मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थोरांची ओळख ... महान साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी'

भडकमकर मास्तर · · जनातलं, मनातलं
थोरांची ओळख जालिंदर जलालाबादी : या सदरामधून आठवणीच्या पडद्याआड गेलेल्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांच्या कामगिरीची ओळख करून देणे, हा उद्देश आहे. जालिंदर जलालाबादी हे साठच्या दशकात लिहायला सुरुवात केलेले महत्त्वाचे विद्रोही कवी आणि लेखक. पुढे त्यांनी जगभर विशेषत: अफ़्रिकेमध्ये मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा फ़डकावत ठेवला. त्यांचे कुटुंब मूळचे अफ़गाणिस्तानचे... फ़ाळणीमध्ये त्यांचे कुटुंबीय पळून भारतात आले...त्यांची अफ़ूची शेती होती.जगभर पसरलेला व्यापार होता. पण पुढे कुटुंबीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर जालिंदरजींचा जन्म झाला. जन्मभूमीलाच कर्मभूमी समजून त्यांनी मराठी साहित्याच्या सेवेलाच आपले जगण्याचे मिशन मानले. पण आपले नाव मूळ वंश ज्या गावाचा त्या जलालाबादच्या स्मृतीसाठी मात्र जलालाबादी घेतले. शाळेत असल्यापासूनच ते अफ़ाट गुणवत्तेचे होते. सर्व व्यासपीठांवरती त्यांचा मुक्त संचार असे. शिवाय लहानपणी त्यांना दोरीवरच्या आणि खुंटाच्या अशा दोन्ही मल्लखांबाची फ़ार आवड होती पण एका अपघातात त्यांचा पाय मुरगळल्यामुळे त्यांना नाईलाजाने तो मार्ग सोडून द्यावा लागला. ते वक्तृत्त्वस्पर्धा, निबंधस्पर्धा, अभिनयस्पर्धा, आट्यापाट्या, खोखो यात कायम जिंकत असत. पण आपण लेखक होऊ असे त्यांना कधीही वाटले नव्हते. शाळेच्या हस्तलिखिताच्या संपादकपदाचा वाद निर्माण झाला तेव्हा त्यांनी स्वत:हून संपादकपद सोडले .. शाळेच्या बक्षीससमारंभात बक्षिसासाठी सतत त्यांचे नाव ऐकून लोक कंटाळून गेले. त्यांचे नाव पुकारताच ते खालूनच ओरडून सांगू लागले की "आता बास".. शाळेत ते इतक्या स्पर्धा जिंकत असत की त्यांनी इतरांना वाव मिळावा म्हणून आपण यापुढे स्पर्धेत भाग घेणार नाही असे जाहीर केले. लहानग्या वयातच केवढी ही जाण...! केरळी रांगोळी आणि बंगालात बंगला ही त्यांची लघुनिबंधांची काही महत्त्वाची पुस्तके. " लिहिते व्हा.." हा तरूणांना दिलेल्या संदेशात्मक लिखाणाचे पुस्तकही नुकतेच बाजारात आले आहे. भारतात असताना "कालभारत " हे एक अनियतकालिक हस्तलिखित त्यांनी चालवले ... "दिल्ली गं दिल्ली तू कुठे चाल्ली?" हा आणीबाणीच्या काळात लिहिलेला लेख पाहून त्यांच्यामागे भारतीय पोलीसांचा ससेमिरा लागला तेव्हा ते भूमिगत झाले.आपले पुढील कार्य त्यांनी अफ़्रिकेतील बुरुंडी येथून चालवले. "मला नोबेल प्राईज नको" हा त्यांचा लेख गाजला... स्वत:च्या अज्ञातवासात त्यांनी अंदमान ते सायबेरिया ही कादंबरी लिहिली. या कादंबरीला बुरुंडी-र्वांडा साहित्यसंस्कृती मंडळाचे उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. लेखन कसे करावे ही त्यांची लेखमाला अफ़्रिकन संदेश या वार्तापत्रात क्रमश: प्रसिद्ध झाली..आंतरजालावरील होतकरू उर्ध्वगामी साहित्यिकांना या लेखमालेचा खूपच उपयोग होईल, म्हणून आम्ही इथल्या वाचकांची इच्छा असल्यास आमच्या खरडवहीत दर आठवड्याला आमच्या गुरूंची ही लेखमाला स्वाहिलीमधून मराठीमध्ये भाषांतर करून प्रसिद्ध करू. काही दिवसांपूर्वीच त्यांना भारतात यायची परवानगी मिळाली. इतकी वर्षे परदेशात राहूनही त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. मराठमोळे उच्चारण अजिबात बदलले नाही.जेव्हा ते पंचवीस वर्षांनी प्रथम मुंबई विमानतळावर आले आणि टॅक्सीत बसले तेव्हा त्यांनी येथील अस्वच्छता, दारिद्र्य यावर एक शब्दही भाष्य केले नाही आणि चक्क पाणपोईच्या नळावर जाऊन ओंजळीतून पाणी प्याले. त्यांचा हा साधेपणा पाहून आमच्या डोळ्यांत पाणी तरारले आणि आम्ही म्हणालो," जियो जालिंदर जियो"... इतक्या थोर सद्गृहस्थाचा केवढा हा विनय... !! मराठी साहित्याच्या प्रचारासाठी त्यांनी काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले. "हायकू कायकू आणि इतर " या त्यांच्या काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे त्यांनी दक्षिण ध्रुवावरती अभिनव पद्धतीने हवाई उडी घेऊन वाचन केले. या प्रकल्पासाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यासाठी महाराष्ट्राच्या गावागावातून घरटी एक एक रुपया गोळा केला जावा असे त्यांना वाटत होते.. आमच्यासारख्या त्यांच्या शिष्यांनी त्या काळात पुष्कळ प्रयत्न केला. मदत फ़ेर्‍या काढल्या.तरी पैसे जमेनात तेव्हा काही अमेरिकन कंपन्यांनी जालिंदरजींना मदत केली. वीस हजार फ़ुटांवरून हवाई छत्रीतून उडी घेऊन त्यांनी दक्षिण गंगोत्रीवर आगमन करणे अपेक्षित होते; त्यांनी तशी उडी घेतलीही परंतु हवाई उडीची सवय नसल्याने ते मूळ जागेहून ३० किलोमीटर दूर जाऊन पडले, तिथून १२ दिवस जीवघेण्या थंडीत पदभ्रमण करत असताना त्यांना वाचवले गेले. पण ते सापडले तेव्हा ते पेन्ग्वीनच्या एका जथ्याला आपली कविता वाचून दाखवताना आढळले. ( तेथेही त्यांना एका अमेरिकन कंपनीकडून दक्षिण ध्रुवावर तेल शोधायला आलेल्या एका गोर्‍या लोकांच्या चमूनेच वाचवले हे विशेष..) बुरुंडीत भरलेल्या पहिल्या जागतिक अतिविद्रोही साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.पण संयोजन समितीत प्रचंड मतभेद होतेच.