मलाही ठाऊक असल्यास लिहीनच.

In reply to by वारकरि रशियात

जोशी Fri, 02/25/2011 - 20:48
अ) 'झोपा' म्हणजे गोठ्याचे दार असे (समजले होते असे)वाटते. हे बरोबर वाटते, 'बैल (पळून) गेला नि झोपा (दार) केला' बैल पळून गेल्यावर दाराचा काय उपयोग ?

Pearl Fri, 02/25/2011 - 12:15
खालील म्हणीं/वाक्प्रचारांच्या मागचे logic/ कहाणी गोष्ट काय आहे/असावी? म्हणजे अर्थ माहिती असतो आपल्याला पण गोष्ट माहिती नसते. १) मूग गिळणे २) वाटाण्याच्या अक्षता लावणे ३) कानामागून येऊन तिखट होणे ४) आकशाला गवसणी घालणे (यात गवसणी म्हणजे काय?) ५)पहिले पाढे पंच्चावन्न ६)म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो ७) रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी (यात तुंबड्या म्हणजे काय?) ८) साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण ९) साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपला (म्हणजे काय ?;-) कळलं नाही :-( ) १०) अति शहाणा त्याचा बैल रिकामा ११) नाकाने कांदे सोलणे (मला याचा अर्थ पण फारसा माहिती नाही) १२) पडत्या फळाची आज्ञा (म्हणजे काय ) विषयाशी संबंधित थोडे अवांतर :-) : हया लिन्क वर बराच म्हणी संग्रह पाहिला. बर्‍याच नविन म्हणी कळाल्या. http://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%80

In reply to by Pearl

नगरीनिरंजन Fri, 02/25/2011 - 12:59
>>कानामागून येऊन तिखट होणे याची मूळ म्हण पानामागून आली आणि तिखट झाली अशी आहे. पोर्तुगीज यायच्या आधी आपल्याकडे मिरची नव्हती. मिरीचा वापर तिखट म्हणून केला जायचा. मिरची झाडावर पानामागे लपलेली असते आणि ती आल्यावर ती इतकी झपाट्याने लोकप्रिय झाली म्हणून "पानामागून आली आणि तिखट झाली" अशी म्हण पडली असे वाटते. >>आकशाला गवसणी घालणे गवसणी म्हणजे खोळ. तंबोर्‍याला किंवा उशीला घालतात ती गवसणी. >>रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी तुंबड्या म्हणजे जळवा. >> पडत्या फळाची आज्ञा अशोकवनात सीतेची भेट झाल्यावर हनुमानाला भूक लागली. सीतेने त्याला फक्त खाली पडलेली फळे खाण्याची आज्ञा केली. म्हणून हनुमानाने सगळी झाडं गदागदा हलवून फळं खाली पाडली आणि अशोकवाटिकेचा विध्वंस केला. त्यावरून ही म्हण आली आहे.

In reply to by Pearl

गणेशा Fri, 02/25/2011 - 14:12
>>९) साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपला (म्हणजे काय ? कळलं नाही ) सापाला लहान समजु नये , आणि नवर्‍यावर विश्वास ठेवु नये कधी दगा देतील सांगता येत नाही असा अर्थ होतो आहे

kamalakant samant Fri, 02/25/2011 - 12:26
इ॑टरेस्टि॑ग=औत्सुक्यपूर्ण म्हणी॑बद्दल बरेच काही लिहीता येइल. ट॑कायचा क॑टाळा आड येतो.

Nile Fri, 02/25/2011 - 13:06
इंटरेस्टींगला शुद्ध मराठीत इंटरेस्टींगच म्हणतात. स्टेपलरला शुद्ध मराठीत स्टेपलरच म्हणतात. कुणाला या बाबत तक्रार करायची असेल तर गुंडोपंतांना संपर्क करणे.

