मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ ~ यश आणि उपेक्षा

इन्द्र्राज पवार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सन १९४२. दुसरे महायुध्द. बर्मा आघाडी आणि जपानी सैन्याने अचानक मारलेल्या विजयाच्या मुसंडीपुढे दोस्त राष्ट्रांना जबरदस्त हादरा बसला होता. म्यानमारच्या 'सित्तान्ग ब्रिज' भोवताली दोस्तांनी जपान्यांना पुढे येऊ द्यायचे नाही या निर्धाराने मोर्चे बांधणी केली होती आणि त्या दिवशीच्या कंपनीचा मुख्य अधिकारी होता २८ वर्षाचा एक भारतीय तरणाबांड बहाद्दर; ज्याच्या नेतृत्वाखाली तुकडीने जपान्यांना तोडीस तोड जवाब दिला. आपल्या साथिदारांना प्रोत्साहन देत देत स्वतःही शत्रूवर आग ओकत असतानाच तिकडून आलेल्या मशिन गनच्या फैरीनी त्याच्या पोटाचा वेध घेतला व हा उमदा अधिकारी तिथेच कोसळला. पोट फुटले होते, रक्तस्त्राव चालूच होता, पण याचा आपल्या जवानाना प्रोत्साहन देण्याच्या भाषेतील जोष काही कमी होईना. आपला कमांडर मरणोन्मुख अवस्थेत पडला आहे पण त्याही अवस्थेत त्याची जिद्द लखलखीत आहे हे पाहून तुकडीला नवीच संजीवनी मिळाली आणि तिने जपान्यावर अशी काही सरबत्ती केली की शत्रू सैन्य थोड्याच वेळात सित्तान्गपासून दूर गेले. विजय मिळाल्याचे पाहिल्यावर तो बहाद्दर अधिकारी बेशुद्ध झाला. सकाळी ब्रिटिश जनरलनी या तुकडीस्थळी तातडीने भेट दिली, विजयाबद्दल जाहीर सत्कार केला. सैनिकांनी त्यावेळी विजयाचे श्रेय आपल्या कंपनी कमांडरला दिले आणि त्यावेळी जनरलने जवळपास मरणोन्मुख अवस्थेत पडलेल्या त्या अधिकार्‍याजवळ जाऊन त्याला धीर दिला आणि सांगितले की, "यंग मॅन, तुझा कालचा पराक्रम हा 'मिलिटरी क्रॉस' मिळविण्याचा तोडीचा आहे आणि मी आताच ती सरकारकडे शिफारस करीत आहे...पण एक लक्षात ठेव 'मिलिटरी क्रॉस' मरणोत्तर मिळत नाही. तेव्हा त्या मानासाठी तुला जगलेच पाहिजे." त्याही अवस्थेत तो तरूण अधिकारी उदगारला, 'सैनिकी सेवा माझ्या रक्तातच आहे, आणि यातून वाचलोच तर पुढेही हेच करणार !" ही जिद्दच त्या अधिकार्‍याला मृत्युच्या मुखातून परत घेऊन आली. स्वतंत्र भारताच्या 'परमवीर चक्र' दर्जाचा ब्रिटीश सैन्यातील 'मिलिटरी क्रॉस' ही अर्थात या विलक्षण प्रतिभावान सैन्याधिकार्‍याला प्रदान करण्यात आला....आणि इथून सुरू झाली जवळपास ४० वर्षाची अखंड सेवा....फक्त एका दलाची.... एका देशाची....एका शपथेची....दल होते - लष्कर...देश भारत...शपथ ~ गणवेश, ज्या गणवेशाशिवाय देश याला ओळखूच शकत नाही, इतको तो त्याच्या प्रतिमेशी निगडीत आहे : आणि हा तरुण अधिकारी होता ~ सॅम होरमुस्जी फ्रामजि जमशेदजी माणेकशॉ : संपूर्ण भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ, मूर्तिमंत सळसळते चैतन्य...वयाच्या ९४ वर्षीदेखील शेवटचा श्वास घेत असतानासुध्दा आपला चेहरा चकचकीत दाढी केलेला असला पाहिजे अशी सूचना आपल्या नातवाला देऊन ठेवणारा एक जबरदस्त शारीरिक आणि मानसिक ताकतीचा सेनानायक....