बुरुंडी आणि र्वांडा इथली मराठी मंडळे सिएरा-लिओन,घाना,बोट्स्वाना इथल्या मंडळांवर अन्याय करताहेत ही भावना दृढ होत चाललेली होती.त्यातून " आता संमेलनच बरखास्त करा" अशा आरोळ्या उठल्या. दक्षिण ध्रुव प्रकल्पाबद्दल त्यांनी घेतलेल्या अमेरिकन कंपनीच्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित झाले. जालिंदरजींवर "अमेरिकेचे बगलबच्चे" असा अत्यंत उद्वेगजनक आरोप झाला.पण मी हे सारे मराठी साहित्याच्या उद्धारासाठी केले असे त्यांनी सांगून पाहिले. पण विरोधकांचा आवाज प्रचंड होता. ही सारी बंडाळी उद्घाटनप्रसंगी उघड झाली. शक्तीप्रदर्शन झाले,घोषणाबाजी ,पत्रकबाजी झाली. जालिंदरजींनी नाक घासून माफ़ी मागावी अशी मागणी केली गेली. जालिंदरजींनी उद्वेगाने म्हटले, " अरे ही काय लोकसभा आहे का?" झाले, आधीच चिडलेल्या बंडखोरांची तळपायाची आग मस्तकाला गेली. तलवारी उपसल्या गेल्या,प्रत्युत्तर म्हणून बंदुका दाखवल्या गेल्या.तरीही संमेलनाची सुरुवात झालीच. जालिंदरजींनी भाषणासाठी माईक हातात घेताच "कुठेतरी भोसकाभोसकी झाली ..." अशी आरोळी उठली. हवेत गोळीबार झाला. संमेलनाचे व्यासपीठ सोडून सर्व पाहुणे पळाले. एकच गोंधळ माजला.तलवारींची पाती सपासप फ़िरू लागली.. गोळीबाराने आसमंत दुमदुमला. पण तरीही एका हातात माईक ठेवून दुसर्‍या हाताने स्वसंरक्षणार्थ गोळीबार करत विविध ठिकाणी दडी मारत मारत जालिंदरजींनी आपले ३८ मिनिटांचे भाषण पूर्ण केले. त्यांना कव्हर फ़ायर देणारे त्यांचे अनुयायी आजही त्या प्रसंगाचे चित्तथरारक वर्णन करतात. जालिंदरजींचे समर्थक संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच जालिंदरजींची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली..पण ते बेमालूम वेषांतर करण्यात इतके तरबेज होते की ते स्वत:च वेषांतर करून या अंत्ययात्रेत सामील झाले आणि स्वत:च्या तिरडीला खांदा दिला आणि प्रतिमादहनाचे महत्त्वाचे नियमही सर्वांना समजावून सांगितले.. पण एक शल्य त्यांना बोचत होते की त्यांचे संमेलनाध्यक्ष या नात्याने केलेले महत्त्वाचे भाषण जनसामान्यांपर्यंत पोचलेले नाही.म्हणून त्यांनी बुरुंडी, र्वांडा, सिएरा लिओन ,घाना इथल्या विविध वाड्या वस्त्यांवरती जाऊन प्रत्येक माणसाला एका भाकरीच्या बदल्यात स्वत:चे भाषण वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या या युक्तीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.मात्र तेथे एका टोळीकडून दुसर्या भाकरीसाठी त्यांच्यावरती दबाव आणायचा प्रयत्न झाला, नंतर त्यांच्यावर दुसरी भाकरी मिळवण्यासाठी हल्ला झाला. तरीही "एकावेळी एकच भाकरी " या त्यांच्या पवित्र्यापासून ते तसूभरही मागे हटले नाहीत....स्वत:चा जीव धोक्यात घालून मराठी साहित्याचा अफ़्रिकन आदिवासी टोळ्यांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचे हे दैवी कार्य करण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा आज इतर कोठे दिसेल काय ? स्वत:च्या भाषेप्रती केवढी ही अव्याभिचारी निष्ठा !!! एका वेळी एकच भाकरी ही त्यांची गर्जना पुढली शतकानुशतके साहित्यिकांना प्रेरणा देत राहील. या थोर साहित्यिकाला प्रस्थापितांनी कायमच उपेक्षित ठेवले. त्यांच्यावर पुष्कळ आरोप केले गेले. साहित्यजगतात ते उर्मट , उन्मत्त म्हणून प्रसिद्ध होते. ."अमेरिकेचा बगलबच्चा" हा मात्र सर्वात हृदय विद्ध करणारा आरोप असं त्यांना वाटतं. मायमराठीनेच आपल्याला सार्‍या आरोपातून तरून जायची शक्ती दिली, असे ते मानतात. हल्ली अगदी कोणालाही ( अगदी उथळ नटनट्यांना,गाणं-बजावण्यातल्यांनासुद्धा) पद्म पुरस्कार दिले जातात, पण इतक्या धाडसी, गुणी आणि लोकोत्तर साहित्यिकाला दुर्लक्षित करणे हेच जणू इथल्या अभिजनवर्गाचे नेहमीचे काम झाले आहे. मी ही खंत त्यांच्यापुढे व्यक्त केली तरी ते फ़क्त हसतात...आयुष्याच्या शेवटी जालिंदरजी समाधानी आहेत. खूप काही करायचं राहून गेलं हे शल्य मात्र त्यांना कधीकधी बोचतं ... सध्या ते ८८ वर्षांचे आहेत .. निवृत्त आयुष्य सुखाने जगत आहेत... विविध व्याधी मागे आहेत, औषधे गोळ्या यांचा मारा चालू आहे पण मन तेवढेच उत्फ़ुल्ल आहे... कधी घरी गेलो तर ओळखतात, पडल्या पडल्या स्माईल करतात आणि गप्पा मारायला सुरुवात होते . हळूच चावट जोक सांगणं असो किंवा ल्यापटॊपवर लिहिलेली नवीन कविता असो,जगणं आनंदात चालू आहे... परवा म्हणाले, " पंतप्रधानांच्या अर्थविषयक प्रबंधाला चाल लावता येइल का रे? मला आता गावंस वाटतंय"... पण मी म्हटलं," अर्थविषयक गाणंच का?" तर मला डोळे मारत म्हणाले," एखादी पद्मश्री मी ही मिळवेन म्हणतो".....काय हा विनोदी स्वभाव !!! बिछान्यावर पडल्यापडल्या ते दोरीवरच्या मल्लखांबातल्या काही ट्रिक्स करून दाखवतात तेव्हा मन थक्क होते. आताच ही स्थिती तर हा माणूस तरूणपणी काय असेल !!! "मी जन्म मानत असतो तर पुढल्या जन्मी मल्लखांबपटू झालो असतो" असं म्हणत ते एक जुना पिवळा पडलेला फोटो दाखवतात, मी विचारतो, हे कोणते झाड आहे? त्यांनी सांगितलं," हा मल्लखांब करताना काढलेला माझा फोटो आहे.".. मी त्या फोटोचा फोटो काढला. तो फोटो माझ्याकडे जपून ठेवलेला आहे.हाच तो फोटो... क्षणभंगुर सिंगूर हे त्यांचे महाकाव्य ते सध्या पूर्ण करत आहेत. जगाने कितीही दुर्लक्ष केले तरी जालिंदरजींची निदान आंतरजाल तरी दखल घेईल अशी आशा आहे...