योगप्रभू Fri, 02/25/2011 - 13:55
पुराणातील वांगी पुराणात एक पुराणिकबुवा होते. मोठे रसाळ कीर्तन करायचे. लोक भक्तीभावाने त्यांचे आख्यान ऐकायचे. गावातले सगळे लोक त्यांना नावाजायचे. पण पुराणिकबुवांची बायको कधीही नवर्‍याच्या प्रवचनाला गेलेली नव्हती. ती आपली घरकामात असायची. एकदा पाणवठ्यावर तिला इतर बायका म्हणल्या, 'अगं तुझा नवरा इतका छान पुराण सांगतो. तू का नाही ऐकायला येत?' म्हणून मग पुराणिकबाई एकदा गेल्याच. नेमके त्या दिवशी पुराणिकबुवा चातुर्मासातील आहारावर निरुपण करत होते. कांदा, लसूण हे विकार उत्पन्न करणारे असल्याने खाऊ नयेत आणि वांगे वातुळ असल्याने खाऊ नये, असे सांगताना बुवांनी पुराणातल्या कथांचा हवाला दिला. सगळ्यांना ते पटले. पुराणिकबाई मात्र मनात खंतावल्या कारण त्यांनी नेमकी त्याच दिवशी बुवांच्या आवडीची भरली वांगी केली होती. घरी आल्यावर बाई ती वांगी फेकून द्यायला निघाल्या. बुवांनी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, 'तुम्हीच म्हणालात ना वांगी खाऊ नयेत म्हणून टाकून देते आहे.' त्यावर बुवा म्हणाले, 'अगं वेडी का काय? ती पुराणातली वांगी पुराणात. रोजच्या आयुष्यात तसे पाळून कसे चालेल?' भित्यापाठी ब्रह्मराक्षस एक गरीबीला कंटाळलेला माणूस आत्महत्या करायच्या उद्देशाने जंगलात गेला. वास्तविक तो घाबरट होता. तो एका झाडाला टेकून बसला आणि स्वतःच्या गरीबीला दोष देऊ लागला. म्हणाला, 'देवा काय वेळ आणलीस? पोटभर खायला तरी मिळू देत.' योगायोगाने तो ज्या वृक्षाला टेकून बसला होता तो इच्छावृक्ष होता. म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करणारा. त्या माणसाच्या समोर सुग्रास भोजन आले. त्याने ते खाल्ले आणि म्हणाला, 'जेवण मिळाले, पण लोकांची देणी कशी देऊ? काही धन मिळाले तर बरे' त्याबरोबर त्याच्या समोर एक सुवर्णनाण्यांनी भरलेली थैली येऊन पडली. ती बघताच त्या माणसाच्या मनात स्वभावानुसार भीती दाटून आली. तो मनात म्हणाला, 'या झाडावर एखादा ब्रह्मराक्षस तर नसेल ना?' लगेच एक अक्राळविक्राळ ब्रह्मराक्षस समोर हजर झाला. त्याला पाहताच हा माणूस मनात म्हटला, 'अरे बापरे! हा आता मला खाणार तर नाही ना?' त्याबरोबर त्या राक्षसाने त्याला खाऊन टाकले. रिकामा न्हावी, कुडाला तुंबड्या लावी एका गावात एक न्हावी होता. गाव लहान आणि न्हाव्याला रोज काम नसल्याने तो रिकामटेकडाच होता. त्याचा बराचसा वेळ कलागती लावण्यात आणि चुगल्या करण्यात जाई. रिकामे मन असल्याने त्यात सतत दुसर्‍याला त्रास कसा देता येईल, याच्या कल्पना. गावाला या न्हाव्याचा स्वभाव ठाऊक असल्याने कुणी त्याच्या जवळपास फिरकत नसे. न्हावीपण झोपडीत एकटा राहात असे. होता होता एक दिवस न्हावी म्हातारा झाला. गावाने वाळीत टाकल्याचा राग धरुन तो मनात म्हणाला, 'मेल्यावर पण या गावातल्या लोकांना चांगलाच धडा शिकवीने' म्हणून तो कुडाला (भिंतीला) तुंबडी (पोट) लाऊन आणि पाय मागे असा गुढघ्यावर बसला आणि त्याच अवस्थेत मेला. गावातील लोक आले तोवर न्हाव्याचे शरीर लाकडासारखे कडक झाले होते. आता आली का पंचाईत? तिरडीवर धड पाठीवर निजवता येत नाही आणि सरळ ठेवला तर तो उठून बसल्याच्या अवस्थेत' गावातले लोक हैराण झाले आणि अखेर म्हणाले, 'रिकामा न्हावी, कुडाला तुंबडी लावी'

