मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाब्द ज्ञान

धनंजय · · जनातलं, मनातलं
शाब्द ज्ञान (कल्पनारम्य कथा) - - - असिद्धवदत्रा! भाति सर्वं शब्देन विना । येथे सर्व काही असिद्ध असल्यासारखे भासतंय हो! शब्दांविना बुद्धी काही समजूच शकत नाही, असे तर नाही ना? नासदासीन्न सदासीत् । "असणे" आणि "नसणे" हेच शब्द नसले तर ज्ञान कुठले? तसे नव्हे. काहीतरी आहे. शब्द नसले तरी संवेदनांमधून काही कळते. नावे नाहीत म्हणजे ज्ञानच नाही, हा भ्रम आहे. "नाव" हे कसले नाव? नाव म्हणजे संकेत-शब्द. "शब्द" हे कसले नाव? शब्दच माहीत नसता, शब्दांतच शब्दांची व्याख्या शक्य नाही. मग व्याख्यांबद्दल कुतूहल तरी शब्दांविना कसे शक्य आहे? कुतूहल म्हणजे ज्ञानासाठी तहान. तहान ही संवेदना आहे. शब्दांशिवायही संवेदना आहेतच. व्याख्या न करताच ध्वनी केला. "अ" - असा ध्वनी केला. यात संकेत कसला? संकेताविना ते नाव नव्हे. सर्वनाम्नः स्म... सर्व नावांचा संकेत होऊ लागेल की हा एक ध्वनी! याने ज्ञानाची तहान भागणार नाही. एकच नाव असेल, तर "काहीतरी आहे" इतकेच कळते. अप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् । कुठलीच आकृती स्पष्ट नसलेला जलप्रलयच की हा! ज्ञानाची तहान म्हणजे कामना. कामस्तदग्रे समवर्तत । कामना ही आधी उद्भवली. हे एक आहे त्याचे अनेक व्हावेत. मग? सर्वस्य द्वे । सर्व काही द्विगुणित केले. किंवा द्विगुणित झाले, म्हणा. कामना दोन करते म्हणा किंवा दोन जाणते म्हणा. "अ अ" । मग? "अ अ अ अ". पुनरावृत्तीमधून काळ मापला जातो. त्याहूनही - पुनरावृत्तीतून काळाचे ज्ञान होते. "आता ऐकल्यासारखाच ध्वनी पूर्वी कधी ऐकला होता" ही स्मृती म्हणजे भूतकाळाचे ज्ञान. "आता ऐकू येते तो ध्वनी थांबेल मग पुन्हा असाच ध्वनी ऐकू येईल" ही अपेक्षा म्हणजे भविष्यकाळाचे ज्ञान. वृद्धिरा! तदैजते । मग शब्दांच्या वैशिष्ट्याची वाढ फोफावते. वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या ध्वनी-आकृती उत्पन्न होऊ शकतात. जी "ही", ती "ती" नाही. आणखी कुठली, ती वेगळीच कुठली ध्वनी-आकृती. वेगळ्या ध्वनींचे वेगळे शब्द. वेगळ्या पदार्थासाठी वेगळा ध्वनी, वेगळ्या व्यक्तीसाठी वेगळा ध्वनी जोडला जातो. तिरश्चीनः शब्दरश्मिर्विततः । शब्दाचे किरण आडवे ओढले. त्याच्या प्रकाशात अचानक सर्व काही वेगवेगळे प्रकट झाले. शब्दांचा स्फोट झाला म्हणजे एका-एका वस्तूच्या ज्ञानाचा स्फोट झाला. शब्दांमध्ये अर्थ वाहायची शक्ती आहे. अर्थः पदम् । अर्थवाही शब्द म्हणजे "पद". पदांनी विश्वातल्या वस्तूंना नावे मिळालीत तरी ज्ञानाची तहान भागली नाही. नावे दिलीत फक्त, तर सर्व काही निर्विकार आहे, असा समज होतो. ते