मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाकाहार :- काही नवीन पैलु

मन · · काथ्याकूट
मित्रहो, जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला. ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही. मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय. मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते. जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी. जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी. माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः- १.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंवा फ्यामिली) प्राण्यांचा आहार समान/मिळताजुळता/साम्य असलेला असतो. जसे घोडा आणि झेब्रा हे एकाच प्रवर्गातील प्राणी. त्यांच्या शरीरात विलक्षण साम्य आहे.म्हणुन त्यांच्या आहारातही साम्य आहे. दोघेही हिरवळ चरतात,त्यावर् जगु शकतात. आता डोळ्यासमोर चित्र आणा की मांजर् उंदीर् पकडते आहे. दुसरे चित्रः- चित्ता किंवा वाघ ससा पकडत आहेत. काही साम्य दिसलं? दुसर्‍या चित्रात उंदीर(भक्ष्य) मोठा झाला आणि बनला ससा तसेच भक्षक ही मोठा झाला आणि मनी मावशी चा बनला वाघोबा. बरोबर? कारण हे दिसत की वाघ/चित्ता आणि मनी माउ हे एकाच म्हणजे मार्जार प्रवर्गातील असल्याने त्यांच्या आहारात हे साम्य आहे. अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. ) त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा. ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा? २.मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात.(थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच,भयावह) उदाहरणः- कुत्रा,वाघ,लांडगा. येथे, अन्न तोडणे हे मुख्य उद्दिष्ट् आहे, चर्वण नव्हे. याउलट,शाकाहारी प्राण्यांकडे सहसा अशा दातांचा अभाव असतो. त्यांचे दात असतात प्रामुख्याने "चर्वण" करण्यासाठी.जात्याच्या दोन दगडात जसे धान्य रगडले जाते, त्याच प्रकारे अन्न हे ह्या प्राण्यांच्या रुंद पृष्ठभाग असणार्‍या दातात "रगडले" जाते. नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा. (जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.) ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा? ३.शाकाहारी प्राणी "चावुन" खातो. मांसाहारी प्राणी चावतो कमी,"गिळतो" जास्त. ("अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ" मिसळली जाते.मांसाहारी प्राण्यात ही प्रक्रिया तेव्हढ्या प्रमाणात होत नाही.(जवल् जवळ् नगण्य.) माणसाच्या लाळेचे अन्नात मिसळण्याशी गुणोत्तर काढले,तर् ते शाकाहारी प्राण्यांच्या अगदी निकट जाते. ४.ऍपेंडिक्स् हे नाव बर्‍याच लोकांनी(जवळपास् आपण सर्वांनीच) ऐकले असावे. काय असते हे ऍपेंडिक्स? तो आहे मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग. तो हिरव्या वनस्पती खाणार्‍या प्राण्यात कार्यरत् असतो. त्याचे कार्य हेच की:- हरित वनस्पतीतील सेल्युलोज चे पचन करुन त्यातुनही उर्जा मिळवणे. मानवी शरीरात हा भाग् कार्यरत् नसल्याने हरित भाग उर्जेसाठी वापरता येत् नाही आणि मग विष्ठेतुन बाहेर् टाकला जातो. पण ह्या अवयवाची उपस्थिती हेच सुचित करते की मानवी शरीर तुर्तास शाकाहारास जवळचे आहे. शाकाहारच ते प्रमुख्याने नीट पचवु शकते. ५.सहज प्रवृत्ती:- एका (पाश्चात्त्य)विश्लेषकाचे निरिक्षण आहे ते असे........ तुम्ही एका नुकत्याच थोड्याशा मोठ्या झालेल्या वाघाच्या भुकेल्या बछड्यासमोर किंवा मांजरीच्या पिल्लासमोर एक सफरचंद ठेवा आणि ठेवा एक छोटेसे जिवंत कोंबडीचे पिल्लु. नैसर्गिक बुद्धिनुसार्, बछडे त्या पिलाला (भक्ष्य म्हणुन) मारुन खाइल, व सफरचंदाशी खेळत बसेल्. आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा. बालक ते सफरचंद खाउन टाकेल आणि त्या पिलाशी खेळण्यात मग्न होइल. बछडे सफरचंद् खायचा विचारही करणार् नाही. बालक त्या पिलाला मारुन मग खाण्याचा विचारही करणार नाही. ह्याचे कारण?नैसर्गिक वृत्ती,नैसर्गिक जाणीव किंवा उपजत् ज्ञान म्हणा हवं तर. मग ह्या सगळ्या गोष्टी बर्‍याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो. तूम्हाला काय वाटतं? वरील निरिक्षण,तर्क् आणि निष्कर्ष योग्य दिशेने जाताहेत, की त्यात कुठे काही विसंगती,तर्क् दोष आहे?

वाचने 55284 वाचनखूण प्रतिक्रिया 93

पिवळा डांबिस 10/05/2008 - 08:42
मनजी, तुमचं म्हणणं अगदी पटलं. आजवर चूक झाली ती झाली... आजपासून फक्त शाकाहारच घेणार! आपला, पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर 10/05/2008 - 09:13
मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते. काही प्राणी दोन्ही वर्गात मोडणारे असतात. ते शाकाहारही करतात (झाडांची पाने, फळे इ.) तसेच इतर काही प्राणी. अस्वल फळे, मध खाते तसेच मासे किडे-मुंग्याही खाते. माकडाच्या काही जाती ही मांस भक्षण करतात. नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा. (जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.) ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा? माणूस कच्चे मांस खात नाही म्हणून त्याला 'सुळ्यांची' गरज नाही. तो मांस शिजवून मऊ करून, पचायला योग्य अशा प्रकारे बनवून खातो. त्या साठी त्याच्या दाढा 'सुटेबल' असतात. आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा. निरागस बालकासमोरच कशाला, (पोहोचलेल्या) मोठ्या माणसासमोर जरी ठेवले तरी तो पिल्लू खाणार नाही. कारण माणूस जिवंत प्राणी, कच्चे मांस खात नाही. फळे मात्र कच्चीच खाल्ली जातात. पण सफरचंद आणि चिकनकरी समोर ठेवली तर माणूस (मांसाहारी) आधी चिकन करी खाऊन नंतर टीव्ही बघत बघत सफरचंद खाईल आणि तृप्त होईल. मग ह्या सगळ्या गोष्टी बर्‍याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो. मला नाही वाटत. मानवाच्या उत्क्रातीपासूनच तो प्राण्यांच्या शिकारीवर जगत आला आहे. तरी देखिल त्याने इतकी प्रगती केली आहे. विज्ञानातील शोध लावले आहेत. दुसर्‍या ग्रहांवर पोहोचला आहे, मेडिकल सायन्समध्ये, गणितीशास्त्रात, कला क्षेत्रात्, साहित्यक्षेत्रात, पेहरावात, स्थापत्यशास्त्रात अनन्यसाधारण प्रगती केली आहे. आयुर्मान वाढवीले आहे. मांसाहार करून देखिल हे सर्व शक्य झाले आहे मग तो आहार अनसुटेबल कसा? अवांतर :"अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"मिसळली जाते. म्हणजे बायकोच्या धाकात राहून आहार करणारा का?

In reply to by प्रभाकर पेठकर

राजे (verified= न पडताळणी केलेला) 10/05/2008 - 09:51
दोघांचे ही मुद्दे पटले ! उपलब्ध परिस्थीतीने जे अन्न समोर दिले / आले ते खावे ह्या मताचा मी ! जेथे शाकाहार उपलब्ध आहे तेथे मांसाहार ची गरज नाही, पण जेथे शाकाहार शक्य नाही तेथे मांसाहार .... हरकत नसावी. काही माकडे मी मुंग्या खाताना / छोटे मोटे कीडे खाताना खुप वेळा पाहीले आहे व मी माकडाला लहानपणा पासूनच मांसाहारी समजतो. बाकी आपली शारीरीक (मानवाची ) रचना शाकाहार व मांसाहार दोन्ही प्रकारच्या भोजनास उत्तम आहे . राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by प्रभाकर पेठकर

मन 10/05/2008 - 14:04
काही प्राणी दोन्ही वर्गात मोडणारे असतात. त्यांना मिश्राहारी म्हणतात. पण हे प्राणी प्रामुख्याने तिथं पाहायला मिळतात जिथं काही कारणानं त्यांना त्यांचे नैसर्गिक अन्न मिळत नाही. किंवा दुसरेच अन्न दिले जाते. ह्यासाठीच मी मांजराचे पिल्लु आणि मानवाचे बालक ह्यांची तुलना दिली आहे. मी म्हण्तोय की "पर्याय उप्लब्ध असताना,प्राप्त परिस्थितीत मानावाची निवड काय राहील,किंवा काय रहायला हवी , ते पहा." शाकाहाराला "प्रथम पसंती" किंवा "प्रेफरन्स " असणे इष्ट. मानवाच्या उत्क्रातीपासूनच तो प्राण्यांच्या शिकारीवर जगत आला आहे. नाही्ए काही संपुर्ण खरे नाही. माणुस शिकार करु लागला तो प्रामुख्याने हिम युग येउन गेल्यानंतर म्हणजे फार तर बारा ते पंधरा हजार वर्षे झाली असावीत. उत्क्रांतीच्या हिशेबाने हा काल्खंड नगण्य आहे.(तो लाखेक वर्षांच्याही पुढे आहे.) पृथ्वीवर हिम युगात जेव्हा एका एकी अति शीत वातावरण तयार होउन अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, तेव्हा, केवळ नाइलाज म्हणून माणसाने शिकारीस सुरुवात केली. आजही मानव कच्चे मांस फारश्या प्रमाणात खाउ शकत नाही, हे कशाचे प्रमाण आहे? याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. अगदि टोकाची स्थिती गृहित धरुयात. सम्जा एखाद्याला ज्याला मांसाहार अत्यंत प्रिय आहे,अशा व्यक्तिला देखील जर तुम्ही कित्येक दिवस्-वर्षे फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. कारण इथे तुमचे 'सुटेबल' नैसर्गिक अन्न कोणते तेच शरीर मागत असते.तुम्ही त्या नैसर्गिक प्रेरणेस अधिक काळ दाबु शकत नाही. याउलट शाकाहाराची सक्ती करुन एखाद्याला वर्षानुवर्षे ठेवलेतं, तर त्याला फारशी अडचण येणार नाही. ....तरी देखिल त्याने इतकी प्रगती केली आहे. विज्ञानातील शोध लावले आहेत. दुसर्‍या ग्रहांवर पोहोचला आहे, मेडिकल सायन्समध्ये, गणितीशास्त्रात, कला क्षेत्रात्, साहित्यक्षेत्रात, पेहरावात, स्थापत्यशास्त्रात अनन्यसाधारण प्रगती केली आहे. आयुर्मान वाढवीले आहे. मांसाहार खाल्ल्याने विविध विषयात प्रगती होणार नाही असं आम्ही कुठं म्हणतोय? ती तशी होते हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. मात्र तुमच्याकडे उपलब्ध (उत्तर)आयुष्यात कटकटी निर्माण होतात, त्याचे काही अंशी कारण मांसाहारावर भर असणे आहे. ("आम" निर्मिती , ह्रुदय रोग व इतर शारिरिक व्याधी) तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. (कृपया माझा नीलकांत रावांना खाली दिलेला प्रतिसाद वाचा.) बाकी तुम्ही कच्चे मांस खाउ शकत नाही याचे कारण ती तुमची नैसर्गिक बुद्धी नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

