मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ठाकरे आणि पवार नाकर्ते राजकारणी - पुष्पा भावे यांचे मत

सन्जोप राव · · काथ्याकूट
आयबीएन लोकमतवर निखील वागळेंनी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावेंचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील दोन बुजुर्ग राजकारण्यांविषयीचे सडेतोड विचार ऐकले / पाहिले. त्यांच्या मते: १. बाळासाहेब ठाकर्‍यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडीत आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्‍यांनी केले नाही. ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे. २. गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रातील सांस्कृतिक र्‍हासाचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना. शिवसेनेनेने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ भाषेचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा शिवसेनेने महाराष्टाच्या राजकारणात आणला. 'सामना' मधील कित्येक उतार्‍यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण बाळासाहेब ठाकर्‍यांना अटक करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथम सुरु केली. ३. शिवसेनेचे मराठी कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. मुंबईत मराठी माध्यमातून सुरु झालेल्या काही महाविद्यालयीन अभ्यासक्रमांना पहिला विरोध शिवसेनेचा होता. ४. शरद पवार शिवसेनेची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले. शिवसेनेला ताब्यात ठेवणे त्यांना शक्य असूनही त्यांनी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्यांच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता. ५. 'एक सुसंस्कृत राजकारणी' ही शरद पवारांची ओळख फारशी खरी नाही. इतर काँग्रेस नेत्यांच्या मानाने त्यातल्या त्यात मवाळ भाषा व काही साहित्यीक वर्तुळांत उठबस एवढा फरक सोडला तर शरद पवार आणि इतर काँग्रेसचे नेते यांच्यात काही फरक नाही. 'यशवंतराव चव्हाणांनंतरचा महाराष्ट्रातला द्रष्टा नेता' हे शरद पवारांचे वर्णन निरर्थक आहे. ६. राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद ही चाळीस वर्षे शिवसेनेत राहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेही बाळासाहेब ठाकर्‍यांप्रमाणेच उथळ आणि सवंग वक्तृत्व या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता चाळीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील. शिवसेनेने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. भुजबळ राणेंपासून सचिन तेंडुलकरांपर्यंतची उदाहरणे आहेत. पुष्पा भावे या तर फार पूर्वीपासून शिवसेनेच्या हिटलिस्टवर असणार्‍या. त्यांना बाळासाहेब ठाकर्‍यांनी ज्याला 'खास ठाकरी भाषा' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'हडळ' वगैरे म्हणून घेतले आहे. पुष्पा भावेंच्या या मुलाखतीत ठाकरेंबद्दलचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्‍या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.

वाचने 24245 वाचनखूण प्रतिक्रिया 38

ऋषिकेश 07/03/2010 - 15:14
ही मुलाखत कालच लोकमतवर पाहिली. पुष्पाताईंचे मुद्देसुद बोलणे खूप आवडले. पुष्पाताईंचे मत मला काहि प्रमाणात पटते. मात्र हे उत्तर एका ठराविक प्रश्नाला आले होते. तो प्रश्न निरपेक्ष किंवा विविध पर्याय समोर ठेवणारा नसून केवळ ठाकरे / पवार या व्यक्तींवर होता. मुलाखत कशी घेऊ नये अथवा पूर्वग्रहदुषित व्यक्तीने मुलाखत घेतल्यास काय होते याचा हा आदर्श वस्तुपाठ होता ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

योगी९०० 07/03/2010 - 15:38
शिवसेना आणि बाळासाहेब हे कायम so called white collared लोकांच्या टिकेचेच विषय बनले आहेत. उगाच धर्मनिरपेक्ष म्हणून नाचायचे आणि करायची टिका. अशी लोकं स्वत:च्या घरात आपल्या जातीच्या बाहेर सुद्धा नातेसंबंध ठेवत नाहीत. पण बाहेर मात्र उगाच बोंबलत हिंडत असतात. (सॉरी ..थोडे विषयांतर होत आहे येथे जात-धर्म विषय नसून..मराठी लोकांचे भले हा विषय आहे.). शिवसेनेने जरी फार भले केले नसले तरी आपण ही कोठे शिवसेनेला पुर्णपणे किंवा कायम सत्ता दिली? ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा कॉग्रेसपेक्षा बर्‍यापैकी कामे करत होते. (माझे वैयक्तित मत..) गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रातील सांस्कृतिक र्‍हासाचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना. असहमत.. खादाडमाऊ