सत्य नाही. काळ बदलतो तसे आहे-नाही ते बदलते, हे स्पष्ट जाणवते. काळ जातो तसा पदार्थांचा संयोग-वियोग जाणवतो, व्यक्तींचे होणे-लय पावणे संवेदनेला जाणवते. शब्दाने काळ कळतो, व्यक्ती कळतात : पण अजून काळाने केलेला व्यक्तिविकार, पदार्थविकार शब्दांत मावत नाही. हा सर्वांचे शाब्द ज्ञान कसे व्हावे? समर्थः पदविधिः । पदांची जोडणी हे करायला समर्थ आहे. पदांची जोडणी म्हणजे पदांची व्यवस्था. त्यातून पदार्थांचे संबंध कळतात. होणे-लयास जाणे, संयोग-वियोग त्या जोडणीतून सांगता येते. त्या व्यवस्थेतून व्यक्तींचा संबंध, काळाने केलेले पदार्थांतले, व्यक्तींतले विकार सांगता येतात. मग काय? प्रत्ययः । प्रत्यय येतो. विश्वाचे संवेदनाज्ञान शब्दांच्या पूर्वीचे आहे, हे सांगितलेच आहे. पण ते ज्ञान म्हणजे प्रत्यय नव्हे. ती पश्यंती (बघणारे ज्ञान) होय. पश्यंतीचे ज्ञान प्राकृतिक आहे, स्थितीशील आहे. जमीन पाऊस प्राप्त करते, तशी शब्दाविना पश्यंती संवेदना प्राप्त करते. परश्च? शब्दानंतर? मध्यमा (मनातली भाषा) आणि वैखरी (स्पष्ट-ध्वनिरूप भाषा) तथ्याचे भिन्न-भिन्न वस्तू म्हणून विश्लेषण करतात, आणि वाक्यांनी, काव्याने पुन्हा भिन्न-भिन्न वस्तूंचे एकत्रीकरण करतात. पश्यंतीने बघितलेल्या असिद्ध संवेदनांमधून सिद्ध ज्ञान जन्माला घालतात. स्वौजसम् । आपल्या ओजाला प्रकट करतात. जणू जमिनीत पावसानंतर बीज अंकुरावे. कोणाकरिता हे? कोणाला सर्व ज्ञान कधीतरी होईल काय? तस्मै हितम् ? त्याच्या हिताकरिता? य एतज्ज्ञानं दधे सो अङ्ग वेद यदि वा न वेद । जो हे ज्ञान धारण करेल त्यालाही हे कळेल का - नव्हे, निश्चितच कळणार नाही. - - - ही शाब्दज्ञानाच्या जन्माबद्दल कल्पनारम्य कथा आहे. इतिहास किंवा तर्क नव्हे. विरंगुळा म्हणून काही व्याकरणसूत्रे (मुळातल्यापेक्षा वेगळ्याच अर्थाने) उद्धृत केलेली आहेत. शिवाय नासदीय सूक्तातली काही वाक्ये विखुरलेली आहेत - त्यांचे शब्दार्थ बर्‍यापैकी ठीकठाक आहेत. उद्धरणांची सूची येणेप्रमाणे - पाणिनीय सूत्रे - असिद्धवदत्राभात् । पा० ६.४.२२ ॥ सर्वनाम्नः स्मै । पा० ७.१.१४ ॥ सर्वस्य द्वे । पा० ८.१.१ ॥ अ अ । पा० ८.४.६८ ॥ वृद्धिरादैच । पा० १.१.१ ॥ समर्थ: पदविधि: । पा० २.१.१ ॥ प्रत्ययः । पा० ३.१.१ ॥ परश्च । पा० ३.१.२ ॥ स्वौजसम्० । पा० ४.१.२ ॥ तस्मै हितम् । पा० ५.१. ५ ॥ हे सूत्र ऐंद्र व्याकरणातले - अर्थ: पदम् । नासदीय सूक्तातील वाक्ये - नासदासीन्न सदासीत् । अप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् । कामस्तदग्रे समवर्तत । तिरश्चीनो रश्मिर्विततः । दधे । सो अङ्ग वेद यदि वा न वेद । (मूळ संस्कृत लेख प्रकाशित झाल्यावर त्याचा दुवा येथे देईन.)

