मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत` - भाग २

प्रकाश घाटपांडे · · काथ्याकूट
भाग १ वरुन पुढे चालु शुद्ध बिनडोकपणा या नाडी-पट्ट्या व्यक्तिश: एकेका जातकासाठी नावानिशी बनवलेल्या असतात असे सांगणे म्हणजे शुद्ध लुच्चेगिरी आहे. कां ते पहा. जर पट्टयांवर व्यक्तीचे नाव, वडिलांचे नाव, जन्मकुंडली हे सर्व कोरलेले असेल तर तशा ३६०० पट्ट्या फक्त ३६०० गि हाइकांनाच पुरतील. जिथे रोजची १०-१५ गि-हाइके येत आहेत तिथे एवढ्या पट्ट्या एका वर्षातच संपून जातील. मग ही केंद्रे इतकी वर्षे चालली आहेत कशी? त्याच त्याच पट्ट्या वारंवार वापरल्याशिवाय ती चाललेली नाहीत हे उघड आहे, आणि तसे करायचे तर पट्टी वाचत श् असल्याचे ढोंग करण्यावाचून काय पर्याय आहे? ते ढोंग उघडकीस येऊ नये एवढ्यासाठीच तर कूट लिपीची योजना. झाकली मूठ सव्वा लाखाची! आणखी एक मुद्दा मांडतो. पृष्ठ १९३ वर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे. (आम्ही म्हणतो की, असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना ? हा प्रश्न विचारायचे कारण असे की, याच पानावर ओक म्हणतात की रोज कमीत कमी २०० लोक, असे २००० वर्षांच्या कित्येक शतके आधी(पासून घडत असावे) असा त्यांचा अंदाज आहे. पृष्ठ ८४ वर त्यांनी ८-१० हजार वर्षांच्या प्राचीनतेचा अंदाज दिला आहे. आता हे आकडे घेऊन जर कुणी हिशोब करायला बसला तर बंडलांची संख्या कित्येक कोटींच्या घरात जाईल, आणि पट्ट्यांची संख्या अब्जांच्या घरात जाईल. एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, अशा शंका डोळस श्रद्धाळू? माणूस सुद्धा घेईल. यावर ओकांचे म्हणणे असे असावे की पट्टयांची संख्या अशी अफाट नसतेच मुळी, मोजकीच असते! पृष्ठ १२१ वर ते म्हणतात 'या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदशन होत राहील यात शंका नाही.' ओकांचे हे विधान त्यांच्या बिनधास्त व बिनडोकपणाचे द्योतक आहे. पट्टयांची संख्येने कमी वाटल्या म्हणजे काय ? कशाच्या मानाने कमी वाटल्या ? गि-हाईकांच्या संख्येच्या मानाने कमी वाटल्या असे त्यांना म्हणावयाचे आहे काय? म्हणजेच ३६०० ही आम्ही वर काढलेली बेसीक संख्याच बरोबर आहे असेच त्यांना म्हणावयाचे आहे ना. पट्टीवरचा कोरलेला मजकून कोण बदलतो, कसा बदलतो, कधी बदलतो याचा काहीही खुलासा ते करीत नाहीत! ठीक आहे ते नसतील करत तर आम्ही करतो :- गि-हाईकांला नाडीपट्टी वाचून दाखवायचे सोंग करीत असलेला स्वामी वास्तविक स्वत:च्या मनाशी जुळविलेला मजकूर घडाघडा ''वाचत`` असतो! एक गि-हाईक गेल्यावर दुसऱ्या गि-हाईकापुढे पुन्हा तीच पट्टी पण मजकूर वेगळा असे करून वाचण्याचे सोंग जरी त्याने केले तरी हे अजब नाटक कूट लिपी या प्रकारामुळे उघडकीस येणे शक्य नसते. हे सत्य खुद्द ओकांनीच सांगितले आहे म्हणून बरे झाले. ''पट्टीवरचा मजकूर बदलतो`` याचा खरा अर्थ हा असा आहे. या विंग कमांडरांची कमांड फक्त त्यांच्या कल्पनावारूच्या विंगवर आहे पण बुद्धी नाडीकेंद्राकडे गहाण पडली आहे हे मात्र यावरून स्वच्छ दिसते. अं. नि. स.चे एक प्रमुख कार्यकर्ते श्री. ओंकार पाटील यांनी स्वत: चेन्नईच्या आसपासच्या नाडीकेंद्रांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला आहे व तो किर्लोस्कर मासिकाच्या दिवाळी (१९९६) अंकात प्रसिद्ध केला आहे तसेच अं.नि.स.ने प्रकाशित केलेल्या प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या यातही त्याचा समावेश केला आहे. त्यांचा तो लेख मुळातूनच वाचला पाहिजे. नाडी-पट्टी शोधून काढण्याच्या बहाण्याने पृच्छकाला अक्षरश: शेकडो प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घ्यायची आणि नंतर नाडी-पट्टी वाचण्याचा देखावा करीत तीच माहिती त्याला ऐकवायची असा प्रकार इथे चालतो. ओंकार पाटलांच्याकडून त्यांची जन्म-वेळ अशीच त्या नाडीवाचकाने त्यांच्याकडून काढून घेतली आणि तिच्यावरून तामिळी पद्धतीची कुंडली बनवून त्यांना दिली पण भासवले मात्र