मदनबाण 07/03/2010 - 15:39
एक मराठी म्हणुन शिवसेने बद्धल प्रेम आहेच आणि राहील,पण जर शिवसेनेने मराठी माणसाचे भले केले असते(असा दावा हल्ली त्यांना बर्‍याचवेळा करावा लागतोय)तर राज ठाकरेंकडे हा मराठीचा मुद्दा राहिलाच नसता...मराठीच्या मुद्द्यावर आजही राजकारण करता येतं... कारण मराठी माणुस त्याच्याच मुंबईत आणि त्याच्याच राज्यात मागे पडला आहे. शिवसेनेला मराठी माणसांना नोकर्‍यांमधे प्राधन्य मिळवुन देण्यासाठी कोणी रोखलं होत का ? नाही ना...मग घोड अडलं कुठे? आणि हीच शिवसेना उत्तरभारतीयांचे गोडवे गायला सुद्धा मागे राहिली नाही हे एक मराठी म्हणुन मी कसे विसरु ? मी माझ्या एका मित्रा बरोबर याच विषयावर बोलताना त्याला एक प्रश्न विचारला होता... आज लाखोंच्या संख्येने लोक मुंबई,महाराष्ट्रात स्थलांतरीत होत आहेत...रोजगार मिळवत आहेत,तर इथल्या मराठी लोकांना काही गोष्टींमधे प्राधान्य दिल गेल तर बिघडलं कुठे? समजा असेच काही लाख मराठी लोक उध्या दिल्लीत विस्थापीत झाले आणि सगळ्या नोकर्‍यांमधे त्यांची भरती मोठ्या प्रमाणात झाली तर ते तिकडच्या लोकांना सहन होईल का ? मुंबई ही सर्व हिंदुस्थानाची आहे हे जरी खरं असलं तरी दुसर्‍या राज्यांचा विकास झाला नाही म्हणुन त्या राज्यातील लोकांचा मक्ता काही महाराष्ट्राने घेतला नाही. जाता जाता :--- मराठीच्या मुद्द्यावर राजकारण घडुन जर मराठी माणसाचं भल होणार असेल तर अशा राजकारणाला मी वाईट म्हणणार नाही... (मराठी) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

विसोबा खेचर 07/03/2010 - 16:37
आयबीएन लोकमतवर निखील वागळेंनी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावेंचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील दोन बुजुर्ग राजकारण्यांविषयीचे सडेतोड विचार ऐकले / पाहिले.
कोण पुष्पा भावे?? धन्यवाद, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुपचुप 08/03/2010 - 13:52
कोण आहे कोण ही पुष्पा भावे??? "मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..."

In reply to by गुपचुप

नितिन थत्ते 08/03/2010 - 17:19
पुष्पा भावे जाउद्या हो.... कोण हे पवार आणि ठाकरे? ते सांगा आधी. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

चेतन 08/03/2010 - 17:29
वर दिलेलं वाक्य निट वाचा म्हणजे कळेल. खुद के साथ बांता: झोपेचं सोंग घेणार्‍याला ऊठ म्हणतोयसं

शुचि 07/03/2010 - 18:04
>>ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.>> भारतीय घटनेनुसार कोणीही नागरीक भारतात कुठेही जाऊन धन्दा/व्यवसाय करू शकतो. त्यात ठाकर्‍यांचा नाकर्तेपणा कुठे आला? >>शिवसेनेनेने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ भाषेचे उदात्तीकरण केले>>> "लुंगी हटाओ, पुंगी बजाओ" अशा प्रकारची वाक्यं शिवसेनेनी दाक्षिणात्य लोकांना हाकलण्यासाठी वापरली. मग काय वापरायची होती? एव्हरीथिंग इ़ज फेअर इन वॉर. सांस्कृतीक र्‍हास???? मी जेव्हा नोकरी करत होते भारतात, जेवायच्या सुट्टीत एक दक्षिण भारतिय बाई नी जळजळ कमी होइना म्हणून तिथेच विषय काढला - बाळासाहेबाचं म्हणे त्यांच्या सुनेबरोबर ...... मी तो डबा टाकून उठले ..... याला म्हणतात - "सांस्कृतीक र्‍हास" ....... आम्ही तोंडावर शिव्या घालतो हे लोक असलं घाणेरडं पसरवतात/ बोलतात. ठाकर्‍यांच्या व्यक्तीमत्वाला अनेक पैलू आहेत. मार्मीक मधील त्यांची व्यंगचित्रे. अत्रे-ठाकरे जुगलबंदी, मराठी माणसाची त्यांनी जागविलेली अस्मिता. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by शुचि

II विकास II 07/03/2010 - 19:37
तीला इनो द्या. -- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

मुक्तसुनीत 07/03/2010 - 20:47
या मुलाखतीचा विषय इथे दिल्याबद्दल धन्यवाद. प्रस्तावलेखकाने मागे उधृत केलेल्या "आखूड लोकांचा प्रदेश" या लेखाची आठवण झाली. ठाकरे-पवार-महाराष्ट्राचे राजकारण आदि विषय फारच मोठे आहेत; त्यामुळे एकाच चर्चेत, लेखात त्यांचा आवाका एकदम गाठणे कठीण. या माणसांची छाया गेल्या चाळीस वर्षांच्या राजकारणावर पडली आहे. त्यांचे दोष हे त्यांच्या कर्तृत्वापेक्षा मोठे वाटू शकतात. मुलाखतीतले मुद्दे मननीय आहेत आणि ते मुंबईमधे जाहीररीत्या मांडायला धैर्य हवे. ( वागळ्यांनी हे धैर्य शिवसेनेच्या बाबतीत नव्वदीच्या दशकात दाखवले. ) प्रश्न : ठाकरे आणि पवार यांच्या संदर्भात जे मांडले त्यामधे groundbreaking अशा स्वरूपाचे काय आहे ? दुसरे म्हणजे , प्रागतिक म्हणविल्या जाणार्‍या विचारसरणीच्या राजकीय अपेशाबद्दल भावे बाईंना विचारण्यात आलेले दिसत नाही. जनतापार्टी-जनतादल यांच्या अपेशाचे काय ?