ज्याला या देशातील [काही राजकारणी सोडले तर] प्रत्येकाकडून भरभरून आदर आणि प्रेम लाभले. (या फोटीतील गुरखा सैनिक फार लोकप्रिय झाला. बांगला मुक्ती आघाडीवर तैनात असलेल्या एका तुकडीला भेट देण्यास जनरलसाहेब आले होते. हा सैनिक ड्यूटीवर तैनात होता. सहज नाव विचारले असता सैनिकाने उत्तर दिले, "सॅम बहादूर साहेब जी"....जनरल सॅम भलतेच खूष झाले, 'अरे मग मीच इथे खरा तर ड्यूटीवर आहे.." या प्रसंगानंतर जर त्यांच्या निकटच्या मित्रांनी आणि अधिकार्‍यानी त्यांना 'सॅमबहादूर' हेच संबोधन दिले, ते त्यांना खूप आवडे.) मिपा सदस्यांना वाटेल की, आज अचानक माणेकशॉ यांच्यावर हा लेख का? ना त्यांची जयंती, ना पुण्यतिथी, ना एखाद्या विक्रमी विजयाच्या आठवणीचा दिवस ! असे असताही, लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली ती 'पैसा', 'सहज' आणि 'सुधीर काळे' यांच्यामुळे. दोनतीन दिवसापूर्वी श्री.सुधीर काळे यांच्या 'कारगील' धाग्यावर अभ्यासपूर्ण चर्चा चालू असताना एके ठिकाणी भारतीय सेनादलाचे पहिलेवहिले 'फिल्ड मार्शल' चा बॅटन मिळविणारे सॅम माणेकशॉ यांच्यासंदर्भात काही उल्लेख आले व तिथे माझ्या प्रतिक्रियेवर उल्लेख करताना सदस्यांनी (नंतर खरडीतूनही) "या विषयावर स्वतंत्र लेख लिहा" अशी सूचना केली. माझ्या मनीही तीच भावना आली तसेच या निमित्ताने का होईना, भारतभूमीच्या या एका महान सेनानीला, त्यांच्या आठवणी जागृत करून, सलाम करू या. ३ एप्रिल १९१४ ला 'अमृतसर' पंजाब येथे पारसी घराण्यात जन्माला आलेल्या सॅमनी प्राथमिक शिक्षण अमृतसर येथेच पूर्ण केले तर नैनितालच्या शेरवूड कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर १९३२ ला त्याचवेळी डेहराडून येथे ब्रिटीश सरकारने सुरू केलेल्या आय.एम.ए. (इंडियन मिलिटरी अ‍ॅकेडेमी) च्या ४० कॅडेटच्या तुकडीत प्रवेश मिळविला. योगायोगाची गोष्ट म्हणजे आज देशातील या नामवंत अकादमीतून पास आऊट झालेल्या १९३४ च्या पहिल्या बॅचमधील माणेकशॉ हे पहिले सेकंड लेफ्टनंट होते. पुढे रॉयल स्कॉउट्स आणि १२ फ्रंटियर फोर्स रायफलचे नेतृत्व केले आणि बर्मा आघाडीवर केलेल्या पराक्रमाने ते त्यावेळच्या आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्थापित झालेल्या भारतीय लष्करातील एक लाडके नावच झाले. १९४७ च्या स्वातंत्र्याचा जल्लोष चालू असतानाच फाळणीमुळे विदिर्ण झालेली अवस्थादेखील ते पाहत होते आणि त्यातच काश्मिर प्रश्नावरून पाकने केलेली घुसखोरीला त्यानी (आता ते 'कर्नल माणेकशॉ' झाले होते) दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे ते सैन्याच्या गळातील ताईत तर बनले पण आता इथे त्यांना घाणेरड्या राजकारण्यांच्या मत्सराची पहिली झलक पाहायला मिळाली. त्यांच्या आणि तत्सम वा वरिष्ठ सेनाधिकार्‍यांना भारत-पाक राजनैतिक संबंधावर जणू काही मत व्यक्त करूच द्यायचे नाही, आणि जरी काही मत असलेच तर ते पं.नेहरूंच्यापर्यंत पोहोचणार नाही अशा पटावरील खेळ्या खेळल्या गेल्या (आणि आज त्याचा परिणाम आपण पाहतोच आहोत...