वपाडाव Fri, 02/25/2011 - 15:51
http://www.misalpav.com/node/1770#comment-24780 इथे प्रा सुरेश खेडकर यांनी ही "गाड्या बरोबर नळ्याची यात्रा" म्हण आणी तिची दास्तॉ सांगितली. पण मी जे ऐकलंय ते काही वेगळं आहे. म्हणजे गाडीशी नाही तर तिचा संबंध घोड्याशी आहे. घोडा जेव्हा पळु लागतो, त्यावेळी त्याच्या पायात, म्हणजेच टाचेत/खुरांत लोखंडाची एक पट्टी रोवली जाते. ती 'U' आकाराची असते. तिला नाळ असे संबोधतात. आणी पुर्वीच्या काळी जेव्हा घोडे घेउन लोक यात्रेला जायचे त्यावेळी, घोड्यासोबत नाळंची यात्रा अशी म्हण रुढ झाली.

In reply to by तुषार घवी

वपाडाव Fri, 02/25/2011 - 17:03
हातभर गजरा न गावभर नजरा
ही म्हण एका चित्रपटात मकरंद अनासपुरेच्या त्वंडुन ऐकली होती. पार यड्यागत हसलो होतो. भारी. अशी रियल लाईफ उदाहरणं लै फाईली हो.

विकास Fri, 02/25/2011 - 17:11
येथे आधीपण या दुवा दिला होता. या संदर्भातील १८९९ साली रेव्हरंड मन्वेरींग नामक मिशनर्‍याने संकलीत केलेले हे पुस्तक वाचनीय आहे. अनेक म्हणींचे शब्द वेगळेच दिसतील.... [अवांतरः एखाद्या समाजात मार्केटींग करायचे असेल तर त्यासाठी त्या समाजाला समजून घेणे महत्वाचे असते. धर्मांतर हे देखील एक मार्केटींगच आहे. त्यासाठी किती मुलभूत अभ्यास केलेला असू शकतो ह्याची ह्यावरून कल्पना येईल. ]

मी ऋचा Fri, 02/25/2011 - 17:11
मला प्रचंड आवडलेली म्हण >> घरात नाही गहू अन म्हणे कलर टीव्ही घेउ सौजन्यः जितेंद्र जोशी (चित्रपट: हाय काय नाय काय)

In reply to by तुषार घवी

नितिन थत्ते Fri, 02/25/2011 - 20:38
ही म्हण "सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको" अशी ऐकलेली आहे. "मला पहा आणि फुलं वहा" ही म्हण अलिकडेच नव्याने ऐकायला मिळाली. अवांतर: आम्हाला बर्‍याच कोकणी म्हणी माहिती आहेत पण त्या इथे लिहिण्यासारख्या नाहीत. ;)

In reply to by नितिन थत्ते

तुषार घवी Sat, 02/26/2011 - 10:04
"गावदेवीला नव्हता नवरा न झोटिन्गाला नव्हती बायको" फी म्हण डहाणू भागात फार प्रसिद्ध आहे. तुम्ही म्हणता ती म्हणही ऐकलेली आहे.