In reply to by मुक्तसुनीत

बिपिन कार्यकर्ते 07/03/2010 - 22:17
मुक्तसुनीत आणि विकास यांच्या प्रतिक्रियांशी पूर्ण सहमत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by मुक्तसुनीत

ऋषिकेश 08/03/2010 - 09:24
प्रागतिक म्हणविल्या जाणार्‍या विचारसरणीच्या राजकीय अपेशाबद्दल भावे बाईंना विचारण्यात आलेले दिसत नाही. जनतापार्टी-जनतादल यांच्या अपेशाचे काय ?
याबाबतही प्रश्न विचारला गेला होता. त्यावर त्यांनी अपयशाची कारणे तर दिलीच शिवाय त्याचा परिणाम सांगितला तो मला मननीय वाटला. परिणाम असा की जनतादल / चळवळ करून काँग्रेसविरोधी वातावरण यापक्षांनी तयार केले मात्र ते टिकवता आले नाहि, कारण पक्ष चालण्यासाठी इच्छाशक्ती असली तरी पैसा नव्हता (कारण भांडवलदारांचा पाठींबा नाहि).. या काळात काँग्रेसविरोधाकडे वळलेल्या जनतेला आपल्या वळचणीला बांधण्याचा राजकीय अवकाश उजव्या / अतिउजव्या शक्तींना जनतादलादी पक्षांच्या अस्ताने मिळवून दिला ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

मुक्तसुनीत 08/03/2010 - 09:25
मला हे उत्तरच नीटसे कळलेले नाही. जरा समजावता काय ?

In reply to by मुक्तसुनीत

ऋषिकेश 08/03/2010 - 09:36
यातलं नक्की काय कळ्ळं नाहि? बाकी अवकाश इथे वेळेचे एकक नव्हे तर स्पेस या अर्थी वापरले आहे जनतादलाने काँग्रेसविरोध चेतवला. काहि काळ जनतेने त्यांना पाठबळ दिलं कारण त्यानी जनतेचे विषय हातळले, आंदोलनं केली. मात्र भारतात केवळ जनतेचा पाठिंबा आहे म्हणून पक्ष टिकणं कठीण आहे. पक्ष चालवण्यासाठी लागणारा पैसा मिळेना. याच काळात निर्माण झालेला काँग्रेसविरोधाचा अवकाश (स्पेस) भाजप सारख्या उजव्या किंवा शिवसेनेसारख्या अतिउजव्या पक्षांनी वापरून आपला बेस वाढवला. (बाकी मुसुंना माझं मराठी कळ्ळं नाहि म्हंजे मला उगीचच सेंन्स ऑफ अचिव्हमेंट वाटतंय :P ह घ्यालच) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