असे की ती कुंडली पट्टीतच लिहिलेली होती. ( १७०० वर्षापूर्वीच्या ज्योतिषाला विसाव्या शतकातल्या कुंडल्या कशा बनवता आल्या हा तांत्रिक प्रश्न ओकांना व त्यांच्या साथीदारांना जिथे समजणेच शक्य नाही तिथे त्यातली लबाडी कुठून कळणार ? ) श्री. पाटील यांना या कुंडलीत काही गम्य नव्हते. खरा चमत्कार तरी कोणता? नाडीपट्टीवर कूट लिपीत खरोखरी काय लिहिलेले असते हे निदान मराठी माणसाला कळणे शक्य नसते, नाडी-वाचक म्हणेल ती पूर्वदिशा अशी तिथे स्थिती असते. या संदर्भात आम्ही प्रस्तुत पुस्तकातील पृष्ठ १२ वरील ओकांच्या पत्रातील ओळी उद्धृत करतो: 'आपण पुरवतो ती माहिती तुमचे ताडपत्र हुडकायला मदत करण्यासाठी आहे. तीच माहिती हजारो वर्षापूर्र्वी कूटलिपीत तेही तामीळसारख्या सुदूर प्रदेशातील भाषेत कोरलेली कशी हाच तर चमत्काराचा पाया आहे.' पण हा पायाभूत चमत्कार खरोखरीच घडला आहे की नाही हे ठरवायचे कुणी आणि कशाच्या आधारे ? तामिळी भाषा जाणणा यांच्या साक्षी दोन्ही बाजूकडून काढल्या गेल्या, पण त्या अगदी टोकाच्या विरोधी आहेत. मग यातून मार्ग काय ? ओकांनी ज्या तामीळ-जाणकारांकडून पृष्ठ ४ वरील माहिती मिळवली ते लोक कूट लिपीची मूळाक्षरे आणि कोणत्याही एका अक्षराची बाराखडी तामिळ लिपीत रूपांतरित करू शकतील तर तामीळ अक्षरांचे देवनागरीत रूपांतर कुणीही संस्कृत जाणणारा तामीळ माणूस करू शकेल. अशा रितीने कूट लिपीतील नावांची शहानिशा मराठी माणूस करू शकेल. आम्ही तर असे म्हणतो की ओकांना जर एवढी तळमळ लागली असेल तर त्यांनी त्या कूट लिपीची मूळाक्षरे आणि एका अक्षराची बाराखडी त्यांच्या स्वामींच्या मदतीने देवनागरी लिपीत रूपांतरित करून प्रसिद्ध करावी. संस्कृत जाणणा या दाक्षिणात्य लोकांना देवनागरी लिपी चांगली ठाऊक असते. त्या कूटलिपीतल्या सांकेतिक चिन्हांशी आणि शब्दांच्या सांकेतिक अर्थाशी आम्हाला काही कर्तव्य नाही, ओकांनीच ज्या पट्टीत जातकाची नांवे कोरलेली नाहीत त्या बद्दल माझी नाडी भविष्याची मते लागू नाहीत असे पृ.१३९ वर सांगितले आहे म्हणून आम्ही फक्त नावांची शहानिशा करू इच्छितो, आणि ती करण्याचा एवढा एकच मार्ग आम्हाला दिसतो. कूटलिपी हेच जर त्या अगस्त्य नाडी-केंद्राच्या चालकांचे ट्रेड-सीक्रेट असेल तर ते तिची गुरुकिल्ली ओकांच्यासुद्धा हाती लागू देणार नाहीत. जर तसे नसेल तरच ओक ती किल्ली मिळवू शकतील. आमच्यासारख्यांना ही गोष्ट अशक्य आहे हे आम्ही कबूल करतो. नाडीकेंद्रात कुणी जास्त चौकसपणा करीत असल्याचा संशय जरी आला तरी काय होते ते श्रीकांत शहांनी व ओंकार पाटलांनी अनुभवले आहे.( महर्षींचा अपमान केला म्हणून केंद्रातून डच्चू मिळाला नाही हे नशीब! ) आम्ही ओकांना अशी विनंती करतो की ही गुरुकिल्ली त्यांनी मिळवून प्रसिद्ध करावी. तसे केल्याशिवाय 'चमत्कार की धूळफेक ?' या कोड्याचा उलगडा त्यांना व्हायचा नाही. नाडी-पट्टी वाचणारा काय कुठेही बोट ठेवून म्हणेल की हे पहा इथे तुमचे नाव! आमच्या हातात त्या लिपीची मूळाक्षरे असली तरच आम्ही आमची खात्री करून घेऊ शकू. एरवी आम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा ? अंगठयाच्या ठशाचा उपयोग नाडीची बंडले शोधण्यात कसा होतो हेही सिक्रिट गुलदस्त्यात! पोलीस खात्याच्या अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मते अंगठयाचा प्रत्येक व्यक्तिचा ठसा हा 'युनिक` असतो. त्या ठशाचे पॅरामिटर्स पुन्हा कधीही रिपीट होत नाही. तसे नसते तर अंगुलीमुद्राशास्त्र केव्हाच मोडीत निघाले असते. ओकांचा हेतू तरी काय ? श्री. ओकांच्या कल्पना-रंजनावरून कुणाला असे वाटेल की मोठमोठ्या महर्षींच्या मार्गदर्शनाखाली आश्रमातील शिष्यांचे तांडेच्या तांडे ताडांच्या झावळ्यावर भाकिते कोरून काढण्यातच आपले ज्ञानार्जनाचे तरुण वय वाया घालवीत होते. अब्जावधि पट्ट्या त्यांनी कोरून लिहिल्या असल्या पाहिजेत. असे जर खरोखरीच घडले असेल तर आम्ही म्हणू धन्य ते महर्षी आणि धन्य ते शिष्यगण! आगामी शेकडो पिढ्यांचे