In reply to by नितिन थत्ते

वपाडाव Mon, 02/28/2011 - 14:24
"मला पहा आणि फुलं वहा"
आमची प्रगती-पुस्तके हातात पडली की हिच म्हण ऐकण्याची पद्धत आम्हाला बानं लावुन दिलि व्हती. वर्षातुन ३-४ वेळा ऐकयलाच लागे.

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय चित्रपटातुन... कावळ्याच्या हातात दिला कारभार न त्याने घाण करुन भरला सगळा दरबार !!! आजीच्या तोन्डुन.. मुगींस मुताचा पुर =)) =)) एका मराठी चित्रपटातुन.. १)घेणे न देणे न फुकटच कंदिल लावणे. २) आल घोड्यावरुन न गेल गाढवावरुन.

In reply to by पर्नल नेने मराठे

टारझन Sat, 02/26/2011 - 16:14
मुगींस मुताचा पुर =)) =))
ह्याच म्हणीसाठी जंग जंग पछाडत होतो गेल्या पावसाळ्यापासुन :) बाकी आमची चुचु म्हणजे "केसभर गजरा आणि गावभर नजरा " बरोबर ना गं :)

In reply to by पर्नल नेने मराठे

टारझन Sat, 02/26/2011 - 16:39
अगं म्हण आहे ती ... बरं केस नाही तर मग अजुन एक म्हण आहे माझ्या पोतडीत . खाली मुंडी आणि पाताळ धुंडी .. आता मुंडी नाही असे म्हणु णकोस !!

In reply to by टारझन

खाली कशाला करेन मुन्दी :ओ कोणाला घाब्रतेय कि काय ;) हवे तर 'वर मुन्डी न पाताळ धुण्दी' असे कर ;)

कापूसकोन्ड्या Sat, 02/26/2011 - 20:55
माझा एक शब्द प्रभू मित्र आहे. एकदा आमच्या ऑफिसात काही परप्रांतीय मित्र आले होते.त्याना वरील म्हण इंग्रजी मध्ये भाषांतर हवे होते. त्याने ते असे केले. when the barber is free he shaves tree

अप्पा जोगळेकर Sat, 02/26/2011 - 23:32
) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०. म्हणजेच वर्षातले ३६५ पैकी ३६० दिवस दारिद्र्य, जेमतेम ५ दिवस खायला मिळते.) अनेक वर्षांपूर्वी हे एका मासिकात वाचले होते पण ते पटण्यासारखे नाही. जसे १८*२० = ३६०तसेच ३६*१० = ३६० ५*७२ = ३६० असे अवयव पाडून असंख्य व्युत्पत्ती जन्माला येउ शकतील. यामागे काही एक निश्चित लॉजिक असायला हवे. पूर्वीच्या काळी वीस दिवसांचा एक महिना असे काही होते का ? जाणकारांनी प्रकाश टाकावा. झोपा केला बैलाला बांधून ठेवण्याच्या दोरीला झोपा म्हणतात असा अंदाज आहे.