विकास 07/03/2010 - 21:32
ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी नक्कीच जनतेचा भ्रमनिरास केला आहे. मात्र माझ्यालेखी पवारांकडून जास्त अपेक्षाभंग झाला आहे. पुलोदच्या झेंड्याखाली स्वतःच्या नेतृत्वाखाली इतर अनेक समाजवाद्यांना (तेंव्हा पुष्पा भावे काय म्हणत होत्या कोण जाणे!) घेऊन काँग्रेसच्या विरुद्ध लढायला निघाले होते, तेंव्हा सतत त्यांच्या नावामागे, "महाराष्ट्राचा बुलंद आवाज" असे विशेषण लावले जायचे. तेंव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात विदुषक म्हणून ओळखले जाणारे तेंव्हाचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले म्हणाले होते की, "हा कसला महाराष्ट्राचा बुलंद आवाज? ही तर बारामतीची पिपाणी!" कधी नव्हे ते हे उद्गार द्रष्टे असल्यासारखे ठरले आणि काही काळातच ही बारामातीची पिपाणी (तत्कालीन) राजीव बँजो बँड मधे सामील झाली. ते झाले म्हणूनही काही बिघडले नाही पण त्या नंतरच्या काळात (स्वत:च्या स्वार्थापोटी, त्यात काँग्रेसचा प्रत्यक्ष संबंध नाही) जे काही चालू केले (विशेषतः सध्याचे कृषिमंत्री म्हणून) ते पहाता खूपच भ्रमनिरास झाला आहे. अर्थात वरील लेखात जे काही लिहीले आहे त्यावरून पुष्पाताईंना केवळ त्यांचे ठाकर्‍यांबरोबरचेच वागणे चुकीचे वाटले, असे दिसतेय. पुष्पाबाईंना "हडळ" संबोधणारी ठाकरी भाषा जशी समर्थनीय नाही तशीच त्यांच्या (ठाकर्‍यांच्या) तोंडातून आश्चर्यकारक देखील नाही. हे म्हणजे, "बोट लाविन तिथे गुदगुल्या मधे एकही अभंग नव्हता", म्हणून टिकाकाराने टिका करण्यासारखे झाले. मात्र (ज्यांच्याबद्दल, सगळे पटले नाही तरी, मला आजही आदर आहे अशा) मृणाल गोरे (ज्यांना ठाकरी भाषेत "घृणाल गोरे" म्हणले गेले होते) त्या पवारांना "कंस की शकुनी" मामा म्हणाल्या आणि पवारांनी त्यांना पुतना मावशी म्हणले तेंव्हा मात्र महाराष्ट्रातील उरल्यासुरल्या राजकारण्यांच्या संस्कृतीची विल्हेवाट लागली असे वाटले होते... आता उरला प्रश्न ठाकर्‍यांनी मराठी माणसाची दिशाभूल केली का याचा: त्याच्याशी मी अंशतः सहमत आहे. दुर्दैवाने पुष्पा भावे अथवा इतर तत्सम विचारवंत अथवा इतर विचारसरणीच्या राजकारण्यांनी मराठी माणसाला काहीच पर्याय दिला नाही. यात भल्याभल्यांची नावे घेत टिका करता येईल पण विषय वाहवत जाईल म्हणून तुर्तास इतकेच...परीणामी ते ठाकर्‍यांना चिकटून राहीले. आजही जो पर्याय आला आहे तो ठाकर्‍यांच्या पठडीतीलच. पण बाळासाहेब ठाकर्‍यांना अटक करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथम सुरु केली. अशा टिकेला वांझोटी टिका, बोट मोडत बसणे, असे म्हणता येईल. एखाद्या वर्गात जर एखादे कार्टे गडबड करत असेल आणि त्यामुळे वर्ग बिघडला तर जबाबदार ते कार्टे की त्या वर्गाचा शिक्षक? मात्र टिका त्या मुलावर करत शिक्षकाच्या निष्क्रीयतेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे काय म्हणावे? अशीच अवस्था राज्यकर्त्यांची आहे. जर त्यांच्यामधे कायदा हातात घेणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचा दम नाही तर दुर्दैवाने खरेच "माईका लाल" जन्माला आला नाही असे म्हणावे लागणार नाही का? बरं हे देखील, (मस्तवाल भाषेविरुद्ध आवाज उठवण्याचा) संपुर्ण शिवसेनेचा इतिहास पहाता तितकेसे खरे नाही आहे. त्यासाठी तुम्हाला ठाण्यात मारोतराव शिंदे म्हणून कोण होते ह्याचा मागोवा घ्यावा लागेल... ऐकीव गोष्टींप्रमाणे, या तत्कालीन नगराध्यक्षाने ठाकर्‍यांना त्यांच्याच सभेत मागता क्षणी शिंद्यांनी आव्हान दिले होते... भुजबळ-राणे-राजसमर्थक असे नंतर अनेक निघालेतच. कोर्टाने बंद केल्याबद्दल दंड केल्यावर आलेच का नाहीत ते नंतर ताळ्यावर? निवडणूक आयोगाने जी बंधने घातली ती कशीबशी का होईना पाळावी लागलीच ना? पण काँग्रेसच्या सरकारला ज्याने बहुतांशी वेळ महाराष्ट्रावर राज्य केले त्यांना असले प्रश्न सोडवण्याची इच्छा (म्हणजे कायदा हातात घेतल्यास योग्य कारवाई करण्याची राजकीय इच्छाशक्ती) आहे असे वाटते का? "politics is the art of looking for trouble, finding it everywhere, diagnosing it wrongly and applying unsuitable remedy", असे कोणी तरी म्हणून ठेवलेले काँग्रेसजनांना चांगले अंगभूत माहीत आहे. असो. दिसली ती फक्त दया. दया? अहो हा फार मोठा शब्द आहे. गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, गांधीजी अशा मोठ्या माणसांनी तो वापरला पण स्वतः समर्थ राहून, दुर्बळतेतून नाही. ज्या बुद्धीवंतांचा राज्यकर्त्यांनी खेळवत ठेवून वापर केला त्यांना कसली आली आहे दया? पण वरील विभूती सोडल्यास सामान्य जगतातील दयेचे उदाहरणच हवे आहे का? सांगतो: कधी काळी पुष्पा भाव्यांना एक सरकारी पारीतोषिक मिळाले होते. सभास्थानी कोणीतरी एक प्राचार्य/लेखक होते (आता आठवत नाहीत), पण अध्यक्ष म्हणून तत्कालीन नभोवाणी मंत्री वसंत साठे होते. त्यावेळी अनेकांचे असे म्हणणे होते की बक्षिसे मंत्र्यांच्या हातून देऊ नयेत म्हणून. तो ज्याचा त्याचा मुद्दा, तसे वाटण्यात काहीच गैर नाही. मला देखील पटते. मात्र एकदा का बक्षिस स्विकारले आणि सभास्थानी आलो की त्या सभेचा मान राखणे ही कदाचीत शिवसेनेसारख्यांना समजणार नाही पण बुद्धीवाद्यांना सहज समजू शकेल - किमान संस्कृती आहे. म्हणजे हे पुष्पा भाव्यांना समजायला हवे होते. पण झाले भलतेच. त्यांचे नाव पुकारताच, व्यासपिठावर त्या गेल्या आणि माईक हातात घेऊन जोरदार निषेष करू लागल्या की, "मी मंत्र्यांच्या हातून बक्षिस घेणार नाही!" असे म्हणत असताना त्यांनी वास्तवीक त्या सभास्थानाचा आणि (मंत्री असला तरी त्यावेळेच्या)अतिथीचा अपमान करून सभेच्या यजमानांना लाजीरवाणी वेळ आणली. आता या आरडाओरडीला कसे तोंड देयचे आणि काय करायचे हा प्रश्न होता.. पण आमचे वसंतराव साठे तसे हुश्शार! त्यांनी लगेच सगळ्यांवर दया दाखवली आणि स्मीत हास्य करत म्हणाले, "ठिक आहे माझ्याकडून घेऊ नका, या प्राचार्य/लेखकांकडून घ्या!" :-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