प्रभाकर पेठकर 10/05/2008 - 15:45
मी म्हण्तोय की "पर्याय उप्लब्ध असताना,प्राप्त परिस्थितीत मानावाची निवड काय राहील,किंवा काय रहायला हवी , ते पहा." शाकाहाराला "प्रथम पसंती" किंवा "प्रेफरन्स " असणे इष्ट. 'पर्याय उपलब्ध असताना' हे महत्त्वाचे. मांजर दोन्ही खाऊ शकते. माणूस कच्चे मांस खाऊ शकत नाही. म्हण्जे मांजराला तुम्ही दोन्ही पर्याय उपलब्ध करून देता आहात आणि माणसाला सफरचंदाशीवाय पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. ही असमान तुलना झाली. माणुस शिकार करु लागला तो प्रामुख्याने हिम युग येउन गेल्यानंतर म्हणजे फार तर बारा ते पंधरा हजार वर्षे झाली असावीत. उत्क्रांतीच्या हिशेबाने हा काल्खंड नगण्य आहे.(तो लाखेक वर्षांच्याही पुढे आहे.) पृथ्वीवर हिम युगात जेव्हा एका एकी अति शीत वातावरण तयार होउन अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, तेव्हा, केवळ नाइलाज म्हणून माणसाने शिकारीस सुरुवात केली. मान्य. माझे ह्या बाबतीत ज्ञान तुटपुंजे आहे. पण शब्दांवर न जाता आशय लक्षात घ्या. माणसांने बहुतांश शोध मांस खायला लागल्यावर लावले आहेत. मांस, जे तुमच्या मते 'अनसुटेबल' अन्न आहे ते खाऊनच माणसाने प्रगती केली आहे. प्रगती मध्ये बौद्धीक, शारीरिक, मानसिक वाढ अभिप्रेत आहे. ज्या अन्नाच्या सेवनाने माणसाने हे सर्व साध्य केले ते 'अनसुटेबल' कसे? आजही मानव कच्चे मांस फारश्या प्रमाणात खाउ शकत नाही, हे कशाचे प्रमाण आहे? शिजवण्याची प्रक्रिया करून खाल्ले तर ते घातक असते का? आजही तुम्ही-आम्ही बटाटा, फॉवर, वांगी, तांदूळ, गहू, बाजरी, मका, पडव़ळ, दोडकी, गिलकी, सुरण, तोंडली, पालक, हिरवा-लाल माठ, करडई, आंबट चुका, शोपू, डाळी, कडधान्ये, अळू असे अनेक पदार्थ शिजवण्याच्या प्रक्रिये शिवाय खाऊ शकत नाही. तेही सर्व अनसुटेबल मानायचे का? जर प्रक्रिया करून खाण्यासाठी ते सुटेबल असेल तर मांस सुद्धा तसेच प्रक्रिया करून खाण्यासाठी सुटेबल का मानू नये? दुजा भाव का? याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. सम्जा एखाद्याला ज्याला मांसाहार अत्यंत प्रिय आहे,अशा व्यक्तिला देखील जर तुम्ही कित्येक दिवस्-वर्षे फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. गैरसमज आहे. योग्यप्रमाणात खाल्ले तर शरीर जरूर सहन करू शकेल. मात्र प्रमाणा बाहेर सेवन केले तर ते हानिकारकच. मग तो मांसाहार असो वा शाकाहार. याउलट शाकाहाराची सक्ती करुन एखाद्याला वर्षानुवर्षे ठेवलेतं, तर त्याला फारशी अडचण येणार नाही. पण म्हणून शाकाहार हेच एकमेव 'सुटेबल' अन्न आहे ह सिद्ध होत नाही. शाकाहारवरही माणूस जगू शकतो असे फक्त म्हणता येईल. मांसाहार खाल्ल्याने विविध विषयात प्रगती होणार नाही असं आम्ही कुठं म्हणतोय? मांसाहाराला 'अनसुटेबल' असे लेबल लावून तुम्ही कमी लेखता आहात. जर 'अनसुटेबल' अन्न खाऊन माणूस इतकी प्रगती करू शकतो तर ते अन्न असुटेबल कसे? ती तशी होते हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. म्हणजेच मांसाहार हा सुद्धा 'सुटेबल' आहे सुर्यप्रकाशा इतकेच स्वच्छ आहे. मात्र तुमच्याकडे उपलब्ध (उत्तर)आयुष्यात कटकटी निर्माण होतात, त्याचे काही अंशी कारण मांसाहारावर भर असणे आहे. अतिसेवन कुठलेही वाईट. मांसाहार करताना चवीसाठी भरमसाठ खायची सवय असेल तर त्रास हा होणारच. तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. अतिसेवनाने रोगग्रस्त झालेली किती शाकाहारी उदाहरणे दाखवू? आपल्या कडील सर्व भाषकांमध्ये जे ब्राह्मण आहेत किंवा शुद्ध शाकाहारी आहेत ते सर्व व्याधीमुक्त जीवन जगतात असा आपला दावा आहे का? त्यांच्यातही व्याधीग्रस्त तितकेच असतात जितके मांसाहारींमध्ये. अतिसेवन हेच त्या मागिल कारण आहे. (असमतोल आहार हेही एक कारण असू शकते.) बाकी तुम्ही कच्चे मांस खाउ शकत नाही याचे कारण ती तुमची नैसर्गिक बुद्धी नाही. हे वाक्य कळले नाही. नैसर्गिक गरज नाही, नैसर्गिक आवड नाही, नैसर्गिक कल नाही समजू शकते. 'नैसर्गिक बुद्धी' शब्द मला नवीन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मन 10/05/2008 - 16:21
'पर्याय उपलब्ध असताना' हे महत्त्वाचे. मांजर दोन्ही खाऊ शकते. माणूस कच्चे मांस खाऊ शकत नाही. म्हण्जे मांजराला तुम्ही दोन्ही पर्याय उपलब्ध करून देता आहात आणि माणसाला सफरचंदाशीवाय पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही तेच सांगतोय, मानवाला "कच्चे मांस(जिवंत कोंबडी!)" हा पर्याय जरी दिला, तरी तो त्याच्यासाठी पर्याय नसतोच. ही असमान तुलना कुठयं बुवा? दोघांना शेम टु शेम पदार्थच तर दिले आहेत. (कारण आक्खी चर्चाच त्या दोन पदार्थांबद्दल चालु आहे.) लोखंडाचा तुकडा कुठला आणि अस्सल सोन्याचा कुठला हे ओळखायचे(समजा एखाद्या अंध व्यक्तीला हे करायचे आहे.), तर काय होइल? दोन्हीला चुंबका जवळ आणा.जे चुंबका कडे आकृष्ट होते, ते लोखंड हा सरळ सधा "ले मॅन्स लॉजिक" वरुन आलेला उपाय आहे. (किंवा दुसरा उपाय(खात्री करुन घेण्यासाठी), :- दोन्हीला दिर्घ काळ पाण्याच्या सान्निध्यात म्हणजे जिथे लोखंड गंजु शकते, अशा ठिकाणी ठेवा.जे गंजेल तेच सोने. ) ही अशीच साधी सरळ कसोटी मी मांडलिए.त्यात कुठे असमानता आहे? आणि ती असलिच तर असमानता ही""पदार्थाच्या गुणधर्मात" आहे. सोने मुळातच चुंबकाकडे आकृष्ट होत नाही. कारण मुळातच सोने आणि लोखंड ह्यांच्या गुण धर्मात ती अचुकता आहे. याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. मी प्रश्नातच उत्तर दिलय त्याचं.आपण कित्येक फळे, कच्चे कणीस आणि अगदि धान्य सुद्धा कच्चे खाउ शकतों. नव्हे खातोच. (आठवा लुस लुशीत, कवळी कवळी धान्याची कणसे,जी क्वचितच का असेना पण आपण कच्ची खाल्ली आहेत.) (मी हे फक्त शाकाहार आपल्याला कसा योग्य ठरतो, त्यासाथी सांगतोय्.इतर तुम्ही उल्लेख केलेले प्दार्थ शिजवुन खातो, पण "आपण शाकाहार कच्चा खाउ शकतो," हे जीव शास्त्रिय दृष्ट्या कशाचे लक्षण आहे त्याचा विचार करावा ,यासाठी मी ते लिहिलयं.) तो आपल्या वागणुकी तील शिल्लक असलेला पुरावा आहे की शाकाहार शरीरास सुट होतो. पण आपण कुठलेच मांस कच्चे खाउ शकत नाही. गैरसमज आहे. योग्यप्रमाणात खाल्ले तर शरीर जरूर सहन करू शकेल. मात्र प्रमाणा बाहेर सेवन केले तर ते हानिकारकच. मग तो मांसाहार असो वा शाकाहार. का "योग्य" प्रमाणात का खायचं? मांसाहार जर शरीरास इतका उपकारक असेल, तर "फक्त मांसाहार(केवळ कच्चे मांस)" खाणे शक्य असायला हवे.ते तसे नाही, कारण ते शरीरास सुट होत नाही. माणुस प्रदुषित हवा, प्रदुषित पाणी आणि एकुणच प्रदुषित पर्यावरण ह्यात राहुनही करतोच की प्रगती. म्हणजे प्रदुषणाचा कुठला अपायच होत नाही. असं म्हट्ल्या सारखं आहे हे. अपाय होतोच. तो अल्प प्रमाणात पण सातत्याने होतो आणि साठत जातो. जेव्हा तो तसा पुर्ण साठतो, तेव्हाच तो""प्रकट" होतो.तो पर्यंत काही होत नाही म्हणुन आपले मांस खात सुटणे निश्चितच स्लो पोइझनिंग आहे. तुम्ही रस्त्यावरुन १० मिनिटे चक्कर टाकुन आलात आणि मग जर तुम्हाला काहिच त्रास होत नसेल, तर ह्याचा अर्थ असा नाही की रस्त्यावर वायु प्रदुषण ०% आहे. ते आहे, पण फक्त तुमच्या जाणिवेच्या पातळिच्या किंचित खाली आहे.(आणि हाच सर्वात मोठा धोका आहे.!!!) बाकी इथे अतिसेवनाचा मुद्दा पुर्ण गैर्लागु होइल असं मला वाटतं. तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. ह्यासाठी मी निलकांत रावांना (ह्याच चर्चेत)प्रतिसाद दिलाय. तो आपण पाहिलात का? त्याबद्दल आपलं काय मत आहे? "नैसर्गिक बुद्धी" म्हण्जे मला "उपजत बुद्धी","उपजत ज्ञान " म्हणायचे आहे. (जे सहसा प्रौढ मानवाकडे अत्यल्प, प्राण्यांकडे भरपुर आणि मानवाच्य बालकांमध्ये काही प्रमाणात असते असे विज्ञान मानते.) (उप्जत ज्ञानाचे उदाहरणः- पोहणे. वगैरे.) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

प्रभाकर पेठकर 10/05/2008 - 19:28
तेच सांगतोय, मानवाला "कच्चे मांस(जिवंत कोंबडी!)" हा पर्याय जरी दिला, तरी तो त्याच्यासाठी पर्याय नसतोच. ही असमान तुलना कुठयं बुवा? दोघांना शेम टु शेम पदार्थच तर दिले आहेत. मांजरासाठी दोन्ही खाण्यालायक पदार्थ आहेत माणसासाठी कोंबडी प्रक्रियेविना खातायेण्यासारखी नाही. हीच दोघांना दिलेल्या पर्यायातली असमानता. कोल्हा आणि करकोच्याच्या गोष्टी सारखे दोघांनाही बशीतून दूध दिले तर कोल्हा ते पिऊ शकतो, करकोचा नाही. दूध पिण्याची दोघांना समान संधी मिळालेली नाही. (पदार्थ सेम असला तरीही). (किंवा दुसरा उपाय(खात्री करुन घेण्यासाठी), :- दोन्हीला दिर्घ काळ पाण्याच्या सान्निध्यात म्हणजे जिथे लोखंड गंजु शकते, अशा ठिकाणी ठेवा.जे गंजेल तेच सोने. ) ह्यावर मी काहीच मतप्रदर्शन करू शकत नाही. माझे मुद्दे मी मांडले आहेत. त्यावर त्याहून अधिक भाष्य करणे म्हणजे वेळेचा अपव्यय होईल किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. किती? ह्या प्रश्नात 'अत्यल्प' हे उतर आहे. हा संपूर्ण 'आहार' होऊ शकत नाही. का "योग्य" प्रमाणात का खायचं? मांसाहार जर शरीरास इतका उपकारक असेल, तर "फक्त मांसाहार(केवळ कच्चे मांस)" खाणे शक्य असायला हवे.ते तसे नाही, कारण ते शरीरास सुट होत नाही. मांसाहारी माणसांनी फक्त मांसाहारच करावा का? सकाळी उठल्यावर ३-४ अंड्यांचे ऑम्लेट (पाव -पोळी काहीनाही), दुपारच्या जेवणात १-२ किलो कोंबडी (दुसरे तिसरे काहीच खायचे नाही), संध्याकाळी नाश्त्याला ४-५ फिश फ्राय आणि रात्री ए-दिड किलो मटण असा आहार आपल्याला अपेक्षित आहे का? तसे असेल तर आपला वाद मिटलेला आहे. इतका उपकारक मांसाहार शरीराला उपकारक आहे असे मी म्हंटलेले नाही. फक्त तो 'अनसुटेबल' नाही असे म्हंटले आहे. माणुस प्रदुषित हवा, प्रदुषित पाणी आणि एकुणच प्रदुषित पर्यावरण ह्यात राहुनही करतोच की प्रगती. म्हणजे प्रदुषणाचा कुठला अपायच होत नाही. असं म्हट्ल्या सारखं आहे हे. अपाय होतोच. तो अल्प प्रमाणात पण सातत्याने होतो आणि साठत जातो. जेव्हा तो तसा पुर्ण साठतो, तेव्हाच तो""प्रकट" होतो.तो पर्यंत काही होत नाही म्हणुन आपले मांस खात सुटणे निश्चितच स्लो पोइझनिंग आहे. जितकी वर्षे मानव मासाहार करीत आला आहे तितकी वर्षे प्रदुषणाचा सामना करावा लागला तर प्रगती करण्यासाठी माणूस उरणार नाही. मांसाहाराचा आणि प्रदुषणाच्या उदाहरणाचा संबंध पटत नाही. मांसाहाराचा संबंध जगातल्या प्रत्येक वाईटाशी जोडून वाद घालायचा म्हंटले तर मला तरी ते योग्य वाटत नाही. मुळात आपण मासाहार आणि शाकाहार ह्यांची तुलना करीत आहोत. वरील सोने आणि लोखंडाचे उदाहरणही विसंगत आहे. त्यातून 'मांसाहार चांगला आणि शाकाहार वाईट' अशी माझी मते असल्याचा तुम्ही गैरसमज करून घेता आहात. मुळ वादाचा मुद्दा असा की मांसाहार मानवाच्या शरिराला 'अनसुटेबल' आणि शाकाहारच फक्त 'सुटेबल' हा आहे. ह्यावर मी माझी मते मांडली. बाकी इथे अतिसेवनाचा मुद्दा पुर्ण गैर्लागु होइल असं मला वाटतं. का बरे गैरलागू? तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. हा नवीन सुर तुम्ही आळवताहात. तुमच्या मुळ लेखात हा मुद्दा नव्हाता. तिथे मुद्दा होता फक्त शाकाहारच मानवी शरिराला 'सुटेबल' आहे, मांसाहार नाही. इथेच वादाला सुरुवात झाली. तुमच्या वरील वाक्याला मी जरूर समर्थन देईन. शाकाहाराला मी वाईट अजिबात म्हणत नाही. मांसाहार मानवी शरीराला 'अनसुटेबल' आहे असे तुम्ही म्हणू नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