कल्याण ( ! ) साधण्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य वेचले, आणि आजही ओकांच्यासारखे झपाटलेले नाडी-ऎडिक्ट आपली सरकारी नौकरी संभाळून नाडी भविष्याचा म्हणजे पर्यायाने नाडी-केंद्रांच्या धंद्याचा प्रचार 'लोकांच्या कल्याणासाठी' करीत आहेत. आम्हाला पडलेला प्रश्न एवढाच आहे की, आपल्याला आधीच ठाऊक असलेल्या गोष्टी ताडपट्टीत लिहिलेल्या आहेत एवढे कळल्यामुळे कुणाचे व काय कल्याण होते ? खुद्द ओकांनाच हा संभ्रम पडला आहे हे विशेष! ( पहा: पृष्ठ ८ पॅरा २). नाडीकेंद्राचा अनुभव घेतलेल्या अनेकांना आम्ही विचारले की तिथे गेल्यामुळे तुमचा प्रत्यक्ष असा काय फायदा झाला? काही उत्तर मिळाले नाही. म्हणजे मग हा सगळा उपद्व्याप श्री. ओक कुणासाठी व कशासाठी करीत आहेत हा प्रश्न पडतो. ते नाडी-केंद्रांचे एजंट आहेत असे कुणी म्हणू नये यासाठी पृष्ठ ७९ वर त्यांनी जो निर्वाळा दिला आहे त्यावर समजा आपण विश्वास ठेवला, तरी मूळ प्रश्न शिल्लकच रहातो. आम्हाला असे वाटते की प्रसिद्धीची हाव आणि एक सनसनाटीचा आनंद मिळवणे एवढ्यासाठीच ते हा खटाटोप करीत असावेत. त्यात त्यांचा स्वार्थ नाही! ओकांच्या धडाकेबाज प्रचारामुळे मराठी माणसे अधिक प्रमाणात नाडीभविष्य पहायला जाऊ लागली असे त्यानीच म्हटले आहे, त्यामुळे तिथल्या स्वामीलोकांचे कल्याण नक्कीच झाले असेल. 'होई ना का बापडे, आपले काय जाते ? परिहार-विधी करण्यासाठी मराठी माणसांचे लाखो रुपये खर्च पडले असतील. पडेनात का जाईनात, आपले चार चव्वल थोडेच खर्च होताहेत ?' बहुतेक तटस्थ लोक असाच विचार करीत असावेत, पण अं. नि. स. ला हे पटत नाही. तिच्यावर खार खाणा-यांनी निदान एवढा तरी विचार करावा की तिच्या प्रचार-कार्यामुळे सर्वसामान्यांचे काही नुकसान तर होत नाही ना, - जसे ओकांच्या प्रचारामुळे ते होत आहे. श्री. ओकांना सध्या एकाच गोष्टीचा निदिध्यास लागला आहे तो म्हणजे : डॉ. दाभोळकर व डॉ. नारळीकर यांनी आपल्या समवेत १०-१२ मित्रमंडळी घेऊन स्वत: नाडी-केंद्रात जाऊन आपल्या आई-वडिलांची नावे, मुलांची नावे, नाडीवाचकाच्या तोंडून ऐकण्याचा आनंद घ्यावा. पट्टीवरच्या कूटलिपीत खरोखरीच नावे आली आहेत की नाहीत ते त्यांना नाही कळले तरी हरकत नाही, त्यांनी नाडीवाल्या स्वामीवर खुशाल डोळे मिटून विश्वास ठेवावा! शिवाय, ओक तिथे त्यांच्या मदतीला उपस्थित असतीलच ना! डॉ. नारळीकरांच्या सारखा थोर खगोलशास्त्रज्ञ व अं.नि.स.चे डॉ. दाभोळकर एका पोरसवदा स्वामीपुढे नम्रपणे बसले आहेत, त्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तरे देत आहेत, हे विलोभनीय दृश्य पहायला ओक आतुर झाले आहेत. असे घडेपर्यंत त्यांना सुखाची झोप लागणार नाही. ओंकार पाटील यांनी जो काय अनुभव घेतला तो ओकांच्या मते खरा नाही किंवा पुरेसा नाही. तो पूर्वग्रह-दूषित आहे. प्रत्येकाने मारुतीच्या बेंबीत ( किंवा आणखी कुठे ) बोट घालून स्वत: अनुभव घेतला पाहिजे असा त्यांचा आणि त्यांचे प्राचार्य मित्र श्री. गळतगे यांचा वैज्ञानिकश् आग्रह आहे! अं.नि.स.ला तसे करण्याची गरज वाटत नाही. थोडक्यात, १. नाडीपट्ट्यांतला मजकूर १६-१७ शतकांहून जास्त जुना नाही. २. कृत-त्रेता-द्वापार युगातल्या महर्षींचा प्रस्तुत नाडी-ज्योतिषाशी व पट्ट्यातल्या मजकुराशी काही संबंध नाही. कलीयुगात त्रिकालज्ञानी महर्षी झाले नाहीत. ३. प्रस्तुत नाडी-भविष्ये सामान्य ज्योतिषांनी लिहिलेली आहेत. ४. नाडीपट्ट्या व्यक्तिश: कुणासाठी लिहिलेल्या नव्हत्या म्हणून त्यात कुणाची नावे असणे शक्य नाही. ५. अंगठयाचा ठसा हा केवळ देखावा आहे. ६. कूटलिपीची मूळाक्षरे व बाराखडी देवनागरी लिपीत उपलब्ध झाली तर आमच्या निष्कर्षांना पुष्टी मिळेल इतकेच. वास्तविक, आमचे निष्कर्ष आम्ही स्वतंत्र प्रमाणांच्या मदतीने आधीच काढले आहेत. त्यासाठी तांबारमला भेट देण्याची आम्हाला गरज पडली नाही. नाडीभविष्याला प्रायमा फेसी केसच नाही असे आम्ही का म्हणतो ते वरील मुद्यावरून कळेल. समाप्त