वाचने 44892 वाचनखूण प्रतिक्रिया 65

मास्तर तुम्ही महान आहात! तुमच्या या महान गुरूला, त्याच्या साहित्यिक प्रतिभेला माझा सलाम. या अशा थोर नरपुंगवाचे आपल्याला मार्गदर्शन लाभले म्हणूनच आपण एवढं उत्तम व्यक्तीचित्रं लिहू शकता. तुमच्या गुरूंना माझे लक्ष लक्ष सलाम! =)) =)) =)) =)) नावातच सगळं काही आहे हो! अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता Sun, 04/05/2009 - 21:28
देवआजोबांनी एवढ्याश्या छोटुल्या छोटुल्या बाळांना सिद्धहस्त वगैरे म्हटल्यामुळे मास्तरांवर अन्याय झालेला आहे. असे मास्तरांसारखे लिहा, म्हणजे सिद्धहस्तचा सि कळेल. -- मिसळभोक्ता

महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान बिपिन कार्यकर्ते

लिखाळ Wed, 04/01/2009 - 21:08
मास्तर .. मास्तर ! कमाल केलीत तुम्ही ! यातल्या वाक्यावाक्याला, कल्पने कल्पनेला आणि शेवटच्या पिवळ्या फोटोला भरभरून दाद :) शेवटच्या फोटोतल्या 'अवघड' स्थितीतून जालिंदर महोदय सुटले ही कमाल पाहता त्यांना एखादा पुरस्कार मिळालाच पाहिजे. --(नोबेल पुरस्काराची हाव नसलेला) लिखाळ.

जगाने कितीही दुर्लक्ष केले तरी जालिंदरजींची निदान आंतरजाल तरी दखल घेईल अशी आशा आहे...
चलो जालिंदर मास्तर आया है| अब जितना चाहे मिसलपाव खाओ! मास्तर अवो जंता लई ईसरभोळी अस्तिया आपन नस्ती वळख करुन दिली तर मान्स यवढ्या मोठ्य अतिईद्रोही भगिंदर ला ईसारली अस्ती. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठमोळा Wed, 04/01/2009 - 21:23
हा प्रकार तर आपल्या विचारशक्तीच्या बाहेरचा आहे बॉ.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

चतुरंग Wed, 04/01/2009 - 21:45
काय ही ओळख! साठोत्तरी काळात नवकवितेला एक वेगळा आयाम देणार्‍या एका जालीम कवीची ओळख आज एक एप्रिलला होणे हाच माझा बहुमान आहे असे मी समजतो. त्रिखंडात (आफ्रिका, अशिया आणि अंटार्क्टिका) संचार असलेल्या ह्या महान हस्तीचा परिचय आपण आम्हा मिपाकरांना करुन दिलात त्याबद्दल आपले शतशः आभार. वाक्यावाक्याला, शब्दाशब्दाला मी अचंबित होत गेलो. पिवळा फोटो येईपर्यंत डोळे एवढे डबडबले की फोटोच पिवळा आहे की डोळे भरुन आल्याने असे दिसते आहे हे कळेना! आता आपल्याला पुढे वाचवणार नाही असे वाटत असतानाच ओळख संपली आणि चुटपुट लागून राहिली! आणखी एका बाबतीत आपले कौतुक वाटते. एवढे महान व्यक्तिमत्व प्रत्यक्ष गुरुस्थानी लाभूनही तुमच्या लिखाणात कुठेही आढ्यता नाही! हे माझे गुरु, मी त्यांच्या शिष्य, ते तसे, मी असा; असे कुठेही नाही!! वा वा!! हाच शिष्य पुढे जाऊन आपला पराभव करणार ह्याची जलालाबादींना खात्रीच असणार ('शिष्यात इच्छेत पराजयम' की कायसे एक वचन आहे ना त्या आधारे लिहितोय. चूभूदेघे)!!! तुमच्या लिखाणाच्या गंगेत आमचे घोडे असेच न्हाऊन निघो हीच जालिंदरचरणी प्रार्थना!! (नतमस्तक)चतुरंग