असो.). पुढे १९६१ च्या सुमारास त्यावेळचे एक नेहरू सोडले तर सर्वांना नकोसे झालेले संरक्षणमंत्री व्ही.के.कृष्ण मेनन यांच्या तुसड्या स्वभावाशी दिलखुलास आणि कायम हसतखेळत गंमतीशीर शेरेबाजी करण्याच्या (टिपिकल पारशी पर्सन...) सवयीच्या सॅम यांचे सूत जमणे शक्यच नव्हते. (सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक श्री.खुशवंतसिंग यांना कृष्ण मेनन यांच्याबरोबर लंडनमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या खास अशा शैलीत रंगविलेले मेनन वाचनीय आहेत. त्या विषयी पुढे कधी तरी....अर्थात इथल्या सदस्यांनी हवे असेल तर !). त्यामुळे सॅम मिलिटरी व्यूहरचनेत 'साईडलाईन्ड' झाले आणि चीनकडून नेफात झालेल्या अपमानस्पद पराभवानंतर पंडित नेहरूंना आठवण झाली ती या धडाडीच्या सेनानायकाची. त्यांनी प्रथम मेनन यांना राजिनामा देण्यास सांगितले व पुढच्याच क्षणी तातडीने सॅम माणेकशॉ यांना बोलावून घेतले आणि पराभूत अवस्थेत माघार घेण्याच्या मनस्थितीत असलेल्या नेफा कमांडचे नेतृत्व करण्याची जबाददारी त्यांच्याकडे तात्काळ दिली. सॅमनी कोणताही अवधी न दवडता नेफा आघाडीकडे धाव घेतली आणि तिथे त्यांनी पाहिले की आपल्या सैन्याला सर्वप्रथम काय हवे तर 'मनोधैर्य', जे पार खच्ची झाले होते. सॅम यांच्याकडे शस्त्राची ताकद जितकी जबरदस्त होती तितकीच शक्ती होती त्यांच्या जादूमय वाणीत. इथून सुरू झाली माणेकशॉ यांचे दलातील अगदी शेवटच्या सैनिकाला केवळ आपल्या वाणीने जिंकण्याची विलक्षण असे कौशल्य. पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व अधिकार्‍यांना आणि सैनिकांना उद्देशून भाषण केले (ज्याची प्रत दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात असलेल्या मिलिटरी हेडक्वार्टर्समध्ये तसेच तत्सम अन्य महत्वाच्या - ५६ जीपीओ सारख्या - मिलिटरी डेपो लायब्ररीत जाणीवपूर्वक जपून ठेवण्यात आली आहे...). भाषणात त्यांनी सांगितले की, 'एक लक्षात ठेवा हा जो चिनी सैनिक आहे तो काही १० फूट उंच नाही...आहे तो तुमच्यामाझ्यासारखाच...तो पुढे आला म्हणजे त्याने त्याच्या अधिकार्‍याने सांगितलेल्या आज्ञेचे पालन केले म्हणून...जे आजपासून तुम्ही कराल." माणेकशॉ यांचे पुढील वाक्य तर कायमचे सैनिकानी आपल्या मनावर कोरून ठेवण्यासारखे आहे...ते म्हणाले, "आजपासून माझ्या लिखित ऑर्डरशिवाय एकही सैनिक युध्दभूमिवरून माघार घेणार नाही हे लक्षात ठेवा....आणि आता हेही लक्षात ठेवा की, अशी कोणतीही लेखी ऑर्डर मी काढणार नाही..." व्वा ! याला म्हणतात सेनाधिकारी ! असा अधिकारी मिळाल्याने भारतीय सैन्याने गमावलेले ते धैर्य परत मिळविले आणि 'भिंतीला पाठ दाखविण, पण शत्रूला दाखविणार नाही...' हे वचन अंमलात आणले, जे पुढील दोन पाक युध्दात प्रकर्षाने जाणविले. (हाच तो ऐतिहासिक क्षण : ले.जन.जगजितसिंग अरोरा [सॅम यांचा लाडका 'जग्गी'] भारताच्या बाजूने पाक शरणागतीचे दस्ताऐवज घेताना. सही करणारे पाक ले.जनरल 'टायगर' नियाझी.) .....(पुढे चालू....) इन्द्रा

