Skip to main content

माझी भटकंती : अंदमान..

लेखक चिगो यांनी मंगळवार, 02/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
"यह तीर्थ महातीर्थों का है मत कहो इसे काला पानी । तुम सुनो यहा की धरती के कण कण से गाथा बलिदानी ॥" ---- गणेश दामोदर सावरकर
मराठी माणसाला अंदमानची ओळख आहे ती सावरकर बंधुंच्या "सजा-ए-कालापानी" मुळे... मीही जेव्हा अंदमानला निघालो, तेव्हा मनात उत्सुकता होती ती "सेल्युलर जेल" ला बघण्याचीच ! एकदा तिथे पोहचल्यावर मात्र सौंदर्य, विविधता आणि इतिहासाची पाखरण असलेल्या ह्या भुमीला पाहुन वाटलं की, ये सफर यादगार रहेगा !! कोलकात्याहुन उडून पोर्ट ब्लेअरला उतरलो. मनापासुन सांगतो, मी आजपर्यंत पाहीलेल्या सगळ्या भारतीय शहरांमध्ये हे सगळ्यात निटनेटकं शहर आहे ! अक्षरशः सुईपासुन प्रत्येक गोष्ट ज्या ठिकाणी भारताच्या मुख्य भुमीवरुन येते, अश्या ठिकाणी हे लोक इतके आटोपशीर, नीट कसे राहतात ह्याचच मला नवल वाटत होतं. पोर्ट ब्लेअर वरुन आम्ही जवळच्याच एका किनार्‍यावर गेलो. जातांना वाटेत जागोजागी त्सुनामी ने केलेल्या हानीचे अवशेष दिसत होते. हा एक नमुना ह्याचा मुळ्यांचा पसारा फोटोत माववणं म्हणजे एक दिव्यच होतं.. त्या बीचवर पोहोचल्यावर मात्र आम्ही वेडावलो. सर्वदुर निळ्या रंगाच्या छटा दाखवणारा अथांग सागर पहुडला होता. त्यातल्या मी त्या आधी पाहिलेला समुद्र म्हणजे मुंबईचा, मग तुम्ही माझी अवस्था ओळखु शकता. तिथुन आम्ही दुसर्‍या एका बेटावर निघालो. ह्याचं नाव "कोरल आयलंड".. इथे जातांना मी पुन्हा एकदा स्वर्गाला खो देऊन परत आलो. झालं असं, की मी बोटच्या समोरच्या टोकावर उभा होतो. माझा विचार होता की किनारा जवळ आल्यावर उडी मारीन. किनारा अद्याप दुरच होता, तेवढ्यात मला पोज मध्ये पाहुन एका मित्राने मस्तीत दिला की मला ढकलून ! आम्ही बुडबुड करत तळाशी... (मला पोहता येत नाही बरोबर). नाकतोंडात खारट पाणी गेल्यावर हात पाय झाडत वर आलो. वर येवून पाहतो, तर बोट सरळ माझ्या उरावरच येत होती. मी आपला "इकडं (उरावर येणारी) बोट नी तिकडं समुद्र" ह्या अवस्थेत. शेवटी पुन्हा एकदा बुडबुडत वर आलो, अंगावर येण्यार्‍या बोटीलाच रेटा मारुन किनार्‍याकडं हातपाय मारले नी आमचे चरण जमिनीला टेकले... :-) इथे स्नॉर्केलिंग करुन, पाण्यात डुबक्या मारुन आम्ही परत पोर्ट ब्लेअरला आलो... संध्याकाळी "सेल्युलर जेल"ला लाईट अँड साउंड शो बघायला गेलो. अगदी "मस्ट सी" आहे हा शो. जेलच्या वेगवेगळ्या भागांवर प्रकाश पाडून, त्यांना अतिशय योग्य अशा संवादांची आणि संगिताची जोड देत हा शो आपल्या डोळ्यांसमोर "सजा-ए-कालापानी" चा