पक्या 10/05/2008 - 23:01
अ़जूनही काही प्रमाणात काही ठिकाणी कच्चे मास खाल्ले जाते. उदा. जपानी लोक काही प्रकारचे मासे कच्चे खातात. सुशी ह्या जगप्रसिध्द डिश मधे कच्चा मासाच वापरतात. बरेच लोक अंडे पण कच्चे खातात. (दूधातून किन्वा तसेच.) (पण माझ्या माहीती प्रमाणे असे कच्चे खाणे योग्य नाही कारण त्यात bacteria ची वाढ होउ शकते. शिजवलेल्या पदार्थात उच्च तापमानामुळे bacteria मरून जातात. ) योग्य प्रमाणात मांसाहार केल्यास ठीक आहे पण अतिरेक नको. मांसाहारात fiber चे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे पोटाच्या व्याधी होउ शकतात (अपचन, बध्द्कोष्ट वगैरे) - पक्या

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा 10/05/2008 - 15:34
विषय वाचुन वाटल की मस्त गरमा गरम व्हेज v/s नॉनव्हेज चर्चा रंगणार. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार. लावणीत रंगतात त्याप्रमाणे सवाल्-जवाबाच्या फड उभा राहाणार . पण मना चा लेख वाचला आणि अगदी डांबिस काकां सारखी अवस्था झाली. मनाचे मुद्दे आम्ही इतके मनाला लावुन घेतले की वाटल की माताय मी पण शाकाहरीच व्हाव क्षण भर. (बायकोला फोन पण करणार होतो, की आज बोंबील नको, शेवग्याच्या शेंगा आणि व्हेज-कलेजी (वांगी हो) आण.) जरा खाली आलो नी पेठकर काकांचा सुंदर प्रतिसाद वाचला. पेठकर काकांनी प्रत्येक मुद्याला छान शब्दांनी(मुद्देसुद) उत्तर देउन, आमचं परत मतपरिवर्तन केल. आणि आम्ही परत मांसाहार करण्यास मोकळे झालो. धाकाहारी प्राण्याच्या आहारात.......... म्हणजे बायकोच्या धाकात राहून आहार करणारा का? काका छप्पर फाडके =)) =)) काकांमुळे माझा हॅमलेट होता होता राहिला. (आवांतरः हॅमलेट वरुन ऑम्लेट आठवल, चला नाष्ट्याला काय करायचे तो प्रश्न्न सुटला. नाहीतरी अंड दोन्ही वर्गात मोडत. शाकाहरी भी खुष, मांसाहारी भी खुष और हम भी ;) )

In reply to by गणपा

मन 10/05/2008 - 15:44
मी पेठकर काका आणि नीलकांत ह्यांच्या प्रतिसादांना उत्तर देताना काही मुद्दे मांडलेत. ते पाहिले सार्‍यांनी , तर बर होइल.... आपण ते पाहिलेत का? (मी शाकाहारी च्या ऐवजी 'धाकाहारी' लिवलं हाय. पन त्ये विवाहित पुरुषांना लयीच लागु पडतय.:-) ) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वेताळ 10/05/2008 - 09:44
तस बघायला गेले तर आम्ही पण ज्यावेळी कोंबडीचा उतारा तिकाटण्यावर ठेवा म्हणुन सांगतो त्यावेळी जिवंत कोंबडी आम्हाला अभिप्रेत नसते.तर शिजवलेली कोंबडी असा अर्थ लोकानी घ्यावा.बाकी सुज्ञ लोकाना ज्यादा सांगण्याची गरज नाही. वि.सु.- उतारयात फक्त कोंबडीच देउ नका, बरोबर चपाती,भात,सुक्के व लिंबु पण ठेवा.आम्ही मिश्रहारी आहोत. आपला (उतारयाची वाट पाहणारा) वेताळ.

In reply to by वेताळ

पिवळा डांबिस 10/05/2008 - 10:08
मेल्या वेतोबा, तुकां म्हातारचळ लागलोसां!! तुका आम्ही सांगूचा म्हणजे ल्हानतोंडात मोठो घास होतलो पण मेल्या, ह्यां चपाती, भात, लिंबू काय मागतंस? आंवशीक खांवक व्हरान! अरे वेताळ म्हणजे आमच्या भूतगणात सर्वश्रेष्ठ रे!! आणि मेल्या तू हंयसर चपाती-भात मागतंस!! त्यापेक्षा आमी पिवळो डांबिस बरे रे!! नेत्याविना निराश, पिवळो डांबिस

In reply to by वेताळ

प्रभाकर पेठकर 10/05/2008 - 10:36
आम्ही मिश्रहारी आहोत. 'मिश्रहारी', नेमका हाच शब्द मला आठवत नव्हता. मानव हा शाकाहारी, मांसाहारी नाही तर 'मिश्रहारी' आहे. त्यामुळे काय सुटेबल आणि काय अनसुटेबल हा प्रश्नच उद्भवत नाही.

नीलकांत 10/05/2008 - 10:03
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. ) त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा. ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
ह्याच नियमाने आपण मांसाहार सोडायचा तर मला शंका आहे की उद्या आमच्या अधोवस्त्रांबद्दल तर तुम्ही शंका घेणार नाही ना? ;) अहो साहेब ह्या निसर्गातील कित्येक गोष्टी मानवाने आपल्याला नैसर्गीक अनुकुल नसल्या तरी त्यावर काही प्रक्रिया अथवा संस्कार करून त्या आपल्याला योग्य अश्या स्वरूपात रुपांतरीत करून त्याचा उपभोग घेतला आहे - घेतो आहे. आता कुठला नियम बघायचा ते तुम्ही ठरवा, नैसर्गीक न्यायाने बघायचे तर जो बलवान आहे तोच टिकणार. मानुस त्यात वर आहे. तो त्याला अनुकुल असे नियम बनवेल. जसं जंगलात सिंह करतो. त्याला अनुकुल अशी त्याची जीवनशैली असते. त्याला हवं त्या ओढ्यावर तो पाणी पितो. हवं ते भक्ष्य तो मारतो. तो त्याच्या खाण्याच्या नैसर्गीक शैलीव्यतिरिक्त काही खात नाही कारण त्याची ती क्षमता नसावी. मानवी मुल्यांचा विचार केला तर मांस हे अतिशय समृध्द अन्न आहे. जे की जगातल्या सर्व भागात सहज उपलब्ध आहे. मांसाहाराला जे पर्यायी अन्न म्हणून सांगीतल्या जातं ते जगात सर्वत्र उपलब्ध नाहीये. नैसर्गीक अवस्थेत मानुस कच्च मांस खात होता. आपल्या शरीराला भाजलेलं मांस अनुकुल आहे हे लक्षात आल्यावर त्याने ते भाजणं सुरू केलं. त्याचा हेतू जगण्यासाठी खाणं हा होता आणि आता तो शिजवून खातो. त्यात वेगवेगळे मसाले आणि पध्दती मिसळून तो त्या अन्नांचं स्वादिष्ट रुचकर भोजनात रुपांतर करतो आणि आमच्या सारखे पामर त्याला पुर्णब्रम्हं म्हणून सेवन करतात. असो. एक साधा विचार करा जगात समुद्राच्या किनारी राहणार्‍या लोकांनी मासे खायचं बंद केलं तर आपण त्याला पर्यायी अन्न पुरवू शकू का? मला वाटतं की शाकाहार मानसाचा नैसर्गीक आहार असेलही मात्र आजच्या उन्नत अवस्थेत मानसाने जसं इतर कित्येक बाबींवर आपल्याला अनुकुल संस्कार केले व हवे असलेले अनुकुल वातावरण तयार करून तो राहतो आहे त्यानुसार आहारात हा साधा बदल खुप क्रांतीकारक आहे असं मला वाटत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

मन 10/05/2008 - 13:26
अधोवस्त्रांबद्दल तर तुम्ही शंका घेणार नाही ना? :-)) :-) (अहो, त्याहिशेबाने खर्‍या "नैसर्गिक" अवस्थेत बॉलिवूड चाललेच आहे, माझ्या उपदेशाशिवाय! ;-) ) पण आता जरा मुद्द्याचं:- एक साधा विचार करा जगात समुद्राच्या किनारी राहणार्‍या लोकांनी मासे खायचं बंद केलं तर आपण त्याला पर्यायी अन्न पुरवू शकू का? हो. हे तर आहेच. जगातील आजची संपुर्ण मानवी लोकसंख्या १००% शाकाहारी राहणे शक्य नाही. कारण तेव्हढे (निव्वळ शाकाहारी)अन्न उपलब्ध नाही हे कटु वास्तव आहे.ह्यामुळेच विधान लिहिताना मी लिहिलय ते:- "ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा." असं लिहिलयं. ईतर कुणाच्या फायद्यासाठी नव्हे तर स्वतः च्या तब्येतीस अनुकुल असल्यामुळे शक्य तेव्हा शाकाहाराचा अन्नात समावेश असावा, असं मला वाटतं. (वाचा:- डॉ. अभय बंग ह्यांचे "माझा साक्षात्कारी हृदयरोग") (ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी:- डॉ अभय बंग हे फिजिशियन ह्या अर्थाने "डॉक्टर" आहेत. सध्या चांदा,भंडारा,मेळघाट वा तत्सम जिल्ह्यांत त्यांचे समाजकार्य कित्येंकांना प्रेरणा/आदर्श ठरले आहे.) शिवाय, आयुर्वेदात "आहार्-विचार" करताना स्पष्ट पणे उल्लेख आहे तो असा:- "अन्नातील सर्व निरुप्योगी भाग विष्ठेतुन न जाता काही प्रमाणात शरीरात शिल्लक राहु शकतो. आयुर्वेदात ह्याला म्हणतात "आम". आम पुढे शारिरिक द्रव्यांसोबत मिसळुन विषारी/घातक सिद्ध होउ शकतो. " "आमा" ची सर्वाधिक निर्मिती ही प्राणिज अन्नाने होते, हे आयुर्वेदात सांगितले आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे

ईश्वरी 10/05/2008 - 14:31
वरील काही मुद्दे पटले (मनच्या लेखातील). पण तरीही काही वेळेस नुसतेच जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर पोषणमूल्यांची गरज म्हणून ही मांसाहार केला जातो. माझ्या परिचितांचे अनुभव देत आहे. माझी एक अमेरिकन मैत्रिण सान्गत होती..तिने व तिच्या नवरयाने काही महीने मांसाहार पूर्णपणे बंद केला होता. पण नंतर त्याना आहारात proteins ची कमतरता भासू लागली. (अमेरिकनान्च्या जेवणात आपल्यासारख्या डाळी नसतात उदा. मूग, तूर्, हरभरा वगैरे . इतर काही प्रकारचे beans ते खातात पण अगदी रोज नाही ..कधीतरीच.) त्यामुळे त्यांनी परत मांसाहार घेण्यास सुरवात केली. माझ्या अजून एका (देशी) मैत्रिणीच्या मुलीला मूग आणि तूर सोड्ल्यास इतर डाळींची ऍलर्जी आहे. मुलगी लहान असल्याने रोज एकाच प्रकारचे पदार्थ खाण्यास नकार देते. मध्यंतरी काही कारणास्तव डाक्टरी चेकअप झाल्यावर मुलीला आहारात proteins कमी पडत आहे हे समजले. त्यामुळे मैत्रिणी च्या घरी सर्व शाकाहारी असले तरी मुलीसाठी त्यांनी चिकन व फिश चे पदार्थ बनवण्यास सुरवात केली. अजुन एका परिचितांचे एक छोटेसे औपरेशन झाल्यावर डाक्टरांनी चिकन सूप भरपूर प्या असे सान्गितले होते. कारण चिकन सूप मध्ये protein भरपूर असते. आणि protein आजारपणात शक्ती भरून येण्यासाठी व शरीरावर काही जखम असेल तर ती लवकर भरून येण्यासाठी मदत करते. -- ईश्वरी

In reply to by ईश्वरी

मन 10/05/2008 - 14:39
ह्या स्थितीत मांसाची पोषक मुल्य म्हणुन गरज कुणीही नाकारु शकत नाही. म्हणुनच तर शाकाहार म्हण्जे "मुख्य अन्न" असं मी काळजी पुर्वक म्हटलय. मुख्य अन्नासोबत पूरक पदार्थ गरज्/नाइलाज म्हणुन घ्यायला अशा परिस्थितीत काहिच हरकत नाही. पण त्याचे अधिक सेवन करणे योग्य नाही,असं वाटतय. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

शितल 10/05/2008 - 15:55
छान प्रतिक्रीया आणि जोरदार मत मा॑डणी. शाकाहार की मा॑साहार हा ज्याचा त्या॑नी ठरवावा, जे पचेल आणि रुचेल ते खाण्यास हरकत नसावी.
माणसाला चालतात. दोन्ही आहारांमधून त्याच्या शरीराच्या वाढीसाठी पोषणासाठी लागणार्‍या विशिष्ठ गोष्टी त्याला प्राप्त होतात. दोन्ही प्रकारचे अन्न हे नेहेमीच्या आहाराचा भाग म्हणून सेवन करताना विशिष्ठ प्रकारे प्रक्रिया करुन/शिजवून घेणे इष्ट असते. पूर्वी कच्चे, त्यापुढच्या काळात भाजलेले, अजून प्रगतीनंतर भाजून मीठ-मीरपूड टाकलेले, आधुनिक काळात विविध मसाले घालून चविष्ट बनवलेले ह्या क्रमाने मांसाहारात (आणि शाकाहारात सुध्दा) प्रगती होत गेली हे मान्य व्हावे. भौगोलिक परिस्थितीनुसार आहार विहारात बदल होत गेले/जातात आणि ते त्या परिस्थितीला टिकून राहण्यासाठी आवश्यक ठरतात. जसे किनारपट्टीवरील माणसे जलचरांचा समावेश आहारात करणारच. अतिशीत प्रदेशात (जसे टुंड्रा) एस्कीमो हे प्रामुख्याने सील, वॉलरस, मासे ह्यांना खाणार. कारण भरपूर प्रोटीन्सची नैसर्गिक गरज दुसरे काही भागवू शकतच नाही. त्याव्यतिरिक्त तुम्ही जर सर्वसाधारण प्रदेशात रहात असलात, जसे महाराष्ट्रासारखे ठिकाण जिथे फार थंड किंवा वाळवंटी प्रदेशासारखे अतिउष्ण नाही तिथे योग्य प्रमाणात मिश्राहार चालू शकेल/चालतो. मना, तू जे आयुर्वेदाचे उदाहरण दिले आहेस - "आमा" ची सर्वाधिक निर्मिती ही प्राणिज अन्नाने होते, हे आयुर्वेदात सांगितले आहे. हे अयोग्य आहे. कारण आमाची मुख्य निर्मिती ही न पचलेल्या अन्नाने होते, त्यात शाकाहार की मांसाहार हा मुद्दा गौण. कडकडून भूक न लागता केवळ वेळ झाली म्हणून जेवणे, रात्री उशिरा भरपेट जेवणे, सतत तेलकट, तळलेले खाणे, व्यायामाचा अभाव असे संपूर्ण शाकाहार ठेवून केलेत तरी हृदयमित्र प्रतिष्ठानला आणखी एक हृदयरोगी देण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही! त्याच आयुर्वेदाने "मटणाचे सूप हे अत्यंत ताकदवान असते आणि विशेषतः आजारी किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला जरुर पाजावे" असेही सांगितले आहे. तेव्हा भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक अन्नाचे स्रोत, ऊर्जेची एकूण गरज, ह्या सगळ्याचा तोल साधत केलेला मिश्राहार हा माणसाला घातक नाही. चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रभाकर पेठकर 11/05/2008 - 09:08
धन्यवाद चतुरंग साहेब, तेव्हा भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक अन्नाचे स्रोत, ऊर्जेची एकूण गरज, ह्या सगळ्याचा तोल साधत केलेला मिश्राहार हा माणसाला घातक नाही. मलाही हेच म्हणायचे आहे. मांसाहार इतका घातक (अनसुटेबल) असता तर माणसाचे आयुर्मान वाढले नसते. मानव जात भूतलावर टिकून राहीली नसती. शाकाहार 'चांगला' की 'वाईट' ह्यावर मी तो 'चांगला' असेच मत देईन. पण ते माझे वैयक्तिक मत झाले. पण 'सुटेबल' आणि 'अनसुटेबल' असा फरक नाही करता येणार असे मला म्हणायचे आहे. कडकडून भूक न लागता केवळ वेळ झाली म्हणून जेवणे, रात्री उशिरा भरपेट जेवणे, सतत तेलकट, तळलेले खाणे, व्यायामाचा अभाव असे संपूर्ण शाकाहार ठेवून केलेत तरी हृदयमित्र प्रतिष्ठानला आणखी एक हृदयरोगी देण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही! एक्झॅटली. अतिसेवन, चुकीच्या जीवन पद्धती वगैरे कारणांनी शाकाहारी माणसेही गंभीर आजारांना आमंत्रण देतातच की. नाहीतर सर्व हॉस्पिटल्स फक्त मांसाहारी रुग्णांनीच भरलेली असती. असो.

विसोबा खेचर 11/05/2008 - 09:28
मी खाण्यात शाकाहार/मांसाहार असा भेदभाव करत नाही. फार विचार करत न बसता जे आवडतं ते चापून खातो, मग तो शाकाहार असो की मांसाहार! फार विचार करत बसलं की खाणं अंगी लागत नाही! :) आणि मी माझ्या पैशांनी खाणार, शिवाय खाण्यामुळे जे काही उपाय/अपाय होतील ते मला होणार, मग च्यामारी जगाची फिकीर मी करूच कशाला? :) आज रविवार आहे. आज मस्तपैकी मटणवडे झोडायचा बेत आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस 11/05/2008 - 09:38
शाब्बास!! आज मस्तपैकी मटणवडे झोडायचा बेत आहे! आणि असं बघा, मटण मांसाहारी आणि वडे शाकाहारी! त्यामुळे दोन्ही मतदारसंघ खूष!! तात्या, उगाच नाही तुम्ही संतपदाला पोहोचलांत!!

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 11/05/2008 - 09:39
आणि असं बघा, मटण मांसाहारी आणि वडे शाकाहारी! त्यामुळे दोन्ही मतदारसंघ खूष!! हा हा हा! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर 11/05/2008 - 10:21
आणि मी माझ्या पैशांनी खाणार, शिवाय खाण्यामुळे जे काही उपाय/अपाय होतील ते मला होणार, मग च्यामारी जगाची फिकीर मी करूच कशाला? ह्हा:..ह्हा:.. ह्हा:... तात्या, तुमच्या ह्या प्रतिक्रियेने आम्हा वाद घालणार्‍यांना साफ वेड्यात काढलेत.

शिंगाड्या 11/05/2008 - 18:47
मुद्देसुद आणि अभ्यासपुर्ण लेखन..पटले..अर्थात काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे

मन 15/05/2008 - 19:23
पि.डा.,पेठकर काका, राजे,नीलकांत,गणपा,पक्या,शीतल ताइ, ईश्वरी ताई,शिंगाड्या राव, चतुरंग भौ आणी हो तात्या सुद्धा. सगळ्यांचे आभार मानतोय दखल घेतल्याबद्दल. काही नवीन मुद्दे दिलेत आपण, काही अहेत त्या मुद्द्यांना उत्तरं दिलीत. यथाशक्ती आपल्या प्रतिसादांना उत्तर् दिलीत.(आणि हा प्रतिसाद उशीरा दिल्या बद्दल दिलगीर आहे.) बाकी कोंबडी-बालक आणि मांजर ह्या उदाहरणाबद्दलः- कोंबडीच्या पिलाला न खाणे ही बालकाचे कृती आहे, पण त्यावरुन व्यक्तिगणिक निष्कर्श बदलताहेत.आणि हे स्वाभाविक् आहे. एकाच घटनेबद्दल आपले दृष्टिकोन वेगवेगळे असु शकतात, निष्कर्श वेगळे असु शकतात. (म्हनजे, बालक मोठे झाल्यावर खाइल्/खाणार नाही वगैरे.) आपल्या निष्कर्शाशी सहमत् नाही,पण नवीन मतं वाचायला मिळाली, याचा आनंद आहे. आपली मत, दृष्टिकोन् वाचले.काही पटले. माझ्या पुरता मी आता समारोप् करतोय. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

मन 23/05/2008 - 22:26
मित्रहो, आत्ताच फॅमिली डॉक्टरचा ताजा अंक वाचला. (माहित नसणार्‍या व्यक्तिंसाठी:- फॅमिली डोक्टर ही आरोग्य विषयक पुरवणी दै.सकाळ मध्ये प्रकाशित होते. प्रस्तुत लेखक/संपादक ह्यांचा आयुर्वेदावर मोठाच अधिकार आहे. ) त्यात ही माहिती मिळाली आहे. पथ्यकल्पना ..... ......... मांसाहार वर्ज्य नसणाऱ्या व्यक्‍तींसाठी पथ्यकल्पनेत मांसरसाचा उल्लेख केलेला आहे. पाकपात्रे घृतं दद्यात्‌ तैलञ्च तदभावतः । तत्र हिंगु हरिद्रां च भर्जयेत्‌ तदनन्तरम्‌ ।। छागादेरास्थिरहितं मांसं तत्खण्डितं ध्रुवम्‌ । धौतं निर्गालितं तस्मिन्धृते तद्‌ भर्जयेत्‌ शनैः ।। ... भावप्रकाश मांस शिजविण्याच्या भांड्यात तूप किंवा तेल घ्यावे. तूप गरम झाले की त्यात हिंग व हळद टाकून परतावी. मग त्यात हाडे काढलेले बकरी वगैरे प्राण्यांचे मांस टाकावे. जरासे परतले की पुरेसे पाणी टाकून शिजवावे. मांस व्यवस्थित शिजले की त्यात जिरे, मोहरी, धणे, सुंठ, हिंग, हळद वगैरे मसाल्याची द्रव्ये टाकून पातळ मांसरस तयार करावा. मांसाहारी व्यक्‍तींना असा मांसरस घेता येतो. मांसरस वात-पित्तशामक, ताकद वाढविणारा असतो. हाडे सांधण्यास मदत करतो, क्षय-ज्वर वगैरे रोगांनी कृश झालेल्या व्यक्‍तींसाठी ताकद देणारा असतो. मांसरसाप्रमाणे "वेसवार' हाही एक प्रकार वर्णन केलेला आहे. मांसं निरस्थि सुस्विन्नं पुनर्दृषदि पेषितम्‌ । पिप्पली शुण्ठी मरिचगुडसर्पिः समान्वितम्‌ ।। ऐकध्यं पाचयेत्सम्यक्‌ वेसवार इति स्मृतः । ... सुश्रुत सूत्रस्थान हाडे काढून टाकलेले मांस पाण्यासह व्यवस्थित शिजवावे. शिजविलेले मांस योग्य साधनांच्या साहाय्याने वाटून बारीक करावे. भांड्यामध्ये तूप, मिरी, सुंठ, पिंपळी, मीठ, गूळ वगैरे द्रव्ये पुरेशा पाण्यासह पुन्हा सिद्ध करावे. द्रवस्वरूपाचा मांसरस तयार झाला की उतरवून वापरावा. यालाच वेसवार असेही म्हणतात. हा वेसवार पचायला जड, स्निग्ध गुणाचा, ताकद देणारा व वातामुळे होणाऱ्या वेदनांचे शमन करणारा असतो. या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा की मांसरस, वेसवार वगैरे कल्पना बनविताना वापरायचे मांस चांगल्या प्रतीचे असायला हवे. प्राण्याचे वजन लवकर वाढावे म्हणून त्यांना इंजेक्‍शन्स, औषधे वगैरे दिलेली नाहीत याची खात्री करून घ्यावी. अन्यथा मांसरसाच्या फायद्याऐवजी या औषधांचा दुष्परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. - डॉ. श्री बालाजी तांबे विषयाशी संबंधित वाटली, म्हणुन इथे टाकतोय. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' खादाड अमेरिकनांचा निषेध्,निषेध, निषेध. )

In reply to by मन

विसोबा खेचर 24/05/2008 - 01:38
अरे लेको आम्ही पूर्वापार मांसाहार करत आहोत! हा लेकाचा बालाजी तांबे आम्हाला मांस असं खा नी तसं खा असं शिकवणारा कोण लागून गेला आहे? :) मनोबा, त्या तांब्याला सांग की मला ओल्या जवळ्याची चटणी करून खायची आहे. कशी बनवायची ते सांग म्हणावं! :) तात्या.