वाचने 34174 वाचनखूण प्रतिक्रिया 62

पैसा Sun, 09/26/2010 - 16:04
"यज्ञी ज्यानी देऊनि निज शिर, घडिले मानवतेचे मंदिर, परि जयांच्या दहनभूमिवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती!" =बाकीबाब बोरकर. आजचा दिवस सत्कारणी लागला. लवकरच पुढचा भाग येऊ दे!!

अनिल २७ Sun, 09/26/2010 - 14:24
सॅम माणकेशॉ.. नाव घेतलं तरी दोन्ही हात कानाला लागतात.. भारताला अश्या अनेक सेम माणकेशाँची गरज आहे. बाकी हा लेख सुंदर झालाय त्याचे कारण ओघावती भाषा.. लेखकाचे अभिनंदन. अजून येऊ द्या..

श्रावण मोडक Sun, 09/26/2010 - 16:17
इंद्रराज, लेख चांगला. प्रश्नच नाही. पण... माहितीतले माणेकशॉ येथे पुन्हा वाचता आले. मेनन यांच्या काळातील त्या चाली, त्यात झालेले दुर्लक्ष, तिथून परत येणे याविषयीच अधिक लिहिले पाहिजे तुम्ही. माणेकशॉनी आयुष्याच्या उत्तरार्धात व्यावसायीक स्तरावर झालेल्या पिछेहाटीचा सामना कसा केला हेही पुढे आले पाहिजे. हा असा लेख कधी लिहिताय?

In reply to by श्रावण मोडक

"उत्तरार्धात व्यावसायीक स्तरावर झालेल्या पिछेहाटीचा सामना कसा केला हेही पुढे आले पाहिजे....." ~~ होय. या बाबींचा [काही प्रमाणात] पुढील भागात उल्लेख आहेच. फक्त मेनन (आणि अर्थात नेहरू) हा विषय स्वतंत्ररित्या घेणे गरजेचे आहे, इतकी त्याची व्याप्ती मोठी आहे....ही बाबदेखील पुढील माणेकशॉ लेखात येते....आणि श्री.खुशवंतसिंग संदर्भात मेनन डोक्यात आहेतच....येथील सदस्यांना राजकारणाची ही कबर खणल्याचे आवडणार असेल तर पुढे हा विषयदेखील घेऊ या; या निमित्ताने. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

श्रावण मोडक Sun, 09/26/2010 - 18:22
येथील सदस्यांना राजकारणाची ही कबर खणल्याचे आवडणार असेल तर पुढे हा विषयदेखील घेऊ या; या निमित्ताने.
अर्रे,,, हे काय विचारणं झालं? लिहाच.

In reply to by इन्द्र्राज पवार

समंजस Mon, 09/27/2010 - 11:31
सगळेच संदर्भ येउ द्या.... जो पर्यंत ते संदर्भ खरे आहेत आणि माहितीपुर्ण आहेत तो पर्यंत मुळीच काळजी नसावी. ज्या सदस्यांना सत्यते पासून दुरच राहायचे असेल ते सदस्य या धाग्यापासून सुद्धा दुर राहू शकतात :)

सुनील Sun, 09/26/2010 - 17:46
छान लेख. सहजरावांनी दिलेल्या चित्रफितीही आवडल्या.

चतुरंग Sun, 09/26/2010 - 21:02
सुंदर लेख. फील्डमार्शलचा किताब ज्या व्यक्तीला शोभतो अशी एकमेव व्यक्ती म्हणजे सॅमबहादुर! (सॅम गरुडाचा पंखा)चतुरंग

अडगळ Sun, 09/26/2010 - 22:27
युद्ध ही गोष्ट पार महाकाव्यापासून ते हायकू पर्यंत, चित्र - शिल्प ते सिनेमा सगळ्याला व्यापून अजून दशांगुळे उरलीच आहे. आणि या युद्धांचे नायक सुद्धा आपल्या अस्मितेचे प्रतीक बनून राहतात . काळ-वेळ - परिस्थितीची पोलादी कांब वाकवून त्याला आकार देणारी ही मनगटे कायमच प्रेरणा देत राहतील. मिपावर येणं सार्थकी लागलं असं काही लोकांचं लिखाण वाचून नेहमीच वाटतं. आपण त्यापैकी एक. असेच लेखन वाचायला मिळत राहो.