वाचने 5150 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by सहज

नितिन थत्ते Tue, 06/22/2010 - 09:59
सहमत आहे. मेंदू सकाळीच ओव्हरहीट झाला. तसेच सकाळी केलेल्या ब्रेकफास्टमधून मिळालेली सगळी ऊर्जा खर्च (डिसिपेट) झाली. आता परत काहीतरी खायला हवे. :? (खानेवालोंको खानेका बहाना चाहिये). >>कल्पनारम्य कथा याला कथा का म्हटले असावे?...च्यायला, म्हणजे पुन्हा कथेची व्याख्या करणे आले. ;) तरी मला तो (करता न येणार्‍या व्याख्येप्रमाणे) निबंध वाटला. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

धनंजय Wed, 06/23/2010 - 00:05
यात काल्पनिक पात्र आहे, त्याचे अनुभव म्हणजे काल्पनिक घटनाक्रम आहे. हे निबंधापेक्षा कथेच्या तंत्राच्या जवळ जाते. निबंधात तथ्य-अधिष्ठित तर्क अधिक दिसतो. येथे सुरुवात-मध्य-अंत अशा स्पष्ट मर्यादा आहेत. हे मात्र निबंध आणि कथेला सामायिक आहे. *"रात्र सरली पण कथा संपली नाही" अशा प्रकारचे "अंत नाही" म्हणणारे वाक्य असल्यास काय? तांत्रिक दृष्ट्या तो अंतच असतो. पण तो लाडिक "आम्ही नै जा" अंत निबंधांपेक्षा कथांना अधिक शोभतो.* अर्थात लेखनाचे "अमुक" असे वर्गीकरण असलेच पाहिजे, असे नव्हे. मान्य. *(यात फरक मोठा सूक्ष्म आहे, मान्य. हे नेहमीचे उदाहरण बघूया : कथा: एक होता भुंगा. तो कमलिनीच्या प्रेमात पडला. तिच्या केसरांत दिवसभर दंग झाला. वेळेचे भान विसरला. संध्याकाळी कमलिनीच्या पाकळ्या मिटल्या, तसा भुंगा कासावीस झाला. लाकडालाही भोके पाडू शकणारा भुंगा तो! पण त्याच्या मनात सुकोमल पाकळ्या पोखरायचा विचारही आला नाही. नाजुक पाकळ्यांच्या पाशात त्याने प्राण सोडले. निबंधखंडातली उपमा : कमळ मिटल्यावर अडकलेल्या भुंग्याने प्राण सोडावेत पण पाकळ्या पोखरू नयेत, तसे प्रेमी वीर प्रेयसीच्या नाजुक पाशात अगतिक असतात. या दोहोंत आस्वाद्य मजकुरातला फरक फार थोडा आहे. दोन्ही ठिकाणी मानवी भावनेला खरी साद घातलेली आहे. मात्र कथेत काल्पनिक घटना सांगायचे प्राथमिक उद्दिष्ट्य वठवलेले आहे. निबंधात प्रेमिकांच्या भावनांचे तथ्य प्राथमिक आणि तो सांगण्यासाठी भुंग्याचा दृष्टांत हा फक्त एक अलंकारिक पर्याय.)*

युयुत्सु Tue, 06/22/2010 - 10:34
हे लिखाण म्हणजे जणु वैचारिक मक्याच्या शाब्दिक लाह्या! युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

मदनबाण Tue, 06/22/2010 - 10:40
परत वाचन करीन या लेखाचे...सध्या ध्वनीने माणुस काय मिळवु शकतो यावर टाळक्यात इचार चालू आहे... कालच जालभटकंतीत ध्वनी विषयक हा इडियो पाहिला... व्याख्या न करताच ध्वनी केला. "अ" - असा ध्वनी केला. ================================== मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