वाचने 19057 वाचनखूण प्रतिक्रिया 33

आम्हाघरीधन गुरुवार, 09/03/2009 - 12:28
नाडीपट्ट्या व्यक्तिश: कुणासाठी लिहिलेल्या नव्हत्या म्हणून त्यात कुणाची नावे असणे शक्य नाही. कुठल्या चड्डीच्या नाडी ची पट्टी कुणासाठी बनवायची हे फक्त दादा कोंडके यांच्या नाडी वाल्या चड्ड्या शिवणार्‍या शिंप्यालाच माहित असणार...... संपर्क : चड्डीवाले नाडीकर. (येथे चड्डीच्या नाडी ची पट्टी तयार करुन मिळेल.) बाकी अवांतर : हे नाडी परिक्षा वगैरे झेपत नाही बघा.... २१वे शतक सुरु आहे.... विज्ञान युगाचे. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

टारझन गुरुवार, 09/03/2009 - 12:36
>>>आगामी शेकडो पिढ्यांचे कल्याण ( ! ) साधण्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य वेचले, आणि आजही ओकांच्यासारखे झपाटलेले नाडी-ऎडिक्ट आपली सरकारी नौकरी संभाळून नाडी भविष्याचा म्हणजे पर्यायाने नाडी-केंद्रांच्या धंद्याचा प्रचार 'लोकांच्या कल्याणासाठी' करीत आहेत. लेख अंमळ चांगला ... पण ( ! ) हे चिन्ह जास्त हिणकस वाटले ... बाकी काही म्हणने नाही !! ;)

In reply to by टारझन

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/03/2009 - 12:41
९९ सालचा लेख आहे. जसाच्या तसा दिला. उद्गार चिन्हा ऐवजी प्रश्नचिन्न पाहिजे व्हत काय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

टारझन गुरुवार, 09/03/2009 - 13:00
ते उग्दारचिन्ह वाटलं असतं तर हिणकस कसं बरं वाटलं असतं घाटपांडे काका ? आता जाऊ द्या .. बाकी चर्चा खरडवहीत !! -