५० फक्त Sun, 02/27/2011 - 23:46
१) मूग गिळणे - आई आपल्या लेकीला सांगत असते की सासरी गेल्यावर कोणि रागावुन बोलायला लागलं की तोंडात मुग धरुन ते मउ होईपर्यंत गप्प बसणे, - बहुधा मुग तोंडात भिजायला जेवढा वेळ लागत असेल तेवढ्यात समोरच्याचा राग शांत होईल यासाठी असावं असं. ६)म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो - एखाद्या वाईट गोष्टीचा पायंडा पडु नये याची खबरदारी घेणे, जसे आपण आपले काम लवकर होण्यासाठी सरकारी कर्मचा-याला लाच देतो, पण नंतर तो प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागायला लागतो म्हणुन एखादं काम झालं नाहीतरी चालेल पण लाच देण्याची सुरुवातच करु नका तसे. आपलं काम झालं नाही तरी (म्हातारी मेली तरी ) चालेल पण एखाद्याला पैसे घेण्याची सवय लागु नये ( काळ सोकावु नये ) ७) रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी (यात तुंबड्या म्हणजे काय?) - फार पुर्वी काही विशिष्ट त्वचारोगात व रक्तदोषांमध्ये शरिरातिल एखादयाच ठिकांणाचे रक्त काढुन टाकावे लागे, त्यासाठी शहनाई सारख्या तुंबडिचा उपयोग केला जात असे. तुंबडीचे तोंड फार छोटे व लवचिक असे, शरिरावर जिथले रक्त किंवा जखमेतील घाण काढायची असेल, तिथे न्हावी त्याच्या वस्त-याने एक छोटा घाव करी व त्यावर तुंबडिचे तोंड ठेवुन तिच्या दुस-या बाजुने रक्त किंवा तो द्राव ओढुन काढी. यावरुन जेंव्हा न्हावी रिकामा असेल तेंव्हा तो ही तुंबडी भिंतीला लावुन बसे असे म्हणण्याची प्रथा पडली. ८) साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण - हे साठा उत्तराची कहाणि असं आहे, हे बहुधा श्रावणांत वाचण्यात येणा-या कहाण्यांच्या शेवटी असतं. माझा अंदाज असा आहे 'उत्तरी हे 'उतारा' याचं बोली रुप असावं.

पिलीयन रायडर Tue, 03/01/2011 - 13:10
लंकेची पार्वती होणे... पार्वती लंकेची कशी असेल? तर याची कथा अशी आहे कि कुणीतरी रावणास असे सांगितले कि शंकराची बायको पार्वती अत्यंत सुंदर आहे.. तिला मिळवण्याची अभिलाषा निर्माण झाल्याने रावणाने अतिशय कठोर तप केले व शंकरास प्रसन्न करून पार्वतीस मागितले.. शंकरास प्रश्न पडला कि आता काय करावे? त्यांनी विष्णू देवाला विचारले. तेव्हा त्यांनी एक उपाय सांगितला.. त्यांनी पार्वतीस रावणा सोबत पाठवले. जेव्हा लंका जवळ आली तेवा त्यांनी रूप बदलून रावणास येऊन सांगितले कि "अरे तुला फसवले, हि पार्वती नाहीच.. खरी पार्वती तर शंकराच्या आसना खाली बेडकी च्या रुपात लपवली आहे..." रावणाने जेव्हा पार्वतीकडे पहिले तेव्हा माये च्या प्रभावानी ओंगळ, दरिद्री दिसू लागली. रावणाने रागात जाऊन शंकरास आसना खालची बेडकी मागितली. शंकराने त्यास ती दिली. आता हि बेडकी शापित मंदोदरी होती जिला शाप होता कि जोवर तिला ब्राह्मण राक्षस येऊन स्पर्श करणार नाही तोवर तिला बेडकी बनून राहावे लागेल. रावणाचा स्पर्श होताच ती मंदोदरी झाली. तीई मुळातच सुंदर असल्याने रावण तिच्यावर भाळला व तिला घेऊन गेला... म्हणून लंकेची पार्वती म्हणजे दरिद्री स्त्री... असा मला माझ्या आईनी सांगितलाय... आता ह्यात फरक असू शकेल...

In reply to by पिलीयन रायडर

वपाडाव Tue, 03/01/2011 - 14:54
मंदोदरी सुंदर असल्याने रावण तिच्यावर भाळला व तिला घेऊन गेला...
शेवटी काय? मनुष्यच तो... प्रकृतीच त्याची ललनांवर भाळण्याची.. -सखाराम बायंडर

In reply to by वपाडाव

टारझन Tue, 03/01/2011 - 15:14
शेवटी काय? मनुष्यच तो...
रावण माझ्या मते हायब्रीड होता ... राक्षस आणि ब्राम्हण च्या ब्रिड चे मिक्सचर .. अधीक प्रकाश रावणाचे नातेवाईक ... उप्स .. जाणकार टाकतील .. !