विसुनाना Tue, 06/22/2010 - 13:25
नासदीय सूक्तातील वाक्ये आणि पाणिनीय सूत्रे यांची मूळ अर्थाच्या पलिकडील गुंफण करून काही नवाच अर्थ निर्माण करणारी कथा (वैचारिक स्फुट?) आवडली. वेद ते वेदान्त काळातील भारतीय (वैचारिक/सामाजिक/नैसर्गिक) वातावरण मनाला भुरळ घालते. लहान मुले (कधीकधी मोठेही) सूर्योदयाचे चित्र काढताना अंधःकारातून उगवणार्‍या सहस्ररश्मिच्या किरणांची आभा जशी क्षितिजातून फुटणार्‍या आकाशगमनी रेषांनी दाखवतात तद्वत ज्ञानाच्या प्रकाशाच्या रेषा म्हणजे शब्द आहेत. (सोप्या शब्दात(!) अ‍ॅबस्ट्रॅक्शन.)
कोणाकरिता हे? कोणाला सर्व ज्ञान कधीतरी होईल काय? तस्मै हितम् ? त्याच्या हिताकरिता? य एतज्ज्ञानं दधे सो अङ्ग वेद यदि वा न वेद । जो हे ज्ञान धारण करेल त्यालाही हे कळेल का - नव्हे, निश्चितच कळणार नाही.
-Nobody, even THE GOD can be omniscient....हे वाक्य आठवले.

राजेश घासकडवी Tue, 06/22/2010 - 11:53
ज्ञान असतं, शब्दापलिकडे, शब्दाआधी संवेदना असतात, व त्या व्यक्त करण्याची, सामावून घेण्याची तहान असते. त्यातून शब्द निर्माण होतात व चराचर व्यापतात (वाच्यार्थाने नव्हे...). नंतर शब्दांमधूनच हे विश्व प्रतीत होतं... छान लेख.

ऋषिकेश Tue, 06/22/2010 - 12:47
वाचले. कळले नाहि (अर्थात दोष माझा) पुन्हा एक दोन वेळा वेगळ्या वेळी वाचून बघेन.. कळल्यान/आवडल्यास/नावड्ल्यास विस्तारीत प्रतिक्रीया लिहिनच ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

रामदास Tue, 06/22/2010 - 14:29
धनंजय ऋषी काही कळले नाही. जे कळले ते असेच आहे का ? १ अस्तित्वाची जाणीव २ संवेदनांची जीवासोबत उत्पत्ती (कामनाही त्यात आलीच) ३ संवेदनाच्या असह्यतेतून श्राव्य ध्वनी (साद आणि प्रतिसादाची मागणी) ४ अनेकांच्या एकच श्राव्य ध्वनीतून अनेकांचा होकार. ५ वारंवार एकच होकार म्हणजे शब्द .