In reply to by चतुरंग

सुंदर प्रतिसाद आणि गुणग्राहकतेबद्दल चतुरंग यांना वाकडा सलाम. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by चतुरंग

भडकमकर मास्तर Wed, 04/01/2009 - 22:00
चतुरंगजी, आपल्यासारख्या थोर समीक्षकाने आणि साक्षेपी लेखकाने या लेखावर आणि आमच्या गुरूंवरती इतकी स्तुतिसुमने उधळली, आम्ही भरून पावलो... आपण तिकडे सातासमुद्रापलिकडे असल्याने आमच्या गुरूंची आपली नजिकच्या भविष्यकाळात भेट होणार नाही, परंतु आपल्या पुढल्या भारतभेटीत आम्ही आपली भेट जरूर घडवून आणू...( दुर्दैवाने काही अपरिहार्य कारणाने आमचे गुरू त्या तिकडल्या देशात जात नाहीत)... बुरुंडी र्वांडा साहित्यसंस्कृती मंडळाच्या एकमेव उत्तेजनार्थ पारितोषिकाखेरीज कोणताही महत्त्वाचा पुरस्कार न मिळालेल्या या साहित्यिकाला जालावर भरभरून प्रतिसाद मिळेल याची खात्रीच होती... रसिकाश्रय हाच खरा पुरस्कार , असं म्हणतात हे काही खोटं नाही... सर्वांचे खूप आभार.... (आमच्या लिखाणकौशल्याचे सारे देणे आमच्या गुरूंचे असे आम्ही मानतो... त्यांच्याशी स्पर्धा मात्र आम्ही कधीच करू शकणार नाही असे नम्रपणे नमूद करतो) आपला (नम्र) भडकमकर मास्तर ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर!!!!!!!!!!!!!! काय बोलू? माझा गळा भरून आला आहे. मी भावनातिरेकाने मूर्च्छित होईन की काय असे वाटत आहे. इतका महान लेख, त्यावरची अतिउच्च समीक्षा आणि तुमचे इतके नम्र उत्तर. नक्कीच तुम्ही पुरूष नाही.... महापुरूष आहात. श्यामच्या आईचा सल्ला तुम्ही अगदी खरा करून दाखवला. धन्य आहे तुमची. असे महान लोक अजून आपल्यात आहेत हे खरोखरच आमचे भाग्य आहे. मी आपल्या आणि रंगाबाबांच्या चरणाशी पूर्णपणे नत आहे. बिपिन कार्यकर्ते

धनंजय Wed, 04/01/2009 - 22:26
या थोर साहित्यिकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची ध्वनिफीत ऐकताना ठ्ठो-ठ्ठो-ठ्ठो- आवाजाचे रहस्य आता कळले. कित्येक वर्षे त्याचे मला कोडेच वाटत होते. कारण असे हास्याचे फवारे उडण्याइतके त्यांचे भाषण विनोदी नव्हते. (आता ती ध्वनिफीत सापडत नाही. या महत्त्वाच्या ऐतिहासिक दस्तऐवजाबद्दलची हयगय झालेली बघून मराठी साहित्याच्या धुरिणांबद्दल मनस्वी चीड नाही येणार तर काय येणार?)

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Wed, 04/01/2009 - 22:49
त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची ध्वनिफीत ऐकताना ठ्ठो-ठ्ठो-ठ्ठो- आवाजाचे रहस्य आता कळले. आपण ती ध्वनिफीत कुठे ऐकलीत ? वेणुनाथ कुडचेडकर डब्बावाला या त्यांच्या शिष्योत्तमाकडे ती उपलब्ध होती असा आत्तापर्यंत गुरुजींचा समज होता... पण वेणुनाथाकडे ही ध्वनिफीत नाहीए... ( आत्ताच फोनवर कन्फर्म केले) आमच्या गुरुजींना ती ध्वनिफीत हवी आहे... कुठून उपलब्ध झाली तर जरूर कळवा... ... राहता राहिले बुरुंडी र्वांडा साहित्य संस्कृती मंडळ... तिथे आपल्या कोणी ओळखीचे आहे का? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

चतुरंग Wed, 04/01/2009 - 23:06
वेणुनाथ कुडचेडकर डब्बावाला कसलं नाव शोधून काढलं आहे!!! =)) =)) =)) =)) (खुद के साथ बातां : आज मास्तरांच्या ग्रे मॅटर मधे भलतीच उलथापालथ झालेली दिसते! ;) ) चतुरंग