विजुभाऊ गुरुवार, 09/03/2009 - 12:49
श्रीकान्त शहां आणि ओम्कार पाटलांचे अनुभव मी ऐकले आहेत. श्रीकान्त ला अगोदर ते सर्व खरे वाटले होते. पण नन्तर ओंकारपाटीलानी पुन्हा मद्रासला जाऊन तेथले लॉजीक ओळखले. नाडी ज्योतीष वाले जे प्रश्न विचारतात त्या ऐवजी तेथे जर एखादी लेखी प्रश्नपत्रिका ठेवली तर साधे एक्सेल सुद्धा उत्तम नाडी ज्योतिश साम्गु शकेल पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/03/2009 - 16:22
ओंकार पाटील यांचा लेख हा इथे दिलाच पाहिजे. भला थोरला लेख आहे. (आता टंकुन घ्यावा लागेल) त्यांनी हळुच पॉकेट टेपरेकॉर्डर ठेवल्या मुळे त्यांना नंतर लेख व्यवस्थित लिहिता आला. तांबारम च्या नाडी केंद्रात त्यांना एकुण २६० प्रश्न विचारले गेले. किस्त्रीम साठी मी जेव्हा हा लेख हमो मराठ्यांना दिला तेव्हा त्यांना यातील 'न्युज व्हॅल्यु' पकडता आली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/03/2009 - 16:08
दोन्ही लेख वाचले. अगदी मुद्देसूद वाटले. बाकी नाडी वगैरेबद्दल काय बोलणार. व्यक्तिशः काही अनुभव नाही. पण थोतांडच वाटते आहे. ओकांचे काहीकाही मुद्दे तर सरळ सरळ हास्यास्पद वाटले. असो. खरं तर आता मला नाडीपरिक्षेच्या खरेपणापेक्षा अजूनच मोठी चिंता सतवते आहे. असे लोक जर का देशाच्या संरक्षण यंत्रणेत सक्रिय होते या विचारानेच घाम फुटतोय !!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/03/2009 - 17:52
दोन्ही लेख वाचले. अगदी मुद्देसूद वाटले. बाकी नाडी वगैरेबद्दल काय बोलणार. व्यक्तिशः काही अनुभव नाही. पण थोतांडच वाटते आहे. सहमत आहे. ओकांशी माझी नुकतीच ओळख झाली आहे. भविष्यकथनाचे जाऊ द्या. पण, नाडीपट्टीचा विषयच मला खूप अनोळखी होता. नाडीपट्टीची ओळख झाली, होत आहे. वैचारिक वाद-प्रतिवादातून सत्य काय असेल ?ते समजण्याचा मार्ग मोकळा होतो असे वाटते. तेव्हा कृपया वाद (व्यक्तीगत न होता) थांबवू नका. चालू द्या......! लेखनाबद्दल घाटपांडे साहेबांचे आभार...! -दिलीप बिरुटे

अवलिया गुरुवार, 09/03/2009 - 18:21
हे सगळे वाचुन मी एकदा एका नाडिकेंद्राला गंमत म्हणुन भेट दिली होती, तो अनुभव टाकावा की काय असे वाटत आहे. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

नितिन थत्ते गुरुवार, 09/03/2009 - 19:13
आयला, म्हणजे ओकांना पट्ट्यांवरचा मजकूर वाचता येतच नाही तर!!! मला वाटत होते की ओक स्वतः पट्ट्या वाचून भविष्य सांगतात. आणखी एक म्हणजे प्रत्येक माणसाची युनीक पट्टी असेल तर जातकाला भविष्य सांगितल्यावर पट्टी देऊन टाकायला पाहिजे (कारण त्या पट्टीचा पुन्हा काही उपयोग नाही). जातकांकडच्या अशा पट्ट्या पाहून मग आपल्यालाही काही वाचून पहायचा प्रयत्न करता येईल. यापुढे जाऊन पट्ट्या जशा अतिंद्रिय शक्तीने लिहिल्या आहेत तशाच त्या वाचायलाही अतिंद्रिय शक्ती लागते असेही ओकसाहेब म्हणू शकतील. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

In reply to by नितिन थत्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/03/2009 - 19:42
प्रत्येक माणसाची युनीक पट्टी असेल तर जातकाला भविष्य सांगितल्यावर पट्टी देऊन टाकायला पाहिजे अहो, कशी देता येईल पट्टी. लेखातील खालील वाक्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदशन होत राहील यात शंका नाही.' ही जरा चालाखीच आहे, असे वाटायला लागले आहे. पट्ट्या जशा अतिंद्रिय शक्तीने लिहिल्या आहेत तशाच त्या वाचायलाही अतिंद्रिय शक्ती लागते असेही ओकसाहेब म्हणू शकतील. हा हा हा. -दिलीप बिरुटे

टिउ गुरुवार, 09/03/2009 - 21:56
बरीच नवीन माहिती कळाली! लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद घाटपांडे काका...एकुण हा सर्व प्रकार बंडलच वाटतोय. पण लोक कशावर विश्वास ठेवतील काही सांगता येत नाही! बाकी दाभोळकर, नारळीकर मंडळी पब्लीक फिगर्स आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्न न विचारताही त्यांची 'नाडीपट्टी' आम्हीसुद्धा शोधु शकतो... ;)

ओकांच्या 'नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो' या धाग्यावर मीखडूस यांनी प्रतीसाद दिले आहेत. सर्व मिपाकरंना विनंती की या प्रयोगास पुर्ण पाठींबा द्यावा व त्यासाठीचे नियम बनवण्यास मदत करावी. संपादक मंडळातील काही लोकांनी पुढाकार घ्यावा. ................. अजून कच्चाच आहे. (पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