ईश्वरी 24/05/2008 - 01:31
फॅमिली डॉक्टर मधील माहिती बद्द्ल धन्यवाद. छान आहे माहिती...उपयुक्त आहे. मी अधूनमधून वाचते ती पुरवणी पण नेहमीच वेळ होत नाही. आणि सकाळ वर मागचे अंक ही वाचायला मिळत नाही. त्यामुळे बरं झाल ही माहिती तुम्ही इथे टाकली. ईश्वरी

नीलकांत 24/05/2008 - 18:55
चरक संहितेत अनेक प्रकारच्या आहाराची चर्चा केलेली आहे. त्यात मांसाहाराचा सुध्दा उल्लेख आहे. कुठल्या प्राण्याचं मांस कसं असतं. कश्यासाठी उपयुक्त आहे आदी सगळी माहिती त्यात आहे. आश्चर्य वाटेल पण हा मांसरस खुप आजारांत आणि काही वेळातर शक्तीवर्धक म्हणून सुध्दा घेण्यास सांगीतलेला आहे. अजामांसरस वाजीकरणासाठी चांगला आहे असं म्हणतात. ;) असो. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदी गोपाळ 02/07/2012 - 01:20
नुसता मांसाहारच नव्हे तर त्यासोबत कोणत्या ऋतूत कोणते मद्य (मोहाचे, उसाचे इ.इ.) कोणत्या पात्रातून म्हणजे काशाचे/चांदीचे/मृत्तीकेचे इ. घ्यावे तेही लिहिलेले आहे बरे! अजामांसरस = मटन सूप. (ज्ञानानंदी) गोपाळ

In reply to by आनंदी गोपाळ

सुनील 02/07/2012 - 21:20
हॅ हॅ हॅ आमचे पूर्वज हुशार खरे ;)

चित्रगुप्त 01/07/2012 - 19:27
खास शाकाहारी लोकांसाठी एक सल्ला: जगातले सर्व लोक जर शाकाहारी झाले, तर आज ज्या भाज्या उदाहरणार्थ साठ रुपये किलो मिळत आहेत, त्या सहा हजार रुपये किलो मिळतील, आणि उपासमारीची पाळी येइल. तस्मात शाकाहार्‍यांनी शाकाहार घेत रहावे आणि मासाहार्‍यांनी मासाहार. उगीच कुणी कसला प्रचार करत बसू नये, हेच बरे. (आम्ही स्वतः शाकाहारी, म्हणून उपासमारीची जास्त काळजी) :)

In reply to by चित्रगुप्त

३_१४ विक्षिप्त अदिती 02/07/2012 - 00:48
फसवं आर्ग्युमेंटः http://www.npr.org/blogs/thesalt/2012/06/27/155527365/visualizing-a-nation-of-meat-eaters?utm_source=nprpins&utm_medium=facebook&utm_campaign=20120627 http://www.vegsoc.org/page.aspx?pid=520 थोडक्यात शाकाहाराशी तुलना करता समान कॅलर्‍या मांसाहारी जेवणातू मिळवण्यासाठी अधिक पाणी, जमीन, वेळ खर्च होतो. चित्रगुप्त काकांनी व्यक्त केलेली भीती निराधार आहे. उलट अधिकाधिक लोकांनी मांसाहार सोडल्यास कदाचित जंगलं वाढायला अधिक जागा उपलब्ध होईल. जगाचं भलं करायचं असल्यास शाकाहारी व्हा. हेडॉनिस्ट मांसाहारी असाल तर सध्यातरी जगाचं भलं करण्याची वेळ आलेली नाही. (सवयीने शाकाहारी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 02/07/2012 - 01:37
आदिती ताई, अ‍ॅनिमल प्रोटीन व प्लांट प्रोटिन प्रत्येकी १ किलो खाल्ले असता, सुमारे ९९% अ‍ॅनिमल प्रोटीन शरीर वापरात घेते, हेच प्रमाण प्लांट प्रोटीनमध्ये ४०% चे आसपास असते. आता, यातील विष्ठेद्वारे वाया जाणार्‍या भागाचा हिशोब पाणी जमीन व वेळेत कसा मोजणार? तुमच्या शरिराने डायजेशन व रिबिल्डिंग साठी खर्च केलेल्या उर्जा, एन्झाईम्स, व टाईमचा हिशोब कुठे? अ‍ॅनिमल फॅटमधून मिळणारी कॅलरी अन स्टार्च पासून मिळणारी कॅलरी यातील क्वालिटेटिव्ह व क्वांटीटेटिव्ह फरक किति? खाण्यासाठी मांस "तयार करणारे" प्राणी ज्या वनस्पती भक्षण करतात त्या प्रमाणे तुम्ही खाऊ शकत नाही. पालेभाज्यांतील सेल्युलोजही 'फायबर' म्हणून तसेच मानवी शरीराबाहेर फेकले जाते. तुम्ही आम्ही वनस्पतींचे फार्फार कमी भाग खाऊ शकतो, ज्यात बहुतांशी फक्त 'स्टोअर्ड फूड' तेही वनस्पतींनी त्यांच्या भ्रूणासाठी (बीजातील साठविलेले) वा आमिष म्हणून वापरलेले (बीज पसरविण्यासाठी वाहकांना आमिष म्हणून फळाचा गर) इतकेच असते. कणसातून दाणे काढून घेतल्यावर उदा. बाजरीच्या झाडातून फेकून दिलेल्या भागाचा हिशोब कुठे आहे??? प्राणी मारून खाल्ला अन धान्य खाल्ले, वेस्टेज परसेंटेज किती? मनुष्य प्राणी मिश्राहारी आहे. तशी त्याच्या शरीराची जडणघडण आहे. तुम्हाला 'आवडत नाही' म्हणून मांसाहार नको असे म्हणा. मी सहमत. पण ही असली आर्ग्युमेंट्स बिनबुडाची आहेत, हे कितीही वेळ वाद घालून सिद्ध करून देईन असे म्हणतो :) (भांडकुदळ) आनंदी गोपाळ संपादनः
उलट अधिकाधिक लोकांनी मांसाहार सोडल्यास कदाचित जंगलं वाढायला अधिक जागा उपलब्ध होईल.
पुन्हा दुसरी लॉजिकल चूक. जंगलातील प्राणी मारून खाण्याचे दिवस संपलेत कधीच. आजच्या घडीला शाकाहार फोफावला, तर शेतीसाठी जास्तच जंगले तोडावी लागतील.. शेती कमी करायची असेल, तर मांसाहारी व्हा. जगाच्या भल्यासाठी आता समुद्राची शेती करायची वेळ आली आहे. मांस नको तर मासे-आहारी तरी व्हाच असे माझे म्हणने आहे. जय प्लँक्टन्स : द बिगेस्ट प्लांट मास ऑन अर्थ!

In reply to by आनंदी गोपाळ

३_१४ विक्षिप्त अदिती 02/07/2012 - 02:15
उर्जा, एन्झाईम्स, व टाईमचा हिशोब कुठे?
या सगळ्या गोष्टी पुन्हा वनस्पतीजन्य आहारातून मानवाचं शरीर बनवणार. शरीर ज्या गोष्टी नाकारतं त्या पुन्हा काहीबाही करून जाळल्यास (उदा: बायोगॅस, खतं इ.) पुन्हा परिणाम एकच होणार. पृथ्वीच्या जीवावरच आपण आपलं आयुष्य जगणार. प्राणिजन्य आहारातून समप्रमाणात ऊर्जा मिळवण्यासाठी बर्‍याच अधिक प्रमाणात पाणी, जमीन, वेळ खर्च होतात असा दावा आहे. (यात कुठेही संपूर्ण पोषण याबद्दल चर्चा नाही.) सर्व लोक शाकाहारी झाल्यास सर्वांना पुरेसं अन्न मिळणार नाही असा जो दावा (का कोण जाणे!) केला जातो तो बिनबुडाचा आहे असा दावा आहे. या गणितात सहजच दिसणार्‍या अडचणीही मीच सांगते. पोषण मूल्य हा फार कटकटीचा भाग आहे. त्याशिवाय शेतीचं अर्थशास्त्र. कपास, नीळ, कॉफी, अफू वगैरे पदार्थ अन्न म्हणून खाल्ले जात नाहीत, त्यांचीही शेती होते. नगदी पिकं काढण्याकडे शेतकर्‍यांचा ओढा असतो. पिकाला पुरेसा भाव मिळाला नाही म्हणून पीक जाळलं जातं. इ. त्याशिवाय शेतीखालचा जमिनीचा भाग कमी झाल्यास, तिथे झाडं लावल्यासही पर्यावरणावर प्रचंड मोठा फरक दिसणार नाही. पर्यावरण म्हणजे हरित वायू परिणामामुळे होणारा परिणाम यासंदर्भात बघितल्यास, हवा 'शुद्ध' करण्याचं काम समुद्री जीव झाडांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात करतात. आत्ता आहे त्यापेक्षा १०% झाडं अधिक झाल्यास फार फरक पडेलच असं नाही. (या गणिताचे स्रोत शोधण्यासाठी टैम्प्लीस.) त्याशिवाय मी सुरूवातीला केलेल्या विधानातल्या अधिक त्रुटी दाखवल्यास आवडेल. दुसर्‍या बाजूने मांसाहारातूनच मिळणारे काही आवश्यक पोषण (ब जीवनसत्त्वाचे काही प्रकार?) शाकाहारी लोकांना मिळत नाही किंवा पुरेसं मिळत नाही अशीही अडचण आहेच. शाकाहार्‍यांच्या आहारात दूध आणि अंडीही मोजलेली नाहीत. व्यक्तिशः माझा कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या आहाराला विरोध नाही. मी स्वतः शक्यतोवर शाकाहारी असले तरी माझ्याही अनेक चवी-ढवी आहेत. सगळ्याच भाज्या, फळं मला अगदी मनापासून आवडतात असं नाही. उलट आवडतं ते काहीही मिळालं नाही/मिळत नाही तेव्हा उपलब्ध असेल ते (बीफ्/पोर्क) आणि शैक्षणिक भूक म्हणून ससा, मोर, बेकन, सॉसेजेस, कोंबडी, हरीण, बकरा खाल्ले आहेत.