काळाकुट्ट इतिहास उभा करतो.. रात्रीच्या वेळी घेतलेले जेलचे दर्शन... आणि जेलच्या समोर पार्कमधे असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा.... मात्र रात्रीच्या वेळी जेलचे दर्शन घ्यायला परवानगी नसते. म्हणुन मग नंतर यायचे ठरवून परत गेलो.. दुसर्‍या दिवशी आम्हाला दक्षिण अंदमान मधल्या "बारटांग" नावाच्या द्विपावर जायचे होते. पोर्ट ब्लेअर ते बारटांग ह्या प्रवासात तुम्ही जंगलातुन प्रवास करता, जिथे "जारवा" नावाच्या "प्रिमिटीव्ह" आदिवासी समुहाचे वास्तव्य आहे. जारवा लोक आधुनिकते पासुन अतिशय दूर असुन ते बाहेरच्यांशी संपर्क टाळतात. तरीही प्रवासात आम्हाला काही जारवा दिसले. त्यांना फोटो घेतलेला आवडत नाही म्हणुन मी ते टाळलं. रस्त्यात आम्हाला एक जारवा स्त्री तिच्या चिमुकल्यांसह दिसली. आणि खरंच, शप्पथ सांगतो.. कमरेपासुन वर ती विवस्त्र असुनही मला एकदम स्ट्राइक झाला तो तिचा चेहरा ! अतिशय आखीव आणि तेजस्वी असा तो चेहरा कुठल्याही "फेअर अँड लव्हली" ब्युटी कन्सेप्टच्या कानफडीत मारेल असा होता.. :-० बारटांग ला पोहचल्यावर आम्ही "मड वल्कॅनो" बघायला गेलो. एका एकरभराच्या जागेत,काहीतरी रासायनिक प्रक्रियेनी जमिनीतून सतत चिखल वाहत असतो. हा अनोखा प्रकार पाहुन मजा आली. इथे ह्या वल्कॅनोज चा वैज्ञानिक अभ्यासही सुरु आहे. बाराटांगच्या दुसर्‍या भागात चुनखडीच्या गुहा आहेत. भुगोलात शिकलेल्या "स्टॅलेक्टाईट्स, स्टॅलेग्माईट्स" वगैरे इथे बघायला मिळतात. (उजेड बरोबर नसल्याने फोटोज काही चांगले आले नाही मात्र).. इथे जाण्यासाठी "मॅनग्रोव्हस" च्या जंगलातून जावे लागते. पाण्यात मगरी-बिगरी असल्याने प्रवास मस्तपैकी टरकीफाईंग होतो. इथल्या जंगलात काही दिसलेल्या काही सुंदर छटा... परत पोर्ट ब्लेअरला आलो. पुढचा टप्पा होता "हॅवलॉक आयलँड".... इथे जाण्यासाठी दोन-अडीच तासांचा समुद्रप्रवास करावा लागतो. समुद्र सूर्याच्या सोबतीने प्रकाशाच्या किमया दाखवत होता.. हॅवलॉकला पोहचलो आणि .... आ हा हा !! सुखावलो. पुन्हा एकदा निळाईची जादू पसरायला लागली. आणि "सी ग्रीन" किंवा "ब्ल्यु ग्रीन" च्या कुठल्याही रंगछटेत न समावणारी ती कलाकारी समोर होती.. त्यातल्या त्यात मला हा किनारा आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे बर्‍याच दुरपर्यंत हा किनारा उथळ आहे. जवळजवळ अडीच-तिनशे मीटर आतपर्यंत माणसाच्या खांद्याच्या वर पाणी येत नाही. मी नुकताच "स्वर्गसुख" उपभोगता उपभोगता परत आयटमपणा करण्याच्या मुडमध्ये नव्हतो. ओहोटीत तर किनार्‍याचा विस्तार स्पष्टपणे समोर येत होता... इथे खुप भटकलो