In reply to by रामदास

पंगा Tue, 06/22/2010 - 19:55
कथा अनेकदा वाचल्यानंतर, 'शब्दांनाच जर अस्तित्व नसते, तर या कथेलाही अस्तित्व नसते (मज्जा! =D>)' या एकमेव निष्कर्षाप्रत येऊ शकलो. बाकी 'कल्पनारम्य कथे'बद्दल बोलायचे झाले, तर 'ही कथा आहे' असे लेखकाचे म्हणणे आहे, तेव्हा बहुधा ही कथा असावी असा विश्वास ठेवण्यास हरकत नसावी. 'यात कल्पना असाव्यात' या दाव्यासही आकलनाअभावी शंकेचा फायदा देता यावा. मात्र 'ही रम्य आहे' हे पटले नाही. (तीनतीनदा वाचूनही डोक्यात काहीही प्रकाश न पडणे हे माझ्या 'रम्य'च्या व्यक्तिगत व्याख्येत तर बसत नाहीच; शिवाय त्यानंतर चौथा प्रयत्न करण्याचे कष्ट घेण्यात काही हशील असते किंवा त्याची निकडीची गरज असते असेही मला वाटत नाही. 'एक सामान्य वाचक' या भूमिकेतून मला असे वाटते; 'समीक्षक' या वर्गात मोडणार्‍या किंवा मोडू इच्छिणार्‍या महाभागांचे निकष याहून वेगळे असू शकतील, त्याबद्दल मला प्रत्यवाय असण्याचे काही कारण दिसत नाही. शेवटी ज्याचीत्याची आवड, ज्याचीत्याची समज. एखाद्यास पिंडात ब्रह्मांड दिसत असल्यास त्यास 'अरे, पण तो एक साधा भाताचा गोळा आहे; त्यात ब्रह्माचे काय, कोंबडीचेही अंडे नाही. तेव्हा ही अंधश्रद्धा सोड! (तू मला पाठच्या भावासारखा. - कल्पनेची उधारी श्री. रा. रा. रा.ग. गडकरी यांजकडून साभार.)' असे - 'राजा नागडा!' छाप - बोंबलण्याची मला गरज वाटत नाही. त्यापेक्षा 'नसतील बिचार्‍याला अंडी मिळत, करतोय स्वप्नरंजन तर करू देत. खोटा का होईना, पण सुखी तर आहे ना?' अशी भूमिका घेणे मला श्रेयस्कर वाटते. असो. बरेच विषयांतर झाले.) - पंडित गागाभट्ट.

In reply to by रामदास

धनंजय Tue, 06/22/2010 - 23:27
प्रथमार्धाचा असा अर्थ करता येईल खरा. "सर्वस्य द्वे" मध्ये प्रतिध्वनीचाही (साद-प्रतिसादाचाही) अर्थ काढता येईल, ही बाब लिहिताना सुचली नव्हती.

प्रियाली Wed, 06/23/2010 - 00:32
मूळ संस्कृत लेख प्रकाशित झाल्यावर त्याचा दुवा येथे देईन.
मराठीत अनुवाद केलात की ही सांगा. तूर्तास, काही मराठी शब्द अध्येमध्ये दिसले पण लेख डोक्यावरून गेला. ;)

चतुरंग Wed, 06/23/2010 - 01:06
० -> ध्वनी -> शब्द -> पद -> प्रत्यय -> ज्ञान (इथे ज्ञाता आणि ज्ञान असे द्वैत शिल्लक आहे) -> अद्वैत (म्हणजेच ० का?) पुन्हा एकदा चक्राला सुरुवात झाली असे म्हणायचे का? चतुरंग

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग Wed, 06/23/2010 - 02:05
डावीकडून साष्टांग घालत घालत आल्याने सुरुवातीला फक्त डोके आणि हात दिसताहेत त्यापुढे ध्वनी मग शब्द इ. ! ;) चतुरंग

धनंजय Wed, 06/23/2010 - 02:35
काही वाचकांना लाह्यांसारखा हलकाफुलका वाटावा, पण काहीना कळायला जड गेला. (मागे "गंगाजळावर तरंगणारा दगड" बघितला होता - म्हटला तर कमालीचा हलका, म्हटला तर कमालीचा जड... कोणाच्या मते बघ्यांकडून चिल्लर गोळा करण्यासाठी फसवणूक...) काहींना "समजण्यालायक नाही" असे वाटले, तेही ठीकच. कोणाला तीनदा वाचता आले, म्हणजे बडबडगीताची सर आली. एक वाक्यातला सारांश : जाणीवांची व्यवस्था लावण्यासाठी संकेत-चिह्नांची मोडणी-जोडणी सोयीची असते. (@चतुरंग : यात चक्र आहे, बरोबर. किंवा "स्पायरल" तरी आहे.) तीन वाक्यांतला सारांश (राजेश घासकडवी यांच्याकडून उद्धृत) ज्ञान असतं, शब्दापलिकडे, शब्दाआधी संवेदना असतात, व त्या व्यक्त करण्याची, सामावून घेण्याची तहान असते. त्यातून शब्द निर्माण होतात व चराचर व्यापतात (वाच्यार्थाने नव्हे...). नंतर शब्दांमधूनच हे विश्व प्रतीत होतं...