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय Wed, 04/01/2009 - 23:30
एकंदर र्वांडा-बुरुंडी मराठी मंडळाची जी वाताहात झाली आहे, त्याला तेच जबाबदार आहेत. त्यांच्या चालकांपैकी कोणाची माझी पूर्वी ओळख असेल, तर ती मी कधीच विसरलो आहे. या टोपणनावाने तर मी त्यांना कधीच ओळखत नव्हतो. संमेलनाच्या दिवशी र्वांडा-बुरुंडी मराठी मंडळाने आम्हाला आमच्या दुसर्‍या टोपणनावाने प्रवेश नकारला. त्यानंतर आम्ही बुरखे घालून प्रवेश करायचा प्रयत्न केला. पण स्वयंसेवकांनी आमच्या जोड्यांवरून आम्हाला ओळखून आम्हाला रोखले. ("आम्ही" म्हणजे बुरखेवाले तिघे जण होतो. बाकी दोघांना मी [बुरख्यामुळे] ओळखत नाही. पण स्वतःला "आम्ही" म्हणवण्यापर्यंत अजून माझी साहित्यिक पायरी नाही, हे दु:खदपणे नमूद करतो.) संमेलनाच्या ठिकाणी मागच्या दारातून निसटताना शिष्यवर्य डब्बावालांनी आम्हाला "जय जालिंदरजी" घोष करताना पाहिले. त्या झिंगलेल्या अवस्थेतही त्यांनी आम्हाला कडाडून मिठी मारली, आणि घरी बोलावले, हा किती त्यांचा मोठेपणा. त्यांच्या घरी गेल्यावर सपाटून बर्फी खात-खात त्यांनी चोरून रेकॉर्ड केलेली ध्वनिफीत ऐकवली. ते चमत्कारिक जप करत आडवे झाले, तेव्हा गुरुवर्यांचे मानून त्यांचेच पाय धरून आम्ही बाहेर पडलो. आता शिष्यवर्य डब्बावाल्यांकडेही ती फीत नाही, हे ऐकून संताप होतो आहे. माझ्याबरोबरच्या त्या दोन बुरखेवाल्यांची नियत खराब होती, अशी एक शंका वाटते आहे. पण डब्बावालांनी खुद्द ती गोड कॅसेट बर्फी समजून खाल्ली असेल, ही शक्यता देखील आहे.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत Wed, 04/01/2009 - 23:35
पण स्वतःला "आम्ही" म्हणवण्यापर्यंत अजून माझी साहित्यिक पायरी नाही, हे दु:खदपणे नमूद करतो. स्वतःबद्दल असे म्हणून धनंजय यांनी "सिद्धहस्त लेखक" म्हणून मिळालेल्या मानपत्राचा अपमान केला आहे ! निषेध ! ;-)

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/02/2009 - 06:26
त्या झिंगलेल्या अवस्थेतही त्यांनी आम्हाला कडाडून मिठी मारली, आणि घरी बोलावले, हा किती त्यांचा मोठेपणा. त्यांच्या घरी गेल्यावर सपाटून बर्फी खात-खात त्यांनी चोरून रेकॉर्ड केलेली ध्वनिफीत ऐकवली. बाकी त्या इतर दोन बुरखेवाल्यांमध्ये मीही होतो... मात्र आडोशाखालून मांडवात प्रवेश करताना आपली चुकामूक झाली असावी... पण त्यामुळे आपल्याला वेणुनाथाच्या घरी जायला मिळाले.. डब्बावाला मोठा कलंदर माणूस... कधी ओळख दाखवेल कधी चोरासारखे बघेल...( म्हणजे तुम्ही चोर असल्यासारखे)... मला त्यांच्या घरी कधीच जायला मिळाले नाही...पण आपल्याला ही संधी मिळाली हे ऐकून खूप आनंद वाटला.... हल्ली वेणुनाथाला स्किझोफ्रेनिया झाला आहे असे ऐकले. त्यात ती ध्वनिफीत भडकमकरांनी हरवली असे सांगत तो फिरतो... काही लोक आपल्याला कायम चोरच समजतात याचे मात्र वैषम्य वाटते. असो... डब्बावाल्यापासून जपून राहणे.. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

योगी९०० गुरुवार, 04/02/2009 - 20:59
बाकी त्या इतर दोन बुरखेवाल्यांमध्ये मीही होतो... मात्र आडोशाखालून मांडवात प्रवेश करताना आपली चुकामूक झाली असावी... च्यायला...म्हणूनच मला मार पडला.. कारण तिसरा बुऱखेवाला मी होतो. भडकमकर मास्तर मध्येच आम्हाला चुकवून गेले आणि मी एका बुरखेवाल्या बाईचा हात धरून (त्यांना मास्तर समजून) धनंजय यांच्याबरोबर डब्बेवाल्यांकडे गेलो. (धनंजय यांना मी त्यांच्या जोड्यामुळे आधीच ओळखले होते.) नंतर ध्वनिफीत ऐकताना मास्तरांसारखे पट्टशिष्य असे पळायचा का प्रयत्न करत आहेत हे समजत नव्हते. गुरुंचा आवाज ऐकून मास्तरांना त्यांची तीव्र आठवण झाली असा आमचा समज झाला होता. धनंजय यांच्याबरोबर आम्हीही गुरूवर्य(?) डब्बेवाल्यांचे पाय धरले आणि त्यावेळी हळूच ती ध्वनिफीत मारली. कारण आम्हाला डब्बेवाल्यांचा डाव माहित होता. एका अमेरिकन बाजारू साहित्यिकाला ती ध्वनिफीत विकायची होती. आमचा उद्देश ती ध्वनिफीत आपले सर्वांचे लाडके जालिंदरजीं यांच्या चरणी ठेवावी असा होता. नंतर बाहेर आल्यावर आम्ही ध्वनिफीत मिळाल्याच्या अति आनंदाने मास्तरांना कडकडून मिठी मारली आणि नंतर आम्हाला मार पडला. त्या बाईच्या नवरा जवळच आमचा शोध घेत होता. त्या मारहाणीत तो अमुल्य ठेवा (ध्वनिफीत ) नष्ट झाला आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा आमचा झालेला गैरसमज त्या बुरखेवालीला कळला तेव्हा तिलाही खुप वाईट वाटले. अजूनही त्या ध्वनिफीतीचे तुकडे आम्ही आमच्या घरात पुजतो आहोत. ती बुरखेवाली सुद्धा आमच्याकडे ध्वनिफीतीचे दर्शन घ्यायला रात्री अपरात्री कधीकधी येते. तिच्या **** नवर्‍याला तिची ही भक्ती पसंत नाही त्यामुळे त्याच्या फिरतीवर जाण्याची तिला वाट पहावी लागते. लवकरच तिला घेऊन गुरूवर्य जालिंदर यांचे दर्शन घ्यावे म्हणतो. त्यांना कव्हर फ़ायर देणारे त्यांचे अनुयायी आजही त्या प्रसंगाचे चित्तथरारक वर्णन करतात तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. कारण त्या कव्हर फ़ायर देणार्‍या अनुयायांपैकी आम्हीही एक होतो. पण कव्हरीग फ़ायर देण्याच्या भानगडीमुळे जालिंदरजींचे भाष्य पुर्ण ऐकता नव्हते आले. त्या वेळी त्यांचे पट्टशिष्य म्हणवणारे काही अनुयायी फोटो काढण्यात मग्न होते. डब्बेवाल्यांविषयी मनात कटूता जरी असली तरी त्यांच्यामुळे एकदा का होईना अध्यक्षीय भाषण ऐकायला मिळाले. खादाडमाऊ