मी.. वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे शंख-शिंपले गोळा केले. (कुणासाठी ते नाही सांगणार आमि, जा ! ;-)) इथं कुणीतरी लपलेले आहे. शोधा बरं जरा... इथुन आम्ही राधानगरी बीचला गेलो. आशियातील टॉपच्या १० बीचेस मधे ह्याचा नंबर लागतो. इथला सुर्यास्त प्रसिद्ध आहे. पण आम्हाला मात्र ढगाळ वातावरणामुळे तो बघायला मिळाला नाही. इथे खेकड्यांनी बनवलेली रांगोळी किनाराभर पसरलेली होती.. ह्याला कॅमेर्‍यात कैद करता करता माझी पार वाट लागली. एका बिळावरुन दुसर्‍या बिळावर त्यांना टिपायला मी फिरत होतो. शेवटी म्हटलं, एका ठिकाणी कॅमेरा धरुन वाट बघू, तर हे महाशय लपंडाव खेळायच्या मुड मधे. भोकाच्या तोडांशी आल्यावर मी क्लिक करणार एवढ्यात पुन्हा तुरुतुरु आत.. पुन्हा बाहेर आले, मी क्लिकतो म्हटलं का पुन्हा भोकात पसार... अक्षरशः भोकाशी आली होती ! दुसर्‍या दिवशी परत पोर्ट ब्लेअर ला आलो. आज सेल्युलर जेलला जायचेच, असं ठरवलं होतं.. दुपारी आम्ही त्या स्वातंत्र स्मारकात पोहोचलो. सुरुवातीला सेल्युलर जेल ७ रांगांचे बनलेले होते. (मॉडेल खाली) मात्र दुसर्‍या विश्वयुद्धाच्या काळात जर्मन-जपानी सैन्याच्या बॉम्बवर्षावात त्याचे चार भाग नष्ट झाले. आत कैद्याना देण्यात येणार्‍या अमानुष वर्तणुकीचे दृष्य दाखवणारे काही मॉडेल्स ठेवलेले होते. हे बघून झाल्या-झाल्या आम्हाला सगळे बाहेर चलायला सांगू लागले. मी म्हटलं, मला सावरकरांची कोठडी पहायचीय. तिथले अधिकारी म्हणत होते की ती तिसर्‍या मजल्यावर एकदम टोकाला आहे, वेळ लागेल. मी त्यांना बोललो, "पाच मिनिटं थांबा." आणि सुस्साट पळत सुटलो. स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीसमोर पोहचलो आणि.... अंगभर रोमांच दाटून आले. पाय पुढे रेटेना. माझा मित्र मागुन आला नी म्हणाला, "अरे, अंदर क्यों नही जाता?" मी म्हटलं, थांब. थोड्या वेळाने आत गेलो. त्यांच्या प्रतिमेला नमस्कार केला.. थोडा वेळ कोठडीत डोळे मिटून उभा राहीलो. कोठडीचे फोटो काढून बाहेर आलो. मात्र त्या कोठडीत उभं राहून फोटो काढून घ्यायची माझी हिंमत झाली नाही. फक्त अंदमानला यायची ऐपत झाली, म्हणून स्वातंत्र्यवीरांच्या जागेवर, क्षणभराचा का होईना, हक्क सांगायची आपली लायकी नाही, हीच एक भावना मनात होती त्याक्षणी... ह्या काळ्यापाण्याच्या प्रदेशातली हिरवळ आणि निळाई मनात ठेवून, दुसर्‍या दिवशी चेन्नईला रवाना झालो... :: सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... ही दिवाळी आपल्या जीवनात सुख-समृद्धीचा प्रकाश आणि स्नेहीजनांच्या सहवासाचे माधुर्य घेवून येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!