In reply to by आनंदी गोपाळ

३_१४ विक्षिप्त अदिती 02/07/2012 - 23:29
तुमचं संपादन थोडं उशीरा पाहिलं. पण सध्या टैम्प्लीस. --- टैम्प्लीस सोडून ---
जंगलातील प्राणी मारून खाण्याचे दिवस संपलेत कधीच. आजच्या घडीला शाकाहार फोफावला, तर शेतीसाठी जास्तच जंगले तोडावी लागतील.. शेती कमी करायची असेल, तर मांसाहारी व्हा.
जंगलातले प्राणी पुरे पडण्याएवढी लोकसंख्या कमी होती तेव्हा ही अडचण नव्हतीच. आता (गेली अनेक शतकं) मांसाहारासाठीही पद्धतशीर शेती होते. १. या (प्राणी-)शेतीसाठी मोकळी जागा लागते. २. या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी आधी मुळात गवत, संत्र्याच्या साली, इ.इ. अनेक गोष्टी लागतात. कोंबड्यांना अ आणि ड जीवनसत्त्व टोचली जातात किंवा कोंबड्यांना टिपण्यासाठी बाहेर सोडलं जातं, पुन्हा अधिक जागेची आवश्यकता आहे. इतर सर्वच प्राण्यांच्या बाबतीत काही ना काही घटक येतातच. या प्राण्यांना पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी पाणी लागतं. या प्राण्यांच्या अन्नासाठी पाण्याची आवश्यकता असते. हे प्राणी जंगलात जाऊन खाऊन परत कत्तलखान्यात जात नाहीत. ३. मांसाहार मार्केटात येतो तो ही बराच प्रोसेस होऊन येतो. (भारतातलं मांसाचं मार्केट खूपच कमी आहे.) या प्रोसेसिंगसाठी जागा आणि चिक्कार प्रमाणात ऊर्जा+पाणी वापरले जातात. त्याची जागा धान्य, भाज्या, फळांनी घेतल्यास पाणी, जागा आणि ऊर्जा नक्कीच कमी वापरले जातील. थोडक्यात सूर्याकडून येणारी ऊर्जा आणि पृथ्वीकडून येणारं पाणी आणि इन/ऑरगॅनिक वस्तूमान झाडांवाटे माणसाच्या शरीरात येण्याऐवजी झाडांकडून प्राण्यांकडे आणि प्राण्यांकडून माणसाकडे तर ती क्रिया अधिक इन-एफिशियंट होणार. (यात पुन्हा आकडे देता येतील, पण थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम, वाढती एंट्रॉपी, परपेच्युअल मशीन किंवा १००% एफिशियन्सी असणारं मशीन बनवणं अशक्य असणं वगैरे पहाता यात आकडे देण्याची फार आवश्यकता नसावी.) अन्न साखळीत कोणताही प्राणी जेवढा वर चढणार तेवढं मूळ स्रोताकडून ऊर्जा मिळवणं इन-एफिशियंट (मराठी) होणार. मूळ स्रोत - सूर्य आणि पृथ्वी. सर्वांना मिळणारी ऊर्जा शेवटी तिथूनच येते. अन्न साखळीत वरच्या स्तरावर असणारे प्राणी, खालच्या स्तरावर असणार्‍या प्राण्यांपेक्षा खूपच कमी असतात त्याचं हेच कारण. मांसाहारी मनुष्य अन्न साखळीत वरच्या स्तरावर जातो. यांची संख्या बेसुमार वाढल्यास शेती करावी लागणार अन्यथा हे लोक मांसाहारी बनून टिकून राहू शकत नाहीत. माणूस खातो त्या माशांची बेसुमार मासेमारी केल्यासही समुद्री इकोसिस्टमवर त्याचे दुष्परिणाम होतात. तिथली अन्न-साखळी तुटते. पर्यावरणाचा मुद्दा कळीचा बनतो पाण्याच्या कमी/मर्यादित उपलब्धतेमुळे. तिसरं महायुद्ध पाण्यासाठीही होऊ शकतं असा एक दावा केला जातो. एखाद्या देशाकडून अन्न आयात करणं म्हणजे पाणीही आयात करणं. या संदर्भात मांसाहार खूपच कमी एफिशियंट आहे याचा विचार केला जातो. लाल मांसाच्या अतिसेवनामुळे होणारे रोग, मांसाहारी (कार्निव्होरस म्हणावे इतपत) लोकांना होणारे निरनिराळे कर्करोग यांचा विचार केलेला नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 05/07/2012 - 22:46
कोणत्याही हृदयरोग तज्ञाकडे जाऊन आपण 'पूर्ण' शाकाहारी आहात असे सांगा. पहिली तपासणी तो तुमच्या शरीरातील जीवनसत्वांच्या प्रमाणाची लिहून देईल. खासकरून ब जीवनसत्व समूह. शाकाहाराचा अतिरेक करणार्‍यांना या 'डेफिशिअन्सिज' होतात. व त्यांचे दुष्परिणामही होतात. रेड मीट, जेनेटिक बिल्डप, बॉडी फॅट डीस्ट्रिब्युशन यांचे विचार वेगळे आहेत. इथे चर्चा माणूस 'नॅचरली शाकाहारी की मांसाहारी' अशी आहे. दात असे म्हणुन शाकाहारी, शेपूट नाही म्हणून शाकाहारी इ.इ. बाष्कळ पुरावे. फक्त दोन टोके. मधला मूळ मिश्राहार सगळेच विसरलेत..असो. (तुमचा प्रतिसाद वाचून first impression उत्तर हे आहे. सविस्तर वाचून नंतर लिहिन. ३ दिवस रजेवर होतो.)

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन 07/07/2012 - 02:34
+१ सहमत. शाकाहाराचे समर्थक कधी कव्हर्ट पणे तर कधी उघडपणे असे बाष्कळ पुरावे मांडायला फार आतुर असतात असे एक निरीक्षण आहे. अशांना कसे आवरावे ते कळत नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

३_१४ विक्षिप्त अदिती 08/07/2012 - 04:57
माझा मुद्दा तो नाहीच. जगातले सर्व लोक शाकाहारी झाल्यास जगाला अन्न कमी पडणार नाही असा मुद्दा मी मांडते आहे. मानवी शरीरात प्राणिजन्य प्रथिनांपेक्षा वनस्पतीजन्य प्रथिनं कमी शोषली जातात असा तुमचा मुद्दा होता. त्यात प्राण्यांची शरीरं जी वनस्पतीजन्य प्रथिनं टाकून देतात त्याचाही विचार करावा लागेल. पोषणमूल्य, आतड्याची लांबी, दातांची रचना हे विषयाशी संबंधित, पण मी मांडते आहे त्यापेक्षा संपूर्णतः वेगळे मुद्दे आहेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 08/07/2012 - 14:42
पृथ्वीवर वर्चस्व गाजविणारे व प्रचंड संख्येने असलेले, व आकारानेही भलेप्रचण्ड असे डायनोसॉर बहुसंख्येने शाकाहारी होते. त्याकाळी शाकाहारी अन्न त्यांना कमी पडल्याने उपासमार होऊन ते मेले असावेत असा शोध लागलेला नाही. परंतू, माणसाच्या शाकाहारात अन प्राण्यांच्या शाकाहारात असलेला महत्वाचा फरक तुम्ही लक्षात घेत नाही आहात. मक्याचे झाड लावले असता माणूस फक्त कणसातले दाणे खातो, बाकीचे पूर्ण झाड 'वाया' जाते. हेच गायीच्या बाबतीत ती संपूर्ण झाड खाऊ शकते. व पचवूही शकते. हाही हिशोब करता, इतक्या प्रचण्ड संख्येने असलेल्या माणसाला खाऊ घालण्यासाठी शेती करणे व त्यासाठी एकोसिस्टीम्स नष्ट करणे हा उद्योग करावा लागेल. अन हे केवळ अनैसर्गिकरित्या मनुष्याला 'शुद्ध' शाकाहारी बनविल्यामुळे.

In reply to by आनंदी गोपाळ

३_१४ विक्षिप्त अदिती 13/07/2012 - 00:17
मनुष्य गाय खातो तेव्हाही संपूर्ण गाय खात नाही, खाऊ शकत नाही, खाल्ल्यास तिचा काही भाग पुन्हा शरीराबाहेर अनावश्यक म्हणून बाहेर टाकणार. (इथे मी फार क्वालिटेटीव्ह (मराठी शब्द?) बोलते आहे हा आक्षेप मान्य आहे.) मुळात ऊर्जा सूर्याकडून आणि पोषण पृथ्वीकडून मिळणार. त्यात जेवढ्या अधिक पायर्‍या येणार तेवढं यंत्र inefficient होणार. आपण (प्राणी) photosynthesis करू शकत नाही म्हणून वनस्पतींची आवश्यकता आहे. झाडाचा आपण मोजका भागच खाऊ शकतो हे खरं आहे तेवढंच हे ही आहे की उरलेला भाग पुन्हा पृथ्वीमधे, हवेमधे परत जातो. सूर्याची ऊर्जा परत जात नाही, पण त्या ऊर्जेचं मुख्य काम catalyst चंच असतं. शिवाय सूर्याचं इंजिन अजून ५X१० वर्ष चालू रहाणार आहे. तत्संबंधात एक अवांतर प्रश्नः वाघाने (किंवा इतर मांसाहारी प्राण्याने) गवत, पालापाचोळा, शाकाहार घेतल्यास त्याच्यावर परिणाम काय होतो?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 13/07/2012 - 11:08
पण लहानपणापासून, ‘फोटोसिंथेटिक’ माणूस तयार करता आला तर काय बहार येईल- अशी साय-फ़ाय स्वप्ने पहात आलो आहे.. बाकी वेळ मिळाल्यावर पुन्हा

In reply to by आनंदी गोपाळ

३_१४ विक्षिप्त अदिती 13/07/2012 - 19:02
अतिशय मर्यादित अर्थाने हे अजूनही होतंच की! सूर्यप्रकाशात मनुष्याच्या शरीरात, त्वचेखाली ड जीवनसत्त्व तयार होतं. अवांतरः असं झाल्यास, सूर्यप्रकाशात लोळत पडलेले लोकं हे दृष्य कॉकेशन वंशाचे लोकं असणारे सोडून इतर देशांतही दिसेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मन१ 13/07/2012 - 19:46
आपण आपले फोटोसिंथेसिस करु लागलो तर हळूहळू उभयचर(amphibian) कसे जमीनीवरच्या आणि पाण्यातल्या प्राण्यांचे गुणधर्म दाखवतात, तसे आपण दाखवू लागू. आपण "चालणारी वनस्पती" ह्या क्याटॅगरित येउ. वनस्पतीसारखे कोवळे लुसलुशीत,तुकतुकित,हिरवेगार दिसू. म्हणजेच समजा आपण दुपारी कधी डुलकी काढायला जायचो आणि आपले मनोहारी रूप पाहून एखादी शेळी, एखादे हरीण, ससा, कित्येक पक्षी ह्यांना आपला मोह पडून ते आपल्याला "कचाकचा" खायला धावतील. काही पक्षी आपल्याला फोडून तोडून घरटे बनवू पाहफोडून्कल्पना करा :- आपला एक डोळा फोडून चिमणीनं घरटं केलय. एक पाय तो क्रूर सुतार पक्षी फोडून्,कुरतडून राहिलाय. यक्क... नकोच ते. शिवाय इतके दिवस आपणच त्यातल्या कित्येकांची पैदास वाढवल्याने, त्यांची कमी नाही. आपल्या आजवरच्या पिढ्यांनी त्यांना कापून कापून जी मौज केली त्याची परतफेड अशी "उत्क्रांत" झालेल्या पिढीला करावी लागेल. बाब्बो. नकोच. शेळीनं तुम्हाला खाण्यापेक्षा तुम्ही शेळीला खाल्लेलं बरं.

चित्रगुप्त 02/07/2012 - 02:12
जीवो जीवस्य भोजनम. शाकाहार काय अथवा मासाहार काय, काहीतरी 'जीव' असलेलेच खावे लागते. 'निर्जीव' उदा. दगड, माती इ. खाऊन पोषण होत असल्याचे अद्याप ऐकिवात नाही.

रमताराम 02/07/2012 - 18:08
चिंम्प्स शिकार करतात हो, अगदी सजातीय प्राण्यांची म्हणजे छोट्या माकडांची शिकार तर प्राधान्याने करतात. छोट्या माकडांचे वसतीस्थान हेरून आधी आसपासची सारी झाडे पकडून बसतात, जणू वेढाच घालतात. नि मग मुख्य नर मधल्या झाडांवरील माकडांवर हल्ला चढवतो. आजूबाजूचे त्यांना दुसर्‍या झाडावर उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना रोखतात किंवा शिकार करतात. मग आता माणूस स्वजनाहारी (कॅनिबल) झाला तर योग्य ठरेल का हो? याशिवाय काही लहानसहान प्राण्यांची शिकारदेखील करतात. चिम्प्स मुळीच शाकाहारी नाहीत. बाकीचे शाकाहार/मांसाहार वगैरेचे कवित्व आमच्या विट्रेंस्टचे नसल्याने तुमचे चालू द्या.

गोंधळी 02/07/2012 - 21:00
माणसाने शाकाहारी असावे की मांसाहारी असावे ही त्या माणसाची व्ययक्तिक बाब आहे. मला तरी व्ययक्तिकरीत्या(माझ्यापुरता )शाकाहार चांगला वाटतो.