टिउ गुरुवार, 04/02/2009 - 00:57
जलालाबादींसारखा लेखक गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही. त्यांच्या कथा कादंबर्‍यांची एके काळी पारायणे केली होती. 'अंदमान ते सायबेरिया' या कादंबरीतलं पाचवं प्रकरण तर अतिशय थरारक आहे. (कुणाला कादंबरी हवी असल्यास व्यनी करावा). सध्या ते 'मी एक पेंग्वीन' नावाचं आत्मचरित्र लिहीत आहेत असं ऐकण्यात आलंय. असे गुरु लाभले ही मास्तरांची पुर्वपुण्याईच म्हणावी लागेल. अवांतरः पिवळ्या फोटोच्या शोधात गेले कित्येक दिवस होतो. तो इथे दिल्याबद्दल मास्तरांचे शतशः धन्यवाद!

In reply to by टिउ

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/02/2009 - 06:37
पिवळ्या फोटोच्या शोधात गेले कित्येक दिवस होतो. आपल्यालाही मल्लखांबाची आवड दिसते. आमचे गुरू त्यांच्या शाळेकडून दिल्लीला मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखवायला गेले होते त्यावेळचे हे छायाचित्र आहे. मागे लाल किल्ला असावा.. अजून एक माहिती... जालिंदरजींचा इन ऍक्शन हा शेवटचा फोटो..कारण मी लेखात उल्लेख केलेला अपघात याच ठिकाणी झाला...आणि डॉक्टरांनी त्यांना मल्लखांब करायला मनाई केली... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शाल्मली गुरुवार, 04/02/2009 - 01:37
ह.ह.पु.वा. =)) बापरे! काय भारी लिहिले आहे!!! केरळी रांगोळी, बंगालात बंगला, हायकू कायकू आणि इतर हे तर लैच जोरात! ह्या थोर साहोत्यिकाची ओळख करून दिल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद!! --शाल्मली.

रेवती गुरुवार, 04/02/2009 - 03:53
अरे देवा!!! मी भयंकर म्हणजे भयंकर फसले. लेखातली चित्रविचित्र नावे वाचून गोंधळून गेले. आधी वाटले की आपले वाचन नाहीये फारसे म्हणून नसती ऐकली ही नावे... शेवटी शेवटी तर हसू येत होते पण इतक्या महान व्यक्तीला कसं हसायचं म्हणून हसले नाही. त्यावेळी प्रतिसाद दिला नाही. आत्ता येउन बघते तर एकसे एक प्रतिसाद...=)) रेवती

In reply to by रेवती

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/02/2009 - 06:34
इतक्या महान व्यक्तीला कसं हसायचं म्हणून हसले नाही. =)) =)) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भाग्यश्री गुरुवार, 04/02/2009 - 04:09
=)) =)) अफलातून !!! या थोर साहीत्तीकाला भेटायला आवडलं असतं!! जाऊदे.. बायदवे, एकावेळी एकच भाकरी वगैरे बाण्या वरून बरंच काय काय ओळखीचे आठवलं! :) http://bhagyashreee.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/02/2009 - 05:14
'जालिंदर जलालाबादी'या थोर साहित्यिकाची ओळख अगदी योग्य शब्दात करुन दिली. जालिंदर हे विशाल अंतःकरणाचे थोर कलावंत आहेत. मानवी मनात त्यांनी सद्बभावनेची ज्योत सतत पेटवत ठेवली . आपले समकालीन लेखक जे लिहितात त्यापेक्षा त्यांनी सतत वेगळे लेखन करण्याचा प्रयत्न केला , म्हणूनच प्रस्थापित साहित्यिकांना त्यांचे लेखन एक धक्का होता. बहूजन समाजात त्यांची लोकप्रिय होण्याची अनेक कारणे असली तरी लोकांना जे आवडते ते लिहून त्यातून समाजप्रबोधन करणे हे त्यांचे वैशिष्टे होते. 'बंगालात बंगला' लघूनिबंधातील एक सुंदर वाक्य आहे, ते म्हणतात '' अनुभवविश्व समृद्ध असल्याशिवाय लेखन समृद्ध होत नाही'' ( पाहा पृ.क्र. ४२० ) असो, अशा या थोर माणसाच्या सहवासात आपण राहिल्याने त्यांच्या लेखनाची छाप आपल्या लेखनावरही उमटली आहे, असे वाटते. 'क्षणभंगुर सिंगूर' या त्यांच्या काव्याला आमची प्रस्तावना आहे, हे सांगतांना खूप आनंद होत आहे. वीस हजार फ़ुटांवरून हवाई छत्रीतून उडी घेऊन त्यांनी दक्षिण गंगोत्रीवर आगमन करणे अपेक्षित होते; त्यांनी तशी उडी घेतलीही परंतु हवाई उडीची सवय नसल्याने ते मूळ जागेहून ३० किलोमीटर दूर जाऊन पडले, तिथून १२ दिवस जीवघेण्या थंडीत पदभ्रमण करत असताना त्यांना वाचवले गेले. पण ते सापडले तेव्हा ते पेन्ग्वीनच्या एका जथ्याला आपली कविता वाचून दाखवताना आढळले. डोळे भरले प्रसंग वाचतांना ! जालिंदरच्या समर्थकांचा फोटोही खूपच सुरेख आला आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/02/2009 - 06:33
'क्षणभंगुर सिंगूर' या त्यांच्या काव्याला आमची प्रस्तावना आहे, हे सांगतांना खूप आनंद होत आहे. आपले अभिनंदन... हेच हेच ते सरप्राईज असावे....( जालिंदरजींनी खास जलालाबादची ब्रह्मगोळी (त्यांना उत्कृष्ट अफू खायला आवडते) खाताखाता मला एक हिंट दिली होती) एका महान साहित्यिकाला दुसर्‍या महान कवीकडून साहित्यसुमनांजली अर्पण केली जाण्याचा अपूर्व योग येत आहे. रसिक आपल्या प्रस्तावनेचीही वाट पाहत आहेत. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ गुरुवार, 04/02/2009 - 15:29
'क्षणभंगुर सिंगूर' या त्यांच्या काव्याला आमची प्रस्तावना आहे, हे सांगतांना खूप आनंद होत आहे.
सिंगुरला क्षणभंगूर म्हटल्याने सिंगूरवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्याला साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष वगैरे व्हायचे असेल तर निवडणूकी आधीच ते प्रकरण निपटा बॉ :) -- लिखाळ.