वाचने 14679
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

लेखन आणि फोटो दोन्ही खूपच छान. सावरकरांच्या कोठडीचं दर्शन घ्यायला मिळालं, केवढं भाग्य तुमचं!

In reply to by मितान

आणि मला वाटत होतं, पाल्हाळ लांबतय का काय म्हणून ! आता मिपा संम ला फॉन्ट साईझ आणि लाईन स्पेसिंग वाढवायची सोय आहे का ते विचारायला लागेल.. :-)

कधी कळणार ह्या देशाला 'ह्या' माणसाचे मोठेपण...

झकास वर्णन. आवडलं एकदम.
फक्त अंदमानला यायची ऐपत झाली, म्हणून स्वातंत्र्यवीरांच्या जागेवर, क्षणभराचा का होईना, हक्क सांगायची आपली लायकी नाही, हीच एक भावना मनात होती त्याक्षणी...
बास भौ! जिंकलंस मित्रा..जिंकलंस.!!!

In reply to by धमाल मुलगा

".....बास भौ! जिंकलंस मित्रा..जिंकलंस.!!!...." ~~ श्री.धमु यानी आमच्या भावना नेमक्या शब्दबद्ध केल्या आहेत या विषयाबाबत. श्री.चिगो.....खूपच सुंदर वर्णन केले आहे, तुम्ही....त्याचबरोबर ते फोटोही. मी आणि माझ्या चार मित्रांनी काही वर्षापूर्वी चेन्नईहून बोटीने अंदमान (व निकोबारचाही...) प्रवास केला आहे. आमची कंडक्टेड टूर नसल्याने व त्यावेळी वेळेचेही काही बंधन नसल्याने आम्ही मनसोक्त सेल्युलर जेल परिसरातच जास्त वेळ काढला होता.....पाऊसही भरपूर असल्याने फिरण्यावरही साहजिकच बंधन आले होते (निकोबारवर तर उतरूही शकलो नव्हतो). तेथील स्थानिकांनी सांगितले की पाऊस असा धो-धो पडतोच. तुम्ही म्हणता तशी भावुक स्थिती 'त्या' कोठडीजवळ आले की नक्कीच होते. आमच्यातील एका मित्राला (गांधीभक्त असल्याने...) हिंदु महासभेची मते पटत नसत. पण प्रत्यक्ष तात्यांच्या सेलमध्ये पाय टाकण्यापूर्वी सर्वप्रथम त्याने तिथे डोके ठेवले.....! मी तर 'सावरकर प्रेमी".... अक्षरशः थरथरत होतो....रडू फुटते की काय, असे वाटू लागले होते. डोळ्यात आपोआप पाणी येते....त्या ठिकाणी वावरताना. पाचसहा वर्षापूर्वी साध्या कॅमेर्‍याने आम्ही काढलेले फोटों व तुमचे आत्ताचे इथले फोटो पाहिल्यावर कळते की, अशा आठवणी फोटोनी नव्हे तर त्यावर केलेल्या चर्चेमुळे दीर्घकाळ लक्षात राहतील. लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मनाची तशी अवस्था होते हे अगदी खरे... माझ्या मित्राला कळेचना, मी असा बावचाळल्यागत का करतोय ते? तो मला म्हणत राहीला की काढून घे फोटो.. मी नाही म्हणालो त्याला. त्या दाराच्या बाहेर (वीर सावरकर कोठडीची पाटी असलेला) आल्यावरच मी फोटो काढून घेऊ शकलो.. मी तुमच्या भावना समजूही शकतो, आणि त्यांचा आदरही करतो.. प्रतिसादासाठी धन्यवाद..

In reply to by इन्द्र्राज पवार

>>पण प्रत्यक्ष तात्यांच्या सेलमध्ये पाय टाकण्यापूर्वी सर्वप्रथम त्याने तिथे डोके ठेवले.....! मी तर 'सावरकर प्रेमी".... अक्षरशः थरथरत होतो....रडू फुटते की काय, असे वाटू लागले होते. डोळ्यात आपोआप पाणी येते... इंद्रदेवा.. काय सांगू देवा.. अगदी अगदी अगदी असंच होतं... हुंदका आवरत नव्हता.. भाईकाकांचे शब्द आठवतात.. कोठडीत तेज वसतीला आलं की कोठडीचा गाभारा होतो.. मी असाच निशब्द बसलो होतो खूप वेळ त्या गाभार्‍यात.. नंतर चार-पाचजणांनी मिळून 'ने मजसी ने' म्हणलं होतं बाबुजींच्या चालीत.. शेवडचं कडवं म्हणताच येइना दाटलेल्या गळ्यानं.. वेळ मिळाला तर लिहितो कधीतरी फोटोसकट..

In reply to by अर्धवट

मी अजुन तिथे गेलो नाहीये, पण समजू शकतो भावना. हे केवळ वाचतानाच डोळे कधी ओलावले ते कळलं नाही! शब्दातीत अनुभव असणार हे सांगायला कोणी ढुढ्ढाचार्याची गरजच नाही.

स्वातंत्रवीरांच्या कोठीचा फोटो बघूनच अंगावर रोमांच आले.. तुमचं काय झालं असेल कल्पना करू शकते. सुरेख! लेख आणि छायाचित्रे सगळेच सुंदर!

फोटो छान. हिरवट-निळ्या पाण्याचा तर खासच!

अंदमान ला जायचा प्लॅन असेल तर किती दिवस अन किती पैक लागतील? मी पुण्यात राह्तो :)

In reply to by मी-सौरभ

मला पण जायचं आहे, डोंबिवलिचा एक ग्रुप आहे त्यांच्या डिटेल्स मिळाल्या की मेसेज टाकेन तो पर्यंत इमेल करा. हर्षद

In reply to by ५० फक्त

चेन्नई की कोलकात्याला जायचं ते ठरवा. माझ्या माहितीप्रमाणे चेन्नई वरुन कमी नोटा लागतात. ट्रॅव्हलवाल्यांना विचारुन बघा. थोडं योग्य प्लानिंग केलं तर रिटर्न टिकीट १६-१७ हजारापर्यंत पडेल. काय करता, फ्लाईट्स कमी आहेत तिथल्यासाठी.. तिथे काही लोकांनी सांगितल्याप्रमाणे, समुद्रमार्गेही जाता येतं. दोन-अडीच दिवस लागतात, म्हणे..