नेहमीप्रमाणे विकासजींनी सर्वांगसुंदर प्रतिक्रिया लिहिली आहे. जय हो! खरंच बाळासाहेब "हिंदुहृदयसम्राट"च्या मागे गेले नसते तर मराठी माणसाचे कल्याण झाले असते. पण त्यांना तो मोह झाला व संजय निरूपम (जो बाळासाहेबांचे दूध पिऊन त्यांनाच डसला!), प्रितिश नंदी यांच्यासारखे अमराठी खासदार त्यांनी निवडले. संजय दत्तला विनाकारण सोडवले, तर त्यानेही शिवसेनेच्या मधुकर सरपोतदारांना पाडून व प्रिया दत्तला निवडून आणून त्या उपकाराचे पांग फेडले. इतर कुठल्या पक्षाने मराठी माणसासाठी काम केले असते, त्याच्या रोजीरोटीसाठी आवाज दिला असता तर शिवसेनाप्रमुख 'मार्मिक' चालवत एव्हांना सेवानिवृत्त झाले असते. पण इतर सगळ्याच पक्षांनी मराठी लोकांना "taken for granted" वागणूक दिली (जी आज भाजपखेरीज बहुतेक सर्व पक्ष हिंदूंना देत आहेत) म्हणून शिवसेना जन्मली. भाजपही हिंदूंच्या नावावर सत्तेवर आली. पण नंतर त्या दोन्ही पक्षांचे विचार पातळ (dilute) झाले व त्यातच दोन्ही संघटना झोपल्या! पण पवार व बाळासाहेब यांच्यात बाळासाहेब पन्नास पटीने सरस. ------------------------ सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)

In reply to by सुधीर काळे

नितिन थत्ते 09/03/2010 - 19:46
>>संजय दत्तला विनाकारण सोडवले, तर त्यानेही शिवसेनेच्या मधुकर सरपोतदारांना पाडून व प्रिया दत्तला निवडून आणून त्या उपकाराचे पांग फेडले. ते उपकार त्याच्या वडिलांनी एका निवडणुकीला उभे न राहून आधीच फेडले होते. (स्मरणशील)नितिन थत्ते
बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांचे 'आठ आणे' काम तरी नक्की केले. पण पवारांनी एक पैशाचेही केले नाहीं. पण मधेच बाळासाहेबांना 'हिंदुहृदयसम्राट' ही पदवी खुणावू लागली, त्यांच्या अजेंड्यावर 'मराठी'पेक्षा 'हिंदू' या शब्दाने अग्रस्थान घेतले व तेंव्हापासून त्यांचा व मराठी लोकांचा र्‍हास सुरू झाला. मदनबाण म्हणतात "जर शिवसेनेने मराठी माणसाचे भले केले असते तर राज ठाकरेंकडे हा मराठीचा मुद्दा राहिलाच नसता" हे १०० टक्के खरे आहे. रामायणात असे वाचलंय् कीं एका प्रसंगानंतर परशुरामांना असे जाणवले कीं आता रामावतार सुरू झाला असून आपले अवतारकार्य संपले आहे. म्हणून ते त्यानंतर सक्रीय राहिले नाहींत. ही कल्पना बाळासाहेबांना कधी येणार? त्यांचे राजकीय अवतारकार्य संपले असून आता त्यांनी ती मशाल राजाभाऊंच्या (राज) हाती द्यावी यातच त्यांचे व मराठी जनतेचे कल्याण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र! ------------------------ सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)

अक्षय पुर्णपात्रे 07/03/2010 - 21:59
श्री राव, मुलाखतीचा सारांश येथे दिल्याबद्दल धन्यवाद. पुष्पाताईंचे धैर्य कौतुकास्पद आहे. त्यांनी मांडलेली मते मला तरी पटतात.

राजेश घासकडवी 07/03/2010 - 22:26
इतक्या चर्चा कशा होऊ शकतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे. एकट्या पुष्पा भावेंनी काहीतरी आकडे देऊन आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने अस्मिता जागृत केली, राजकारणावर छाया पडली, शिवसेनेने खूप काही केलं -पवारांनी काहीच नाही केलं, मराठी माणसाचा ऱ्हास झाला, सांस्कृतिक ऱ्हास झाला... व्यक्तीनिरपेक्ष काहीतरी आपल्याला शोधता येईल. मराठी माणसाचं सरासरी उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेत वाढलंय का? शिक्षणाचं प्रमाण वाढलंय का? शिवसेनेने कुठचे प्रकल्प राबवले? त्याला किती यश आलं? त्या तुलनेने कॉंग्रेस राजवटीत काय झालं? काहीतरी मोजून बघा की राव. एकीकडे आपणच बोंब मारतो की व्यक्तीपूजेचं स्तोम माजतंय म्हणून. आणि दुसरीकडे कोणी कशा लढाया केल्या, कोणी कोणाला टक्कर दिली आणि कोणी कोणाचा झेंडा वर केला याशिवाय दुसरं काही बोलत नाही. आपण पक्ष निवडून देतो ते जनतेचं आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक भलं करण्यासाठी. ते झालं की नाही याबद्दल का कोणी बोलत नाही? नुसत्याच असल्या चर्चा म्हणजे 'माझ्या वडलांची काठी तुझ्या वडलांच्या काठीपेक्षा लांब आहे' असली भांडणं वाटतात. तेही काठीची लांबी न मोजता!

In reply to by राजेश घासकडवी

अक्षय पुर्णपात्रे 07/03/2010 - 22:45
आकडेवारीसकट चर्चा होणे योग्यच आहे. आकडेवारी असली तरी न पटलेले आकडे विश्वासार्ह नसल्याचे सांगितले जाते. (एका ब्रिटीश युनियन लिडरच्या आतमचरित्रातले 'figures can lie and liers can fugure' हे वाक्य आठवले.) अशा प्रकारच्या चर्चांमध्ये अ‍ॅनेक्डोटल पुरावे, स्वानुभवांवर आधारित अपर्‍या सँपल स्पेसवरून काढलेले निष्कर्ष ठामपणे मांडले जातात. पुष्पा भावे यांनी एका मुलाखतीत किती लोकांचा/ पक्षांचा आढावा घ्यायला हवा होता, हे समजत नाही. एकाच मुलाखतीकडून सर्व राजकारणाचा धांडोला घ्यावा, ही गैरवाजवी अपेक्षा आहे.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

राजेश घासकडवी 07/03/2010 - 23:06
पुष्पा भावे यांनी एका मुलाखतीत किती लोकांचा/ पक्षांचा आढावा घ्यायला हवा होता, हे समजत नाही. एकाच मुलाखतीकडून सर्व राजकारणाचा धांडोला घ्यावा, ही गैरवाजवी अपेक्षा आहे.
माझा रोख पुष्पा भावेंवर नव्हता. उलट त्यांनी काही आकडे देण्याचा प्रयत्न तरी केला आहे असं वाटतं. आपण मिपावर, किंवा इतर संस्थळांवर चर्चा करताना किंवा विचारवंत राजकारणाविषयी बोलताना आकडे न वापरता "अ‍ॅनेक्डोटल पुरावे, स्वानुभवांवर आधारित अपर्‍या सँपल स्पेसवरून काढलेले निष्कर्ष ठामपणे" मांडतो. त्यातून सत्य प्रतीत होईल अशी आपली अपेक्षा आहे का? की अर्धवट ज्ञानचित्रांच्या कोलाजची एक सुंदर कलाकृती निर्माण करण्याचा उद्देश असतो? राजेश

In reply to by राजेश घासकडवी

अक्षय पुर्णपात्रे 07/03/2010 - 23:20
राजेश, उपप्रतिसाद तुझ्या प्रतिसादाला दिला याचे कारण आकडेवारीसकट चर्चा व्हावी या मताशी मी पूर्ण सहमत आहे. भावेंविषयी ('एकट्या पुष्पा भावेंनी काहीतरी आकडे देऊन ...') प्रतिसादात मत नसून ते वरील चर्चेसंदर्भात आहे, हे ही मला कळले होते. श्री सुनीत यांचा जनता दल अपयश तसेच श्री विकास यांचा पर्याय सूचवण्याची गरज या मतांना एकत्रितपणे प्रश्न होता. सगळी गडबड झाली. सर्दीवर खापर फोडतो.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