बामनाचं पोर गुरुवार, 04/02/2009 - 05:35
ह. ह .पु. वा. =)) =)) =)) इतक्या प्रतिभावंत लेखकाचा सहवास लाभला हे मास्तरांचे भाग्यचं.... पण इतकी वर्षे ही माहिति दडवुन ठेवल्या बद्दल णिशेढ... णिशेढ .. णिशेढ ..

In reply to by विसोबा खेचर

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 04/02/2009 - 09:56
तात्या, मास्तरांपुढे नतमस्तकतर मी पण आहेच. पण मास्तरांच्या गुरूंचा अनुल्लेखाने अनादर करू नका! असा महान लेखक, क्रिडापटू, संगीतज्ञ इ. इ. पुढच्या पाच अब्ज वर्षांत होणे नाही. वरचे सर्व प्रतिसादही भयंकर विनोदी आहेत, विशेषतः धनंजय, प्रा.डॉ., चतुरंग, टिऊ आणि मास्तरांचे! अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

दिपक गुरुवार, 04/02/2009 - 10:43
गुरु-शिष्यासमोर नतमस्तक. ___/\___ या महान साहित्यकाच्या जीवनावर एक चित्रपट यायला हवा.

पहाटवारा गुरुवार, 04/02/2009 - 11:51
मास्तरांचा लेख अन त्यावर्च्या सुपर्हिट प्रतीसाद पाहुन 'हुज लाइन इझ इट एनीवे '' या इन्ग्र्जी कार्यक्रमाची आठवण झाली. झकास!!

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 04/02/2009 - 12:40
आहा हा काय ते गुरु आणी आ हा हा काय ते शिष्योत्तम भडकमकर गुर्जी. लेख वाचला आणी डोळ्यासमोर रामदास स्वामी आणी कल्याण उभे राहिले. पराबा ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

अदित्य गुरुवार, 04/02/2009 - 16:32
मास्तर तुमच्या या महान गुरु चा शिश्य होउन ह्या उच्च गुरु शिश्य परम्परेत मला स्विकारा, म्हणजे मि पण मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा अन्तरजाला वर फ़डकावत राहिल व आपल्या साम्प्रदयाचे भविश्य उज्वल करिन.

डॉ.प्रसाद दाढे Fri, 04/03/2009 - 10:29
मास्तरांचं पुन्हा एकदा अभिनंदन! च्यायला खूप दिवसांत एव्हढा हसलो नव्हतो.. हे असलं लेखन आणि असले इरसाल प्रतिसाद फक्त मिसळ-पाववरच वाचायला मिळतात.. तरी अजून विजूभाऊ, रामदास, पिडा आदींनी हे वाचलेलं दिसत नाही.. त्यांचीही वाट पाहात आहे

मदनबाण Fri, 04/03/2009 - 12:07
मास्तर जबराट लिवलयं तुम्ही... :) मदनबाण..... मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी जालावरुन सभार...

वाहीदा Fri, 04/03/2009 - 13:34
सुरवातीला वाचताना या महान लेखकाचे एक ही पुस्तक आपण कसे वाचले नाही अन नावही कसे काय ऐकले नाही या पेचात होते :?. त्यांचे नाव डायरीत निट लिहून ठेवले अन मगच लेख वाचायला घेतला "जियो जालिंदर जियो"... ऐवजी "पियो जालिंदर पियो" असे वाचले पण ऐवढ्या मोठ्या लेखकाचा आपण चुकून अपमान करत आहोत हे जाणवले . पण खालील वाक्ये वाचून हसणे अनावर झाले वीस हजार फ़ुटांवरून हवाई छत्रीतून उडी घेऊन त्यांनी दक्षिण गंगोत्रीवर आगमन करणे अपेक्षित होते; त्यांनी तशी उडी घेतलीही परंतु हवाई उडीची सवय नसल्याने ते मूळ जागेहून ३० किलोमीटर दूर जाऊन पडले, तिथून १२ दिवस जीवघेण्या थंडीत पदभ्रमण करत असताना त्यांना वाचवले गेले. पण ते सापडले तेव्हा ते पेन्ग्वीनच्या एका जथ्याला आपली कविता वाचून दाखवताना आढळले. प्रतीसाद वाचून हसता हसता पडेन असे वाट्ले भडकमकर मास्तर तुम्ही अगदी थोर आहात तुमची थोरवी मिपाकर नेहमीच गाणार :-) मिपा मुळे तुमचे लेखन आम्हास लाभले म्हणून तात्यांचे ही आभार ! ~ वाहीदा

शरदिनी Fri, 04/03/2009 - 15:42
फार अतिशयोक्त लिहिले आहे. स्पश्ट बोल्ते..राग नसावा. नाही आवड्ले. ... विद्रोही चल्वलीचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा

In reply to by शरदिनी

>>विद्रोही चल्वलीचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा लोकप्रिय साहित्यिकाचे असे विडंबन करु नये ! शरदिनी,तुम्ही प्रतिसाद सिरियसली लिहिला काय ? :?