चित्रगुप्त Fri, 04/02/2010 - 18:35
......ओंकार पाटील यांचा लेख हा इथे दिलाच पाहिजे. भला थोरला लेख आहे. (आता टंकुन घ्यावा लागेल) त्यांनी हळुच पॉकेट टेपरेकॉर्डर ठेवल्या मुळे त्यांना नंतर लेख व्यवस्थित लिहिता आला. तांबारम च्या नाडी केंद्रात त्यांना एकुण २६० प्रश्न विचारले गेले. किस्त्रीम साठी मी जेव्हा हा लेख हमो मराठ्यांना दिला तेव्हा त्यांना यातील 'न्युज व्हॅल्यु' पकडता आली....... .....हा ओंकार पाटीलांचा लेख मिपावर दिलेला आहे का? असल्यास त्याचा दुवा? नसल्यास अजून अवश्य द्यावा......

इंटरनेटस्नेही Fri, 04/02/2010 - 19:58
चांगला लेख आहे... अभिनंदन. विना नाडी नाही गोडी! (सौजन्य: बिपीन कार्यकर्ते) -- (नाडी पेक्षा चड्डीची नाडी जास्त वेळा बघणारा) इंटरनेटप्रेमी!

पाषाणभेद Fri, 04/02/2010 - 22:24
योगायोगाने धागा वर आला. घाटपांडे काकांना जोरदार पाठिंबा. नाडी वरील लेख अंधश्रद्धा पसरवत आहेत. सबब, तशा लेखांना संपादकांनी सामाजीक जाणिवेतून बंदी आणावी किंवा लेखकाला सुचना द्यावी. (भले ते लेखक मोठे असतील, लेखाला सुचक प्रतिक्रिया येत नसतांना देखील लिहीण्याचा प्रयत्न करत असतील किंवा तात्या त्यांचे कौतूकही करत असतील तरीही.) The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by पाषाणभेद

ओकांची मते भले मला पटत नसली तरी त्यांच्या लेखावर बंदी आणावी असे मला वाटत नाही. असे केल्यास त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येईल.त्यांच्या लेखाचा वैचारिक प्रतिवाद करणे, मतभिन्नता व्यक्त करणे या बाबी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करुन देखील करता येतात. मी व्यक्तिशः ओकांचा व्यक्ति म्हणुन आदरच करतो. त्यांच्या चिकाटीचे मला कौतुक देखील वाटते. नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता! या राजेश च्या विडंबनाला त्यांनी दिलेली दिलखुलास दाद ही त्यांच्या खिलाडुपणाचे प्रतिक आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

पाषाणभेद Sat, 04/03/2010 - 12:21
काका, माझी तरी कुठे त्यांच्याशी दुश्मनी आहे. त्यांचे रेल्वेतील किस्से तर फारच छान असतात. नाडीग्रंथ हा अनेक प्रश्नांना बगल देत पुढे चाललेला आहे. केवळ लढाई करणारा सैनिक म्हणून लढावू बाण्याने पुढे जात राहणे मला चुकीचे वाटले म्हणून मी तसे लिहीले. अर्थात अंधश्रद्धा अन भारतीय समाज, इतर देशांनी केलेली प्रगती, संस्कृती, विज्ञान, आजचे युग, प्रगती या सामाजीक जाणीवांच्या बाबतीत बरीच चर्चा होवू शकते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून जॉर्ज बुश यांच्या वरचा विनोद आठवला. बुश एका शाळेत जातात. मुले त्यांना युद्धावरून प्रश्न विचारतात. एक एक मुलगा गायब होतो. शेवटचा मुलगा वेगळा प्रश्न विचारतो, "माझ्या वर्गातील इतर मुले कोठे गायब झाली". या पुढेही त्यांचे नाडिवरील लेख आले तर माझी काही हरकत नाही. (मी कोण टिकोजी हरकत घेणारा?) त्यांनी इतर विषयावर लिहीले तर मी त्यांचा आनंद घेईल. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

चित्रगुप्त Sat, 04/03/2010 - 09:19
.....मतभिन्नता व्यक्त करणे या बाबी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करुन देखील करता येतात........... अगदी खरे. ओंकार पाटलांनी नाडी-प्रसंगाचे गुपचुप आडियो रेकॉर्डिंग करून नाडी संबंधी खर्‍या संशोधनाची सुरुवात केली, असे म्हटले, तर आता विंग कमांडरांनी अनेक लोकांचे नाडीवाचन होत असतानाचे व्हिडियो शूटींग करून यूट्यूब वर टाकावे, म्हणजे या बाबतीत सत्य काय आहे, हे समजणे सुकर होईल. गिर्‍हाइकाकडून नेमकी कोणती माहिती पट्टी हुडकताना घेतली जाते, हा कळीचा मुद्दा आहे, त्याची शाहनिशा अश्या रेकॉर्डिंग मधूनच होउ शकते. नाडीवाल्यांकडे विंग कमांडरांची एवढी वट असावी, असे वाटते, त्यांना देखील जर असे शूटिंग करण्यावर बंदी असेल, तर या सर्व प्रकारात बनवाबनवी असते, या मताला बळकटी येते. असे काही प्रयत्न केले गेले आहेत का?