In reply to by अडगळ

"युद्धांचे नायक सुद्धा आपल्या अस्मितेचे प्रतीक बनून राहतात." ~~ आणि तसे ते बनून राहणे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यासाठी फार मोठी गरजेची बाब आहे. जन्माला येणे, शिकणे, नोकरी करणे, काम करणे, मध्येच संसार सुरू करून तेच चक्र अव्याहतपणे चालू ठेवता ठेवता दोन वेळ जेवणे, झोपणे व परत उद्या तेच....हेच आयुष्य बहुतांशी सर्वांच्या ललाटी लिहिलेले असते; पण ते सुसह्य होते ते अशा वीरांच्यामुळे ज्यांनी स्वतः २४ तास जागे राहून इतरांना सुखाची झोप कशी लागेल ते पाहिले. ~~ सैनिक हे काम करतो....आणि त्याला तसे काम करण्याचे उमेद, स्फूर्ती देतो तो त्या सेनेचा नायक. सॅमबहादूर माणेकशॉ अशा सेनानायकांच्या यादीत अग्रभागी होते. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मुशाफिर Tue, 09/28/2010 - 05:57
फारच सुंदर आणि ओघवतं लेखनं! तुमच्या बहुतेक सगळ्याच मुद्यांशी सहमत आहे. काही वर्षांपूर्वी जनरल वेदप्रकाश मलिक यांची झालेली मुलाखत आठवते. त्यांनी एक आठवण तेव्हा सांगितली होती. सॅम माणेकशॉनी एकदा जनरल मलिकना विचारलं, "व्हॉट डू यु थिंक इज द लिमिट ऑफ अ‍ॅन इंडियन सोल्जर?" तेव्हा जनरल मलिकना नक्की काय उत्तर द्यावं हे सुचेना. तेव्हा माणेकशॉ स्वतःचं म्हणाले , "द लिमिट ऑफ द इंडियन सोल्जर्स ईज द लिमिट ऑफ देअर ऑफिसर! सो ट्रेन युअर ऑफिसर्स टु बी द बेस्ट ऑफ युवर मेन". सैन्याधिकारी म्हणून स्वतःच एक आदर्श असणार्‍या सॅम माणेकशॉंपेक्षा हे जास्त चांगल्याप्रकारे कोण समजावू शकलं असतं का? थोडसं अवांतर; मागे एकदा वाचलेल्या एका पाकिस्तानी सैनिकाच्या अनुभवकथनातील एक वाक्य (त्याने जरी ते आत्मस्तुतीपर म्हटलं असेल तरीही ) कायम स्मरणात राहिलयं, त्यात म्हटलं होतं, "जर पाकिस्तानी सैनिकांच्या धाडसी वृत्तीला आणि शौर्याला, भारतीय सैन्यातल्या अधिकार्‍यांसारख्या धडाडीची आणि नेतृत्वाची जोड लाभली, तर ते एक अजेय सैन्य होईल". सांगायचा मुद्दा असा, की युध्दशास्त्रातील महत्वाच्या बाबींची माणेकशाँना किती सखोल जाण होती? हेच इथे अधोरेखीत होतं. पुढील भागं वाचण्यास उत्सुक आहे. मुशाफिर. अवांतर: १९७२ च्या युद्धाच्या वेळी इंदिरा गांधीच्या "आर यु रेडी जनरल?" ह्या प्रश्णाला , "आय अँम ऑलवेज रेडी, स्विटी!" असं उत्तर केवळ जनरल माणेकशॉच देऊ जाणोत! :)

In reply to by मुशाफिर

"द लिमिट ऑफ द इंडियन सोल्जर्स ईज द लिमिट ऑफ देअर ऑफिसर! सो ट्रेन युअर ऑफिसर्स टु बी द बेस्ट ऑफ युवर मेन". ~~ होय. किती सत्य आहे हे विधान ! म्हणूनच झाडून सार्‍या सैनिकांच्या नजरेत 'सॅम' हे केवळ एक लष्करी अधिकारी नव्हते तर ते होते 'बहादूर'. ~~ बांगला मुक्तीवेळी एक फ्रंटवर असलेल्या जखमी सैनिकांना पाहण्यासाठी ते तिथल्या इस्पितळात गेले असता, त्यांना एक सैनिक खूपच जखमी झालेला दिसला. त्याच्याजवळ जाऊन त्याची आपुलकीने चौकशी केली. म्हणाले > "किती गोळ्या लागल्या तुला जवाना?" सैनिक [काहीसा विव्हळत] : "जनरलसाहेब, ३...." सॅम (मोठ्याने हसून) > "अरे वा !! मग तू किती नशीबवान आहेस ते बघ. मी तुझ्याएवढा होतो त्यावेळी ७ गोळ्यानी माझ्या पोटाची चिरफाड करून टाकली होती. मला उद्याचा सुर्य दिसतो की नाही अशी शंका माझ्या साथिदारांना आली....पण मला नाही. कारण? कारण, मला माहित होते की माझे काम अजून अपुरे आहे. सो माय बॉय, हे लक्षात घे की तू जो गणवेश स्वीकारलेला आहेस, त्याचे काम अजून पूरे झालेले नाही." बस्स....! त्या सैनिकाला अजून कसल्या औषधाची गरज होती? खडखडीत बरा होऊन परत छावणीत परतलाही. असा असावा सैन्याधिकारी...!! इन्द्रा