चिगो, सुरेख! पोहर्‍यात बरंच काही आहे असं दिसतय :) जंगलछटा आणि निळा हिरवा समुद्र केवळ! स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल +१.

In reply to by विसोबा खेचर

तात्या... धन्यु !! तुमच्यासारख्यांचे कौतिक लय मोलाचे वाटते..

क्या बात..क्या बात..क्या बात.. डीटेल मधे लिहिलं आहेत. फोटो सुंदर.. त्या स्वा. सावरकरांच्या कोठडीत मीही गेलो होतो. वीस वर्षांपूर्वी. तेव्हा मी साष्टांग नमस्कार घातला होता. आणि आजुबाजूचे व्हाईट कॉलर्ड महाराष्ट्रीय भारतीय मित्र एकजात हसले होते. "काय बावळट आहे" म्हणून. त्यावेळी हे इतक्या वाईट कंडिशन मधे होतं की माझे कपडे त्या "साष्टांग नमस्कारा"नंतर धुळीने रंगले होते. लेख मस्त..

तिथे एक फाशीगेट बघितलं. त्याच्या फासात मान ठेवून बघितली होती. भयंकर काटा अंगावर. दुसरा मित्र खटक्याच्या लिव्हरवर हात ठेवून उभा आहे हे बघून झटकन दोर गळ्यातून काढला. असे मित्र असले की वेगळे शत्रू कशाला हवे? असो. जुन्या आठवणी जागवल्यात. धन्यवाद.

In reply to by गवि

आता मात्र परिस्थिती बरी आहे तिथली.. त्या फाशीच्या जागी मी पण टरकलो होतो. एकाच ठिकाणी तीन फाशीचे फंदे लटकत होते.. :-(

__/\__ धन्यवाद. अंदमान सफारी अतिशय सुरेख ! 'मड वल्कॅनो' बद्दल पहिल्यांदाच माहिती झाली. आता जालावर शोध घेतो. अवांतर :- 'टरकीफाईंग' शब्द आवडला ;)

माननीय चिगो यांचे लक्ष लक्ष आभार. माझे वडील सावरकर भक्त, 'सावरकर' हा नुसता शब्द देखील उच्चारला कि अंगात एक वीज संचारते, तर हा लेख आणि श्री. इंद्रा यांचा प्रतिसाद वाचून काय झाले असेल, हे सांगू शकत नाही. श्री. इंद्रा यांना व श्री. गगनविहारी यांना नम्र विनंती, त्यांचेहि सविस्तर अनुभव आणि फोटो येउद्यात. गगनविहारी यांना जसा कोठडीतील धुळीचा आस्वाद मिळाला तशी तिथली काही धूळ आमच्याहि माथी लागावी म्हणून तळमळ वाटत आहे. सुप्रसिद्ध अविनाश धर्माधिकारी यांनी सावरकरांचे केलेले वर्णन. : १) http://www.esnips.com/doc/cf0d7370-01a6-44f1-8e3a-dc68773d60e3/Veer-Sav… २) http://www.esnips.com/doc/9f7be2e2-6da1-4488-9cb7-c4857768cead/Veer-Sav…

अंदमानातून सुटण्यासाठी सावरकरांनी ब्रिटिशांना माफीपत्र लिहून दिले होते. त्याची प्रत कुठे मिळेल का?

In reply to by daredevils99

ते माफीपत्र नव्हते.. आपण तसा उल्लेख चुकून केला असेल असे गृहीत धरतो.. त्याचा गोषवारा आहे माझ्याकडे. सुटकेच्या शर्ती आणी अटी असे स्वरूप होते त्याचे..

चिगो शेवटच वाक्य खासच........ तुम्ही लकी आहात.....तात्यारावांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या कोठडीच दर्शन तुम्ही घेतलत..... हे लिहीताना माझ्या अंगावर काटा उठलाय.......