अरुंधती Sat, 04/03/2010 - 14:18
मी इन्टरनेटवर नाडीग्रंथांच्या पट्ट्यांचे कार्बन डेटिंग अ‍ॅनॅलिसिस झाले आहे काय, त्यात वापरलेल्या शाईचे पृथःकरण, व्याकरण - वृत्त - छंद इत्यादि संदर्भ, नाड्यांमध्ये येणार्‍या देवीदेवता - औषधी वनस्पती इ.इ. व तत्कालीन संदर्भ ह्या विषयांच्यावर कोठे लिखाण मिळते काय हे (इंग्रजीतून) हुडकले. अद्याप मिळालेले नाही. नाडीग्रंथांवर अद्याप अशा प्रकारचे संशोधन भारतात झालेले नाही हेच मुळात आश्चर्यजनक आहे!! असे काही संदर्भ असल्यास मला त्यांविषयी जरूर जाणून घ्यायला आवडेल. तसेच आधुनिक विज्ञानावर आधारित जर नाडीग्रंथांवर संशोधन झाले असले तर त्याविषयीही जाणण्यास आवडेल. आधुनिक विज्ञान ज्या प्रकारचे पुरावे मागते, जे निकष लावते त्या त्या निकषांचे समाधान झाल्याखेरीज ओक म्हणतात त्याप्रमाणे त्यांची (नाडीग्रंथांची) सच्चाई लोकांसमोर प्रस्थापित होणार तरी कशी???? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

चित्रगुप्त Sat, 04/03/2010 - 14:46
बरोबर.... श्री ओक यांनाच असे सर्व संशोधन करणे त्यातल्या त्यात सुलभ असणार, कारण अन्य कुणास शक्य नसलेली नाडीवाल्यांशी ओळख आणि निकटता, त्या मंडळींचा त्यांच्यावर बसलेला विश्वास. ते अनेक वर्षां पासून अत्यंत आवडीने आणि हिरिरीने नाडीग्रंथ आणि तत्संबंधित अन्य विषय आणि व्यक्ती यांची तरफदारी करत आहेत, परंतु मी खरा की तू खरा, यापेक्षा खरे काय, हे बघणे जास्त महत्वाचे ...... काही वर्षांपूर्वी काही कारणाने हा सर्व प्रकार खरा असून यात बनवाबनवी नाही, असे त्यांचे मत झाले, हे ठीक, पण आता एवढे घडून गेल्यानंतर पुन्हा एकदा जास्त चिकित्सक वॄत्तीने सर्व प्रकाराचे आकलन करून घेणे, तसेच व्हिडियो शूटिंग करणे, वगैरे केल्यास या अत्यंत महत्वाच्या विषयावर खरोखर संशोधन घडून येइल...

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Sat, 04/03/2010 - 16:29
चित्रगुप्त, नाडीग्रंथांतील "मजकूरात खरे काय?" बघणे जर महत्वाचे असेल तर ओकांच्या काठीचा टेकू कशाला? आपणच सुरवात करा. तो तमिळ मजकूर विविध लोकांनी ओकांच्या अपरोक्ष नव्याने पहावा, अर्थ काढावा, सादर करावा. त्यातच व्हीडिओ वा अन्य आधुनिक शोधसाधनांचा ही समावेश असावा. नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

शशिकांत ओक Sat, 04/03/2010 - 16:17
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही {प्रियालींच्या धनंजयांना अन्यत्र ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाला - की}... नाडीग्रंथांची भलावण करणारे कोणत्या क्याटेगरीत {भ्रमसेन की ठकसेन}येतील? स्वतःशी प्रामाणिक, ()कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का? {धनंजय म्हणतात} ...विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते. {कदाचित हैयोहैयैयोंच्या अनुषंगाने} या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व. या उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे? याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो : ...धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती..... ज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे.. .. {कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते. नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत. आपल्या बाबतीतील मत की आपण सर्व विरोधी प्रतिक्रिया देणारे "अनुभव घेणार नाही" ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती. नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल. नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे. नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

JAGOMOHANPYARE Sat, 04/03/2010 - 22:14
पायदळ आणि वायुदळ यांचं महायुद्ध परत लागलं वाटतं... :) ओक साहेब, मी पूर्वी काही प्रश्न विचारले होते.... एकाच लोकेशनमधील लार्ज स्केल्वर नाड्या बघून भुकंप, पूर इ चे अंदाज का नाही बघत? वैयक्तिक भविष्यापेक्षा सामाजिक भविष्य प्रयोग म्हणून का नाही करत? *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