विकास 09/03/2010 - 20:43
नमस्कार अक्षयराव, आपण या प्रतिसादांचा संदर्भ इतरत्र दिलेला दिसल्याने आणि माझ्या मूळ प्रश्नाला उत्तर न मिळाल्याने परत एकदा विचारतो: कृपया पुष्पा भाव्यांनी नक्की वरती काय आकडेवारी दिलेली दिसते आहे? जी कुठलाही समाजशास्त्रज्ञ, सांख्यिकीतज्ञ आकडेवारी म्हणून मानून अनुमान काढू शकेल? धन्यवाद -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

अक्षय पुर्णपात्रे 09/03/2010 - 20:59
श्री विकास, तुमचा मूळ प्रश्न राजेश यांच्या विधानाचा उल्लेख करून असल्याने मी उत्तर देण्याचा (बर्‍याचवेळा इच्छा होऊनही) प्रयत्न केला नाही. राजेश यांनी पुष्पाताईंनी आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे असे नमूद केलेले आहे. माझे मत राजेश यांच्या मताशी तंतोतंत जूळत नाही पण काही प्रमाणात सारखे आहे. माझे मत असे आहे: पुष्पाताई भावे यांच्या मुलाखतीच्या सारांशावरून काहीएक आकडेवारी त्यांच्याकडे मागितल्यास मिळू शकेल असे सूचित होते. मूळ मुलाखतीत त्यांनी कितपत आकडेवारी दिली आहे याबाबत मला कल्पना नाही पण इतरत्र वाचलेल्या त्यांच्या लेखनावरून त्यांचे बरेच युक्तिवाद आकडेवारीवर आधारीत असल्याचे लक्षात येते.(मला पुष्पाताईंची सर्व मते पटत नाहीत.) या मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत (विशेषत: श्री ठाकरे आणि श्री पवार यांच्या संदर्भात) मते पटली. वरील सारांशात पुष्पाताईंनी दादरमधील मराठी व अमराठी दुकानांच्या चाळीस वर्षांपुर्वीची आणि नंतरची संख्या यांची तुलना केली आहे. जे काहीएक आकडेवारी असल्याचे निर्देशीत करते. याउलट खाली झालेल्या चर्चेत मते आकडेवारीवर आधारीत असल्याचे (म्हणजे ती नसतीलच असे नाही) दिसून येत नाही. म्हणून मी राजेश यांच्या मतास दुजोरा दिला. राजेश यांच्या मतानुसार आकडेवारीवर आधारीत चर्चा करण्याची पुष्पाताईंची तयारी दिसते तर इतर चर्चासहभागकांमध्ये ती आढळत नाही. अर्थात राजेश यांना काय म्हणायचे होते त्यावर तेच प्रकाश टाकू शकतील.

In reply to by राजेश घासकडवी

विकास 08/03/2010 - 19:43
(गेल्या दोन दिवसांत (माझ्या मोठ्या प्रतिसादानंतर येथे नसल्याने कशालाच उत्तर दिलेले नाही. तेंव्हा थोडे वराती मागून घोडे ठरू शकेल :) ) माझा रोख पुष्पा भावेंवर नव्हता. उलट त्यांनी काही आकडे देण्याचा प्रयत्न तरी केला आहे असं वाटतं. वरील लेखातले नक्की काय वाचून पुष्पा भाव्यांनी आकडेवारी दिली असे आपल्याला म्हणायचे आहे? कृपया समजावून सांगावे. धन्यवाद. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

शुचि 08/03/2010 - 20:38
४० वर्षे ब्ल्याक्मेलींग .... बगा की राव आकडा =)) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by राजेश घासकडवी

विसोबा खेचर 07/03/2010 - 23:43
एकट्या पुष्पा भावेंनी काहीतरी आकडे देऊन आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अहो पण कोण या पुष्पा भावे?? मी तरी कधी नाव ऐकलं नाही. कुणी समजावून सांगेल काय? मी हाच प्रश्न वारंवार विचारून राहिलो आहे..! आपला, (बाळासाहेबांचा चाहता) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शुचि 07/03/2010 - 23:48
=)) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by विसोबा खेचर

चिंतातुर जंतू 08/03/2010 - 10:39
या दुव्यात तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाने होऊ शकणार्‍या मराठीच्या गळचेपीविषयी पुष्पा भाव्यांनी मांडलेले विचार आहेत. त्याशिवाय पुष्पा भावे यांचे मराठी नाटकांविषयीचे अनेक अभ्यासपूर्ण लेख पूर्वी वाचल्याचे स्मरते. मराठी स्त्रियांसाठी झटलेल्या आणि विदुषी म्हणवून घेता येईल इतपत मराठी नाटक/साहित्याविषयी लिखाण केलेल्या पुष्पा भाव्यांविषयी (निव्वळ त्यांच्या राजकीय भूमिकेपायी) अनेक ठिकाणी ओकली गेलेली गरळ वाचून आणि आठवून महाराष्ट्राच्या एकंदर बौध्दिक आणि सांस्कृतिक र्‍हासाची जाणीव या महिला दिनी झाल्यावाचून राहात नाही. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

नाखु 08/03/2010 - 09:48
तात्यासाहेब हा "थोर विचारवंतानी" (खरे तर हिंदु द्वेषी विचारजंत) केलेला "डोंबार खेळ " आहे... अवलादी "वागळे" (सेना द्वेषि) आणि पुष्पा बाई (शबानाचा मराठी अवतार) काय बाळासाहेबांवर स्तुती सुमने ऊधळणार आहेत का? बिल्कुल धर्मनिरपेक्श नसलेला.. खुळा (नाद)

वेताळ 08/03/2010 - 09:59
खरतर पुष्पा भावेंनी महाराष्ट्रासाठी कार्य काय केले हे विचारले जाणे हिच त्याच्या उदांत कार्याची पावती आहे. :D निव्वळ मोठ्या लोकाच्यावर टिका करणे हेच त्याचे आतापर्यतचे कार्य आहे.त्यात त्याना मर्कट भेटला मग त्यानी लोकमत वर तमाशा केला.खरतर निखिल वागळेनी आयुष्यात एकच ध्यास घेतला आहे कि मरेपर्यत ठाकरे कुंटुबियांवर टिका करीत राहिन. इतर महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रश्नाकडे हा इसम गंभीरपणे बघत नाही.जर त्याच्या मनाविरुध्द एकादी गोष्ट होत असेल,कोणी बोलत असेल तर तो कसा आकांडतांडव करतो ते बघण्यासारखे असते. वेताळ
=(( सर्व मराठी माणुस जर शिवसेनेच्या पाठीशी उभा रहिला असता तर मराठी लोकान्चे भले झाले असते मतदानावेळी दुसर्‍या पक्षाला मतदान करायचे वा पिकनिकला जायचे आणि शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केले हे बोम्बलत हिन्डायचे तुम्हि कायम निवडुन दिलेल्या इटालियन कॉन्ग्रेस व भ्रष्ट्न्वादि कॉन्ग्रेस यानी मराठी माणसाची कायम वाट्च लावलीय - याकडे दुर्लक्ष करायचे हि तथाकथित अतिविद्वान लोकान्ची तचेस पत्रकरान्ची सवयच आहे निव्वळ मोठ्या लोकाच्यावर टिका करणे हेच त्याचे आतापर्यतचे कार्य आहे.त्यात त्याना मर्कट भेटला मग त्यानी लोकमत वर तमाशा केला.खरतर निखिल वागळेनी आयुष्यात एकच ध्यास घेतला आहे कि मरेपर्यत ठाकरे कुंटुबियांवर टिका करीत राहिन. इतर महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रश्नाकडे हा इसम गंभीरपणे बघत नाही.जर त्याच्या मनाविरुध्द एकादी गोष्ट होत असेल,कोणी बोलत असेल तर तो कसा आकांडतांडव करतो ते बघण्यासारखे असते. हे एकदम बरोबर

भारद्वाज 08/03/2010 - 20:28
इतर महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रश्नाकडे हा इसम गंभीरपणे बघत नाही.जर त्याच्या मनाविरुध्द एकादी गोष्ट होत असेल,कोणी बोलत असेल तर तो कसा आकांडतांडव करतो ते बघण्यासारखे असते. ...१०० % सहमत
माझे पण सॉफ्टवेअर संबंधी काही लेख प्रसिद्ध झाले आहेत. मला पण पुणे युनिव्हर्सिटीकडून गोल्डमेडल मिळालं आहे (म्हणजे सरकारी बक्षीसच की!!!) मुलाखतीत माझ्या या क्षेत्राबद्द्ल न बोलता मी ठाकरे, पवार यांच्या विषयीची माझी सडेतोड मतं मांडणार आहे.. तेव्हा वाचक हो उद्याच्या अश्याच एका लेखाची प्रतिक्षा करा. काय म्हणता माझा आणि राजकारणाचा काय संबंध?..काय अभ्यास? अशी काही requirement आहे असं निखीलजी काही म्हणाले नाहीत..आणि त्यांनी लिहुन दिलेल्या माझ्या "सडेतोड विचारां" मधे पण असा काही उल्लेख नाही आहे.

प्रशु 09/03/2010 - 21:14
महिला विधेयकाला विरोध करणार्या समाजवादीं बद्द्ल पुष्पा का बोलत नाही?

उल्हास 10/03/2010 - 22:58
कावेबाईनी जनता दल , समाजवादीनी काय काय थेर केली याकडे कधी तरी ल़क्ष द्यावे आपल्या ताटात पड्लेले गाढव पहा मग दुसर्‍याच्या ताटात माशा आहेत का याची उठाथेव करा