In reply to by दशानन

आंबोळी Fri, 04/03/2009 - 22:26
विद्रोही चल्वलीचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा पण अशी धमकी देताना शरदिनीतैनी "मोकलाया दाहि दिशा" या अभिजात आणि नितांत सुंदर कवितेची स्टाईल चोरली आहे. अशी दुसर्‍याची स्टाईल चोरून तुम्ही लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा (ह.घ्या) बाकी मास्तर एकदम हुच्च झालय लिखाण. दंडवत! जय जालिंदर जय मास्तर प्रो.आंबोळी

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत Fri, 04/03/2009 - 18:28
>>विद्रोही चल्वलीचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा १. या लिखाणात "विद्रोही चल्वलीचे" विडंबन नक्की कसे केलेले आहे ? २. मी लेख वाचला. त्यातून लेखकाने "मी लोकप्रिय व्हायला हवे" अशी इच्छा आणि दावा केल्याचे दिसले नाही. ३. राहिला प्रश्न कशाचेही विडंबन करावे का करू नये ? याचा. तर करावे. जरूर करावे. विडंबन करण्यायोग्य नाही असे जगात काहीही नाही. विडंबनातसुद्धा प्रकार आणि श्रेणी असतात. प्रस्तुत लेखाची श्रेणी उत्तम आहे असे मला व्यक्तिशः वाटले. - उत्तरांच्या बाबतीत उत्सुक.

In reply to by शरदिनी

भडकमकर मास्तर Fri, 04/03/2009 - 17:40
विद्रोही चल्वलीचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा अहो पण जालिंदरजी हे कल्पनेतील व्यक्तिमत्त्व आहे... त्यांचे विडंबन आहे हे .... कोणत्याही साहित्यिक चळवळीला हीन लेखायची इच्छा नव्हती. ... वाटल्यास लेखन मागे घेतो. नाक घासतो. अध्यक्षपद सोडतो. वगैरे वगैरे काहीही मी करणार नाही. :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाटल्यास लेखन मागे घेतो. नाक घासतो. अध्यक्षपद सोडतो. वगैरे वगैरे काहीही मी करणार नाही. हा हा हा ! मास्तर लैच फॉर्मात दिसताय ! :)

अवलिया Sat, 04/04/2009 - 12:43
हा हा हा ! मास्तर लैच फॉर्मात दिसताय :) --अवलिया जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते

अभिज्ञ Sat, 04/04/2009 - 15:44
मास्तरांचे अभिनंदन. थोर साहित्यिक जालिंदर जलालाबादि ह्यांची गेली कित्येक वर्षे उपे़क्षित असलेली मराठी साहित्य सेवा मास्तरांमुळे सर्वज्ञात झाली आहे. विद्रोहि व अतिविद्रोहि अश्या दोन्ही व्यासपीठावर जालिंदरजींनी आपलि छाप पाडलेली दिसते. बुरुंडि र्वाडा ह्या आफ्रिकन "देशा"वरिल भागात मराठी साहित्याचि मुहुर्तमेढ रचण्याचे मोठे कार्य त्यांनी केलेले दिसते. त्यामुळेच त्या भागाच्या पश्चिमेला असलेल्या सिएरा- लोओन सारखा समुद्रालगतचा भाग व पुर्वेला पसरलेला बोट्स्वाना सारख्या अप्रगत(?) भागातील मराठी लोकांना उगाचच उपेक्षेने वगैरे ग्रासल्या सारखे वाटत आलेले आहे,सबब त्या भागातहि महाराष्ट्र मंडळांत बुरुंडि र्वाडा ह्या भागातील साहित्यिकांबद्दल व एकंदरितच लोकांबद्दल व त्यांतील प्रमुख साहित्यिक म्हणुन जालिंदरजींबद्दल तीव्र मत्सर व असुया जाणवत आलेली आहे. साहित्य संमेलनात दिसलेल्या लाथाळ्या हा त्याचाच परिणाम असावा. मास्तरांनी दिलेल्या वर्णानानुसार जालिंदरजींचे काहि गुण पुरेपुर असलेले साहित्यिक जालावर वेगवेगळ्या नावाने आढळतात हा योगहि चमत्कारिकच मानला पाहिजे. ;) अभिज्ञ

पाषाणभेद Mon, 04/06/2009 - 13:46
आम्ही जालिंदर जलालाबादिंचे फॅन झालो. पुढेमागे आम्ही त्यांच्या पुढेमागे राहून त्यांचे समर्थक म्हणून राहू इच्छीतो. - पाषाणभेद

बेसनलाडू Fri, 04/10/2009 - 04:34
मास्तर, भल्याभल्या लेखकांनाच नाही तर भल्याभल्या वाचकांनाही आडवे केल्यासारखे लिहिलेत. लई भारी! आवडले. (वाचक)बेसनलाडू

मास्तर तुम्ही महान आहात, एकमेवाद्वितीय आहात. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

बाकरवडी Fri, 08/14/2009 - 16:37
वा वा क्या बात है !! "जियो जालिंदर जियो" :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

प्रास Fri, 06/08/2012 - 13:10
ज ह ब ह री लिखाण! बिकांनी आठवण करून दिल्याने पुन्हा वाचलं. मजा आली. जालिंदर जलालाबादींची इतकी इत्यंभूत माहिती दिल्याबद्दल भडकमकर मास्तरांचा आभारी आहे. आता अनेक दिवसांचं जालिंदर बाबांबद्दलचं मिपावरचं गूढ उकलायला मदत होईल. ;-)

जालिंदर जलालाबादींची प्रकृती सध्या कशी आहे याची कोणाला कल्पना आहे का? खूप दिवसांत त्यांचे काहीच खुसखुशीत लेखन वाचायला मिळाले नाही म्हणून काळजी वाटली.