चित्रगुप्त Mon, 04/05/2010 - 18:35
...............ओकांच्या काठीचा टेकू कशाला? आपणच सुरवात करा. तो तमिळ मजकूर विविध लोकांनी ओकांच्या अपरोक्ष नव्याने पहावा, अर्थ काढावा, सादर करावा. त्यातच व्हीडिओ वा अन्य आधुनिक शोधसाधनांचा ही समावेश असावा........... अगदी बरोबर, ओकसाहेब..... मिपा वर नाडीसंबंधी उलटसुलट चर्चा व एकमेकांवर गरळ ओकत राहणे, यातून काहीही साध्य होणार नाही. नाडीसंबंधाने अरुंधती यांनी सुचवलेले मुद्दे जरी योग्य असले, तरी तश्या प्रकारचा अभ्यास मुळात हा सर्व बनवाबनवीचा प्रकार नाही, हे (मिपाकरांनी विविध नाडीकेंद्रांना स्वतः भेटी देऊन तेथील संभाषण टेप करून) सिद्ध झाले, तरच करणे योग्य व गरजेचे असेल. या विषयी मिपा सदस्यांना खालील प्रमाणे कार्य करता यावे: १. यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांची यादी (संपर्क क्रमांक व गावाचे नाव यासह) बनवणे. २. त्याप्रमाणे कोणकोणत्या नाडीकेंद्रांना भेट देणे सोयीचे होईल, याची यादी बनवणे (तिथले पत्ते, फोन, फी, वगैरे माहितीसह). यात श्री. ओकांचे सहकार्य मोलाचे आहे. ३. जे सदस्य स्वतः नाडीकेंद्रांना भेट देऊ शकत नाहीत, परंतु काही सहभाग देउ शकतात, त्यांनी ते काय करू शकतात, हे कळवावे. उदाहरणार्थ टेप रेकॊर्डर्स ची वा वाहनाची सोय करणे, गरज असल्यास आर्थिक भार उचलणे, नाडी केन्द्रांना फोन करणे, एकंदरीत या प्रकल्पाचे नियोजन, को-ऒर्डीनेशन करणे, वगैरे. ४. नाडी वाचनाचे वेळी व्हिडियो शूटिंग व ऒडियो रेकॊर्डिंग करणे शक्य आहे का, नाडी केन्द्रवाले तसे करू देतील का, हे श्री. ओक यांनी सांगावे. ते तसे करू देत नसल्यास गुप्तपणे करणे भाग आहे. श्री. ओकांनी उल्लेख केलेला केन्द्रवाल्यांचा टेपरेकॊर्डर हा नाडी वाचनाचे वेळी सुरू केला जात असेल. त्यापूर्वी पट्टी शोधताना विचारल्या जाणा‍र्‍या प्रश्नांचे व जातकाने दिलेल्या उत्तरांचे रेकॊर्डिंग केले जाते का (जसे श्री ओंकार पाटील यांनी केले आहे), हे श्री ओक यांनी स्पष्ट केलेले नाही. आपल्या संशोधनाचे दॄष्टीने, तेच जास्त महत्वाचे आहे. ५. त्यानंतर प्रत्यक्ष नाडीकेंद्रांना भेटी देऊन आपापल्या पट्ट्या काढवून त्या संपूर्ण प्रसंगाचे रेकॊर्डिंग करणे. यात काही जातकांना तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगितले जाईल, तरीही काय संभाषण झाले, याची नोंद करावी. ६. आपण या प्रकाराची चिकित्सकपणे तपासणी करायला आलेलो आहोत, असे नाडीकेंद्र वाल्यांना वाटले, तर ते तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगून वाटेला लावतील, अशी बरीच शक्यता वाटते, तरी आपण खरोखरच संकटात सापडलेले आहोत, व पट्टीत पापक्षालनार्थ सांगून येणारी धार्मिक कॄत्ये करण्यास उत्सुक आहोत, असा अविर्भाव असावा. हल्ली मिळणारे अगदी लहान, खिश्यात पेन सारखे अडकवता येणारे रेकॉर्डर्स खूपच सोयिस्कर पडतील. मुख्य म्हणजे यात डिजिटल फ़ाईल्स च्या स्वरूपात रेकॉर्डिंग होत असल्याने ते मिपावर सर्वांना ऐकता येइल. सहज सुचलेले मुद्दे वर लिहिले आहेत, सर्वच मिपाकर अतिशय सूज्ञ, बुद्धिमान व कर्तबगार असल्याने या विषयी अजून जास्त चांगले नियोजन करून प्रत्यक्ष कार्यास सुरुवात करता येईल.

शशिकांत ओक Tue, 04/06/2010 - 00:06
त्यापूर्वी पट्टी शोधताना विचारल्या जाणा‍र्‍या प्रश्नांचे व जातकाने दिलेल्या उत्तरांचे रेकॊर्डिंग केले जाते का (जसे श्री ओंकार पाटील यांनी केले आहे), हे श्री ओक यांनी स्पष्ट केलेले नाही.{जर विनंती केली तर काही नाडी केंद्र संचालक तशी सोय करू शकतात असा अनुभव आहे -ओक }
चित्रगुप्तजी, आपले धन्यवाद। पुर्वग्रह सोडून नाडीग्रंथांच्या अभ्यासाला मनापासून आपणासमान आता आणखी विचारक मिळतील तर 'अब दिल्ली दूर नहीं'। नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत