मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ठाकरे आणि पवार नाकर्ते राजकारणी - पुष्पा भावे यांचे मत

सन्जोप राव · · काथ्याकूट
आयबीएन लोकमतवर निखील वागळेंनी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावेंचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील दोन बुजुर्ग राजकारण्यांविषयीचे सडेतोड विचार ऐकले / पाहिले. त्यांच्या मते: १. बाळासाहेब ठाकर्‍यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडीत आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्‍यांनी केले नाही. ज्या दादर बांद्र्यात शिवसेनेनेने मराठी माणसाला उचलून धरल्याचा दावा केला, त्या भागात अमराठी दुकानांची आजची संख्या चाळीस वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे. २. गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्रातील सांस्कृतिक र्‍हासाचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना. शिवसेनेनेने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ भाषेचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा शिवसेनेने महाराष्टाच्या राजकारणात आणला. 'सामना' मधील कित्येक उतार्‍यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण बाळासाहेब ठाकर्‍यांना अटक करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथम सुरु केली. ३. शिवसेनेचे मराठी कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. मुंबईत मराठी माध्यमातून सुरु झालेल्या काही महाविद्यालयीन अभ्यासक्रमांना पहिला विरोध शिवसेनेचा होता. ४. शरद पवार शिवसेनेची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले. शिवसेनेला ताब्यात ठेवणे त्यांना शक्य असूनही त्यांनी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्यांच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता. ५. 'एक सुसंस्कृत राजकारणी' ही शरद पवारांची ओळख फारशी खरी नाही. इतर काँग्रेस नेत्यांच्या मानाने त्यातल्या त्यात मवाळ भाषा व काही साहित्यीक वर्तुळांत उठबस एवढा फरक सोडला तर शरद पवार आणि इतर काँग्रेसचे नेते यांच्यात काही फरक नाही. 'यशवंतराव चव्हाणांनंतरचा महाराष्ट्रातला द्रष्टा नेता' हे शरद पवारांचे वर्णन निरर्थक आहे. ६. राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद ही चाळीस वर्षे शिवसेनेत राहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेही बाळासाहेब ठाकर्‍यांप्रमाणेच उथळ आणि सवंग वक्तृत्व या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता चाळीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील. शिवसेनेने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. भुजबळ राणेंपासून सचिन तेंडुलकरांपर्यंतची उदाहरणे आहेत. पुष्पा भावे या तर फार पूर्वीपासून शिवसेनेच्या हिटलिस्टवर असणार्‍या. त्यांना बाळासाहेब ठाकर्‍यांनी ज्याला 'खास ठाकरी भाषा' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'हडळ' वगैरे म्हणून घेतले आहे. पुष्पा भावेंच्या या मुलाखतीत ठाकरेंबद्दलचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्‍या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.

वाचन 24238 प्रतिक्रिया 0