In reply to by मुशाफिर

संजय अभ्यंकर Tue, 09/28/2010 - 22:11
"द लिमिट ऑफ द इंडियन सोल्जर्स ईज द लिमिट ऑफ देअर ऑफिसर! सो ट्रेन युअर ऑफिसर्स टु बी द बेस्ट ऑफ युवर मेन" १९७२ च्या युद्धाच्या वेळी इंदिरा गांधीच्या "आर यु रेडी जनरल?" ह्या प्रश्णाला , "आय अँम ऑलवेज रेडी, स्विटी!" असं उत्तर केवळ जनरल माणेकशॉच देऊ जाणोत! त्या सलिम जावेदचे डायलॉग झक मारतात. जयहिंद!

कुसुमिता१२३ Sun, 09/26/2010 - 22:46
फि.मा.सॅम माणेकशा म्हटलं की खरच ऊर अभिमानाने असा भरुन येतो! सॅम माणेकशांबद्द्लच्या वरच्या सर्व प्रतिक्रियांशी सहमत! लेख सुरेख आहे..पुढचा भाग लवकर लिहा!

आंसमा शख्स Mon, 09/27/2010 - 09:48
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर अचानक वाचायला मिळाले, आनंद झाला.
हाच तो ऐतिहासिक क्षण : ले.जन.जगजितसिंग अरोरा [सॅम यांचा लाडका 'जग्गी'] भारताच्या बाजूने पाक शरणागतीचे दस्ताऐवज घेताना. सही करणारे पाक ले.जनरल 'टायगर' नियाझी.
हे असे, खरा इतिहास जागता ठेवणारे फोटो नेहमी पेपर मध्ये आणि टिव्हीवर का दिसत नाहीत... हे खरे इंडियन आयडॉल्स आहेत! इंद्रराज यांचे लेखन वाचत असतो, फार उत्तम लिहिता तुम्ही. पुढील भागाची वाट पाहत आहे.

"हे खरे इंडियन आयडॉल्स आहेत!" ~~ ही भावना फार छान आहे. आता या क्षणी जी मुले व मुली ५ ते ९ च्या वर्गात आहेत त्यांना 'इंडियन आयडॉल्स' म्हणजे काय? असे विचारले तर (आमच्या दुर्दैवाने....) 'स्टार प्लस' आणि 'सोनी' चॅनेल्सकडे बोट दाखवितात. किमान त्यांच्यासाठी का होईना त्यांच्या पालकांनी स्क्रीनवरील कचकड्यांच्या बाहुल्यापेक्षा खरेखुरे आयडॉल्स कोण आहेत हे दाखविण्यासाठी 'सॅम' सारख्यांची ओळख करून देणे आत्यंतिक गरजेचे झाले आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

आंसमा शख्स Mon, 09/27/2010 - 10:23
कचकड्याच्या नटनट्यांपेक्षा आणि कुठला तरी भंकस महागुरु म्हणतो म्हणून गाणे सुधरवण्यापेक्षा हे टिव्हीवर यायला हवे. तगडे शारिरीक ट्रेनिंग आणि देशभक्ती याचे महत्त्व कधी कळणार? आणि मुलांनाच का? अनेक धार्मिक(?) नेत्यांनाही हेच दाखऊन दिले पाहिजे यात शंका नाही. शिवाय कलमाडींना पाठवला पाहिजे हा लेख. ही प्लॅस्टिकच्या चमकीसारखी माध्यमे आपल्याला षंढ, मठ्ठ आणि मूर्ख करून टाकत आहेत. دشمن دانا بهتر از دوست نادان است दुष्मने दाना बेहेतर अज दुस्त नादां अस्त

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain गुरुवार, 09/30/2010 - 12:40
सहमत. योग्य संस्कार लाभल्याने मी अशा गटात कधीच नव्हतो :) लेख आवडला. रद्दीच्या गठ्ठ्यात हरवला होता! इतके दिवस तुमचे सविस्तर प्रतिसाद वाचत होतो आणि तुम्ही संपूर्ण लेख लिहायला कधी सुरुवात करणार याची वाट पहात होतो. लेखमाला म्हणजे आंधळा मागतो एक डोळा... अशी स्थिती झाली. ही मालिका व त्या अनुषंगाने तुमच्या डोक्यात येणार्‍या सर्व गोष्टी ( इथे दोघांचा उल्लेख आहे) आणि (इतर विषयांवरही) बिनधास्त लिहा. स्वयंघोषित साहित्यिक आपला रतीब घालत असताना तुमच्यासारख्या दर्जेदार लेखकाने परवानग्या मागण्याची गरज नाही.

समंजस Mon, 09/27/2010 - 11:22
छान लेख. फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर आहे म्हटल्यावर उत्तम व्हायलाच हवा :) [अवांतरः सॅम माणेकशॉ यांचा जन्म 'अमृतसर' येथे न होता, मुंबईतील एखाद्या पारशी कुटूंबात झाला असता तर ? ]

"[अवांतरः सॅम माणेकशॉ यांचा जन्म 'अमृतसर' येथे न होता, मुंबईतील एखाद्या पारशी कुटूंबात झाला असता तर ? ]" ~~ बाप रे ! असे झाले असते तर ते 'दुसरे' टाटा-बजाज-मेहता किंवा 'अंबानी' च झाले असते. साध्या काल्पनिक विचारानेदेखील अंगावर काटा आला. इन्द्रा

नेहमी प्रमाणेच सुंदर व अभ्यासु लेखन इंद्रदा. सॅम माणकेशा ह्यांच्याविषयी जे काय वाचले ते एकतर फक्त वर्तमानपत्रातुन अथवा एखाद्या युद्धविषयक पुस्तकात आलेल्या संदर्भातुन. फक्त माणकेंशा विषयी असलेले असे लेखन अजुन तरी वाचलेले न्हवते. आता काहि तक्रारी :- १) वर श्रामो म्हणतात तसे ह्या लेखातली माहिती हि सर्वत्र उपलब्ध अशा प्रकारातली आहे. तुमच्याकडून कधीही वाचनात न आलेल्या अथवा दृष्टीआड राहिलेल्या माणकेशां चरित्राची माहिती आम्हाला वाचायची आहे. २) दरवेळी सभासदांचा विचार नका करु बॉ ! आम्हाला अभ्यासु इंद्र पवारांच्या मनातुन झरलेले सर्व काही वाचायला आवडेल. ज्या दिवशी सभासदांच्या आवडी-निवडीचा विचार करुन इंद्र पवार लिहायला लागतील त्या दिवशी पासून त्यांचे लेख उघडणे बंद :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री.प.रा. आणि अदिती यांच्या मताशी सहमती व्यक्त करीत आहे. अर्थात इथे लिखाण देताना 'ते वाचणार्‍याला कितपत आवडेल' या शंकेची माशी देण्यापूर्वी कानात गुणगुणतेच. पण तुम्ही दोघे म्हणता तेही खरेच. लक्षात ठेवतो. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

इन्द्रा, ही माशी ज्यांच्या कानात गुणगुणायला पाहिजे त्यांची ऑडीटरी नर्व्ह बहुदा खराब आहे. असो. हे इथे विषयांतर झालं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिगो Wed, 09/29/2010 - 11:56
इन्द्रा, तुम्ही "सॅम" बद्दल लिहीत आहात, तेव्हा परीणामांची चिंता नको. ज्यांना वाचायचं नसेल, ते दुर राहतील. सहज आठवलं म्हणून सांगतोय. अरुणाचल प्रदेश मध्ये वलाँग ला (जिथे १९६२ मधे युद्ध झाले) "हेलमेट टॉप" वर एक सुंदर वाक्य कोरलेले आहे.. "At Walong, the Indian soldiers lacked everything but guts"... लढा.

प्रसन्न केसकर Tue, 09/28/2010 - 13:52
फील्ड मार्शल मानेकशॉ हा अर्थातच भारतीय लष्कराच्या इतिहासातला स्फूर्तीदायी भाग आहे. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यांच्यामुळेच भारताचा विजय झाला आणी आपला देश अशियातील उगवती महासत्ता ठरला हे त्यांचे योगदान अतुलनिय आहेच. १९६२ आणि १९६५ च्या युद्धांमधेदेखील त्यांचा सहभाग महत्वाचा होता. फील्ड मार्शल मानेकशॉ उपेक्षित होते, राजकारण्यांनी त्यांची सतत गळचेपी केली हे मात्र पचायला जड गेले. जरी काही राजकारण्यांकडुन त्यांना विरोध झाला तरीही फील्ड मार्शल मानेकशॉ हे अन्य अनेक महत्वाच्या राजकारण्यांशी जवळिकीचे संबंध राखुन असल्याने अन्य सर्व सेनाधिकार्‍यांपेक्षा अधिक स्वातंत्र्य त्यांना मिळाले असेच मी बर्‍याचदा ऐकले होते. याबाबत अजुन वाचायला नक्कीच आवडेल.

"फील्ड मार्शल मानेकशॉ उपेक्षित होते, राजकारण्यांनी त्यांची सतत गळचेपी केली हे मात्र पचायला जड गेले...." श्री.केसकर यांच्या या मुद्द्याचा विचार पुढील लेखात आहेच, पण जाता जाता हेही सांगतो की, या देशातील पहिल्यावहिल्या पराक्रमी फिल्ड मार्शलला १९७३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर वयाच्या ९३ वर्षापर्यन्त म्हणजे सन २००७ पर्यन्त पेन्शन मिळत होती ~~ फक्त रुपये १३००/- (येस, फक्त तेराशे रूपये...) ~ हा मुद्दा पुढे घेतला आहेच. इथे फक्त तुम्ही जो उपेक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे त्यासाठी या छोट्या खुलाशाचे प्रयोजन. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते Tue, 09/28/2010 - 14:32
माणेकशाँना मुद्दाम १३०० रु अशी कमी पेन्शन दिली जात होती का? त्यावर कोणी देशभक्तांनी आवाज उठवला होता का? १९७३ मध्ये तरी १३०० रु ही ठीक पेन्शन होती का?

kamalakant samant Tue, 09/28/2010 - 14:38
लेख चा॑गला आहे पण ६५ च्या लढाइत ते कोणत्या भागात होते? हे सा॑गितले तर बरे.

kamalakant samant Tue, 09/28/2010 - 14:39
लेख चा॑गला आहे पण ६५ च्या लढाइत ते कोणत्या भागात होते? हे सा॑गितले तर बरे.

kamalakant samant Tue, 09/28/2010 - 14:40
लेख चा॑गला आहे पण ६५ च्या लढाइत ते कोणत्या भागात होते? हे सा॑गितले तर बरे.

सुधीर काळे गुरुवार, 09/30/2010 - 14:14
इंद्रराज, आजच जवळ-जवळ एक आठवड्यानंतर मी मिपावर आलो. नीट वाचून प्रतिक्रिया देईन ४ ऑक्टोबरला. धन्यवाद, सुधीर काळे

In reply to by सुधीर काळे

इन्द्र्राज पवार गुरुवार, 09/30/2010 - 17:53
"आजच जवळ-जवळ एक आठवड्यानंतर मी मिपावर आलो. ..." असल्या विषयावर तुमची प्रतिक्रिया येणार नाही असे झाले नसते, पण 'दुसरा' लेख आला व 'तिसर्‍या' ची पूर्वतयारी झाली आहे, तरी जाकार्ताहून एक पाकळीपण इकडे फिरकेना त्यावेळी समजलो की, होय, तुम्ही काम्/व्यवसायाच्या धबडग्यात अडकला असणार. इथे लेख क्र.२ एनी वे...वेटिंग. ~~~ इन्द्रा

शशिकांत ओक Wed, 12/06/2023 - 11:00
नुकतेच सॅम बहादूर प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान वाटले. वरील धाग्यातील चित्रातून प्रसंग जसेच्या तसे त्यात पहायला मिळतात. इंदिरा गांधी यांचे डोळे खोल गेलेले आणि काळी वर्तुळे असल्याचे त्यांच्यावर ताण दाखवत होता. घरगुती सॅम, तमिळ बॅटमॅन यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलत गेले.