In reply to by गोंधळी

प्रभाकर पेठकर 02/07/2012 - 21:30
शाकाहार नक्कीच चांगला आहे. पण शरीराच्या प्रथिनांच्या गरजेच्या पूर्ततेसाठी रोजच्या जेवणात कडधान्ये असावीत. कडधान्यातून प्रथिने मिळतात पण त्यांना 'अपूर्ण प्रथिने' म्हणतात ती शरीरात पूर्णपणे शोषली जात नाहीत. त्यासाठी त्या बरोबर कार्बोहायड्रेट्स असावेत. जसे, भात, भाकरी इ. म्हणूनच आपल्याकडे वरण भात, मुगाच्या डाळीची आणि तांदूळाची खिचडी खायची पद्धत आहे, तांदूळ+उडीदाची डाळ असलेली इडली अशा पदार्थांचा आहारात समावेश जास्त असावा. मांसाहारी पदार्थात प्रथिने अधिक असतात आणि ती 'पूर्ण' प्रथिने ह्या सदरात मोडतात आणि शरीरात पूर्णपणे शोषली जातात. आयुष्यभर शरीराला प्रथिनांची कमतरता भासली तर म्हातारपणी काही विशिष्ट आजार (पाय असह्य दुखणे इ.इ.) होऊ शकतात. माझ्या आईला ह्याचा त्रास झाला होता. पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गोंधळी 02/07/2012 - 21:48
मांसाहारी पदार्थात प्रथिने अधिक असतात आणि ती 'पूर्ण' प्रथिने ह्या सदरात मोडतात आणि शरीरात पूर्णपणे शोषली जातात. सहमत. पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आहे. असहमत.मला वाटते हा संशोधनाचा विषय आहे. आणि काका मला शाकाहार चांगला किं मांसाहार चांगला या वादात पडायचे नाहि आहे.हा ज्याचा त्याचा व्ययक्तिक प्रश्न आहे. ------------------- जय आदिवासी.

In reply to by गोंधळी

प्रभाकर पेठकर 03/07/2012 - 03:08
मला वाटते हा संशोधनाचा विषय आहे. माझ्या आईच्या आजारपणात तज्ज्ञ फिजिशियन कडून ही माहिती मिळाली. त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात शिकविले जाते त्या अर्थी कांही तरी तथ्य असावे असे मला वाटते. बाकी ह्या विषयावर मी जास्त अधिकारवाणीने बोलू/लिहू शकत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

गोंधळी 04/07/2012 - 13:20
मटण खाणाऱ्या व्यक्तींना कर्करोग होण्याची शक्‍यता अधिक असल्याचा दावा "ग्लोबल ऍग्रीकल्चरल इन्फॉर्मेशन नेटवर्क'ने (ग्लोबोकॅन) प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे. ही महिती आजच्या सकाळ मधिल आहे. http://www.esakal.com/esakal/20120704/5665452963893279664.htm

सुनील 02/07/2012 - 22:15
निरिक्षण १ - चिम्स हे केवळ मांसाहारीच नव्हे तर, स्वजातभक्षीदेखिल आहेत, हे वर ररांनी सांगितलेच आहे. तेव्हा हा मुद्दा बाद. निरिक्षण २ - मनुष्य कच्चे मांस खात नाही. सबब, त्याला तीक्ष्ण दातांची वा सुळ्यांची आवश्यकता नाही. हा मुद्दादेखिल बाद. निरिक्षण ३ - मुद्दा नीट समजला नाही. मनुष्य मांसाहारदेखिल चावूनच खातो, गिळून नव्हे :) निरिक्षण ४ - मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग यातच सगळे आले, नाही का? निरिक्षण ५ - काय पण तुलना? बालक कोंबडीचे पिल्लू कसे खाईल? त्याऐवजी सफरंचंद आणि मस्त भाजलेली चिकन तंदूरी ठेवा आणि मग बघा, ते बालक काय करते ते ;) थोडक्यात, ज्याला जे हवे, ते त्याने खावे. नसती कारणमिमांसा देत बसू नये :)

In reply to by सुनील

३_१४ विक्षिप्त अदिती 02/07/2012 - 22:43
निरिक्षण २ - मनुष्य कच्चे मांस खात नाही. सबब, त्याला तीक्ष्ण दातांची वा सुळ्यांची आवश्यकता नाही. हा मुद्दादेखिल बाद.
अनेक भाज्या, धान्येही आधुनिक मनुष्य कच्च्या खात नाही, बर्‍याच प्रक्रिया करून खातो. कच्ची पीठं खाल्ल्यास अनेकांना पोटदुखी इत्याही होतात. (निदान कणीक भिजवल्यावर आई अशी तंबी देतेच देते.)
ज्याला जे हवे, ते त्याने खावे. नसती कारणमिमांसा देत बसू नये
सहमत आहे.

अत्रुप्त आत्मा 02/07/2012 - 23:03
मनोबांचा धागा ग्रेट, आणी पेठकर काकांचे एकाहुन एक मुहतोड जबाब त्याहुन ग्रेट...! व्वा..! चर्चा व्हावी तर ती अशी. शिवाय आयुर्वेदातले उल्लेखही बारकावे हेरणारे आहेत. मला तर असं वाटतं की हा अख्खा धागाच एका छोट्याश्या पुस्तकात रुपांतरीत करुन(आणखि आवश्यक भर घालुन) हे पुस्तक शाकाहारी आणी मांसाहारी अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांना मोफत लस म्हणुन वाटावे. कारण दोघांमधेही त्या त्या मताचा व्हायरस असतोच..!

रमेश आठवले 07/07/2012 - 02:30
प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेचा वर वर अभ्यास केला तर असे लक्ष्यात येते कि प्रत्येक प्राणीमात्रात त्याच्या उदरभरणासाठी लागणारे अन्न मिळवण्यासाठी स्वयम्भूत साधने असतात. मांसाहारी प्राण्यान्जवळ नखे, सुळे अशी शिकारीची साधने असतात. मनुष्यामध्ये अशी साधने नाहीत ह्यांचे कारण मानव हा शाकाहारी घडविला गेला आहे. त्याने नंतर बुद्धीचा वापर करून काठी, बाण,सापळा व इतर बाह्य साधनांचा वापर करून शिकार करावयास सुरुवात केली आणि ह्यामुळे तो मांसाहारी होऊ शकला, बाकी नैसर्गिक पणे तो शाकाहारीच घडला आहे.

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 08/07/2012 - 01:02
i-lA~रमेशचे अनेक अर्थ आथवले मला. असो. महोदय! तुम्ही 'वर वर' अभ्यास केला तर मी तुम्हाला, 'खाली खाली' हाका मारीन. अन प्रश्न विचारीन. हे 'वर वर अभ्यास' काय आहे? तुमच्या उदरात उंदीर भरला अन गवत भरले, तर उंदराने जिवंत रहाल की गवताने? खाली खाली विचार केला तर गवत पचवता येत नाही. त्यातले ना क्लोरोफिल पचते, ना सेल्युलोज. (सेल्युलोज ही एक प्रकारची 'साखर' असते हे आपणास अथवते का?) या उलट उंदरातील बरेच काही पचते. उगंच काहीतरी आथवले म्हनून काहीतरी टंकले असे करू नये, ही णम्र इणंटी.

In reply to by आनंदी गोपाळ

अत्रुप्त आत्मा 08/07/2012 - 14:34
गोपाळा,,,हसवुन हसवुन मारलस रे बाबा...! उगंच काहीतरी आथवले म्हनून काहीतरी टंकले असे करू नये, ही णम्र इणंटी. >>>

In reply to by आनंदी गोपाळ

रमेश आठवले 08/07/2012 - 23:36
ध चा मा करणारया एक आनंदीबाई रघुनाथराव होवून गेल्या. आता आणखी एक आनंदीबाई अवतरल्या आहेत असे वाटते. लेखनात सभ्यपणा वापरण्याची शिकवण या नवीन आनंदीबैना मिळालेली नाही असे दिसते. या बाबत गोपाळराव यांस विचारावयास हवे.

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 09/07/2012 - 22:38
आपण सरपंचां कडे तक्रार केलीत, इतपत माझ्या प्रतिक्रीयेने दुखावलात, हेच जर मला उलट प्रश्न करून विचारले असतेत, तर समजवून सांगितले असते. उत्क्रांतीच काय तर कोणत्याही जीवशास्त्रीय विषयांचा तुमचा अभ्यास शून्य आहे असे साडेतीन रुपयांची पैज लाऊन इथे सांगतो. (माझी ऐपत तितकी आहे. म्हणून तितकी पैज.) आनंदी अन गोपाळ याचे स्पष्टीकरण जरा माझी स्वाक्षरी पहाल तर समजेलच.

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 09/07/2012 - 22:51
प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेचा वर वर अभ्यास केला तर असे लक्ष्यात येते कि प्रत्येक प्राणीमात्रात त्याच्या उदरभरणासाठी लागणारे अन्न मिळवण्यासाठी स्वयम्भूत साधने असतात.
उत्क्रांती प्रक्रिया ही स्वत:च ती साधने बनविते. ती 'असत' नाहीत.
मांसाहारी प्राण्यान्जवळ नखे, सुळे अशी शिकारीची साधने असतात. मनुष्यामध्ये अशी साधने नाहीत ह्यांचे कारण मानव हा शाकाहारी घडविला गेला आहे. त्याने नंतर बुद्धीचा वापर करून काठी, बाण,सापळा व इतर बाह्य साधनांचा वापर करून शिकार करावयास सुरुवात केली आणि ह्यामुळे तो मांसाहारी होऊ शकला, बाकी नैसर्गिक पणे तो शाकाहारीच घडला आहे.
बुद्धी नावाचे शस्त्र उत्क्रांतीतून मिळाल्यावर इतर सगळी शस्त्रे क्षुल्लक व कुचकामी ठरली, सबब त्यागली गेली. अक्कल वापरून अन्न मिळविणे जास्त सोपे होते. उगा धारदार सुळे अन बळकट बाहू कशाला हवेत? आम्ही प्राणी पाळू लागलो अन शेती करताना झाडेही पाळू लागलो. उत्क्रांतीचा 'वरवर' नाही नुसता ८वी यत्तेइतका अभ्यास केला असतात, किंबहुना वर्गात शिक्षक बोलले ते थोडे जागेपणी ऐकले असतेत, तरी इतके समजले असते. उगा प्रतिसाद टंकताना 'अमुक शास्त्राचा 'वरवर' अभ्यास केला असता असे दिसून येते' स्टाईल वाक्ये टंकून स्वतःच्या अज्ञानाला वजन देण्याचा प्रयत्न केलात तर माझ्या सारखे लोक मी टंकले तसे खडूस प्रतिसाद लिहीणारच. ती मिपाची प्रकृती आहे.

In reply to by रमेश आठवले

वेताळ 12/07/2012 - 17:40
उत्क्राती काळात मानव सर्वप्रथम शाकाहारी होता ह्याबद्दल आपण संशोधन केले आहे काय? असल्यास त्याबद्दल अधिक माहिती द्या.

In reply to by वेताळ

रमेश आठवले 13/07/2012 - 22:20
या विषयावर मी लिहिले आहे त्याची आणि माझ्या ज्ञानाची टर न उडवता आपण मला अधिक माहिती द्यावयास सांगितले याबद्दल धन्यवाद. निरोगी चर्चा हि अशीच असावयास हवी असे माझे मत आहे. मिपाच्या संपादक मंडळींचेही असेच मत आहे असे मी मानतो. खाली दिलेल्या धाग्यावर मानवाची शरीर रचना आणि त्याची पचन प्रक्रिया हि शाकाहारी प्राण्यांसारखी आहे आणि मांसाहारी प्राण्यांच्या सारखी नाही हे पटवून दिले आहे. http://www.stevepavlina.com/blog/2005/09/are-humans-carnivores-or-herbivores-2/

In reply to by रमेश आठवले

जी लिंक आपण दिलीत तो स्टीव्ह पावलिना हा दीपक चोप्रा वैग्रे प्रमाणे ग्रोथ गुरु आहे, आहारतज्ञ नाही, सबब त्याची मते ग्राह्य मानता येत नाहीत.

In reply to by रमेश आठवले

बॅटमॅन 14/07/2012 - 02:32
तुम्ही दिलेला दुवा तद्दन गल्लाभरू छाप आहे हे माहिती असूनदेखील तिकडे दुर्लक्ष करून "आशया"कडे जातो. तो जो "आशय" दिलेला आहे, त्याशी मानवजातीचा इतिहास सुसंगत नाही. शेतीचा शोध लागण्याआधी माणूस अगदी खुंदल खुंदल के शिकार करून खात होता. त्यावेळी बरा आला नाही त्याला कुठलाही प्रॉब्लेम? माणसाचे अतिशय जवळचे जेनेटिक बांधव चिंप्स देखील नॉनव्हेज खातात. इतकेच नव्हे तर वैदिक वाङ्मय, महाभारत, आयुर्वेद, इ. ठिकाणी देखील मांसाहाराचे वर्णन खूप ठिकाणी येते. त्याचा निषेध हा देखील खूप नंतरच्या काळातील आहे. भारतच का, उर्वरित जगातदेखील मांसाहार खूप जोरात केला जायचा आणि आत्तादेखील जातो. हे सर्व आणि इतरही बरेच मुद्दे या चर्चेत ऑलरेडी बहुत वेळेस आलेले आहेत. ते थोडे तरी पहा, त्यातल्या विसंगती स्पष्ट करा आणि मग बोला. कुठल्याही बाजूने चिक्कार लिंका मीपण देऊ शकेन आत्ताच्या आत्ता. पण त्याला काही अर्थ नाही.

In reply to by रमेश आठवले

प्रभाकर पेठकर 14/07/2012 - 01:00
आपल्या मतांचा आदर आहेच. परंतु, कुठले, कोणाचे वैचारिक विश्लेषण वाचून आपले मत बनविण्यापेक्षा योग्य प्रमाणात मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार घेणार्‍या वेगवेगळ्या समुदायाचे अल्पायुष्य आणि दीर्घायुष्य ह्या मोजपट्टीवर मापन केले (तसा विदा उपलब्ध असेल तर) तर जे निष्कर्ष समोर येतील ते जास्त विश्वासार्ह म्हणावे लागतील. योग्य प्रमाणात घेतलेला मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार कितपत आरोग्यदायी ठरतो ह्याचे काही सर्वमान्य पुरावे उपलब्ध असतील तर चर्चेला दिशा मिळेल. नाहीतर तिन्ही आहार पद्धतींचे समर्थन आणि खंडन करणारे अनेक जणं असतात त्यामुळे जगाच्या अंतापर्यंत ही चर्चा चालू शकेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 14/07/2012 - 02:03
योग्य प्रमाणात घेतलेला मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार कितपत आरोग्यदायी ठरतो ह्याचे काही सर्वमान्य पुरावे उपलब्ध असतील तर चर्चेला दिशा मिळेल. नाहीतर तिन्ही आहार पद्धतींचे समर्थन आणि खंडन करणारे अनेक जणं असतात त्यामुळे जगाच्या अंतापर्यंत ही चर्चा चालू शकेल.
एग्जॅक्टलि!!! थोडेसे गुगलून पाहिले असता एक पेपर सापडला. यात त्यांनी व्हेजवाले आणि हेल्थ कॉन्शस नोनव्हेजवाले यांची तुलना करून निष्कर्ष काढले ते त्यांच्याच शब्दांत देतो. शीर्षकः Vegetarian diets, chronic diseases and longevity. सारांशः प्युअर व्हेजवाल्यांच्या मते व्हेज खाण्यामुळे आयुर्मान वाढते, विविध रोगांची रिस्क कमी होते, इ.इ. पण युरोपमधील सर्वांत जास्त हेल्दी लोक उदा. स्कँडेनेव्हियन्स..ते तर लै मांस खातात. व्हेज खाण्यामुळे लट्ठपणा कमी होतो, तसेच हृदयरोगाची रिस्क कमी होते, पण विविध प्रकारच्या कॅन्सर बद्दलची रिस्क आजिबात कमी होत नाही. शिवाय नॉनव्हेज खाण्यामुळे हिंसक स्वभाव बनतो असे जे अडाणचोट विधान आहे त्याला दुजोरा देणारी कसलीही माहिती आजपर्यंत पुढे आलेली नाही. आणि अलीकडच्या खादाड समाजात व्हेज म्हणजे एक प्रकारचे आहारनियमनच असल्यामुळे त्याचा काही अंशी फायदा होतो. व्हेजमध्ये फळे वैग्रे खा ल्ल्यामुळे फायदा होतो, निव्वळ मांस न खाल्ल्यामुळे नाही. पान क्र. २ वर पहावे, आईसलँड मधील आहाराच्या सवयी खुंदल खुंदल के नॉनव्हेज वाल्या असूनदेखील त्यांचे आयुर्मान जास्त आहे. हेल्थ कॉन्शस नॉनव्हेजवाले आणि व्हेजवाले यांची तुलना केल्यास बर्‍याच प्रचलित समजुतींना तडा जाऊ शकतो हे या ४ पानी पेपरावरुनदेखील सिद्ध होते.

अप्पा जोगळेकर 07/07/2012 - 15:11
अनेक शाकाहारी पदार्थ आणि सगळे मांसाहारी पदार्थ प्रक्रिया केल्याशिवाय खाणे आजमितीस तरी अशक्य आहे. एकेकाळी माणूससुद्धा कच्चे मांस खात असेल पण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अन्न शिजवून खाण्याच्या सवयीमुळे कदाचित पचनशक्ती दुबळी होत गेली असावी असे वाटते. शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो. ज्यांना अधिक शारिरीक उर्जेची गरज असते असे लोक जसे - फुटबॉलर, अ‍ॅथलीट, बॉक्सर अशांचा मांसाहाराशिवाय निभाव लागणार नाही असे वाटते. अनेक दुबळ्या, अशक्त किंवा क्षयासारख्या आजारातून उठलेल्या माणसांना अंडी , चिकन सूप किंवा तत्सम आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. याउलट हार्ट पेशंट, अति लट्ट माणसे, कोलेस्टेरॉल जास्त असणारे लोक यांना सक्तीने शाकाहार घेण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. तेंव्हा मानवी शरीराला मांसाहार योग्य किंवा शाकाहार योग्य असा सरसकट इन्फरन्स कसा काढणार ? फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. प्रत्येकाच्या शरीराला कोणत्या अन्नाची सवय आहे यावर बरेच काही अवलंबून आहे. दररोज मांस खाणारा माझा एक किरिस्ताव मित्र मी पाहिलेला आहे. अनेक वंगबंधू, कोळी समाजाचे लोकं हे दररोज मांसाहार करतच असतात. माझ्या जुन्या ऑफिसातला एक मित्र त्याच्या डब्यामध्ये 'फॉर अ चेंज' व्हेज आणत असे. तेंव्हा माणसाचे शरीर कायम मांसाहार करु शकत नाही हेदेखील तितकेसे पटत नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

बॅटमॅन 07/07/2012 - 15:16
+१. हा तिसरा मुद्दा ढोंगी शाकाहारमार्तंड जरा जास्तच लावून धरतात. स्वतःची तथाकथित नैतिक श्रेष्ठता प्रस्थापित करायची लै हौस असते त्यांना.

चित्रगुप्त 08/07/2012 - 14:21
कलेच्या प्रांतात पारंपारिक (अर्थात पाश्चात्य पारंपारिक) वास्तववादी कलेचे समर्थक आणि आधुनिक कलेचे समर्थक एकमेकांना वाट चुकलेली कोकरे समजून आपल्या विचारसरणीचा बाप्तिस्मा देऊन आपल्या कळपात ओढू बघत असतात, तसेच शाका-मासा. चे होत असतेसे दिसते. :)

In reply to by चित्रगुप्त

अत्रुप्त आत्मा 08/07/2012 - 14:38
@आपल्या विचारसरणीचा बाप्तिस्मा देऊन आपल्या कळपात ओढू बघत असतात, तसेच शाका-मासा. चे होत असतेसे दिसते. Smile अतिशय समर्पक प्रतिसाद...

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 08/07/2012 - 15:28
शाकाहारी आणि मांसाहारी पारंपरिक कलासमर्थक आणि आधुनिक कलासमर्थक मार्क्सवादी आणि हिंदुत्ववादी अँटी-पुणे आणि पुण्याचे वकील निवासी आणि अनिवासी वेगवेगळ्या आब्राहमिक धर्मांचे अनुयायी अशी ही थोडीशी मोठी लिस्ट आहे ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 08/07/2012 - 20:59
तुमच्या स्मायल्यांचा स्रोत आत्ताच्या आत्ता सांगा नैतर बाटलीत भरून कैद करतो बघा तुम्हाला ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

च्यायला ! तुम्ही आधी प्रतिसाद टंकून मग स्मायली शोधता, की स्मायली सापडली की त्याप्रमाणे प्रतिसाद लिहीता?

जे.पी.मॉर्गन 10/07/2012 - 13:09
धाग्याचं शीर्षक वाचूनच त्यातले मुद्दे आणि आणि पुढचे प्रतिसाद काय येणार ह्याचा अंदाज आला होताच. आणि अगदी "जे जे वांछील तो ते खावो" हे कंक्लूजनसुद्धा कळलं होतं. पण जसे फिक्स केलेल्या मॅच मध्येदेखील काही एक्साइटिंग गोष्टी घडतातच - तसे, पेठकरकाकांचे प्रतिसाद, मनोबाचे मुद्दे, आयुर्वेदातले दाखले, अदिती वि. आनंदी गोपाळचं "बॅटल विदिन अ बॅटल"..... शेवट माहित असलेली सास-बहू सीरियल बघतोय असं वाटलं. अर्थात ज्ञानात भर पडली - मतांत फरक (अर्थातच्) पडला नाही. (आज रात्री मटण सूप पिण्याची इच्छा असलेला) जे पी

मन१ 12/07/2012 - 13:01
धागा वर आणलेला दिसतोय, मुद्दे वाधलेले दिसताहेत. पाहून छान वाटलं. सविस्तर निवांत टंकेन.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर 12/07/2012 - 17:06
ग॑वि साहेब, मुडदा पाडलात आमच्या, शाकाहारी बनण्याच्या, अर्भकी विचारांचा.

In reply to by गवि

गणपा 12/07/2012 - 15:53
या धाग्यावराचा सर्वोच्च प्रतिसाद. ;) बादावे शेवटच्या ताटातली रश्याची वाटी फारच प्रेमाने आणुन दिलेली दिसते. ;)

In reply to by गवि

नंदन 13/07/2012 - 11:12
या धाग्यावराचा सर्वोच्च प्रतिसाद.
असेच म्हणतो. त्यातही परमेश्वराच्या प्रथम अवतारास अग्रस्थानाचा मान देणे हे तर अगदी समर्पक! :)

चित्रगुप्त 15/07/2012 - 07:59
गुडघेदुखी ही चाळीशीच्या पुढील स्त्रियांमधे विशेषतः भारतात फार आढळते. युरोपात अगदी म्हातार्‍या (गोर्‍या) स्त्रियासुद्धा अगदी टुणटुणीत, स्लिम असलेल्या दिसतात, तर तेथील अगदी तरूण हबशी स्त्रियासुद्धा भलत्याच लठ्ठ असतात, (असे माझे निरिक्षण आहे, चू.भू.द्या.घ्या.) या गोष्टीचा आहाराशी काय संबंध आहे, हे तज्ञांनी स्पष्ट करावे.

In reply to by चित्रगुप्त

अर्धवटराव 15/07/2012 - 10:34
त्याचा आहाराशी फार काहि संबंध नाहि. काळ्या अफ्रिकन लोकांच्या जीन्स मधे चरबी साठवुन ठेवणारे हार्मोन्स नसतात. त्यामुळे चरबी कंट्रोल करणारे हार्मोन्स पण नसतात. जर एखादं हायब्रीड प्रॉडक्ट ( उदा. काळं + पांढरं )असेल आणि त्यात पांढर्‍याकडुन चरबी साठवणारे हार्मोन्स आले तर त्यांना अडवणारे एण्टी चरबी हार्मोन्स च्या अभावामुळे ते बेहिसाब लठ्ठ होतात. ढिशक्लेमर : १) हि सर्व ऐकिव माहिती आहे. संदर्भ देणे, ऑथेण्टीक माहितीचे दुवे लक्षात ठेवणे अश्या भानगडीत आम्हि पडत नाहि २) जीन्स, हार्मोन्स वगैरे शब्द प्रतिसादाला केवळ भारदस्तपणा येण्यासाठी वापरले आहेत. "केमीकल लोचे" या एकाच पिशवीत हि मंडई निपटता येईल. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

प्रभाकर पेठकर 15/07/2012 - 17:29
"केमीकल लोचे" या एकाच पिशवीत हि मंडई निपटता येईल. एखाद्या चित्रपटात, समुहनृत्यात नायिकेपेक्षा, समुहातली एकदम मागची, एखादी दुय्यम नर्तिका अतिशय गोड दिसत असावी आणि आपल्या नृत्य कौशल्याने नायिकेपेक्षा स्वतःकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असावी तसे हे, डिस्क्लेमरच्या अगदी शेवटच्या कोपर्‍यातलं, वाक्य फार आवडलं.